मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एका वडीलांचे त्यांच्या मुलाच्या विवाहाबद्दल मनोगत…” ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “एका वडीलांचे त्यांच्या मुलाच्या विवाहाबद्दल मनोगत….”  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  

नुकतेच – दि ३१ मार्च २०२३ ला माझ्या ज्येष्ठ मुलाचे लग्न झाले .

सोहळा खूप मोठा भव्य करण्याचा मनोदय नव्हता त्यामुळे आपल्या सर्वांना बोलावू शकलो नाही म्हणून क्षमस्व !

परंतु या निमित्ताने आम्ही – (मी – माझी पत्नी आणि मुले आणि वधू आणि त्यांचे वडिलधारे लोक अशा सगळ्यांनी ) मिळून काही गोष्टी लक्षपूर्वक आणि ठरवून करण्याचा प्रयत्न केला आणि तो देवाच्या आणि कुलस्वामिनीच्या कृपेने उत्तम रीत्या सफल झाला तो तुमच्या सगळ्यांशी समभागी (share ) करतो .

आम्ही असे लक्षात घेतले की – विवाह हा एक अत्यंत प्रमुख असा संस्कार आहे .

त्यामुळे हा संपूर्ण विवाह विधी हाच लग्नाचा मुख्य भाग असावा . 

 त्यात – सिनेमा – TV सीरियल – आणि आपले अज्ञान यांमुळे पुष्कळ गैर आणि रसभंग करणाऱ्या गोष्टी घुसल्या आहेत त्या टाळूया .

म्हणून – काही गोष्टी विचारपूर्वक केल्या आणि काही कटाक्षाने टाळल्या .

बँड – म्हणजे रणवाद्ये नकोत . मंगल आणि सुमधुर  वाद्याचे संगीत असावे . म्हणून सनई, सतार, बासरी यांचे आनंद उत्साह वाढवणारे संगीत पार्श्वभूमीवर ठेवले .

या विवाह संस्काराचे विधि अतिशय सुंदर आणि हृदयंगम आहेत .

त्यात सौंदर्य – मांगल्य – पावित्र्य – दूरदृष्टी – सगळं काही आहे .

परंतु आपणच ते विसरून गेलो आहोत .

म्हणून मी स्वतःच चार पाच महिने – विवाह विधींचा अभ्यास केला

त्याचे संकल्प – कृती – मंत्र यांचे अर्थ अभ्यासले – त्याला प्रमाण आणि आधार ग्रंथ वाचले .

ते वाचून मन भरून आले आणि असे प्रकर्षाने वाटले की सर्वांना हे विधी समजले पाहिजेत . 

म्हणून असे ठरवले की हा संपूर्ण विधी समजावणारे एखादे छोटेसे पुस्तक तयार करावे आणि प्रत्येकाला द्यावे . लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाचे आपण स्वागत करतो त्यावेळी हे पुस्तक स्वागताची भेट म्हणून प्रत्येकाला दिले .

आणि सांगितले की आपण इथे लग्नासाठीच वेळ काढून आला आहांत तेव्हा इथे बसल्या बसल्या – हे पुस्तक चाळा – त्यातलाच विधी आपल्या समोर चालू आहे तो बघा . त्याचा अर्थ इथे दिला आहे आणि समोर प्रत्यक्ष कृती होत आहे.

ही कल्पना आलेल्या सगळ्यांनाच आवडली आणि कित्येकांनी त्याच्या अधिक प्रती मागूनही घेतल्या .

प्रत्यक्ष वधू – वर एकमेकांना पुष्पमाला घालताना ऐन वेळी वधूला किंवा वराला उचलून घेऊन एक अनैसर्गिक मजा घेण्याची वाईट कृती लग्नात घुसली आहे . ही कृती करण्यासाठी काही उत्साही तरुण आणि मित्र वाटच पाहात असतात .

त्यांना आधीच फोनवर बोलून विधी किती सुंदर आहे हे समजावले आणि त्यांनाच विचारले की – इतक्या छान भावनांचा संगम होताना – त्या भावनांना विस्कटून टाकणारी – ऐन वेळी पुष्पमाला घालूच न देणारी – उचलून घेण्याची – कृती करायची का?  तेव्हा त्यांनी स्वतःहूनच सांगितले की आम्ही हे करणार नाही .

आपण जेव्हा मंगलाष्टके म्हणतो त्यावेळी अक्षता वाहातो . त्या अक्षता येणार्‍या आप्त स्वकीय – मित्र यांच्या शुभ ईच्छा आणि आशिर्वाद म्हणून – वधू वरांच्या डोक्यावर वाहायच्या असतात . पण ही गोष्ट माहीती असूनही आपण ती त्यासाठी काही आयोजन नसल्यामुळे करू शकत नाही – भावना मनात ठेवून आपण आहे तिथून अक्षता वाहाव्या लागतात आणि त्यामुळे वाहाणे बाजूला राहते आणि जोर लावून फेकाव्या लागतात . मनातील भावना कृतीत व्यक्त करु शकत नाही .

म्हणून आम्ही आणि विधी सांगणार्‍या गुरुजींनी पुढाकार घेऊन एक वेगळी संकल्पना प्रत्यक्षात केली – ती अशी :

मंगलाष्टकांच्या वेळी आलेत्या प्रत्येकाच्या हातात अक्षता असतील पण त्या त्यांनी प्रत्येक वेळी टाकायच्या नाहीत तर हातातच ठेवायच्या .

तसेच आलेल्या सगळ्यांनाच खुर्च्यांवर बसायला सांगितले – वधू वरांच्या बाजूला फक्त उपाध्याय – अंतर्पाट धरणारे आणि करवल्या एवढेच असतील .

त्यामुळे पुढे गर्दी झाली नाही .

बसल्या जागेवरून प्रत्येकाला पाहाता आले.

मंगलाष्टके झाल्यावर वधू – वरांचे पुष्पहार घालून झाले की – ते दोघे गुरुजींसह विधी मंडपातून  उतरून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या जवळ जातील त्यांना नमस्कार करतील . त्या त्यावेळी समोरच्या चार – पाच जणांनी त्यांच्या मस्तकावर त्या अक्षता सोडाव्या . यामुळे लग्नासाठी येणाऱ्या प्रत्येकालाच त्याच्या सदिच्छा आणि आशिर्वादरूप अक्षता वधू – वरांच्या प्रत्यक्ष डोक्यावर वाहाता येतील .

असे करत अगदी सगळ्यांना सुरुवातीच्या ओळीपासून शेवटी पर्यंत आणि पुन्हा परत शेवटच्या ओळीपासून पुढच्या ओळी पर्यंत येणारे आप्त स्वकीय  जिथे बसले आहेत तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटून त्यांचा वधू-वरांनीच सन्मान केला . आणि भरभरून आशिर्वाद प्राप्त केले .

या सगळ्या कौतुक कृतीला सुमारे २०० जणांच्या जवळ जाण्यासाठी – त्यांना नमस्कार करून शांतपणे पूर्ण करण्यासाठी केवळ पंधरा  मिनिटे पुरली .

यामुळे – वृद्धांना त्यांच्या बसल्या जागी जाऊन नमस्कार करून त्यांचा मान राखता आला आणि नंतर वृद्धांना – रांगेत तिष्ठत उभे राहून वधू वरांना स्टेजवर भेटावेच लागले नाही .

प्रत्येकाला वधू वर जवळून बघताही आले .

आलेल्या प्रत्येकाच्या भावनांना प्रत्यक्ष कृतीची पूर्णता आली – तसे समाधान प्रत्येकाने बोलूनही दाखवले .

गुरुजींनीही विधीतील प्रत्येक कृती – त्याचा अर्थ त्या त्या वेळी थोडक्यात सांगितला .

पाणिग्रहण – कन्यादान – सप्तपदी या मागच्या भव्य आणि उदात्त कल्पना लक्षात आल्या .

त्यानंतर पंगतीमध्ये सर्वांनी सहभोजन घेतले . पंगतीला वाढणाऱ्यांना सुद्धा ही कल्पना आवडली आणि त्यांनीही अगत्याने आणि आग्रहाने वाढले .

आपण सर्व हे विसरून गेलो आहोत की विवाह हा एक उत्साह – चैतन्य – आणणारा समाजाला स्वस्थता देणारा मंगल असा संस्कार आहे . हे विसरण्याचा अजून एक दुष्परीणाम आपणच आणला आहे – तो म्हणजे प्रत्येक विधीमधे फोटोग्राफर आणि व्हिडिओवाले – त्यांना जसे हवे तसे फोटो काढण्यासाठी विधिंच्या मधे घुसून तेच जणू पुरातन कालापासून लग्न लावत आले आहेत अशा थाटात वधू वरांना वेगवेगळ्या पोज घ्यायला लावतात आणि खरे म्हणजे विधी आणि संस्कार यांचा विचका करतात .

अशावेळी यजमान काहीच बोलत नाही त्यामुळे गुरुजी सुद्धा काही करू शकत नाहीत . 

खरे म्हणजे यजमानाने पुढाकार घेऊन या गोष्टी न कळत – शिताफीने टाळता येतात .

आम्ही फोटोग्राफी केलीच पण आधीच ही संकल्पना फोटोग्राफरला समजावून सांगितली आणि त्यांना सांगितले की तुमच्यासाठी म्हणून कोणतीही पोज संपूर्ण विधीत होणार नाही . तुम्ही सर्व बाजूनी फोटो काढा पण विधी तुमच्या साठी थांबणार नाही .

सुंपूर्ण समारंभच – 

“candid photography ” करा .

सगळे विधी झाल्यावर ज्याला जसे हवे तसे एकत्र – ग्रुप फोटो काढून घ्या .

आश्चर्य म्हणजे ही कल्पना फोटोग्राफरला सुद्धा आवडली आणि त्यांनी ही खूप सुंदर आणि भरपूर फोटो काढले .

इतकेच नव्हे तर फोटोग्राफर ने दोनच दिवसांत सर्व फोटोंची एक लिंक तयार करून दिली . आम्ही ती लिंक प्रत्येक कुटुंबाला व्हॉटस्अप वर पाठवली आणि ज्याला जे फोटो हवे आहेत ते डाऊनलोड करून घेतले .

प्रत्येकाला आपले स्वतःचेही – छान फोटो मिळाले .

संपूर्ण समारंभात शांत संयमित आवाजात सनईचे सूर सरु ठेवले होते त्यामुळे वातावरण प्रसन्न तर झालेच पण आवाजही मर्यादित ठेवण्यामुळे प्रत्येकाला एकमेकाशी नीट बोलता आले . 

खूप दिवसांनी भेटणाऱ्या नातेवाईकांना गप्पा मारता आल्या . 

हल्ली संगीताचा आवाज अतिशय मोठा ठेवतात त्याने काय साध्य होते हेच समजत नाही . 

एवढेच नव्हे तर एकमेकांशी धड बोलताही येत नाही .

कानांवर ध्वनीचे अत्याचार सहन करावे लागतात ते वेगळेच . बरे कोणी सांगतही नाही की आवाज मर्यादित ठेवा म्हणून .

आम्ही आधीच ठरवून हे सर्व टाळले . 

त्यामुळे ढणढणाटा ऐवजी उलट प्रसन्नता – उत्साह – गप्पा – हास्यकल्लोळ यांनी समारंभाला जास्त शोभा आली .

तसे लोकांनी बोलूनही दाखवले .

अशा काही गोष्टी सहज साध्य आहेत – करता येतात – अवघड नाहीत .

उगीच प्रवाह पतित होऊन भलत्याच गोष्टी करणे आपण टाळू शकतो .

यात कुठेही कर्मठपणा _ कठोरपणा आणण्याची किंवा आपल्या परंपरांचा वृथा अभिनिवेश दाखवण्याची बिल्कुल आवश्यकता नाही .

योग्य वेळी प्रत्येकाला आपलेसे करून – समजावून सांगितले की छान करता येते – उलट प्रत्येकाचा सहभागही वाढतो .

लग्नाला जाणाऱ्या प्रत्येकाला हे मनातून हवे आहे हे ही प्रकर्षाने लक्षात आले .

मग आपणच आपला अप्रतीम वारसा सांभाळायचा – वाढवायचा आणि भरभरून पुढच्या पिढीला द्यायचा हे आपण निश्चित पणे करु शकतो .

हे सर्व मी लिहीले आहे – ते आधी केले मग सांगितले – या वचनाला जागून आहे.

आपला : नरेंद्र आपटे (ठाणे)

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समाधान… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ समाधान… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ 

बसायला आरामखुर्ची आहे,

हातामध्ये पुस्तक आहे….

डोळ्यावर चष्मा आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

निसर्गामध्ये सौंदर्य आहे,

निळे आकाश, हिरवी झाडी आहे….

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

जगामध्ये संगीत आहे,

स्वरांचे कलाकार आहेत,

कानाला सुरांची जाण आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

बागांमध्ये फुले आहेत,

फुलांना सुवास आहे,

तो घ्यायला श्वास आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

साधे चवदार जेवण आहे,

सुमधुर फळे आहेत,

ती चाखायला रसना आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

जवळचे नातेवाईक, मित्र आहेत,

मोबाईल वर संपर्कात आहेत,

कधीतरी भेटत आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

 

डोक्यावरती छत आहे,

कष्टाचे दोन पैसे आहेत,

दोन वेळा, दोन घास आहेत,

इतके मला पुरेसे आहे !

 

देहामध्ये प्राण आहे,

चालायला त्राण आहे,

शांत झोप लागत आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

याहून आपल्याला काय हवे ?

जगातील चांगले घेण्याचा,

आनंदी, आशावादी राहण्याचा विवेक आहे,

इतके मला पुरेसे आहे !

 

विधात्याचे स्मरण आहे,

प्रार्थनेत मनःशांती आहे,

परमेश्वराची कृपा आहे,

इतके मला पुरेसे आहे !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Be a CEO of your own life. ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ Be a CEO of your own life. लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

मी आणि ताई आम्ही दोघी बहिणी. मी पुण्यात तर ताई नाशिकला स्थाईक. आज आम्ही दोघी सिनियर सिटीझन आहोत. मी पासष्ट तर ताई सत्तरीला पोचली.

आयुष्याचा आतापर्यंतचा काळ कसा गेला? कळलंच नाही. घर परिवार आमच्या नोकऱ्या, मुलांची शिक्षणं, त्यांच्या नोकऱ्या, त्यांची लग्नं, नातवंडं, मुलांचे अमेरिकेत स्थायिक होणे, आमच्या अमेरिकेच्या फेऱ्या. म्हणजे आमच्या पारिवारिक सिनेमाच्या सोळा रिळापैकी चौदा रीळं तर जवळपास संपली, म्हटलं तरी चालेल.

आता आयुष्यात बऱ्यापैकी स्थिरता आली आहे. वय बोलू लागलं आहे. अमेरिकेचे ग्रीन कार्ड आम्ही घ्यावं, याबद्दल बऱ्याच चर्चेनंतर आता मुलांनी म्हणणं सोडून दिले आहे.

आम्ही अमेरिकेला येऊ, पण राहू आम्ही भारतातच. हे नक्की ठरलंय.

 ताई म्हणजे सौ. अनिता अजय देशपांडे यांचा नाशिकला मोठा बंगला आहे. रिटायरमेंट नंतर मागची पंधरा वर्षं त्यांनी बंगल्याचा पूर्ण उपभोग/ आनंद घेतला. त्यांच्या शेजारीच ताईचे मोठे दीर श्री अनिल देशपांडे यांचा बंगला. दोघी जावांचं छान पटतं. दोघांना एकमेकांच्या आधार आहे. बरोबर मोकळेपणाही आहेच. आता मात्र वयाप्रमाणे बंगल्याचे मेंटेनन्स करणं कठीण होतं आहे. त्यानंतर सेफ्टी, security चा प्रश्नही आहेच.

आतापर्यंतच्या सर्व पारिवारिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण झाल्या.

आता पुढे काय ? पुढे काय ?

आता स्वतः ची जबाबदारी स्वतःच घ्यायची वेळ आली आहे.

तरुणपणी बघितलेली स्वप्नं – ‘उच्चशिक्षित मुलांनी उंच भरारी घ्यावी’. ती पूर्ण झाली. आता त्या स्वप्नांचे साईड इफेक्ट दिसतायेत. मुलं जवळ नाहीत. तसं बघितलं तर पुण्यासारख्या शहरात प्रत्येक चौथ्या घरी हाच सीन आहे.

स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आपणच घेतलाय/ भोगलाय. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे स्वप्नांचे साइड इफेक्ट पण gracefully handle करावेच लागतील.

वयाच्या या नाजूक वळणावर, ‘पुढे काय ?’

या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. आता प्रत्येक दिवस वेगळा निघतो, शरीराचा प्रत्येक अवयव वेगळा रंग दाखवतोय. वेळेवर सावध होणे गरजेचे आहे.

आज ताईचा फोन आला. म्हणाली,

“अग! पुण्यातील जरा चांगल्या old Age Homes बद्दल विचारपूस करून माहिती पाठव. “

मी म्हटलं, “अग ताई !! हे काय आता, नवीन खूळ तुझ्या डोक्यात आलंय ? चांगला बंगला सोडून Old Age Home वगैरे काय ?”

ताई म्हणाली, “अग! का नाही ? आपले final destination old Age Home ठरविण्यात काय हरकत आहे ?

Safety, Security, medical help, डॉक्टरची सुविधा Dining Mess facility, same age group चे आपल्या सारखेच आपल्याला भेटणार, मग काय हरकत आहे ?

अग !!जसं जसं वय वाढत जाणार तसतसे अनेक प्रश्न समोर येऊ शकतात. आयुष्याचा हाही फेज आरामात पार पडावा, ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते. पण तसे होईलच याची काही गॅरंटी आहे का ?

खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा, वास्तविकता लक्षात ठेवून आपली सोय करून ठेवावी. काही बदल, Planned Change ठरवून करायचे असतात.

हिवाळ्यात हीटर, उन्हाळ्यात कुलर / AC ची सोय करतो ना, तसंच काहीसं हे पण.

ही म्हातारपणाची सोय आहे, ” ताई म्हणाली,

Be a CEO of your own life. •••

Be your own BOSS. •••

माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतची जबाबदारी माझीच आहे ना!

अग !मुलांना आपली काळजी असतेच. पण ते आता आपली मदत कशी करू शकतील ? आपण आपली व्यवस्थित सोय केली तर त्यांना पण काळजी राहणार नाही.

बरं ! जेथे आपलीच मुले आपल्या जवळ नाहीत, तेंव्हा दुसऱ्यांवर भार टाकणंही बरोबर नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणाजवळच एवढा वेळ नाही/नसतो ग. अपेक्षा करणंच चूक आहे.

तेव्हा एखाद्या छान म्हणजे व्यवस्थित सर्व सोई जेथे उपलब्ध असतील, तेथे आपण रहायला जायचं, हे आम्ही ठरवलंय.

भविष्याची सोय करून, आपल्या मनाला जर आपण शाश्वत केलं. तर मन खंबीर राहतं. वर्तमान ही मजेत जगता येतं. मनाला खचू द्यायचं नाही.

‘Life is very unpredictable, ‘ हे लक्षात ठेवून हा निर्णय घेतलाय.

आयुष्यातील कोडी आपल्यालाच सोडवायची असतात.

लाइफचं हे प्रोजेक्ट आपल्यालाच successfully complete करायचं आहे. “

ताई एक वाक्य नेहमी म्हणते,

“कोणाच्या आयुष्यात Option म्हणून नाही जगायचं. नेहमी Perfect And Special जगायचं. “

प्रत्येक वळणावर जरा थांबून आपल्या आयुष्याचे Alignment करावं.

ताई म्हणाली,

“अग !!!

आता वृद्धाश्रम किंवा Old Age Home बद्दल विचार बदलले आहेत. ज्यांना त्यांची मुलं सांभाळत नाही, ते अशा जागी राहतात, हे असं कोणी आता समजत नाही. “

ताईचा हा निर्णय विचारात घेण्यासारखा आहे.

म्हणतात ना,

प्रार्थना ऐसे करें जैसे सब कुछ भगवान पर निर्भर करता है ।

परंतु प्रयास ऐसे करें जैसे सब कुछ आपपर निर्भर करता है।

लेखिका :सुश्री संध्या बेडेकर.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बदक की गरुड ? ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बदक की गरुड ? ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी  गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे, एक पाटी जिच्यावर लिहिले होते की

बदक की गरुड

तुमचे तुम्हीच ठरवा.

दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट, वर टाय.

ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला.  आणि बोलला,

” माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे. जोपर्यंत मी तुमचे सामान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे, सर.”

त्या कार्ड वर लिहिले होते,

जॉन चे मिशन

माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर, सुरक्षित आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.

मी भारावून गेलो होतो.

गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ, नीटनेटकी होती.

जॉनने मला विचारले.

“आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय?”

मला त्याची गंमत करायची लहर आली म्हणून मी त्याला म्हणालो. “नाही, मला ज्यूस हवा आहे.”

तात्काळ जॉन उत्तरला…

“काही हरकत नाही सर, माझ्याकडे तीन वेगवेगळ्या थर्मास आहेत. ह्यापैकी एकात ज्यूस, एकात डायट ज्यूस आणि एकात पाणी आहे.”

तुम्हाला वाचायचे असेल तर माझ्याकडे आजचे वर्तमानपत्र आणि काही मासिके आहेत.

जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा जॉन मला म्हणाला की जर मला गाणी किंवा बातम्या ऐकायच्या असतील तर हा रिमोट आहे आणि ह्या वरील नंबर्स प्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आनंद घेऊ शकता.

मला अजूनही धक्का बसायचा बाकी होता. कारण

पुढे त्याने अत्यंत मार्दवपूर्ण  स्वरात विचारले. “सर, एसी चे तापमान ठीक आहे की आपणास काही वेगळे हवे आहे?” त्यानंतर त्याने मला माझ्या गंतव्य स्थानी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे सांगितले आणि पुढे विचारले की, तो माझ्याशी बोललेले चालेल की त्याने शांत राहावे ?

न राहवून मी त्याला विचारले,

” तू नेहमी तुझ्या ग्राहकांना अशी सेवा देतोस?”

त्यावर तो उत्तरला, “नेहमी नाही, दोन वर्षांपासून देतो आहे. माझ्या सुरुवातीच्या काळात मीही इतर टॅक्सी चालकांसारखा सतत तक्रार करीत असे.  आणि असमाधानी राहत असे. पण एकदा एका डॉक्टरकडून मी व्यक्तिमत्त्व सुधारणांबाबत ऐकले.

त्यांनी एक पुस्तक लिहिले होते.  त्याचे नाव होते. ” तुम्ही जे कोणी आहात त्याने फरक पडतो” ज्यात  पुढे लिहिले होते.  जर तुम्ही सकाळी उठून असा विचार कराल की आज दिवस वाईट जाणार आहे. फक्त अडचणीच आहेत, तर खरेच तसेच होईल.  तुमचा तो दिवस वाईट आणि अडचणींचा जाईल.

बदक बनू नका

गरुड बना

बदक फक्त आणि फक्त आवाज करतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो. आणि गरुड सर्व समुदायापासून वेगळा आणि उंच उडतो.

आणि माझ्या लक्षात आले की मी सतत रडतो आहे फक्त तक्रारी करतो आहे.

म्हणून मी स्वत:ला बदलण्याचे ठरविले. माझ्या दृष्टिकोनात बदल करून गरुड बनण्याचे ठरविले.

मी इतर टॅक्सी चालकांकडे बघितले. अस्वच्छ, गलिच्छ टॅक्सीज आणि आडमुठे चालक आणि म्हणून असमाधानी ग्राहक. असे चित्र होते ते.

मी काही बदल करायचे ठरवले. आणि माझ्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नंतर आणखी काही बदल करीत गेलो.

आणि गरुड बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी माझा व्यवसाय दुप्पट झाला आणि ह्यावर्षी आत्तापर्यंतच्या चौपट झालेला आहे.

तुम्ही सुदैवी आहात की आज मी तुम्हाला इथे सापडलो. अन्यथा आजकाल माझे ग्राहक माझ्याकडे आगाऊ रिझर्व्हेशन करून माझी टॅक्सी सेवा घेत असतात. किंवा मला मेसेज करून माझी टॅक्सी बुक करतात. मला शक्य नसेल तेव्हा मी  अन्य गरुड बनलेल्या टॅक्सीचालकाद्वारे ती सेवा ग्राहकाला पुरवतो.

जॉन बदलला होता. तो साध्या टॅक्सीतून लिमोझीन कार सर्व्हिस पुरवत आहे.  जॉनने  बदका सारखे सतत आवाज करत, सतत तक्रार करणे सोडून दिले आहे.  आणि गरुडासारखी भरारी मारायला सुरुवात केली आहे.

तुम्ही कुठे आणि काय काम करता याने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही ते कसे आणि  कोणत्या मनोभूमिकेतून करता याने नक्की फरक पडतो.

तुम्ही काय ठरवले आहे ?

बदकासारखे सतत आवाज करत (रडत), तक्रार करत राहणे की गरुडासारखे सगळ्यांपेक्षा वर उडण्याचे ?

लक्षात ठेवा….

निर्णय तुमचा आहे

हे कुलूप फक्त आतून उघडते….

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पु.ल. आणि वारा…” लेखिका :सौ. मंगला गोडबोले ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

पु.ल. आणि वारा…” लेखिका :सौ. मंगला गोडबोले ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

 पुलंचा हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तता किती अफाट होती ह्याची एक झलक…

1960-61च्या आसपास कधीतरी वसंत सबनीस यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती.त्यातील संवाद पाहा:

वसंत सबनीस : आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होता. हीच ‘वरात’ तुम्ही आता ‘वाऱ्यावर’ सोडली आहे, हे खरं आहे काय?

पुलं : “वाऱ्याचीच गोष्ट काढलीत म्हणून सांगतो…”

“भावगीत गायक झालो तो काळ ‘वारा फोफावला’ चा होता…!”

“नट झालो नसतो तर ‘वारावर’ जेवायची पाळी आली असती…”

“शिक्षक झालो त्यावेळी ध्येयवादाचा ‘वारा प्यायलो’ होतो…”

“संगीत दिग्दर्शक झालो त्यावेळी पेटीत ‘वारा भरून’ सूर काढत होतो…”

“नाट्य दिग्दर्शक झालो त्यावेळी बेकार ‘आ-वारा’ होतो…”

“प्राध्यापक झालो तेव्हा विद्वत्तेचा ‘वारा अंगावरून गेला’ होता…”

“पटकथा लिहिल्या त्या ‘वाऱ्यावर उडून’ गेल्या…”

“नुसताच साहित्यिक झालो असतो तर कुणी ‘वाऱ्याला उभं नसतं राहिलं…!”

“ही सर्व सोंगं करतांना फक्त एकच खबरदारी घेतली. ती म्हणजे ‘कानात वारं शिरू न देण्याची…!

“आयुष्यात अनेक प्रकारच्या ‘वाऱ्यांतून हिंडलो.’ त्यातून जे जिवंत कण डोळ्यात गेले ते साठवले आणि त्यांची आता ‘वरात’ काढली…!”

“लोक हसतात… माझ्या डोळ्यात आतल्या आत कृतज्ञतेचं पाणी येतं आणि म्हणूनच अंगाला अहंकाराचा ‘वारा लागत’ नाही!”

🙏🙏🙏 वा राव !

पुलंना उभा महाराष्ट्र

साष्टांग दंडवत घालतो

ते उगीच नाही!

(सौ.मंगला गोडबोले यांच्या – ‘पुलं… चांदणे तुझ्या स्मरणाचे’ या पुस्तकातून).

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जपावं… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

जपावं… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

   पाय जपावा

   वळण्याआधी

   तोल जपावा

   ढळण्याआधी

   अन्न जपावे

   विटण्याआधी

   नाते जपावे

   तुटण्याआधी

   शब्द जपावा

   बोलण्याआधी

   अर्थ जपावा

   मांडण्याआधी

   रंग जपावे

   उडण्याआधी

   मन जपावे

   मोडण्याआधी

   वार जपावा

   जखमेआधी

   अश्रू जपावे

   हसण्याआधी

   श्वास जपावा

   पळण्याआधी

   वस्त्र जपावे

   मळण्याआधी

   द्रव्य जपावे

   सांडण्याआधी

   हात जपावे

   मागण्याआधी

   भेद जपावा

   खुलण्याआधी

   राग जपावा

   भांडणाआधी

   मित्र जपावा

   रुसण्याआधी

   मैत्री जपावी

   तुटण्याआधी!

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

    प्रस्तुती :श्री. कमलाकर नाईक

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनातलं शब्दात… लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ मनातलं शब्दात… लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

आज अनिताकडे  पार्टी आहे . तिच्या आणि अजयच्या  ओळखीच्या पाच फॅमिलीज् येणार आहेत . त्यामुळे सकाळपासून तयारी सुरू आहे .

पहिल्यांदाच सर्वांना  घरी  बोलविण्याचा  बेत तिने ठरविला . नाहीतर महिन्यातून एकदा सर्व  मित्र  बाहेर हॉटेलमध्ये भेटतात. गप्पा टप्पा मारतात , आणि  रिचार्ज होऊन घरी येतात . हॉटेल असेच शोधतात जेथे  मुलांना मस्ती करायला भरपूर जागा असेल.••••

या सर्व कार्यक्रमात आजी-आजोबा घरीच राहतात , त्यांना रात्रीचे बाहेर जाणं , उशीरा जेवणं तेवढं झेपत नाही .. यावेळेस अनिता-अजयने घरीच बोलविण्याचा  प्लान ठरविला. ज्या परिवारात आजी आजोबा आहेत त्यांनाही आमंत्रण दिले .

सर्वांच्या सोयीनुसार  दुपारच्या जेवणाचा बेत ठरविला. आपल्या मनोरंजनाची पद्धत थोडी बदलावी ,असं तिच्या मनात होतं .

घरचे जेष्ठ ,Retired from work जरी असले तरी They are  not retired from fun,

असं तिचं मत आहे . नेहमी आपण बाहेर जातो ,ते काहीही तक्रार न करता घरी राहतात . येताना आपण त्यांच्या आवडीचे आइस्क्रीम  आणले, तरी अगदी आनंदाने ते त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खातात .

त्यांचे बाहेर जाणं कमी झालेलं आहे . बदल, change प्रत्येकाला आवडतोच .

आपण आपल्या  पद्धतीत थोडा बदल केला तर त्यांना पण आपल्यात सामावून घेता येईल .हा विचार अनिताच्या मनात होताच.

खरंतर दोन चार दिवसांपूर्वी  घडलेल्या एका घटनेनं   हा बदल करण्याचा विचार तिच्या मनात आलेला अजून  दृढ झाला.

परवा आजोबांचे चार मित्र त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला म्हणून घरी आले, तर अनिताच्या मुलीने म्हणजे प्रियाने खाडकन आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला . हे अस वागणं बरोबर नाही. खरंतर पंधरा वर्षांच्या प्रियाने सर्व आजोबांना  हसून नमस्कार करणे आणि त्यांना पाणी आणून देणे  एवढ करणं तरी  नक्कीच अपेक्षित होतं .

बरं !  आजच्या मुलांना लेक्चर देऊन चालत नाही .ऐकतील की अजून बिथरतील सांगता येत नाही .

मुलांना आपल्यापेक्षा लहान मोठे सर्वांबरोबर व्यवस्थित  वागता आलं पाहिजे . थोडं बहुत काम करायची सवयही असलीच पाहिजे. आज समोर दिसणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .

तेव्हा घरी गेटटूगेदर करायचे तिने ठरविले .

जेव्हा तिने हा विचार आपल्या मैत्रिणींमध्ये मांडला ,तेव्हा सगळ्यांना तो एकदम पटला असं झालं नाही . वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या .•••••

“अग ! ते खूप बोलतात . आपल्याला फ्रीली बोलता येणार नाही .” “त्यांच्या कडे लक्ष द्यावे लागते . आपला अर्धा वेळ त्यातच जाईल .”  “मग रोजच्या सारखंच होणार ना , बदल कुठे झाला ?” “त्यांना लवकर जेवायचे असते . रात्रीचे झेपत नाही” वगैरे वगैरे .

अनिता म्हणाली  “अग!  आपण थोडा बदल करून तर बघू . माझ्या घरी सुरुवात करू .अग!  जमेल सर्व .मी करते तयारी . त्यांना ही बरं वाटेल . मुलांनाही मदतीला घेऊ.”

रश्मी कशीबशी या प्लॅनसाठी तयार झाली.

आज देशपांडे आजी आजोबा , कुलकर्णी आजी आजोबा ,जाधव आजोबा, आणि देशमुख आजी आनंदात होते .आणि आश्चर्य चकितही  होते.

मुलांबरोबर लग्नाला जाणे , एखाद्या कार्यक्रमात जाणे, यांची त्यांना सवय आहे. पण मुलांबरोबर त्यांच्या मित्रांच्या पार्टीला जायचे होते . उत्साह  तर होता, बरोबर थोडं टेंशन ही होतं.

पार्टी छान झाली . सर्वांनी enjoy केलं . लहान मुलांनी खूप धमाल केली. बरोबर त्यांची मदतही झाली .आजी आजोबांकडे लक्ष द्यायचे काम त्यांनी छान केले .

सिनीयर्सची आपापसात छान ओळख झाली . गप्पा झाल्या .यंग जनरेशनच्या मनसोक्त गप्पा रंगल्या . हॉटेलपेक्षा हे option छान आहे . छान  हातपाय  पसरून  गप्पा मारता येतात, हे सर्वांना पटलं .

फॅमिली गेटटूगेदर छान रंगलं.

दुपारच्या चहानंतर अंताक्षरीचा कार्यक्रम झाला. तरुण वर्ग, बच्चा पार्टी आणि आजीआजोबा ग्रुप असे तीन गट होते . सर्वांनी  धमाल केली .आजी आजोबांनी जुनी गाणी छान म्हटली .

अगदी अंगाई गीत ,मंगलाष्टक तर

*जा मूली  जा दिल्या घरी तू सुखी रहा .

*केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर

*घट डोईवर ,घट कमरेवर •••

शेवटचं देशपांडे आजींचे गाणं ऐकून तर सर्वांच्या डोळ्यात पाणीच आले .गाणं होतं ••••

*घरात हसरे तारे असता ,मी पाहू कशाला नभाकडे.•••*

शेवटी देशपांडे आजोबा म्हणाले ,”धन्यवाद मुलांनो, आज  तुमच्यात सामील केल्याबद्दल. आज खूप दिवसांनी नवीन गाणी ऐकायला मिळाली . आम्ही  दहा वर्षांनी लहान झालो.

Hope ,We have not troubled you.”

प्रियाने सर्वांसाठी चहा केला. त्याचं तर खूपच कौतुक झालं .

अनिताने ज्या उद्देशाने हे पाऊल उचलले , त्याची सुरुवात  योग्य दिशेने  झाली आहे हे तिच्या लक्षात आले.

म्हणतात ना •••

समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट जरी माणसाजवळ असली तरी प्रश्न सहज सोडविता येतात.

माणसाने वेळेसोबत चालावे. काळाप्रमाणे बदलावे,परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे.

लेखिका :सुश्री.संध्या बेडेकर

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सारथी… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सारथी… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

दोन दिवसांनी तो घरी आलेला. दहा बाय बाराचं त्याचं घर. बायको, लेक आणि तो.

त्याच्या खोलीबाहेरची ती गॅलरी. दरवाजाला लागून गॅलरीत आडवी पडलेली कॉट. कॉटवरचा त्याचा म्हातारा बाप. आयुष्यभर हातगाडी खेचत रस्ता मागे ढकलला त्यानं. थकला तो आता.. पायातलं त्राणच गेलंय त्याच्या आता. खुरडत खुरडत रांगत जातो तो.. अगदीच परावलंबी नाही तो… जरी असता तरी काळजी नव्हती. त्याचा खूप जीव होता बापावर.

त्याच्यासाठी वाट्टेल ते केलं असतं त्यानं.

त्याची बायकोही त्याच्यासारखीच.

सासरा नाही माझा बापच आहे असं समजणारी.

म्हातारा बिचारा कॉटवर बसलेला असायचा दिवसभर.

नातीला गोष्ट सांगायचा..

 

बापानं काबाडकष्ट केले म्हणून..

तो बारावी सायन्स तरी झाला.

पुढचं शिक्षण नाही झेपलं त्याला. आणि

तसा डोक्यानं मध्यम.

 

नोकरी नाही म्हणून घरी बसला नाही. पेपरची लाईन टाकायला सुरवात केली.

साहेब….

खरं तर साहेब त्याच्यापेक्षा वयानं फार मोठे नाहीत. फार फार चाळीस. पण प्रचंड हुश्शार. फार्माचा धंदा.जोरात चाललेला. फार्मा लेनमधे भलंमोठ्ठं ऑफीस.

एक दिवस साहेबांनी थांबवलं त्याला.

‘किती दिवस पेपर टाकणार आहेस अजून ?

ड्रायव्हिंग शिकून घे. मी पैसे देतो. गाडी चालवायला लागलास की, माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचं. उपकार वगैरे करत नाहीये मी.

तुझ्या पगारातून कापून घेईन मी.”

जमलं.अगदी सहज.

सहज गाडी चालवायला शिकला.

साहेबांकडे कामालाही लागला.

साहेबांना माणसाची चांगली पारख.

साहेब सांगतील तसं…

तो कधीच नाही म्हणायचा नाही.

साहेबांचे दौरे असायचे.

सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, बेळगाव…

चार चार दिवस टूर चालायची.

त्याची काहीच तक्रार नसायची.

हातगाडीवाल्याचा पोरगा

आता ड्रायव्हर..

प्रमोशनच की….. आता बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. झोपडपट्टीतून चाळीची एक खोली. पक्क्या भिंती, पक्कं छत. छान संसार सुरू झाला.

काही महिन्यांनी साहेबांनी एक दिवस पुन्हा बोलावलं.

“किती दिवस ड्रायव्हरची नोकरी करणार आहेस ?

यापुढे तुझी ड्युटी फक्त सकाळी आणि संध्याकाळी.

सहा ते दहा.

मधल्या वेळेत कॉलेज करायचं.

डी फार्मसी करून टाक.

फी मी भरीन. पण हे बघ… पुढच्या पगारातून कापून घेईन..”

साहेबांनी सांगितलं ना..

मग करायचंच.

तीन वर्ष फार ओढाताणीची गेली..

अभ्यास, नोकरी आणि संसार…..

जमवलं कसंबसं.

आणि तो “डी फार्म” झाला.

साहेबांकडची ड्रायव्हरची नोकरी चालू होतीच. रिझल्ट लागला. साहेबांना पेढे नेऊन दिले. साहेब खूष.

“गाडीची किल्ली दे इकडे. उद्यापासून मला ड्रायव्हरची गरज नाही. सिटी हॉस्पीटलमधलं मेडीकल आपण चालवायला घेतलंय. आपला माणूस आहे तिथं..

दोन तीन महिन्यात सगळं शिकून घे. नंतर मात्र तुलाच सगळं सांभाळायचंय..

तीन महिन्यानंतर तुला चांगले पैसे मिळायला लागतील.

आजच सुप्रभा बिल्डरकडे जायचं.

गंगापुररोडला स्कीम होत्येय त्यांची.

मी बोललोय त्यांच्याशी. तिथं एक वन बीएचके बुक करायचा.

असे किती दिवस भाड्याच्या घरात रहायचं ?

हफ्ता तुझ्या पगारातून कट होईल.”

ठरलं तर.

साहेबांनी सांगितलं तसंच होणार.

‘बरं..’

नेहमी तो एवढंच म्हणायचा. आणि चालू लागायचा. आज मात्र तिथंच घुटमळला.

“साहेब,

मी तुमची गाडी चालवली.

तुमी माझ्या जीवनाच्या गाडीला, चांगल्या रस्त्याला लावली.

मी कसं आभार मानू तुमचं ?”

साहेब पहिल्यांदा दिलखुलास हसले…

“म्हणजे मला पण तू ड्रायव्हर करून टाकलंस की.

हरकत नाही..

अरे सगळ्यात मोठा ड्रायव्हर तो श्रीकृष्ण.

मी आपली त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो.

ते जाऊ दे. उपकाराची परतफेड कशी करणार ?

तू पण कुणाचा तरी ‘ड्रायव्हर’ हो.

तूही चांगला प्रामाणिक माणूस शोध.

त्याला योग्य रस्ता दाखव.

त्याची गाडी मार्गी लाव.

आणि आपल्या कंपनीच्या परिवारात सामील करून घे.”

हे अनमोल मार्गदर्शन ऐकून, सागरापेक्षा मोठा धबधबा डोळ्यात अडवून, तो घरी निघून गेला.

साहेबही निघाले. आज एका सेमिनारला जायचं होतं त्यांना. नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करणार होते साहेब. विषय होता…

“धंद्यासाठी चांगली विश्वासू माणसं कशी जोडावीत ?”

साहेब नुसतेच हसले आणि निघाले.

इतकी वर्ष साहेबांनी तेच तर केलं होतं…

“धंदे का राज” साहेब आज बिनदिक्कत सांगणार होते…

 जीवनात सारथी व्हा …!!!

… कुणाचे तरी..!!

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्री… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ मैत्री…  ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

ठाम रहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही,

स्वतःवर विश्वास असला की,

जीवनाची सुरूवात कुठूनही करता येते.

 

कोणतेही नाते निभावताना,

समोरच्याच्या मनातील,

आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते.

विनाकारण भावूक होण्यात अर्थ नसतो.

नाही तर आपण नाते फुलवत राहतो,

आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो.

 

दरवळ महत्त्वाची…

कारण दरवळ अविस्मरणीय असते,

मग ती फुलांची असो,

वा माणसांची…

 

हसतच कुणीतरी भेटत असतं,

नकळत आपल्यापेक्षाही आपलंसं वाटत असतं,

केव्हा कोण जाणे,

मनात घर करुन राहत असतं.

 

ते जोपर्यंत जवळ आहे.

त्याला फुलासारखं जपायचं

असतं,

दूर गेल्यावरही आठवण

म्हणून,

मनात साठवायचं असतं,

याचंच तर नांव,

“मैत्री”असं असतं..!!

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कावळा— लेखक :पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

कावळालेखक :पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

पाळीव नसूनसुद्धा ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा भरपूर आहेत, असा ‘कावळा’ हा एकच पक्षी. कारण पिंडाला शिवण्याशी याचा संबंध येतो.

पाळीव नसूनसुद्धा ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा भरपूर आहेत, असा ‘कावळा’ हा एकच पक्षी कारण पिंडाला शिवण्याशी याचा संबंध येतो.

आमच्या एका मित्राची आजी एकदा (एकदा म्हणजे एकदाचीच) वारली.

आता तिच्या पिंडाला न शिवायचं कावळ्याला काहीही कारण नव्हतं. अहो, चांगले नव्वद वर्षे पाहून म्हातारीने डोळे मिटले होते. मंडळी बुचकळ्यात पडली.

तुझ्या मुला-बाळांची काळजी घेऊ म्हणावं, तर मुलगाच बावीस वर्षे पोस्टातून पेन्शन घेऊन अजून बावीस वर्षे जगेल इतका टुणटुणीत. जगो बुवा! आपल्याला त्याचं काही नाही.पण लेकी होत्या, सुना, नातू , पणतू..

सगळं काही अगदी यथासांग होतं.

मग कोणीतरी उठलं आणि म्हणालं- ” आजीबाई, एक मोठ्ठी लोणच्याची बरणी आणि चार कपबशा आल्या तरच तुमची शालजोडी देईन हो बोहारणीला. “

.

.

.

पटकन् कावळा शिवला…

कावळा हा पक्षी कौटुंबिक गोष्टीत इतका बारकाईने लक्ष घालत असेल याची कल्पना नव्हती मला…

लेखक :पु. ल. देशपांडे

(‘पाळीव पक्षी’)

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares