मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझी पूजा अपूर्ण आहे !!! – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माझी पूजा अपूर्ण आहे !!!… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो !

पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो ! 

पण त्या पांढर्‍या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो ! 

पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज मी देवाजवळ दिवा लावतो ! 

पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो ! 

पण संसारतापाने मंदपणे जळत असताना 

चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही 

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो !

पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो !

पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो !

पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो ! 

पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे ! 

 

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो ! 

पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद

परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही,

 

तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साठी ओलांडलेल्या मेंदूची अप्रतिम कार्यक्षमता… माहिती स्त्रोत : न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ साठी ओलांडलेल्या मेंदूची अप्रतिम कार्यक्षमता… माहिती स्त्रोत : न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले  

आश्चर्यकारक !…  

जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे संचालक म्हणतात की वृद्ध व्यक्तीचा मेंदू सामान्यतः वाटतो त्यापेक्षा अधिक व्यावहारिक असतो. या वयात, मेंदूच्या डाव्या आणि उजव्या गोलार्धांचा परस्परसंवाद सुसंवादी बनतो, ज्यामुळे सर्जनशील शक्यतांचा विस्तार होतो. म्हणूनच ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये अनेक व्यक्तिमत्त्वे आढळू शकतात.

अर्थात, मेंदू आता तारुण्यात होता तितका वेगवान राहिलेला नसतो. तथापि, तो लवचिकता प्राप्त करतो. म्हणून, वयानुसार, योग्य निर्णय घेण्याची आणि नकारात्मक भावना कमी होण्याची शक्यता असते. मानवी बौद्धिक क्रियाकलाप शिखर गाठतात वयाच्या ७० च्या आसपास, जेव्हा मेंदू पूर्ण शक्तीने काम करू लागतो.

कालांतराने, मेंदूतील मायलिनचे प्रमाण वाढते, एक स्त्राव, जो न्यूरॉन्स् मधील सिग्नलचा वेगवान मार्ग सुलभ करतो. *यामुळे, बौद्धिक क्षमता सरासरीच्या तुलनेत ३००% वाढतात.

हे देखील मनोरंजक आहे की ६० वर्षांनंतर एखादी व्यक्ती एकाच वेळी मेॆंदूचे दोन्ही गोलार्ध वापरू शकते. जे अधिक जटिल समस्या सोडविण्यास मदत करते. 

मॉन्ट्रियल विद्यापीठातील प्राध्यापक मोंची उरी यांचा असा विश्वास आहे की वृद्ध मेंदू कमी ऊर्जा वापरणारा मार्ग निवडतो, अनावश्यक गोष्टी काढून टाकतो आणि समस्या सोडवण्यासाठी फक्त योग्य पर्याय शोधतो. एक संशोधन केले गेले, ज्यामध्ये विविध वयोगटाच्या लोकांनी भाग घेतला.  

चाचण्या देतांना तरुण लोक खूप गोंधळलेले होते, तर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी योग्य निर्णय घेतला.

आता, ६० ते ८० वयोगटातील मेंदूची वैशिष्ट्ये पाहू. ती खरोखर मजेशीर आहेत.

वृद्ध व्यक्तीच्या मेंदूची वैशिष्ट्ये…  

१. तुमच्या सभोवतालचे सर्वजण म्हणतात त्याप्रमाणे मेंदूचे न्यूरॉन्स मरत नाहीत. जर एखादी व्यक्ती मानसिक कार्यात गुंतली नाही तर त्यांच्यातील संबंध फक्त अदृश्य होतात.

२. भरपूर माहितीमुळे विचलित होणे आणि विस्मरण निर्माण होते. म्हणून, तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य अनावश्यक क्षुल्लक गोष्टींवर केंद्रित करण्याची गरज नाही.

३. वयाच्या ६०व्या वर्षापासून, एखादी व्यक्ती निर्णय घेताना तरूणांप्रमाणे, मेंदूचा फक्त एक गोलार्ध वापरत नाही, तर दोन्ही गोलार्ध वापरते.

४. निष्कर्ष: जर एखादी व्यक्ती निरोगी जीवनशैली जगत असेल, हालचाल करीत असेल, व्यावहारिक शारीरिक क्रियाकलाप चालू ठेवत असेल आणि पूर्णपणे मानसिकरित्या सक्रिय असेल, तर बौद्धिक क्षमता वयानुसार कमी होत नाहीत, तर अणिक वाढतात, आणि वयाच्या ८०-९० व्या वर्षी शिखरावर पोहोचतात.

आरोग्यदायी टिप्स: — 

१) वृद्धत्वाला घाबरू नका.‌  

२) बौद्धिक विकासासाठी प्रयत्न करा.  

३) नवीन कलाकुसर शिका, संगीत बनवा, वाद्य वाजवायला शिका, चित्रे रंगवा, नृत्य शिका.

४) जीवनात रस घ्या, मित्रांना भेटा आणि संवाद साधा, भविष्यासाठी योजना बनवा, शक्य तितका उत्तम प्रवास करा.

५)  दुकाने, कॅफे, शो मध्ये जायला विसरू नका.

६) एकटे गप्प बसून राहू नका, ते कोणासाठीही विनाशकारीच आहे.

७) सकारात्मक रहा, नेहमी खालील विचाराने जगा. 

 “सर्व चांगल्या गोष्टी माझ्याकडेच आहेत !”

स्रोत: न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन.

(कृपया ही माहिती तुमच्या ६०, ७० आणि ८० वर्षांच्या मित्रांना द्या जेणेकरून त्यांना त्यांच्या वयाचा नक्की अभिमान वाटेल.)

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तर समजून घ्यावे की…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ “तर समजून घ्यावे की…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच, आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि, ” इहलोकातील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे. “

कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला; तर समजून घ्यावे कि, आपण आता कौटूंबीक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे.

 बसल्या बसल्या ह्या शेंगातील दाणे काढा, असे जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे.

वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवु नका. भाऊबंदकीचे नाते कुटूंबाच्या फाळणी बरोबरच संपुष्टात आले, नातेवाईक देणे / घेणे वादातून संपले,

पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला.

*

कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो, फारसी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता, ह्याला मी किती मदत केली होती…

सगळे कटू अनुभव जमा झाले असतील, कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल.

नाती बिघडली, सबंध बिघडले, वाट्याला एकटेपण आले, आता कुणाचे फोन येत नाहीत, दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही.

तरीपण एक नातं अजून टिकलं आहे, एक फोन चालु आहे, ते नातं मुलीचं.

तितक्यात मुलीचा फोन येतो, ती विचारते— ” पप्पा गेले होते का दवाखान्यात ? औषधं घेतलीत का ? काय म्हणाले डॉक्टर ? जेवण झालं काय ?” 

नाना प्रश्न काळजीचे, आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचे हेच एकमेव नात उरतं…

थोडा पश्चातापही होत असतो, मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले, कसे होणार त्यांचे ?

लोक मुलगा झाला कि, स्वतःला भाग्यवंत समजतात, मला असे वाटते, ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होय.

एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवावे, यावरुन भांडत असतात तेव्हा झालेली चूक सुधारण्या पलीकडे गेलेली असते. तेव्हा मुलगी म्हणते,

“बाबा काळजी करू नका मी आहे ना !!…. “

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक उल्लेखनीय धाडस… लेखक : श्री सागर आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ एक उल्लेखनीय धाडस… लेखक : श्री सागर आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

पुण्यातील मराठी मुलीने बदलायला लावला अमेरिकी शाळांतील शिवरायांचा इतिहास; पुढील शैक्षणिक वर्षापासून औरंगजेबाची महती बाद; छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा धडा 11 वीच्या शालेय इतिहास समाविष्ट!

पुण्यातील बाणेर येथील श्री अतुल जयकुमार आवटे यांची पुतणी, त्रिशा सागर आवटे ही अमेरिकेतल्या मॅडिसन स्टेट मधल्या वेस्ट हायस्कूल मध्ये 11वीला शिकते. एकदा त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात औरंगजेब यावर असलेला एक धडा क्लासमध्ये शिकविला जात होता. त्यात औरंगजेब किती सर्वश्रेष्ठ होता, याबद्दल लिहिलेले आहे, ते शिकविले जात होते. त्यावेळेस त्रिशाने धाडस करून क्लासमध्ये टीचरला सांगितले की, हे खरे नाही, हा खोटा इतिहास आहे व छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वश्रेष्ठ होते. शिवरायांबद्दल सगळा खरा इतिहास तिने वर्गात इतिहास सांगितला. अलेक्झांडर च्या कथा ऐकून वाढलेल्या अमेरिकन मुलांना शिवरायांचा हा धाडसी इतिहास रोमांचित करून गेला. टीचरलाही हा इतिहास नवा होता; पण इंटरेस्टिंग वाटला. त्यानंतर त्यांच्या टीचरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खूप वाचन केले व सगळी माहिती मिळवली. याचा परिणाम असा झाला की, आता त्या शाळेमध्ये पुढील वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर संपूर्ण एक धडा समाविष्ट केला जाणार आहे, जेणे करून तेथील विदयार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वश्रेष्ठ होते, हे कळावे.

त्रिशाने केलेल्या या धाडसाबद्दल एक भारतीय म्हणून खरंच खूप अभिमान आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांचा धडा पुढील शैक्षणिक वर्षांपासून समाविष्ट करणार, याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे पण खूप आभार.

लेखक : सागर आवटे ( Trisha’s father ), Madison City, Wisconsin State.

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जातीचं काय घेऊन बसलात राव ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

 ☆ जातीचं काय घेऊन बसलात राव ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर ☆

अरे जात म्हणजे काय.. ? 

माहित तरी आहे का.. ?

 

अरे कपडे शिवणारा शिंपी.. !

तेल काढणारा तेली.. !

केस कापणारा न्हावी.. !

लाकुड़ तोडणारा सुतार.. !

दूध टाकणारा गवळी.. !

गावोगावी भटकणारा बंजारा.. ! 

भांडी बनविणारा कासार, दागिने बनविणारा सोनार, मूर्ती मातीची भांडी बनविणारा कुंभार,

रानात मेंढी-बकरी वळणारा धनगर.. !

पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण.. !

बूट चप्पल शिवणारा चांभार.. ! 

बागायती शेती करणारा 

वृक्ष लावणारा माळी. !

आणि लढाई लढणारा क्षत्रिय.. !

 

आलं का काही डोस्क्यात.. ?

आरं काम म्हणजे जात.

आणि सर्वात महत्त्वाचे वरील प्रमाणे कामे आता कुठल्याही जातीचीच व जातीसाठी राहिली नाहीत.

आता शिक्षणाने व्यवसाय प्रत्येकाचे बदलले आहेत.

आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला.

आता इंजीनीयर ही नवी जात.

कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात.

“सी. ए” ही पण जात.

तर 

“एम. बी. ए” ही नवी जात.

डॉक्टर ही पण जात.

तर वकीलही जातच.

तर “शिक्षण” व “माणुसकी” हाच खरा धर्म.

 

बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात.. !

घरीच दाढी करता नवं.. ? 

तेव्हा तुम्ही न्हावी होता.

बुटाला पालीश करता नव्हं.. ?

तेव्हा तुम्ही चांभार होता.

गैलरी टेरेस वर झाडे लावता ना.. !बगीचा करता तेव्हा तुम्ही माळी होता.

घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह.. !तेव्हा ब्राम्हण होता.

आरं कामानं मोठं व्हा जातीनं न्हाय.. !

आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला,

हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय.. ?

मंग कशाला उगीचच बोंभाटा करता राव.. ?

तुम्ही शहरात/खेडेगावात राहत असाल तुम्ही आजारी पडल्यावर/अडीअडचणीला मदतीला सगळ्यात आधी धावून येतो तो तुमचा शेजारी/मित्र आणि तो तुमच्या वरीलप्रमाणे जुन्या जातीचा नसतोच हे मान्य कराल की नाही.. ?

 

सगळ्याला आता आधुनिक पद्धतीने काम हाय.. !

सगळ्याला शिक्षण खुले हाय.. !

खूप शिकायचं कामं करायचे.. ! 

माता पित्याचे-गावाचे-जिल्हय़ाचे-राज्याचे-देशाचे नाव लौकिक करायचे… !!

 

“जात फक्त राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी जिवंत ठेवली आहे”

 ☆

लेखक : अज्ञात 

संग्राहक : संजय जोगळेकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रफू… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रफू… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

मित्र भेटला परवा… खूप जुना…

बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं…

नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर…

म्हणाला, “मुद्दामहून भेटायला आलोय तुला… हा योगायोग नाही… क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय. “

सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन… सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो…

अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही… तेव्हढा वेळच नाही मिळाला.

विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण… चेहऱ्यावर शक्य तेव्हढा ‘आलासच ना अखेरीस’ हा माज ठेऊन.

तो मला म्हणाला,

“दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली…

काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास…

ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं…

आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता…

वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली…

त्यानंतर तू मला तोडलस ते कायमचंच…

मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षुन…

तू त्यावेळी मला म्हणाला होतास, ‘देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो’…

ती वेळ माझ्यावर आली… दोन महिन्यांपूर्वी…

नाही शिवू शकलो मी ते भोक…

नाही करु शकलो रफू…

नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा ओतून ते एक छिद्र…

माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं… !

गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत…

‘कसला बाप तू?’ अशी खिल्ली उडवत बहुदा मनातल्या मनात…

म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे…

आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला…

यावेळी तू आपलं नातं ‘रफू’ केलेलं पहायला…

त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून रडायला”.

सुन्न होऊन ऐकत होतो मी…

संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठे अंगण मिळते बागडायला…

‘देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो’, चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता.

घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना… नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे.

‘तो’ त्याने नकळत केलेल्या ‘पापातून’ अन् ‘मी’ नकळत दिलेल्या ‘शापातून’ उतराई होऊ बघत होतो…

मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो…

दोघं मिळून एक नातं, नव्याने ‘रफू’ करू पाहत होतो !

तात्पर्य: सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो, मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावणेचा सदैव प्रयत्न झाला पाहीजेत, त्यासाठी सर्व नातेसंबदांना जपा, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही क्षुल्लक क्षुद्र लेखू नका. आपले मित्र नातेवाईक, शेजारी, सहकारी आपले नोकर चाकर हे आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही, आपल्या आचरणणांने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, व कधी अनावधनाने कुणी दुखावलेच तर वेळीच “रफू” करायला विसरू नका….

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रमाण…” – कवी : कृष्णाजी नारायण आठल्ये  ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “प्रमाण…”कवी : कृष्णाजी नारायण आठल्ये  ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

अतीकोपता कार्य जाते लयाला

अती नम्रता पात्र होते भयाला ।

अती काम ते कोणतेही नसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १ ॥ 

*

अती लोभ आणी जना नित्य लाज

अती त्याग तो रोकडा मृत्य आज । 

सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ २ ॥ 

*

अती मोह हा दु:ख शोकास मूळ

अती काळजी टाकणे हेही खूळ ।

सदा चित्त हे सद्विचारे कसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ३ ॥

*

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया

अती खेळणे हा भिकेचाच पाया । 

न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ४ ॥ 

*

अती दान तेही प्रपंचात छिद्र

अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र । 

बरे कोणते ते मनाला पुसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ५ ॥

*

अती भोजने रोग येतो घराला

उपासे अती कष्ट होती नराला । 

फुका सांग देवावरी का स्र्सावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ६ ॥

*

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड

अती द्वेष भूलोकीचे पंककुंड । 

अती मत्सरे त्वां कशाला कुसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ७ ॥

*

अती आळशी वाचुनी प्रेतस्र्प

अती झोप घे तोही त्याचाच भूप । 

सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ८ ॥

*

अती द्रव्यही जोडते पापरास

अती घोर दारिद्य्र तो पंकवास । 

धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ९ ॥

*

अती भाषणे वीटती बुद्धिवंत

अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत । 

खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १० ॥

*

अती वाद घेता दुरावेल सत्य

अती `होस हो’ बोलणे नीचकृत्य । 

विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ ११ ॥ 

*

अती औषधे वाढवितात रोग

उपेक्षा अती आणते सर्व भोग । 

हिताच्या उपायास कां आळसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १२ ॥

*

अती दाट वस्तीत नाना उपाधी

अती शून्य रानात औदास्य बाधी । 

लघुग्राम पाहून तेथे वसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १३ ॥

*

अती शोक तो देतसे दु:खवृद्धी

अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी । 

ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १४ ॥ 

*

अती भूषणे मार्ग तो संकटाचा

अती थाट तो वेष होतो नटाचा । 

रहावे असे की न कोणी हसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १५ ॥ 

*

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती

अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती । 

न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १६ ॥ 

*

अती भांडणे नाश तो यादवांचा

हठाने अती वंश ना कौरवांचा । 

कराया अती हे न कोणी वसावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १७ ॥

*

अती गोड खाणे नसे रोज इष्ट

कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ । 

असोनी गहू व्यर्थ खावे न सावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १८ ॥ 

*

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी

नव्याचे अती लाडके शुद्ध नादी । 

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ १९ ॥ 

*

सदा पद्य घोकोनियां शीण येतो

सदा गद्य वाचोनियां त्रास होतो । 

कधी ते कधी हेही वाचीत जावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ २० 

इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा!!!!! 💐

कवी : कृष्णाजी नारायण आठल्ये 

प्रस्तुती : डॉ. भारती माटे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी आता पुस्तक वाचत नाही… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 मी आता पुस्तक वाचत नाही… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी ☆

 मी हल्ली 

पुस्तकं नाही

माणसंच वाचतोय ! 

 

पुस्तकं महाग झालीयत

माणसं स्वस्त. 

 

शिवाय,

सहज सगळीकडे उपलब्ध असतात 

माणसं. 

 

बरीचशी चट्कन वाचून होतात

कधी कधी मात्र 

खूप वेळ लागतो 

समजायला. 

 

काही तर 

आयुष्यभर कळत नाहीत ! 

 

सगळ्या साईजची 

सगळ्या विषयांची.

 

छोटी माणसं, मोठी माणसं

चांगली माणसं, खोटी माणसं. 

 

आपली माणसं, दूरची माणसं

दूर गेलेली माणसं, जवळची माणसं. 

 

दु:खी माणसं, कष्टी माणसं 

कोरडी माणसं, उष्टी माणसं 

 

बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं

निमग्न, तिरसट, मूडी माणसं. 

 

पाठीवर थाप मारणारी

हातावर टाळ्या मागणारी

थरथरत्या हाताने

घट्ट धरून ठेवणारी. 

 

मोजकं बोलणारी कविता-माणसं

कादंबरीभर व्यथा माणसं. 

 

सतत माईक घेऊन ओरडणारी माणसं

डोळ्यांनी मौन सोडणारी माणसं. 

 

काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही

काहींच्या मजकुरात विषयच नाही

 

वर्षामागे वर्ष पानं जातात गळत

काहींची प्रस्तावनाच संपत नाही ! 

 

पुस्तकांचं एक बरं असतं

कितीही काळ गेला तरी

मजकूर कधी बदलत नाही

 

माणसांचं काय सांगू

वेष्टन, आकार

विषय, मजकूर 

सारंच बदलत बदलत 

शेवटी वाचायला 

माणूसच उरत नाही.

 

तरीही शब्द शब्द 

वाचतोे मी माणसं,

पानापानातून

वेचतोे मी माणसं………!!!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी केलेली ‘पु.लं.’ ची हजामत” –  लेखक : श्री चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “मी केलेली ‘पु.लं.’ ची हजामत” –  लेखक : श्री चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

(हा लेख आहे पुलंचे केशकर्तन करणाऱ्या प्रतिभावान माणसाचा)

जगाची गंमत करणा-या अवलियाची हजामत या बहादुराने केली आहे.

पण ही हजामतही त्यांच्यासाठी एका देवपूजेपेक्षा कमी नव्हती.

या देवपूजेचे गोष्ट त्यांच्याच शब्दात…

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ ; विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक विद्यार्थी दुकानाचे दार घडून आत आला.

‘तुम्हाला पु. ल. देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे. ‘

त्याच्या या वाक्याने माझ्या चेह – यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून ‘ सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत ‘- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गि-हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला.

आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला 

‘ हो लगेच निघतो ‘ 

असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गि-हाईकाकडे आरशात पाहू लागलो.

त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. ‘ पुलं ‘ चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गि-हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता.

‘राहू द्या हो ; माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही. ‘ 

त्याच्या या वाक्यातून ‘ पुलं ‘ बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मार्गी लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली. त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महर्षी देवधरांच्या घरी केस कापावयास जात असे तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता.

थोड्याच वेळात मी ‘ रुपाली ‘ मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि ‘ या ‘ म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले.

‘ थोडावेळ बसा ; भाई जरा नाश्ता करतो आहे ‘ असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या.

आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते.

अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो.

इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुर्ची देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. ‘ चंदकांत, यांचे केस बारीक करून टाका ‘ म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहीण्यात गर्क झाल्या.

त्यांचे लक्ष नाही असे पाहून 

‘ फार लहान करू नका,

थोडेच कापा ‘ 

पुलं माझ्या कानात कुजबुजले.

माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलिकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या.

पहिल्याच दिवशी पुलं त्यांना ‘ पुलं-स्वामिनी ‘ का म्हणतात याचा अर्थ उमगला.

त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या.

त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.

केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व ‘ वा छान! ‘ म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सवोर्च्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गुंडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले.

‘ चंद्रकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका ‘ त्यांनी आज्ञा केली.

मला जरा विनोद करावासा वाटला.

मी म्हटलं, ‘ नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की ‘ हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणा-या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील. ‘ त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या ‘ तो काय येशुख्रिस्त वगैरे आहे की काय ?’ 

मी मनात म्हणालो ‘ मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सार्मथ्य त्यांच्या लेखणीत होते.

म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता.

शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो,

‘ एक आनंदाचं देणं ‘.

पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे… ‘

लेखक : श्री चंद्रकांत बाबुराव राऊत

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  वाचताना वेचलेले  ☆ “सरणारे वर्ष मी…” – कवी : मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सरणारे वर्ष मी…” – कवी : मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

(…मंगेश पाडगावकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता)

*

मी उद्या असणार नाही

असेल कोणी दुसरे

मित्रहो सदैव राहो 

चेहरे तुमचे हसरे ।।

*

झाले असेल चांगले

किंवा काही वाईटही

मी माझे काम केले

नेहमीच असतो राईट मी ।।

*

माना अथवा मानू नका

तुमची माझी नाळ आहे

भले होवो, बुरे होवो

मी फक्त ‘ काळ ‘ आहे ।।

*

उपकारही नका मानू

आणि दोषही देऊ नका

 निरोप माझा घेताना

 गेटपर्यंंतही येऊ नका ।।

*

उगवत्याला “नमस्कार”

हीच रीत येथली

विसरू नका ‘एक वर्ष’

साथ होती आपली ।।

*

धुंद असेल जग उद्या

नववर्षाच्या स्वागताला

तुम्ही मला खुषाल विसरा

 दोष माझा प्राक्तनाला ।।

*

शिव्या, शाप, लोभ, माया

यातले नको काही

मी माझे काम केले

बाकी दुसरे काही नाही ।।

*

निघताना “पुन्हा भेटू”

असे मी म्हणणार नाही

‘वचन’ हे कसे देऊ

 जे मी पाळणार नाही ।।

*

मी कोण? सांगतो

“शुभ आशीष”देऊ द्या

“सरणारे वर्ष ” मी

आता मला जाऊ द्या ।। 

 

प्रस्तुती : शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares