मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्री लिहायला…” – कवयित्री सुजाता साठे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “श्री लिहायला…” – कवयित्री सुजाता साठे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

श्री लिहायला घरात आता

हिशोबाची वहीच नाही

ऑनलाइन पेमेंटच्या नव्या युगात

तांदूळ साखरेच्या डब्यात

लपवायलाच काही नाही

 

फाटलेले कपडे शिवून

पुन्हा वापरायची पद्धत नाही

सुई दोरा घेऊन शिवायला

मुळात कोणाकडे वेळच नाही

 

युज अँड थ्रो चा जमाना आहे

माळे उगीच भरायचे नाही

जुन्या गोष्टींमध्ये उगीच

मन असे गुंतवायचे नाही

 

मॉलच्या राशी तर आहेतच

आमिषाना भुलायचं नाही

असं म्हटलं तरीही

प्रत्यक्षात तसं होतच नाही

 

आता तर रेलचेल ऑनलाइन ची

ॲमेझॉन ची गळ मोडवत नाही

परस्पर होतो हिशोब सारा

पुन्हा, मी तर कुठे जातच नाही

 

जुनी हिशोबाची वही वाचताना

डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही

तेव्हा बावळट का आता शहाणे

या वादात मला पडायचं नाही

 

जुन्या आठवणी घेऊनच

पुढे पुढे जायचं असतं

काळाबरोबर आनंदाने

आपणही बदलायचं असतं

 

कवयित्री :सौ. सुजाता साठे

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घाई…कवयित्री : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ घाई…कवयित्री : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

फार घाई होते हल्ली…

प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहिजे म्हणून घाई…

क्षण फुकट वाया गेला म्हणून

लगेच गळे काढायची पण घाई…

 

माझ्याजवळ काही आलंय की जे अजून मलाही नीट नाही उमगलंय…

ते पटकन जगाला दाखवायची घाई….

जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…

पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….

 

गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….

व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….

 

Quality मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…

 

विचारांना अविचाराने बाजूला सारायची घाई….

 

नजरेत दृश्य येताक्षणी कॅमेऱ्यात बंद करायची घाई…

विचाराचा कोंब फुटताक्षणी,कृतीत उतरायची घाई…

फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….

बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….

मेमधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई….

 

बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई…!

चिमखड्या आवाजांना लता/किशोर व्हायची घाई.

बालांना किशोर व्हायची घाई…

किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई तर..

काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….

 

तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य/लावणीची घाई…

दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई…

 

प्रसंग टेकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई…

श्वास थांबता क्षणी श्रद्धांजली वाहायचीसुद्धा घाई…!

 

मुक्कामाला पोहचायची घाई….

कामावरुन निघायची घाई…

 

सिग्नल संपायची घाई….

पेट्रोल/डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…

 

सगळंच पटकन उरकायची घाई…

आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई…

 

आठ दिवसांत वजन कमी करायची घाई…

महिनाभरात वजन वाढवायची देखील घाई….!

पाच मिनिटांत गोरं व्हायची घाई…

पंधरा मिनिटांत केस लांब व्हायची घाई…

 एक मिनिटात वेदना शमवायची घाई…

एनर्जी ड्रिंक पिवून वडीलधाऱ्यांना दमवायची घाई…

 

साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमून जाई…

भवतालचा काळ/निसर्ग गालात हसत राही….

मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई…!!!

 

घाईघाईने मारलेल्या उड्या

कमी कर रे माणसा थोड्या

बुद्धी पेक्षा ही आहे काळ मोठा

कधीतरी जाण वेड्या…

 

कवयित्री : सौ. विदुला जोगळेकर

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माणसाला शेपूट येईल का ? ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ माणसाला शेपूट येईल का ? ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

माणसाने माणसाशी

संवाद तोडला आहे

म्हणून तो घराघरात

एकटा पडला आहे

 

येत्या काळात ही समस्या

अक्राळविक्राळ होईल

तेव्हा आपल्या हातातून

वेळ निघून जाईल

 

कदाचित माणूस विसरेल

संवाद साधण्याची कला

याच्यामुळे येऊ शकते

मुकं होण्याची बला

 

पूर्वी माणसं एकमेकांशी

भरभरून बोलायची

पत्रसुद्धा लांबलचक

दोन चार पानं लिहायची

 

त्यामुळे माणसाचं मन

मोकळं  व्हायचं

हसणं काय, रडणं काय

खळखळून यायचं

 

म्हणून तेव्हा हार्ट मध्ये

ब्लॉकेज फारसे नव्हते

राग असो लोभ असो

मोकळेचोकळे होते

 

पाहुणे रावळे गाठीभेटी

सतत चालू असायचं

त्याच्यामुळे प्रत्येक माणूस

टवटवीत दिसायचं

 

आता मात्र माणसाच्या

भेटीच झाल्या कमी

चुकून भेट झालीच तर

आधी बोलायचं कुणी ?

 

ओळख असते नातं असतं

पण बोलत नाहीत

काय झालंय कुणास ठाऊक

त्यांचं त्यांनाच माहीत

 

घुम्यावाणी बसून राहतो

करून पुंगट तोंड

दिसतो असा जसा काही

निवडुंगाचं  बोंड

 

Whatsapp वर प्रत्येकाचेच

भरपूर ग्रुप असतात

बहुतांश सदस्य तर

नुसते येड्यावणी बघतात

 

त्यांनी मेसेज वाचल्याच्या

दिसतात निळ्या खुणा

पण रिप्लाय साठी सुटत नाही

शब्दांचा पान्हा

 

नवीन नवीन Whatsapp वर

चांगलं बोलत होते

दोनचार शब्द तरी

Type करत होते

 

आता मात्र बऱ्याच गोष्टी

इमोजीवरच भागवतात

कधी कधी तर्कटी करून

इमोजीनेच रागवतात

 

म्हणून इतर प्राण्यांसारखी

माणसं मुकी होतील का ?

भावना दाबून धरल्या म्हणून

माणसाला शिंगं येतील का ?

 

काय सांगावं नियती म्हणेल,

लावा याला शेपटी

वाचा देऊन बोलत नाही

फारच दिसतो कपटी

 

हसण्यावर नेऊ नका

खरंच शेपूट येईल

पाठीत बुक्का मारून मग

कुणीही पिळून जाईल

 

म्हणून म्हणतो बोलत चला

काय सोबत येणार

नसता तुमची वाचा जाऊन

फुकट शेपूट येणार

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रवास… साैजन्य : सुश्री जयंती यशवंत देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रवास… साैजन्य : सुश्री जयंती यशवंत देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

बस सुटणार, एवढ्यात एक तरूण घाईघाईने बसमध्ये शिरला. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती.   हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपवताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले. त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृध्दाला अडचण होतेय का,याचा जराही विचार न करता, स्वतःच्या बाजूला आणि त्या वृध्दाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या. तो वृध्द अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला. इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पहात होते.

साधारण तासाभराच्या प्रवासानंतर तो तरुण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला. तो वृध्द आता थोडा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेह-यावर दिसत नव्हता.

न राहवून मी त्या वृध्दाशेजारी जाऊन बसले आणि म्हणाले, ” आजोबा, तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखवले नाही. तुम्ही हे एवढे का सहन केले. . ?”

चालत्या बसमधून खिडकीबाहेर पहात त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेह-यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले,

” आपला प्रवास किती घडीचा असतो?

निर्धारित थांबा आला, की तो किंवा मी उतरून जाणारच होतो. आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला. ? जमेल तेवढा सहप्रवास सुखाने, सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही. !”

आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्द न् शब्द मनात साठवत राहिले. . .

” बाळ, जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे. जीवन असतेच दो घडीचे. !

जन्माच्या वेळी वाटल्या जाणा-या मिठाईपासून या प्रवासाची सुरूवात होते आणि श्राध्दाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस,हाच जीवनाचा गोडवा. . !

त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण. . !

बाळ,या दोन्ही वेळी आपण स्वतः त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही. मग मधल्या काळात येणारे  कडू-गोड क्षण. . त्याचा सारखाच आनंद घेत जगता आले पाहिजे. !

अनेक माणसं भेटतात या प्रवासात. . त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात. . त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गणगोत, नातलग आले. . काही कसलीही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारी असतात. कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात. . त्यासाठी कारणच हवं, असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी. . त्यांचा पिंड निराळाच असतो. आपण नेहमी लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी कधी साथ देत नाहीत. . !

जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं. . ते जेवढं वाट्याला येईल, तेवढं आनंदानं जगून घ्यावं; म्हणजे कोणी सामानाचे असो, की विचारांचे. . ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही. या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते. “

रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत,तर कधी खिडकीतून मागे पळणा-या झाडांकडे. . खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते.

थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्यातरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे, म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते.

त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,

” बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा. . पुढे वय वाढत गेलं, की सुखाच्या बाबतीतही तेच होतं. . वास्तविक दोन्ही तिथंच असतात. फक्त आपण धावत असतो. !

धावण्याची शर्यत जणू. त्यात कधी कधी धरून ठेवावे, असे हात निसटून जातात. लक्षात येतं, तेव्हा उशीर झालेला  असतो. . पण एक मात्र खरं. व पु एके ठिकाणी लिहितात,

 ” जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून      चालत नाही. ती दोघांनाही असावी लागते. कारण  ‘भाळणं ‘ संपल्यावर उरतं ते ‘सांभाळणं. . ‘ हे सांभाळणं ज्याला जमलं, त्यालाच ‘जीवन जगणं’ कळलं. . !”

असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं, काय माहीत. .

बसचा शेवटचा थांबा आला. दोघेही खाली उतरलो. दोन पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले. . सावरले. दाटल्या स्वरांत म्हणाले, “पोरी, अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत गं. . !”

मीही उत्तरादाखल पुटपुटले, ” आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं, असे पाय देखील दुर्लभ झालेत हो. . !”

 दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणा-या. .

आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत दोघेही पुनः पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो.

” दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. . . “

साैजन्य  :सुश्री  जयंती यशवंत देशमुख

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सात किमती रत्ने… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ सात किमती रत्ने… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

सात किमती रत्नं पाठवत  आहे.

पहिले रत्न – माफी 

तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने ‘माफ’ करा.

दुसरे रत्न – विसरा 

दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. ‘निःस्वार्थ’ भावना ठेवा.

तिसरे रत्न – विश्वास 

नेहमी ‘स्वकष्ट’ आणि ‘निसर्गा’वरअतूट विश्वास ठेवा.    हीच तुमच्या यशाची पावती असेल.

चौथे रत्न – नातं 

समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होतं ते नातं. नात्याला जपा, नात्याला तडा जाऊ देऊ नका.

पाचवे रत्न – दान 

नेहमी सढळ हाताने दान करा, दान केल्याने धन कमी होत नाही. उलट दान केल्याने मिळतो मान.आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं.

सहावे रत्न – आरोग्य

दररोज व्यायाम करा, योगासने करा, चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा.

सातवे रत्न – वैराग्य 

नेहमी लक्षात ठेवा की, ‘जन्म’ आणि ‘मरण’ कधीच कुणालाच चुकलेले नाही. ‘जन्म’ घेतला म्हणजे ‘मृत्यु’ अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळत बसू  नका. ‘जीवन’ खूप सुंदर आहे, आनंदाने जगा.                                                 

माणूस जसा बदलत चालला आहे, तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.

निसर्गाची ताकद आहे बघा.निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.

ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत,

तो तोडताना दहा वेळेस विचार करतो.

आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो,

मग ती झाडे  असो की नाती…

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “विचारमोती…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “विचारमोती…”   ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

जी गोष्ट मनात आहे,

 ती बोलण्याची हिम्मत ठेवा,

आणि…

जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,

ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.

 

चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून,

उदास राहण्यापेक्षा,

अनोळखी लोकात राहून,

आनंदी राहिलेलं कधीही चांगलं.

 

परिस्थितीप्रमाणे

बदलणारी माणसे, सांभाळण्यापेक्षा,

परिस्थिती “बदलविणारी” माणसे सांभाळा.

आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही.

 

माणूस कोणत्याही वस्तूला, फक्त दोनच वेळा महत्व देत असतो.

एक तर ती मिळायच्या अगोदर, किंवा ती गमावल्याच्या नंतर.

 

कोणी तुमचा सन्मान करो, अथवा ना करो,

तुम्ही तुमचे कर्तव्य करत, चांगले काम करत रहा.

नेहमी लक्षात ठेवा…

करोडो लोक झोपेत असतात,

म्हणून सूर्य आपला विचार

कधीही बदलत नाही.

सूर्योदय हा होतोच…

 

बुद्धी सगळ्यांकडे असते,

पण तुम्ही चलाखी करता की, इमानदारी,

हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं…

चलाखी चार दिवस चमकते,

आणि इमानदारी,

आयुष्यभर…

 

दुसऱ्याच्या मनात, निर्माण केलेली निर्मळ व स्वच्छ जागा

हीच खरी सर्वात महाग,

व अनमोल जागा…

कारण…

तिचा भाव तर करता येत नाहीच,

पण एकदा जर का ती गमावली,

तर पुन्हा…

प्रस्थापित करता येत नाही…!!

 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी एकदा आळीत गेलो…” – पु. ल. देशपांडे  ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “मी एकदा आळीत गेलो…” – पु. ल. देशपांडे  ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

मी एकदा आळीत गेलो

चाळ घेऊन बाहेर आलो

तोंडात भरली सगळी चाळ

मी तर मुलाखाचा वाचाळ ॥१॥

 

कधी पायांत बांधतो चाळ

उगीच नाचतो सोडून ताळ

वजन भारी उडते गाळण

पायांचीहि होते चाळण ॥२॥

 

गाळणे घेऊन गाळतो घाम

चाळणीमधून चाळतो दाम

चाळीबाहेर दुकान माझे

विकतो तेथे हसणे ताजे ॥३॥

 

‘खुदकन हसू’ चे पैसे आठ

‘खो खो खो’ चे एकशे साठ

हसवण्याचा करतो धंदा

कुणी निंदा कुणी वंदा ॥४॥

 

कुणाकुणाला पडतो पेच

ह्याला का नाही लागत ठेच?

हा लेकाचा शहाणा की खुळा?

मग मी मारतो मलाच डोळा ॥५॥

कवी :पु ल देशपांडे

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक चिमुकला थेंब… कवयित्री : सुश्री भारती पांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एक चिमुकला थेंब… कवयित्री : सुश्री भारती पांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

अचानक सरारत आलेली 

पावसाची सर

क्षणार्धात विरूनही गेली.

एका चिमुकल्या पानावर

थबकून राहिलेला एक चिमुकला थेंब, 

 

त्याच्या मनात मात्र घनघोर वादळ. 

पाण्याची वाफ आणि वाफेचं पुन्हा पाणी. 

एवढंच का माझं आयुष्य?

नाहीतर मग 

असंच मातीत कोसळून 

नि:शेष होऊन जाण्याचं?

 

निराशेनं थेंब किंचितसा घरंगळला. 

पान खाली झुकलं. 

नव्यानेच उगवलेल्या एका किरणानं 

थेंबाला कवेत घेतलं…..  

…… आणि लाखो प्रकाश शलाका 

एकदम प्रकटल्या. 

त्याच रंगांनी नटलेलं एक चिमुकलंसं 

फुलपाखरू बागडत आलं 

आणि …. 

क्षणार्धात 

तो रंगीत थेंब पिऊन 

निघूनही गेलं कुठेसं….. 

 

कवयित्री : सुश्री भारती पांडे 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काही कळलंच नाही… कवी – ना.धो. महानोर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ काही कळलंच नाही… कवी – ना.धो. महानोर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

का कुणास ठाऊक, 

काही कळलंच नाही,   

*मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी..*

 

कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,

काही कळलंच नाही.

 

काय मिळवलं, काय कमावलं,

काय गमावलं,

काही कळलंच नाही.

 

संपलं बालपण,

गेलं तारुण्य,

केव्हा आलं ज्येष्ठत्व,

काही कळलंच नाही.

 

काल मुलगा होतो, 

केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो, 

काही कळलंच नाही.

 

केव्हा ‘बाबा’ चा

‘आबा’ होऊन गेलो,

काही कळलंच नाही.

 

कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी,

कोणी म्हणतं हाती आली काठी,

काय खरं आहे, 

काही कळलंच नाही.

 

पहिले आई बापाचं चाललं,

मग बायकोचं चाललं,

मग चाललं मुलांचं, 

माझं कधी चाललं, 

काही कळलंच नाही.

 

बायको म्हणते, 

आता तरी समजून घ्या , 

काय समजू,

काय नको समजू, 

कां कुणास ठाऊक, 

काही कळलंच नाही.

        

मन म्हणतंय तरुण आहे मी,

वय म्हणतंय वेडा आहे मी,

या साऱ्या धडपडीत केव्हा 

गुडघे झिजून गेले, 

काही कळलंच नाही.

 

झडून गेले केस, 

लोंबू लागले गाल,

लागला चष्मा, 

केव्हा बदलला हा चेहरा 

काही कळलंच नाही.

 

काळ बदलला,

मी बदललो

बदलली मित्र-मंडळीही

किती निघून गेले, 

किती राहिले मित्र,

काही कळलंच नाही.

 

कालपर्यंत मौजमस्ती

करीत होतो मित्रांसोबत,

केव्हा सीनियर सिटिझनचा 

शिक्का लागून गेला, 

काही कळलंच नाही.

 

सून, जावई, नातू, पणतू,

आनंदी आनंद झाला, 

केव्हा हसलं उदास हे जीवन,

काही कळलंच नाही.

 

भरभरून जगून घे जीवा

मग नको म्हणूस की,

“मला काही कळलंच नाही……. 

 

कवी – ना.धो. महानोर

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विठूमाऊलीचा प्रसाद ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

विठूमाऊलीचा प्रसाद ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

आर्मी सर्व्हिसेस कोरचे कॅप्टन प्रकाश कदम पंढरपूरला विठूमाऊलीच्या दर्शनाला आले होते. आज त्यांची सुट्टी संपत होती. दर्शन झालं की इथून मुंबई आणि मग तिथून पोस्टिंगवर – ड्युटीवर रुजू व्हायचं म्हणून कॅप्टनसाहेब लष्करी गणवेषातच दर्शनाला आले होते.

दर्शन झालं, आता बाहेर पडणार एवढ्यात एका छोट्या मुलीनं त्यांना हटकलं – काका, तुम्हीपण सैन्यात आहात ना ? इथून आता शत्रूशी ढिशूम ढिशूम करायला तुम्ही काश्मीरला जाणार ना ? माझे बाबाही तिथेच आहेत. त्यांच्यासाठी हा विठोबाचा प्रसाद घेऊन जाल ? आई म्हणते बाबा आता कधीच परत येणार नाहीत, त्यांना एवढा प्रसाद तर द्या.

आणि कदमांचा पंढरपूरचा मित्र त्यांच्या कानात कुजबुजत सांगत होता – ही उमंग. शहीद मेजर कुणाल गोसावींची मुलगी. मेजरसाहेब २०१६ साली काश्मीरमध्ये नग्रोटा इथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले, तेव्हा ही फक्त ४ वर्षांची होती….

कदमांच्या डोळ्यात पाणी तरारलं आणि त्यांना पुढचं काही ऐकूच आलं नाही.

लेखक : मकरंद पिंपुटकर 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares