मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा !” भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा ! भाग – १  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

भारतीय सेना… जिंदगी के साथ भी… जिंदगी के बाद भी! 

दोघांच्या मध्ये सुमारे चार हजार किलोमीटर्सचं भलं थोरलं अंतर होतं… ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. नवरा फौजेत होताच… सुभेदार मेजर पोस्टवर होता Shillong मध्ये. पोराला दुसरं-तिसरं काहीही व्हायचंच नव्हतं… बापाच्या पाठोपाठ पोरगंही फौजेत गेलं तसं तिच्या काळजाचे दोन भाग झाले. एक भाग कुंकवाची चिंता करी तर दुसरा भाग म्हातारपणाच्या आधाराची. एकुलता एक तर लेक होता तो. त्याच्या आधी दोन मुली पदरात होत्या… पण पोरी लोकाच्या घरी जायच्या… उतारवयात आधार पाहिजेच की! पोराचे दोनाचे चार हात झाले आणि अंगणात नातवंडं खेळायला लागली की जन्माचं सार्थक झाल्याची स्वप्नं ती माऊली रंगवत दोघांचीही वाट पहात बसायची!

मुलाचं पत्र आलंय चारच दिवसांपूर्वी… ”अम्मा, येतोय सोळा-सतरा जूनला. माझ्या आवडीची ओल्या नारळाची बर्फी, चटणी आणि गरमागरम दोसे तयार ठेव. आणि हो, यावेळी माझ्या मागं लग्नाचं टुमणं नकोस लाऊस गं… एकच वर्ष तर झालंय मला फौजेत जाऊन. आणखी जरा स्थिर स्थावर होऊ दे. पुढची पोस्टिंग शांतता क्षेत्रात मिळेल बहुदा. अगं, इकडं खूप दमछाक होते… रोज अतिरेक्यांना शोधायला जातो आम्ही… कधी त्यांचे लोक मारले जातात.. कधी आमचे. पण तू काळजी करू नको. मला छान पैकी मी इथून निघण्याच्या आधी आमच्या मेस मध्ये सर्व अधिकारी, जवान सुग्रास जेवण देतील आणि निरोप देतील! पुन्हा कधी त्यांची भेट होईल न होईल… देव जाणे! पप्पा तिकडे शिलॉंगमध्ये पोस्टेड आहेत. त्यांना सुट्टी मिळाली असती तर आम्ही दोघेही एकाचवेळी घरी आलो असतो… शेतातली कामं मार्गी लावली असती. या दोघी अभ्यास करताहेत ना? त्यांच्यासाठीही काही आणीन छान यावेळी Nagaland मधून. येतो… काळजी घे… तुझाच… E. Thomos Joseph. Corps of Military Intelligence attached with 1/5 Gorkha Rifles. तारीख ११ जून १९९२.

उद्या निघायचं म्हणून ई. जोसेफ साहेब आज रात्रीच तयार झाले होते सामानसुमान बांधून. कालच मेसमध्ये पार्टी झाली निरोपाची. उद्या निघायचं कोट्टयमला.. सुंदर केरळमध्ये… पोहोचायला तीन-चार दिवस तर सहजी लागतील. बिछाण्यावर अंग टाकले आणि युनिटमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या… अतिरेक्यांच्या मागावर एक QRT Quick Action Team निघाली होती… तिथून जवळच अतिरेक्यांचा एक मोठा गट असल्याची पक्की खबर होती! जोसेफ साहेब गणवेश परिधान करून तातडीने बाहेर पडले… सहकारी अधिकारी म्हणाले, “आप तो कल छुट्टीपर निकलने वाले हो… आज ऑपरेशनसे लौटने में देर होगी.. आप मत साथ आईये!” त्यावर सेकंड लेफ्टनंट जोसेफ साहेब म्हणाले, “छुट्टी तो कल से है… मैं तो आज duty पर हूं… मैं भी साथ चलूंगा!”

ते अतिरेकी विरोधी अभियान रात्रभर चालले… अतिरेक्यांना या अभियानाची खबर आधीच लागली होती… गावाजवळच्या जंगलात त्यांनी सापळा रचून ठेवला होता… त्यांच्या तावडीत गोरखा सैनिकांची ही तुकडी दुर्दैवाने सापडली… आपल्या सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले… काही अतिरेकी जोसेफ साहेबांनी अचूक उडवले होते… पण अतिरेक्यांना यमसदनी धाडताना आपले तीन अधिकारी आणि दहा सैनिक धारातीर्थी पडले… त्यात ई. टी. जोसेफ साहेबही होते! त्या सर्वांचे कुटुंबीय आता कायम प्रतीक्षेत राहणार होते… जोसेफ साहेबांच्या मातोश्री थ्रीसिएम्मा जोसेफ सुद्धा!

Nagaland त्यावेळी धुमसत होतं… रस्ते बंद… रस्त्यांत हिंसक निदर्शने, लष्करी वाहनांवर दगडफेक, गोळीबार… एक ना अनेक गोष्टी सुरु होत्या. लष्कर याही परिस्थितीमध्ये संयम ठेवून काम करीत होतं… नेहमीप्रमाणे. जोसेफ साहेबांचे वडील सुभेदार मेजर थॉमस जोसेफ यांच्यापर्यंत लेकाच्या हौताम्याची बातमी पोहोचली… किती मोठा धक्का असेल त्या पितृहृदयासाठी… बाप के कंधे पे बेटे का जनाजा… किती मोठं ओझं हे! हे शल्य वागवीत ते शिलाँगवरून नागालँडकडे जायला निघाले… तेरा तासांचा प्रवास… पोहोचायला चार दिवस लागले… मालगाडीमधून प्रवास करावा लागला… काही ठिकाणी पायी जावे लागले! हुतात्म्यांचे देह आता कणा-कणाने निसर्गाच्या स्वाधीन होऊ लागले होते. त्याची दुर्गंधी सुटू लागली… भारतीय लष्कराच्या त्यावेळच्या व्यवस्थेनुसार गोरखा सैनिकांचे दाह-संस्कार युनिटमध्येच केले गेले. जोसेफ साहेब धर्माने ख्रिस्ती. त्यांना कोहिमामध्येच विधिवत दफन केले गेले… कारण तो देह इतक्या दूरवर पाठवणे दुरापास्त होते… अंत्यसंस्कार प्रसंगी केवळ त्यांचे वडीलच उपस्थित राहू शकले… आई, बहिणी आणि नातेवाईकांना अंत्यदर्शन होऊ शकले नाही!

सुभेदार मेजर जोसेफ साहेबांनी त्याच वर्षी सेनेतील नोकरी सोडली आणि ते आपली पत्नी, आणि दोन मुली यांना घेऊन त्यांच्या मूळ गावी निघून गेले… काळजात लेकाचा विरह घेऊन! यात सर्वांत दु:खी होत्या त्या मातोश्री थ्रीसिएम्मा!

त्या गावातल्या चर्चच्या मागील बाजूस असलेल्या दफनभूमीकडे बघायच्या तेंव्हा त्यांना भास होई… लेक तिथल्या एका कबरीमध्ये विसावला आहे… आणि आपण त्याच्या कबरीवर साधं फूल वाहू शकत नाही… इकडे हजारो किलोमीटर्स दूर अंतरावर एका तशा अज्ञात स्थळी, एकाकी अवस्थेत जोसेफ साहेबांचा आत्मा त्या कबरीत तळमळत असेल… आई नजरेस नाही पडली शेवटच्या क्षणी!

एक एक क्षण युगासारखा असतो दुखावलेल्या मनांसाठी. संसार सुरु राहतो… पण पायात रुतलेल्या काट्यासारखे दु;ख पावलोपावली साथ देत राहतं… वाटचाल वेदनेकडून आणखी वेदनेकडे. आई-बापाचे दु:ख दुस-या कुणाला कसे समजावे?

काळ पुढे सरकत गेला. जोसेफ कुटुंबीयांनी मग मुलींकडे लक्ष केंद्रित केले, त्यांना योग्य ते शिक्षण दिले… त्या दोघीही शिक्षिका झाल्या! आणि लेकाच्या आठवणीत हे दोन म्हातारे डोंगर आयुष्याचा सूर्यास्त होण्याची वाट पाहू लागले! लष्करी पार्श्वभूमी असल्याने जोसेफ साहेबांचे वडील तरी काहीसे खंबीर होते… मात्र आईची तगमग सुरूच होती… !

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक प्रवास – अंधारातून प्रकाशाकडे- – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एक प्रवास – अंधारातून प्रकाशाकडे– – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

– – – सागर आणि नेत्रा पाटील

संध्याकाळ होत जाते, घरोघरी दिवे लागतात आणि अंधार मागे सरतो. पण ‘अंधार’ म्हणजे नेमकं काय? काहींसाठी तो प्रकाशाचा अभाव असतो; तर काहींसाठी संधींचा.

सागर पाटील यांना हा फरक आयुष्याच्या अगदी लहान वयातच समजला. डोळ्यांवर अनेक शस्त्रक्रिया होऊनही वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी दृष्टी गमावली. त्यानंतर समाज दिव्यांग व्यक्तीकडे कसा पाहतो, हे त्यांनी जवळून अनुभवले. दुर्लक्ष, उपेक्षा, दया किंवा ‘बिच्चारा’ असा शिक्का—यापलीकडे अनेकांना काही दिसतच नव्हते.

या सर्व प्रवासात अत्यंत खंबीरपणे, खमकेपणाने सागर यांच्यासोबत त्यांचे आई वडील उभे राहिले. मुलाला अंधत्व आले असतानाही त्यांनी कधीच “हे करू नकोस” किंवा “तुला जमणार नाही” असा नकारात्मक सूर लावला नाही. उलट, सागर काही नवी गोष्ट अजमावत असतील, तर आई वडील म्हणायचे, “आमच्या समोरच कर, काही मदत लागली तर आम्ही आहोतच”. हा सकारात्मक दृष्टीकोन, सागर यांच्या आत्मविश्वासाचा पाया ठरला.

यामुळे सागर यांच्या मनात एक विचार दृढ झाला होता—एखाद्या व्यक्तीची “मर्यादा (limitation) / कमजोरी” ही तिच्या मूल्याची मोजपट्टी असू नये. पुढे हाच विचार एका चळवळीचा पाया ठरला.

त्यांच्या सोबतीला होत्या नेत्रा पाटील—शांत, संवेदनशील आणि कृतीतून परिवर्तन घडवण्यावर विश्वास ठेवणाऱ्या.

सागर यांनी मराठी साहित्य विषयात एम. ए. केले; पण त्यांचा जीव रमला तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये. वडिलांना सरकारी नोकरी सोडावी लागलेली पाहून त्यांनी लहानपणीच ठरवले होते—नोकरी करणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा उद्योजक व्हायचे.

शालेय वयापासूनच त्यांचे इस्त्री, रेडिओ, ट्यूबलाईट दुरुस्त करणेही सुरू झाले. वापरात नसतानाही बॅटऱ्या का उतरतात (drain होतात) ? हा प्रश्न त्यांना सतावत राहिला. त्यातून पुढे त्यांनी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचे तंत्र विकसित केले.

२०१३ मध्ये त्यांनी IIG (Ideal Innovative Group) कंपनीची स्थापना केली. संगणक आणि एलईडी उत्पादनांची जुळणी सुरू झाली. नामांकित कंपन्यांसाठी बल्ब व ट्यूबलाईट तयार करण्याबरोबरच स्वतःच्या ब्रँडनेही उत्पादने बाजारात आली.

कामाची व्याप्ती वाढू लागल्यावर, सागर यांनी सॉल्डरिंगची कामं घरी आणायला सुरुवात केल्यावर, वयाची साठी उलटून गेलेल्या त्यांच्या आईंनी हे कौशल्य स्वतः आत्मसात केले. आजही त्या नातवाला सांभाळत, घर सांभाळत दिवसाला सॉल्डरिंगचे १०००-१५०० टाके सहज लावतात.

पुढे एलईडी उत्पादने स्वस्त झाल्यावर सागर आणि नेत्रा यांनी पुनर्भरणीय उत्पादनांवर (rechargable products) लक्ष केंद्रित केले. टाटा पॉवर हे त्यांच्या सुरुवातीच्या नामवंत ग्राहकांपैकी एक. उत्पादनाचा दर्जा हा यशाचा पाया असतो, या त्यांच्या विश्वासाला टाटा पॉवरने दीर्घकालीन कराराद्वारे (lifetime contract) दुजोरा दिला.

पुढे त्यांच्या संशोधनातून विकसित झालेल्या विशेष पुनर्भरणीय (rechargable) बॅटऱ्यांनी रेल्वे क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. रेल्वे गार्ड आणि मोटरमन सिग्नल देण्यासाठी वापरत असलेल्या विशेष बॅटऱ्यांच्या उत्पादनात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. सुमारे चारशेहून अधिक उत्पादक कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘VC – व्हिज्युअली चॅलेंज्ड’ या त्यांच्या ब्रँडच्या उत्पादनांनी सर्व तांत्रिक कसोट्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले आणि महत्त्वाच्या ऑर्डर्स प्राप्त केल्या. गुणवत्ता, नित्यनूतनता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी उद्योगविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

परंतु या दांपत्याचा प्रवास केवळ स्वतःपुरता उद्योग उभारण्यापुरता आणि पैश्यांची धन करण्यापुरता मर्यादित राहिला नाही.

रुईया महाविद्यालयातील शिक्षणकाळात त्यांना संतोष फडके, अनघा पेंडसे यांच्यासारख्या समविचारी मित्रमैत्रिणी भेटल्या, महाविद्यालयानंतरही हे मैत्र अबाधित राहिलं. आणि या सर्वांच्या परस्पर सहकार्य, संवाद आणि सामूहिक विचारातून, दृष्टिबाधित व्यक्तींना आणि एकंदरीतच समाजातील गरजूंना प्रशिक्षण देण्यासाठी IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना झाली.

या सगळ्यांना एक साधी पण महत्त्वाची गोष्ट उमगली होती—लोकांना सहानुभूतीपेक्षा संधीची अधिक गरज असते.

अनेक दृष्टिबाधित व्यक्तींमध्ये त्यांनी बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, शिस्त आणि अपार क्षमता पाहिली. समाज जिथे “हे लोक काय करू शकत नाहीत?” असा प्रश्न विचारत होता, तिथे त्यांनी “त्यांना संधी मिळाली तर ते काय करू शकतील?” हा प्रश्न विचारला.

…… आणि त्या एका प्रश्नाने अनेक आयुष्यांची दिशा बदलली.

ट्रस्टने दानधर्माऐवजी सक्षमीकरणाचा मार्ग निवडला. कौशल्य विकास, आत्मविश्वास आणि स्वावलंबन हे त्यांच्या कार्याचे केंद्र बनले. इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण, संगणक साक्षरता, उद्योजकता मार्गदर्शन, व्यावसायिक मराठी, क्रीडा आणि जनजागृती उपक्रमांद्वारे अनेकांना नवी दिशा मिळाली.

प्रशिक्षित हातांनी तयार होणारा प्रत्येक एलईडी दिवा जणू एक संदेश देत होता—

“मी सक्षम आहे. ”

कार्यशाळा वाढल्या. प्रशिक्षणार्थी उत्पादने तयार करू लागले, उपकरणे दुरुस्त करू लागले, स्वतः कमाई करू लागले. अनेकांना वर्षानुवर्षांनी आत्मविश्वास मिळाला. चिंतेत जगणाऱ्या कुटुंबांना आशेचा किरण दिसू लागला.

या प्रवासात नेत्रा यांनी भावनिक आधाराची महत्त्वाची भूमिका निभावली. व्यवस्थापनाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपुलकीची ऊब दिली. लोकांना ‘प्रकरण (case study)’ म्हणून नव्हे, तर स्वप्ने आणि क्षमता असलेल्या व्यक्ती म्हणून वागवले.

मोठ्या ऑर्डर्स आल्या असताना त्यांची पूर्तता करण्यात आणि प्रशिक्षण कार्यशाळांच्या पूर्वतयारीत सागर यांच्या आईंचा सहभाग आजही अत्यंत महत्त्वाचा आहे.

सागर यांची दृष्टी केवळ उद्योग किंवा प्रशिक्षणापुरती मर्यादित नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रगतीच्या वाटेवर नेण्याची त्यांची वृत्ती तितकीच प्रेरणादायी आहे.

अलिबाग येथील कुटुंबाच्या सामायिक मालकीची जमीन अनेक वर्षे वाद आणि मतभेदांचे कारण बनली होती. सागर यांच्या मेहुण्याने (मावशींच्या जावईबापूंनी) या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्याची कल्पना मांडली. सागर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात पुढाकार घेतला. आज तीच जागा एका सुंदर रिसॉर्टमध्ये रूपांतरित झाली आहे आणि त्याचा लाभ सर्व भागीदारांना मिळत आहे.

समाजहित आणि लोकांना जोडण्याच्या या कार्यासाठी त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. अलीकडेच अमरावती येथे सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून, त्यांच्या मातृसंस्था असलेल्या रुईया महाविद्यालयाचा ‘रायझिंग स्टार’ हा सन्मानही त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

आज ट्रस्टने ५० हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि १००० हून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण दिले आहे. यापैकी ३५०हून अधिक जण दृष्टीबाधित आहेत, अनेकजणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत, तर काही स्वमग्न (ऑटिस्टिक) आहेत. विविध कारणांनी गरजू असलेल्या या सर्वांना एकच व्यासपीठावर समान संधी देण्याचा प्रयत्न हा या उपक्रमाचा विशेष पैलू आहे.

सागर आणि नेत्रा यांनी या सगळ्यांना केवळ मदत केली नाही; त्यांनी हरवलेला स्वाभिमान परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कंपनीतील १८ कामगारांपैकी १४ जण दृष्टिबाधित आहेत.

एकेकाळी ज्या शैक्षणिक संस्थांनी सागर यांना इलेक्ट्रॉनिक्स शिकवण्यास नकार दिला होता, त्याच संस्था आज त्यांना प्रशिक्षक म्हणून सन्मानपूर्वक निमंत्रित करताना दिसतात.

काही प्रशिक्षणार्थी आज स्वतः मार्गदर्शक झाले आहेत. काहींनी स्वतःचा उदरनिर्वाह सुरू केला आहे. जे पालक कधीकाळी भविष्याबद्दल साशंक होते, ते आज अभिमानाने बोलतात.

या यशोगाथा कदाचित वर्तमानपत्रांच्या मथळ्यांत फारशा झळकत नसतील; पण त्यांनी अनेक आयुष्ये उजळवली आहेत.

कारण सागर आणि नेत्रा पाटील यांनी केवळ दिवे तयार केले नाहीत—

…… त्यांनी माणसांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केला आहे.

अधिक माहितीकरता : 

IIG Education and Development Trust,

संपर्क :  शॉप क्रमांक २बी, जिजामाता चाळ, कोकणीपाडा, अशोकवन, दहिसर (पूर्व), मुंबई, ४०००६८. मो ९३२२०१७१४०.

डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २८ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी

महात्मा गांधी हे टागोरांपेक्षा बरेच लहान. पण दोघे अगदी सख्खे मित्र होते. गंमत म्हणजे ही मैत्री ते समविचारी आहेत म्हणून होती कां, तसेही नाही. आपण म्हणतो नं, ‘तुझं माझं पटेना आणि तुझ्याशिवाय गमेना’ तसा प्रकार आहे हा! कित्येक बाबतीत त्यांच्यात मतभेद होते, कधी कधी टोकाचे, पण त्यामुळे मैत्रीत बाधा आली नाही.

त्यांच्यातल्या मतभेदाला सुरवात, गांधींजींनी शांतिनिकेतनला दिलेल्या पहिल्या भेटीपासूनच झाली. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आले आणि लगेंच ६ मार्च १९१५ ला त्यांनी शांतीनिकेतन ला पहिली भेट दिली. तोपर्यंत टागोर जगप्रसिद्ध झाले होते, कारण १९१३ मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता.

शिक्षणाबद्दलच्या विचारात दोघांमध्ये मूलभूत मतभेद होते. गांधीजींच्या मते शिक्षण हे व्यावहारिक व सर्वांगीण विकासावर केंद्रित हवे. जागतिक प्रवाहाशी जुळवून घेण्याची त्यांना गरज वाटत नव्हती. शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार त्यांना गरजेचा वाटत नव्हता. याउलट टागोरांचा शिक्षण विषयीचा दृष्टिकोन वैश्विक होता. तरीही भारतीय परंपरांचा पण शिक्षणात अंतर्भाव व्हायला हवा म्हणून त्यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली, जिथे भारतीय परंपरा व आंतरराष्ट्रीय मूल्ये यांचा मेळ घालणारे शिक्षण देणारी व्यवस्था होती. यामुळे गांधीजी शांतिनिकेतनच्या शिक्षण पद्धतीवर संतुष्ट नव्हते.

गांधींच्या मते अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःची कामे स्वतः करावी. नोकर, स्वयंपाकी, झाडूवाले, पाणीवाले यांची गरज नसावी. त्यांनी हे मत टागोरांकडे व्यक्त केलं व टागोरांनीही कोणताही किंतु न बाळगता ही पद्धत अंमलात आणली. तो दिवस (१० मार्च) ‘गांधी दिवस’ म्हणून रविंद्रनाथांनी घोषित केला. आजही तेथे या दिवशी सर्व कामगारांना सुट्टी दिली जाते व विद्यार्थी सर्व कामे करतात.

स्वातंत्र्य, समता व मनुष्य धर्म यांची दोघांनाही ओढ आहे पण गांधीनी लोकलढ्याचा मार्ग अवलंबिला. मात्र टागोरांना अहिंसात्मक लढा प्रसंगी हिंसक होतो याचे भय वाटे. हा लढा सामान्य माणसातील सुप्त सामर्थ्य जागे करतो यावर दोघांचा विश्वास होता. पण विराट समुदायाच्या भावनांना गांधी ऐनवेळी कसा आवर घालणार ही चिंता टागोरांना होती. उपोषणात टागोरांना अतिरेक दिसे तर गांधीजींना त्यात आत्मशुद्धी दिसे. उपोषण हा एक अहिंसक जुलूम आहे ही टागोरांची भूमिका तर तो नैतिक बळाचा वापर आहे ही गांधीजींची भूमिका होती.

दोघेही वसाहतवाद व भांडवलशाहीच्या विरोधात होते. पण गांधीजींनी राजकारणाचा मार्ग स्विकारला आणि टागोरांनी शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्राचा! असहकार चळवळ, शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार, परदेशी कपडे जाळणे याला टागोरांचा प्रचंड आक्षेप होता.

रोज अर्धा तास प्रत्येकाने चरखा चालवावा असे आवाहन गांधीजींनी केले, तेव्हा टागोर उपहासाने म्हणाले, “जर यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत होणार असेल तर मग अर्धा तास का, साडे आठ तास का नाही?” एकूणच गांधींच्या चरखा प्रकरणावर ते टीका करत, व यामुळे भारत पुन्हा मध्ययुगात जाईल, अशी शंका व्यक्त करत.

स्वातंत्र्य चळवळीत उपेक्षित घटकांसह समाजातील सर्व घटकांच्या समावेशाचा आग्रह गांधीजींनी धरला. हिंदू मुस्लिम ऐक्य, दलितांची उन्नती यावर त्यांनी भर दिला. ते अनेकदा पाश्चात्त्य संस्कृतीवर टीका करत. याउलट टागोरांचा राष्ट्रवाद विश्व व्यापी व मानवतावादी होता.

बिहारच्या भूकंपानंतर गांधीजी म्हणाले होते, “हरिजनांना अस्पृश्य म्हणून वाळीत टाकल्याबद्दलची ही शिक्षा देवानेच दिली आहे. “

यावर टागोरांनी कडाडून टीका केली. कारण ते अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात होते. त्यांच्या मते लोकांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे. वैज्ञानिक प्रगतीनेच राष्ट्र समृद्ध होईल यावर त्यांचा दृढ विश्वास होता.

दोघेही अहिंसा, सहिष्णुतेवर आधारित मानवतावाद व निसर्ग प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. दोघेही आत्मनिर्भरतेच्या बाजूने होते. दोघेही गरिबी व दयनीय अवस्थेत जगणाऱ्यांच्या बद्दल प्रेम व सहानुभूती बाळगून होते. दोघेही भारताच्या प्राचीन संस्कृतीचा व आध्यात्मिक इतिहासाचा अभिमान बाळगणारे होते.

गांधीजींच्या मते, माणसे सगुण ईश्वराची पूजा करत असतील तर ती मानसिक गरज म्हणून पहावी. जनसामान्यांना दिलासा देणारा परमेश्वर त्यांना मान्य होता. टागोरांचं उपनिषदीय अध्यात्म सामान्यांच्या पचनी पडणारं नाही म्हणून त्यांना पसंत नव्हतं.

गांधीजींना ईश्वर सत्यामधे दिसत होता तर टागोरांना ईश्वर प्रेमात दिसत होता व दोघांचे मार्गही वेगळे होते. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने सत्य मिळविण्याचा प्रयत्न केला. तर टागोरांनी सहकार्य, परस्पर आदर व सहिष्णुतेच्या मार्गाने प्रेम म्हणजेच ईश्वर मिळविण्याचा प्रयत्न केला.

दोघांना एकमेकाबद्दल प्रचंड आदर होता. दोघे एकमेकाचे प्रचंड चाहते होते. मूल्ये सारखीच पण तपशिलात मतभेद होते. त्यांच्यात सतत पत्र व्यवहार होत होता. त्यात मतभेदांची मोकळी चर्चा व्हायची कारण दोघांनाही परस्परांची थोरवी मान्य होती. आणि त्यामुळेच गांधीजींनी टागोरांचा उल्लेख ‘गुरुदेव’ असा केला तर टागोरांनी गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली 

दोघांनीही मैत्रीचे नाते कसे निभावले याचीही उदाहरणे आहेत.

अनुसूचित जातींना स्वतंत्र मतदार संघ देण्याच्या ब्रिटिश प्रस्तावाच्या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले होते. त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटल्याने टागोर स्वतः त्यांना भेटायला गेले. त्यावेळी सुदैवाने इंग्रज सरकारने त्यांची मागणी मान्य केली होती आणि या नेत्याने उपोषण सोडले. त्यावेळी महात्माजींनी टागोरांना स्वतः रचलेले गाणे गाण्याची विनंती केली आणि खरोखरच टागोरांनी ‘जीवन जाखन शुकै ए जय करुणाधारे’ हे गाणे म्हटलं.

विश्वभारतीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी निधी गोळा करणे या उद्देशाने नृत्य नाट्य पथक घेऊन टागोर दिल्ली दौरा करत होते. ही बातमी गांधीजींपर्यंत पोहोचली. इतक्या उतार वयात निधी गोळा करण्यासाठी त्यांना फिरताना पाहून गांधीजींना अतीव दुःख झाले. गांधीजी त्यांना भेटले व त्यांच्या पैशाची व्यवस्था ही केली.

टागोरांच्या मृत्यूच्या आधी एक वर्ष म्हणजे १९४० मध्ये गांधीजी कस्तुरबांसह या आजारी कवीला भेटायला गेले होते. टागोरांनी त्यांना विनंती केली की आपल्या नंतर गांधींनी विश्वभारतीचा कार्यभार स्वीकारावा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५१ मध्ये विश्वभारती ला भारत सरकारने केंद्रीय विद्यापीठ म्हणून मान्यता दिली.

एकाच वेळी एकमेकांचे विरोधक व प्रशंसक असणाऱ्या या दोन महान विभूतीं सारखी शुद्ध, स्पष्ट व आदरयुक्त मैत्री पुन्हा होणे नाही.

—–

☆ गीत : ८२ ☆

TIME is endless in thy hands, my lord. There is none to count thy minutes.

Days and nights pass and ages bloom and fade like flowers. Thou knowest how to wait.

Thy centuries follow each other perfecting a small wild flower.

We have no time to lose, and having no time we must scramble for our chances. We 

are too poor to be late.

 

And thus it is that time goes by while I give it to every querulous1

 man who claims it, and thine altar is empty of all offerings to the last.

 

At the end of the day I hasten in fear lest thy gate be shut; but I find that yet there is time.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८२ ☆

मोजतसे क्षण।

कोण तुझे पण।

काळाचे बंधन।

तुला नाही॥

 

दिस राती जाती।

ऋतु सरताती।

युगे युगे भक्ती।

वाट पाही॥

 

काळ तुझ्या हाता।

फुले उमलता।

आणिक सुकता।

काय राही॥

 

सृष्टी आवडीने।

निर्मि सवडीने।

काळ कावडीने।

पाणी भरी॥

 

आम्ही तो पामर।

काळाचे चाकर।

मिळता भाकर।

सारे साहू॥

 

असे ज्याचा त्याचा ।

आपल्या वाट्याचा।

त्याच्या प्रसादाचा।

कालखंड॥

 

माझ्या वेळे साठी।

सगेच भांडती।

कसा तुझ्या साठी।

वेळ काढू॥

 

साधे ना सकळ।

न काढी जो वेळ।

तो तुझ्या जवळ।

जाता न ये॥

 

दिसाच्या शेवटी।

येतो तुझ्या कुटी।

दार जगजेठी।

लावू नको॥

 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ८३ ☆

MOTHER, I shall weave a chain of pearls for thy neck with my tears of sorrow.

The stars have wrought their anklets of light to deck thy feet, but mine will hang upon thy 

breast.

Wealth and fame come from thee and it is for thee to give or to withhold them. But this my sorrow is absolutely mine own, and when I bring it to thee as my offering thou rewardest me with thy grace.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८३ ☆

जरी चंद्रतारका घेऊन येती

पैंजण रुणझुण तुझ्या पदाला॥

*

ओवीन म्हणतो तुझियासाठी

माझ्या दुःखाश्रुंची माला

जी रुळेल तव वक्षावरती

हृदयाशी करी हितगूजाला॥

*

मानमरातब आणिक मत्ता

तूच देतसी, तूच घेतसी

दुःखावर परी माझी सत्ता

अर्पित तुजला, घे हृदयासी॥

*

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ८४ ☆

IT is the pang of separation that spreads throughout the world and gives birth to shapes innumerable in the infinite sky.

It is this sorrow of separation that gazes in silence all night from star to star and becomes lyric among rustling leaves in rainy darkness of July.

It is this overspreading pain that deepens into loves and desires, into sufferings and joys 

in human homes; and this it is that ever melts and flows in songs through my poet’s 

heart.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८४ ☆ 

☆ 

विरह वेदना भुवना व्यापिते

अंबरी अगणित रचना निर्मिते॥

*

नीरवतेतुन ती अंधारी फिरते

सहसंवेदना ताऱ्यांत शोधिते॥

*

तीच आणखी बनुनी गीते 

पाऊसओल्या पानी सळसळते॥

*

ही अनुभूती वैश्विक असते

प्रेम, अपेक्षा यातही रुजते॥

*

आनंद, यातना घरोघरी पाहते

तीव्रता तयांची हृदयी सांडते॥

*

माझे कवीमन त्यात अडकते

काव्य त्यातुनी जन्मा येते॥

☆ 

– क्रमशः भाग २८

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बायो क्लॉक… – लेखक – रणजीत भोसले ☆ प्रस्तुती – सुनिता जोशी ☆

सुनिता जोशी

 

? इंद्रधनुष्य ?

☆ बायो क्लॉक… – लेखक – रणजीत भोसले ☆ प्रस्तुती – सुनिता जोशी

जेव्हा आपल्याला पहाटे लवकर प्रवास करायचा असेल, तेव्हा आपण सकाळी ४ वाजता गजर लावतो आणि झोपतो; पण बऱ्याच वेळा, गजर न वाजता देखील आपण ठरलेल्या वेळेला जागे होतो. यालाच बायो-क्लॉक म्हणतात. बऱ्याच लोकांचा विश्वास असतो की, माणसाचे आयुष्य सरासरी ८०-९० वर्षांपर्यंत असते. तसेच ५०-६० वर्षांनंतर आजार सुरु होतात, असेही त्यांना ठामपणे वाटते. ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली असते की, नकळत ते स्वत:च आपले बायो-क्लॉक तसेच सेट करतात. म्हणूनच, अनेकांना ५०-६० वयानंतर तब्येतीच्या तक्रारी सुरु होतात. खरं म्हणजे, आपणच मनाने आपले बायो-क्लॉक चुकीच्या पध्दतीने प्रोग्राम करतो. चिनी लोकांचे दृष्टिकोन वेगळे आहेत! चीनमध्ये, अनेक लोक ठामपणे विश्वास ठेवतात की १२० वर्षांपर्यंत ते निरोगी आयुष्य जगू शकतात. या सकारात्मक मानसिकतेमुळे त्यांचे बायो-क्लॉक तशा प्रकारे सेट आहे. आणि म्हणूनच! तुमच्या बायो-क्लॉकला पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्याचा आनंद घ्या! हे करा आणि १०० वर्षांपर्यंत आरोग्यदायी जगा!

१. मनाने बायो-क्लॉक सकारात्मक रीतीने सेट करा. नियमित ध्यानधारणा (मेडिटेशन) केल्यास, आपण किमान १०० वर्षे निरोगी जगू शकतो.

२. ४० ते ९० या वयोगटात कोणताही आजार होणार नाही यावर ठाम विश्वास ठेवा. वृध्दत्व हे १२० वर्षांनंतरच सुरु होते, असे स्वत:ला पटवा.

३. केस पांढरे झाले तरी त्यांना नैसर्गिकरित्या रंगवा. नेहमी तरुण दिसण्याचा प्रयत्न करा. कपडेही युवक-युवतींसारखे परिधान करा. हे तुमचा आत्मविश्वास वाढवेल. कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला वृध्द समजू नका.

४. खाण्याच्या वेळी नकारात्मक विचार करु नका. उदा. हे अन्न भेसळयुक्त आहे, अपायकारक आहे असे विचार टाळा. त्याऐवजी ठामपणे विश्वास ठेवा की, ध्यानधारणेच्या सामर्थ्याने मी घेतलेले अन्न शुध्द होत आहे आणि माझ्यासाठी अमृतासमान आहे. हे अन्न मला १२० वर्षांपर्यंत निरोगी आणि दीर्घायुष्य देईल. अन्यथा, नकारात्मक विचारांमुळे शरीरात घातक एन्झाईम्स तयार होतात, जे पचन आणि आरोग्यास हानिकारक ठरतात.

५. सदैव सक्रिय राहा. चालण्याऐवजी शक्य असल्यास हलके धावण्याचा (जॉगिंग) प्रयत्न करा.

६. वाढत्या वयानुसार आरोग्य अधिक चांगले होत जाते, यावर विश्वास ठेवा. (हे शास्त्रीयदृष्ट्या खरे आहे!)

७. आनंद आणि आजारपण एकत्र राहू शकत नाहीत. जिथे आनंद असेल, तिथे आजार टिकू शकत नाही. म्हणूनच, आनंदी राहा, निरोगी राहा! रोज विनोदी चित्रपट पाहा आणि मन मोकळं हसा!

८. मी आता म्हातारा/म्हातारी होत आहे असे कधीही बोलू नका, अगदी गंमतीतही नाही! तुमच्या विचारांतून आणि शब्दांतूनच तुमचे आयुष्य घडते. बायो-क्लॉक पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्य अनुभवा! दृष्टीकोन बदला, आयुष्य बदलेल! जगण्याचा आनंद घ्या….

लेखक – रणजीत भोसले

प्रस्तुती : सुनीता जोशी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लामियाचा केक… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

डॉ. तेजस्विनी वाळिंबे

? इंद्रधनुष्य ?

☆ लामियाचा केक☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

काही वर्षांपूर्वी एका जंगल सफारी दरम्यान वाघाचे दर्शन घेण्यासाठी आमची धडपड चालू होती. हरणं, गवे, हत्ती दिसले पण वाघ काही दिसेना. परतीच्या वाटेवर दूर एका झाडामागे मला काहीतरी भास झाला. “वाघच असावा बहुतेक, ” मी म्हणाले, तर आमचा गाईड हसून म्हणाला, ” तो वाघापेक्षाही भयानक दोन पायांचा प्राणी आहे. ” या विधानाच्या सत्यतेचा अनुभव अनेक वेळा नराधमांच्या कृत्याच्या बातम्या वाचून आपल्याला येतो. क्रौर्य आणि हिंसेने बरबटलेल्या अनेक घटना कौटुंबिक हिंसाचाराच्या रूपाने कधी बाहेर येतात तर कधी सामूहिक अत्याचार आणि दंगलींच्या रूपात दिसतात.

जगाच्या इतिहासात प्रचंड हिंसाचार आणि क्रौर्य घडतं ते युद्धाच्या वेळी. सीमेवरील सैनिकच याचे बळी ठरतात असे नाही तर लहान मुलं, स्त्रिया हजारो निरपराध जीवांचं आयुष्य आणि अनेक पिढ्या युद्धामुळे उध्वस्त होतात. कधीही भरून न येणाऱ्या भळभळणाऱ्या जखमा युद्धामुळे तयार होतात.

लामियाची ही कथा अशीच एक. 1990 साल, इराक मधील एका छोट्या खेड्यात आपल्या आजी – बीबी सोबत राहणारी नऊ वर्षाची एक गोड मुलगी लामिया आणि तिचा हिंदी नावाचा एक कोंबडा. लामिया आपल्या काबाडकष्ट करणाऱ्या आजीबरोबर एका झोपडीत राहत होती. आजीला ती प्रत्येक कामात मदत करत असे. कंदीलाच्या प्रकाशात घरचा अभ्यास करणारी, आपल्या मित्रासोबत आपले स्वप्न बोलून दाखवणारी निरागस लामिया. सद्दाम हुसेन इराकवर राज्य करत होता. या तानाशहाचे गोडवे गाऊन शाळेतला दिवस सुरू होतो. ‘आमचं रक्त, आमचा आत्मा, आमचं सर्वस्व आम्ही त्याग करू आमच्या सद्दाम साठी. शत्रू ने आमचं अन्नपाणी, औषधे बंद केले, एवढेच काय आम्ही श्वास घेतो ती हवा थांबवली तरी आम्ही झुकणार नाही. ‘ अशी सद्दामच्या जयजयकाराची प्रार्थना होऊन शाळा सुरू होते. सायरन चे आवाज आणि आकाशात घिरट्या घालणारी विमानं छातीत धडकी भरत असतात. सद्दाम हुसेन चा वाढदिवस शाळेत साजरा करायचा असतो. त्यासाठी मुलांच्या नावाच्या चिठ्ठ्या शिक्षक काढतात. एक विद्यार्थी शाळा स्वच्छ करेल, एक ताजे फळं आणेल. केक कोण आणणार?

केक आणण्यासाठी चिठ्ठी निघते ती लामियाच्या नावाची. शाळेत रोज डबाही आणू न शकणारी लामिया सगळ्यांसाठी केक कसा आणणार? घरी पोहोचल्यावर आपल्या लाडक्या बीबीला ती ही बातमी सांगते. शेजारणी कडून ते आजीला आधीच समजलं असतं. शेजारणीचा मुलगा सईद लामियाचा मित्र. रात्री बीबी आणि लामिया केकला काय काय साहित्य लागणार, याची यादी करतात मैदा, साखर, बेकिंग पावडर इत्यादी. लामियाच्या वडिलांची आठवण म्हणून ठेवलेलं एक घड्याळ आणि अशाच काही जुन्या वस्तू झोळीत घेऊन लामिया, बीबी आणि हिंदी, लामियाचा कोंबडा दुसऱ्या दिवशी शहरात जायला निघतात. शहरात गेल्यावर बीबी काही जुन्या वस्तू विकून एक छान ड्रेस लामियाला घेऊन देते. मग ती तिला एका जुन्या ओळखीच्या संपन्न घरात घेऊन येते. ती म्हणते, ” मी आता म्हातारी झाली आहे. तुझं शिक्षण, खाणं- पिणं मला आता झेपणार नाही. तू आता यांच्यासोबत रहा. लामियाचा चेहरा कावरा -बावरा होतो.

“बीबी, तू माझ्यावर रागावली का? मी सगळं करेन. कपडे धुवेन. भांडी घासेन. तू म्हणशील ते ऐकेन. मला तू इथे नको राहायला सांगू. मी तुझ्याबरोबर येईन. तू केक साठी माझ्यावर रागावली आहेस का? ” बीबी काही उत्तर देईना. संधी साधून लामिया पळाली. तिला बिचारीला वाटलं की केक साठी बीबी आपल्यावर रागावलेली आहे. मी केकचं साहित्य जमवलं तर बीबी आपल्याला परत घरी घेऊन जाईल. बीबी लामियाला शोधत याला त्याला विचारता विचारता पोलीस स्टेशनमध्ये येते. पोलीस तिला काही दाद देईना. तिकडे लामिया गावात भटकत राहते. योगायोगाने तिचा मित्र सईद तिला भेटतो. केकचं साहित्य जमवण्यासाठी दोन लहान मुलांची केविलवाणी धडपड. कधी चोरी करतात, कधी लोक त्यांना फसवतात, कधी कोंबडा हरवतो, कधी भांडतात, रुसतात तर कधी एकमेकांसाठी जीव ओवाळतात. हॉस्पिटलमध्ये हातपाय तुटलेले लोक जेव्हा सईदला भेटतात तेव्हा सईद त्यांना विचारतो, ” अमेरिकन बॉम्ब मुळे तुटला का तुझा हात? “

इकडे बिबीला एक भला माणूस भेटतो. अंध:कारातही कुठेतरी पणतीची मंद वाद तेवत असते, तशीच या क्रौर्याने भरलेल्या या जगात भली माणसं अधून मधून भेटत राहतात. बीबी त्या माणसाच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये लामिया हरवल्याची तक्रार करते. तेवढ्यात सायरनचा आवाज येतो आणि बीबी खाली कोसळते. हा भला माणूस बीबीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करतो. लामियाची शहरातली पायपीट सुरूच असते. एका दुष्ट माणसाच्या तावडीतून पळून येताना एका मिरवणुकीत ती घुसते आणि पोलीस तिला पकडतात. त्या भल्या माणसाला अखेरीस लामिया सापडते …

तो त्वरेने तिला हॉस्पिटलमध्ये आजीला भेटायला घेऊन जातो पण आजी बेडवर नसते. लामियाला भेटण्याअगोदरच बीबीचा मृत्यू झालेला असतो. बीबीचं प्रेत घेऊन दोघे परत खेड्यात येतात. बीबीला दफन केल्या जातं. आता सईदची आई लामियाला केक करायला शिकवते. या केक साठी लामियाने आजीच्या मरणाचं दुःख झेललं असतं. अनेक हालअपेष्टा सोसून जमा केलेलं ते केकचे साहित्य. अखेर तो वाढदिवसाचा दिवस येतो. सद्दामचा जयजयकार होतो. शिक्षक लामियाचा केक, इतर मुलांनी आणलेली फळं टेबलवर मांडून ठेवतात. केकचा एक घास खाऊन बघतात आणि लामियाचं कौतुक करतात. डोळ्यात अश्रू आणि दुःखी चेहऱ्याने लामिया ते सगळं बघत असते. इतक्यात सायरनचा आवाज येतो, पाठोपाठ बॉम्ब पडल्याचा आवाज. सगळी मुले बेंच खाली लपतात. लामिया आणि तिचा मित्र एकमेकांकडे बघत बेंच खाली लपलेले असतात. तेवढ्यात आणखी मोठा आवाज येतो. बॉम्ब तिच्या वर्गावरही पडतो. अर्धा वर्ग उद्ध्वस्त होतो. एका क्षणात नाहीसे होतात- शिक्षक, वर्गातली मुलं आणि लामियाने आणलेला केकही. लामिया आणि तिचा मित्र अश्रूपूर्ण नजरेने एकमेकांकडे बघत असतात आणि याच वेळी कुठेतरी आनंदी म्युझिक सुरू असतं. सद्दाम हुसेनच्या राजवाड्यात वाढदिवसाचा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला असतो. छतापर्यंत मोठा केक. दिव्यांचा झगमगाट. पदार्थांची रेलचेल…. सत्तेची राक्षसी महत्त्वाकांक्षा, क्रौर्य आणि हिंसेतून मिळालेला बीभत्स आनंदोत्सव.

ही कथा आहे, “The president’s cake, ” या सिनेमाची.

आजही जगात हजारो निरागस मुलं अनाथ होतात, हजारो बेघर होतात, हजारो भूकबळी पडतात. युद्ध काही संपत नाही. सत्तेची न संपणारी राक्षसी आकांक्षा, मत्सर, क्रौर्य, विवेक बुद्धीचा अभाव यातील प्रत्येक गोष्ट विनाशकारी ठरते आणि या सगळ्या एकत्रित आल्या तर काय होणार?

ऐश्वर्यमीर्ष्या नैर्घृण्यं क्षीबत्वं निर्विवेकता|

एकैकं किं न यत् कुर्यात् पञ्चाङ्गित्वे तु का कथा ॥

 

© डॉ. तेजस्विनी वाळिंबे

(नेत्रतज्ञ)

 (एक डॅाक्टरची आई)

पुणे मो. ८८८८८३१९०५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वृद्धत्व :: एक गाळण्याची प्रक्रिया.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ वृद्धत्व :: एक गाळण्याची प्रक्रिया.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

दक्षिण भारतात ६०, ७०, ८०, ९० आणि १०० व्या वर्षाचे वाढदिवस साजरे करण्याची परंपरा आहे, याचे कारण:

आपण ६०, ७०, ८०, ९० आणि १०० ही वर्षे इतक्या थाटामाटात का साजरी करतो? या आकड्यांमागे काही *आध्यात्मिक* अर्थ आहे की या केवळ सांस्कृतिक परंपरा आहेत?

याचे उत्तर महाभारतातील एका प्रभावी कथेत दडलेले आहे—राजा ययातीची कथा.

राजा ययातीचे आयुष्य ऐश्वर्य, सुख आणि यशाने परिपूर्ण होते. पण जेव्हा अचानक वृद्धत्व आले, तेव्हा तो आतून हादरला. सखोल चिंतनानंतर त्याला एक गहन सत्य उमजले:

सुखाला मर्यादा आहेत, पण इच्छेला कधीच अंत नसतो. “

या एका जाणीवेने त्याचे आयुष्य बदलले. त्याने वृद्धत्वाचा स्वीकार केला आणि स्पष्ट केले की मानवी आयुष्यात पाच आंतरिक वळणे असतात—जी वयावर नाही, तर समजूतदारपणावर आधारित असतात.

विशेष म्हणजे, ही पाच वळणे भारतीय परंपरेतील ६०, ७०, ८०, ९० आणि १०० वर्षांच्या टप्प्यांशी तंतोतंत जुळतात. चला तर मग, हे टप्पे सोप्या भाषेत समजून घेऊया.

६० वर्षे – षष्टी:

मन साठवण्याकडून समजून घेण्याकडे वळते.

वयाच्या ६० व्या वर्षी शरीरात नाही, तर प्राधान्यक्रमात बदल होतो. “मला अजून किती मिळू शकेल? ” हा प्रश्न हळूहळू मावळतो आणि “आता खरंच महत्त्वाचं काय आहे? ” हा प्रश्न त्याची जागा घेतो.

येथे आत्मचिंतन सुरू होते. आता गोंगाट, टाळ्या किंवा इतरांकडून मिळणाऱ्या मान्यतेची गरज उरत नाही. आता ओढ असते ती केवळ स्पष्टतेची. हा ऱ्हास नाही—तर महत्त्वाकांक्षेला मिळालेली परिपक्वतेची जोड आहे.

७० वर्षे – भीमरथ शांती:

स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा शांतता अधिक शक्तिशाली वाटते.

चाळीशी आणि पन्नाशीमध्ये आपण जगाला आपले म्हणणे पटवून देण्यात वेळ घालवतो. ७० व्या वर्षी एक शांत बदल घडतो. तुम्ही आता लगेच प्रतिक्रिया देत नाही. वादांचे आकर्षण संपते. *वाद जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे जास्त महत्त्वाचे वाटते. *

एक जाणीव प्रबळ होते: “बरोबर असण्यापेक्षा शांत असणे जास्त मौल्यवान आहे. ” म्हणूनच ७० वे वर्ष साजरे केले जाते.

८० वर्षे – सहस्रचंद्रदर्शन / शताभिषेकम:

तुमचे अस्तित्वच एक उपचार बनते.

८० व्या वर्षी लोक तुमच्याकडे केवळ सल्ल्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी सखोल शोधत येतात—एक असा विश्वास की, “आयुष्य जगता येते, पचवता येते आणि समजून घेता येते. “

या वयात तुमचे अस्तित्वच एक आशीर्वाद बनते.  शब्दांची गरज उरत नाही. तुमचे असणेच सांगून जाते: “सगळं काही ठीक होतं. आयुष्य आपला मार्ग शोधून घेतं. ” म्हणूनच ८० वे वर्ष पवित्र मानले जाते.

९० वर्षे – नवती:

अहंकार हळूच निवृत्त होतो.

९० व्या वर्षी काहीतरी दुर्मिळ घडते. *तुम्हाला आता लोकांना सुधारण्याची इच्छा होत नाही. * तुम्ही तुमच्या मतांना चिकटून राहत नाही. गोष्टी वैयक्तिक रित्या घेतल्या जात नाहीत. तुमचे मन सहजासहजी दुखावले जात नाही.

हे अशक्तपणामुळे घडत नाही—तर आयुष्याने तुम्हाला आतापर्यंत पुरेसे दाखवलेले असते. *क्षुल्लक गोष्टी आता तुमची ऊर्जा खर्च करण्यास पात्र नसतात. * एक सात्त्विक शांतता मनात स्थिरावते. ही नम्रताच खरी आध्यात्मिकता आहे.

१०० वर्षे – शतमानम्:

आयुष्य वैयक्तिक कहाण्यांच्या पलीकडे जाते.

१०० व्या वर्षी पोहोचणे म्हणजे केवळ वर्षांची संख्या गाठणे नव्हे. ही अशी अवस्था आहे जिथे आयुष्याचे व्यापक चित्र स्पष्ट दिसू लागते.

तुम्हाला जाणवते की तुम्ही वाहिलेल्या अनेक चिंता अनावश्यक होत्या. तुम्ही दिलेले प्रेम हेच खरोखर महत्त्वाचे होते. आणि हे आयुष्य नेहमीच एका अनामिक, दयाळू शक्तीने सावरून धरलेले होते. १०० व्या वर्षी व्यक्ती एक ‘व्यक्ती’ उरत नाही, तर ती एक दैवी ‘अस्तित्व’ बनते.

सार:

आपल्या ऋषीमुनींनी केवळ वयाचा उत्सव साजरा केला नाही. त्यांनी वयासोबत येणाऱ्या आंतरिक परिवर्तनाचा उत्सव साजरा केला.

  • ६० – प्राधान्यक्रम बदलतात.
  • ७० – शांतता हीच ताकद बनते.
  • ८० – अस्तित्व हेच औषध/उपचार बनते.
  • ९० – अहंकार शांतपणे विरघळतो.
  • १०० – आयुष्य पूर्णत्वास जाते.

वृद्धत्व म्हणजे झिजणे नव्हे.  वृद्धत्व ही एक गाळण्याची प्रक्रिया आहे—ज्यातून केवळ शहाणपण, सौम्यता आणि कृपा शिल्लक राहते.

अर्थात – – 

वयाने मोठे होणे म्हणजे आयुष्य अधिक शुद्ध, सुज्ञ आणि सौम्य होणे होय. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५७ आणि ५८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५७ आणि ५८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५७ – – 

जगीं होइजे धन्य या रामनामे ।

क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥

उदासीनता तत्त्वता सार आहे ।

सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥

अर्थ :  भक्ताने सतत रामनाम घेऊन या जगात धन्य व्हावे. नुसते नामस्मरण करण्यापेक्षा क्रिया म्हणजे कृतीने, भक्तीने सातत्याने उपासना करावी. मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका न येऊ देता, उदासीनपणे (म्हणजे आजूबाजूच्या घटनांचा मनावर परिणाम न होऊ देता) मोकळ्या मनाने रामनामाची उपासना करावी आणि या जगात भक्त म्हणून धन्य व्हावे.

विवेचन : या आधीच्या दहा श्लोकांमध्ये समर्थांनी आदर्श भक्त कसा असावा, त्याची लक्षणे सांगितली आणि त्यावरून साधकांना देखील आपण कसे असावे याचा बोध होतो. पण त्या मार्गाने जायचे कसे किंवा त्यासाठी काय करायचे याचा उपाय ते या श्लोकात आपल्याला सांगत आहेत.

आधीचे श्लोक वाचून जर आपल्याला समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सर्वोत्तम भक्त व्हावेसे वाटले तर समर्थांचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. परंतु असे भक्त होण्यासाठी संस्कारांची आणि प्रयत्नांची गरज असते. लहानपणापासूनच संस्काराचे महत्त्व असते. ओल्या मातीला आकार देणे सोपे असते. म्हणून मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे आणि प्रत्यक्ष आपल्या वागणुकीतून त्यांच्यासमोर चांगल्या वागण्याचा आदर्श ठेवणे या गोष्टी संस्कारात येतात.

त्याचप्रमाणे समर्थांनी सांगितलेला भक्त होण्यासाठी देखील संस्काराची मनाला गरज असते. आपले मन सतत विषयाकडे ओढ घेत असते. त्यामुळे मनाला जाणीवपूर्वक भगवंताचे स्मरण, त्याची उपासना करण्याची सवय लावून घ्यावी लागते. हे एक प्रकारचे संस्कारच असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात सामान्य माणसाला देवात सुद्धा विषय दिसतात. परंतु संतांना विषयात सुद्धा देव दिसतो.

संतांजवळ प्रत्येक गोष्टीत देव पाहण्याची जी दृष्टी असते, ती विकसित व्हावी लागते आणि ती संस्कारानेच विकसित होते. म्हणून नामस्मरण, त्यासोबतच कृती आणि उपासना यांच्या माध्यमातून परमेश्वराचे ध्यान करावे. भोवतालच्या परिस्थितीमुळे मनात नाना प्रकारचे विकल्प किंवा शंका येतात. खरा भक्त अशा कोणत्याच गोष्टीकडे लक्ष न देता मनापासून भगवंताची उपासना करतो. म्हणूनच त्याच्यावर उपासनेत मोकळेपणा असतो.

भक्ताने उदासीन असावे असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदासीन हा शब्द इंद्रियांच्या बाबतीत वापरला गेला आहे. म्हणजे आपले मन जे सतत विषयांकडे ओढ घेते ती आवरणे, आणि विषयांच्या बाबतीत विरक्त राहणे म्हणजेच उदासीन राहणे होय. थोडक्यात म्हणजे विषयांच्या बाबतीत आपली वृत्ती उदासीन असली पाहिजे. भोवतालच्या परिस्थितीबद्दल नाही. आपण प्रापंचिक माणसे आहोत म्हणून आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना मग त्या अनुकूल किंवा प्रतिकूल असो, त्या संबंधात आपल्याला त्यांची योग्य ती दखल घेऊन वागावे लागेल. आपले जे कर्तव्य आहे त्याबाबत सजग राहावे लागेल. म्हणजेच त्या बाबतीतली उदासीनता कामाची नाही. आपल्याला प्रपंचात राहून परमार्थ साधायचा आहे. तेव्हा जी उदासीनता आहे ती विकारांबद्दल असावी. अशा प्रकारची सवय एकदा आपल्या मनाला लागली की मग भगवंताची मोकळेपणाने आपण उपासना करू शकू.

आपल्यासारख्या सामान्य माणूस अनेक गोष्टींना आणि विषयांना मनाने बांधला गेलेला असतो आपण जोपर्यंत ही बंधने तोडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भगवंताचे होऊ शकत नाही किंवा त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. मनाने प्रपंचाचा संग टाकावा आणि भगवंताचा संग जोडावा. मग खरोखरच भगवंताचे धन्य भक्त होण्यासाठी आपण पात्र होऊ.

स्वसंवाद :: 

१) माझी उपासना “नित्यनेमाने” होते का? मी सुखात किंवा दुःखात असताना सुद्धा?

२) “सामान्य माणसाला देवात विषय दिसतो” माझ्या उपासनेत माझे खरोखर देवाकडे लक्ष असते का की मनात इतर विचारच जास्त असतात?

३) विकारांबद्दल उदासीन आणि कर्तव्याबद्दल सजग या दोन्ही गोष्टींचा समतोल माझ्या जीवनात आहे का?

– – – – 

श्लोक क्र. ५८ – – – 

नको वासना वीषई वृत्तिरुपें।

पदार्थी जडे कामना पूर्वपापें |

सदा राम निष्काम चिंतीत जावा।

मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥

अर्थ :  हे मना, भौतिक विषयांमध्ये वृत्तीरूपाने वासनांमध्ये अडकू नकोस. पूर्व पापांमुळेच आपले मन विषय वासनांमध्ये अडकते. म्हणून भगवंताचे नेहमी निष्काम भावाने चिंतन कर आणि मनामध्ये कल्पनेचा लवलेशही ठेवू नकोस.

(पदार्थी- दृश्य/बाह्य विषयांमध्ये, निष्काम- कोणतीही इच्छा न ठेवता, कल्पना-सुखाच्या गोष्टींचे मनोरे रचणे, लेश- मागमूस)

विवेचन :  ५७ ते ६० या श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला विषयवासनेचा त्याग करण्याबद्दल सांगत आहेत. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो हे आपण मागील श्लोकांमध्ये पाहिले आहे. या श्लोकात म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की विषयांमध्ये वृत्ती रूपाने आपली वासना अडकता कामा नये. या दृश्य किंवा भौतिक जगात आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो, त्यामध्ये आपले मन अडकते. ही सवय पूर्वपापामुळे लागते असे समर्थ सांगतात. हे पूर्वपाप म्हणजे पूर्व संचित संस्कार असे म्हणता येईल. हे संस्कार किंवा वृत्ती केवळ एका जन्माची नसून अनेक जन्मांची असते. त्यातूनच असे वागण्याची बुद्धी होते. यावर उपाय म्हणून निष्कामपणे रामाचे चिंतन करावे आणि विषयवासनांची कल्पना देखील मनामध्ये अजिबात उरू देता कामा नये.

वस् धातूपासून वासना हा शब्द आला आहे. वस् म्हणजे राहणे किंवा स्थिर होणे. आपले मन सतत इंद्रियांमध्ये म्हणजेच विषयांमध्ये राहते आणि सवयीने ते तेथेच स्थिर होते. म्हणून त्याला आपण वासना असे नाव देतो. स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध यांच्या सहाय्याने इंद्रियां मार्फत आपण विषय सेवन करीत असतो. थोडक्यात वासना म्हणजे हवेपण! आपल्याला जोपर्यंत हे हवे, ते हवे असे वाटत असते तोपर्यंत आपली चित्त त्या त्या विषयांमध्ये गुंतलेले असते.

वृत्ती, कामना आणि वासना असा प्रवास आपण बाह्य जगतातील वस्तूंसाठी करीत असतो. आपले मन अतिशय चंचल आहे. या मनावर वारंवार वेगवेगळ्या विषयांचे तरंग उठतात. असे अनेक तरंग जेव्हा तयार होतात, तेव्हा त्यातून त्या विषयाबद्दलची कामना म्हणजेच इच्छा निर्माण होते. ही कामना जेव्हा तीव्र होते तेव्हा तिचे रूपांतर वासनेमध्ये होते. हा वृत्ती, कामना आणि वासनेपर्यंतचा प्रवास माणसाला त्यातून बाहेर पडू देत नाही आणि शेवटी अध:पतनाकडे घेऊन जातो.

माणूस एकदा वासनेच्या अधीन झाला की त्याला दुसरे काही सुचत नाही. तो त्या सवयीचा गुलाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टीचे समर्थन करू लागतो. धूम्रपान किंवा मद्यपान करणारे त्या गोष्टींचे समर्थन करीत असतात असे आपण अनेकदा पाहतो. म्हणजे त्यांना त्यात आपण काही वावगे करीत आहोत असे वाटतच नाही. राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकात सुधाकर दारूच्या सवयीचा गुलाम होतो आणि त्यात त्याला काही वाटेनासे होते. परंतु नंतर ही दारू त्याच्या संसाराची धूळधाण करते. प्रख्यात गायक दीनानाथ मंगेशकर यांना देखील मदिरेचे व्यसन लागले होते आणि अति व्यसनामुळे त्यांचे अकाली निधन झाले. मुले लहान असताना संसार उघड्यावर टाकून निघून जावे लागले.

माणूस वृद्ध झाला, इंद्रिये थकली तरी देखील माणूस त्यातून बाहेर पडत नाही. शेवटपर्यंत विषय वासना त्याला त्रास देतच असतात. एखादी गोष्ट प्रत्यक्षात मिळाली नाही की मग तो कल्पनेच्या राज्यात रमतो, कल्पनेचे मनोरथ करू लागतो. आजच्या काळात तर टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्या आभासी गोष्टी कल्पनेच्या राज्यात माणसाला गुंतवून ठेवतात.

मग या सर्व गोष्टीतून सुटका करून घेण्याचा काही उपाय आहे का? निश्चितच आहे! समर्थ म्हणतात, “आपण निष्कामपणे रामाची चिंतन करावे, त्याचे ध्यान, मनन, चिंतन, पूजा करावी. हे सर्व संस्कार आहेत. त्यातून हळूहळू वाईट विषयांची कामना कमी होत जाते, मनामध्ये सद्वासना निर्माण होतात आणि शेवटी निर्वासना अवस्था निर्माण होऊन साधक मोक्षापर्यंत पोहोचतो. असा त्याचा प्रवास वाईटाकडून चांगल्याकडे होऊ शकतो.

पण इथे समर्थ आपल्याला निष्काम भक्ती करायला सांगतात हे लक्षात घ्यायला हवे. आपण सामान्य माणसे परमेश्वराची भक्ती देखील काहीतरी हेतू किंवा इच्छा मनात धरून करीत असतो. त्यामुळे आपली वासना शेवटपर्यंत सुटत नाही. हे ईश्वरा, मला अन्य काही नको. फक्त तू हवा आहेस अशा प्रकारची आर्तता जेव्हा भक्तीत येईल, तेव्हा आपली वाटचाल मोक्षमार्गाकडे व्हायला सुरुवात होईल.

या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा अरे अरे ज्ञाना झालासी पावन हा अभंग आठवतो. त्यात ते म्हणतात,

वृत्तीची निवृत्ती आपणा सकट |अवघेची वैकुंठ चतुर्भुज ||

जेव्हा साधकाची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होऊ लागते, तेव्हा त्याच्या वृत्तीची निवृत्ती होऊ लागते. ती देखील कशी? तर आपणा सकट म्हणजे त्याचा मी पणा, अहंकार सगळे काही नष्ट होते आणि संपूर्ण वैकुंठच त्याला विष्णूरूप दिसू लागते. कामना, वासना सर्वच गोष्टी नाहीशा होतात. कल्पनेचा लवलेश देखील राहत नाही आणि मग आपोआपच जन्ममृत्यूच्या चक्रातून देखील त्याची सुटका होते.

स्वसंवाद ::

१) माझ्या मनात वारंवार येणाऱ्या कोणत्या इच्छा हळूहळू वासनांमध्ये रूपांतरित होत आहेत?

२) “मला हे हवेच आहे” असे वाटते तेव्हा मी त्यामागचा विचार करतो का?

३) मी एखादी गोष्ट मिळाली नाही तर अस्वस्थ होतो का, की शांत राहू शकतो?

४) माझ्या आयुष्यात कल्पनाविलास (दिवास्वप्ने / आभासी जग) किती प्रमाणात आहे?

५) मी दररोज किमान काही वेळ निष्काम भावाने नामस्मरण किंवा चिंतन करतो का?

– क्रमशः श्लोक ५७ आणि ५८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १० – पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १०. – पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई ☆ प्रा.भारती जोगी ☆

पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई

“मी सगुणाबाई! नाही ना ओळख लागंत? नाव ही नाही आठवंत ना? बरोबरंच आहे ना… इतिहासाच्या कुठल्या पानात गडप झाले, जमा झाले, हरवले कुणास ठाऊक!

आता मीच देते ओळख करून…

मी… सगुणाबाई! थोरल्या बाजीरावांची धाकटी सून… जनार्दन रावांची पत्नी. सुंदर, गोरीपान आणि विशेष म्हणजे… शिकलेली!

सातारच्या भिडे सावकारांची मी कन्या, वयाच्या ५व्या वर्षी १० वर्षाच्या जनार्दन रावांची पत्नी बनून पेशव्यांच्या घरात आले. आणि जाणवले की बाई गं, मला तर इथे अनेक एकाहून एक अशा मातब्बर सासू आणि जावांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचयं!

गंमत वाटली ना, अस्तिवाचं टिकवणं तेव्हाही होतं… हे वाचून! पण खरंयं ते!

पण हाय रे दैवा! अस्तित्व टिकवून ठेवीन म्हणंत असतांनाच… अचानक कर्नाटक च्या मोहिमे वरून परततांना जनार्दन रावांना टायफॉइड झाला, आणि मी १०व्या वर्षीच विधवा झाले हो! *बालविधवा* हा शिक्का कपाळावर, आणि लाल आळवण अंगावर! सौभाग्य म्हणजे काय? हे देखील कळले नव्हते, आणि बालविधवा म्हणजे काय? हे तरी कुठे माहिती होतं??

तुम्हाला सांगते… सासर-माहेर दोन्हींची श्रीमंती… पण… सौभाग्याची श्रीमंती हिरावून नेली ना नियतीने! नव-याचा केवळ १४ व्या वर्षी मृत्यू… त्यामुळे एकही पराक्रम नावावर नाही… त्यामुळे मी अभिमानाने मिरवावं असं कुठलंही पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता ही नाही. जगायला कुठलं कारण ही नाही. मग काय… मरेपर्यंत जगावं लागणार, म्हणून मग विरक्ती ची वाट धरली, बालवयातच! हो! कारण… बालविधवा म्हणजे… *समिधा*!! मूक, मौन, शांत जळंत राहणा-या! त्यांत कुठला आलायं ना ओलावा?

पण एक आधार मिळाला, वेळ घालवायला… *ग्रंथवाचन*! वेगवेगळ्या ठिकाणाहून ग्रंथ मागविले,

दुर्मिळ ग्रंथ संग्रह केला. भरपूर वाचन केले. पोथी-पुराणे ही वाचली. तीर्थक्षेत्री च्या तीर्थ यात्रा ही केल्या.

तुम्हाला एक गंमत सांगते… इतिहासाने माझी नोंद नाही घेतली, पण माझ्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाची मात्र नोंद आहे… कदाचित… अ क्षर असा अ क्षय साठा… म्हणून तरला की काय??

असंच वैराग्य युक्त, वैराण आयुष्य आणि वय सरंत होतं… वर्षा-वर्षानी पुढं-पुढं!! कुटुंबातील अनेक मृत्यू या डोळ्यांनी बघितले, पचवले… मायाळू सासू काशीबाई, पित्यासमान नानासाहेब, भावासमान सदाशिव राव, नारायण राव… एक ना अनेक!

पण तुम्हाला सांगते… माधवराव आणि रमाबाईंचं आकस्मिक जाणं… नाही पेलवलं गेलं हो! हा चटका नाही साहता आला. मग खूपच एकटेपण आलं… प्रकृती बिघडली… खालावतच गेली… आणि साता-याजवळ वडूज गावी, वाड्यात… कायमची विसावले मी!

आणि… आणि… पेशवाईतील…

*पहिली बालविधवा*… इतिहास जमा झाली… एक समिधा निमाली!!

– लेख क्र. १० .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५५ आणि ५६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५५ आणि ५६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५५ – – – 

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।

वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥

ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥

अर्थ: ज्याच्या मनातील दुष्ट वासना आणि वाईट विचार नाहीसे झाले आहेत, भगवंताला आपल्या प्रेमपाशात बांधण्याची उत्कट इच्छा ज्याच्या मनामध्ये तीव्रतेने आहे आणि ज्याच्या प्रेमामुळे आणि शरणागत वृत्तीमुळे स्वतः भगवंत त्याचा ऋणी झाला आहे, असा भक्त भगवंताचा जगातील सर्वात उत्कृष्ट किंवा धन्य भक्त आहे.

(नष्ट -त्याज्य/वाईट, दुराशा – दुष्ट वासना वासना /इच्छा, प्रेमपाश- प्रेमाने बांधून ठेवणे, पिपाशा – तृष्णा /तहान)

विवेचन : भगवद भक्तीत जो रंगून गेला आहे, तो मनाने अंतर्बाह्य निर्मळ असतो. आत एक आणि बाहेर एक असे त्याच्याजवळ असत नाही. वासना, विकार आणि दुष्टभावना यांना त्याच्या मनात थारा नसतो. किंबहुना ह्या गोष्टी त्याला सहनच होत नाहीत. जसे आपल्याला शुभ्र वस्त्रावर एखादाही डाग चालत नाही, त्याप्रमाणे त्याचे मन शुभ्र वस्त्रासारखे आणि पारदर्शक असते. अशा भक्त विषयी बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, ” जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे हृदयी. “

“मना वासना दुष्ट कामा नये रे.. ” असे समर्थ सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आपल्याला सांगतात. त्याचे तात्पर्य हेच आहे. रावणाच्या मनामध्ये सीतेची कामना होती. धृतराष्ट्राच्या मनात पुत्रमोह होता. दुर्योधनाच्या मनात राज्याची कामना होती. अशा वाईट आणि दुष्ट विचारांमुळे त्यांचा नाश झाला.

आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ऐहिक सुखाची कामना असते. सत्ता, पैसा, सोनेनाणे कितीही मिळाले तरी हवेच असते. पण भगवंताचा खरा भक्त मात्र या गोष्टींपासून दूर असतो. तो कामना करतो ती भगवंताचीच! त्याच्या मनात तळमळ असते ती भगवंतप्राप्तीचीच! त्याची समर्पण भावना एवढी तीव्र असते की स्वतः भगवंत त्याच्या ऋणात राहतो. त्यांना कोणतेही ऐहिक सुख नको असते. तुकाराम महाराज म्हणतात, ” न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा.. ” त्यांचे भगवंताशी प्रेमाचे नाते जोडलेले असते. “तूंचि बापधनी” अशी भावना परमेश्वराबद्दल भक्ताच्या मनात असते. तोच त्यांचे आई-वडील, गुरु सगळे काही असतो.

भगवंताला देखील अशा भक्तांचा दास व्हावेसे वाटते. आपल्या दासाला कोणताही त्रास झालेला भगवंताला चालत नाही. मग जनाईला तो दळण दळू लागतो, नाथांच्या घरी तो पाणी भरतो, विठू महाराच्या रुपात दामाजींचे कर्ज फेडतो, पुंडलिकासाठी विटेवर उभा राहतो, अर्जुनासाठी त्याच्या रथाचे सारथ्य पत्करतो. यात त्याला कोणताही कमीपणा वाटत नाही.

देव बांधला जात नाही आणि त्याला कोणी बांधू शकत नाही. श्रीकृष्ण लहान असताना यशोदेने त्याला बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु जो जो त्याला बांधायला जावे तो तो दोरी अपूर्ण पडत होती. मग भगवंताने स्वतःच तिच्याकडून बांधून घेतले. असा भगवंत भक्तांच्या प्रेमाने बांधला जातो. हे अदृश्य बंधन असते. देव भावाचा भुकेला असतो.

सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु तो श्रीकृष्णाचा परमभक्त होता. तो जेव्हा श्रीकृष्णाच्या भेटीसाठी द्वारकेला आला तेव्हा श्रीकृष्णाने स्वतः त्याच्या पायात मोडलेले काटे काढले, त्याचे पाय धुतले, सेवासुश्रुषा केली. अशा रीतीने भगवंत हा भक्तांचा ऋणी होतो. परंतु त्यासाठी भक्ताची देखील तेवढी योग्यता असावी लागते.

आपले सगळे संत भगवंताचे असेच प्रेमळ भक्त होते. “संतांचीया गावा प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश ” असे उद्गार संतांच्या बाबतीत तुकाराम महाराज काढतात. म्हणूनच आपण सगळ्या संतांना माउली म्हणून संबोधतो. अशा संतांचा तर भगवंत देखील ऋणी असतो आपण अशा संतांचे दास व्हावे म्हणजे दासानुदास व्हावे. एवढी समर्पण भावना जर आपल्याजवळ असेल तर भगवंत प्राप्ती दूर नाही.

स्वसंवाद :: 

१) माझ्या मनातील दुराशा आणि वाईट विचार मला जाणवतात का? आणि ते नाहीसे करण्याचा मी प्रयत्न करतो का?

२) भगवंताला प्रेमपाशात बांधण्याची तळमळ माझ्या मनात आहे का? की माझी भक्ती केवळ ऐहिक गोष्टींसाठीच आहे?

३) “दासानुदास” होण्याची माझी तयारी आहे का – संतांच्या चरणी नम्रतेने जाण्याइतकी समर्पण भावना माझ्यात आहे का?

== == == 

मनाचे श्लोक क्र. ५६ – – – 

दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू |

स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू |

तया अंतरी क्रोध संताप कैचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५६|

अर्थ :  जो अनाथ आणि दुःखितांवर प्रेम करतो, जो मनाने अत्यंत मृदू आहे, प्रेमळ आणि सर्वांवर कृपेचा वर्षाव करणारा आहे, तसेच शरणागताला आश्रय देणारा आहे आणि ज्याच्या अंतरात राग किंवा संताप यांना त्रास नाही, असा परमेश्वराचा भक्त जगामध्ये खरोखरच धन्य होय.

(मवाळ – मृदू, स्नेहाळ – प्रेमळ, दासपाळू – शरणागताला आश्रय देणारा, संताप -त्रास)

विवेचन ::  हा श्लोक “जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा” या पालुपद-मालिकेचा सुंदर समारोप आहे.

हा श्लोक वाचताना एक विशिष्ट लय आपोआपच प्राप्त होते. ‘ ळ ‘ची पुनरावृत्ती याला एक वेगळेच सौंदर्य देते. परंतु हे केवळ भाषिक दृष्टीने जरी असले तरी अर्थाच्या दृष्टीने देखील हा श्लोक तेवढाच सुंदर आहे. जो भक्त भगवंताचा होऊन राहिला आहे, त्याच्यामध्ये काही गुणांचा परिपोष आपोआपच होत असतो. अशा भक्ताच्या अंगी कोणते गुण असतात ते समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे.

संत हे भगवंताचे श्रेष्ठ भक्त असतात म्हणून संतांमध्ये वरील श्लोकातील गुण आपल्याला प्रकर्षाने दिसतात किंवा जाणवतात. अत्यंत प्रेमळपणा हा संतांचा गुण! ते अनाथांची, दिनांची, दुःखी जनांची माउली होतात. संत एकनाथांनी तप्त वाळवंटात रडत असलेले हरिजनाचे मूल कडेवर उचलून घेतले. पूर्वजांचे श्राद्ध करीत असताना भुकेल्या हरिजनांना जेवू घातले, तृषार्त गाढवाच्या मुखी गंगेचे पाणी घातले. प्रसंगी परमेश्वर तरी कठोर होतो, परंतु संतांना मात्र सर्वसामान्यांचा अपार कळवळा असतो. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी मी अवतार घेतो असे गीतेमध्ये भगवंत म्हणतात. परंतु ज्ञानेश्वर माउलींसारखे संत दुष्ट नाहीसे होवो असे म्हणत नाहीत तर दुष्टांचा दुष्टपणा नाहीसे होवो असे म्हणतात.

सर्वसामान्यांच्या त्रासाने संत संतापत किंवा दुःखी होत नाहीत. त्यांच्याजवळ अपार करुणा असते. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास.. असे संत तुकाराम महाराज म्हणतात ते याचसाठी. संत कधी कधी कठोरपणे वागले किंवा बोलले तरी देखील त्यात लोककल्याणाची तळमळ आणि प्रेम असते. दासपाळू म्हणजे भगवंताच्या भक्ताला ते आश्रय देणारे असतात.

गीतेत भगवंतांनी स्थितप्रज्ञ पुरुषाची जी लक्षणे वर्णन केली आहेत, असे स्थितप्रज्ञ म्हणजे संत असतात. परंतु अशा व्यक्तींबद्दल बोलताना समर्थ त्यांना संत, महात्मे किंवा साधू असे म्हणत नाहीत तर अशा व्यक्तींसाठी ते ‘दास सर्वोत्तमाचा ‘शब्द वापरतात. हे शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहेत. दास म्हटले म्हणजे अहंता येत नाही. ज्या व्यक्ती आपल्याला साधू, संत, महात्मे म्हणवून घेतात, अशांच्या ठिकाणी अहंकार येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अशी माणसे आपल्याला सिद्धी प्राप्त आहे अशा प्रकारचा दावा करतात. खरे तर सिद्धी या परमार्थापासून दूर नेतात. परंतु सामान्य माणसे सिद्धीला भुलतात. याच गोष्टीचा गैरफायदा अशी मंडळी घेऊन समाजातील लोकांना फसवत असतात. फसवणुकीची अशी खूप उदाहरणे आपल्याला वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात. सुशिक्षित लोक देखील अशा प्रकारच्या चमत्कारांना बळी पडतात. म्हणून समर्थांच्या उपदेशामध्ये सिद्धींचा उल्लेखही नाही. समर्थांच्या दृष्टीने संत पुरुष तोच की जो परमेश्वराचा दास असतो.

परमेश्वराचा साक्षात्कार झालेले संत निरिच्छ असतात. विपरीत परिस्थितीने ते दुःखी होत नाहीत आणि अनुकूल परिस्थिती आली म्हणून हर्षित होत नाहीत. लोककल्याणाची त्यांना तळमळ असते. त्यासाठीच ते आपले आयुष्य घालवतात आणि म्हणून आता उरलो उपकारापुरता… असेच ते म्हणतात. असेच सर्वोत्तमाचे दास जगामध्ये धन्य भक्त म्हणवले जातात.

स्वसंवाद ::

१) माझ्या मनात दुसऱ्यांबद्दल खरी करुणा आहे का – की ती केवळ दिखाव्यापुरती असते?

२) “दुष्टपणा नाहीसे होवो” असे म्हणण्याइतकी उदारता माझ्या मनात आहे का – की मला माणसेच नको असतात?

३) मी “दास” आहे की “महात्मा” होण्याच्या मागे आहे – नम्रतेने परमेश्वराचा दास राहणे मला खरोखर पसंत आहे का?  

– क्रमशः श्लोक ५५ आणि ५६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “The Unsung Indian” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “The Unsung Indian” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

डॉ. गणेश राख!

पुण्यातील एका मजुराने पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले. प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाली. खर्च किती येईल याची त्याला कल्पना नव्हती; घर गहाण ठेवावे लागेल की काय अशी त्याची भीती होती.

डॉक्टर, मूल काय झालं? तो विचारतो.

“तुमच्या घरी परी आली आहे—मुलगी झाली आहे, ” डॉक्टर उत्तर देतात.

“फी किती आहे?”

“परी जन्माला आली की मी फी घेत नाही, ” डॉक्टर शांतपणे म्हणाले.

भावनांनी भरून आलेला तो मजूर डॉक्टरांच्या पायांवर कोसळला—“साहेब, तुम्ही देव आहात. ”

हे पुण्याचे डॉ. गणेश राख! … गेली दहा वर्षे ते असेच करत आहेत—मुलगी झाल्यावर एक पैसाही न घेता प्रसूती. आतापर्यंत १, ००० हून अधिक कन्यांचे जन्म त्यांनी विनामूल्य घडवले आहेत.

“मला लहानपणापासून कुस्तीगीर व्हायचं होतं; पण आई म्हणाली—‘डॉक्टर हो आणि या परींचं रक्षण कर, ’” ते अभिमानाने सांगतात.

लंडनच्या बीबीसीने त्यांच्यावर ‘Unsung Indian’ या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध केला आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलं.

… त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा—अशा देवदूतांचा जन्म झाला की खरंच समाज धन्य होतो…!

 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares