श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘मामा’ (माहेरचा समृद्ध दुवा)

‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’, आजीच्या ‘संस्कारांची शिदोरी’ आणि आजोबांचे ‘सुरकुत्यांमधील शहाणपण’ अनुभवले. या महावस्त्रात एक अत्यंत हसरा, मनमोकळा आणि प्रेमाचा सुंदर रंग भरणारा पुढचा महत्त्वाचा पदर म्हणजेच ‘मामा’! या पदराची झळाळी अत्यंत विलक्षण आणि नजरेत भरणारी असते; कारण हा नात्यांमधील अतिशय महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा आणि विलोभनीय असा पदर आहे.

‘झुक झुक झुक अगीनगाडी… मामाच्या गावाला जाऊया’ हे गाणं ज्याला माहिती नाही, असा मराठी माणूस विरळाच! मामाबद्दलचे प्रेम आणि आदर आपण अगदी लहानपणापासूनच शिकतो. आकाशात दिसणारा चंद्र बाळाला दाखवताना आई त्याला प्रेमाने ‘चांदोमामा’ म्हणते. तो भलेही आपल्यापासून लाखो मैल दूर असतो, पण त्याच्याशी आपण लहानपणी नकळत कितीतरी गुजगोष्टी करतो! चंद्राची ती शीतल सावली आपण प्रत्यक्ष मामाच्या प्रेमात अनुभवतो. लहान मुलांच्या गोष्टींतही अनेक प्राणी ‘मामा’ बनून बोलू लागतात; तर खेळांमध्ये ‘माझ्या मामाचं पत्र आलं, ते मला सापडलं’ अशी सुंदर गाणी असायची. आजच्या काळात पत्रलेखनच बंद झाल्यामुळे आपण अशा अनेक चांगल्या गोष्टींना मुकलो आहोत.

‘मामा’ हा शब्द उच्चारताच कोणाच्याही चेहऱ्यावर एक निखळ हास्य आणि आपुलकी उमटल्याशिवाय राहत नाही. आपण कधी विचार केला आहे का, ‘मा-मा’ या शब्दात दोन वेळा ‘मा’ शब्द का येतो? पहिला ‘मा’ म्हणजे आईची अथांग ‘माया’ आणि दुसरा ‘मा’ म्हणजे आईचे ‘माहेर’! या दोन ‘मा’ अक्षरांच्या सुरेख मिलनातून साकार झालेला शब्द म्हणजेच मामा! संस्कृतमध्ये ‘मम’ म्हणजे ‘माझे’. जो पूर्णपणे आपला असतो, जिथे कोणत्याही मुखवट्याची किंवा संकोचाची गरज नसते, तो ‘मामा’! आईच्या माहेरची समृद्ध आठवण आणि भाच्यांच्या विश्वातला हक्काचा सखा म्हणजेच मामा असतो.

मला तीन मामा होते. तिघांचीही आर्थिक परिस्थिती तशी अगदी बेताचीच होती, पण त्यांच्याजवळील प्रेमाचा आणि संस्कारांचा झरा मात्र अक्षय—म्हणजेच कधीही न आटणारा होता! लहानपणी ‘मामा घरी येणार आहेत’ एवढं जरी ऐकलं, तरी मला जो आनंद व्हायचा, तो अक्षरशः अवर्णनीय असायचा. सुट्ट्यांमध्ये मामाकडे जायला मिळणे हा मोठा उत्सव असायचा. तिथे मामा आणि मामी माझे खूप लाड करायचे, मला आवडणारे खाद्यपदार्थ हटकून बनवले जायचे. याच मामांनी मला प्रेमासोबतच संस्कारांची खरी शिदोरी दिली. माझे धाकटे मामा तर माझे मामा कमी आणि मित्रच जास्त होते! त्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने शेअर करायचो; तेही मला योग्य-अयोग्य काय, हे नेहमी समजावून सांगायचे.

त्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती अगदी नाजूक असताना सुद्धा मामांनी माझ्या आईला तिच्या प्रत्येक अडचणीत वेळोवेळी खूप मदत केली. तिचे आई-वडील तर ती लहान असतानाच वारले होते; त्यामुळे मामाच तिचे आई-वडील झाले. त्यांनीच तिला सांभाळले, शिकवले आणि योग्य वेळी लग्न करून दिले.

आई आणि मामा यांच्यातील अतूट व जिव्हाळ्याच्या बंधनाचा एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग मला आजही आठवतो. एकदा आई खूप आजारी होती, त्यावेळी मी लहान होतो. मामा शहरात राहत असल्याने आईला त्यांच्याकडेच ठेवावे लागले. नंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिचे एक मोठे ऑपरेशन झाले. त्या दरम्यान तिला प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि तातडीने रक्ताची गरज निर्माण झाली होती. अशा वेळी माझे मामा तिथे देवासारखे धावून आले. त्यांनी स्वतःचे रक्त देऊन माझ्या आईचे प्राण वाचवले! अशा कधीही न विसरता येणाऱ्या मामांच्या अनेक आठवणी माझ्या आठवणींच्या कप्प्यात जपलेल्या आहेत.

लहानपणीच्या आठवणींचा पट उलगडला, की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि ‘मामाचं गाव’ हे समीकरण सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं. ‘मामाच्या गावाला जाऊया, तिथे जाऊन मजा करूया’ ही बालगीतातली ओळ प्रत्येक लहान मुलाच्या आवडीची असते. मामाचं घर म्हणजे मुलांसाठी कडक शिस्तीतून मिळालेली एक हक्काची ‘मुक्त शाळा’! जिथे आई-बाबांचा ओरडा नसतो, अभ्यासाची कटकट नसते; असतो तो फक्त आणि फक्त भाचेमंडळांचे लाड पुरवणारा मामा! आई जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी नकार देते, तेव्हा भाचेमंडळी आपला हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी ज्याच्याकडे विश्वासाने धाव घेतात, तो मामाच असतो. भाच्यांच्या आनंदासाठी स्वतः लहान मूल होणारा, सुट्ट्यांमध्ये त्यांना फिरायला नेणारा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारा मामा प्रत्येक मुलाच्या बालपणाला आनंदाचे इंद्रधनुषी रंग देऊन जातो.

मामाच्या या अथांग मायेचा आणि बालपणीच्या आनंदाचा विचार करताना एका अत्यंत महत्त्वाच्या नात्याचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्णच होऊ शकत नाही—ते नातं म्हणजे ‘मामी’! मामा जे लाड करतो, बहिणीला धीर देतो किंवा भाच्यांच्या पाठीवर हात ठेवतो; या सगळ्यामागे ‘मामीची साथ आणि तिचे औदार्य’ खूप मोठे असते. मामी जर संकुचित वृत्तीची असेल, तर मामाचं घर भाच्यांसाठी कधीच उघडं राहू शकत नाही.

मामी ही केवळ मामाची पत्नी नसते, तर नावातच दडल्याप्रमाणे ती भाच्यांसाठी ‘मा-मी’ म्हणजे आईसारखीच दुसरी माउली असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळी भाचेमंडळी घरी आल्यावर, अजिबात कपाळावर आठी न आणता, हसतमुखाने त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणारी, त्यांचे कौतुक करणारी मामी खऱ्या अर्थाने त्या घराचे घरपण जपते. प्रसंगी ती स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष करून भाच्यांचे लाड पुरवते! नणंदेच्या संसारातील दुःखात तिला आपल्या सख्या बहिणीसारखा मायेचा आडोसा देणारी मामीच असते. म्हणूनच, मामाच्या माहेरचा हा ‘सुगंध’ टिकवून ठेवण्यात मामीचे योगदान अनन्यसाधारण आणि वंदनीय आहे!

मामा या नात्याचे रूप केवळ लाड पुरवण्यापुरते मर्यादित नाही; तर कठीण प्रसंगात तो कुटुंबाचा भक्कम कणा बनतो. दुर्दैवाने ऐनवेळी कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणजे मुलांचे वडील वारल्यानंतर, विस्कळीत झालेल्या कुटुंबाला आणि दुःखात बुडालेल्या आईला खऱ्या अर्थाने सावरणारा तिचा भाऊ म्हणजेच मुलांचा मामाच असतो. अशा वेळी मामीसुद्धा आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्या भाच्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे सामावून घेते.

याचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक उदाहरण म्हणजे भारताचे महान सुपुत्र, पहिले थोर इंजिनियर भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या! सर विश्वेश्वरय्या लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. अशा अत्यंत बिकट आणि कठीण प्रसंगात त्यांच्या आईला आणि बाल-विश्वेश्वरय्यांच्या शिक्षणाला त्यांच्या मामाने विश्वासाचा आणि भक्कम आधार दिला. मामाने लावलेल्या या विश्वासाच्या रोपट्यातूनच पुढे देशाचा एक महान शिल्पकार घडला!

मामा-मामी आणि भाच्यांचे हे प्रेम केवळ भावनांपुरते मर्यादित न राहता व्यवहारातही अगदी मूर्त स्वरूपात दिसते. आपल्याकडे अनेक हॉटेल्स, दुकाने किंवा व्यवसायांची नावे ‘मामा-भाचे’ अशी असलेली आपण आवर्जून पाहतो. ही केवळ व्यावसायिक नावे नसतात, तर एकमेकांवरील अथांग विश्वास, साथ आणि प्रेमाचे ते जिवंत प्रतीक असतात.

आपल्या संस्कृतीच्या इतिहासात पौराणिक कथांमध्ये या नात्याच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही छटा दिसतात. एका बाजूला स्वतःच्याच बहिणीच्या अपत्यांची निर्दयपणे हत्या करणारा आणि श्रीकृष्णाला मारण्यासाठी कपट-कारस्थाने रचणारा दुष्ट कंस मामा, तसेच भाच्यांना कपटाने युद्धाच्या गर्तेत लोटणारा कारस्थानी शकुनी मामा यांसारख्या कुप्रसिद्ध प्रवृत्ती होत्या; तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णाचे अर्जुनाच्या आणि पांडवांच्या पाठीशी असलेले खंबीर मार्गदर्शकाचे नातं होते. कृष्णाने भाच्यांवर म्हणजे अभिमन्यूवर केलेले प्रेम आणि दाखवलेला धर्ममार्ग आजही नात्यांचा आदर्श मानला जातो.

मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते, तेव्हा तिच्या माहेरची खरी ताकद आणि आधार तिचा भाऊ आणि वहिनी असतात. बहिणीच्या सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा, तिच्या मुलांच्या लग्नसमारंभात किंवा शुभकार्यात ‘माहेरचा मान’ म्हणून आस्थेने पुढाकार घेणारा मामा कुटुंबातील नात्यांची वीण अधिक घट्ट करत असतो.

कधी कधी आपले काम साधून घेण्यासाठी लोक एखाद्याला ‘मामा’ म्हणतात, त्यावरूनच बहुधा ‘कामापुरता मामा’ ही म्हण आली असावी. पण खरा मामा हा कामापुरता कधीच नसतो! तो कायमच आपल्या नात्याचं भान आणि जबाबदारी सांभाळत असतो. बहिणीकडे सगळ्या कार्यक्रमात तो हक्काने राबत असतो—अगदी पु. ल. देशपांडे यांच्या कथेतील ‘नारायण’सारखा! त्याच्या उपस्थितीशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा यांनी अंतरपाट धरल्याशिवाय तर आपल्याकडे लग्नच लागत नाही! तो एक प्रकारे मामाने भाच्याला आणि भाचीला दिलेला प्रेमळ आशीर्वादच असतो. भाच्यांच्या लग्नात मंडपात ‘मामाचा मान’ आणि त्यांनी दिलेली भेट ही केवळ वस्तू नसते, तर त्यात आपल्या बहिणीच्या संसाराबद्दलची अखंड कृतज्ञता साठलेली असते. बऱ्याच समाजात अजूनही मामाची मुलगी करण्याची प्रथा आहे. जेव्हा मामांची मुलगी लग्न होऊन आत्याकडे सून म्हणून येते तेव्हा त्या निमित्ताने दुसरी पिढी पुन्हा जोडली जाते. नात्यांचा गोफ आणखी घट्ट होतो.

आजच्या आधुनिक आणि गतिमान युगात, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जाण्याचे प्रमाण थोडे कमी झाले असले, तरी ‘मामा-मामी’ या नात्यातील ओलावा आणि आपुलकी आजही तशीच टिकून आहे.

आजच्या बदलत्या काळातही भाच्यांशी मित्रासारखे नाते जपणारा, त्यांच्या करिअरच्या आणि आयुष्याच्या टप्प्यावर पाठीवर विश्वासाचा हात ठेवणारा मामा आणि मायेची सावली देणारी मामी आजही तितकेच हवाहवासे वाटतात. नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा मामा-मामीचा पदर माहेरच्या मायेचा समृद्ध सुगंध घेऊन येतो. हा पदर जेवढा प्रेमाने आणि आदराने जपला जाईल, तेवढं आपलं कुटुंब आणि आपले आयुष्य अधिक आनंदी व सुकर होईल!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted