सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

 

☆ “दहीहंडी…!” ☆ सुश्री शीला पतकी 

काल टीव्ही वरती सर्वत्र दहीहंडी दाखवण्याचा कार्यक्रम होता वेगवेगळ्या स्तरावरती मोठ्या धाडसाने मुलं चढत होती. बघणार्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. मोठे मांडव, मोठे स्टेज त्यावर वाद्यरुंदाचा प्रचंड मोठा आवाज. गोविंदा हिरीरीने वर चढत होते आणि त्या मंडळाने बांधलेली दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते. दहीहंडी फोडणाऱ्याला लाखांनी बक्षीस होते. तरुण मुलांनी अनेक दिवस सराव केलेला हा खेळ मुंबईत खूपच लोकप्रिय आहे. मोठाली बक्षीस लावली जातात, व्यासपीठावरती चित्रपट सृष्टीतील अनेक नावाजलेली मंडळी हजेरी लावतात, राजकीय व्यासपीठावरील मंडळी तिथे दिसतात. मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्तींच्या नावाने मंडळांनी बक्षीसं ठेवलेली असतात आणि हजारोंच्या संख्येने लोक ते पाहायला आलेले असतात. हा सगळा थरार काल टीव्हीवरून पाहत होते महिला मंडळही मागे नव्हतेच तरुण मुलीही या खेळात हिरीरीने पुढे होत्या. सगळ्यात कौतुक होते त्या छोट्या मुलाचे जो वरच्या थरावरती जाऊन आपले दोन्ही हात सोडून नमस्कार करून हंडी फोडत होता. सगळेच जीवघेणे होते. 95 गोविंदा जखमी झाले आणि एका गोविंदाचा मृत्यू झाला हे दरवर्षी ठरलेलेच असते. दहीहंडी याचा अर्थ हा नाहीच मुळी. कृष्ण जन्मानंतर दहीहंडी फोडण्याची पद्धत आपल्यामध्ये आहे पूर्वी शाळा शाळातून छोटे कृष्ण तयार करून मध्ये बाजूला आणखीन छोटे कृष्णा किंवा गोप गोपिका तयार करून त्याच स्टुला वर तो छोटा कृष्ण उभा राहत असे ती छोटी बांधलेली दहीहंडी फोडत असे. हे दृश्य आम्ही पाहिले किंवा जास्तीत जास्त दोन तीन थराची हंडी पण काल दहा थराच्या हंडी ने पारितोषिक प्राप्त केले असे दोन गट निघाले. हि बातमी मी टीव्हीवर पाहिली. त्याशिवाय टीव्हीवर जे दिसत होते ते खूप भयानक होते अनेक नृत्यांगना हिडीस नृत्य करत होत्या समोरच्या मॉबला प्रोत्साहित करत होत्या. कंबर लचकवणे, शरीराचे वेडे वाकडे अंग विक्षेप ज्याला म्हणतो ते करणे चालू होते. मागे तसेच भयानक गाणी लावली जात होती. समोरची 17 /18 वर्षाची मुले त्याच्या मागे बसलेले तरुण ही आपली सगळी तरुणाई कंबर लचकावून दोन्ही हात बाजूला घेऊन शरीर घुसळून नाचत होती आणि विचित्र हातवारे करत होते. क्षणभर वाटला हा आपला भारतीय संस्कारच नव्हे! पण हे कोण सांगणार? हे दृश्य पाहून खूप वाईट वाटले.

दहीहंडीचा खरा अर्थ एका कीर्तनकाराने फार सुंदर सांगितला श्रीकृष्णाच्या काल खंडात दहीहंडीचे जे वर्णन आहे त्यामध्ये चार थराची दहीहंडी चौथ्या थरावर श्रीकृष्ण, आणि ती दह्याची लोण्याची हंडी फोडून श्रीकृष्ण तो ती हंडी फोडून तळ्यातल्या माणसाला पहिल्यादा खायला देतो. इथे समाज व्यवस्थेवरती खूप छान भाष्य केलं गेल आहे ते म्हणतात, ” समाजात त्या काळात चातुर्वर्ण रचना होती ती कर्मानुसार होती म्हणजे कामानुसार भाग्यानुसार नाही मग या चारही थरामध्ये चौथ्या थरावर चढून जाणारा जो आहे तो या तिन्ही थरांच्या मदतीने वर गेलेला आहे त्याची जबाबदारी आहे की तळागाळातल्या प्रत्येक माणसाला त्या हंडी मधला ऐवज मिळाला पाहिजे पहिल्यांदा तो तृप्त झाला पाहिजे नाहीतर मी हंडी फोडतोय मीच तिथे बसून लोणी खाणार असं कृष्णाने कधीच केलं नाही त्या हंडीतल्या धारा सगळ्या तळामध्ये प्रथम येत असत आणि त्यानुसार प्रत्येक थरातल्या माणसाला ते सर्व मिळाले पाहिजे हा अट्टाहास होता. वरच्या थरामधल्यानेच बसून सगळं खायचं नाही”. उत्तम संदेश आहे ना आज चातुर्वर्ण जरी नसेल तरी विचार किती सुंदर आहे की अगदी समाजातल्या तळातल्या माणसाला सुद्धा जे मी खाणार आहे ते मिळाले पाहिजे आणि त्यांनी खाल्ल्यानंतर मला ते उपलब्ध झाले पाहिजे किंवा त्याला दिल्याशिवाय मी खाता कामा नेये. त्याचे पोट भरणे ही माझी जबाबदारी आहे किती सुंदर संदेश मला त्या कीर्तनकारांचा हा खुलासा अतिशय आवडला. हंडी अशी श्रद्धेने झाली पाहिजे पण आज त्याला काही अर्थ उरला नाही आज हे सगळे सण इव्हेंट झालेत. राजकीय पक्षांचे तरुणाईला आपल्याकडे खेचण्याचे व्यासपीठ ठरले आहेत आणि त्या सणांना वाईट रूप आले आहे. गोविंदा आपलं कसब आपली कला आपलं कौशल्य दाखवत असतात त्यासाठी मेहनत करतात हे प्रेक्षणीय आहे पण त्या त्या स्टेजवर चाललेला धिंगाणा अत्यंत वाईट आहे ही सगळी राजकीय शर्यत आहे आपल्या राजकारण्यांनी अशा अनेक ठिकाणी घुसखोरी केली आहे आणि त्या सणांच पावित्र्य नष्ट केलय. सरकार पक्षाला नामोहरम करणे इतकंच काम उरल आहे. उलट अशा सणांच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा एकत्रितपणे काम करून आपल्या तरुणाईला आपल्या संस्कृतीला साजेचा उत्सव साजरा करायला प्रोत्साहन देणे हे त्यांचे काम असायला हवे. न की बाया नाचवणे ती सुंदर नृत्य असती तरी छान वाटले असते परंतु त्या नृत्यांमधला नृत्य हा शब्द मी चुकीचा वापरते त्या नाचा मधला भडकपणा अंगवीक्षेप बाईच्या प्रत्येक अवयवाचे दर्शन अत्यंत वाईट पद्धतीने दाखवले जात होते ही आपली संस्कृती नाही हा आपला संस्कार नाही हे या तरुण पिढीला कोण सांगणार? आणि सांगणारा असला तरी त्यांना पटणार का? हा प्रश्न आहे कुठे जाणार आहोत आपण? …..!

मंडळी तुम्हाला काय वाटतं……?

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted