मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कलम – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ नास्तिक – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

शुक्रवारची संध्याकाळ. उतरती उन्हे ढगांच्यात लपाछपी खेळत होती. मी ऑफीसमधून बाहेर पडून आकाशवाणी बसटॉपकडे चाललो होतो. बसस्टॉपवर गर्दी जरा जास्तच होती. गर्दीत काही ओळखीचे चेहरे दिसत होते. त्यांच्यात हाय-हॅलो, नमस्कार-चमत्कार होत होते. त्यातच धापा टाकत, विव्हळत बसेस येत होत्या.

आपलं काहीसं ओझं गर्दीत ओतून आणि गर्दीचा एक अंश गिळून त्या पुढे निघून जात होत्या. मी माझ्या घराकडे जाणाऱ्या बसची प्रतीक्षा करत उभा होतो. विचार करत होतो, खूप दिवसात एखादी गोष्ट लिहिली नाही.

एवढ्यात जवळच आरडा-ओरडा ऐकू आला. आकाशातून एक गरुड येऊन रस्त्यात पडला होता. त्याच्या अवती-भवती, एक काळा साप लपेटलेला होता. दोघांच्यात भीषण लढाई चालू होती.

बसस्टॉपवरचे लोक त्या बाजूला पळाले. ट्रॅफिक काही काळ थांबल्यासारखाच झाला. लोक बसमधून, कारमधून माना बाहेर काढून काढून बघत होते. ज्यांना जायची घाई होती, ते वारंवार हॉर्न वाजवत होते. लवकरच ट्रॅफिक गरुड आणि साप यांच्या आजूबाजूने पुढे जाऊ लागला. एकमेकांशी जोरदार लढाई करणाऱ्या गरुड आणि सापाच्या चारी बाजूंनी प्रेक्षक त्यांना घेरून उभे राहिले. मी पण त्यांच्यात सामील झालो.

कधी सापाचं पारडं भारी व्हायचं. कधी गरुडाचं. जीवन-मरणाचा प्रश्न होता. जितकी तोंडं, तितक्या बोली.

‘हा गरुड नाही. ससाणा आहे ससाणा. सापाला मारून टाकेल! ‘

‘अरे नाही, हा गरुड आहे गरुड. पण तोही साधारण साप नाही. काळा नाग आहे. त्याचा फणा पाहिला नाहीत. नागापुढे गरुडाचं काहीच चालणार नाही. ‘

बघता बता गर्दीची सहानुभूती दोन हिश्श्यात वाटली गेली. काही गरुडाच्या पक्षात गेले काहींनी नागाचा पक्ष घेतला.

गर्दीत कांहीं जुगारीही होते.

‘शंभराची पैज लावा. शंभराची. नागच जिंकेल. ’

‘लागली पैज! गरुडच जिंकणार! ’

गर्दीत उभी असलेली एक म्हातारी म्हणाली, ‘कुणी तरी दोघांना वेगळं करा. नाही तर दोघेही मरतील. ‘

कुणी तरी म्हंटलं, ‘आम्ही त्यांना वेगळं करायला गेलो, तर ते आम्हालाच मारून खातील. ‘

एक आवाज आला, ‘तुम्ही भित्र्या भागुबाई आहात. ‘

त्याला उत्तर मिळालं, ‘तुम्ही मोठे तिस्मारखां आहात, असं तुम्हाला वाटतय, तर तुम्हीच त्यांना हात लावा नं! आम्हीदेखील बघू तुमचा पराक्रम! ‘

जेव्हा सापाचं पारडं जड व्हायचं, तेव्हा गर्दीत उभा असलेला एक साधू बाबा जयजयकार करत म्हणायचा, ‘बम-बम भोले! नागदेवता की जय हो! ‘ 

जेव्हा गरुड विजयी होतोय, असं वाटायचं, तेव्हा आवाज यायचा, की हे तर भगवान विष्णूचं वाहन गरुड आहे, तो सापाला सोडणार नाही. ‘

अखेर गरुडाने नागाचा फणा धरून दाबला अणि आपल्या तीक्ष्ण चोचीने आणि टोकदार नखांनी त्याला मारून मारून अर्धमेला केलं. गरुड सापाला घेऊन उडणार, एवढ्यात, साधूबाबाबांनी एक दगड उचलून गरुडावर भिरकावला. गडबडीत गरुड सापाला तिथेच सोडून तसाच उडून गेला.

जुगारी लोक पैसे एकत्र करू लागले. गरुडाच्या पक्षधा-यांवर विजयाचे हसू होते, तर नागपक्षाच्या लोकांचे चेहरे पडले होते.

कुणी खिन्न झालेल्या व्यक्तीने आपली चीड बाहेर काढण्यासाठी एक दगड उचलला. आणि एका बसच्या काचेवर मारला. त्यातून गडबड-गोंधळ, आरडा-ओरडा सुरू झाला. लोक इकडे-तिकडे पळू लागले.

गर्दी आणि आरडा-ओरडा बघून ट्रॅफिक पोलीस तिथे आले. त्यांना पहाताच जुगारी सटकले. गर्दी विखुरली. गर्दीत बसवर दगड कुणी मारला, हे कळले नाही. कुणी तरी त्या क्षत -विक्षत सापाला उचलून बस-स्टॉपच्या कडेला फुटपाथवर टाकून दिले.

माझ्या घराकडे जाणारी बस एवढ्यात आली. मी धक्के खात आत चढलो आणि बस निघाली.

दोन दिवसांनी संध्याकाळी जेव्हा मी घरी जाण्यासाठी आकाशवाणी बस स्टॉपवर गेलो, तेव्हा तिथलं दृश्य पाहून दंग झालो.

शुक्रवारी संध्याकाळी बस स्टॉपच्या शेजारील फूटपाथवर, जिथे क्षत-विक्षत साप टाकलेला होता, तिथे एक छोटंसं पक्कं मंदिर बनलं होतं. त्याच्या भोवतीच्या चारी बाजूंच्या भितींवर पांढरे टाईल्स लागले होते. मंदिरात शिवलिंग स्थापित केलेलं होतं. शेजारीच नागदेवतेचा मोठा फोटो होता. त्याला फुलांचा हार घातलेला होता.

ज्या साधूबाबांनी शुक्रवारी गरुडाला दगड मारला होता, तेच साधूबाबा मंदिरात घंटा वाजवून पूजा-अर्चा करत होते. बाहेर काही महिला शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी हातात दुधाच्या लोट्या घेऊन रांगेत उभ्या होत्या. काही भक्तगणही भगाव्या रंगाची वस्त्रे परिधान करून बाहेर उभे होते. मंदिराच्या शेजारी एक फुलवाल्याचे दुकान होते. तो फुलांचे हार विकत होता. त्याच्या शेजारी एक मिठाईवाला बुंदीचे लाडू विकत होता. मंदिराच्या शेजारी एक नुकताच पेंट केलेला साईन बोर्ड होता. त्यावर लिहिलं होतं, या मंदिराचा शिलान्यास, या विभागाचे नगरसेवक श्री. की ख ग यांच्या करकमळांनी झाला आहे.

मी भगवी वस्त्रे परिधान केलेल्या एकाला विचारलं, ’ हे सगळं काय आहे भाऊ? ’ 

‘आपल्याला माहीत नाही? हे साधूबाबा बनारसचे एक सिद्ध महात्मा आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना रात्री दृष्टांत झाला, इथे एक शिवलिंग गाडलेले आहे. आणि इथे नागदेवतेचा वास आहे. इथे पूजा करून नवस बोलला, तर आपली इच्छा पूर्ण होते. ‘

मला रहावलं नाही. ‘काय बोलताय? शुक्रवारी संध्याकाळी मी इथेच होतो. इथे एका गरुडाने सापाला मारून टाकलं होतं. मग त्या सापाला कुणी तरी फूटपाथच्या कडेला टाकलं. हा साधूबाबाच गरुडाला दगड मारत होता.

मी आणखी काही बोलणार, एवढ्यात त्या भगव्या वस्त्रधारीने माझ्याकडे रागाने पहात थरथर कापत म्हंटलं, ‘नास्तिक’ कुठले! ‘

मला त्या व्यक्तीशी वाद घालावासा वाटला नाही. आपण आंधळ्याला रस्ता दाखवू शकतो. पण डोळे असूनही बघायचंच कुणी नाकारलं, तर आपण तरी काय करणार?

मी बस पकडली आणि घरी आलो. घरी पोचून बघतो, तर काय, बाईसाहेब स्नान वगैरे करून लोट्यात दूध घेऊन उभ्या होत्या.

‘ऐकलंत का, आपली शेजारीण सांगत होती, आकाशवाणीच्या शेजारच्या बस स्टॉपजवळ एक नवं मंदिर झालय. तिथे बनारसचे सिद्धी पावलेले महात्मा आले आहेत. असं म्हणतात, तिथे जो नवस बोलतो, त्याची इच्छा पूर्ण होते. तुम्हाला माहीतच आहे, की आपल्या शेजारचे शर्मा… त्यांचं प्रमोशन किती तरी दिवस रखडलं होतं, आज सकाळीच मिसेस शर्मांनी त्या मंदिरात पूजा केली. नवस बोलला आणि दुपारी शर्माँचं प्रमोशन झालंसुद्धा! आपल्या टुण्णूची उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होतेय. म्हणून मीसुद्धा तिथे जाऊन दर्शन घेऊन येते. तुम्ही येणार का? ‘

‘तू जाऊन ये. मला कथा लिहायचीय. मी आपल्या देवघरातल्या देवापुढे डोकं टेकवीन. ‘ 

मूळ हिन्दी कथा – ‘नास्तिक’

मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नमन नटवरा… — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ नमन नटवरा…  — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(“एका नाटकासाठी इतकी धडपड, मेहनत करायची?

“होय बाबा, ही स्पर्धा हाय, इथं बरीच नाटक होनार, मुंबई पुन्यातून परीक्षक येत्यात, त्याना आवडायला हवं… मग स्पर्धेत पयल दुसरं आलं तर अंतिम स्पर्धेला जायला मिळतं. त्यासाठी ही धडपड’.) 

इथून पुढे – – – 

नाटकासाठी एक स्टेज मिळालं. तेथे दुसऱ्यादिवशी जमायचं ठरल. नरूआणि शिरीष तेथे पोचले तेव्हा जयवंतसरांची पत्नी धावपळ करून स्टेज लाऊन घेत होती. सर कुठे दिसत नव्हते. शिरीषने चौकशी केली तेंव्हा कळले सरांना काल रात्री उलट्या होऊ लागल्या, चक्कर येऊ लागली म्हणून डॉ गुळवणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. सर्वजणं काळजीत होते, नाटक चार दिवसावर आले आणि प्रमुख भूमिका करणारा कलाकार हॉस्पिटलमध्ये. थोडीफार तालीम झाली. मग घरी जाण्याआधी नरू आणि शिरीष हॉस्पिटलमध्ये गेले. सरांना सलाईन लावलेले होते. लांबून त्याना पाहून ते घरी आले.

दुसऱ्या दिवशी शिरीष आणि नरू स्टेजकडे आले, तर जयवंतसर लाईट जोडून पहात होते. नरुने शिरीषच्या हातात हात दिला. काल हॉस्पिटलमध्ये झोपलेला माणूस आज तालीम घयायला हजर होता. मग दोन दिवस रंगीत तालीम झाली. नरुने संपूर्ण नाटक पहिल्यांदा पाहिले. किती अवघड भाषा.. मोठे मोठे संवाद.. अनेक ग्रुप्स.. मुस्लिम कपडे.. लेव्हल्स.. त्यावरील हालचाली.. प्रकाश आणि संगीत सांभाळत कलाकार नाटक पुढे नेत होते. आलेले पाहुणे नाटक पाहून खूष झाले. त्यानी काही सूचना पण केल्या.

इकडे नाट्यस्पर्धा सुरु झाली होती. “तुघलक ‘नाटकाला तिसरा दिवस मिळाला होता.

नाटका दिवशी सर्वांनी स्वतः प्रॉपर्टी, स्पॉट्स उचलून आणले आणि स्टेजवर मांडले. तीन रंगीत तालमी झाल्या होत्या त्यामुळे स्पर्धेतील प्रयोग उत्तम आणि खणखणीत झाला. स्वतः जयवंतने मोहम्मद बिनतुघलक उत्तम साकारला. सर्वच कलाकारांनी चांगले काम केले. तीन परीक्षक होते. त्यातील एक स्त्री परीक्षक होती. परीक्षक आत येऊन सर्वाना विशेष करून जयवंतला भेटून गेले आणि त्यानी पण नाटकाचे कौतुक केले.

नाटकाचा प्रयोग छान झाला असे कौतुक अनेक समीक्षकांनी केले, अनेक प्रेक्षकांनी केला. खुप मेहनत करून नाटक उभे केले होते. या कौतुकाचा स्वीकार जयवंत आणि त्याची पत्नी घेत होती.

दुसऱ्या दिवशी ती दोघ आणि ग्रुपमधील इतर एका स्टॉलवर चहा पित असताना जयवंतचा छोटा मोबाईल वाजला. त्याकाळात त्या शहरात फारच थोडया लोकांकडे मोबाईल होते. नवीन नंबर पाहून जयवंतने “हॅल्लो.. हॅल्लो”केले.

पलीकडून एका बाईचा आवाज आला “नमस्कार, तुमचे नाटक आणि भूमिका उत्तम झाली ‘.

“थँक्स, कोण बोलतंय?

“, मी राधिका, या स्पर्धेची परीक्षक ‘

जयवंतला आश्यर्य वाटते. परीक्षकाचा मला फोन? का केला असेल

“बोला मॅडम.. का फोन केला होता?

 

“स्पर्धेचे सिनिअर परीक्षक आहेत ना सुधीरसर त्याना तुम्हाला भेटायचे आहे. त्यानी तुम्हांला निरोप द्यायला सांगितले.. केंव्हा येऊ शकता? शक्यतो एकटे या किंवा तुमच्या ग्रुपमधील कुणी असलं तरी चालेल ‘.

जयवंतच्या डोक्यात चक्र फिरू लागली, काही तरी गडबड आहे..

सावध राहा.

“उद्या येतो मॅडम सकाळी अकरा वाजता ‘.

“या, आम्ही सारे असू, गेस्टहाऊस मध्ये आहोत आम्ही ‘.

“होय, येतो.. म्हणून जयवंतने मोबाईल ठेवला.

जयवंत एक मिनिट विचार करू लागला -परीक्षकांनी का बोलावले असेल? असे एवढ्या वर्षात कुठल्या परीक्षकांनी रेस्टहाऊस वर बोलावल्याचे ऐकले नव्हते, हे काहीतरी नवीन.

त्त्यांचे फोनवरील बोलणे ऐकत असलेली क्षमा म्हणाली “त्या शेखरचे पहिल्या दिवशी नाटक झाले ना, त्यालाही काल बोलावलेले म्हणे..

“बरे, आपण उद्या जायचे, शिरीष आणि नरू तुम्ही माझ्यसमवेत यायचे आणि.. जयवंतने शिरीषच्या कानात सांगितले.

शिरीषने मान हलवली. उद्या दहा वाजता ते दोघे जयवंतच्या घरी येणार होते.

दुसऱ्या दिवशी नरू आणि शिरीष जयवंतकडे आले. पण जयवंतने एक वस्तू शिरीषकडे दिली, ती त्याने पॅंटीच्या खिशात ठेवली आणि रिक्षा करून तिघे निघाले.

तिघे रेस्टहाऊस मध्ये पोहोचले आणि चौकशी करून राधिका मॅडमच्या सूट मध्ये आले, त्याना पहाताच राधिकामॅडमने बाजूच्या सूटमधील सुधीरसर आणि मोहनसरांना बोलावले. तिघे येऊन खुर्चीत बसले, मग सुधीरसर बोलू लागले

“जयवंत, तुमचे नाटक छानच झाले. पण तशी इतर ग्रुपची पण नाटकें चांगलीच होतात. स्पर्धेत पहिला किंवा दुसरा नंबर आला तरच तुम्ही अंतिम स्पर्धेत जाणारं आणि ते आमच्या हातात आहे.

जयवंतने शिरीषकडे पाहिले. शिरीषने हळूच मान हलवली आणि हात खिशात घातला.

“बोलायला हरकत नाही ना, ही तुमचीच माणसे आहेत ना?

जयवंतने मान हलवताच सुधीर बोलायला लागले.

“आम्ही या आधी सुद्धा बऱ्याच ठिकाणी परीक्षक म्हणूंन काम केले आहे, स्पर्धेचा निकाल आमच्या हातात असतो. तुम्हाला जर पहिला नंबर हवा असेल आम्हाला तिघांना प्रत्येकी एक लाख द्यावे लागतील.

“काय? अनपेक्षितपणे जयवन्त चित्तकारला.

“होय, दुसरा हवा असेल तर प्रत्येकी पंचांहत्तर हजार.. राधिका मॅडम मध्येच म्हणाल्या.

“आणि ग्रुप्स पैसे देतांत बरं का, तिसरे परीक्षक म्हणाले.

“काल तो स्वप्नील आला होता, त्याला पण हेच सांगितलं… आणि अंतिम फेरीत नंबर हवा असल्यास त्याची पण व्यवस्था होईल.

“मी एकटा एवढ्या पैशाचा निर्णय घेऊ शकत नाही, ग्रुपला विचारून सांगतो ‘.

“, हो सांगा आणि हे तुमच्या आमच्यात ठेवा बरं का..

“, येतो सर… म्हणून तिघे बाहेर पडले.

बाहेर पडून रस्त्यावर आल्यावर जयवंत शिरीषला म्हणाला “आता बाहेर काढ..

शिरीषने खिशात लपवीलेला पॉकेट रेकॉर्डर बाहेर काढला आणि चालू केला.. त्यात सारे सांभाषण व्यवस्थित रेकॉर्ड झाले होते.

—सायंकाळी सहा वाजता —-

शहरातील बरेच नाट्यकर्मी, प्रतिष्ठित व्यक्ती, प्रोफेसर जमले होते. वर्तमानपत्र वार्ताहर, टीव्हीचॅनेल रिपोर्टर कॅमेरासह हजर होते. चर्चा जोरात सुरु होत्या. आजपर्यत पैशाची मागणी करणारे परीक्षक कोणी पाहिले नव्हते, समाजाची एवढी अधोगतीचा विचार केला नव्हता.

सर्व लोकांसमोर आणि वार्ताहरासमोर जयवंतने परीक्षकासोबतचे रेकॉर्डिंग ऐकवले आणि सर्वाना धक्का बसला. सांस्कृतिक क्षेत्रात एवढे अध. पतन कोणी कल्पिले नव्हते.

दोन मिनिटात बातम्यातून ही बातमी सर्वदूर पसरली.

सर्व ठिकाणहून फोनावर फोन सुरु झाले.

कलेक्टरनी स्पर्धा रद्द केली. परीक्षकांची नाट्यकर्मिनी आणि जनतेने शी थू केले. पोलीस बंदोबस्तत त्याना शहराबाहेर हाकलले. दुसऱ्या दिवशी अनेक वर्तमापत्रात ही ठळक बातमी होती. पुढे कधीही या परीक्षकांना कोणी बोलावले नाही.

जयवंत निराश झाला. आपण आणि आपल्यासारखे अनेक निष्टने नाटक करतो.. रात्रीचा दिवस करून सोबत्याना घेऊन स्पर्धेत उतरतो.. आपली तब्येत, संसार, पैसे याचा विचार न करता दोन दोन महिने जागरणे करून उपयोग काय? असे परीक्षक पैशासाठी हवा तसा निकाल देणार.

जयवंत मग लहान मुलांची नाट्यशिबीरे घेऊ लागला पण स्पर्धेच्या नाटकापासून कायमचा दूर झाला.

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नमन नटवरा… — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ नमन नटवरा…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर

 नरु जोरात सायकल चालवत होता, त्याच्या पाठीमागे शिऱ्या बसला होता. शिऱ्या घड्याळ बघत म्हणाला

“साडेसहा वाजले की रे, जोरात घे.

“घेतो रे, पन चढ हाय न्हवं..

“अरे, सात वाजले की सर दरवाजा बंद करत्यात.. जल्दी.

नरुने जोरात सायकल घेतली आणि पावणेसात वाजता सायकल हॉलच्या पायऱ्याला लावली. दोघे घाम पुशीत उभे राहिले. लहानशी वाऱ्याची झुळूक आली, त्याने त्या दोघांना बरे वाटले. मग नरुने हळूच हॉलचा दरवाजा ढकलला. हॉल मध्ये जयवंतसर खुर्चीत बसुन पुस्तक वाचत होते. त्यान्च्यासमोर बाकावर आठ मुलगे आणि चार मुली, दोन वयस्क पुरुष आणि एक वयस्क स्त्री पण बसली होती. नरु आणि शिरीष आत जाऊन एका बाकावर बसले.

सात वाजले तसे जयवंतने हॉल चा दरवाजा आतून बंद केला.

मग तो बोलू लागला “यंदा स्पर्धा पंचवीस नोव्हेंबरपासून सुरु होते आहे, तेंव्हा या वर्षीच्या आपल्या नाटकाची तालीम सुरु करायला हवी. यंदा आपल्या संस्थेने गिरीष कर्नाड यांचे “तुघलक ‘हे नाटक निवडले आहे. तसे हे खर्चिक नाटक आहे कारण या नाटकासाठी ऐतिहासिक ड्रेपरी हवी, लेव्हल्स करायला लागतील, म्युझिकवर खुप मेहनत करायला लागेल. आपल्या संस्थेने मंजूर केलेल्या रकमेत हे नाटक करणे कठीण आहे म्हणून आपल्या सर्वाना अंगमेहनत करून कमीतकमी खर्चात नाटक उभे करायला लागेल.

तुमच्यापैकी सर्वांनाच भूमिका मिळेल असे नाही पण नाटकासाठी इतर कामे जास्त जास्त आव्हानदायक असतांत. बॅकस्टेज अत्यन्त महत्वाचे. कारण आपला हौशी ग्रुप आहे, व्यावसायिक नव्हे. आपल्या सर्वांनाच बॅकस्टेज पण करायला लागेल. या नाटकातील भूमिकेनुसार मी कलावन्त निवडले आहेत, त्याची लिस्ट उद्या मिळेल. प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य कोण करणार हे आपण ठरवू. त्या सर्वांना माझी आणि माझ्या पत्नीची मदत असेल. भूमिका ठरल्यानंतर कलाकारांनी पंधरा दिवसात आपले संवाद पाठ करणे अपेक्षित आहे, मग मोव्हमेंट दिल्या जातील, मग नेपथ्य लावून हालचाली, मग प्रकाश, संगीतसह मोव्हमेन्ट ठरतील. मग जयवंतने नाटकाचे थोडे वाचन केले आणि मंडळी घरी गेली.

नरु आणि शिरीष परत सायकलवरुन घरी निघाले, आता हवेत थंडी होती.

शिरीष या ग्रुपमध्ये दोन वर्षे लहान भूमिका करत होता, नरु त्यांच्याबरोबर यंदा प्रथमच येत होता. नरु बोलू लागला “शिऱ्या, हे जयवंतसर कसे आहेत, म्हणजे बरीच वर्षे नाटक करतात काय?

“होय, वीसवर्षे तरी ते नाटक करतात, सुरवातीला दुसऱ्या ग्रुपमध्ये होते पण तिथं त्यांचं बिनसलं त्यापासून ते आणि त्त्यांची बायको वेगळी झाली आणि त्यांनी हा ग्रुप सुरु केला, दरवर्षी नाटक काढतात पण म्हणावं तस यश अजून मिळालं न्हाई त्यास्नी, पण स्वतःमात्र बेस्ट काम करत्यात, त्त्यांची बायको पण बेस्ट काम करते.

“पन मला देतील काम स्टेजवर?”, बहुतेक न्हाई, या ग्रुपमधील जुनी अनुभवी लोक हायेत, हे नाटक सरांनी काढलंय ते लय अवघड हाय, बोलताना फापलायला व्हणार, इनोदी नाटक असत तर जमतंय कसतरी, पन या नाटकात जुनीच टीम असणान, तुला बॅकस्टेजला घेनार, पन खरं नाटक बॅकस्टेज करता करता समजत.. मी पन दोन वरश बॅकला होतो, बघू यंदा स्टेजवर चान्स देत्यात काय?

दोघ सायकल चालवत घरी गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सात वाजता सर्व जमली, आज अजून बरीच लोक आली होती, वयाने मोठी लोक होती, स्त्रिया होत्या. नरु गप्प बसुन पहात होता.

कलाकारांची निवड झाली, यावेळी शिरीषला शहाबुद्दीनची भूमिका मिळाली. स्वतः जयवंतसर मोहम्मदबिन तुघलक ही कठीण भूमिका करणार होते. वाचने सुरु झाली, हे नाटक चौदाव्या शतकातील आणि इस्लामी वातावरणातील, त्यामुळे बरेच उर्दू शब्द आणि वाक्ये होती. पण जयवंतसरांनी नाटकाचा व्यवस्थित अभ्यास केला होता, त्यामुळे प्रत्येक कलाकाराला ते व्यवस्थित मार्गदर्शन करत होते. हळूहळू कलाकारांच्या तोंडात वाक्ये बसायला लागली.

पण काही कलाकार कधी येत होते कधीं दांडी मारत होते. जयवंतची चिडचिड होतं होती. रोज कुणालाना कुणाला लेक्चर द्यावे लागत होतं. काही दिवसांनी एक स्त्री कलाकार यायची बंद झाली. तिची तात्पुरती तालीम दुसरी कलाकार करू लागली. शेवटी जयवंतसर आणि त्त्यांची पत्नी तिच्याघरी गेली, तेंव्हा तिने “मला लहान भूमिका दिली, म्हणून माझे त्या भूमिकेत मन लागत नाही ‘, असे सांगून काम करण्यास नकार दिला. पुन्हा शोधाशोध करून नवीन स्त्री मिळविली, पुन्हा तिची पहिल्यापासून तालीम सुरु, एका पुरुष कलाकारांची दुसऱ्या शहरात बदली झाली.. म्हणून पुन्हा नवीन माणूस शोधला.

एक दिवस घरी जाताना नरू शिरीषला म्हणाला “मग दरवर्षी असच कोनी ना कोनी नाटक मधीच सोडून जातंय काय?

“होय बाबा, यालाच नाटक म्हणत्यात… पडदा वर जाई पर्यत काय काय होईल सांगता यायचं न्हाई.

“मग जयवंतसरांना लय तरास होतं असेल?

“होय, सर दिवसभर साखरकारखान्यात नोकरीला जात्यात, घरसंसार हायेच आणि रात्रीच नाटक. त्यात रोज असली टेन्शन..

“आनी त्त्यांची घरवाली?

“ती बी नोकरीं करते, यांच्या नाटकात काम करते ‘.

अनेक अडचणी, संकटे दूर करून नाटकाला आकार येत होता, कलाकारांचे पाठांतर बऱ्यापैकी झाले. मग जयवंतसर नेपथ्याच्या मागे लागले. एका सुताराला बोलाऊन लेव्हल्सची मापे दिली, मागे कमान करायला दिली. म्युझिकसाठी एका स्टुडिओत जयवंतसरांनी दोन रात्री जागून कॅसेट तयार केली. यंदा प्रकाशयोजनेकरिता ग्रुपमधील मनिषवर जबाबदारी दिली, अर्थात त्याला मार्गदर्शन जयवंतसरांचेच होते.

जसजशी स्पर्धेची तारीख जवळ येत होती, तसतशी रात्रीची जागरणे वाढत होती, आता रविवारी पूर्ण दिवस आणि बाकी दिवशी रात्री दोनपर्यत तालीम, मग संगीताची तालीम करून जयवंत पहाटे चार वाजता घरी पोचत होता, परत सकाळी डबा घेऊन आठला बाहेर पडत होता.

नाटकाची ड्रेपरी तयार झाली, त्या दिवसापासून कलाकार आपली ड्रेपरी घालून तालीम करू लागले. घरी जाताना नरू शिरीषला म्हणाला

“मग आता नाटक एकदम स्टेजवर बागायचं?”, न्हाई रे बाबा, आता कुठलं तरी स्टेज घेणार भाड्याने तीन रात्रीसाठी आनी तिथं लाईट जोडून नेपथ्य उभ करून नाटकाच्या वेळी करयचा तशी प्रॅक्टिस करायची, त्यावेळी सर त्यान्च्या नाटकातल्या मित्रमंडळींना बोलावत्यात आनी त्यास्नी सूचना करायला सांगत्यात ‘.

“एका नाटकासाठी इतकी धडपड, मेहनत करायची?

“होय बाबा, ही स्पर्धा हाय, इथं बरीच नाटक होनार, मुंबई पुन्यातून परीक्षक येत्यात, त्याना आवडायला हवं… मग स्पर्धेत पयल दुसरं आलं तर अंतिम स्पर्धेला जायला मिळतं. त्यासाठी ही धडपड ‘.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भंगारवाले दादा आणि त्यांचे चुकणारे हिशेब… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ भंगारवाले दादा आणि त्यांचे चुकणारे हिशेब… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

जगभरात करोनाने थैमान घातलं, आणि जाता जाता त्याने आम्हालाही फटका दिला. आमच्या बाबांचा बळी घेतला त्यानं, आईची नोकरी त्यापूर्वीच गेलेली होती. आधीच हातावर पोट असलेले आम्ही अगदीच उघड्यावर पडलो. पैसे संपले, फी भरता आली नाही, माझी आणि माझ्या धाकट्या भावाची शाळा सुटली.

पुस्तकातल्या शिक्षणापेक्षा, जिवंत राहण्यासाठी हातपाय मारण्याचं शिक्षण जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं होतं.

मी आणि माझा भाऊ गल्लोगल्ली फिरून भंगार गोळा करायचो. प्लॅस्टिकच्या बाटल्या – पिशव्या, तुटक्या – फुटक्या, गंजलेल्या मेटलच्या वस्तू – पंखे, बादल्या, छत्र्या – जे मिळेल ते. आणि हे सगळं घेऊन आम्ही तुकारामदादांकडे जायचो – आमच्या एरियातील सगळं भंगार तेच विकत घ्यायचे.

तुकारामदादा – कधीकाळी पांढरा असलेला सदरा, पायघोळ लेंगा, डोक्यावर टोपी, दाढीचे खुरटे खुंट, रूक्ष – उग्र चेहरा. तुम्ही आणलेली रद्दी – भंगार तोलायचे, त्यांच्याकडच्या कॅल्क्युलेटरवर आकडेमोड करायचे, आणि हातावर पैसे टेकवायचे.

ना चेहऱ्यावर एखादं स्मितहास्य, ना अघळपघळ गप्पा.

जणू हसण्याचे किंवा बोलण्याचे पैसे पडत असावेत.

मी आणि भाऊ पहिल्यांदा त्यांच्याकडे पुठ्ठे, भंगार घेऊन गेलो तेव्हा फक्त ४८० रुपये टेकवले होते त्यांनी माझ्या हातावर.

तीन चार दिवस सतराशे साठ उकिरडे फुंकून गोळा केलेल्या कचऱ्याचे मोल – धड पाचशे रुपयेसुद्धा नव्हतं झालं.

दर दोन चार दिवसांनी आम्ही तिथं जायचो. दादा वजन करायचे, हिशोब करायचे, पैसे द्यायचे. तेच रूटीन.

पण मग मला एक गोष्ट लक्षात आली. कधीकधी त्यांची गणितं चुकायची, हिशेब बरोबर व्हायचा नाही.

आजचंच बघा ना, आजच्या माझ्या भंगाराचं वजन गेल्या वेळेपेक्षा कमी आहे, पुठ्ठे प्लॅस्टिक जास्त आहेत आणि लोखंड कमी आहे, पण दादांनी मला गेल्या वेळेपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. “भंगाराचे भाव वाढलेत, ” दादा स्वतःशीच बोलल्यासारखे गुरकावले.

पण किंमती वाढलेल्या नसायच्या, ना दादांकडच्या बोर्डावर, ना इकडच्या तिकडच्या भंगारवाल्यांकडे. मी चौकशी केली होती, माहिती काढली होती.

एकदा मला एक चपला ठेवायचा स्टँड मिळाला, बऱ्या अवस्थेत होता. एका बिल्डिंगमधले एकजण घर विकून निघून गेले होते, सोसायटीच्या आवारात स्टँड पडला होता, वॉचमनकाकांनी हाक मारून मला दिला होता तो.

मी स्टँड घेऊन दादांना दिला, “चोरीचा माल मी विकत घेत नाही, ” ते गुरगुरले. मग मी सगळी रामकहाणी सांगितली, “आईशप्पथ, खरं सांगतोय, ” म्हटलं.

दादांनी मला नीट निरखून पाहिलं. त्यांनी काय पाहिलं आणि त्यांना काय समजलं माहित नाही, पण तो स्टँड ते घेऊन गेले. आणि पाचशे रुपयांच्या चार कोऱ्या करकरीत नोटा घेऊन आले.

“दादा, याचे एवढे पैसे नाही होणार, ” मी चाचरत म्हणालो.

“हे तू ठरवणार का मी? माझ्या एका मित्राला अगदी असाच स्टँड हवा होता. ” ते म्हणाले.

ते खोटं सांगत होते. आणि हे आम्हा दोघांनाही माहित होतं.

मग मला जाणवलं की माझ्याप्रमाणेच इतरही काही मुलांच्या बाबतीत दादांची गणितं चुकायची, हिशेब चुकायचे. ती मुलंही माझ्यासारखीच कळकट मळकट, ठिगळं लावलेले कपडे घातलेली, अर्धपोटी असायची, आणि दादा अशा मुलांना पन्नासच्या जागी पाचशे रुपये द्यायचे – त्यांनी आणलेल्या भंगारात तांबं आहे, स्पेशल मशीन आहे, काहीबाही बहाणा सांगायचे.

आम्हाला पैसे हवेच असायचे. ते मुद्दाम जास्ती पैसे देत आहेत हे आम्हाला उमगायचे, पण आम्ही त्याबद्दल कधीच बोललो नाही, आम्हाला कळतंय हे दाखवलं नाही, पण आम्हाला माहित होतं.

आणि एक दिवस आई आजारी पडली. तिला दवाखान्यात भरती करायचं होतं, घरात नेहमीप्रमाणेच पैसे नव्हते. माझ्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जर्मन सिल्वरचा एक पेला घेतला होता, त्यावर झोकदार अक्षरांत माझं नाव कोरलं होतं.

आमच्या उरल्यासुरल्या घरातली ती शेवटची मौल्यवान गोष्ट होती.

काळजावर दगड ठेवून मी तो पेला दादांना दिला. त्यांनी मला परत सांगितलं, “चोरीचा माल मी विकत घेत नाही. “

“अहो, यावर माझंच नाव आहे. आईला दवाखान्यात घेऊन जायचंय, म्हणून विकतोय मी तुम्हाला हे, ” मी पोटतिडकीने सांगितलं.

आईला काय होतंय हे त्यांनी मला नीट विचारून घेतलं. एका कागदावर मला एका हॉस्पिटलचं नाव, पत्ता, एका डॉक्टरांचं नाव फोन नंबर लिहून दिलं, “मी पाठवलंय म्हणून सांग, ” म्हणाले, आणि तब्बल पाच हजार रुपये माझ्या हातावर ठेवले. “चांदीचे भाव आजच वाढले आहेत, ” ते म्हणाले.

पण जर्मन सिल्वर म्हणजे चांदी नसते. एवढं तर मलाही ठाऊक होतं.

चार दिवसांत आईची प्रकृती ठणठणीत झाली, डॉक्टरांनी पैसेदेखील घेतले नाहीत, “ते पैश्यांचं मी आणि दादा बघून घेतो, ” म्हणाले, एवढंच काय, पण आईला तिकडे दवाखान्यात नोकरीदेखील दिली.

मलाही एक पार्ट टाइम नोकरी मिळाली, आता मी आणि भाऊ रात्रशाळेत जाऊ लागलो. आता मला भंगार शोधत भटकावं लागत नव्हतं.

या गोष्टीला आता दोन तीन वर्षं होऊन गेली आहेत. गेल्या महिन्यात माझी नोकरी परमनंट झाली आहे. आज माझा पहिला पगार झालाय, आईसाठी नवी साडी घेतली आहे मी माझ्या पगारातून, धाकट्या भावासाठी शर्ट.

आणि माझ्या खिश्यात एक पाकीट आहे… तुकारामदादांसाठी.

मी त्यांच्या भंगाराच्या दुकानात गेलो. दादा असून तसेच आहेत. आणखी म्हातारे झाले आहेत. हालचाल थोडी मंदावली आहे. त्यांनी मला ओळखलं नाही.

“दादा! मला ओळखलंत? मी भंगार घेऊन यायचो इथं. दोन तीन वर्षांपूर्वी. तुम्ही मला जास्त पैसे द्यायचात. खूप जास्त. माझ्या आईचा हॉस्पिटलचा खर्च तुम्ही केला होतात.”

त्यांनी मान वर केली. त्यांनी मला ओळखलं होतं, पण तसं अजिबात न दर्शवता ते म्हणाले, “जास्तीचे पैसे? कोणी? मी दिले होते? “

“तुम्ही माझ्या कुटुंबाला वाचवलं. “

त्यांनी खांदे उडवले. “वजनकाटा जुना आहे. कधीकधी चुका करतो. आणि माझं वय झालंय, कधी कधी माझ्याकडूनही चुका होतात. “

मी माझ्या खिशातलं पाकीट त्यांना दिलं, १००० रुपये होते त्यात. “दादा, जास्त नाहीयेत, पण माझ्याकडून खारीचा वाटा. तुमच्या काट्याच्या चुकांसाठी. पुढच्या गरजू मुलासाठी. मी शक्यतो दर महिन्याला येत जाईन. “

त्यांनी ते पाकीट उघडलं, एकटक पाहिलं. डोळ्यात तरारलेलं पाणी बोटांनी निकवत त्यांनी मान डोलावली. मी निघालो.

अजूनही दादांचे हिशेब चुकतात, विशेषत: मेहनती, गरजू, गरीब मुलं असली की नक्कीच.

ते कोणाला फुकट काही देत नाहीत, कोणावर मेहरबानी करत नाहीत.

कष्ट करणारं कोणी असलं की मग मात्र त्यांचा हात देता होतो, त्यांचे हिशेब सोयीस्कररीत्या चुकतात आणि तुकारामदादांच्या या चुकणाऱ्या हिशेबांनी आमच्यासारख्या अनेक मुलांच्या आयुष्याची गणितं सुटतात.

(काल्पनिक)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अ _न_ मोल…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “अ _न_ मोल…” ☆ श्री मंगेश मधुकर

रात्री नऊच्या सुमारास फोन वाजला. पलीकडून आवाज “साहेब, नमस्कार”

“नमस्कार!! कोण? ”

“मी अनमोल, आपला जुना परिचित, स्मरणात आहे का? ”

“आहे तर, वा वा, बऱ्याच दिवसांनी.. ”

“आपली तीव्रतेनं आठवण आली म्हणून फोन केला. रागावू नका. ”

“अजिबात नाही. उलट आठवणीनं फोन केल्याबद्दल छान वाटलं”

“आपलं आरोग्य कसंयं”

“उत्तम, तुझं”

“चांगलयं. नियतीनं संधी दिली तर भेट होईल. धन्यवाद!! शुभ रात्री” एवढं बोलून फोन कट. थोडं विचित्र वाटलं पण अनमोल असाच आहे.

त्याची पहिली भेट आठवली. खूप महिन्यांपूर्वी आमच्या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून भरती झाला. गोल चेहरा, बारीक कापलेले केस, शिडशिडीत बांधा, उंचापूरा, लांब नाक, मोठाले डोळे आणि किंचित हसरा चेहरा असलेल्या अनमोलला भेटल्यावर काही विशेष वाटलं नाही पण जेव्हा त्यानं बोलायला सुरवात केली तेव्हा वेगळेपण जाणवलं. तो बोलीभाषेत न बोलता पुस्तकी बोलायचा. काम नीट करण्याविषयी सांगितल्यावर ताबडतोब विनम्रपणे नमस्कार करत तो म्हणाला“आपणास तक्रार करण्याची संधी मिळणार नाही याची पुरेपूर आणि शक्य ती काळजी घेईन. फक्त लोभ असू द्या. यथाशक्ती उत्तम प्रयत्न करीन. ” खरं सांगायचं तर मला त्याचं वागणं आणि बोलणं नाटकी वाटलं.

“गुड, ऑल द बेस्ट” मी शेकहँडसाठी हात पुढे केल्यावर नमस्कार करत म्हणाला “धन्यवाद”.

अनमोलचं व्यक्तिमत्व, वागणं, काम आणि बोलणं यात प्रचंड विरोधाभास होता. केवळ वाचलेले जड जड मराठी शब्द तो बोलताना सर्रास वापरायचा आणि तेच ऐकायला विचित्र वाटत होतं. इंग्रजी शब्द मात्र कटाक्षानं टाळायचा. कुणी ‘गुड मॉर्निंग’ म्हटलं की ‘आपला दिवस सुखकर जावो”असा प्रतिसाद द्यायचा. जरा हटके बोलण्यामुळं साहजिकच कंपनीत अनमोल चर्चेचा आणि चेष्टेचा विषय झाला. अनेकजण मुद्दाम त्याच्याशी बोलून मजा घ्यायचे. हे कळत असूनही अनमोलनं बोलण्याची पद्धत बदलली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर अतिसौजन्यानं वागणारा अनमोल कामाच्या बाबतीत एकदम ढिला. कायम मोबाइल नाहीतर वाचत बसलेला. कामाकडे फारसं लक्ष नसल्यानं वारंवार चुका व्हायला लागल्या तेव्हा पुन्हा पुन्हा समज दिली परंतु काही फरक पडला नाही म्हणून सिक्युरिटी मॅनेजरला कळवल्यावर दुसऱ्याच दिवशी अनमोल भेटायला आला. “खूप व्यस्त तर नाही ना. काहीसं बोलायचं होतं”

“आता नको. उद्या बोलू. महत्वाचं काम चालूयं”

“व्यत्यया बद्दल क्षमा असावी. माझ्याकडून कामात कुचराई झाली. अक्षम्य चुका झाल्या म्हणून तुम्ही दबाव टाकलात”

“कसला दबाव? काहीही काय बोलतोयेस. ”

“आमच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की तुम्ही नाराज आहात. ”

“तुझ्या कामात सुधारणा हवी एवढंच सांगितलं. दबाव बिबाव काही नाही. बाबा रे, चुकीचे शब्द वापरू नकोस. फार वेगळे अर्थ निघतात. असलं काही बोलण्यापेक्षा कामाकडे लक्ष दे. नाहीतर… ”मी पुढचं मुद्दामच बोललो नाही.

“जसा आपला आदेश, मनपूर्वक आभार आणि धन्यवाद”

“एक मिनिट, फक्त काम नीट कर एवढंच सांगितलंय. आदेश वगैरे काही दिलेला नाही. कळलं”माझा आवाज वाढला तेव्हा अनमोलचा चेहरा पडला. नमस्कार करून निघून गेला. मी कामात हरवलो.

 

संध्याकाळी घरी जाताना कळलं की दुपारीच अनमोल नोकरी सोडून गेला. धक्काच बसला. अनमोल असं काही वागेल असं अजिबात वाटलं नव्हतं. एकदम नोकरी सोडण्याइतकं काहीच घडलं नव्हतं. फोन केला पण त्यानं उचलला नाही. पुन्हा प्रयत्न केला तेव्हा फोन स्वीच ऑफ. त्यानं आपल्यामुळे नोकरी सोडली याचं वाईट वाटलं. भेटून समजावं असं वाटलं पण प्रयत्न करूनही भेट झाली नाही तेव्हा मीदेखील नाद सोडला. दोन महिन्यानंतर एका पुस्तक प्रदर्शनात अचानक अनमोल भेटला.

“अरे, भल्या माणसा, तुला किती फोन केले पण एकदाही उत्तर दिलं नाहीस. इतका रागावलास. ”

“मी व्यर्थ कशाला रागवेल. घरच्यांचा अतीव आग्रह, दबाव आणि चांगला पगार म्हणून ते काम स्वीकारलं. इच्छेविरुद्ध काम म्हणजे मनाला जाच. आता पुस्तकांच्या दुकानात काम करतोय. हे आमचंच प्रदर्शन आहे. इथं पगार कमी असला तरी काम आवडीचं आहे. माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं.”

“तू कामावर परत ये. मॅनेजरशी बोलतो”

“आपण दाखविलेल्या आपुलकीबद्दल धन्यवाद!! मला जीवनाचा मार्ग सापडलायं. ”

“म्हणजे”

“कायम पुस्तकांच्या सानिध्ध्यात रहायचं म्हणून या दुकानात काम करतोय. खजिन्याची चावी हातात आलीय असं समजा. वेगवेगळी पुस्तकं पहायला, हाताळायला, वाचायला मिळतात आणि पगारसुद्धा मिळतो सुख म्हणजे अजून काय असतं. ”

“नाहीतरी तुला वाचनाची आवड आहेच. ”

“आवड नाही वेड म्हणा. ”

“ते कसं”

“वडिलांची कृपा!! मजुरी करणारे वडील चौथीपर्यंत शिकले. इच्छा असूनही पुढं शिकता आलं नाही पण त्यांना वाचायचा नाद. रोज पेपर विकत घेऊन वाचायचे. वडिलांना पाहून मलाही वाचनाचा नाद लागला. माझी आवड समजल्यावर वडील रद्दीतून जुनी पुस्तकं आणून द्यायचे. कोणताही विषय वर्ज्य नव्हता. वाचत गेलो. त्यांच्या अपेक्षा होत्या पण माझं अभ्यासात फार डोकं चाललं नाही. कसाबसा दहावी पास झालो. आमच्याकडं पिढीजात गरीबी, आजूबाजूची परिस्थिती भयावह. भांडणं, मारामाऱ्या, शिव्या हे नित्याचच. परिस्थितीत फार सुधारणा झाली नसली तरी वाचनामुळं माझ्यात लक्षणीय बदल झाला. विचार सुधारले आणि बोलणं तर मी ठरवून बदललं अर्थातच त्यासाठी वाचनाचा खूप फायदा झाला. ”

“अच्छा म्हणजे मुद्दाम तू… ”

“म्हणून तर दखल घेतली जाते. *गर्दीत आपलं अस्तित्व दाखवायचं असेल तर वेगळेपणा पाहिजेच*”

“हुशारेस, फार पुढे जाशील” 

“आपल्यासारख्यांचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर काळजी नाही. पुन्हा नक्की भेटू यात. पुस्तकं जरूर घ्या. तुम्हांला विशेष सवलत द्यायला मालकांना आग्रह करतो. धन्यवाद!! ”अनमोलच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. निरोप घेऊन तो आपल्या कामाला गेला.

“बाबा, इज ही नॉर्मल”माझ्या मुलानं विचारलं.

“हंड्रेड पर्सेंट”

“मग असं का बोलत होते. ”अनमोलविषयी सविस्तर सांगितल्यावर मुलगा म्हणाला. “लकी मॅन”

“ काम तर सगळेच करतात. पैसे, प्रतिष्ठा मिळवतात. आवड मनाच्या खोल कप्प्यात बंद करून भलतंच काम करत राहतात. अनमोलच्या स्टाईल मध्ये बोलायचं तर *आवडीचं कामच उदरनिर्वाहाचं साधन असणं* यासारखे परमसुख नाही. प्रत्येकाच्या नशिबात हे नसतं. त्याबाबतीत हा खरंच सुदैवी. नावाप्रमाणेच *अ न मोल. *

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ऊब…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “ऊब…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

“ते चाॅकलेटी स्वेटरवाले का ? .. रोज सकाळी काठी टेकत, नाक्यापर्यंत जातात ते ? ते तुमचे वडील काय ?”

“हो…तेच ते.” जीवावर आल्यासारखं विन्यानं उत्तर दिलं.

.. तो चाॅकलेटी स्वेटर आता, विन्याच्या डोक्यात गेलेला.

त्या जुनाट चाॅकलेटी स्वेटरवाल्या म्हाताऱ्याचा मुलगा.

हीच आपली लायकी… हीच आपली ओळख.

भर थंडीत विन्या धुसफुसू लागला.

खरं तर आपल्या वडलांवर विन्याचा भारी जीव.

फार जपायचा त्यांना तो.

आई गेल्यानंतर तर फारच.

 

तो ,रूही , नील आणि त्याचे बाबा.

छोटा परिवार.

सुखी परिवार.

 

पण या सुखालाच नजर लागली होती.

 

हल्ली थंडी नकोशी वाटते विन्याला.

जरा कुठे गारवा आला की झालं..!

त्याचे बाबा कपाटातून, तो चाॅकलेटी स्वेटर बाहेर काढायचे.

आठ महिने तो स्वेटर ,कपाटात अंग चोरून बसलेला.

साचलेपणाचा कुबट वास यायचा त्याला.

बाबांना त्याचं काही वाटायचं नाही.

स्वेटर आणि ते!

पुढचा चातुर्मास.

 

नाईलाज म्हणून, आंघोळीच्या वेळा काढला जायचा तेवढाच.

बाकी कर्णाच्या कवचकुंडलासारखा, तो आपला बाबांच्या अंगाला चिकटलेला.

सलग वापरून वीण बरीचशी विरळ झालेली. रंगही उडालेला.

पण नाही म्हणजे नाही.

एकदा ऐकायचं नाही म्हणल्यावर काय ?

म्हातारी माणसं म्हणजे हट्टी मूल… समजूत पटायची नाही.

आता तर विन्याला वाटायचं , की बाबा आपल्या वयाचा गैरफायदा घेतात, छळतात मला.

 

खरं तर दोन वर्षांपूर्वी विन्यानं नवीन ओसवालचा स्वेटर आणलेला.

तसाच.

चाॅकलेटी.

 

बाबा जुनाट झालाय तुमचा स्वेटर. 

हा नवीन वापरा

फेकून द्या तो.”

 

बाबांनी नवा स्वेटर फेकून दिला.

 

मीही जुनाट झालोय.

मलाही फेकून द्या.”

 

काय बोलणार ?

 

विन्या नुसता आतल्या आत कुढत बसायचा.

उगाच लोकांना वाटायचं , 

हा आपल्या म्हातार्या बापाला साधा स्वेटरही घेवून देत नाही.”

लाज वेशीवर टांगलीय या स्वेटरनं.°

रूही आपल्या म्हातार्या सासर्याला खूप सांभाळून घ्यायची.

थंडी संपली की, स्वेटर गुपचूप ड्रायक्लीन करून आणायची. नीट घडी करून कपाटात ठेवायची.

 

पण…,

वाढत्या वयाला इलाज नाही.

बाबांच्या .

आणि स्वेटरच्याही.

 

बापलेकाच्या प्रेमाला ग्रहण लागलं होतं.

नात्याची लोकर ऊसवत चाललेली.

 

रूहीनं ठरवलं.

सप्टेंबरपासून सुरवात केली.

चाॅकलेटी रंगाचा गुंडा.

सतत विणत बसायची.

बाबांच्या लक्षात आलं.

“कुणासाठी गं ?”

‘नीलसाठी…’

 

नोव्हेंबर उगवला.

हुडहुडी थंडी.

रूहीचे तीन स्वेटर तयार.

 

नील.

विन्या.

बाबा.

तिघांचे डिट्टो.

 

एक हिवाळी रात्र.

जेवणं झालेली.

हाॅलमधे मिटींग.

रूहीनं बोलावलेली.

” आज मिटींग  बोलावलीय ती स्वेटरसाठी.

तुम्ही कुणीही  बिलकुल बोलायचं नाही.

फक्त ऐकायचं.

मी तीन स्वेटर विणलेत.

तुमच्या तिघांसाठी.

या थंडीत तेच वापरायचे.”

 

विन्या , बाबांना त्यांच्या स्वेटरवरनं बोललेलं, मला आवडायचं नाही.”

 

बाबा ,तुमच्या स्वेटरवरनं विन्याला कुणी बोललेलंही मला आवडणार नाही.”

मला माहित्येय.

बाबा , त्या स्वेटरमधे तुमचा जीव आहे.

सासूबाईंनी विणलाय तो.

म्हणूनच मीही स्वतः विणलाय हा.

तुम्हीही समजून घ्या.

आमच्या प्रेमाची ऊब तेवढीच आहे.

सासूबाईंइतकी.

तो जुना स्वेटर तुम्ही जरूर वापरा.

पाहिजे तर शर्टाच्या आतून.

पण त्यापायी आपल्या नात्याची वीण उसवता कामा नये.

त्या स्वेटरला जपूच आपण.

पण कधीतरी तो संपणारच आहे.

त्याच्या नसण्याची सवय करायलाच हवी.

पण सासूबाईंची आठवण सदैव आपल्याबरोबरच आहे.

त्या स्वेटरशिवायही, त्याची ऊब मिळणारच आहे.

 

तेव्हा… आता नई शुरूआत.

 

बस..!

 

मिटींग ओव्हर.

नो अर्ग्युमेंटस्.”

खरंच विषय संपला.

 

डबल कोटेड बाबा, गुलाबी थंडी एन्जाॅय करू लागले.

 

ते चाॅक्लेटी स्वेटरवाले तिघे म्हणजे , तुमचे सासरे ,तुमचे हे आणि तुमचा मुलगा काय ?”

कुणीतरी रूहीला विचारलं.

 

रूही मनापासून हसली.

हो…”

 

स्वेटरची ऊब तिलाही जाणवली.

नात्यांची घट्ट वीण.

थंडी वाजायचीच नाही.

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जय जय राम कृष्ण हरी… भाग – २ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ जय जय राम कृष्ण हरी… भाग – २ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(‘‘सगळे मान्यवर स्थानापन्न झाले… (हे शब्द कसे माहिती गण्याला? … पुन्हा कुजबूज) पण गण्या जणू आता तलवार परजून उभा होता… बुवाच भांबावून, अवाक् होऊन थोडे मागे सरकले होते.) 

इथून पुढे – – 

‘‘आणि तो क्षण आला बरं का मंडळी… त्या नववधूने रंगमंचावर पाऊल टाकले… नुकतीच ब्युटी पार्लर मधून मेकअप करून आलेली… (गण्याच्या मित्रांनी कपाळावर हात मारला. पण गण्याच्या डोळ्यासमोर फक्त ती सुंदर वधू होती आणि वाचेवर शब्दांचे उधाण)… आणि दागदागिन्यांनी नशखिशांत मढलेली ती वधू… तुम्हाला सांगतो… अगदी नक्षत्रासारखी सुंदर दिसत होती… सगळे उपस्थित डोळे विस्फारून तिच्याकडेच बघत राहिले होते. राजपुत्र राजेसाहेबांच्या शेजारीच उभे होते… जागेवरच खिळल्यासारखे. राजांची मात्र थोडी पंचाईत झाल्यासारखी वाटत होती… मनमोकळं बघूही शकत नव्हते ना ते…”

‘‘अहो गणोजी… हे किर्तन चालू आहे.. विसरताय का तुम्ही? ”… बुवांनी गणूला कोपराने ढोसलं… पण आता गण्याला भानावर आणणं कुणाच्या बापालाही जमणार नव्हतं.

– – अखेर बुवांनी जयघोष सुरू केला… ‘जय जय रामकृष्ण हरी’… आणि गणूने त्यांच्याकडे रागाने पाहिलं खरं…. पण स्वत:च्या उफाळणाऱ्या मनाला कसंतरी आवरलं आणि त्या मुलीचं वर्णन आवरतं घेऊन एकदाचं ते लग्न लावून टाकलं, आणि आपणहूनच म्हणायला लागला… ‘जय जय राम कृष्ण हरी’… 

… आणि मग त्याने बुवांना खूण केली… ‘‘आता बोला तुम्ही. ”… पण आता ही कथा पुढे कशी न्यायची ते बुवांना कळत नव्हतं. गण्या सलग बोलत होता… मध्ये ना अभंग… ना श्लोक… 

हे असे “अत्याधुनिक“ कीर्तन सुरू होऊन जेमतेम पाऊण तास झाला होता… त्यांना दीड तासाच्या कीर्तनाचे पैसे मिळाले होते… आता काय करायचं? .. गण्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांचा प्रॉब्लेम हुशार गण्याच्या लगेच लक्षात आला. ‘‘तुम्ही थांबा… मीच सांगतो…” त्याने बुवांना खूण केली… आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’… स्वत:च्या भसाड्या आवाजात म्हणायला सुरुवात केली.. श्रोत्यांची चुळबूळ चांगलीच वाढलेली त्याच्या लक्षात आली…

‘‘तर मंडळी, आता त्या लग्न सोहळ्यातून बाहेर या आणि पुढची कथा ऐका… ‘जय जय रामकृष्ण हरी’… आता फक्त पेटीवर वाजलं…

‘‘तर अशा रीतीने राज्याला पुन्हा सुस्वरुप तरुण अशी राणी मिळाली… राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसली. आता राजपुत्रानेही कारभारात लक्ष घालावे… निर्णय घ्यायला शिकावेत असा राजेसाहेब त्यांना आग्रह करायला लागले होते. खुशालचेंडू असला तरी राजपुत्र चांगलाच हुशार होता… त्याहीपेक्षा धूर्त होता. ‘राजेसाहेबांची नवी तरुण राणी ही माझ्या दृष्टीने फक्त राज्याची राणी आहे… ती माझी आई होऊच शकत नाही…मुळात मी तसं कधीच समजणार नाही’.. ही खूणगाठ तिला पहिल्यांदा पाहताक्षणीच त्याच्या मनात आपोआपच बांधली गेली होती. आणि नव्या राणीसाहेबांची मनोभूमिकाही याहून फार काही वेगळी नव्हती… ‘‘ 

.. गण्यामधला सुप्तावस्थेतला कथाकार जसजसा जागा होत होता तसतशी राजेंद्रबुवांची अस्वस्थता वाढत चालली होती. खरंतर गण्याच्या गोष्टीत पुढे काय होणार याची त्यांनाही खूप उत्सुकता होती, पण ते ती दाखवू शकत नव्हते… आणि श्रोते? ते तर विसरूनच गेले होते की ते कीर्तनाला आले होते. आता सगळा माहोल केवळ कथाकथनाचा होता… ‘तर मंडळी’ हा शब्दही अनावश्यक वाटायला लागला होता..

‘‘ तर आता राज्याची घडी पुन्हा व्यवस्थित बसली होती. नव्या राणीसरकारही मान-सन्मानाला चांगल्याच चटावल्या.. म्हणजे सरावल्या होत्या हो… भरजरी पैठण्या…शालू-शेले, पेलवणार नाहीत इतके दाग-दागिने या गोष्टींना तर फार झटकन् आपलंसं केलं होतं त्यांनी… मात्र राजपुत्र समोर आले की त्या का इतक्या गडबडून जातात, स्वत:ला विसरल्यासारख्या भांबावून का जातात हे काही त्यांना कळत नव्हतं, आणि बहुतेक राजपुत्रालाही…” गण्या क्षणभर थांबला.. स्वत:च भारावल्यासारखा… पण लगेच सावरला… आणि सांगायला लागला… 

‘‘काळ स्थितप्रज्ञासारखा त्याच्या गतीने पुढे चालला होता…” (पण हा आपला पूर्वीचाच गण्या आहे का या विचाराने त्याची मित्रमंडळी मात्र वेगाने अस्वस्थ होत होती)… क्षणभर थांबून गण्या पुन्हा बोलायला लागला… “ सगळं काही पूर्ववत् सुरू झालं होतं. राणीसाहेब गेल्याचं दु:खही मावळलं होतं. राजांच्या बरोबरीने राजपुत्र कारभारात लक्ष घालत होते… नव्हे आता तरबेज व्हायला लागले होते… आणि… आणि…” गण्या बोलायचा थांबला… ‘‘काय सांगू श्रोतेहो…(इथे गण्याने चेहेऱ्यावर त्याला अतीव दु:ख झाल्याचा मस्त अभिनय केला).. आणि अचानक एक दिवस राज्य पुन्हा एकदा दु:खाच्या गर्तेत कोसळलं … फक्त कोसळलं नाही…जोरात आपटलं…अचानक राजेसाहेबांचं निधन झालं… संपूर्ण राज्य हादरून गेलं… राज्याला सुतकी कळा आली… (आणि एकीकडे गण्याचं शब्दभांडार मात्र बहरत होतं… राज्यावर कोसळलेला दु:खाचा पहाड त्याने आपल्या ओघवत्या वाणीने उत्तमपणे जणू चित्रित केला.) राजेसाहेबांचा असा अचानक मृत्यू कसा झाला हा प्रश्न काही सुटत नव्हता… अनेक प्रकारे तपासून पहाणं कितीतरी दिवस चालू होतं. जनतेच्या विचारातून मात्र हा प्रश्न एव्हाना हळूहळू पुसला गेला होता. जनजीवन पुन्हा बरंच सुरळीत सुरू झालं. जगरहाटीनुसार राजपुत्राचा राज्याभिषेक केला गेला गेला, आणि जनतेला नवा राजा मिळाला….

… तर मंडळी, असेच काही महिने गेले आणि नव्या राजाच्या विवाहाची चर्चा सुरू झाली… वाढली… आणि अनपेक्षितपणे एक दिवस त्यांच्या विवाहाचा मुहूर्त घोषित केला गेला… सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलं होतं… संपूर्ण राज्यच सजवलं गेलं होतं…. युवराज्ञी कोण हे जरी तोपर्यंत गुलदस्त्यातच होतं तरी तिच्या स्वागताची तयारी मात्र जोरदार सुरू होती… दरम्यान राजांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे निदान जाहीर केले गेले होते, पण ते अगदी अनपेक्षित म्हणावं इतक्या झटकन् पडद्याआडही गेले होते…” गणू नकळत क्षणभर थांबला… आणि पुन्हा बोलायला लागला… ‘‘आणि अखेर ती विवाह घटिका समीप येऊन ठेपली. ”… गण्याची भाषा एव्हाना फारच ओघवती झाली होती… 

.. ‘‘आणि काय सांगू श्रोते हो… युवराज्ञी मंचावर दाखल झाल्या… कमालीच्या सुंदर… राजघराण्याच्या एका वेगळ्याच तेजाचं वलय त्यांच्याभोवती स्पष्ट जाणवत होतं… एक एक पाऊल हळुवारपणे टाकत त्या पुढे आल्या… राजपुत्रासमोर उभ्या राहिल्या… राजपुत्र भान हरपून त्यांच्याकडे बघत राहिले होते…” (आणि इकडे स्वतःच्या लग्नासाठी कमालीचा आतुर झालेला गण्या मात्र फारच भावविवश झाल्याचं त्याच्या मित्रांनी अचूक हेरलं होतं).. “ आणि.. आणि… बाकी सगळे उपस्थित…काय सांगू तुम्हाला.. अहो कधी चक्कर येतेय याची वाट पहात असल्यासारखे… प्रचंड संभ्रमित… स्वत:लाच चिमटा काढून बघत होते… आ वासून एकमेकांकडे बघत होते… ‘या आहेत युवराज्ञी…? या?? … काहीच महिन्यांपूर्वी महाराणी म्हणून स्वागत केलं होतं ना आपण यांचं? … आणि आता…” आता मात्र गण्या अतिशय भांबावून गेल्याचं बुवांच्या नेमकंच लक्षात आलं होतं…

‘.. जय जय राम कृष्ण हरी… जय जय रामकृष्ण हरी…’.. बुवांनी कसंबसं स्वत:ला सावरून जयघोष सुरू केला होता… तोल जाऊन पडता पडता गण्यानेही स्वत:ला सावरलं होतं… ‘ही गोष्ट मला माहिती होती? खरंच की…’ तो भंजाळून गेला होता. ‘ 

‘आता गण्याच्या या स्वप्नरंजनात पुढे आणखी सांगण्यासारखं काय असणार आहे? ’ या सूज्ञ विचाराने सगळे जाणते श्रोतेही एकएक करत जायला निघाले होते… 

… आणि बुवांसमोर दक्षिणेसाठी ठेवलेल्या तबकावर मात्र आज नाणी टाकल्याचा ‘खण खण’ आवाज येत नव्हता.. बुवा डोळे फाडून बघायला लागले तर काय.. चक्क नोटा फडफडत होत्या त्या तबकात… अजिबात आवाज न करता..

बुवा गजर थांबवत मागे वळले. खूश होऊन मुरलीधरापुढे हात जोडायला… पण त्याच्या गाभाऱ्याचे दार मात्र घट्ट बंद झाले होते… बहुतेक आतून… 

समाप्त

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जय जय राम कृष्ण हरी… भाग – १ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ जय जय राम कृष्ण हरी… भाग – १ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

दुपार कलत आली तशी त्या गावच्या जत्रेसाठी जमलेली गर्दी पांगायला लागली… ‘किसनपूर’ म्हणजे कृष्णपूर हे त्या पंचक्रोशीतलं त्यातल्या त्यात मोठं गाव. या गावात मुरलीधराचं एक बरंच जुनं आणि मोठं देऊळ होतं. दरवर्षी तिथे गोकुळ अष्टमीचा उत्सव दणक्यात साजरा केला जायचा. आणि त्यावेळी भरणाऱ्या जत्रेसाठी आजूबाजूच्या गावातले लोक आवर्जून यायचे. खूप गर्दी जमायची… जी दरवर्षी वाढतच होती. त्या देवळात संध्याकाळी कीर्तन होणे हा उत्सवाचा अविभाज्य भाग झाला होता. नारायणबुवा नावाचे एक प्रतिष्ठित कीर्तनकार जणू यासाठीच बऱ्याच वर्षांपासून नेमलेलेच होते. गावात जागोजागी तसे बोर्डही टांगले जायचे.

यावर्षीही सगळं काही रीतीनुसार सुरु होतं. गर्दी कमी झाल्यावर आत्ता कुठे लोकांचं त्या कीर्तनाच्या बोर्डाकडे लक्ष जायला लागलं…आणि लोक आश्चर्यचकित होऊ लागले. यंदा नारायणबुवांच्या जागी हे कुठलं नाव आहे… ‘राजेंद्रबुवा? ’.. आणि शेजारी एका तरण्याबांड कीर्तनकाराचा फोटो? कधी नव्हे ते कीर्तन ऐकण्याची उत्सुकता वाढल्याचं जाणवायला लागलं होतं.

देवळाच्या प्रशस्त सभामंडपाकडे आता श्रोत्यांची पावलं वळू लागली. चक्क गर्दी जाणवायला लागली. हमखास येणारी वृध्द माणसं तर होतीच, पण यंदा चक्क काही तरुण मंडळी कीर्तन ऐकायला (की राजेंद्रबुवांना बघायला?) तिथे आली होती.

ठरल्यावेळी साथीदार आले आणि राजेंद्रबुवा कीर्तनकाराच्या टिपिकल वेषात तिथे दाखल झाले… ‘‘आयला हा बुबा टी शर्ट-जीन्स मध्ये काय फाकडू दिसेल राव ”… गण्या न राहवून बोललाच, पण मित्राने चिमटा काढला आणि गण्या गप्प बसला.

‘‘जय जय राम कृष्ण हरी…” गाभाऱ्यातल्या मुरलीधराला आणि श्रोत्यांना नमस्कार करुन बुवांनी जयघोष सुरु केला… ठेका सुरू झाला… पुढच्या रांगेतली मुंडासी डोलायला लागली… पण १० मिनिटे झाली तरी बुवांचा जयघोष काही थांबेनाच… गण्या आणि कंपनी वैतागली आणि त्यांनी बुवांना खूण केली. बुवाही नाही म्हटलं तरी घाबरलेलेच होते… ‘कीर्तन शिकलो खरा आजोबांच्या हट्टापायी… पण आता एवढ्या लोकांसमोर…’ चतुर गण्याने त्यांची अवस्था नेमकी टिपली आणि ‘हं… करा सुरू…’ असं खुणेनेच सांगितलं… त्यांना त्यांच्या गुरुने परवानगी दिल्याच्या आविर्भावात..

‘‘तर मंडळी आज मी तुम्हाला एक वेगळीच कथा सांगणार आहे… ऐका हं… एक आटपाट नगर होतं…”..

.. ‘आता यात काय वेगळं आहे? ’ गण्याचा चेहेराच बोलला.

‘‘एव्हाना त्या नगराचं एक राज्य झालं होतं…” राजेंद्रबुवाही गण्याच्याच वयाचे… ‘‘त्या राज्याचा राजा ‘आदर्श’ म्हणावा असाच… प्रजेसाठी जणू देवच. राणी सरकारही तशाच… प्रजेवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या… कनवाळू उदार… त्यांना एक मुलगा होता… देखणा… उमदा… पण खुशालचेंडू म्हणावा असा… ‘जय जय रामकृष्ण हरी’ …” पुन्हा २ मिनिटं जयघोष… 

‘‘मग पुढे…? ” गण्याला काही गप्प बसवत नव्हतं.

‘‘तर मंडळी असं सगळं उत्तम चाललेलं होतं ते राज्य… दिवसागणिक लौकिक वाढत होता. आणि अचानक एक दिवस… ” बुवांच्या चेहेऱ्यावरचे हावभाव बदलले… अभिनय हा त्यांच्या पेशाचा एक अविभाज्य भाग होता ना… ‘‘मंडळी आणि अचानक एक दिवस अतिशय दु:खद बातमी हा हा म्हणता राज्यभर पसरली… राणीसाहेबांचे आकस्मिक देहावसान झाल्याची बातमी… आणि संपूर्ण राज्यावर दु:खाचा जणू डोंगरच कोसळला… ‘जय जय रामकृष्ण हरी’ ”

…. ‘हां इथे हे ठीक आहे’… गण्याने मान हलवली. श्रोतेही जरासे हळहळले…. ‘ पण आता पुढे बोला की बुवा…’.. गण्याने बुवांना खुणावलं. बुवांनाही एव्हाना सावरायला वेळ मिळाला होता…

‘‘त्यावेळी सगळ्यांवर काय परिस्थिती ओढवली होती ते काय सांगावं महाराजा … सगळं राज्य जणू आईविना पोरकं झालं होतं”… या वाक्याने मात्र गण्या जरा दुखावला होता… गप्प बसला… ‘‘ अहो राजेसाहेब विमनस्क अवस्थेत तास न् तास शून्यात बघत बसत होते. पण असं किती दिवस चालणार हो… राज्यकारभाराचा गाडा चालू ठेवायलाच हवा हे त्यांनाही कळत होतं. त्यांनी स्वत:ला कसंबसं सावरलं. राजपुत्रही एव्हाना सावरले होते. हळूहळू सगळं काही पूर्ववत झालं… ‘जय जय रामकृष्ण हरी’…” पुन्हा ठेका धरला गेला. बुवा नव्या कोऱ्या उपरण्याने घाम पुसत होते… गण्या उठण्याच्या बेतात होता… बुवांनी त्याला खुणेनेच बसायला सांगितलं आणि पुन्हा कथा सांगायला सुरूवात केली… ‘‘अहो काळ काही थांबतो का कुणासाठी? सांगा बरं…” बऱ्याच माना हलल्या… ‘‘आता राज्याला साम्राज्ञी हवीच, म्हणून राजेसाहेबांनी इतरांच्या आग्रहाखातर पुनर्विवाह करायला संमती दर्शविली… आणि वधू-संशोधन सुरू झाले…”.. ’पुन्हा जय जय राम कृष्ण हरी…’ 

पुढची कथा बुवांना आठवत नाहीये हे चाणाक्ष गण्याच्या लक्षात आलं… तो घाईने उठून बुवांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला… ‘‘तुम्ही दमलेले दिसता बुवा… साहजिकच आहे म्हणा… इतका वेळ सारखं बोलल्यावर दम लागणारच हो. मी तुम्हाला मदत करू का? म्हणजे कथा मी सांगतो, तुम्ही मधून मधून ‘राम कृष्ण हरी’ म्हणा…” आणि बुवांनी काही बोलायच्या आत गण्या बोलायला लागला…..

‘‘तर मंडळी आता तुम्हीच सांगा… आता राजेसाहेब वयाने इतके मोठे… म्हणजे राजपुत्र खरं तर लग्नाच्या वयाचा… मग त्यांच्या वयाला साजेशी बायको कशी मिळणार नाही का त्यांना? … म्हणजे तो काळ खूप वेगळा होता ना हो? म्हणून मग त्यांच्या आप्तांनी आणि मंत्रीमंडळानेही पुढाकार घेतला. राजघराण्यातली त्या वयाची वधू मिळणं शक्यच नव्हतं आणि एखादी तरुण राजकुमारी या म्हाताऱ्याशी…” गण्याने जीभ चावली… ‘‘अशा इतक्या वयस्कर राजेसाहेबांशी लग्न करायला कशी तयार होणार ना? आणि मी म्हणतो का म्हणून तयार व्हावं तिने? ” … बुवांनी गण्याला चिमटा काढला आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’.. मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. गण्याने स्वत:चा आवेग कसाबसा थोपवला आणि तो पुढे बोलायला लागला…

‘‘मग जवळच्याच गावातल्या एका गरीब माणसाची मुलगी सापडली. चांगली तरतरीत, नाकी डोळी नीटस होती, आणि हो, थोडीफार शिकलेलीही होती. नीट टापटीप रहाण्याची आवड उपजतच असावी हे लक्षात येत होतं. आणि बोलायलाही चटपटीत होती. भेटायला आलेल्या बड्या लोकांशी न घाबरता डोळ्याला डोळे भिडवून बोलत होती. अखेर वडलांना कर्जातून मुक्त करायचं या कर्तव्यभावनेने नाईलाजानेच लग्नाला होकार दिला त्या बिचारीने ”… गण्याचा घाम पुसून होईपर्यंत बुवा ‘रामकृष्ण हरी’ म्हणत राहिले. ‘आता पुढे मी सांगतो’, ते गण्याला म्हणाले, पण गण्यामधे उफाळून आलेला कथाकार काही थांबायला तयार नव्हता…

‘‘तर मंडळी, अशा तऱ्हेने राजेसाहेबांसाठी दुसरी वधू मिळाली. लग्नाचा दिवस ठरला… भव्य शामियाना… सुंदर सजावट… मोठा रंगमंच…” (‘रंगमंच? ’… श्रोत्यांमध्ये कुजबूज झाली…) पण गण्या थांबला नाही… ‘‘सगळे मान्यवर स्थानापन्न झाले… (हे शब्द कसे माहिती गण्याला? … पुन्हा कुजबूज) पण गण्या जणू आता तलवार परजून उभा होता… बुवाच भांबावून, अवाक् होऊन थोडे मागे सरकले होते.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नवीन अध्याय… (अनुवादित कथा) – मूळ हिन्दी लेखक : अज्ञात  ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ नवीन अध्याय… (अनुवादित कथा) – मूळ हिन्दी लेखक : अज्ञात  ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

उज्जैनची कडाक्याची थंडी आणि महाकालेश्वर महादेवांच्या शहरातून वाहणारी थंड हवा अजूनही रूपाच्या मनात एक विचित्र भावना निर्माण करत असते.

रूपा ही एक अतिशय शांत आणि सुसंस्कृत मुलगी होती जिचे लग्न उज्जैनमधील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाले होते. रूपाचा नवरा, केशव, या शहरातील एक मोठा धान्य व्यापारी होता. तो स्वभावाने थोडा कडक होता आणि शिस्त हाच घर चालवण्याचा एकमेव मार्ग आहे असे त्याला वाटत होते. त्याच्यासाठी, फक्त व्यवसायातील नफा महत्वाचा होता व त्याच्या ठायी भावनांची किंमत शुन्य होती.

रूपाची दिनचर्या पहाटे चार वाजता सुरू व्हायची. ती उठायची, क्षिप्रा नदीवरून वहाणाऱ्या थंड बर्फाळ वाऱ्यात आंघोळ करायची आणि नंतर ती मंदिर स्वच्छ करायला लागायची. थंडीमुळे तिचे हात सुन्न पडायचे, पण तिने कधीही तक्रार केली नाही.

केशवची आत्याही त्यांच्याच घरात राहत होती. तिचा स्वभाव फारच कडक होता आणि ती प्रत्येक वाक्यावर तिच्यावर डाफरत असे. रूपा तिचे प्रत्येक शब्दबाण मान खाली घालून झेलत असे आणि तरीही तिची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडत नसे.

त्या डिसेंबरमध्ये धुके इतके दाट होते की अंगणातले तुळशीचे रोपही अस्पष्ट दिसत होते. रूपाला तिच्या आईवडिलांच्या घराची सतत आठवण येत असे, जिथे तिची आई तिला गरम दूध देऊन उठवत असे. इथे तिला सर्वांची काळजी घ्यावी लागत असे.

केशव बऱ्याचदा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जात असायचा. रूपाला घरी अगदी एकटे पडल्यासारखे वाटायचे. आत्यांचे कठोर शब्द आणि केशवची उदासीनता यामुळे तिची अवस्था वाऱ्याच्या झोताबरोबर उडणाऱ्या वाळलेल्या पानासारखी झाली होती.

एकदा त्यांच्या घरी एका उत्सवाची तयारी सुरू होती. रूपा सकाळपासूनच स्वयंपाकघरात स्वयंपाकाला लागली होती. तूप आणि मसाल्यांचा सुगंध घरात दरवळत होता. मग, आत्यांनी एका क्षुल्लक गोष्टीवरून रूपाला सर्वांसमोर खूपच फटकारले.

रूपाचे डोळे अश्रूंनी भरून आले, पण ती काहीच बोलली नाही. शांतपणे, तिने तिच्या साडीच्या पदराने डोळे पुसले आणि परत कामाला लागली. पण त्या दिवशी, तिचं हृदय खुपच दुखावलं गेलं होतं. तिला याचं राहून राहून आश्चर्य वाटत होतं की तिचे अस्तित्व फक्त इतरांची सेवा करण्यापुरतंच मर्यादित आहे का?

त्या संध्याकाळी केशव परत आला तेव्हा त्याला दिसले की रूपाची तब्येत बरी दिसत नाहीये. पण तिच्या प्रकृतीबद्दल विचारण्याऐवजी त्याने फक्त एवढेच म्हटले की उद्या उत्सवासाठी पाहुणे येणार आहेत आणि सर्व तयारी वेळेपूर्वीच झाली पाहिजे. रूपाने फक्त मान हलवली आणि गप्प राहिली.

रात्री, जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपी गेलेले होते, तेव्हा रूपा छतावर एकटी उभी होती. आकाशात धुके पसरले होते आणि थंड वारा तिच्या चेहऱ्याला बोचत होता. तिला राहून राहून असं वाटत होतं की ती तिचे संपूर्ण आयुष्य असेच मुक्या बाहुलीसारखे घालवेल का?

मग तिने मनात एक संकल्प केला. तिला असं जाणवलं की आदर, प्रेम हे मागून मिळणार नाही, ते मिळवावे लागेल. तिला तिचे मौन सोडावे लागेल, पण सन्मानाने, कुणाचं मन न दुखावता.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाहुणे आले तेव्हा रूपाने तिच्या साधेपणाने, सेवाभाव आणि बुद्धिमत्तेने सर्वांची मनं जिंकली. तिने सहजतेने तिची शालीनता आणि व्यवहारकौशल्य दाखवले. तिने पाहुण्यांकडून कौतुकाची थाप मिळवली. आत्या आणि केशव त्यांच्या ठायी असलेल्या या मुक्या बाहुलीकडे पहातच राहिले. त्यांना पहिल्यांदाच जाणवले की रूपा ही फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाही तर तिचं स्वतःचंही काही अस्तित्व आहे.

जेव्हा आत्याने तिला पुन्हा टोमणे मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा रूपाने मोठ्या प्रेमाने आणि आदराने त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. ती म्हणाली, “आत्या, मोठ्यांचे आशीर्वाद तेव्हाच फळ देतात जेव्हा लहानांचा आदर केला जातो. “

संपूर्ण घर स्तब्ध झाले. केशवलाही त्याच्या पत्नीचे एक नवीन रूप दिसले. संपुर्ण घर एकहाती सांभाळत असलेल्या रत्नाच्या अस्तित्वाची त्याला जाणीव झाली. त्या रात्री पहिल्यांदाच केशव रूपासोबत बसला आणि शांतपणे तिचं मनातलं ऐकून घेतलं.

थंडी अजूनही तशीच होती, पण आता रूपाची खोली उबदारपणाने भरलेली होती, हिटरने नाही तर प्रेम आणि आदराच्या उबदारपणाने. आत्यांचा स्वर आता हळूहळू मवाळ होत गेला. तिच्या संयमाने, रूपाने त्या जुन्या घराचे वातावरण बदलून टाकले होते.

आता, जेव्हा जेव्हा रूपा क्षिप्रा नदीच्या काठावर जायची तेव्हा तिला वाऱ्याच्या झुळूकीत संगीत ऐकू येत असे. तिला कळले होते की धुके कितीही दाट असले तरी, सूर्यप्रकाशाचा एक किरण त्याला छेद देण्यासाठी पुरेसा असतो. तो किरण तिचा स्वतःचा आंतरिक आत्मविश्वास होता.

संवादाच्या अभावामुळे अनेकदा नातेसंबंधात कटुता येते. रूपाने ती पोकळी तिच्या गोडव्याने भरून काढली. केशव आता रुपाच्या स्वप्नांमध्ये आणि त्याच्या व्यवसायात अधिक रस घेऊ लागला. त्याने तिला कुटुंबाच्या व्यवसायाच्या कामामध्येही समावून घेतले.

उज्जैनचे रस्ते आता रूपाला परके वाटत नव्हते. तिला असे वाटले की तिने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा जुना भव्य वाडा आता तिला तुरुंगासारखा वाटत नाही, तर आपल्या स्वतःच्या घरासारखा वाटत होता. धुके दूर झाले होते आणि सूर्यप्रकाश आणखी सोनेरी वाटत होता.

आजही, थंडी पडली की रूपा तिच्या सासू आणि आत्यांसाठी आल्याचा चहा बनवते. पण आता तिच्यात मनात भीतीची नाही, तर जवळीकतेची भावना आहे. त्याग आणि संघर्षातून तिने तिचे स्थान मिळवले आहे.

शेवटी, रूपाला जाणवले की प्रत्येक माणसामध्ये एक शक्ती असते; फक्त ती ओळखण्याची गरज आहे. तिने तिचा खरा स्वाभिमान शोधला व आपला सन्मान राखला, हा तिचा सर्वात मोठा विजय होता आणि तिच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आता सुरु झाला होता.

 

मूळ हिंदी कथालेखक : अज्ञात

मराठी अनुवाद : मेघःशाम सोनवणे

नाशिक.

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विदाई… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ विदाई… ☆ डॉ. शैलजा करोडे

“भरली, भरली, भरली मंगलघटिका भरली “… तशी लग्न मंडपातील धावपळ वाढली. घोड्यावरून नवरदेव आला. त्याच्या स्वागताला वधुकडील मंडळी मंडपाच्या दाराशी मंगल कलश, पुजेचं ताट घेऊन उभी होती. आगत स्वागत झालं.

” वधूला आणा ” माझे काका म्हणाले, तसे मामांनी मला उचलून मंडपात आणले.

नवरदेवासह मला फुलांच्या राशिवर चालवत स्टेजवर आणले, डी जे वर गाणे वाजत होते ” बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है “

 

अंतरपाट धरला गेला व मंगलाष्टकं सुरू झाली.

: तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि ॥

या मंत्रोच्चाराबरोबर

गुरूजींनी दोन्ही हात वर नेले टाळी वाजवून वाजंत्रीला इशारा देण्यासाठी. अक्षतांची बरसात आमच्यावर होऊ लागली. आंतरपाट दूर झाला व मी वरमाला घालणार तोच अशोकला त्याच्या मित्रांनी वर उचलले. मी बावरले, आता कशी घालणार वरमाला. तोच माझा भाऊ व त्यांच्या मित्रांनी मलाही वर उचलले. मी आणखीनच गडबडले. मी वरमाला घालण्यासाठी वाकले, तोच अशोकच्या मित्रांनी त्याला मागे खेचले. या गडबड, गोंधळ, हसी मजाकमध्ये एकदाची मी अशोकच्या गळ्यात वरमाला घातली.

आम्हांला खाली उतरविले तसा मी निःश्वास सोडला. शालूचा पदर व शाल सावरत रूमालाने मी घर्मबिंदू टिपले. नजरेच्या कडेतून अशोक मला न्याहाळत होते, तशी नकळत मी ही लाजले. आरक्त गाल आणखी लाल झाले.

सप्तपदी, कन्यादान सगळे विधी पार पडले. जेवणावळी उठल्या. व प्रत्येक वधूला हळवा करणारा विदाईचा क्षणही आला. फुलांनी सजवलेली कार तयारच होती. आई बाबा, काका काकी, मामा मावशी माझ्या मैत्रिणी सगळ्यांचा निरोप घेऊन साश्रू नयनांनी मी लग्नमंडप ओलांडून बाहेर आले.

कारजवळ भाऊ उभा आपले दोन्ही हात पसरवून, मी रडतच त्याच्या कुशीत शिरले. डोळ्यातील पाणी थांबवत भाऊने कारचा दरवाजा उघडला मला विदाई देण्यासाठी. ” ताई, तुला काय भेट देऊ मी. ” ” अरे हा एवढा मोठा आनंद दिलास तू. मला लग्नाच्या बोहल्यावर चढवलंस. आणखी काय हवं आणि हे केवळ तुझ्यामुळे तर शक्य झालं, विद्येचं दान तू मला भरभरुन दिलंस “

मी सासरी निघाले, हळूहळू निरोप देणारे हात मागे पडले अन मी भूतकाळात शिरले.

“सोनाली, ए पोरी प्रकाशचा डबा भरलास काय? त्याची तयारी कर, आटप लवकर आणि शाळेला सोडून ये त्याला. सोनालीची आई रखमा बोलत होती.

” हो मी केलीय त्याची तयारी, नेते त्याला शाळेत “

“अन हे बघ, शाळेतून लवकर घरी ये, इकडे तिकडे भरकटू नकोस, घरातलं सगळं आवर आणि शेवंता आजीने बोलावलंय, त्यांची मोलकरीण चार दिवस रजेवर आहे, त्यांची कामं करशील, चार पैसे मिळतील तर घरखर्चाला कामा येतील. चल मी निघते कामावर “

प्रकाशचा हात धरून आम्ही दोघी भावंडं शाळेकडे चालू लागलो.

प्रकाशला सोडलं आणि माझी पावलं तिथंच थबकली. प्रार्थना सुरु होती 

” खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ” नकळत माझेही मन गुंतले. प्रार्थना संपवून मुले वर्गात केव्हा गेली मला कळलेही नाही. वर्गात गणिताचा तास सुरु झाला. आणि माझेही कुतूहल वाढले. मी वर्गाच्या खिडकीशी लपून तर मध्येच डोकावून गुरूजींनी शिकवलेले, ऐकत होते, पाहात होते.

” काय गं, सोनाली शेवंता आजीकडे इतक्या उशीरा का कामाला गेलीस? कोठे होतीस तू? “

” काही नाही आई, घरातलं काम आवरलं नी गेली की त्यांच्याकडे “

” खोटं नको बोलूस? उद्या वेळेवर जा त्यांच्याकडे ” ” हो आई, जाईन मी वेळेवर “

प्रकाशला शाळेत सोडले, पण आजही माझा पाय तेथून निघत नव्हता. आज इतिहासाचा तासात पानिपतचे तिसरे युध्द शिकवले जात होते, मराठा साम्राज्य व अहमदशाह अब्दालीचे अफगाण सैन्यात हे युध्द झाले. या युद्धात मराठ्यांचा दारूण पराभव झाला व अहमदशाह अब्दाली विजयी झाला. पण त्याला फारसा लाभ झाला नाही व नरसंहारात त्याचेही सैन्य बरेच मारले गेले.

संध्याकाळी आई घरी परतली ती संतापातच. ” कार्टे कुठे भटकत असतेस ग. आज शेवंता आजीकडे गेलीच नाहीस म्हणत फाडकन माझ्या मुस्कटात मारली. मी कळवळले. प्रकाश माझा भाऊ मध्ये आला, नको आई, ताईला मारु नकोस, ताई माझ्यासाठी शाळेच्या आवारातच होती. ” ” आवारात होती, तिथे काय करत होती ही ” ” आई, ताई माझ्या वर्गाच्या खिडकीतून अभ्यासाकडे लक्ष देत होती. तिलाही शिकायचंय आई, तिलाही येऊ दे ना शाळेत ” ” हिला शाळा शिकवू? मग घरातल्या भाकरी कोण भाजणार? तू? का मी काम सोडून घरी बसू. मी घरी बसली तर तुम्ही खाणार काय? हवा कि पाणी? हवा खाऊन, पाणी पिऊन जगता आलं असतं ना तर काहीच कमवायची गरज नसती पडली रे. पण खायला तर कमीत कमी दोन टाईम तर लागतंच. महागाई या प्रकारची, एकट्या तुझ्या बापाच्या कमाईत काय भागतं.? पुढे हिचं लगीन पण करावं लागील ना, कोठून आणायचा एवढा पैसा? आता शिक्षण, पुढे लगीन. बस झाली तुझी बडबड. तुला शिकवतोय आम्ही हेच भाग्य समज. जास्त शहाणपणा करू नकोस. ‘ प्रकाश गप्प झाला.

रात्री झोपतांना माझा दुर्मुखलेला चेहरा पाहून प्रकाश म्हणाला, तू काळजी करू नकोस ताई, रोज शाळेत काय शिकवलं ते मी तुला शिकवत जाईन. दुपारी माझी शाळा सुटली कि मी तुला शिकवत जाईन. आई बाबा दुपारी कामावर गेलेले असतात. मी तुला घरकामातही मदत करीत जाईन. ‘ ” पण प्रकाश मला परीक्षा कशी देता येईल, माझा जर शाळा प्रवेशचं झाला नाही तर ” ” ताई परीक्षा नाही देता येणार, पण मी घरी आल्यावर प्रश्नपत्रिका सोडवत जा ना. म्हणजे तुला प्रश्नांचे स्वरूप कळत जाईल, परीक्षा, गुणांकन, निकाल या गोष्टी तुझ्यासाठी नाही घडल्यात तरी तुझं ज्ञान तर वाढेल.

मी अठराव्या वर्षात पदार्पण केलं तशी आई बाबांना माझ्या लग्नाची चिंता सतावू लागली. स्थळ पाहणी सुरु होती, , रुप रंग जरी असलं तरी माझ्याकडे शिक्षण नव्हतं. मध्यंतरीच्या स्त्री भ्रूण हत्येमुळे सगळ्याच समाजातील मुलींची संख्या घटली होती, त्यामुळे मुलींच्या बाबतीत हुंडा, मान पान, रूप रंग या बाबी गौण ठरू लागल्या. फक्त मुलगी द्या, खर्च आम्ही करू म्हणणारी मंडळींचे प्रमाण वाढले होते.

अशोक चे स्थळ माझ्यासाठी सांगून आले. पण माझ्याकडे रूप रंग असले तरी शिक्षण नव्हते. अशोक शिक्षित व आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर होता. मुलगी फार शिकलेली नसली तरी त्याला अशिक्षित नको होती. रूपाने देखणा उंचपुरा, अशोक मलाही भावला होता, पण माझं शिक्षणचं आडवं येत होतं.

बैठकीत मंडळी बसली होती. ” मुलगी पसंत आहे, पण शिक्षण नाही, फार नाही पण नवर्‍याला व्यवसायात मदत होईल एवढं शिक्षण हवं होतं ” ‘ नमस्कार, मी तुम्हां सगळ्यांमध्ये लहान आहे तरी बोलण्याचं धाडस करतोय. माझी बहीण अशिक्षित नाही, तिला सगळं लिहिता वाचता येतं, हवं तर यावर्षी दहावीच्या परिक्षेला बहिःस्थ विद्यार्थिनी म्हणून फाॅर्म भरावा, ती नक्कीच पास होईल याची मी गॅरंटी घेतो, व लगेच पुढच्या वर्षी बारावीचीही परीक्षा देईल. “प्रकाश बोलत होता.

” मग हरकत नाही. मुलीचं शिक्षण होईल व तोपर्यंत ती 21 वर्षांचीही होईल. चालेल आम्हांला “

आणि आज प्रकाशने माझी विदाई केली होती. त्याच्यामुळेच तर मला शिक्षणाचं अनमोल रत्न मिळालं व अशोकसारखं सोनं लाभलं. तरी माझा भोळा भाऊ म्हणतो ताई तुला मी काय भेट देऊ “

सनईचे सूर वाजू लागले. स्वागताला सवाष्णी आल्या, तशी माझी तंद्री भंग पावली. ” ये सुनबाई, पहिला उजवा पाय टाक ” म्हणत कुटुंबातील जेष्ठ स्त्रियांनी माझा गृहप्रवेश केला, व मी एका नव जीवनाला सुरूवात केली.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares