मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तरुणाई… ☆ श्री श्रीरंग खटावकर ☆

श्री श्रीरंग खटावकर  

? मनमंजुषेतून ?

☆ तरुणाई… ☆ श्रीरंग खटावकर  ☆

मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!”

खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं, आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते. मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको, ज्याची जळते त्यालाच कळते, यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो, पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हाला काय होतंय खोटे दात काढायला.”

तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे, हे बघ” म्हणत बोळक उघडलं, तर टेडी बिअर सारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट! “दात दोनच असले, तरी कडक बुंदीचा लाडू खातो अजून.”

“खातोस की चघळतोस रे” ख्या ख्या, करून सगळे हसले.

“नान्या चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये.

“हाट, ते साखर फुटाणे होते देवळातले!”

असे मस्त संवाद चालू होते.

मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.

जवळपास पाच सहा महिने झाले असतील, मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही. फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने, भांडले होते.

“शिंच्या त्या मोदिने माझं पितळ उघडे पाडलन, बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो “

“मॅग, लापवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय?

एक दिवस अचानक सगळा च्या सगळा ग्रुप गैरहजर!

त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!

त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत?”

तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले.

” अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना!त्यालाच सोडायला गेलो होतो”

“कुठे??”

अरे कुठे म्हणून काय विचारतोस, स्वर्गात! ” त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे!” “काही म्हणा, मन्या भाग्यवान हो!

लेक अमेरिकेतून येतो काय, हाटेलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला, तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं!”

बाकी सगळे खिन्नपणे हसले. मी म्हंटलं, “तात्या इतकं लाईटली घेताय?”

“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून आपलं रुटीन चालू करायचं!”

एकदम काहीसं आठवून मला म्हणाले,” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला!”

मी डोक्याला हात लावला, ते बघून अजून एक आजोबा म्हणाले,” अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर, वर्षभरात अजून दोन चार तरी विकेट पडणार!” ख्या ख्या ख्या!

दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो, तेवढ्यात तात्यांनी हाक मारली,” ओ केटरर जरा इकडे या, आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची!”

“पार्टी?”

“अरे, नान्याच्या सेंच्युरी ला फक्त अकरा वर्ष उरलीत!”

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले,” एवढा कसा बावळट रे, आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे, फार काही नको, मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा, बारा प्लेट”

“बास एवढंच ना? दिलं!”

“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते, आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर, आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळी खाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना!”

संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो, आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.

“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!”

मला बघून सगळे थांबले, तात्या पुढे झाले, उपम्याची मुद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला, सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!

मी काहीश्या संभ्रमावस्थेत घरी आलो, आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला  असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल?

असायलाच हवी !

आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,

 

“कल खेल में, हम हों न हों

गर्दिश में तारे रहेंगे सदा

भूलोगे तुम, भूलेंगे वो

पर हम तुम्हारे रहेंगे सदा

रहेंगे यहीं, अपने निशाँ,

इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो

हम हैं वहीं, हम थे जहाँ

अपने यही दोनों जहां

इसके सिवा जाना कहाँ

जीना यहा मरना यहा,

इसके सीवा जाना कहा !!”

© श्रीरंग खटावकर

मो – +91 7039410869

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सावरकर आणि मी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “सावरकर आणि मी…” ☆ श्री सुनील देशपांडे

६ जानेवारी १९२४: रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अंदमानातून सुटून मायदेशी परतले. त्यानंतर त्यांचे पुढील वास्तव्य बारा तेरा वर्षे रत्नागिरी येथे पण नजर कैदेत होते.

आज ६ जानेवारी रोजी सावरकरांच्या सुटकेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यापूर्वी मी लिहिलेला  सावरकरांचा समाज सुधारक हा पैलू , प्रामुख्याने मला आवडलेला व त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात त्यांनी सर्व समाजापुढे मांडलेला आहे. याबाबतचा माझा लेख आज पुन्हा आठवला आणि आपल्यासमोर मांडतो आहे.

सावरकर आणि मी  –

 

त्यांची माझी प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही. याची देही याचि डोळा त्यांना प्रत्यक्ष कधी पाहिलेही नाही. तरीसुद्धा त्यांची माझी पहिली भेट झाली ती मी एसएससीला म्हणजेच अकरावीला असताना १९६५-६६ मध्ये.

हो, ही भेट होती त्यांच्या एका निबंधातून झालेली. त्या निबंधाचे नाव होते ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हो तेच ते,  विनायक दामोदर सावरकर. अकरावीला असताना मराठीच्या पुस्तकात ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हा आम्हाला धडा होता.  माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा तो एक जीवनाचा धडा होता. आमच्या मराठीच्या आपटेबाईंनी हा धडा जरी आम्हाला शिकवला होता, तरी तो माझ्या डोक्यात बसला तो माझ्या आईने मला शिकवला तेव्हा ! तसं पहायला गेलं तर माझी आई आणि सावरकर यांच्यात वैचारिक साम्य फार नव्हतं.  त्या धड्यामध्ये सावरकरांनी परमेश्वराची जी संकल्पना मांडली आणि जी माझ्या डोक्यात रुजली ती वस्तुतः आमच्या आईला मान्य असण्याचं काही कारण नव्हतं. पण तरीही स्वतःची मतं लादण्यापेक्षा त्या धड्यामध्ये सांगितलेला विचार उत्तम प्रकाराने समजावून सांगणे ही हातोटी आमच्या आईमध्ये असल्याने, त्या निबंधाचे माझ्या मनामध्ये जे बीज पेरलं गेलं त्यातून माझ्या अनेक विचारांची जडणघडण होत गेली.

त्या निबंधाची मांडणी मला खूप आवडली. ज्या विषयाची आपल्याला मांडणी करायची आणि जी बाजू आपल्याला पटवून द्यायची आहे, त्याच्या विरोधी बाजू पूर्वार्धात पूर्णपणे पटवून द्यायची आणि उत्तरार्धात त्या सर्व पूर्वार्धातील मुद्द्यांचे खंडन करायचे. अशा पद्धतीचे त्या निबंधाचे लेखन माझ्यावर प्रभाव पाडून गेले.

ईश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करणे ही त्या वेळेला मला क्रांतिकारी कल्पना वाटली. कारण त्या वेळेपर्यंत ईश्वर आणि त्याचं अस्तित्व, हे लहानपणापासून झालेल्या संस्कारातून आपण गृहीतच धरलेलं असतं.  तसं मी ते गृहीतच धरलेलं होतं. सावरकरांनी माझं ते गृहित मुळापासूनच उखडून टाकलं प्रथमच.

सावरकरांच्या म्हणण्यानुसार मनुष्याचा देव म्हणजे,  देव प्रसन्न व्हावा म्हणून माणसे जी काही कर्मकांडं करतात, ती कर्मकांडं करण्यासाठी भाग पाडणारा देव. हा देव त्यांना सर्वथा अमान्य आहे. नवसाला पावणारा देव, भक्ताच्या हाकेला ओ देणारा देव, भक्ताच्या नैवेद्याने प्रसन्न होणारा देव, भक्ताच्या नामस्मरणाने.त्याच्या हाकेला धावून जाणारा देव, किंबहुना देव नावाचं कोणतंही अस्तित्वच त्यांना (आणि अर्थात मलाही) अमान्य आहे.  त्यामुळे ज्याला अस्तित्वच नाही अशा देवाला प्रसन्न करून घेण्याची कोणतीही कृती ही निरर्थक आहे या मतावर ते ठाम आहेत. देवाने मानवासाठी काहीही निर्माण केलेलं नाही आणि देव मानवासाठी काहीही करीत नाही. या विश्वामध्ये नैसर्गिक प्रक्रियेने जे काही निर्माण झालं आहे त्या निर्मितीचा उपयोग मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी, सुखासाठी आणि उपयोगासाठी करून घेत असतो. ही कृती करीत असताना तो स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करतो, विकास करतो आणि या निसर्गकृती मागील कार्यकारण भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.  पुढील पिढ्यांसाठी संशोधनाचे विश्व अधिकाधिक विस्तारून ठेवतो.  या निसर्गाच्या अर्थात या संपूर्ण विश्वाच्या निर्मिती मागे काही कार्यकारण भाव असेल काही सूत्रबद्धता आणि नियमबद्धता असेल आणि त्या सर्वांना बांधून ठेवणारी शक्ती  असेल व त्या शक्तीलाच जर आपल्याला देव समजायचं असेल तर, त्या विश्वाच्या देवाचीच पूजा केली गेली पाहिजे. मनुष्याच्या देवाला पूर्णपणे नाकारलं पाहिजे. हा निसर्ग काही विशिष्ट नियमाने बद्ध आहे त्या नियमांची माहिती करून घेणे त्याचं सर्वतोपरी ज्ञान मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे त्यासाठी संशोधन कार्यात रममाण होणे हीच त्या विश्वाच्या देवाची पूजा असं ते मानतात. म्हणूनच त्यांनी कोणतेही पूजा पाठ आणि कर्मकांडांचं समर्थन केलं नाही. पुरस्कारही केला नाही. उलट त्याचा विरोध केला. निषेध केला. ज्या कृती मागे निश्चित कार्यकारण भाव नाही नैतिक विचार नाही आणि मानवतेच्या मूल्यांचा विचार नाही अशा सर्व गोष्टींना त्यांनी विरोध केला. मग त्या गोष्टी हिंदू धर्मात असोत वा दुसऱ्या कोणत्याही धर्मात असोत.  देवपूजेपासून देवतांचे स्तोम वाजवणाऱ्या मंदिरे, व्रतवैकल्ये, ज्योतिष शास्त्र, मुहूर्त, यात्रा, जत्रा, उत्सव या सर्वांना त्यांनी विरोध केला आहे. माणसा माणसांमध्ये भेदभाव करणाऱ्या चातुर्वर्ण्य, जातीयवाद अशा सर्व गोष्टींना कडाडून विरोध केला आहे. धर्मशास्त्राच्या आधारे समर्थन करत असलेल्या श्रृती आणि स्मृतींना त्यांनी नाकारलं आहे. त्यासाठी त्यांचे इतर बरेच साहित्य वाचले पाहिजे. किमान त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचले पाहिजेत. त्यांचे क्ष किरणे नावाचे त्यांच्या निवडक लेखांचे निघालेले पुस्तक ते तरी वाचले पाहिजे. खरं म्हणजे या निबंधानंतर एसएससी नंतरच्या सुट्टीमध्ये मी झपाटल्यासारखा समग्र सावरकर वाङ्मय वाचत होतो. माझ्या आठवणी प्रमाणे त्यावेळी पाच-सहा खंड होते. ते मी वाचून काढले आणि त्यांच्यासारखाच मी निरीश्वरवादी झालो.  सावरकर व आगरकर या दोघांनी हिंदू धर्म हा भटाभिक्षुकांचा धर्म नाही हे पोट तिडकीने ठामपणाने व ओरडून ओरडून सांगितले. हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे. त्याला रूढी आणि कर्मकांडांच्या बंधनात जखडून त्याचा मूळ जीव घोटण्याचा प्रयत्न करून त्या जीवनशैलीचा धर्म बनवला गेला. तिथेच आपल्या संस्कृतीच्या, जीवनशैलीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. सावरकरांचा हिंदू धर्म म्हणजे तथाकथित धर्म मार्तंडांच्या पाशात जखडलेला हिंदू धर्म नव्हता असे माझे मत झाले आहे. सावरकरांचे हिंदुत्व हे तथाकथित पारंपरिक सनातनी हिंदुत्ववादी लोकांच्या हिंदुत्वापेक्षा अत्यंत वेगळं होतं आणि ते तथाकथितांना पटण्यासारखं आणि पचण्यासारखं नव्हतं आणि नाही.  अर्थात या सर्वांचा विचार मांडण्यासाठी अजून एका लेखाचे प्रयोजन करावे लागेल असे मला वाटते. पण एकंदर सावरकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्यानंतर मला सुचलेल्या कवितेच्या ओळी पुढे देत आहे.

भावी काळ कसा असेल अपुला ठाऊक ना मानवा.

केंव्हा देव जगी करेल प्रलया माहीत नाही कुणा.

भूकंपातुन जीव आणिक किती जातील पृथ्वी तळी.

आगी आणिक वादळामधुनही जीवीतहानी किती.

देवा प्रार्थियले आम्ही जरि किती याहून नाही गती.

विश्वा वाचविण्या समर्थ जगती वैज्ञानिकाची मती.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अशी ही म्हातारपणाची तऱ्हा..!! – लेखक : कृष्णकेशव ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

अशी ही म्हातारपणाची तऱ्हा..!! – लेखक : कृष्णकेशव ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

परवा व्हाट्सअपवर म्हातारपणावर एक सुंदर कविता आली होती आणि त्यात दोन अगदी छान ओळी होत्या..!

🌹  तुम्हीच सांगा छंद

     जोपासायला वयाचा संबंध असतो का ?…

     रिकामटेकडं घरात बंद

     माणूस आनंदी राहतो का ?” 🌹

छंद जोपासायला वयाचा संबंध असतो की नाही हे मला माहित नाही पण माझे काहीं म्हातारे मित्र आणि त्यांचे अफलातून छंद बघितल्यावर ‘रिकामटेकडेपणा बरा पण छंद आवर’ असं काहीसं मला  हल्ली वाटायला लागलंय..

आता  हेच बघा ना..!      

आमच्या सोसायटीत पहिल्या मजल्यावर राहणारे कुंभकोणी काका..!

नेमकं मुलांच्या प्ले एरिया समोरचं त्यांचा फ्लॅट आणि मुलं सकाळ संध्याकाळ खेळायला आली की कुंभकोणी काका न चुकता गॅलरीत हजर..! किंबहुना गॅलरीत बसून मुलांवर डाफरत राहणे हा त्यांचा आवडता छंद..!!

“अरे किती आरडाओरडा करताय..खाली येऊन एकेकाला फटके दिले आणि बॉल ‘जप्त’ केला म्हणजे तुम्हाला समजेल..!”   

दिवसातून एकदा तरी हा डायलॉग सगळ्या सोसायटीला ऐकू येतोच.‌.

फिरायला जाणं अथवा सिनीयर कट्ट्यावर गप्पा मारत बसणं असल्या ‘टाईमपास’ गोष्टीत त्यांना इंटरेस्ट नव्हता..आयुष्य सगळं महापालिकेत ‘वसुली अधिकारी’ म्हणून गेल्यामुळे ‘जप्ती’ हा त्यांचा आवडता विषय..!

आणि चुकून एकदा कधीतरी बॉल त्यांच्या गॅलरीत येऊन पडला की कुंभकोणी काका तो बॉल घेऊन खाली जाईपर्यंत सगळी मुलं तेथून गायब झालेली असायची..!

पण कोणी बॉल मारलाय हे काकांच्या बरोबर लक्षात असायचं आणि मग त्याच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडीलांबरोबर कुंभकर्णी काकांची ‘ट्वेन्टी ट्वेन्टी’ सुरू व्हायची ती लवकर संपायची नाही..!

नाहीतरी कुंभकोणी काकांना सोसायटीची सगळी नियमावली तोंडपाठ असल्यामुळं त्यांच्याशी वाद घालणं अवघडचं..!

आणि मग तो बॉल ‘जप्त’  झालेला असायचा हे इथं सांगायला नकोच..!

(असे आत्तापर्यंत जप्त झालेले पंधरा वीस बॉल तरी कुंभकोणी काकांच्याकडे असतील.)

यंदा काहीं मोठ्या मुलांनी शेवटी चिडून त्यांचा दाराबाहेर ठेवलेला लाकडी शू-रॅक मध्यरात्री होळीत टाकायचं ठरवलं होतं..पण कुंभकोणी काकूंनी चार बॉल गुपचूप परत केल्यामुळें तो प्लॅन मुलांनी कॅन्सल केला..!!

धुमाळसाहेबांची मात्र वेगळीच तऱ्हा..! 

तहसीलदार या पदावरून ते निवृत्त झालेले.. त्यामुळे वरुन आणि (टेबल)खालून भरपूर कमावलेलं..त्यांनी तीन चार बॅंकेत एफ डी आणि सेव्हींग खाती उघडून ठेवली आहेत..

आणि रोज एका बॅंकेत जाऊन सेव्हींग खात्यात हजार दोन हजार भरणे किंवा काढणे हा त्यांचा आवडता छंद..!

एकदा मी त्यांना विचारलं..”कशाला रोज बॅंकेत जाता..एटीएम कार्डनं पैसे काढत जा..जाण्यायेण्याच्या त्रासपण होणार नाही.. आणि हल्ली ‘होम बॅंकींग’ची पण सोय आहे..!”

ते हसून म्हणाले ” अहो त्यात कसला आला त्रास.!

उलट तेवढाच माझा तास दोन तास छान वेळ जातो..!

एकदा कौंटरवर टोकन घेतलं की अर्धा पाऊण तास तिथं एसीमध्ये कोचवर बसून आराम करता येतो..काहीं बँकेत वाचायला पेपर पण ठेवलेला असतो.! 

आणि माझी मोठी डिपॉजीटस असल्यामुळे कधी कधी चहा पण मिळतो..! इथं घरी मुलगा व्यायाम करा, हे करा ते करा म्हणून सारखं मागे लागत असतो.!” (धुमाळ साहेबांनी जास्तीत जास्त वेळ बॅंकेत घालवता यावा म्हणून बॅंकासुद्धा जास्त गर्दी असलेल्या ‘सिलेक्ट’ केल्यायतं.!)

आता मला सांगा बॅंकांमधून कितीही एडव्हान्स टेक्नाॅलॉजी आली आणि  सर्व्हिस इंम्प्रुव्हमेंट झाली तरी धुमाळांच्या या ‘लॉजीक’पुढे तिचा काय उपयोग होणार..!

शेजारच्या वींगमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या शेंडेकाकांची तर वेगळीच गोष्ट..! 

आईवडीलांना वरच्या फ्लोअरवर जायला यायला त्रास नको म्हणून मुलानं कौतुकानं ग्राऊंड फ्लोअरला फ्लॅट घेतलेला..! पण शेंडेकाकांना रोज सकाळी  कोवळ्या उन्हात बसून पेपर वाचण्याची (गावाकडची) सवय..! आणि  खाली ऊन येत नाही म्हणून शेंडेकाका रोज सकाळी पाच पन्नास 

पायऱ्या चढून टेरेसवर जाऊन पेपर वाचत बसतात..! (तेवढाच पायांना व्यायाम होतो हे त्यांच अ‍ॅडिशनल लॉजिक.!) 

आता ह्याला काय म्हणणार ..? 

आणि शेवटी जे व्हायचं ते झालंच.. मागच्या आठवड्यात खाली उतरताना एक पायरी चुकली आणि पंधरा दिवसासाठी शेंडेकाकांना प्लॅस्टर घालून घरात बसावं लागल..! 

माझा एक मित्र आहे.. बॅंकेतून रिटायर झाल्यापासून त्यानं वेळ घालवण्यासाठी एक छंद लावून घेतलाय..

रोज सकाळी उठलं की वॉटस्अपवर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मयतीचे शोकसंदेश देण्याचा.. आणि तेही कवितेत..!! 

(कवि होण्याचं त्याच स्वप्न  राहून गेल होतं.) 

आणि तेवढ्यासाठी मित्रांचे, नातेवाईकांचे.. त्यांच्या भाऊबंदाचे असे आठ दहा गृप जॉईन केलेत.!  

आणि मग एखाद्या गृपवर कुणाच्या वाढदिवसाचा मेसेज दिसला रे दिसला की  शुभसंदेश आणि  याची कविता तयार..! 

“तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळणारा झरा.. 

सळसळणारा शीतल वारा.. 

पिवळ्या उन्हातील

रिमझिमणाऱ्या श्रावणधारा..

तुला  खूप खूप शुभेच्छा..!” 

प्रत्येकाच्या वाढदिवसाला त्याच्या काव्य प्रतिभेला असा नवीन नवीन बहर येत असतो.! 

आणि अगदीच कुणाचा वाढदिवस नसेल तर हा अमिताभ बच्चन ‘माधुरी दिक्षित मोदीजी अशा  सेलिब्रिटींचे वाढदिवस आपल्या मोबाईलवर उत्स्फूर्तपणे साजरा करत असतो..!! 

संध्याकाळी सोसायटी च्या सिनियर सिटिझन कट्ट्यावर येणाऱ्या आबा पवारांचा किरकिर आणि कुरकुर हा स्थायीभाव..! 

बायको असताना “आज भाजीच तिखट झाली.. चटणीचा भुगा झालाय, चहात साखर जास्त पडलीय” अशी सतत किरकिर करून सगळा संसार करपवलेला..! 

आणि आता कट्ट्यावर बसलं की  सुनेच्या तक्रारीचा पाढा वाचायला लागायचं.. (सूनेसमोर बोलण्याची काय बिशाद..?)   

“बर्वेकाका.. आजकालच्या सुनांना घरातल्या वडीलधाऱ्यांबद्दल अजिबात प्रेम आणि आपुलकी वाटत नाही.. तुला सांगतो आजपर्यंत एकही दिवस माझ्या सूनबाईनं मला समोर उभं राहून जेवायला वाढलं नाही.. डायनींग टेबलवर ताट वाढून ठेवलेलं असतं आणि ती कायम  बेडरूममध्ये बसून वॉटस्अपवर मेसेज बघत बसलेली असते..! सासऱ्याची अजिबात किंमत नाही..! “

“अरे तुझी सून निदान ताट वाढून तरी ठेवते.. इथं मला रोज सुनबाईचा जेवणाचा डबा डबेवाल्याकडे भरून द्यावा लागतो..! पण मी तुझ्यासारखं कुंथत नाही. 

मुलगा सून दोघही नोकरी करतात.. दिवसभर कष्ट करतात त्यामुळं हातपाय धड आहेत तोपर्यंत आणि आपल्याला जमेल तशी त्यांना मदत करायची..! आपलं ओझं होऊ द्यायचं नाही..म्हणून मी प्रेमानं ते करतो..! 

आणि हो.. तुझ्या सूनेची तरी काय चूक आहे..? ती समोर असली की तू तिच्या स्वयंपाकातलं अधिक उणं काढणार.. त्यापेक्षा समोर नसलेलं बरं..!” 

काकांनी आबा पवारांच्या वर्मावरच बोट ठेवलं.. 

बर्वेकाका म्हणजे तसे आनंदमुर्ती..! म्हातारपण कसं आनंदात जगावं वागावं याच प्रात्यक्षिकच..! 

पंचाहत्तरी ओलांडली तरी रोज सकाळी वॉकींग योगा.. त्यामुळं तब्बेत ठणठणीत..! घरची भाजी आणायला निघाले तरी सगळ्या शेजाऱ्यांना विचारत जायचे..”  बाजारात चाललोय.. कुणाला काहीं आणायचय कां..? येताना घेऊन येतो..” 

मागच्या महिन्यात त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं.. गृपवर त्यांनी मेसेज टाकला होता.. “मला नवीन गुडघे आले आहेत.. सगळे न विसरता बघायला आणि त्यानिमित्तानं चहाला या..!” 

तर अशी ही नाना  तऱ्हेची म्हातारी माणसं आणि त्यांच्या या अशा नाना तऱ्हा..!

पण त्यांचे हे असे तऱ्हेवाईकपणाचे  कंगोरे आपल्या नेहमीच्या सरळसोट आणि बोथट आयुष्यात एक सुखद टोचणी देत असतात आणि रोजच्या  जगण्यात नवनवीन रंग भरत असतात एवढं मात्र नक्की..!!

लेखक : कृष्णकेशव

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जिजाऊं’च्या लेकींसाठी… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ जिजाऊं’च्या लेकींसाठी… ☆ श्री संदीप काळे ☆

सकाळी, सकाळी रमेश चित्ते आणि दिलीप माहुरे दाजी यांचा फोन आला  म्हणाले, “दाजी एक वाईट बातमी आहे, अविनाश कदम यांची आई गेली.’’ मला एकदम धस्स झाले. “मी परवा येतो” असे सांगून फोन ठेवला. अविनाश कदम पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते. गेल्या बावीस वर्षांपासून त्यांचे आणि माझे नातेसंबध.

मी अविनाशला भेटायला ठरल्याप्रमाणे नांदेडला गेलो. चित्ते, माहुरे दाजी माझ्यासोबत होते. नांदेडमध्ये हनुमानगडजवळ जानकीनगर येथे अविनाश यांच्या घरी आम्ही पोहचलो. घरात अविनाश यांच्या आई कमलबाई यांच्या फोटोला मोठा हार घातला होता. काकूंचा फोटो पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. 

घरात अविनाशचे वडील नामदेव कदम गुरुजी, काका होते. आम्ही घरात बसलो. काकू कशा गेल्या हे काकांनी सांगितले. बोलता-बोलता काका म्हणाले, “अविनाशला त्याच्या आईपेक्षा प्रिय जिजाऊ स्मृती सृष्टी होती. त्याची आई कित्येक महिने दवाखान्यात पडून होती, त्याने आईची सेवा केली नाही.’’

काकांच्या बोलण्यातून सतत जिजाऊ सृष्टी, जिजाऊ सृष्टी, असे सारखे माझ्या ऐकण्यात येते होते. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न पाहून माहुरे दाजी म्हणाले, “गेल्या २० वर्षांपासून याच भागात असलेला ‘राजमाता जिजाऊ सृष्टी’ असा मोठा प्रकल्प शासन, प्रशासन, लोकसहभाग यांच्या मदतीने अविनाश उभे करीत आहेत. या ‘जिजाऊ सृष्टी’ने नांदेडच्या वैभवामध्ये मोठी भर घातली. जसा नांदेडमध्ये गुरुद्वारा सर्वांना प्रिय आहे, तसे या जिजाऊ सृष्टीचे सर्वांना आकर्षण झाले आहे.” माहुरे, चित्ते आणि कदम काका तिघेही ‘जिजाऊ सृष्टी’ बाबत भरभरून बोलत होते. 

मी काकांना म्हणालो, “अविनाश जिजाऊ सृष्टीकडेच गेलेत का?’’ काका म्हणाले, `हो’. आम्ही उठलो आणि `जिजाऊ सृष्टी’च्या दिशेने चालायला लागलो. 

अविनाश यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर भव्य `जिजाऊ सृष्टी’ साकारली होती. बाहेरून वाटत होते आपण एखाद्या किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय. आम्ही आतमध्ये गेलो, दूर नजर टाकली तर अविनाश तिथल्या झाडांना पाणी टाकत होते. काकांनी अविनाशला आवाज दिला. अविनाशचे लक्ष आमच्याकडे गेले. हातातला पाईप बाजूला फेकत अविनाश आमच्याकडे आले. 

माझ्याजवळ येताच अविनाशने मला मिठी मारली. आमच्याकडे पाहून काकांच्या डोळ्यात पाणी आले. आई गेल्याचे दु:ख आणि खूप वर्षांची भेट अशी दोन्ही कारणे त्या मिठीमागे होती.

आईविषयी बोलावे का जिजाऊ सृष्टीविषयी बोलावे, अशी गडबड अविनाशच्या मनामध्ये सुरू होती. अविनाशने माझ्यासोबत बोलायला सुरुवात केली ती `जिजाऊ सृष्टी’पासूनच. जिजाऊ सृष्टी, ती उभी करण्याची भूमिका, त्यातून मोठे काय होणार आहे. आईने सर्वांचा घेतलेला निरोप हे सर्व काही अविनाश सांगत होते.

पुरोगामी चळवळीमध्ये काम केलेल्या माणसांचे काम आकाशाला गवसणी घातल्यासारखे असते. अविनाशचेही तसेच होते. वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये काम केल्याचे अंग असलेल्या अविनाशने त्यांच्या `राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान’च्या माध्यमातून `जिजाऊ सृष्टी’चे स्वप्न साकारण्यासाठी पुढाकार घेतला. २० वर्षांच्या मेहनतीने अविनाशने `जिजाऊ सृष्टी’ अंतिम टप्प्याकडे नेण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. 

अविनाशचे वडील नामदेवराव एक आदर्श शिक्षक म्हणून सर्वपरिचित. जे काय उभे करायचे, ते पुढे चिरंतर टिकले पाहिजे, हीच शिकवण अविनाशला वडिलांकडून मिळाली. त्या शिकवणीतून उभी राहिलेली वास्तू `जिजाऊ सृष्टी’च्या रूपाने समोर दिसत होती. 

जिजाऊंच्या जन्मापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकापर्यंत सारा इतिहास इथे चित्राच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आला होता. या चित्राचे स्केच काढले होते चित्रकार दिलीप कदम यांनी. चित्र बनवली शिल्पकार व्यंकट पाटील यांनी. प्रत्येक चित्राच्या खाली जे ऐतिहासिक प्रसंग लिहिले होते ते श्रीमंत कोकाटे यांनी. `जिजाऊ सृष्टी’बद्दल काय सांगू आणि काय नाही, असे अविनाशला झाले होते.

अविनाशने माझा हात पकडला आणि सारी ‘जिजाऊ सृष्टी’ तो मला दाखवत होता. ती ‘जिजाऊ सृष्टी’ मला अशी सांगत होती जणू तिथल्या प्रत्येक वीट आणि वस्तूला अविनाशचा स्पर्श झाला आहे.

जिजाऊ चरित्राचा अभ्यासक असणाऱ्या अविनाशला जिजाऊ यांच्याप्रमाणे अनेक स्त्रिया, मुली घडल्या तर चिरंतर टिकणारे समाज परिवर्तन घडेल हे माहिती होते. त्यातूनच `जिजाऊ सृष्टी’ची निर्मिती समोर आली. प्रत्येक मुलगी, महिला जिजाऊ बनू शकते, या भावनेतून या सृष्टीची निर्मिती झाली. जिजाऊंची शौर्यगाथा, जिजाऊंनी घडवलेले शिवाजी महाराज, जिजाऊंची रणनीती, सामाजिकता, मूल्यधारणा, हे सर्व काही चित्रांच्या, देखाव्यांच्या  माध्यमातून दाखवण्यात आले होते.

महिला, मुली ज्यांना कुणाला राजमाता जिजाऊंच्या सच्च्या पाईक बनायचे आहे त्यांनी ‘जिजाऊ सृष्टी’त जाऊन तिथला अंगावर काटे आणणारा इतिहास एकदा डोळ्यांखालून घाला, तिथे असणाऱ्या जिजाऊंच्या पायावर डोके ठेवा, म्हणजे त्यांच्या मोठेपणाचे कण तुमच्या मेंदूला चिकटतील. अशी खासियत त्या ‘जिजाऊ सृष्टी’ची होती, हे मी अनुभवत होतो.   

एका मोठ्या हॉलकडे आमचे लक्ष वेधत काका म्हणाले, ही मुलींची अभ्यासिका आहे. या ‘जिजाऊ सृष्टी’चे सगळ्यात वैशिष्ट्य काय असेल तर ही मुलींची अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेसाठी माझा खूप आग्रह होता. या अभ्यासिकेमध्ये दीडशे मुली एकावेळी अभ्यास, जिजाऊ चरित्राचे पारायण करणार आहेत. जिजाऊ, सावित्री, रमाई असा सर्वांची आई म्हणून भूमिका बजावणाऱ्या मातांचे आत्मचरित्र, त्यांची माहिती देणारी, स्पर्धा परीक्षेची पुस्तके येथे असतील. किमान पंधरा हजार पुस्तकांचा ‘गोतावळा’ इथे असणार आहे.

अविनाश कदम ( ७९७२३७८०८४) म्हणाले, मी जे जे विषय या जिजाऊ सृष्टीच्या अनुषंगाने हेरले होते, ते ते विषय मला प्रत्यक्षात आणायचे होते. ते सर्व विषय मी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सर यांना सातत्याने सांगत गेलो. चव्हाण सर यांनी जिजाऊ सृष्टीसाठी माझ्याइतकीच जीव ओतून मला मदत केली. शासन, प्रशासन, नांदेड मनपा आणि लोकसहभाग या सगळ्यांच्या माध्यमातून या ‘जिजाऊ सृष्टी’ला हातभार लागला. काम पूर्णत्वास नेण्यासाठी आजही मदतीची गरज आहे. केवळ दिखावा नाही तर या जिजाऊ सृष्टीच्या माध्यमातून खूप काळ टिकणारी संस्कृती उभी राहावी. अनेक महिला, मुली येथे घडाव्यात हा उद्देश आहे, असे अविनाश मला सांगत होते.

`जिजाऊ सृष्टी’मधल्या एका झाडाखाली आम्ही जाऊन सगळेजण बसलो. मी हळूच आईचा विषय काढला, अविनाश कमालीचे हळवे, डोळे पुसत मला सांगत होते. माझी आई तिकडे दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत होती. तिचा आजार हाताच्या बाहेर गेलाय आणि ती आज ना उद्या सोडून मला जाणार आहे, याची कल्पना मला होती. तिच्या आजारपणाच्या काळामध्ये मी तिच्याजवळ थांबणे अपेक्षित होते, पण त्याच वेळेला `जिजाऊ सृष्टी’चे काम अधिक गती घेत होते. `जिजाऊ सृष्टी’ उभी करताना काय पाहिजे. त्याचे स्वरूप काय असले पाहिजे. ते जोपर्यंत आपण समोर उभे राहून करून घेत नाही तोपर्यंत ते निर्माण होऊ शकत नाही. हे माझ्या अनेक वर्षांच्या कामातून लक्षात आले होते. त्यामुळे आजारपणात मला आईला अजिबात वेळ देत आला नाही. एक जिजाऊ मला तिकडे सोडून जात होती आणि दुसरी जिजाऊ इकडे `जिजाऊ सृष्टी’च्या माध्यमातून निर्माण होत होती. 

आजारपणाच्या काळामध्ये आईने मी भेटावे, जवळ राहावे असा ध्यास घेतला. माझा ध्यास मात्र जिजाऊ सृष्टी होती. आई आणि `जिजाऊ सृष्टी’ हे दोन टोक होते. इकडे `जिजाऊ सृष्टी’ उभी राहिली. तिकडे आई जात राहिली. 

आई जाण्यागोदर दोन दिवस अगोदर मी आईला भेटायला गेलो. मी परत निघताना आईने माझा हात तिच्या हातामध्ये घेतला. माझ्या डोळ्यात डोळे टाकून ती म्हणाली, अविनाश सगळ्यांचे चांगले होईल असे बघ. स्वतःची काळजी घे. तुझी `जिजाऊ सृष्टी’ पाहायला मी खाली नसले तरी ती जिजाऊ सृष्टी मी वरतून नक्की पाहीन. तिच्या डोळ्यांतले पाणी खाली पडायच्या अगोदरच तिने ते पाणी पुसले. तिला वाटले असेल ती रडली तर मी कमकुवत होईन. मी `जिजाऊ सृष्टी’चे काम सोडून तिच्याकडेच बसेन.

मी आईपासून निघालो आणि तिसऱ्या दिवशीच आई गेली. भावुक झालेल्या अविनाशची माहुरे आणि चित्ते दाजी समज काढत होते. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. आम्ही अश्रूंभरले डोळे पुसून पुन्हा डोळे उघडल्यावर समोर `जिजाऊ सृष्टी’ होती. आम्ही जिजाऊ सृष्टीमध्ये अजून एक चक्कर मारली. 

रडून मोकळे झालेले अविनाश काळजीच्या मुद्रेमध्ये गेले होते. अविनाश म्हणाले, आतापर्यंत दोन कोटी रुपयांच्यावर यासाठी खर्च झालाय. पदरमोड, शासन, राजकीय मंडळी, नांदेड मनपा, अनेक दाते यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागले. ते काम अजून पुढे जाण्यासाठी किमान एक कोटी रुपयांची गरज आहे. हे एक कोटी रुपये गोळा कसे करायचे, हा माझ्यासमोर प्रश्न आहे.

मी अविनाशच्या खांद्यावर हात टाकत म्हणालो, “सुरुवात करत असताना तुमच्याकडे दोन रुपये नव्हते. झाले ना दोन कोटी रुपये जमा. हेही एक कोटी जमा होतील. नका काळजी करू, धडपड सुरू ठेवा. तुमच्या धडपडीतून पुढचे चारशे वर्षे हेवा वाटावा, असा इतिहास निर्माण होणार आहे.”

`जिजाऊ सृष्टी’त काढलेले प्रत्येक चित्र पाहिल्यावर, त्या चित्राच्या खाली लिहिलेला प्रत्येक संदेश वाचल्यावर अंगावर काटा उभा राहत होता. असे वाटत होते की किमान अजून पाच-सहा तास तिथेच बसून राहावे.

खूप मोठे काहीतरी निर्माण केले, याचा अभिमान जसा अविनाश यांच्या रोमारोमात होता तसा तिथली कलाकृती पाहताना आपण काहीतरी वेगळे अनुभवतोय याची जाणीव पावलोपावली होत होती.

अविनाश, नामदेव गुरुजी, काका यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. चळवळीत राहून आपण वेगळे काहीतरी केले पाहिजे आणि त्या वेगळेपणाला चिरंतर टिकणारी झालर लागली पाहिजे. असे काम प्रत्यक्षामध्ये साकार करणारा अविनाश माझ्यासमोर एक उत्तम उदाहरण होते. आपण काहीतरी शिकलो आणि त्यामधून पुढच्या पिढीसमोर एक वेगळा आदर्श आपण ठेवून जाणार आहोत. हे सारे काही अविनाश यांच्या कामांमधून पुढे आले होते. हल्ली आपल्याकडे पुतळे आणि स्मारक उभारण्याची स्पर्धा लागलेली आहे, पण त्या पुतळ्याने स्मारकाच्या माध्यमातून चिरंतर टिकणारे काहीतरी उभारणार आहोत, याचे उदाहरण फक्त नांदेडच्या अविनाश यांच्यासारखे एखादे सापडू शकते. बरोबर ना…!

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “२०२४ मध्ये…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “२०२४ मध्ये…” ☆ श्री मंगेश मधुकर

अजून एक वर्ष संपलं .. .. 

सरत्या वर्षाला निरोप देताना,

नवीन वर्षातसुद्धा आजूबाजूला, 

भावनांवर ताबा नसणारे,

कशानंही ‘ईगो’ दुखावणारे,

रागावर कंट्रोल नसणारे,

कायम अस्वस्थ असणारे,  

विचार न करता वागणारे,

जाईल तिथं स्वार्थ पाहणारे,

मुखवटे घालून बोलणारे,

नात्यांपेक्षा व्यवहाराला महत्व देणारे, 

स्वतःच्या आगाऊपणाचं कौतुक वाटणारे,

नेहमीच दुसऱ्यांच्या चुका दाखवणारे,

ईएमआय, इंटरनेट, इमोशन्स यात गुरफटून 

वर्षातले ३६५ दिवस टेंशनसोबत जगणारे,

सुशिक्षित असूनही अडाण्यासारखं वागणारे,

पैशाचा माज दाखवणारे,

फालतू गोष्टीवर वारेमाप खर्च करणारे,

सेलिब्रेशनसाठी निमित्त शोधणारे,

उथळ गोष्टीत आनंद मानणारे,

सार्वजनिक ठिकाणी मूर्खासारखं वागणारे,

निर्लज्जपणे वाहतुकीचे नियम तोडणारे,

गर्दीत बेफाम गाडी चालवणारे,

फोनवर बोलत ड्रायव्हिंग करणारे, 

स्वतःबरोबर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणारे,

कुठंही वेडयावाकड्या गाड्या पार्क करणारे,

रस्त्यावर अतिक्रमण करून दुकानं थाटणारे,

अशा दुकानातून खरेदी करणारे,

रस्त्यावर कचरा टाकणारे,

कुठंही पचकन थुंकणारे, 

अन्न फेकून देणारे,

डॉक्टर असूनही व्यापाऱ्यासारखं वागणारे,

दुकानासारखं हॉस्पिटल चालवणारे, 

वाढदिवस सार्वजनिक साजरा करणारे,

जागोजागी फ्लेक्स लावून स्वतःची टिमकी वाजवणारे,

फुटकळ कामाचे वारेमाप प्रदर्शन करणारे,

शोभत नसताना विचित्र फॅशन करणारे,

सोयीनुसार रूढी-परंपरा पाळणारे,

‘आमच्यावेळी असं नव्हतं’ हे सतत ऐकवणारे,

वेळ कसा घालवावा या विवंचनेत असणारे,

वय वाढलं तरी हेका न सोडणारे,

माणसांपेक्षा मोबाईलला जवळचा मानणारे, 

सतत फोनवर बोलणारे,

हेडफोडवर गाणी ऐकत चालणारे,

सोशल मीडियाला भुलणारे,

खाजगी गोष्टी चव्हाट्यावर मांडणारे, 

लाईक्स,कमेंट हेच आयुष्य मानणारे,

चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणारे,

राजकारणाचे खेळ आणि 

खेळातले राजकारण पाहत गप्प बसणारे,

अजूनही नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणारे,

आणि आपसात भांडणं करणारे,

आणि 

नव्या वर्षात यंव करायचं, त्यांव करायचं 

असं नित्य नियमानं ठरवणारे आरंभशूर,

 

…… असे मी, तुम्ही, आम्ही, आपण सारे एकाच माळेचे मणी……..

 

सो कॉल्ड मॉडर्न लाईफमध्ये 

अस्वस्थता, बेचैनी आणि मोबाईल सतत सोबत,

जावं तिथं गर्दी आणि गोंगाट, 

सगळी सुखं आहेत तरी मन शांत नाही 

माणसं असूनही किडा-मुंगीसारखं जगणं.

त्याच त्या चक्रात फिरत राहणं.  

स्वप्न,अपेक्षा पूर्ण करण्याच्या धावपळीत 

तब्येतीला फारच गृहीत धरलं जातयं.

डायबेटिस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक हे कायमचे सोबती 

फार लवकर आयुष्यात येऊ लागलेत… वेळीच काहीतरी करायला हवं.

नाहीतर दिवसेंदिवस हे वाढत जाणार.

जीव तोडून कमावलेला पैसा, 

जीव टिकवण्यासाठीच खर्च होणार, 

तेव्हा …… 

नंतरचा पश्चात्ताप टाळण्यासाठी थोडा विचार करा…  

नक्की काय चुकतंय हे शोधा….. 

 

समाजासाठी, घरच्यांसाठी आणि स्वतःसाठी…… 

2024 मध्ये…….फक्त कॅलेंडरच नाही …. तर काही सवयीसुद्धा बदलू या.

‼सर्व वाचकांना नवीन वर्षातला प्रत्येक दिवस मनासारखा, आरोग्य संपन्न जावो हीच सदिच्छा‼

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जागे होऊ या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ जागे होऊ या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

मला आज पहाटे ४ वाजता स्वप्न पडून जाग आली.  मी भारतातील सर्वात मोठ्या DLF मॉलमध्ये मोजे आणि  टाय खरेदी करू पाहत होतो.

 _मी आत गेल्यावर मला एक स्वेटर दिसला ज्याची किंमत 9000 रुपये  .स्वेटरच्या शेजारी एक जीन्सची जोडी होती 10000 रुपये .मोजे 8000 रुपये  !  आणि आश्चर्य  टाय ची किंमत चक्क 16,000/- 

मी विक्रेत्याच्या शोधात गेलो आणि घड्याळ विभागात एक सापडला

_तो एका माणसाला घड्याळ दाखवत होता.  225/- रोलेक्स घड्याळ.   4 कॅरेटची हिऱ्याची अंगठी.. रु. 95/- 

आश्चर्यचकित होऊन मी विक्रेत्याला विचारले “रोलेक्स घड्याळ रु. 225/- मध्ये कसे विकले जाऊ शकते? आणि  स्वस्त मोजे रु. 8000/- ला कसे विकले जाऊ शकतात”? 

तो म्हणाला “काल रात्री कोणीतरी दुकानात घुसले आणि त्याने प्रत्येक गोष्टीचे price tag बदलले”.

“आपले पण बहुधा असेच झालेले आहे…प्रत्येकजण गोंधळलेला आहे.  “ते कमी किमतीच्या गोष्टींसाठी खूप किंमत द्यायला तयार असतात आणि मोठ्या किमतीच्या गोष्टींसाठी खूप कमी पैसे देतात”

“खरंच काय मौल्यवान आहे आणि काय नाही हे त्यांना कळत नाही” .  मला आशा आहे की आम्हाला लवकरच योग्य किंमतीचे टॅग परत मिळतील …. “

मी चकित होऊन उठलो आणि गोंधळलो आणि तेव्हापासून विचार केला…

_कदाचित आपलं आयुष्य या स्वप्नासारखं असेल.

_कदाचित कोणीतरी, काहीतरी आपल्या आयुष्यात शिरले आणि प्रत्येक गोष्टीची किंमत (VALUE) बदलली.

कदाचित  स्पर्धा, पद, पदव्या, प्रसिद्धी, पदोन्नती, शो-ऑफ, पैसा आणि शक्ती यांचे मूल्य खूप अधिक !

…आणि आनंद, कौटुंबिक, नातेसंबंध, मन:शांती, समाधान, प्रेम, ज्ञान, दयाळूपणा, मैत्री, संस्कृती धर्म ईश्वर स्वतःचे दिव्यत्व… यांची किंमत कवडी इतकी ….

कदाचित आपण सर्वजण कमी अधिक प्रमाणात हे स्वप्न जगत आहोत…

जिथे खरी किंमत चुकवायला पाहिजे तिथे आपण खूप कंजूसपणा करीत आहोत आणि ज्याला कवडीची पण किंमत नाही त्याच्यावर आपले सर्वस्व उधळित आहोत

मला आशा आहे…… आपण जागे होऊ,….  योग्य वेळेत.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपल्याला असं जगता येईल? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ आपल्याला असं जगता येईल? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

ऑफीस सुटल्यावर घरी   निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते. 

पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.

आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते.  माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.

“बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना” आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले. 

एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.

आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.

“ओ आजोबा नीट घेऊन खा की?” मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे. 

तेवढ्यात  मागून एक माणूस स्कुटीवर  आला. 

“काळजी करू नकोस, बाबा सापडले!!” कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि  त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!

त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली. 

“काय बाबा आज पाणीपूरी का?         खायची का अजून???”

त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले. 

“हे आजोबा कोण आहेत तुमचे?” मी विचारले.

“वडील आहेत माझे.” त्याचे उत्तर.

“त्यांना काही त्रास आहे का?” माझा पुढचा प्रश्न.

“हो त्यांना अल्झायमर आहे.”

अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता. 

” मग हे आजोबा असे कुठेही जातात का?” 

” हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर  चालत आलेत.”

मी शॉकच झालो. 

“मग तुम्ही यांना शोधता कसे?”मी विचारले.

“आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना  मी.”

“असे वारंवार होत असेल” मी आश्चर्याने विचारले. 

तो स्मितहास्य करून म्हणाला “महिन्याला एक दोन वेळेस”

“काळजी घ्याआजोबांची ! बाप रे काय हा वैताग” मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, “बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं.”

त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.              

खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की  कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.

उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो…                 

खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चीssssssssअsssssर्सssss-…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “चीsssssssssssssर्सssss…”🍾 ☆ श्री सुनील देशपांडे

तो म्हणाला 

“हे बरोबर नाही नववर्षाचं स्वागत करायचं नाही

आपलं वर्ष गुडीपाडव्याचं “त्यां”चं अनुकरण करायचं नाही”

मी म्हणालो

“ आजची तारीख काय?”

“३१ डिसेंबर”

“आजची तिथी काय?’

“माहीत नाही”

“मग आपलं नक्की काय?”

मला रोजची तारीख माहिती

माझं सगळं नियोजन तारखेवर

म्हणून माझं नववर्षही तारखेवर.

मग पाडवा? 

तो ही माझा आहेच.

मी आनंदाचा प्रवासी,

जिथे आनंद तिथं मी.

शादी कीसीकी हो, अपना दिल गाता है.

ही माझी वृत्ती, हा माझा पिंड.

खरं तर प्रत्येक सकाळ ही,

एका नववर्षाची सुरुवात असते.

सवेरेका सूरज हमारे लिये है,

असं म्हणणारा कलंदर मी.

पण रोज साजरा करायला

जमतंय कुठं? जमलं तर ते ही करावं.

कुणाच्याही आनंदात आपला आनंद शोधावा.

आनंदाला ना जात ना धर्म ना देश.

म्हणूनच,

आनंदाचे डोही आनंद तरंग…

असं म्हणत मित्रांनो साजरा करूया

निखळ आनंद, 

मग तो कुणाचा का असेना,

आणि कधीही का असेना !!!

तर चीssssssssअsssssर्सssss

हॅप्पी    न्यू    इयर !!!!!

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खरं म्हणजे संकल्प ही संकल्पना माझ्या स्वभावाशी कधीच जुळली नाही. संकल्प वगैरे करण्याच्या भानगडीत मी फारशी पडतच नाही. मूळात कुठलाही संकल्प ,योजना, काही ठरवणं हे आजपासून नसतच..ते असतं ऊद्यापासून…म्हणजे असं.”आता ऊद्यापासून मी हे नक्की करणार हं..!!”आणि तो ‘उद्या” कधीच ऊगवत नाही.Tomorrow has no end-Tomorrow never comes.

असो,तर तमाम संकल्प कर्त्यांचा आदर ठेऊन मी खात्रीपूर्वक  म्हणेन,संकल्प करुन मनाची फसवणुक करून घेण्यापेक्षा,रोज रोज हाती येण्यार्‍या पत्त्यांचाच चांगला डाव मांडावा. वर्ष संपले म्हणजे नक्की काय होते. कॅलेंडरचे शेवटचे पान उलगडते. आणि नव्या वर्षाचा नवा आकडा समोर येतो. बाकी कालचा दिवस संपला आणि आजचा दिवस सुरु झाला. नेहमीप्रमाणेच.

संकल्प ही एक सकारात्मक संज्ञा आहे खरी.पण नव्या वर्षासाठी माझा हा असा व्यापक संकल्प आहे.

एक तणावमुक्त आयुष्य जगायचं. ठरवून केलेल्या संकल्पाचंही दडपण नको. माझा हाच संकल्प असतो की संकल्पच करायचा नाही .मुक्त मनाने मस्त जगायचं. अटकलेल्या वृत्तीलाच निवृत्त करायचं.

जाग आली की सकाळ आणि झोप आली की रात्र.

इतकं साधं सुबक सुलभ !या ऊतरंडीवरच्या आयुष्याचं  हेच गणित.

कुणाचा त्रास करुन घ्यायचा नाही अन् ज्यात त्यात

लुडबुड करुन कुणाला त्रास द्यायचा नाही. *जगा आणि जगू द्या*हेच मूलतत्व.

भूतकाळात जास्त रमायचं नाही. विशेषत: मनाला टोचणार्‍या, वेदना देणार्‍या ,कष्टी करणार्‍या आठवणीत रेंगाळायचं नाही. फक्त क्षण आनंदाचे जपायचे.

शक्यतो सगळ्यांना माफच करुन टाकायचं. मनात नको राग..नको वैर नको सूडबुद्धी..एक माफीनामा आपणही सादर करायचा. त्यासाठी ऊशीर नको.

सांगायचं राहूनच गेलं ही रूखरूख नको.

नव्या पालवीला बहरु द्यायचं. जुनं थापत नाही बसायचं. जे अपुरं, तुटलेलं,ते यथाशक्ती सांधण्याचा प्रयत्न करायचा. मनापासून, अगदी झोकून.

असे दिगंताला भिडणारे पण तरीही बद्ध नसलेले

स्वैर संकल्प माझे. वर्तमानात जगायचं. आनंदाचे दवबिंदु वेचायचे.

आनंद द्यायचा. आनंद घ्यायचा.

येणारे हे नवे वर्ष तुम्हा आम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जनाबाई… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ जनाबाई… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सकाळी साडेसहाची वेळ .

शांत वातावरणात गाण्याचे सूर कानावर पडले.

 

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा……….

कुणीतरी रेडिओ लावलेला असावा. इतक्या सकाळी कधी आवाज ऐकू आला नसल्याने तिकडे लक्ष गेले.

हळूहळू आवाज बंद झाला.

 

दुसरी दिवशी पण

 सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले… ऐकू आले

तिसऱ्या दिवशी फिरायला निघाले तेव्हा आवाज कुठून येतो ते समजले.

 

 एक पंचावन्न.. साठ वर्षाच्या बाई रस्ता झाडत होत्या.

 त्यांनी मोबाईलवर गाणी लावली होती. 

आपल्याच तंद्रीत त्या गाणी ऐकत काम करत होत्या.

 

“ ताई तुम्ही नवीन आलात का? “

“ हो बदलीवर आले आहे आठ दिवसाच्या.. माझी मैत्रिण इथं काम करायची तिला बरं नाही म्हणून मी येत आहे. “

 

“ असं का? तरीच आधी कधी तुम्हाला पाहिलं नव्हतं. नीट झाडलं जातंय ना? “

 “ हो हो त्याचं काही नाही देवाची गाणी ऐकू आली म्हणून विचारलं.”

 

“ अहो मुलीनी मोबाईल मध्ये गाणी  भरून दिली आहेत. कसं लावायचं ते शिकवलं आहे 

 विठुरायाची गाणी ऐकतं.. काम कधी होतंय समजतच नाही बघा …..आणि शीण पण वाटत नाही……”

“ भजनाला जाता का?”

“ कुठलं  हो…..मला खूप आवड आहे पण वेळच भेटत नाही बघा…माझी आई गाणी  म्हणायची..

 आता आमच्या घराजवळ विठ्ठलाचे देऊळ आहे तिथे ही गाणी लावतात ..”

 

“ हो का? तुमच्या लेकीला गाण्याचे हे चांगल  सुचलं….” त्या हसल्या आणि कामाला लागल्या..

मला जनाबाईचा अभंग आठवला

 

झाड लोट करी जनी

केरभरी चक्रपाणी 

पाटी घेऊन या शिरी

नेऊन  टाकी दूरी 

ऐसा भक्तिसी  भुलला

नीच कामे करू लागला 

जनी म्हणे विठोबाला

काय उतराई होऊ तुला

 

विठुराया तु जनीला मदत करत होतास हे तिच्या अभंगातून आम्हाला माहित आहे.

पण खरं सांगू इतकी वर्ष लोटली तरी आजही तू भक्तांच्या  तनामनात आहेसच…

नाम रूपानी…

 

तुझे अभंग आजही मनाला उभारी देत आहेत. 

संकटात साथ देत आहेत. काम करताना भक्तांना कष्ट  जाणवत नाहीत …

तुझ्यावर अलोट प्रेम करणारी जनी आज मला दिसली रे या ताईंमध्ये….

 

खरंच  ….विठुराया जनीची कामे निश्चितच करत असेल..

 

असं होतच असेल…. 

फक्त श्रद्धा आणि दृढ विश्वास हवा ….. जनी इतका…

मग तो येतोच मदतीला…  सगळं सोपं करतो .नीट लक्ष दिल की ध्यानात येते की प्रत्यक्ष जगतानाही अशीच आपल्याला पण पांडुरंगाची साथ असते … त्याची रूपे वेगवेगळी असतात. ती एकदा दिसायला लागली की मग सगळीकडेच तो दिसतो….

….. आता ठरवलं आहे सवयच करून घ्यायची रोजच्या जगण्यात त्याला बघायची…

…. मग  तो विठुराया  दिसेल….. पंढरपूरला न जाता पण…… आपल्या आसपास…

…. आज  कशी मला जनी भेटली तसाच….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print