त्या दिवशी पुण्यात जोरदार पाऊस पडत होता. अनिकेतला ऑफिसला जायला उशीर झाला होता. त्याने घाईघाईत एक रिक्षा थांबवली. रिक्षात एक ७०-७२ वर्षांचे आजोबा ड्रायव्हर होते. त्यांचे हातपाय वयामुळे थरथरत होते. डोळ्यावर जाड चष्मा होता.
अनिकेत चिडून म्हणाला, “काय ओ आजोबा? घरी बसत जा ना या वयात. चला, मला लवकर ‘हिंजवडी’ला सोडा. “
आजोबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी शांतपणे रिक्षा स्टार्ट केली.
रस्त्यात खड्डे होते. आजोबांची रिक्षा खूप हळू चालत होती. प्रत्येक खड्डा चुकवताना त्यांना वेळ लागत होता.
अनिकेतचा संयम सुटला. तो मागून ओरडला, “अहो, काय चालवलंय? बैलगाडी आहे का ही? जरा फास्ट घ्या ना! माझी मीटिंग आहे. “
आजोबांनी आरशातून एकदा अनिकेतकडे बघितलं. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते, पण पावसामुळे अनिकेतला ते दिसले नाहीत. ते म्हणाले, “साहेब, रस्ता खराब आहे. गाडी जुनी आहे, घसरली तर तुम्हाला लागेल. “
अनिकेतने तोंड वाकडं केलं, “बहाणे नका सांगू. म्हातारपण झालंय तुमचं. ” शेवटी ऑफिस आलं. मीटरवर १४० रुपये झाले होते.
अनिकेतने १५० रुपये दिले आणि म्हणाला, “ठेवा सुट्टे. उपकार समजा. “
आजोबांनी ते पैसे घेतले, पण ते पैसे खिशात ठेवण्याऐवजी, त्यांनी आपल्या सीटच्या खाली ठेवलेल्या एका ‘छोट्या टिफिन बॉक्स’ मध्ये ठेवले. आणि त्या डब्याला त्यांनी नमस्कार केला.
अनिकेतला कुतूहल वाटलं. तो रागाने निघणार होता, पण पाय अडखळला.
त्याने विचारलं, “त्या डब्यात काय देव आहे का? १० रुपयाला नमस्कार करताय? ” आजोबांनी तो डबा उघडला. त्या डब्यात अन्न नव्हतं.
त्यात ‘चिल्लर आणि नोटा’ होत्या आणि एक ‘फोटो’ होता.
तो फोटो एका १० वर्षांच्या गोड मुलीचा होता. तिने शाळेचा युनिफॉर्म घातला होता. आजोबा थरथरत्या आवाजात म्हणाले:
“साहेब, ही माझी नात आहे, ‘रिया’. माझा मुलगा आणि सून कोरोनात गेले. तेव्हापासून मीच सांभाळतो तिला. “
आज तिची ‘शाळेची फी’ भरण्याची शेवटची तारीख आहे. १५०० रुपये भरायचे आहेत. सकाळपासून १४०० रुपये जमले होते. १०-२० रुपयांसाठी मी लोकांच्या विनवण्या करत होतो.
आता तुम्ही दिलेले हे १५० रुपये मिळून माझे १५५० रुपये झाले.
“साहेब, मी म्हातारा आहे, हात थरथरतात… पण या हातांनी आज माझ्या नातीचं भविष्य सुरक्षित केलंय. तुम्ही ज्याला ‘उशीर’ म्हणत होतात ना… तो माझ्यासाठी ‘संघर्ष’ होता. कारण जर आज मी फास्ट गाडी चालवून अपघात केला असता, तर माझ्या नातीला अनाथ आश्रमात जावं लागलं असतं. “
हे ऐकून अनिकेत सुन्न झाला.
ज्या हातांना तो ‘कमकुवत’ आणि ‘म्हातारे’ समजत होता, ते हात जगातले सर्वात मजबूत हात होते, जे एका अनाथ मुलीचं भविष्य सावरत होते.
त्याला आपल्या मघाच्या वागण्याची, त्या १० रुपयांच्या उपकाराची आणि त्या टोमण्यांची प्रचंड लाज वाटली.
अनिकेतने आपली बॅग उघडली. त्यात ५००० रुपये कॅश होती.
त्याने ते सगळे पैसे काढले आणि आजोबांच्या त्या टिफिन बॉक्समध्ये ठेवले.
आजोबांनी हात जोडले, “नको साहेब, हे खूप आहेत. “
अनिकेत हळवा होऊन म्हणाला, “आजोबा, हे पैसे फीसाठी नाहीत. हे त्या ‘रिया’साठी आहेत. तिला सांगा, आज तिच्या आजोबांनी एका तरुणाला ‘माणुसकी’ शिकवली. तुम्ही आज घरी जा. ती तुमची वाट बघत असेल. “आजोबांनी अश्रू पुसले आणि रिक्षा वळवली.
अनिकेत ऑफिसच्या पायऱ्यांवर उभा राहून त्या जाणाऱ्या रिक्षाकडे बघत होता. आज त्याला समजलं होतं की, वेग हा गाडीचा नसतो, तर तो आयुष्याच्या परिस्थितीचा असतो.
कधीही कोणाच्या कामावरून किंवा वयावरून त्यांचा अपमान करू नका. प्रत्येकजण आपली लढाई लढत असतो. रिक्षावाला, भाजीवाला हे सुद्धा कोणाचे तरी ‘पालक’ असतात. त्यांचा आदर करा. तुमची १० मिनिटांची घाई त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठी नसते.
☆
कवी: अज्ञात
प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जेव्हा मित्रमैत्रिणी खूप वर्षांनी एकत्रित पुन्हा भेटतात ना, तेव्हा खूप आनंद होतो.
तारुण्यातील मैत्री व साठीतली मैत्री यात बराच फरक असतो.
तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो. कारण तेव्हा मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो…
मैत्री टिकली तर टिकली, नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असतं. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो आपण. पण जेव्हां साठीला पोहोचतो, तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो, ते कळत सुध्दा नाही…
जेव्हा साठीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात, तेव्हा सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलंसं वाटत असतं की, ती मैत्री खूप खूप हवी हवीशी वाटत असते.
नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल, तर सर्व गोष्टी पडद्याआड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा – गोष्टी करतो. आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतं. आपल्याला समजावून घेतो, सुखादु:खात सहभागी होतं व चुकलं तर बोलतं व माफही करतं. असे मिळालेले मित्र म्हणजे ‘नवरत्ना’तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटलं तर वावगे ठरणार नाही.
आपण कोणाचे कोणीच नसतो, पण आपले मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात. म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रूपात ही नक्कीच होते.
आत्ता आयुष्याची साठी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे, तेव्हा या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात, त्यांना भेटूया….
कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठपर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे…
ते स्टेशन आलं की उतरावंच लागते…
म्हणून जोपर्यंत आपला प्रवास चालू आहे, तोपर्यंत त्या प्रवासात मनातल्या तक्रारींना बाजूला काढून टाकू या.
माहीत नाही, परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू?
म्हणून मैत्रीची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!
पण अशी मैत्री समजून घेणारे फार कमी असतात.
ज्यांना खरे निःस्वार्थी मित्र लाभले ना, ते खरेखुरे भाग्यवानच!
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भक्तीचा उद्गार– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
☆
सुधीर गाडगीळ यांनी सांगितलेला हा प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी आहे.
ते सांगतात—पुण्यातील मंडईत संतवाणीचा कार्यक्रम संपत आला होता. शेवटचा अभंग झाला होता. पेटी, तबला आवरले जात होते. कलाकार उठू लागले होते. भीमसेन जोशीही शांतपणे उभे राहून स्टेजवरून उतरण्याच्या तयारीत होते. सभागृहात ‘कार्यक्रम संपला’ अशीच भावना होती.
तेवढ्यात, प्रेक्षकांमधून एक हमाल पुढे आला. साधा, घामेजलेला, काम करून आलेला. हात जोडून, थोड्या संकोचाने तो म्हणाला—
“जोशीबुवा… ‘तीर्थ विठ्ठल’ म्हणाल का? ”
क्षणभर सगळे थांबले. कार्यक्रम संपलाच होता. साथीदारांनी वाद्यं आवरली होती. अशा वेळी अभंग म्हणणं म्हणजे पुन्हा सगळं उलगडणं. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.
पण भीमसेन जोशी थांबले. त्यांनी त्या हमालाकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आग्रह नव्हता, हट्ट नव्हता—फक्त भक्ती होती. जोशीबुवांनी क्षणाचाही विचार न करता मागे वळून म्हटलं, “अहो, पेटी-तबला ठेवू नका… तीर्थ विठ्ठल म्हणूया. ”
सगळे स्तब्ध झाले.
पुन्हा पेटी उघडली गेली. तबल्यावर हात बसला. आणि मग भीमसेन जोशींनी
“तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…”
सुरू केलं.
सुधीर गाडगीळ सांगतात—तो अभंग मैफिलीचा भाग नव्हता; तो करुणेचा, माणुसकीचा आणि भक्तीचा उद्गार होता. आवाजात विलक्षण आर्तता होती. जणू त्या हमालाच्या आयुष्याचं ओझं त्या स्वरांत उतरलं होतं. हमाल रडत उभा होता. प्रेक्षक नुसते ऐकत नव्हते—ते अनुभवत होते.
अभंग संपल्यावर टाळ्या नव्हत्या. फक्त गहिरं मौन होतं.
गाडगीळ शेवटी म्हणतात—
“त्या दिवशी कळलं, भीमसेन जोशी हे मोठे गायक होतेच; पण त्याहून मोठं होतं त्यांचं मन. कार्यक्रम संपला होता, पण भक्ती संपलेली नव्हती—आणि जोशीबुवांनी ती ओळखली.”
हा प्रसंग, संतवाणी म्हणजे नेमकं काय, हे कायमचं समजावून जातो.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘कुब्जा’ हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ती मथुरेतील कंसाची दासी. कुरुप, कुबड असलेली एक वृद्धा. कंसासाठी ती चंदन घेऊन जात असते. वाटेत कृष्ण भेटतो. म्हणतो, ‘सुंदरी, मला देशील चंदन? ’
कुणी तरी तिला प्रथमच ‘सुंदरी’ म्हणाले होते. तिने कृष्णाला चंदनाचा लेप लावला. कृष्ण कुणाकडून तसेच काही कसे घेईल? त्याने कुब्जेच्या हनुवटीला धरून ती वर उचलली आणि कुब्जा खरेच सुंदर झाली.
भक्तांना हे सहजच पटते. चिकित्सकांना ही निव्वळ कल्पित कहाणी वाटते. मला या कथेतून वेगळाच आनंद मिळतो.
कुणी असुंदर असेल तर मान उंचावून कसे वावरेल? त्यात दासी असल्याने तिला ‘तोंड वर करायचा’ अधिकार तरी कसा असेल? कृष्णाने कुब्जेची हनुवटी उंचावली. तिला ताठ व्हायला शिकवले. कुरूप असो की दासी असो; मान वर करूनच जगले पाहिजे, हे भान कृष्णाने तिला दिले.
‘दिसण्या-असण्यातून’ न्यूनगंड निर्माण होऊ न देता आपणही दिमाखात जगू शकतो, हे दाखवण्याची संधी ईश्वराने किती विश्वासाने आपल्याला दिली आहे. कुब्जा सुंदर झाली की नाही हे मला ठाऊक नाही; पण तिच्या मनातली असुंदरतेची जाणीव कृष्णाने दूर केली, असे मला वाटते.
इकडे विठुरायानेही कंबरेवर हात ठेवून, थाटात उभे राहत हे दाखवून दिले की, सौंदर्य नाही तर औदार्य महत्त्वाचे. सौंदर्य येते आणि वयोमानाने ओसरतेही.
औदार्य अठ्ठावीस युगे टवटवीतच राहते.
खूपदा भक्ती करणारेही जेव्हा म्हणतात की, देवा-धर्माचे इतके आम्ही करतो; पण ईश्वराची कृपा काही होत नाही.
पण, पारमार्थिक साधना म्हणजे जग बदलणे नाही, तर आपला दृष्टिकोन बदलणे. हे समजले की आपल्या वृत्तीच्या कुब्जेला सुंदर व्हायला वेळच लागत नाही.
रखरखत्या उन्हात कुठून कोकीळ कुजन ऐकू आले की मनाला निवलेपण जाणवते ना?
पहिल्या पावसाने आसमंतभर दरवळणाऱ्या मातीच्या गंधाने चित्ताला हरखून जायला होते की नाही?
तान्हे मूल कुणाचेही असो; गर्दी-गोंधळातही आपल्याकडे बघून गोड हसते, तेव्हा आपल्याही ओठांवर स्मितरेषा दरवळते की नाही?
आपल्याबाबत हे घडते तेव्हा निश्चित मानावे की आपल्याला कृष्णस्पर्श झाला आहे.
अंतरीची ही निरपेक्ष संवेदनशीलता हाच कृष्णाचा साक्षात्कार.
मनातली असुंदरतेची, अपूर्णतेची जाणीव संपली की सारे सुंदरच आहे. हे जाणवते.
माझ्या कृष्णाने निर्माण केलेले काहीही असुंदर असूच शकत नाही, ही श्रद्धा दृढ असली की झाले!
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी` |
कर कटिवरी ठेवूनीया ||
लेखक:अज्ञात
प्रस्तुती:सौ.राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘तंत्रज्ञानाचा असाही उपयोग…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
अक्षय हा एक आयटी इंजिनिअर. पुण्याच्या हिंजवडी भागात राहायचा. त्याचा स्वभाव असा होता की, कुठेही अन्याय झाला की त्याला राग यायचा.
अक्षयच्या ऑफिसच्या खाली एक म्हातारी आजी, ‘सकुबाई’, भाजी विकायला बसायच्या. त्यांचं वय ७० च्या घरात होतं, पण तरीही त्या ताजी भाजी विकायच्या.
अक्षय नेहमी त्यांच्याकडून भाजी घ्यायचा. पण त्याला एक गोष्ट खटकायची.
जेव्हा कधी अक्षय पेमेंट करायला फोन काढायचा, तेव्हा आजी गळ्यात लटकवलेला एक ‘QR Code’ पुढे करायच्या.
अक्षयने स्कॅन केल्यावर त्यावर नाव यायचं – “जीवन हॉस्पिटल ट्रस्ट”.
अक्षयला शंका यायची. ‘एखाद्या भाजीवालीच्या खात्याचं नाव हॉस्पिटलच्या नावाने कसं असू शकतं? ‘
त्याला वाटलं, नक्कीच एखादा दलाल किंवा एजंट या आजीला फसवतोय. तिच्या कमाईचे पैसे परस्पर हॉस्पिटल किंवा ट्रस्टच्या नावाखाली लाटतोय आणि या अडाणी म्हातारीला काहीच समजत नाहीये.
एका संध्याकाळी अक्षयला राहवलं नाही. त्याने भाजी घेतली आणि स्कॅन करताना पुन्हा तेच नाव आलं.
अक्षय चिडला. तो आजींना म्हणाला, “आजी, तुम्हाला समजतं का? हा कोड तुमचा नाहीये. तुमचे पैसे कोणा दुसऱ्यालाच जातायत. कोण आहे हा एजंट? का त्याला पैसे देताय? “
सकुबाई घाबरल्या. त्या म्हणाल्या, “नाही बाळा… एजंट नाहीये कोणी. तू पेमेंट कर ना बाबा. “
अक्षय म्हणाला, “नाही, मी करणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला खरं सांगत नाही, की हा ‘घोटाळा’ काय आहे, तोपर्यंत मी तुम्हाला एक रुपया देणार नाही. आणि उद्या पोलिसात तक्रार करेन की एक म्हातारी फसवली जातेय. “
‘पोलीस’ शब्द ऐकताच सकुबाईंच्या हातातली भाजी खाली पडली. त्या रडू लागल्या.
त्या म्हणाल्या, “नको रे बाबा… पोलिसात नको जाऊस. सांगते तुला खरं. “
सकुबाईंनी पदराने डोळे पुसले आणि म्हणाल्या,
“बाळा, हा कोड माझा नाही, आणि पैसे मला मिळतही नाहीत. हा कोड समोरच्या ‘जीवन हॉस्पिटल’ च्या अकाउंटचा आहे. “
अक्षय गोंधळला. “पण का? तुम्ही दिवसभर उन्हात बसून कष्ट करता, आणि पैसे हॉस्पिटलला का? “
सकुबाई म्हणाल्या, “माझा ६ वर्षांचा नातू आहे, ‘मनू’. त्याचे आई-बाप कोरोनात वारले. तेव्हापासून तो माझ्याच जवळ आहे.
सहा महिन्यांपूर्वी त्याचे दोन्ही किडनी निकामी (Kidney Fail) झाल्या. त्याला आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागतं.
माझ्याकडे पैसे नाहीत रे बाळा. मी डॉक्टरांच्या पाया पडले.
तेव्हा तिथल्या एका चांगल्या डॉक्टरने सांगितलं की, ‘आजी, उपचाराचा खर्च ट्रस्ट करेल, पण औषधांचा खर्च तुला करावा लागेल. ‘
त्यांनीच मला हा बोर्ड बनवून दिला. मी गिऱ्हाईकाला सांगते की यावर पैसे टाका. जेवढे पैसे या कोडवर जमा होतात, ते थेट हॉस्पिटलला जातात आणि त्यातून माझ्या नातवाची औषधं येतात.
माझं काय रे? मी दिवसभर एक वडापाव खाऊन जगू शकते. पण जर मी रोख पैसे घेतले, तर कदाचित मला भुकेचा मोह होईल आणि मी ते पैसे खाण्यावर खर्च करेन. म्हणून मी ठरवलंय… हातात पैसा घ्यायचाच नाही. जे येईल ते थेट नातवाच्या जिवासाठी जाईल. “
हे ऐकून अक्षय सुन्न झाला.
त्याला वाटत होतं की आजी फसवल्या जात आहेत, पण इथे तर त्या एखाद्या ‘योद्ध्यासारख्या’ लढत होत्या. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन, पैशाला स्पर्शही न करता त्या फक्त एका QR कोडच्या भरवशावर नातवाचा जीव वाचवत होत्या.
अक्षयने शांतपणे आपला फोन खिशात ठेवला.
त्याने आजींना विचारलं, “आजी, नातवाचं पूर्ण ऑपरेशन करायला किती खर्च येईल? “
आजी म्हणाल्या, “डॉक्टर म्हणालेत ५ लाख लागतील. आतापर्यंत १० हजार जमा झालेत. मरेपर्यंत जमवेन, पण नातवाला वाचवेन. “
अक्षयने त्याच क्षणी आपल्या ऑफिसच्या ग्रुपवर आणि मित्रांना हा प्रसंग मेसेज केला. आजींचा फोटो आणि तो QR कोड व्हायरल केला.
पुढच्या २४ तासांत, त्या QR कोडवर ५ लाख नाही, तर १५ लाख रुपये जमा झाले.
दुसऱ्या दिवशी अक्षय जेव्हा भाजी घ्यायला गेला, तेव्हा आजी तिथे नव्हत्या.
त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मनूच्या ऑपरेशनची तयारी चालू होती. अक्षय तिथे गेला. त्याला बघताच सकुबाईंनी त्याचे पाय धरले.
“बाळा, तू देवदूत बनून आलास. आज माझ्या नातवाला नवीन आयुष्य मिळालं. “
अक्षयने आजींना उठवलं आणि म्हणाला, “आजी, देवदूत मी नाही, तुम्ही आहात. ज्यांनी शिकवलं की, तंत्रज्ञान (Technology) फक्त चॅटिंगसाठी नाही, तर कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी सुद्धा वापरता येतं. “
आपण अनेकदा समोरच्या गोष्टी बघून चुकीचे अंदाज (Judge) लावतो. पण त्यामागे एक मोठं सत्य असू शकतं. तंत्रज्ञानाचा वापर जर चांगल्या मनाने केला, तर एका क्लिकवर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. मदत करायला खिसा नाही, मन श्रीमंत असावं लागतं.
*
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈