मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘सत्संग म्हणजे काय?’ –- लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

सौ. शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘सत्संग म्हणजे काय?’ – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूंना सहज विचारले-

“देवा सत्संग सत्संग म्हणतात

त्याचा एवढा काय हो महिमा”?

यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की, “तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. “

नारद मुनी त्या कीटकाला शोधत

नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले-

“सत्संगाचे काय फळ आहे, तुला माहीत आहे का? “

कीटकाने त्यांचेकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला.

प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा भगवान श्रीविष्णूंकडे आले आणि म्हणाले,

“देवा तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा. “

देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले,

“तेथे पहा. त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे. ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. “

नारदमुनी त्या पोपटाचे पिलाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला.

पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचेकडे पाहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच.

नारद मुनी मनाशीच विचार करू लागले, काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे? कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले.

अत्यंत दुःखी होऊन ते पुन्हा भगवान श्रीविष्णूंपाशी आले. म्हणाले,

“देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू. पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत.

अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात? “

तेव्हा देव त्यांना म्हणाले,

“त्याची चिंता तू करू नकोस. तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल, तर ते पहा. नुकत्याच तिथे एका गाईने बछड्याला जन्म दिलाय. तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. “

दुःखी अंतःकरणाने नारदांनी तेथे जाऊन त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला.

त्यानेही दृष्टी वळवून त्यांचेकडे पाहिले आणि ते तेथेच लुढकले.

नारद मुनी घाबरून देवांकडे परत आले. तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून भगवान श्रीविष्णु म्हणाले,

“एका राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आहे. त्याचेकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल. “

नारदांनी विचार केला, आता पर्यंत कीटक, पोपट व गाईच्या बछड्याचे मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही, पण राजकुमाराचे जर काही बरेवाईट झाले तर माझे प्राणही संकटात येऊ शकतात.

तथापि देवाचे विश्वासावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले-

“सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो? “

प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला,

“मुनिश्रेष्ठ, आपण अजून नाही समजलात का?

अहो, आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो. आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट झालो.

नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो आणि मला गाईच्या बछड्याचा देह प्राप्त झाला.

पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहांमध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्यदेह प्राप्त झाला आणि पुन्हा आपल्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले.

हे सर्व आपल्यासारख्या संतांचे दर्शनाचेच फळ आहे. ज्यांना आपल्यासारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत. “

नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले

व सत्संगाचा महिमाही कळला.

“नारायण, नारायण, ” प्रेमाने म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले,

“देवा, जशी आपली लीला अगाध आहे, तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आहे. “

म्हणून मित्रांनो,

जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे.

बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर,

बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात.

याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर,

लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो.

ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात हनुमान धन्य झाले,

श्रीकृष्णांच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला,

याउलट दुर्योधनाच्या सहवासाने कर्ण श्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला.

आपण ज्यासोबत राहतो त्याच्या विचारांचा, रहाणीचा, वागणीचा, अंमल हा आपल्यावर होत असतो.

संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात

संगत कशी हवी याचा विचार करावा…

!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रगतिपथावरचं तारतम्य… लेखिका: श्रीमती नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रगतिपथावरचं तारतम्य… लेखिका: श्रीमती नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

पंधरा दिवस मुंबईतल्या मुंबईत मुलाकडे राहायला गेलो होतो.

एका दिवसातच ऑनलाईन दिली जाणारी order आणि कमीतकमी चारतरी घरपोच येणारी पार्सल हा माझ्या चिंतेचा आणि रागाचा विषय झाला.

नवरा नेहमीप्रमाणे स्थित प्रज्ञ….

“पंधरा दिवसात काय तू मागे पडून यांची ‘सिस्टिम’ बदलायच्या भानगडीत पडतेस?”

सुनावलंच मला.

पण भाज्या, फळं, आणि त्या त्या दिवशी लागणारं सामान मी स्वतः बाजारात जाऊन आणणार. ही गोष्ट मुलाच्या आणि सुनेच्या गळी उतरवण्यात मात्र मी यशस्वी झाले.

दोघंही पटवून देतच होते,

“आई हे घरपोच येणं खूप सोयीचं आहे.

स्वस्त ही पडतं.

त्यावर कित्ती तरी “ऑफर्स “असतात.

सुट्ट्या पैशांची कटकट नाही.

माल परत ही घेतला जातो.

वगैरे वगैरे…….”

त्यांच्या व्यस्त जीवन शैलीमुळे त्यांना हे फायदे वाटतात.

 ज्येष्ठ नागरिकांकडे वेळच वेळ आहे म्हणून तुम्हाला हे पटत नाही हा आजच्या पिढीचा ठळक मुद्दा.

“अगदी बरोबर “असं म्हणून वाद टाळलाच मी.

पंधरा दिवस नातवंडांबरोबर घालवून पुढे दोन तीन महिने पुरेल इतकी आनंदाची शिदोरी भरून घेण्यासाठी तर येतो आपण.

त्यात  वादाच्या मिठाचा खडा   कशाला?

 

पण मनच ते..उघड बोलले नाही तरी अनेक गोष्टी  डाचत होत्याच.

 

घरपोच येतं, पण तुमच्या सोयीच्या वेळेनुसार येतं का?

कधी भाजी फोडणीला टाकत असतो, कधी wash room मध्ये असतो, कधी वाचत असतो, आणि सामान येतं. दार उघडा,

OTP दिल्याशिवाय मिळत नाही

मग फोन शोधा.

लिस्ट प्रमाणे चेक करा.

यात वेळ तर जातोच ना.

तोसुद्धा तुमच्या मनाविरुद्ध आणि गैरसोयीचा.

मग आपल्या सोयीने, वेळ काढून का नाही बाजारातून आणायचं.?

 

स्वस्त असतं का हे मी काही पडताळून बघितलं नाहीये.

पण अवाढव्य  कोबी, “(अर्धा बाईंना द्यावा लागतो.. हरकत नाही पण गरजही नसते. )

मलूल  पालेभाजी, ताजी नसलेली फळं हे चालवून घ्यावं लागतं.

ऑफर्स म्हणाल तर त्यासाठी ठराविक किमतीचं सामान घ्यावंच लागतं. मग 2000 rs ला 200 rs कमी पडतायत, काही तरी मागव म्हणजे ती ऑफर मिळेल म्हणून 200 rs गरज नसताना खर्च करायचे.

आज ‘सेवा उद्योग’ इतका मोठा झालाय, तत्पर झालाय की आजची पिढी नकळत त्याच्या आहारी गेलीय.

 आपल्या घरी काम करणाऱ्या मावशीने सणवाराला, किंवा आपल्या अडचणीला आपल्याला मदत (सेवा) केली तर आपण त्यांना काहीतरी प्रेमाने बक्षीस देतो.

इथे उलटी गंगा आहे. ज्यांची सेवा ‘घेतो’ तेच आपल्याला काही तरी देतात.

कुरिअर घेऊन येणारा असो, किराणा घेऊन येणारा असो, दुधाचं, वर्तमानपत्रांचं bill घ्यायला येणारा असो, इस्त्रीवाला असो, फुलपूडी टाकणारा असो, या सगळ्यांशी एक जवळीक असते. एक आपुलकीचं नातं तयार होतं.एकमेकांची विचारपूस केली जाते.या विचारांच्या आपल्या पिढीला हा सगळा ऑनलाईन  रोखठोक मामला नाही पसंतीस येत.

 

कपडे, खेळणी, अगदी कुकर, induction, क्रोकरी, चादरी, पडदे,सगळं फोटो पाहून मागवायचं आणि पसंत पडलं नाही, साईझ चुकली तर परत करायचं.हा यांचा उलटा कारभार माझ्या तरी आकलनाच्या पलीकडे आहे.

आणि पर्यावरणाचा विचार केला तर संताप आणणारा आहे.

एकदा एक छोटा box आला. तो एका कागदाच्या पिशवीत( सर्विस provider चं नाव मिरवणाऱ्या) आपला पत्ता असलेली चिट्ठी चिकटवलेला होता.

सीलची tape चिकटवलेली होतीच.

इतकी कागदाची वेष्टनं दूर करून boxच्या आतल्या प्लास्टिक पिशवीत काय वस्तू सापडावी?थर्मोमीटर ..

माझ्या रागाचा पारा प्रचंड चढलाच.

डोक्याला इतका ताप झाला

की मुलगा सून घरी आल्यावर माझा संताप मी व्यक्त केलाच..

अशा सहज खरेदी करता येणाऱ्या वस्तू मागवून कागदाची किती नासाडी होते याचं भान नसतं यांना.

स्वयंपाकाच्या मावशी आल्या, आणि लागणारी एखादी वस्तू नसेल तर

Blink itवरून पापणी लवायच्या आत ती दारात हजर होते.

सोय म्हणून ठीकच आहे पण kichen मॅनेजमेंटचा बट्याबोळ  झालाय.

त्याची सवय लागली, काही अडतच नाही ना.

पण शिस्त हरवत चालली याची खंत वाटतेच.

सात वर्षांची नात रात्री काही तरी मागत होती माझ्याकडे. मी म्हटलं, दुकान बंद झालं आता. तर तिनेच सांगितलं ऑनलाईन मागवून ठेव ना आत्ता. उद्या मिळेल मला.

आत्ताच्या आत्ता’ हा रोग, ‘संयम  नसल्याचं लक्षण’ किती घातक आहे.

नकळत पोहोचतंय, झिरपतंय  ते लहान मुलात.

माझ्याकडे आत्ता पैसे नाहीयेत, हेही तिला पटलं नाही.

 

GPay कर म्हणून सल्ला दिला तिने.

तिच्या हजारजबाबीपणाचं कौतुक करू,तिच्या  हुशारीची दाद देऊ की, तिला किती माहिती आहे याचं नवल वाटून घेऊ

या बुचकळ्यात पडले मी.

का इतकी माहिती असली पाहिजे या वयात?

आत्ता ही वस्तू देणार नाही, मिळणार नाही हे साधं सोपं गृहीतक पटवायचे दिवस संपले का?

तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. त्याचे अनेक फायदे आहेत. अनेक सोयी उपलब्ध झाल्यात.

या कुठल्याही प्रगतीला माझा विरोध नाही

मी ही bill भरणे, किराणा, औषधं मागवणे, तिकिटं काढणे ही ऑनलाईन  पण सावध, सुरक्षित अशी transactions करते.

माझं म्हणणं एवढंच… की प्रगतीपथावर चालताना ‘तारतम्य’ बाळगा.

कुठल्याही मार्गात खाच खळगे असतात, खड्डे असतात, उतार चढाव असतात.

त्यामार्गांवरचं ‘कुठपर्यंत पोहोचायचं’ हे ‘आपलं स्थान’ आपण पक्कं करून  मार्गक्रमणा  करावी.

प्रगतीच्या दिशेने जाणारा मार्ग ‘एकदिशा’ मार्ग नसतो.

भरकटलात तर ‘Uturn’ घ्यावा लागू शकतो.

त्यामुळे ‘तारतम्य’ बाळगून प्रगतिपथावर नक्की घोडदौड करावी, या बाबत माझं दुमत नाहीच मुळी.

 

विचारात  गढून गेले.मी….इतक्यात बेल वाजली.

काही तरी ‘पार्सल’ आलं बहुधा.’

लेखिका: श्रीमती नीलिमा जोशी.

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्णाची गूढ शिकवण – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कृष्णाची गूढ शिकवण – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

कृष्ण अंधारात जन्मला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.

कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल, भरवसा नाही…!

अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच…

चक्रव्यूह कसा भेदायचा, हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं, हे कृष्णाने सांगितलं नाही.

कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.

चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ‘चालू’ आहे असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल, तर फक्त सौम्य हसतो.

फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…

तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे, ते स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…

अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.

श्रीकृष्ण “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण नि:शस्त्र! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था

कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था

भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था

कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला, तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील, तर मी रथ सोडलाच म्हणून समज…

अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी, असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥

जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…

असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा, तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो, हे तो बघत बसतो…

रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो… कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणुत भरलो…

तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवांतही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन…

म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.

कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.

श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

श्रीकृष्णाने आपली आई-वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदेला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.

कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे, हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही…!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मदत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “मदत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

एखाद्याला मदत करण्याची कृती आपण स्वतः करतो… की ती आपल्याकडून करवून घेतली जाते?

दोन्ही प्रश्नाचे उत्तर’ हो’ असेच असेल, नाही का? तर मदतीच्या कृतीबाबतचा एक किस्सा असा.

अध्यात्मिकचा कोर्स करत असताना एकदा आम्हाला सांगितले की आता पुढची 15 मिनिटं या हॉलच्या बाहेर जा आणि कुणाला तरी मदत करून या. वेळ सुरू झाला आणि आम्ही बाहेर पडलो.

आमची मदत घेण्यासाठी कोणी दिसते का, शोधू लागलो. रस्ता रहदारीचा होता. एक आजी हातात जड पिशवी घेऊन चालत होत्या. आमच्यापैकी एक जण धावतच तिथे गेला आणि अगदी विनयाने म्हणाला, “आजी कुठे जायचे तुम्हाला? थोडे अंतर मी पिशवी घेतो, ” त्याच्या या बोलण्यावर आजी संशयाने बाजूला झाल्या आणि चढ्या आवाजात म्हणाल्या, “बाजूला हो…. आला मोठा मदत करणारा! “… एक प्रयत्न तर फसला..

वेळ आता दहाच मिनिटं उरला होता. पुन्हा शोधाशोध सुरू. रस्त्याच्या कडेला मळकटलेल्या कपड्यातली एक गरीब मुलगी दिसली. आम्ही तिकडे धावलो. शेजारीच वडापावचा गाडा होता. तिला म्हणालो, “चल. तुला वडापाव खायला देतो. ” त्यावर ती आमच्याकडे संशयाने पाहू लागली. “नको नको, ” म्हणत दूर पळून गेली.

आता पाच मिनिटे राहिली. शेवटी वडे तळणाऱ्या बाईंना आमच्या टास्कबद्दल सांगितले आणि “तुम्हाला काही मदत करू का? ” असे विचारले. त्यावर तिनेही नकार दिला. “माझे वडे बिघडवून ठेवाल, ” असे म्हणाली. वेळ संपला आणि कुणालाही मदत न करता आम्ही परत आलो.

आल्यावर सरांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर ते म्हणाले, ” आता तुमच्या लक्षात आले असेल. मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते. कुणीही मदत करू शकत नाही. मदत तीच व्यक्ती करते, ज्याची परमेश्वराने निवड केलेली असते. त्यामुळे इथून पुढे आयुष्यात जर कुणाला तुमच्या माध्यमातून मदत झाली तर “मी केली” असे म्हणू नका. ती परमेश्वराने केलेली असते. पण कृतीचे माध्यम म्हणून तुम्हाला निवडले आहे, हे विसरू नका. आणि त्याच्या इच्छेशिवाय हे शक्य नाही, हे ध्यानात ठेवा.

ही शिकवण त्यानंतरच्या प्रत्येक मदतीच्या कृतीवेळी मला आठवत राहिली. आणि आपण फक्त माध्यम आहोत, हे सतत जाणवत राहिले. यामुळे ‘अहंकाराचा वारा’ काही प्रमाणात का असेना थोडा दूर राहिला, हे मात्र नक्की.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रंग पाण्याचे… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर ☆

सौ. रेखा जांबवडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रंग पाण्याचे… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

‘पाणी’ शब्द हा असे प्रवाही

वळवू तिकडे वळतो हा..

जशी भावना मनात असते

रूप बदलते कसे पहा..!

*

नयनामध्ये येता ‘पाणी’

अश्रू तयाला म्हणती,

कधी सुखाचे, कधी दुःखाचे,

अशी तयांची महती..!

*

चटकदार तो पदार्थ दिसता,

तोंडाला या ‘पाणी’ सुटते,

खाता खाता ठसका लागून

डोळ्यांतून मग ‘पाणी’ येते..!

*

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,

म्हणती अविरत भरते ‘पाणी’..

ताकदीहूनी वित्त खर्चिता

डोक्यावरूनी जाते ‘पाणी’..!

*

‘वळणाचे ‘पाणी’ वळणावरती’

म्हण मराठी एक असे,

‘बारा गांवचे ‘पाणी’ प्यालाय’

चतुराई यातुनी दिसे..!

*

लाथ मारूनी ‘पाणी’ काढणे,

लक्षण हे तर कर्तृत्वाचे,

मेहनतीवर ‘पाणी’ पडणे

चीज न होणे कष्टाचे..!

*

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,

‘पाण्या’त पाहणे गुण खोटा..

‘पाणी’दार ते नेत्र सांगती,

विद्वत्तेचा गुण मोठा..!

*

शिवरायांनी कितीक वेळा,

शत्रूला त्या ‘पाणी’ पाजले..

नामोहरम करून, अपुले

मराठमोळे ‘पाणी’दाविले..!

*

टपोर मोती दवबिंदूचे

चमचम ‘पाणी’ पानावरती,

क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,

अळवावरचे अलगद ‘पाणी’..!

*

कळी कोवळी कुणी कुस्करी,

काळजाचे त्या ‘पाणी’ होते..

ओंजळीतूनी ‘पाणी’ सुटता,

कन्यादानाचे पुण्य लाभते..!

*

मायबाप हे आम्हां घडविती,

रक्ताचे ते ‘पाणी’ करूनी..

विनम्र होऊन त्यांच्या ठायी

नकळत दोन्ही जुळती ‘पाणि’

*

आभाळातून पडता ‘पाणी’

तुडुंब, दुथडी नद्या वाहती,

दुष्काळाचे सावट पडतां

सारे ‘पाणी पाणी’ करती..!

*

अंतीम समयी मुखात ‘पाणी’

वेळ जाणवे निघण्याची..

पितरांना मग ‘पाणी’ देऊनी,

स्मृती जागते आप्तांची..!

*

मनामनांतील भावनांचे,

‘पाण्या’मध्ये मिसळा रंग..

प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,

चेहऱ्यावरती उठे तरंग..!

कवी : अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “घटस्फोट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “घटस्फोट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकील हसून म्हणाले…

“घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला.

कोर्टानं तुम्हाला 30 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिलीये,

आणि दर महिन्याला 20,000 रुपये खर्चासाठी मिळत राहतील.

आता खूश ना?”

ती हलकेसे स्मित करून म्हणाली..

“हो… खूश आहे… आता मला कुणाकडून काही नकोय.”

वकील कागद गोळा करू लागला…

आणि कविता आई–वडिलांसोबत बाहेर पडली.

कोपऱ्यात निर्वाण—तिचा नवरा—सगळं शांतपणे पाहत उभा होता.

कवितानं एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही.

गाडीचं दार बंद झालं…

आणि नातंही.

पहिला महिना—

माहेरी सगळे फार प्रेमानं वागले.

कविताला वाटलं—

“हेच तर स्वातंत्र्य… हाच तर शांतपणा!”

 

दुसरा महिना—

घरच्यांचा सूर थोडा बदलू लागला.

भाऊ कधी रागानं बोलायचा,

वहिनी टोमणे मारायची—

“मोठी झालीस, थोडी जबाबदारी घे ना…”

भाचेही म्हणू लागले—

“आत्त्या, किती दिवस राहणार इथे?”

 

तिसरा महिना—

घरातलं वातावरण बदलू लागलं.

जिथं आधी प्रेम होतं, तिथं आता भार वाटू लागला.

कविता शांत राहायची… पण मनात दुख वाढत राहायचं.

 

चौथा महिना—

तिच्या प्रत्येक गोष्टीवर नजरा ठेवायला लागले.

बाहेर पडली की शेजारच्यांची खुसफुस—

“तिचा घटस्फोट झालाय… आता माहेरीच राहणार?”

 

कविताच्या आत काहीतरी तुटत होतं.

तिला पहिल्यांदा जाणवलं—

सासरी नातं कठीण होतं, पण ते तिचं स्वतःचं घर होतं. माहेरी ती ना पाहुणी, ना घरची—फक्त एक ओझं.

 

एक रात्री टेरेसवर बसून ती विचार करू लागली—

“पैसे मिळाले… स्वातंत्र्य मिळालं…

पण इज्जत? आपुलकी? आणि घर?”

ती स्वतःशी कुजबुजली—

“चूक केली…

फैसला घेताना मी फक्त दु:ख पाहिलं, पण परिणाम पाहिलेच नाही…”

तिला कळलं—

तुटलेल्या नात्यानंतर बाईला सर्वात जास्त आधाराची गरज असते,

पण समाज आधी तिला जज करतो.

आणि माहेर…

“माहेर आहे, पण अधिकार काहीच नाही.”

“माझं खरं घर मी माझ्या अहंकारानं सोडून आले…”

डोळ्यात पाणी आलं.

निर्णयाची किंमत आता समजत होती.

चार महिने पूर्ण झाले…

कवितेला रोज एकच प्रश्न सतावू लागला—

“मी काय गमावलं…?

फक्त राग आणि टोमण्यांमध्ये वाहून इतका मोठा निर्णय घेतला…?”

 

ती आकाशाकडे बघत बसायची…

निर्वाणच्या आठवणी मागून धावत यायच्या.

त्याच्या सवयी, छोटी भांडणं, आणि सर्वात जास्त—

त्याचं साथ देणं.

 

एका रात्री मन पूर्ण तुटलं.

तिनं फोन उचलला… नंबर लावला.

कॉल लागला—

“हॅलो?” — निर्वाण.

कविता थरथरत्या आवाजात—

“निर्वाण… आपण… आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का?

मला तुझी फार आठवण येते…

मला तुझ्यासोबत राहायचंय…”

दोन्ही बाजूला काही क्षण शांतता…

निर्वाण हळूच म्हणाला—

“मीही तुझ्याविना राहू शकत नाही…

 चूक दोघांची होती, सुधारायला दोघांनीच सोबत चालायचंय.

तू ‘हो’ म्हणालीस…

तर मी आत्ताच निघतो.”

कवितेच्या गालावरून आसवं वाहू लागली

“हो… मी तयार आहे.”

रात्रीचे 12 वाजले होते.

 

निर्वाण कार घेऊन निघाला.

थंडी, सुनसान रस्ता…

पण मनात एकच आवाज—

‘तिला परत घरी आणायचं आहे.’

सलग 5 तास ड्राइव्ह केलं.

ना थांबला, ना दमला.

सकाळी 5 वाजता

तो कवितेच्या माहेरच्या दारात उभा होता.

कविता बाहेर आली—

घाबरलेली, लाजलेली… पण दिलासा मिळालेला चेहरा.

आई–वडिलांनी दार उघडलं.

निर्वाणनं नम्रपणे प्रणाम केला.

कवितेने  बॅग उचलली.

ना बोलणं, ना वाद—

दोघांना कळलं, हा निर्णय मनातून घेतलेला आहे.

कार सुरू झाली…

आणि कविता परत तिच्या घराकडे—खऱ्या घराकडे—निघाली.

मित्रांनो…

नाती मोडत नाहीत.

फक्त कधी कधी त्यावरील धूळ हळूवार साफ करायची असतो.

योग्य वेळी घेतलेलं छोटंसं पाऊल—

संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं…

 

रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलण्याइतका योग्य असतो का?

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “धावा…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “धावा…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

“शकुनी थांबवला नाही… कारण कृष्णाचा धावाच झाला नाही. ”

— महाभारताचं सत्य आणि आयुष्याचा धडा

महाभारतात शकुनी हा फक्त एक व्यक्तिरेखा नव्हता…

तो बुद्धीचा चुकीचा वापर, सूड, धोका आणि अंतर्मनातील विष याचं प्रतीक होता.

त्याचा डाव, त्याची योजना, त्याची फसवणूक — हे सगळं चालत होतं; कारण कोणीही त्याला थांबवण्यासाठी धावा केला नव्हता.

प्रश्न नेहमी विचारला जातो:

श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते… मग शकुनीला थांबवलं का नाही?

उत्तर महाभारताच्या मूळ तत्त्वात आहे:

 देव हस्तक्षेप तेव्हाच करतात, जेव्हा तू धावा करतोस.

तू न बोलता देव तुझ्या कर्मात अडकत नाही.

द्रौपदीने धावा केला– म्हणून कृष्ण प्रकट झाले.

द्रौपदीने हात सोडले.

सारे मार्ग संपले.

मनातला अहंकार, “मी सांभाळेन”, “मी एकटी लढेन” – हे सर्व कोसळलं.

आणि जेव्हा तिने आतून हाक मारली —

“कृष्णा! ”

तेव्हा कृष्ण प्रकट झाले.

देहाने नव्हे, पण उपस्थितीने.

यातून महाभारत सांगतं:

धावा हा बाहेरचा आवाज नाही, तो आतला स्वीकार आहे — “मी एकटी/एकटा नाही. ”

पांडवांनी धावा केला नाही… म्हणून शकुनीचा डाव सुरू राहिला.

युधिष्ठिर जुगारात अडकत गेले,

भीम रागात अडकला,

अर्जुन गोंधळात,

नकुल–सहदेव शांततेत…

कोणी म्हणालं नाही —

“कृष्णा, आम्हाला थांबव. ”

श्रीकृष्ण सभेत होते.

सर्व जाणत होते.

शकुनी खोटं खेळतोय,

धृतराष्ट्र अंध आहे,

दुर्योधन चिडतोय —

हे कृष्णांना माहीत होतं.

पण देवाने हस्तक्षेप का केला नाही?

कारण —

जितका पापाचा डाव होता, त्याहून मोठं होतं माणसांचं मौन.

देव माणसाच्या स्वेच्छेमध्ये हस्तक्षेप करत नाहीत.

जोपर्यंत तू म्हणत नाहीस:

“कृष्णा, मला सांभाळ. ”

तोपर्यंत कृष्ण अधिकाराने येत नाहीत.

कृष्ण सर्वत्र होते… पण बोलावलं नाही, म्हणून हस्तक्षेप झाला नाही.

ही आयुष्याची सर्वांत मोठी शिकवण आहे:

 देवाला बोलावलं की देव येतो.

देवाला विसरलास की शकुनी जिंकतो.

इथे “देव” म्हणजे काय?

तुझं जागृत भान

तुझा विवेक

तुझी अंतर्ज्ञान

तुझी योग्यतेची जाणीव

तुझ्यातला प्रकाश

ज्या क्षणी तू त्याला बोलावतोस,

त्या क्षणी तुला बळ मिळतं —

निर्णयाचं, धैर्याचं, स्पष्टतेचं.

शिकवण — योग्य वेळी धावा करा

आयुष्यात कधी तुम्हाला कोणीतरी फसवतं,

कुठे चुकीचं ओढलं जातं,

कुठे शंका, भीती, गोंधळ येतो,

कुठे तर्क हरतो,

कुठे सत्य डोळ्यासमोर असूनही हात थरथरतात…

त्या क्षणी शकुनीची ऊर्जा काम करते.

तेव्हा महाभारत सांगतं:

“कृष्णाला बोलाव.

शकुनीचं जाळं कोसळेल. ”

धावा म्हणजे काय?

मनातला एक आतला surrendered क्षण:

“हे कृष्णा, मी इथं अडकले/अडलो आहे…

मला मार्ग दाखव. ”

आणि मग जे घडतं ते चमत्कारच असतं.

देव प्रकट कधी होतात?

 मन शांत झालं की.

अहंकार खाली आला की.

 सत्य स्वीकारलं की.

आतली हाक प्रामाणिक झाली की.

देव दाराबाहेर थांबलेले नसतात…

देव अंतर्मनातच बसलेले असतात.

फक्त तू बोललास की ते उठतात.

जीवनातील महान तत्त्व

महाभारत म्हणतं:

“जोपर्यंत तू देवाला आतून बोलवत नाहीस,

तोपर्यंत देव तुझ्या आयुष्यात प्रकट होत नाही. ”

आणि हेच सत्य प्रत्येक संकटात लागू आहे.

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ UPI चा संकटकाळ… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ UPI चा संकटकाळ… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

जिथे जाल तिथे QR कोड तुमचे बँक खाते रिकामं करण्यासाठी तयार असतो.

भाजीवाले, रिक्षावाले, पान टपऱ्या, आलिशान दुकानं — सगळे फक्त एका स्कॅनवर तुमच्या पैशांपासून दूर आहेत. कोणताही संकोच नाही, कोणतीही जाणीव नाही. फक्त दोन टॅप, आणि काम संपलं.

“पूर्वी असं नव्हतं…”

पैशांना वजन असायचं. तुम्ही ते हातात धरायचात. दहा रुपयांच्या नोटेचा स्पर्श, एखादी कुरकुरीत ₹५०० ची नोट खर्च करताना होणारी घालमेल. पाकीट उघडून खर्च करण्याआधी दोनदा विचार करायची ती क्रिया. तो ‘फ्रिक्शन’ म्हणजे शहाणपणा होता. तो तुम्हाला थोडा थांबवत होता, विचारायला लावत होता —  “खरंच याची गरज आहे का?”

“UPI ने तो फ्रिक्शन काढून टाकला.” आणि त्यासोबत आपल्या मेंदूमधील एक महत्त्वाचा भावनिक सर्किटही. वर्तनशास्त्रज्ञ याला “pain of paying” म्हणतात — “खर्च करताना होणारी ती हलकीशी मानसिक घालमेल, जी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवते. रोख रक्कम देताना ती होती. UPI ने ती गायब केली.”

हे सगळं मला गेल्या आठवड्यात समजलं, जेव्हा मी माझे मासिक खर्च तपासत होतो. आकडे पाहून अक्षरशः धक्का बसला.

फूड डिलिव्हरीवरचा खर्च दुप्पट झाला होता. यादृच्छिक व्यवहार, विसरलेली सदस्यता शुल्कं, अनियोजित खर्च — हे सगळं शांतपणे होत होतं, आणि मी निष्काळजीपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. सोयीने मला सुस्तावून टाकलं होतं. मी झोपेत चालणाऱ्यासारखा खर्च करत होतो.

बाबांनी नेहमीप्रमाणे आधीच सांगितलं होतं. ते अजूनही नोटा बाळगतात. महिन्यातून एक किंवा दोनदा रोख रक्कम काढतात. त्यांना वाटतं, त्यामुळे वास्तवाशी नातं टिकून राहतं.

 सुरुवातीला मी ते जुनाट म्हणून झटकून टाकलं. पण आता त्यांचं म्हणणं कळतं.

‘मर्यादेत एक शिस्त असते. स्पर्श करता येणाऱ्या पैशात स्पष्टता असते.’

“UPI च्या सुलभतेमुळे आपल्याला भास होतो की आपण सगळं परवडवू शकतो. पण तुम्ही पैसे जाताना पाहत नाही. पश्चात्तापही 9होत नाही.”

आणि खरं तर, पश्चात्ताप शत्रू नाही — तो एक प्रतिक्रिया आहे. एक आठवण आहे. त्याशिवाय खर्चाचं परिणामांशी नातं तुटतं.

आणि जेव्हा पैसा अनभिज्ञतेने खर्च होतो, तेव्हा जीवनसुद्धा दिशा हरवू लागतं.

सोय ही एका किमतीवर येते. आणि ती किंमत म्हणजे जाणीव.

कॅशलेस म्हणजे कायमच भान ठेवूनच होतो असं नाही.

एकदा हरवलेली जागरूकता पुन्हा मिळवणं महागडं असतं.

हा लेख तंत्रज्ञानाला दोष देण्यासाठी नाही.

हा केवळ आठवण करून देण्यासाठी आहे — की व्यवहाराची गती, विचाराच्या गतीपेक्षा जास्त वेगाने जाऊ नये.

UPI राहणारच आहे. पण तसाच विचार पण राहायला हवा. संयम राहायला हवा. आणि तो लहानसा आतला आवाज, जो पूर्वी कुजबुजायचा — पुन्हा विचार कर.

कारण खरी अडचण पाकिटात नाही, तर खर्च आणि जाणिवा यांच्यामधल्या त्या शांततेत आहे.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईचं आता वय झालंय… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आईचं आता वय झालंय… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आई,

ठाऊक आहे का तुला ?

 

चिक्‍कार वेळ बेल वाजवल्यावर

बंद दरवाजाआड तुझी

चाचपडत येणारी पावले

थकलेल्या आवाजात म्हणतात,

‘आले रे…’,

 

तेव्हा अपराधी जीव

श्‍वास रोखून पडतो भांड्यात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

खिडकीत बसून अंधाऱ्या उजेडात

सुईत दोरा ओवण्याचा तुझा वाढता

खटाटोप पाहून येतात कढ,

कातर कातर होत जाते मन

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

डाव्या कुशीवर कोपराच्या उशीवर

एकार्त झोपलेल्या तुझा,

मंद श्‍वासोच्छ्वास निरखताना,

किती धडधडते हृदयात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

‘‘काही झालेलं नाही रे मला,

तू झोप…होईन मी बरी!’’

असा तुझाच रुग्णाईत दिलासा

ऐकण्यासाठी ओठंगून उभ्या असलेल्या

माझ्या तथाकथित निरोगी मनाला

पडत जातात कित्येक घरे

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

तिन्हीसांज टळून गेल्यानंतर

खोलीतला दिवा न लावता

बाहेर टक लावून बघत बसतेस

अज्ञातात काहीतरी,

तेव्हा गलबलते ह्रदयात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

आजही ह्या वयात खरकटे तोंड पुसताना,

तुझ्या वृद्ध पदराचा घुरट वास

घेताना मी होत जातो लहान,

आठवते मज माझेच भूत…

खिडकीच्या गजांतून पाय काढून

तुझी चाकरमानी वाट पाहात

बसणारे माझे बालपण…आठवते

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

अजूनही आहे मनगटावर मौजूद

तू दिलेला कालथ्याचा डाग…

शेजारच्या डोंगरेकाकूकडे

आशाळभूत खाऊ मागितल्याची

शिक्षा म्हणून दिलेले ते

माझ्याच दुर्दम्य लोचटपणाचे प्रमाणपत्र

आताशा धुकट झाले आहे,

निबर कातडीवर, पण तरीही-

सहज जाते नजर त्या डागावर

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

दोस्तांबरोबर रंगवलेली बाटलीभर

मध्यरात्र उतरते क्षणार्धात

वास्तवाच्या विहिरीत

करकरणाऱ्या रहाटासारखी…

तुझ्या एकटेपणाची सावली

हालत राहाते रात्रदिव्याच्या

मंद उजेडात भिंतीवर…

तेव्हा, कोसळून पडतो मी पुन:पुन्हा

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

थकलेल्या देहाने वावरत असतेस

खोल्याखोल्यांतून, पुटपुटत असतेस

काहीतरी देव्हाऱ्याकडे पाहात

उसासून, तेव्हा

तुझ्या डोळ्यांत साकळलेले

संध्याकाळचे गडद रंग

किती उदास वाटतात

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

मटार निवडताना बोटांवर चढलेली

हिरवीजर्द जीजिविषु अळी

तुझ्या अंधुक डोळ्यांना होते दिसेनाशी,

हे पाहून हळवे व्हायला होते

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

‘‘मला मेलीला कशाला हव्यात

साड्या आणखी?’ असे म्हणत

जुन्या पैठणीवर फिरणारा तुझा

सुरकुतलेला जीर्णशीर्ण हात

पाहून थरथरते काळीज

दरवेळी, हे ठाऊक आहे तुला?

 

एखाद्या संध्याकाळी ‘‘येताना

पाच रुपयांची फुलं घेऊन ये रे,

‘त्याच्या’ बोडख्यावर घालायला!’’

असे त्राग्याने म्हणतेस, तेव्हा

उगवणाऱ्या उद्याचाही

वाटतो आधार

दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

 

थकलेल्या तुझा शरीराचा

कंटाळलेला वावर करतो उदास

सर्वंकष तरीही-

मनात येते की

प्राक्‍तनाचे गणित नाही जुळले,

पण तुझ्या पदराखाली झाकलेले

सुरक्षित बालपण दृढमूल आहे, अजूनही !

 

आई …

अजून तू मला हवी आहेस.

कवी:अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शांतपणाने केवळ अलिप्त व्हा!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे  ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “शांतपणाने केवळ अलिप्त व्हा!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

ताज्या फुलांचे आपल्याला कोण कौतुक असते. आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो.

फुले घेताना ती ‘माझी’ असतात. पण देवाला वाहिली की ‘त्याची’ होतात… किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त होतो… ‘ज्याचे होते त्याला दिले’… फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.

काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ मनाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो… त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही.

अगदी तसेच, आपली दु:खे ‘त्याच्या’ चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे…

त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही… आतापर्यंत जी ‘माझी’ दु:खे होती. ती आता ‘त्याची’ झाली. त्यांचा कसला विचार करायचा… आणि कालची दु:खे तर, आज निर्माल्य झाली. त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो.

शिळ्या फुलांप्रमाणे, मग ती सडायला लागतात. आणि मग मनाला पोखरायला लागतात… म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत, तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळे व्हायचे.

आज पेरण्यासाठी आपण आनंद आणूया. धान्याची पेरणी करताना, जशी जमिनीची मशागत करतात, तशी मनाची साफ-सफाई करूया आणि तिथे आनंद पेरूया. तो शतपटीने उगवून येतो. त्याची जोपासना करू. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच…

दु:ख सोडून द्यावे,… निर्माल्य बनून जाते.

आनंद पेरत जावा,… समाधान बनून राहते.

पारखून घेतले तर कोणीच आपले नसते. समजून घेतले तर कोणीच परके नसते.

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात.

दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares