चेन्नईतील एका शाळेने आपल्या मुलांना दिलेली सुट्टी जगभर व्हायरल होत आहे.
याचे कारण इतकेच आहे की त्याची रचना अतिशय विचारपूर्वक केली गेली आहे. हे वाचून लक्षात येते की आपण प्रत्यक्षात कुठे पोहोचलो आहोत आणि आपण आपल्या मुलांना काय देत आहोत? अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलांसाठी नाही तर पालकांसाठी गृहपाठ दिला आहे, जो प्रत्येक पालकाने वाचला पाहिजे.
त्यांनी लिहिले आहे –
गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला आनंद झाला. त्यांना शाळेत यायला आवडते, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पुढील दोन महिने त्यांच्या नैसर्गिक संरक्षक म्हणजेच तुमच्यासोबत घालवले जातील. आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत, जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल.
– मुलांसोबत किमान दोन वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचे महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा. आणि त्यांना अन्न वाया घालवू नका, असे सांगा.
– जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं धुवू द्या. अशा कामांतून मुलांना मेहनतीची किंमत कळेल.
– त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यास मदत करू द्या. त्यांच्यासाठी भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या.
– तीन शेजाऱ्यांच्या घरी जा. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि जवळ व्हा.
– आजी-आजोबांच्या घरी जा आणि त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचे प्रेम आणि भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत फोटो काढा.
– त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा, जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल.
– कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ चुकवू नका.
– किचन गार्डन तयार करण्यासाठी तुमच्या मुलांना बिया पेरण्यास प्रवृत्त करा. आपल्या मुलाच्या विकासासाठी झाडे आणि वनस्पतींबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.
– मुलांना तुमचे बालपण आणि कौटुंबिक इतिहास सांगा.
– तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या, त्यांना दुखापत होऊ द्या, त्यांना घाण होऊ द्या. अधूनमधून पडणे आणि वेदना सहन करणे त्यांच्यासाठी चांगले आहे. सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल.
– त्यांना कुत्रा, मांजर, पक्षी किंवा मासे असे कोणतेही पाळीव प्राणी ठेवू द्या.
– त्यांच्यासाठी काही लोकगीते वाजवा.
– तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही कथा पुस्तके आणा.
– तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर ठेवा. या सगळ्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आहे.
– त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम केक, चिप्स, एरेटेड पेये आणि बेकरी उत्पादने जसे पफ आणि तळलेले पदार्थ जसे समोसे देणे टाळा.
– तुमच्या मुलांच्या डोळ्यांत पहा आणि तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना. आतापासून येत्या काही वर्षांत, ते नवीन उंचीवर असतील.
पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही पालक असाल तर हे वाचून तुमचे डोळे नक्कीच ओलावले असतील. आणि जर तुमचे डोळे ओले असतील तर कारण स्पष्ट आहे की तुमची मुले खरोखरच या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. या असाइनमेंटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या, ज्याने आपण मोठे झालो, परंतु आज आपली मुले या सर्व गोष्टींपासून दूर आहेत, ज्यामुळे आपण स्वतः आनंदी आहोत..
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती : उषा नाईक
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पाचवी ते दहावीपर्यंत मी आमच्या कॉलनीतल्या एक वर्ष पुढे असलेल्या – अनिरुद्ध परांजपेची पुस्तकं वापरली. या कारणासाठी तरी मला त्याच्यासारखे पैकीच्या पैकी मार्क मिळावेत, असं मला वाटायचं.
मध्ये एकदा माझी एक छोटी मैत्रीण पावसात भिजली. माझं घर जवळच होतं म्हणून माझ्याकडे आली. ‘‘ओले कपडे बदल आधी’’- असं म्हटल्यावर माझ्या कपड्याच्या कपाटात खुडबुड करत बराच वेळ रमली. मग एक टॉप कप्प्यातून ओढत आरशात स्वत:ला हसून वगैरे न्याहाळत म्हणाली, ‘‘हा घालून जाऊ?’’ मी म्हटलं, ‘‘हो हो अवश्य. आणि परत आणून देण्याच्या फंदात पडू नकोस. मला जरा लहान होतो तो आता. ’’ त्याच भरात मी कपाटातून अजून चार-पाच गोष्टी काढल्या आणि जाताना तिच्याकडे सुपूर्द करत म्हणाले, ‘‘बघ ही जीन्स आणि बाकीचे टॉप पण येतील तुला कदाचित. ’’ माझी कॉलेज गोइंग मैत्रीण खूशच झाली. दुसऱ्या दिवशी तिच्या आईचा फोन आला. ‘‘अगं, काय मस्त कपडे आहेत सगळे. छोटीचे किती लाड करतेस!’’ माझ्यापण तोंडावर मोठ्ठं हसू पसरलं.
किती साधी गोष्ट आहे ही. कुणीच गैरसमज करून घेतला नव्हता. क्वचित कधी छोटीला ते कपडे घालताना माझी आठवण आली असेल बास.
ह्याच्या विरुद्ध मध्ये जे ऐकायला मिळालं, ते इतकं विचित्र होतं. आमच्या एका फॅमिली फ्रेंड कुटुंबाकडे गेले होते. काकूंना माझं बाळ बघायचं होतं. बरं नसल्यामुळे त्यांना हिंडता फिरता येत नाही आता. त्यांच्या सुनेनी पाठवलेला एक सुंदर अंगरखा कावेरीला घालून घेऊन गेले होते. काकूंना म्हटलं, ‘‘हे बघा.. आठवतंय का तुम्हाला? तुमच्या नातीचा फ्रॉक आहे हा. ’’ ते लक्षात आल्यावर काकूंच्या डोळ्यातून घळाघळा पाणीच यायला लागलं. उदास उदास होत त्या म्हणाल्या, ‘‘सूनबाईंना सांगू नकोस हं. तिच्या नकळत दिल्या होत्या या सगळ्या गोष्टी मी तुला. तिनी फेकून देण्यासाठी काढल्या होत्या बाजूला. किती विचित्र झालीए तुमची पिढी. प्रत्येक गोष्टीत तुमचे आक्षेप, शंका, प्रश्नांची सरबत्ती. आम्ही कितीतरी गोष्टी ऐकलेल्या, पाहिलेल्या, चालत आलेल्या- म्हणून करत आलो. त्यामागच्या भावनांची गोडी जगताना कळत गेली. पण तुम्हाला आधी सगळ्याची कारणमीमांसा करायची असते आणि आमचं म्हणणं उडवून लावायचं असतं. ’’
गप्पांच्या ओघात कळत गेलं. त्यांच्या कुणा नातेवाईकांकडून आलेलं बाळलेणं पाहिल्यावर काकूंच्या सुनेचा पारा चढला होता. ती काकूंना घालून पाडून बोलली. ‘‘कुणाची तरी वापरलेली झबली आणि दुपटी. मी नाही माझ्या बाळाच्या अंगाला लागू देणार. इट्स सो अनहायजिनिक. आम्हाला नाही भिकेचे डोहाळे लागले. आम्ही स्वत: खूप कष्ट करून भरपूर पैसे कमावतो. जगातली कुठलीही महागातली महाग गोष्ट आम्ही आमच्या बाळाला घेऊ शकतो. हे सेकण्ड हॅण्ड गिफ्ट तुम्ही त्या नातेवाईकांना परत करा. ’’ हे ऐकल्यावर काकू अवाक झाल्या होत्या म्हणे. मुद्दा तुमच्याकडे किती पैसे आहेत हा नाहीच्चे मुळी. एका बाळानी वापरलेल्या गोष्टी दुसऱ्या बाळाकडे मऊ होऊन जातात. बाळाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा घेऊन जातात. अगदी इम्युनिटीसुद्धा वाढवतात. शेअरिंग, देवाणघेवाण, एका आईनी दुसरीला दिलेला धीर, उमेद, नव्या आईच्या कष्टांसाठी, नवलाईसाठी वाटणारी सहानुभूती – अशा शब्दात न मांडलेल्या कितीतरी गोष्टी- प्रेम आणि दिलासा व्यक्त करतात.
खरंच अलीकडे लोकांकडे पैसे जास्त की वेळ कमी झालाय कळत नाही. पण हो, सुबत्ता खूप आलीए आणि पेशन्स कमी झालाय एवढं मात्र नक्की. दुसऱ्याचं काऽऽही नको असतं लोकांना. पूर्वी लहान होतोय म्हणून कुणी ड्रेस वगैरे दिला तर किती अप्रूप वाटायचं. आत्याकडे राहायला गेल्यावर गंमत म्हणून तिच्या जुन्या चपला घालून बसण्याचा आनंद वेगळाच असायचा. कित्ती वेळा मोठय़ा बहिणी / वहिन्यांच्या कपड्यांना धावदोऱ्यांनी टीप घालून लहान करून घालायचो आम्ही. माझ्या अरंगेत्रमला वृषाली वहिनीची लग्नातली चिंतामणी रंगाची साडी नेसले होते मी. हाफसारी करून. माझ्या दूरदर्शनवरच्या आणि एकूण आयुष्यातल्याही पहिल्या शूटिंगला प्रिया वहिनीची हिरवी साडी आणि टीप घातलेलं ब्लाऊज! अजूनही कधी तो सतारवादनाचा कार्यक्रम लागला आणि
माझं निवेदन सुरू झालं की, प्रिया वहिनीची आठवण येते. आईच्या कितीतरी ब्लाऊजना तर टिपा घालून काढून भोकं पाडली होती मी चक्क. नाटक, एकांकिका, कविता वाचन- प्रत्येक कार्यक्रमाला हक्काची वॉर्डरोब कर्टसी म्हणजे आईच! बाकी फोटोशूट इ. कार्यक्रमांना मोठय़ा बहिणींचे कपडे चाचरत मागण्यात आणि मिळाल्यावर हरखून जाण्यात काय मजा होती!माझी आई आणि सिंधूमावशी वर्षांतून एकदा भेटल्या की, एखाद् वेळी साड्या एक्स्चेंज करायच्या. वापरण्यात ताजेपणा यायचा. आणि आठवणीनी मूड आनंदी व्हायचा. माझ्या आईच्या वडिलांनी- आईच्या पहिल्या बाळंतपणात- संदीपसाठी म्हणून करून घेतलेल्या पाळण्यात पुढे शंभर-सव्वाशे तरी बाळं झोपली, त्यांच्या आयांनी हलका झोका घालत अंगाई म्हटली. त्यांना पाळणा पोचवण्यासाठी, त्यासोबत काहीतरी खाऊ देण्यासाठी आईनी केलेली लगबग किंवा बाबांनी पाळणा स्कूटरला सुतळीनी बांधून बाळाच्या घरी तो नीट पोचवण्यासाठी केलेली धडपड आठवली तरी मला हेलावून जायला होतं. किती गोड संदर्भ जुडत जातात एखाद्या वस्तूला.
हल्ली सगळेजण अळूच्या पानांसारखे निर्लेप व्हायचा प्रयत्न करतायत. निरुपद्रवी असण्यासाठी स्वत:ला मिटून घेतायत. नकोच ती कटकट कुणाकडून काही घेण्याची- आणि मग आठवणीनं परत करण्याची- या नादात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या- ‘आनंदाचं, चांगलं ते’ वृद्धिंगत करण्याच्या साखळीला खंड पडत चाललाय. प्रत्येकानं बाजारात मिळत असलेल्या सगळ्या गोष्टी घ्यायचं ठरवलं- तर मग काय. चंगळवाद पोसणारे मार्केटिंगवाले अजून अजून यशस्वी होत राहतील. आपल्यालाही मग घरातल्या भारंभार वस्तूंप्रमाणे प्रदर्शनात मांडल्यासारखं जगायची सवय होईल. छे! झटकून टाकू या हा अवघडलेपणा. एखादी गोष्ट स्वीकारण्याची ग्रेस शिकू या. एखाद्याचा आनंद द्विगुणित करणं फुकट साध्य होतं. त्याला पैसे नाही लागत. ते करू या- आणि मग कुणाकडे किती पैसे आहेत, त्या पैशात आपण काय काय खरेदी करू शकतो याच्या बाता मारू या!
लेखिका: सोनाली कुलकर्णी
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वरवर पाहताना ही गोष्ट अशा एका व्यवसायाची वाटते जिथे तुम्ही पैसे देऊन वडील, आई, किंवा जोडीदार ‘भाड्याने’ घेऊ शकता. पण जसजशी कथा पुढे सरकते, तसतसं जाणवते की हे केवळ पैशांचे व्यवहार नाहीत, तर ते आपल्या समाजातील ‘एकाकीपणाचं’ एक भयाण वास्तव आहे.
त्या चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत जे माझ्या काळजाला भिडले.
त्यातला एक प्रसंग म्हणजे, एका माणसाला तो मेल्यावर त्याच्या फ्युनरलला इतर माणसं कशी त्याची आठवण काढत रडतायत, हे फिलींग अनुभवायचं असतं. त्यासाठी तो ही सर्विस घेतो.
खरंतर त्या व्यक्तीला माहीत असतं की ही समोरची माणसं फक्त ‘अभिनय’ करत आहेत, तरीही त्यांच्याकडून मिळणाऱ्या दोन शब्दांच्या मायेसाठी तो लाखो रुपये खर्च करायला तयार असतो.
आणि त्यांच्या त्या शब्दांनी त्याला पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण होते.
हा चित्रपट पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे माणसाला अन्नाइतकीच भावनिक ओलाव्याचीही भूक असते.
‘Rental Family’ मध्ये आपण पाहतो की, लोक केवळ संवाद हवा म्हणून पैसे मोजतात. पण जेव्हा आपलं हेच नातं नैसर्गिक आणि भावनिकदृष्ट्या घट्ट असतं, तेव्हा ते आपल्याला केवळ आनंदच नाही, तर ‘गगनभरारी’ घेण्याचं बळ देतं.
जेव्हा आपल्याला माहीत असतं की, “जर मी गोते खात पडलो, तर मला सावरणारे हात आहेत,” तेव्हा आपण आयुष्यात मोठे निर्णय घ्यायला घाबरत नाही.
हे नात्यातील डीप इमोशनल कनेक्शन आपलं ‘सिक्युरिटी नेट’ बनतं.
या चित्रपटातून मला पुन्हा एकदा जाणवलं की, हजार दिखाऊ नात्यांपेक्षा आपल्या आयुष्यात ती ‘एक’ व्यक्ती महत्त्वाची असते, जिच्याकडे आपण आपलं मन मोकळं करू शकतो आणि असं सिक्युरिटी नेट असलेलं नातं निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या रिलेशनशिप स्किलवर काम करणं अत्यावश्यक आहे.
खरी नाती आपल्यासाठी आरसा बनतात . ती आपल्या चांगल्या गुणांचे कौतुक करतात आणि त्याचबरोबर आपल्या चुकांचीही जाणीव करून देतात.
Love relationship is an opportunity to take ownership of our shadow parts.
जेव्हा आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतून स्वतःकडे पाहतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि एक चांगली व्यक्ती बनण्याची प्रेरणा देते.
संशोधन सांगतं की, ज्यांची कौटुंबिक आणि सामाजिक नाती घट्ट आहेत, त्यांची निर्णयक्षमता अधिक चांगली असते.
‘रेण्टल फॅमिली’ मधला तो एकाकीपणा माणसाला आतून पोखरतो, पण याउलट, खरी माया माणसाला ऊर्जा देते.
पण लक्षात ठेवा, नोकरी/बिझनेस रिलेशनशिप फक्त त्यांच्या ग्रोथसाठी आपल्या सोबत असतात.
आपण आजारी पडल्यावर, खरोखरच भावनिक ओलाव्याचीही गरज असते. तेव्हा बिझनेस रिलेशनशिप कामी येत नाहीत.
एखादा मोठा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळालेल्या तुमच्या यशाचा आनंद साजरा करायला प्रेमाची व्यक्ती सोबत कोणी नसेल, तर त्या यशाला काहीच अर्थ उरत नाही.
पैशाने आपण ‘माणसं’ गोळा करू शकतो, पण ‘माया’ नाही. आणि प्रगतीसाठी माणसांच्या गर्दीपेक्षा मायेची ऊब जास्त कामाला येते.
म्हणूनच आजपासून एक गोष्ट करायला सुरुवात करा.
नोकरी /व्यवसायाच्या ‘रेण्टल’ जगात सतत राहण्यापेक्षा, आपल्या खऱ्या जवळच्या माणसांशी दिवसातून एकदा तरी मनमोकळं बोला.
तुम्हाला सायलेंटली सपोर्ट करणाऱ्या व तुमच्या यशात ज्यांचा वाटा आहे, त्यांना “तुझ्यामुळे मी इथवर पोहोचलो,” असं सांगायला विसरू नका.
लक्षात घ्या, कधीकधी जवळच्या व्यक्तीला फक्त तुमचं ऐकून घेणं हवं असतं, तुमचा वेळ हवा असतो आणि ही गोष्ट कोणत्याही महागड्या भेटीपेक्षा त्यांच्यासाठी मौल्यवान असते.
चला तर मग, आपण आपली नाती इतकी घट्ट करूया की आपल्याला कोणत्याही ‘रेण्टल’ आधाराची गरज पडणार नाही. कारण जेव्हा मनं जोडलेली असतात, तेव्हाच आयुष्याची खऱ्या अर्थाने वाढ होते!
तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रगतीत तुमच्या जवळच्या व्यक्तीचा भावनिक पाठिंबा किती मोलाचा ठरला?
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीची काही ना काही गोष्ट ही असतेच. मराठी मनावर गेली 45 वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या निर्मितीमागे ही काही रंजक गोष्टी आहेत..
राजहंसप्रकाशन
पुस्तकाच्या सुवर्ण महोत्सवी आवृत्तीनिमित्त खास काही आठवणी तुमच्यासाठी..
प्रसन्ना ठाकूर पानसे.
…
त्याचं झालं असं की आपल्या मुलांना रात्री झोपताना गोष्टी सांगाव्यात, यासाठी वीणाताई व त्यांचे पती (चंद्रकांत गवाणकर) नवनवीन पुस्तकं शोधत. एके दिवशी त्यांचे पती कार्व्हरवरचं इंग्रजी पुस्तक घेऊन आले. वीणाताईंनी त्यातल्या गोष्टी रात्री झोपताना मुलांना सांगायला सुरुवात केली. नेहमी गोष्टी सांगताना झोपणारी मुलं टक्क जागी राहिली.. आई.. पुढे काय झालं गं त्याचं? असं विचारत मुलांचे डोळे झरू लागले.. हे डोळे झरणे, मुलांना इतकी उत्कटता वाटणं, हा ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाचं मूलस्थान सापडण्याचा क्षण होता..
‘तारांवरी पडावा केव्हा चुकून हात,
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा, “
या चिं. त्र्यं. खानोलकर (#आरती_प्रभू)च्या ओळींप्रमाणे वीणाताईंच्या हाती गंधार सापडला होता…
त्यानंतर अनेक इंग्रजी पुस्तकं, संदर्भ ग्रंथ वाचत वीणाताई माहिती मिळवू लागल्या. आई आणि मुलांच्या गोष्टीतलं हे पुस्तक कागदावर येत गेलं. ही नव्या प्रवासाची नांदी होती… बाकी सोपस्कार आपोआप होत गेले. लिखाणाचे कागद माजगावकरांच्या ‘माणूस’पर्यंत पोहोचले.
मधल्या काळात काही घडामोडी घडल्या आणि ‘माणूस’ या मासिकाच्या दिवाळी अंकासाठी ‘कार्व्हर’ या विषयावर लिहायचं ठरलं. दिवाळीचा मूड लक्षात घेता संपूर्ण दिवाळी अंकात कार्व्हरची संघर्षगाथा मांडावी का? #मराठी माणसाला सातासमुद्रापारचा कार्व्हर आपलासा वाटेल का? अशा अनेक शंका माणूसचे संस्थापक श्री. ग. माजगावकर आणि दिलीप माजगावकर यांच्या मनात आल्या. प्रयोगावर भर देणार्या ‘माणूस’ मांसिकाने वेगळी वाट चोखाळायची ठरवली. दिवाळीचा संपूर्ण अंक ‘कार्व्हर’ या विषयावरच निघाला. ऐन दिवाळीत हा अंक उजळून गेला.
तो अतिशय लोकप्रियही ठरला. कित्येक महिने वाचकांची अभिप्रायाची पत्रं ‘माणूस’च्या कार्यालयात येत होती. सुरुवातीलाच ‘कार्व्हर’ला अशी अफाट लोकप्रियता मिळाली.
१९८१ मध्ये यावर पुस्तक काढायचं ठरलं. #दुर्गाभागवत यांनीही या सुमारास ‘कार्व्हर’वर लिहिलं होतं. पण आपल्यापेक्षाही वीणा गवाणकर यांना तो (कार्व्हर) सहजतेने उमगलाय, लिखाणाचा सूर सापडलाय, तेव्हा वीणाताईंनीच हे पुस्तक लिहावे, असा आग्रह दुर्गाबाईंनी धरला. एक लेखकानं दुसऱ्या लेखकाला समजून घेतलं तर किती उत्तम साहित्यकृती जन्माला येते याचं हे उत्तम उदाहरण.
दरम्यानच्या काळात #पुल देशपांडे यांना वीणाताईंनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. ते म्हणाले,
“हे पुस्तक लोकप्रिय ठरेल. पुस्तक स्वतःच्या पायांवर चालणारं आहे. त्याला कुणाच्या प्रस्तावनेच्या कुबड्यांची गरज नाही. “. त्यांच्या पत्रातील मजकूर मलपृष्ठावर छापण्याची परवानगी वीणाताईनी मागितली. त्यांनी उदारमनाने ती दिली. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीवर ते पत्र छापलेलं आहे.
पुलंपासून सामान्यातल्या सामान्यांपर्यंत सर्व वयोगटातल्यांना सातासमुद्रापारचा ‘कार्व्हर’ आपला वाटू लागला. त्याच्या कथांनी मराठी माणसाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले, त्याच्या संघर्षातून प्रेरणा मिळू लागली. अपयश आलं, एकटं वाटलं, की हातात ‘कार्व्हर’चं पुस्तक येऊ लागलं. ते कधी मित्र बनलं तर कधी मार्गदर्शक (सेल्फ हेल्प बुक) झालं. मराठी माणसाच्या घराघरात हृदयात विराजमान झालं.
#अक्षरधारा च्या रसिकाताई राठिवडेकर सांगतात, की ‘कार्व्हर’ हे पुस्तक विकलं जात नाही, असा दिवस जात नाही.
बघा बरं. आजच्या पुस्तक आल्यानंतरच्या ४५ वर्षानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. जेव्हा पुस्तक माणसाच्या मनामनात पोहोचतं, त्याला ते आपलं वाटतं, तेव्हा ती कलाकृती फक्त लेखकाची राहात नाही, तर आपल्या सर्वांची बनते. खरं सांगायचं तर लेखकाच्या आयुष्यात यापेक्षा आनंदाचा क्षण तो कोणता?
राहून राहून वाटतं या ‘कार्व्हर’ नावाच्या माणसाचं. तो बिचारा आयुष्यात स्वतःचं असं काही घेऊन आला नाही. आई ज्यानं पाहिली नाही, जन्मगाव नातलग कोणी नसलेलं ‘मेरी’चं पोर आयुष्यभर सर्वांना भरभरून देत गेलं. किती भाग्यवान ते अमेरिकेचे लोक.
आणि हो. ‘कार्व्हर’नं लेखिका प्रकाशकांनाही भरभरून दिलं. वीणाताईंनी त्यानंतर १५ पुस्तकं लिहिली आणि ती लोकप्रियही झाली. ‘#राजहंसप्रकाशन’ च्या गौरवशाली वाटचालीतलं ‘कार्व्हर’ हे मानबिंदू ठरलं. लेखक- प्रकाशक दोघांनी पुस्तकविक्रीतून मिळालेला मोठा भाग समाजासाठीही अर्पण केला.
आता चौथी -पाचवी पिढी ‘कार्व्हर’ वाचते. जेन झी लाही हे पुस्तक आपलसं वाटतंय… गेल्या 45 वर्षात
आजूबाजूचा समाज, समाजमाध्यमं बदलली, पण ‘कार्व्हर’ची लोकप्रियता सर्व वयोगटात कायम आहे.
‘कार्व्हर’ हा ‘कार्व्हर’ होता. एकमेवाद्वितीय होता, हे मान्य करावंच लागेल. आज अनेकदा आपल्या आयुष्यात प्रचंड निराशेचे, उदासीनतेचे क्षण येतात. सारं काही संपलं, असं वाटतं. त्या क्षणी या पुस्तकाचं कोणताही पान उघडलं आणि वाचलं की आपण पुन्हा सकारात्मक विचारांकडे वळतो.
कधीतरी वाटतं, या ‘कार्व्हर’वर #चित्रपट किंवा #नाटक अशी कलाकृती तयार व्हायला हवी होती.. पण नंतर
मनात विचार आला.. काहींच्या आयुष्यात, संघर्षात इतकी नाट्यमयता असते की चित्रपट फिका वाटावा. नाटकातली आभासी नाट्यमयता कमी पडावी.
या पुस्तकात वीणाताईंनी अनेक शब्दांपलीकडच्या गोष्टी मांडल्या आहेत. आपल्या मनात त्याचं चित्रीकरण होत राहतं. वाचताना प्रत्येकाच्या मनात त्याचा त्याचा म्हणून ‘कार्व्हर’ सापडत जातो.. अणि तो चिरंतन राहो..
* * * *
लेखिका:प्रसन्ना ठाकूर पानसे
प्रस्तुती: उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
असे म्हणतात की एखाद्या घराची परीक्षा त्या घराच्या फ्रिजवरून होते… माझी आजी फ्रिजला आळशी कपाट म्हणायची. तिला वाटायचे की ज्या वस्तू नीट ठेवायच्या नसतील, त्या कोंबण्यासाठी असतो हा फ्रिज.
त्याच्या पुढे जाऊन मला असे वाटते की फ्रिज हा घरच्या घडामोडींचा आणि वातावरणाचा द्योतक असतो.
माझ्या निरीक्षणात आलेले विविध प्रकारचे फ्रिज:
आळशी फ्रिज:
या फ्रिजमध्ये काय सापडेल, याचा नेम नसतो. या फ्रिजमधले पदार्थ तिहार जेलच्या कैद्यांसारखे बाहेर पडायची वाट बघत असतात… आणि एकमेकाना तू इथे कधीपासून आहेस हा प्रश्न विचारताना आढळतात. फाशीची शिक्षा मिळूनही प्रत्यक्षात ती मिळेपर्यंत वाट बघणाऱ्या कैद्यांप्रमाणे बसलेल्या एक्सपायरी डेट गेलेल्या बाटल्यांपासून कधीही घरचे लोक भेटायला न येणाऱ्या कैद्यांसारख्या दुर्लक्षित काही दिवसापूर्वीच्या उरलेल्या शिळ्या अन्नापर्यंत सर्व प्रकार असतात इथे! काही जन्मठेप मिळालेल्या भाज्या निर्विकारपणे ‘सडत’ पडलेल्या असतात.
हा फ्रिज जेलरच्या थंड डोक्याने या सर्व गोष्टींना सामावून घेत असतो!
टापटीप फ्रिज
या फ्रिजमध्ये सर्व वस्तूंना ध्रुवबाळासारखे स्वतःचे स्थान असते. प्रत्येक डब्याला स्वतःचे झाकण असते. भाज्यांच्या ट्रे मधल्या भाज्या फ्लॅट संस्कृतीप्रमाणे बंद डब्यात बसलेल्या असतात. त्यांना शेजारच्या भाजीचा “गंध” देखील नसतो.
बॅचलर फ्रिज
हा फ्रिज सहसा रिकामाच असतो. भाड्याच्या घरात घरमालकांनी ठेवलेल्या या फ्रिजमध्ये हॉटेल रूमच्या फ्रिजसारख्या फक्त बाटल्या मात्र असतात. कधी काळी येऊन गेलेल्या आईने जाताना पुसून गेल्यावर त्या फ्रिजची कोणी विचारपूस अथवा घासपूस केलेली नसते.. जाताना आईने करून ठेवलेली लोणची मुरंबे सांभाळत आईची आठवण काढत हा फ्रिज बसलेला असतो. कधी काळी अचानक आलेल्या गर्लफ्रेंडला किचनमधील पसारा दिसू नये म्हणून वस्तू कोंबण्यासाठीही याचा उपयोग होतो.
नवविवाहित फ्रिज
हा फ्रिज उत्साहाने आणि तरुणाईने सळसळत असतो. घरच्या जुन्या वस्तूंच्या बरोबरीने सुपर मार्केटमध्ये मिळणारी एक्झॉटिक फळं आणि फ्रोझन पदार्थांची रेलचेल असते या फ्रिजमध्ये. सगळे नवे पदार्थ या फ्रिजमध्ये स्वतःचे स्थान शोधत असतात. काचेच्या नव्या कोऱ्या बाटल्यांमध्ये शेजारी शेजारी चिकटून बसलेली ऑलिव्ह ऑइलमध्ये केलेली लोणची पाहून जुनी मुरलेली लोणची नाक मुरडत असतात.
NRI फ्रिज
इतर कुठल्याही फ्रिजपेक्षा गच्च भरलेला हा फ्रिज कायम आपला कंफ्युज्ड असतो. माहेरून आणलेली पिठं, मसाले, पापड, लोणची एकीकडे सांभाळताना दुसरीकडे मुलांच्या आवडीचे चीज, पिझ्झा, जेली प्रकारही तो लीलया सांभाळत असतो… मात्र जास्त जागा कुठल्या पदार्थांना द्यायची या संभ्रमात असतो. अगदी त्या घरच्या गृहिणीसारखा… तोच संभ्रम.. मुलांची आवड सांभाळताना आपली आवड मात्र फ्रीझरमध्ये गोठवणारा!
ज्येष्ठ नागरिक फ्रिज
या सर्वात केविलवाणा असणारा… एकेकाळी मुले मोठी होत असताना भरलेल्या या फ्रिजला आता पुन्हा दोघेच राहत असताना आलेलं रिकामपण खायला उठत असते. एकेकाळी चॉकलेटनी भरलेल्या कप्प्यांची जागा आता इन्सुलिन इंजेक्शनच्या पेनांनी घेतलेली असते. आईस्क्रीमऐवजी फ्रीझरमध्ये मुलांनी भारत भेटीत दिलेला सुकामेवा असतो.. सणावारांना मुलांच्या आठवणीसारखाच हमखास बाहेर येतो तो. भाजीचा ट्रे रिकामा असतो, कारण विरंगुळा म्हणून रोजची भाजी रोज संपवली जाते. उमेदीच्या काळातली वेळेची तारांबळ आता नसल्याने त्या ट्रेला काही कामच नसते.
कसाही असो मात्र फ्रिजला प्रत्येक घरात मानाचे स्थान असते. जुना असो व नवा, हा जर बंद पडला तर साऱ्या घराचे चैतन्य थंड पडते!
☆
लेखिका : विनया रायदुर्ग
प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈
☆ पुत्रसुख…!– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी☆
☆
कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं. आणि सामंतकाका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मूर्ती… कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली. कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं, ” थांबा जरा ..गणपती मूर्ती आहे….!” त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मूर्तीकडं पाहिलं. ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हात नकळत जोडले गेले.
कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबलबेल दिली. एस.टी.सुरु झाली..! कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला…!
काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मूर्ती असताना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी. त्यांची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, “राहू दे काका. उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मूर्ती ठेवू. तेव्हा द्या.”
थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, “काका, एक विचारू? तुमच्या गावात गणेशमूर्ती मिळत असेलच नं? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणं ; तेही एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन? “
सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, “आमच्या गावात मिळतात मूर्त्या. पण अशी नाही. ही मूर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? जिवंत वाटते. अगदी लहान बाळच..!”
कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हात जोडले. हलकेच स्पर्शही केला. ” आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन थकलो. मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी पंधरा वर्षांपूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मूर्ती तिथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणू काही… तिचे डोळे भरून वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले, “माझं बाळ…! “
हे असं घडल्यापासून ह्या गावातून मूर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो. “
कंडक्टर हे ऐकून स्तिमित झाला. थोड्या वेळानं त्यानं विचारलं ” पण काका, तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावात ..”
” तेही केलं पण… जास्त मूर्ती केल्या तरच त्यांना इंटरेस्ट.. आणि असे भाव येतीलच,याची शाश्वती नाही.”
हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, “काका, मग विसर्जित करायचीच नाही मूर्ती ..!”
सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले,”विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..! आत्ताही दारात वाट पहात बसली असेल. रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय..! भाकरतुकडा काय.., दृष्ट काढण्यासाठी ..! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे. छोटा तांब्या भांडं ….काय विचारू नका.. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीए. “
यावर कुणाचे डोळे पाणावले. कुणी स्मित केले. नंतर मौन राहिलं. काकांचं गाव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मूर्ती हातात घेतली. म्हणाला “काका, तुम्ही तिकीट काढा. तोपर्यंत धरतो मी..” काहीजण त्या मूर्तीकडं जवळून पहात राहिले. आता लोकांची नजरच बदललेली….! सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले, “दीड तिकिट द्या. एक हाफ आणि एक फुल “
कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं ” दीड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? “
काकांनी स्मित केलं, “दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? “
हे ऐकून सगळे एकमेकांकडं पाहू लागले..!
काका म्हणाले, “असे कोड्यात का पडलात बरे? त्याला नमस्कार केलात. त्याला आपला देव मानता.. व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मूर्ती याच भावाने भजतो; पूजतो.. अगदी पूजा केल्यावरही …
पण त्याला एकाचीच गरज प्रेमाची.. आपल्या आलिंगनाची .. द्या दीड तिकिट..!” हे बोलताना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं दीड तिकीट दिलं..!
सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी.तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हात जोडले गेलेले….. अगदी अनाहूतपणे …!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शीतल कुलकर्णी
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈