श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “शिवभूमीची शौर्यकथा” – लेखक : श्री गोविंद अनंत मोडक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक: शिवभूमीची शौर्यकथा
– – – महाराष्ट्राचा गोष्टीरूप इतिहास
लेखक: श्री गोविंद अनंत मोडक
पृष्ठ: २४१
मूल्य: ३५०₹
श्री. गोविंद अनंत मोडक, यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी संपादित केलेल्या ह्या दुर्मिळ पुस्तकात महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती फारच सुंदर लिहिली असून, ती वाचताना कंटाळा येत नाही, सर्व माहिती लिहिताना पाल्हाळ न लावता लिहिली असल्यामुळे तीनवेळा जरी हे पुस्तक कोणत्याही तरुणाने किंवा तरुणीने मन लावून वाचले तरी हा महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास त्याच्या मनात पक्का ठसेल.
सदरहू पुस्तकाची अनुक्रमणिका जरी सहज चाळली तरी ‘छत्रपती श्री शिवाजीराजे’ ह्यांच्या जन्मापूर्वीच्याही काळाचा आढावा घेऊन, शिवशाही कशी गाजली, कशी अस्त पावली, पेशवाई कशी सुरु झाली आणि पुढे एकंदरच मराठ्यांचे राज्य ‘कसे बुडाले’ इत्थंभुत माहिती सर्वच तरुण मुलामुलींना आणि प्रौढांनाही वाचायला मिळेल.
ह्या पुस्तकाची प्रस्तावना वाचून असे लक्षात येते की, इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि संशोधक ह्यांना सदरहू पुस्तक कसे समजावून द्यावे ह्याबाबतच्या पाच-सहा विशेष सूचनाही लेखकाने लिहिल्या आहेत.
महाराष्ट्राचा गोष्टीरूप इतिहास” हे पुस्तक मराठी इतिहासाचा थरारक, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण प्रवास आहे.
शिवरायांच्या तलवारीपासून पानिपतच्या रणांगणापर्यंत असे वीर जे धन दौलतीसाठी नाही लढले, ते स्वतःसाठी नाही लढले, ते राष्ट्रासाठी, आपल्या मातीसाठी, स्वराज्यासाठी, आपल्या शिवरायांसाठी लढले. रक्त, श्रद्धा आणि धगधगत्या ज्योतीने महाराष्ट्र घडवणाऱ्या वीरांचे जगणे तसेच विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला पुन्हा जिवंत करणाऱ्या ऐतिहासिक गोष्टींचा हा संग्रह आहे. हा संग्रह महाराष्ट्राच्या वैभवशाली भूतकाळाची अनोखी सहल वाचकांना घडवतो.
यात शूर चांदबिबी व हुशार मलिक अंबर, भोसले घराण्याचा उदय, शहाजी राजांची कर्तबगारी शिवबांचे बालपण, स्वराज्य स्थापनेची पूर्वतयारी, स्वराज्य स्थापना, शहाजी राजांची कैद, अफजलखानाचा वध, बाजीप्रभूंचा पराक्रम, शाहिस्तेखानाची स्वारी, बादशहाशी समेट, कपटाने धरले पण युक्तिने सुटले, स्वराज्य व्यवस्था, गड आला पण, सिंह गेला, दोन मोठ्या लढाया, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, मराठी राज्यावरील आरिष्ट, स्थलांतर, जगण्यासाठी पराकाष्ठा, मराठी राज्यांत दुही, बाळाजी विश्वनाथांस पेशवाई कशी मिळाली, मराठी राज्याच्या वाढीची तयारी, निजामाचा मोड, शिंदे होळकरांचा उदय, गजेंद्रमोक्ष, कोल्हापूरकर संभाजी सभेट, आपसांत लढाई, बाजीरावांची धडाडी, ‘‘माझे मस्तक तरी किल्ल्यात पडू दे! ’’, आता हिंदु- झाले पाहिजे, माळव्याची सनद, आधी एकी मग मुलुखगिरी, शाहूंचा मृत्यु, इत्यादी अश्या एकूण ५९ गोष्टी या संग्रहात समाविष्ट केलेल्या असून सनावली आणि कठिण शब्दांचा कोश हि दिलेला आहे.
इतिहास गोष्टीच्या स्वरूपात – सोपा, रंजक व शैक्षणिक दृष्टिकोनातून मांडलेला विद्यार्थी, शिक्षक, वाचक आणि इतिहासप्रेमींसाठी आदर्श ग्रंथ – –
मराठी साम्राज्याचा अभिमान जागवणारा प्रेरणादायी इतिहास“शिवभूमीची शौर्यकथा”
हे पुस्तक, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीतल्या सर्वांनीच वाचण्याइतके सोप्या आणि भाषेची लांबण टाळून लिहिलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट असून त्यात सनावली, प्रसिद्ध व्यक्तींचा कार्यकाळ इ. माहिती असून, बऱ्याच ऐतिहासिक शब्दांचे अर्थही त्यात दिलेले आहेत.
गडकोट किल्ल्यांवर भटकंती करणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीच्या संग्रही असावे, असे हे पुस्तक आहे. सर्वच तरुणांना हे पुस्तक आवडेल अशी आम्ही आशा करतो.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






