मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 28 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 28 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

४२.

फक्त तू आणि मी

असे दोघेच एका नावेत बसून

पर्यटनाला जायचे म्हणाला होतास.

 

ही आपली यात्रा कोणत्या देशाला जाणार,

केव्हा संपणार हे कोणालाच माहीत नाही.

 

किनारा नसलेल्या त्या महासागरात

तू शांतपणे स्मितहास्य करत असताना

लाटांसारखी माझी गीतं

 नि:शब्दपणे स्वरमय होतील.

 

ती निघायची वेळ अजून आली नाही का?

कामं अजून पूर्ण व्हायची आहेत का?

 

बघ! किनाऱ्यावर सांज उतरली आहे,

तिच्या संधिप्रकाशात समुद्रपक्षी

आपापल्या घरट्याकडं परत फिरताहेत.

 

साखळदंड केव्हा सुटतील आणि

सूर्याच्या सायंकालीन अखेरच्या किरणांप्रमाणं

रात्रीच्या काळोखात नाव अंधारात विरून जाईल?

 

४३.

त्या दिवशी तुझ्या आगमनासाठी मी तयार झालो नव्हतो.

तू न सांगताच ऱ्हदयप्रवेश केलास,

इतर साध्या माणसाप्रमाणं!

आणि हे राजेश्वरा, तू येऊन माझ्या आयुष्यातल्या

क्षणिकतेवर चिरंतनपणाची मुद्रा उमटविलीस!

 

आज सहजपणे माझी नजर त्या क्षणावर वळते

आणि तुझी मुद्रा मला दिसते तेव्हा

सुखदुःखाच्या क्षणिक दिवसांप्रमाणं

ती विस्मरणाच्या धुळीत गेल्याचं समजतं.

 

धुळीतल्या माझ्या पोरकट खेळाकडं तू तिरस्कारानं पाहिलं नाहीस.

तारका – तारकांच्या मधून वाजणारी

तुझी पावलं च् माझ्या भोवतालातून

मला ऐकू येत होती.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सत्य… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सत्य… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

कालिदासांना ही जाणीव झाली होती की ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं की जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवर पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, “ माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल.” वृद्ध स्त्री म्हणाली, “ बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते.” 

 मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली—

कालिदास म्हणाले “ मी प्रवासी आहे. “

वृद्ध स्त्री म्हणाली, “  प्रवासी तर फक्त दोनच आहेत– एक चंद्र आणि दुसरा सूर्य– जे दिवस रात्र चालतच असतात.” 

कालिदास म्हणाले, “ मी अतिथी आहे. पाणी मिळेल ?”

वृद्ध स्त्री म्हणाली, “ अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत– एक धन आणि दुसरं तारुण्य– ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?” 

कालिदास म्हणाले, “ मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ? “

वृद्ध स्त्री म्हणाली, “ अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत ! एक धरती आणि दुसरं झाडं–धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगड मारला तरी ती मधुर फळच देतात.” 

कालिदास आता हतबल झाले. आणि ते म्हणाले “ मी हट्टी आहे.”  

वृद्ध स्त्री म्हणाली, “  नाही तू हट्टी कसा असशील ?  हट्टी तर फक्त दोनच आहेत– एक नख आणि दुसरे केस– कितीही कापले तरी परत वाढतातच. “

कालिदास आता कंटाळले,आणि म्हणाले, “ मी मूर्ख आहे.”

वृद्ध स्त्री म्हणाली, “ मूर्ख तर फक्त दोनच आहेत– एक राजा, ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो,  आणि दुसरा दरबारातील पंडित, जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.”  

कालिदास आता काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवणी करू लागले. 

वृद्ध स्त्री म्हणाली, “ ऊठ बाळा,”- आवाज एकून कालिदासांनी वर पाहिलं, तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक झाले. 

सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, “ शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते.” कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले. 

तात्पर्य: विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका. 

          ८४ लाख जीवांमध्ये फक्त  माणूस पैसे कमावतो. पण इतर कुठलाच जीव उपाशी रहात नाही….  

          आणि माणूस—पॆसे कमवूनसुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही !

संग्राहक – अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शिल्लक… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ शिल्लक… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

ओंजळीत मी पाणी धरले. हाताला त्याचा गार स्पर्श छान वाटला. पण थोड्या वेळात पाणी आपणहून हळूहळू गळून गेले. मी खूप प्रयत्न केला त्याला सांभाळून धरण्याचा. नाही राहीले ते ओंजळीत ! पण हात मात्र ओले राहीले. 

ओंजळीत फुले घेतली. त्यांचा तो मऊ मुलायम अलवार स्पर्श मनाला खूप आल्हाददायक वाटला .त्यांच्या सुगंधाने मन वेडावले. पण फुले कोमेजायला लागली. म्हणून ओंजळीतून त्यांना सोडून दिले. हाताला मात्र ती सुगंधित करुन गेली . क्षणभराच्या सहवासाने सुवासाची लयलूट झाली . 

ओंजळीत मी मोती धरले. त्यांचा मऊ मुलायम पण थोडा टणक स्पर्श मनाला जाणवला. त्यांच्याकडे नुसत्या पाहाण्यानेही मनाला आनंदाचे , समाधानाचे सुख मिळाले, ते माझ्या ओंजळीत मी धरले. ते  तसेच राहिले. त्यांच्या पांढर्‍या सौंदर्याने मन मात्र शांतशांत झाले . माझी मलाच ” मी धनवान असल्याची ” भावना मनात आली .

कुठे तरी मी मनात ह्या ‘ तीन सुखांची ‘ तुलना करु लागले. आनंदाचे, समाधानाचे माप लावून मापू लागले. तेव्हा ते ठरविणे खूप कठीण वाटले. कारण, ओंजळीतून प्रत्येकवेळी मनात बरेच काही शिल्लक राहिले .

माझ्या मनाने आता ह्यात माणसे शोधायला सुरुवात केली . तेव्हा खरंच खूप व्यक्ती तिथे मला तशाच दिसल्या .

काही आपल्याजवळ येऊनही पाण्यासारख्या पटकन गळून गेलेल्या, पण मनात आपुलकीचा ओलावा काठोकाठ भरून ठेवलेल्या—-

काही फुलासारख्या, आपण हातात धरले, म्हणून कोमेजून जाणाऱ्या , पण तरीही माघारी सुगंध ठेवणार्‍या—

काही अगदी जवळच्या– मोत्या सारख्या. आपण ठेऊ तशाच राहणार्‍या, आपले जीवन मौल्यवान करणार्‍या— 

खूप चेहेरे आठवले मला , आणि नकळत माझ्या चेहर्‍यावर हास्य उमटले.

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बघा… जमतंय का ?… अज्ञात☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ बघा… जमतंय का ?… अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

“भाजीत चिमूटभर साखर घाल गं, म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते” — स्वयंपाक करताना आजी म्हणायची.  भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते. 

 मला नवल वाटतं आजीवर्गाचं. त्यांना बरोबर माहित असायचं – कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते. 

पूर्वी घरोघरी कर्ता पुरुष म्हणजे करारी, थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा. कुणाचं कशावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी ,” हो हो बरोबर आहे तुमचं ”  म्हणून होणारा वाद टाळायची. नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची. 

‘चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो ‘ असं ती म्हणायची .

घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही ,कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही. सावकाशीने समजावून सांगायचे ज्यावेळेस ते समजून घेईल. चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो असं आई पण म्हणायची. म्हणूनच  त्यांचे संसार विना कलह झाले कामवाल्या बाई बाबतही असंच – तिने कधी दांडी मारली, कधी उशीरा आली, तरी ती पण एक संसारी बाई आहे, आपल्यापेक्षा  तिला आव्हानं असतात जास्त. मग अशावेळेस “का गं आज उशीर झाला ? बरी आहेस ना ? काळजी घे गं बाई– चल दोन घास खाऊन घे“ असं म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहील. 

थोडी माणूसकी खूप मोठं काम करते. थोडा विश्वास ,थोडं प्रेम ,थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात —- आजी नेहमी म्हणायची “ आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण. एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं. “

आताची सतत अरे ला कारे करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत असं वाटतं.

ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते. 

थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमुटभर आनंदाची नक्कीच भर घालू  शकतो.

ले.: अज्ञात 

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 27 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 27 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

७.

5     वाचताना वेचलेले:

भावार्थ गीतांजली…. प्रेमा माधव कुलकर्णी

गीतांजली भावार्थ

 

४१.

तुझे अस्तित्व नाकारून ते तुला धुडकावतात,

धूळभरल्या पथावरून तुझ्या बाजूने जातात,

पूजासाहित्य पसरून

मी किती वेळ तुझी वाट पाहतोय.

येणारा – जाणारा माझी फुलं घेऊन जातो.

माझी फुलांची दुरडी बहुधा रिकामी झाली.

 

सकाळ गेली, दुपार गेली,

सायंसमयी झोपेनं माझे डोळे

आता जड होऊ लागलेत.

घराकडे परतणारे माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकतात,

मला हसतात. मी शरमते.

माझा पदर चेहऱ्यावर ओढून मी भिकारणीप्रमाणं बसते.

ते मला प्रश्न विचारतात,

“काय पाहिजे?”

तेव्हा मी नजर वळते.

त्यांना काय सांगू?

 

माझ्या सख्या,या सर्वांमागे सावलीत

तू कुठे आहेस?

त्यांना काय सांगू? ‘येणार’ असं मला आश्वासन दिलंस आणि मी तुझी वाट पाहतेय.

हुंड्यासाठी हे दारिद्र्य मी जपलंय असं कसं सांगू?

ते मनातच मी ठेवलंय, बंदिस्त केलंय.

 

या गवतावर बसून आकाशाकडे

टक लावून पाहत राहते.

सर्वत्र प्रकाश भरून राहिलाय.

तुझ्या रथावर सोनेरी पताका फडफडताहेत.

आ वासून रस्त्याच्या कडेला थांबून

ते सगळेजण पाहताहेत. . . .

आणि तू येत आहेस.

 

तू रथातून उतरून येशील. वासंतिक वाऱ्यानं

थरथरणाऱ्या पाण्याप्रमाणं फाटक्या कपड्यातील ही भिकारी मुलगी धुळीतून उचलून तुझ्या शेजारी

बसवून घेशील.

 हे ते अवाक होऊन पहात राहतील.

 

वेळ सरकत राहतो, पण तुझ्या रथाच्या चाकांचा आवाज नाही!

विजयाच्या घोषणा देत,

गोंगाट करीत किती मिरवणुका गेल्या.

या सर्वांच्या मागे तूच होतास का?

 

निरर्थक इच्छा करीत उरस्फोट करीत,

तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ती मीच का?

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ सुस्वागतम् की स्वागतम् ? – लेखक – श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ सुस्वागतम् की स्वागतम् ?  – लेखक – श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

हा अनुभव बारामतीतच नाट्यसंमेलनाच्या वेळी आला. त्या नाट्यसंमेलनाचा एक भाग म्हणून विद्याधर गोखल्यांच्या हस्ते कवी मोरोपंतांच्या प्रतिमेचे पूजन आयोजित केले होते. ठरलेल्या वेळी गोखले, जब्बार पटेल वगैरे प्रतिमा पूजनासाठी सिद्धेश्वर मंदिरामागच्या मोरोपंत स्मारकाच्या जागेत आले. त्या वेळी तो जुना वाडा होता. मोरोपंतांच्या खोलीची नि बाहेरची सजावट करण्याचे काम माझ्याकडे दिले गेले होते. मी बाहेर पताका वगैरे लावून रांगोळीने ‘सुस्वागतम्’ असा शब्द लिहून ठेवला होता. 

गोखल्यांनी प्रतिमेचे पूजन केले. नंतर त्यांना ‘चार शब्द’ बोलण्याची विनंती केली गेली. गोखल्यांनी कवी मोरोपंतांबद्दल, स्मारकाच्या व्यवस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. पण त्यानंतर मात्र ” रांगोळी छान काढली आहे, पण मराठीच्या शुद्धलेखनाची किमान मोरोपंतांच्या बारामतीत तरी हेळसांड होऊ नये “, असे शब्द ऐकवले.

रांगोळीत “सुस्वागतम्” हा एकच शब्द होता. त्यात काय चुकले हे मला कळेना. शिवाय गोखल्यांनी ‘चार शब्द’ बोलताना जाहीरपणे हे सांगितल्याने काहीशी अपमानकारक स्थिती झाली होती. शेवटी त्यांनीच खुलासा केला. 

“सुस्वागतम् “या शब्दाचे मूळ ‘ग’ या संस्कृतमधील धातूमध्ये आहे. त्याला व्याकरणाच्या नियमानुसार ‘तम्’ हा प्रत्यय लागून गतम् असा शब्द बनतो. गतम् शब्दाला ‘आ’ हा उपसर्ग लागून ‘आगतम्’ असा शब्द बनतो. त्या आगतम् शब्दाला ‘सु’ हा आणखी एक उपसर्ग लागून तो शब्द ‘स्वागतम्’ असा बनतो. एकदा ‘सु’ हा उपसर्ग लावल्यावर पुन्हा ‘सु’ लावून “सु सु” का करता? ” असे त्यांनी बोलून दाखवले.

त्या वेळी सगळ्यांच्या समोर चूक काढल्यामुळे गोखल्यांचा मनातून राग आला होता. पण पुढे त्यातूनच व्याकरणाचा अभ्यास कमी पडतो आहे, हे जाणवले. माझ्या शुद्धलेखनाबद्दल नि मराठीच्या भाषिक प्रभुत्वाबद्दल कौतुकाचे शब्द अनेक वेळा ऐकायला मिळतात. त्याचे श्रेय कै. गोखल्यांचे आहे. त्यांच्यामुळेच मराठी, संस्कृत व्याकरणाचा अभ्यास नि गुजराथी, कानडी, बंगाली, उर्दू वगैरे लिपी शिकाव्या वाटल्या.  नाट्यसंमेलनाच्या वेळच्या या घटनेला आता निदान २५ वर्षे तरी झाली असतील. पण अजूनही व्याकरणाचा अभ्यास करावा वाटतो. हे सगळे गोखल्यांमुळे घडले. 

लेखक – श्री अनिल कुमकर

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सख्खं म्हणजे काय? ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सख्खं म्हणजे काय? ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆ 

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी

नेमकं काय असतं हे “सख्ख प्रकरण?” 

 

सख्खा म्हणजे आपला सखा.

सखा म्हणजे जवळचा

जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो.

त्याला आपलं म्हणावं,

 त्याला सख्ख म्हणावं !

 

सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्य नसते- पथ्य असते.

 

ज्याच्याजवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर 

आपलं स्वागत होणारच असतं 

आपल्याला पाहून त्याला हसू

येणारच असतं

अपमानाची तर गोष्टच नसते 

फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर 

विठ्ठल म्हणतो का …..

या या फार बरं झालं !

माहूरवरून रेणुका मातेचा 

किंवा कोल्हापूरवरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरीबालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून !

मग आपण का जातो ?

कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ….म्हणून !

हाही एक प्रकारचा” आपलेपणाच !”

 

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? किंवा आपण नेलेले तो काय घेतो?

काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, 

किती रोड झालीस ? कशी आहेस ? 

सुकलेला दिसतोस, काय झालं? —

नाही म्हणत.

 

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं?

पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास म्हणजेच “आपलेपणा !”

 

हा आपलेपणा काय असतो ?—

 

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ

भेटल्यानंतर बोलण्याची ओढ 

बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ

निरोप घेण्याआधीच पुन्हा भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं  त्याला आपलं म्हणावं 

मग ते नातं चुलत, मावस असलं तरी सख्ख म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे …..

म्हणजे ” आपलेपणा! “

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पाहिल्या डोळे भरून येतात

आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात, 

तो आपला असतो , 

” तो सख्खा असतो !”

 

लक्षात ठेवा,

ज्याला दुसऱ्या साठी ” सख्ख ” होता येतं त्यालाच कुणीतरी सख्ख असतं, 

बाकी फक्त परिचितांची यादी असते —-नको असलेल्या माणसांची गर्दी असते !

 

तुम्हीच सांगा…..

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?

ज्याला तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का? 

 

आता एक काम करा —–

 

करा यादी तुम्हाला असणाऱ्या

सख्ख्या नातेवाईकांची 

झालं न धस्सकन 

होतयं न धडधड 

नको वाटतंय न यादी करायला ….

 

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी 

आणि मानायला लागा सर्वांना आपलं—– कोणी कितीही झिडकारलं तरी—-

 

कारण …रागराग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही 

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं..

 

संग्राहिका : सुश्री मानसी आपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तो निसर्गच असतो… व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ तो निसर्गच असतो… व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

शिक्षणानं सगळी उत्तरं मिळत नाहीत. मेंदूतल्या आळसावलेल्या पेशींना शिक्षण फक्त जाग आणतं. वस्तू, माणसं, आकडे, इतिहास ह्यांची कोठारं म्हणजे मेंदू. स्मरणशक्ती, स्मृती ह्यांचं प्रचंड गोडाऊन म्हणजे मेंदू. किडलेलं धान्य, विचार, आठवणी फेकून देण्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय शिक्षणाचं ज्ञानात रूपांतर होत नाही. शिक्षण म्हणजे पोपटाचा पिंजरा. ज्ञान म्हणजे राजहंस. नीर-क्षीर भेद समजल्याशिवाय अनावश्यक माहितीनं बेजार झालेला मेंदू टवटवीत राहणार नाही. नव्या शुद्ध विचारांसाठी त्या करोडो पेशी रिकाम्या हव्यात आणि भक्तीसाठी मनाचे, कमळाच्या पानाचे द्रोण निर्लेप हवेत. अशा रिकाम्या जागी जो उतरतो तो निसर्गच असतो.

वपु काळे. ~’ तू भ्रमत आहासी वाया..’ 

संग्राहिका : मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वय असतं का पावसाला? ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वय असतं का पावसाला?☔ ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

हो असतं की…….

मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.

वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत चालताना पाऊस चार वर्षाचा असतो..

शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करताना पाऊस बारा वर्षाचा असतो..

ट्रेकिंग करताना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस टीन एज ओलांडत असतो..

तिला पाऊस आवडतो, रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना अपरिहार्यपणे पाऊस गद्धे पंचविशीत असतो.

भिजायला नको वाटायला लागलं की पन्नाशी येते पावसाची..

गुडघे दुखू लागले की साठीशांत होते पावसाची..

नंतर नंतर पाऊस  मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात ,आणि नातवंडांना ओरडतो पण, की अरे भिजू नका रे पावसात..

आपल्यासोबत बदलत जाणारी पावसाची रूपं पाहिली की मनात येतं…

 

किती पहावा पाऊस

धुके चष्म्यात दाटले

किती गेले पावसाळे

थोडे डोळ्यात उरले..

 

वय पावसाला नाही

वय मला भिववीते

अशा सर्दाळ हवेत

संधी वाताला मिळते. 

 

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 26 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 26 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

३७.

प्रवास संपत आला असं वाटलं होतं,

माझ्या शक्तीची मर्यादा गाठली असं वाटलं होतं,

माझ्या समोरचा मार्ग संपलाय असं वाटलं होतं,

शिदोरी संपलीय आणि शांत विजनवासात आसरा घ्यावा असं वाटलं होतं. . . .

 

आता वाटतंय तुझ्या माझ्यावरील मर्जीला

अजून शेवट नाही.

जुने- पुराणे शब्द तोंडातून

बाहेर पडायचे थांबतात,

तेव्हा  ऱ्हदयातून नवी धून निघते,

जुने मार्ग नजरेआड होतात,

तेव्हा आश्चर्ययुक्त  नवा प्रदेश दिसू लागतो.

 

३८.

‘तू मला हवास, तू मला हवास. . . . . ‘

असंच सतत माझं काळीज

चिरंतनपणे घोकीत राहो.

तुझं अस्तित्व विसरायला लावणाऱ्या

सर्व वासना मिथ्या, पोकळ आहेत

 

रात्रीच्या अंधारात

प्रकाशाची विनवणी दडलेली असते.

तसाच तू हवास, फक्त तू हवास. . .

ही हाक माझ्या अजाणपणाच्या

गर्भात दडलेली असावी

 

सर्व शक्तिनिशी वादळ शांततेला धडक देतं

तेव्हा त्याला शांततेची ओढ असते.

तसेच माझी बंडखोरी तुझ्या प्रेमाशी टक्कर घेते,

तेव्हा सुध्दा ‘ तू हवास’ फक्त ‘तू हवास’ अशी

साद ती घालते.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares