श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “गादी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

काल शेजारच्यांनी चांगल्या तीन चार नवीन गाद्या करून रिक्षेने आणल्या. या गाद्यांवर त्यांचा मुलगा आनंदाने एखाद्या राजासारखा राजेशाहीथाटात बसला होता. आणि…

गादी या शब्दावर मी भाळलो आणि लोळलो सुध्दा. कशाकशाच्या संदर्भात हा शब्द वापरतो हा विचार आला… राजेशाही, किंवा घराणेशाही. धार्मिक, आध्यात्मिक, किंवा संत परंपरेची. झोपायची, आणि अगदी जुन्या गोष्टीत असणारी पानाची गादी. पण तरीही गादी म्हंटलकी डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात त्या दोन गाद्या. एक राजघराण्यातली, आणि दुसरी अर्थातच आपली नेहमीची झोपायची. पानाची गादी हा शब्द बहुतेक जुने लेखक आणि सिनेमा यांच्या बरोबरच ईतिहास जमा झाला. वरच्या पैकी पानाची गादी सोडली तर सगळ्या प्रकारच्या गादींना ईतिहास आहे. पानाच्या गादीचाही ईतिहास असला तर तो इतरांबरोबर आपलाही असेल. राजघराण्यातला गादीला अर्थातच घराण्याचा, आणि आपल्या गादीला (कदाचित) घोरण्याचा.

राजघराण्यातल्या गादीवर आदराने बसवलं जात. डोक्यावर छत्र असत आणि शेजारी हातातल्या भल्या मोठ्या पंखाने वारा घालायला कोणीतरी. (म्हणजे असंच पाहिलं किंवा दाखवलं आहे.) आणि आपण मात्र अंगावर पांघरूण घेतलं असेल तर ते ओढून, आणि प्रसंगी ओरडून उठवतो. लगेेच उठला नाही तर… वर फिरणारा आणि वारा घालणारा पंखा कधीकधी मुद्दाम बंद केला जातो. आदर आणि बसवणं हे राजघराण्यातल्या गादीबद्दल असतं. तर कोणत्याही प्रकारचा आदर न ठेवता गादीवरुन उठवणं हे आपल्या गादीबद्दल. राजगादीवर बसल्यावर वारा घातला जातो, तर गादीवरुन उठवण्यासाठी वारा बंद केला जातो.

राज गादीवर बसल्यावर जयजयकार किंवा स्तुतीसुमनं ऐकायला मिळत असावीत. आम्हाला किंवा आम्ही गादीवरून उठवतांना आवाज सुरुवातीला कदाचित गोड निघाला नाही तरी काढण्याचा प्रयत्न असतो, पण ठराविक वेळेनंतर तो आवाज गोड वाटणरच नाही याचीच काळजी घेतो. स्तुती आणि सुमनं याचा संबंध नसतो. असतो तो सुस्ती घालवण्याचा खटाटोप.

राजगादीवर बसल्यावर अनेक बाबतीत बरेच चांगले सल्ले दिले जातात. आपल्या गादीच्या बाबतीत ऊठा आता हाच सल्ला असतो. हल्ली मुलांना झोपा आता असा सल्लाही द्यावा लागतो, पण ऊठा आता हाच जवळचा वाटतो.

राजघराण्यातल्या गादीवर व्यक्ती बसली कि तीला, व्यक्ती आणि गादी दोघांना वजन प्राप्त होतं. किंमत असते. आपली गादी किती किलोची आहे यावरुन गादीचच वजन व सोबत किंमत सांगितली जाते. आपल्याला आणि वजनालाही किंमत नसते. राजघराण्यातली गादी ही त्याच व्यक्तीची आणि गादीच असते. आपली मात्र सिंगल, डबल, नुसत्याच कापसाची, किंवा ब्रँडेड असते. तर राजघराण्याच्या गादीला त्यांचाच आणि आपलाच असा ब्रॅड असतो.

काय लागतं या गादीसाठी… म्हंटल तर बरंच काही… नाहीतर काहीही नाही. गादी कोणती, कधी, कशासाठी मिळणार यावर अवलंबून असतं.

राजघराण्याच्या गादीला त्या घराण्यात एकतर जन्म घ्यावा लागतो, किंवा दत्तक तरी जावं लागत. कर्तुत्व (असेल तर…) नंतरसुध्दा सिध्द करता येत. (अपवाद असु शकतात. काही घराणी आहेत. जे आजही कर्तृत्वाच्या शोधात आहेत. पण तरीही गादीवर आहेत असं वाटतं.)

धार्मिक, आध्यात्मिक, संत परंपरेच्या ठिकाणच्या गादीवर बसायला पावित्र्य, संस्कार, बौध्दिक व वैचारिक बैठक व पात्रता लागते. कर्तुत्वासोबत वक्तृत्व असाव लागतं. वाचन, मनन, चिंतन लागत. संस्कृती माहीत असावी लागते व तीचा अभिमान असावा लागतो. रितीरिवाजाची जाण असावी लागते. आणि अंगी नम्रता आणावी लागते. आणि हे सगळं आलं की बोलणं चांगलच वाटतं, कारण अहंकार नसतो.

राजघराण्यात कधीकधी गादीवरचा माणूसच बदलतो. यासाठी दगाफटका पण होतो. आपल्या बाबतीत मात्र तस नसतं. आमच्या गादीला या सगळ्यांची गरज असेलच असं नाही. फक्त ती व्यवस्थित राहण्यासाठी अधूनमधून तीला कडक ऊन मात्र दाखवावं लागतं. आणि याचवेळी आम्ही गादीवरच फटके मारतो. यात कोणताही दगा नसतो. काहीवेळा तर गादीच बदलतो.

राजघराण्यातल्या गादीवर बसल्यावर ती व्यक्ती बसल्या गादीवरुन आपलं राज्य विस्तारण्याचा प्रयत्न करते. आमचा संसार विस्तारला की आम्हाला नवीन गादीचाच विचार करावा लागतो. आणि देह विस्तारला तर असलेल्या गादीवरच तो पसरावा लागतो. म्हणजे राज्य पसरवणं, आणि आपण पसरणं यासाठी गादी लागते हे महत्वाच.

गादीवर बसवण्याचा समारंभ व सोहळा असतो. मुहूर्त पण असतो. यात मंत्रोच्चार असतात. गादीवरुन उठवण्याचा सोहळा रोजच असतो, आणि मंत्रोच्चार नसले तरी उच्चार मात्र वरच्या स्वरात असतात. आणि मुहूर्त पाहणार आहे का अशी विचारणा असते.

राजगादीवर आल्यावर कारभार पहावा लागतो. आणि सगळे कारभार आटोपले की आम्ही गादीवर येतो. अगोदर घरातल्या गाद्या सकाळी गुंडाळून ठेवल्या जात होत्या. आता सिंगल, डबल बेड आल्यामुळे त्या चोवीस तास पसरलेल्याच असतात. आणि आमच्या सोयीच्या वेळेने आम्ही त्यावर पसरतो.

वरच्या सगळ्या गाद्या या द्रृश्य स्वरुपात असतात. पण याशिवाय न दिसणारी एक गादी आहे जी आमच्या चांगल्या वाईट सवयींबद्दल असते. या गादीला फार जूनी किंवा फारतर मागच्या पिढीची परंपरा असते. आणि त्याचा ऊल्लेख गादी चालवतोय असाच होतो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted