श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “शून्य… शून्य… शून्य…” – भाग – २ ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
कालच्या लिखाणात शून्यामुळे आयुष्यात काय बदल जाणवले ते सांगितलं. पण विचार सुरुच होते. आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांनी हे काम केल नसत तरी कोणीतरी ते केलच असत. कस ते सांगता येत नाही. पण केलच नसतं तर…
आपल्या दिवसभरातल्या अनेक गोष्टी कशा झाल्या असत्या… आज वाचता न येणाऱ्या संख्या आम्ही शब्दांच्या सहाय्याने लीहू शकतो त्या संख्यांच काय झालं असतं. कारण शब्दात लिहिण्यासाठी सुध्दा ती आकड्यातली संख्या वाचतातर यायला हवी. यासाठी संदर्भच हवा असेल तर महापालिकेपासून देशाच्या आर्थिक नियोजनाचे आकडे पहा. केवळ मुंबई महापालिकेच बजेट जवळपास चौर्याहत्तर हजार कोटी आहे. इतके हजार कोटी आकड्यात कसे लिहीणार. आणि वाचणार केव्हा. पण शून्यामुुळेेच हे आकडे अस्तित्वात आले. लिहीले आणि वाचलेही गेले.
हे खूप मोठं उदाहरण झालं. पण शून्य नसत तर आमचा आजचा पगार कीती सांगितला असता? … आमची प्रगती पैशाकडून रुपयांकडे झाली असती का… शून्यामुुळेेच आकडे ०९ नंतर १० नंतर १०० असे वाढले आणि वाढतच राहिले.
शंभर आकडा आला, आणि सुरु झाली टक्केवारी. शून्य आणि तो वापरायचे नियम शोधले नसते तर आज गणित शिकवणाऱ्या शिक्षकांनी काय शिकवलं असतं… हा प्रश्न अंक असणाऱ्या सगळ्याच विषयाबाबतीत आला असता.
आज गाडीत पेट्रोल भरतांना सुध्दा तो म्हणतो, हं झिरो म्हणजेच शून्य बघा. शून्य नसता तर आम्ही काय पाहिलं असतं. सुुरुवात कुठून केली असती. वेळेचे सेकंद, मिनीटं, तास कसे मोजले असते. गाडीचा वेग कसा सांगितला असता. महिना किती दिवसांचा असता. वर्ष कसं मोजलं असतं. थर्मामिटरने ताप कसा मोजला असता.
एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर म्हणतो शंभरवेळा, किंवा हजारदा सांगून झालयं. तेव्हा काय म्हंटलं असतं. शंभरला शेकडा, शत, शतक असे पर्यायी शब्द मिळाले असते का… “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ” “शत जन्म शोधिताना” “सौ साल पहले… ” “तुम जिओ हजारो साल” गाण्यात अशा ओळी आल्या असत्या का… सोनं शंभर नंबरी झालं असतं का… कौरव कीती होते, याच ऊत्तर काय दिल असतं.
जपमाळ एकशेआठ मण्यांची कशी झाली असती. आमची संस्कृती इतकी जूनी आहे तर मग रौप्य, सुवर्ण, हिरक, अमृत, शतकोत्तर महोत्सव कसा मोजला किंवा सांगितला आणि साजरा केला असता.
त्यामुळे शून्याचा शोध लावल्यामुळे काही गोष्टी थोड्या त्रासदायक वाटत असतील. पण त्यामुळेच अनेक गोष्टी सोप्या वाटायला लागल्या आहेत. व्यवहार सहज आणि सोपे झाले आहेत.
आज गणितज्ञांंसह अनेकांनी प्रगती केली असेल. पण खरोखरच शूून्यातूून कोणी निर्मिती करून क्रांती घडवली असेल तर ती शून्याचा शोध लावणारा आणि त्याचे नियम तयार करणारा यांनीच. आणि याचं श्रेय जातं ते त्या दोन महान भारतीयांनाच. या भारतीयांनी शून्य आणि त्याचे नियम शोधले नसते, तर किती तरी काळ…
आम्ही शून्यातच अडकून राहिलो असतो.
क्रमशः – भाग २
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






