मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मित्र…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “मित्र…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी

मैत्री केली तर

 जात पाहू नका,

 आणि मदत केली तर

 ती बोलून

 दाखवू नका.

 कारण कोणत्याही

 बाटलीचा सील,

 आणि दोस्तांचा दिल

एकदा तोडला की,

 विषय संपला.

 मित्र गरज म्हणून

 नाही तर

 सवय म्हणून

 जोडा.

 कारण गरज

 संपते,

पण सवयी कधीच

 सुटत नाहीत.

 ‘मित्रनावाची ही दैवी

 देणगी जिवापाड

 जपून ठेवा,

 कारण,

 जीवनातील अर्धा

 गोडवा हा मित्रांमुळेच

असतो.

 कोणीतरी विचारले,

 मित्रांमध्ये एवढे

 काय विशेष

 नातेवाईकांपेक्षा?

 त्यांना सांगितले,

 मित्र हे फक्त

 मित्र असतात.

त्यात सख्खे, चुलत, मावस,

 सावत्र असं

 काही नसते.

 ते थेट मित्रच

 असतात.

 मैत्रीचे धागे

 हे कोळ्याच्या जाळ्या

 पेक्षाही बारीक असतात.

पण लोखंडाच्या तारेहूनही

 मजबूत असतात.

 तुटले तर श्वासानेही

 तुटतील,

 नाहीतर

 वज्राघातानेही

 तुटणार नाहीत.

 प्रत्येक दुखण्यावर

दवाखान्यात उपचार होतातच

 असे नाही,

 काही दुखणी

 कुटुंब आणि

 मित्र मंडळी

 यांच्याबरोबर

 हसण्या आणि

 खिदळण्यानेही

 बरी होतात.

 माणसाने कितीही प्रयत्न

 केले तरी

 अंधारात सावली

 म्हातारपणात

 ‘शरीरआणि

 आयुष्याच्या शेवटच्या

 काळात पैसा

कधीच साथ देत नाहीत,

 साथ देतात ते

 फक्त आपण

 जोडलेले

 जवळचे मित्र.

 मित्र बोलवित

 आहेत पण तुम्हाला

 जावेसे वाटत नसेल तर,

समजा की तुम्ही

 म्हातारे झालात.

 म्हातारपण येऊ

 न देणे आपल्या

 हातातच

 आहे ना?

 मित्रांसोबत रहा

 व आनंदात जीवनभर

जगत राहा.

 

 कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तसंच जाऊ नको..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तसंच जाऊ नको..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

आपले संस्कार, आपली संस्कृती.

घरी आलेल्या कुणालाही ‘तसंच’ पाठवायचं नाही आणि आपण कुणाकडे जाताना ही ‘तसंच’ जायचं नाही हा आमच्या घरचा शिरस्ता!

या ‘तसंच’मध्ये जगभरचा पाहुणचार सामावलेला होता.

माझे कुणी मित्रमैत्रीण ठरवून आले की बटाटेवडे कर, अचानक आले तर त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा नाहीतर सांजा कर.. अगदीच वेळ नसेल तरी धडपडत उठून किमान “सफरचंदाची एक फोड तरी खा” म्हणत ती हातावर दे.

आई-बाबांचे ऑफिसमधले कुणी पाहुणे आले तर किमान चहा तरी कर.

नातेवाईकांपैकी कुणी येणार असेल तर खास आवडी-निवडी जप हे सारं कसे अध्याहृतच होतं.

हे सगळं करताना आई-आजीच्या चेहऱ्यावर कधी आठी यायची नाही, कधीही श्रम दिसायचे नाहीत, आणि त्यांचं स्मितहास्य पण लोपायचं नाही… इतकं ते सारं अगदी सहज होतं! सहज होतं म्हणूनही ते सुंदरपण होतं!

पाहुण्यांसाठी असलेल्या ह्या नियमाला एक पोटनियमही होता. आपल्याच घरातून निघतानाही ‘तसंच’ निघायचं नाही. घरातल्या सर्व माणसांसाठीही एक उपनियम होताच!

सकाळचा चहा पिऊन झालेला असला तरी, “‘तशीच’ जाऊ नको ग कॉलेजला! ” असं म्हणत आजी तूपसाखर लावलेली एक पोळी घेऊन माझ्या मागे उभी असायचीच.

मनसुखानी नावाचा प्रोफेसर त्यावेळी आम्हां मुलींमध्ये भारीच फेमस होता. आमच्या गप्पांतून आजीला हे कळलं असावं. आणि मग..

“आजी, उशीर होतोय ग.. नकोय मला.. मी जाते तशीच, ” असं म्हणण्याचा अवकाश…

ती त्या मनसुखानीच्या नावाने बोटं मोडायची.

“त्या मनसुखानीला म्हणावं एवढी पोळी खाल्ल्याशिवाय माझी आजी काही मला ‘तशीच’ सोडत नसते. बाकी तू तुझं बघ, ” असा तिचा राग उफाळून यायचा पण घरातून निघताना ‘तसंच’ जायचं नाही हा तिचा नियम आम्हाला पाळायलाच लागायचा.

आपण कुणाकडे जातानाही ‘तसंच’ जायचं नाही हा या सगळ्याचा व्यत्यास.. तोही तितकाच खरा होता. आत्याकडे जाताना खास ठेवणीतल्या लोणच्याची बाटली भरली जायची. मावशीला आवडतात म्हणून घारगे व्हायचे.. एक ना दोन! यातलं काहीच नाही जमलं आणि अचानक कुणाकडे जावं लागलं तर जाता जाता द्राक्षं घे.. चिकू घे, असलं काही न काही त्या करायच्या.

हे सगळे सोपस्कार आई-आजी पाळायच्या इथपर्यंत ठीक! पण मी माझ्या शाळा-कॉलेजच्या वयात काही कामासाठी कोणाकडे एकटीच जातेय तरी या ‘तशीच’ जाऊ नको गं, म्हणायच्या आणि मग मात्र माझी चिडचिड व्हायची. मी कधी ऐकायचे, पण अनेकदा त्या-त्या वयातल्या न ऐकण्याच्या नादात ‘तशीच’ निघून जायचे. लहान आहे.. मोठी होईल तेव्हा कळेल, असं म्हणून सोडूनही द्यायच्या!

एकदाच आजीने या चिडचिडीवरचा उतारा केला.

मला म्हणाली, “कपभर चहाही न देता कुणाला ‘तसंच’ पाठवशील किंवा रिकाम्या हाताने कोणाकडे जाशील.. तर आपल्या घरातलं काही जाणार नाही.. पण पत मात्र जाईल. ज्याला ऐपत आहे, त्याने आपली पत सांभाळावी. ”

आजही माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक घरातून ‘तसंच’ कुणी जात नाही. आणि आपणही ‘तसंच’ कुणाकडे जात नाही.

काय करणार..?

आजीचे नाते सांगणारी मौल्यवान विद्यापीठं शब्द पेरून आपल्या आसपासच वावरत असतात ना.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं. दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरुन वेळ आणि इंधन बचत व्हायचीच; पण गैरसोयही टाळता यायची.

सुबत्ता वाढत गेली, तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवन शैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही, असं मात्र नाही.

आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं नीट पुरवणी आत ठेऊन निश्चित जागी ठेवला, तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो नि शोधाशोध पण करावी लागत नाही.

पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीजमध्ये ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.

बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं. ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला, तर कोणालाही त्रास होणार नाही.

पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून, घासून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.

खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे. आपली टर्न आल्यावर संपल्या नि बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.

घर सगळयांचं असतं. सगळी जबाबदारी गृहिणीची असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात, पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो नि चुकीच्या सवयी लागतात.

घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही (खरंतर हाॅटेलचेसुध्दा नियम असतातच).

ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत, काही एकत्र सवयी लावून घेतल्या, तर भविष्यात नक्कीच फायदा होईल.

आपल्या घरामध्ये कोणाचाही फोन आला तर एकमेकांना त्यांचे निरोप न विसरता देणे, घरातील कोणाकडेही मित्र-मैत्रीण आल्यास त्यांचे यथोचित स्वागत करणे, घरी येणारी व्यक्ती ही कुटुंबाची मैत्री आहे, असं समजून त्यांचे आदरातिथ्य करूया. घरातील प्रत्येक वस्तूवर व्यक्तींची नावे असलीच पाहिजेत असे नाही. बहुतेक सर्व वस्तू कॉमन असतात. त्याला ही घरपण म्हणतात. तसेच घरातील कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू संपविण्यापूर्वी कोणी खायचे राहिले नाही ना? अशी चौकशी करावी. घरातील प्रत्येकाचे दिवसभराचे काम, अंदाजे वेळापत्रक, उद्योगातील आर्थिक व्यवहार एकमेकांना माहिती असण्याची आवश्यकता आहे.

कुटुंबातील माहेरची किंवा सासरची व्यक्ती असो, सर्वांचे समान आदरातिथ्य

असावे अशा प्रकारच्या गोष्टींना कुटुंबातील मॅनर्स किंवा संस्कार असे म्हणतात, याचे खूप चांगले परिणाम पुढील पिढीवर होतात.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

आज मुलाने नेमकी कोणती खोडी काढली असेल कोण जाणे!

मुख्याध्यापकांनी एका आईला अचानक शाळेत बोलावलं आणि म्हणाले,

“तुमच्या मुलाने आज ‘जर माझ्या आईला एक दिवसाची सुट्टी मिळाली तर…’ या विषयावर असा निबंध लिहिला आहे की संपूर्ण स्टाफरूममध्ये आधी सगळे हसत होते… आणि नंतर सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.”

आई घाबरतच खुर्चीवर बसली.

तिला वाटलं, मुलाने काहीतरी मोठी खोडी केली असणार.

मुख्याध्यापकांनी हसत तिच्या हातात वही दिली आणि म्हणाले,

“ही घरी जाऊन वाचू नका… इथेच वाचा.”

वहीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं—

“जर माझ्या आईला एक दिवसाची सुट्टी मिळाली तर…”

पूर्वी मला वाटायचं की माझी आई जगातली सर्वात रागीट बाई आहे.

ती सकाळी पाच वाजता उठवते. अभ्यास करायला लावते. डबा पूर्ण संपवला नाही तर ओरडते. उशिरापर्यंत मोबाईल वापरला तर काढून घेते. सुट्टीच्या दिवशीही म्हणते— “खोली आवर.”

मला वाटायचं… काश! माझी आई एक दिवस कुठेतरी निघून जावी.

पण गेल्या सोमवारी आई आजारी पडली. डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली.

त्या दिवशी पहिल्यांदाच आई खरोखरच अंथरुणातून उठली नाही.

सकाळी गजर वाजला… पण माझे केस कुरवाळत “बाळा, शाळेला जायचं नाही का?” असं म्हणायला कोणीच आलं नाही.

मी उशिरा उठलो. युनिफॉर्म इस्त्री केलेला नव्हता. मोजे एका खोलीत, बूट दुसऱ्या खोलीत होते. डबा रिकामाच होता.

बाबा स्वयंपाकघरात उभे होते. त्यांनी पहिल्यांदाच पोळी करण्याचा प्रयत्न केला. पण पोळी गोल न होता भारताचा नकाशाच झाला.

तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की आई एकाच वेळी किती कामं करते.

शाळेतून घरी आलो, तर दारात कोणी वाट पाहत नव्हतं.

आई अंथरुणात होती. तरीही हसत म्हणाली,

“आलास का माझ्या राजा?”

मी म्हणालो, “आई, भूक लागली आहे.”

ती उठण्याचा प्रयत्न करू लागली… पण वेदनेने पुन्हा झोपली.

त्या दिवशी पहिल्यांदाच मी स्वतःसाठी जेवण वाढून घेतलं.

जेवण थंड होतं… पण त्याहून जास्त थंड घर वाटत होतं.

रात्री मी पाहिलं, आईला खूप ताप होता. तरीही ती बाबांना विचारत होती—

“मुलाने दूध पिलं का?”

“गृहपाठ केला का?”

“उद्या त्याची ड्रॉईंगची वही ठेवायला विसरू नका.”

तिला स्वतःच्या औषधांपेक्षा माझी जास्त काळजी होती.

दुसऱ्या दिवशी मी आईचा मोबाईल घेतला.

मला वाटलं त्यात गेम्स असतील.

पण त्यात सर्वात जास्त फोटो माझेच होते.

मी पहिल्यांदा शाळेत गेलो तो फोटो…

मी पहिल्यांदा सायकल चालवली तो फोटो…

मला ताप आला होता तो फोटो…

आईच्या मोबाईलमध्ये तिचा स्वतःचा एकही चांगला फोटो नव्हता.

सगळे फोटो माझेच होते.

त्या दिवशी मला समजलं…

आई स्वतःचं आयुष्य जगत नाही… ती माझं आयुष्य जगत असते.

तिसऱ्या दिवशी मी आईचे पाय दाबले.

ती हसून म्हणाली,

“आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?”

मीही हसलो… पण डोळ्यात पाणी होतं.

मला आठवलं…

मी कितीतरी वेळा तिला म्हटलं होतं—

“तुला काहीच येत नाही… तू फक्त ओरडत राहतेस.”

पण खरं तर मला काहीच येत नव्हतं.

माझा शाळेचा शर्ट कपाटात आपोआप येत नाही…

डबा आपोआप भरला जात नाही…

अंथरूण आपोआप आवरत नाही…

माझ्या आवडीचं जेवण आपोआप बनत नाही…

या सगळ्यामागे माझ्या आईची झोप, तिचा वेळ आणि तिचं संपूर्ण आयुष्य असतं.

आता जर देवाने मला विचारलं की जगातलं सर्वात कठीण काम कोणतं?

तर मी म्हणेन— “आई होणं.”

कारण आईला कधीच सुट्टी नसते.

तिला ताप असो… तरी घर चालतंच.

तिला वेदना असोत… तरी मुलांचीच काळजी असते.

तिला रडावंसं वाटत असलं… तरी ती हसत जेवण वाढते.

आता मी देवाला कधीच म्हणणार नाही की माझी आई एक दिवसासाठी कुठेतरी जाऊ दे.

मी फक्त एवढंच म्हणेन—

“देवा… माझं उरलेलं आयुष्यही माझ्या आईला दे.”

“कारण आई घरात असेल… तर छोटंसं घरही स्वर्गासारखं वाटतं.”

निबंध इथेच संपला.

वही हातात धरताना आईचे हात थरथर कापू लागले.

तिच्या डोळ्यातले अश्रू वहीच्या पानांवर पडू लागले.

तिला आठवलं…

गेल्या महिन्यात रागाच्या भरात मुलाने म्हटलं होतं—

“तुला फक्त ओरडताच येतं.”

त्या दिवशी ती रात्रभर रडली होती.

पण आज त्याच मुलाने, कुणीही न सांगता, तिचं संपूर्ण आयुष्य शब्दांत मांडलं होतं.

मुख्याध्यापक हळूच म्हणाले—

“मुलं आपले शब्द ऐकत नाहीत… पण आपला त्याग मात्र नक्की ओळखतात. फक्त त्यांना समजायला थोडा वेळ लागतो.”

आई घरी आली.

मुलगा धावत दारात आला.

यावेळी त्याने काहीच म्हटलं नाही.

फक्त आईला घट्ट मिठी मारली.

आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

दोघेही शांत होते…

पण त्या शांततेत हजारो शब्द दडले होते.

त्या दिवशी पहिल्यांदाच मुलाने स्वतःच आपली ताटली उचलली…

स्वतःचे बूट स्वच्छ केले…

आणि रात्री झोपण्यापूर्वी आईजवळ जाऊन म्हणाला—

“आई… आजपासून तुला सुट्टी देणार नाही… पण तुला कामात कधीच एकटंही सोडणार नाही.”

आई हसली.

तिला वाटलं, तिचा सगळा थकवा त्या एका वाक्यात विरघळून गेला.

लक्षात ठेवा…

मुलांना आई-वडिलांची किंमत ते त्यांच्यासाठी सर्व काही करत असताना कळत नाही. ती तेव्हा कळते, जेव्हा तेच हात थकायला लागतात. म्हणून वाट पाहू नका. आजच आपल्या आई-वडिलांजवळ बसा, त्यांचा हात हातात घ्या आणि एवढंच नक्की सांगा— 

“तुम्ही आहात म्हणून माझं जग सुंदर आहे.”

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सद्गुरू… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सद्गुरू… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

चुकले ते एकाच ठिकाणी… शरणागती ही कृती नाही, ती अवस्था आहे. पाया पडणे ही शरणागतीची सुरुवात असेल, पण ती शरणागती नाही. शरणागती म्हणजे माझे मला कळत नाही, माझ्या मनाचा मला भरवसा नाही, माझ्या बुद्धीची मर्यादा मला माहीत आहे आणि म्हणून मी आता तुमच्यावर सोडतो. हे ओठांवरी येणे सोपे पण मनाने म्हणणे हेच खरे कठीण आहे. कारण आपला अहंकार हे म्हणणे देत नाही. तो म्हणतो अरे, आपण काय कमी आहोत? आपण स्वतः करू.

दत्त महाराजांच्या परंपरेत एक गोष्ट नेहमी सांगितली जाते सद्गुरू हे आपल्याला नको त्या गोष्टी देत नाहीत, पण हव्या त्या गोष्टी आपल्याला तयार केल्याशिवाय देत नाहीत. म्हणजे काय? म्हणजे असे की आपण जेव्हा खऱ्या अर्थाने शरण जातो, तेव्हा सद्गुरू आधी आपल्या आतील अनावश्यक प्रश्न गोष्टी साफ करायला सुरुवात करतात. आणि हे साफ करणे सुखाचे नसते. जुन्या सवयी जातात, जुने आधार सुटतात, जे माझे वाटत होते ते एकेक करून निघून जाते. हे सुरू झाले की माणूस घाबरतो अरे, हे काय होतेय? मी शरण गेलो तर आणखी त्रास?

पण हाच तो क्षण असतो जेव्हा सद्गुरू खरे काम करत असतात. कुंभाराने मडके बनवताना आधी माती मऊ करावी लागते, चांगली तुडवावी लागते, मग आकार द्यावा लागतो, मग भट्टीत टाकावे लागते तेव्हा कुठे ते मडके पाणी धरायला तयार होते. आपले आयुष्यही असेच असते. सद्गुरूच्या हाती स्वतःला सोपवणे म्हणजे त्या मातीसारखे होणे जी स्वतःचा आकार विसरते आणि कुंभाराच्या हातात स्वतःला झोकून देते.

शरणागतीनंतर जे होते ते शब्दांत सांगणे कठीण आहे पण एक गोष्ट नक्की होते. भीती कमी होते. जी माणसे, जी परिस्थिती आधी असह्य वाटायची त्यांच्याकडे बघण्याची नजर बदलते. हे का झाले माझ्यासोबत? हा प्रश्न हळूहळू यातून मला काय शिकायचे आहे? असा होतो. हा बदल लहान वाटतो, पण हाच सर्वात मोठा बदल आहे. कारण प्रश्न बदलला की उत्तर बदलते, उत्तर बदलले की जगणे बदलते.

सद्गुरूला शरण गेल्यावर माणूस परिपूर्ण होतो असे नाही. चुका होतात, अडखळणे होते, मन पुन्हा भरकटते. पण फरक एकच असतो आता एकट्याने भरकटत नाही. सद्गुरू सोबत असतात. अंधारात चालताना दिवा हातात असेल तर वाट चुकत नाही असे नाही पण पडलो तरी उठता येते, कारण काय झाले ते दिसते. सद्गुरू हा असा दिवा आहे जो विझत नाही, जो थकत नाही, जो माघार घेत नाही… अगदी खरं आहे..

संकल्प करायला काय हरकत आहे मी आजपासून सद्गुरूवर विश्वास ठेवतो. माझ्या समजुतीपेक्षा त्यांची कृपा मोठी आहे. इतकेच पुरे आहे. बाकी सारे सद्गुरू पाहतात ना…

ll श्री गुरुदेव दत्त ll

ll दत्तरुप ll

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “राजे आणि दुसरं घर..!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “राजे आणि दुसरं घर..!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

अवघ्या त्रेपन्न वर्षांचा एक सत्पुरुष..

पंचतत्त्वात विलीन झाला आणि…

चित्रगुप्ताच्या दरबारात हजर झाला..

चित्रगुप्तानं बसायला मानाचं आसन दिलं,

अन् राजांना अपमान झालेला तो दरबार आठवला..

दोघांनीही त्यावर स्मितहास्य केलं.

 

चला राजे, तुम्हांला स्वर्गाच्या दारापर्यंत

सोडायची जबाबदारी माझी आहे.

आयुष्यभर पायाला भिंगरी लावून फिरलात,

आता जरा उसंत घ्यावी.

चित्रगुप्त अंमळ हुशारीने म्हणाला.

 

राजे जागचे हलले नाहीत, अन् तो चिंताक्रांत झाला.

चलावं महाराज, याचसाठी तर असतो मानव जातीचा अट्टहास.. यावेळी स्वरात जरा अजीजी होती.

 

नको देवा, अर्ध्यातच बोलावलंस न विचारता,

अन् ह्या स्वर्गाचा आग्रह नव्हताच कधी मनात.

श्रींच्या इच्छेचं स्वराज्य तर झालं,

सुराज्यासाठी तू वेळ कुठे दिला..

इथे स्वर्गात गेलो तर देवत्व मिळेल,

आणि खाली मूर्ती आणि टाक होतील माझ्या.

मला मानवच राहू देत आणि राहिलेला अर्धा डाव पूर्ण करु दे.

 

भाग्य लिहीलं गेलंय राजे, आता बदल नाही.

या दरबारातून थेट स्वर्गात, याला पर्याय नाही.

 

राजे पुन्हा हसले,

देवा, माझी वही नीट तपासलीत ना,

तुरी द्यायची कला अवगत आहे मला.

 

स्वर्ग सोडून राजाने पृथ्वीचाच हट्ट धरला

आता मात्र चित्रगुप्ताचा नाईलाज झाला.

जगत्पिता ब्रह्मदेवाशी बोलणी करुन,

राजांसोबत महाराष्ट्रातील गर्भवतींच्या स्वप्नात दाखल झाला.

 

गर्भवती १

देवी, हे मूल देतोय तुला, तेजस्वी आहे.

राजकारणात जाईल, सुराज्य देईल.

नको देवा, शिकून सवरुन नोकरी करेल,

असंच मूल हवंय मला. दुसरं घर बघ.

 

गर्भवती २

देवी, हे मूल देतोय तुला.संस्कारी आहे,

रांझ्याच्या पाटलाचे हात तोडेल, शत्रूकडच्या स्त्रीलाही सन्मान देईल.

नको देवा.आपण भलं आणि आपलं घर भलं,असं मानणारंच मूल दे मला, दुसरं घर बघ.

 

गर्भवती ३

देवी, हे मूल देतोय तुला, परोपकारी आहे,

रयतेचं हित बघेल, कुणाला उपाशी ठेवणार नाही,

प्रसंगी धनिकाकडून घेईल व गरीबाला देईल.

नको देवा, भौतिक सुखांची सवय झालीय मला,

असं उपद्व्यापी मूल नकोय मला, दुसरं घर बघ.

 

गर्भवती ४,५,६…..

देवींनो, होऊ घातल्या मातांनो,

इतिहास बदलू शकणारं एक मूल कूस मागतंय,

स्वर्गाचा दरवाजा सोडून, चंद्रमौळी अंगण मागतंय,

सुराज्याच्या राहिलेल्या स्वप्नासाठी,

स्वतःच निर्मिलेल्या राज्यात,

पुनर्जन्मासाठी एक जिजामाता शोधतंय..

कुणीतरी या पुढे आणि आपल्या उदरात

सामावून घ्या हा सूर्य.

 

देवा, कितीदा सांगावं तुला,

जे आहे ते सहन करावं, जे होईल ते स्वीकारत जावं,

निगुतीनं वागावं अन् स्वतःचं पहावं, हेच अंगात भिनलंय आता.

अन्याय बिन्याय, सत्यासाठी लढा, वगैरे वगैरे म्हणजे

लष्कराच्या भाकरी आहेत रे, नाही भाजायच्या आम्हांला.

हे सूर्याचं तेज सांभाळणारी जिजाऊ शेजारच्या घरात आहे बहुतेक.

आमचा पिच्छा सोड देवा आणि कृपा करुन दुसरं घर बघ.

 

हताश झालेल्या स्वरात चित्रगुप्त म्हणाला,

राजे, उणीपुरी तीनशे चाळीस वर्ष फिरवताएत मला.

एव्हाना तुमचा देव केलाय हो लोकांनी,

मणभर सोन्याचं सिंहासन, आणि रुप्याचे टाक झालेत तुमचे आणि मूर्तीही विसावल्यात देव्हा-यात.

पुतळे तर तुम्ही न पाहिलेल्या, न जिंकलेल्या प्रदेशातही उभारलेत. 

तुमचा पुनर्जन्म हा तर तुमचं नावं घेऊन मनमानी करणा-यांनाही घात ठरेल. त्यांनाही नकोसा असेल हा पुनर्जन्म. आता तरी स्वर्गात चला.

 

देवा, असा हताश झालो असतो तर,

चार मित्र घेऊन भवानीसमोर शपथ घेतलीच नसती,

कोवळ्या पोराला घेऊन आग्र्याहून सुटलोच नसतो,

सर्व काही गमावलेल्या तहातून उभा राहिलोच नसतो,

अमर्याद सागराशी पैज घेतलीच नसती,

दक्षिणेचा दिग्विजय मिळवलाच नसता,

स्वराज्यासाठी आदर्श आज्ञापत्रे लिहीलीच नसती,

आणि..

माझ्यानंतरही चालणारं राज्य निर्माण केलंच नसतं.

एकदा सुराज्य येऊ दे देवा, तुम्ही म्हणाल तेथे येईन.

तोपर्यंत…?

तोपर्यंत,

राजांचा आत्मा न मागितलेल्या देवत्वाच्या माळेत गुंफलेला राहणार,

आणि

मावळ्यांचे हात केवळ ढोल-ताशांच्या गजरात गुंतलेले राहणार..!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कसे घडले हे ?…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “कसे घडले हे ?…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी

भारताच्या संयुक्त कुटुंब प्रणालीला तोडण्याची कटकारस्थानं:

“कुटुंबं तुटली, की बाजार फुलतो” — हा केवळ एक विचार नाही, तर एक संपूर्ण नीती आहे.

आधुनिकतेकडे वाटचाल की लपवलेली गुलामी?

भारताची खरी ताकद काय होती?

मुघल आले, ब्रिटिश आले, अनेक परकीय आक्रमणकर्ते आले — पण एक गोष्ट अखंड राहिली — आपली संयुक्त कुटुंब प्रणाली.

हीच होती आपली खरी “Social Security”

ना पेन्शनची गरज, ना एकटेपणा, ना मानसिक आजारांचा कहर.

मग पाश्चिमात्य जगाला ही व्यवस्था का नकोशी वाटू लागली?

पश्चिमी देश म्हणजे वसाहतवादी — त्यांचा सर्वात मोठा धर्म म्हणजे बाजार.

पण भारतासारख्या देशात, जिथे लोक सुख-दुःख सामायिक करतात, कमी खर्च करतात, आणि सामूहिक विचार करतात— इथे त्यांचे उत्पादने विकली जाऊ शकत नव्हती.

मग एक हुशार योजना आखली गेली:

“कुटुंबं फोडा, माणसं एकटी करा, आणि प्रत्येकजण ग्राहक होईल. “

हा हल्ला कसा झाला?

माध्यमांनी संयुक्त कुटुंबांना दाखवलं:

* “भांडखोर”,

* “ओझं”,

* “प्रगतीला अडथळा”,

तर लहान कुटुंबं (nuclear families) दाखवली:

* “स्वातंत्र्य”,

* “आधुनिकता”,

* “स्वबळावर उभं राहिलेली”.

लक्षात ठेवा:किती TV मालिकांमध्ये सासू-सुनांच्या भांडणांचा शेवट “वेगळं होणं” हाच उपाय म्हणून दाखवला जातो?

 ग्राहकवाद (Consumerism): 

जेव्हा प्रत्येक जोडपं वेगळं राहायला लागलं:

* 1 कुटुंब = 4 घरे

* 1 TV = 4 TV

* 1 स्वयंपाकघर = 4 स्वयंपाकघरे

* 1 कार = 4 स्कूटर + 2 कार

बाजार तेजीत आला, पण समाज ढासळला.

या “सांघिक हल्ल्याचे” भारतात परिणाम काय झाले?

सामाजिक अधोगती:

* ज्येष्ठ मंडळी आता “ओझं”

* मुले एकटी (आणि स्क्रीनमध्ये हरवलेली)

* नातेवाईक “उपलब्धच नाहीत”

* संस्कारांचं स्थान आता “इन्फ्लुएन्सर्स” ने घेतलं आहे

मानसिक आरोग्याचा संकोच:

* पूर्वी आजी-आजोबांशी जे बोललं जातं, ते आता “काउंसलर” कडे जातं

* जेव्हा प्रेमातून एकटेपणा सुटायचा, तो आता उपचारांनी कमी करावा लागतो

 बाजाराचे फायदे:

* प्रत्येक समस्येसाठी एक प्रॉडक्ट

* प्रत्येक भावनेसाठी एक अ‍ॅप

* प्रत्येक सणासाठी “ऑनलाईन ऑर्डर”

“सबस्क्रिप्शनने संस्कारांची जागा घेतली आहे. “

 आजचा प्रश्न — आपण काय होत आहोत?

 “आधुनिकतेच्या” नादात आपण:

 * संयुक्त कुटुंबं म्हणालो “जुनाट”

* आईवडील झाले “अडथळे”

* कुटुंबं झाली “नको असलेली भावना”

* नातेसंबंध झाले “अनफॉलो”

 पण विचार केलाय का?

 * Amazonला फायदा होतो तेव्हा तुम्ही दिवाळीत एकटे खरेदी करता, कुटुंबासोबत बसत नाही.

* Zomato कमावतो तेव्हा तुम्ही आईच्या हातचं अन्न टाळता.

 * Netflix चालतो तेव्हा तुम्ही आजीच्या गोष्टी टाळता.

 

 उपाय: अजूनही वेळ गेलेली नाही

 संयुक्त कुटुंबं “ओझं” नाहीत, ती “मूल्यवान संपत्ती” आहेत.

* मुलांना ग्राहक म्हणून नव्हे, तर संस्कारित माणूस म्हणून वाढवा.

* ज्येष्ठांना घराबाहेर काढू नका — त्यांचा अनुभव Google पेक्षा श्रेष्ठ आहे.

* * सण “खरेदीसाठी” नव्हे, तर उत्सवासाठी साजरे करा.

अ‍ॅप्स नव्हे, प्रेम वाढवा— म्हणजे एकटेपणा आपोआप कमी होईल.

 

  निष्कर्ष:

 “पश्चिम जगाने व्यापारासाठी कुटुंबं फोडली, आणि आपण ‘आधुनिक’ होण्यासाठी आपली ओळख विकली. “

 आता थांबण्याची, विचार करण्याची आणि आपल्या संस्कारांकडे परतण्याची वेळ आली आहे — नाहीतर पुढची पिढी ‘संयुक्त कुटुंब’ म्हणजे काय, ते समजून घेण्यासाठी Google वापरेल.

 कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मानसशास्त्राची पदवी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मानसशास्त्राची पदवी… – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

वर्गात प्राध्यापकांनी मानसशास्त्राचा तास घ्यायला सुरुवात केली होती. तेवढ्यात मागून एका मुलाने शिट्टी वाजवली. प्राध्यापकांनी शिट्टी कोणी वाजवली, असं विचारल्यावर संपूर्ण वर्ग शांत बसला. मात्र कोणीच नाव सांगितलं नाही.

सरांनी हातातला खडू खाली ठेवला आणि म्हणाले, ”आपला आजचा तास इथेच संपतो आहे. पण राहिलेला वेळ सार्थकी लावण्यासाठी मी तुम्हाला कालच रात्री घडलेला एक किस्सा सांगतो. “

किस्सा ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कान टवकारले.

“काल रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती. वेळ काढायचा म्हणून गाडीत पेट्रोल भरून येऊ, असा विचार माझ्या मनात आला म्हणून गाडी काढून मी पेट्रोल भरून घेतलं. पेट्रोल भरल्यावर सहजच मी एका शांत रस्त्यावर गाडी वळवली. रस्त्याच्या कोपऱ्यावर एक अतिशय मादक, सुंदर ललना उभी होती. मी गाडी तिच्याजवळ थांबवून तिला विचारलं की मॅडम, मी आपली काही मदत करू शकतो का? हो, मला घरापर्यंत सोडू शकलात तर फार बरं होईल. गाडीचा दरवाजा उघडून मी तिला आत घेतलं आणि तिच्या घराच्या दिशेने गाडी वळवली. वाटेत आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो. सौन्दर्यासोबतच बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या निवडक स्त्रियांमध्ये मी तिचा समावेश करेन.

तिच्या घराशी पोहचल्यावर तिने लाजत लाजत कबूल केले की माझ्या सहृदय वागण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली आहे. मी ही तिच्या सौन्दर्याची आणि बुद्धिमत्तेची तारीफ करत तिच्या प्रेमात पडल्याची कबुली तिला दिली. एकमेकांशी बोलताना मी तिला माझ्या पेशाबद्दल सांगितलं. निरोप घेताना आम्ही फोन नंबरची अदलाबदल केली. अगदी शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तिचा भाऊ मी शिकवत असलेल्याच महाविद्यालयात शिकतो, त्यामुळे होणारा दाजी या नात्याने मी त्याची काळजी घ्यावी. मी तिला त्याचं नाव विचारलं. त्यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही त्याला त्याच्या खास सवयीवरून लगेच ओळखाल…

‘तो अतिशय उत्तम शिट्टी वाजवतो. ‘

प्राध्यापकांच्या या वाक्यावर अख्खा वर्ग मगाशी शिट्टी वाजवलेल्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागला.

प्राध्यापक महाशय त्या विद्यार्थ्याकडे बघून हसून म्हणाले, ” माझी मानसशास्त्राची पदवी / ज्ञान मी विकत घेतलेलं नाही तर स्वकष्टाने अर्जित केलं आहे.

निघ बाहेर वर्गाच्या… “

*

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पती-पत्नी : आयुष्याचे शेवटचे सोबती” – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “पती-पत्नी : आयुष्याचे शेवटचे सोबती” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

लग्न म्हणजे फक्त फोटोमध्ये हसणाऱ्या दोन चेहऱ्यांची गोष्ट नाही. ती एका घरात राहणाऱ्या दोन व्यक्तींची कहाणी आहे, ज्या हजारो वेळा तुटतात, पण जगाला न कळता पुन्हा स्वतःला जोडून घेतात.

पती-पत्नीच्या नात्यात फक्त प्रेमच नसते. त्यात राग असतो, अहंकार असतो, दुःख असते. असेही दिवस येतात की दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. पत्नीच्या मनात वेदना असते की, “हे कधीच बदलणार नाहीत. ” तर पतीच्या मनात खंत असते की, “ही मला कधीच समजून घेत नाही. ”

पण गंमत बघा…

तोच पती उशिरा घरी आला की पत्नी दाराच्या आवाजाने जागी होते. आणि तोच पती रागात असला तरी पत्नी जेवली नाही, हे कळल्यावर तिच्यासमोर ताट वाढतो.

यालाच विवाह म्हणतात.

मुलं लहान असताना घर गजबजलेलं असतं. आई-वडील स्वतःला मुलांच्या शिक्षणात, लग्नात, नोकरीत, नातवंडांत पूर्णपणे झोकून देतात. पण एक दिवस मुलं आपापल्या आयुष्यात रमून जातात. हळूहळू घर रिकामं होतं.

आणि मग फक्त दोघेच उरतात.

एकेकाळी त्रासदायक वाटणारे घोरणे, एखाद्या दिवशी ऐकू आले नाही तर डोळे पाणावतात. “इतकं बोलू नकोस, ” म्हणून ज्याला रागावलं होतं, तो आवाज कायमचा शांत झाला तर घराच्या भिंतीसुद्धा ओसाड वाटतात.

एखादा माणूस गेल्यावर सांत्वनासाठी अनेकजण येतात. पण रात्री पलंगावरील रिकामी जागा कोणी भरून काढू शकत नाही. औषध देणारा हात, “जेवलास/जेवलीस का? ” असे विचारणारा आवाज, रागामागे दडलेली काळजी दाखवणारे डोळे — हे सगळं परत आणता येत नाही.

म्हणून लक्षात ठेवा…

सर्वोत्तम जोडपे ते नसते, जे कधीच भांडत नाही.

सर्वोत्तम जोडपे ते असते, जे भांडणानंतरही एकमेकांची साथ सोडत नाही.

 वैवाहिक जीवनात प्रेमापेक्षा समजूतदारपणा मोठा असतो.

समजूतदारपणापेक्षा संयम मोठा असतो.

आणि संयमापेक्षाही मोठं असतं ते मन, जे शेवटपर्यंत एकत्र राहण्याचा निर्णय घेतं.

खोडकरपणा, लाज, भांडणं, शांतता, संघर्ष, आनंद, अश्रू, हसू, तडजोड — या सगळ्यांनी मिळून विवाह पवित्र बनतो.

आपला जोडीदार जिवंत असतानाच त्याची किंमत ओळखा. कारण जिवंतपणी दिलेला सन्मान हा मृत्यूनंतर गाळलेल्या अश्रूंहून अधिक पवित्र असतो.

हे नेहमी लक्षात ठेवा…

आयुष्यात परिपूर्ण जोडीदार कधीच मिळत नाही. पण तुमच्या अपूर्णता स्वीकारून शेवटपर्यंत तुमची साथ देणारा जोडीदार मिळणे, याहून मोठे भाग्य दुसरे नाही.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संक्रमण..  – कवी – ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – ज्योत्स्ना तानवडे ☆

ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ संक्रमण..  – कवी – ड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सूर्योदय तो पूर्वेला अन्

 पश्चिमेस तो अस्त असे

सृष्टीचा हा नियम मानवा

 त्रिकालाबाधित सत्य असे ।

 *

रवि जरासा अवखळ भारी

 एका जागी स्थिर नसे

 एका जागी नित्य उगवणे

 हेच तया मंजुर नसे ।।

 *

वदे रवि तो ब्रह्मापाशी

 जरा मोकळीक द्या मजला

उगवुन येण्या एक ठिकाणी

 मजला येईल कंटाळा ।।

 *

आज येथुनी उद्या तेथुनी

 उगवलो तर होईल छान

रोज नव्या देशाला देईन

 पहिला बघण्याचा हो मान ।।

 *

ब्रह्मदेव ही हसले किंचीत

 हट्ट पाहुनी सुर्याचा

दिवस कुठे अन् कुठे रात्र

 हा मेळ कसा साधायचा ।।

 *

मान राखुनी परी रविचा

 ब्रह्मदेव वदले त्याला

उगवताना पूर्व दिशा अन्

 पश्चिमेस जा अस्ताला ।।

 *

परी उगवता पूर्व दिशेला

 उत्तरेकडे सरकत जा

सहा मास सरताच मागुता

 दक्षिण अंगे उगवत जा ।।

 *

सूर्य तोषला रचना ऐकून

 उदय आणिक अस्ताची

दिशा जरी ती एक परंतु

 जागा बदले नित्याची ।।

 *

उत्तर अंगे उगवत जाता

 उत्तरायनी सूर्य असे

दक्षिण अंगे तोच उगवता

 दक्षिणायनी तोच दिसे ।।

 *

संक्रमणाने फुलते जीवन

 गती लाभते जगण्याला

म्हणुनी दिनकर व्यापुनी फिरतो

 नभांगणातुनी दिवसाला ।।

 *

जगी चिरंतन टिकून राही

 बदल तयाचे नाम असे

असे बदल, परी मार्ग सुनिश्चित

 हे देवाचे दान असे ।

कवी – ड .समीर आठल्ये

प्रस्तुती – ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares