मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नेमकी तारीख आठवत नाही, पण तीन वर्षांपेक्षा जास्त झाले असतील, दिवस मात्र पावसाळ्याचेच…!

सकाळपासून आकाश निरभ्र होते, सोबत मी रेनकोट नेला नव्हता.

भिक्षेकर्‍यांचे सर्व काम आटपायला त्या दिवशी चार वाजले, पोटात अन्नाचा कण नव्हता.

आकाश अजूनही निरभ्र होते, आता पटकन घरी जायचे आणि काहीतरी खायचे असा विचार करून मोटारसायकलवर बसलो.

… दोन लोक छान छान काहीतरी बोलत असताना, मध्येच काहीतरी व्हावं आणि अचानक हमरी तुम्ही वर यावं, एकमेकांवर जोरजोरात ओरडायला सुरुवात करावी, तसंच काहीसं वर झालं असावं.

निरभ्र असलेलं आकाश आता काळं कुट्ट झालं, दोन विजांमध्ये भयानक भांडणे सुरू झाली, त्याचा आवाज खालीपर्यंत येत होता. याचा परिणाम म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले, पावसाच्या रूपात…!

आणि जोरदार पाऊस सुरू झाला.

सोबत मी रेनकोट आणला नव्हता. कमरेला एक पिशवी लावलेली असते, त्यात थोडेफार पैसे आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे असतात. पावसात हि बॅग भिजू नये म्हणून मी गाडीला अडकवलेल्या कुठल्याशा बॅगेत ही बॅग घुसवली.

दोन विजांच्या भांडणात आपण पडायला नको, हा शहाणा विचार करून, आता भिजत निघणार तेवढ्यात एका भिक्षेकर्‍याने त्याच्या जवळचे रेनकोटचे जॅकेट मला दिले, नको नको म्हणत असतानाही त्याने ते घालायला लावले.

हे मीच त्याला कधीतरी दिले होते, पण आता ते डाव्या काखे पासून पूर्णपणे खाली पर्यंत उसवले होते फाटले होते. दोन ठिकाणी भोकं पडली होती…

त्याचं मन मोडायचं नाही म्हणून आणि जाऊदे बुडत्याला काडीचा आधार म्हणत मी निघालो, पावसाचा जोर प्रचंड होता. मोटर सायकलच्या विरुद्ध दिशेने येणारा आडवा पाऊस वेगाने तोंडावर आपटत होता.

दोन्ही गाल झापडून निघत होते.

एखादा निष्णात ढोलकी पटू रंगात आल्यानंतर त्या ढोलकीच्या दोन्ही बाजूला ज्या वेगाने थपडा मारेल, तसा पाऊस मला ढोलकी समजून दोन्ही गालावर थपडा मारत होता.

आजूबाजूची झाडं त्याच्या या कलाविष्काराला झुकून दाद देत होती, तर काही इकडून तिकडे जोरजोराने माना हलवत होती, बेभान होऊन…!

काही महाभागांनी तर रस्त्यावरच लोटांगण घातलं, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं, पण त्या “ढोलकीपटूला” याचे काही सोयर सुतक नव्हते.

रसिकांची दाद मिळाल्यावर कोणत्याच कलाकाराची थांबायची इच्छा नसते, तसंच या पावसाचं झालं.

इकडे प्रचंड पाऊस, रस्त्यावर गुडघाभर पाणी…

आणि तिकडे माझ्या पोटात भुकेचा वणवा पेटलेला…

काय विरोधाभास…!

पाठीवर जवळपास 100 किलोच्या बॅगचे ओझे, बाईकच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या आकाराच्या बॅगा खचाखच भरलेल्या, या बॅगेच्या आजूबाजूने जागा मिळेल तिथे काठ्या कुबड्या अडकवलेल्या…

हे सर्व सांभाळत रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून कसाबसा मार्ग काढत असताना, पावसाने अजूनही ढोलकी वाजवणे थांबवले नव्हते. जणू त्याची माझ्याशी जुगलबंदी चालू होती…

मुळात काळा सावळा असलेला मी, आज या पावसाने मला गोरा मोरा केला…!

शेवटी या जुगलबंदीत मी जाहीर हार पत्करली आणि गाडी साईडला लावून थांबलो.

संपूर्ण भिजलो होतो, रेनकोटच्या जॅकेटचा काहीही उपयोग नव्हता, आता अंगात ओल्या कपड्यांमुळे अंगात थंडी भरली. मी कुडकुडायला लागलो.

शेजारीच चार तकलादु बांबू रोवून त्यावर फ्लेक्स अंथरलेली एक मोडकी तोडकी वडापावची टपरी होती, एक आजी तिथे वडे तळत होती आणि त्याचा खमंग सुवास सुटला होता.

शाळेत न जायचा हट्ट करणाऱ्या मुलाला, त्याच्या आईने हाताला धरून फरपटत ओढत न्यावं, तसं भुकेने मला या वडापावच्या गाडीपर्यंत नेलं.

आजी वडे तळण्यात गुंग होती, वय असेल सत्तरीचं, चेहऱ्यावर सुरकुत्या, प्रत्येक सुरकुती दुष्काळी भागातल्या जमिनीसारखी भेगाळलेली, तरीही चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यात ममता…!

‘वडापाव खायचा आहे का रे बेटा…? ‘

आजीच्या वाक्याने माझी तंद्री भंगली.

‘हो आजी’…

आजी मला बेटा म्हणाली, मला कौतुक वाटलं.

कढईतला गरम गरम एक वडा तिने पावात खोचून दिला, पावातून निम्मा बाहेर आलेला तो गरमागरम वडा जणू माझ्याचकडे खाऊ का गिळू या नजरेने पाहत होता.

“गरम गरम” वडा पोटातली “आग” विझवणार होता… इथेही पुन्हा विरोधाभासच..!

‘वडा गरम आहे बेटा, सावकाश खा तोंड भाजेल… ‘

आजीचं मायेचं वाक्य ऐकून या थंडीतही मला ऊब जाणवली.

‘अजून एक खा बेटा धर’, म्हणत तिने दुसरा गरम गरम वडापाव माझ्या हाती न मागता दिला.

आजीला कसं कळलं मला भूक लागली असावी…?

मी विचार करत राहिलो.

आजी आजीच असते, नातवांसाठी ती घोडा घोडा होते, झुक झुक आगीनगाडी होते… जेवू घालताना तिच्या हातावर मोर सुद्धा येतो, आणि तो नाचतो… हो मी पाहिलंय मोराला नाचताना…!

ती कधी उंट होते, कधी मांजराचे आवाज काढते, डावा हात उजव्या कानाला धरून, उजवा हात त्यामधून घालून सोंड दाखवत ती हत्ती सुद्धा होते… आजीला सगळंच कसं येतं बुवा…?

आजीच्या मांडीवर तिच्या मऊसूत पदराखाली झोपताना कशाचीही भीती वाटत नाही. गालावरून फिरणारा तीचा खरबरीत हात मात्र तिच्या भूतकाळाची जाणीव करून देत असतो, पण ती कधीच सांगत नाही…

आई बाबा कधी ओरडून एखादा फटका मारायला आले तर आजी नातवंडाना पाठीमागे उभी करून, स्वतः पुढे येते आणि त्यावेळी ती ढाल होते… खरंच आजीला सगळंच कसं येतं…?

आजीला हिशोब मात्र येत नाही…

एक चपाती हाताने खायला घालून म्हणते, आत्ताशी कुठं अर्धी खाल्ली, जेवताना एक चपाती मागितली तर ती दोन देते आणि म्हणते खा एकच आहे…

कधी साडी घेऊ का म्हटलं तर म्हणते, नको रे बाबा ट्रंकेत तर पाच पन्नास पडून आहेत… ट्रंकेत बघितलं तर, आजोबांनी घेतलेल्या तीन-चार विरलेल्या साड्या असतात फक्त..

आजीला सगळं येतं, मात्र हिशोब काही येत नाही…!!!

माझी आजी अशीच होती, हि सुद्धा का कोण जाणे पण मला तशीच भासली…

बरोबरच आहे, “आजी” हे एक मायेचं आभाळ आहे, आणि जगातून कुठूनही पाहिलं तरी आभाळ सारखंच दिसतं ना…?

‘अजून एक खाणार का बेटा… ‘ 

आजीने पुन्हा माझी तंद्री तोडली.

नम्रपणे मी नको म्हणत, आजीला किती पैसे झाले विचारले.

म्हणाली, ‘दोन वडापाव ना? तीस रुपये झाले बेटा’

पैसे देण्यासाठी पॅन्ट मधल्या एका खिशात मी हात घातला तिथे पैसे मिळाले नाहीत, मी दुसऱ्या खिशात हात घातला, मागच्या खिशात हात घातला, गडबडीने रेनकोट काढून शर्टाच्या खिशात हात घातला, पैसे कुठेही सापडले नाहीत. मी बावचळलो… गोंधळलो…!

हां, आठवलं, आपण पैशाची बॅग मोटरसायकलवर अडकवलेल्या बॅगांमध्ये ठेवली आहे… मग मी मोटरसायकलवर ठेवलेल्या बॅगांची उचकापाचक करायला लागलो. ती सुद्धा बॅग काही केल्या सापडेना…

गडबडीत पडली की काय…? या विचाराने माझा थरकाप झाला… त्यात अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असतात.

तावातावाने मी बॅग शोधत होतो आणि बॅग मिळत नव्हती.

बॅगेच्या विचाराने मी अक्षरशः रडकुंडीला आलो…

आजीचं लक्ष होतं, म्हणाली, 30 रुपयांसाठी एवढं रडकुंडीला येऊ नको बाळा, नंतर दिले तरी चालतील.

 ‘तसं नाही आजी पण… ‘

 माझं वाक्य तोडत आजी मृदू आवाजात, मायेनं म्हणाली, ‘ अरे बाळा कळतंय मला, कधी पैसे असतात तर कधी नसतात. तू एखाद्या खेड्यातल्या गरीबा घरचा दिसतोस. ‘

‘ गावाकडचं घर सोडून, नशीब काढायला इथं कुठल्यातरी कंपनीत कमी पगारावर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असशील ना…?

अशी खूप मुलं आजी आजी म्हणत येतात माझ्याकडं, ती पदराला हात पुसत म्हणाली… ‘

डिलिव्हरी बॉय…?? आजी मला डिलिव्हरी बॉय का समजली असेल…?

ओह, माझ्याकडची एक मोठी बॅग, गाडीला अडकवलेल्या तशाच दोन मोठ्या बॅगा, जशा Swiggy Zomato किंवा कुरिअर यांच्या डिलिव्हरी बॉईज कडे असतात तशा… हे पाहून आजीने अंदाज बांधला मी सुद्धा डिलिव्हरी बॉय आहे.

हाताने बॅग शोधणे सुरूच होते.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ड्रायव्हरलेस टॅक्सी आली म्हणे… लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – मीनल केळकर ☆

मीनल केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ड्रायव्हरलेस टॅक्सी आली म्हणे… लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – मीनल केळकर ☆

आता किचनलेस बायको कधी येणार?

काल मोबाईलवर ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या गाडीचा व्हिडिओ पाहिला आणि नेमकी कामवाली बाई सुट्टीवर गेल्यामुळे सिंकभर भांडी, न तापवलेलं दूध आणि कुकरच्या टेन्शनमध्ये स्वयंपाकघरात पोळपाट-लाटणं घेऊन उभ्या असलेल्या माझ्या मनात दिवसाढवळ्या स्वप्न रंगू लागली! गाडीत ना ड्रायव्हर, ना हॉर्न वाजवणारा काका… सगळं ते नवीन मशीन म्हणजे AI स्वतः करत होतं. विज्ञानाने एवढी प्रगती केलीये तर देवा, हे तंत्रज्ञान आमच्या किचनमध्ये आधी पाठव! आणि जो माणूस हे किचनचं मशीन शोधेल, त्याच्या पायाचं तीर्थ मी रोज सकाळी घेईन; कारण रस्त्यापेक्षा याची खरी गरज आमच्या भारतीय किचनमध्येच आहे.

सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून मी त्या मशीनपेक्षा जास्त अपडेटेड असते. डोळे उघडायच्या आधीच प्रोसेसर सुरू होतो– मुलाचा डबा, नवऱ्याचा नाश्ता, सासूबाईंचा चहा, गॅसवर दूध आणि फ्रिजमधल्या उरलेल्या भाज्या कशा संपवायच्या या विचारात मी गाढ झोपेतून उठते. मी स्वतः अजून पूर्ण जागी नसते, तोच हॉलमधून नवरोबांचा पहिला प्रश्न येतो, “चहा झाला का? ” अहो, मी काय रोबोट आहे? पण त्यांना चहा मात्र वेळेवर हवा असतो!

जरा कल्पना करा, उद्या जर हे मशीन किचनमध्ये आलं तर काय होईल? सकाळी नवरा म्हणाला, “चहा दे, ” तर मशीन उत्तर देईल, “तुम्ही काल चहाचा कप सिंकमध्ये ठेवला नव्हता, आज तुमची सेवा तात्पुरती बंद आहे! ” तिथेच मुलगा तोंड वेडंवाकडं करून म्हणाला, “आई, तू रोजच काय पोहे करतेस? ” तर मशीन म्हणेल, “बाळा, मागच्या आठवड्यात दोनदा सँडविच आणि तीनदा पास्ता खाल्लाय, विसरलास का? गपचूप पोहे खा, नाहीतर आजचा डबा कॅन्सल! ” इतक्यात त्याने मोजे विचारले तर मशीन सांगेल, “जिथे काल फेकून दिले होते, तिथेच आहेत, स्वतः जाऊन उचल! ” दुपारच्या जेवताना सासूबाई म्हणाल्या, “आज भाजीत मीठ जास्त झालंय, ” तर मशीन लगेच रेकॉर्ड दाखवेल, “हो सासूबाई, मागच्या १७ वर्षांत तुमच्याकडून हीच कमेंट तब्बल ३, ४२८ वेळा आली आहे! ” एवढ्यावरच त्या थांबणार नाहीत, ऐनवेळी म्हणतील, “पोळ्या कमी कर, आज भात जास्त खाणार! ” तेव्हा मशीन डोक्याला हात लावून म्हणेल, “सकाळी तीन पोळ्या सांगितल्या होत्या, त्यानुसार पीठ मळलंय. आता सिस्टीम बदलणार नाही, भातातच ॲडजस्ट करा! “

खरी मजा संध्याकाळी येईल. मी सोफ्यावर निवांत चहा पित बसेन आणि नवरा पाऊस बघून म्हणतील, “गरम गरम भजे कर ना गं! ” मी म्हणेन, “मला काय विचारता? जा मशीनला विचारा, आज मी फक्त युझर आहे! ” नवरा किचनमध्ये जाताच मशीन ओरडेल, “तुमचे वजन दोन किलो वाढले आहे आणि घरात बेसनही संपले आहे. भज्यांचा विचार सोडा आणि गुपचूप शेपूची भाजी खा! “

इतक्यात दाराची बेल वाजते आणि कोणतेही ‘नोटीफिकेशन’ न देता दोन पाहुणे हसत-हसत अवतरतात– “म्हटलं चहा-पाणी करून जावं. ” नवरा सांगतो, “पटकन चहा आणि काजूचा शिरा बनव! ” तेव्हा ते मशीन फ्रिज उघडून डबे तपासेल आणि वायर हायव्होल्टेज होऊन ओरडेल, “अलर्ट! घरात चहाची पत्ती एकच चमचा आहे आणि शिऱ्यासाठी दूधच नाहीये! पाहुण्यांनो, येताना व्हॉट्सॲप का नाही केलं? माझी सिस्टीम क्रॅश होत आहे! ” शेवटी पाहुण्यांचा पाहुणचार करून रात्री सिंकमधला डोंगराएवढा भांड्यांचा पसारा पाहून बिचारं मशीन हँग होईल आणि स्क्रीनवर मेसेज येईल, “सिस्टम एरर! भारतीय कुटुंबाचा पसारा, नखरे आणि बिनबोलावलेले पाहुणे सांभाळण्याची माझी क्षमता नाही! “

अमेरिकेच्या रस्त्यावर गाडी चालवणं सोपं आहे हो, पण भारतीय घरात चार लोकांच्या वेगवेगळ्या आवडी आणि ऐनवेळचे नखरे सांभाळणं कठीण आहे! एकाला तिखट नको, दुसऱ्याला भेंडी नको, नवऱ्याला रोज नवीन हवं, सासूबाईंना ऐनवेळी भात हवा आणि फ्रिजमध्ये फक्त दोन सुकलेल्या सिमला मिरची नि टोपलीत दोन बटाटे! अशा वेळी त्या दोन बटाट्यांमध्ये पाहुण्यांसह अख्ख्या घराला खुश ठेवणं, हे कोणत्याही मशीनच्या बापालाही जमणार नाही! म्हणूनच, ज्या दिवशी ते मशीन स्वतः फ्रिज बघून काय बनवायचं याचं उत्तर शोधेल, त्या दिवशी जगातल्या सर्व बायका टाळ्या वाजवून म्हणतील, “आता खरंच विज्ञान प्रगत झालं! ” काय मग गृहिणींनो, पटतंय ना?

“बाईशिवाय चालणारं भारतीय किचन’ बनवणं विज्ञानाला कधीच जमणार नाही! कारण मशीनमध्ये फक्त डेटा आणि कोडिंग असतं… पण भारतीय किचनमध्ये लागणारा अचूक ‘अंदाज’, चवीची ‘जादू’ आणि कुटुंबासाठी असणारं ‘प्रेम’ कोणत्याही कम्प्युटरमध्ये डाऊनलोड करता येत नाही. गृहिणीचा २४ तास चालणारा प्रोसेसर आणि तिची माया… या तोडीचं तंत्रज्ञान जगात कुठेच तयार होऊ शकत नाही! “

लेखिका : सौ. तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड

 (लेख आवडल्यास नावासोबत शेअर करा, ही विनंती.) 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ मराठीचा घसरलेला टक्का ! – ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मराठीचा घसरलेला टक्का ! – ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

परवा ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट पाहिला. आजच्या गल्लाभरू चित्रपटांच्या दुनियेत एका वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट पाहताना आनंद वाटला. मराठी शाळांची खालावत चाललेली धक्कादायक अवस्था आणि अस्तित्वाचा संघर्ष या चित्रपटाने अत्यंत ढळढळीतपणे समाजासमोर आणला आहे. हा चित्रपट पाहत असताना मला नुकताच काही दिवसांपूर्वी लागलेला इयत्ता दहावीचा निकाल आठवला. निकालानंतर वर्तमानपत्रात ठळक अक्षरांमध्ये एक मथळा (हेडलाईन) प्रसिद्ध झाला होता ‘ दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात ९४, ००० विद्यार्थी अनुत्तीर्ण !’ आपल्याच मातृभाषेला दुय्यम स्थान दिल्यामुळे मुले चक्क मराठीत नापास झाली आहेत. ही संख्या थोडीथोडकी नाही.

” मला सगळ्या विषयात चांगले मार्क आहेत पण फक्त मराठीत गेलो… ” दहावी उत्तीर्ण एका विद्यार्थ्याचे हे उद्गार ! आम्हाला सगळ्या विषयात चांगले मार्क्स असले तरी आमच्या टॉप फाईव्ह मध्ये मराठी नसते. “आमची उज्ज्वल यशाची परंपरा ! आम्ही सर्व विषयांची उत्तम तयारी करून घेतो, ” असे मोठे मोठे बोर्ड लावणारे क्लासेस मराठी विषयाची तयारी करून घेताना कुठे जातात ?

एका बाजूला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण आनंदाने आणि अभिमानाने स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत; अर्थात, यात वावगे काहीच नाही. पण खरंच माझी मराठी टिकावी, तिची समृद्धी आणखी वाढावी यासाठी आपण मुळापासून काही प्रयत्न करतो आहोत का ? जेव्हा मुलांच्या मराठीतील नापासांचे हे धक्कादायक प्रमाण समोर येते, तेव्हा आपण क्षणभर गडबडतो, आपल्याला धक्काही बसतो. पण तो तेवढ्यापुरताच! या स्थितीला जबाबदार असलेला प्रत्येक घटक आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळा होतो. मुले म्हणतात, ” शाळेत मराठीचे तास नियमितपणे झालेच नाहीत. ” बऱ्याच वेळा मराठीचे तास दुसऱ्या विषयाला वापरले जातात. मराठी काय घरीही अभ्यासता येईल. अशी मानसिकता निर्माण केली जाते. दहावीचे शिक्षक म्हणतात, ” मुले आमच्याकडे येताना खालूनच कच्ची आली. ” प्रत्येकजण अशा सबबी देऊन आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळा होत असतो. पण या विषयावर आपण कधी मुळापासून यावर विचार करणार आहोत की नाही ?

‘असर’ (Annual Status of Education Report) चा मागील एक अहवाल सांगतो की, जी मुले दहावीत होती, त्यांना इयत्ता तिसरीत असताना पहिलीचे मराठी धडे वाचता येत नव्हते; तर आठवीत असताना दुसरीच्या स्तरावरील उतारा वाचता येत नव्हता. आज इतक्या वर्षांनंतरही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आपल्या मुलांचे मार्कांचे एकूण टक्के वाढले असतीलही, पण ज्ञानाचा आणि मराठीचा खरा टक्का मात्र घसरला आहे. मराठी साहित्य संमेलनांचे भव्य आयोजन करणे, पुस्तक प्रदर्शने भरवणे किंवा दुकानाच्या पाट्या मराठीत लिहायला लावणे या गोष्टी भाषेच्या प्रसारासाठी उपयुक्त असतीलही; पण जोपर्यंत आपण मूळ आजारावर उपाय करत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही.

ज्यांनी ‘शांतिनिकेतन’ची स्थापना केली, ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर बंगाली भाषेबाबत कमालीचे आग्रही होते. त्या काळात बंगालमधील सरकारी नोकरदार आणि मध्यमवर्गीय लोक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यात आणि इंग्रजी बोलण्यात धन्यता मानत होते. अशा विपरीत परिस्थितीत गुरुदेवांनी “मातृभाषेतील शिक्षण हेच सर्वात उत्तम शिक्षण” असल्याचा उद्घोष केला. केवळ बोलून न थांबता त्यांनी शांतिनिकेतनमध्ये केवळ बंगालीतूनच शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि पाठ्यपुस्तकेही बंगालीत तयार केली. ‘आमार जीवन, आमार बानी’ (माझे जीवन, हीच माझी वाणी) हे त्यांचे घोषवाक्य होते. आम्ही मात्र आज स्वातंत्र्याला ऐंशी वर्षे होत आली, तरी इंग्रजी भाषेचे गोडवे गाण्यातच मग्न आहोत.

एकदा एका विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला रवींद्रनाथांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. त्या काळी असे समारंभ आणि त्यातील भाषणे केवळ इंग्रजीतूनच होत असत (जी आजही होतात). उपस्थितांचीही तीच अपेक्षा होती; पण गुरुदेवांनी तो सगळा इंग्रजी राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) धुडकावून लावला आणि थेट बंगालीत भाषण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या भाषेचा असा अभिमान आपल्यात कधी जागी होणार?

आपले सरकार इंग्रजी शाळांना धडाधड परवानग्या देत आहे आणि दुसरीकडे मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. “मराठी शाळांचा दर्जा खालावला आहे” असा बागुलबुवा उभा करून पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये पाठवणे बंद केले. परिणामी, ‘विद्यार्थी नाहीत’ हे कारण पुढे करून शासनाने शाळा बंद करण्याचा सपाटा लावला आहे. ज्या काही शाळा आज कशाबशा सुरू आहेत, त्यांची अवस्था केविलवाणी आहे; कुठे छप्पर गळतेय, तर कुठे पुरेसे शिक्षक नाहीत.

‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटात हेच विदारक वास्तव अचूक मांडले आहे. विद्यार्थीसंख्या कमी झाली म्हणून शासनाकडून शाळा बंद होण्याची टांगती तलवार जेव्हा मानेवर येते, तेव्हा त्या शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के (सचिन खेडेकर) शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना हाक मारतात. हा चित्रपट आपल्याला एक मोठा धडा देतो. सरकार शाळा बंद पाडत असले आणि समाज उदासीन असला, तरी ज्या शाळेने आपल्याला घडवले, तिच्या पडत्या काळात तिच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येक माजी विद्यार्थ्याची आणि समाजाची नैतिक जबाबदारी आहे. हे दुष्टचक्र मोडून काढण्यासाठी समाज, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि शासन या सर्वांनी आता एकत्र यायलाच हवे.

‘मी मराठी, माझी शाळा मराठी’ हे आता केवळ वाक्य न राहता आपले ब्रीदवाक्य व्हायला हवे. आमचा इंग्रजीला अजिबात विरोध नाही, ती काळाची गरज म्हणून महत्त्वाची भाषा आहेच आणि ती पुढेही शिकता येते. पण ज्या गोष्टी मातृभाषेतून आमचे मूल सहजपणे आणि आत्मविश्वासाने शिकू शकते, त्या गोष्टी सुरुवातीलाच परक्या भाषेतून लादून त्याच्यावर ताण का आणायचा ? मराठी शाळांमधून केवळ कोरडे शिक्षण दिले जात नाही, तर आपली संस्कृती, शिष्टाचार आणि उत्तम संस्कार तिथे जोपासले जातात. जर आपल्याला आपली संस्कृती टिकवायची असेल आणि मुलांवर सुसंस्कार हवे असतील, तर मराठी शाळा आणि मराठी माध्यम अपरिहार्य आहे.

मुलांना मराठीची खरी गोडी शालेय स्तरापासूनच लागली पाहिजे; ती केवळ ‘एक परीक्षा’ म्हणून अभ्यासली जाऊ नये. ही गोडी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षक, पालक आणि संपूर्ण समाजाने उचलली पाहिजे. मुलांच्या पाठ्यपुस्तकातील धडे, कविता त्यांना मराठीची गोडी निर्माण होईल अशा असाव्यात. घरातही मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे यावीत. पालकांनी देखील मुलांसमोर दर्जेदार अशी मराठी पुस्तके स्वतः वाचावीत. सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी लागते. नुसते वाचन करा म्हणून सांगितले तर मुले ऐकणार नाहीत. यासोबतच, भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये आणि नोकऱ्यांमध्येही मराठीला मानाचे व अनिवार्य स्थान मिळाले पाहिजे. “मराठी शिकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही” हे जेव्हा मुलांच्या आणि पालकांच्या लक्षात येईल, तेव्हाच मराठीच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने प्राधान्य मिळेल.

आपल्याला केवळ गणित, विज्ञान, इतिहास किंवा भूगोल येऊन उपयोग नाही; आपल्याला आपली मातृभाषाही उत्तम लिहिता, बोलता आणि वाचता आली पाहिजे. “माझा मराठाचि बोलू कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके।” या माउलींच्या उद्गाराची अनुभूती आमची मुले केव्हा घेणार ? जेव्हा त्यांना मराठी भाषेत खरोखर रस वाटू लागेल तेव्हाच ना ! आणि याच मराठी मातीतून उद्याचे उत्तम साहित्यिक, वक्ते, शास्त्रज्ञ आणि समाजाला दिशा देणारे समाजसेवक निर्माण होतील. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आणि गर्वाने म्हणू शकू…

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी… “

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”मला ब्रेक हवाय !” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मला ब्रेक हवाय !” ☆ संध्या बेडेकर ☆

If you are tired, learn to take a rest. Take break.

मला break हवाय.

आज सकाळपासूनच माझी चिडचिड सुरू होती. इतक्यात हे अस बरेचदा होतय. म्हणजे उगीच चिडचिड करायला मी काही वेडी नाही. तसा माझा स्वभाव ही नाही. ही चिडचिड सध्या तरी स्वतःपर्यंतच आहे. मी नोकरी करत नाही, पण घर सांभाळण घरातील सर्वांची ची वेळ, डबे, त्यांचे मूड, चिडचिड खाण्याचे नखरे, जेष्ठांचे औषधपाणी, घराचे मेंटेनन्स, सांभाळणे हे काही सोप्प काम नाहिये. आणि ते फक्त काही दिवसांचे / महिन्यांचे नाही तर वर्षानुवर्ष तेच ते चालू आहे. थोडक्यात हे म्हणजे सर्वांच्या तालावर नाचणेच झाले नाही का ? खरतर हे सर्व करण्यात मला आनंदच मिळतो. आवडत मला. त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून स्वयंपाक करण खरच आवडत मला. जसजस माझ वय वाढतय तसतशी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की थोडी चूक झालीच आहे माझी. सर्व मनासारख, सतत त्यांच्या सेवेत मागेपूढे हजर राहणे.

हे बरोबर नाही. एकतर त्यांच्या सवयी बदलतात. काम करायची सवय नाही. उद्या अजयचे लग्न झाले तर ती सून पण कदाचीत अजयला म्हणेलही… की तुमच्या आईने तुम्हाला काही सवयी लावल्या नाहीत. खूप लाडावून ठेवल आहे. आज नोकरी करणारी सून येण्याची शक्यता जास्त आहे, तेंव्हा नवर्याचे सहकार्य अपेक्षित असतेच.

 हे सर्व विचार मला अस्वस्थ करतायेत. हे अस का होतय ? हा विचार मला अस्वस्थ करतोय. वय झालय म्हणण्यापेक्षा वय वाढतय, हे म्हणण जास्त योग्य होईल., तस म्हंटल तर 50/52 वर्ष वय म्हणजे काही खूप नाहीच. शक्ती कमी झालीय की काही आजार वगैरे? आता कुठे सून आणायची वेळ आली आहे.

मी माझा प्रोब्लेम घरात सांगीतला नाही तर, त्यांना कळेल कसा ? हे अस ओढून ताणून घर चालवण बरोबर आहे का ? उद्या मी च आजारी पडले, तर सर्वांनाच जास्त त्रास होईल. मला विश्रामाची गरज आहे का ? ब्रेक हवाय का ?

हे विचार मनात घर करून बसले आहेत.

 आज दुपारी आईंना चहा देतांना, आई म्हणाल्याच… काय ग अनिता ? काय विचार करतेय ? आज तुझ्या भावाचा फोन आला होता ना. सर्व ठीक आहे ना त्यांच्याकडे. बर वाटत नाहीये का ? अजय काही बोलला का ? इतक्यात लक्षात आलय, तू नेहमीसारखी प्रसन्न दिसत नाही.

आईंच्या तीक्ष्ण नजरेत काहीच सूटत नाही. हे खरय.

मी म्हंटल… आई अहो.. माहित नाही का ? पण मला सध्या थकवा जाणवतोय. उत्साह वाटत नाही.

अग! मग सांगायच न. तू सांगितल नाही तर कळेल कस?

 आई अहो ! तुम्हाला सांगायच अस माझ बरेचदा ठरवून झाल हो. पण पुन्हा तेच… पुत्र प्रेम, पति प्रेम आड येत, जबाबदारी आठवते.

आणि मी काहीच बोलत नाही.

 आता मात्र बदल करायची वेळ आली आहे. हे कळतय मला.

आई म्हणाल्या… अग बाई !

आता आईपणा, सूनपणा, बायकोपणा, सर्वच बाजूला ठेव जरा. अग ! देवी बनायचा प्रयत्न करू नको. ब्रेक घे.

 नाही म्हणजे.. सहन करायची / ऐकायची एक लिमिट असते ग.

उद्या तुझी तब्येत बिघडली तर ? कोण लक्ष देणार आहे ? 

घर एक घर आता पूरे झाल.

अग! मी केलेली चूक तू करू नकोस.

अग! शांत राहण चांगली सवय आहे. ज्या घरातील स्त्री शांत स्वभावाची असते, ते घर छानच चालत. पण कोणत्याही परिस्थितीत, कितीही त्रास असताना शांत राहण म्हणजे आत्महिंसाच असते ती.

स्वतःपेक्षा जास्त दुसर्यांचा विचार करणे, महत्व देण हे कुठे तरी थांबवायला शिकलेच पाहिजे. स्वतःकडे दुर्लक्ष करण बरोबर नाही.

आई पूढे म्हणाल्या… अग! घर सांभाळताना मी पण स्वतःला विसरले होते. आणि आता मला स्वतःला आठवायला औषधांची गरज लागते.

आमच्या जमान्यातही बायका भजन क्लास, जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमांना जायच्याच. त्या पण छानच घर सांभाळत होत्याच की.. मी आपली आता यांची यायची वेळ झाली, त्याची वेळ झाली याच विचारात असायची. मला कोणी नको जाऊ अस कधी म्हंटल नाही. माझ पण तेच असायच ना… घर एक घर 

अग! खूप पर्याय असतात / आहेतच.

आपल्या सोयीनुसार त्यांची सर्वीस घ्यायची. स्वतःसाठी हक्काने पैसे खर्च करायला शिकायच असत.

घरी खूप संपत्ती आहे मालमत्ता आहे. त्याचा उपभोग घ्यावा. जीवनशैली गरज पडेल तशी बदलावी ना. मीच सर्व काम करेन, हा हट्ट का ? 

आजोबा सर्व शांतपणे ऐकत होते.

थोड्याच वेळात अजय आणि बाबा ऑफिस मधून परत आलेच.

अजय म्हणाला… या रविवारी Mother’s Day I love. My Mom, and Aaji too.

कस celebrate करायच ? Mom आजी कुठे जायच? सांगा.

आजोबा म्हणाले… अरे फक्त Mother’s Day लाच आई, आजी आठवतात का ? बाकी कधी काही चौकशी केली आहे का ? अरे! आमची देखरेख तुझी आई करते. तिला काय हवय ? काय आवडत ? एखादा तिच्या आवडीचा सिनेमा तिला बघायचा आहे का ? हे कधी विचारल का तिला ? 

तिच्याजवळ बसून काही विचारपूस वगैरे केली का ? कधी.

अरे! लग्न झाल्यावर तुझी जबाबदारी वाढणार आहे. तिच्या बरोबर पण असच वागशील का ? 

आईवर तुझ प्रेम आहे, हे माहित आहे आम्हाला, कधी कधी ते दाखवायच पण असत ना… आपल्या कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून. नाहीतर तुझ्या मनातल तिला कस कळेल ?

हे बघ सध्या अनिताला डोॅक्टर कडे न्यायची गरज आहे. तिला काम केल्यावर थकवा वाटतोय.

आधी हे काम कर. मग जंगी पार्टी करूयात.

अरे!लहानपणी शिकवलय ना… रस्ता पार करताना आधी डावीकडे, मग उजवीकडे… पुन्हा डावीकडे बघायच आणि मग रस्ता पार करायचा.

अरे! आयुष्यातही वेगवेगळया वळणावर जरा थांबाव. सर्व दृष्टिने विचार करावा. आपली जबाबदारी, कर्तव्य आपण बरोबर करतोय ना. काही ऐकायच / विचारायच/ सांगायच राहून तर नाही गेल. याचा विचार करावा. फक्त महिला दिवस, Mother’s Day ला नाही तर हे आपल्या वागण्यात असाव.

प्रेमाच्या दोन शब्दांत खूप जादू असते. काळजीने केलेल्या विचारपूस मध्ये अर्ध अधिक बरे होण्याची ताकद असते.

बरे असो…

उद्यापासून आपल्या घरी स्वयंपाक करायला मावशी असणार आहेत. अनिता ! त्यांची पूर्ण तयारी झाल्यावर फोडणीचे काम मात्र तूच कर. तुझ्या हातची भाजी आमटी आवडते सर्वांना. फक्त तेवढच करायच हं.. हे लक्षात ठेव.

माझ्याकडून Mother’s day ची दोन्ही आयांना हीच भेट.

हो फक्त Mother’s Day ला नाही तर नेहमीसाठी.

बाबा म्हणाले…

अग ! अनिता घरातील सगळ्यांची देखभाल करताना, स्वतःला विसरायच नसत. स्वतःवर प्रेम करायला शिकायच असत. तू या घरासाठी खूप मौल्यवान आहेस.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे सुट्टीपुराण! ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ माझे सुट्टीपुराण☆ उज्ज्वला केळकर

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज. आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत म्हणा, किंवा अनुभव म्हणा. त्यावेळी मी डी. एड. कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रामायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात नं, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —

पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं काही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय. ’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.

पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्‍या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवारा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीच वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात. मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.

दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठे तरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजं-तवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अ‍ॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.

दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,

आता मला सुट्टी मिळणार मिळणार

खूप खूप मज्जा मी करणार करणार.

आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावार नुसतंच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.

आता सकाळी जाग आल्यावर उठून फिरायला जायचं मी ठरवलं. उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या. ’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.

आता टी. व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी. व्ही. च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन् नसून खोळंबा झाला. शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी. व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.

आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-

इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’ मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मीटूनच घ्यायचा.

तर असं हे माझं सुट्टीपुराण. जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चक्क डाव्या हाताने पुण्यकर्म !” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “चक्क डाव्या हाताने पुण्यकर्म !” ☆ श्री सुधीर करंदीकर

“पुण्यात पाणी कपात आणि चक्क डाव्या हाताने पुण्य कर्म”

आपल्या डाव्या हाताला छान पुण्य कर्म करण्याची संधी लाभणार आहे.

देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत. दोन्ही अगदी तंतोतंत सारखे आहेत, तरीपण का ते माहित नाही, आपण सगळेच जण उजव्या हातावर जास्त प्रेम करतो.

जेवण उजव्या हाताने करतो,

देवाची पूजा करताना देवाला गंध लावणे; हळदीकुंकू वाहणे; फुलं वाहणे; हे सगळे उजव्या हाताने करतो,

कुणी प्रसाद दिला तर तो उजव्या हातावर घेतो, दानधर्म उजव्या हाताने करतो, वगैरे वगैरे.

आणि आपण डाव्या हाताला फक्त टॉयलेट मध्ये असतानाच न आवडणारे काम देतो.

आता डाव्या हाताला पुण्य कर्म करायला देण्याची पुणेकर मंडळींना छान संधी येत आहे.

कशी ते आता बघू –

येत्या सोमवारपासून म्हणजे १५ जून पासून नळाला पाणी एक दिवसाआड येणार आहे. म्हणजे पाणी वाया न घालवता वापरले तरच साठवलेले पाणी दोन दिवस पुरणार आहे. आणि पाणी वाया न घालवणे हे छानच पुण्य कर्म आहे.

आपल्या घरांमध्ये पाणी कुठे कुठे वाया जाते याचा जर आपण आढावा घेतला तर लक्षात येईल, बेसिन च्या नळांमधून दिवसभरात खूप पाणी वाया जात असतं.

दिवसातून आठ ते दहा वेळा आपण प्रत्येक जण नक्कीच वॉश बेसिन पाशी जातो.

सकाळी उठल्यावर दात घासणे, काही खाल्ल्यानंतर /जेवल्यानंतर तोंड धुणे; चुळा भरणे, मधून मधून चेहरा स्वच्छ करण्याकरता चेहऱ्यावर पाणी मारणे, मधून मधून नाक शिंकरणे, वगैरे वगैरे.

आणि आपल्या बहुतेकांची सवय अशी असते, की, बेसिन जवळ जायचे, नळ सुरु करायचा (काहीजण तर नळ अगदी फुल उघडतात) आणि वर दिल्याप्रमाणे दात घासणे, वगैरे कार्य करायचे आणि मग चेहरा बघायचा, आ करून जीभ बघायची / मान डावीकडे उजवीकडे वळवून आपण छान दिसतोय ना, हे बघायचे आणि शेवटी बेसिनचा नळ बंद करायचा.

थोडक्यात काय, तुमचं काम छान होते, पण ज्या कामा करता अर्धा मग पाणी पूरलं असतं, त्याकरता चार-पाच मग पाणी ड्रेनेज मध्ये जात असतं.

बहुतेक जण बेसिनचा नळ पूर्ण का उघडतात हे कोडेच आहे. आपल्याला एका हाताच्या ओंझळीत मावेल एवढेच पाणी प्रत्येक वेळी घ्यायचे असते, त्याकरता अगदी बारीक नळ पण चालतो. (प्रत्येक बेसिनच्या खाली एक कॉक असतो. आपण सगळ्यांनीच तो कॉक कायम अर्ध्याच्या वर बंद करून ठेवावा म्हणजे बेसनची धार आपोआपच लहान येते. हे जरूर करा).

आता तुम्ही म्हणाल की डाव्या हाताला पूण्य कर्म कसे करायला मिळणार.

सांगतो – 

बेसिन पाशी गेल्यानंतर डावा हात नळावर ठेवायचा. जेव्हा जेव्हा उजव्या हातावर पाणी घ्यायचे असेल, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी डाव्या हाताने नळ उघडायचा, ओंजळ भरली की डाव्या हाताने प्रत्येक वेळी नळ बंद करायचा. जोपर्यंत आपण बेसिन जवळ आहोत तोपर्यंत डावा हात नळावरच ठेवायचा.

म्हणजे आपण डाव्या हाताने काय केले आहे – पाहिजे तेव्हा नळ सोडला, नको तेव्हा नळ बंद केला. आणि यामुळे भरपूर पाण्याची बचत होणार आहे. आणि ती पण रोजच्या रोज, आणि घरामधल्या प्रत्येकाकडून.

पाणी वाचवणे / वाया न घालवणे हे पुण्य कर्म नक्कीच आहे.

आज करून बघा.

जलदेवता खुश होईल, आपल्याकडून पुण्य कर्म होत आहे म्हणून डावा हात खुश होईल, शरीर देवता पण खुश होईल. आपल्या वास्तूमध्ये हे पुण्यकर्म होत आहे म्हणून वास्तुदेवता पण खुश होईल.

वाचवलेल्या पाण्यामुळे काही लोकांची तहान भागणार आहे त्यामुळे निसर्ग देवता पण खुश होईल, आणि वरच्या देवता पण खुश होतील…

एखादी गोष्ट सतत एक महिना केली तर ती सवय लागते असे म्हणतात. पुण्यामध्ये एक दिवसाआड पाणी बंद हे महिनाभर नक्की चालू राहणार.

अशा रीतीने एक दिवस पाणी बंद यामुळे आपल्याला अगदी सोप्या रीतीने पुण्य कर्म करत राहण्याची सवय लागणार आहे.

ज्या ज्या ठिकाणी पाणी बंदी नाही, त्यांनी पण ही सवय जरूर लावून घ्यावी, आणि पुण्य कर्म करत राहावे… आणि खुश रहावे.

खुशिया ही खुशिया हो,

दामन में जिसके,

क्यू ना खुशी से वो दिवाना हो जाये…

आणि याकरता करायचे काय आहे – तर काहीही कारणाकरता बेसिन जवळ गेल्यावर डावा हात बेसिनच्या नळावर ठेवणे, पाहिजे तेव्हा नळ उघडणे आणि नको तेव्हा बंद करणे.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठ आणेवाले आणि मोफत कोचिंग… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ आठ आणेवाले आणि मोफत कोचिंग☆ शीला पतकी 

इयत्ता आठवी ड चा वर्ग… सहामाहीचे पेपर वाटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि गणितात नापास… कारण या विद्यार्थिनी बाहेरच्या शाळेतून आलेल्या… जिथे इंग्रजी फारसे करून घेतले जात नाही… आणि गणिताची तितकी तयारी नसते. या वर्गाला शिकवणारे आम्ही दोन शिक्षक मी आणि डॉक्टर पार्वतीबाई मोहोळकर !.. दोघी आम्ही मेहनती, मुलींबद्दल कळवळा, प्रेम, आपल्या विषयात तयार असल्या पाहिजे याची जाणीव. हे सगळं आमच्या दोघींकडे होतं. मग आम्ही ठरवलं की यांचं कोचिंग घ्यायचं. कोचिंगला सकाळी या मुली लवकर येत नाहीत कारण या मुलींना घरामध्ये कामाला खूप गुंतवले जाते. अतिशय खालच्या वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांनी असतात एकल पालक विद्यार्थिनी. पैशाची चणचण आणि मुलीला कुठेतरी कामाला लावलेले असते. त्यामुळे तिला सकाळी वेळ नाही. मग आम्ही ठरवलं शाळा सुटल्याबरोबर वर्गात घुसायचे एकाही मुलीला घरी जाऊ द्यायचं नाही पालकांना तशी कल्पना दिली होती आणि गुरुदक्षिणा म्हणून वर्गाला एक रुपया फी ठेवली होती. तीन दिवस मोहोळकर बाई इंग्रजी शिकवायचे आणि तीन दिवस मी गणित करून घ्यायची. मुलींना हा तास बुडवता येत नव्हता. अगदी बेसिक पासून आम्ही शिकवायला सुरुवात केली त्यामुळे मुलींना समजायला लागलं त्या शंका विचारायला लागल्या आणि त्यानंतरच्या नऊमाही परीक्षेमध्ये थोडी प्रगती झालेली दिसली. त्यांचाही उत्साह वाढला आमचाही उत्साह वाढला. आणि वार्षिक परीक्षेला मात्र त्या मुलीने कमालच केली सर्व मुलीने उत्तम गुण मिळवले होते आता एक चार दोन असतात ते सुधारत नाहीत ते सोडले तर बाकी सगळ्या मुलींनी चांगले मार्क मिळवले चांगले म्हणजे त्यांच्या दृष्टीने जिथे आज सात आठ दहा पंधरा मार्क पडायचे तिथे ते 40 45 50 पर्यंत गेल्या मुख्य म्हणजे त्यांना विषयाची गोडी लागली, आणि आम्हाला खात्री पटली की आता या दहावीपर्यंत नापास होणार नाहीत. या वर्गाला असणारी एक रुपया फि. वर्गांची संख्या 50 ते 55. शेवटचा वर्ग असायचा. साधारणपणे महिन्याला चाळीस एक रुपये जमायचे. बाकी काही गरीब विद्यार्थीना रुपयाही माफ होता. त्यातले 20 डॉक्टर पार्वती बाई मोहोळकर आणि वीस शीला पत्की अशी वाटणी व्हायची. वीस रुपये फी मिळत असताना आम्ही तीन दिवस एक तास जीव तोडून शिकवत होतो त्या तर बाई पीएचडी करत होत्या.

दुसरी घटना मी मुख्याध्यापक झाल्यावर रिझल्ट वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दहावी वर प्रयत्न सुरू झाले दहावीत जातानाच सर्व नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी एका वर्गात घातल्या जेणेकरून आम्हाला त्यांच्याकडून ठोस काही करून घेता येईल. त्या सर्व मुलींच्या पालकांची मीटिंग बोलवली आणि त्यांना सांगितले की आम्ही या वर्गाला कोणतेही शुल्क घेणार नाही. फक्त मुलींना सकाळी बरोबर आकरा वाजता पाठवा. पालकांची मीटिंग झाली ह्या मुलींवर आता काम केले तर त्या सहज दहावी पास होऊ शकतील असा विश्वास आम्ही पालकांना दिला. कारण त्यावेळेला वीस मार्काच्या कुबड्या नव्हत्या. पालकांनाही कल्पना पटली एक महिना हा वर्ग चालू ठेवला तेव्हा बऱ्याच विद्यार्थिनी उशिरा येत होत्या किंवा आल्या तर बाहेर बसायच्या असे चालू झाले. पुन्हा एकदा विद्यार्थिनी आणि पालक यांची एकत्रितरित्या मीटिंग घेतली. त्यामध्ये एक अडाणी असलेल्या पालक बाई म्हणाल्या,

“मी या सगळ्याची जबाबदारी घेते रोज अकरा वाजता मी येऊन शाळेपाशी बसते एकही मुलगी इकडे तिकडे फिरणार नाही सगळ्या आत जातील ही जबाबदारी मी घेते आणि त्या बाईने मुलींना एक लेक्चर दिले अगदी… का ग टिंब टिंब नो एवढी शाळा तुमच्यासाठी काय काय करायली,… ही बाई एवढं तळमळून सांगायली… अन तुम्हाला नग वाटते होय ग… आमच्या काळात शिक्षण नव्हतं म्हणून आमची अशी तरा झाली… तुम्हाला एवढ आम्ही शाळेत घातले चांगले शिका की 

… मग बसाल आमच्यासारख्या भाकऱ्या थापत अन शेण लावत. अगं पोरींनो तुम्ही पास झाला तर तुमच्या आई बाचं नाव होईल ह्या बाईचं नाव होणार आहे का ?ऐका जरातेवढी तळमळून सांगायला लागली “

झालं या भाषणा नंतर सभेचा नूरच बदलला प्रत्येक पालकाने आपल्या मुलीची जवाबदारी घेतली वर्ग व्यवस्थित सुरू झाले आणि त्यावर्षीचा रिझल्ट सेवासदन च्या आत्तापर्यंतच्या रिझल्ट मध्ये सर्वाधिक म्हणजे 92 टक्के लागला तेव्हा एवढे रिझल्ट लागत नव्हते आणि कॉपी वगैरे प्रकरणं फार प्रचलित नव्हती आणि आमच्या शाळेत तर नाहीच नाही.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आज एक बातमी वाचली 45 हजार रुपये देणाऱ्यांनाच मोटेगावकर प्रश्न देत असत.

फुकट शिकवल्यावर किंमत नसते म्हणून 1रू घेऊन महिनाभर शिकवणारे आम्ही शिक्षक आणि त्याला गुरुदक्षिणा हे भक्कम नाव देणारे… आणि शाळेचा निकाल उत्तम पद्धतीने वाढला पाहिजे यासाठी मुलींच्या वर्गाचे नियोजन करूनमोफत शिकवणारे आमचे शिक्षक त्याला सहकार्य करणारे पालक या सगळ्या घटना 20-22 वर्षांपूर्वीच्या आहेत 22 वर्षांमध्ये एवढ अधःपतन व्हावे याचे वाईट वाटले…!

आता तुम्ही म्हणाल तुमचं काय नीट च नव्हतं पण आमचं त्या गरीब मुलींचं नीट व्हावं म्हणून तरी नक्कीच होतं

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ताकद शांततेची – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ ताकद शांततेची – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे वळण येते जिथे शब्दांच्या तलवारीने काळजावर वार केले जातात. जेव्हा एखादी व्यक्ती आपला सतत अपमान करते तेव्हा सुरुवातीला मनात संताप येतो मग वेदना होते आणि हळूहळू आपण स्वतःच्याच नजरेत स्वतःला कमी लेखू लागतो. पण खरं सांगू का?अपमान हा देणाऱ्याचा स्वभाव असतो पण तो स्वीकारायचा की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. जेव्हा समोरची व्यक्ती वारंवार कटू शब्द बोलते तेव्हा ती प्रत्यक्षात तिच्या स्वतःच्या मनातील गोंधळ मत्सर किंवा न्यूनगंडाला वाट करून देत असते. आपण मात्र ते शब्द एखाद्या ओझ्यासारखे आपल्या खांद्यावर वाहत राहतो.

खरंतर समुद्राच्या लाटा जशा किनाऱ्यावरील खडकावर आदळून परत फिरतात तसाच आपला स्वभाव असायला हवा. खडक शांत असतो स्थिर असतो आणि लाटांच्या आदळण्याने त्याचे अस्तित्व संपत नाही. आपली शांतता हेच अशा अपमानाला दिलेलं सर्वात सडेतोड उत्तर असतं. कारण आपण जेव्हा प्रत्युत्तर देतो तेव्हा आपण नकळत समोरच्याच्या पातळीवर उतरलेलो असतो. कधीकधी हा अपमान आपल्याला खूप काही शिकवून जातो. ज्यांनी आपल्याला कमी लेखलं ज्यांनी आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं तेच लोक कळत-नकळत आपल्याला प्रगतीची जिद्द देऊन जातात. अपमान पचवणं सोपं नसतं पण जो तो पचवून त्याचं रूपांतर ऊर्जेत करतो तोच इतिहासाच्या पानात स्वतःचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहितो.

जगातील मोठ्या क्रांती या बहुतेक वेळा कोणाचे तरी हसे उडवल्यामुळे किंवा कोणाचा तरी घोर अपमान झाल्यामुळेच घडल्या आहेत. अशा वेळी स्वतःला दोष देणं थांबवा. तुमच्या सौंदर्याची तुमच्या बुद्धीची किंवा तुमच्या कर्तृत्वाची किंमत एखाद्या व्यक्तीच्या शब्दांवरून ठरत नाही. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांच्यापासून हळूच दोन पावलं मागे होण्यातच शहाणपण असतं. स्वतःचा आदर करायला शिका कारण जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तेव्हा जगातील कोणताही शब्द तुम्हाला जखम करू शकत नाही. तुमचं मौन इतकं प्रगल्भ असू द्या की समोरच्याला स्वतःच्या शब्दांच्या पोकळपणाची जाणीव व्हावी. शेवटी सूर्याला कोणी कितीही दूषणं दिली तरी त्याचा प्रकाश कमी होत नाही तसंच तुम्ही तुमच्या तेजाने तळपत राहा अपमान करणाऱ्यांचे शब्द आपोआप हवेत विरून जातील. तुमच्या शांततेत इतकी ताकद असू द्या की, समोरच्याच्या शब्दांना स्वतःचीच लाज वाटली पाहिजे.

“मित्रांनो;काळजी घ्या… “

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आजकालची लग्न म्हणजे” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आजकालची लग्न म्हणजे…” ☆ श्री मंगेश मधुकर

परिचयातल्या एकाच्या मुलीच्या लग्न होतं. आग्रहाचं आमंत्रण असल्यानं तासाभराचा प्रवास करून संध्याकाळी सहाच्या सुमारास विवाहस्थळी पोचलो. सव्वा सहाचा मुहूर्त होता. भल्या मोठ्या लॉनमध्ये जंगी तयारी. पाचसातशे खुर्च्या मांडलेल्या. पाहुणे मंडळीचा ओघ सुरू होता. स्टेजवर सत्कार सुरू होते. तीस-चाळीसजण तिथं उगीचच गर्दी करून उभे होते. माईकवर नावं पुकारणाऱ्या दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींमध्ये मोठा आवाज कुणाचा? यावर स्पर्धा चाललेली त्यात भरिसभर म्हणजे दोघं एकाचवेळी बोलत असल्यानं सत्कार घ्यायला येणाऱ्यांना नक्की कोणत्या बाजूला जायचं हे कळत नव्हतं. यामुळे वातावरण तापायला लागल्यावर नवरीच्या मामानं आपल्या माणसाला थांबायला सांगितल्यानं पुढचे सत्कार नीट सुरू झाले. काही वर्षांपासून लग्नात सत्काराचं फॅड बरचं वाढलंय. त्यावरून बऱ्याच मानपानाच्या घटना घडतात. खरं तर या सत्कारांकडं कोणाचं फारसं लक्ष नसतं पण त्याला फार महत्व आलंय. एवढं मात्र नक्की!! असो.

अचानक मुहूर्ताची आठवण झाल्यानं नवरा-नवरीला स्टेजवर बोलावलं गेलं तोपर्यंत साडे-सहा वाजलेले. मुहूर्तची वेळ टळून गेलेली पण त्याविषयी कोणाला देणघेणं नव्हतं. मुहूर्ताची वेळ फक्त पत्रिकेत छापण्यासाठीच असते. बाहेर डीजेच्या दणदणाटात वरात सुरू झाली.

घोड्यावर विराजमान नवरदेव, समोर नाचणारे मित्र-नातेवाईक तर लॉनच्या दाराशी वाट बघणारी नवरी. स्टेजवर चालू असलेले सत्कार आणि वेलकम ड्रिंक, स्टार्टरमध्ये गुंतलेली पाहुणेमंडळी. असं एकूणच नजारा.

सुमारे पाऊण तासानं वरात दाराशी आल्यावर जोरात नाचगाणं झालं त्यात नवरदेवही नाचले. नवरीला पण आग्रह झाला पण ती आली नाही. सुवासिनींनी ओवाळल्यावर रंगबिरंगी दिव्यांच्या झगमगत्या रथात नवरा-नवरी बसले. साधारणत: पाचशे मीटरचं अंतर त्यातही रथाच्या बाजूंनी फटाक्यांची आतषबाजी, मशीनमधून धूर सोडला जात होता सोबत सोनेरी कागदाची चमचम उधळली जात होती, पुढे सहा तरुणींचे समईनृत्य परंतु स्पीकरवरचं गाणं सारखं बंद पडायचं म्हणून वैतागून सगळ्याजणी चालायला लागल्या. या शाही वरातीचे उत्सवमूर्ती नवरा नवरी मात्र अवघडल्यासारखे बसलेले. त्यातही नवरी खूप एक्साईट झालेली. सगळा प्रकार फार भन्नाट, भारी वाटत असल्याचं तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं. नवरा मात्र बावचळल्यासारखा टकामका पाहत होता. रथ स्टेजजवळ पोचल्यावर सत्कार थांबले. दोन्ही कुटुंबातर्फे पुन्हा पाहुण्यांचं स्वागत केल्यानंतर दोन पुढऱ्याचं आशीर्वादपर भाषणं झालं आणि अंतरपाट धरला गेला.

पहिली मंगलअष्टका झाल्यावर अक्षतांची वारेमाप उधळण झाली. त्यानंतर एकच मंगलअष्टका म्हटली गेली आणि “लग्न” लागलं. आकाशात डोळे दिपवणारी फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ती दहा मिनिटं चालली आणि “लग्न” मात्र अवघ्या तीन मिनिटांत लागलं. लगेचच पाहुणे मंडळीं जेवणाच्या हॉलच्या दिशेने पळाली. काही क्षणांपूर्वी सेलिब्रिटी असणारे नवरा-नवरी एकदम बेदखल अर्थात ती दोघंसुद्धा जग विसरून फोटोसाठी पोजेस देण्यात बिझी. नवीन जोडप्याला शुभेच्छा आणि आहेर देण्यासाठी लागलेल्या रांगेत मीही सामील झालो.

बुफे काउंटर जवळ तुफान गर्दी झालेली. दिसेल त्या मोकळ्या जागेत बसून खाणं चाललेलं. प्रत्येकाची ताटं गच्च भरलेली. त्यातलं बरंचसं टाकून दिलं जात होतं. अन्नाची नासाडी पाहून जेवायची इच्छा राहिली नाही. घड्याळात पाहिलं तेव्हा साडेआठ वाजून गेलेले. न जेवताच निघालो.

डोक्यात विचारांचा कल्लोळ…

  • आताशा ‘लग्न” मंगल सोहळा न राहता भपकेबाज इव्हेंट झालाय.
  • परंपरांसोबतच अनेक फिल्मी आणि खर्चिक गोष्टींच प्रमाण वाढलंय.
  • आपुलकी, आपलेपणा, अगत्य कमी आणि दिखाऊपणा जास्तच असतो.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मीपण’ गळून जावे… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ ‘मीपण’ गळून जावे… ☆ राधिका भांडारकर ☆

त्यादिवशी ती मला सांगत होती, “मी आहे म्हणून यांचं बरं चाललंय. माझ्यामुळेच यांचं सारं सुरळीत चाललं आहे. संसाराचा रगाडा काही कमी असतो का? सगळं काही मी खांद्यावर पेलते म्हणून यांना कसली ददात नाही, तोशीश नाही. उद्या मी गेल्यावर यांचं कसं होईल गं? याची चिंता मला लागून राहिली आहे. ”

… थोडक्यात ‘मी मी आणि मीच’. माझ्या आधीही मीच, आताही मीच आणि नंतरही मीच. तिचं हे लांबलचक “मी पुराण” ऐकून मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं पण तिला काही समजूतीचं लवचिकतेचं, दूरस्थ, निवृत्त राहण्याबाबतीतलं काही सांगावं असंही मला वाटेना. कारण ती तिच्या ‘मीपणात’ इतकी डुबून गेली होती की माझं बोलणं तिनं माशी सारखं उडवून दिलं असतं. शेवटी मी तिला इतकंच म्हणाले, “खरोखरच तू सुपर वुमन आहेस. ”

आमच्या सोसायटीतल्या मिसेस उदगावकर ही अशाच. तशा त्या देखण्या आहेत, त्यांची राहणी नीटनेटकी आहे, धनवानही आहेत, पारिवारिक आयुष्यात तशा सुखीच. रोज संध्याकाळी कट्ट्यावर येतातही पण बाईच्या चेहऱ्यावर अदृश्य अक्षरे लिहिलेली जाणवतात. ”आय अॅम द बेस्ट! ” माझ्यासारखी मीच. जे जे काही नंबर वन ते सगळं सगळं माझ्याकडे आहे. ”

.. …. तशा बोलतात सगळ्यांशी पण चेहऱ्यावर असलेला कायमस्वरूपी, दुसऱ्यांच्या बाबतीतला तुच्छताभाव कधीही लपत नाही. ज्या दिवशी त्या कट्ट्यावर येत नाहीत तो दिवस भाग्याचाच असतो म्हणाना सगळ्यांसाठी.

“आज आल्या नाहीत का मिसेस “फुशारकी”? बरं झालं! ” असं म्हणून कट्ट्यावर एक अत्यंत नैसर्गिक असा हशा पिकतो.

समोरचे नानाही त्याच पठडीतले आहेत. ”आपलं बुवा असं आहे. भल्याभल्यांनी माझ्यापुढे नाकं घासली आहेत आता सांगा? ”

पण नानांच्या बाबतीत एकदा कुणीतरी म्हणाले होते, ” अहो! कोण विचारते या नानांना? निवृत्त झाले तेव्हा साधा निरोपसमारंभ ही कुणी आयोजित केला नाही यांच्यासाठी. एकही मित्र, स्नेही यांना नाही. पत्नी बिचारी त्यांचा हा अहंभाव, मीपणा नाईलाजाने सहन करते पण मुले कुठे विचारतात? ”

 – – थोडक्यात ही “मीपण” पांघरून वावरणारी माणसं असतात ना ती आपल्या पलीकडे काही जग आहे हे विसरूनच गेलेली असतात. अत्यंत अहमन्य आणि आत्मकेंद्री असतात ही.

मला आठवतंय एकदा मी माझ्या नातीने (वय वर्ष सात) काढलेलं एक सुंदर चित्र जवळच्या एका नातेवाईक स्त्रीला दाखवत होते. खरं म्हणजे तिने ते नीट पाहिलं सुद्धा नाही. कौतुक करणं तर दूरच राहो पण फाटकन म्हणाली,

.. “छे हो! हे तर काहीच नाही. माझ्या नातवाने केलेली पेंटिंग्ज तुला दाखवेन. रवी वर्माने पाहिली असती ना तर त्यानेही त्याचं कौतुक केलं असतं. आमच्या घरात एका खोलीत माझ्या सुनेने त्याची सर्व पेंटिंग्ज भिंतीवर छान रचनात्मक पद्धतीने लावून ठेवली आहेत. ये एकदा पहायला मग कळेल तुला. ”

– – तिच्या कलाकार नातवाचं मला का कौतुक नसावं पण *त्या दिवसाचा एक अत्यंत बावळट चेहरा म्हणून*(Todays Face या मोडमध्ये) माझा क्रमांक नक्कीच लागला असता…. तिनं माझ्या वात्सल्य भावनांना अथवा ममत्त्वाला किती दुखावलं याचा तिला पत्ताही नसेल इतकी ती स्वतःत गुंतलेली होती. तिच्या “मीपणाच्या” रम्य कल्पना विश्वात ती मात्र खरोखरच खुशीत असावी. *खुदपसंत* यालाच म्हणतात का?

अशा अहंभावात रमलेल्यांना काय कळणार हो संत रामदासांचा दासबोध आणि युगंधराची गीता? हे लिहिताना “गाढवापुढे वाचली गीता” ही म्हण मात्र माझ्या मनात अगदी बिनदिक्कत प्रवेश करती झाली.

भगवत गीतेनुसार “मीपण” म्हणजेच अहंकार, म्हणजेच दुःखाचे मूळ कारण. अहंकार सोडून निमित्तमात्र होऊन कर्म करणे, निस्वार्थ भावनेने जगणे आणि देहबुद्धी न ठेवता आत्मरूपाने राहणे, अहंकाराचे विसर्जन करणे, मीपण गळून जाणे हे तत्त्वज्ञान यांच्या कधीतरी पचनी पडो असाच धावा जणू मी या समस्त “मीपण” बाळगणाऱ्यांसाठी परमेश्वरापाशी करेन.

– – या “मीपण” असणार्‍यांच्या गोतावळ्यात जेव्हा मी चेंगरून जाते तेव्हा नकळत स्वतःलाही तपासून पाहते बरं का! मी थोडीच साधू संत आहे? तसे काही विकार माझ्यातही असणारच ना? *कोहम* हा प्रश्न माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जेव्हा घुमतो तेव्हा मीही अशीच भांबावते. खरं म्हणजे त्या क्षणी ही जी काही माणसं माझ्या भोवती अहमन्यतेचे झेंडे घेऊन परिक्रमा करत असतात तेव्हा मी सावधपणे विचार करू लागते” मी कशी आहे? ” यापेक्षा मी कशी असले पाहिजे याकडे आपोआपच लक्ष केंद्रित करते. झाडावरून एक पान अलगद माझ्या पायाशी गळून पडतं आणि तेव्हाच त्या गळून पडलेल्या पानाच्या स्वधर्माशी मी मला तपासून पाहते. माझ्यात असलेलं “मीपण” हे असंच या पानासारखं गळून पडावं. नको अहंकार, नको मोह, नको पाश. मुक्त तरी जोडलेलं, स्वतंत्र तरी नम्र. “मी आणि माझे” या रेषा ओलांडून पूर्णपणे विसावलेलं असं माझं मन असावं मग या सुखाच्या अविकारी मार्गावरून जाण्याची मला ओढ लागते पण जमेल का मला हे?

खरं म्हणजे मनातल्या मनात मी कधीतरी, माझ्या भोवतालच्या या अहंकाराने पछाडलेल्या माणसांचे आभार मानते कारण त्यांच्यामुळेच “मीपणा” गळावा या चिंतनयुक्त तत्त्व रेषेवर मी येऊन पोहोचलेली असते. समाजात अशा माणसांची होणारी थट्टा, उपहास, निंदा, नकोसेपण आणि पर्यायाने त्यांचे अंतिम एकटेपण पाहून मला या अवगुणांपासून दूर जावेसे वाटते.

– – एक असतो अर्ध्या हळकुंडात पिवळा होऊन समाजात स्वतःचीच पाठ थोपटत बडेजावात मिरवणारा तर दुसरा असतो साधक, तपस्वी, स्थिर, शांत, निगर्वी. त्याच्या ठायी असलेल्या महान कलागुणांचा त्याला इतकासाही दर्प नसतो, अहंकार नसतो. तो त्याच्या प्रेक्षकांसमोर श्रोत्यांसमोर, शिष्यगणांसमोर आणि स्वतःच्या कलेशीही सदैव लीन असतो. श्रेयस आणि प्रेयस मधल्या कलहात तो कधीच नसतो. शेवटच्या श्वासापर्यंत “मीपण” पार गळून गेलेला तो फक्त एक अभ्यासक असतो.

.. आज मी नसेन तशी, नाहीच. पण उद्याच्या वाटेवर मी नक्की प्रयत्न करेन.

‘ लहानपण देगा देवा … मुंगी साखरेचा रवा.. ’

– – यातला “लहानपण” हा शब्द खूप व्यापक आहे. ”लहानपण” म्हणजे मीपणा, मोठेपणा गळून गेलेला काळ.

.. “ भगवंता माझ्यातले “मीपण” असेच गळून जावे इतकेच माझे मागणे ”.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares