अलका ओमप्रकाश माळी
विविधा
☆ – फुकट काहीही नसते…? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆
सेल! सेल! सेल! … एक खरेदी करा दुसरी वस्तू अगदी फ्री! फ्री! अशा पाट्या मान्सून मध्ये सगळी कडे जास्तच झळकतात.. महिला वर्ग तर अशा मान्सून सेल ची अगदी आतुरतेने वाट बघत असतो.. पण खरचं ह्या एक वर एक फ्री ह्या अशा ऑफर फायदेशीर असतात का हो की ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न असतो.. कारण या जगात कोणतीच गोष्ट फुकट मिळत नसते..
“फुकट” हा शब्द ऐकला की प्रत्येकालाच आनंद होतो. पण खरतर या जगात फुकट काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. ती कधी पैशांत मोजली जाते, तर कधी वेळ, कष्ट, त्याग, संयम किंवा जबाबदारी ह्यांच्या रूपात मोजली जाते..
निसर्ग आपल्याला हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि अन्न देतो. पण त्यामागे ही निसर्गाचे संतुलन टिकवण्याची जबाबदारी आपलीच असते. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या धान्यामागे त्याचा घाम, मेहनत असते. त्यामुळे अन्नाचा प्रत्येक घास अमूल्य असतो.. आणि त्या घासाची किंमत जो पर्यंत कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत त्याचे खरे मोल कळत नाही..
एखाद्या परीक्षेत उत्तम यश गुण मिळवण्यासाठी नियमित अभ्यास, शिस्त आणि सातत्य आवश्यक असते आणि ह्या किंमतीवरचं यशाची पावती मिळते म्हणजेच यश मिळवण्यासाठी प्रयत्न सातत्य आणि मेहनत ही किंमत मोजावी लागतेचं… एखाद्या खेळाडूसाठी एखादी स्पर्धा त्यातील यश मेडल मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रॅक्टिस करावी लागते अपार कष्ट घ्यावे लागतात वेळ खर्ची घालावा लागतो तेंव्हा कुठे यशाची पायरी मिळते.. प्रत्येक यशामागे संघर्षाची कहाणी असते. संघर्षाची चिकाटीची किंमत मोजावी लागते..
आजच्या काळात अनेक गोष्टी “फ्री” म्हणून दिल्या जातात. परंतु त्याची किंमत आपण वेळ, छुपे टॅक्सेस किंवा इतर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चुकवत असतो. त्यामुळे जे दिसते तेच खरे असते असे नाही. कोणतीच गोष्ट कधीच फुकट मिळत नाही.. त्याची कोणत्या ना कोणत्या प्रकारे किंमत मोजावीच लागते..
आई-वडिलांचे प्रेम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ यांना पैशांत मोजता येत नाही. पण त्यामागे त्यांचा त्याग, काळजी आणि निस्वार्थ भाव असतात म्हणून अशा नात्यांचे मोल खूप जास्त असते.. अशी नाती अमूल्य असतात आणि ती ज जपणे ही आपली जबाबदारी असते..
जीवनात यश, सन्मान, विश्वास आणि आनंद हे कोणालाही सहज मिळत नाहीत. त्यासाठी प्रामाणिकपणा, परिश्रम, संयम आणि चिकाटी आवश्यक असते. कष्टाशिवाय मिळालेली गोष्ट टिकत नाही, पण कष्टाने मिळवलेले सुख आयुष्यभर अभिमान देऊन जाते.
म्हणूनच “फुकट काहीही नसते” हे जीवनाचे सत्य आहे. प्रत्येक गोष्टीमागे कोणाचा तरी त्याग, कष्ट किंवा किंमत दडलेली असते. म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे मोल ओळखून कृतज्ञ राहता आले पाहिजे, त्या मागे लागलेल्या कष्टांची किंमत ओळखता येण खूप गरजेचं असतं.
“कष्ट हेच खरे भांडवल आणि परिश्रम हेच यशाचे प्रवेशद्वार आहे. ” कष्टाशिवाय फळ नाही, आणि मूल्याशिवाय कोणतीही गोष्ट नाही. ” म्हणून फुकटाच्या मोहात न पडता, प्रामाणिक परिश्रमाने मिळवलेल्या प्रत्येक यशाचा अभिमान आयुष्यभर आनंद देऊन जातो..
© अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




