मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “५ रुपयांचे ५०० रुपये झाले…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “५ रुपयांचे ५०० रुपये झाले…” ☆ श्री सुधीर करंदीकर

 “५ रुपयांचे ५०० रुपये झाले – फक्त पंधरा दिवसांमध्ये – मजेशीर आठवण. ” 

आपण सगळेच जण निरनिराळ्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करत असतो, त्यावर कुठे ७ टक्के व्याज मिळते, कुठे ५ टक्के, काही ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे १० टक्के, हे आपण जाणतोच. आणि जास्तीत जास्त व्याज कुठे मिळेल याकडे आपली कायम नजर असते.

मला चक्क एका ठिकाणी पाच रुपये देऊन त्याबद्दल पाचशे रुपये मिळाले आणि ते पण फक्त पंधरा दिवसांमध्ये, किती टक्के झाले हे तुम्हीच सांगा.

जुनी गोष्ट आहे, मी एकदा बावधन ला ट्रॅफिकचा रस्ता क्रॉस करण्याकरता एका म्हशीची मदत घेतली. आणि म्हशी बरोबर अगदी आरामात रस्ता क्रॉस केला. आणि त्याकरता म्हशी च्या मालकाला ५ रुपये दिले.

एकदमच वेगळी घटना म्हणून या घटनेवरती मी ‘म्हैस’ हा लेख लिहिला. आणि लेख मित्रमंडळींना पाठवला. एका मित्राचा फोन आला की लेख खूपच छान आहे, तू लोकसत्तेला पाठव म्हणजे तो खूप लोकांपर्यंत पोहोचेल.

मित्र हे पण म्हणाला की लेख पाठवल्यानंतर त्यांच्याकडून लेख मिळाला असं उत्तर येईल किंवा उत्तर येणार पण नाही, तसेच लेख छापून येईल किंवा येणार पण नाही. कारण त्यांच्याकडे भरपूर लेखांची आवक जावक असणार. आपण पाठवून बघायचं.

मी लगेचच लोकसत्तेचा ई-मेल ऍड्रेस शोधला आणि त्यांच्या ऑफिसला लेख पाठवला.

आणि चक्क तिसऱ्या दिवशी मला लोकसत्ता ऑफिस मधून फोन आला – म्हैस लेख छानच आहे आणि आम्ही येत्या शनिवारच्या चतुरंग मध्ये तो छापत आहोत. आणि लेख छापून आला..

खूप ओळखीच्या आणि अनोळखी लोकांचे छान छान अभिप्राय कळवणारे मेसेजेस आले / फोन आले. मजा आली.

आणि त्याच आठवड्यात लोकसत्तेकडून मला म्हैस लेखाबद्दल ५०० रुपयांचे मानधन मिळाले.

थोडक्यात म्हणजे ट्रॅफिकचा रस्ता क्रॉस करण्याकरता म्हशी बरोबरच्या मुलाला मी पाच रुपये दिले, तो अनुभव कागदावर उतरवून मी तो लोकसत्तेकडे पाठवला, आणि लोकसत्तेने मला त्याबद्दल पाचशे रुपये दिले.

अशा रीतीने पाच रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्यांचे मला पाचशे रुपये मिळाले, आणि ते पण फक्त पंधरा दिवसांमध्ये…

आहे की नाही मस्त इन्व्हेस्टमेंट!

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सृजनाचे क्षण… भाग – २ ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ सृजनाचे क्षण… भाग – २ ☆ उज्ज्वला केळकर

आता ‘पांघरूण’कथेविषयी. याच क्रेशमधला एक मुलगा. त्याचं नाव मी ठेवलं ‘सर्जा’. सर्जाचं घर, मी, तळा-गाळातलं कुठलंही प्रतीनिधिक घर असेल, तसं रंगवलं. त्याची आई विड्या वळून संसार चालवणारी. म्हातारी, दमेकरी सासू, दोन भावंड, दिवसभर उनाडणारी, बाप रिक्षा चालवायचा पण सगळा पैसा बाई-बाटलीत उडवायचा. मनात येईल, तेव्हा बायकोच्या तोंडावर काही नोटा फेकायचा. तेवढंच त्याचं आपल्या संसाराबाबतचं कर्तव्य. ‘साल्या, भडव्या, रांडलेका’शिवाय बोलणं नाही. आईदेखील सदा करवादलेली.

आज क्रेशमध्ये चादरींचं वाटप होतं. त्यासाठी सगळ्या आयांना बोलावलं होतं. मी कथेत चादरींची केली ब्लॅंकेटस्. नाना रंगांची आकर्षक ब्लॅंकेटस्. आपल्याला कोणत्या रंगाचं ब्लॅंकेट मिळेल? तो विचार करायचा. त्याला लाल ब्लॅंकेट मिळालं होतं. त्याचा जर्मनीतला भाऊ डेव्हीड सारखंच. सर्जा अतिशय उत्तेजित झाला होता. त्याला आज जेवण-खाण काही सुचत नव्हतं. त्याने घरी आल्या आल्या आपल्या भावंडांना बोलावलं आणि सगळे ते ऊबदार ब्लॅंकेट पांघरून झोपून गेले.

सर्जाचा बाप दारू पिऊन घरी येतो. आज त्याच्या खिशात दमड्या नसल्यामुळे त्याला बाईकडे जाता आलेलं नाहीये. तो अस्वस्थ आहे. घरी येताच त्याचा पाय त्या नव्या ब्लॅंकेटमध्ये अडकतो. तो खाली पडतो. उठता उठता त्याचे लक्ष एकदम त्या आकर्षक ब्लॅंकेटकडे जाते. त्याच्या डोक्यात वीज चमकते. हे ब्लॅंकेटच आज तिला द्यावं. ती एकदम खूश होऊन जाईल. अशी चिकटेल, लई मजा येईल. तो सर्जाच्या अंगावरचे ब्लॅंकेट ओढू लागतो. ‘ब्लॅंकेट दे’ म्हणतो. सर्जा म्हणतो, ‘माझ्या जर्मनीतल्या बापाने माझ्यासाठी पाठवले आहे. मी देणार नाही. ’

‘तुझ्या जर्मनीतल्या बापाकडेच निघून जा, ‘ असं म्हणत सर्जाचा बाप ते ब्लॅंकेट हिसकावून निघून जातो. पाठीमागच्या सीटवर ब्लॅंकेट ठेवून तो रिक्षा सुरू करतो.

सर्जा रडत राहतो. त्याच्या अश्रूभरल्या डोळ्यासमोर येतं, ते फोटोतल्या ज्यो बाबांचे उबदार घर. त्याला अधीकच उघड्यावर पडल्यासारखं वाटतं. रडत रडत तो आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. आई आपल्या फाटक्या धडुत्याचा पदर त्याच्या अंगावर सरकवते…इथे कथा संपते.

तर अशा अनेक कथांमागच्या कथा सांगता येतील. अनेकदा प्रत्यक्ष अनुभव न घेता मानसिक अनुभवावरही मी कथा लिहिल्या आहेत. जे सुचलं, ते एकदा कागदावर उतरलं, की तृप्तता येते. समाधान वाटतं. आनंद होतो. तरीही मी, काही जण म्हणतात, त्याप्रमाणे असं म्हणणार नाही, की मी ‘स्वान्त सुखाय’ लिहिते. ‘स्वान्त सुखाय’च जर लिहायचं असेल, तर छापायला पाठवायचा खटाटोप कशाला करायचा? मला जे वाटतं, भावतं, ते तसं इतरांनाही भावतं, आवडतं का? हे मला समजून घ्यावसं वाटतं, त्यांच्या प्रतिक्रिया समजून घ्याव्यात, त्यातून काही नवीन शिकायला मिळेल का, हेही बघावं, असं वाटतं म्हणून मी लिहिते आणि छापायलाही देते.

अनेक जण अर्थप्राप्तीसाठी लिहितात. नावलौकिक मिळावा म्हणूनही लिहितात. मागणी तसा पुरवठा करणारीही काही लेखक मंडळी आहेत. संपादक, प्रकाशक, प्रायोजक यांनी सांगितलं, म्हणून लिहिणारीही काही लेखक मंडळी आहेत. इतरांचं कशाला? मी माझंच एक उदाहरण सांगते. सांगली आकाशवाणीच्या नाट्यविभागाने एकदा मला सांगितलं, जागतिक आरोग्यादिनाच्या निमित्ताने ‘फास्ट फूड’ या विषयावर तुम्ही नभोनाट्य लिहा. ठाशीव, साचेबंद विचार – फास्ट फूडचे फायदे-तोटे इ. बद्दल मला लिहावेसे वाटत नव्हते. या शब्दाभोवती विचार करता करता ‘फास्ट फूड’ संकल्पनेच्या नाना परी मला सुचल्या. बाजारात मिळणारं नेहमीचं फास्ट फूड, दहा दिवसात दहावी विज्ञान, भूगोल, इ. ‘इंटलेक्चुअल फास्ट फूड, ’ ‘कल्चरल फास्ट फूड’, ‘जेनेटिक फास्ट फूड’ (९ महिन्यांऐवजी ९ आठवड्यात बाई बाळंतीण व्हावी, म्हणून संशोधन) वगैरे… फॅँटसीच्या अंगाने मी हे नभोनाट्य लिहिले. ते अनेकांना आवडलेही. माझ्याकडे वरील विषयाची मागणी झाली नसती, तर मी हे नभोनाट्य वा नंतर याचीच केलेली कथा मुळीच लिहिली नसती. म्हणजे हा विषय मला सुचलाच नसता. माझी एकूण ५ नभोनाटये, व १००च्या वर ‘प्रतिबिंब’ शीर्षकाखालील कौटुंबिक श्रुतिका प्रसारित झाल्या आहेत.

सांगली आकाशवाणीच्या नाट्यविभागाने माझ्याकडून ‘एड्स्’ या विषयावरही सांगून नभोनाट्य लिहून घेतले. त्या विषयावरही मागणी नसती, तर मी नाटक, कथा लिहिली नसती.

एकदा एका मुलाखतीत कुणी तरी मला माझ्या लेखन प्रवासाविषयी विचारले. मग मीही त्याचा मागोवा घेऊ लागले. मला आठवतं, मी आठवीत असताना पहिली कविता लिहिली. त्यावेळी गोवा मुक्तिसंग्राम अगदी शिखरावर होता. रोज नव्या बातम्या. त्यावर चर्चा वगैरे… एक दिवस बातमी आली, या संग्रामातले शिलेदार हेमंत सोमण रस्त्यातून तिरंगा घेऊन चालत असताना पोर्तुगीज सैनिकाने त्यांना गोळी घातली. ते शहीद झाले. सर्वांना वाईट वाटलं. त्या दिवशी कशी कोण जाणे, मला कविता सुचली,

‘ हेमंत सोमणांनी गोव्यात झेंडा रोविला.

तडतडा तडकले पोर्तुगीज झेंडा त्यांनी पाहिला ‘ यानंतर ओळींवर ओळी… ते हुतात्मा झाले इथपर्यंतच्या. सगळ्यांनी कवितेचे कौतुक केले. पण दुसर्‍या दिवशी बातमी आली, त्यांना गोळी मारली नाही. त्यांना तुरुंगात टाकले. बातमी चांगलीच होती. आम्ही आनंदोत्सव साजरा केला. झाले ते चांगलेच झाले, पण माझी बिच्चारी कविता मात्र शहीद झाली. त्यानंतर शाळेत फारशी काही कवितेच्या वाटेला गेले नाही. नाही म्हणायला ११वीच्या निरोप समारंभाच्या वेळी एक कविता करून म्हंटलेली आठवते.

कॉलेजमध्ये असताना मला कवितेत रस असणार्‍या, कविता करणार्‍या मैत्रिणी मिळाल्या. आणि मीही उत्साहाने कविता करू लागले. हळू हळू वैचारिक, ललित लेखनही सुरू झालं. अभ्यासाचा सराव म्हणून असेल, मी कविता, कथा, पुस्तके यांची समीक्षाही करू लागले.

माझं लग्न झालं आणि मी सांगलीजवळील माधवनगरसारख्या खेड्यात एकत्र कुटुंबात राहू लागले. पुढे दोन-तीन वर्षे घरात काम काम आणि कामच. काही नवीन सुचायला आणि विचार करायला वाव आणि वेळच नव्हता. माझे लेखन थांबलेच जसे. नाही म्हणायला किरकोळ कविता अधून –मधून लिहिल्या जात. त्या जाणणार्‍या आणि कविता लिहिणार्‍याही काही जेष्ठ कवयित्री तिथे मला मिळाल्या. महिला मंडळाच्या ‘वंदना’ या हस्तलिखित वार्षीकाच्या संपादनाचेही काम तिथे मी केले.

पुढे १९७० साली मला सांगलीच्या डी. एड. कॉलेजमध्ये अध्यापनाची नोकरी लागली. तिथे अनेक विद्यार्थिंनींशी संबंध आला. त्यांच्या नाना कथा आणि व्यथा मला कळल्या, पण तरीही मी कथेच्या वाटेकडे वळले नव्हते. बाकीचे लेखन मात्र पूर्ववत चालू होते. या काळात माझे अनुभवविश्वही विस्तारले. मला लेखनाला नवनवे विषय सुचले. तरीही या काळात माझे प्रामुख्याने लेखन हे कॉलेजचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी झालं.

माझं कथालेखन त्या मानाने उशिरा सुरू झालं. त्याला कारणही तसंच घडलं. मला लग्नानंतर दहा वर्षाने मुलगा झाला. तोपर्यंत मुलाची (मुलगा किंवा मुलगी) वाट पाहून आम्ही अनाथाश्रमातून मूल दत्तक घ्यायचे ठरवले होते. त्यासाठी फॉर्म भरणे वगैरे चालू केले होते आणि अचानक मला दिवस गेल्याचे लक्षात आले. नंतर माझ्या मनात आलं, जर मी आधी मूल दत्तक घेतलं असतं आणि नंतर मला स्वत:चं मूल झालं असतं, तर घरातली, नात्यातली, शेजारची त्याच्याशी कशी वागली असती? यातून मला ‘परक्याचं पोर’ हे कथा सुचली. बाळंतीण असतानाच मी ती लिहिली. ही माझी पहिली वाहिली कथा. ती खूप गाजली. मला अनेक खुषीपत्रे आली. त्यानंतर मी बर्‍याच कथा लिहिल्या. त्याही गाजल्या. माझे ५ कथासंग्रह प्रकाशित आहेत. १. कृष्णस्पर्श २. धुक्यातील वाट ३. झाले मोकळे आकाश ४. फास्ट फूड ५. पाचा उत्तरी सफल संपूर्ण. माझे २ कविता संग्रह आहेत. १. चंद्रपालखीची वाट २. मृगजळाकाठी. एक भौगोलिक पुस्तक आहे. ‘भारतीय नद्यांची ओळख. ’ यात भारतातील मुख्य नद्या व त्यांना मिळणार्‍या ३-४ महत्वाच्या उपनद्या यांची भौगोलिक व सांस्कृतिक महिती दिली आहे.

याशिवाय माझी बालवाङ्मयाची ३०-३२ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यात कथा, कविता, नाटिका, चरित्र इ. प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. माझ्या काही कथांचा हिंदीत, तर तुरळकपणे उडिया, तेलुगु, कन्नडमध्ये अनुवाद झाले आहेत. मला माझ्या एकंदर लेखनासाठी, बालवाङ्मयाच्या ३ पुस्तकांसाठी, २ अनुवादीत पुस्तकांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. तसेच मला जालंदर येथे पंजाब कला साहित्य अ‍ॅकॅडमीचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे मला कोटा येथे ‘शब्दसरोज सन्मान’, व जबलपूर येथे ‘डॉ. श्रीराम दादा ठाकूर संस्कारधानी सन्मान’ मिळाला आहे. पण महाराष्ट्राबाहेरचे हे पुरस्कार सन्मान मला माझ्या अनुवादित साहित्यासाठी मिळाले आहेत.

अनुवादीत साहित्य हा माझ्या लेखनाचा आणखी एक टप्पा. मला अनुवादित साहित्य वाचायला आवडतं आणि अनुवाद करायलाही आवडतो. अनुवाद म्हणजे केवळ एका भाषेतील शब्दाला, दुसर्‍या भाषेतील प्रतिशब्द देणे नव्हे. ते झाले भाषांतर. अनुवाद हीदेखील पुनर्निर्मिती असते. अनुसृजन असंही काही लोक त्याला म्हणतात. तो शब्द मला फार आवडतो. तर मी अनुवाद करते म्हणजे पुनर्निर्मिती किंवा अनुसृजन करते.

मी फक्त हिन्दी भाषेतील साहित्याचा अनुवाद करते. अनुवादामुळे, वेगवेगळे प्रदेश, तिथला परिसर, वातावरण, लोकजीवन, लोकसंस्कृती, त्यांचे रीतिरिवाज, त्यांची जीवनदृष्टी कळून येते. नवीन ज्ञान होतं. त्याचबरोबर हेही कळतं, की जीवनपद्धती वेगवेगळी असली, तरी संस्कृतीचा अंत:स्त्रोत एकच आहे. मी आत्तापर्यंत, मोहनलाल गुप्ता, प्रतिमा वर्मा, सूर्यबाला, मधु कांकरीया, भगवान वैद्य ‘प्रखर’, सुशांत सुप्रिय, गिरिमा घारेखान, हंसा दीप, इ. लेखकांच्या कथांचा अनुवाद केला आहे. रेत में खोयी नदी, संघर्ष, गोरा, गोदान इ. कादंबर्‍यांचा अनुवाद केला आहे. माझे ७ अनुवादित लघुकथा संग्रह प्रकाशित आहेत. हरीशंकर परसाई, घनश्याम अग्रवाल यांच्या व्यंग्य लेखनाचाही मी अनुवाद केला आहे. सरश्री तेजपारखी, स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानात्मक पुस्तकांचाही मी अनुवाद केला आहे. माझ्या अनुवादीत पुस्तकांची संख्या ३५ च्या वर आहे. काही पुस्तके छापली जाण्याची वाट बघत प्रकाशकांच्या रांगेत उभी आहेत.

अभिमन्यू जसा चक्रव्यूहात शिरला आणि आत आतच जात राहिला, तसेच माझे अनुवादाच्या बाबतीत झाले आहे. मी एकदा अनुवादात घुसले, ती त्यातच गुरफटत गेले. माझे स्वत:चे लेखन बाजूलाच पडले. पण मला यातही आनंद मिळाला. अगदी नवनिर्मिती केल्याचा आनंद. तर असे हे माझे काही सृजनाचे क्षण, जे मला आनंद, समाधान, तृप्ती देऊन गेले. आपल्या सगळ्यांना ते सांगावेसे वाटले, म्हणून हा लेखन प्रपंच.

— समाप्त —

©  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तेथे काळजीचे काय काम!! ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ तेथे काळजीचे काय काम!! ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

*अनेक वर्षांपूर्वीची कथा. एका जनपदाचा (त्यावेळी राज्यांना जनपद म्हटले जायचे…) राजपुत्र आपल्या असामान्य कर्तृत्वाने राजाधिराज झाला…! *

नव्हे…!!

*विश्वविख्यात झाला..!!! “*

नव्हे…!

*युगयुगांवर त्याने आपले नाव कोरले…!! “*

… *लौकिक अर्थाने त्याने आई वडिलांची आज्ञा पाळली. आपल्या गुरूंची आज्ञा पाळली. त्यांच्या प्राणप्रिय पत्नीला जेव्हा राक्षसाने फसवून पळवून नेले, तेव्हा त्याने उपलब्ध मनुष्यबळ, साधनसामग्रीच्या आधारे राक्षसाचा वध केला…! दुसऱ्याच्या राज्याचा मोह न करता, त्याच्या भावाला राज्याभिषेक करून हा स्वर्गाहून प्रिय असणाऱ्या आपल्या मातृभूमीत परत आला…!! *

– – *यात त्याने कायम “प्रतिसाद” देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. * 

आपल्या मनात जे आहे तेच मी इथे लिहिले आहे…

*प्रत्येकाला “नर ते नारायण” अर्थात “राम ते प्रभू श्रीराम” असा प्रवास करण्याचा मूलभूत अधिकार भारतीय संस्कृती आपल्याला देत आली आहे…! “*

रामचरित्र जितके गाऊ तितके कमीच आहे…!

आज सर्वसामान्य माणसं एक तक्रार करीत असतात की कशातच राम राहिलेला नाही, त्यावेळी रामाची कथा प्रकर्षांने आठवते आणि ती कथा आपल्याला सांगते की जोपर्यंत रामकथा या भूमीवर जोपर्यंत ऐकली जाते, गायली जाते, सांगितली जाते, तोपर्यंत इथल्या कणकणात राम आहे…! आपण त्याचे स्मरण करून आपले विहित कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या सोबत असेल…

कारण…

कर्तव्य म्हणजे राम

बांधिलकी म्हणजे राम

समर्पण म्हणजे राम

निराश होण्याचे, तक्रार करण्याचे काहीच कारण नाही…

श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात त्याप्रमाणे आजपासून आपण *”मुखी नाम | हाती प्रपंचाचे काम ||”* हे सूत्र अंगीकारण्याचा प्रयत्न करू.

– – *”जेथे आहे रामनाम |*

 *तेथे काळजीचे काय काम ||”*

श्रीराम जयराम जयजयराम

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सृजनाचे क्षण… भाग – १ ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ सृजनाचे क्षण… भाग – १ ☆ उज्ज्वला केळकर

परवा एक गंमतच झाली. हरियाणा येथे रहाणारे माझे स्नेही श्री. बलजीत गढवाल ‘भारती’ यांचा मला एक मेसेज आला. खरं तर त्यांचा माझा अलीकडे दोन-तीन वर्षात संपर्क नव्हता. मेसेजचा साधारण आशय असा होता, ‘मी एक पुस्तक काढतोय. ‘लेखक का लिहितात? सुमारे 150 लेखकांकडून मी याबद्दल लेख मागवले आहेत. तुम्हीही तुमचे विचार कळवा. तुम्ही का लिहिता? आणि तुमच्या लेखनप्रवासाबद्दलही लिहा. ’ मेसेज वाचला आणि मी विचारातच पडले. खरंच! मी आत्तापर्यन्त विचारच केला नव्हता, मी का लिहिते? मनात आलं की मी आपली लिहित सुटायची. आता मात्र मी विचार करू लागले, आपण का लिहितो? एकूणच लेखक का लिहितात?

‘लेखक का लिहितात? ’ या विचाराभोवती मन रेंगाळताना, थोडा पूर्वसूरींचा धांडोळा घ्यावासा वाटला. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास या संतांनी काव्यरचना केली, ती ’लोककल्याणासाठी’, त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीचा अनावर उमाळा मनात दाटून आल्यामुळे तो व्यक्त करण्यासाठी. त्यानंतरच्या काळात पंत कवींनी काव्यलेखन केले, ते आपल्या विव्द्त्तेचं प्रदर्शन करून कीर्ती मिळवण्यासाठी. त्यापुढील टप्प्यावर तंत कवींनी काव्ये रचली, ती एक तर वीरश्रीच्या चेतनेसाठी पोवाडे आणि मनोरंजनासाठी लावण्या. नंतरच्या ब्रिटीश काळात, लो. टिळक, आगरकर, म. गांधी, म. फुले यांनी लेखन केलं, ते लोकजागृतीसाठी. स्वातंत्र्याची आकांक्षा, समाज सुधारणा, अंध:श्रद्धेला विरोध, जाती-जातीत आणि स्त्री-पुरुषातील समानता, स्त्री शिक्षणाची गरज आणि महत्व इ. उद्देशाने लेखन केले जात होते. पुढे पुढे लेखनाची आणखीही एक धार यात येऊन मिसळली. इंग्रजी शिक्षणाबरोबरच, इंग्रजी वाङ्मयाचाही परिचय झाला आणि त्या अनुकरणातून पारलौकिक विषयांबरोबर लौकिक विषयांकडेही लेखकांचे मन ओढ घेऊ लागले. आपला परिसर, नातेवाईक, परिचयातले, कल्पनेतले विषय यावर लेखन होऊ लागले.

लेखनातले हे सारे टप्पे मनात येतायेताच, मन विचार करू लागले, ‘आज लेखक का लिहितात? ‘ मी माझ्या एका नावलौकिक असलेल्या मैत्रिणीला विचारले, ‘ तू का लिहितेस? ‘ ती म्हणाली, ‘आपण का बोलतो? दुसर्‍याला काही तरी सांगावसं वाटतं म्हणून! . मीही नेमकी त्याच कारणासाठी लिहिते. ‘ तिचं हे उत्तर ऐकलं आणि मला ‘खूल जा सिम सिम’ म्हंटल्यावर आलिबाबाची गुहा उघडावी, तसं वाटलं. बरोबर! मीदेखील नेमकी याच कारणासाठी लिहिते. व्यक्त होण्याची अनावर ऊर्मी मनात दाटून येते आणि लेखणी कागदावर लिहिती होते. आपण काही पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं, अनुभवलेलं असतं. ते दुसर्‍याला सांगावसं वाटतं. पण ते सगळं जसंच्या तसं सांगितलं जातच असं नाही. कधी त्यात काट-छाट होते. कधी भर पडते. कधी वाटतं, हा किंवा ही आत्ता असा न वागता, तशी वागली असती तर? परिस्थिती कशी बदलली असती? मग मनात अनेक विचार, कल्पना रुंजी घालू लागतात. मग त्या वेगळ्या शक्यतांच्या आधारे कविता, कथा, कादंबर्‍या निर्माण होतात. घटितातून अघटिताची पुनर्मांडणी होते. हीच लेखकाची नवनिर्मिती असते. अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा, असे नाही. कल्पनेच्या पातळीवरही घेता येतो.

घटितातून अघटिताची पुनर्मांडणी केलेल्या माझ्या ‘जन्म’ शीर्षकाच्या कवितेचे उदाहरण मी इथे देते. एकदा क्युरेटीन करायचं म्हणून मी दवाखान्यात अ‍ॅडमिट होते. मला ऑपरेशन टेबलवर झोपवले होते. अ‍ॅनॅस्थेसिस्ट येणार म्हणून त्यांची वाट बघत सगळे बाहेर थांबले होते. रूममध्ये मी एकटी. भिंतींवर अनेक शो केसेस. त्यात सर्जरीची हत्यारे, वेगवेगळ्या सुर्‍या, कात्र्या, चिमटे वगैरे… मला एकदमच वस्तुस्थितीचं वर्णन करणारी कविता सुचू लागली. त्याचं सर्वसाधारण स्वरूप असं –

घटका भरत आलेली

जीवघेणी कळ

मस्तक भेदून गेलेली.

ललाटीची रेषा,

वाट हरवून बसलेली.

घड्याळाची टिक टिक 

जिण्याचा तोल साधत 

सांडत असलेली.

एवढ्यात डॉक्टर आले. मला अ‍ॅनॅस्थेशिया दिला गेला. क्युरेटीन झाले. मी शुद्धीवर येऊ लागले. डोक्यात तीच कविता…

ईथरची बाधा, नसानसातून 

शरीरभर भिनलेली….

डोळ्यापुढची वर्तुळे

लाल… हिरवी.. पिवळी… निळी…

काळवंडत गेलेली…

कोसळत्या काळोखात होणार्‍या

पांढर्‍या शुभ्र ठिपक्यांच्या 

लयबद्ध हालचाली.

पाजळत्या रक्तपिपासू हत्यारांची 

लांबच लांब पसरलेली 

अशुभ सावली.

… तेव्हा मी काही बाळंतीण होणार नव्हते, पण मला कवितेचा शेवट सुचला…

संज्ञा बधीर होताना, सारं सारं दूर सरतय.

रक्तात उमलणार्‍या, गुलबकावलीचं हसू,

लाटालाटांनी मनभर उसळतय. अणूरेणू व्यापून उरतय.

जणू ते गुलबकवलीचं फूल म्हणजे बाळ, आता माझ्या हातात येणार आहे…..

– – अशी ही वास्तव आणि कल्पनेची सरमिसळ. दवाखान्यातून घरी येताना मी बाळ नाही, पण कविता घेऊन आले.

वास्तवाचं प्रभावी वर्णन करण्यासाठी योग्य, उचित शब्दकळा निवडतानाही कल्पनेची देणगी लगतेच आणि तितकाच अभ्यासही हवा.

– – एकदा एका संस्थाभेटीने मला दोन कथा दिल्या. संस्थेचं नाव करुणा निकेतन क्रेश. क्रेश म्हणजे संगोपनगृह. मी डी. एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्‍याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा अशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले.

 तिथे असलेल्या मदतनीस बाई आम्हाला क्रेशची माहिती सांगत होत्या. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आसपासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची मुले येत. त्या बोलत असतानाच तिथे एक दीड – पावणे दोन वर्षाची, नुकतीच चालायला लागलेली मुलगी लडखडत आली आणि खाली बसून त्या मदतनीस बाईंच्या पायाला तिने मिठी मारली. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतले. मग म्हणाल्या, ‘क्रेशने अ‍ॅडॉप्ट केलेली ही पहिली मुलगी. एका लेप्रसी झालेल्या भिकारी दांपत्याची ही मुलगी. सिस्टर मारियाच्या मनात ही मुलगी भरली. त्यांनी त्या भिकारी दांपत्याला संगितले, की ‘आम्ही तुमच्या मुलीला सांभाळू. तिला खूप शिकवू. तिला चांगलं जीवन जगायला मिळेल. पण आमची एक अट आहे. तुम्ही तिला आपली ओळख अजिबात द्यायची नाही. बघा. तिचं कल्याण होईल. ’.. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. थोडं एकमेकांशी बोलले. त्यांना वाटलं असणार, निदान मुलीला तरी आपल्यासारखी भीक मागत जगायला नको. त्यांनी नन मारियाची अट मान्य केली. आम्ही हिला खूप शिकवणार आहोत. डॉक्टर करणार आहोत आणि पुढे उच्च शिक्षणासाठी जर्मनीला पाठवणार आहोत. ’ एव्हाना त्यांनी त्या मुलीला आपल्या दुसर्‍या मैत्रिणीकडे सोपवले होते आणि त्या पुढे माहिती सांगू लागल्या. पण माझं तिकडे लक्षच नव्हतं.

माझं मन त्यावेळी, ती लहान मुलगी, तिचे लेप्रसी झालेले आई-वडील, त्या मुलीला डॉक्टर करून जर्मनीला पाठवायचे क्रेशचे लोक बघत असलेले स्वप्न, यातच गुंतून गेले होते आणि मनात कुठे तरी कथा आकार घेऊ लागली होती.

क्रेशच्या कार्याची माहिती त्या पुढे सांगू लागल्या. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आसपासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ, गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात.

तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती सांगत होत्या. ‘ इथल्या मुलांना जर्मनीतील काही लोकांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा खर्च ते करतात. तिथल्या मुलांना खेळणी पाठवतात. चित्रे पाठवतात. ग्रीटिंग्ज पाठवतात. आम्ही ते सगळं मुलांना देतो पण इथे खेळायला. बघायला. त्यांना खेळणी वगैरे घरी नेऊ देत नाही. आपल्या घराचे फोटोही मुलांचे दत्तक पालक पाठवतात. पत्रे पाठवतात. त्यांनी मग आम्हाला अशी काही पत्रे, खेळणी, ग्रीटिंग्ज दाखवली.

त्या दिवशी त्या क्रेशमध्ये आणखी एक कार्यक्रम होता. थंडीचे दिवस होते. त्यामुळे तिथे मुलांसाठी त्या दिवशी चादरी वाटण्यात येणार होत्या. प्रमुख व्यवस्थापिका रेमंड मॅडमनी त्या दिवशी मुलांच्या आयांना बोलावून घेतले होते. हॉलमध्ये सगळे जमले. दोघे शिपाई सोलापुरी चादरींचे गठ्ठे घेऊन आले.

प्रार्थना, सर्व उपस्थितांचे स्वागत झाले. प्रभू येशूची शिकवण, तो सगळ्यांकडे कसा कनवाळू दृष्टीने बघतो, असं सगळं बोलून झालं. मुलांच्या परदेशातील पालकांनी चादरीचे पैसे दिल्याचे सांगितले गेले. तिथे चादरी वाटप सुरू झाले आणि माझ्या मनात कथा साकारू लागली. त्या दिवशी मी घरी आले ती दोन कथांची बीजे घेऊन. एक ‘तहान’ आणि दुसरी ‘पांघरूण. ’

प्रथम ‘तहान कथेविषयी. मी माझ्या कथेत ती लहान मुलगी, जस्मिन, डॉक्टर झालीय, असं दाखवलं. तिथून कथेची सुरुवात. ती मोठी होत गेली, तसं तिला कळलं, आपण लेप्रसी झालेल्या भिकार्‍याची मुलगी आहोत. चर्चपुढे बसलेले ते भिकारी. तिला येता जाता त्यांना न्याहाळायचा, यापैकी आपले कोण आई-वडील असतील ते शोधण्याचा छंद लागतो. आज ती जर्मनीला निघालीय. तिचा निरोप समारंभ होतोय. स्टेजच्या पुढल्या भिंतीवर एक मोठे पोस्टर आहे. येशू ख्रिस्त कुणा शिरमोणी नावाच्या पापी महिलेच्या ओंजळीत पाणी घालतोय. खाली लिहिलं आहे. त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागवतो, त्याला तहान लागत नाही. (वरील पोस्टर मी मिशन हॉस्पिटल – मिरज इथे पाहिलं होतं. ते कथेत इथे वापरलं) जस्मिनला वाटतं, आपण कळायला लागल्यापासून त्याने दिलेल्या पाण्यानेच तर तहान भागावतोय. पण आपल्याला खूप खूप तहान लागलीय. आपले खरे आई-वडील कोण आहेत, हे जाणून घेण्याची तहान. ती निघते. टॅक्सीत बसता बसता त्या भिकार्‍यांकडे जाते. त्यांच्या थाळीत, वाडग्यात हाताला लागतील तसे पैसे टाकते. मनोमन म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, मला आशीर्वाद द्या. टॅक्सी निघून जाते. चार विझू विझू झालेले डोळे टॅक्सी दृष्टिआड होईपर्यंत त्या दिशेने बघत रहातात.

तर अशी ती ‘तहान’ कथा.

– क्रमशः भाग पहिला 

©  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वो भी क्या दिन थे…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “वो भी क्या दिन थे…” ☆ श्री सुधीर करंदीकर

विदर्भामध्ये वाशिम या छोट्या गावात आम्ही होतो.

५ वी ते ११ वी म्हणजे मॅट्रिक पर्यंत सरकारी शाळेत शिक्षण झाले. शाळेची फी माझ्या आठवणी प्रमाणे 13 आणे होती. शाळा घरापासून बऱ्यापैकी लांब होती. शाळेत चालत जायचे आणि चालत परत यायचे. सायकल, रिक्षा हे आटोक्या बाहेरचे होते. व्हॅन हा प्रकार अस्तित्वातच नव्हता.

शाळेत जाण्याकरता दोन हाफ पॅन्ट आणि दोन बुशशर्ट, आणि इतर वापरण्याकरता एक जास्तीची हाफ पॅन्ट आणि शर्ट एवढेच कपडे असायचे.

बूट मोजे हा प्रकार आमच्या ऑटोक्या मधला नव्हता. साधी चप्पल असायची.

पण यामध्येच आम्ही मस्त असायचो आणि एन्जॉय करायचो. घराच्या आसपास राहणारे मित्र पण असेच मस्त एन्जॉय करायचे.

घरी कोणी पाहुणे आले तर जाताना ते खाऊ करता म्हणून चार आणे (आत्ताचे 25 पैसे) द्यायचे.

ते मी जपून ठेवायचो. आणि भाऊबीजे करता त्याच पैशांमधून मामे बहिणी करता छोटं खेळणं घेऊन यायचो.

तेव्हा टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. आपापसांमध्ये संवाद असायचे, विनोद असायचे, फिरक्या घेणे असायचे. आणि त्यामध्ये एक वेगळीच मजा असायची आनंद असायचा.

अशा खूप मजेशीर आठवणी आहेत. खरा आनंद घरच्या सगळ्यांशी छान संवाद, योग्य शिस्त, घरचे जेवण, महिन्यात एखादा घरी केलेला गोड पदार्थ यातच असतो.

असं वाटतं अधून मधून त्या भूतकाळातून एक मस्त फेरफटका मारून यावा आणि तो आनंद पुन्हा पुन्हा घ्यावा.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नात्यांची वीण – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ नात्यांची वीण – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

नात्यांची वीण ही रेशमाच्या धाग्यासारखी असते, जितकी मऊ आणि सुंदर, तितकीच नाजूक.

… आयुष्य जगत असताना अनेक माणसे भेटतात, काही मनात कायमचे घर करतात, तर काही जीवाभावाचे सोबती बनतात. पण कधी कधी काळाच्या ओघात किंवा परिस्थितीच्या फेऱ्यात हीच हवीहवीशी वाटणारी नाती अचानक दुरावतात. एखादा छोटासा गैरसमज, बोलता बोलता तोंडातून गेलेला एखादा चुकीचा शब्द किंवा केवळ एका क्षणाचा राग, वर्षानुवर्षांच्या प्रेमावर मिठाचा खडा टाकतो आणि सुरू होतो एक न संपणारा अबोला. खरे तर अशा वेळी मनाच्या एका कोपऱ्यात दोघांनाही एकमेकांची ओढ असते. जुन्या आठवणी आठवून मन भरून येतं, साध्या साध्या गोष्टींतून एकमेकांची उणीव भासते, पण संवाद मात्र खुंटलेला असतो. या दुराव्याचं सर्वात मोठं कारण असतं ‘अहंकार ‘म्हणजेच इगो. मी का वाकू? मी का आधी बोलू? मी वयाने मोठा आहे तर त्यानेच आधी यायला हवं, किंवा मी लहान असूनही मला सन्मान मिळाला नाही, अशा विचारांचे काहूर मनात माजलेले असते.

मोठेपण आणि लहानपण या तराजूत जेव्हा आपण नात्याला तोलतो, तेव्हा नात्याचं वजन आपोआप कमी व्हायला लागतं. आपण हे विसरतो की, नाते टिकवण्यासाठी कोणाचे तरी वयाने मोठे असण्यापेक्षा मनाचे मोठे असणे जास्त महत्त्वाचे असते.

कोणतेही नाते पुन्हा पूर्ववत करायचे असेल, तर अहंकाराची भिंत पाडावीच लागते. समोरचा माणूस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, याचा विचार केला की इगोची किंमत शून्य होऊन जाते. चूक कोणाचीही असो, पण जर ते नाते आपल्यासाठी अनमोल असेल, तर पुढाकार घेण्यात कसलीच लाज वाटायला नको. कधी कधी ‘सॉरी’ म्हणण्याने आपण लहान होत नाही, उलट ज्याला आपल्या सुखापेक्षा समोरच्या व्यक्तीची साथ जास्त महत्त्वाची वाटते, तोच खरा मोठा असतो.

अबोला हा नात्यातला सर्वात मोठा शत्रू आहे, तो केवळ अंतर वाढवतो. त्याऐवजी समोरासमोर बसून, मनमोकळेपणाने बोलल्यास मोठमोठे डोंगरही विरघळून जातात. नाती ही जपून ठेवायच्या वस्तू नसून ती जगण्याची अनुभूती आहे.

– – आयुष्याचा प्रवास तसा छोटा आहे, त्यात रुसवे-फुगवे आणि अहंकार घेऊन चालण्यापेक्षा प्रेमाची शिदोरी सोबत असलेली केव्हाही चांगली. जर तुम्हाला वाटत असेल की एखादं नातं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तर मग उशीर करू नका. ‘मोठा ‘ किंवा ‘छोटा ‘हा विचार बाजूला ठेवा आणि मनाच्या मोठेपणाने संवादाचा हात पुढे करा. कारण गेलेली वेळ आणि तुटलेली माणसं पुन्हा मिळवणं कठीण असतं. एखाद्याला गमावून पश्चात्ताप करण्यापेक्षा, स्वतःचा इगो बाजूला सारून त्या नात्याला पुन्हा एकदा फुलायला मदत करणं, हेच खऱ्या समृद्ध आयुष्याचं लक्षण आहे.

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पिढी अशीच घडवावी लागते ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ पिढी अशीच घडवावी लागते ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

“तुमचा सगळा प्रोग्रॅम आधी पाठवा. ते वाचून मग ठरवतो. ” असा एक उद्धट फोन महिन्याभरापूर्वी आला. सहसा असले फोन आले की, मी किंवा पूर्वा उत्तरं देण्याच्या भानगडीत पडत नाही. ओळख पाळख नसणारा माणूस ‘मीच भारी’ अशा स्वरात अन् तोऱ्यात बोलायला लागला की, आम्ही पुढं काही बोलत नाही. त्यामुळं, आम्ही प्रतिसाद दिला नाही.

दोन दिवसांनी पुन्हा तोच फोन..

” तुम्ही पाठवला नाहीत प्रोग्रॅम.. मी पाठवा असं म्हटलं होतं तुम्हाला. ” समोरुन अरेरावी..

” पण मी ‘पाठवतो’ असं म्हटलं नव्हतं तुम्हाला. ” मी शांतपणे म्हटलं.

” तुम्ही पाठवा. ” 

” आम्ही प्रोग्रॅम जाहीर करत नाही. तो आदल्या दिवशीच सांगितला जातो आणि केवळ नोंदणी केलेल्यांनाच. ” 

” असं का बरं? ” 

” गेली एकोणीस वर्षं आमची हीच पद्धत आहे. आम्ही प्रवासाचे डिटेल्स जाहीर करत नाही. ” 

” असं असेल तर मला माझ्या मुलाला पाठवण्यात इंटरेस्ट नाही. ” समोरुन जोरात आवाज.

” ठीक” मी म्हटलं अन् फोन ठेवून दिला.

तीन चार दिवस उलटून गेले. पुन्हा एकदा तोच फोन..

” मला माहिती पाठवा.. “

मी फोन ठेवून दिला. पुढचे काही दिवस वेगवेगळ्या फोन नंबर्स वरुन तो माणूस फोन करत राहिला. मी आमच्या नियमानुसार अनुभूती चा प्रोग्रॅम दिला नाही.

 

एके दिवशी माझ्या एका मित्राचा मला फोन आला.

” अनुभूतीच्या जागा भरल्या का रे? ” 

” नाही अजून. का रे? ” 

” अरे, एकजण तुला फोन करतायत. तू त्यांना कुठले कुठले गड किल्ले आहेत, याची माहिती दिली नाहीस, अशी त्यांची तक्रार आहे. तू त्यांना माहिती दे ना. ” 

” अनुभूतीचे काही नियम आहेत रे. आम्ही प्रोग्रॅम आदल्या दिवशीच सांगतो. आणि तोही पूर्ण सांगत नाही. उद्या कुठं जायचं आहे तेवढंच सांगतो. संपूर्ण प्रोग्रॅम जाहीर केला जात नाही. ” मी सांगितलं.

” पण असं का? ” 

” अनुभूती चा अर्थ काय? अनुभूती म्हणजे आपलं आयुष्य अधिक समृद्ध करणारा विलक्षण अनुभव. तोच तर या कार्यक्रमाचा प्राण आहे. आपण सगळी ठिकाणं सांगून टाकली की, लोक गूगल सर्च करतात, युट्यूब वर शोधून पाहतात. सगळी उत्सुकता, अप्रूप, आनंद घालवून टाकतात. मग त्या कार्यक्रमाचा उद्देशच साध्य होत नाही. “

” अरे, पण त्यातले अनेक किल्ले त्यांनी आधीच पाहिले असतील तर? मग त्यांना तेच तेच पाहावं लागणार नाही का? ” 

” हे बघ. मी आठ वर्षांचा असताना पहिल्यांदा रायगडावर गेलो. आज ३२ वर्षं झाली, मी जवळपास चारशे हून जास्त वेळा तिथं जातोय. पण अजूनही असं वाटतं की, प्रत्येक वेळी तो गड मला वेगवेगळा दिसतो. ” 

” पण तुला आवड आहे म्हणून तू सारखा सारखा तिथं जातोस. लोकांना तशी आवड नसेल आणि फक्त दहा दिवस काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणून पाठवायची इच्छा असेल तर? ” 

“अनुभूती त्यांच्यासाठी नाहीच मुळी. कारण हा इतिहास, समाज, संस्कृती, परंपरा, ज्ञान, आपला वारसा यांच्याशी मुलांना नातं जोडायला शिकवणारा कार्यक्रम आहे. तो टाईमपास प्रोग्रॅम नाही. म्हणूनच असा विद्यार्थी आणि असे पालक आम्ही आमच्या गटात घेतच नाही. माझ्याहीपेक्षा जास्त पॉश कॅम्प्स आयोजित करणारे कितीतरी तज्ञ लोक आहेत. त्यांनी अगदी अवश्य तिकडं नाव नोंदवावं. पण माजुरडे पालक आणि विद्यार्थी आम्हाला नकोत. ” 

” पण त्यांना त्यांच्या मुलाला तुझ्याच प्रोग्रॅमला पाठवायचं आहे. तुझा प्रोग्रॅम वेगळा असतो अन् मुलांना खूप शिकायला मिळतं, असं त्यांना अनेकांनी सांगितलं म्हणूनच त्यांना इंटरेस्ट आहे. ” 

” मग त्यांनी आमचे नियम पाळायला हवेत. तेही कोणतीही तक्रार न करता. तू त्यांना हे स्पष्ट सांग आणि या विषयात अजिबात मध्यस्थी करु नकोस. ” असं सांगून मी विषय थांबवला.

काही वर्षांपूर्वी अनुभूती च्या प्रवासातच एका पालकांचा मला फोन आला होता. त्यांची मुलगी आमच्या सोबत होती. आणि “दहा दिवसांत एकदाही फोन करायचा नाही” अशीच अट सगळ्या पालकांना घातली होती. आम्ही कोल्हापुरात होतो. मला फोन आला.

” सर, तुम्ही कोल्हापुरात आहात ना… तिथल्या *** नावाच्या हॉटेलात बेस्ट नॉनव्हेज मिळतं. ” 

“पण आपण अनुभूती मध्ये जेवण पूर्णतः शाकाहारीच असतं. हे आधीच स्पष्ट सांगितलेलं आहे. “

” सर, माझा एक जवळचा मित्र कोल्हापुरातच राहतो. तो तिला घ्यायला येईल आणि नॉनव्हेज जेवण करवून पुन्हा आणून सोडेल. तुम्ही सगळे तुमचं तुमचं व्हेज जेवण करा. ” मुलीचे वडील म्हणाले.

” तसं जमणार नाही. ” मी.

” आता कोल्हापूर मध्ये जाऊन नॉनव्हेज खायचं नाही, असं कसं चालेल? ” 

” तुम्ही नॉनव्हेज खाऊ घालण्यासाठी तिला खास कोल्हापूर ला घेऊन जा. आत्ता मी इथून तिला कुणाहीसोबत सोडणार नाही आणि पुन्हा अशा गोष्टींसाठी मला फोन करु नका. ” ठणकावून सांगितल्यावर पुन्हा असा फोन आला नाही.

असाच आणखी एक प्रसंग. आम्ही सिंहगड – तोरणा असा ट्रेक करुन खाली उतरलो आणि विश्रांतीसाठी थांबलो. भल्या पहाटे माझा एक मित्र तिथं कार मधून पोर्टेबल शेगडी आणि आप्प्यांचं पीठ घेऊन आला. तीन शेगड्या होत्या. आणि आम्ही सगळे जण सेल्फ कुकिंग पद्धतीनं आपापले आप्पे करुन घेऊन मनसोक्त ताव मारत होतो. पण आमच्यात एक मुलगी होती.

“मला आप्पे नकोत. आमच्याकडे सारखेच केले जातात. तुम्ही खा, मी खात नाही. ” आम्ही सगळ्यांनी दोन तीन वेळा आग्रह करुन पाहिला, नंतर विषय सोडून दिला.

नाश्ता करुन आम्ही राजगड कडे रवाना झालो आणि माझ्या विशेष आवडीची गुंजवणे मावळाची वाट धरली. ती वाट खरोखरच घाम फोडणारी आहे. शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारी आहे. शेवटचा टप्पा आणखीनच आव्हानात्मक आहे. कारण तो दरवाजाच तशा कठीण ठिकाणी आहे. झालं.. हट्टानं 

रिकाम्या पोटी बसलेल्या बाईसाहेब गुंजवण्याच्या जंगलातच फतकल मारुन खाली बसल्या. अंगातलं बळ संपलं होतं. पोटात भूक उसळ्या मारत होती. डोकं लागलं दुखायला. निम्मे जण वाट काढत वरती वरती सरकत होते. ते सगळे होते तिथं थांबले. ग्लुकोन डी आणि लिंबाचं सरबत पाजत पाजत तिला हळूहळू वरती आणलं. गुंजवणे दरवाज्याच्या उंबऱ्याशी बसूनच ती जेवली अन् मग अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर तिच्या अंगात त्राण आलं.

पण ह्या अर्धवट ज्ञानी हट्टी उद्योगामुळे अडीच तीन तासांचं खोबरं झालं. संजीवनी माची सोडून द्यावी लागली..! स्वतःचंच म्हणणं खरं करण्याची सवय अनेक मुलामुलींना असते आणि आयुष्यात अनेक ठिकाणी महागात पडते ती अशी…

फुटाणे, शेंगदाणे खाण्याची सवय आता “जुनाट” ह्या प्रकारात समाविष्ट झाली आहे. पेरीपेरी, फ्रेंच फ्राईज हे प्रकार आता रुढ झाले आहेत. मुलं पेरुची जेली खातील, पण पेरु खाणार नाहीत. जामुन शॉट घेतील, पण जांभळं खाणार नाहीत. मसाला पापड खातील, पण भाताचे सांडगे किंवा कोंड्याच्या पापड्या खाणार नाहीत. त्यांना लाह्यांचा काला माहितीच नसतो.

भल्या पहाटे गडावर चढून जावं. सकाळच्या उन्हात गड फिरावा. न्याहारी करण्यासाठी लाह्या, राजगिरा किंवा पोहे सोबत घ्यावेत. तिखट मिठाच्या डब्या असाव्यात. एका डबीत शेंगदाण्याचा कूट घ्यावा. बचकभर हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे असावेत. गड फिरुन झाल्यावर एखाद्या देवडीशी किंवा गडावरच्या देवळात बसावं. धोपटी उघडून सगळं साहित्य बाहेर काढावं. आजूबाजूला फिरुन दोन दगड शोधावेत. टाक्याच्या पाण्यानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. दगडावर दोन तीन मिरच्या अन् बोटभर आलं चांगलं ठेचून घ्यावं. लाह्यांवर पाण्याचा सपका मारावा. मग त्यात कूट, मिरच्या, आलं, तिखट, मीठ घालून एकत्र करुन घ्यावं. गडावरच्या गडकरणी भगिनींकडून सुगडातलं घट्ट कवडीचं दही घ्यावं. अन् दह्यात सगळं कालवून ताक घालून झकास काला तयार करावा. पोटभर खावा. वरुन पुन्हा दही, ताक रिचवून तृप्त मनानं ढेकर द्यावी. तिथंच पथारी पसरून दोन तास ताणून द्यावी. ह्यातलं सुख आपल्या मुलांना ठाऊकच नाही.

गडावर जाऊन तिथं फ्रूटीसारखी बाटलीबंद कोल्ड्रिंक्स पिऊन लोकांना नेमकं काय मिळतं हे मला आजतागायत समजलेलं नाही. लोक तिथंही पिझ्झा बर्गर मिळेल का हे शोधतात. आईस्क्रीम शोधतात. पण लिंबाचं सरबत त्यांना महाग वाटतं. वास्तविक पाहता, गडभ्रमंती करणाऱ्याच्या सोबत दोन चार लिंबं, दोन चार कांदे बटाटे असायलाच हवेत. थंडगार शिळ्या भाताचा डबा सोबत असला तरीही उत्तम. म्हणजे गडावरुन दही ताक मिळवून दहीभात ताकभात करुन खाता येतो. हे सगळं आपल्या मुलांनी आवर्जून अनुभवायला हवं. मनगटी घड्याळाशी असलेला संबंध जरा कमी करुन सूर्याच्या घड्याळानुसार जगायला हवं. म्हणजे मग नव्या जगाची ओळख व्हायला लागते. आणि हेच जग अत्यंत श्रीमंत, समृद्ध, निकोप आणि सर्वतोपरी उत्कृष्ट असल्याची अनुभूती येते.

आपल्या पूर्वजांची ज्ञानसमृद्धता किती उच्च दर्जाची होती, याचा परिचय आताच्या पिढीला होणं आवश्यक आहे. पुरातन लेण्या, मंदिरांवरची शिल्पकला, कोरीवकाम, योग्य दगडाची निवड, बांधकामाचा भक्कमपणा, पुष्करण्या, बारवा, पाण्याची टाकी, जिवंत झऱ्यांचा शोध ही केवळ भटकंती नव्हे. ही आपल्या पूर्वजांच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि कर्तृत्वाची जिवंत साक्ष आहे. ते वैभवच आपलं भूषण आहे. दऱ्याडोंगरांत, निबीड अरण्यात वसलेली देवस्थानं पाहणं, त्यांचा अभ्यास करणं आणि तिथली शांत प्रसन्नता अनुभवणं ह्यात जो आनंद आहे तो “मॉलोमॉल” भटकण्यात अन् प्ले स्टेशन खेळण्यात नाही, हे आपल्या मुलांना योग्य वयातच शिकवायला हवं. त्यांच्या करिअरमधला राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा स्कोअर जितका महत्वाचा आहे, तितकाच त्यांचा व्यक्तिमत्व विकाससुद्धा महत्वाचा आहे. त्यांची नाळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी घट्ट जोडली जाणं हे फार फार गरजेचं आहे. तरच हा वारसा जपणारे हात अन् त्याविषयीच्या संवेदना जागृत ठेवणारी मनं तयार होतील.

बलोपासना, मनोपासना, ज्ञानोपासना आणि राष्ट्रोपासना या चारही उपासना आपल्या मुलांनी नित्यनेमाने केल्या तर त्यासारखा व्यक्तिमत्व विकासाचा दुसरा उत्तम मार्ग नाही. ही उपासनेची चतु:सुत्री जितकी घट्ट रुजेल तितके आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचे वटवृक्ष तयार होतील आणि गगनाला भिडतील. उत्तमतेचं अन् चारित्र्याचं अधिष्ठान ज्याच्या आयुष्यात असतं, त्याचं भवितव्य उज्ज्वलच असतं.

ह्याच विचारानं “अनुभूती” ची सुरुवात आम्ही २१ वर्षांपूर्वी केली. यंदा सुद्धा १३ दिवसांची ही विलक्षण प्रेरणा देणारी आणि नवं आयुष्य जगायला शिकवणारी “अनुभूती” ९ मे ते २१ मे, २०२५ या कालावधीत आहे. दहा किल्ले आहेत, तीन जंगल ट्रेक आहेत, विविध पुरातन मंदिरं आहेत, समुद्रावर मनसोक्त खेळणं आहे, ऐन रत्नागिरीत आमराईतला अस्सल हापूस आंब्याचा आस्वाद घेण्याचा अनुभव आहे आणि अर्थातच रात्रीच्या अंधारात गड चढून जाण्याचा थरारक अनुभव तर आहेच…!

– – – आपल्या मुलांना घडवण्यासाठी हे करायलाच हवं ना…

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ असेन मी.. नसेन मी… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

असेन मी.. नसेन मी… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆


गुणी लेकरे, नाचरी पाखरे

येवढं पुरे, नको काही दुसरे

प्रस्तावना

काही गोष्टी माणूस जन्मतःच सोबत घेऊन येतो.

देश, गाव, कुळ, घर, माती, नाती – गोती, आणि…

काही ऋणं — जी कधीच फिटत नाहीत.

ज्या गावानं आपल्याला आश्रय दिला, चालायला शिकवलं,

जिथल्या वाटांनी स्वप्नांना दिशा दिली,

जिथल्या मातीनं पोटभर अन्न दिलं,

त्या गावाला आपण काय देऊ शकतो?

 

ही गोष्ट आहे एका गावाची,

काही माणसांची,

आणि निसर्गाशी अजूनही तुटू न दिलेल्या नात्याची.

गुणी लेकरे, नाचरी पाखरे

येवढं पुरे, नको काही दुसरे


☆ 
अध्याय १ – 
माझा गाव ☆

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात, सासवडपासून वीस आणि पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर वसलेलं माळशिरस (भुलेश्वर) हे माझं मूळ गाव. सुमारे पाच हजार लोकसंख्येचं, तालुक्यातल्या मोठ्या कृषिक्षेत्रांपैकी एक असलेलं हे गाव शांत, सुसंस्कृत आणि सलोख्याचं उत्तम उदाहरण आहे.

गावात हिंदू-मुस्लीम, सवर्ण-दलित असले कोणतेही ताणतणाव नाहीत. गावगुंडगिरी किंवा दहशतीचा मागमूसही नाही. ग्रामस्थ परस्परांचा आदर राखत, सण-उत्सव, जत्रा एकत्र साजऱ्या करतात. ग्रामदैवत श्री भुलेश्वर यांच्यावर सर्वांची नितांत श्रद्धा आहे.

किंचित इतिहास

भुलेश्वर मंदिर यादवकालीन असून गावातली बहुतेक कुटुंबं शतकानुशतकं इथं नांदत आहेत. ते सगळे ‘यादव’ असून देवगिरीच्या यादवांची ते रयत आहेत. इथल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे. इतिहास, परंपरा आणि श्रम यांचं सुंदर नातं इथं आजही जाणवतं

गावाची रचना

गावाची रचना पारंपरिक पद्धतीची आहे. मंदिरं, वेशी, मुख्य मार्ग, बाजारपेठ, शाळा, स्मशानभूमी — सगळं नियोजनबद्ध आणि परस्परपूरक आहे. ओढा ही गावाची नैसर्गिक पश्चिम सीमा असून त्यानं गावाला एक वेगळी ओळख दिली आहे.

ब्राह्मण परिवार आणि आमची भूमिका

गावात पाच ब्राह्मण कुटुंबं आहेत. त्यापैकी बुरसे आणि काळे हे ग्रामोपाध्याय. पंचक्रोशीतले सर्व धार्मिक विधी, संस्कार, लग्नकार्य, इ. कार्यं करून देणे ही जबाबदारी परंपरेनं आमच्याकडे या दोन कुटुंबांची.

आमच्या बुरसे कुटुंबाची ओळख केवळ उपाध्येपणापुरती नाही, तर कीर्तन, साहित्य, संगीत, वक्तृत्व अशा ललितकलांशी घट्ट नातं असलेली आहे. नारदीय कीर्तनाची परंपरा आमच्या घराण्यात पिढ्यान्‌पिढ्या जपली गेली आहे. त्यामुळं ललितकला, शब्द, स्वर, भाव हे आमच्या रक्तातच आहेत.

भटमळा — आमची ओळख

गावाच्या पश्चिमेला ओढ्यालगत आमची वडिलोपार्जित सुमारे सात-आठ एकर जमीन, जिला ‘भटमळा’ म्हणून ओळखतात. इथली गोड्या पाण्याची विहीर एकेकाळी अर्ध्या गावाची तहान भागवत असे. दुष्काळातही ती क्वचितच आटत नसे.

कृतज्ञतेतून जन्मलेली शाळा

माझे वडील स्व. धुंडिराज लक्ष्मण बुरसे (आप्पा) यांनी एक विचार मांडला —

“ज्या गावानं आपल्याला गेली तेराशे वर्षं, पिढ्यान्‌पिढ्या आश्रय दिला, त्या गावाचं ऋण कसं मानायचं? त्या ऋणातून उतराई कसे व्हायचं? ”

यातूनच सुमारे पस्तीस – चाळीस वर्षांपूर्वी भटमळा आणि विहीर, गावातल्या ‘भुलेश्वर विद्यालया’ला दान करण्याचा निर्णय झाला.

आमच्या या कृतीनं प्रेरित होऊन इतर दोन ब्राह्मण कुटुंबांनीही त्यांच्या मालकीची मंदिरं आणि जागा शाळेसाठी दिल्या. गावानं श्रमदान केलं, शासनाचं साहाय्य मिळालं आणि पाहता पाहता चौथीपर्यंतची शाळा दहावीपर्यंतच्या माध्यमिक विद्यालयात रूपांतरित झाली!

आज ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणकशाळा, क्रीडांगण, सभागृह अशा सर्व सुविधा इथं उपलब्ध आहेत. पंचक्रोशीतली शेकडो मुलंमुली याचा लाभ घेत आहेत.

लेकरं आणि पाखरं

पूर्वी श्रमदानातून रोपलेले विविध वृक्ष आता ‘प्रौढ’ झाले आहेत. सारा परिसर हिरवागार झाला आहे.

वर्गांमधून मुलांचा आणि झाडांवरून पाखरांचा चिवचिवाट ऐकताना मन समाधानानं भरून येतं.

कर्तव्यपूर्तीचं सात्त्विक समाधान आम्हा सर्वांना मिळतं.

☆ अध्याय २ – परिवर्तन ☆

पुरंदर जलउपसा योजनेमुळं गावाचं स्वरूप झपाट्यानं बदललंय. पारंपरिक तृणधान्यांची जागा ऊस, भाजीपाला, फळशेती यांनी घेतलीय. रासायनिक खतं, कीटकनाशकं वाढली. उत्पादन वाढलं, पैसा आला — पण निसर्ग मात्र अस्वस्थ झाला, मागे पडला!

आज गावातलां शेतकरी स्वतःच्या जेवणासाठी लागणारं धान्य स्वतः न पिकवता विकत घेतो.

गावात पाणी आहे, पण अन्नसाखळी विस्कळीत झालीय.

पर्यावरणाची हाक

कीटक, फुलपाखरं, सरपटणारे जीव नाहीसे झाले.

त्यांच्यावर अवलंबून असलेली रानपाखरं, साप, ससे, हरणं उपाशी राहू लागलीयेत.

पर्यावरणाचा समतोल ढासळू लागलाय.

माझा निर्णय

या पार्श्वभूमीवर मी ठरवलं —

माझ्या शेतातली चार-सहा एकर जागा जाणीवपूर्वक अविकसित ठेवायची.

  • केवळ पारंपरिक तृणधान्यं
  • अरंकरित, गावरान बियाणं
  • रासायनिक खतं व औषधं नाही
  • पिकांची राखण नाही

पाखरांना, प्राण्यांना मोकळा वावर करू द्यायचा

त्यांना हवं तेवढं खाऊ द्यायचं,

उरेल ते माझं.

अशी पाखरे येती

विस्थापित झालेली, दूर गेलेली हरणं, ससे, पाखरांचे थवे सुगीच्या दिवसांत परत येतात.

किलबिलाट-किचकिचाट, उड्या-सुरकांड्या, धुडगूस – दंगा — सगळं सुरू होतं.

रानजिवांची पोटं तट्ट फुगतात.

त्यांच्या मुखातून 

उरलेलं धान्य मला वर्षभर पुरतं.

असेन मी, नसेन मी

गावाजवळ विमानतळ होतोय. रिंगरोड, बुलेट ट्रेन धावणार आहेत. विकासाचा रेटा थांबणार नाहीये.

मला माहीत आहे —

एक दिवस मला माघार घ्यावीच लागेल.

पण तो दिवस येईपर्यंत

माझं वावर सगळ्या जीवांसाठी खुलं असेल.

मी असेन… नसेन!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”छेडोगे तो छोडेंगे नहीं…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “छेडोगे तो छोडेंगे नहीं…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

*कधी कधी शक्ति प्रदर्शन करणं आवश्यक असतं. * 

– – आज कुठून सूर्य उगवला माहित नाही. रोज शांतपणे सुरू होणारा दिवस, आज जरा विचित्रच सुरू झाला. रात्रभर अस्वथच होते मी. स्वप्न पण विचित्रच पडली. सारखी मारामारी दिसत होती. द्रोण, मिसाइल, सायरन किती ते आवाज! डोक भणभणत होत. रोज सकाळी देवाला नमस्कार करत आणि आजची सकाळ बघायला मिळाली, त्याबद्दल देवाचे आभार मानत, भूमीला वंदन करत उठणारी मी, आज वर्षानुवर्ष चालणारी परिपाटी पार विसरून गेले.

मन अस्वस्थ, अशांत, काहीतरी बिघडलंय, काहीतरी वेगळ घडलय, जे मन विचलित करणारं, तसं काहीतरी वेगळंच.

 भांडण, मारामारी, ठोकाठोकी आज स्वप्नात हेच सगळे बघितले. आणि TV वर पण जोरजोरात तेच सांगणं चालू होतं.

आज काही खरं नाही. विचाराची दिशा चुकलीच आहे. आज त्याच संदर्भात जुन्या घटना आठवल्या.

मनाने एकदम भरारी घेतली. मन तर वाटच बघत असत. सुपरसोनिक स्पीड ने भांडणाच्या सर्व घटना बरोबर शोधून काढल्या. त्यावर बरोबर वार केला.

खरतर भांडाभांडी करायचा माझा स्वभाव नाही. पटत नाही अस जेंव्हा कधी माझ्या लक्षात येत, तेंव्हा मी रस्ता बदलते. हा सरळ सोपा मार्ग मी निवडला आहे. पण जेंव्हा हे लक्षात येत की आपल्या शांतिपूर्ण वागण्याला समोरचा granted घेतोय, तो आपल्याला मूर्ख समजतोय. बेवकूफ समजतोय, तेंव्हा मात्र दणका दयावाच लागतो. दणका मात्र वेळ बघून, जोरात बसेल, चार लोकांच्या लक्षात येईल असा देते.

*जोर का झटका जोर सेही लगे* असाच वार करायचा.

या विचारा बरोबर हे जे चाललय, ते चूक की बरोबर याचाही गोंधळ मनात चालूच असतो. त्यांना दणका देताना, आपल पण नुकसान होतच असतं ना.

दणका द्यायचे *दोन* फायदे होतात.

** एकतर आपल्याला आपली शक्ति कळते. वार करताना काय बरोबर? कुठे चूक झाली ? हे कळत. म्हणजे पूढे जर अशी वेळ आलीच, तर जास्त पावरफुल वार करता येईल. लगेच पूढची *strategy* तयार होते.

आणि दुसऱ्यालाही आपण काय आहोत? हे समजत. बाकीचे चार लोक आपल्या आप सावध होतात. त्यांनाही आपल्या शक्तिची झलक दिसते. आपल्याबद्दल त्यांचे अनुमान/ Impression ते ठीकठाक करतात.

उदया पुन्हा खोड्या काढायच्या आधी, पंगा घ्यायच्या आधी सर्व विचार करतील.

त्यामुळे भांडण नेहमी चूकच असत अस नाही. असा आज मी शोध लावलाय.

लहानपणी शिकवल होत *भांडायच नाही. * आता गेले ते दिवस. एका गालावर मारल तर दुसरा गाल पूढे करायचे दिवस गेले.

कधी कधी शक्ति प्रदर्शन करणही आवश्यक असतच. आपण जपून ठेवलेले हथियार वेळ पडली तर काम चोख बजावतात की नाही त्यांची *testng* पण होऊन जाते.

भांडणात फायदा तसा कोणाचाच नसतो. भांडणानंतरही नाॅर्मल व्हायला वेळ लगतोच.

*अरे!! त्यावेळेस मला अस बोलायला हव होत, अस म्हणायला हव होत. अस करायला हव होत. * चर्चांचा दौर सुरू होतो. जो तो आपल्या बुद्धीनुसार, स्वभावानुसार, आपला फायदा बघून आपले विचार मांडत असतो.

हे सर्व मनात येत राहतं. बरेच दिवस त्यावर विचार होत राहतो. हे असं किती दिवस चालेल ? हे माहित नसत. एकदा मनसोक्त ठोकून झालं की लवकरात लवकर भांडण थांबविणं आवश्यक असतं. कधी कधी लोक दुसऱ्यांचा चष्मा घालून त्यांचा आधार घेऊन भांडतात. इंग्रजीत भांडतात. त्यांचा बहुतेक असा समज असतो की अस केल्याने समोरच्यावर जास्त दबाव पडेल. दबाव आणि प्रभावाचा माझ्यावर काडीचाही असर पडत नाही.

भांडताना केव्हा थांबायचे ? ते मात्र वेळेवर कळलच पाहिजे. आपल्या भांडणाची मजा घेणारे कोण ? किती जण आहेत ? आपल्याला उक्सवणारे किती आहेत ? आपल्याला समोर ढकलून मागच्या मागे पळून जाणारे कोण ? किती ? शुभचिंतक किती ? हेही समजत. तसे शुभचिंतकांची संख्या खूप नसतेच. या अशा लोकांच्या तावडीत जायचं नाही.

*There are lot of jealous people with friendly faces around us. We must always remember this truth. * 

त्यांच्या मनोरंजनाचे कारण आपण व्हायच नाही. ते काय फ्री फुकटमध्ये मजा घेतात. नुक़सान तर आपलंही होतंय ना. आपण आपली किती energy, वेळ, पैसा, मनस्वास्थ्य? यावर खर्च करायच, हे आपल्यालाच ठरवायच असत. त्यामुळे वेळेवर, *Cease fire* करणं जमलं पाहिजे.

लोकांना काय वाटेल ते वाटू दे. काही समजो वा न समजो लोक काय दोन्ही बाजूने बोलतात.

*If you want to make wrong decision, ask everyone. * 

*Cease fire* मी घाबरले म्हणून झाला नाही, केलाय.. माझा उद्देश्य पूर्ण झाला होता. म्हणून केलाय. मग पुढे होणारे नुकसान वाचविण्यातच हुशारी होती. एवढं समजण्याइतपत आपण हुशार आहोतच. आपल्याला आपली जबाबदारी, कर्तव्य, माझं, माझ्या कुटुंबाच हित समजण्याएवढी हुशार मी नक्कीच आहे. फुकटच काही मिळतंय म्हणून लाळघोटेपणा करणं जमत नाही मला. हा माझा

* EGO* नाही *SELFRESPECT* आहे.

सकाळी विचलित असलेल मन हळुहळु शांत झाल. जे झाल ते चांगल झाल. आणि लवकर थांबल, तेही चांगलच झाल.

म्हणतात ना,…

* Revenge is just waste of Time, Skip people. *

हे जरी खर असल तरी कधी कधी छान *दणका* देण आवश्यक असतच.

शक्ति प्रदर्शन करण ही आवश्यक आहे.

खूप soft राहिल तर लोक मूर्ख समजतात. तेंव्हा आपली strong personality दाखविणेही आवश्यक असत.

**छेडोगे तो, छोडेंगे नही, थोडा नुकसान सह लेंगे, लेकिन झुकेंगे तो बिल्कुलही नही. **

हा मेसेज देणे आवश्यक असतं…

At the same time…

If you treat me good, I will treat you better. – – हेही सांगणे/ दाखवणे आवश्यक असते.

कोणाला सांभाळायचं ? आणि कोणापासून सांभाळून रहायचं ? हे ही समजलंच पाहिजे. नाही का ?

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विवेकवादी पालकत्व – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “विवेकवादी पालकत्व – –☆ श्री जगदीश काबरे ☆

विवेकवादी पालक होणे म्हणजे केवळ देव न मानणे किंवा धार्मिक आचार न पाळणे एवढाच मर्यादित अर्थ नसून, आपल्या पाल्याला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतःच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याची मोकळीक देणे होय. विवेकवादी पालकत्वाचा केंद्रबिंदू श्रद्धा नव्हे तर तर्क, भीती नव्हे तर समज, आणि अंधानुकरण नव्हे तर जाणीवपूर्वक निवड हा असतो. असा पालक मुलाला “हे असंच आहे” असे सांगण्याऐवजी “हे का असावं? ” असा प्रश्न विचारायला उद्युक्त करतो आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रक्रियेत स्वतःही सहभागी होतो.

विवेकवादी पालकत्व म्हणजे नैतिकतेचा उगम देवभयात नाही तर मानवी सहवेदनेत म्हणजे कोणत्याही प्राण्याशी माणुसकीने वागण्यात आहे हे मुलांच्या मनात रुजवणे. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य यांची मांडणी स्वर्ग-नरक किंवा पाप-पुण्याच्या चौकटीत न करता, इतर माणसांवर होणारा परिणाम, न्याय, समता आणि जबाबदारी यांच्या आधारावर करणे, हा त्याचा गाभा असतो. त्यामुळे मूल “कोणी पाहत आहे का? ” म्हणून नव्हे, तर “यामुळे कुणाला त्रास होईल का? ” म्हणून हा विचार करून वागायला शिकते. विवेकवादी पालक होणे म्हणजे मुलाला समाजापासून तोडणे नाही, तर समाजात विवेकाने उभे राहण्याची क्षमता देणे होय. सण-उत्सव, परंपरा, धार्मिक वातावरण यांपासून मुलाला सक्तीने दूर न ठेवता, त्यामागची सामाजिक-ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून सांगणे आणि त्या गोष्टी प्रश्नांसह स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची मुभा देणे, ही त्याची भूमिका असते. यामध्ये पालक स्वतःला अंतिम सत्याचा मालक मानत नाही, तर शिकणारा सहप्रवासी मानतो. एकूणच विवेकवादी पालकत्व म्हणजे मुलांच्या मनात भीतीऐवजी कुतूहल, आज्ञाधारकतेऐवजी संवाद, आणि अंधश्रद्धेऐवजी चिकित्सक बुद्धी रुजवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करणे होय. हा मार्ग सोपा नसतो, कारण तो सतत आत्मपरीक्षणाची मागणी करतो; पण याच मार्गातून स्वतंत्र विचार करणारी, जबाबदार आणि माणुसकी जपणारी पिढी घडू शकते, हीच त्यामागची मूलभूत धारणा असते.

हे सगळे माझे आजचे विचार आहेत. पण खरं सांगायचं तर मी जेव्हा माझ्या तरुणपणी विवेकवादी मार्गाने जगण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला वाटलं होतं की, हा संघर्ष मुख्यतः माझ्या वैयक्तिक आयुष्यापुरताच मर्यादित राहील. पण जेव्हा पालक झालो, तेव्हा उमगलं की हा निर्णय आता केवळ माझा राहिलेला नाही; तो माझ्या मुलाच्या भवितव्याशी, त्याच्या प्रश्नांशी, त्याच्या भीतीशी आणि त्याच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाशी घट्टपणे जोडला गेला आहे. पालकत्व ही आईबाप झाल्यानंतर आपल्यावर पडणारी एक मोठी जबाबदारी असते. त्यातही नास्तिक आणि विवेकवादी पालकत्व ही जबाबदारी अधिकच गुंतागुंतीची करते. कारण इथे केवळ पोट भरण्यासाठी शिक्षण देणे किंवा सुरक्षितता पुरवणे एवढ्यावर गोष्ट थांबत नाही, तर मुलाच्या मनात कोणत्या प्रकारचा विवेक रुजतो आहे, कोणत्या प्रकारची भीती नकळत पेरली जातेय, आणि कोणते प्रश्न आपण टाळतो आहोत, याचाही सतत हिशोब ठेवावा लागतो. मी जेव्हा माझ्या पाल्याच्या बालपणाकडे मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की हा प्रवास सरळ रेषेत झालेला नाही; तो अनेक वळणांचा, चुकांचा, अपराधी भावनेचा, आत्मपरीक्षणाचा आणि कधी कधी स्वतःच्या विवेकालाही प्रश्न विचारायला लावणारा राहिला आहे.

माझ्या विवेकवादी भूमिकेमुळे सर्वात आधी सामना करावा लागला तो कुटुंबातच. माझे आई-वडील, आजी-आजोबा, काका-मावश्या हे सगळे ज्या श्रद्धा, सण-उत्सव, देवधर्म यांच्या वातावरणात वाढले, त्यातूनच त्यांनी मला घडवलं होतं. पण माझ्या वाचनाच्या सवयीमुळे मी त्या प्रवाहातून बाहेर आलो, प्रश्न विचारू लागलो, देव मानणं सोडलं. पण तरीही कुटुंबातील नात्यांची ऊब टिकून होती. मात्र जेव्हा माझ्या मुलाचा प्रश्न आला, तेव्हा अनेकांना वाटलं की आता मी “अति” करतो आहे. “तू नास्तिक असलास तरी मुलाला देवापासून का वंचित ठेवतोस? ”, “लहान मुलाला देव नाकारायला शिकवणं म्हणजे त्याचं बालपण हिरावून घेणं नाही का? ” असे प्रश्न थेट किंवा अप्रत्यक्षपणे विचारले गेले. सुरुवातीला मी आक्रमक झालो. मला वाटायचं की मी जे करतो आहे तेच योग्य आहे आणि बाकी सगळे अंधश्रद्धेच्या कैदेत अडकलेले आहेत. पण हळूहळू कळलं की, या आक्रमकतेचा फटका माझ्या मुलालाच बसतो आहे. कारण तो नात्यांच्या संघर्षात नकळत ओढला जात होता. मग मी एक तोडगा शोधला. वाद टाळला नाही, पण संघर्ष सौम्य करण्याकडे कल ठेवला. मी मुलाला देव न मानायला “शिकवणं” थांबवलं आणि देवाबद्दल प्रश्न विचारायला “परवानगी” देऊ लागलो. कुटुंबात सण आले, पूजा झाली, तेव्हा मी त्याला जबरदस्तीने दूर ठेवलं नाही, पण त्याला हेही स्पष्ट सांगितलं की, हा सगळा लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे, निसर्गाचा नियम नाही. हा मध्यम मार्गही माझ्यासाठी सोपा नव्हता. पण त्यामुळे नात्यांमध्ये निर्माण होणारी कटू टळली आणि मुलाला स्वतःचा निष्कर्ष काढायला वाव मिळत गेला.

शाळेचा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होता. पहिल्याच दिवशी सकाळची प्रार्थना, देवाचं नाव, हात जोडून उभं राहणं, हे सगळं माझ्या मुलासाठी नविन होतं, पण माझ्यासाठी अस्वस्थ करणारं. एकीकडे मला वाटायचं की सार्वजनिक शिक्षणसंस्थांमध्ये धर्मनिरपेक्षता असावी, तर दुसरीकडे मला हेही जाणवत होतं की रोजच्या लढाईत मुलाला वेगळं पाडणं त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या जड ठरेल. सुरुवातीला तो घरी येऊन विचारायचा, “आपण देव मानत नाही तर मला प्रार्थना का म्हणायला लावतात? ” तेव्हा मी थेट उत्तर दिलं, “तुला मनापासून वाटत नसेल तर मनातल्या मनात शांत उभा राहा. ” पण काही दिवसांनी लक्षात आलं की, हा सल्ला त्याच्यासाठी अवघड आहे. वर्गात सगळे एकत्र म्हणत असताना वेगळं वागणं म्हणजे स्वतःकडे लक्ष वेधून घेणं. मग मी माझी भूमिका बदलली. मी त्याला सांगितलं की प्रार्थना ही शाळेची शिस्त आहे, श्रद्धा नाही. जोपर्यंत आपण त्यांचा अर्थ तपासतो आणि प्रश्न विचारतो तोपर्यंत शब्दोच्चार करण्यात काहीच गैर नाही. हा बदल माझ्यासाठीही मोठा होता. कारण मला स्वतःला अनेक वर्षे धर्माशी निगडित कोणतेही शब्द उच्चारायचीही चीड होती. पण इथे मला मुलाच्या मानसिक सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं लागलं.

सण-उत्सवांबाबतही असाच गोंधळ होता. दिवाळी, गणेशोत्सव, रमजान, ख्रिसमस हे सगळं मुलांसाठी रंग, गाणी, मिठाया, गोष्टी यांचं जग असतं. मी जर फक्त “हे सगळं उथळ आहे” एवढंच सांगितलं असतं, तर कदाचित त्याच्या आयुष्यातून आनंदाचा एक मोठा भाग काढून टाकल्यासारखा झाला असता. म्हणून मी वेगळा मार्ग निवडला. आम्ही सण साजरे केले, पण देवासाठी नाही, तर माणसांसाठी. दिवाळीत दिवे लावले, कारण प्रकाश आवडतो; गणेशोत्सवात मूर्ती पाहिल्या, पण गणेशाची पूजा केल्याने समस्या सुटतात का, या प्रश्नावर चर्चा केली. रमजानमध्ये उपवासामागचं शिस्तीचं तत्त्व समजावलं. ख्रिसमसमध्ये भेटवस्तू देण्यामागचं सामाजिक नातं उलगडून दाखवलं. या प्रक्रियेत मला जाणवलं की विवेकवाद म्हणजे आनंद नाकारणं नाही, तर आनंदाच्या पार्श्वभूमीवर असलेली भीती आणि अंधश्रद्धा काढून टाकणं आहे.

देव आणि धर्माइतकाच कठीण विषय म्हणजे नैतिकता. अनेकदा लोक मला विचारायचे, “देव मानत नसाल तर चांगलं-वाईट कसं ठरवता? ” हा प्रश्न माझ्या मुलालाही पडला. शाळेत, गोष्टींमध्ये, चित्रपटांत चांगला माणूस म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा असा सूचक संदेश असायचा. तेव्हा मी त्याच्याशी खूप साध्या भाषेत बोललो. मी सांगितलं की, नैतिकता म्हणजे भीतीपोटी तयार केलेले नियम नाहीत, तर सहवेदनेतून समाज सुरळीत चालावा म्हणून घेतलेले निर्णय असतात. आपल्यामुळे कुणाला त्रास होतो का? कुणाचं नुकसान होतं का? आपण समाजात एकमेकांवर किती आणि कोणत्या हेतूने अवलंबून आहोत? आपण नागरिकशास्त्राचे नियम मोडत तर नाही ना? या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे नैतिकता. मला वाटलं होतं की, हे सगळं त्याच्यासाठी फार तात्त्विक ठरेल, पण उलट तोच मला उदाहरणं देऊ लागला… “मी मित्राची वस्तू परत दिली; कारण त्याला वाईट वाटू नये, असं मला वाटलं. ” त्या क्षणी मला कळलं की, विवेकवादी मूल्यं मुलांच्या मनात नैसर्गिकरीत्या रुजतात, फक्त आपण त्यांना धर्माच्या चौकटीत अडकवता योग्य दिशा दिली पाहिजे. इथेच माझ्या पालकत्वाची खरी कसोटी लागली.

मृत्यूबद्दलचा संवाद हा कदाचित सर्वात जड टप्पा होता. एखाद्या नातेवाइकाचा मृत्यू झाला, तेव्हा प्रश्न उभा राहिला, “तो कुठे गेला? ” अनेक पालक स्वर्ग-नरक, पुन्हा जन्म, देवाकडे गेला अशी उत्तरं देतात. कारण ती उत्तरं सोपी असतात. पण मी ठरवलं होतं की, मी असलं काही खोटं सांगणार नाही. तरीही मला भीती वाटत होती की, सत्य सांगितल्याने त्याचं मन अस्वस्थ होईल की काय? मी त्याला सांगितलं की, माणूस मरतो तेव्हा त्याचं शरीर निसर्गात मिसळतं, आठवणी आपल्या मनात राहतात, आणि तो आपल्यामध्ये अस्तित्वात राहतो त्याच्या स्मृतीतून. तो काही वेळ शांत राहिला, मग म्हणाला, “म्हणजे आपण त्याला आठवत राहिलो तर तो जिवंत आहे? ” त्या वाक्याने मला जाणवलं की मृत्यूबद्दलची विवेकवादी मांडणी माणसाला अधिक जबाबदार बनवते. त्या जबाबदारीतून त्याला हे कळलं की, स्वर्गाची आशा नसताना, आपलं आयुष्य इथेच अर्थपूर्ण करावं लागतं.

जन्माच्या बाबतीतही असाच संवाद झाला. म्हणजे तो साधारण चार वर्षाचा असताना त्याने आईला विचारले की, “मी कुठून आलो आणि कसा आलो? ” सर्वसाधारण घरातून अशा प्रश्नाला उत्तर दिले जाते की, ‘तुला देवबाप्पाने पाठवले. ‘ या उत्तराने मुलाचे समाधान होत असले तरी हे उत्तर चुकीचे आहे, खोटे आहे. यामुळे आपण मुलांवर नकळतपणे अंधश्रद्धेचा संस्कार करत असतो. तेव्हा त्याच्या आईने त्याला समाजावून सांगितले की, “तुला चित्रे काढायला आणि रंगवायला आवडतात. तू जेव्हा लाल रंगात हिरवा रंग मिसाळतोस तेव्हा त्यापासून तिसऱ्याच रंगाचा पिवळा रंग तयार होतो. तसेच बाबाच्या आणि माझ्या प्रेमाचे रंग मिसाळल्यामुळे तिसरा तू माझ्या पोटातून जन्माला आलास. ” किती विवेकी आणि सुंदर उत्तर आहे हे!

विवेकवादी संस्कार रुजवताना मी अनेक प्रयोग केले आणि तितक्याच चुकाही केल्या. एक काळ असा होता की, मी प्रत्येक गोष्टीत अंधश्रद्धा शोधून काढायचो. एखादी अंधश्रद्ध गोष्ट ऐकली की लगेच विज्ञान सांगायचो, आकडे मांडायचो, पुरावे द्यायचो. पण नंतर जाणवलं की मुलासाठी प्रत्येक क्षण वादाचा असणं थकवणारं आहे. कधी कधी त्याला फक्त गोष्ट ऐकायची असते, प्रश्न लगेच सुटले नाही तरी चालतात. मी हेही शिकलो की, विवेकवाद म्हणजे कायम “मला सगळं माहीत आहे” अशी भूमिका घेणं नाही, तर “मला अजून माहीत नाही” हे मान्य करण्याचं धैर्य आहे. खरोखरच त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेही नव्हती, आणि ते मी त्याला प्रामाणिकपणे सांगितलं. या प्रामाणिकपणामुळे आमच्यात विश्वासाचं नातं अधिक घट्ट झालं. आज मागे वळून पाहताना मला असं वाटत नाही की, मी एक परिपूर्ण विवेकवादी पालक आहे. उलट मला असं वाटतं की मी माझ्या मुलाकडून, समाजाकडून, आणि स्वतःच्या चुका पाहून अजूनही शिकतो आहे. पण एक गोष्ट नक्की वाटते की मी त्याला भीती दाखवण्यापेक्षा प्रश्न विचारायला उद्युक्त केले, आज्ञाधारक बनवण्यापेक्षा संवाद साधण्यास शिकवले, आणि श्रद्धेपेक्षा सहवेदना महत्त्वाची असते हे त्याच्या मनावर बिंबवले. थोडक्यात हा लेख केवळ माझ्या आठवणींचा संग्रह नाही; तो अशा अनेक पालकांच्या अनुभवांचा आरसा आहे, जे समाजाच्या प्रवाहात वाहून न जाता थोडं थांबून विचार करतात. कारण विवेकवादी पालकत्व हा एकट्याचा लढा नसतो; तो संपूर्ण कुटुंबाचा लढा होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, आपण आपल्या पुढच्या पिढीला अंधारात लोटले नाही, तर त्याच्या हृदयात करूणेची आणि मेंदूत विचाराची ज्योत प्रज्वल्लीत करण्याचा प्रयत्न केला, याचा आनंद काही औरच असतो.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares