☆ अनावधानाचे ध्यान – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
दररोज रात्री झोपण्यापूर्वी तन मन धन आपल्या आराध्याला अर्पून डोळे मिटून त्याला समर्पण करावं.
रात्रीची झोप आणि सकाळी जागं होणं…ही फक्त रोज घडणारी शारीरिक क्रिया नाहीये, त्यात एक गूढ अध्यात्म दडलं आहे.
दिवसभर “मी”, “माझं”, “माझ्या इच्छा”, “माझी धडपड” यात गुरफटलेला मनुष्य जेव्हा रात्री झोपतो, तेव्हा नकळत सगळं सोडून देतो.
पद, पैसा, चिंता, यश, अपयश, नाती, अहंकार — काहीच हातात राहत नाही. झोप म्हणजे एका अर्थाने दररोज अनुभवलेलं छोटंसं ‘ध्यानच’ असते. ध्यानात जसं मन बाहेरच्या जगापासून बाजूला होऊन निरामय शांततेत उतरतं, तसं झोपेतही घडतं. फरक एवढाच की ध्यानात आपण जाणीवपूर्वक शांततेकडे जातो आणि झोपेत निसर्ग आपल्याला त्या शांततेत अलगद घेऊन जातो.
कदाचित म्हणूनच गाढ झोप ही इतकी सुखद वाटते, कारण त्या क्षणी मनुष्य अहंकारातून पूर्णतः पण थोडावेळच बाहेर आलेला असतो.
ना कालची खंत असते, ना उद्याची भीती…फक्त एक शांत अस्तित्व.
मग पहाटे जेव्हा जाग येते आणि आपले डोळे उघडतात, श्वास सुरू असतोच, सूर्य पुन्हा खिडकीतून डोकावणार असतो, तेव्हा आपल्या संस्कारित मनाला जाणवतं ही फक्त जाग नाही, ही कृपा आहे. आपण रात्री स्वतःला पूर्णपणे अज्ञाताच्या स्वाधीन करतो आणि सकाळी पुन्हा जागे होतो यापेक्षा मोठा विश्वास आणि यापेक्षा मोठं आश्चर्य दुसरं कोणतं? खरं म्हणजे हीच ती ईश्वरी कृपा आहे, असते, असेल.
अध्यात्म कदाचित ह्याच एका जाणिवेपासून सुरू होत असावं की जीवनावर आपला ताबा नाही, फक्त सहभाग आहे. आपण मालक नाही, निमित्त आहोत.
प्रत्येक सकाळ ही केवळ नवीन दिवसाची सुरुवात नसते; ती अस्तित्वाने दिलेली एक हळूवार आठवण असते
“ अजून तुझं कार्य संपलेलं नाही.”
जो मनुष्य रात्री झोपताना समर्पण आणि सकाळी उठताना कृतज्ञता अनुभवतो, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस साधनेसारखा होतो. त्याला उमगू लागतं – झोप ही केवळ विश्रांती नाही, आणि उठून बसणं ही केवळ दिनचर्या नाही…तो दररोज घडणारा एक अदृश्य आध्यात्मिक चमत्कार आहे.
ह्याची जाण ज्याला आली तो अध्यात्म तरला असेच म्हणावे लागेल.
*
लेखक:अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
☆ सहज विचार… – लेखक : अज्ञात – संग्राहिका : उषा सोमण ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆
☆
सहज-विचार (random thoughts)
जेव्हा मी सत्तरीत पाऊल ठेवलं, तेव्हा मी माझ्या जुन्या आरामखुर्चीवर शांतपणे बसले होते. पार केलेल्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना मी स्वतःशीच पुटपुटले, “बरं… तर हे कदाचित आयुष्याचं शेवटचं प्रकरण असावं.”
पण मी जितका विचार केला, तितकी मला एक आश्चर्यकारक गोष्ट जाणवली: आयुष्य संपत नव्हतं, तर ते फक्त सत्याचा उलगडा करत होतं.
ज्या गोष्टींवर मी कधीकाळी मनापासून विश्वास ठेवला होता, त्यातील अनेक गोष्टी केवळ आभास निघाल्या.
मुले? ती मोठी होतात आणि स्वतःचं वेगळं जग निर्माण करतात.
आरोग्य? ते तुमच्या कल्पनेपेक्षाही वेगाने अदृश्य होऊ शकतं.
सरकार? ते बहुधा फक्त हेडलाईन्स, आश्वासने आणि कागदावरचे आकडे असतात.
आणि वृद्धत्व… वृद्धत्व क्रूर असू शकतं. ते आधी तुमच्या शरीरावर नाही, तर तुमच्या आशेवर हल्ला करतं.
म्हणून मी काही कडू सत्यांशी, प्रामाणिक सत्यांशी तडजोड केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच सत्यांनी मला वाचवलं.
° मुलं तुम्हाला एकटेपणापासून वाचवू शकत नाहीत.
वर्षानुवर्षे आपण स्वतःला सांगतो,
“जेव्हा माझी मुलं मोठी होतील, तेव्हा मी कधीच एकटी नसेन. ती मला भेटायला येतील, माझी काळजी घेतील, माझ्या जवळ राहतील.”
हे एक सुंदर स्वप्न आहे.
पण वास्तवाचे बेत वेगळे असतात. मुलांकडे नोकऱ्या, बिलं, जोडीदार, जबाबदाऱ्या आणि त्यांची स्वतःची मुलं असतात. त्यांचे दिवस कामांनी भरलेले असतात आणि तुम्ही फक्त त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या मधली एक छोटी आठवण बनून राहता.
कधीकधी तुम्ही एखाद्या सणासारखी त्यांच्या फोनची वाट पाहता.
दिवस जातात.
आठवडे उलटतात.
आणि शेवटी एक मेसेज येतो:
“हाय मॅाम, आशा आहे की तू ठीक असशील.”
त्यांना आपली आठवण राहिली, या विचाराने तुम्ही हसता.
पण खोलीतला तो शांत एकटेपणा तसाच राहतो.
तेव्हा मला समजलं: मुलं हे एक वरदान आहेत, पण ती एकटेपणाविरुद्धचं संरक्षण कवच नाहीत.
° आरोग्य हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे.
एक दिवस असा येतो, जेव्हा पायऱ्या चढणं म्हणजे एखादा डोंगर चढल्यासारखं वाटतं. जेव्हा तुमचे गुडघे तुमच्या विचारांपेक्षा जास्त जोरात ‘बोलू’ लागतात. ज्या ठिकाणी तुम्ही एकेकाळी धावत जायचात, तिथे जाणं तुम्ही टाळता.
तेव्हा तुम्हाला समजतं: आरोग्य हे अनंत काळ टिकणारं नाहीये.
तीच तुमची खरी संपत्ती आहे.
आरोग्याशिवाय पैशाला काही अर्थ उरत नाही. ताकदीशिवाय स्वातंत्र्याची चमक कमी होते. जोपर्यंत तुमचं शरीर तुमचं ऐकतंय, तोपर्यंत त्याची काळजी घ्या.
° पेन्शन आणि पैसा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत
पेन्शन तुम्हाला जिवंत ठेवू शकतं, पण ते तुम्हाला ‘जगू’ देईलच असं नाही.
वर्षानुवर्षे माझा असा विश्वास होता की ही व्यवस्था आपली काळजी घेईल. दशकांच्या कामानंतर कोणीतरी म्हणेल, “आता विश्रांती घे. आम्ही आहोत ना.”
पण आयुष्य असं चालत नाही.
बिलं येतातच. औषधांचा खर्च वाढतो. महागाई वाढते. आणि अचानक तुम्हाला जाणवतं की जगणं महाग झालं आहे.
म्हणून मी एक निर्णय घेतला: आश्वासनांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. जेवढं शक्य आहे तेवढी बचत करा. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत कमवा. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी छोटीशी बचतही मोलाची ठरते.
°मी पाळत असलेले ५ नियम:°
°नियम १: पैसा हा अनेकदा मुलांपेक्षा जास्त भरवशाचा असतो.
हे ऐकायला कदाचित कठोर वाटेल, पण सत्य असंच असतं. मुलं म्हणजे प्रेम आहेत, आनंद आहेत, पण ती तुमचा ‘रिटायरमेंट प्लॅन’ नाहीत. स्वतःसाठी बचत करा. ती बचत तुम्हाला स्वातंत्र्य देते आणि स्वातंत्र्य तुम्हाला शांतता देतं.
°नियम २: तुमचं आरोग्य हेच आता तुमचं ‘फुल-टाईम’ काम आहे.°
तुमचा रोजचा पहिला विजय म्हणजे अंथरुणातून कोणत्याही वेदनेशिवाय उठणे. चाला, व्यायाम करा, साखर-मीठ कमी खा. आजार तुम्ही कोण आहात हे पाहत नाही, पण खबरदारी सर्व काही बदलू शकते.
°नियम ३: स्वतःच्या सहवासाचा आनंद घ्यायला शिका.°
कुणाची तरी वाट पाहणं दुःख निर्माण करतं. फोनची, भेटीची किंवा कोणीतरी आपल्याला आनंद देईल, याची वाट पाहू नका. स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करा. आवडता पदार्थ बनवा, एखादं चांगलं पुस्तक वाचा, जुनी गाणी ऐका. जिथे अपेक्षा संपतात, तिथे शांतता सुरू होते.
°नियम ४: वृद्धत्व म्हणजे ‘कमकुवत’ होण्याचा परवाना नाही.°
मी माझ्या वयाची अशी अनेक लोकं पाहते जी दिवसभर तक्रार करतात— “सगळं दुखतंय,” “कोणालाच काळजी नाही,” “जग खूप वाईट आहे.” मग हळूहळू लोक त्यांना भेटायला येणं बंद करतात. प्रेमाचा अभाव नसतो, पण सततची नकारात्मकता थकवणारी असते. तुमची जिद्दच आदर मिळवून देते. आयुष्य कितीही दुखत असलं, तरी ताठ मानेने जगा.
° नियम ५: भूतकाळ सोडून द्या.°
वृद्धत्वातील सर्वात धोकादायक शब्द म्हणजे “पूर्वी.” पूर्वी आयुष्य सोपं होतं, पूर्वी मुलं ऐकायची, पूर्वी जग चांगलं होतं. पण तो “पूर्वी” आता निघून गेला आहे. फक्त “आज” अस्तित्वात आहे. जर तुम्ही कालच्या आठवणीत जगलात, तर आज जे काही शिल्लक आहे तेही तुम्ही गमावून बसाल. मी आता जगायला शिकतेय. आठवणीत नाही, पश्चात्तापात नाही, तर या क्षणात.
वृद्धत्व ही एक परीक्षा आहे. ती तुमच्यासाठी दुसरं कोणीही देऊ शकत नाही. तुम्ही खुर्चीत बसून मदतीची वाट पाहत तक्रार करू शकता… किंवा दीर्घ श्वास घेऊन जे काही उरलं आहे, त्यातून पुन्हा आपलं आयुष्य उभारू शकता.
आणि जर तुम्ही तसं केलंत, तर तुम्हाला एक सुंदर गोष्ट सापडेल:
सत्तरीनंतरचं आयुष्य संपलेलं नसतं. त्यात अजूनही हास्य असू शकतं, शांतता असू शकते आणि एक अर्थ असू शकतो.
☆ “आम्ही मध्यमवर्गीय होतो…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆
साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी ‘मध्यमवर्गीय’ ही जमात अस्तित्वात होती. तसं तर संपूर्ण भारतभर ती पसरली होती, पण महाराष्ट्रात तिचा स्वतःचा असा ‘ब्रँड’ होता.
घरात एक कमावता पुरुष, दोन-तीन भावंडं, नवराबायको, कुठे कुठे आजी आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला, अशी एकूण कुटुंबसंस्था होती. एक कमावता आणि खाणारी तोंडं ५-६, हे चित्र सगळीकडे सारखंच होतं. काही ठिकाणी महिलावर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता, पण आजच्याइतका नाही. म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्रीवर्गाची सत्ता होती… एकहाती सत्ता! पण तिथलं तिचं स्वतःचं एक गणित होतं… पक्कं गणित..! त्यावरच सगळे हिशोब जुळत होते.
अन्नाच्या बाबतीत, “पोटाला खा हवं तेवढं, पण नासधूस नको, ” असा शिरस्ता होता. माझी आजी नेहमी म्हणायची, “खाऊन माजावं, पण टाकून माजू नये. “
कढी, पातळ भाजी, कालवण करायची त्या दिवशी वरण कमी लावायचं, आंब्याचा रस वगैरे असेल तर भाजी कमी करायची, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्याच तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या… अशी साधी साधी समीकरणं असायची. घरातली पुरुषमाणसांची आणि मुलांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या. उरलंसुरलं त्या खाऊन घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमागरम पिठलं असायचं. इतकंही करून पोळी-भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हायचा ‘कुचकरा’ किंवा ‘फोडणीचा भात’. जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे. सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न परस्पर मिटायचा.
मुलांची शाळा म्हणजे ‘टेन्शन’चा विषय नव्हता. आपली साधी मराठी शाळा. १००-१५० रू वर्षाची फी. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे. जरा मोठाधाटा युनिफॉर्म घेतला की सहज २ वर्ष जायचा.
पुस्तकांचा जरा ‘जुगाड’ असायचा. म्हणजे समजा ‘अ’ ने दुकानातून कोरीकरकरीत पुस्तकं विकत घेतली असतील, तर तो ती पुस्तकं वर्ष संपल्यावर ‘ब’ ला ७०% किमतीत विकायचा.. अन् मग ‘ब’ तीच पुस्तकं ‘क’ ला ४०% मधे विकायचपुस्तकाच्या या ३ वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजरत महल, अहिल्याबाई अशा ‘दूरदृष्टी’च्या व्यक्तिमत्त्वाला चष्मा लागायचा, कोणाला दागिने मिळायचे, तर कोणाला दाढी मिशी यायची. आणि हे असे उद्योग अ ब क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं.
बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाजं फिरत असायची. पण शाळेत असताना, ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला बॅकवॉटर अशी Destinations मला नकाशातसुद्धा कधी भेटली नाहीत.
पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा अशी बिनडोक कामे सहसा ‘अ’ करून मोकळा व्हायचा… म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त चित्रकलेतच “स्कोप” उरलेला असायचा. आणि त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानावर यायचा…
शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागत नसत. मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं, त्यांचे दप्तर- स्वेटर वापरणं ह्यात ‘इगो बिगो’ कोणाचा आड येत नव्हता. स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा. त्यातही लहान बाळाचा स्वेटर, कपडे, दुपटे, झबले इतके फिरायचे की त्याचा मूळ मालक कोण हेही कोणाला आठवायचं नाही.
पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. मुलींना “यंदा नापास झालीस किंवा कमी मार्क्स मिळाले तर तुझं लग्न लावून देवू.. ” आणि मुलांना, “तुला रिक्षा घेवून देवू चालवायला” अशी ‘जागतिक’ धमकी मिळायची..
SSC नंतर कुठल्या शाखेकडे जायचं, कोणता कोर्स करायचा, घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली स्थळं… Proposals.. हे आजच्या काळातले ‘Highly Personal Issues’ त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिले जात. हातपाय पसरायला लागते, तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात Space. बाकी सगळा ‘लेकुरवाळा’ कारभार!!
आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा ‘बाबा’ लोकांचा प्रांत होता. प्रत्येक बाबांच्या तीनचार तरी RD, LIC काढलेल्याच असायच्या… आणि त्यासुद्धा बहुतेक वेळा एजंटवरील प्रेमापोटी! बाकी शेअर्स, Mutual Fund वगैरेचा ‘एजंट’ त्या काळी उदयाला आलेला नव्हता आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याच, तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमीशनला सुरुंग लागायचा… Share market म्हणजे जुगार.. हा ‘समज’ अगदी पक्का होता..
‘फॅमिली डॉक्टर’ हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा. आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे. तसे ते डॉक्टर पण ‘नीतिमत्ता’ वगैरे बाळगून होते. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी करायला सांगायचे नाहीत.. गरज असेल तरच करूया, पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल, असा त्यांचा ‘व्यावहारिक’ पवित्रा असायचा.
जसा ‘फॅमिली डॉक्टर’ तशीच एक फॅमिली ‘बोहारीण’ पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण.. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत.. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे. मग ही ‘बोहारिण’ एका दुपारी अवतरायची.. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने, आई जरा वैतागलेली असायची.. भलं मोठं कपड्यांचं गाठोडं विरुद्ध चहाची गाळणी अशी ‘तहा’ ला सुरवात व्हायची.. तिची गाळणी खपवायची घाई.. तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा! खूप घासाघीस करून ‘Deal’ चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची.. ह्या कार्यक्रमात २-३ तास आरामात जायचे, शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या. शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..
खरं सांगू का.. मध्यमवर्गीय ही काही ‘परिस्थिती’ नाहीये, ती ‘वृत्ती’ आहे… साध्या, सरळ, कुटुंबवत्सल, पापभीरू माणसांची. मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा ‘कणा’.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे.. आम्हीच आहोत नियमित ‘कर’ भरणारे, वाहतुकीचे काटेकोर ‘नियम’ पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत ‘मतदान’ करणारे. असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा..
अचानक १९९०-९१ मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.. ते आमच्या पर्यंत यायला १०-१२ वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याच, ‘ वादळ ‘ झालं होत.. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीयपण..
प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही… अचानक ‘प्रोफेशनल’ झालो. माणसामाणसातलं आपलेपण कोरडं झालं. कालांतराने ते भेगाळलं.
पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या. Busy Schedule, Deadlines, Projects Go Live अश्या ‘गोंडस’ नावाखाली आम्ही ते स्वीकारलं. गलेलठ्ठ पैकेजेस मध्ये गुंडाळला गेला आमच्यातला चांगुलपणा, प्रेमळपणा आणि आपलेपणासुद्धा.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्वामी विवेकानंद म्हणतात… – लेखक: स्वामी विवेकानंद☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
(पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)
☆
धर्मसंबंधीच्या सर्व संकुचित, मर्यादित, कलहप्रसू, आक्रमक कल्पना आता लयास जावयास हव्यात. धर्मसंबंधीच्या साऱ्या पंथनिष्ठ, जमातनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ कल्पना टाकून द्यावयास हव्यात. प्रत्येक जाती-जमातीचा फक्त स्वतःचा असा एकेक विशिष्ट देव असावा आणि स्वतःखेरीज इतर सगळ्यांचा देव खोटा आहे असे प्रत्येकाने मानीत असावे ही भ्रामक, वेडगळ समजूत आता भूतकाळात जमा व्हावयास हवी. असल्या सगळ्या कल्पनांचा सपशेल त्याग करावयास हवा.
धर्मांनी समावेशक वृत्ती धारण केली पाहिजे, ईश्वरविषयीच्या त्यांच्या विशिष्ट कल्पना इतरांहून वेगळ्या आहेत एव्हढ्याचसाठी त्यांनी तिरस्काराने एकमेकांना तुच्छ न लेखले पाहिजे. मी आपल्या आयुष्यात अशी कितीतरी धार्मिक माणसे पाहिली आहेत, अशी समंजस माणसे पाहिली आहेत की ज्यांचा ईश्वरावर, आपण त्या शब्दाचा जो अर्थ करतो त्या अर्थाने मुळीही विश्वास नाही. कदाचित तुम्हा-आम्हाला कधी कळू शकला असेल त्यापेक्षा कितीतरी चांगल्या रीतीने ईश्वर त्यांना कळला आहे.
धर्मांनी, त्यांच्या ठायी प्रचंड शक्ती वसत असल्यामुळे, जगाचे भले करण्यापेक्षा त्याचे नुकसानच जास्त केले आहे, आणि असे होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा संकुचितपणा आणि विशिष्ट सीमांमध्येच घुटमळत राहण्याची त्यांची प्रवृत्ती.
– स्वामी विवेकानंद (पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)
☆
लेखक: स्वामी विवेकानंद
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “दिखाव्याचा ‘मदर्स डे’ आणि एकाकी ‘आई…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆
मे महिन्याचा दुसरा रविवार उजाडतो आणि अचानक संपूर्ण आभासी जग (Social Media) भावूक होतं. मोबाईलच्या स्क्रीनवर ‘Happy Mother’s Day’ चे स्टेटस झळकू लागतात. कुणी फुलांचा गुच्छ देतं, कुणी केक कापतं, तर कुणी आईसोबतचं एखादं जुनं कृष्णधवल छायाचित्र शेअर करतं. दिवस संपतो, त्या फोटोंवरचे ‘लाईक्स’ मोजून आपण सुखावून जातो आणि पुन्हा आपल्या दिनचर्येत व्यस्त होतो. पण या उत्सवाच्या झगमगाटात एक जळजळीत प्रश्न उभा राहतो — मदर्स डे म्हणजे कॅलेंडरने दिलेला केवळ २४ तासांचा तुकडा आहे, की तो आपल्या बोथट होत चाललेल्या संवेदनांना आरसा दाखवणारा एक क्षण?
भारतीय संस्कृतीने आपल्याला ‘मातृदेवो भव’ हा मंत्र दिला. तैत्तिरीय उपनिषदातील हा विचार केवळ भिंतीवर टांगण्यासाठी किंवा भाषणात वापरण्यासाठी नव्हता, तर ते एक मूलभूत जीवनमूल्य होतं. घराच्या देव्हाऱ्यात देव असतोच, पण एका बालकाच्या जगात देवाची पहिली सगुण प्रतिमा ही आईच्या रूपातच उभी राहते. देव निराकार असतो, पण आई साकार असते—स्पर्शात, शब्दात आणि नजरेत. मात्र, आज हेच ‘दैवत’ अनेक ठिकाणी वृद्धाश्रमांच्या उंबरठ्यावर का दिसते? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. आपण भक्तीचा उच्चार तर मोठमोठ्याने करतो, पण व्यवहारात मात्र स्वतःची ‘सोय’ बघतो. आईच्या अथांग कष्टांच्या पायावर आपल्या आयुष्याची देखणी इमारत उभी राहिली; पण तिच्या वार्धक्यात तिला पेलताना आपल्याला ‘जागा नाही’, ‘वेळ नाही’ किंवा ‘परिस्थिती नाही’ या सबबी आठवू लागतात. आईने मात्र आपल्याला वाढवताना कधीही ‘परिस्थिती’ची अट घातली नव्हती, हे आपण सोयीस्करपणे विसरतो.
आजच्या आधुनिक आणि तथाकथित प्रगत जगात काही जण केवळ बुद्धीची कसरत करत असं मांडतात की, “आपण आईच्या उदरातून आलो, म्हणून तिचा आपल्यावर मालकी हक्क नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि जन्म घेणं हा केवळ एक जैविक ‘इन्सिडन्ट’ (योगायोग) आहे.” तत्त्वज्ञान म्हणून हे ऐकायला आकर्षक वाटतं, कारण ते जबाबदारीतून मुक्त करतं. मान्य आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि नातं म्हणजे गुलामगिरी नव्हे. पण नातं हे केवळ जैविक नसतं, ते ‘ऋणाचं’ असतं. आणि ऋण म्हणजे ओझं नव्हे, तर ते कृतज्ञतेचं भान असतं. आपल्या पहिल्या भीतीला जिने कुशीत घेतलं, आपल्या पहिल्या पडण्यावर जिने मायेची फुंकर मारली आणि आपल्या पहिल्या यशात जिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले, त्या नात्याला केवळ ‘योगायोग’ म्हणणं ही हृदयाशी केलेली प्रतारणा आहे. बुद्धीला ते पटू शकतं, पण हृदयाला ते कधीच शिवणार नाही.
आई ही कोणी परिपूर्ण ‘देवी’ नाही. ती एक हाडामांसाची माणूस आहे. तिलाही अपेक्षा असतात, तिच्याही मर्यादा असतात आणि तिच्याकडूनही चुका होऊ शकतात. म्हणूनच ती आपल्याला अधिक जवळची वाटते. आपण तिला देव्हाऱ्यात बसवतो आणि तिच्याकडून ‘त्याग’ आणि ‘सहनशक्ती’ची अपेक्षा करतो. पण तिला देव्हाऱ्यापेक्षा तुमच्या सोफ्यावर बसून तुमच्याशी दोन शब्द बोलायचे असतात. म्हणूनच मदर्स डे हा केवळ उत्सवाचा क्षण नसावा, तर तो आत्मपरीक्षणाचा क्षण असावा. आपण शेवटचं आईशी निवांत कधी बोललो? तिच्या आरोग्याची मनापासून विचारपूस कधी केली? तिला एखादं महागडं गिफ्ट देणं सोपं असतं, पण तिला आपला ‘वेळ’ देणं कठीण असतं. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट टाकणं सोपं असतं, पण तिच्या वाढत्या वयातील हट्टासमोर संयम बाळगणं कठीण असतं.
आईचा खरा सन्मान म्हणजे तिच्या वार्धक्यात तिच्या थरथरत्या हाताला आधार देणं. तिच्या एकटेपणाला आपली जिवंत उपस्थिती देणं आणि तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी तिला ‘ओझं’ नव्हे तर ‘आपलं’ असल्याची जाणीव करून देणं. ‘मातृदेवो भव’ हा मंत्र उच्चारण्यासाठी नसून तो जगण्यासाठी आहे. भावना व्यक्त करणं सोपं असतं, पण जबाबदारी उचलणं कठीण असतं. ही जबाबदारी म्हणजे केवळ आर्थिक तरतूद नव्हे, तर तिला आदराचं स्थान देणं होय.
कॅलेंडरवर ‘मदर्स डे’ दरवर्षी येईल आणि जाईल. पण आईचा वरदहस्त आपल्या डोक्यावर किती काळ राहील, याची कोणतीही शाश्वती नाही. फुले देण्यापेक्षा तिला मानसिक आधार द्या. पोस्ट टाकण्यापेक्षा तिच्या शेजारी बसून तिचं ऐकून घ्या. ज्या दिवशी घरातील आई खऱ्या अर्थाने आनंदी आणि समाधानी असेल, तो प्रत्येक दिवस ‘मदर्स डे’ ठरेल. कारण आईची सावली असेपर्यंतच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित असतं.
तिच्या सुरकुतलेल्या कपाळावर, तुझ्या सुखाचा इतिहास आहे,
तिच्या थरथरत्या हातांमध्येच, जीवनाचा विश्वास आहे…
तिची सोबत आहे तोवर तिचं हसणं कमावून घे,
मदर्स डे च्या स्टेटस पेक्षा, तिचं मन कुरवाळून घे!
वेळ निघून गेल्यावर रडून, काहीच साध्य होणार नाही,
आई नावाचं विद्यापीठ, पुन्हा पुन्हा मिळणार नाही…
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈