काल दुपारी मी परत तिच्या घराबाहेर ब्रेडच्या टोपल्या बघितल्या. शेजारी पाटी लिहिली होती, “ज्यांना खरोखर जरूर आहे, त्यांनीच फक्त हवे तेवढे ब्रेडचे लोफ घ्यावेत. आज मी एवढेच देऊ शकते. संपले असतील तर दार वाजवून अजून आहेत का विचारू नये. ”
दोन मोठ्या टोपल्यात साधारण २५-३० ब्रेडचे लोफ होते. मी गेले कित्येक महिने चालायला जाताना त्या ब्रेडच्या टोपल्या बघत होते. मला हे नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याची फार इच्छा होती, म्हणून मी तिचं दार वाजवलं. बराच वेळ कुणी दार उघडलं नाही. मी परत जायला निघाले.. तेवढ्यात त्या घराच्या खिडकीतून आवाज आला, “काय हवंय?”
मी म्हणाले, “या ब्रेडबद्दल कुतूहल होतं. बाकी काही नाही. मला ब्रेडची जरूर नाही. ”
तिनं दार उघडलं. साधारण पन्नाशीतली एक बाई नर्सच्या पोशाखात दारात दिसली. “तू पत्रकार आहेस का? कुठल्या वर्तमानपत्रासाठी लिहिणार असशील, तर मला बोलायचं नाही. ”
“नाही नाही.. मी पत्रकार नाही. मी नेहमी चालायला येते या रस्त्यावर. ही ब्रेडची टोपली तुम्ही ठेवता? कुणासाठी? मी काही मदत करू शकते का?” मी म्हणाले.
ती म्हणाली, ”मी जवळच्या हॅास्पिटलमधे नर्स म्हणून काम करते. काही वर्षांपूर्वी एक पेशंट ॲडमिट झाला. तो लहान असताना त्याच्या घरची अत्यंत गरीबी होती. वडील पाव, बिस्कीटं तयार करणारे बेकर होते. त्यामुळे तो पण ब्रेड, पेस्ट्री उत्तम बनवत असे. वडील गेल्यावर, १५-१६ वर्षांचा असल्यापासून तो एका टोपलीत ब्रेड भरून गावात हिंडून विकत असे. त्यातून बरा पैसा मिळू लागल्यावर पै पै जमवून त्याने स्वत:ची बेकरी सुरू केली. हळूहळू सर्वांनाच या बेकरीचे पदार्थ खूप आवडू लागले. त्याच्या हातात चार पैसे आले. खाण्याची मारामार संपली. घरही घेतलं. गाड्या घेतल्या.
या गावानं आपल्याला खूप काही दिलं, या भावनेनं त्यानं गरजूंसाठी ताजे ब्रेडचे लोफ दर रविवारी दोन तीन टोपल्या भरून घराबाहेर ठेवायला सुरूवात केली. तासाभरात ते लोफ गरजू लोकांनी नेलेले असत. काही लोक टोपलीत चार पैसे टाकत, एखादी थॅंक्यू नोट टाकत, तर कधी बाहेर ब्रेडला जेवढे पैसे पडतात तेवढे टाकत. एकदा कुणीतरी एक चांदीची बांगडी सुध्दा टाकली होती.
त्याचा संसार सुखाने चालला होता. मुलंबाळं चांगली निघाली. या टोपलीतील ब्रेड नेणाऱ्यांच्या दुव्यांमुळे आपलं दारिद्र्य संपलं, भरभराट झाली असं त्याला वाटायचं. काही संकटं आली, पण ती दूर झाली. वयाच्या ७६ वर्षी तो अल्पशा आजाराने गेला. त्याची बायको पण वर्षात गेली. त्याने ICU मधे असताना मला विचारले, ”मी तुझ्या नावाने काही पैसे ठेवत आहे. दर आठवड्याला गरजू लोकांसाठी तू ब्रेडची टोपली ठेवशील का? मला एके काळी ब्रेडचा एक तुकडा मिळायची मारामार होती. ते इतरांच्या नशिबी येऊ नये, म्हणून मी हे आयुष्यभर करत आलो आहे. माझी मुलं म्हणतात की याची जरूर नाही. म्हणून तुला विचारत आहे.. मुलांना समजत नाही की देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”
मी ‘हो’ म्हणाले. कुठेही त्याच्या नावाचा उल्लेख नसावा आणि वर्तमानपत्रात बातमी, फोटो काही नसावेत, एवढीच त्याची अट होती. त्यानं दिलेले पैसे वापरून मी दर रविवारी दाराबाहेर ब्रेड ठेवू लागले. गेल्या वर्षी त्यानं दिलेले पैसे संपले. मी माझ्या पैशांनी कधी पाच, दहा, पंधरा ब्रेड ठेवू लागले. लोकं ब्रेड घेतात व जमेल ते आणि भरपूर प्रेम या टोपलीत टाकतात. मलाही हे लोकांचं प्रेम आवडू लागलं. मागच्या वर्षीच्या वादळात जेव्हा माझ्या घरावर मोठं झाडं पडलं, तेव्हा पाच पन्नास लोक आले व त्यांनी सर्व सफाई करून माझं घर पूर्ववत करून दिलं. माझ्या अडचणी पण कमी होत गेल्या. कारण देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”
मला खूप कौतुक वाटलं. ती म्हणाली, “त्यानं ही प्रथा सुरू केली आहे ती आपण चालू ठेवू. मला काही देऊ नको, पण तुझ्या घराबाहेर एक ब्रेडची बास्केट ठेव, म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती लाभेल आणि तुला जेव्हा एखादा असा माणूस भेटेल, जो न चुकता ही प्रथा चालवेल, फक्त त्यालाच ही गोष्ट करायला सांग. कुणाला सांगायचे हे तुझं तुला कळेल, जसं मला तुझ्याशी बोलताना कळलं. ”
मी काही ब्रेडचे लोफ विकत घेतले व माझ्या घराबाहेर एका बास्केटमधे ठेवले. केवळ देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही म्हणून नाही.. पण त्या निनावी व्यक्तीने मरणानंतरही कुणाला ब्रेडचा एक तुकडा मिळण्याची भ्रांत पडू नये ही इच्छा व्यक्त केली म्हणून!
पैशाचा प्रश्नच नाही. कारण..
…देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही.
☆
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आत्मविश्वास… एक बहुमूल्य संपत्ती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. तदुसऱ्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.
या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे.
आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.
जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.
आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.
ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही.
ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही.
तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.
ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवन विसंवादात आहे.
तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड, तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.
याचा विचार करा, कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त “ईश्वरी कृपा” आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे. म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा.
पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, “आत्मविश्वास”
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून… !!!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अमेरिकेत घरी स्वयंपाक करणे बंद झाल्यावर काय झाले…?
1980 च्या दशकातील प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी अमेरिकन लोकांना चेतावणी दिली.
स्वयंपाकघर खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यात आले असून, सरकारनेही वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेतल्यास कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्याची प्रासंगिकता नष्ट होईल… पण तो सल्ला फार कमी लोकांनी ऐकला.
घरी स्वयंपाक करणे बंद झाले आणि बाहेर ऑर्डर करण्याच्या सवयीने बरीचशी अमेरिकन कुटुंबव्यवस्था नष्ट झाली… !
घरात स्वयंपाक करणे म्हणजे कुटुंबाला एकत्र ठेवणे, आपुलकीने जोडणे. पाककृती ही केवळ कला नाही… ! तर ते एक कौटुंबिक संस्कृती आणि समाधानाचे केंद्र आहे…!
घरात जर स्वयंपाकघर नसेल आणि फक्त बेडरूम असेल तर ते कुटुंब नाही त्याला वसतिगृह किंवा हॉटेलच म्हणावे लागेल !
स्वयंपाकघर बंद करून एकच बेडरूम पुरेशी आहे असे वाटणाऱ्या अमेरिकन कुटुंबांचे काय झाले… ?
1971 मध्ये, 71 टक्के यूएस कुटुंबांमध्ये मुलांसह जोडीदार होते, परंतु आज, पन्नास वर्षांनंतर, ही संख्या 20 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, कुटुंबे आता नर्सिंग होममध्ये राहतात.
अमेरिकेत 15% स्त्रीया एकट्या राहतात.
12% पुरुष कुटुंबात एकटेच राहतात.
19% घरांची मालकी फक्त वडिलांची किंवा आईची आहे.
केवळ 6% कुटुंबात पुरुष आणि महिला एकत्र आहेत.
अलिकडच्या काळात जन्माला आलेल्या बाळांपैकी 41% शिशु अविवाहित स्त्रियांपासून जन्माला आली आहेत त्यापैकी निम्म्या अपरिपक्व मुली शाळेत जाणाऱ्या आहेत, ही अतिशय गंभीर वस्तुस्थिती आहे…
41% ही खूप मोठी आकडेवारी आहे. म्हणजेच अमेरिकेत कौमार्य असे काही उरले नाही…
परिणामी, अमेरिकेत सुमारे 50 टक्के पहिले विवाह घटस्फोटात,
67 टक्के द्वितीय विवाह आणि
74 टक्के तृतीय विवाह समस्याग्रस्त आहेत.
फक्त बेडरूम म्हणजे कुटुंब नाही.
स्वयंपाकघर नसेल तर….
युनायटेड स्टेट्स हे तुटलेल्या लग्नाचे उदाहरण आहे.
आपल्या देशातील नागरिकांना कायमस्वरूपी खाद्यपदार्थ दुकानातून विकत घेण्याची सवय लागली तर इथली कुटुंबव्यवस्था देखील अमेरिकेप्रमाणे नष्ट होईल कुटुंबे उद्ध्वस्त झाली की मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडते.
बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीर लठ्ठ आणि बेढब बनते मग लहान-मोठे आजार, इन्फेक्शन आदी समस्या उद्भवतात व खर्च देखील वाढतो…
घरात स्वयंपाक करणे आणि घरातील सदस्यांसोबत बसून खाणे हे कुटुंब व्यवस्थेसाठी हिताचे आहे!
अर्थव्यवस्थेसाठी शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य देखील आवश्यक आहे.
म्हणूनच पुर्वजांनी आम्हाला बाहेरचे न खाण्याचा सल्ला दिला पण……………
आज आपण आपल्या कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवतो… स्विगी, झोमॅटो, उबेर यांसारख्या फूड सर्व्हिस कंपन्यांकडून दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी शरीराला लहान-मोठे आजार होऊ देणारे अन्न खाण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर करतो…
अगदी उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय लोकांमध्येही आता ही फॅशन झाली आहे.
भविष्यात ही सवय समाजासाठी मोठी आपत्ती ठरणार आहे…
आपण काय खावे हे ऑनलाइन कंपन्या ठरवतात… जेणेकरून डॉक्टर आणि औषध कंपन्यांची कमाई वाढेल…
आपले पूर्वज प्रवासात अथवा तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी घरात बनवलेले अन्नपदार्थ सोबत घेऊन जात असत.
म्हणूनच घरी स्वयंपाक करा,
आणि…
आनंदाने जगा…!
(सोशल मिडीयाचा वापर लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही तर लोकांच्या आचरणात आणि विचारात परिवर्तन करण्यासाठी करा.)
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “तुम्ही मुंबईतल्या खानावळीत कधी जेवला आहात काय?” – लेखक : प्रबोधनकार ठाकरे ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
जातिभेदाला पहिली थप्पड… (जुन्या आठवणी)
जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची. गिरगांवात एक-दोन बामणांची छुपी हॉटेले गल्लीकुच्चीत असायची. तेथे गुपचूप जाऊन कित्येक बामण चहाची तलफ चोरून भागवीत असत. कारण, त्याकाळी हॉटेलात उघडपणे चहा पिणे अथवा काही खाणे प्रशस्त मानले जात नसे. चार-पाच मंडळींनी कुडाच्या पडद्याआड गुपचुप बसून खावे प्यावे नि पसार व्हावे. दारूच्या गुत्त्यांत शिरणारांकडे लोक जितक्या कुत्सित काण्या नजरेने पाहत नि धिक्कार दर्शवीत, त्याच नजरेने लोक हॉटेलगामी प्राण्यांकडे पाहत असत. मात्र या बामणी छुप्या हॉटेलात बामणांचाच प्रवेश व्हायचा. इतरांना तेथे मज्जाव असायचा.
पहिल्यापासूनच मुंबई शहर म्हणजे नोकरमान्यांचे माहेरघर. बाहेरगांवाहून नोकऱ्यांनिमित्त तरुणांच्या टोळ्याच्या टोळ्या नित्य येथे यायच्या. बिन-हाडाची (म्हणजे चंबूगबाळे ठेवण्याची सोय एखाद्या ओळखीच्या किंवा नातेवाईकाच्या ओसरीवर झाली, तरी मम्मंची ब्याद तो किती दिवस भागवणार? अर्थात, सार्वजनिक खाणावळीची आवश्यकता पुढे आली. या दिशेने पहिला धाडसी यत्न भटवाडीतल्या सखूबाईने केला. विधवा बाईने असा एखादा स्वतंत्र धंदा अगर व्यवसाय करणे, ही कल्पनाच त्या काळी मोठी बंडखोर. शहाण्यासुरत्यांच्या भावना एकदम जखमी व्हायच्या! पण सखुबाईने सर्व सामाजिक विकल्पांना झुगारून खाणावळीचा धंदा सुरू केला. मुंबईच्या हिंदू खाणावळीच्या इतिहासात या सखूबाईचे नाव अग्रगण्य आहे. सखूबाईने खाणावळ उघडताच, पहिला मोठा पेचप्रसंगाचा प्रश्न आला, तो म्हणजे आमच्या नाठाळ जातीभेदाचा. खाणावळीत बामण येणार तसे इतर अठरापगड बामणेतरसुद्धा येणार. या सगळ्यांच्या निरनिराळ्या जातवार पंगती मांडायच्या तर मलबार हिलचे अंगणसुद्धा पुरायचे नाही. आणि बामणेतरांच्या पंगतीला बामणे जीव गेला तरी बसायची नाहीत. या पेचावर सखुबाईने दणदणीत तोड काढली. तिने प्रत्येक अन्नार्थी बुभुक्षिताला स्पष्ट बजावले- “माझी खाणावळ अन्नार्थ्यांसाठी आहे. मी बामण ओळखीत नाही नि जातपात मानीत नाही. प्रत्येक हिंदूला मी एका पंगतीला सारखे वाढणार… अगदी पाटाला पाट नि ताटाला ताट भिडवून वाढणार. जरूर असेल तर त्यांनी यावे, नसेल त्याने खुशाल भुके मरावे. मला त्याची पर्वा नाही. कोणी कुरबुर दुरदुर करील, त्याला भरल्या ताटावरून ओढून उठवून हाकलून देईन. “
झाले. कर्दनकाळ सखूबाईचा हा दण्डक जाहीर होताच, यच्चावत बामणे नि बामणेतर खाणावळीत पाटाला पाट भिडवून गुण्यागोविंदाने जेऊ लागले. सकाळ संध्याकाळ हजार-पाचशे पाने उठू लागली. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके काही कर्मठ ब्राम्हण, सखुबाईच्या खास मेहरबानीने मुकटे नेसून एका लहानशा अंधाऱ्या खोलीत सोवळ्याने जेवत असत. त्या खोलीला सखूबाई ‘विटाळशीची खोली’ असे म्हणत. मोठ्या पंगतीत वाढणी चालत असली म्हणजे साहजिकच या सोवळ्या बामणांकडे वाढप्यांचे दुर्लक्ष व्हायचे. “अहो, आमटी आणा, चपाती आणा, हे आणा, ते आणा. ” असा ते ओरडा करायचे. बराच ओरडा झाला की सखूबाई गरजायची, “अरे बंड्या, त्या विटाळशा बाया काय बोंबलताहेत तिकडे पहा. ” त्या सोवळ्या जेवणारांनी तक्रार केली, तर बाई स्पष्ट सांगायची, “हे पहा, मोठ्या पंगतीचे काम टाकून तुमच्याकडे ‘पेशल’ पाहणार कोण? तुम्हाला सगळे ‘पेशल’ पाहिजे तर ते मला जमणार नाही. वाढप्याच्या सोयीसोयीनेच घेतले पाहिजे तुम्हाला. चांगले मोठ्या जमातीत बसून गुण्यागोविंदाने खावे, गप्पागोष्टी सांगाव्या, ते बसता कशाला त्या अंधाऱ्या खोलकटांत सुतक्यासारखे ?”
सखूबाईचे उदाहरण पाहून मागाहून गिरगांवात आणखी तीन-चार ब्राह्मण विधवांनी खाणावळीचा उपक्रम केला आणि तो अगदी सखूबाईच्या शिस्तीने चालवला. झावबाच्या वाडीतली भीमाबाई आणि मुगभाटातली चंद्रभागाबाई यांच्या खाणावळी सारख्या जोरात चालत असत. दरमहा रुपये सात आणि साडेसात, असे दोनच भाव असत. सातवाल्यांना ताक आणि साडेसातवाल्याना दूध-दही एवढाच फरक. बाकी सगळी व्यवस्था सारखी. त्यात प्रपंच नाही. रविवारी काहीतरी “पेशल’ बेत असायचा आणि तो मंडळीना विचारून ठरायचा. सणावारी मिष्टान्न भोजनाच्यावेळी कोणी कमी जेवले तर बाई उस्तळायची, “कायरे, आधी कुठे हाटेलात शेण खाऊन आला होतास वाटतं?” असा भरमंडळीत टोमणा द्यायची. प्रत्येक आसामीला दरमहा चार पाहुण फुकट. मग ते ‘पेशल’ बेताला अथवा सणावारी आणले तरी तक्रार नाही. एखादा इसम दोन-तीन वेळा आला नाही, तर सखूबाई लगेच त्याच्या बिऱ्हाडी आपला माणूस पाठवून चौकशी करायची आणि आजारी असला तर तो बरा होऊन जेवायला परत येईपर्यंत दोन्ही वेळेला साबुदाण्याची पेज बिनचूक घरपोच पाठवावयाची. हा प्रघात बाकीच्या सर्व खानावळीतही पाळत असत.
सखूबाईच्या तोंडाला फारसे कोणी तोंड देत नसत. देईल त्याचे असे काही वाभाडे काढायची ती, का सगळ्या पंगतीची भरमसाट करमणूक! तिचा तोंडपट्टा चालला असता मध्येच कोणी काही बोलला तर एक पेटंट वाक्य असायचे, “चूप, मध्येच मला ‘ॲटरप्रॅट’ करू नकोस. अरे, एवढा मोठा तो जस्टिस रानडा नि तो चंद्रावर्खर ! माझ्या खाणावळीत जेवले म्हणून हायकोडताचे जड्ज झाले, समजलास. ” एखादाचे दोन महिन्यांचे बिल थकले आणि तो लाजेकाजेसाठी खाणावळीत येण्याचे टाळू लागला, तर बाई त्याला मुद्दाम बोलावून आणायची आणि हात धरून जेवायला घालायची. मग सगळ्या पंगतीत त्याची कानउघाडणी करायची, “अरे मुंबईची नोकरी म्हणजे अळवावरचं पाणी. आज गेली तर उद्या मिळेल दुसरी. पण मेल्या, उपाशी राहून तू काय करणार? उपाशी पोटाने नोकऱ्या मिळत नाहीत. तुझा हात चालेल तेव्हा दे पैसे. पण जेवायला टाळाटाळ करशील तर ओतीन भाताचे आधाण तुझ्या बोडक्यावर. ” पंगती चालल्या असताना, कमरेवर हात देऊन बाई पंगतीतून शतपावल्या घालायची. प्रत्येकावर काही ना काही टीका, टिप्पणी, टिंगल सारखी चालायची. सणावारी तर पोटभर जेवण्यावर तिचा फार मोठा कटाक्ष. मधून मधून एका रांगेने चार-पाच बामणे सारखे बसलेले पाहिले का मग सोवळ्यावर सखूबाईंचे टिंगलपुराण असे काही बेफाम चालायचे का पुढच्या खेपेला ते सारे बामण पंगत मोडून सरमिसळ बसायचे.
तात्पर्य, सहभोजनाने जातीभेदाचे बंध तुटले नाहीत तरी किंचित ढिले पाडण्याची कामगिरी आजकालच्या समाज-सुधारकांच्या कल्पनेत फुरफुरण्यापूर्वीच सखूबाईने हा धाडसी प्रयोग केलेला आहे आणि त्याचे महत्त्व हिंदूंच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात डावलता येणार नाही.
☆
लेखक : प्रबोधनकार ठाकरे
माहिती संकलन आणि प्रस्तुती : मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पु. ल. – दि ग्रेट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
मराठीत “लागण्याची” गंमत बघा:
बाजूच्या गावात एक चित्रपट *लागला* होता.
तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला “लागला”.
त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच “लागला” होता.
बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला “लागला”.
घरचे जेवायचा आग्रह करू “लागले”. मला जेवणात गोड “लागतं” हे माहिती असल्याने गोड केलं होतं.
भात थोडा “लागला” होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला “लागली”. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार “लागली”.
निघताना बस फलाटाला “लागली”*च होती, ती *”लागली”च पकडली.
पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस “लागली”. मग काय…
घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी “लागली” कारण आल्या आल्या घाईची “लागली”.
थोडक्यात माझी अगदी वाट “लागली”..
घरची मंडळी हसायला “लागली”.
The only & only Great पु ल!!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “बोलणं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
“तिळगुळ घ्या गोड बोला”
असं दर संक्रांतीला आपण म्हणतो. पण या म्हणण्यामागे फक्त औपचारिकता असते. खरंच आपण गोड बोलण्याचा किती प्रयत्न करतो ? ते जमत नसेल तर त्यासाठी आपलं बोलणं सुधारावं यासाठी खरच काही प्रयत्न करतो का? त्यासाठी आपण खरंच काही एक्झरसाइज करतो का? मागच्या वर्षीच्या माझ्या बोलण्यापेक्षा या वर्षीच्या बोलण्यामध्ये अधिक गोडवा आहे असं आपल्याला जाणवतं का? त्या जाणवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करतो का? हे सगळे प्रश्न मला पडत होतेच, परंतु आज ही एक पोस्ट कुणीतरी फॉरवर्ड केली. माहित नाही कोणी लिहिली पण ती खरोखरच बोलकी आहे वाचा तर —-
– – –
‘बोलण्याची शक्ती’ हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे.
आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे.
तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्या बद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत!
हे इतके महत्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.
‘आहे हे असं आहे’,
‘माझा आवाजच मोठा आहे’
‘मला अशीच सवय आहे’
असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो. 🤨
बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर. ‘कौन बनेगा करोडपती’ मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे. शब्दोच्चार, आवाजाचा चढ – उतार शिकायचं असेल, तर हा आवाज अभ्यासायलाच हवा, आवाजाची, बोलण्याची साधना तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन!
काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही हे हळूहळू कळत जातं.
शब्द जगलेला माणूस तो शब्द उच्चारतो, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो. बोलण्याचा आवाज हा आतून येतो! माणसाच्या चेतनेला स्पर्श करून! त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो.
आशाताईंचं बोलणं गाण्याइतकंच सुश्राव्य आहे. जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे.
एक प्रयोग केला होता. सुंदर शब्दांची यादी दररोज वाचणं. प्रामाणिक, सत्य, अद्भुत, शक्ती… अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल, तशी मोठ्याने वाचायची.
वाढवत जायचे हे शब्द.
हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. बोलणं चांगलं होतंच, पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावंसं वाटत नाही, इतका अभिरुचीचा दर्जा वाढत जातो! संगत बदलते. आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे.
शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल, हेही तितकंच खरं!
सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात.
वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात.
नेमकं मोजकं बोलता येतं. कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते.
यासाठी वाचन, काव्यवाचन महत्त्वाचे ठरते.
कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगात आहेत! फक्त शोधता – ऐकता आली पाहिजेत.
या बोलण्यातली सर्वांत टाळायची गोष्ट, म्हणजे पाल्हाळ लावणे, संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणे. वेळ ही संपत्ती (Time is Money) असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये?
फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.
आपल्या माणसांशी बोलण्याने ताण हलका होतो.
बोलणं म्हणजे,
निव्वळ शब्द थोडीच असतात?
न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं.
वेळात वेळ काढून घराघरात संवाद झाले पाहिजेत. माणसांमाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते.
मनातले गैरसमज बोलून दूर करता येतात,
पण
त्याआधी कसं बोलायचं,
ते या जगाच्या शाळेत शिकावंच लागतं.
बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो.
तात्पर्य : ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, दुनिया त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीस अशक्य गोष्टी शक्य होतात…. 🙏
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “ महा⭐तारे ” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
मित्रहो..
आजकाल समाजात वृध्द म्हणजे ज्येष्ठ नागरीक म्हणजेच “म्हातारे” म्हणण्याचा प्रघात आहे.
परंतु एका कवीने या शब्दाची फारच सुंदर आणि यथार्थ फोड केली आहे.
‘म्हातारे’ म्हणजे “महा ⭐ तारे” !
…. जे कर्तव्यपूर्तीच्या जीवनानुभवाने समृध्द असतात म्हणून ते खरोखरच स्वयंप्रकाशी व त्यांच्या बृहन्कुटुंबीय, समाजासाठीसुध्दा प्रकाशमान व मार्गदर्शक असतात. मात्र आपल्या संस्कृतीत असलेला
“थोरांना वयाचा मान देण्या”चा प्रघात तितकासा पाळला जातोय का ?
After all, respect is not to be demanded, but commanded !
Here is how..
हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !
पहाटे पाच वाजता उठतात
सगळं आवरून फिरायला जातात
व्यायाम करुन उत्साहात परततात
हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !
धडपडतात, पडतात, परत उठतात
एवढंसं खातात, काही औषधं घेतात
रात्री निशाचरागत जागत बसतात
हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !
पेपर वाचतात, बातम्या पाहतात
राजकारणावर हिरीरीने बोलतात
नाटक सिनेमा आवडीने पाहतात
हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !
दूध, भाजी, किराणा आणतात
नातवंडाना शाळेतही सोडतात
संध्याकाळी त्यांना खेळायला नेतात
हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !
नातवंडाशी खेळून मस्ती करतात
घरभर पळून उच्छाद मांडतात
नव्या नव्याच्या शोधात रमतात
हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !
लग्नसमारंभात थाटात मिरवतात
लहानथोरांची खुशाली विचारतात
आनंदी, ताजेतवाने घरी परततात
हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !
ते कधीच थकणार नाहीत,
कारण ते म्हातारे नाहीत..
ते तर महा 🌟 तारे आहेत !
महा 🌟 ताऱ्यांनो,
🌃 लुकलुकत रहा.. 🎇 चमकायला बिल्कुल बिचकू नका ‼
☆
कवी : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈