मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अनोखी पहल — कणादकुमार अमर – ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ अनोखी पहल — कणादकुमार अमर – ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ श्री मकरंद पिंपुटकर

आपल्या रोजच्या आयुष्यात चहाच्या टपरीपासून, भाज्यांच्या ठेल्यापासून, सायकलच्या दुकानांत अनेक ठिकाणी आपण शाळकरी मुलांना कामं करताना बघतो, घरकाम – धुणीभांडी करणाऱ्या मुलींना बघतो. चुकचुकतो, या मुलांनी शाळेत जायला पाहिजे म्हणतो, आणि मग तो विचार, ते चिंतन डोक्यातून काढून टाकतो आणि आपापल्या कामाला लागतो.

२०१६ साली, प्रयागराज (अलाहाबाद) मधील मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MNNIT मधील कणाद कुमार अमर या विद्यार्थ्यानेही ही अशी कामं करणारी मुलं पाहिली. मात्र इतरांसारखा तो कोरडा हळहळला नाही, त्याच्या डोक्यात चक्रं फिरू लागली.

त्याच्या ओळखीच्या या मुलांना तो भेटला. या मुलांना, त्यांच्याच वस्तीत – ‘नया गाव’ इथे, रोज संध्याकाळी तासभर तरी अभ्यासाला पाठवा, अशा त्याने त्या मुलांच्या आई वडिलांना विनवण्या केल्या.

“तुम्ही आमची मुलं पळवून नेणार आहात” पासून “धंदे के टाईम खोटी मत करना” पर्यंत अनेक उत्तरं मिळाली.

खूप मिनतवाऱ्या केल्यावर पंधरा विद्यार्थी मिळाले. कणाद आणि त्याचे पाच मित्र, त्यांचं कॉलेज संपल्यावर, नया गाव वस्तीत जाऊन या मुलांना शिकवू लागले. कॉलेज सांभाळून, इथं येऊन शिकवणं काहींना दगदगीचं वाटू लागलं – असे काही जण गळले, काही नवे स्वयंसेवक जोडले गेले. आणि कणादची ही ‘अनोखी पहल’ नया गावमध्ये रुजू लागली.

पण कणादला एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. त्याला या उपक्रमाची व्याप्ती वाढवायची होती. वस्तीमध्ये एका वेळी आणखी विद्यार्थ्यांना शिकता येईल अशी जागा नव्हती. कॉलेज सांभाळून वस्तीपर्यंत शिकवायला येणं स्वयंसेवकांना धावपळीचं होत होतं.

मार्ग काढण्यासाठी कणाद सरळ जाऊन MNNIT च्या डायरेक्टर डॉ. राजीव त्रिपाठी यांना भेटला.

एरवीच्या तरुणाईच्या अनास्थेबद्दल निराश होणाऱ्या डॉ त्रिपाठी यांना कणादची संकल्पना, निर्धार भावला. त्यांनी संध्याकाळी ६ नंतर, MNNIT मधील वर्ग संपल्यावर, MNNIT मध्ये या मुलांना शिकवण्यास परवानगी दिली.

या परवानगीने दोन गोष्टी छान झाल्या. नया गावमधील भरपूर विद्यार्थ्यांना शिकवता येणार होतं आणि कॉलेजच्या स्वयंसेवकांना मुलांना शिकवण्यासाठी दूर जाण्याची गरज नव्हती. शे दीडशे विद्यार्थी या “अनोखी पहल”चा फायदा घेऊ लागले.

संध्याकाळची वेळ व्यवसायाच्या दृष्टीने गडबडीची आणि म्हणून महत्त्वाची. या वेळेला या शाळकरी मुलांची व्यवसायात जास्त मदत लागे. त्यामुळे पालक संध्याकाळी मुलांना शिकायला पाठवायला नाखुश असत. कणादने यावरही मार्ग काढला. दुपारी १२ ते २ या वेळात, जेव्हा MNNIT ला जेवणाची सुट्टी असे, त्या वेळात कणाद नया गावमध्ये जाऊन अशा मुलांना शिकवू लागला.

MNNIT मधील वर्ग रात्री ८ पर्यंत चालत. मग इतक्या उशीरा मुलं, विशेषतः मुली घरी कशा येणार अशी पालकांना काळजी होती. पुन्हा कणादने या विद्यार्थ्यांसोबत घरापर्यंत येण्याची जबाबदारी घेतलीही आणि निभावलीही.

कॉलेजला सुट्टया लागल्या. या मुलांचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी कणाद MNNIT लाच राहिला. “अनोखी पहल” सुरू राहिली.

सगळं छान रुळू लागलं होतं, ‘अनोखी पहल’चे विद्यार्थी चांगले गुण मिळवू लागले होते. निव्वळ शिक्षणच नव्हे तर उत्तर प्रदेशातील कडाक्याच्या थंडीला तोंड देण्यासाठी या मुलांसाठी मायेची उब आणि तशाच उबदार लोकरी कपडयांची सोय करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांसाठी ‘अंत्योदय’ उपक्रमाअंतर्गत क्रीडास्पर्धा, शैक्षणिक स्पर्धा (निबंधलेखन, quiz, काव्यलेखन आदि) आयोजित केल्या जाऊ लागले होते, सणवार साजरे केले जाऊ लागले होते…

… आणि करोना आला.

‘अनोखी पहल’चा चमू हटला नाही. डटून राहिला. शक्य तेवढ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घेऊन त्यांनी हा ज्ञानयज्ञ सुरू ठेवला. ‘अनोखी पहल’ आता MNNITचा अधिकृत उपक्रम झाला होता. संस्थेचे चार प्राध्यापक यात मदतीसाठी नेमले होते.

आता करोनाचे संकट गेले आहे. ‘अनोखी पहल’ जोरात, जोमात आणि जोशात सुरू आहे. विद्यार्थी उत्तमोत्तम यश संपादन करत आहेत, काही जण तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून खुद्द MNNIT मध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.

कणाद स्वस्थ बसलेला नाही, फक्त इथल्या उपक्रमाच्या यशावर संतुष्ट नाही. मिर्झापूर, उत्तर प्रदेश आणि IIT, खरगपूर  इथेही त्याच्या संवादातून आणि प्रेरणेतून हे उपक्रम यशस्वीरीत्या  सुरू झाले आहेत.

“हे असं फुटकळ पाच पन्नास विद्यार्थ्यांना शिकवून काय असा मोठा तीर मारला ?” असं काठावर बसून सल्ला देणारे, उंटावरून शेळ्या हाकणारे काहीजण विचारतीलही – त्यावर एक खूप छान कथा वाचली होती.

एका तलावाच्या काठावर काही मासे पाण्याबाहेर पडले होते, पाण्याअभावी तडफडत होते. एकजण एक एक करून ते मासे पुन्हा पाण्यात टाकत होता. दुसऱ्याने त्याला विचारलं, “अरे, इथे इतके मासे पडले आहेत. असे पाच पंचवीस मासे परत पाण्यात टाकून काय मोठा फरक पडणार आहे ?” 

पाण्यात पुन्हा दिमाखात पोहणाऱ्या एका माशाकडे पहात पहिला उत्तरला, ” त्या माशाला नक्की फरक पडला आहे. “

कणादच्या ‘अनोखी पहल’ ला हार्दिक शुभेच्छा.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ये मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्‌ । 

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ४-११ ॥ 

*

भजताती मला पार्था मीही त्यांना भजतो

मनुजप्राणि सर्वथा मम मार्ग अनुसरतो ॥११॥

*

काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः । 

क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ ४-१२ ॥ 

*

मनुष्यलोके कर्मफलाकांक्षी देवतांचे पूजन करती 

पूजन करता देवतांचे होते सत्वर कर्मफल प्राप्ती ॥१२॥

*

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । 

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥ 

*

गुण तथा कर्म जाणुनी चातुर्वर्ण्य निर्मिले मी

कर्ता असुनी त्या कर्मांचा आहे अकर्ताच मी ॥१३॥

*

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा । 

इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥ 

*

मला मोह ना कर्मफलाचा त्यात न मी गुंततो

तत्व माझे जाणणारा कर्माशी ना बद्ध होतो ॥१४॥

*

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः । 

कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्‌ ॥ ४-१५ ॥ 

*

जाणुनिया हे तत्व कर्मे केली मुमुक्षुंनी

तूही पार्था कर्मसिद्ध हो त्यांना अनुसरुनी ॥१५॥

*

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।

तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ४-१६ ॥ 

*

कर्माकर्म विवेक करण्या संभ्रमित प्रज्ञावान

उकल करोनी कर्मतत्व कथितो मी अर्जुन 

जाणुन घेई हे ज्ञान देतो जे मी तुजला

कर्मबंधनातून तयाने होशिल तू मोकळा ॥१६॥

*

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः । 

अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ ४-१७ ॥ 

*

कर्मगती अति गहन ती आकलन होण्यासी

जाणुन घ्यावे  कर्मासी अकर्मासी विकर्मासी ॥१७॥

*

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । 

स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥ 

*

कर्मात पाहतो अकर्म अकर्मातही कर्म 

बुद्धिमान योगी जाणावा करितो सर्व कर्म ॥१८॥

*

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः । 

ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ ४-१९ ॥ 

*

सकल शास्त्रोक्त कर्मे ज्याची 

कामना विरहित असंकल्पाची

भस्म जाहली जी ज्ञानाग्नीत 

तो ज्ञानी असतो तो पंडित  ॥१९॥

*

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः । 

कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२० ॥ 

*

कर्म कर्मफलाचा असंग सदातृप्त आश्रयरहित

जीवनी करितो कर्म तथापि तो तर कर्मरहित ॥२०॥

– क्रमशः भाग ४ 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य

(त्यांचा आशीर्वाद खरा ठरला. शंकराचार्यांना अद्वैत वेदांताचा प्रचार प्रसार करायला आणखी सोळा वर्षांचे आयुष्य मिळाले.) – इथून पुढे —

या सोळा वर्षांच्या काळात शंकराचार्यांनी संपुर्ण भारतभर भ्रमण केले. सहा दर्शनांपैकी वेगवेगळ्या विचारधारांना मानणाऱ्या विद्वानांशी त्यांनी शास्त्रार्थ केला. हे शास्त्रार्थ म्हणजे वादविवाद नव्हते. त्या काळी शास्त्रार्थात कोण बरोबर हे अजिबात महत्वाचे नसे. काय बरोबर आहे हे महत्वाचे असे. असे शास्त्रार्थ ऐकायला विद्वानांची प्रचंड गर्दी होई. या शास्त्रार्थाच्या माध्यमातून लोक आपल्या ज्ञानात भर घालत. शंकराचार्यांनी शास्त्रार्थ केलेल्या सर्व विद्वानांनी अद्वैत दर्शन हे श्रेष्ठ असल्याचे मान्य केले. अशा प्रकारे त्यांनी अद्वैत वेदांताला भारतभर प्रतिष्ठा मिळवून दिली. या सर्व शास्त्रार्थापैकी बिहारमधील महाज्ञानी पंडित मंडन मिश्रा आणि त्यांच्या पत्नीशी शंकराचार्यांचा झालेला शास्त्रार्थ अतिशय गाजला. मंडन मिश्रा मीमांसा आणि द्वैतवादाचे कट्टर समर्थक होते. मंडन मिश्रा आणि त्यांच्या पत्नी शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांताने अतिशय प्रभावित झाले. दोघांनी शेवटी शंकराचार्यांचे शिष्यत्व स्वीकारले. यानंतर शंकराचार्यांचे नाव भारतभर झाले.

त्यांनी भारतभर केलेल्या प्रवासात धर्माचा दिग्विजय झाला. आपण सुरू केलेले धर्मकार्य पुढे असेच सतत चालू रहावे असे शंकराचार्यांची इच्छा झाली. म्हणून त्यांनी देशाच्या चार दिशांना चार पीठे निर्माण केली. दक्षिणेला कर्नाटकात शृंगेरीत शारदापीठ, पूर्वेला ओडिसात जगन्नाथपुरीला गोवर्धनपीठ, उत्तरेला बद्रीधामला जोतिर्मयपीठ आणि पश्चिमेला गुजरातमध्ये द्वारकेला द्वारकापीठ स्थापन केले. चार पीठांवर आपल्या चार प्रमुख शिष्यांना पिठाधिपती नेमले. या चार शिष्यांपैकी एक सुरेश्वर होते. हे सुरेश्वर दुसरे तिसरे कुणी नव्हते तर स्वतः मंडन मिश्रा होते. त्यांना शृंगेरीचे पीठाधिपती म्हणून नेमले गेले.

शंकराचार्यांची वयाची ३२ वर्षे पुर्ण होत आली होती. आपले जीवीतकार्य पूर्ण होत आल्याची जाणीव त्यांना होऊ लागली. एव्हाना त्यांना टोकाचे वैराग्य प्राप्त झाले होते. आता ते केदारनाथला एका गुहेत सतत ध्यानस्थ असत. अशात एके दिवशी शंकराचार्य अचानक अंतर्धान पावले. त्यानंतर ते कुणालाही दिसले नाहीत.

शंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय दर्शन शास्त्राविषयी थोडी माहिती घेऊ.

 

भारतीय दर्शनशास्राचे दोन प्रकार पडतात.

A) आस्तिक दर्शन

B) नास्तिक दर्शन

 

A) आस्तिक दर्शन हे वेदांना प्रमाण मानणारे दर्शनशास्र आहेत. त्यांचेही सहा प्रकार आहेत. दर्शनशास्रासमोर त्यांचे जनक लिहले आहेत.

१) सांख्य दर्शन – महर्षि कपिल

२) योग दर्शन – महर्षि पतांजली

३) मिमांसा / पुर्वमिमांसा दर्शन – महर्षि जैमिनी

४) न्याय दर्शन – महर्षि गौतम

५) वैशषिक दर्शन – महर्षि कणाद

६) वेदांत / उत्तर मिमांसा दर्शन – महर्षि व्यास

 

B) तीन नास्तिक दर्शन – वेदांना प्रमाण न मानणारे लोक दर्शनशास्त्रांना‘ नास्तिक दर्शन‘ म्हणतात. याचे तीन प्रमुख प्रकार आहेत.

१) बुद्ध दर्शन – गौतम बुद्ध

२) जैन दर्शन – महावीर

३) चार्वाक दर्शन / लोकायत दर्शन – ब्रहस्पती

 

आस्तिक दर्शनातील वेदांत दर्शनाचे पाच उपप्रकार आहेत.

१) द्वैत – मध्वाचार्य

२) अद्वैत – शंकराचार्य

३) विशिष्ट अद्वैत – रामानुजाचार्य

४) द्वैत अद्वैत – निम्बार्काचार्य

५) शुद्ध अद्वैत – वल्लभाचार्य

 

वेदांत दर्शनात तीन तत्वांच्या संबंधाबद्दल चर्चा केली आहे.

जगत – निर्जीव गोष्टी (शरीर / निर्जीव ब्रम्हांड) – जड – चालवले जाणारे

जीव – आत्मा – चैतन्यमय – चालवणारा

ब्रम्ह – ईश्वर – सच्चिदानंद परमेश्वर

१) द्वैत वेदांत दर्शन –

मध्वाचार्य –जीव, जगत आणि ब्रम्ह हे सगळे वेगळे वेगळे आहेत.

 २) अद्वैत वेदांत दर्शन –

शंकराचार्य – जीव, जगत आणि ब्रम्ह एकच आहेत. अविद्येमुळे माया निर्माण होते आणि मायेमुळे या तिघांमध्ये भेद असल्यासारखे वाटते.

 ३) विशिष्ट अद्वैत वेदांत दर्शन –

रामानुजाचार्य – जीव, जगत आणि ब्रम्ह हे एकच आहेत. पण मायेमुळे नव्हे तर ब्रह्मामध्ये स्वगत भेद (शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये भेद) असल्याने ते वेगळे वेगळे झाले आहेत. जीव आणि जगत ब्रह्मापासून जन्म घेतात.

४) द्वैताद्वैत / भेदाभेद वेदांत दर्शन –

निम्बार्काचार्य – जशी लाट आणि समुद्र वेगवेगळे आहेत आणि एक सुद्धा आहेत तसेच जीव, जगत आणि ब्रम्ह वेगवेगळेही आहेत आणि एक सुद्धा आहेत.

 ५) शुद्ध अद्वैत – वैष्णववाद –

वल्लभाचार्य – जीव, जगत आणि ब्रम्ह एकच आहेत. जीव आणि जगत हे सुद्धा केवळ ब्रम्ह आहेत. मायेमुळे जगत वेगळे वाटत असले तरी माया सुद्धा ब्रम्हाचाच भाग असल्याने ती सुद्धा ब्रम्हच आहे.

शंकराचार्यांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन !

 – समाप्त – 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

एक अलौकिक व्यक्तिमत्व !… आद्य शंकराचार्य

भारतात आजवर अनेक महान व्यक्तीमत्वे  होऊन गेली. त्यांचे कार्य इतके महान होते की शेकडो वर्षांनंतरही भारतीय समाज त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल कृतज्ञ आहे. ती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय समाज या महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो.

आज अशाच एका अलौकिक व्यक्तिमत्वाची माहिती घेऊ या !

वैशाख शुक्ल पंचमी ! आद्य शंकराचार्यांचा जन्मदिवस !

… सहा भारतीय दर्षणांपैकी प्रसिद्ध अद्वैत वैदांत दर्शनाचे जनक आणि प्रणेते,…. ब्रम्हसुत्रावर भाष्य, १० प्रमुख उपनिषदांवर भाष्य, विवेकचुडामणी, उपदेशसहस्री यासारख्या ३०० पेक्षा जास्त ग्रंथांचे निर्माते,… शास्रार्थात प्रकांड पंडितांना नम्रपणे नमवत धर्म दिग्विजय करणारे पंडित , … 

जगतगुरू आदी शंकराचार्यांची आज जयंती.

सामान्य मनुष्याला शेकडो वर्षात जे कार्य साध्य होणार नाही ते केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात साध्य करणारे हे असामान्य व्यक्तिमत्व !

केरळ मधील चेर राज्यात पेरीयार नदीच्या किनाऱ्यावर वसलेले कलदी हे गाव होते. हे गाव आजच्या कोची शहराजवळ आहे. या कलदी गावात शिवगुरू आणि सुभद्रा(आर्यांम्मा) भट्ट हे ब्राह्मण जोडपे राहत होते. लग्नाला बरेच वर्षे झाली तरी दोघांना मुलबाळ मात्र होत नव्हते. दोघे शंकराचे निस्सिम भक्त होते. एक दिवस शिवगुरूला स्वप्नात श्रीशंकराने दर्शन दिले. सोळा वर्षांचा बुद्धीमान पुत्र किंवा साठ वर्षांचा कमीबुद्धी पुत्र … यापैकी एकाची निवड करायला श्रीशंकराने शिवगुरूला सांगितली. यावर शिवगुरूंनी सोळा वर्षांचा बुद्धीमान पुत्र मिळावा अशी इच्छा व्यक्त केली.

पुढे यशावकाश माता सुभद्रा गर्भवती राहिली आणि वैशाख शुक्ल पंचमीला त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. श्रीशंकराच्या कृपाप्रसादाने झाला म्हणून बालकाचे नाव शंकर ठेवले.

शंकराचार्यांच्या जन्मसालाबद्दल मात्र एकवाक्यता नाही. वेगवेगळे विद्वान लोक शंकराचार्यांचा काळ वेगवेगळा मानतात. अगदी इस पुर्व 491 पासून इ.स. नंतर 897 पर्यंत वेगवेगळ्या वर्षी शंकराचार्यांचा जन्म झाला होता असे वेगवेगळे लोक मानतात.

शृंगेरीपीठानुसार महाराज विक्रमादित्याच्या कार्यकाळाच्या चौदाव्या वर्षी शंकराचार्यांचा जन्म झाला. पण विक्रमादित्य ही पदवी अनेक राजांना दिली गेली, ज्यांनी प्रजेवरील सर्व कर माफ केले होते. अगदी शंकराचार्यांनी उभारलेल्या चार पीठांमध्येही शंकराचार्यांचे जन्मसालाबद्दल एकवाक्यता नाही.

शृंगेरी शारदापीठ – इ.स.पूर्व 483

जगन्नाथपुरी गोवर्धन पीठ – इ.स.पूर्व 484

बद्रिकाश्रम ज्योतिर्मय पीठ – इ.स.पूर्व 485

द्वारकापीठ – इ.स.पूर्व 491

वयाच्या तिसऱ्या वर्षीच बाल शंकरच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. शंकरचे पाचव्या वर्षी यज्ञपवीत संस्कार झाले आणि शंकर शिक्षणासाठी गुरुगृही गेला. पण केवळ दोन वर्ष गुरूगृही राहून बालक शंकरने तात्कालिक शिक्षण व्यवस्थेतील सर्व शास्त्रांचे ज्ञान मिळवले. शिकवायला नवीन काहीही बाकी न राहिल्याने गुरूने सातव्या वर्षीच शंकरला स्वगृही परत पाठवून दिले. बाल शंकरने वयाच्या सातव्या वर्षी प्रकांड पंडिताला लाजवेल इतके ज्ञान मिळवले होते.

या ज्ञानामुळे शंकरला बालवयातच वैराग्य प्राप्त झाले होते. त्याला संन्यास घ्यायचा होता. पण आई आपल्या एकुलत्या एक पुत्राला संन्यास घ्यायची अनुमती देईना. शंकर आठ वर्षाचा असताना एकदा नदीत स्नान करत होता. इतक्यात मगरीने बाल शंकरचा पाय पकडला आणि ती त्याला खोल पाण्यात ओढू लागली. त्या अवस्थेतही बाल शंकरने आईला संन्यास घेऊ देण्याची विनंती केली. शेवटी आईने त्याची विनंती मान्य केली. त्यावर मगरीने शंकरचा पाय सोडला. बाल शंकरच्या मनासारखे झाले. संन्यासदिक्षा घेऊन बाल शंकर गुरूच्या शोधात बाहेर पडला.

पण इतक्या प्रभावी बालकाला गुरूही तसाच हवा. महिष्मती राज्यात नर्मदा नदीच्या तीरावर ओंकारेश्वर येथे गोविंद भगवतपादांचा आश्रम होता. ते महाज्ञानी म्हणून प्रसिद्ध होते. बाल शंकरने त्यांचे शिष्यत्व पत्करण्याचा निर्णय घेतला. दोघांची भेट झाल्यावर गोविंदपादांनी बालशंकरला त्याचा परिचय विचारला. त्यावर “मनोबुद्धयहंकार चित्तानि नाहम्…” असे सहा कडव्यांचे निर्वाण षट्कम हे पद्य सांगितले. बालशंकरने भुजंगवृत्तात तयार केलेल्या या सुंदर निर्वाण शटकात बालशंकरने आपला परिचय केवळ “शिवो अहम्” असा करून दिला. असा बुद्धिमान शिष्य मिळाल्याने गोविंद भगवतपाद सुद्धा सुखावले. त्यांनी बाल शंकरला आपला शिष्य बनवले. त्यांनी बालशंकरला वेदांत, अष्टांगयोग आणि उपनिषदांचे ज्ञान भरभरून दिले. शिक्षण पूर्ण झाल्यावर शंकर तेथेच आचार्य म्हणून काम करू लागले. शंकर आता शंकराचार्य झाले.

शंकराचार्यांना ब्रम्हसुत्रावर भाष्य करण्यासाठी इच्छा होती. त्यासाठी गुरूंच्या परवानगीने शंकराचार्य काशीला गेले. तेथे त्यांनी ब्रम्हसुत्र, प्रमुख दहा उपनिषदे आणि भगवत गीतेवर भाष्य लिहिली. काशीला गंगेच्या तटावर शंकराचार्यांनी अनेक विद्वानांसोबत शास्त्रार्थ केला. एकदा एका विद्वान ब्राम्हणाबरोबर सुरू झालेला शास्त्रार्थ तब्बल आठ दिवस चालला. शंकराचार्यांच्या ज्ञानावर समाधानी होऊन त्या ब्राम्हणाने शंकराचायांना भरभरून आशीर्वाद दिला….  शंकराचार्यांचे १६ वर्षांचे आयुष्य वाढून ३२ वर्षांचे होईल असा आशीर्वाद.  प्रत्यक्ष चिरंजीव वेदव्यास ब्राह्मणरूपात शंकराचार्यांशी शास्त्रार्थ करत होते असे मानले जाते. त्यांचा आशीर्वाद खरा ठरला. शंकराचार्यांना अद्वैत वेदांताचा प्रचार प्रसार करायला आणखी सोळा वर्षांचे आयुष्य मिळाले.

 –क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी – भाग-2 – लेखक : श्री सुभाषचंद्र सोनार☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी –  भाग-2 – लेखक : श्री सुभाषचंद्र सोनार☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी : …. नाना जगन्नाथ शंकरशेठ. 

आपण एतद्देशीय लोक जगन्नाथ शंकरशेठ यांचे अत्यंत ऋणी आहोत. कारण ज्ञानाचे बीज पेरण्यात ते अग्रेसर होते; इतकेच नव्हे तर सध्या त्याची जी जोमाने वाढ झाली आहे त्याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे.

– दादाभाई नौरोजी

अन्य क्षेत्रातली नानांची कामगिरीही थक्क करणारी आहे. ‘ग्रेट ईस्टर्न स्पिनिंग अँड विव्हिंग’ या मुंबई त सुरू झालेल्या पहिल्यावाहिल्या कापड गिरणीचे नाना प्रवर्तक डायरेक्टर होते. गुजरात व सिंधशी दळणवळणासाठी, सन १८४५ मध्ये त्यानी, ‘बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी’ स्थापन केली. ‘याग्रो हार्टिकल्चरल सोसायटी अॉफ वेस्टर्न इंडिया’, ‘जिअॉग्राफिकल सोसायटी’ आणि धान्य व्यापार्यांच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी ‘जॉईंट स्टॉक ग्रेन कंपनी’ या महत्वपूर्ण संस्थांच्या स्थापनेतही, त्यांचाच पुढाकार होता. तसेच १८४२ मध्ये स्थापन झालेल्या ‘बँक अॉफ वेस्टर्न इंडिया’चे ते प्रवर्तक संचालक होते. तर १८५७ मध्ये मुंबईत पहिले नाट्यगृहही बांधले ते नानांनीच.

नानांच्या कार्याची यादी इथेच संपत नाही. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी विहार लेकची निर्मिती तर त्यांनी केलीच, शिवाय पाणीटंचाईच्या काळात रेल्वेच्या डब्यांमधून पाणी आणून, ते विहीरी व तळ्यांमध्ये ओतण्याची व्यवस्थाही त्यांनी करविली.

मुंबईच्या रस्त्यांवर खोबरेल तेलाचे दिवे लावले जात. पण त्यांच्या अपु-या प्रकाशामुळे लोकांची गैरसोय होई, नि चोरचिलट्यांचं फावत असे. इंग्लंडमध्ये रस्त्यांवर ग्यासचे दिवे लावले जातात, ही गोष्ट कानावर येताच नानांनी, तशा प्रकारच्या दिवाबत्तीच्या सोयीसाठी, चिंचपोकळीला ग्यास कंपनी सुरू केली.मॉरिशसहून ऊसाचं बेणं आणून त्यांनी आपल्या बागेत त्याची लागवड केली.

अशा सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधांचं जाळं नानांनी मुंबईत विणलं. त्यामुळेच आज मुंबईला आर्थिक राजधानीचा व आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे. या महात्म्यामुळेच मुंबई ही प्रत्येक मराठी माणसाची स्वप्ननगरी बनली. आयुष्यात एकदा तरी या स्वप्ननगरीला भेट दिल्याशिवाय, त्याला आपलं जीवन असार्थक वाटू लागलं. त्यातूनच ‘जीवाची मुंबई करणे’ हा वाक्प्रचार रुढ झाला. मुंबईवर कवणं रचली गेली. अण्णाभाऊ साठेंनी मुंबईची लावणी लिहीली. तर हिंदी चित्रपटातही मुंबईवर अनेक गीतं लिहीली गेली. ती गाजली, लोकप्रिय झाली.

आज आम्ही ‘आमची मुंबई, आमची मुंबई’ असं अभिमानाने म्हणतो. पण त्यातून मंबईविषयीचं प्रेम कमी, आणि प्रांतिक अस्मिताच अधिक डोकावते. डोकवे का ना, पण मग मुंबईच्या विकासातही आमचा सहभाग असला पाहिजे, तरच आमची मुंबई म्हणण्याला अर्थ आहे. ज्या निर्जन मुंबईत एकेकाळी लोकांना यायची भीती वाटायची, त्या मुंबईचं नानांनी आपल्या परिसस्पर्शाने सोनं केलं. त्या सोन्याच्या मुंबईची आम्ही बकाल मुंबई करुन टाकली आहे.

सतीप्रथाबंदीसाठी राजा राममोहन राय यांच्यासोबत पुढाकार घेऊन नानांनी, नऊ वर्षे लढा दिला व सतीप्रथा प्रतिबंधक कायदा करवून घेतला. सतीबंदीसाठीच्या त्यांच्या कार्याची गव्हर्नर जॉन माल्कम यांनी मुक्त कंठाने स्तुती केली. नानांच्या लोकप्रियतेने प्रभावित झालेल्या सर फ्रेडरिक लिओपोल्ड यांनी आपल्या मुलाचं नाव ‘लिओनार्ड रॉबर्ट शंकरशेठ’ असं ठेवलं होतं.

सरकार दरबारी नानांच्या उत्तरोत्तर वाढत्या प्रभावामुळे, पोटशूळ उठलेल्या नानांच्या हितशत्रूंनी, नानांवर १८५७ च्या उठावकर्त्यांना अर्थसहाय्य केल्याचे व आपल्या धर्मशाळेत त्यांना आश्रय दिल्याची बालंटं आणून, नानांच्या नावे पकडवॉरंट जारी करायला सरकारला भाग पाडले होते. पण हितशत्रुंचे हे कट नानांनी उधळून लावले.

ज्या काळात भारताच्या राजकिय, सामाजिक व औद्योगिक क्षितिजावर समस्त राष्ट्रीय नेत्यांचा, संस्था-संघटनांचा, उद्योजकांचा उदयही झाला नव्हता, त्या घनतमी, नाना जगन्नाथ शंकरशेठ हा शुक्रतारा, आपल्या तेजाने तळपत होता. म्हणूनच त्यांचे एक चरित्रलेखक डॉ. माधव पोतदार हे नानांना, ‘आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रपुरुष’ संबोधतात, तर नानांच्या जीवनावर “प्रारंभ” ही कादंबरी लिहीणारे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ, नानांचा ‘आधुनिक भारताचा आद्य शिल्पकार’ असा सार्थ गौरव करतात. व्यक्तिगत पातळीवर नानांच्या कार्याचं महत्त्व जाणणारे अनेक आहेत. परंतु शासकीय पातळीवर मात्र नानांचं ऋण जाणणारा नि त्यातून उतराई होणारा कोणी नाही.

ज्यांचा शासनाने ‘भारतरत्न’ किताबाने गौरव केला पाहिजे, असे नाना जगन्नाथ शंकरशेठ उपेक्षेचे धनी ठरले आहेत. कारण नानांच्यामागे ना मतपेटीवर प्रभाव टाकू शकणारं ‘सामाजिक पाठबळ’ आहे, ना पुरस्कारासाठी आराडाओरडा करणारी ‘शाऊटिंग बटालियन’ आहे. परिणामी मुंबईवर जीवापाड प्रेम करणारा हा मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, मुंबईतही उपेक्षित आहे. मुंबईच्या विकासासाठी जातीनिरपेक्ष भावनेने, सढळ हातांनी आर्थिक मदत व भूमीदान करणा-या नानांच्या स्मारकासाठी मात्र मुंबईत जागा नाही, एवढी मुंबई कृपण नि कृतघ्न झाली आहे. हे पाहून नानांच्या आत्म्याला काय वाटत असेल…..

 डूबे हुओं को हमने बिठाया था,अपनी कश्ती में यारों।

और फिर कश्ती का बोझ कहकर, हमें ही उतारा गया॥

 हल्लीचे नेते राजकीय लाभाच्या शक्यतेखेरीज, कुणाचीच तळी उचलत नाहीत. आणि त्यांच्या राजकीय लाभाच्या गणितात, नाना मात्र नापास आहेत. शासनाची ही उदासिनता आणि ज्या दैवज्ञ सोनार जातीत नाना जन्माला आले, त्या ज्ञातीबांधवांची आत्ममग्नता खरोखर वेदनादायी आहे.

 सध्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स करण्याचा धंदा जोरात सुरु आहे. ही मंडळी मुलांसमोर देशीविदेशी उद्योजकांचे आदर्श उभे करते, पण त्यांच्या आदर्शांच्या दोनशे वर्षं आधी, नाना जगन्नाथ शंकरशेट नामक, ‘फर्स्ट इंडियन आयकॉन’ होऊन गेला, हे त्यांच्या गावीही नाही. तर शालेय पाठ्यपुस्तक मंडळालाही त्याचं विस्मरण झालं आहे. इतकी प्रचंड अनास्था या युगपुरुषाच्या वाट्याला आली आहे. याला काय म्हणायचं.! वैचारिक दिवाळखोरी की भावी महासत्तेची मस्ती..! अपूज्यांची पूजा नि पूज्यांची अवहेलना करुन, भारत महासत्ता बनेल असं कुणाला वाटत असेल, तर तो त्यांचा ‘बनेलपणा’आहे, माझं अस्वस्थ मन मात्र म्हणते आहे.

या दिल की सूनो दुनियावालो,

या मुझको अभी चूप रहने दो।

मैं ग़म को खुशी कैसे कह दूं,

जो कहते हैं उनको कहने दो॥

समाप्त

लेखक : -सुभाषचंद्र सोनार, राजगुरुनगर.

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी –  भाग-1 – लेखक : श्री सुभाषचंद्र सोनार☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी –  भाग-1 – लेखक : श्री सुभाषचंद्र सोनार☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

भारतरत्न किताबाचे उपेक्षित मानकरी : …. नाना जगन्नाथ शंकरशेठ. 

आपण एतद्देशीय लोक जगन्नाथ शंकरशेठ यांचे अत्यंत ऋणी आहोत. कारण ज्ञानाचे बीज पेरण्यात ते अग्रेसर होते; इतकेच नव्हे तर सध्या त्याची जी जोमाने वाढ झाली आहे त्याचे सर्व श्रेय त्यांनाच आहे.

– दादाभाई नौरोजी

आमच्या जातिव्यवस्थेचा डंख, महामानवांनाही चुकला नाही. परिणामी सामान्य माणसासारखी, असामान्य माणसं देखील, जातिव्यवस्थेची बळी ठरली आहेत. आमच्या देशात नावलौकिकासाठी, व्यक्तीचं नुसतं कार्यकर्तृत्व पुरेसं नसतं. तर त्याला जातीच्या प्रमाणपत्राचीही जोड असावी लागते. जातीचं प्रमाणपत्र हे अनेकदा, प्रगतीपत्रकावरही कुरघोडी करतं. तुमच्याकडे प्रस्थापित जातीचं प्रमाणपत्र असेल, तर मग तुमच्या राई एवढ्या कर्तृत्वाचेही पर्वत उभे केले जातील. आणि ते नसेल, तर तुमच्या पर्वता एवढ्या कर्तृत्वाचीही राई राई केली जाईल. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ!

आज नाना जगन्नाथ शंकर शेठांची २१२ वी जयंती. हे नाना कोण? असा प्रश्न काहींना पडेल, तर काही म्हणतील हे नाव ऐकल्यासारखं वाटतं, पण हे गृहस्थ कोण ते मात्र आठवत नाही. नानांचं योगदान आणि कार्यकर्तृत्वाचा परिचय असणारेही आहेत, पण थोडेच.

मित्रहो, नानांची एका वाक्यात ओळख सांगायची तर, नाना जगन्नाथ शंकर शेठ हे भारतीय रेल्वेचे जनक आहेत, एवढं सांगितलं तरी पुरेसं आहे. पण ते नानांच्या कार्यकर्तृत्वरुपी हिमनगाचं फक्त टोक आहे. एवढं नानांचं योगदान विशाल आहे.

१० फेब्रुवारी १८०३ रोजी मुंबईत, एका धनाढ्य सोनार (दैवज्ञ) परिवारात, नानांचा जन्म झाला. कुशाग्र बुद्धीच्या नानांचं शिक्षण घरीच झालं. तरुणपणी आपला वडीलोपार्जित व्यापाराचा वारसा तर नानांनी समर्थपणे चालवलाच, पण समाजकारण, अर्थकारण, राजकारण, शिक्षण, कला, विज्ञान अशा जीवनाच्या अनेक क्षेत्रात, त्यांच्या अश्वमेधी अश्वाने निर्विघ्न संचार करुन, नानांच्या कार्यकर्तृत्वाची पताका चौफेर फडकवली. त्यामुळेच आचार्य अत्रेंनी ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ असं त्यांचं सार्थ वर्णन केलं आहे.

नाना हे फक्त धनाढ्य नव्हते, गुणाढ्यही होते. नाना इतके धनाढ्य होते की, प्रसंगी इंग्रज सरकारलाही ते अर्थसहाय्य पुरवित, आणि नाना इतके गुणाढ्य होते की, अनेक महत्वपूर्ण प्रश्नांवर इंग्रज अधिकारी, नानांशी परामर्श करीत. नाना जणू त्यांचे थिंक टँक होते. धनाचा आणि गुणांचा असा मनोरम आविष्कार क्वचितच पहायला मिळतो.

मुंबई या आपल्या जन्मभूमि आणि कर्मभूमिवर नानांचं निरतिशय प्रेम होतं. भारतात सुरु होणा-या नव्या गोष्टींचा मुळारंभ, हा मुंबईपासूनच झाला पाहिजे, हा नानांचा ध्यास होता. इंग्रजांची भारतातील राजधानी कलकत्ता होती. तरीही या देशात रेल्वेचा मुळारंभ मुंबईपासून झाला, त्याचं सर्व श्रेय नानांना आहे. हे पाहून मला मेहदी हसन यांच्या गजलेतील — 

‘मैंने किस्मत की लकीरों से चुराया है तुझे।’

—- या काव्यपंक्तींचं स्मरण होतं.

आज रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन (जीवनरेखा) बनली आहे. पण खरोखरच ‘दैवज्ञ’ नानांनी, नियतीच्या हातातली लेखणी काढून घेऊन, स्वहस्ते ती जीवनरेखा मुंबईच्या करतलांवर रेखली आहे. त्यासाठी आपल्या संवादकुशलतेने त्यांनी इंग्रज अधिका-यांचं मन वळवलं. त्यांना सर्वप्रकारच्या सहकार्याचं आश्वासनही दिलं. त्यासाठी १८४३ साली ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. नुसता पुढाकारच घेतला नाही, तर या कंपनीच्या तीन प्रवर्तकांपैकी एक प्रवर्तक नानाच होते. तसेच रेल्वेच्या कार्यालयासाठी स्वत:च्या घरात जागा उपलब्ध करुन देऊन, नानांनी रेल्वेच्या मार्गातील तोही अडथळा दूर केला. अशाप्रकारे १६ एप्रिल १८५३ रोजी, मुंबई-ठाणे या मार्गावर धावलेली ही रेल्वे, फक्त भारतातील पहिली रेल्वे नव्हती, तर आशिया खंडातील पहिली रेल्वे होती. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणा-या, बोरीबंदर-पुणे या रेल्वेमार्गाचे जनकही, नानाच आहेत. नानांच्या या बहुमोल कार्याचा गौरव इंग्रज सरकारने सोन्याचा पास देऊन केला. त्यायोगे नानांना रेल्वेच्या पहिल्या वर्गातून, प्रवासाची सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिली.

नानांच्या लोककार्याच्या यज्ञाची सांगता इथेच होत नाही, तर मुंबई विद्यापीठ, ग्रँट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जे. जे. स्कूल अॉफ आर्टस, एल्फिन्स्टन कॉलेज या शिक्षणसंस्थांच्या उभारणीत, नानांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. स्रीशिक्षणाचेही नाना पुरस्कर्ते होते. मुलींसाठी त्यांनी स्वखर्चाने स्वत:च्या घरात शाळा सुरु केली. तसेच मुलींसाठी शाळा सुरु करणा-या रेव्हरंड विल्सन यांना शाळेसाठी, गिरगावात जागा उपलब्ध करुन दिली. तत्पूर्वी सन १८४६-४७ मध्ये नानांनी महाराष्ट्रभर हिंडून, शैक्षणिक परिस्थितीची पहाणी करुन, आपले अनुभव बोर्ड अॉफ एज्युकेशनचे अध्यक्ष, सर अर्स्किन पेरी यांना कळविले. त्यातूनच महाराष्ट्रात सार्वत्रिक शिक्षणाचा पाया घातला गेला. त्यामुळेच आचार्य अत्रेंनी म्हटले आहे, “आज मुंबई इलाख्यामध्ये विद्यादानाचा जो विराट वृक्ष पसरलेला दिसतो त्याचे बीजारोपण नाना शंकरशेट यांनी केले आहे हे प्रत्येक महाराष्ट्रीयाने ध्यानात धरावेत. आम्ही हे म्हणतो असे नव्हे तर महर्षि दादाभाई नौरोजींनीच मुळी तसे लिहून ठेवलेले आहे.”

– क्रमशः भाग पहिला  

लेखक : -सुभाषचंद्र सोनार, राजगुरुनगर.

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पारंपारिक  मानसोपचार… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ पारंपारिक  मानसोपचार… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

भल्यामोठ्या खलबत्यात ती दणादण दाणे कुटत होती…. बत्ता चांगलाच मजबूत होता.तो उचलायचा म्हणजे ताकदीचं काम होतं ! तोंडाने ती काहीतरी पुटपुटत होती. त्यात संताप जाणवत होता. मधूनच तिच्या आवाजाला धार यायची तेव्हा बत्ता जरा जास्तच जोरात आपटला जायचा. खला तील दाण्याचा पार भुगा होऊन आता त्याला तेल सुटायला लागलं होतं. जेव्हा बत्त्याला तेल लागायला लागलं तशी ती थांबली. पदराने तिने घाम पुसला आणि हुश्श करून पदरानेच थोडं वारं घेतलं.

आता तिचा चेहरा जरा शांत वाटत होता. तिची आणि माझी नजरानजर झाली तशी ती म्हणाली, “ बरं वाटलं बघ ! चांगलं कुटून काढलं बत्त्याने ! “

माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य!

“ अगं कोणाला? “ 

त्यावर ती म्हणाली…. “ आता मी कोणाला कुटून काढणार? आहे का ती ताकद माझी? कोणापुढे माझं काहीही चालत नाही ! कोणी माझं ऐकत नाही. मग असे छोटे छोटे संताप एकत्र गोळा होऊन त्याचा एक मोठा ढीग होतो बघ एखाद दिवशी ! मग त्या ढिगाचं ओझं मला सहन होत नाही. माझ्याकडून काहीतरी वेडंवाकडं बोललं जाईल याची मला भीती वाटते. अशी भीती वाटली ना की मी दाणे किंवा चटण्या घेते कुटायला,आणि खलबत्त्याच्या आवाजात बडबड करते माझ्या मनाला वाटेल ती ! चटण्याही छान होतात आणि तेल सुटलेला दाण्याचा लाडू ही छान होतो. मग घरातले सगळे म्हणतात…. चटण्या आणि दाण्याचा लाडू खावा तर हिच्याच हातचा ! मग मला गालातल्या गालात हसू येतं बघ.” 

माझ्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह !” म्हणजे तू नक्की काय करतेस?” 

“अगं डोक्यात फार संताप असला ना की सगळी शक्ती एकवटून कोणाच्यातरी एक थोबाडीत ठेवून द्यावीशी वाटते. हात शिवशिवतात माझे . आणि फाडफाड बोलून समोरच्याला फाडून खावं अशी इच्छा होते. पण हे असं वागणं योग्य नाही हेही पटतं मला. पण मग या त्रासाचं काय करू? तो सगळा राग मी या खलबत्त्यातल्या दाण्यांवर आणि खोबऱ्यावर काढते… जे जे मनात असतं ते बोलून टाकते. त्यामुळे मोकळं वाटतं बघ मला ! मनावरचं ओझं हलकं होतं. अंगातली ताकद सत्कारणी लागते. आणि चटण्या, लाडू सुंदर होतात हा सगळ्यात मोठा फायदा. पुन्हा, घरात वादंग घालून घरातली शांतता नष्ट करा हेही होत नाही… “ …. आणि ती मस्तपैकी हसली ! आणि माझ्या डोक्यात ट्यूब पेटली…… अरे खरंच ! किती छान घरगुती उपाय आहे हा !

पूर्वी बायकांनी घरात फार बोलायची, आपली मतं मांडायची पद्धत नव्हती. लहानपणापासूनच त्यांना सहन करण्याची सवय लावली जायची. पण त्यातही काही बायका मूळच्या बंडखोर वृत्तीच्या असायच्याच. त्यांना मनाविरुद्ध गोष्टी पचवणे जड जायचे. पण घरामध्ये अशा पद्धतीने कामं करता करता त्या मोकळ्या व्हायच्या. जात्यावर गाणी गात दळताना त्या सुरांबरोबर त्यांच्या मनाचे बंध मोकळे व्हायचे. धान्याबरोबर तिच्या मनातील टोचणारे बोचणारे अनेक सल पिठासारखे भुगा होऊन जायचे…. असंच असेल कदाचित .. म्हणूनच पूर्वीच्या बायकांमध्ये सहनशक्ती अधिक होती असे राहून राहून वाटते.

पाट्यावर जोरजोरात वाटणे, दगडावर धुणं आपटणे, आदळ आपट करत भांडी घासणे, किसणीवर खसाखसा खोबरे किसणे, जात्याचा खुंटा ठोकणे, उखळामध्ये मुसळाने कांडणे, या सगळ्या कामांमध्ये बायकांना भरपूर ताकद लागायची. या शारीरिक कष्टांच्या क्रिया करताना त्यांच्या मनातील उद्वेग बाहेर पडायला मदत व्हायची.

आत्ताच्या काळात आपण सगळेच शारीरिक कष्ट करायचे विसरलो आहोत. त्यामुळे आतल्या आत जी घुसमट होते ती बाहेर पडायला वाव मिळत नाही. पूर्वी घरात खूप माणसं असायची. त्यामुळे वातावरणातील ताण कमी असायचा. विविध विषयांवर घरात बोलणं व्हायचं, त्यामुळे एकाच विषयाभोवती संभाषण फिरायचं नाही. त्यामुळे दुःख उगाळत बसण्याची माणसांवर वेळच यायची  नाही.

आपणही जेव्हा काही शारीरिक श्रम करतो तेव्हा शरीराबरोबर आपल्याला एक मानसिक स्वास्थ्य लाभतं. एखादी घाण झालेली गोष्ट आपण स्वतःच्या हाताने घासून पुसून लख्ख करतो तेव्हा ती घासताना मनातील कचरा, धूळ आणि जळमटं बहुधा स्वच्छ होत असावेत. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातील एखादे तरी स्वच्छतेचे काम स्वतःहून करावे. त्यामुळे तुमचे मन:स्वास्थ्य चांगले राहायला मदत होईल असे वाटते. प्रत्येकाने शारीरिक श्रमाचा कोणताही मार्ग जो आपल्याला सहज शक्य असेल आणि आवडीचा असेल तो शोधून काढावा ….. पण आपल्या जीवनातील राग, संताप, नैराश्य, आपल्या मनात साचून राहणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी !

…… 

लेखिका : सुश्री माधुरी राव, पुणे.

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच 

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्‌ । 

विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्‌ ॥ ४-१ ॥ 

कथित भगवान

अव्यय योग कथिला मी विवस्वानाला

त्याने कथिला स्वपुत्राला वैवस्वताला ।। १ ।।

अपुल्या सुतास कथिले त्याने मग मनुला

इक्ष्वाकूला मनुने कथिले या अव्यय योगाला ॥१॥

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः । 

स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४-२ ॥ 

अरितापना राजर्षींनी योग जाणला परंपरेने

वसुंधरेवर नष्ट पावला तो परि कालौघाने ॥२॥

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः । 

भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्‌ ॥ ४-३ ॥ 

योग हा तर अतिश्रेष्ठ अन् कारकरहस्य

प्रिय सखा नि भक्त असशी माझा कौन्तेय 

मानवजातीला उद्धरण्या घेउन आलो हा योग

तुजला कथितो आपुलकीने पार्था ऐक हा योग ॥३॥

अर्जुन उवाच 

अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः । 

कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४-४ ॥ 

कथिले अर्जुनाने

हे श्रीकृष्णा जन्म तुझा तर अर्वाचीन काळाला

अतिप्राचीन सूर्यजन्म  कल्पारंभी काळाला

महाप्रचंड अंतर तुम्हा दोघांच्याही काळाला

मला न उमगे आदीकाळी कथिले कैसे सूर्याला ॥४॥

श्रीभगवानुवाच 

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । 

तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥ ४-५ ॥ 

कथित श्रीभगवान

कितीक जन्म झाले माझे-तुझे ऐक परंतपा कुंतीपुत्रा

तुला न जाणिव त्यांची परी मी त्या सर्वांचा ज्ञाता ॥५॥

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्‌ । 

प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥ ४-६ ॥ 

अजन्मा मी,  मी अविनाशी मला न काही अंत

सकल जीवांचा ईश्वर मी नाही तुजला ज्ञात

समग्र प्रकृती स्वाधीन करुनी देह धारुनी येतो

योगमायेने मी अपुल्या प्रकट होत असतो ॥६॥

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । 

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥ 

जेव्हा जेव्हा धर्माची भारता होत ग्लानी 

उद्धरण्याला धर्माला येतो मी अवतरुनी ॥७॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । 

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥ 

विनाश करुनीया दुष्टांचा रक्षण करण्या साधूंचे

युगा युगातुन येतो मी  संस्थापन करण्या धर्माचे ॥८॥

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । 

त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥ 

जन्म माझा दिव्य पार्था कर्म तथा निर्मल

मोक्ष तया मिळेल जोही या तत्वा जाणेल

देहाला सोडताच तो मजला प्राप्त करेल

पुनरपि मागे फिरोन ना पुनर्जन्मास येईल ॥९॥

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । 

बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ ४-१० ॥ 

क्रोध भयाला नष्ट  करुनी निस्पृह जे झाले होते

अनन्य प्रेमाने माझ्या ठायी वास करूनि स्थित होते

ममाश्रयी बहु भक्त पावन होउनिया तपाचरणे ते

कृपा होउनी प्राप्त तयांना स्वरूप माझे झाले होते ॥१०॥

– क्रमशः भाग चौथा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ केकी मूस — लेखक : श्री योगेश शुक्ल ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ केकी मूस — लेखक : श्री योगेश शुक्ल ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

आज ३१ डिसेंबर कलामहर्षी केकी मूस यांचा स्मृतीदिन. केकी मूस या अवलियाची ही दुनिया! कलेशी तादात्म्य पावलेल्या या कलाकाराने आपले सारे आयुष्य तिच्या साधनेत घालवले. ‘केकी मूस’ हे नाव प्रथम ऐकणाऱ्याला गूढ-कुतूहलाचे वाटते. या नावामागे मोठे विश्व दडल्याची भावना होते. या व्यक्तिमत्त्वाचा शोध सुरू झाला, की मग या गूढ अंतरंगाची खोली किती खोल-रुंद आहे याचाही साक्षात्कार होतो. कलेच्या प्रांतातील या गंधर्वाचा शोध घेतच अनेकांची पावले चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगतच्या त्या दगडी बंगलीत शिरतात आणि या दंतकथेचा भाग बनून जातात.कैकुश्रु माणेकजी ऊर्फ केकी मूस या अवलियाची ही दुनिया! मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रूंच्या वस्तीत २ ऑक्टोबर १९१२ रोजी हा कलायोगी जन्माला आला.

 केकी मूस यांना त्यांचे निकटवर्तीय बाबुजी म्हणत असत. केकी मूस  हे पारशी समाजात जन्मले, ते तहहयात अविवाहित राहिले. त्यांची आई पिरोजाबाई सात्त्विक, प्रेमळ अन् दयाळू होत्या. वडील माणेकजी शांत, संयमी, सुशील व हिशोबीदेखील होते. केकी मूस यांचे बालपण  मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत मलबार हिल येथे त्यांच्या मामांच्या घरी गेले. मामा स्वातंत्र्यपूर्व काळातील नामवंत बिल्डर होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस ही त्यांनी बांधलेली वास्तू आहे. त्यांचे नाव आर.सी. नरिमन. मुंबईतील समुद्रकाठच्या एका टोकाला त्यांचेच नाव देण्यात आले आहे – नरिमन पॉर्इंट. मामांनी केकींचे शिक्षण- प्राथमिकपासून तर महाविद्यालयापर्यंत मुंबईत केले. केकींनी १९३३ साली पदवी प्राप्त केली. त्याचे मामा अविवाहित होते. त्यांनी केकीला त्यांचा मुलगा मानले होते.

केकीने पदवी प्राप्त होताच लंडनला जाऊन कलाशिक्षण घेण्याची इच्छा प्रकट केली. परंतु मामाला त्यांचा उद्योग व्यवसाय केकीने सांभाळावा असे वाटत होते. केकी हट्टी होते. ते म्हणाले, “मामा कोठलेही ऐश्वर्य मला माझ्या निर्णयापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही.” ते ऐकल्यावर मामा भडकले. त्यांनी केकींना त्यांच्या आईबाबांकडे पाठवून दिले. केकींनी त्यांची बॅग भरली व त्याच मिनिटाला मामांचा बंगला सोडला व रात्रीची कलकत्ता मेल धरली. केकींचे यांचे वडील, माणेकजी मूस हे १९३४ साली कालवश झाले. त्यांच्या आईचा आधार गेला. पण १९३३-१९३४ सालामध्ये केकींनी पाटणादेवी, तीर्थक्षेत्र बालझिरी, खुलताबाद, वेरूळ या ठिकाणी कित्येकदा जाऊन फोटोग्राफी केली, पेंटिंग्ज केली. केकींनाही वडिलांच्या निधनाने हादरा बसला. केकी त्यांच्या आईला तिच्या हॉटेल व्यवसायात मदत करू लागले. केकींनी लंडनला जाण्याचा विषय आईकडे कधीही काढला नाही.

कैकुश्रु माणेकजी मूस हे केकींचे नाव, परंतु पिरोजाबाई लाडाने त्यांना केकी म्हणू लागल्या. त्याच नावाने ते जगप्रसिद्ध झाले. केकींच्या मनातील घालमेल आईला कळली बहुधा, आई एक दिवस त्यांना म्हणाली, “केकी, बाळा, मी तुला उद्या पैसे देणार आहे, तू लंडनला जाण्याची तयारी कर!”. केकी त्यांच्या अखेरच्या प्रवासापर्यंत कधीही आईचे ते ‘देणे’ विसरू शकले नाहीत. आईची आठवण आल्यावर केकी देवालाही रागावायचे आणि म्हणायचे, ‘कसला देव बीव काय नाय! देव असता तर माज्या आईला त्याने नेला नसता.’ आईने परवानगी दिल्याने केकी जाम खूश झाले. केकींनी १९३५ ला लंडनला प्रयाण केले व तेथील ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा ‘कमर्शियल आर्ट’चा डिप्लोमा पूर्ण केला. ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’ने फोटोग्राफीच्या जागतिक दर्ज्याच्या ज्या स्पर्धा त्या चार वर्षांत घेतल्या त्या स्पर्धांमध्ये केकींनी प्रथम येण्याचा बहुमान दोनदा मिळवला, अन् ते लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारूपाला आले. त्यांनी जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल केले. लंडनचे नागरिक केकींना ‘गोल्ड मेडलिस्ट, गोल्डन मॅन केकी’ म्हणू लागले. केकींनी १९३८-१९३९ या वर्षभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, ब्रिटन, इटली इत्यादी राष्ट्रांचा दौरा केला. केकींनी त्या त्या राष्ट्रातील कला जाणून घेतल्या. तेथील नामवंत प्रसिद्ध कलावंतांना सदिच्छा भेटी दिल्या.

केकी १९३९ च्या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या हप्त्यात भारतभूमीवर उतरले. ते दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून सरळ चाळीसगावी त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर तब्बल पन्नास वर्षें, त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला स्वेच्छेने आत्मकैद केले.  या चक्रावणाऱ्या आत्मकैदेत जगरहाटी विसरलेल्या या कलाकाराने निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’! मूस यांना या विश्वात जी जी म्हणून कला आहे, त्या साऱ्यांची आस होती. रंगकाम, चित्रकाम, रेखाचित्र, छायाचित्रण, मूर्तिकला, कातरकाम, काष्ठशिल्प, ओरिगामी, सतारवादन..काय काय म्हणून नव्हते. यातूनच चाळीसगावातील पाच दशकांच्या वास्तव्यात त्यांनी आशयघन अशा शेकडो कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातच या सर्व कलाकृतींचे एक संग्रहालय थाटण्यात आले. एका सर्जनशील कलाकाराच्या या स्मृती जतन करण्याचे काम ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’तर्फे केले जात आहे.

रेम्ब्रा रीट्रीट! केकी मूस यांच्या ब्रिटिशकालीन बंगल्याचे हे नाव आत शिरताच कलेशी नाते जोडते. विश्वाविख्यात कलाकार रेम्ब्रा हा केकी मूस यांचा आदर्श! कलेच्या प्रांतातील त्याचे अर्धवट कार्य पूर्ण करण्यासाठीच जणू आपला जन्म झाला, ही मूस यांची धारणा होती. आत शिरताच भोवतीने सर्वत्र शिल्पं, चित्रे, छायाचित्रे आदी कलाकृती दिसू लागतात. चित्र आणि छायाचित्र ही केकी मूस यांची दोन मुख्य अंगे! या साऱ्या दालनात तीच अधिक भरून राहिलेली आहेत. हे सुंदर जग आणि चराचरात सामावलेले सौंदर्य चित्रातून रेखाटावे आणि छायाचित्रातून प्रकट करावे, या ध्यासातून त्यांनी आयुष्यभर त्यांचा कुंचला आणि कॅमेरा चालवला. या दोन प्रतिभांनीच मूस यांना जगविख्यात केले.

कल्पनाचित्रांचा खेळ असलेली ‘टेबल टॉप फोटोग्राफी’ हा त्यांचा एक अफलातून प्रकार! मनातले एखादे चित्र उपलब्ध वस्तूंच्या साहाय्याने उभे करावे, त्याला प्रकाशयोजना, त्रिमितीची उत्तम जोड द्यावी आणि या साऱ्या दृश्याचे छायाचित्र काढत अवघ्या विश्वाला फसवावे!

केवळ मीठ, भुसा, कापूस, वाळलेल्या काडय़ा यातून त्यांनी तो गोठवणारा हिवाळा उभा केला. या दृश्यावर एक धुरकट प्रकाश टाकला आणि छायाचित्र घेतले. झाले, भल्याभल्यांना या चित्रातून जागोजागीचा ‘विंटर’ दिसू लागला. यात खुद्द पंडित नेहरूदेखील होते. हे चित्र पाहिल्यावर नेहरू एवढेच म्हणाले, ‘धिस इज माय नेटिव्ह प्लेस. मि. मूस, टेल मी व्हेन यू हॅव व्हिजिटेड काश्मीर?’  ‘ऑफ डय़ूटी’ आणि ‘अ वेटिंग देअर टर्न विथ टेरर’ ही दोन छायाचित्रेही अशीच मूस यांच्यातील सर्जनशील मन दाखवणारी. ‘ऑफ डय़ूटी’मध्ये जवानाचा एक बूट दाखवला असून, त्याच्यात एक हसरी बाहुली खोचलेली आहे. बाहुलीतून जणू तो बूटच हसत आहे. दिवसभर त्या जवानाबरोबर ‘डय़ूटी’ करणाऱ्या त्या बुटालाही थोडा वेळ विश्रांती मिळाली की हायसे वाटते, आनंद होतो. पहिल्यात हा आनंद, तर दुसऱ्यात ती भीती! ‘मृत्यूचे भय’ दाखवणारे हे छायाचित्र! आजारी आईला मोसंबीचा ज्यूस देताना मूस यांना ही जाणीव स्पर्शून गेली. एक मोसंबी कापून त्याचा ज्यूस (अंत) होत असताना बाजूच्या मोसंब्यांच्या मनात काय भाव उमटत असतील, याचेच भय त्यांनी या फळांवर चित्रित केले. ..क्षुल्लक फळांमधून चराचरांतील प्रत्येकाच्या जीवन-मरणाचे दर्शन घडविणाऱ्या या छायाचित्राने मूस यांना पुढे जागतिक कीर्ती मिळवून दिली.

मूस यांच्या संग्रहालयात व्यक्तिचित्रेही आहेत. त्यांच्या स्टुडिओला भेट देणाऱ्या जवळपास प्रत्येक मान्यवराचे त्यांनी एक आगळे छायाचित्र काढलेले आहे. पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, साने गुरुजी, पंडित महादेवशास्त्री जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, ना. ह. आपटे, ना. सी. फडके, श्री. म. माटे, आचार्य अत्रे, वसंत देसाई, बाबा आमटे अशी इथे एक मोठी शंृखलाच उभी राहते. यात काही ‘असामान्य’ असे सामान्य चेहरेही आहेत. एका फासेपारधी स्त्रीचा चेहरा असाच सतत लक्ष वेधत असतो. या वृद्ध, कृश महिलेच्या चेहऱ्यात त्यांना साऱ्या जगाचे दु:ख जसे दिसले, तसेच त्या शेकडो सुरकुत्यांमधून जगण्याची दुर्दम्य इच्छाही जाणवली. या वृद्धेच्या काढलेल्या छायाचित्रांना पुढे जगभर प्रसिद्धी मिळाली.

मूस यांनी शिल्प, मूर्ती, माती, काष्ठशिल्प, ओरिगामी आदी कलाप्रकारही हाताळले. यांच्या असंख्य कलाकृती या संग्रहालयात आहेत.  मूस यांच्या नजरेत आलेल्या अनेक लाकूड-फांद्यांनाही त्यांनी व्यक्तिमत्त्व बहाल केले. त्यांच्या बंगल्याच्या आवारातील सुकलेल्या एका बोरीच्या खोडात त्यांना असाच एक चेहरा दिसला. मूळ खोडातून वर निघालेल्या या चार फांद्यांना त्यांनी हव्या त्या आकारात छाटले आणि त्यांच्यात साखळय़ा अडकवल्या; यातूनच तयार झाली ती ‘इटर्नल बाँडेज’ नावाची एक अफलातून कलाकृती! स्त्री-पुरुष ही एकाच सृष्टीची एकमेकांना बांधून ठेवणारी निर्मिती, इथपासून ते ‘त्या’ हातांकडून परमेश्वराच्या होणाऱ्या प्रार्थनेपर्यंत असे अनेक अर्थ या कलाकृतीतून ध्वनित होत गेले.  पंडित नेहरू या कलाकृतींच्या ओढीने इथपर्यंत आले आणि सारे कार्यक्रम रद्द करत दिवसभर रमले. तर इथे सतत येणारे बाबा आमटे जाताना ‘इथे मी माझा आत्मा ठेवून जात आहे’ असे म्हणाले. संग्रहालयाची इमारत असलेले मूस यांचे ब्रिटीशकालीन घर 109 वर्षांचे वृध्द झालेले आहे. 31 डिसेंबर 1989 रोजी कलामहर्षि केकी मूस यांनी या जगाचा निरोप घेतला.केकी मूस यांनी आयुष्यभर कलानिर्मितीशिवाय दुसरे काहीही केले नाही. त्यांची कला सातासमुद्रापार गेली. तिला अनेक मानसन्मानही मिळाले, पण या मान, सन्मान, पुरस्कार, नाव, प्रसिद्धी, पैसा आणि मुख्य म्हणजे बाजार या साऱ्यांपासून ते दूर राहिले. कुंचला आणि कॅमेऱ्यातून वेळ मिळताच ते सतारीवर बसायचे. या संवेदनशील कलाकाराचा सहवास सर्वानाच हवाहवासा वाटायचा. तिथल्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी देश-विदेशातून असंख्य कलाकारही रोज चाळीसगावचा पत्ता शोधत इथपर्यंत येतात. आजही आपल्या कलादालनाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती खान्देशातील या मातीला अधिक समृध्द करीत आहेत.

लेखक : श्री योगेश शुक्ला 

प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वस्त्र” – लेखिका : सुश्री अश्विनी मुळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “वस्त्र” – लेखिका : सुश्री अश्विनी मुळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

त्या वैभवशाली, भव्य दरबारात ती एखाद्या भिंगरीसारखी गरगरत होती. हात जोडत होती, विनवण्या करत होती. ती तेजस्वी बुद्धीमती युक्तिवाद करत होती. पण सर्वांच्याच माना खाली होत्या. अखेर दु:शासनाने तिच्या केसांना पकडून तिला थांबवलं आणि तिच्या वस्त्राला हात घातला. एकच जळजळीत नजर  आपल्या महापराक्रमी पतींकडे टाकून तिने डोळे घट्ट मिटून घेतले. कृष्णाचा धावा सुरु केला. “तुझं बोट कापल्यावर मी बांधलेल्या चिंधीएवढं वस्त्रसुद्धा माझ्या अंगावर उरणार नाहीये आता. तू तरी काही करणार आहेस कां? की तूही बसणार आहेस मान खाली घालून?” पण हे काय? संपूर्ण शरीराला वस्त्राचा स्पर्श अजूनही कसा काय जाणवतोय? दुर्योधनाचं मन बदललं कां? तिने हलकेच डोळे उघडले. दु:शासन दात ओठ खात दरादरा वस्त्र ओढत होता आणि ते संपतच नव्हतं. एकाला जोडून दुसरं. दुसऱ्यात गुरफटलेलं तिसरं. शालू, शेले, अंशुकं, किंशुकं, पटाव. रेशमी, कशिदाकारीची, जरीबुट्टयांची वसनं. ओघ संपतच नव्हता. संपूर्ण राजसभा पुतळ्यासारखी स्तब्ध होऊन ते आश्चर्य बघत होती. दुर्योधनाचा मदोन्मत्त चेहरा भयचकित झाला होता. बलदंड दु:शासन घामाने नाहून निघाला होता. आणि एका क्षणी ते पृथ्वीमोलाचे पाटव प्रकटलं. त्याच्या सुवर्ण झळाळीने सर्वांचे डोळे दिपले. त्या वस्त्राला मात्र हात घालण्याची हिंमत दु:शासनात नव्हती. ते तेज असह्य होऊन तो खाली कोसळला. पितामह भीष्मांनी हात उंचावून इशारा केला आणि नि:शब्दपणे दरबार रिकामा झाला. उरले फक्त अग्निकुंडातल्या ज्वालेसारखी दिसणारी द्रौपदी आणि तिच्या पायाशी कोसळलेला दु:शासन. त्याच क्षणी अठरा दिवस चालणाऱ्या सर्वसंहारी महायुद्धाचं बीज रोवलं गेलं.

वस्त्राच्या हरणामुळे महाभारत झालं आणि हरणाच्या वस्त्रामुळे रामायण घडलं. एक पळही विचार न करता, राजवस्त्रांचा त्याग करून, वल्कलं लेऊन रामा पाठोपाठ वनाची वाट धरणाऱ्या राजसबाळी सीतेला सुवर्णमृगाच्या काचोळीचा मोह कसा काय पडला असेल? तो मोह इतका प्रभावी होता की रामाने परोपरीने सांगूनही तिने आपला हट्ट मागे घेऊ नये? तिची फक्त पाऊले पहिलेल्या लक्ष्मणावर तिने संशय घ्यावा? त्याने संरक्षणासाठी आखून दिलेली मर्यादा तिने ओलांडावी?

आपल्या तीन प्राथमिक गरजांमधे दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वस्त्रांची ही ताकद. ज्यांनी दोन अजरामर युद्धं घडवून आणली. समरभूमीवर अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्णाला वस्त्रच आठवलं. ‘वासांसी जीर्णानी यथा विहाय’.

‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’. माणसाचं व्यक्तिमत्त्व खुलवणारी वस्त्रं. आत्मविश्वास वाढवणारी. ऊब देणारी. सन्मान करणारी. आदर, माया, प्रेम दर्शवणारी वस्त्रं. 

गेले तेरा दिवस एक वस्त्र लाखो लोकांना जोडून घेत होतं. रेशमी धाग्यांबरोबर अतूट श्रद्धा गुंफली  जात होती. लाखो हात ते विणत होते. लाखो पाय त्या वस्त्रापर्यंत पोचण्यासाठी आनंदाने तिष्ठत होते. प्रेम, श्रद्धा, भक्तीचा कशिदा त्यावर उमटत होता. राजवस्त्र हा शब्दसुद्धा अपुरा ठरेल त्या महावस्त्राला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासाठी विणल्या जाणाऱ्या वसनात आपले दोन धागे सोडताना लाखो मनं उचंबळत होती. अनघाताई घैसास, तुमचं कौतुक तरी किती करू? आपण मांडलेल्या या खेळात किती सहजपणे तुम्ही सर्वांना सामावून घेतलंत. रोज बारा बारा तास चालणारे पंधरा हातमाग आणि त्यात आम्ही दिलेलं दोन धाग्यांचं अर्घ्य. त्या दोन धाग्यांत तुम्ही आम्हाला श्रीरामापर्यंत पोचवलंत.  अयोध्येला कधी जाणं होईल, माहित नाही. कधी ते रामदर्शन होईल, माहित नाही. पण माझ्या हातचे दोन धागे आज ना उद्या रामचंद्राच्या पोशाखात असतील, ही भावनाच किती तोषवणारी आहे. रामाची मूर्ती घडवण्यासाठी आणलेल्या शिळेला स्पर्श करताना जे‌ समाधान मिळालं, त्याच तोडीचं धागे विणतानाचं समाधान होतं. त्या दोन धाग्यांनी प्रत्येकाचा सहभाग राममंदिराच्या उभारणीत नोंदला गेला. पुणे ते अयोध्या हे अंतर एका नाजुकशा धाग्यावर स्वार होऊन, आम्ही सहज पार केलं. जेव्हा प्रभू रामांचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ तेव्हा आम्ही विणलेले धागे त्यांच्या वस्त्रातून आम्हाला ओळख देतील. हे भाग्य अनघाताई, तुम्ही आम्हाला दिलंत. 

लेखिका : अश्विनी मुळे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print