मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निद्रेच्या उंबरठ्यावरचे गूढ ध्यान – लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ निद्रेच्या उंबरठ्यावरचे गूढ ध्यान – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

रात्र हळूहळू पृथ्वीवर उतरते. दिवसाचा गोंगाट शांत होऊ लागतो. मनाच्या आकाशात दिवसभर उडणारे विचारांचे पक्षी आपल्या घरट्याकडे परतू लागतात. आणि मग येतो तो क्षण—जेव्हा मनुष्य डोळे मिटतो.

पाहता पाहता एक अद्भुत घटना घडते.

… दिवसभर “मी”, “माझं”, “माझ्यासाठी” या भावनांनी व्यापलेला मनुष्य अचानक सर्व काही सोडून देतो. पद, प्रतिष्ठा, संपत्ती, नाती, चिंता, स्वप्नं, संघर्ष, यश-अपयश—सगळं काही मागे राहतं. झोपेच्या दारातून आत जाताना तो काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही.

हे केवळ झोपणं नसतं… हे एका अज्ञात शक्तीसमोर केलेलं पूर्ण समर्पण असतं.

.. कारण झोप म्हणजे एक छोटासा मृत्यू आणि सकाळ म्हणजे एक नवा जन्म. रात्री आपण स्वतःला विश्वाच्या स्वाधीन करतो. आपल्या हृदयाची धडधड, श्वासांची लय, शरीरातील असंख्य प्रक्रिया—हे सर्व आपण नियंत्रित करत नसतो. तरीही काही अदृश्य कृपा आपल्याला सांभाळत असते.

कधी विचार केला आहे?

झोपताना आपल्याला खात्री नसते की पहाटे डोळे उघडतीलच. तरीही आपण निर्धास्तपणे निद्राधीन होतो. हा विश्वास कुठून येतो?

… कदाचित तो विश्वास आपल्या आत्म्याला त्या परमचैतन्याशी असलेल्या नात्यातून मिळत असावा.

ध्यानात साधक जाणीवपूर्वक स्वतःला शांततेकडे नेतो. पण झोपेत निसर्ग स्वतः आपल्याला त्या शांततेच्या गर्भात घेऊन जातो. म्हणूनच गाढ झोपेत एक अवर्णनीय आनंद असतो. त्या क्षणी ना इच्छा असते, ना अपेक्षा, ना दुःख, ना सुख.

… फक्त अस्तित्व असतं…

.. निराकार…

.. निर्विचार…

.. निशब्द…

आणि कदाचित त्या गहन शांततेत आत्मा क्षणभर स्वतःच्या मूळ स्वरूपाला स्पर्श करत असतो.

पहाट होते.

पूर्व दिशेला प्रकाशाचा पहिला किरण जन्म घेतो.

आपले डोळे उघडतात.

श्वास अजूनही सुरू असतो.

हृदय अजूनही धडधडत असतं.

आणि जीवन पुन्हा एकदा आपल्याला हाक देतं.

… तो क्षण साधा नसतो. ती कृपा असते.

… कारण प्रत्येक सकाळ ही आपल्या पात्रतेमुळे मिळत नाही; ती आपल्याला दिलेली एक नवीन संधी असते.

विश्व जणू हळूच सांगत असतं—

“अजून तुझा प्रवास पूर्ण झालेला नाही… अजून काही अनुभव घ्यायचे आहेत… अजून काही कर्म पूर्ण करायची आहेत… “

अध्यात्माची सुरुवात कदाचित याच जाणिवेतून होते—

… की जीवनावर आपला अधिकार नाही, फक्त सहभाग आहे.

… आपण या विश्वाचे मालक नाही.

… आपण केवळ निमित्त आहोत.

जेव्हा मनुष्य रात्री झोपताना संपूर्ण समर्पण करतो आणि सकाळी उठताना कृतज्ञतेने मस्तक झुकवतो, तेव्हा त्याचं प्रत्येक श्वास ध्यान बनतो, प्रत्येक दिवस साधना बनतो आणि प्रत्येक रात्र ईश्वराच्या कुशीत विसावल्यासारखी वाटू लागते.

… मग झोप ही फक्त विश्रांती राहत नाही.

… आणि जाग येणं ही फक्त दिनचर्या राहत नाही.

… तो दररोज घडणारा एक गूढ आध्यात्मिक उत्सव बनतो—

… जिथे प्रत्येक रात्र अहंकाराचा विसर्जन सोहळा असते,

… आणि प्रत्येक पहाट आत्मजागृतीचा नवीन उदय.

ज्याला या रहस्याची अनुभूती आली, त्याला समजतं की जीवन हे जगायचं नसतं—ते कृतज्ञतेने स्वीकारायचं असतं. 

लेखक : अज्ञात 

संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वतःवर प्रेम करा… ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ स्वतःवर प्रेम करा☆ सुश्री सुरेखा चिखलकर

आपण अनेकदा म्हणतो, “कोणी माझी काळजी घेत नाही, कोणी मला समजून घेत नाही, कोणी माझ्यावर प्रेम करत नाही “

… पण या प्रत्येक प्रश्नापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा; मी स्वतःसाठी काय करतो? जो माणूस स्वतःच स्वतःला सतत दोष देतो, स्वतःची किंमत कमी करतो आणि स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो, त्याला इतरांनी कायम आनंद द्यावा, ही अपेक्षा पूर्ण होणे कठीण असते.

स्वतःवर प्रेम करणे म्हणजे आरशात स्वतःचे रूप पाहून आनंदी होणे एवढेच नाही.

… स्वतःच्या चुका स्वीकारून त्यातून शिकणे, स्वतःला माफ करणे, स्वतःचा सन्मान राखणे आणि गरज पडल्यास स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे हेही स्वतःवर प्रेम करण्याचेच रूप आहे.

जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो, तेव्हा इतरांकडून प्रेमाची भीक मागावी लागत नाही. कारण त्यावेळी आपला आनंद इतरांच्या स्वीकृतीवर नाही, तर स्वतःच्या आत्मविश्वासावर उभा असतो.

… म्हणून आयुष्यात सर्वप्रथम स्वतःशी मैत्री करा. कारण जो स्वतःचा होऊ शकत नाही, त्याच्यासाठी दुसऱ्यांचे प्रेमही अनेकदा अपुरे ठरते. *_

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुझ्यासारखा तूच मित्रा.. ” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “तुझ्यासारखा तूच मित्रा.. ”  ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

यावर्षी ३० जुलै आणि २ ऑगस्ट अशा दोन दिवशी “ मैत्रीदिन “ साजरा केला गेला. तसा बरेचदा तो असाच दोन वेळा जगात साजरा केला जातो, आणि याचे कारण असे की ३० जुलै ही तारीख “ UN International Day of Friendship “ म्हणून जागतिक पातळीवर ‘मैत्रीदिन’ म्हणून साजरी केली जाते. तर दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी.. जो यावर्षी २ ऑगस्ट रोजी होता.. भारत, अमेरिका, आणि यू. के. मध्ये ‘ मैत्रीदिन ‘ साजरा केला जातो.

… दरवर्षीप्रमाणे यंदाही, उपलब्ध असलेल्या सर्व सामाजिक माध्यमांवरून या दोन्ही दिवशी शुभेच्छांचा मुसळधार पाऊस पडला आणि मैत्रीला चिंब भिजवून गेला… आनंद आणि समाधान दोन्ही भरभरून देऊन गेला.

… वाचता वाचता सहजच असं लक्षात आलं की अशा बहुतेक सर्व शुभेच्छा “ मैत्री “ चे महत्व, प्रत्येकाच्या आयुष्यात तिची असणारी आवश्यकता, आणि अर्थातच त्यामागची कारणं, ‘मैत्री’ या शब्दाशी मूलतःच जोडल्या गेलेल्या भाव-भावना, आणि त्या भावनांबद्दल व्यक्त करावीशी वाटणारी कृतज्ञता … हेच सगळं ठळकपणे सांगणाऱ्या होत्या.. नेहेमीसारख्याच…आणि यात आक्षेप घेण्यासारखं खरोखरच काहीच नाही.

पण एका सुहृदाने मात्र मला एक हिंदी कविता पाठवली होती जी फक्त मैत्रीबद्दल न बोलता, स्वतःच्या एका जिवलग मित्राला उद्देशून लिहिलेली होती…भावना त्याच पण व्यक्त करण्याची पद्धत वेगळी.. आणि त्यामुळे अर्थातच ती मनाला फार भावली … त्या मित्राच्या आपल्या आयुष्यात असण्याबद्दल.. व्यक्तिशः त्याच्याबद्दल वाटणारा विश्वास आणि त्याच्याबद्दल मनात सतत असणारी कृतज्ञतेची भावना ठळकपणे व्यक्त करणारी ती कविता … आणि म्हणूनच त्या कवितेचे हे वेगळेपण मनाला थेट भिडले.

…. आणि त्या कवितेचा स्वैर भावानुवाद करण्याचा मोह टाळताच आला नाही.

हिंदी कवी श्री. विजय सिंह चौहान यांच्या.. ।। तुमसा कोई नहीं ।।.. या हृद्य कवितेचा हा स्वैर भावानुवाद ……

☆ तुझ्यासारखा तूच मित्रा.. ☆

भेटण्यासाठी कुठलंच कारण नको 

अन गप्पा मारण्यासाठी एखादा विषयही नको 

शब्दांचं अवडंबर नको… बस् फक्त तुझा आपलेपणा पाहिजे 

बाकी काहीच नको रे मित्रा …

 

मन जेव्हा मनाशी जुळतं..

नातं आपसूकच विणलं जातं 

मग कितीही वर्षं का उलटेनात..

मनात उजळणारे स्नेहाचे दिवे विझू शकतच नाहीत रे मित्रा …

 

भेट कितीही दिवसांनी होवो..

डोळ्यात तो पूर्वीचाच विश्वास असतो 

मग काही न बोलताही खूप काही बोललं जातं 

मनातल्या मधुर संवेदना एकमेकांच्या मनाला लगेच जाणवतात मित्रा …

 

कुठलाही स्वार्थ नाही.. कसलीच अपेक्षाही नाही 

फायदा- नुकसान याचा हिशोब तर नाहीच नाही 

तूच तो मित्र जो सदैव सोबत उभा असतोच असतोस 

प्रत्येक सुखाचे वा दु:खाचेही उत्तर तूच देऊ शकतोस मित्रा …

 

अशा तुझ्या सुंदर पवित्र मैत्रभावनेला माझा मनापासून सलाम मित्रा 

माझ्या मनातल्या मनात तुझा सततच सन्मान मित्रा 

हे आपलं मैत्रीचं घट्ट नातं आयुष्यभर असंच दरवळत राहू दे..

माझा-तुझा स्नेह अविनाशी आणि विश्वास असाच अतूट राहू दे मित्रा… 

खरंच.. तुझ्यासारखा फक्त तूच मित्रा…

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “प्रिय जुलै महिना…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “प्रिय जुलै महिना…!!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रिय जुलै महिना,

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष…?

कालच तू निघून गेलास, पण आजही तुझी आठवण आली म्हणून हा पत्र प्रपंच…? 

महिनाभर राहून गेलास, आपण बोललो – भेटलो तरीही मनातल्या अनेक गोष्टी सांगायच्याच राहून गेल्या, त्या सांगण्यासाठी हे आंतरदेशीय पत्र तुला टाकत आहे.

हल्ली पत्राचा जमाना गेला, पण आपल्यापासून सुरुवात करायला काय हरकत आहे…?

… लहानपणी मी खूप पत्र लिहायचो… ते फिकट निळं, आभाळाच्या रंगाचं आंतरदेशीय आणायचं, कुणी येणार नाही अशा ठिकाणी खोलीचा एक कोपरा पकडून बसायचं, संध्याकाळ नंतर नक्षीदार चांदण्याची काळी साडी नेसून रात्र जशी नकळत येते… इतका वेळ कुठ्ठेही दिसत नसलेला चंद्र, रात्रीच्या भाळावर चांदीच्या बंद्या रुपयागत जसा अचानकपणे नकळतच चमचमतो, तसे शब्दही नकळत चमचम करत मनात यायचे रे…? 

… पिकात सोडलेलं पाणी जसं जमिनीत मुरतं, तसे सुचलेले शब्द मनात मुरायचे, खडे मीठ टाकून आंब्याच्या कोयीसकट, माठात घातलेल्या पिवळ्याशार लोणच्यासारखे…? 

… रानात पेरणी करावी आणि एक दिवस अचानक उठून बघावं आणि इतके दिवस काळ्याशार दिसत असलेल्या मातीत अचानक हिरवे कोंबच कोंब दिसू लागावेत… काळी मातीच जणू हिरवी होऊन जावी, तसं ते निळं पत्र माझ्या मनातल्या भावनांनी हिरवं होऊन जायचं…? 

शेवटी पत्राच्या एका कडेला जिभेवरून फिरवून थोडं ओलं केलं किंवा भाताची चार शितं या कडेवरून त्या कडेवर बोटानं लावली की, आधीच लावलेला डिंक मनातल्या मनात हरखून जायचा… भात खाऊन पोट भरल्यागत…?!!

हरखून, विरघळलेला तो डिंक पत्र घट्ट चिटकवायचा आणि नाती सुद्धा…? 

… नाती टिकवायला प्रेमाची चार शितं आणि थोडा मायेचा ओलावा लागतो हेच खरं…? 

पत्र लिहून झालं की, हाफ चड्डी सावरत, गावातल्या गल्लीबोळातनं फिरून, पत्र “पोष्टाच्या लाल पेटीत” टाकायला दुडक्या चालीनं पळत सुटायचो… पोस्टाची ती आsss करून उभी असलेली लाल पेटी, अजूनही मनात घर करून आहे रे… लहानपणी ती आsss करून उभी असलेली लाल पेटी दिसायची…

… आज आsss करून उभी असलेली उघडी नागडी चिल्ली पिल्ली दिसतात… पोटात भुकेचा वणवा पेटलेला… तो ही लालच…? 

.. ये लाल रंग कब मुझे छोडेगा…???

असो, यावेळी तू आणलेला पाऊस आम्हाला खूप आवडला. आम्ही तो पुरवून पुरवून वापरत आहोत.

कुणाला भिजवून गेला, तर कोणाची तहान भागवून गेला…

शेतकऱ्यांची चूल पेटवून गेला…? 

तुला सांगायचं राहिलं,

… आपल्या गावात ज्यांच्याकडे धड कपडे नाहीत किंवा घरं नाहीत, रस्त्यावर राहतात अशा सर्वांना रेनकोट आणि छत्र्या दिल्या आहेत, काळजी नसावी.

… आपल्या घरामागे जी गल्ली आहे ना, तिथल्या एकाने त्याच्या अपंग आईला, घराबाहेर काढले, तिला व्हीलचेअर दिली.

… त्याचं बघून दुसऱ्याने त्याच्या वडिलांना बाहेर काढलं, ते आजारी होते, पायाने अधू होते. त्यांना हाताने चालवायची तीन चाकी सायकल घेऊन दिली आहे. गंमत बघ, पूर्वी बाबा आपल्या लहान मुलांना तीन चाकी सायकल घेऊन द्यायचे, आज बाबांना तीन चाकी सायकल घेऊन देताना मला काय वाटलं असेल, हे शब्दात नाही सांगू शकत जुलै…

– – तर घराबाहेर काढलेल्या या आई-बाबांना भेटायला गेल्यानंतर जाणवले, त्यांच्यासारखे अनेक जण रस्त्यावर राहत होते… नाईलाजाने जगण्यासाठी याचना करत होते.

वेळ – मित्र – नाती यांना किंमतीचं लेबल नसतं पण हरवल्यावर त्यांचं मोल कळतं जुलै…

… ज्या आई-बाबांना, त्यांच्या मुला-मुलींनी घराबाहेर काढलं आहे, त्यांना आईबापाचं मोल कधी कळेल रे…?

.. या सर्वांनाच रस्त्यावरच गोळ्या औषधं दिली आहेत, रक्त लघवी तपासण्या केल्या आहेत, कुणाला कुबडी, कुणाला काठी, तर कुणाला मानेचे – कमरेचे पट्टे गरजेप्रमाणे दिले आहेत. जे मला रस्त्यात करायला जमत नाही अशा सर्वांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे.

तुला “तो” आठवला का…? हां… “तोच तो”…

त्याने आता टगेगिरी, मारामारी या सर्व गोष्टी सोडल्या आहेत. काम करू लागला आहे. परवा त्याच्या लग्नाला जाऊन आलो, तुझी आठवण काढत होता. सासरी जाताना मुलीच्या वडिलांना काय वाटेल, म्हणून स्वतःच रडणारा तो हाच तो, त्याच्या भावनांना सलाम करणारा मीच तो…? 

तुला तर माहीतच आहे, आपल्या गावात जे लोक असे बाहेर राहतात आणि याचना करतात त्यांना गोळा करून आपण त्यांच्याकडून जेवढा जमेल तेवढा गावाचा भाग झाडून पुसून स्वच्छ करत आहोत. या संपूर्ण टीमला आपण “खराटा पलटण” असं नाव दिलं आहे.

.. दर आठवड्याला अशी स्वच्छता करून प्रत्येकाला महिनाभर पुरेल इतका किराणा दिला आहे.

.. आई स्वरूप अनेक माऊली होत्या, त्यांना नवीन साड्या दिल्या आहेत.

अरे हो, लहान लहान मुलांनी, जुलै काका कुठे गेला? जुलै काका कुठे गेला? असं म्हणत मला भंडावून सोडलं, मग त्यांची समजूत काढण्यासाठी काकांनी हे लाडू पाठवले आहेत, असं सांगून रस्त्यावरील सर्व चिल्ल्या पिल्लांना लाडू दिले.

आपल्या गावातले जे लोक सध्या कुठे ना कुठे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांना डबा आणून देणारं कुणीही नाही, अशा सर्वांना आपण जेवणाचे डबे पोच केले आहेत, त्याचप्रमाणे आपल्या गावातले जे लोक रस्त्याकडेला पडून आहेत, त्यांनाही जेवण दिले आहे. मागच्या पाच वर्षांपासून आपण रोजच्या रोज हे करत आहोत.

तुला माहित आहे ना जुलै… अनेक पालक घरातल्या लहान मुलांना शाळेत न टाकता, आपल्या मुलांना घेऊन भीक मागायला आपल्या गावातल्या धार्मिक स्थळांच्या बाहेर जमा होतात.

.. अशा अनेक पालकांना भेटून त्यांच्या संमतीने त्यांच्या मुलांना भीक मागणे सोडायला लावून त्यांना शाळा कॉलेजात घातले आहे.

… यावर्षी अशा साठ मुला मुलींना आपण शैक्षणिक मदत केली.

तुला ती चिंगी माहितीय…? तान्ही असल्यापासून तिची आई तिला भीक मागायला घेऊन जायची, यावर्षी आपण तिला नर्सरी मध्ये टाकलं आहे. तो पिंट्या… त्याला टॅलीचे क्लासेस लावले… ती पिंकी आठवते का तुला…? जुलै काका मला गाडीवर चक्कर मार असं म्हणणारी… हां तीच, तीला एमबीएला ऍडमिशन घेऊन दिलं आहे… अजून एकीला आयएएस व्हायचं आहे, हायस कुटं दोस्ता…?

– – सर्वात महत्त्वाची गोष्ट, भीक मागणाऱ्या ज्या लोकांना भीक मागणे सोडायचे आहे अशांसाठी आपण एक रोजगार केंद्र (Employment Centre) सुरू केलं आहे. तिथे आपल्या या लोकांच्या साथीने परफ्युम, कृत्रिम मोती आणि फुलांचे बुके, कापडी पिशव्या आणि लिक्विड वॉश अशा गोष्टी तयार करत आहोत, या सर्व वस्तूंच्या विक्रीतून आलेले पैसे त्यांचा पगार देण्यासाठी वापरत आहोत.

.. सध्या पंधरा ते वीस लोक या प्रकल्पात काम करत आहेत, ते कष्टकरी होऊन गावकरी झाले आहेत, याचा आनंद आहे… आणखीही अनेक लोकांना काम करण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना पगार देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, ही खंत सुद्धा आहे.

.. थोडा वेळ जाऊ दे, होईल सर्व व्यवस्थित, मैं समय हुं… असं तूच म्हणतोस ना जुलै…?

 तुझ्यावर विश्वास आहेच आणि आम्ही प्रयत्न सोडणार नाही, यावर विश्वास ठेव? 

 – – तू म्हणशील हे सर्व करतंय कोण…?

.. तर, मी तुला लिहिलेलं हे माझं पत्र जे आत्ता वाचत आहेत, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…? 

.. ज्यांनी दुसऱ्याच्या “वेदना” समजून घेऊन “वैद्य” होण्याचा प्रयत्न केला, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…?!

.. ज्यांनी स्वतःचे हात मला दान दिले आहेत, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…?!!

– – या सर्वांचे हात घेऊन, मी आणि मनीषा काम करत आहोत, ज्यांच्या समोर आम्ही कायम नतमस्तक होतो, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…

आता हे आंतरदेशीय पत्र पुरे करतो, जिभेनं ओलं करून, भाताची चार शीतं लावून, पत्र टाकायला पुन्हा पोस्टाच्या पेटीकडे पळत जायचं आहे…? 

… जाता जाता एक सांगतो, तू गावातून गेल्यानंतर आज आमच्याकडे ऑगस्ट रहायला आला आहे.

.. तो येताना श्रावण घेऊन आला आहे, अनेक सणवार तो आम्हांला भेट देणार आहे.

मित्रा जुलै, तू सुद्धा वारी आणि आषाढी एकादशी घेऊन आलास. सर्व वातावरण भक्तीमय झालं होतं… अजूनही आहे… कायम राहील…? 

… पण आम्ही काही उपवास केला नाही, कारण आम्ही रोजच पोटभर उपास करतो…

… भंगलेल्या मूर्ती काही दिवसात पुन्हा उठून उभ्या राहून, जेव्हा आशीर्वादाचे दोन शब्द माझ्या झोळीत टाकतात, अभंग मी तिथेच अनुभवतो…

… चंदनाची उटी नाही, माझ्याकडे मलमाची वाटी आहे… जखमांमुळे सडत चाललेले पाय, जेव्हा बरे होऊन चालायला लागतात, त्यांच्या पायाने जणू मीच वारी करतो…

… माझ्या हातातला स्टेथोस्कोप टाळ होतो आणि त्यांच्या हृदयातली धडधड मृदंग… भजन मी इथेच अनुभवतो…

… जीर्ण आणि जराजर्जर झालेल्या वृद्ध शरीरांवर मी भक्ती करतो, मग त्यांच्या कायेमध्येच मला विठ्ठल दर्शन देतो…

– – – म्हणून मग मी नाही गाठला चंद्रभागेचा तीर… ना गाठले पंढरपूर…

कळावे, लोभ असावा.

तुझा मित्र,

अभिजीत 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लाहोर की मिट्टी.. ” – लेखक : श्री अमरनाथ सिंग ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “लाहोर की मिट्टी.. ” – लेखक : श्री अमरनाथ सिंग ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

माझी आई पंजाबी ड्रेस घालायची. साडी किंवा लुगडं नेसणाऱ्या बायांमध्ये ती वेगळीच दिसायची. मला ते खूप खटकायचं. असं वेगळं दिसणं मला अजिबात आवडायचं नाही. मी लहान असतांनाची ही गोष्ट. मी लाडीगुडी लावायचो, कधी कधी हट्ट करायचो, साडी नेस म्हणून. तिला काही ते जमलं नाही.

तिचं लग्न झालं तेव्हा ती घागरा-कुर्ता घालायची. हरियाणाचा हा पारंपरिक वेश आहे. तिकडे गावी सोनिपतला असतांनाची ही गोष्ट. लग्नात माझ्या नानांनी तिला अकरा किलो चांदीचे दागिने दिले होते. घागरा-कुर्त्यासह एव्हढे दागिने अंगावर ती कसे वागवत असेल या विचारांनी आम्ही अचंबित व्हायचो. मग जेव्हा इकडे आली महाराष्ट्रात, तेव्हा पंजाबी ड्रेस घालू लागली. तिला मग त्याचीच सवय झाली. नंतर तिला पेहराव बदलणं जमलंच नाही. आयुष्यात एकदाही तिने साडी नेसली नव्हती.

महाराष्ट्राचे परिधान नाही पण भाषा मात्र तिने पुरेपूर आत्मसात केली होती. घराबाहेर तिचा सगळा जीवनव्यवहार मराठीतच चालायचा. नंतर सगळ्या बहिणींच्या बाबतीतही अगदी असंच घडलं.

आईच्या मैत्रिणी सगळ्या मराठी बोलणाऱ्या बाया होत्या. ती त्यांच्याशी उत्तम मराठीत बोलायची. नर्सरीत कामाला जायची. ही नर्सरी (नाशिक जिल्ह्यात) वैतरणा धरणाच्या जवळ होती. ७२च्या दुष्काळात आईची पाटबंधारे खात्यातील नोकरी गेली. वडिलांच्या एकट्या नोकरीवर घर चालणे कठीण होते. दोन बहिणी लग्नाच्या होत्या. नर्सरीत रोजंदारीवर ती जाऊ लागली.

मी दुसरीत असेन. तिच्या सोबत कधी कधी नर्सरीत जायचो. दुपारी सगळ्या बाया रिंगण करून जेवायला बसायच्या. सगळ्यांच्या पुरचुंड्या आणि डबे मधोमध मांडले जायचे. ज्वारी-बाजरी-नाचणीच्या भाकऱ्या, लसणाची चटणी, बेसन, ठेचा, कांदा, मुळा, मेथी, कांद्याची पात, भाजलेले शेंगदाणे… त्या सगळ्या गप्पा मारता मारता आवडीने जेवायच्या. कष्टकरी समूहाचे एकमेकांशी वाटून खाण्याचे ते दृश्य माझ्या मनावर कायमचे कोरलं गेलं आहे.

धृपताबाई आईची मैत्रीण. दोघी शनिवारी नाशिकला जाऊन फळं आणि भाज्या आणायच्या. रविवारच्या आठवडे बाजारात दोघी ते विकायच्या. शेजारी-शेजारी जमिनीवर दुकान मांडली जायची. सगळा व्यवहार मराठीत चालायचा. एक काष्टेवाली आणि एक पंजाबी ड्रेसवाली अशा या मैत्रिणी सगळ्यांच्या खूप परिचयाच्या होत्या.

सकाळी लक्ष्मीबाई दूध घालायला यायची. लुगड्यातली लक्ष्मीबाई, तिच्या कपाळावरील भलं मोठं कुंकू, नाकातील नथ आजही ठळक आठवते. सगळ्यात शेवटी ती आमच्याकडे यायची. किटली-कळशीत शिल्लक असलेलं सगळं दूध बळंबळं घालून जायची. आई तिला कप-बशीत चहा द्यायची. एका हाताने हळूच नथ बाजूला सारून बशी ओठाला लावून ती जोरात फुरका मारायची. फुरक्याचा तो आवाज अजूनही कानात गुंजतो. चहा झाला की त्या दोघी सुख-दुःखाच्या गोष्टी करत घटकाभर बसायच्या.

माझा जन्म इथे महाराष्ट्रात झाला. इथेच वाढलो. आसपास मराठी वातावरण होतं. आम्ही सगळी बहीण-भावंडं मराठी माध्यमातून शिकलो. त्यामुळे आम्ही सगळे उत्तम मराठी बोलू लागलो. आज मी सगळं वाचन-लेखन मुख्यतः मराठीतच करतो. हे मला आपसूकच मिळालं आहे. आसपासच्या वातावरणातून.

आश्चर्य वाटतं मला आईचं. तिचा जन्म लाहोरचा. फाळणीनंतर उसळलेल्या दंगलीत जीव वाचवून त्यांचं कुटुंब इकडं आलेलं. फाळणीच्या काळात आई अकरा वर्षांची असेल. तसं कळतं वय होतं तिचं. तेव्हा तिला दोन भाषा यायच्या, घरात बोलली जाणारी हरियाणवी आणि आसपास मोहल्ल्यात बोलली जाणारी पंजाबी.

पुढे दहा बारा वर्षे हरियाणात गेली. नंतर तिचं लग्न झालं अन रोजगाराच्या शोधात ती वडिलांसोबत महाराष्ट्रात आली. अंगावरच्या कपड्यानिशी ते आले होते. हरियाणवी आणि पंजाबीशिवाय त्यांना इतर कोणतीही भाषा येत नव्हती. मराठीचा एक शब्दही त्यांनी ऐकलेला नव्हता.

त्यांचा पहिला ठिकाणा नगर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातला घोडनदी प्रकल्प. पाटबंधारे खात्यात रोजंदारी कामगार म्हणून लागले. पुढे सेवेत पर्मनंट झाले. तिथे जवळपास एक दशक राहून बदली होऊन ते आले नाशिक जिल्ह्यात वैतरणानगरला. तिथे आणखी एक दशक राहिले. मग परत बदली झाली ठाणे जिल्ह्यातील सुर्याप्रकल्पावर. तिथे २००० साली ती सेवानिवृत्त झाली. तिथून पुढचा काळ देहूरोडला. २०१५ ला पुण्यात माझ्याकडे असतांना तिचा मृत्यू झाला.

अर्ध्या शतकाचा हा महाराष्ट्रातला तिचा रहिवास. या काळात अगदी पहिल्या टप्प्यातच तिने मराठी आत्मसात केली. वडील सुद्धा चांगलं मराठी बोलायचे. पण आईसारखं अस्खलित नाही.

आईने मराठी कशी आत्मसात केली असेल. तिला प्रेरणा नेमक्या कशा मिळाल्या असतील. ती पूर्ण निरक्षर होती. नवी भाषा शिकण्याची प्रक्रिया तिच्या अंतःकरणात नेमकी कशी घडली असेल, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा मला ती गेल्यानंतर निर्माण झाली. आयुष्याच्या धावपळीत बरेच तपशील असेच सुटून जातात. नंतर त्याचं महत्व जाणवतं. मग जीव हळहळत राहतो.

भाषा आत्मसात करतांना नेमकं काय घडलं होतं आईच्या बाबतीत? आज ते कसं कळणार? आता केवळ आठवणी उरल्या आहेत. मी आठवणींचा धांडोळा घेऊ लागतो. मागे मागे जाऊ लागतो. मला तिचे शब्द आठवतात.

ती म्हणायची,

“बेटा, जिस मिट्टी में उगा अन्न खाते हैं,

जहां का पाणी पिते हैं,

वहां की बाणी (भाषा) 

म्हारी नस नस में बस जाणी चेईये. ” 

अशी नाळ जुळली होती मायची अन मराठीची!

जवळपास पन्नास वर्षे महाराष्ट्रात राहून ती खऱ्या अर्थाने मराठी मातीची लेक बनली होती. शेवटी या मातीत ती सामावली.

आम्ही तिचं अस्थी विसर्जन देहूगावला इंद्रायणी नदीत केलं.

#लाहौर_की_मिट्टी

#इंद्रायणी_के_जल_में_समा_गयी

– 

लेखक : अमरनाथ सिंग

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बांध!!!” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

??

☆ “बांध!!!☆ मोहिनी किंहिकर हेडावू 

मी युगान युगाची विरहिणी! सागर मिलनाची आस असलेली!! अनंत काळापासून!!

नाही आवडत मला, माझ्या वर बांध घातलेले! मला वाहू द्या माझ्या मनाप्रमाणे! निरागसपणे! अविरत! अखंड! सागराकडे!! जो बाहू पसरून कधीची माझी वाट बघत आहे!!!

घाला बांध माझ्यावर, कितीही, पण माझ्या मनावर बांध घालू शकत नाही कोणी! ते तर कधीच सागरा कडे जाऊन त्याच्या बाहुपाशात विसावले आहे.!! जेव्हा त्याची ओढ अनावर होते, तेव्हा मी माझे मित्र काळे मेघ, यांना मदतीला साद घालते आणि तेही तेवढ्याच तत्परतेने येतात. कदाचित माझी स्थिती पाहून त्यांचे त्यांना अश्रू थोपविता येत नसावे आणि ते बरसताता, वर्षाव करताता… तेव्हा बांधकाम विशारद म्हणतात, “बांधाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे ‘, हे ऐकून माझे कान तृप्त होतात!

मी प्रियकराला भेटायचे म्हणून तयारीला लागते. खूप खूप बोलायचे असते. कमी वेळात! त्याची एकदा उजळणी करून घेते आणि तो क्षण येतो ज्याची मी आतुरतेने वाट बघत असते!! दरवाजे धडकन उघडतात… मी बेभान धावत सुटते,… माझ्या पायाचे मलाच ओझे वाटते… पण मी धावत असते… माझ्या भेटीसाठी आसुसलेला तोही! तो आपले भरभक्कम बाहू पसरतो… आणि त्याच्या बाहुपाशात मी विरघळत जाते,… स्वतःचे अस्तित्व विसरते! एकरूप होते!!

पण ह्या मिलानाला मात्र चंद्र साक्षी नसतो! कारण तो फक्त नश्वर प्रेमीयुगल यासाठीच आपले चांदणे पसरत असतो!!

आमच्या अमर प्रेमासाठी काळे मेघ असतात, दिलासा देतात! मध्येच कधीतरी वीज चमकते. त्या प्रकाशात मला दिसतात ते माझ्या प्रियकराचे सागराचे अथांग डोळे, ज्यात माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी प्रेम सामावलेले असते! आणि आणि माझ्यावर कधी तरी बांध घातले होते, हेदेखील मी विसरते!

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘नाझ’ आहे तुझ्यावर ! ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

??

☆ “‘नाझ’ आहे तुझ्यावर !” ☆ श्री संदीप काळे ☆

मी जयपूरच्या विमानतळावर उतरलो. एरवी सरफरोश, कच्चे धागे अशा चित्रपटांतून पाहिलेल्या राजस्थानच्या भूमीवर मी आज पहिल्यांदाच पाऊल ठेवले. अनेक शूरवीरांच्या पदस्पर्शाने ऐतिहासिक ठरलेल्या, ‘त्या’ भूमीवर पाय ठेवताक्षणी मी त्या भूमीला वंदन केले. विमानतळावर मला घेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राजस्थान राज्याचे प्रदेशाध्यक्ष गोपाल गुप्ता आणि त्यांची सर्व टीम हार-तुऱ्यांसह आली होती. हॉटेलवर पोहचण्यासाठी रात्रीचे अकरा वाजले. तेवढ्या रात्री उद्या जयपुरात होणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्य अधिवेशनाच्या तयारीची बैठक घेण्यासाठी सर्व सहकारी तयार होते. बैठक झाली. अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी गेल्यावर मी घड्याळाकडे पाहिले. रात्रीचा एक वाजला होता.

उद्याच्या कार्यक्रमाचे चिंतन करत मी अंथरुणावर पडलो होतो, पण झोप काही लागेना. मी सकाळी सातपासून एवढी पळापळ केली तरी, झोप का लागत नाही? याचा विचार मी करत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले, की मुंबईत डॉ. मीना जोशीकाकू धर्माबाद येथून आल्या होत्या. त्यांच्या गडबडीत व्यंकटेश जोशीकाका यांनी मला जेवूच घातले नाही. मी त्यांच्यासोबतच फिरत होतो. मुंबईच्या हॉटेल वेलकमपासून ते जयपूरमधल्या हॉटेलपर्यंतचा माझा प्रवास कमालीचा पळापळीचा होता. मी हॉटेलच्या रिशेप्शनचा फोन डायल केला. त्यांना जेवणाविषयी बोललो. त्यांनी मला सांगितले, किचन अकरा वाजताच बंद झाले आहे. माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. मी जेवणासाठी ऑनलाईन पार्सल मागविले. खाली काऊंटरवर आलो. दरवाजा उघडून बाहेर पाहिले, तर जोरदार पाऊस चालू होता. रस्त्याने गुडघाभर पाणी वाहत होते. अर्ध्या तासाने, तेवढ्या पावसातही माझे पार्सल आले.

पार्सल देणाऱ्या व्यक्तीने मला पार्सल दिले. पाऊस केव्हा कमी होईल, याची तो माणूस वाट पाहत होता. इतक्यात हॉटेलमध्ये साफसफाई करणाऱ्या माणसाला जाग आली आणि तो पार्सल आणलेल्या व्यक्तीला पाहत म्हणाला, ‘अरे ‘नाझ’, तू अजून घरी गेला नाहीस का? अजून इथेच कसा?’

त्याने सांगितले, ‘नाही, निघालो होतो. येथे असलेल्या साहेबांची ऑर्डर होती. होम डिलेव्हरी देणारी मुले घरी गेली होती. त्यामुळे मलाच यावे लागले. आता पार्सल देऊन घरी निघावे म्हटले, तर जोरदार पाऊस सुरू झाला’. अचानक लाईट गेली. साफसफाई करणाऱ्या माणसाने मेणबत्ती लावली. आम्ही तिघेजण त्या मेणबत्तीच्या उजेडात बसलो. पाऊस काही थांबत नव्हता. लाईट कधी येणार आहे, हे माहिती नव्हते. मी तिथेच जेवणाचे पार्सल उघडले आणि जेवायला सुरुवात केली. त्या दोघांनाही मी जेवण्यासाठी आग्रह करीत होतो. पण ते दोघेही जेवत नव्हते. मी जेवत जेवत बोलायला सुरुवात केली.

‘नाझ’ हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत होतो. खूप सुंदर नाव आहे. ‘आमच्याकडे मुलाचे नाव लहानपणी मुलाची आत्या ठेवते. तुमच्यामध्ये कोण ठेवते?’ असे मी त्या पार्सल घेऊन आलेल्या व्यक्तीला विचारले. त्यावर हॉटेलमध्ये सफाई करणारा आणि ‘नाझ’ दोघे एकमेकांकडे पाहत होते. त्यांनी मला ऊत्तर दिलेच नाही. आमचे बोलणे चालूच होते. बोलण्यातून एकएक करून अनेक विषय समोर येत होते. माझ्यासमोर बसलेले ते दोघेजण हातचे राखून बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून एक विषय पुढे आला, तो म्हणजे राजस्थानात गरिबी एवढी चिकटली आहे की, त्यातून बाहेर पडणे पिढ्यानपिढ्या शक्य नाही. तोच सफाई करणाऱ्या सोयबला कुणीतरी आवाज दिला, म्हणून तो बाहेर गेला. त्यानंतर मी आणि ‘नाझ’ बोलत बसलो. ‘नाझ’ हे कमालीचे वेगळेपण असलेले व्यक्तिमत्त्व होते. कसली सामाजिक आणि आर्थिक चिंता नाही. तो बिनधास्त जगतोय, अगदी जगाची पर्वा न करता! अनेकांना सोबत घेऊन.

मी जयपूरच्या मयूर हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्या हॉटेलपासून अगदी जवळच नाझ राहतोय. तिथे त्याचे आणि त्याच्या मित्राचे एक छोटेसे हॉटेल आहे. जयपूरमध्ये लहानाचे मोठे होताना ‘नाझ’ने जे भोगले होते, ते खरे तर कुणाच्याही वाट्याला येऊ नये, असेच होते. पण त्यातून तो एवढा आनंदी आणि समाधानी आहे की, त्याच्यासारख्या अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे.

‘नाझ’ची कहाणी सुरू होते, एका अशा गल्लीत, जिथे जाणे म्हणजे सामाजिक स्वास्थ्याच्या विरुद्ध मानले जाते. ‘नाझ’ची आई सुलताना देहविक्रीचे काम करायची. जेव्हा ‘नाझ’चा जन्म झाला, तेव्हा सुलताना हिने ठरवले की, आता हा व्यवसाय सोडून आपण दूर कुठे तरी नव्याने आयुष्य सुरू करायचे. ‘ती’ त्या दलदलीतून बाहेर पडली. तिने तिचे नवीन आयुष्य सुरू केले. सुलताना हिने कधीही ‘नाझ’च्या बाबतीत कुणालाही खोटे सांगितले नाही. पण त्याचे परिणाम ‘नाझ’ला भोगावे लागले. ‘नाझ’ त्यातून बरेच काही शिकला.

तो माझ्याशी बोलताना म्हणाला, ‘मला बाप नाही, हे माझ्या आसपास असलेल्या लोकांना खूप खटकते. मला बाप नाही, मी बिनबापाचा जन्मलो, हा विषय ते सतत काढत असतात. मला जे विचारतात, त्यांच्या आयुष्याकडे जेव्हा मी बारकाईने पाहतो, तेव्हा माझ्या लक्षात येते की, त्या व्यक्तीचे आणि त्याच्या वडिलांचे आयुष्यभर कधीच पटले नाही. अनेकांना वडील आहेत, पण त्यांनी त्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं आहे. अनेकांना वडील असून ते त्यांच्या सोबत राहत नाहीत. अनेकांना वडील आहेत, पण ते त्यांच्याशी बोलत नाहीत. दुरावा आणि दुरावा हे त्या अनेक मुलांना जसे लागू होते, तसे बापांनाही लागू होते. वडील आणि मुलगा, मुलगा आणि वडील या दोघांमधले नाते किती ठिकाणी चांगले राहते? ते कसे वाईट आहे? याचे अनेक दाखले मला ‘नाझ’ने दिले.

‘नाझ’ म्हणाला, ‘आम्ही ज्या मुस्लिम गल्लीत राहत होतो, तिथे मी लहान असताना सर्व मित्र मला ‘ये नाझयज औलाँद है’ म्हणून चिडवायचे. मी माझ्या ओळखीच्या मौलवींकडे याबाबत तक्रार केली. त्यावर मौलवी मला हसून म्हणाले, ‘तू नशीबवान आहेस. तुझ्यामुळे कुणाला तरी असुरी आनंद घेता येतो. हे चांगले आहे. तूही सर्वांना सांग, अगदी अभिमानाने, माझे नाव ‘नाझ’ आहे. ‘नाझ’ म्हणजे अभिमान, ‘नाझ’ म्हणजे आपलेपण. अरे, या जगात कुणी बिनबापाचा नसतो. सर्वांचा बाप अल्लाह आहे. कुणीही येथे पोरका नाही’.

मौलवीच्या सांगण्यानंतर माझ्याआधी माझ्या मित्रांनी माझे नाव सगळ्या गल्लीला सांगितले. माझ्या अगोदर माझे नवे नाव कुणीतरी अम्माला जाऊन सांगितले.

‘नाझायज’चा ‘नाझ’ आता सर्वांसाठी आदर्श ठरला आहे. ‘नाझ’ने स्वतःचे हॉटेल सुरू केले आहे. तिथे अनेक माणसे काम करतात. ‘नाझ’ आणि मौलवी यांच्यातील नाते आता खूप छान झाले होते. मौलवींच्या मदतीने ‘नाझ’ने अम्मासह अनेकांच्या मदतीने ‘नाझ’सारखी असलेली अनेक मुले शोधून काढली. त्यांचे समुपदेशन करत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्या सर्व मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून आलेले अनुभव आणि मिळालेले नाव यावर ‘नाझ’ माझ्याशी खूप भरभरून बोलत होता. ‘नाझ’ची पत्नी रेश्मा ‘सलोखा’ नावाची सामाजिक संस्था चालवते. ‘नाझ’चे सामाजिक काम पाहून रेश्मा ‘नाझ’सोबत लग्न करण्यासाठी तयार झाली. या दोघांना रुक्साना, सरिता आणि विजयमाला अशा तीन मुली आहेत. त्या तिन्ही मुली इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यांचा प्रथम येण्याचा क्रम दरवर्षी ठरलेला असतो.

मी ‘नाझ’ ला म्हणालो, ‘ही नावे अशी वेगवगेळी का ठेवली?’

‘नाझ’ म्हणाला, ‘आम्ही अशी नावे मुद्दामच ठेवली आहेत. मी आणि रेश्माने कधी आपला धर्म एकमेकांवर लादला नाही’.

आम्ही गप्पांमध्ये एवढे रमलो की, बाहेर पावसाची रिपरिप थांबली, हे आमच्या लक्षातच आले नाही. ‘नाझ’ बाहेर गेला. त्याने पाहिले की आता पाऊस थांबला आहे. ‘मी निघतो’ म्हणत ‘नाझ’ निघाला. नेमकेच जेवण झाले आहे. चला शतपावली करू, या उद्देशाने मीही ‘नाझ’सोबत बाहेर पडलो.

‘नाझ’ने बॅग गाडीला अडकवली आणि आम्ही जयपूरच्या ‘त्या’ रस्त्याने गपा मारत फिरत होतो. मध्येमध्ये आकाशातून पावसाचे थेंब अंगावर पडत होते. आकाशातले ते पाणी जेवढे स्वच्छ होते, तेवढीच ‘नाझ’ची इमानदारी, वर्तन आणि माणुसकी स्वच्छ होती. मेहनतीतून कमवायचे, निराधार मुलांना रस्ता दाखवायचा, कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहायचे, लोकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घ्यायचा, सामाजिक ‘सलोख्या’साठी प्रयत्न करायचे, असे अनेक उपक्रम ‘नाझ’ आणि त्यांच्या पत्नी रेश्मा दोघे मिळून चालवत होते.

मी ‘नाझ’ला म्हणालो, ‘आता रात्र खूप झाली आहे. आपण परत हॉटेलच्या दिशेने निघूया’. त्यावर ‘नाझ’ विनंती करत म्हणाला, ‘साहेब, अगदी बाजूलाच माझे घर आहे. आपण पाच मिनिटांसाठी आलात, तर बरे होईल’.

मी होकारार्थी मान हलवली. आम्ही ‘नाझ’च्या घरी गेलो. आम्ही घरी येतोय हे ‘नाझ’ने अगोदरच घरी सांगितले होते. ‘नाझ’च्या आईने दरवाजा उघडला. ‘नाझ’ची रेशमाही आमची वाट पाहत होती. छोटेसे, पण अत्यंत नीटनेटके घर. त्या घरात मंदिर आणि मज्जितमधील ‘देवपण’ समसमान दिसत होते. ‘नाझ’, ‘नाझ’ची आई सुलताना, ‘नाझ’ची पत्नी रेश्मा यांच्यासोबत माझ्या खूप गप्पा झाल्या.

सुलताना म्हणाल्या, ‘माझ्या मुलाने, माझ्यामुळे खूप भोगले आहे. त्यातून तो आता सावरला आहे. ज्याचा त्याला त्रास व्हायचा, राग येत होता, त्यातून त्याने सावरून मौलवीच्या मदतीने खूप मोठे काम उभे केले. ‘नाझ’ लहान असताना मुले त्याला चिडवायची, तू ‘नाझायज औलाद हैं’ असे म्हणायची. त्यावर ‘नाझ’ घरात येऊन स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायचा. मी त्याला समजून सांगायची. त्यावर तो ओरडून मला विचारायचा, ‘खरं सांग, माझा बाप कोण आहे?’

तो जसाजसा मोठा गेला, तशी त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली’. ‘नाझ’कडे पाहत सुलताना म्हणाली, ‘माझ्या ‘नाझ’चा मला अभिमान आहे. ‘नाझ’ने कित्येकांच्या आयुष्यात सोनेरी सामाजिक पहाट आणून दिली.

‘नाझ’च्या गालावरून हात फिरवत सुलतान म्हणाली, ‘बेटा, काळजी घे स्वतःची. खूप पळापळ करतोस तू. मुली मोठ्या होत आहेत त्यांची काळजी घे. किती डोळे खोल गेलेत तुझे’ असे म्हणताना सुलतानाच्या डोळ्यांत पाणी आले. सुलतानाने ‘नाझ’ला जवळH’b घेतले. ‘नाझ’ सुलतानाच्या मांडीवर झोपी गेला. सुलताना ‘नाझ’ला थोपटत होती. सुलतानाआईच्या प्रेमाला कोणत्या शब्दांत बांधावे, असे मला झाले होते.

रेश्मा म्हणाली, ‘या जगात असे अनेक ‘नाझ’आहेत, ज्यांना रस्ता दाखवण्याची गरज आहे. नाहीतर ते व्यसनाला जवळ करतात. दरवर्षी एकट्या राजस्थानमध्ये असे ‘नाझ’ वीस हजारापेक्षा जास्त सापडतात. हाच आकडा देशभरात दहा पट आहे. जगभरातल्या ‘नाझ’चा विचार केला, तर अशा ‘नाझ’ची एक मोठी जमात तयार होऊ शकते. यातली साठ टक्क्यांहून अधिक माणसे लोकांच्या बोलण्यामुळे जगणे सोडून देतात आणि उर्वरित चाळीस टक्के लोकांच्या बोलण्याला घाबरून जीव मुठीत धरून जगतात’.

मी घड्याळाकडे पाहिले. रात्र आता संपण्याकडे झुकली होती. मी ‘नाझ’ला म्हणालो, ‘चला ‘नाझ’कुमार, निघावे लागेल मला. तुम्ही तुमच्या आईच्या कुशीत आहात. माझी आई फारच लांब आहे’.

त्यावर दुसऱ्या बाजूने मला सुलताना आईने पकडले आणि मांडीवर झोपवले. सुलताना मला म्हणाली, ‘बाळा, आई शोधा, म्हणजे सहज सापडेल’.

तो क्षण कमालीचा भावनिक होता. मी ‘नाझ’च्या घरातून बाहेर पडलो. सोबत ‘नाझ’ही होता. ‘नाझ’ मला हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी आला. त्याची गाडी घेऊन तो परत घरी गेला. त्या हॉटेलमध्ये अजून लाईट आली नव्हती. मी विचार करीत होतो, अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या ‘नाझ’ला हाच समाज पूर्वी नावे ठेवत होता. आता हाच समाज ‘नाझ’चा उदो उदो करतो. या समाजाचे खरे रूप काम करणाऱ्या, वेगळेपण जपणाऱ्या, सामाजिक प्रवाहात असणाऱ्या माणसाला कधी दिसले नाही. उलट या टीका करणाऱ्या, बेसुमार वागणाऱ्या माणसांच्या चुकीच्या वागण्यामुळे चांगली माणसे अजून चांगले काम करीत असतील, जसा ‘नाझ’ करतो. सामाजिक स्वास्थ्य ‘यांनी’ बिघडवले, असा ज्यांच्यावर बेसुरी सामाजिक शिक्का बसला, पण त्यांनी सामाजिक स्वास्थ्य खऱ्या अर्थाने सुधारले, असे अनेक ‘नाझ’ आपल्या अवतीभोवती आहेत. त्या ‘नाझ’ला तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून मदत करणे गरजेचे आहे, बरोबर ना? करणार ना तुम्ही मदत?

 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्री- – -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

??

☆ मैत्री– – – ☆ विभावरी कुलकर्णी

किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

पण महत्वाचा, अनुभवल्याशिवाय न समजणारा ‘मी’ आणि’ तू’ यांचा मिळून बनतो शब्द ‘मैत्र’

हे मैत्र ज्यांच्यात असते, ती भावना म्हणजे मैत्री’ सर्व भेदांना छेदून जाते ती ‘मैत्री’

एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास म्हणजे ‘मैत्री’ कोणतीही गोष्ट करताना झालेली आठवण म्हणजे मैत्री’

दोन आत्म्यांना जोडणारे, तरीही मुक्त असणारे बंधन म्हणजे ‘मैत्री’

असे बंधन जे स्थळ, काळ, वेळ, स्त्री, पुरूष सर्वांच्या पलिकडचे..

बंध असूनही बंधनात न ठेवणारे…

सर्व नाती जपूनही नात्यांच्या पलिकडचे… कोणतेच नाते नसूनही सर्व नाती जपणारे-

कोणतीही गोष्ट हक्काने केंव्हाही शेअर करावीशी वाटणे म्हणजे ‘मैत्री’

एकमेकांना समजून घेते. समजावते ती मैत्री’ कोणतीही गोष्ट लपवावीशी वाटत नाही ती ‘मैत्री’

षडरिपुंच्या पलिकडे जाऊन आदर करते ती मैत्री’ 

एकमेकांच्या उणीवांसहित केलेला स्विकार म्हणजे ‘मैत्री’

मनातले न सांगताच समजून घेते ती ‘मैत्री’ 

एकमेकांचा आदर करते. आणि हक्कही गाजवते ती ‘मैत्री’

नशीबवान माणसांनाच लाभते अशी मैत्री खरचं किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माज्या कुलुपाची चावी हरवली…” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

??

☆ “माज्या कुलुपाची चावी हरवली…” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

‘पांडू हवालदार’ या दादा कोंडकेंच्या सिनेमात एक गाणं आहे, “माज्या कुलुपाची चावी हरवली, कोतवाल तुमी डायरीत ही क्येस न्हाई लिव्हली… ” ते गाणं दादांच्या टिपिकल द्व्यर्थी संवादाइतकं चावट जरी नसलं, तरी ऐकता-ऐकता आपोआप गालात जीभ जातेच!

पण शीर्षक म्हणून निवडलेल्या या शृंगारिक गाण्याचा आणि माझ्या लेखाचा खरं तर संबंध इतकाच की, आज अनेक दिवसांनंतर माझ्या हातून एक किल्ली हरवली.

लहानपणीचे किल्ली हरवण्याचे बरेच प्रसंग ‘माज्या डायरीत लिव्हलेले’ आहेत. कारण, मी स्वतःच ते अनुभवले होते किंवा माझ्या आसपास घडताना पाहिले होते.

साताऱ्याच्या सैनिक शाळेत असताना इयत्ता पाचवीपासून होस्टेलवरच राहात होतो. दर वर्षी उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीनंतर मुलं होस्टेलवर परत आली की दोघे-तिघे तरी आपल्या कपाटाच्या किल्ल्या घरी विसरून आलेले असायचे. कधीकधी मीही त्यातला एक होतो. क्वचित, खेळाच्या मैदानावर किंवा खेळायला जाता-येताना खिशातून किल्ली कुठेतरी पडून जायची. मग संध्याकाळी अगदी गडद काळोख होईपर्यंत किल्ली शोधण्याचे निष्फळ प्रयत्न व्हायचे.

आमच्या शाळेचे आवार म्हणजे जुना ब्रिटिश कॅम्प असल्याने, १९७०च्या दशकात आमची शाळा सातारा शहराच्या बाहेरच होती म्हणायची. सदर बाजार नावाची एक वस्ती तेवढी शाळेपासून जवळ होती. त्यामुळे डुप्लिकेट किल्ली बनवून देणाऱ्याला बोलावून कुलूप उघडणे तसे दुरापास्तच असायचे. मग रडवेल्या चेहऱ्यांनी ती मुलं कपाटाचे कुलूप तोडायचे मार्ग शोधू लागायची.

अशा वेळी काही वर्गमित्र आणि सिनियर मुलं मदतीला यायची. तशीच, मनातला आसुरी आनंद लपवत, लांबूनच फुकट सल्ले देणारीही काही मुलं होती. आमच्या कपाटांना लावलेली कुलुपं तशी साधीच असायची. त्यामुळे ती तोडायला फुटबॉल बूट हाच रामबाण उपाय कामी यायचा. त्या बुटांच्या तळाला जे कडक असे स्टड असायचे, त्यांच्या माऱ्याने त्या फुसक्या कुलुपाचा सहजी ‘आ’ वासत असे. आमच्यातली जरा जास्तच ‘Security Conscious’ असलेली काही मुलं सुट्टीवर जाताना आपल्या कपाटाला ‘नवताल’ किंवा अशाच कुठल्या तरी कंपनीची दणकट कुलुपं लावून जायची. त्यांची किल्ली जर हरवली तर मात्र त्यांची अवस्था बघवत नसे. तिथे फुटबॉल बुटांचा उपयोग होत नसे. मग दगडाचे ‘दाणदाण’ आवाज रात्री उशिरापर्यंत ऐकू येत असत.

अनेक कटू अनुभव घेतल्यानंतर, पुढे-पुढे माझ्याकडून किल्ली हरवण्याचे प्रसंग कमी झाले. कोणतीही किल्ली किंवा इतरही गोष्टी जपून ठेवण्याचं जरासं भान मला आपोआप आलं. हल्ली घरातून बाहेर पडताना, मी गाडीच्या किल्लीचा वजनदार गुच्छ रुमालासोबत पॅन्टच्या डाव्या खिशात ठेवतो आणि घराच्या किल्लीची छोटी रिंग उजव्या खिशात ठेवतो. उद्देश हा की, रुमाल किंवा गाडीची किल्ली काढताना चुकून घराची किल्ली हाती येऊ नये किंवा खिशाबाहेर पडू नये.

आज मी जरा गडबडीत बाहेर पडलो होतो. एका हातात पिशवी असल्याने, दुसऱ्या हाताने दोन्ही किल्ल्या उचलल्या आणि एकाच खिशात कोंबल्या. पुढच्या दोन तासात, सदर्न कमांड हॉस्पिटलमधील दोन डिपार्टमेंट्स, आणि एक-दोन दुकाने अशा विविध ठिकाणी जाऊन, वेगवेगळी कामे करून, स्वातीला तिच्या क्लिनिकमधून घेऊन मी घरी आलो. तिला लगेच कॉलेजात लेक्चर घ्यायला निघायचे होते. घर उघडण्यासाठी खिशात हात घातला तो काय? किल्ली गायब! दोन्ही खिसे दोन-तीनदा तपासले, हातातली पिशवी तपासली, पण व्यर्थ.

स्वातीजवळच्या किल्लीने घर तर उघडले. पण “घराची किल्ली हरवल्यामुळे, सुरक्षेचा विचार करता, आता घराचे मुख्य कुलूप बदलावे लागणार… ” हा विचार माझ्या मनामध्ये येण्याच्याही आधी मला स्वतःची प्रचंड लाज वाटली. तसेच उलट्या पावली बाहेर पडून, ज्या दोन-तीन ठिकाणी मी गेलो होतो तिथे जाऊन शोधाशोध करावी, कुठेतरी ती किल्ली पडलेली नक्की सापडेल, असा माझा विचार होता. पण आता आम्हा दोघात मिळून एकच किल्ली असल्याने, स्वाती कॉलेजात गेल्याशिवाय मला घर बंद करून बाहेर पडता येणार नव्हते.

अखेर मी बाहेर पडलो आणि सगळीकडे पुन्हा जाऊन आलो. दुपारची वेळ झालेली होती. आज बुधवार असल्याने सदर्न कमांड हॉस्पिटलचा ‘हाफ डे’ होता. त्यामुळे तिथे शुकशुकाट झालेला होता. तिथल्या कारपार्कमध्ये शोधाशोध केली. दुकानापर्यंत आलो तर, दुपारी झोपण्याच्या ‘पुणेकर धर्मा’ला जागणाऱ्या दुकानदाराने दुकान बंद केलेले होते. त्या दुकानासमोर थोडी शोधाशोध केली. अखेर हात हलवत घरी आलो. घरात शिरत असतानाच ‘पांडू हवालदार’ सिनेमातलं गाणं आठवलं होतं आणि हा लेखही मनात तयार झाला होता.

तेवढ्यात मला किल्ली हरवण्याशी संबंधित असलेला दुसरा एका प्रसंग आठवला. बऱ्याच वर्षांपूर्वी, मुलं लहान असताना, आम्ही दोघे मुलांना घेऊन कुठंतरी लांब ड्राइव्हसाठी गेलो होतो. हवा आल्हाददायक होती. एका डोंगरावर गाडी नेली आणि अचानक रस्त्याच्या कडेला एक मोठं, निर्मनुष्य पठार दिसलं. त्या सबंध पठारावरच काय, पण आसपासदेखील एकही मनुष्यप्राणी नव्हता. शहरातल्या माणसांना अशा जागेची भुरळ न पडली तरच नवल!

रस्ता सोडला आणि सरळ त्या पठारावर मी गाडी नेली. खाली उतरून जरा हिंडावं, फोटो काढावे, अशी सगळ्यांचीच इच्छा होती. चौघंही खाली उतरलो. काही पावलंच पुढे गेलो असू, तेवढ्यात गाडी लॉक झाल्याचा ‘पिक’ असा आवाज मागून आला. काय घडलं होतं याचा मला त्या क्षणी अंदाज आला. मी गाडीची किल्ली इग्निशन स्विचमध्ये ठेवूनच खाली उतरलो होतो आणि किल्ली ‘ऑन’ केलेल्या अवस्थेत होती. गाडीचे एक ‘फीचर असे होते की जर काही क्षण ‘ऑन’ अवस्थेत किल्ली राहिली तर गाडीचे दरवाजे आपोआप ‘लॉक’ होतात. या ‘फीचर’चा अनुभव मी गाडीमध्ये बसलेलो असताना अनेकदा घेतला होता. पण त्या क्षणी मला त्याचा विसर पडला होता.

आता परिस्थिती अशी होती की त्या निर्मनुष्य पठारावर आम्ही चौघे आमच्या गाडीच्या बाहेर होतो, किल्ली गाडीच्या आत होती, गाडीच्या खिडक्या बंद होत्या, आणि गाडी लॉक झालेली होती. किल्लीच्या बाबतीतला असा प्रसंग माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेला होता. त्यामुळे त्यावर खात्रीशीर उपाय मला चटकन सुचेना. गाड्या चोरणारे लोक पट्टी किंवा काहीतरी वापरून, बाहेरून गाडीची खिडकी उघडू शकतात इतपत माहीत होते. पण अर्थातच, तसले काही करण्याचा मला पूर्वानुभव नव्हता. काहीतरी खटपट करू लागलो. अशा वेळी भुकेजलेली स्वाती आणि मुले मला उद्देशून जे काही बोलत होती ते ऐकून माझे मनोबल आणखीच खचत चालले होते.

अचानक आमच्यापैकी कोणालातरी दूरवरच्या रस्त्यावरून जाणारी, एक ‘लालपरी’ बस दिसली. स्वाती व मुलांनी आरडा ओरडा करून ती बस थांबवली. बसचा ड्रायव्हर व कुणा प्रवाशाने काहीतरी करून गाडीची खिडकी उघडण्यात यश मिळवले आणि आमची त्या संकटातून सुटका झाली. आजवर किल्ली हरवण्याचे सर्वच प्रसंग शोकांत असल्याचा अनुभव आलेला होता. त्या मानाने, गाडीच्या किल्लीचा हा प्रसंग फार महागात पडला नव्हता म्हणून जरा हायसे वाटले.

आज किल्ली हरवल्याच्या शोकांत प्रसंगाची गोष्ट लिहायला मी जड अंतःकरणाने बसलो होतो. स्वाती कॉलेजातून आल्यावर तिला ही गोष्ट वाचून दाखवावी, म्हणजे दुःख जरा हलके होईल असा विचार केला होता. संध्याकाळी, “शोधा म्हणजे सापडेल” असे ओरडतच स्वाती घरात शिरली, तेंव्हा मात्र मी जरा खटटू झालो. माझे दुःख हलके करण्याऐवजी तिने माझ्या जखमेवर मीठ चोळावे याचे मला वाईट वाटले. पण पाहतो तो काय? माझी किल्ली माझ्या डोळ्यासमोर नाचवतच ती ओरडत होती!

कॉलेजातून परत येऊन गाडी कारपार्कमध्ये लावल्यानंतर, तिने बारकाईने कारपार्क धुंडाळले होते. तिला ती किल्ली आमच्या कारपार्कमध्येच सापडली होती असे तिने सांगितले. ते ऐकून माझी अवस्था मात्र ‘काखेत कळसा… ‘ अशी झाली होती.

परंतु, किल्ली हरवण्याच्या काही कथा सुखांतदेखील असू शकतात हा अनुभव आज मला आला, हेही नसे थोडके!

© कर्नल आनंद बापट ( निवृत्त ) 

 मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Kaizen…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Kaizen… ☆ संध्या बेडेकर ☆

Kaizen हे जापनीज तत्व आहे.

Place for Everything. Everything in place.  

आम्ही तिघी बहिणी. अगदी सख्या, म्हणजे आमचे आई वडील सेमच.

परंतु स्वभाव सवयी, आवड निवड बघून कोणाला खरं वाटणार नाही. एकाच हाताची पाची बोटं एक सारखी नसतात, असं म्हणतात ना, अगदी खरय. आई वडीलांच्या सवयी मुलांमध्ये उतरतात. तेही खरंय. कधी कधी दोन्ही घरच्या आजी आजोबांचाही मधून मधून उद्धार होत असतोच. शेवटी स्वतः चे काही गुण असतातच की.

व्यवस्थित पणा आळशीपणा. वगैरे वगैरे.

आमची ताई म्हणजे जपानी सूत्र म्हणजे 

KAIZEN  पाळणारी 

Place for everything. Everything in Place

सतत चांगल्यासाठी घरातील सर्वांबरोबर विचार विनिमय करून बदल करणारी.

 हे पाळणारी.

तिचं घर म्हणजे खूप विचारपूर्वक डिझाईन केलेले. अगदी पूर्ण आयुष्याचा विचार करून.

मुलं झाल्यावर, ती मोठी झाल्यावर, आपण म्हातारे झाल्यावर वगैरे वगैरे सर्व गोष्टी लक्षात ठेवून छान घर बांधलं. सवयींमध्ये एवढा व्यवस्थीत पणा आहे. त्यामुळे विचारांतही स्पष्टता, बोलणही स्पष्ट. कुठेही कनफ्युजन नाहीच. घर फक्त बांधलंच नाही तर ते ठेवलही व्यवस्थित. मुलं शिस्तीत वाढली, त्यामुळे तो व्यवस्थित पणा पूढे ही चालू राहिला. आजही आहेच.

तिच्या घरी तुम्ही काहीही मागा म्हणजे सुई दोरा, रबर बॅंड, एखादी इंद्रधनुष्यग, लिहायला कागद पेन, मॅचिंग कानातले म्हणजे काहीही. ती म्हणेल 

अग! माझ्या आलमरीत सेकंड ड्राॅववर मध्ये उजव्या बाजूला एका झिपलाॅक बॅग मध्ये बघ. तेथेच मिळेल तुला. एवढा आत्मविश्वास असतो ताईंच्या बोलण्यात.

घरातील प्रत्येक सामानाची जागा पक्की

Place for everything. ते सामान पण तेथेच असणार. Everything in place आठवतंही सर्व, कारण वर्षानुवर्षे त्या वस्तूची तीच जागा आहे.

ताई फक्त वस्तूंचेच व्यवस्थापन छान करते अस नाही, हा विचारपूर्वक व्यवस्थित पणा तिच्या प्रत्येक क्षेत्रात दिसतो. कारण विचारांचे व्यवस्थापन परफेक्ट आहे. चांगला बदल करायला ती नेहमीच तयार असते.

त्याउलट आमची दीदी. मस्त मौला. कोणतीही गोष्ट विचारा. अग! आहे घरात, पण शोधावी लागेल. शोधली तर नक्की मिळेल.

म्हणजे अगदी सुई दोरा ते पासपोर्ट, medical report ते साखरेचा डबा. म्हणजे डबा असतो ओटयावरच पण ओट्यावर इतर वस्तूंमध्ये शोधावा लागतो एवढंच. सर्व गोष्टी शोधल्यावर च मिळतात. पासपोर्ट कुठे मिळेल सांगता येत नाही. कधी कधी शोधण्याचे कष्टही वाया जातात. Anyways पण ती आनंदी असते. मजेत जगते.

माझं आपलं अधल मधलं काम. सोनं चांदी दागिने पासपोर्ट, अगदी जागेवर. बाकी वस्तू बऱ्यापैकी जागेवर. परंतु ताई सारख माझ्या आलमरीत सेकंड ड्रावर मध्ये••• वगैरे म्हणजे एवढ्या डिटेल्स मध्ये सांगायची काही हिम्मत नाही माझी.. कधी मिळतात वस्तू, कधी नाही. वस्तू त्याच जागेवर ठेवल्या जात नाहीत म्हणून गडबड होते. एखाद्या वेळेस खूप व्यवस्थित आवरून ठेवलं तर स्वतः बद्दल छान वाटत. परंतु महिन्याभरात जैसे थे. खूप सांभाळून ठेवलेली वस्तू तर हमखास वेळेवर मिळत नाहीच. वेळेवर विकत घ्यावी लागते. उगीचच पैसे खर्च होतात. वाईट वाटत.

तसे आमच्या तिघींचे संसार मजेत चालू आहेत.

जो है, जैसा है, उसमें हम सब खुश हैं

ताईला भेटल्यावर प्रत्येक वेळी तिच कौतुक वाटतं. एखाद्या बाईने किती व्यवस्थित असावं?? कधीच पेटीकोट शोधावा लागत नाही. मॅचिंग नेहमी कसं काय जमतं बुआ? आश्चर्यच वाटतं. नेमकी तीच डबी कशी काय मिळते? काही शोधाशोध नाही, डब्यांची हुसकाहुसकी नाही. साडयांचा ढीग तसाच व्यवस्थीत.

तेच दीदीचे म्हणजे कुठे जायचे म्हंटले तर पसरलेल्या घरात अजून थोडा पसारा वाढतो.

माझं आपलं वेगळंच प्रकरण. ठीक ठाक. खूप व्यवस्थित तर नाहीच पण जेमतेमच. हुसकाहुसकी शोधाशोध असतेच. शेवटी दुसरच काही तरी ठरत. त्यामुळे गोंधळ असतोच.

माझ्या आणि दीदींच्या मुलांचं कौतुक म्हणजे घरी चहा पिऊन झाल्यावर तो कप तेथेच असतो, वाळतो. पण ताईकडे मात्र ही मुलं कप लगेच बेसिन मध्ये ठेवतात.

प्रत्येक वेळी मी ठरवते. स्वतः मध्ये बदल करायचा, हळूहळू मुलांनाही सवय लावायची. व्यवस्थित पणा म्हणजे वेळेवर काम करणे. वेळ वाचतो. चिडचिड कमी होते. यात फायदाच जास्त आहे. तसा उशीरच झाला आहे पण काही हरकत नाही 

देर आए दुरुस्त आए।  

सुबह का भूला अगर घर लौट आए तो उसे भूला नहीं कहते।

थोडा फरक नक्कीच पडेल. मुलांना पूढच्या आयुष्यात त्याचा फायदाही होईल.

आज सहा महिन्यांनंतर ताई घरी आली. माझ्यातला बदल बघून हसून शाब्बास म्हणाली.

 म्हणाली, 

Yes,

Kai म्हणजे बदल 

आणि Zen म्हणजे चांगला.

सतत चांगले बदल घडवत रहाणे.. मग प्रगती निश्चितच होणार. वेळ नक्कीच वाचणार. मग 

ते आपले घर असो, एखादी संस्था असो नाहीतर स्वतः चे व्यक्तिमत्त्व असो. प्रगती नक्की होणार.

फक्त बदल करायची मानसिक इच्छा, तयारी, आणि सातत्य पाहिजे.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares