सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
पुस्तकावर बोलू काही
☆ “पार्थसूत्र” — लेखक : श्री वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
पुस्तक : पार्थसूत्र
लेखक – वैभव केळकर
सहलेखिका – डॉ. मेघना दलाल
प्रकाशक- मधुर राजीव बर्वे.. दिलीप राज प्रकाशन.
मूल्य – रुपये ३००
“पार्थ सूत्र” अर्जुनाच्या जीवन यात्रेवरील एक प्रेरणादायी गाथा आहे महाभारत या महाकाव्याचा आधार घेत हे पुस्तक प्राचीन तत्त्वज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन यांची सांगड घालत लेखक द्वय वाचकांना अर्जुनाचे आयुष्य उलगडून दाखवतात.
साधारणपणे 200 पानांचे हे पुस्तक महाभारतातील माहित असलेल्या गोष्टी पार्थ म्हणजे अर्जुनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगते.
एकूण 23 कथनातून हे महाभारत आपल्यापुढे उभे केले आहे. ‘,
शून्य प्रहरी’ या सुरुवातीच्या लेखातच अर्जुन आपला नातू परीक्षित याला सांगतो की, “थांबण्याची वेळ ज्याची त्यालाच ओळखता आली पाहिजे.. “सर्व पांडव द्रौपदीसह वानप्रस्थाला निघाले आहेत आणि अर्जुनाचे मन भूतकाळाच्या विहिरीत डोकावले आहे, जिथे उमटते चित्र ते पांडवांचे! ज्यांची विटी विहिरीत पडली आहे आणि ती काढून देण्यासाठी त्यांना एका तेजःपुंज ऋषीची मदत मिळत आहे.. ते प्रत्यक्ष द्रोणाचार्य त्यांचे गुरु झाले! भीष्माचार्य हे पितामह! पांडवांना असे गुरु आणि पितामह मिळाले हे त्यांचे भाग्यच! त्यांनी कौरव- पांडवांना ज्या गोष्टी सांगितल्या, त्यातून अर्जुनाचे भावविश्व समृद्ध होत होते. त्यांच्यामध्ये शिस्त आणि प्रेम यांचा संगम तेव्हा राहिला होता..
अर्जुन एक विशिष्ट उद्देश घेऊन जगला. जे करायचं ते स्थिर बुद्धीने करत होता. जिथे शंका येईल तिथे श्रीकृष्णाची त्याला साथ होती. अर्जुन मूल्यांनी प्रेरित असा होता. या पुस्तकात अर्जुनाच्या वैयक्तिक संघर्षांचे आणि कठीण प्रसंगातील त्याच्या विचार प्रक्रियेचे उत्कृष्ट चित्रण केलेले आहे.
अर्जुनाचा काळ आणि सद्य परिस्थिती याची सांगड घालत लेखकांनी या पुस्तकातील लेखन केलेले आहे. अर्जुनाने केलेली प्रत्येक गोष्ट काल सुसंगत अशी होती की, त्यातून आत्ताही प्रत्येकाला काही शिकण्यासारखे आहे..
एकूण 23 लेखातून महाभारतात असणारे अर्जुनाचे स्थान, त्याचे विचार आणि त्या त्यावेळी अर्जुन कसा वागला, यासंबंधी लेखक द्वयीने विचारपूर्वक लेखन केले आहे. बालपण, द्रौपदी स्वयंवर, एकांत वास, वनवास, विराट युद्ध, कर्ण वध असे सर्व लेख आपल्याला अर्जुनाचे महाभारताशी असलेले नाते त्याच्या तोंडून व्यक्त करून दाखवतात.. अगदी वानप्रस्थाश्रमा पर्यंतचा अर्जुनाचा जीवन प्रवास यात आपल्याला उलगडून दाखवलेला आहे.
द्रोणाचार्य, भीष्म यांच्या बद्दल अर्जुनाला असलेला आदरही येथे व्यक्त झाला आहे. द्रौपदी आणि इतर सर्व भाऊ यांच्या बद्दलचे प्रेम, कर्तव्य ही अर्जुनाने आयुष्यात सांभाळले होते. हे एक वेगळ्या प्रकारचे असे पुस्तक मला वाटले..
महाभारतातील गोष्टी आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत तसेच मोठेपणी ही महाभारत अधिक सखोल त्याने वाचले आहे पण अर्जुनाच्या दृष्टिकोनातून महाभारत आणि त्याचा आधुनिक काळाशी असलेला संबंध हे अशा पद्धतीने लिहिलेले पुस्तक मात्र मी प्रथमच वाचले.
प्रत्येक लेखात अर्जुन असा वागला होता आणि आताच्या काळात येणाऱ्या संघर्षात अर्जुन कसा वागला असता यासाठी होणारे वैचारिक मार्गदर्शन या पुस्तकात वाचायला मिळते. आपण प्रत्येक जण अर्जुनच असतो, की ज्याला वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते.
अधून मधून प्रसंगाला अनुसरून काव्य लेखन ही या पुस्तकात केलेले आहे. दर्शन वृत्ती, जिज्ञासा वृत्ती, स्वामित्व वृत्ती, संघ वृत्ती, रचना वृत्ती, युद्ध प्रवृत्ती, पलायन वृत्ती अशा विविध गोष्टी जशा पितामहांनी सांगितल्या त्यातून पार्थला मिळालेले शिक्षण हे आजच्या काळातही उपयुक्त आहे. इंद्रप्रस्थ नगरी उभारली तेव्हा राज्य कसे असावे? प्रजेसाठी काय काय करावे? तसेच सर्वांना शांत सुखी व समृद्ध जीवन देण्यासाठी राज्यकर्त्यांनी कसे वागावे? अशा बऱ्याच गोष्टींचा अर्जुनाने कसा विचार केला असेल याचे मनोज्ञ दर्शन या लेखक द्वयीने केले आहे.
एकंदरच पुस्तक वाचनीय वाटले आणि महाभारतातील मुख्य नायक पार्थ म्हणजेच अर्जुन याच्या विचाराचा मागोवा घेऊन त्यातून आपल्याला आत्ताच्या काळातही उपयुक्त असे काही ज्ञान मिळते हे विशेष!
“पार्थसूत्र” या पुस्तकामध्ये मला जे आवडले ते मी येथे लिहिले आहे. एकंदरच महाभारताविषयी आपल्याला आपुलकी वाटते आणि मानवी आयुष्य आणि त्यात घडणाऱ्या घटना ह्या पुरातन काळापासून तशाच आहेत. म्हणूनच म्हंटले जाते की महाभारतात जे आहे ते सर्वत्र आहे! आणि ते कालातीत आहे..
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





