मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गटुळं – भाग-2 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ ग्रामीण एकांकिका – गटुळं – भाग-2 ☆ श्री आनंदहरी 

(रंगाच्या घराचा सोपा… सोप्यात फर्निचर असे काही नाही.. भिंतीवर देवाचे कॅलेंडर / चित्र..  भिंतीकडेला घोंघडं अंथरलंय..  तिथं भामा  काहीतरी भाजी निवडत किंवा तत्सम काहीतरी घरातील काम करीत बसलीय…)

भामा  :-  (दाराकडे पहात चाहूल घेत स्वतःशीच ) आजून कसं आलं न्हायती..( क्षणभराने ) आलं वाटतं…( खाली मान घालून मुसमुसायला सुरवात करते .. मध्येच डोळ्याला पदर लावते )

रंगा :- ( हातातलं खुरपं कोपऱ्यात ठेवून.. खांद्यावरचा टॉवेल काढून तोंड पुसत )

 भामे, वाईच पानी आण ग..

(भामाचं एक नाही न दोन नाही .. तिचं मुसमुसणं चालूच … ते लक्षात न येऊन ..खाली बसत )

ए s भामे, ऐकाय आलं न्हाय का काय ? आगं वाईच पानी आण जा की…

(भामाकडे बघतो.. ती रडतीय हे ध्यानात येताच आश्चर्य वाटून ..)

(स्वगत ) ऑ SS ! वागिनींच्या डोळ्यांत पानी ? …  वागीन बी कवातरी रडती ह्ये ठावं न्हवतं ? जाऊंदेल… ईचारपुस कराय पायजेल… न्हायतर माजं काय खरं न्हाय बाबा… इचारतोच काय झालंय ती..

(भामा जवळ जाऊन बसत काळजीच्या स्वरात ) 

भामा.. ए ss भामा,  आगं काय झालं गं…?

(नवऱ्याला जवळ येऊन विचारताना पाहून भामाचं मुसमूसणे जास्तच मोठयाने सुरू होतं..) 

आगं, रडू नगं..गप .…आता काय झालंय  ती तरी सांगशील का मला ? उगं उगं… रडू नगं… तू सांगीतल्याबिगर मला तरी कसे उमगंल गं ? काय झालंया  ? सांग बगू ..

भामा :- ( रडत रडत ) तुमची आय..

रंगा :- माझी आय…? ( रडायचे नाटक करत ) आयं गss  असं कसं गं झालं …. आगं मी येस्तवर  वाट का न्हाय ग बगीतलीस…अशी कशी गेलीस आमास्नी सोडून.. आता आमी कसं ग जगायचं…भामीचा तरी ईचार करायचा हुतास की गं ss!  तुज्याबिगर आता ती कशी ग ऱ्हाईल..?

(भामाच्या जवळ सरकून / गळ्यात पडून रडण्याचं नाटक करीत ) आय गं ss !..असं कसं ग झालं माज्या आयचं..?

भामा :- ( क्षणभर त्याच्याकडे पहात रडणं विसरून नेहमीच्या आवाजात ) ओ ss गप बसा वाईच .. काय बी झाल्यालं न्हाय म्हातारीला…

रंगा :-  (रडण्याचं सोंग चालूच ठेवत ) काय बी झाल्यालं न्हाय म्हंजी … ? उगा माजी समजूत काडु नगंस… तुजी आयवरली माया ठावं न्हाय व्हय मला.? आगं,  तू रडतीयास म्हंजी… माजी आयच… आये.. आये गं….!

भामा :- (चिडून) गप बस्तायसा का वाईच..? लागलं लगीच ‘ आय  ss आय गं ‘ कराय.. काय हुतंय म्हातारीला ? ब्येस ठणठणीत हाय ती..

रंगा :- (रडण्याचं नाटक थांबवत ) आँ ss !  खरंच सांगतीयास ? मग तू कशापायी रडीत हुतीस गं ?

भामा :- (स्वगत) हेंच्या रडण्यात इसरूनच गेले हुते .. बरं झालं ध्येनात आणलं ह्येनी त्ये…

(डोळ्याला पदर लावत मुसमुसत रडायला लागते )

रंगा :- (स्वगत)  द्येव जवा बायकासनी काळीज वाटीत हुता, डोळ्यात टचकन दाटणारं पाणी वाटीत हुता तवा ही बया न्हवतीच ततं … द्येव आपला काळजीत पडला ..येक काळीज आन डोळ्यांतलं पाणी शिलकीत ऱ्हायलं कसं…. ? कोन ऱ्हायलं बिनकाळजाचं म्हणीत द्येव आपला हिकडं बघतुय.. तकडं बघतुय …तर ही आपली लांब दुसरीकडं … लांडग्यासनी काळीज वाटीत हुतं त्या लायनीत..  हिला बायकांचं काळीज द्याला द्येव पळत पळत ततंवर जातूय तर  काय ? अवो, लांडग्यांचं काळीज हिला आगुदरच बसवून बी झाल्यालं…

(भामाकडं जात..  न रडता काळजीनं ) आगं, मग तुला झालंय तरी काय रडाय ? आतातरी  सांगशील का ?

भामा :- (रडत – मुसमुसत ) तुमची आय मला न्हाय न्हायती बोल्ली ?

रंगा :- ( आश्चर्याने ) क्काsय ? माजी आय ? आन तुला बोलली.. (स्वगत )… गाईनं कवा वागीणीला खाल्ल्यालं म्या तरी  ऐकलं न्हवतं…

(भामाकडं बगत) गप गं गप.. सांजंच रडू नगं.. गरीब-बिचारी माझी माय ती ?

भामा :- (रडणं विसरून एकदम चिडून) काय म्हणलासा ?

रंगा :-  काय म्हनलो ?

भामा :- (चिडून) मगाधरनं तुमची आय न्हाय न्हाय ती बोलली म्हणून मला रडू येतंया.. जीवाला लागलं माज्या.. मी आपली दुपारधरनं रडत बसलीया.. पाण्याचा योक  घोटसुदीक पोटात गेल्याला न्हाय माज्या… आन तुमी… ‘ गरीब ती माजी माय ‘ म्हंतायसा व्हय ? तुमची माज्यावं काय मायाच न्हाय ऱ्हायल्याली बगा ..

रंगा :- (साळसूद पणाचा आव आणत) मी  माय म्हनलो ? (स्वगत) कवातरी चुकून खरं याचंच म्हणा  तोंडांत …(भामाला) न्हाय गं भामे, न्हाय ! आगं मी तर ‘ गरीब ती माजी गाय ‘ आसं म्हनलो …लय रडलीस त्येनं तुला गायचं माय ऐकू आलं असंल… आसं हुतं कवा कवा….

भामा :- (चिडूनच)  न्हाय .. तुमी ‘ माय ‘ म्हनलासा..

रंगा :- न्हाय गं.. मी गाय च म्हंलो… तू माय ऐकलंस..इस्वास नसंल तर कुनालाबी ईचार. (स्वगत )  हिला एक माजं कवा पटतच न्हाय..  मी माय म्हनलो आन आमच्या या भामीनं ‘ माय ‘ ऐकलं .. आता ह्येला ऐकनं म्हनायचं का काय ? (  भामाकडे पहात )   बरं ती जाऊंदेल.. तू गप हो बगू आता.. आपुन त्या म्हातारीचं घर उनात बांदु… (स्वगत) तसं.. माज्या गरीब बिचाऱ्या मायचं घर हिनं कवाच उनात बादलं आसंल म्हणा.. आसल्या कामात लईच उरक हाय तिला..( भामाकडॆ पहात ) भामे,गप रडू नगं..बरं, तुज्यासाठनं च्या आणू का करून ?

भामा :- नगं, मी आनते च्या .. तुमी, दमून आलायसा ..

रंगा :- व्हय.. पर तू बी दमली अश्शील ..( स्वगत ) रडून रडून

भामा :-  आंत्ये मी च्या करून..( आत जाते. जाताना  ‘ कसे मी गुंडाळलं ‘ अशा अर्थाने विजयी मुद्रेने प्रेक्षकांकडे पहात आत जाते )

रंगा :- (स्वगत) ही आसं हाय … आय कायबी बोल्ली नसंल हिला , ही ठावं हाय मला.. अवो, गरीब गाईवानी हाय ती.. आता लईच तरास दिल्याव.. गाय कवातरी शिंगं उगारायचीच..जाऊंदेल .. दोन दिसांनी भामी वाईच निवाळल्याव आणावं आयला..तरी बरं पल्याड धाकला येसवंता हाय.. दोन रोज त्यो तरी बगील आयचं..पर एकांद्या माऊलीला योकच ल्योक आसंल… आन आसली सून पदरात आसल.. त्या माऊलींचं काय खरं न्हाय बगा..  हीच खोडील हाय; ती काय ठावं न्हाय वी मला ?..पर सांगायचं कुनाला ? अवो, पदरात निखारा बांदल्याला हाय ..पर चटकं बसत्यात म्हणाय बी येत न्हाय ..आन टाकून बी द्येता येत न्हाय… उगा आपलं,  ब्येस गार गार लागतंय म्हनायचं .. दुसरं काय..

भामा :- (चहा घेऊन येत ) काय म्हनलासा.. चटकं ? कसलं चटकं बसाय लागल्यात तुमास्नी ?

रंगा :-  (स्वगत ) ही आसं हाय… नगं ती,  लगीच ऐकाय जातंय…आनं आपल्यास्नी आकायचं ती आयकाय येऊनबी न आकल्यागत कराय लागतंय.. ( भामाकडे वळून )  आगं,  डोळ्यांत पानी हाय .. तुला लय दुक बी झाल्यालं हाय.. आन डोसक्यात काय-बाय ईचार असणार.. तवा म्हणलं,  च्या येवस्तीत आन.. गरम आस्तुय .. चटकं बसतीली.. (रंगा चहा घेतो.)

भामा :-  (चहा घेता घेता परत डोळ्यात पाणी आणत)  ह्ये बगा, म्या काय तुमच्या आय ला घरात न्हाय घ्याची .. आधीच सांगून ठेवत्ये…

रंगा :-  हं . म्या कवा तुज्याम्होरं बोलतो काय गं  ? आगं, माजं नशीब म्हनून तुज्यावानी बायकू मला मिळालीया… तू काय म्हंशील तसं…  भामे, लै भुका लागल्यात वाईच जेवनाचं बगतीस काय ..?

भामा :-  व्हय .. पर तुमी सपरात जायाचं न्हाय.. माज्यासंगती चला बगू आत… ( भामा आत जाते ) (आतूनच )

आलासा का न्हाय ? या लगुलग..

रंगा :-  आलो न्हवका.. ( प्रेक्षकांकडे बघून – थोडसं वाकून – दोन्ही हात डोक्यावर शिंगासारखे धरत..नंदीबैलासारखी मान हलवत ” गुबुगुबु ss गुबगुबु ” असा तोंडाने आवाज करत रंगमंचावर दोन तीन फेऱ्या मारून  म्हणतो..)

आमच्या भामीला नवरा न्हवं.. ,ह्यो असला  गुबुगुबु पायजेल…चला गुबुगुबुराव…गुबु गुबु.. गुबु गुबु..( आणखी एक फेरी मारून गुबु गुबु करत आत जात असतानाच प्रकाश कमी होत होत अंधार होतो )

अंधार

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गटुळं – भाग-1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ गटुळं – भाग-1 ☆ श्री आनंदहरी 

ग्रामीण एकांकिका :- गटुळं

लेखक :- आनंदहरी

पात्रे –

धुरपदा :-  सासू :- वय साधारण 65 ते70 च्या जवळपास काहीशी थकलेली

यशवदा :-  धुरपदाची समवयस्क शेजारीण

रंगा :-  धुरपदाचा मोठा मुलगा 40 च्या दरम्यान

भामा ;- रंगा ची बायको मोठी सून

यशवंता :- धुरपदा चा धाकटा मुलगा 35 च्या जवळपास

सारजा :-  यशवंतांची बायको..

सागर :-  स्वतःला पुढारी समजणारा गावातील एक रिकामटेकडा

(रंगाचे साधेच घर.. पुढे अंगण.. शेजारी गोठ्याचं छप्पर .. यशवंताचे घर.. रंगा रानात कामे करणारा.. यशवंता छोट्याशा कारखान्यात काम करणारा कामगार.  घरे साधीशीच .. फर्निचर असे फारसं काहीही नाहीच)

प्रवेश पहिला..

(विंगेतून धुरपदाला हाताला धरून ओढतच तिची सून बडबडतच तिला अंगणात  घेऊन येते…)

धुरपदा :-  (गयावया करीत) आगं ssआगं.. असं काय करतीयास गं..?

भामा :- (ठामपणे काहीसे निर्धाराने) आगुदर भायेर हुयाचं.. लय झालं. पार डूईवरनं पानी गेलं…

धुरपदा :-  आगं,  पर झालंय तरी काय ?

भामा :- आदी माज्या घरातनं भायेर हुयाचं.

धुरपदा :- (काहीसे आश्चर्याने,काहीसं चिडून) तुजं घर ? कवापासन घर तुज झालं गं ?     घर काय म्हायेरासनं घिऊन आलीवतीस व्हय गं ? लगी लागली माजं माजं कराय ? आगं , नवऱ्यासंगं रात-दिस राबून काडी काडी गोळा करून बांधलय म्या ती.. आन मलाच भाईर काडतीस व्हय गं ?  म्हणं, माज्या घरातनं भायेर हुयाचं..

भामा :- माज्या म्हायेराचं नाव काढायचं काम न्हाय .. सांगून ठयेवते… ही घर बगूनच माज्या बा नं दिलीया मला… पार फशीवलंसा तुमी, मला नं माज्या बा ला… माजा बा लई भोळा, फसला.. आन तालेवाराची  सोयरीक आल्याली सोडून हितं दिली मला…

धुरपदा :- व्हय गं व्हय… पार पालखीच घ्येवून आला आसंल न्हवं , एकांदा राजा तुज्यासाठनं ..  मग जायाची हुतीस… आमी काय मेणा न्हवता धाडला ? मेल्याली म्हस म्हणं आठ शेर दूध देत हुती ..उगा आपलं कायबी बोलायचं..

भामा :-  म्हस आठ शेरांची असूनदेल न्हायतर धा शेरांची…बास झालं तुमचं..आदी भायेर हुयाचं आन आजाबात घरात याचं न्हाय…न्हाय म्हंजी न्हायच..

धुरपदा :- (ती घरातून बाहेर काढणारच हे जाणवून गयावया करीत) आगं पर मला म्हातारीला कशापाय काडतीयास गं भाईर..? ऱ्हाऊदेल की ग  घरात मला.. म्या म्हातारीनं कुटं जायाचं गं..?

भामा :- त्ये मला कशापायी ईचारतायसा ?  … कुटं बी जावा पर माज्या घरात रहायचं न्हाय… आजपातूर लई झालं.. पर आता म्या कुणाचंच ऐकायची न्हाय..  भाईर म्हंजी भाईंरच..

धुरपदा :- (गयावया करत ) आगं..नगं गं आसं करुस….. ऐक माजं ? आगं, असं किस्तं दिस ऱ्हायल्यात माजं म्हातारीचं ?

(धुरपदाचं काहीही न ऐकून घेता तिला झिडकारून भामा आत जाते.. आतून वाकळ बाहेर टाकते आणि दार बंद करते ..  धुरपदा दुःखी कष्टी होऊन बाहेर तशीच बसली आहे… भामाने तिच्या जवळच वाकळ टाकली तशी ती बसूनच जरा वाकळेकडं सरकली काही क्षण तशीच बसून राहिली)

धुरपदा:- ( काहीसे आठवण होऊन  वाकळ उलटी सुलटी करून शोधत..) माजं गटूळं ss ? माजं गटूळं कुटं गेलं…?

(काहीसं आठवून तिरमिरीत उठते..[ विंगेजवळ जात ] भामाचे दार ठोठावत)

भामे ss ए भामे ss ! माजं गटूळं दे आदी… आदी माजं गटूळं दे.. ( पुन्हा दार ठोठावते ) सांगून ठयेवते …आदी माजं गटूळं दे..

(जरा बाजूला होत बडबडू लागते..)

मला भायेर काडतीया आन माजं गटूळं बी दिना झालीया …

तू ब्येस काडशील गं… पर माझा रंगा आला का पेकटात लाथ घालून तुलाच भायेर काडतुय का न्हाय त्ये बग….

भामा :- (विंगेतूनच – फक्त आवाज) माजं गटूळं ss माजं गटूळं ss ! म्हातारी पार जीव खाया लागलीय गटूळयासाठनं..  गवऱ्या मसनात गेल्या तरीबी गटूळं गटूळं कराय लागल्यात.. येवडं काय अस्तंय त्या गटूळ्यात कुणाला ठावं ?..ही घ्या तुमचं गटूळं..

(दार उघडून भामा गटूळं बाहेर फेकते .. धुरपदा झटकन पुढं होऊन गटूळं घेते)

धुरपदा:- (बंद दाराकडे [विंगेकडे] पहात, हातवारे करीत .. काहीसं स्वतःशीच बोलल्यासारखं पण भामाला उद्देशून)

व्हय बाई व्हय… माज्या गवऱ्या मसनात गेल्याती…समद्यांच्याच कवा ना कवा जात्यातीच… आता तुज्या  नसतील जायाच्या तर ऱ्हाउंदेल बाई.. तू ऱ्हा जित्तीच .. न्हायतरीं गवऱ्या मसनात धाडाय कुणीतरी पायजेलच …

मला घरातनं भायेर काढतीया.. वाईच कड काढ.. माजा रंगा आला म्हंजी कळंल ..कसं भायर काढायचं असतंय ती.. ( स्वगत) तवर आपलं सपरात जावं आन वाकाळ हातरुन पडावं …

 (धुरपदा वाकळ आणि गटूळं घेऊन छपरात/ गोठयात जाते… काहीवेळ अस्वस्थच.. उठून तिथंच  माठावर असणाऱ्या तांब्यातून पाणी पिते . अंगणात येते , बंद दाराकडं आशाळभूतपणे पाहते… चहाची तल्लफ आली असावी असा अविर्भाव ,….अंगणात फिरता फिरता…)

(स्वगत)

कवा दाराम्होरनं जाणारा कुणीबी च्या पेल्याबिगर गेला न्हाई आन आता दोन दोन सुना आसूनबी मला म्हातारीला च्या चा घोट बी मिळंना झालाय…

(आकाशाकडे बघून हात जोडते.. जीवाची घालमेल होतेय..हळू हळू चालत छपराकडे जात असतानाच प्रकाश कमी होत अंधार होतो)

अंधार

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्हॅलेंटाईन डे भाग-2 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ व्हॅलेंटाईन डे भाग-2 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(14 फेब्रुवारी हा प्रेमी जोडप्यांचा दिवस  व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची तिकडे पद्धत आहे…. आता पुढे)

“हा जुन्या काळापासून चालत आलेला सण नां.. एक आपलं सोडा हो, पण आपल्या मुलांकडून हे  असलं कधी काही मी कसं ऐकलं नव्हतं‌?”नानी शंका समाधान करून घेत होत्या.

“काय आहे नानीजी, ग्लोबलायझेशन मुळं सगळं जग हल्ली एक झालंय ना…. शिवाय सगळं डंका पिटत मोठ्या प्रमाणात साजरं करायची पद्धत आलीय त्यामुळे!… आता तर एक दिवसाऐवजी पुरा आठवडा धुमाकूळ चालू असतो…

पुन्हा दोघं गप्प होऊन अंथरुणावर बसून राहिले. त्यांना काहीच सुचत नव्हतं. टीव्ही बघणं तर दूरच…. पण झोपावसं ही वाटत नव्हतं. दहा वाजून गेले होते. तेवढ्यात अमर महाशय धाड्दिशी दरवाजा उघडून घरात दाखल झाले. त्यांनी हातातला मोठा गिफ्ट बॉक्स सोफ्यावर आदळला ….आणि ते बेडरूम मध्ये अंतर्धान पावले.

अन् दोघांचं जोरजोरात भांडण ऐकू येऊ लागलं. कानावर आदळलेल्या तुटक-तुटक शब्दांचा त्यांनी लावलेला अर्थ असा होता… की ठरलेल्या जागी… ठरलेल्या वेळी… अमर पोहोचू शकला नव्हता.एक तर त्याची ही स्वतःची नवी कंपनी होती आणि अचानक  कंपनीमध्ये खूप मोठं एक महत्त्वाचं काम आलं. त्यामुळे लवकर त्याची सुटका झाली नाही. आणि कधी नव्हे ते त्याला आपल्या जीवनात पहिल्यांदाच लोकलच्या मरणाच्या गर्दीत उभा राहून प्रवास करावा लागला. त्यातच त्याचा मोबाईल चोरीला गेला. व्यवस्थित संभाषण होऊ शकलं नव्हतं. त्यामुळं दोघांची चुकामूक  …मग गैरसमजावर गैरसमज ….शब्दाला शब्द वाढणं ….आरोप-प्रत्यारोप…. नताशाचं रडणं… अमरचं तिरसटणं…सगळं चालू होतं. एका दृष्टीने पाहिले तर दोघांचंही आपापल्या परीने बरोबर होतं. पण हे कबूल कोण करणार?.. समोरच्याला समजून घेण्याचा दृष्टीकोन कोणातच नव्हता. फक्त एकाच वाक्यात दोघांच्या बोलण्यामधे समानता होती. “माझ्यावर तुझं प्रेमच नाहीय.”

मियाॅं बिबीच्या भांडणात पडण्यात काहीच अर्थ नव्हता.

थोड्या वेळानं सगळं शांत… शांत झालं. न खाता-पिता दोघं तशीच रागारागानं झोपली होती.

बारा वाजत आले होते.

‘नानाजी अहो ,पण हा लग्नाआधी प्रेम करणाऱ्यांचा सण नां ‘वगैरे मनात आलेले विचार त्या फुलांकडे पाहता पाहता नानी विसरून गेल्या. टेबलावरून मोठ्या प्रेमानं त्यांनी बुके हातात घेतला. आणि त्या म्हणाल्या,” बघाना ही दोघं यडी पोरं कशी भांडून झोपली… आता काय.. पुन्हा उद्या याहून महाग बुके आणतील.. आणिअधिक किंमती गिफ्टही… पण मला उद्या ही उदास, दुःखी कष्टी मलून झालेली बुकेतली फुलं बघवणार नाहीत. आपण असं करू या का?… बोलता बोलता त्या वळल्या.समोर बघताहेत तर नाना कपाटातून मोठा चॉकलेट बार काढून घेऊन उभे होते. नाना आणि चॉकलेट?.. जगातली ती एकमेवचअशी व्यक्ती असावी जिला चॉकलेट आवडत नाही.  आपण दोघं एकच विचार करतोय नां ! नाना हसत म्हणाले,”चलो फिर… मौका भी है और दस्तूर भी”

मग काय पिक्चरचा सीनच साकार झाला. नानांनी मोठ्या आदबीनं गुडघ्यावर बसत नानींना बुके दिला. नानी थँक्यू म्हणाल्या. त्यांनी दिलेल्या चॉकलेटचा एक बाईट घेतला. उरलेलं चॉकलेट नानांच्या तोंडात भरवत त्या म्हणाल्या, “नानाजी हॅपी व्हॅलेंटाइन डे!”पुन्हा काहीतरी चुकल्यासारखं वाटल्यामुळे त्या म्हणाल्या,” मी हे बरोबर बोलतेय ना? का मेरी क्रिसमस सारखं मेरी व्हॅलेंटाइन ….आणि त्यांचं कुजबुजून बोलणं चालूच राहीलं……

एरवी इतिहासाच्या पानात लपलेला पण या आठवड्यात बाहेर आलेला तो महान संत ‘श्री व्हॅलेंटाईन बाबा’ जरूर लग्नाच्या पासष्टीत पहिलावहिला व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करणार्‍या या जोडप्याला  ब्लेसिंग देत असेल.

समाप्त

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्हॅलेंटाईन डे भाग-1 ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ व्हॅलेंटाईन डे भाग-1  ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

नाना-नानी यांचीआनंदी जोडी… पासष्ट वर्षाच्या संसारात परिस्थितीच्या रूपानेभोगाव्या लागलेल्या उन्हाच्या झळा, पावसाचा भडीमार, आणि बोचरी थंडी यांचा मोठ्या हिमतीने हसत हसत सामना केलेले.. ..छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधणारे हे सुखी जोडपे.नानींचं माहेर इंदूरचं… लग्न झाल्या झाल्या नानी हे टोपण नाव ऐकलं की त्यांना कससंच वाटायचं .पण नवऱ्याची लहान भावंडंच काय सगळं घरदारच त्यांना नाना म्हणायचं .म्हणून मग त्या नानी! आणि नानांची सगळ्यांशीच आदराने बोलायची सवय… त्यामुळे त्या नानीजी आणि त्यांचे ‘हे’ नानाजी!

आठवड्यापूर्वीच आपल्या नातवाकडं मुंबईत राहायला आले होते. नातू अमर आणि नातसून नताशा आग्रह कर- करून आपला नवा संसार बघायला त्यांना घेऊन आले होते आणि कमीत कमी पंधरा दिवस झाल्याशिवाय परत जायचा विषयही  काढायचा नाही, अशी त्यांना तंबीही देऊन टाकली होती.

“काहीही म्हणा हं नानीजी, सहा महिनेच झालेत लग्नाला, पण किती छान ट्यूनिंग जमलंय नाही यांचं ?फार छान वाटतंय हे पाहून ! आपल्या दोघी मुली, आणि ह्याचे आई-बाबा यु .एस. सोडायला तयार नाहीतआणि हा पठ्ठ्या अमर, सरळ मी इंडियात ‘सेटल’ होणार, तिथंच धंदा ,व्यवसाय करणार म्हणून ठासून सांगून इथे मुंबईला राहायला आलाय. शब्दाशब्दातून कौतुक भरून वाहत होतं . नानीजी तरी कौतुक करण्यात कुठल्या कमी पडायला!” ही नताशा किती गोड लाघवी मुलगी आहे नाही! आपण आलो त्याच दिवशी मला म्हणाली होती, “नानीजी सध्या तरी आपलं हे घर…म्हणजे हा वन बीएचके फ्लॅट छोटा आहे. असं करा, तुम्ही बेडरूम वापरा . आम्ही हॉलमध्ये”….” वा ग वा शहाणे!” मी म्हणाले , “आम्हालाच हा हॉल हवाय.. मोठा… ऐसपैस! किती प्रेमाने माझ्या कुशीत शिरली होती आणि मांडीवर डोकं ठेवून झोपली होती.”नानी च्या डोळ्यासमोर सारखं तेच चित्र येत होतं . अचानक आठवण झाल्यासारखं त्या म्हणाल्या,

“अरे हो, ती आज सांगून गेली आहे की त्यांचे डिनर आज बाहेर आहे आणि परत यायला पण आज उशीर होणार आहे. संध्याकाळी आपल्यासाठी जेवणाचे पार्सल येणार आहे. आठ वाजले होते नाना-नानी आपलं जेवण आवरून टीव्ही पहात बसले होते. तेवढ्यात दरवाजा धाडदिशी उघडून नताशा आत आली .हातातला मोठा बुके तिनं सेंटर टेबलवर  व्यवस्थित ठेवला. पण पायातल्या चप्पल कोपऱ्यात उडवल्या. पर्स भिरकावून दिली आणि बेडरूमचा दरवाजा पण दणकन् बंद केला.

‘अमर कुठाय… तुमचं डिनर’

 …वगैरे शब्द नानींच्या तोंडातून बाहेर पडलेच नाहीत.  “हा काय प्रकार आहे ?”त्या हळू आवाजात नानांबरोबर बोलू लागल्या. मी गेल्या आठवडाभर पाहतेय… कधी चॉकलेटचा मोठा बॉक्स, कधी लाल गुलाबाची फुलं आणि त्या शोकेस कडं बघा, केवढा मोठा टेडी त्यांनीआणून ठेवलाय… आणि आज हा प्रकार! नानींना काहीच सुचेना.

“हा फेब्रुवारीचा दुसरा आठवडा चालू आहे नां,मग बरोबर आहे”नाना सगळे कोडे उलगडल्यागत बोलले,”कळलं का काही? हा व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि त्यात आज चौदा तारीख!”

“म्हणजे काय हो? काल परवा कुठल्याशा मालिकेत ऐकला हा शब्द. प्रेमाचा दिवस काहीतरी असतं म्हणे व्हॅलेंटाईन म्हणजे”….इति नानी उवाच!

नानींचा भाबडेपणा पाहून आलेले हसू आवरत नाना म्हणाले ,”अहो परदेशातल्या तरुण-तरुणींचा हा खास दिवस आहे. युरोपातील एका देशात एक व्हॅलेंटाईन नावाचा संत… चर्चचा फादर म्हणा हवं तर, होऊन गेला. प्रेम करणाऱ्या युगुलांचं तो लग्न लावून द्यायचा म्हणे. कारण तिथल्या सम्राटानं ‘लोकांनी लग्नं करायची नाहीत’ असा हुकूम काढला होता. व्हॅलेंटाइनचा आणि चौदा फेब्रुवारी या दिवसाचा काहीतरी संबंध असावा. त्यामुळे चौदा फेब्रुवारी हा प्रेमी जोडप्यांचा’दिवस व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करायची तिकडं पद्धत आहे.

क्रमशः ….

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र :  ‘तुमच्या पापामुळे होणारा माझ्या अंगाचा दाह असह्य झाला, तर मी निघून जाईन,’ हा मारुतीचा निरोप भावड्याने लोकांना सांगितला ……)

आता प्रत्येकजण एक दुसऱ्याकडे बघायला लागला. पापाची खाण म्हणजे सावकार. त्याने लोकांना खूपच लुबाडलं होतं. पण त्याने विचार केला, ‘तसं लोकांना फसवून मी बक्कळ पैसा   कमावला. पण खरं पाप तर जगन्याने केलंय. शेजाऱ्याच्या बायकोशी चोरटे संबंध ठेवलेयत आणि राजरोस मिरवतोय सभ्य म्हणून.’  जगन्याच्या मते  ‘माझीतर एकाच बाईबरोबर भानगड आहे, पण पाटील तर…. किती बाया आल्या आणि किती गेल्या..’  पाटलाला वाटतंय……

“ऐका ss,”पुन्हा एकदा भावड्याने आरोळी मारली,”देव थकलाय आता.त्याला विश्रांती घ्यायचीय. रात्रही झालीय. तेव्हा आता सगळ्यांनी आपापल्या घरी जा. उद्या सकाळी दहाला पूजा होईल. त्यानंतर दर्शनाला या.”

म्हातारीने दगड्यापुढे दंडवत घातला, “द्येवा, माफ कर मला. माझ्या या गुणी पोराच्या अंगावर मी वसवस करत राह्यले. त्याचं पुण्य दिसलंच नाही बघ माझ्या डोळ्याला.”

दादल्या आणि चिमीनेही नमस्कार  करुन माफी मागितली.

“वैनी, मारुतीरायाचं ताट वाढ. मी भरवतो देवाला.”

कोणाच्याही नकळत भावड्याने जेवणात औषध मिसळलं आणि तो दगड्याला प्रेमाने भरवू लागला.  डाळभाताचं ते मिळमिळीत जेवण दगड्याच्या घशाखाली उतरेना.

“हे बघ, दगड्या, देवाने काय सांगितलं, ते ऐकलंस ना? तू पुण्यवान आहेस, म्हणून मारुती तुझ्या अंगात आला. आता, मारुतीने पुढे काय सांगितलं, ते मी सगळ्यांसमोर बोललो नाही. म्हटलं, लोक गेले की तुला सांगूया.”

“काय म्हणाला मारुती?”सगळ्यांचेच कान टवकारले.

“मारुती म्हणाला, ‘दगडू पित होता, ते त्याच्याकडून अजाणतेपणे घडलं. पण यापुढे त्याने जर ती चूक केली, तो एक घोट जरी दारू प्याला, तरी माझ्या गदेने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा करुन टाकीन.’ हे मरेपर्यंत लक्षात ठेव, दगड्या. यापुढे दारूला स्पर्शही करू नकोस. नाहीतर तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरेल. कळलं?”

दगड्या घाबरला. खरोखरच घाबरला. खूप खूप घाबरला. त्याने स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली, “मारुतीराया, तुझी शपथ घेऊन सांगतो, यापुढे दारूला हातही लावणार नाही.”

दुसऱ्या दिवशी दहानंतर गर्दी जमायला लागली. तेव्हा भावड्याने जाहीर केलं – ” काल मध्यरात्री मारुतीरायाने मला पुन्हा दृष्टांत दिला. मी त्याला विनंती केली,’देवा, मारुतीराया, तुझ्या दर्शनासाठी येणाऱ्या बऱ्याच जणांच्या हातून पाप घडलंय. त्याचा तुला त्रास होतोय, हे मला ठाऊक आहे. पण तू अचानक असा आमच्याकडे पाठ फिरवून जाऊ नकोस. आणखी एक-दोन दिवसतरी थांब. कोणी आतापर्यंत येऊ शकले नसतील,उद्या-परवा येतील, त्यांना दर्शन दे.मग हळूहळू अंतर्धान पाव.’ तो राजी झाला. म्हणा – जय हनुमान.”

सगळ्यांनी त्याच्या पाठोपाठ ‘जय हनुमान’चा घोष केला.

तिसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चेहऱ्यावरची सूज अर्धीअधिक कमी झाली होती.

चौथ्या दिवशी दगड्या उठला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची मारुतीसूज पूर्णपणे उतरली होती.

नंतर भावड्या मुंबईला परतला आणि दवाखान्यात कंपाउंडरच्या कामावर रुजू झाला.

दगड्याने दारू सोडली व तो व्यवस्थित कामाला लागला.

पण अजूनही त्या गावांत दगड्याच्या अंगात आलेल्या मारुतीरायाच्या कथा भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक सांगितल्या-ऐकल्या जातात.

समाप्त

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र :दगड्याच्या अंगात मारुती आला नसून ती ऍलर्जीमुळे आलेली सूज आहे, या भावड्याच्या म्हणण्याला डॉक्टरांनी दुजोरा दिला व त्यावर औषध दिलं…..)

भावड्या घरी पोचला, तेव्हा म्हादेव येऊन बसला होता. “द्येवा, मारुतीराया, तू बरोबर मार्ग दावलास. माजी म्हस मला गावली. बोल्ल्यापरमाणं नारळ फोडतो.”त्याने दोन नारळ फोडले आणि दहा रुपयेही ठेवले मारुतीसमोर. नाम्याच्या पोराला नोकरी लागली.तोही खुश होऊन आला. त्याने पेढे आणि वीस रुपये ठेवले.

आजूबाजूच्या इतर गावातलेही लोक दर्शनाला येऊ लागले. आतापर्यंत एका पैशाचीही कमाई नसलेल्या दगड्यामुळे इतके पैसे घरात यायला लागले, म्हटल्यावर घरची परिस्थिती तर सुधारली होतीच ;पण सगळे दगड्याला मानही देऊ लागले होते.

भावड्याने मोबाईलवर दगड्याचा फोटो काढला आणि डॉक्टरांना पाठवला. नंतर त्याने डॉक्टरांना फोन लावला.

“हो. आपला कयास बरोबर होता. त्याला कसलीतरी ऍलर्जीच झाली आहे. मी दिलेलं औषध दे त्याला. म्हणजे निदान वाढणार तरी नाही सूज,”डॉक्टरांनी सांगितलं.

भावड्याने मनोभावे मारुतीला नमस्कार केला. तो म्हातारीला म्हणाला,”आई, आपली पुण्याई म्हणून मारुती आपल्या घरात आला. मी एक दिवस उशिरा आलो, पण आता मात्र मी त्याची सेवा करणार. माझ्या हाताने मी त्याला भरवणार.”

भावड्याने एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला, तेव्हा त्याला जाणवलं, की प्रकरण वाटतं, त्यापेक्षा कितीतरी पटीने गंभीर आहे. सगळ्याच दृष्टीने.

एक म्हणजे दगड्याच्या तोंडाला आलेली सूज उतरायला हवी. त्याचं शरीर दारूने आधीच एवढं पोखरलेलं आहे, की दुसरं टॉक्सिन ते कितपत पचवू शकेल, ते सांगता येत नाही. त्यामुळेच ही ऍलर्जी झाली आहे, हे नक्की.ही ऍलर्जी कसली आहे, हेही माहीत नाही. एकूण, त्या पेशन्टबाईंवर औषधाचा जसा लवकर परिणाम झाला, तसा दगड्याच्या बाबतीत होईल की नाही, याची गॅरंटी नाही.

दुसरं म्हणजे त्याला बरं वाटलं, त्याच्या चेहऱ्यावर आलेली सूज उतरली, तर त्याचा आनंद वाटणारी व्यक्ती फक्त आपणच असणार.त्याला मिळणारे पैसे, नैवेद्य, मान वगैरेमुळे घरातल्या माणसांची इच्छा, त्याने असंच राहावं, अशी असणार. बाकीच्यांचं सोडाच; पण खुद्द दगड्याही हे देवत्व एन्जॉय करतोय.

आणि आजूबाजूच्या माणसांना कळलं, की हा मारुती-बिरुती नसून ही ह्याला झालेली ऍलर्जी आहे, तर सगळे मिळून दगड्याला तर पिटून काढतीलच, पण घरच्यांनाही सोडणार नाहीत.

यातून काय मार्ग काढावा बरं?

दगड्यासमोर डोळे मिटून, मांडी घालून बसलेला भावड्या खऱ्या मारुतीला आळवू लागला,’मारुतीराया, तुम्हीच सांगा – यातून माझ्या दगड्याची आणि घरातल्या इतरांची सुटका कशी करायची?’

आणि मारुतीने भावड्याला मार्ग दाखवला.

भावड्या उठला. दगड्याच्या पुढ्यात पण दगड्याला पाठमोरा, गर्दीकडे तोंड करुन उभा राहिला. दोन्ही हात वर करुन ओरडला, “थांबा. गप्प राहा सगळे.”

त्याबरोबर सगळेच बोलायचे थांबले आणि उत्सुकतेने त्याच्याकडे बघू लागले.

“मी आता इथे बसून मारुतीस्तोत्र म्हणत होतो, तेव्हा मारुतीने मला दृष्टांत दिला.”

हे ऐकताच लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली.

“शांत राहा. मारुती माझ्याशी काय बोलला, ते ऐकायचं असेल, तर सगळे शांत व्हा.”

त्याबरोबर आपापसातलं बोलणं थांबवून सगळे भावड्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागले.

“मारुती म्हणाला, ‘मला तुमच्या गावात यावंसं वाटलं, म्हणून मी गावातल्या सगळ्यांत पुण्यवान माणसाची निवड केली. होय. हा दगडू अजाण लेकरू आहे. तो पित होता, हे खरं आहे. पण त्याच्या अजाणपणामुळे त्याच्या हातून घडलेल्या त्या चुकीला मी माफ केलंय.

हे सगळे लोक भक्तिभावाने माझ्या दर्शनाला आलेत. मी त्यांच्यावर प्रसन्न झालो आहे.

पण……… एखादा पापी माणूस माझ्यासमोर आला, की माझ्या अंगाची आग होते. जळणाऱ्या लंकेत माझ्या शरीराचा दाह होत होता, त्याचीच मला आठवण होते. तेव्हा, जर ती आग, तो दाह असह्य झाला, तर मी दगड्याचं शरीर, तुमचं हे गाव सोडून निघून जाईन. म्हणून शेवटचं सांगतोय, प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी विचार करा. आपण पाप केलंय, असा मनाचा कौल मिळाला, तर इथून निघून जा. नाहीतर मीच निघून जाईन. आजच असं नाही, उद्या, परवा, एरवा, तेरवा….. जेव्हा तुमच्या पापामुळे होणारा माझ्या अंगाचा दाह सहन करण्यापलीकडे जाईल तेव्हा.”

एवढं बोलून भावड्या वळला. दगड्याकडे वळून हात जोडून म्हणाला, “देवा, तुझा निरोप सगळ्यांच्या कानावर घातला.”

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : रोजची प्यायची वेळ झाली, तशी दगड्याची तब्येत बिघडत चालली.  दादल्याने त्याला सांभाळलं, सावरलं…..)

आतापर्यंतच्या आयुष्यात दगड्या कोणाच्या खिसगणतीतही नव्हता. आताही काही कमवत नसल्यामुळे उठताबसता त्याचा उद्धार व्हायचा.

त्यामुळे आज अचानक सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं आणि घरचे, बाहेरचे सगळे आपल्याला भाव द्यायला लागले, म्हटल्यावर दगड्याला नशाच चढली आणि ती दारूपेक्षाही कितीतरी मोठी, पॉवरबाज होती.

हळूहळू शेजारच्या गावांतही हे मारुतीचं कळलं.मग आपापल्या समस्या घेऊन तिकडचेही लोक यायला लागले.

रात्री लोक घरी गेल्यावर म्हातारीने दगड्याला जेवायला वाढलं.

उभं राहून राहून दगड्याचे पाय दुखत होते. पण त्याची रोजची वेळ झाली होती.

“मी जरा भायेर जावून येतो,”तो म्हणाला.

पण म्हातारीने अडवलं त्याला,”आरं, येडा का खुळा तू ? द्येव आंगात यिवून बसलाय आणि हा चाल्ला पियायला. मारुतीचा क्वोप झाला तं गदा हाणील त्यो डोस्क्यात.”

“व्हय भावजी. हुबं ऱ्हाऊन ऱ्हाऊन दमलायसा.गरम गरम ज्येवण ज्येवून झोपा आता निवांत. उद्या सकाळपासून लोकं येयाला लागतील. मग परत हुबं ऱ्हावं लागणार.”

चिमीला एवढं गोड बोलताना पाहून दगड्यालाच नव्हे, तर म्हातारीलाही नवल वाटलं.

जेवताजेवता म्हातारीलाआठवण झाली, “आरं दादल्या, भावड्याला कळवाया होवं. मारुतीरायाच्या पाया पडून जा, म्हणावं.”

हात- तोंड धुतल्यावर दादल्याने मुंबईला भावड्याला फोन लावला, “आरे, आपल्या घरात चमत्कार झालाय. दगड्याच्या आंगात मारुतीराया आलाय. त्याचा चेहरा बघितलास, तर दगड्या म्हणून वळखूच येईत न्हाय. द्येवच दिसतोय. तवा तू ताबडतोब निघून ये.”मग त्याने भक्तांची गर्दी वगैरे सगळं सांगितलं.

“पण मला लगेच निघायला नाय जमणार. उद्या सकाळी डॉक्टरसायबांना सांगतो, दुसऱ्या कंपाउंडरची सोय करतो आणि मग निघतो.”

रात्री पांघरायला दगड्याला घरातली स्पेशल वाकळ मिळाली.

भावड्याने फोन ठेवला, तेव्हा तो विचारात पडला,’मारुतीला यायचं होतं, तर तो दादल्याच्या अंगात आला असता. या बेवड्याच्या अंगात कशाला येईल तो?’

त्याला मध्यंतरी दवाखान्यात आलेल्या पेशंटबाईची आठवण झाली. तिच्या ओठाभोवतालचा भाग सुजला होता. ती सेम मारुतीसारखी दिसत होती. मग डॉक्टरांनी औषध देऊन तिला बरं केलं. तोंडाची सूज उतरली  आणि ती नॉर्मल झाली. आता उद्या डॉक्टरांनाच विचारूया, असं ठरवून भावड्या झोपला.

सकाळी डॉक्टर म्हणाले, “बरोबर आहे, तू म्हणतोस ते. मारुतीला अंगात यायचंच असतं, तर तो मोठ्या भावाच्या अंगात आला असता ना. या दारुड्याची निवड का केली असती त्याने?त्या बाईंसारखी यालाही ऍलर्जी झाली असणार. हे बघ. मी गोळ्या देतो त्याला. पण बरं होईपर्यंत त्याला अजिबात दारू पिऊ देऊ नकोस.दुसरं म्हणजे तुझ्या घरची माणसंपण ‘मारुती, मारुती ‘ करताहेत. त्यांना हे ऍलर्जी -बिलर्जी, गोळ्या-बिळ्या काही सांगू नकोस. तूच त्याला गुपचूप, कोणाच्या नकळत औषधं देत जा.”

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : दगड्याच्या अंगात मारुती आला, म्हणून म्हातारीने दगड्यापुढे लोटांगण घातलं. दगड्या घाबरला, म्हातारी म्येलीबिली का काय?…..)

पण तेवढ्यात म्हातारी उठून बसली आणि पुन्हा डोळे विस्फारून  दगड्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यांत नेहमीसारखा राग, तिरस्कार नव्हता. तिचे डोळे भक्तीने तुडुंब भरलेले होते. आणि हात जोडलेले होते.

‘आर तिच्या! आयेबी ढोसाया लागली का काय?’ दगड्याच्या मनात आलं,’येका परीन बरंच हुईल की ते. आपल्या मागची ‘पिऊ नगस’ची कटकट तरी टळंल. पयशे मागत बसाया नको.तीच भरंल.’

म्हातारीच्या चेहऱ्यावरून भक्तीभाव तसाच वाहत होता. आणि ती हात जोडून उभी होती.

“आये, काय गं?”

“मारुतीरायाss, माज्या घरात आलास तू. क्येवढी किरपा झाली रं तुझी. तुझ्यापुढे साखर ठिवते थोडी.”

तिने मारुतीरायाला साखरेचा निवेद दाखवला.

शेजारी कळण्याचा अवकाश, बघताबघता हीs गर्दी गोळा झाली. कोणीतरी समई आणली, कोणी तेल आणलं, कोणी फुलं आणली. म्हातारीच्या घराचं देऊळ झालं.

मग प्रत्येकजण मारुतीपुढे लोटांगण घालून रुपया -दोन रुपये ठेवू लागला.. कोणी नैवेद्याला दूध आणलं. कोणी साखर आणली. कोणी केळी आणली. चिमी खुश झाली. पटापटा सगळं भांड्यात ओतून वाट्या परत करू लागली.

दगड्याला दूध आणि साखरेत रस नव्हता. तो पैसे मोजत होता. दोन -पाच -दहा…… पन्नासपर्यंत मोजले. पुढे जमेना झालं. ‘आयला, त्ये मास्तूर शिकवत होतं साळंत, तेव्हा लक्ष द्याया हवं होतं.’

दादल्याने सगळे पैसे उचलून बाजूला ठेवले.

काल संध्याकाळपासून म्हादेवाची म्हैस सापडत नव्हती. त्याने मारुतीला दंडवत घालून साकडं घातलं, “द्येवा, म्हस गावू दे. दोन नारळ फोडीन तुझ्या पायाशी.”

काय बोलावं, ते दगड्याला सुचेना. तो टकामका बघत राहिला.

गर्दीतलं कोणीतरी बोललं, “म्हादेवा, तुजा सौदा मान्ने नाय द्येवाला. दोन नारळावर पैसं बी दे.”

“बरं, बरं. दोन नारळ फोडीन, वर धा रूपे दीन.”

तेवढ्यात दगड्याला सुचलं. मग मोठ्यांदा श्वास घेत, धापा टाकत तो बोलायला लागला, “म्हस बांधतुयास, त्यो खुंट गोठ्यातून भायेर काढ. अंगणात हुबा कर. ज्या दिशेला पडंल, त्या दिशंला म्हस गेलीया.”

म्हादेवाचं समाधान झालं. तो गेला.

तेवढ्यात नाम्या आला पुढे. “मारुतीराया, माझा पोर शिकलाय थोडाफार. तुला ठाऊकच असेल. पर त्येला नोकरी लागत न्हाय.आज ग्येलाय एका ठिकाणी…..”

“लागंल,लागंल,”दगड्याने उगीचच उत्तर दिलं.

नाम्याने खुश होऊन पाच रुपये ठेवले.

दगड्याला एकदम मस्त आयडिया सुचली, ‘गावातली समदी लोकं येतायत. गुत्तंवाला म्हमद्या बी यील. त्येला सांगायचं -माज्या भक्ताला, या दगड्याला जलमभर फुकटमंदी पियायला द्ये. तुज्या धंद्यात बरकत हुईल.’

जसजसा दिवस उतरत चालला, तसं दगड्याला गरगरायला लागलं. उभा राहिला होता, तो होडीत असल्यासारखा डुलायला लागला. दादल्याच्या लक्षात आल्याबरोबर त्याने लगेचच दगड्याला धरून खाली बसवलं. “द्येवा, सकाळपासून हुबंच हायेसा, जरा खाली बसा.” मग त्याने चिमीला लिंबूसरबत बनवायला सांगितलं आणि स्वतःच्या हाताने दगड्याला पाजलं.

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

दगड्या नेहमीसारखाच हलतडुलत, लटपटत, झोके खात घरी परतला. कुठे वाटेत न पडता घर आलं, म्हटल्यावर त्याला जग जिंकल्याचा आनंद झाला.

तसा उशीर खूपच झाला असावा. सगळी गपगार झोपली होती. दगड्या आला काय, नाय आला काय, वाटेतच कुठे झिंगून पडला काय, कोणालाच सोयरसुतक नव्हतं.

अचानक दगड्याला पोटात पडलेल्या प्रचंड खड्ड्याची जाणीव झाली. भुकेचा तो खड्डा एवढा प्रचंड होता, की चुलीपर्यंतचं चार पावलांचं अंतरही त्याला चार कोसांचं वाटलं.

जेमतेम दोन मुदी भात आणि गाडग्याच्या तळाला गेलेलं कालवण….. दगड्याचं पोट अर्धंमुर्धंही भरलं नाही. म्हातारीला उठवून जेवण बनवायला लावावं आणि पोटभर जेवावं,मग तिने शिव्या घातल्या तरी चालतील, असं त्याच्या मनात आलं. पण त्याच्यात तेवढंही त्राण नव्हतं. मग रागाने शिव्या घालत तो उठला. जेमतेम हात बुचकळून म्हातारीला ढकलून तो तिच्या बाजूला पटकुरावर आदळला. म्हातारी झोपेतच जराशी  कण्हली . दादल्या, त्याची बायको चिमी चिप्प झोपली होती.

 

“ए मुडद्या, ऊठ की रं. सूर्य डोईवर आला. कामाबिमाला जायचं सोडून आयतं गिळायला जल्म घेतलाय. म्हातारीने या वयात जमत नसताना दुसऱ्याच्या शेतात जाऊन मरायचं आणि या म्हाराजानं निसतं ढोस ढोस ढोसायचं. चार मानसं काय खातील, इतकं हा एकटाच गिळतोय. दादल्या आणि चिमी तर तुला भायेर काढाया टपल्येयत. मी आणि भावड्या कसंबसं थोपवतोय त्यास्नी. आता दारू जरा कमी कर, मसन्या आणि कामाचं बघ.”

मजुरीवरून परत आलेल्या म्हातारीची तणतण ऐकून दगड्याची झोपमोड झाली. तो जाम वैतागला.

“चा हाय का तय्यार? चाचा प्येला भरला की मगच मला उठीव.”

 

फुर्रर्र फुर्रर्र चहा पिणाऱ्या दगड्याकडे लक्ष गेलं मात्र, म्हातारी एकदम दचकली.

“प्येला खाली ठ्येव. प्येला खाली ठ्येव की रं मुड…..”

पण दगड्याने पेला पुरा रिकामा झाल्यावरच खाली ठेवला. म्हातारी डोळे फाडून त्याच्याकडे बघतच राहिली.

“काय गं म्हातारे, भूत दिसल्यावाणी काय बघतीस?”

म्हातारीच्या तोंडून शब्दच फुटेना झाला. ती आपली टकाटका बघतच राहिली दगड्याकडे.

 

झालंच तर होतं तसं.त्याचे ओठ तोंडल्याच्या दुपटीने टरटरले होते. नाक फुललं होतं. गालाचा तर जाम फुगाच झाला होता.

“मारुती. व्हय. मारुतीच झालाय रं  माझा दगड्या.”

किती वर्षांनी म्हातारीने आपल्याला ‘माझा’ म्हटलं, म्हणून दगड्या फुशारून गेला.

म्हातारीचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. खरंच. दगड्या थेट मारुतीसारखाच दिसत होता. म्हणजे मारुती आला का काय दगड्याच्या अंगात?

म्हातारीने दगड्यापुढे लोटांगण घातलं. दगड्याने डोळे विस्फारून म्हातारीकडे पाहिलं. आये, आणि नमस्कार घालतेय आपल्याला!रात्री ढोसलेल्या दारूची नशा आता जास्तच चढली का काय!पण म्हातारी खरंच झोपली होती, त्याचे पाय धरून.मग मात्र तो घाबरला, म्येलीबिली का काय ही?

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्केच – भाग पहिला ☆ श्री शरद दिवेकर

श्री शरद दिवेकर

?  विविधा ?

☆ स्केच – भाग पहिला ☆ श्री शरद दिवेकर ☆

रोजच्यासारखीच धावपळ करत कसंबसं रेल्वे स्टेशन गाठलं आणि ट्रेनचा हाॅर्न वाजला. जिवाचा आकांत करून समोरच निघण्याच्या तयारीत असलेल्या ट्रेनचा आमचा नेहमीचा डबा गाठला आणि डब्यात शिरलो. तेवढ्यातच ट्रेन सुटली. हाशहुश करत आमचा सहा मित्रांचा कंपू असतो तेथे पोहोचलो. ऑफिसची सॅक रॅकवर टाकली आणि पंख्याखाली उभा राहिलो. असंच रोज घडायचं. सकाळी 08.43 च्या कल्याण – सीएसटी डबल फास्टमध्ये मी कल्याणपासूनच बसून प्रवास केला असं क्वचितच घडायचं. पण एक मात्र बरं होतं की सुरेश, रमेश आणि प्रकाश ट्रेन प्लॅटफॉर्मवर  येण्यापुर्वीच हजर असायचे. त्यामुळे आमच्या तीन सीट्स तरी शुअर असायच्या आणि गाडी घाटकोपरला पोहोचली की उरलेले आम्ही तिघे त्यांच्या सीट्सवर अगदी हक्काने बसायचो सीएसटी येईपर्यंत. पण आज मात्र मी ठरवलं की ही स्वतःच्या जीवाची लावचड आपण थांबवायला हवी. उद्यापासून थोडं लवकर  उठून लवकर घर सोडायचंच, म्हणजे अशी धावपळ करावी लागणार नाही.

दुस-या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि भरभर आवरून स्टेशन गाठलं. ट्रेन्स थोड्या लेट असल्याने आमची ट्रेन आली नव्हती. त्यामुळे धावती ट्रेन पकडून सीट पकडायचा प्रयत्न करता येणार होता. तसा प्रयत्न केला देखील मी आणि विंडो सीट नाही आणि दुसरी सीट देखील नाही पण तिसरी सीट मिळवली मी. नंतर उरलेले तिघंही आले आणि गप्पा, चेष्टा, मस्करी करत करत आमचा प्रवास सुरू झाला.

आज एक वेगळी गोष्ट घडली. नेहमी ट्रेन कल्याण स्टेशनमध्ये शिरताना आमच्या समोरच्या सीट्स रिकाम्या असायच्या. पण आज उलट्या बाजूच्या विंडो सीटवर डाऊन करून आलेला माणूस बसला होता. बसला नव्हता. चक्क झोपला होता बसल्या बसल्या. घाटकोपर स्टेशन आलं आणि आम्ही तिघंही उभे राहिलो आणि आमच्या सीट्स आमच्या मित्रांना दिल्या. थोड्या वेळाने माझी नजर त्या उलट्या बाजूच्या विंडो सीटवर बसून आलेल्या माणसाकडे गेली. आता तो झोपला नव्हता. जागा होता. त्याच्या हातात होती एक वही आणि पेन्सिल. बाहेरच्या हवेच्या झोताने त्याच्या वहीचं पान फडफडलं आणि माझ्या नजरेला पडलं आत्ताच विंडो सीटवरून उठलेल्या सुरेशच्या स्केचकडे. त्या माणसाने ते स्केच जवळपास पुर्ण केलं होतं. त्याच वेळी त्या माणसाने ती वही बंद केली आणि ती वही आणि पेन्सिल त्याने त्याच्या पिशवीत भरली आणि तो उठला आणि दाराकडे जाऊ लागला. पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या. सीएसटी आल्यावर आम्ही सगळे ट्रेनमधून उतरून आपापल्या ऑफिसेसकडे रवाना झालो.

संध्याकाळी ऑफिस सुटण्यापुर्वीच प्रकाशचा फोन आला आणि समजले की सुरेश गेला. मी एकदम उडालोच. जेमतेम पस्तीशीचा हा सुरेश आणि त्याला एवढ्या कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक आला आणि तो गेला ! सगळे सोपस्कार आणि अंत्यविधी आवरून घरी पोहोचायला मध्यरात्र होऊन गेली होती. दुसर्‍या दिवशी उशीराच उठलो आणि मूडच नव्हता ऑफिसला जाण्याचा. त्यामुळे ऑफिसला दांडी मारली.

असेच दिवस चालले होते. आता माझी एक सीट तरी शुअर असायचीच. विंडो सीट नाहीच मिळायची मला ! पण तरीही पुर्वीपेक्षा सुखावह प्रवास व्हायचा रोज. सुरेश जाऊन साधारण महिना झाला असावा आज. आजही आमची ट्रेन सुटली आणि सहजच लक्ष गेलं समोरच्या विंडो सीटला बसलेल्या त्या माणसाकडे, तोच माणूस, स्केच काढणारा. तो माझ्या चांगलाच लक्षात राहीला होता. नेहमीप्रमाणे घाटकोपर आल्यावर उभा राहिलो आणि कुतुहलाने त्या माणसाकडे पाहिलं. तर त्याच्या हातात होती आजही तीच वही आणि पेन्सिल सुध्दा. त्यामुळे मुद्दामच त्या वहीत डोकावून पाहिलं. तर काय ! त्या माणसाने आत्ताच विंडो सीटवरून उठलेल्या रमेशचे स्केच काढले होते. खुपच सुंदर स्केच काढले होते त्याने. वेळ चांगला जात असेल त्या माणसाचा. तेवढ्यात त्या माणसाने आपली वही बंद केली आणि वही आणि पेन्सिल पिशवीत ठेवून तो उठला आणि दाराकडे जाऊ लागला. सीएसटी आल्यावर आम्ही गाडीतून उतरलो आणि आपापल्या ऑफिसेसकडे रवाना झालो.

त्या दिवशी दुपारीच माझा मोबाईल वाजला. प्रकाशचाच फोन होता. फोन ठेवला आणि माझ्या हातापायातील शक्तीच निघून गेली. रमेशला हार्ट अ‍ॅटॅक आला होता आणि तो गेल्याचे सांगण्यासाठीच प्रकाशने फोन केला होता. पुन्हा एकदा तीच धावपळ, तेच सगळे सोपस्कार आणि अंत्यविधी. एका महिन्यात आम्ही दोन मित्र गमावले होते.

दुसर्‍या दिवशी सुट्टी होती. सहज कॅलेंडर पाहिलं तर काल अमावास्या होती. प्रकर्षाने आठवण झाली सुरेश आणि रमेश यांची. सहजच कॅलेंडरचं मागच्या महिन्याचं पान पाहिलं आणि लक्षात आलं की सुरेश गेला त्या दिवशी देखील अमावास्याच होती. काय योगायोग होते हे !

असेच काही दिवस गेले. आता आमची चौकडीच उरली होती. आज पिठोरी अमावास्या. वाढदिवस असतो माझा तिथीने. माझी पत्नी आठवणीने लक्षात ठेवते हा दिवस. त्यामुळे माझ्या देखील लक्षात असतो. पण मूडच नव्हता आज. सकाळी प्लॅटफॉर्मवर आलो. ट्रेन अजून यायची होती आणि त्रिकुटही आलं नव्हतं अजून. त्यामुळे मला आज चक्क विंडो सीट मिळाली आणि एकदम खुश झालो. तेवढ्यात त्रिकुट अवतरलं आणि त्यापैकी दोघांनी उरलेल्या दोन सीट्स पटकावल्या. लगेचच ट्रेन सुरू झाली आणि वा-याचा झोत अंगावर आला आणि आणखीनच खुश झालो मी. पण समोरच्या सीटवर पाहिलं आणि मला दरदरून घाम फुटला. समोर तोच माणूस बसला होता आणि त्याच्या हातात होती तीच वही आणि पेन्सिल.

क्रमशः ….

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

मो 70457 30570, ईमेल – sharaddivekar784@gmail.com

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares