श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “मी, चारधाम, आणि घोडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

त्यांनी निर्णय घेतला. चारधामला जायचं आणि सोबत मलाही न्यायचं.

याच यात्रेत बर्याच वर्षांनी माझा आणि घोड्याचा परत एकदा संबंध आला तो केदारनाथला जातांना.

पहिल्यांदा बहूतेक जणांचा घोड्याशी संबंध येतो तसाच माझाही आला होता. हो बरोबर……. लग्नात. त्यावेळी घोड्यावर बसल्यानंतर येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायचे आहे हे माहीत होत. त्याची शारिरीक व मानसिक तयारी होती. आणि एक आनंदाची सळसळ मनात होती. पण यावेळी घोड्यावर बसल्यानंतर कोणत्या प्रसंगाला तोंड द्याव लागेल हे खरंच सांगतायेत नव्हत. आणि आता परत घोड्यावर बसून काय तोंड देणार……. कारण पहिल्या प्रसंगानंतर तोंड देण्याची वेळ वारंवार आली तसंच तोंडावर पडण्याची वेळही खूपदा अनुभवली होती.

पहिल्यांदा मी कोणाचातरी नाथ होणार म्हणून घोड्यावर (स्वत:हून) बसलो होतो. आता केदारनाथला जातांना मात्र मला अक्षरशः उचलून, जवळपास टांगाटोळी करतच कसबस घोड्यावर चढवल होतं. सगळ्या प्रवासात चढवणे आणि उतरवणे हा कार्यक्रम एकूण सहावेळा झाला. कदाचित या कार्यक्रमाला तो घोडाही कंटाळला असावा.

प्रवास संपल्यावर मी एकदाचा उतरल्यावर घोड्यावरच पाठीवरचंच काय मनावरचही ओझं उतरलं असेल. माझ्या ऐवजी घोड्यानेच सुस्कारा टाकला असेल. पण आम्ही दोघंही सुटलो होतो.

केदारनाथला जाणारी शेकडो माणसं होती. आणि बरेचजण घोड्यावर जातात. त्यामुळे तिथे जाणारे, घोडे, आणि घोड्यावर बसवून नेणारे यांची यात्रा नव्हे तर बाजार भरल्यासारखं वाटत होतं. घोडेवाले घोड्यांची आणि जाणारा त्यावर बसायची किंमत आपल्यापरीने ठरवत होता. राजकारणात घोडेबाजार हा शब्द ऐकला आहे. त्याची थोडी कल्पना आली.

तो घोडा आहे का खेचर हेच या घोड्याला म्हणजे मला समजलच नाही. पण सगळे घोडा म्हणत होते म्हणून मी पण त्याला घोडाच म्हणत होतो.

वाढत्या वयानुसार कोणी तसं वागलं नाही तर आपण सहजपणे म्हणतो. नुसता वाढला आहेस घोड्यासारखा…….. पण घोडा माणसाला काय म्हणत असेल? ……. असा प्रश्न पडला. पण घोडाच तो. काय म्हणेल? ….. घोडाच म्हणेल… अशी मी माझीच समजूत काढली.

सगळेच मला म्हणत होते, घोड्यावर नीट बैस… हे इतक्यावेळा सांगून झालं, की नंतर माझ्याबद्दल घोड्यालाही शंका आली असावी. आणि तो सुध्दा मनातल्यामनात मला म्हणाला असेल. घोड्या….. वर नीट बैस……..

पहिल्यांदा घोड्यावर बसलो होतो त्यावेळी घोड्याकडे आणि त्याच्या काही सवयींकडे नीट लक्ष दिलं नव्हत. गरज वाटली नव्हती. आता घोड्यावर चार पाच तास बसायचं असल्याने त्यांच्या काही गोष्टी लक्षात येत होत्या.

पहिलं असं लक्षात आलं की इथे घोड्यांची काही कमी नाही…… आणि शक्यतो ते सतत आपल्या जोडीदाराबरोबरच राहण्याचा प्रयत्न करतात. काही कारणाने त्यांच्यात अंतर पडलच तर हर प्रकारे प्रसंगी थोड धावत पळत, वाट मिळेल तिथून, गरज पडल्यास मधे येइल त्याला हलकासा धक्का देत, इतरांच्या जोडीकडे दुर्लक्ष करत, आपल्या आणि आपल्याच जोडीदारासोबत राहतात. गर्दीतही आपला जोडीदार सोडत नाहीत.

आणि आपण……. गर्दीतही आपला जोडीदार सोडत नसलो, किंवा तो बरोबर असला तरी दुसर्यांचे जोडीदार कसे आहेत हे बघायचा मोह सोडत नाही.

या प्रवासात मला घोड्यावर शारिरीक धक्के खूप बसले. पण त्यांच हे बरोबरीने राहणं हा मला घोड्यान धक्का न देताही बसलेला धक्का होता.

पहिल्यांदा घोड्यावर बसलो तेव्हा….. आणि आता…… केव्हा एकदा खाली उतरतो असंच झालं होतं. फक्त दोन्हीवेेळा परिस्थिती आणि कारणं वेगळी होती.

इथे सगळेे पायी, घोड्यावर, डोलीने, पीट्टू करुन जातात. पीट्टू म्हणजे एक वेताची खूर्ची असते. त्यात बसवून ती खूर्ची पाठीवर ठेउन घेऊन जातात. पण कसाही केला तरी प्रवास सोप्पा नाही. कारण रस्ताच धड नाही. त्यातही चढाव आणि उतार. वातावरणाचा तसा भरवसा नाही.

पाउस असेल तर रस्ता ओला, निसरडा असतो. काही ठिकाणी थोडेफार वाहणारे किंंवा अंगावर उडणारे पाणी असते. डोंगरावरून घसरून आलेले थोडे दगड माती असते. घोड्यांनी केलेले नैसर्गिक विधी. (हे विधी साफ करायला ठिकठिकाणी माणसं असतात. पण जाणारे येणारेही काही कमी नसतात.) एकाच रस्त्यावर सगळेच, जाणारे आणि परत येणारे, घोडे, डोली, पीट्टू, रस्त्याच्या बाजूला असलेले खाद्यपदार्थवाले. त्यात एका बाजूला डोंगर, पर दुसर्‍या बाजूस खोल दरी.

त्यातही मोबाईलवर फोटो काढणारे, शूटिंग करणारे, आणि व्हिडिओ काॅल करणारे. यांचा उत्साह पराकोटीचा होता. पण घोड्यावर बसून प्रवास करणार्‍या काही लोकांचे चेहरे खरच फोटो काढण्यासारखे होते. कदाचित माझाही चेहरा तसाच असेल. पण तो न काढल्याने घोड्याच्या एका बक्षीसपात्र फोटोस सगळेच मुकले.

डोली म्हणजे पाय थोडे लांब करुन बसतायेइल अशा खुर्चीला बाजूला दोन दांडू आणि त्या दांडूंना पुढे आणि मागे एक आडवा दांडू असतो. आणि पुढे दोन आणि मागे दोन असे चारजण मिळून उचलून घेऊन जातात. वर सांगितलेल्या गर्दीच्या आणि व्यवस्थित नसलेल्या रस्त्यावरून ते चौघं डोलीत बसलेल्या माणसाचं वजन सांभाळत घेऊन जातात. चढ आणि उतार काहिही असलं तरी वजन सांभाळत आपसात समन्वय साधत प्रवास पूर्ण करणं कठीण आहे. वजन घेउन चढतांना धाप लागते, आणि उतारावर तोल, वेग, आणि रस्त्यावर असणारी गर्दी सांभाळावी लागते.

त्यामुळे दोन्ही बाजूचा प्रवास सुखरुप झाला, तर देव भेटला. नाहीतर आपणच देवाला भेटण्याची तयारी करावी.

सगळा एकूण प्रवास (गौरी कुंडला पोहोचण्या पासून केदारनाथ पर्यंत) जवळपास वीस किलोमीटर.

मी केदारनाथला गेलो तेव्हा थोडा पाउस आणि वातावरणात गारवा होता. मी तर स्वेटर चढवून त्यावर रेनकोट घातला होता. शिवाय हाताशी आधाराला काठी होतीच. पायी जाणारे जवळपास सगळेच काठी घेतातच.

आम्ही पैसे देऊन दर्शन घेणार होतो. पण त्याची वेळसुद्धा पहाटे साडेतीन वाजता होती. आम्ही रात्री दोन वाजताच तयार झालो असलोतरी पैसे न देता दर्शन घेणाऱ्यांची चाहूल रात्रभर होती. अंधारात सुध्दा ते जात असले तरी त्यांच्यासाठी मंदिराची दारं मात्र पहाटे पाचलाच उघडणार होती.

चारधाम ला जायचं तर चारदाम खर्च होणार हे गृहीत होत. याच कारण दुकानदारांना चहा, साखर, मीठ ते पाण्याची बाटली आणि सिलेंडर अशा सगळ्याच गोष्टी खालूनच वर आणि माणूस किंवा घोडा यांच्याच मदतीने पैसे मोजून वर न्याव्या लागतात. चहा जरी तीस रुपयांना मिळत असला तरी पाण्याची बाटली मात्र ऐंशी नव्वद रुपयांना मीळते.

तसच परिस्थिती नुसार घोडे, डोली, पीट्टू यांचे भावही (दर) बदलत असतात. आम्ही केदारनाथ उतरायला सुरुवात करणार तेव्हातर पाऊस होता. वातावरणात झालेल्या बदलामूळे फक्त वरुन खाली जाऊ देत होते. खालून वर सोडत नव्हते. त्यामुळे उतरायला घोडे जवळपास मिळतच नव्हते. आणि डोली व पीट्टू यांचेही दर वाढले होते. काही जणांनी पायी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. कारण वातावरण परत केव्हा निवळेल याची वाट बघण्यात वेळ जाणार होता. आणि परत एकाचवेळेस गर्दी वाढणार होती. आता निदान खालून वर येणार्यांची गर्दी नव्हती.

पण निसर्ग सौंदर्य अफाट आहे. ऊन, पाऊस, धबधबे, गारवा, हिरव्यागार डोंगरावर दिसणारा थोडा बर्फ, ढगाच्या वरुन जाणारा रस्ता. सगळच खास आहे. आमच्याबरोबर असणार्या तरुण मंडळींनी ते सौंदर्य पायी जातांना आणि येतांना अनुभवल. पण सहज आणि सोप्प आहे असं नाही.

चारधाम यात्रेत यमुनोत्री हि सराव परीक्षा आहे, तर केदारनाथ वार्षिक परीक्षा. कारण यमुनोत्री चं अंतर फक्त तीन चार किलोमीटर आहे. पण गंगोत्री आणि बद्रिनाथ सहज सोप्प आहे. तिथे सहज पायी जातायेत. चढाव उतार आणि अवघड रस्ता नाही.

अजूनही बरच काही सांगण्यासारखं आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted