दीपा नारायण पुजारी
विविधा
☆ सावध व्हा… ☆ दीपा नारायण पुजारी ☆
रात्रीचे अकरा वाजत आले होते. शेजारच्या घरातील भजनसंध्या अजून सुरुच होती. भजनात रंगलेल्या त्या कुटुंबाला संध्यासमय उलटून निशाराणी अवतरली आहे हे कळलं नसावं. भक्तीरसात ते चिंबचिंब चिंबोरे झाले होते.
भक्तीरसात, शांतरस असतो हे त्यांना ठाऊक नसावं. गायनातला गोडवा संपला होता आणि त्या भगवंताला आपला आवाज ऐकू जावा म्हणून कंठघोष सुरू झाला होता. शेजारी दवाखाने आहेत. आजूबाजूच्या घरात वृद्ध, जेष्ठ लोक रहात आहेत. कुणी परिक्षार्थी, अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतील या गोष्टींचं भान त्यांना उरलं नसावं. देवाचं नाव घेताना, त्यानंच निर्माण केलेल्या या सृष्टीवर ते केवढा अन्याय करताहेत, हे कोणी, कसं पटवून द्यायचं बरं? सगळे उच्चविद्याविभूषित, कलासक्त,. त्यांच्या भक्तीत विघ्न कसं आणायचं?
हा भक्तीरस श्रवणीय, आनंददायी न राहता, ध्वनीप्रदूषणास कारणीभूत ठरतो. ध्वनीप्रदूषणाचे अनेक परिणाम होतात. डोकेदुखी, रक्तदाब वाढणं, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होणं आणि कायमचं कमी ऐकू येणं अर्थात बहिरेपणा. मोठ्या आवाजात बोललेलं ऐकण्याची सवय कायमसाठी लागू शकते. मग हळू आवाजात बोललेलं ऐकण्याची क्षमता कमी होते. एकाग्रता कमी होते. हा त्रास सगळ्यांना सोसावा लागतो. आवाज कमी ठेवा असं सांगावं तर, आम्ही आमच्या घरात गातोय आणि ते ही देवभक्तीपर अभंग. तुमच्या कानांना त्रास का होतो? अशा प्रकारची उत्तरं ऐकावी लागतात. केवळ कर्णबधीर नाही तर मनबधीर झालेल्या या लोकांना कसं समजवायचं? असो.
माझ्या झोपेचं मात्र या भजनानं पुरतं खोबरं केलं होतं. काणठळ्या बसवणारा आवाज कानावरुन हात बाजूला सारू देत नव्हता. अशा बेभान झालेल्या भक्तीरसात न्हालेले चिंबोरे गणेशोत्सवात भक्तीनं निथळून नाचताना दिसतातच नं आपल्याला. लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस, गौराईंचं आगमन असो किंवा निवडणूक जिंकल्याचा जल्लोष आपला आनंद व्यक्त करण्याची पद्धत कर्णकटू तर असतेच, पण सामाजिक शांतता बिघडवणारी असते. समाजात राहताना नीतीनियमांचं पालन न करणारे अनेक महाभाग दिसतात. ध्वनी प्रदूषण हा शब्द यांच्या शब्दकोशात नसावाच. कोणता कृष्ण, कोणता राम यांना प्रसन्न होत असेल? बिचारे देव सुद्धा कपाळावर आठ्या घालून, कान बंद करुन बसत असतील.
निसर्गाच्या साध्या सरळ नियमांना धाब्यावर बसवून चाललेल्या अशा कितीतरी कृतींना ही अवनी कंटाळली आहे. तिला आता हा आक्रोश सहन होत नाहीये. मोठ्या आवाजात, वेगानं, धुराड्यातून धूर सोडत पळणारी वाहनं, तिचं शरीर तुडवतात. आधुनिकीकरणाच्या नावाखाली, तिची हिरवी बाळं, मुळासकट उखडून टाकली जातात. ती तापलेल्या तप्त तव्यागत किती उसासे सोडत आहे. सजीवांना संजीवन देणारी ही अवनी, आपलं काम चोख बजावत आहे. तरीही वेगवेगळे संकेत देऊन ती तिच्यावर होणारा अन्याय सांगत असते. त्यातूनच जंगलात लागणारा वणवा, असह्य उष्मा, दुष्काळ, पाण्याचं दुर्भिक्ष्य अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्सुनामी, महापूर, भूकंप, ज्वालामुखी अशा उद्रेकाच्या रुपानं पृथ्वी तिचा राग व्यक्त करत असते. या वर्षी पावसानं दिलेली हुलकावणी याचंच लक्षण आहे.
आपण सावध व्हायला हवं. संकेत समजून घ्यायला हवेत. अन्यथा ही सर्जनशीलता गमावून बसलेली, रुष्ठ झालेली पृथ्वी, आग ओकणारा सूर्य, संतुलन बिघडलेलं निसर्गचक्र यांना तोंड देणं अवघड होऊन बसेल. आपल्या पुढच्या पिढीला तप्त दाह देणारं वाळवंट म्हणजे पृथ्वी अशी व्याख्या करावी लागेल. हरित अवनी म्हणजे काय असतं हे कळणं दुरापास्त होईल. हिरवे डोंगर, नदीनाले, सरोवरं, तलाव या गोष्टी चित्रात बघाव्या लागतील. हिरवे गालीचे अदृश्य होतील. पक्षांचा गोड किलबिलाट बंद होईल. सूर रुसून बसतील. संगीताचा वसंत हरवेल आणि फक्त ग्रीष्म राहील. म्हणूनच.. म्हणूनच सावध व्हा..
© दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈






