मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 4 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 4 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

त्याला (authentic) म्हणतात?

सकाळी न्याहरीला चुलीवर खूप वेळ शिजत ठे4वलेली घरच्या तांदुळाचे अटवलं, मऊ भात शिजत ठेवलेला असे त्यातच दारच्या वेलाची तोंडली शिजायला टाकलेली असत भाताबरोबर ती मऊ लुसलुशीत होत. खायला केळीच्या पानाच्या फाळक्यावर वाढून घेतले जाई. हे केळीच्या पानाचे फाळके मी व मावशी वाडीत जाऊन हाताने काढून आणत असू केळीच्या मोठ्या उभ्या पानातून अलगद आडवे पान कापुन घेऊन मग मधल्या दांड्यातून ते फाडून घ्यायचे. पण हा मधल्या दांड्याला जोडलेला पानाचा भाग काढायचे कौशल्याचे आणि रोजच्या सवयीचे असल्याने मावशी लीलया काढी. मी कधी प्रयत्न केला तर पान फाटे पण हळूहळू तेही जमले टाकीवर धुवून घेऊनच आत येत असू.

तर असे हे फाळके हारीने मांडून त्यावर गरम गरम भात आणि प्रत्येकाच्या पानात मऊ झालेले तोंडले ते कुस्करून त्यात दही तिखट मीठ प्रत्येकाने आपापले मिसळायचे हे तोंडल्याचे झटपट भरीत भाताबरोबर मुटू मुटू खाऊन तृप्तीची ढेकर द्यायची.

कधीकधी आजी तांदळाची उकड करत असे तीही रुचकर लागे पोहे घरचे असत घरच्या भाताचे जरा जाडसर करून आणलेले. त्यात दारातला नारळाचा चव लाल तिखट मीठ साखर व तेल एवढेच घालायचे त्याला म्हणायचं हात फोडणीचे पोहे इतके रुचकर लागत. आम्ही ते केव्हाच मटकावत असू. आंब्याचा हंगाम असल्याने सर्व झाडांना पाडाला आलेले आंबे लटकलेले असत. वारं सुटलं की आंबे बदा बदा खाली पडत. रायवळ, तोतापुरी, पायरी, अशी विविध जातीची झाडे होती. 

सकाळी भिक्षुकीची कामे आवरली की आजोबा घरी येत. उंच, गोरे, कानात बिगबाळी, धोतर व पांढरा शर्ट परिधान केलेला असे. ओल्या सुपार्या कातरून जेवण झाल्यावर अडकीत्त्याने कातरत मुखशुद्धी करिता खायला घेत, भिंतीत एक गोल तोंडाचा कोनाडा होता. त्यातही काही साहित्य ठेवलेले असे. कधी ते ओटीवर लोडाला टेकून बसलेले असत. आम्ही वाडीत आंबे मिळतील का असे त्यांना विचारात असु, ते म्हणत, “जा आंबा मिळेल!” मग भराभरा वाडीत जात असू. आंबे पडायची वाट बघत असू. एक गाणं ही म्हणत असू. ते असे, “आपटं धोपटं, पायलीचा पोपटं, पहिला आंबा पडेल तो देवाला!” आणि मग वारं येई आणि धपकन आंबे पडत. ते वेचून आणत असू. या रायवळ आंब्याचे ‘कोयाडं’ करत. बाठी पातेल्यात पिळायच्या, सालीचा गर पाण्यातून काढायचा, ते पाणी दाट असायचे, ते बाठीत ओतायचं खमंग मेथी, हिंग, मोहरीची फोडणी त्या पाण्याला द्यायची, मीठ, तिखट, गुळ घालून उकळी आणायची झालं ‘कोयाडं’ तयार. इतके रुचकर लागते की दिल आणि रसना खुश व्हावी. 

दुपारची जेवण झाल्यावर मोठी माणस अंमळशा झोपत, आम्ही मुल धाकटे मामा, मावशी आम्ही दोघ भावंड असा आमचा बेड्यात (गोठा) पत्याचा वख्खईचा डाव पडे दोन-तीन तास रंगत रंगत संध्याकाळ होई. त्याबरोबर दारच्या कैर्या तिखट-मीठ लावून खाता खाता आनंद सोहळाच साजरा होई. काहीवेळा ओटीवर असलेल्या खांबांना धरून आम्ही खांब, खांब, खाम्बोल्या असा खेळहि खेळत असू. अधूनमधून समुद्राकाठी संध्याकाळी फिरायला जाण ही होई. समुद्र तसा जरा दूर पश्चिम दिशेकडे होता, १ किलोमीटर  चालत जावे लागे. ही घरे पूर्वेकडे होती. समुद्रात पाण्यात खेळणे, वाळूवर किल्ले करणे, कधी कवड्या शिंपले  वेचणे चालू असे. काहीवेळा समुद्राच्या लाटेबरोबर लाट विरली की शंख , गोगलगायीचे गोल शंखही वाहात येत, चुकून वेचायला गेल तर आत किडा असेच मग जोरात फेकून देत असू. पुन्हा पाण्यात! थोडी भीतीही वाटे. मग सूर्याचे सागरात हळूहळू अस्ताला जातानाचे दृश्य विलोभनीय असे, मग सायंकाळचे तांबूस रंग आकाशात रेंगाळत थोड्यावेळात संधी प्रकाश दिसू लागे. आमची पावले घराकडे परतत. उन्हाळा म्हटलं की, काळीमैना डोंगराची मैना करवंद आणि जांभळं यांचाही हंगाम जोरात असे, मी व मावशी शेताच्या पलीकडे डोंगरीवर जात असू. तिथे करवंदीच्या जाळ्या भरपूर होत्या. इतकी ताजी करवंद खाण्यात अप्रूपच असे. वाडीत जांभळीची जांभळे वेचून ती गोडीही चाखण्यात आनंद असे. 

एका चुलत मामाचे घर शेजारी होतं तिथे बकुळीचे उंच झाड होतं. संध्याकाळच्या वेळेस बकुळीच्या फुलांचा सडा पडे आम्ही तीही आनंदाने वेचत असू. घरी जाऊन नारळाच्या झावळीचे कोवळे हिरं काढून बकुळीचा गजरा ओवत असू. त्या बकुळीचा घमघमाट अजूनही मला येत असल्यासारखा भासतो बकुळ फुलं सुगंधाने भरलेली कुपीच जणू! वाळलं तरी त्याचा परिमल आनंद देत राही.

—-क्रमश:

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 3 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 3 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

घरात परतत असू………. च्या पुढे?

आजीने केलेले ताजे लोणचे आमटी भात तोंडल्याची भाजी खाताना जेवणाची मजा येत असे. तसे पूर्वी भाकरी पोळी कमीच दोन्ही वेळा भातच असे. भाकरी संध्याकाळी तांदळाच्या गरम गरम आजी पंगत बसली की करत असे त्या भाकरी सोबत नारळाची लसुण व लाल तिखट, किंचीत आंबट घातलेली चिंच मीठ साखर आणि पाट्यावर वाटलेली चटणी लज्जतदार लागे.

असे करत रात्रीची जेवणे झाल्यावर, अंथरुणं पडतं फार उन्हाळा व उकाडा वाढला की मागच्या दारी घातलेल्या तात्पुरत्या मांडवात बिछाने घालत वार्यावर झोप लगेच येई काही वेळा गप्पा रंगत. मोठा मामा भुताच्या गोष्टी सांगत असे. त्यामुळे सुरुवातीला उत्कंठा वाटे पण नंतर बोबडी वळे. गिर्हा, जखीण, मुंजा, अशी काहीतरी नाव असत रात्रीच्या वेळी ते अधिकच भयप्रद होई. मग अंगाचे मुटकुळे करून डोक्यावर पांघरूण घेऊन डोळे गच्च मिटले जात. सकाळ कधी होई ते कळत नसे.

सकाळी उठून प्रात:र्विधी आवरण्याची घाई असे. तोंड धुण्यापासून सर्व मागच्या हौदावर जाऊनच करावे लागे. हल्ली सारखी घरातल्या घरात बेसिन नळाला पाणी अशी सोय नव्हती. शौचालाही खूप लांब घरापासून पाचशे फूट अंतरावर जावे लागे. पत्र्याची चौकोनी बांधलेली बंदिस्त खोली मागे चर पाडलेला असे. लहान मुलांसाठी लांब लाकडे टाकून केलेली तळात चर असलेली व्यवस्था म्हणजे त्याला ठाकुली म्हणत.

हौदात पाणी येण्याकरता विहिरीवर रहाट असत. मोठे लाकडी चक्र त्यावर सुंभा च्या दोरीने आडवे बांधलेले पत्र्याचे डबे किंवा मातीचे पोहरे म्हणजे मडके असे. त्या चक्राचा लांब दांडा विहिरीच्या बाहेरच्या बाजूला असे त्याला ही लाकडी चक्र जोडलेले असे आणि वरून खाली उभा खांब जमिनीत उभा केलेला असे. त्या खांबाला दुसरा एक आडवा बांबू जोडून ते जोखड बैलाच्या पाठीला बांधत बैलाच्या डोळ्यावर झापड बांधलेले असे मग त्याला जुंपले की तो गोल गोल फिरत राही.म्हणजे चाकांना गती मिळून रहाट फिरू लागे तसतशी एक एक पोहरा विहिरीत सर सोडलेल्या माळे वरून पाण्यात बुडे व भरून निघून रहाटावरून उलट होत वरच्या बाजूला जोडलेल्या पत्र्याच्या पन्हाळात उलटा होऊन पाणी पडे ते पुढे सिमेंट बांधलेल्या दांड्या तून थेट वेगाने हौदाकडे वाहू लागे मग टाकी भरून घेतली जाई

त्याच पाण्याने खाली गुरांना पाणी प्यायची टाकी असे तीही भरे मग या दोन्ही टाक्यांची तोंडे गच्च कपड्याच्या बुचाने रोखली जात आणि पाणी नारळ पोफळीची जी बाजू त्यादिवशी पाणी सोडायची असेल तिथे सोडले जाई. याला शिपणं करणे असे म्हणत. हे रोजचं काम आणि प्रत्येक घरातून सकाळच्या वेळी चालू असे.रहाटाचा कुईsss कुईsss आवाज येणे ठरलेलेच असे.

वेगवेगळ्या ऋतूत तेथे वेगवेगळी मजा असे उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे फणस जाम कोकम, पोह्याचे पापड याची मज्जा असे कोकम फळे आणून फोडून टाकून  बियांचा गर एका पातेल्यात जमा होई. वरची टरफले साखर भरून बरणीत ठेवली जात मिठ ही घातले जाई मग त्याला भरपूर रस सूटे. रस ओतून घेऊन त्यात प्रमाणात पाणी साखर मीठ घातले, थोडी जिरेपूड की झालं कोकम सरबत तयार हे ताज्या फळाचे सरबत अप्रतिम चवीचे लागे उन्हाळ्यात तखलीकीने कोरडा पडलेला घसा शांत होई

जाम हे किंचित पांढरे हिरवी झाक असलेले भरपूर पाण्याचा अंश असलेले फळ प्यास लागलेली शमन करत असे. एखादा दिवस पापड करण्याचे ठरे. लाकडी उखळीत पोह्याचे पीठ तिखट मीठ हिंग पापड खार पाणी हे प्रमाणात घालून मुसळाने कुटले की पापडाचा गोळा तयार होई, काही वेळेला कांडपिणी असत त्या कुटून देत मग मावशी, आई, आजी व मी मोठे मोठे पोळपाट घेऊन सरासरा पापड लाटत असू. मावशीचा लाटण्यावर खूपच हात चाले मग कोण जास्त पापड लाटतो अशी शर्यत ही लागे. असे पापड उन्हात घालून वाळल्यावर खाण्यातली मजा काही औरच असे. ताकातले हि पापड आजी चविष्ट करीत असे. तसे पापड आता मूळ चवीचे खायला मिळत नाहीत. हल्ली त्याला (authentic) म्हणतात. 

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 2 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 2 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

मग घरात प्रवेश मिळे…… च्या पुढे?

मामाच्या घरापुढे सारवलेलं अंगण असे. आठ दहा उंच दगडी पायर्या चढून गेले की घराच्या लांबी इतका पुढे खांब असलेला (हल्लीचा व्हरांडा) जवळ जवळ ५० फुट लांब ओटीच्या बाहेर पडवीचा भाग आणि मग चौकोनी ओटी, त्यावर गादी, तक्के अशी बैठक असे. भिंतीत बरेच कोनाडे होते. या कोनाड्यात धाकटे मामा, ‘बुगुबुगु’ असा तोंड घालून,नंदीबैलाचा आवाज काढीत. तो आत घुमत असे. मी लहानपणी त्या ‘बुगुबुगु’ आवाजाला घाबरत असे. डाव्या अंगाला एक दार आहे. तेथे आत बापूंच माजघर आहे, त्या माजघराला हे नाव पडले होते. पूर्वी एकत्र कुटुंब असे, त्यातल्या एकाचे नाव असेल. ओटीवर उजवीकडे काळ्या पॉलीशचे पितळी चकत्या असलेले दर्शनी दार, त्यातून प्रवेश केला की मोठ माजघर, एकीकडे उजव्या हाताला लागतो लाकडी बांधलेला झोपाळा. समोर स्वयंपाकघरात जायचे दार, डाव्या हाताला देवघर त्याच्या समोर मागच्या पडवीत जायचे दार दाराच्या आत छोटीशी ओटी सारखी जागा व समोर उतरले की पुन्हा घराच्या लांबी एवढीच मोठीच्या मोठी पडवी एका बाजूला नारळ ठेवलेले असत, भिंतीवर कोयताळे असे. त्यात निरनिराळे कोयते असत. समोरच बाहेर पडायचे दार टाकीकडे वाडीत जायला यायला. इकडे उजवीकडे चुली घातलेल्या होत्या. तेथेच पडवीत शिंकाळे टांगलेले होते. त्यात नारळ फोडला की उरलेल्या कवडी बागेतून आणलेल्या भाज्या केळीचे फाळके ठेवलेले असत. पडवीला अर्धीभिंत व त्यावर गजाचे उघड्या भिंतीवर रोवलेले मोकळे ढाकळे आवरण, ज्यातून मुक्तपणे हवा खेळे. त्यामुळे त्यावेळी फ्रीज नसले तरी नारळ भाजी हवेच्या गारव्यात टिकून राही. अलीकडल्या भिंतीला घुसळखाम्बा म्हणजे साईचे ताक साधे ताक घुसळण्यासाठी केलेले. दोन भिंतीतील हुक त्याला अडकवलेल्या दोऱ्या, त्यात रवी उभी करून बरणीत सोडायची व दुसरी दोरी रविला गुंडाळायची आणि दोरीची दोन टोके मागे पुढे ओढली की रवी अलगद ताकात फिरून लोणी चट्कन येई हे एक यंत्र म्हणाना कां? सोपं सुटसुटीत! पुढे गेल्यावर उजवीकडे दार होते बाहेर पडायला त्याच्याबाहेर सुम्भाच्या दोरीच्या शिंकाळ्यात छोटे मातीचे मडके टांगलेले असे. त्यात दात घासायला ‘कणे’ ठेवलेले असत. कणे म्हणजे भाताच्या वरची निघालेली फोलपटे, जाळून त्यांची केलेली राखुंडी, दात घासण्यासाठी व भांडीही स्वच्छ करण्यासाठी वापरत असत. तेथून बाहेर पडले की समोरच बांधलेला मोठा सिमेंटचा हौद आहे. तो सतत विहिरीच्या पाण्याने भरलेला असे. पाणी घ्यायला पितळी तपेल्या असत. किंवा छोट्या पत्र्याच्या बादल्या असत. एका बाजूला मोठी धोंड आडोसा केलेली, नारळाचे झाप विणून त्त्याला लावलेले असत. त्याने गोठा, घरे शाकारली जात. हे झाप विणायला बायका रोजंदारीवर येत असत. नारळाच्या हिरव्या झावळ्या काढून त्या चटई सारख्या विणल्या जात. ती एक उत्कृष्ठ कला होती. आता कितपत टिकून आहे माहित नाही. 

हौदाच्या उजव्या अंगास पाणी तापवायला चूल घातलेली असे. जळण वाडीतले भरपूर असे. नारळाची चोड, (अखंड नारळ सोलून निघालेली साल) नारळाच्या वाळलेल्या झावळ्या इतर काटक्या असत. पाणी काढून धोंडीवर बादलीत आणायचं भर घालायची की अंघोळीची तयारी व्हायची लहानपणी आजी कौतुकाने न्हायला घाली रिठ्याने केस धुवायची शिकेकाईनेही असे. किती जपले तरी थोडे तरी पाणी डोळ्यात जाई व डोळे चुरचुरत. पण आजीने घातलेली कौतुकाची अंघोळ या लाडावलेल्या नातीला मनापासून आवडे. 

माजघरातून उजव्या हाताला दार होते ते दुकानाच्या पडवीत उघडे. तेथेच लागून जिना होता, घराच्या माळ्यावर जायला, दुसरा आतून डाव्या बाजूला बापूच्या माजघराजवळ होता. पूर्वी खेडेगावातलं किराणा मालाचं दुकान आजोबा चालवत असत. म्हणून त्या पडवीला कायमचे नाव दुकानाची पडवी असे पडले. लाकडी झोपाळ्याच्या उजव्या हाताला बाळंतीणीची खोली होती. आणि एरवीची आजी आजोबांची खोली असे. त्यात महत्वाचे अंगावरचे डाग, रक्कम इत्यादी ठेवलेले असे. 

समोरच्या बाजूस स्वयंपाकघाराचे दार होते. आत प्रवेश करताच उजवीकडे दाराच्या बाजूला मांडणी. डावीकडे माजघराच्या भिंतीला भिंतीत कपाट, आणि पूर्वेच्या भिंतीला खाली दोन चुली, बाजूला वैल हि होता. पडवीच्या भिंतीला पाण्हेरे ( पाण्याचे हंडे , पिंप ठेवायची जागा) तेथे बाजूला हात धुवायला छोटी मोरी होती. बाहेर जायचे दाराच्या उजव्या हाताला भिंतीतले फडताळ असा हा स्वयंपाकघराचा सरंजाम. तेव्हा पितळी ताटे, वाट्या, भांडी, वापरायची पद्धत होती. ताटांना कल्हई लावली जाई.

आम्ही मुंबई हून आल्यावर घरात प्रवेश केल्यावर पहिले हौदावर (टाकी) जाऊन हात पाय धुवत असू. मग चपला घालून मामाच्या वाडीत भिरी भिरी हिंडून वाडीभर प्रत्येक झाडा पानांचे निरीक्षण करत असू. बोटीतून आल्याने डोळ्यात व डोक्यात सतत एकतास हलणारे फिरणारे पाणी पाहिल्याने काहीवेळ डोक्यात फिरल्यासारखी जाणीव होत राही. वाडी पाहतानाही असेच फिरल्यासारखे होई, पण सर्व नजरे खाली घालून आम्ही जेवायची हाकाटी आल्यावर घरात परतत असू.

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गिरगावातला गोविंदा ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ गिरगावातला गोविंदा ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

 

श्रावण महीना सुरू झाला की आपल्या सणांची सुरवात होते आणि नकळतच मन गिरगावात पिंगा घालायला लागते.

नाग पंचमी, राखी पौर्णिमा ह्यानंतर आठवड्यानी येणारी गोकुळाष्टमी हा सण गिरगावकर मोठ्या उत्साहाने आणि जोशाने साजरा करत. 

१९६३ सालचे ‘ब्लफमास्टर’ सिनेमा मधील शम्मी कपूरचे गोविंदयाचे गाणे हे गिरगावातील मांगलवाडीत चित्रित झाल्याने 

गिरगावातील गोविंदयाला खूपच प्रसिद्धी मिळाली. संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी हे तेंव्हा गिरगावात रहात असल्याने त्यांनी गिरगावातील गोविंदयाचे हुबेहूब चित्रण करून गिरगावातील गोविंदयाचे जगभर दर्शन घडविले. 

गिरगावात गोविंदा हा प्रत्येक वाडीमध्ये साजरा होत असे. प्रत्येक वाडीची गोविंदा टोळी ही आपल्या वाडीच्या हंड्या फोडल्या कि आपल्या आजूबाजूच्या दुसऱ्या वाडीच्या हंड्या फोडायला बाहेर पडत असत. ‘गोविंदा आला रे आला मडकी सांभाळ ब्रिजबाला’ तसेच ‘एक दोन तीन चार, XXX दादाची पोरे हुशार’ असे गात आणि नाचत गल्लोगल्ली फेरफटका मारला जायचा. तेंव्हा गिरगावात दादा लोकांची कमी नव्हती. जो गोविंदयाला जास्त पैसे देईल त्याचे नाव जोडले जायचे. हे करताना डावा  हात पुढच्याच्या पॅन्टला धरून, कमरेत वाकून, उजवा हात हलवत एक एक पाऊल  ठराविक लयीत टाकला जायचा. ह्याचे चित्रणही ब्लफमास्टरच्या गाण्यामध्ये व्यवस्थित केले आहे. त्या गाण्याच्या चित्रीकरणात मूळचे गोविंदा खेळणारे दिसत आहेत. हाल्फ पॅण्ट आणि बनियन ह्यावर गोविंदा बाहेर पडत असे. वाडीतील काही जण नेवैद्य म्हणून फळांचे ताट नाहीतर गोड  शिरा असे गोविंदा समोर ठेवत असत. गोविंदावर सर्व बाजूनी पाण्याचा वर्षाव केला जायचा. त्यामध्ये एखादयाकडून गरम पाणी अंगावर पडल्यास, अजून पाणी टाकण्याची मागणी केली जायची. ‘तुमच्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा’ असे मोठ्याने ओरडून वाडीतील रहिवाश्याना अजून पाणी टाकण्यास उद्युक्त केले जायचे. काही टवाळ मुले लांबूनच पाण्याचे फुगे मारायचे. ते फुगे मारण्यात एवढं तरबेज असत कि ज्याला फुगे लागायचे त्याला कळायचेही नाही कि फुगे आले तरी कुठून. वरून होणारा पाण्याच्या फुग्यांचा मारा चुकवत वाडीच्याबाहेर पडणे म्हणजे एक मोठे दिव्यच असे. 

पूर्वी गोविंदा हा राष्ट्रीय सण म्हणूनच मानला जायचा आत्तासारखे राजकीय सणाचे स्वरूप त्याला नव्हते. त्यामुळे टी शर्ट आणि मोठ्या बक्षिसांच्या थैल्यांचे आमिषही नव्हते. 

काही मोठ्या वाड्यांचे गोविंदा बरोबर एक सीन ही असे. एका ट्रक मध्ये वाडीतल्याच मुलांना चेहऱ्यावर रंग लावून पुराणातील एखाद्या प्रसंगाचे दर्शन घडत असे. नंतर काही राजकीय घडामोडींचे किंवा त्यावेळेच्या ज्वलंत घडामोडीचे विषय घेऊन सीन बनवले जायचे. 

बहुतेक हंड्या ह्या तीन ते चार थराच्या असायच्या. पूर्वी हंड्यांमध्ये उंचीची स्पर्धा नव्हती. हंड्या फोडून थोडे फार जे काही पैसे मिळायचे त्यामधून सगळ्यांना वडापाव मिळाला तरी बरे वाटायचे आणि जर काही जास्त प्रमाणात पैसे मिळाले असतील तर रात्री भुलेश्वरच्या कन्हैया ह्याच्या किंवा किका स्ट्रीटच्या पाव भाजीच्या गाडीवर त्याचे सेलिब्रेशन होत असे.  

त्याकाळी गिरगावात ठाकूम – माकूम, ढोल – ताशा हि वाद्य जाऊन कच्छी बाजा आणी ढोल हा जास्त वापरात येत होता. १९५१ च्या अलबेला सिनेमात संगीतकार सी रामचंद्रांनी त्याचा पहिला वापर हा भोली सुरत ह्या गाण्यासाठी केला होता. 

कच्छी बाजा आणि ढोल ह्याशिवाय गोविंदयाला पूर्णत्व मिळत नसे. तसे वाजवणारे खूप जण होते पण सनईवर अबूभाई आणि पोंक्षे, विजय चव्हाण, इब्राहिम, परश्या असे मोजकेच प्रमुख ढोल वाजविणारे ठरवायचे असले कि वर्गणी जमवण्यावर जोर द्यायला लागायचा. त्यासाठी वाडीतले सगळे एकवटून कामाला लागायचे. एकदा का गोविंदयाच्या दिवशी कच्छी बाजाचा आवाज यायला लागला कि आपोआप वाडीतले सगळे जमा होऊन आणि आपसूक टोळी तयार होऊन गोविंदा नाचायला सुरवात होत असे. कधी कधी दोन गोविंदा समोरासमोर आले आणि त्यामध्ये वरील दिग्गज वाजवणारे असले कि जुगलबंदी हि व्हायचीच आणि ऐकणाऱ्यांसाठी आणि नाचणाऱ्यांसाठी तो एक आयुष्यभरासाठी आठवणींचा ठेवा असायचा. 

पूर्वी राजेश खन्ना रहात असलेली ठाकुरद्वारच्या कोपऱ्यावरची सरस्वती निवास येथेच एक उंच हंडी बांधली जायची. ती हंडी फोडायला लालबाग, उमरखाडी असे लांबून गोविंद्याच्या टोळ्या येत असत. एखादा गोविंदा ती हंडी फोडायचा प्रयत्न करतोय असे समजले कि पूर्ण ठाकूरद्वारचे चारही रस्ते खचाखच भरून जायचे. प्रत्येकजण एक विलक्षण अनुभूतीचा साक्षीदार होण्यासाठी धडपडत असे. पहिले तीन थर आरामात लावले जायचे. चौथ्या थरापासून थरार चालू होयचा. पाचवा थर हा फक्त दोन  जणांचाच असायचा. प्रत्येकाचे श्वास रोखले जायचे. पाचव्या थरानंतर हंडी फोडायला दोन एक्के का तीन एक्के म्हणजे एकावर एक असे दोघे का तिघे लागतत ते ठरायचे आणि हंडीला कसाबसा फोडणाऱ्या गोविंदाचा हात लागायचा आणि हंडी फोडली जायची. हंडी फोडणारा आणि सगळे थर लगेच हळूहळू सावरत खाली यायचे आणि एकच जल्लोष व्हायचा. कच्छी बाजा जोरात वाजायला लागायचा आणि नुसता गोविंदाच नाही तर सगळेच जोशात नाचायला लागायचे. हंडी फुटल्याचे एक वेगळेच समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर असायचे. संध्याकाळ पर्यंत सगळीकडे असेच उत्साहाचे वातारण असायचे. सकाळपासून गजबजलेला गिरगाव रात्रीमात्र शांत आणि थकलेला असायचा पण तो एका दिवसापुरताच कारण दुसऱ्यादिवशी पासून लगेच गणेशोत्सवाच्या तयारीला गिरगावात सुरवात व्हायची. 

अजूनही गिरगाव सोडून गेलेला गिरगावकर गोविंदयाच्या दिवशी एकतर गिरगावातील गोविंदयाला हजेरी लावतो नाहीतर जेथे असेल तेथे गिरगावचा माहोल बनवून गोविंदा साजरा करतो. पण त्याचे मन मात्र गिरगावातच घिरट्या घालत रहाते हे ही तितकच खरं.

       

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 1 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 1 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

भव्य जलाशयावर हळूहळू चालली आमची आगबोट,

पाणीच पाणी चहूकडे पाहुनी 

उरात धडकी राहिली भरुनी 

पण, मामाच्या गावाला जायचं आहे 

आंबे फणस खायचे आहेत, सुट्टीची मज्जा घ्यायची आहे म्हणून डोळे मिटून बोटीत बसायचे धक्का यायची वाट पहायची उतरल्यावर श्वास सोडायचा, हुंदडायचा, ध्यास घ्यायचा, सुट्टीचा आनंद लुटायचा, डोळेभरून निसर्ग पहायचा आणि महिनाभर मुक्काम ठोकायचा कोठे तर मामाच्या गावाला अलिबाग जवळच्या लहानशा ‘थळ’ गावात! 

दरवर्षी मे महिन्याशी शाळेला सुट्टी लागली की वेध लागायचे थळला मामाकडे जाण्याचे अलिबाग पासून तीन मैलावर असलेले लहानसं खेडं! कौलारू घरे नारळ पोफळी, आंब्या फणसाची झाडं दूरवर असलेली शेतं. विहिरीवर पाण्यासाठी रहाट, थोडसं पशुधन असे हे मामाचं गाव! 

आम्ही रेल्वेने मुंबईच्या आमच्या उपनगरातील घरातून निघून मसजीद बंदर स्थानकावर उतरत असू, मग व्हीक्टोरियात बसायचो भाऊच्या धक्यावर जायचं असायचं. तेव्हा व्हिक्टोरिया हे घोडा जुंपलेले टांग्यासारखे वहान होते. मागे वर उंच छत असलेली बग्गी त्यात दोन तीन माणसे मावत. पुढेही एक दोघ बसत. त्याच्या पुढे मग गाडीवान आणि जुंपलेले घोडे अशी ही खूप लांबलचक असलेली एखादी शाही बग्गीच ! पुढे दोन्ही बाजूस दिवे असत. याच छत पुढे ओढून बंदही करता येई, (आता ही व्हिक्टोरिया इतिहास जमा झाली आहे ) मग आमची सवारी भाऊच्या धक्याला पोहचायची. आई बोटीचे तिकीट काढत असे, आम्ही बोटीत प्रवेश करत असू. चहुबाजूला अरबी समुद्राचं ‘अबब’, पाणी बघून बालवयात माझ्या उरात धडकीच भरायची! एकदाचा बोट निघायचा भोंगा, भूsss भूsss करत वाजला की बोट धक्का सोडून पुढच्या समुद्रावर हळूहळू चालू लागे. समुद्राचे पाणी कापत कापत. हालत डोलत हेलकावे खात बोटीची संथपणे रेवसच्या दिशेने वाटचाल चालू असे. आता प्रवासाच्या मध्यावर बोट पोह्चायच्या बेतास आली की दुरूनच, मधोमध असलेला, ‘काशाचा खडक’ दिसू लागे, मग मन धास्तावून जाई. काशाच्या खडका जवळून बोट जाऊ लागली, की तेथे जणू समुद्र खवळल्यासारखाच होई, आणि मग बोट खूपच हेलकावे खाऊ लागे, माझ्या बालमनात भितीने घाबरगुंडीची वलये गोळा होत, उरात धडकीतर भरेच, मग आईला बिलगून बसू लागे. त्या खडकाजवळ काही वर्षांपूर्वी रामदास बोटीला जलसमाधी मिळाल्याची भयकथा अनेकदा आई, मामाने सांगितल्यामुळे, मी मनात त्या काशाच्या खडकाची धास्तीच घेतली होती. त्यामुळे ती समुद्रातील अपघाती जागा पार करून बोट पुढे गेल्यावर, लहान असतानाही मी सुटकेचा निश्वास सोडत असे. राहिलेले, थोडे अंतर भीती, उत्कंठा, आणि पोहचण्याची अधीरता यात पार पडे. आणि आता आलीच जवळ जमिनीवर उतरायची जागा, उतरल्यावर हायसं वाटे, आणि तो मनावर त्यावेळी भयाने ग्रासलेला प्रवास संपे.

हळूहळू चालत आम्ही, बसच्या थांब्यावर जात असू. या बस पूर्वीच्या पद्धतीच्या होत्या, त्यांचे प्रवासी बैठकी चा भाग मागे सोडून, पुढचा चालकाचा भाग, पुढे तोंड काढल्यासारखा इंजिनाचा भाग असे. आता सारख्या चपट्या तोंडाच्या बस नसत. पूर्वीची लौरी (ट्रकही) असेच असत. मग स्थानापन्न झाल्यावर, आमची वटवट चालू असे, मोटार सुरु होई, रस्त्याची अवस्था खेडेगावातील त्यावेळच्या स्थिती प्रमाणेच होती. आचके दचके खात बस चालत असे, आणि मग आई दटावे, “ बोलू नका, बोलता बोलता जीभ दाता खाली येऊन चावली जाईल,”  त्या भीतीने आमची वटवट कमी होई.

कंडक्टरला थळ आगार, सांगितलेले असे थळचा फाटा आला की बस मुख्य रस्त्यावरून आत वळे. उजवीकडे दत्तदेवळाची दत्ताची डोंगरी मागे टाकली की पुढे गेल्यावर डावीकडे तळं येई पुन्हा पुढे गेल्यावर बाजाराकडे जायचा रस्ता व आत देवीचे देऊळ! मग बरीच दोन्ही बाजूची वाड्या घरे मागे पडत. नंतर आलचं मामाचे घर. होळीवर उतरत असू. होळी म्हणजे दरवर्षीच्या रस्त्याच्या बाजूला होळी पेटवली जाई. म्हणून त्या जागेला म्हणायची पध्द्त होळीपाशी उभे आहेत तेथे उतरले आहेत वैगरे म्हणजे ती जागा होळीची असे. 

बस थांबताच आम्ही टुणकन उड्या मारून पळत घराकडे जात असू. आत जायची घाई असे. पण आजी व मावशी थांबून ठेवत. थांबा, “तांदूळ पाणी ओवाळायचे आहे!” लांबून प्रवास करून आल्याने बाहेरची बाधा होऊ नये म्हणून हा उपचार होऊन मगच घरात प्रवेश मिळे.

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खिडकी(कविता) – सुश्री समिधा गांधी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून  ?

☆ खिडकी(कविता) – सुश्री समिधा गांधी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अगं!!

ती खिडकी उघडून

केव्हा पाहिले होतेस

तुझ्या मालकीच्या

आकाशाच्या तुकड्याकडे?

 

तिथेच तर असणार आहे

कुठे हरवणार का आहे

असा विचार करून

त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस

 

अधूनमधून खिडकी उघडत जा

आकाशाला नीट न्याहाळत रहा

नसतील दिसत इंद्रधनूचे सप्तरंग

नसेलही कदाचित नक्षत्रांची रांगोळी

 

दिसेल झाकोळलेले नभ

कधी असेल कडक ऊन 

दिसणार नाही मुक्त उडणाऱ्या

पक्षांची लांबचलांब माला

 

तरीही खिडकी उघडायचे

कधीही थांबवू नको

ती मिळविण्यासाठी केलेला 

आटापिटा तू विसरू नको

 

तरच कदाचित तू तुझ्या

लेकीसुनांना त्यांच्या वाटचा

आभाळाचा तुकडा, नाही नाही

संपूर्ण आकाश मिळवून देशील

 

सुश्री समिधा गांधी

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आभार… ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

?  मनमंजुषेतून ?

☆ आभार…☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

काही शब्दच असे असतात की ते ऐकणार्‍याच्या मनावर जादु करतात. कुणी छोटसं काम केलं आणि पटकन् त्या व्यक्तीला “धन्यवाद” म्हणून कृतज्ञता व्यक्त केली की त्या आदान प्रदानात गोडवा राहतो.

या लाॅकडाउनच्या काळात माझ्यासारख्या वय झालेल्या महिलेला अनेकांनी मदत केली.कुणी किराणा आणून दिला ,कुणी फळे भाज्या ,किरकोळ औषधे,रोख  पैसे  …वजने उचलली ..एक ना अनेकप्रकारे सहायता केली. मी त्यांची नुसतीच आभारी नाही तर ऋणी आहे…

आतापर्यंतच्या आयुष्यात माझ्यावर फार संकटे आली अथवा अशा काही समस्या  ऊभ्या राहिल्या असे सुदैवाने झाले नाही ..एक सुरक्षित अन् नाॅर्मलच आयुष्य जगले!!

पण हा लेख लिहीत असताना माझ्या मनात आले, संकट म्हणजे नक्की काय? त्याची व्याख्या काय?—–

तुम्हाला प्रचंड तहान लागली आहे आणि तुमच्या जवळ प्यायला पाणी नाही, त्यावेळी कुणीतरी तुम्हाला त्याच्या जवळची पाण्याने भरलेली बाटली देउन तुमची तहान भागवतो तो क्षण सर्वोच्च कृतज्ञतेचाच असतो!

तुम्हाला त्वरेने कुठेतरी जायचे आहे आणि त्याच वेळी टॅक्सी रिक्षा बस वाल्यांचा संप आहे ,पण कुणी ओळखीचे अथवा अनोळखी तुम्हाला स्वत:च्या गाडीतून सोडतात तेव्हा त्या  उपकाराची परतफेड फक्त “धन्यवाद!!” या सर्वसमावेशक शब्दानेच होऊ शकते!!

संकट मोठं नसलं तरी मदतीची गरज कशी कशा स्वरुपात हे परिस्थिती ठरवते..

माझे प्रिय पपा गेले तेव्हां आम्ही जळगावला राहत होतो! मला खूप उशीरा कळवलं!  वेळेत ठाण्याला कसं पोहचायचं? मला पपांचं अंत्यदर्शन तरी मिळेल का? प्रचंड दु:खाने मी बुद्धीहीन झाले होते! दोघांनाही —मी आणि माझे पती —जाणं आवश्यक होतं! शिवाय माझ्या मिस्टरांना मला अशा अत्यंत भावनिक प्रसंगी एकटीलाच जाऊ द्यायचं नव्हतं..मग लहान मुलींना कुठे ठेवणार?

त्यावेळी आमचे जीवलग मित्र डाॅ. गुप्ता आणि अलका यांनी सर्वतोपरी मदत केली .अतिमहत्वाच्या कोट्यामधुन रेल्वेची तिकीटं आणून दिली. मुलींची जबाबदारी घेतली .माझी बॅगही भरण्यात मदत केली .स्टेशनवर सोडायला आले.त्यावेळी ए टी एम वगैरे नव्हतच!  पैशाचं एक पुडकंही त्यांनी माझ्या बॅगेत टाकलं! माझे पती त्यांना म्हणालेही “पैसे आहेत अरे…!””असु दे! लागतील..”

 प्रश्न पैशांचा नव्हता!!  त्यामागची भावना महत्वाची..

—-मैत्री, प्रेम, प्रसंगाचं गांभीर्य समजुन  दाखवलेलं औचित्य याचं मोल होऊच शकत नाही.. त्यासाठी धन्यवाद हे शब्दही  तोकडे आहेत!! 

अगदी अलीकडे दोन वर्षापूर्वी माझी गुडघेरोपणाची शस्त्रक्रिया झाली !आम्ही दोघच ! मुलं परदेशात .माणूसबळ नाहीच. शिवाय कुणाला कशाला त्रास द्यायचा? निभावुन नेऊ आपले आपणच!!– पण प्रत्यक्ष आॅपरेशनच्या दिवशी माझ्या नणंदेचा मुलगा सुन हजर..पुढची सगळी सुत्रं त्या दोघांनी हातात घेतली..माझी जाऊही सोबतीला आली. ही सगळी माझ्या प्रेमाची माणसं ऊत्स्फुर्तपणे आली ..माझ्या सेवेखातर.. सगळं सुरळीत पार पडलं. आज जेव्हां मी बिना वेदनेचं पाऊल ऊचलते तेव्हां या सर्वांच्या प्रेमाचंच बळ एकवटलेलं असतं!!—यांचे आभार कसे मानु? किती अपुरे आहेत शब्द!!

खरं सांगु? मला माझ्या आयुष्यांत असे हाक मारल्यावर धावणारे मित्र मैत्रीणी, प्रियजन, नातेवाईक लाभले,  म्हणून मी परमेश्वराचेच आभार मानते!!

ईश्वरचरणी मी माझी कृतज्ञता ,भावपूर्णतेने व्यक्त करते….!!!

धन्यवाद!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मदतीचा त्रास ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ मदतीचा त्रास ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

विशु आमची जवळची मैत्रीण.

स्वभावाने लाख, हुशार आणि मदतीस अगदी तत्पर.

गम्मत अशी, की विशूचा मनुष्य संग्रह अत्यंत मोठा.

कोणतेही काम सांगा, हिच्याकडे,त्यावर माणसे,आणि उत्तर तयार असते.

बरं ,यात तिला मोठेपणाही नको असतो.

पण मदत करण्याची हौस— 

हसू येईल सांगितले तर,

पण हिच्या मदतीचा लोकांना त्रास होतो.

कसे म्हणताय?

ऐका तर।

लेकाचे लग्न विशूने हौसेने केले. 

सूनबाईना वेगळा फ्लॅट आधीच घेऊन ठेवला होता.

सूनबाई घरी प्रवेश करायच्या आधीच , विशूने, आपल्या हौसेने, घर अगदी मस्त लावून टाकले.

सूनबाईने बघितले, आणि म्हणाली, मला हा नको होता फ्रीज. आणि मला हा रंग नाही आवडत भिंतींना. मला तरी विचारायचे ना आधी.

झाले। एवढा खर्च, कष्ट करूनही  दोघीही नाराजच.

तरी विशूची जित्याची खोड जात नाही.

ती इतकी भाबडी आहे ना,की, समोरचा रागावूही शकत नाही.

सहज वीणा म्हणाली, बाई ग परवा केळवण करणार आहे, 10 माणसे यायची हेत. ,काही सुचत नाही बघ, काय मेनू करू,आणि कसे करू.

विशूने तिला न विचारता, तिच्या समोरच एका बाईना फोन केला, आणि मेनूही सांगून मोकळी झाली. 

वीणा म्हणाली, अग हे काय,। मी आहे ना इथे,मला विचार की. पैसे मी देणारे ना.

आणि तुला कुणी सांगितलं मला बाई हवीय ? मी बघीन काय करायचे ते–

ते विशूच्या गावीही नव्हते.. हल्ली लोक तिला बोलवेनासे झालेत.

आली की सर्व सूत्रे हाती घेतलीच म्हणून समजा.

भिडस्त लोकांना हे आवडत नाही पण बोलताही येत नाही.

 तिलाही फटके कमी नाही बसत,या स्वभावाचे.

कामवालीच्या उनाड मुलाला हिने नोकरी लावून दिली.

4 दिवसात मालकाचा हिलाच फोन। बाई कसला मुलगा दिलात–.गेला की काम सोडून।

विचारले कामवालीला, तर फणकाऱ्याने म्हणाली, “काय व बाई. असली नोकरी देतात व्हय?  दुधाच्या पिशव्या टाकायच्या- तर कोण  तिसऱ्या  तर कोण 5व्या मजल्यावर राहत्यात। पोराचे पाय दुखले,  दिली सोडून नोकरी “. 

विशू हतबुद्ध झाली, शेजारच्या मुलीचे लग्न जमता जमत नव्हते.

विशूच्या ओळखीचा एक मुलगा होता. हिने लगेच, त्या मुलीला, त्याचे स्थळ सुचवले.

दोघे, भेटले, बोलले.

ती मुलगी विशूला म्हणाली,  “काकू, कसला मुलगा, सुचवलात हो. सगळे एकत्रच राहतात. केवढी माणसे, घरात. आणि त्याला पगारही माझ्यापेक्षा कमी. नका बाई असले मुलगे सुचवू.”

बिचारी विशू.

तरीही, विशूची जित्याची खोड जाईना.–तिची मदतीची हौस भागेना,.–आणि मूळ स्वभाव बदलेना..

© डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चेक पोस्ट ड्युटी..शब्दांकन शीतल चव्हाण ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ चेक पोस्ट ड्युटी..शब्दांकन शीतल चव्हाण ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

(काळजाला हात घालणारा प्रसंग)

—-चेकपोस्ट अंकली…सोबत संजय जाधव सर… दुसऱ्या दिवशी पोलिसांनी काय मनावर घेतलं कुणास ठाऊक?..पण दुसऱ्या दिवशी सगळ्याच गाड्यांची झडती घेतली… पण तेवढ्यात सुध्दा लोकं डोळा चुकवून सटकत होती,…आणि जी अडवली जात होती त्यांच्या हातात हमखास दवाखान्याची फाईल…म्हणजे गेल्या 5 वर्षात जेवढी सांगलीला दवाखान्यात गेली नसतील ना.. तेवढी ह्या लॉकडाउनच्या काळात दवाखान्यात गेली….कुठून कुठून…,कधीच्या अन कुणाच्या फाईली हुडकून काढल्या कुणास ठाऊक?

ह्याच गडबडीत एक तरुण मुलगा येऊन माझ्यासमोर उभा राहिला….साधारण वीस बावीस वर्षाचा असेल…त्याला वाटलं आम्ही सुध्दा पोलिसच आहोत की काय !…म्हणाला “साहेब, बहिणीकडे चाललोय,पलूसला…प्लिज ..जाऊ दे.” जाधव सरांनी विचारलं.. ,”का चाललाय?”..त्यावर त्यानं जे उत्तर दिलं त्यावर आम्ही दोघेही खूप हसलो… म्हणाला, ” ते बहिणीला सांडगं, पापड, कुरुड्या आणि चटणी द्यायला चाललोय, उन्हाळ्याचं.”…मी हसत हसतच त्याला खुळ्यात काढलं,.. म्हटलं “लेका तुला काय कळतंय का?.. इथं काय चाललंय?..दुनिया थांबलीय अक्की..अन तुला कुरुड्याचं पडलंय होय!!”.. तसा त्याचा चेहराच पडला..”नाही साहेब, तसं नाही.. खरं प्लिज मला जाऊ दे”… मी त्याला पोलिसांकडे जायला सांगितलं.” जा..त्यांची घे जा परवानगी”. त्यानं पोलिसालापण हीच विनवणी केली… पोलिसांनी देखील सुरुवातीला त्याला शिव्याच घातल्या.. आणि परत जायला सांगितलं…तसा तो त्यातल्या एका पोलिसाच्या पायाशीच वाकला,..आणि ढसाढसा रडायला लागला….”साहेब प्लिज, मला जाऊदे, … नाहीतर माझ्या बहिणीचं काही खरं नाही… प्लिज मला माझ्या बहिणीसाठी तरी सोडा,….मी येताना परत इथं थांबतो,… त्यावेळी मला काय शिक्षा द्यायची ते द्या.”…. त्याच्या एवढ्या विनवणीवर आम्ही सगळेजण अवाक झालो…. त्या पोलिसाने त्याला जवळ घेऊन विचारलं…,”असं का म्हणतोयस”..त्यावर त्यानं रडतच उत्तर दिलं,…”साहेब ,दरवर्षी बहिणीला इकडूनच सगळं द्यावं लागतं,.नाहीतर सासरची लोकं तिला खूप त्रास देतात ओ….यावर्षी हे उन्हाळ्याचं द्यायला  जरा उशीर झालाय तर दाजी तिला रोज फोडून काढा लागल्यात.” …. भयाण वास्तव… तो भाऊ आमच्यासमोर मांडत होता…. एका पोलीस मित्रानं त्याला सांगितलं….”अरे एक तारखेनंतर जा की लेका”.… तो नाही म्हणाला,..” कारण आज जर इथून परत गेलो तर घरात आई बाच्या जीवाला पण घोर लागेल… गेली महिनाभर त्या दोघांना सुध्दा बहीणीची खूप काळजी लागलीय….”

एक निवृत्तीला झुकलेले पोलीस काका होते…. त्यांच्या डोळ्यांत मात्र टचकन पाणी आलं…. बहुधा त्यांनाही एखादी लेक असावी… कारण त्या पोलिसाच्या वेशात भावुक झालेला बाप मला स्पष्ट दिसत होता…. सगळे पोलीस बंधू भगिनी, आम्ही क्षणभर शांत झालो होतो…. एरव्ही निर्ढावलेल्या चेहऱ्याच्या सर्व पोलिसांच्या डोळ्यांत पाणी साचलं होतं.… अन माझ्या साठलं होतं…. त्या पोलीस काकांनी त्याला स्वतःच्या गाडीवर बसवलं.. आणि म्हणाले..”चल, माझ्याबरोबर.. आपण दोघे मिळून तुझ्या बहिणीला हे सगळं देऊन येऊ.”….परत त्याला भीती.. पोलिसाला बघितल्यावर सासरची खवळतील अन परत बहिणीबाबत काही विपरीत घडायला नको…. म्हणून त्याने परत हात जोडून एकट्यालाच जाऊ द्यायची विनवणी केली….त्या पोलीस काकांनी त्याला धीर दिला.. “अरे मी समोर येणार नाही.. तू बाहेरच्या बाहेर दे आणि ये.. मी थांबतो अलीकडच्या चौकात.”..…एवढं ऐकल्यावर त्या मुलाने पोलीस काकांना घट्ट मिठीच मारली अन ओक्साबोक्शी रडू लागला……पोलीस काकांनी त्याला धीर देत गाडीवर पाठीमागे बसवलं.. त्या पिशव्या ,डबा ,,बरणी घेऊन तो पोलिसाच्या गाडीवर बसला आणि गाडी स्टार्ट झाली.. नजरेआड होईपर्यंत मी आणि जाधव सर त्या गाडीकडे पाहत होतो.. अगदी भरल्या डोळ्याने… पोलीस वेशातील एक बाप चालला होता.. ..एका लेकीकडे…..आणि एक भाऊ चालला होता एका बहिणीकडे…..फक्त नी फक्त तिचे अश्रू पुसण्यासाठी……

आज परत माझ्या मनात असंख्य प्रश्न काहूर माजवून गेले…..त्रास देवून गेले… ..तरीही आजूबाजूला अशी परमेश्वराची रूपं पाहायला मिळाली अन मी भानावर आलो….. आज परत मला कळेना कुणाला परमेश्वर म्हणू?….त्या भावाला?….त्या बहिणीला?….की त्या पोलीस काकांना?…..पण  तो आहे एवढं मात्र नक्की.. कोणत्या ना कोणत्या रुपात तो तुम्हाला भेटावयास येतो… कदाचित आज देखील …

खरं सांगू… परमेश्वराने आपल्याला ” माणूस ” या पदावर पोस्टिंग केलंय.. पण आपण आपली पोस्ट विसरत चाललोय ….तसं विसरून नाही जमणार…. ती सतत चेक करावी लागेल आपल्याला…आपली माणूस ही पोस्ट… कदाचित ह्यालाच चेकपोस्ट म्हणतात बहुतेक…. . आज खऱ्या अर्थाने मी चेकपोस्टवर ड्युटीला होतो….. 

 थेट चेकपोस्टवरून…  

शब्दांकन… शीतल चव्हाण, जयसिंगपूर 

संग्राहक – श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग दुसरा ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? मनमंजुषेतून ? 

☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग दुसरा ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆  

आम्ही रहात होतो तेथेही स्वातंत्र्य चळवळीने भारावलेले काही तरुण तरुणी रहात होते. जवळच सेवादलाची शाखा होती. सर्व लहान मुलांना तेथे गोळा करून गाणी गोष्टी सांगितल्या जात. साने गुरुजींची, त्यांच्या विचारांची ही सेवादल शाखा होती. अनेक मैदानी खेळ इथे खेळायला मिळत. झेंडावंदन, देशभक्तीची गाणी शिकवली जात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेवादलाच्या शाखा हळूहळू बंद पडल्या. पण साने गुरुजींच्या विचाराप्रमाणे, ध्येयाप्रमाणे कार्य मात्र सुरू राहिले.

माझ्या लग्नानंतर एकदा घराच्या माळ्यावर सूतकताईचा चरखा दिसला. मी चौकशी केली तेव्हा समजले, तो माझ्या मिस्टरांचा, ‘माधव नारायण कुलकर्णी’ यांचा होता. ते सेवादलाचे कार्यकर्ते होते. साने गुरुजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी कोल्हापुरात राष्ट्रसेवादलाचे शाखा प्रमुख म्हणून उल्लेखनीय काम केले होते. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची ते एक आठवण सांगत. ध्वजारोहण कसे करावे, वंदेमातरम म्हणायला शिकवणे, तिरंगा हवेत लहरत ठेवण्याचे नियम शिकवणे वगैरे गोष्टींची माहिती लोकांना देण्याकरिता हे सेवादलाचे कार्यकर्ते गावागावातून जात. त्यात श्री. राम मुंगळे, श्री. बाबासाहेब बागवान, श्री.यमकनमर्ढे वगैरे मित्र असत. सेवादलाची गाणीही गायला शिकवले जाई. नंतरही बरीच वर्षे हे सर्व मित्र (‘ह्यांच्या सांगण्याप्रमाणे जवळजवळ पन्नास वर्षे) महिन्यातून एकदा एकत्र येत. स्थळ होतं, श्री. मोहनराव लाटकर यांचे ‘ओपल हॉटेल!’ त्यात श्री. चंद्रकांत पाटगावकर, बाबुराव मुळीक,इ. होते. हे सर्व श्री. एस्. एम्. जोशी, श्री. नानासाहेब गोरे, श्री. यदुनाथ थत्ते, श्री. आजगावकर आणि साधना परिवाराशी जोडलेले होते. देशभक्तीने भारावलेले हे प्रामाणिक कार्यकर्ते! बरेचसे प्रसिध्दी पराङमुख!! बाबुराव यमकनमर्ढे यांनी तर त्या काळात कोकणात जाऊन शाळा सुरु केली.

बालवयात ऐकले होते, स्वातंत्र्य मिळाले, चांगले दिवस येतील. लहानपणी काही दिवस रेशनवर धान्य मिळे. मिलो (तांबडा जोंधळा)मका, बटाट्याचे चौकोनी तुकडे… कापड सुध्दा रेशनवर मिळे. चीटाचे  कापड म्हणत. . याचेच कपडे शिवले जात. फ्रॉक, परकर-पोलकी, गल्लीतल्या सर्व मुलींची सारखी! आम्हाला गंमत वाटे!! गोर गरीब, सामान्य, श्रीमंत, सुस्थितीतील लोकांनाही तेच कपडे घालावे लागत. त्यावेळी साथीचे रोग होते. प्लेग, कॉलरा, टी. बी., देवी, इ. पालक चिंतेत असत. दंगलीही होत. सामाजिक वातावरण काहीसं असुरक्षित वाटे. तरीही शेजारी एकमेकांना मदत करत. लपंडाव, सागरगोटे, आंधळी कोशिंबीर असे अनेक देशी खेळ खेळण्यात मुलांना आनंद मिळे. वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके यांच्या वाचनाने विचार आणि जीवन समृद्ध होत असे.

आज विचार केला तर? अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो आहोत. तरी शेतकरी काळजी मुक्त नाही. कपडे, फळे, धान्य मुबलक आहे. अद्ययावत साधने, विज्ञान-तंत्रज्ञान यामुळे  सुधारणा झालेली आहे. परंतु संकटांचा ससेमिरा तसाच आहे. कोरोनाची महामारी, महापूरासारखी आस्मानी संकटे त्यात भर घालत आहेत. कोविड जीवाणूंचे नवीन प्रकार पाय पसरत आहेत. शासन व्यवस्था करत आहे. पण गरज आहे मनोबलाची, स्वच्छतेची, शिस्तीची! गरज आहे विश्वासाने एकमेकांना समजून देण्याची!! लहानथोरांना आधार देण्याची!! स्वतंत्र भारताची, स्वातंत्र्य देवीची ही मागणी, ही इच्छा आपण सर्वांनी मिळून एकजूटीने, निष्ठेने पूर्ण करायची आहे.

वंदेमातरम !!

© सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

फोन नंबर : 0738768883

pmk2146@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares