सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
विविधा
☆ श्रावणी पौर्णिमा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला नारळीपौर्णिमा, राखी पौर्णिमा, पोवती पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा” अशी नावे आहेत.
पूर्वीपासूनच नारळी पौर्णिमा म्हणून या दिवशी नारळाचे अनेक पदार्थ केले जातात. नारळीभात, करंज्या, वड्या, पोळ्या यांचा नेवैद्य देवाला दाखवून आनंदाने खातात.
कोळी लोक समुद्राची पूजा करतात. पावसाळ्याच्या सुरूवातीचे दिवस म्हणजे माशांचा प्रजनन काळ. म्हणून या काळात ते मासेमारी बंद ठेवतात. नारळी पौर्णिमेला समुद्र पूजन करून श्रीफळ अर्पण करून ते समुद्रात होड्या नेतात व मासेमारी सुरू करतात. समुद्र हे वरुण देवतेचे स्थान मानले जाते. वरूण पश्चिमेचा दिक्पाल आहे. या पौर्णिमेला त्याला श्रीफळ अर्पून कृतज्ञता व्यक्त केली जाते.
राखी पौर्णिमा हा खरेतर उत्तर भारतातला सण. पण आज पूर्ण भारतात बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून सर्वांना हवाहवासा वाटतो.
राखी या शब्दातच खूप मोठा अर्थ आहे. राख म्हणजे सांभाळ कर असे सांगणे. धर्मशास्त्रामध्ये या पौर्णिमेला राखी बांधावी असे सांगितले आहे. या विधीला ” पवित्रारोपण ” असे म्हणतात. आपल्याकडे भावाचा उत्कर्ष व्हावा, त्याचे प्रेम व पाठबळ आपल्याला मिळावे या हेतूने बहीण भावाला राखी बांधते. काही प्रांतात नोकर मालकाला, ब्राह्मण यजमानाला, मुलगी वडिलांना, पत्नी पतीला राखी बांधते. त्यामागे एकच भावना असते आपल्यापेक्षा सक्षम माणसाने आपले रक्षण करावे. एका रेशमी धाग्याने नात्यांचे रक्षण व्हावे एकमेकांना भेटावे हात हेतू आहे.
यामागे अशी कथा आहे की एकदा देव आणि दानव यांच्या त तुंबळ युद्ध झाले. दानवांचा राजा होता बलाढ्य वृत्रासुर. देवांचा राजा होता इंद्र. दोघेही पराक्रमी होते. इंद्राचा विजय व्हावा म्हणून त्याच्या पत्नीने तिला भगवान विष्णूंच्या कडून मिळालेला एक दोरा म्हणजेच राखी त्याच्या हातात श्रद्धेने बांधली. इंद्राचा विजय झाला. त्याचे सगळे वैभव त्याला परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून दरवर्षी रक्षाबंधन साजरे करु लागले.
एक ऐतिहासिक कथा सुद्धा आहे. बहादूरशहाने चितोड वर स्वारी केली. चितोडची राणी कर्मवती हवालदिल झाली. तिने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली. त्या राखीचा सन्मान करून हुमायूँ बादशहाने तिला बहीण मानून मदतीचा हात दिला. आपले सैन्य पाठवले व बहादुर शहा ला पळवून लावले. रक्षाबंधनाला जाती-पातीचे बंधन नाही हेच यावरून सिद्ध होते.
पूर्वी राज्याचा मंत्री राजाला राखी बांधत असे. त्यावेळी तांदूळ, सोने व पांढर्या मोहर्या एकत्र करून त्याची पुरचुंडी बांधून रक्षा म्हणजे राखी तयार करत. तिची पूजा करत. त्यावेळी खालील मंत्र म्हणून राज्याचा मंत्री राजाला राखी बांधत असे
येनबघ्दो बळीराजा
दानवेन्द्रो महाबल:
तेनत्वामपि बध्नामि
रक्षे मा चलमाचल.
याचा अर्थ असा आहे की महाबली दानवेन्द्र बळीराजा जिने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुला हि बांधतो. हे रक्षे, तू चलित होऊ नकोस” यावरून मुळचे रक्षाबंधन राजासाठी होते असे दिसते. आज मात्र बंधू व बंधू समान असलेल्या सर्वांना राखी बांधली जाते.
” पोवती पौर्णिमा” असेही एक नाव आहे. कापसाच्या सुताच्या नऊ धाग्यांची जुडी करून तिला. 8-12 किंवा 24 गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रम्हा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांना आवाहन करून हे पोवते प्रथम देवाला वाहून तसलीच पोवती तयार करून कुटुंबातील इतर सदस्यांना मनगटावर बांधली जातात.
श्रावणी पौर्णिमा या दिवशी पूर्वी कुमारांना शिक्षण घेण्याचा मुहूर्त समजला जात असे. ब्राम्हण लोक या दिवशी यज्ञोपवीत बदलण्याचा कार्यक्रम करतात.
तमिळी पंचांगाप्रमाणे या पौर्णिमेला” अवनी” असे नाव आहे. तमिळ महिना ते अवनी या कालाला ” अवित्तम ” असे म्हणतात.
अवित्तम म्हणजे धनिष्ठा. श्रावणात जेव्हा लागोपाठ दोन दिवस पौर्णिमा येते तेव्हा दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो. लागोपाठ दोन दिवस पौर्णिमा आली तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मण श्रावणी साजरी करतात.
जैन लोक हा दिवस रक्षा पर्व म्हणून पाळतात. जैन मंदिरामध्ये राख्या ठेवल्या जातात. जैन मुनि त्यांचे आदराने स्वागत करतात.
उत्तर भारतात नौकर मालकांच्या हाताला राखी बांधतात.
उत्तराखंडमध्ये चंपावत जिल्हा आहे. तेथील देईपुरी इलाख्यात बरही नावाची देवी आहे. तिला खूष करण्यासाठी गावातल्या दोन गटात दगडफेक चालू करतात. यात अनेक लोक जखमी होतात म्हणून आत्ता हायकोर्टाने त्यावर बंदी घातली आता तेथील लोक दगडां ऐवजी एकमेकांना सफरचंद मारतात.
उत्तर भारतात एकादशी ते पौर्णिमा झुलन यात्रा उत्सव असतो. श्रावण पौर्णिमेला राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देत गीते गातात.
अशाप्रकारे श्रावण पौर्णिमा हा आनंददायी सण सर्वत्र साजरा केला जातो.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





