मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

माणसाचा दुर्मिळ जन्म मिळूनही, त्याचा अंतिम उद्देश ज्यांच्या अजिबात लक्षात येत नाही, अशा सर्वसामान्यांसाठी श्री समर्थ रामदासांना “श्री दासबोध” हा ग्रंथ लिहावासा वाटला असावा, असे या ग्रंथाच्या पानोपानी जाणवते. माणसाची दिनचर्या कशी असावी, त्याने राहावे कसे, बोलावे कसे, वागावे कसे, चांगले म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, इतक्या सगळ्या रोजच्या आचरणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींपासून सुरुवात करून, अखेर, एकमेव शाश्वत असे जे परब्रह्म, ते जाणून घेण्यासाठी आवश्यक अशा आत्मज्ञानाच्या खुणा अंगात कशा बाणवायच्या,  या समजण्यास अतिशय अवघड गोष्टीपर्यंतचे सर्व ज्ञान सामान्यांना यातून मिळावे हा या ग्रंथाचा स्पष्ट हेतू असावा. अर्थात सामान्य माणसाला या पायरीपर्यंत पोहोचायला एक मानव जन्म पुरणारच नाही हेही समर्थ नक्कीच जाणून होते. आणि म्हणूनच  कोणते सद्गुण,  म्हणजेच सत्वगुण अंगी बाणवले तर अखेर “त्या जगन्नियंत्या परब्रम्हाचे दर्शन होणे” या मानव-जन्माच्या अंतिम उद्दिष्टाच्या दिशेने निदान वाटचाल तरी सुरु करणे मानवाला शक्य होईल, हेच या ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारे सांगितले असावे असे वाटते. अंगी सत्वगुण बाळगणे हा यासाठीचा त्यातल्या त्यात शॉर्टकट असावा असेच पूर्ण वेळ वाटत रहावे, इतका हा मुद्दा या ग्रंथाच्या केंद्रस्थानी असल्याचेही जाणवत रहाते  —-  आणि मग आजच्या काळानुरूप सत्वगुण म्हणजे नेमके काय अपेक्षित असावे, हा प्रश्न पडतो —- त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

मानवी स्वभावातले ‘सत्व- रज – तम‘ हे ठळकपणे दिसणारे तीनही गुण सारखेच शक्तिशाली असतात. आणि कुठलीही शक्ती कशी वापरली जाते, यावर तिचा परिणाम अवलंबून असतो.  रज आणि तम हे गुण स्वतःभोवती, प्रपंचाभोवती, आणि परिणामतः ऐहिक गोष्टींभोवती फिरत राहणारे, तर सत्वगुण सतत स्वतःमधून स्वतःला बाहेर काढणारा, आणि सतत त्या परमशक्तीकडे आकर्षित करणारा. त्यामुळेच, “जग माझ्यासाठी आहे“ ही भावना रज-तम गुणांमुळे निर्माण होते.  तर “ मी जगासाठी आहे “ ही भावना वारंवार जागृत करतात ते सत्वगुण –अशी थोडक्यात व्याख्या करता येईल.  हे सत्वगुण “परमदुर्लभ“ असं समर्थांनी अगदी सार्थपणे म्हटलं आहे. कारण असं असावं की, मुळातच सगळ्या सजीवांबद्दल, “ते खऱ्या अर्थाने  स्वजातीय  आहेत, माझे स्वकीय आहेत“, अशी आपलेपणाची, जवळकीची भावना मनात उपजतच असणं अत्यंत अवघड असतं. पण निश्चयपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक सत्वगुण अंगिकारले तर ते सहजसाध्य होऊ शकतं, हा विश्वास समर्थ देतात. “मी जगासाठी आहे“ अशी मनाची ठाम धारणा झाली की, हळूहळू इतर प्रत्येक माणसाबद्दल प्रेमभावना वाटू लागते. ती वागण्यातही दिसू लागते. आप-पर भाव नकळत पुसट-पुसट व्हायला लागतो. मग आपोआपच मोह-क्रोध-मत्सरादी षड्रिपूंचा मनातला धुमाकूळ हळूहळू आणि स्वतःच्याही नकळत कमी व्हायला लागतो आणि मनही नकळत शांत- समाधानी होऊ लागतं. अर्थात “ठरवलं आणि झालं“ असा साधा- सरळ मामला नसतोच हा. यासाठी जाणीवपूर्वक सातत्याने प्रयत्न करावे लागतात. हळूहळू तो जेव्हा जगण्याचाच भाग होऊन जातो, प्रत्येक सजीवात परमात्म्याचा अंश आहे ही भावना मनात पक्की रुजते, तेव्हा मग परमात्मास्वरूप असणाऱ्या स्वतःच्या आवडत्या देवरूपाकडे,  सद्गुरुंकडे मन ओढ घ्यायला लागतं — कारण तो जागोजागी असल्याचं अंतर्मनाला जाणवायला लागतं. आणि नकळतपणे  मनातून “मी“ हद्दपार होऊ लागतो. मग स्वतःवर दुःख कोसळले, किंवा सुखे हात जोडून समोर उभी राहिली, तरी या कशानेच मन विचलित होत नाही. ते अधिकाधिक विशाल होत जातं –वृत्तीचा संकुचितपणा आपोआप कमी होत जातो. इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो, आणखी सकारात्मक होतो आणि रज – तमापेक्षा सत्वगुण अत्यंत आनंददायक, शांतीदायक, सुखदायक असल्याची खात्री पटू लागते. प्रपंचात राहूनही परमार्थ साधण्याचा मार्ग उघडपणे समोर दिसू लागणे, ही याची पुढची पायरी. मग इतर कशाहीपेक्षा ईश्वराबद्दल सर्वाधिक ओढ, प्रेम वाटू लागते. स्वतःच्या दुःखांची बोच नगण्य वाटायला लागते. आणि इतरांची दुःखे कमी करण्यासाठी हात आपोआपच पुढे होतात. संत ज्ञानेश्वर – तुकाराम यांच्यासारखे अनेक संत म्हणजे  सत्वगुणांची मूर्तिमंत उदाहरणे.  सत्वगुण म्हणजे काय, कोणत्या कृतीमध्ये  ते ठळकपणे  दिसून येतात, हे श्री समर्थांनी दासबोधाच्या दुसऱ्या दशकातल्या  सातव्या  समासात विस्तृतपणे सांगितले आहे.

 क्रमशः….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  शिवथर घळ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆  शिवथर घळ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆ 

सह्याद्रीच्या डोंगररांगात अनेक घळी आहेत, अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध ही आहेत पण सर्वात प्रसिद्धीला आली ती श्री रामदास स्वामींची शिवथरघळ!

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, वरंधा घाटाच्या कुशीत ही घळ विराजमान झालेली आहे. ही घळ चारी बाजूंनी हिरव्यागार झाडांनी झाकून गेली आहे. सतराव्या शतकात श्री.रामदासांनी निबीड अरण्यात, निसर्गसंपन्न स्थळी असलेल्या ह्या घळीची ध्यान धारणेसाठी निवड केली. समर्थांनी बावीस वर्षे इथं वास्तव्य केले आणि ह्या घळीतच दासबोधा सारख्या आध्यात्मिक ग्रंथाची निर्मिती झाली. श्री. कल्याणस्वामी नी हा ग्रंथ अक्षरबंद केला. ह्या ग्रंथाद्वारे रामदासस्वामींनी सर्व जाती,पंथ, धर्माच्या स्त्री पुरुषांना उपदेश केला आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला.शिवराय आणि समर्थ रामदासांची पहिली भेट  ह्याच घळीत झाली.

या घळीत रहाण्या मागचा रामदासांचा ग्रंथनिर्मिती हा एकमेव हेतू नव्हता तर त्यांचा महत्त्वाचा हेतू होता की शिवरायांना स्वराज्य बांधणीत मदत करणे. डोई जड झालेले जावळीचे चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांची खबर विजापूरला कळवतात, हे ध्यानात येताच समर्थांनी मठा मंदिरा द्वारे जावळी खोऱ्याची संबंध प्रस्थापित केले. तेथील आम जनतेला स्वराज्याच्या बाजुला ओढून घेतले. पुढे शिवाजी महाराजांनी मोर्‍यांचा निपात केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी हे दोन्ही हिरे शिवाजी महाराजांना गवसले.

अफजलखान  विजापूरहून निघाला त्यावेळी याच घळीतून रामदासांनी शिवबांना निरोप धाडला “केसरी गुहेसमीप मस्तीत चालला”.

“एकांती विवेक करुनी इष्ट योजना करावी.”

समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजे शिवथर घळ.

समर्थानंतर तब्बल अडीचशे वर्षे कुणालाच या घळीची माहिती नव्हती. “रामदास गोसाव्याची गुहा” असं या घळीला म्हटले जायचे. समर्थ साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक धुळ्याचे शंकरराव देव यांनी काही कागदपत्रांच्या आधारे एकोणीशे तीस साली या घळीचा शोध लावला. नंतर एकोणीसशे पन्नास साली समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाली. त्यांच्या पुढाकाराने या संपूर्ण जागेचे नूतनीकरण करण्यात आले, पर्यटकांना चढण्यास सोपे जावे म्हणून पायऱ्या बांधून दोन्ही बाजूला लोखंडी रॉड लावले गेले. पायथ्यापासून शंभर पायऱ्या चढून आल्यावर घळीपाशी पोचता येते. घळीत समोरच समर्थांच्या बसण्याची जागा आहे. सुमारे एक हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या घळीत दगड आणि माती यांचं बांधकाम केलेल्या तीन भिंती आहेत. हवा खेळती राहावी म्हणून खिडकी सारख्या पोकळ्या ठेवल्या आहेत. या घळीच्या  बाजूला असलेला धबधबा 100 फुटावरून खाली पडतो, उन्हाळा व हिवाळ्यात या धबधब्याचे पाणी शांत व मनोहरी दिसते. पण पावसाळ्यात हेच पाणी तांडव नृत्य करणाऱ्या शंकराचे रूप घेते.  घळीत आजही शांतता आणि गारवा जाणवतो निसर्गाचा हा गारवा यांत्रिक एअर कंडिशनिंग पेक्षा जास्त गार आहे. या घळीत रामदास स्वामी दासबोध सांगताहेत आणि कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अशा दोन मूर्ती पहावयास मिळतात.

शिवथर घळ येथे सेवा समितीच्या इमारतीमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.

समर्थांनी या घळीला “सुंदर मठ असे म्हटले आहे.”

ही जागा अशी आहे की एक वेगळीच मनशांती इथे लाभते. अशी मनशांती मिळण्याचे भाग्य आम्ही सहलीला  गेलो तेव्हा मला लाभली. अशी ही अद्भुत घळ आपणही पहावी म्हणून हा सारा खटाटोप.

।।जय जय रघुवीर समर्थ.।।

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

“वैजू सारखं वागायला जमत नाही ग आपल्याला. ती कशी कुणी चौकस भेटलं की तिच्या लेकीच्या उत्तम करिअरबद्दल कौतुकाने बोलत सुटते. विचारणार्याची कोरडी काळजी ओठावर यायला संधीच देत नाही.” उषाने त्यांच्या मैत्रिणीचा वैजूचा दाखला देत म्हटलं.

“हो ना! वैजू म्हणते की, ‘लोकांना सतत काहीतरी चघळायला हवं असतं. आपण कशाला त्यांचं च्युइन्गम व्हायचं? आपल्या काळजातलं कुसळ दाखवायचं?”

“बरोबरच आहे तिचं. पण….” म्हणत दोघी  गप्पच बसल्या.  आपापल्या विचारात मग्न झाल्या आणि मग निमूट घरी निघाल्या

* * *

लॅच् की ने दरवाजा उघडल्याचा आवाज आल्यावर उषाने घाईघाईने पुढ्यातली भाजी आवरायला घेतली.

“शी! काय पसारा केलायस आई माझ्या खोलीत.” पर्स ठेवता ठेवता मानसीने शेरा मारलाच.

“हे मॅच बघताहेत आमच्या रूम मध्ये. म्हणून मालिका बघायला मी इथे बसले भाजी निवडत.” उषाने खालच्या मानेने म्हटलं.

“आवर ते सगळं लवकर” मानसीच्या आवाजातून बासगिरी डोकावलीच.

काल मॉलमधून आणलेले ड्रेस घालून बघताना मानसीने खोलीभर टाकलेला पिशव्या, हँगर्स, पिनान्चा पसारा उषाने आज सकाळीच आवरला होता. मुकाट्याने भाजीचा पसारा आवरताना तिने डोळ्यातलं पाणीसुद्धा आवरलं…..

समाप्त

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

 

☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

“अलीकडे रात्री बराच वेळ झोप लागत नाही.वेड्यासारखे विचार मनात येतात. वाटतं की काळ पंधरा वीस वर्षांनी मागे जावा.किती छान स्थळं येत होती तेव्हा मानसीसाठी. हुशार, स्मार्ट, पाच आकडी पगार घेणारी एकुलती एक लाडकी लेक आमची. काहीतरी निमित्त काढून चांगली चांगली स्थळं तेव्हा नाकारली मानसीने. ठाण्याचा  एक मुलगा तर अगदी परफेक्ट मॅच होता मानसीला.  पण ‘त्याची माझी उंची जवळजवळ सारखीच आहे’ असलं खुसपट काढून मानसीने त्यालासुद्धा नाकारलं. यांनी किती समजूत काढली होती तिची.त्यावेळी  मानसीची बाजू घेण्याचा मूर्खपणा मी केला नसता तर……” उषाच्या मनातली खदखद बाहेर पडत होती.

उषाच्या हातावर हलकेच थोपटल्यासारखं करीत नलू म्हणाली  ” जॉर्जबद्दल तर तुला माहितेय.  चंदाच्याच ऑफिसमधला हुशार, सालस मुलगा. केवळ दुसर्‍या धर्माचा म्हणून यांनी टोकाचा विरोध केला. तो लग्न करून, अमेरिकेला जाऊन चांगला सेटल झाला. आणि ‘आता मला लग्नच करायचं नाही’ म्हणून चंदा हट्ट धरून बसलीय.”

“आजचा जमाना असता ना तर आधी लग्न करून नंतर त्यांनी तुम्हाला कळवलं असतं.”

“ते परवडलं असतं. हे गेल्यानंतर कधी नाही इतकं एकटं  वाटतं आताशा”. नलू खिन्न होऊन  म्हणाली.

“मला तर हल्ली जवळच्या नात्यात सुद्धा कुठल्या कार्याला जावसं वाटत नाही. तिकडे आडवळणाने गाडी शेवटी मानसीच्या लग्नावर  येते.”

“परवा मुंजीला  गेले होते, तेव्हा ओळखीच्या  एका बाईंनी चंदा साठी घटस्फोटित स्थळ सुचवलं. धीर करून घरी बोलले मात्र, चंदा एखाद्या वाघिणीसारखी चवताळली. तिने घेतलेल्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहायला जाते म्हणाली.”

“अगबाई,मग? अरुणाने समजुत काढली का तिची?”

“काढणारच. सगळ्याच स्वार्थी आणि मतलबी झाल्येत आजकाल. चंदा सढळपणे घरात खर्च करते. मग तिची मर्जी सांभाळत अरुणा सगळं तिच्या हातात आयतं देते. ‘आत्या आत्या’ करत मुलं चंदाकडून हॉटेलिंग, उंची कपडे, गेम्स वसूल करतात. शिवाय चंदा तिच्या भाड्याने दिलेल्या फ्लॅटचं उत्पन्न थोडंच  सोडणारेय? कधी लाडीगोडी लावून अरूणा  मुलांना चंदाच्या खोलीत झोपायला लावते. राजा-राणीचं  दार लागलं की मलाच काहीतरी अपराध केल्यासारखं वाटतं.” नलूने मनातली खंत  व्यक्त केली.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

बागेत बाकावर बसलेल्या नलूने समोरून येणाऱ्या उषाला बघून हसून हात हलविला. उषा येऊन बाकावर बसण्याआधीच तिला विचारलं ,”अगं कुठे होतीस काल? किती वाट पाहिली तुझी. शेवटी चार फेऱ्या मारून मी घरी गेले.”

“सॉरी ,सॉरी अगं, मानसीची एक मीटिंग रद्द झाली म्हणून आयत्यावेळी तिनं आम्हाला  मालला यायला सांगितलं. अवेंजर्स सिनेमा बघायला ”

“बरं -बरं. आवडला का?”

“डोक्यावरून गेला” हसल्यासारखं करत उषा म्हणाली.” काय ते वेडेवाकडे एलियन्स ,त्यांची विचित्र वाहनं, शस्त्रास्त्र,सारेच अगम्य! मला तर अधून-मधून  डुलक्याच येत होत्या.”

“आणि आता आपल्याला मॉल मधलं ते हिंडणं, खाणं,खरेदी काहीच नको वाटतं. त्यात सिनेमा असा असला म्हणजे…..”नलूने उषाच्या सुरात सूर मिळविला.

“आपल्या या कर्तृत्ववान, ऑफिस मध्ये बॉस असलेल्या लेकी, यांच्या सोयीप्रमाणे आपल्याला गृहीत धरतात. शिवाय घरीदारी सगळीकडे बॉस सारख्याच वागतात.”उषा नाराजीच्या स्वरात म्हणाली.

“आमची चंदा “सेव्हन सिस्टर्स” ला जायला निघालीय. ते सांगायचं होतं तुला”. नलूच्या स्वरातून काळजी डोकावत होती.

“कुणाबरोबर जातेय?”

“एकटोच जातेय. नागालँड, त्रिपुरा पासून एकटीने महिनाभर हिंडणारेय. तिच्या एनजीओतर्फे तिथल्या स्त्रियांच्या आरोग्याचा सर्व्हे करायचा आहे म्हणे. मला तर खूप टेन्शन आलंय.”

“साहजिकच आहे. तरण्याताठ्या मुलीने तिथल्या अशांत वातावरणात एकटीने वावरायचं म्हणजे काळजी वाटणारच”. नलूला दुजोरा देत उषा म्हणाली.

“हो. पण घरात तसं काही बोलायला गेले तर चंदाने मोबाईल मधून डोकं वर काढून, ‘कू–ल, आई कू–ल’ म्हणत माझ्याकडे’ जग कुठे चालले आहे आणि मी कुठल्या युगात वावरतेय’  अशा नजरेनं पाहिलं”

“अरुणा काही म्हणाली का?” उषाने नलूच्या सुनेचं मत आजमावयाला विचारलं.

म्हणाली माझी समजूत काढल्यासारखी ‘अहो आई ,तुम्ही व्हाट्सअप वापरता. आपल्या फॅमिली ग्रुपवर चंदा रोज मेसेज करीन ना. फोटो सुद्धा पाठवील.  काळजी नका करू.’

“फक्त तिथलं इंटरनेट कनेक्शन चालू असायला हवं.” ही माझी शंका मग मी मनातच ठेवली.”  नलूच्या बोलण्यात नाराजी होती.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गप्पांची एक मैफिल संपली ☆ श्री चंद्रकांत बर्वे

श्री चंद्रकांत बर्वे

 ☆ मनमंजुषेतून ☆ गप्पांची एक मैफिल संपली ☆ श्री चंद्रकांत बर्वे ☆ 

प्रसिद्ध पत्रकार, मुलाखतकार, लेखक, नाटककार आणि माझे मित्र अशोक शेवडे यांनी आता या जगातून एक्झिट घेतली आहे. पण त्याच्याबद्दल लिहिताना मी तसा इमोशनल नाही होणार, कारण त्याच्या आठवणी जर जागवल्या तर त्या सगळ्या आनंदी आहेत. त्याला कुणीही कधीही दुर्मुखलेल पाहिलं नसेल.

ही बातमी समजल्यावर मी जेव्हा त्याच्या मुलीला राखीला फोन केला तेव्हा ती म्हणाली आज पहाटे ते गेले पण काल रात्रीपर्यंत आम्ही बोलायचो तेव्हा ते कायम आनंदी असायचे.

मी १९८५ मध्ये आकाशवाणी मुंबईला आलो तेव्हा त्याचा आणि माझा प्रथम परिचय झाला. तो आकाशवाणी आणि दूरदर्शन मध्ये अनेक छोटेमोठे कार्यक्रम करायचा. कोणत्याही कामानिमित्त आला तर तो बाकी सर्व स्टाफशी देखील भेटणार गप्पागोष्टी करणार असा त्याचा स्वभाव आणि मी तर गप्पिष्टच त्यामुळे आमची मैत्री होणं अगदी स्वाभाविक होतं. आमचा चहा पिऊन झाल्यावर मी सिगारेट पीत असे, पण त्याने मात्र कधी सिगरेटला स्पर्श केला नाही. तो स्टेट बँकेत कॅशीअर होता आणि तरीही त्याचे वेगवेगळ्या पेपरमध्ये फिल्मी आणि ललित लिखाण वगैरे चालू होतंच. एकदा आल्या आल्या त्याने मला गंभीरपणे विचारले १०० रुपये आहेत का? मला वाटलं काही तरी त्याला अडचण असेल. मी लगेच त्याला एक नोट काढून दिली. त्याने लगेच मला हसत हसत एक रुपयाच्या १०० नोटांचे बंडल दिले. त्या काळात एकेक रुपया कायम छोट्या मोठ्या खरेदीला उपयोगी पडायच्या. त्यामुळे तो कधी ऑफिसात आला की बरेचजण त्याला एकच्या नोटांचे बंडल मागत. त्याला या सगळ्या गोष्टी जमतात कशा? तर त्यावर त्याचं उत्तर म्हणजे त्याचे पब्लिक रिलेशन्स. आमच्या आंबटगोड कार्यक्रमाचे रेकॉर्डिंगच्या दिवशी त्याचे स्क्रिप्ट वेळेवर त्याचा एक माणूस आणून द्यायचा. फोर्टात बँकेचे काम आणून देणारा माणूस जाता जाता आकाशवाणीत स्क्रिप्ट देऊन जायचा. त्याचा मित्र परिवार मोठा होता आणि वेगवेगळ्या शासकीय आणि निम शासकीय ऑफिसातून देखील होता. पत्रकार असल्यामुळे सगळे नाटकवाले आणि मराठी फिल्मी लोक त्याचे मित्र झाले होतेच. शिवाय मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे यांच्या सारखे बडे राजकीय नेते देखील.

नोकरी करून तो मला म्हणाला मी नोकरी सोडणार आहे पण पुढे फिल्मी डायलॉग मारला. ‘सही समय और सही मौका’ आनेपर. आणि पुढे त्याने त्याप्रमाणे नोकरी सोडली.

माझीही आकाशवाणीतून दूरदर्शन अहमदाबादला बदली झाली. पण आकाशवाणीच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी माझ्या नावे मी एक आकाशवाणीच्या निर्मात्यांसाठी जनरल वर्कशॉप घ्यावे असे पूर्वीच ठरवले होते आणि त्याप्रमाणे माझ्यावर एक आठवड्याचे वर्कशॉप ची जबाबदारी आली. मीच वेगवेगळ्या विषयातील जाणकारांना घेऊन ते अहमदाबाद आकाशवाणीत कंडक्ट करायचे होते. मी त्यातला ‘मुलाखतीचे तंत्र’ हा विषय अशोकला दिला. हां पण इतर राज्यातील निर्माते सहभागी होत असल्याने हिंदी किंवा इंग्रजीतून सोदाहरण लेक्चर अपेक्षित होतं. अशोकने हिंदीतून आपले आपले सादरीकरण सुरु केले. पहिल्या पाच मिनिटात भरपूर हशा मिळाला, आणि मग त्याने मुलाखतीच्या किंवा भाषणाच्या सुरुवातीला श्रोते हसतील किंवा उत्सुकतेने ऐकू लागतील हा पहिला मंत्र सांगितला. एकूण त्याच्या शिकवण्यावर सर्व निर्माते एकदम खुश झाले. मलाही हा अन्य भाषिक मंडळींना देखील इम्प्रेस करू शकतो हे समजलं.

पुढे काही वर्षांनी माझी मुंबई दूरदर्शनला बदली झाली. मी जरी ‘असिस्टंट स्टेशन डायरेक्टर’ म्हणून आलेलो असलो तरी मी केंद्रात नवीन होतो आणि अशोक तर बरेचदा येजा करायचा. त्यामुळे सुरुवातीला त्यानेच माझी बऱ्याच जणांशी ओळख करून दिली. केंद्रातील काहीजण तर मला अशोक शेवडेचा मित्र म्हणून ओळखत होते. पुढे मी एक फिल्मी कार्यक्रम करायला घेतला ‘चंदेरी सोनेरी’ अशोक म्हणजे मराठी फिल्म्सच्या माहितीचा एक्का असल्याने मुलाखतीची जबाबदारी त्याच्यावर. त्याने ती आनंदाने स्वीकारली. त्यासाठी आमच्या स्टुडिओ ची तारीख या फिल्मी लोकांची तारीख मिळवणे, त्यांना भेटून मुलाखतीची प्रश्नोत्तरे तयार करणे, अनुषंगिक कोणते फिल्मी कट्स लागतील त्याची उपलब्धता वगैरे बरीच कामे असतात पण त्यात त्याचे संपूर्ण सहकार्य मिळे, नव्हे ते तो आनंदाने करे. तो कोणालाही भेटीची वेळ घेतल्यावर जाताना स्वतः बुके घेऊन जायचा, तो वेळेत गेला नाही असे कधीही घडले नाही. त्याचे घर डोंबिवलीत आणि पावसाळ्याच्या दिवसात कधी गाड्यांचा खोळंबा होण्याची शक्यता असते, पण त्यामुळे कार्यक्रमात अडचण येऊ नये म्हणून शूटींगच्या आदल्या रात्री तो माहिमला आपल्या मुलीकडे राह्यला जायचा. टीव्हीवर कार्यक्रम ही त्याची नेहमी टॉप प्रायोरिटी असे. तो फिल्मी पत्रकार, आमचा कार्यक्रम फिल्मी त्यामुळे पार्टीची निमंत्रणे येत असत. त्यात मद्यपान असतेच असते. तो शेकडो पार्ट्याना गेला असेल पण त्याने कधीही एक पेगही घेतला नाही. तो मला म्हणायचा की मी साधारणतः मराठी सिनेमा बद्दल जे वाईट जाणवेल ते निर्मात्याला सांगतो पण तसे शक्यतो लिहित नाही कारण मराठी सिनेमांना प्रोत्साहित करावे असे मला वाटते. आमच्या चंदेरी सोनेरी कार्यक्रमाचे शंभर एक कार्यक्रम झाले.

त्याने पुढे स्वतः प्राची देवस्थळी बरोबर ‘चंदेरी सोनेरी’ हा स्टेजशो सुरु केला. त्याचेही शेकडो कार्यक्रम झाले. एका कार्यक्रमात मी पाहुणा म्हणून गेलो होतो त्यावेळेस माझा परिचय करून देताना अशोक म्हणाला की मी त्याला १०० कार्यक्रम करण्याची संधी दिली. मी त्याला लगेच उत्तर दिले.

मी तुला फक्त एक कार्यक्रम दिला होता, पुढले कार्यक्रम तुला तुझ्या चांगल्या कामामुळे मेरिटमुळे मिळाले.

©  श्री चंद्रकांत बर्वे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 18 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 18 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

नवरत्न परिवारामध्ये माझा प्रवेश झाल्यापासून नृत्याबरोबर माझी साहित्याची आवड दिवसेंदिवस वाढत गेली. फोफावत गेली. आम्हा मैत्रिणींचा काव्य कट्टा अधून मधून रंगतदार होत असल्यामुळे, मला ही आपोआप काव्य स्फुरायला लागले.

असं म्हंटल जात – संगती संगे दोषा. माझ्याबाबतीत मात्र” संगती संगे काव्य”असे घडत गेले. आणि नकळत छान छान कविता मला सुचत गेल्या. त्यामध्ये विशेष करून आमच्यातील सौ जेरे मावशी (वय वर्षे ७७) यांनी मला खूप मार्गदर्शन केले.

माझी पहिली कविता”मानसपूजा”,मी विठ्ठलाची संपूर्ण षोडशोपचार पूजा काव्यामध्ये गुंफली. कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा मी आईबरोबर घराजवळील विठोबा देवळामध्ये पहाटे पाच वाजता काकड आरती ला जात होते.तिथले अभंग,आरत्या दिवसभर माझ्या मनामध्ये रेंगाळत रहात आणि त्यातूनच मला हे काव्य स्फुरत गेले.

एकामागून एक प्रसंगानुरूप अनेक कविता लिहिल्या गेल्या.मी मनामध्ये कविता रचून लक्षात ठेवत असे आणि सवडीनुसार फोनवरून गोखले काकूंना सांगत असे.आमची फोनची दुपारी तीनची वेळ ठरलेली होती.मी माझ्या घरा मधून फोन वरून कविता सांगत असे आणि त्या कागदावर उतरवून घेत असत.माझी फोनची घंटा वाजायचा अवकाश,पेन आणि कागद घेऊन त्या तयारच असत. अशा अनेक कविता झरझर कागदावर उतरत गेल्या. माझ्या मनाला आणि मेंदूला एक खाद्य मिळत गेलं आणि मन आणि मेंदू सतत कार्यरत राहिले.

माझा विजय मामा हिमालय दर्शन करून आला होता.त्याने मला आणि आईला प्रवासाचे संपूर्ण रसभरीत वर्णन ऐकवले.ते मला इतके भावले की माझ्या मनामध्ये ठसले आणि मेंदूमधून काव्य रचना अशी ओघवती होत गेली की साक्षात हिमालय माझ्या नसलेल्या डोळ्यापुढे उभा राहिला आणि ती कविता तयार झाली.जी सगळ्यांना खूपच आवडली.

अशा प्रसंगानुरुप आणि कविता बनत गेल्या इथून पुढे मी तुमच्यासमोर सादर करणार आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

ज्या प्रमाणे  कळीमधून कमळ हळू हळू उमलत जावे, त्याममाणे माझा सर्वांगीण विकास हळूहळू होत होता. माझ्या व्यक्तिमत्वातील सूप्त गुण फुलत होते. नवरत्न दिवाळी अंकाच्या माध्यमातून आमचा छोटासा महिला वाचन कट्टा तयार झाला. त्यामध्ये आम्ही कविता वाचन हिरीरीने करतो. त्यातीलच सौ.मुग्धा कानिटकर यांनी त्यांच्या घरी हॉल मध्ये माझ्या एकटीचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींना आमंत्रित केले होते. त्यामध्ये मी भरतनाट्यम चा नृत्याविष्कार सादर केला आणि कविताही सादर केल्या नाट्य सादर केले.त्या सर्वांनी माझे तोंड भरुन कौतुक केले.त्यांच्या शाब्बासकी मुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले.

त्यापाठोपाठ तसाच कार्यक्रम मिरजेतील पाठक वृद्धाश्रमात मला आठ मार्च महिला दिनी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. सर्व आजी कंपनी मनापासून आनंद देऊन गेल्या आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले.

5 जानेवारी 2020 रोजी आमच्या नवरत्न दिवाळी अंकाच्या पुरस्कार वितरण सोहळा, सेलिब्रिटी श्रीयुत प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याप्रसंगी मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते हे गीत नृत्य रुपात सादर करायला मिळाले.विशेष म्हणजे सुरवाती पासूनच सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा ठेका धरला होता आणि नृत्य संपल्यावर सर्वांनी त्या गाण्याला आणि नृत्याला उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केले. अर्थात हे मला नंतर सांगितल्या वर समजल. विशेष म्हणजे श्री प्रसाद पंडित यांनी कौतुकाची थाप दिली आणि मला म्हणाले, ” शिल्पाताई, आता आम्हाला तुमच्या बरोबर फोटो काढून घ्यायचाय.”

माझ्यातील वक्तृत्वकला ओळखून मी सूत्रसंचालन ही करू शकेनअसे वाटल्याने लागोपाठ तीन मोठ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला दिली गेली. एका नवरत्न दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन गोखले काकू यांच्या मदतीने मी यशस्वी करून दाखवले.ते अध्यक्षांना नाही इतके भावले की त्यांनीच माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.त्यानंतर माझा भाऊ पंकज न्यायाधीश झाल्यानंतर आई-बाबांनी एक कौतुक सोहळा ठेवला होता. त्याचेही दमदार सुत्रसंचलन मीच केले ज्याचे सर्वांनी खूप कौतुक केले. दुसऱ्या दिवशी पंकज दादा मला म्हणाला, ” शिल्पू ने समोर कागद नसतानाही काल तोंडाचा पट्टा दाणदाण सोडला होता.” तसेच माझी मैत्रिण अनिता खाडिलकर हिच्या “मनपंख” पुस्तकाचे प्रकाशनझाले त्यावेळी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन ही मी यशस्वी रित्या पार पाडले.

माझ्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी फक्त आणि फक्त गडद काळोख असूनही मी माझ्या परिचितांच्या कार्यक्रमांमध्ये सुत्रसंचलन रुपी प्रकाशाची तिरीप आणू शकले याचे मला खूप समाधान आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग-6 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग- 6 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

अशी व्याख्याने, मूल्याधिष्टित कार्यक्रमांना आम्हां मुलांना घेऊन जाणे, आपल्या संस्कृतीची  ओळख करून देणे ह्या बाबतीत आईबाबा नेहमीच सतर्क होते.

विद्यापीठ हायस्कूलच्या ग्राउंडवर राष्ट्र सेविका समितीच्या पूज्य लक्ष्मीबाई केळकर ऊर्फ मावशी यांची रामायणावर प्रवचने होती. ती पण रात्रीचीच.   विद्यापीठ हायस्कूल घरापासून खूपच लांब होतं. चालतच जावं-यावं लागणार होतं. सहदेव म्हणून हाॅस्पिटलचेच  एक कर्मचारी,  त्यांना विनंती करून आईने त्यांना व त्यांच्या पत्नीला सोबतीला बरोबर घेतले.

वंदनीय मावशी यांची वाणी झुळुझुळु वहाणारं गंगेचं पाणी.  शांत चेहरा, शांत बोलणं, स्पष्ट उच्चार, जमिनीवर आसनावर पालथी मांडी घालून बसलेल्या, शुभ्र नऊवारी लुगडे, दोन्ही खांद्यावरून पदर घेतलेला, शुभ्र रूपेरी केस, नितळ गौरवर्ण.

रोज प्रवचनाच्या सुरवातीला प्रार्थना केली जात होती.

“ही राम नाम नौका भवसागरी तराया

मद, मोह, लोभ सुसरी, किती डंख ते विषारी

ते दुःख शांतवाया मांत्रिक रामराया ।।

सुटले अफाट वारे मनतारू त्यात विखरे

त्या वादळातुनिया येईल रामराया ।।

भव भोव-यात अडली नौका परि न बुडली

धरुनी सुकाणु हाती बसलेत रामराया ।।

आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूरदेशी

तो मार्ग दाखवाया अधिकारी रामराया ।।

प्रभु ही तुझीच मूर्ती चित्ती सदा ठसू दे

मनमानसी या कृपा तुझी असू दे ।।

एकदा बोलायला सुरुवात केली की ऐकताना दीड तास कधी संपला कळतच नसे. अफाट जनसमुदाय,  pin drop silence.

व्यासपीठावर प्रभु रामचंद्रांचा हार घातलेला ‘ पंचायतन’ फोटो. उदबत्तीचा वातावरणात भरून राहिलेला दरवळ आणि मावशींचं ओघवतं, निर्मळ वक्तृत्व.  सग्गळा परिसर रामनामाने भारलेला असे.

प्रवचनात रामायणातल्या व्यक्तिंची,  त्यांच्या स्वभावांची , वर्तणुकीची आणि घडलेल्या घटनांची गोष्टीरूप ओळख करून देताना,  मावशी जीवनातल्या प्रत्येकाच्या जबाबदारी पेलण्याचे, वागण्याचे,विचारांचे स्वरूप कसे असावे यावरही बोलत असत. त्यावेळी हे सर्व कळण्याचं आमचं वय नव्हतं. खूपसं कळायचं नाही. राष्ट्रसेविका समितीचे कार्य हे व्यक्ती आणि कुटुंबापासून देशसेवेपर्यंत व्यापलेले होते. हे कार्य करताना व्यक्तिविकास, कुटुंबातली प्रत्येकाची कर्तव्ये आणि समाजातला आपला वावर हा देशसेवेसाठीच असला पाहिजे,  हे शिकवणारे.

राजूनं,  माझ्या भावानं  या संदर्भातली एक आठवण सांगितली.  एकदा प्रवचनाच्या आधी आई मावशींना भेटायला गेली. मी बरोबर होतो. आईनं विचारलं,  मावशी,  मी कशाप्रकारे देशसेवा करू शकते? त्यावर मावशी म्हणाल्या,  तू घरचं सगळं सांभाळतेस, पतीला योग्य सहकार्य देतेस, भविष्य काळातली चार आयुष्ये घडवते आहेस, हेच निष्ठेने करत रहा, हीच देशसेवा.

त्या दिवशीच्या प्रवचनात मावशींनी हाच विचार उलगडून दाखवला.  प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने,  आपुलकीने आणि जबाबदारी ने करणे, हीच रामायणाची शिकवण आहे.

काही वर्षानंतर, राष्ट्र सेविका समितीच्या शिबिरात माझे व माझ्या बहिणीचे नाव आईने नोंदवले. 21 दिवसाच्या शिबिरात स्वावलंबन, स्वसंरक्षण, देशाभिमान, अशा अनेक मूल्यांवर आधारित बौद्धिके, खेळ, आणि परस्पर संवाद यातून व्यक्तिमत्व विकास घडवण्याचे  संस्कार नकळत आमच्यात रुजले.  खरंतर हे त्यावेळी कळले नाही, पण पुढे अनेक प्रसंगात आपोआप बुध्दी तसाच विचार करू लागली. हळूहळू खरेपणा  आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे, ह्याची जाणीव झाली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे तडफदार, अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व.  जणु दुसरे शिवराय अशी देहयष्टी,  पेहराव, दाढी, डोळ्यांत तीच चमक आणि अस्खलित वाणी.

तर मावशी अतिशय नम्र, आणि केवळ आदर करावा अशा. माया, ममता, प्रेम हे सगळे शब्द एकाठिकाणी सामावलेलं व्यक्तिमत्व. शिस्त आणि करारीपणा ही त्यांची दुसरी बाजू.

श्रोत्यांवर नकळत संस्कार घडत होते. व्याख्याने,  प्रवचने ऐकून दुस-या दिवशी त्यावर गप्पा मारत जेवणे, हा आमचा आवडता छंद म्हणा किंवा काही, पण त्यावर बोलायला आवडायचे. कधी कधी न समजलेलं आई समजून सांगायची. त्यावेळी ह्याचं मोठंसं महत्व जाणवलं नाही. ते सहजरित्या होत होतं.

पुढे आयुष्यात कळलं की ते किती छान आणि महत्वाचं होतं.

बालपणीच्या आठवणी लिहिता लिहिता परत लहान झाल्यासारखे वाटले.

खरंच किती सुंदर असतं नाही बालपण! आई बाबा,  बहीण भाऊ, , छोटंसं जग. इथे स्पर्धा नाही, स्वार्थ नाही, राग नाही.

“या बालांनो या रे या” कवितेतली खरी

“सुंदर ती दुसरी दुनिया”

“बचपन के दिन भी क्या दिन थे”

“उडते बन की  तितली”

समाप्त

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नाते- इंद्रधनुष्यी बंध ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ नाते- इंद्रधनुष्यी बंध ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

जे मनामनाला जोडते ते नाते

जे चराचराला जोडते ते नाते !!

असंख्य वेगवेगळी नाती जन्मापासून आपल्याला अवघ्या विश्वाशी बांधून टाकतात. या प्रत्येक नात्याचे

रूप वेगळे,भाव वेगळा,

रीत वेगळी प्रीत वेगळी !

आपण आयुष्यात असंख्य नात्यांनी एकमेकांशी बांधले गेलेलो असतो. या प्रत्येक नात्याचे स्थान, त्याचे महत्व, त्याची गरज, त्याचे निभावणे हे वेगवेगळे असते.

सर्वात प्रथम आपण ईश्वरीतत्त्वाशी बांधले गेलेलो असतो. त्यानंतर आयुष्यात महत्त्वाचे असते ते आई-वडिलांचे श्रेष्ठ आणि पवित्र नाते.

 माय-बाप असती

 सर्वस्व या जन्माचे

 त्यांच्यामुळेच होई

 सार्थक या जीवनाचे !!

आई-वडील आपल्याला उत्तम आरोग्य, उत्तम संस्कार, उत्तम विचार, उत्तम शिक्षण यांची मौल्यवान शिदोरी देऊन या विश्वाच्या प्रवासाला सोडतात. त्यामधे आपल्या आयुष्याची भावनिक बाजू ही आईने तर व्यावहारिक बाजू वडिलांनी व्यापलेली असते. व्यवहार म्हटले की रूक्षपणा आलाच. पण सर्वच गोष्टी नुसत्या भावनेवर चालत नाहीत तर व्यवहार हा पहायलाच लागतो. त्यामुळेच वडील थोडे कठोर वाटतात. पण नारळातले पाणी किंवा फणसातल्या गऱ्यांप्रमाणे त्यांचे मन असते.

‘दुधावरची साय’ म्हणजे तर संसाराचे संचित असते. नातवंडे ही आजी-आजोबांचे सुख निधान असतात, तर नातवंडांना आजी-आजोबा अतिशय प्रिय असतात. आजच्या बदलत्या वातावरणात नातवंडे पाळणाघरात तर आजोबा वृद्धाश्रमात हे दुर्दैवी वास्तव आहे.तरीही दोघांना एकमेकांची ओढ असते म्हणूनच ते एकमेकांना भेटायची कारणेही हुडकत असतात.

आपल्या आयुष्यातले आणखी एक लोभस नाते आहे मैत्रीचे. मैत्री अखंड विश्वासाची साथ देते, कायम मदतीचा आधाराचा हात देते, निरपेक्ष प्रेम देते. असे मैत्र  ज्यांना लाभते ते खरच भाग्यवंत असतात. मैत्रिणीने,’ मी आहे ना? काळजी करू नको,’ असे नुसते म्हटले तरी हे शब्द आपल्याला संजीवनी सारखेच वाटतात.

आपल्या वाटचालीत आपल्या मदतीला येते ती आपली कामवाली सखी. अनेक वर्षांच्या सहवासाने आपणही तिच्याशी एखाद्या मैत्रिणी सारखे वागू लागतो.तिच्याजवळ मन मोकळे करू लागतो. ती पण स्वत:ची सुखदुःखे आपल्याशी वाटून घेते आणि कामाबरोबरच जीवाला विसावा शोधत रहाते.

अशी असंख्य नाती आपण रोजच्या जगण्यात निभावत असतो.

निसर्गाशी आपले नाते हे तर जिवाभावाचे असते. निसर्ग आपला माय बापच आहे. तो आपले पालनपोषण करतो, रक्षण करतो. त्यामुळे त्याचेही संवर्धन, रक्षण करणे हे आपले महत्त्वाचे  कर्तव्य ठरते.

आपण अशा रीतीने आपल्या आयुष्यात घरातल्या, घराबाहेरच्या,निसर्गातल्या घटकांशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधले गेलेले असतो. या प्रत्येक नात्याचा रंग वेगळा, गंध वेगळा, प्रत्येकाची नजाकत वेगळी आणि त्यामुळेच त्यातून मिळणारी अनुभूती पण वेगळीच असते.

“पैशाने श्रीमंत होणे खूप सोपे असते.

नात्यांनी समृद्ध होणे तितकेच कठीण असते.”

म्हणूनच आपल्याला लाभलेल्या नात्यांची समृद्धी आपण जपली पाहिजे. एकमेकांना वेळ देणे, एकमेकांचे ऐकून घेणे, मदत करणे, एकमेकांचे विचार नाही पटले तर सोडून देणे, माफ करणे अशा अनेक गोष्टींनी ही नाती जपणे शक्य आहे. असे म्हणतात ज्यांना आयुष्यात शांती हवी असेल  त्यांनी वादविवादात एक पाऊल मागे घ्यावे. पण इतरांकडून ती अपेक्षा करू नये. त्यामुळे आपण नात्यांचा आनंद घेऊ शकतो आणि इतरांच्याही आनंदात भर घालू शकतो.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares