मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ काही ‘अलिखित’ नियम… लेखक : श्री प्रसन्न पेठे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ काही ‘अलिखित’ नियम… लेखक : श्री प्रसन्न पेठे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

हे माहित असेलच पण तरीही….

काही काही नियम हे ‘अलिखित’ असतात. म्हणजे ते कुठे लिखित स्वरूपात, छापील स्वरुपात नसले तरी जगभर शिष्टाचार-स्वरुपात पाळले जातात.

पूर्वीच्या काळच्या झुंजार राजांची, पराक्रमी योद्धयांची जी अश्वारूढ शिल्पं घडवतात, त्यात एक शिष्टाचार पाळला जातो तो असा –

(१) जर का तो योद्धा लढाई लढत असताना, रणांगणावर झुंजताना मरण आलं असेल, तर तो स्वार असणाऱ्या घोड्याचे पुढचे दोन पाय हवेत दाखवतात.

(२) जर का त्या योद्ध्याला युद्धात जखमा होऊन प्रत्यक्ष युद्धभूमीपासून दूर मरण आलं असेल, तर तो स्वार असणाऱ्या घोड्याचा एकच पाय हवेत असतो असं दाखवतात.

(३) जर तो योद्धा घोड्याच्या बाजूला घोड्याजवळ लगाम धरुन उभा दाखवला असेल, तर त्याचा अर्थ तो योद्धा आणि त्याचा घोडा दोघांना लढाईत मरण आलेलं असतं.

(४) जर तो स्वार असलेल्या घोड्याचे चारही पाय जमिनीवर टेकलेले असतील, तर त्याचा अर्थ त्या योद्ध्याला लढाईखेरीज वेगळ्या कारणाने मरण आलेलं असतं.

लेखक : श्री प्रसन्न पेठे

प्रस्तुती :  सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाची अफाट शक्ती… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाची अफाट शक्ती… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या ५-१५ वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की, हे संपूर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच असतात व मी जगायला लायक नाही.

ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’ होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचत. पुढे वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की, ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही.

 – पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली.

त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) न करता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. पुढे ९० व्या वर्षापर्यंत जगभर लेक्चर देत फिरत होत्या.

त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे ‘यू कॅन हील युवर लाईफ’. त्या पुस्तकाच्या शेवटच्या काही पृष्ठांमध्ये तर त्यांनी एक तक्ता दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आजार, दुसऱ्या स्तंभामध्ये त्यामागील नकारात्मक भावना व तिसऱ्या स्तंभामध्ये कशाप्रकारे सकारात्मक विचार करा म्हणजे तो आजार बरा होईल असे दिले आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सर पर्यंत सर्व आजारांच्या मागच्या नकारात्मक भावनांचा त्यामध्ये समावेश आहे. हा तक्ता आपल्या मनाची स्वच्छता करायला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

दुसरे उदाहरण ‘ब्रँडन बेज’ यांचे. त्यांना स्वत:ला फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर पोटामध्ये होता. बऱ्याच दिवसांपासून पोट सुटल्यासारखं वाटतंय म्हणून रूटिन चेकअपसाठी सोनोग्राफी केली, तेव्हा एवढा मोठा ट्युमर डॉक्टरांना दिसला. त्यांच्या गायनॅकॉलाजिस्ट (स्त्री रोग तज्ज्ञ) तर उडाल्याच. त्या म्हणाल्या, लगेच अ‍ॅडमिट होऊन उद्याच्या उद्या ऑपरेशन करून काढून टाकू. पण ब्रँडन बेज यांना मन, भावना व शरीराच्या संबंधांविषयी चांगली माहिती असल्याने त्या म्हणाल्या, “मला एक महिन्याची मुदत द्या. समजा काही उपयोग नाही झाला तर ऑपरेशन करा. “

एक महिनाभर त्यांनी स्वत:च्या मनाची स्वच्छता केली व जुन्या अनावश्यक आठवणी खणून बाहेर काढल्या व टाकून दिल्या. त्याच्याशी निगडित लोकांना माफ केलं. महिनाभराने सोनोग्राफीत ट्युमरचा आकार निम्म्याने कमी झाला व पुढील तीन महिन्यांत सोनोग्राफी नॉर्मल आली. इतरांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी ‘The Journey’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. तसेच ही पद्धत शिकवणारा तीन दिवसांचा कोर्सही सुरू केला आहे. त्या कोर्सचा अनेकांना खूपच उपयोग झाला.

तसेच आपल्या देशातील डॉ. दीपक चोप्रा हे एक प्रख्यात एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहेत व अमेरिकेतील एका प्रसिद्ध हॉस्पिटल मध्ये प्रमुख पदावर होते. ते म्हणायचे की, मी अगदी मनापासून कॅन्सरच्या गाठी मुळापासून कापतो, So ideally it should not recur. खरं म्हणजे ते पुन्हा होता कामा नये. पण तरीही recurrence का बरं होतो?

जेव्हा त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की, जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा मलम लावलं तर ती जखम लवकर बरी होते. पण समजा नाही लावलं तरीही ती जखम बरी होतेच. कोण बरं ही जखम बरी करतं? आपलंच शरीर.

जखमेच्या शेजारील mother cells पासून daughter cells तयार होतात व जखम भरून येते. सर्वसाधारणपणे आईचे जसे संस्कार, मानसिकता असेल तशीच मुलीची होते. आपल्या नकारात्मक भावना वेगवेगळ्या पेशींमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे ट्युमर कापला तरी तिथे जी जखम होते, ती बरी करण्याचं काम तिथल्या mother cells करतात.

पण त्यामध्ये जर नकारात्मक भावना साठवल्या असतील तर नवीन पेशी परत तशाच तयार होणार. त्यामुळे वर-वर फांद्या छाटून उपयोग नाही तर झाड मुळापासून काढायला हवं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी medical practice बंद केली व आता ते पूर्णपणे cellular healing वर काम करतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला मनाची स्वच्छता करायला शिकवतात.

त्यामुळे जर आपण सर्वांनी स्वत:साठी रोजची १५ मिनिटे काढली व मनाची स्वच्छता केली तर आपण कमीत कमी आजारी पडू. बरं मनाची स्वच्छता करताना एखाद्या दिवशी खूपच छान व हलके वाटते पण दुसऱ्या दिवशी परत काहीतर घटना घडतात आणि ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे मनात नकारात्मक विचार यायला लागतात.

दारुड्या माणसाला तुम्ही कितीही समजवा की दारू पिणे वाईट आहे व त्याला ते पटते सुद्धा. पण दारूचे दुकान दिसल्यावर पाय बरोबर तिकडे वळतात. त्याचप्रमाणे आपण अगदी ठरवतो सुद्धा की, फक्त सकारात्मकच विचार करायचे. पण एक ठिणगी पुरेशी होते की, लगेच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. पण हे अगदी नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे घरातील धूळ रोज साफ करावी लागते, त्याचप्रमाणे मनाची स्वच्छताही रोज करणे आवश्यक आहे.

प्रयोग म्हणून करून तर पहा. मी जोपर्यंत स्वत: कोणती गोष्ट करून अनुभवून पहात नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हीही ठेवू नका. पण एकदा तुम्हाला अनुभव आला की, मला खात्री आहे की, रोज ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात घासायला, अंघोळ करायला, हातपाय धुवायला विसरत नाही, त्याप्रमाणे एकदा तुम्हाला मनाची स्वच्छता करण्याची सवय लागली की, तुम्ही कधीच ही सवय सोडणार नाही.

सर्वांना निरामय आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

आपण सर्व आरोग्यदायी जीवन जगत इतरांना प्रेरित कराल ही अभिलाषा!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तीन तिघाडा…!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

??

☆ “तीन तिघाडा…!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

रायगडमधली सगळी कामं आटवून मी सिद्धार्थ जाधव नावाच्या माझ्या कॉलेज मित्राच्या घरी जेवण केलं. मुंबईमधल्या माणसाला कोणाच्या घरी जाऊन जेवायचं म्हटलं की जरा अडखळल्यासारखं वाटतंच. आणि ते जेवण जर एखाद्या गावच्या ठेवणीत आईच्या स्पर्शाने बनवलं असेल, तर त्याची मजा काही औरच. सिद्धार्थ आणि मी तसे नांदेड जिल्ह्यातले. त्याच्या आईची जुनी ओळख, मग काय — आईने पक्का मराठवाडी जेवणाचा बेत आखला आणि जोरदार जेवण झाले.

जेवण झाल्यावर मी पुढच्या रस्त्याला निघालो. गाडी सुरू होती. मी माझ्या लॅपटॉपवर माझीच प्रेमसेतू नावाची कादंबरी वाचत होतो. बराच वेळ प्रवास झाल्यावर “फणसाड अभयारण्य” असा बोर्ड वाचायला मिळाला. पुढे मुरुड-जंजिरा आणि रोहे अशी शहरे आसपास असल्याचं फलकावरून जाणवलं. त्या रस्त्यावर मध्ये येणारी माणसं — जंगलातून रस्त्यावर प्रवास करणारी माणसं; कोणी फळं विकत होतं, कोणी लाकडं वाहत होतं, कुणी गुरेढोरे चारण्यासाठी जंगलामध्ये ये-जा करत होतं.

जंगलाच्या आतमध्ये थोडं पुढे गेल्यावर माणसांची वर्दळ जरा कमी झाली. एका वाहणाऱ्या शांत आणि निरागस झऱ्यावर माझी नजर गेली. तिथे प्रचंड शांतता होती. आसपास असणारं वातावरण मनाला मोहिनी घालत होतं. मी सगळीकडे पाहिलं — आसपास कोणीही नव्हतं. कदाचित म्हणूनच इथल्या वातावरणामध्ये एक वेगळी शांतता होती.

माझ्यासोबत असलेला शंकर नावाचा माझा चालक मला म्हणाला, “साहेब, तुम्ही त्या झऱ्याकडे पाहत आहात; पण त्याच्या थोडं पलीकडे पहा. ” मी पाहिलं तर एका बाजूला दोन-चार मोर एका झाडाखाली बागडत होते. त्या मोरांच्या पलीकडे, दोन छोटे-छोटे हरणाची पिल्लं पाणी पिण्यासाठी पाऊलवाटेने पाण्याच्या दिशेने जात होती. आम्ही गाडीचा आवाज न करता शांतपणे तिथेच थांबलो होतो.

असं वाटत होतं की माणसाने त्या सगळ्या प्राण्यांच्या विश्वावर प्रचंड अतिक्रमण केलं आहे. बिचाऱ्या प्राण्यांना माणसाने कुठेच सोडलेलं नाही.

माझ्या चालकाने मानेखालची शीट लांब केली आणि त्या लिंबाच्या झाडाखाली रस्त्यावर शांतपणे त्या शीटवर पडला. सिद्धार्थच्या आईचं जेवण त्याच्या अंगाला लागलं होतं, हे माझ्या लक्षात आलं. मी लॅपटॉप आवरला आणि चालकाला आवाज देत म्हणालो, “अरे, मी जरा आलोच. ” ड्रायव्हरने लावलेले डोळे थोडेसे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं. मी गेल्याची खात्री करून तो अजून शांततेत पडून राहिला.

मला दुरून दिसणाऱ्या त्या झऱ्यापर्यंत मी चालत गेलो. मी जाईपर्यंत त्या हरणांचं पाणी पिणं झालं होतं. माझ्या पावलांच्या चाहुलीने ते मोर केव्हाच पळाले होते. आता मी तिथली शांतता आणि ते पाण्याचे वाहणारे झरे — अशा आमच्यातच न बोलताही गप्पा सुरू होत्या. मी बूट काढले आणि शांतपणे त्या पाण्यात पाय सोडून बसलो.

त्या जागेवर खऱ्या अर्थाने सांगायचं तर शांत जगाची चाहूल लागली होती — म्हणजे माणसं नाहीत, वाहनांची जवळजवळ ये-जा नाही, मोबाईलला रेंज नाही, कोणाचं बंधन नाही, कुठल्या फॅक्टरीचा किंवा विमानाचा आवाज नाही.

मला असं वाटलं होतं की थोडा वेळ झाल्यावर माझा चालक मला शोधत-शोधत तिकडे येईल आणि म्हणेल, “चला, उशीर झाला”; पण तो कशाचा येतोय! शांत ठिकाणी आणि लिंबाच्या झाडाखाली त्याला लागलेली झोप अधिकच गाढ स्वरूपाची होती, हे त्याच्या न येण्यामुळे मी समजून गेलो.

पुढच्या प्रवासाला लागावं, या हेतूने मी उठणार तितक्यात दोन महिला आणि एक मुलगी डोक्यावर लाकडांच्या मोठ्या मुळ्या घेऊन येताना मी पाहिल्या. त्या तिन्ही माझ्या अगदी जवळ आल्या. त्यांनी अलगदपणे त्या लाकडाच्या मुळ्या खाली ठेवल्या आणि मी ज्या ठिकाणी पाय सोडून बसलो होतो त्या झऱ्याचं पाणी गटागट पिऊ लागल्या. पाणी प्यायल्यावर त्यांचा थकलेला चेहरा एकदम प्रसन्न झाला.

त्या सुनसान जागी, जिथे सगळीकडे “सावधान” असे बोर्ड लावलेले होते, जिथे माणसांचा-पक्ष्यांचा फारसा थारा नव्हता, तिथे या दोन महिला आणि एक मुलगी एवढ्या जड लाकडं घेऊन कुठे जात असतील? हे रोजचं त्यांचं काम असेल का? यांना इथल्या हिंस्र प्राण्यांची भीती वाटत नसेल का? असे प्रश्न माझ्या मनात आले.

मी त्यांना बोलावं का, आणि बोलल्यावर त्यांना आवडेल का, हा प्रश्नही मनात आला. पण मी संकोच न ठेवता मोठ्याने आवाज दिला —

“ताई, हे पाणी काय पाईपलाईनचं आहे का?”

मी ज्यांना प्रश्न विचारला, त्या बाईने दुसऱ्या बाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं, पदरानं चेहरा पुसला आणि हसत म्हणाली,

“दादा, हे जंगलातून येणारं पाणी आहे. इथे कुठली पाईपलाईन आली आहे?”

मी विचारलं, “बारा महिने पाणी असतं का?”

ती म्हणाली, “हो, इथे नेहमी पाणी असतं. ”

मी विचारलं, “तुम्ही कुठे राहता?”

हे ऐकल्यावर तिचा सूर थोडा आवरलेला झाला, “बाजूलाच राहतो, ” एवढंच उत्तर दिलं.

मी म्हणालो, “बरं ताई, ठीक आहे, मी निघतो. ”

त्यावर ती म्हणाली, “दादा, जरासा हात लावाल का, ही लाकडं उचलायला?”

मी हसलो, “हो का नाही, नक्की. ”

पण तिनं लगेच म्हटलं, “असू द्या, दादा. आम्ही थोडं खातो, थोडा वेळ बसतो, मग निघतो. ”

मी हो म्हणून मान हलवली.

तिने पिशवीतून भाकरी काढली. त्या खात होत्या. त्या दोन मोठ्या महिलांना मला बोलायला संकोच वाटत होता, पण धाकटी मुलगी मोकळेपणाने बोलत होती.

ती म्हणाली, “दादा, तुम्ही आमच्या सरांसारखे दिसता. तुम्ही पण शिक्षक आहात का?”

मी हसत उत्तर दिलं, “नाही, मी पुस्तकं लिहितो, लेखक आहे. ”

ती म्हणाली, “थोडं खाल का भाकरी?”

मी म्हणालो, “नको, मी आत्ताच जेवलो. ”

ते ऐकून दुसरी महिला म्हणाली, “अगं, एवढे मोठे माणसं आहेत, तुझा चटणी-भाकरीचा तुकडा खातील का?”

हे ऐकून मुलीचा चेहरा पडला.

मी म्हणालो, “अहो, अन्नापुढे लहान-मोठं असतं का? दे, अर्धी भाकरी मलाही द्या, मी खातो. ”

माझं ऐकताच ती मुलगी पटकन उठली. तिनं भाकरीचा एक तुकडा मोडला, त्यावर चटणी लावली, एक मिरची ठेवली आणि मला दिली.

तो घास तोंडात जाताच माझ्या मनानं सिग्नल दिला — हा मेनू झकास आहे! हॉटेलमधून सोन्याचा चमचा घेऊन खाण्यापेक्षा हा मानपानानं दिलेला घास कितीतरी मौल्यवान होता.

जेवताना गप्पा सुरू झाल्या. त्यातून त्यांच्या जगण्याच्या गोष्टी उलगडल्या.

सर्वसामान्य माणसाला रोज पोटाची आग भागवण्यासाठी काय काय उपाय करावे लागतात, हे लाल दिव्याच्या गाडीत बसून योजना करणाऱ्यांना कळणारच नाही.

ती एक मुलगी आणि त्या दोन महिला माझ्यासाठी जिवंत केस स्टडी होत्या — गरिबी आणि लाचारीत जगणारा महाराष्ट्र माझ्यासमोर उभा राहिला. पण या गरिबीतही त्यांनी आपला स्वाभिमान कधीच विकला नव्हता — हाच महाराष्ट्राचा चेहरा आहे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Just do it, then fix it… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ Just do it, then fix it… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

बर्था बेंझ

Just Do it, then fix it !

ही गोष्ट आहे १८८८ सालची. जर्मनीतील एक तरुण गृहिणी, बर्था, आपल्या पतीबद्दल काळजीत होती. तिने कार्ल नावाच्या एका हुशार संशोधकाशी लग्न केलं होतं, कारण तिला त्याच्या प्रतिभेवर प्रचंड विश्वास होता. लग्नामध्ये तिने माहेरून मोठी रक्कम आणली होती, ज्यातून कार्लने त्याच्या सर्वात मोठ्या शोधासाठी, ‘मोटरवॅगन’साठी पैसा गुंतवला होता. ही मोटरवॅगन म्हणजे जगातील पहिल्या इंजिन (internal-combustion engine) असलेल्या तीन चाकी गाडीचा एक नमुना होता.

बर्थाचा पतीवरील विश्वास बरोबर होता, कार्ल खरंच एक हुशार संशोधक होता. पण त्याची एक मोठी अडचण होती – त्याला आपल्या कामाचं मार्केटिंग अजिबात जमत नव्हतं. त्याने एकही गाडी विकली नव्हती. लोक त्याच्या ‘मोटरवॅगन’कडे फक्त एक खेळणं किंवा कुतूहलाची वस्तू म्हणून पाहत होते. या गाडीचं मार्केटिंग कसं करावं, हे कार्लला कळतच नव्हतं. तो फक्त आपल्या गाडीचं डिझाईन अधिकाधिक सुधारण्यात वेळ घालवत असे.

पण बर्था अधिक व्यवहारी होती. तिला माहित होतं की लोकांना फक्त बोलून पटणार नाही, तर त्यांना पुरावा हवा होता. ‘मोटरवॅगन’ हे फक्त एक खेळणं नसून, ते घोडागाडीसारखं सर्व काम करू शकते, हे सिद्ध करण्याची गरज होती.

एके दिवशी सकाळी, तिने कार्लसाठी एक चिठ्ठी लिहिली. त्यात लिहिलं होतं की, “मी आपल्या १३ आणि १५ वर्षांच्या दोन्ही मुलांना घेऊन माझ्या आईकडे जात आहे. ” तिची आई १०० किलोमीटर दूर राहत होती. त्यामुळे कार्लला वाटलं की ती ट्रेननेच जाईल. पण जेव्हा त्याने गॅरेजचा दरवाजा उघडला, तेव्हा त्याच्या काळजात धस्स झालं.

त्याची ‘मोटरवॅगन’ गायब होती! त्याला विश्वासच बसेना. ‘ती गाडी घेऊन तर नाही ना गेली?’ तो स्वतःशीच पुटपुटला. त्या गाडीत फक्त दहा मैल (अंदाजे १६ किमी) चालेल एवढंच इंधन होतं आणि वाटेत इंधन भरण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. शिवाय, पक्के रस्ते नव्हतेच, फक्त खडबडीत आणि खाचखळग्यांच्या पायवाटा होत्या. त्या रस्त्यांवर त्याच्या ‘मोटरवॅगन’चे तुकडे तुकडे झाले असते. हे निव्वळ वेडेपणाचं धाडस होतं.

पण बर्थाने ते धाडस केलं होतं. तिने प्रवासात येणाऱ्या अडचणींचा कोणताही विचार केला नव्हता. तिने ठरवलं होतं की समस्या जशा येतील, तशा त्या सोडवायच्या.

पहिली समस्या लगेचच समोर आली – गाडीतलं पेट्रोल संपलं. बर्थाला माहित होतं की ‘लिग्रोइन’ (Ligroin) नावाचं पेट्रोल-आधारित द्रावक (solvent) अनेक औषधांच्या दुकानात मिळतं. तिने एका छोट्या गावात औषधांचं दुकान शोधलं आणि तिथे एक-एक लीटरच्या दहा बाटल्या विकत घेतल्या. (आणि अशाप्रकारे, तिने नकळतपणे जगातल्या पहिल्या ‘पेट्रोल पंप’ची कल्पना प्रत्यक्षात आणली होती.)

थोड्या वेळाने, दोन तारा एकमेकांना चिकटल्या आणि गाडीची इलेक्ट्रिकल सिस्टीम बंद पडली. बर्थाने त्या तारांना वेगळं करण्यासाठी ‘गार्टर’ (garter – एक कपडा) वापरला आणि तारांना एकमेकांपासून दूर ठेवलं. (आणि अशाप्रकारे, तिने ‘इन्सुलेशन’च्या प्राथमिक स्वरूपाचा शोध लावला होता.)

पुढे गेल्यावर, कार्बोरेटरमध्ये कचरा अडकला आणि गाडी बंद पडली. फुंकर मारूनही तो कचरा निघेना. तेव्हा बर्थाने आपल्या हॅटला लावलेली लांब ‘पिन’ (hatpin) काढली आणि तिने कार्बोरेटर साफ केला. (आणि अशाप्रकारे, तिने एका अर्थाने ‘रोडसाईड असिस्टन्स’ची सुरुवात केली होती.)

प्रवासात गाडीचे लाकडी ब्रेक-ब्लॉक घासून घासून गुळगुळीत झाले होते. ब्रेक लागेनासे झाले. तिने एका गावातल्या चांभाराला शोधून काढलं आणि त्याला त्या लाकडी ब्लॉक्सच्या आकाराचे दोन चामड्याचे तळवे बनवायला सांगितले. (आणि अशाप्रकारे, तिने आजच्या ‘ब्रेक-पॅड’ची कल्पना जन्माला घातली होती.)

अखेरीस, एक उंच डोंगर आला, जो गाडीचं लहान इंजिन चढू शकत नव्हतं. गाडीत फक्त दोनच गिअर होते, कारण ती फक्त सपाट जमिनीवर चालवण्यासाठी बनवली होती. बर्थाने आणि तिच्या दोन्ही मुलांनी गाडीला धक्का मारत डोंगर चढवला. तेव्हा तिला कळलं की डोंगर चढण्यासाठी गाडीला कमी ताकदीचा ‘लोअर गिअर’ असणं गरजेचं आहे.

अखेरीस, अनेक अडचणींवर मात करत ती तिच्या आईच्या घरी पोहोचली. तिने लगेच आपल्या पतीला तार (telegram) करून आपण सुरक्षित पोहोचल्याचं कळवलं. दुसऱ्या दिवशी, ती त्याच गाडीने १०० किलोमीटरचा परतीचा प्रवास करून घरी परत आली.

तिने दोन दिवसांत २०० किलोमीटरचा प्रवास करून हे सिद्ध केलं होतं की, तिच्या पतीची ‘मोटरवॅगन’ घोडागाडीपेक्षा कमी नाही. तिच्या या धाडसी प्रवासाची बातमी संपूर्ण जर्मनीत वाऱ्यासारखी पसरली. लोकांचा ‘मोटरवॅगन’कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि कार्लच्या कंपनीला प्रचंड यश मिळालं.

बर्थाचं माहेरचं आडनाव ‘रिंगर’ होतं, पण तिचं सासरचं आडनाव होतं ‘बेंझ’ आणि तिच्या पतीचं नाव होतं ‘कार्ल बेंझ’. बेंझ कंपनी यशस्वी झाली. कालांतराने १९२६ मध्ये तिचं ‘डेमलर’ (Daimler) कंपनीत विलीनीकरण झालं आणि जगातली सर्वात प्रसिद्ध कंपनी ‘मर्सिडीज-बेंझ’ (Mercedes-Benz) उदयास आली.

बर्था बेंझच्या या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो? आपण हे शिकू शकतो की, “सर्व काही योग्य होण्याची” वाट पाहत बसल्याने समस्या कधीच सुटत नाहीत. आपल्याकडे उत्तरं नसली तरीही सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, कारण समस्या कधीच आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाहीत. आपण विचार करत बसलो, तर संधी हातातून निघून जाऊ शकते.

प्रसिद्ध लेखक जेम्स क्लिअर यांनी एकदा एक किस्सा सांगितला होता. ते काही वरिष्ठ मॅनेजमेंट अधिकारी आणि सल्लागारांसोबत एका चर्चेत सहभागी होते. एका नाविन्यपूर्ण कल्पनेबाबत चर्चा सुरु होती. अनेक तांत्रिक आणि व्यवस्थापकीय मुद्दे अनेकजण मांडत होते. त्या चर्चेत सहभागी असलेल्यांपैकी सगळ्यात यशस्वी, प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्ती मात्र एकच गोष्ट बोलली… की हे आधी करून बघूया… नंतर सुधारणा करत करत पुढे जाऊया !(Do it, then fix it) ती व्यक्ती होती “वर्जिन ग्रुप”चे सर रिचर्ड ब्रॅन्सन !

बर्था बेंझने १८८८ मध्ये हेच केलं होतं. Just Do it, then fix it!

लेखक : श्री सलिल सुधाकर चौधरी 

 नेटभेट + ई-लर्निंग सोल्युशन्स, 

 (मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !) 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆”लेफ्टनंट जनरल सुरेंद्र नाथ शर्मा” – इंग्लिश माहिती संग्राहक : अज्ञात अनुवादक ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ ”लेफ्टनंट जनरल सुरेंद्र नाथ शर्मा” – इंग्लिश माहिती संग्राहक : अज्ञात अनुवादक ☆ सुश्री प्रभा हर्षे

 लेफ्टनंट जनरल सुरेंद्र नाथ शर्मा 

आज एका अत्यंत कणखर व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण जाणून घेऊयात.

हे आहेत लेफ्टनंट जनरल सुरेंद्र नाथ शर्मा (S N Sharma). ते १०२ वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९२३ रोजी झाला. त्यांच्या पत्नी ९७ वर्षांच्या आहेत त्यांचे सर्व कुटुंबीय ही भारतीय सेनेशी पराक्रमाने जोडले गेलेले आहे.

चला, थोडी झलक पाहूया….

त्यांचे वडील मेजर जनरल अमरनाथ शर्मा हे भारतीय सेनेमध्ये डॉक्टर होते व त्यांनी डायरेक्टर जनरल ऑफ आर्मी मेडिकल कॉर्पस् हे पद भूषविले होते.

त्यांचे मोठे बंधू मेजर सोमनाथ शर्मा यांना अतुलनीय शौर्याबद्दल पहिले परमवीर चक्र मिळाले आहे..

त्यांचे धाकटे बंधू लेफ्टनंट जनरल विश्वनाथ शर्मा हे ही भारतीय सेनेत १९८८ ते १९९०या काळात चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते।

लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ शर्मा यांच्या पत्नीच्या मातोश्री यांनी आपल्या सेनेच्या परमवीर चक्राचे डिझाईन तयार केले आहे.

स्वतः लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ शर्मा भारतीय सेनेत पॅराट्रूपर होते. पॅरॅशूट मधून उडी घेणे ही गोष्ट ते अत्यंत बिनचूकपणे, आवडीने व सर्वस्व पणाला लावून करत असत. आपल्या आयुष्यातील अशी शेवटची उडी त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी मारली आहे.

लेफ्टनंटसाहेब अजूनही स्वतः मोटर ड्रायव्हिंग करतात. हिमाचल प्रदेश येथे असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसवर पोचण्यासाठी ते स्वतः च १० तास ड्रायव्हिंग करतात.

तुम्ही काय खाता या पत्रकाराच्या प्रश्नाला त्यांनी मोठे मार्मिक उत्तर दिले आहे – – 

“ काळजी आणि ताण हे सोडून मी सर्व काही खातो ! अगदी पोटभर ! “ 

– – आपण सर्वांनी, विशेषत: ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्यापासून स्फूर्ती घेतली पाहिजे आणि आपण सर्वांनी ह्या थोर गृहस्थांचा आदर्श ठेवला पाहिजे.

इंग्लिश माहिती संग्राहक : अज्ञात 

मराठी अनुवाद : प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कलीयुगातील राम-सीता!! – लेखक : श्री प्रमोद आसने ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

 

☆ कलीयुगातील राम-सीता!! – लेखक : श्री प्रमोद आसने ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

रोडच्या कडेनं जाणारं प्रत्येक गरीब जोडपं भिकारी असतंच, असं काही नाही…

आज कोपरगाव येथून येत असताना रोड च्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळं मी त्या भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवणाचं विचारलं, तर ते ‘नको’ म्हणाले. मग मी त्यांना 100 रुपये देऊ केले, तर ते सुद्धा नको म्हणाले, मग पुढचा प्रश्न विचारला की :तुम्ही असे का हिंडताय? ‘

 – – मग सुरू झाला त्यांचा जीवनपट – 

ते 2200 km चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी परत चालले होते. त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही मग माझ्या आईने डॉक्टर ला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्री कृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की, ‘डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूर ला जाऊन परत द्वारकेला पायी येईल’,

म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय, मग मी त्यांच्या बायकोविषयी विचारलं तर ‘ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती व रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करायला येते’, म्हणून निघाली.

मग मी ते 25% हिन्दी 75% इंग्रजी बोलत असल्यामुळे शिक्षण विचारलं तर माझी बुद्धी ऐकून सुन्न झाली. त्यांनी लंडन येथे ऑक्सपोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र यावर पी एच डी केलीय तर त्यांच्या बायकोने ‘मनोविकार शास्त्र’ या विषयावर लंडन येथेच पी एच डी केलीय (एवढं शिकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नाही, नाहीतर आपल्या कडे 10 नापास सुद्धा छाती ताणून हिंडतो) एवढंच नाहीतर व सी. रंगराजन (गव्हर्नर) यांचे बरोबर, तसेच कल्पना चावला ह्यांच्या बरोबर काम व मैत्रेचे संबंध होते, तसेच त्यांना मिळणारी मासिक पेन्शन ते एक अंध ट्रस्ट ला ते देऊन टाकतात. सध्या ते सोशल मिडियापासून लांब राहतात, रोडच्या कडेन जाणार प्रत्येक जोडपं भिकारी असतंच असं काही नाही, एखादा पुरुष हा आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होतो आणि आपल्या पतीसोबत कोणी स्त्री सीता सुद्धा होते, म्हणूनच आज भेटलेली माणसे कलीयुगातील मी तर राम-सीता च समजतो 

आम्ही जवळ जवळ 1 तास त्यांच्याशी गप्पा मारल्या रोडवर उभा राहूनच. इतके प्रगल्भ विचार एकूण मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला. आणि वाटलं की आपण उगाचच खोट्या फुशारकीवर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. हा पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून तीन महिने झाले आणि अजून घरी पोहचायला एक महिना लागेल.

त्यांचे नाव –

डॉ. देव उपाध्याय व डॉ. सरोज उपाध्याय.. कलीयुगातील राम सीता…!!!

┉❀꧁꧂❀┉

लेखक : श्री प्रमोद आसने 

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आज एक यशोदा भेटली… लेखक : श्री सागर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ आज एक यशोदा भेटली… लेखक : श्री सागर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

 (F O S T E R C A R E) 

सौ. गीतांजली रोहोकले व श्री. सुनील रोहोकले. पार्ल्यामध्ये राहणारे एक उच्च वर्गीय सुखी कुटुंब..

गीतांजली रोहोकले हे नाव ‘स्वयं टॉक’ फॉलो करणार्यांना नक्कीच परिचित असणार. श्री. रोहोकले ICICI मध्ये दहा वर्ष जनरल मॅनेजर आणि आता एका इन्व्हेस्टमेंट कंपनी मध्ये CEO म्हणून कार्यरत… मुलगी दहावीत तर मुलगा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत.. स्वतः मॅडम अनेक सामाजिक संस्थाबरोबर कार्यरत.. एकंदरीत आपल्या सारख्या कुटुंबाची जी काही स्वप्न असतात ती पूर्ण झालेले सुखी कुटुंब….

काल ह्या दाम्पत्याला भेटण्याचा योग आला, निम्मित होतं ‘स्वयं’ टॉकवर ऐकलेली ‘फॉस्टर मदर गीतांजली रोहोकले’ यांची मुलाखत. एकदा तरी प्रत्यक्ष जाऊन ह्यांना भेटायचे हे मी व सौ. ने तेव्हाच मनाशी पक्कं केलं होतं.

जवळजवळ दहा महिन्यांनी हा योग जुळून आला. अनेक प्रश्न मनात होते, एखादी छोटी गोष्ट सुद्धा विसरायला होऊ नये म्हणून सौ. नी तर चक्क एका कागदावर प्रश्नावलीच लिहून काढली…..

बदलापूर ते पार्ला 3 तासाचा प्रवास एकदाचा संपला आणि आम्ही त्यांच्या घरी पोचलो… आमच्या स्वागतासाठी मॅडम दारातच उभ्या होत्या. अतिशय प्रसन्न व हसतमुखाने आमचे स्वागत झाले.. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळणार ह्याची खात्री त्याच क्षणाला पटली…

“FOSTER CARE” म्हणजे नक्की काय?? हे बहुतेकांना माहीत नसावे.. त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती..

अनाथ आश्रमात आलेली लहान बाळे.. ते दत्तक जाईपर्यंत काही कुटुंबांकडे सांभाळायला दिली जातात. लहान असताना त्या बाळांना आईच्या मायेची व कुटुंबाची नितांत गरज असते. कोवळ्या मनाला आधार व आकार देण्याचे काम अशी काही कुटुंबं करत असतात. त्यांना “Foster Care Family” म्हणतात…

थोडक्यात सांगायचे तर देवकीच्या पोटी जन्माला आलेला कृष्ण यशोदेकडे सांभाळायला दिला गेला. त्यामुळे यशोदा माता आणि नंद राजा हे कृष्णाची Foster Care Family झाली…

मॅडमशी बोलताना, त्यांचे अनुभव ऐकतांना पदोपदी त्यांच्या डोळ्यांत, त्यांच्या देहबोलीत नितांत मातृत्वाचा झराच वाहतोय ह्याचा अनुभव येत होता.

फॉस्टर मदर असलेल्या गीतांजली मॅडम बऱ्याच सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. TB झालेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थामध्ये त्या प्रत्यक्ष काम करतात.. फक्त देणगी स्वरूपात आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण न करता प्रत्यक्ष काम करण्याकडे त्यांचा कल आहे.

घरी आलेल्या बाळाची काळजी घ्यायला, त्यांची देखभाल करायला पगारी तत्वावर बाई ठेवणे सहज शक्य असताना, मॅडम सगळे स्वतः जातीने करतात.. अगदी आलेल्या बाळाला आंघोळ घालण्यापासून, त्यांचे खाणेपिणे, औषधे सर्व काही त्या स्वतः करतात. ‘आपल्याला अशा मुलांची आईच व्हावे लागते’ असा त्यांचा आग्रह आहे..

अनाथ आश्रमातील एक बाळ जास्तीत जास्त पाच ते सहा महिने फॉस्टर फॅमिलीकडे असते. बाळ त्याच्या हक्काच्या पालकांच्या घरी जाईपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, ह्याची संपुर्ण काळजी मॅडम घेत असतात..

बाळ आल्या दिवसापासून, त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या हरकतींचे व्हिडिओ, त्याच्या प्रत्येक महिन्याच्या वाढदिवसाचे फोटो काढून त्याचा एक अल्बम मॅडम दत्तक घेणाऱ्या पालकांना देतात. नवीन पालकांनी बाळाच्या लहानपणीचे कुठलेही क्षण मिस करू नयेत, त्यांचे बाळ अगदी लहान असतांना कसे दिसायचे हे त्यांनाही माहीत असावे, बाळ मोठे झाल्यावर आपण लहानपणी कसे दिसायचो हे त्यालाही कळावे म्हणून हा सगळा प्रेमळ खटाटोप.

आज संस्थेला अश्या कुटुंबांची खूप गरज आहे. लहान बाळं जेव्हा अनाथ आश्रमात येतात तेव्हा फार नाजूक स्थितीत असतात. जन्मतःच आईशी तुटलेली नाळ, हरवलेले कुटुंबाचे छत्र.. भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप मोठे वादळ त्यांनी अनुभवलेलं असते. त्या काळात त्यांना मायेची, कुटुंबाच्या भक्कम आधाराची नितांत गरज असते.

एवढ्या लहान, म्हणजे अगदी चार ते पाच दिवसांच्या बाळाला काही कळते का हो? कुतूहलापोटी माझा निरर्थक प्रश्न.. पण त्यावर मॅडमनी दिलेलं उत्तर ऐकताना सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या….

त्या म्हणाल्या, “अश्या सगळ्या बाळांमध्ये एक सवय खूप प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे दूध पितांना किंवा झोपताना ते बाळ कायम आईचे एक बोट मुठीत गच्च धरून ठेवते. एकदा हरवलेले मायेचे छत्र परत हरवेल ही भीती इतक्या लहान वयातही त्यांच्या मनात घर करून असते”.

दत्तक जाईपर्यंत आणि एक शाश्वत आधार मिळेपर्यंत.. म्हणजेच अनाथ आश्रम ते हक्काचे घर ह्या प्रवासाचा सेतू फॉस्टर फॅमिलीला बांधायचा असतो.

हे सगळे अनुभव सांगताना मुंबईमध्ये केवळ सहा फॉस्टर फॅमिली आहेत ह्याची खंत ह्या माऊलीच्या बोलण्यातून जाणवत होती. ही संख्या वाढण्याची खूप नितांत गरज आहे असे त्यांना मनोमन वाटते.

रोहोकले दाम्पत्यांना भेटण्याचा योग मिळाला हे आमचे भाग्यच. “तुमचे कार्य असेच अखंड सुरू राहो” ह्या सदिच्छा देऊन, अतिशय सुंदर भेटीचा मौल्यवान खजिना घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो,

ते लवकरच परत भेटण्याचा योग येईल ह्या सकारात्मक विचारांनीच…

लेखक : श्री सागर कुलकर्णी,

बदलापूर. मो  8806816983

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संपूर्ण देशातील मुलींसाठी एक प्रेरणा मणिपूरच्या अदासो कपेसा – लेखक : ॲड विलास पाटणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

सुश्री सुनिता जोशी

 

 

? इंद्रधनुष्य ?

☆ संपूर्ण देशातील मुलींसाठी एक प्रेरणा मणिपूरच्या अदासो कपेसा – – लेखक : ॲड विलास पाटणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी

मणिपूरच्या अदासो कपेसा पंतप्रधान मोदींच्या पहिल्या महिला अंगरक्षक.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एका महिला अंगरक्षकाची नियुक्ती झाली आली आहे. या महिला अधिकाऱ्याचे नाव अदासो कपेसा आहे.

अदासो कपेसा ह्या मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यातील कैबी गावच्या रहिवासी आहेत. सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या असूनही त्यांनी आपले ध्येय कधीही नजरेआड होऊ दिले नाही. एसपीजी मध्ये रुजू होण्यापूर्वी, अदासो कपेसा सशस्त्र सीमाबलाच्या ५५ व्या बटालियनमध्ये पिथौरागढ येथे इन्स्पेक्ट म्हणून कार्यरत होत्या. तिथेही त्यांनी आपल्या कामात उच्च दर्जाची प्रतिबद्धता आणि शिस्त दाखवली.

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये निवड होणे ही भारतातील सर्वात कठीण निवड प्रक्रियांपैकी एक आहे. अदासो यांना प्रतिनियुक्तीवर एसपीजी मध्ये पाठवण्यात आले, जिथे त्यांनी अत्यंत कठोर कमांडो प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यान त्यांची कामगिरी इतकी उत्कृष्ट होती की, त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षा टीममध्ये नियुक्त करण्यात आले.

मणिपूरच्या एका छोट्याशा गावातून येऊन एसपीजी सारख्या प्रतिष्ठित युनिटमध्ये स्थान मिळवणे कौतुकास्पद आहे. त्या केवळ आपल्या गावासाठी किंवा मणिपूरसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशातील मुलींसाठी एक प्रेरणास्थान आहेत.

– – त्यांचा संघर्ष, शिस्त, आणि अतूट विश्वास यांना अभिवादन !! 

लेखक : ॲड विलास पाटणे

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ द्रौपदी… – लेख क्र. १० ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ द्रौपदी… – लेख क्र. १० ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.) 

स्त्री आधी आई होते मग तिच्यात वात्सल्य निर्माण होतं की आधी वात्सल्य येतं म्हणूनच मग ती आई होते? मला वाटतं दोन्हीही नाही. आपण जन्माला आल्यानंतर आई कुशीत घेते, मांडीवर झोपवते, हाताने भरवते. त्यावेळी ते वात्सल्य, माया बाळ आत्मसात करतं. मग प्रौढ झाल्यावर ती माया, वात्सल्य आपल्या बाळावर बरसतं. माझ्या बाबतीत बालपणच नव्हतं. एक प्रौढा म्हणून जन्माला आले. मग कुठलं वात्सल्य, कुठली माया? जे अनुभवलंच नाही ते बाळाला कुठून देणार? ज्यावेळी अभिमन्यूचा युद्धात मृत्यू झाला तेंव्हा सुभद्रा उत्तरेला कुशीत घेऊन किती रडली होती. पण माझ्या डोळ्यातून टिपूसही आलं नाही. एवढंच काय माझी पोटची मुलं अश्वत्थाम्याने मारली तरी मी रडले नाही. कदाचित असे असेल कि नियतीने मला तसा वेळच दिला नाही, की मी शोक करत बसेन. माझ्या डोळ्यात फक्त धगधगता सुडाग्नी असायचा आणि मग मला हवी ती गोष्ट करून घेण्यासाठी माझं कोणत्याही पायरी पर्यंत अधःपतन व्हायचं. पण मी तो सूड घेऊनच शांत व्हायची. तुम्ही याला मला जबाबदार धरू नका. कदाचित माझं सौंदर्य याला जबाबदार असू शकेल. खरं म्हणजे अर्जुनांनी ‘पण’ जिंकला होता पण मोठ्या भावाच्या आधी लग्न करणं त्यांना अवघड वाटत होतं. आणि पाचही पांडव माझ्यावर आरक्त झाले होते. स्त्रियांना पुरुषाची नजर फार लवकर समजते. पुढे एकत्र राहणं अवघड होऊ नये म्हणून मी पाच जणांची पत्नी म्हणून राहिले. आणि हेच सौंदर्य दुर्योधन, दुःशासन यांच्या मनातही असूया निर्माण करण्यास कारणीभूत ठरलं असावं.

एकाच माणसानं किती वेळा आयुष्यात अपमान सहन करायचा? यज्ञवेदीतून माझा जन्म झाला तो म्हणजे अधर्माचं निर्दालन आणि धर्माचं संस्थापन या कार्याला कृष्णाला मदत करण्यासाठी, असं म्हणतात. पण म्हणून या कार्यात मी किती वेळा माझं चारित्र्य हनन सहन करायचं? वास्तविक मी विवाहाला तयार झाले ते पण पूर्ण करणाऱ्या वल्लभ नावाच्या एका ब्राह्मण मुलाशी! पण नंतर समजलं की तो ब्राह्मण तर नाहीच पण आपल्याच वडिलांशी, द्रुपद राजाशी, युद्ध करून त्यांना हरवणारा क्षत्रिय माणूस अर्जुन आहे. माझा पांडव कुटुंबातला प्रवेशच असा फसवणुकीतून झाला. त्यातच पाच माणसांबरोबर विवाह व संसार करण्याची कसरत करावी लागली. त्यवरून कौरवांनी मला वेश्या ठरवलं. नंतर तर कहरच झाला. कौरव सभेत लक्षात आलं की आपण षंढ लोकांशी विवाह केला आहे. यांचा धर्म, पत्नीच्या चारित्र्याचं रक्षण करणं हा नाही का हो? भर सभेत तुमच्या पत्नीला विवस्त्र करण्याचा, तिच्या चारित्र्याला हात घालण्याचा खेळ चालला होता. तरी सगळे मूग गिळून गप्प, खाली माना घालून बसलेले. दुसरे कोणी असते तर एकेकाची जीभ हासडून हातात दिली असती. वेगळं काय झालं असतं? बारा, तेरा वर्षानंतर जे युद्ध झालं, त्याला त्याच दिवशी तोंड फुटलं असतं. त्या सभेने मला शिकवलं की भावनिक गुंतवणूक, ही एक मानवी भावना आहे, ती चुकीची नाही पण ती जर आपल्या आयुष्यावर, निर्णयांवर व आत्मसन्मानावर हावी होऊ लागली तर मोडायलाच हवी. आणि मी ताठ उभी राहिले. आणि विचारलं, माझ्यावर हक्क सांगणारे हे कोण हो? मी काय यांच्या दावणीला बांधलेला घोडा की हत्ती ? मला पणाला लावण्यापूर्वी यांनी मला विचारलं होतं? युधिष्ठिर जेंव्हा हरले तेंव्हा त्यांनी आपले उत्तरीय काढून ठेवले, म्हणजे त्यांनी दास्यत्व स्वीकारले. मग यांचा माझ्यावर अधिकार कसा राहतो, कफल्लक झाल्यावर ! तिथे भीम उठले आणि म्हणाले, सहदेवा जा, अग्नी घेऊन ये. दूत खेळणाऱ्या धर्माचे हात जाळून टाकतो. एवढे बोलून थांबले नाहीत तर दुर्योधन, दुःशासन यांच्या वधाच्या प्रतिज्ञा केल्या. म्हणाले, ज्या हातानं दुःशासनानं पांचालीच्या केसांना धरलं ते हात आणि पांचालीला मांडी दाखवून आवाहन करणाऱ्या दुर्योधनाची मांडी नाही फोडली तर बघा. भीमाचा तो अवतार, त्याची प्रतिज्ञा बघून धृतराष्ट्र घाबरले. आणि त्यांनी माझी सुटका तर केलीच पण पांडवांची दास्यातून सुटका करून त्यांना हरलेलं सगळं वैभव परत केलं.

मला युधिष्ठिरांचं तर इतकं आश्चर्य वाटतं. एकदा इतका वाईट अनुभव आल्यावरही माणूस शहाणा होत नाही कां हो? अपमानित पांडव सूड घेणार या भीतीने कौरवांनी पुन्हा द्यूत खेळण्यास बोलावल्यावर हे निर्लज्जपणे पुन्हा खेळायला गेले. त्यांनी पांडव वनातून परत कसे येणारच नाहीत अशी सोय करणारा पण लावला आणि आम्ही मूर्खासारखे पुन्हा त्यांच्या कपटामध्ये अडकलो.

अज्ञातवासात असताना कीचक, जयद्रथ यांनी माझ्या चरित्र्याला हात घालण्याचा प्रयत्न केला. अज्ञातवासात आहोत त्यामुळे गप्प बसूया असे सर्वांचे मत होते. म्हणजे मी वनवासातून परत यायला उरलेच नसते. कौरवांच्या लक्षात आलं नाही की त्यांनी एक भीमाला वनवासाला जाता येणार नाही म्हणून सांगितलं असतं तर माझे अज्ञातवासात धिंडवडे निघाले असते. आणि कौरवांना असुरी आनंद उपभोगता आला असता. भीम गप्प बसणाऱ्यातले नव्हतेच, त्यांनी अपरात्री किचक व इतर राक्षसांचा वध केला, जयद्रथाला अद्दल घडवली, माझी दोघांपासून सुटका केली. सुदेष्णाची दासी म्हणून मला रहावे लागले. मी इतके अपमान सहन केले. चारित्र्याशी चाललेले खेळ पचवले. तरी लोकांच्या मते मी चुका केल्या म्हणून महाभारताचे युद्ध झाले. कुठेतरी अपमानाचा सूड घ्यावा, प्रत्युत्तर करावं अशी इच्छा होणे स्वाभाविक नव्हतं कां ? 

शेवटी धर्माचं संस्थापन झालं की नाही माहित नाही. पण कुरुक्षेत्रावर प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या, भावाच्या, मुलाच्या कलेवराजवळ जाऊन मला, पांडवांना व कृष्णाला दूषण देत होती. हे पाहिल्यावर मनात आलं, आपण काय मिळवलं? लौकिकार्थानं राज्य मिळालं, राणीचा मुकुट मिळाला. पण असा एकही दिवस गेला नाही की मला भर सभेतला माझा अपमान आठवला नाही की पांडवपुत्रांची झालेली हत्या डोळ्यासमोर दिसली नाही. कुरुक्षेत्रावरचा प्रेतांचा ढीग डोळ्यासमोरून हलला नाही. मग कसला आनंद साजरा करू? भकास हस्तिनापुराचा की उध्वस्त राजवाड्याचा! आनंद इतका क्षणिक असतो की तो फक्त देहापुरता राहतो, पण दुःख इतकं अनंत असतं की ते अंतरात्म्यालाही दुखावतं आणि तिथेच घर करून राहतं!!

तुमच्यासमोर फक्त माझ्या व्यथाच मांडल्या पण माझ्या मनाचा एक हळवा कोपराही आहे, त्यात आहे माझा सखा, कृष्ण! सखा कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण! ज्याच्याशी आपलं सख्य असतं त्याला सखा म्हणावं अशी व्याख्या असली तरी सख्य असणं आणि सखा असणं यात एका हृदयाचं अंतर असतं आणि असं दुसऱ्याचं हृदय पार करून जायचं व त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं म्हणजे काय असतं —नाही ते मला शब्दात सांगता येणारच नाही.

माझ्या या सख्याला काही सललं जरी असतं तरी एक शालूच काय पण मी माझं अख्खं आयुष्य ओवाळून टाकलं असतं. त्यानं मात्र त्याचं आयुष्य खरंच माझ्यासाठी ओवाळून टाकलं. एक हाक– हाक तरी कशाला, मी संकटात आहे हे त्याला न सांगताच कळायचं आणि जीवाच्या आकांताने धावून यायचा, कधी मनानं कधी शरीरानं! सखा हे नातं असं असतं की, नाही हो, नातं नसतं हे! नात्या पलीकडे काहीतरी असतं. कारण नात्यांना बंधनं असतात, मर्यादा असतात, नात्याला समाज रचनेची बैठक असते. सखा या सर्वांपलीकडे जाऊन आपला आधार, आपला अभिमान, आपल्या दुःखातला साथी, सतत मदतीचा हात देणारा देव, अहो, दिनकरासारखा स्वार्थ परायण असतो. आपलं सर्वस्व असतो. तो नसता नां तर मी अस्तित्वहीन, अभिमान शून्य झाले असते.

पण या हळव्या कोपऱ्याला नां, एक दुखरी नस आहे. सांगू? त्याने माझ्यासाठी काय केलं, तो माझ्यासाठी कोण होता, हे सांगितलं. सखा कसा असतो तेही सांगितलं. पण मी त्याची सखीच होते नां? मी काय केलं? त्याची दुःखं त्याची संकटं होतीच की. अर्थात त्यासाठी तो समर्थ ही होता. पण मी त्याच्या हृदयाचं अंतर पार करू शकले नाही. मी माझ्यातच अडकले होते. सखी म्हणून एकदा चिंधी बांधली की झालं? कुरुक्षेत्रावरचा संहार त्यानं पाहिला, गांधारीने दिलेला शाप त्याला बोचला, नव्हे काळजातून आरपार गेला. यादवांचाही संहार त्याला पहावा लागला. आणि तो विमनस्क अवस्थेत भटकत राहिला. त्यानंही मला कांही सांगितलं नाही अन् मी ही ओळखू शकले नाही. अगदी एकटा पडला तो! खरं म्हणजे मी जर त्याच्याजवळ तेंव्हा असते नां तर त्याचा हा असा अंत होऊ दिला नसता. ही बोच, हा सल मात्र कायम मनात राहिला. खरं म्हणजे सख्या समोर मन मोकळं करता आलं पाहिजे. एकमेकांना एकमेकांची मनं कळली पाहिजेत, अगदी न सांगता सुद्धा! असा एक सखा आयुष्यात हवाच जो जगण्याची उर्मी देतो, मनोबल वाढवतो, जगण्याचा हव्यास निर्माण करतो. याबाबतीत मात्र मी फार नशीबवान ठरले. जन्मोजन्मी मला हाच सखा लाभावा आणि असाच सखा तुम्हा सर्वांना मिळावा, हीच मनीषा !!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

या देवी सर्वभूतेषु भक्ती-रूपेण संस्थिता। 

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”

सगुणोपासना करायची याचा सरळ अर्थ म्हणजे मूर्तीची, छायाचित्राची, प्रतिमेची, प्रतिकाची पूजा करायची. मनुष्याला स्वाभाविकपणेच चांगुल्याची आवड असते. जरी मनुष्याला नित्य आदर्श वागता आले नाही, आदर्श राहता आले नाही तरी समोरच्या मनुष्याने मात्र आदर्शच वागावे असे त्याला मनोमन वाटत असते. ही सुद्धा एक प्रकारची सगुण उपासना म्हटली पाहिजे. सगुणोपासना म्हणजे एक मूर्तीची म्हणजे त्या मूर्तीत प्रत्यक्ष भगवंत सजीवरूपात अवतीर्ण झाला आहे असे मानून केलेली उपासना किंवा आराधना.

मूर्तिपूजा भारतात खूप आधी पासून अस्तित्वात किंवा प्रचलित आहे. ती आज आहे आणि जोपर्यंत ह्या भूमीवर शेवटचा मनुष्य राहील, तोपर्यंत ती नक्कीच अस्तित्वात राहील, असे म्हणता येईल. भले मनुष्य कितीही स्खलनशील असला तरी आपण किती खोल गेलो हे कळण्यासाठी का होइना त्याला एका प्रतिमेची, मर्यादेची स्वाभाविक गरज असते. अशा मर्यादापुरुषोत्तमापुढे (इथे स्त्री सुद्धा असू शकते) नतमस्तक व्हायला मनुष्याला आवडते. मनुष्य कितीही वाईट मार्गात असला, तरी आपल्या संततीनें आपला वाईट मार्ग अनुसरावा असे त्यास कधीच वाटत नाही, म्हणून तो आपल्या संततीस मर्यादापुरुषोत्तमाचा आदर्श घालून देतो आणि तसे होण्याचा प्रयत्न कर असे सांगतो. या नश्वर जगात जन्म घेतलेल्या मनुष्याला खरं तर पूर्ण पुरुष (म्हणजे खरा देव: माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा) बनायचे असते, पण मनुष्य आपल्या पूर्व संस्कारामुळे किंवा वृत्ती बदलू शकत नसल्यामुळे एक प्राणी बनून या जगात वावरतो आणि हा मनुष्य एक प्राणी म्हणूनच अखेरचा श्वास घेतो. खरंतर प्ररमेश्वराने फक्त मनुष्यालाच ‘मनुष्य ते देवत्व’ असा अनंताचा प्रवास करण्याचे वरदान दिले आहे, पण मनुष्य धड मनुष्य होत नाही आणि देवत्व तर खूप दूर राहते.

सर्व संतांनी मनुष्य प्राण्याची ही खूप जुनी खोड बरोबर समजून घेतली आणि भक्तिमार्गासारखे सुंदर आणि सुलभ तंत्रज्ञान पुन्हा एकदा आपल्या हाती दिले. ज्यामध्ये मूलभूत असे सगुण भक्ती आणि निर्गुणभक्ती असे दोन प्रकार सांगितले आहेत. सामान्य मनुष्याला आचरणीय असा मार्ग म्हणजे सगुणभक्ती. साधुसंतांनी सगुणभक्तीचा उच्छेद करून निर्गुण भक्तीचे प्रतिपादन केलेले आही. समर्थ म्हणतात,

“सगुणाचेनि आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें ।सारासारविचारें । संतसंगें ॥”

(दास. ०६. ०६. ५५)

संत चोखामेळा म्हणतात,

‘निर्गुणाचे भेटी आलो। सगुणाचे संगे।’

श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात – ‘गाईच्या वासराला गाईचे दूध प्यायचे असेल तर त्याला गाईच्या आचळालाच तोंड लावावे लागेल, इकडे तिकडे लावून चालत नाही ? त्याप्रमाणे निर्गुणाचा अनुभव घ्यायचा असेल तर सगुणातूनच घ्यावा लागतो. सामान्य माणूस सगुणभक्तीच करतो पण आंधळेपणाने करतो, ती डोळसपणे करणेच आवश्यक आहे. सगुणात आपल्या आराध्यदेवतेची पूजा करायची असते. ती आर्तभावाने करावी, भक्तीत भावाला महत्त्व आहे. भाव शुद्ध हवा. ‘ समर्थांनी केवळ सगुण भक्ती सांगितली आणि ते चुप बसलेत असे नाही तर त्यांनी सगुण भक्तीकरता श्रीराम हे दैवत जाणीवपूर्वक निवडले. कारण राम मर्यादा पुरुषोत्तम होता, कुशल राज्यकर्ता होता, दैवी गुणसंपन्न होता. तो अलौकिक पुत्र होता, अलौकिक शिष्य होता, अलौकिक बंधू होता, अलौकिक पती होता, अलौकिक मित्र होता आणि अलौकिक शत्रूही होता. अशा अलौकिक रामाचा आदर्श समर्थांनी लोकांपुढे ठेवला. उद्देश हा की त्यातील एकेक गुण, एकेका व्यक्तीने जरी उचलला तरी त्याची प्रचंड शक्ती समाजात निर्माण होईल. त्या प्रचंड शक्तीने समाजाचे सामर्थ्य वाढेल. म्हणून त्यांनी श्रीरामाची उपासना सांगितली. श्रीरामाचे दैवत समाजापुढे ठेवले. श्रीगुणांच्या सामर्थ्याची शक्ती म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान!

उपासनेची शक्ति आणि शक्तीची उपासना. सध्या समाजाला या दोन्हीची तितकीच गरज आहे.

गुरूला आवडते ते करणे म्हणजेच सद्गुरुंची सेवा करणे होय. बरेच वेळा साधक त्याच्या आवडीची कृती करतो आणि सद्गुरूंची सेवा करीत आहोत असे दर्शवितो. परमार्थाची चार चाके आहेत. एक अखंड रामनाम, दुसरे शरणागती, तिसरे सत्संग आणि चवथे रामकृपा होय. संसारामध्ये अहंकार व स्वार्थ हे वैराचे मूळ आहे. वैराचे मूळ स्मृती मध्ये आहे. निर्वैर होण्यासाठी स्मृती नाहीशी झाली पाहिजे. स्मृतीमध्ये रामनाम सतत भरले पाहिजे. म्हणजे परमार्थ उत्तम चालतो. भूतकाळाची स्मृती नाही व भविष्याची चिंता नाही. असा जीव फक्त वर्तमानातच जगतो. हाच जीव निवैर होऊ शकतो. या मार्गाचा अवलंब भक्तीमध्ये होतो. तो ईश्वराचा दास होतो व त्याच्या हृदया मध्ये सतत ईश्वराचे चिंतन चालू असते. असा जीव कालातीत होतो, निर्वैर होतो. देहबुद्धीचे देवबुद्धीमध्ये रुपांतर प्रयत्न साधकाने करावा. त्यासाठी आपल्या सर्व कृती कडे तो परमात्मा पाहत आहे अशी भावना तीव्र करावी. असा भाव वाढीस लागल्यास त्यास परमात्मा सर्व ठिकाणी दिसू लागतो. हेच सगुण भक्तीचे बृहत रूप होय. यालाच साक्षात्कार असे म्हणतात.

सगुणभक्ती ही सर्वार्थाने सुलभ अशीच आहे, कोणीही त्याचे अनुसरण करू शकतो. सगुण हा शब्द ऐकून मूर्तिपूजा करणारे सगुणाची पूजा करतात असे म्हटले तर ते अर्धसत्य होईल असे मला वाटते. सगुण याचा सरळ अर्थ, स म्हणजे चांगले आणि गुण म्हणजे गुण. जिथे चांगल्या गुणांची कदर होते, पूजन होते ती सगुणभक्ती. कोणत्याही चांगल्या मनुष्याच्या अंगचे गुण आपल्या अंगी यावेत म्हणून प्रयत्न करणे हे सगुणभक्ती म्हटली पाहिजे. प्रचलित सगुण भक्ती म्हणजे पाणी, पुष्प, गंध, वस्त्र आणि नैवेद्य किंवा संपूर्ण षोडशोपचारे पूजा करणे म्हणजे सगुणभक्ती असे मानले जाते, हे स्थूलमानाने योग्य असेलही, पण आराध्य देवतेचे गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न सुरु केला जातो तेंव्हा खरी सगुणभक्तीला सुरुवात झाली असे म्हणता येईल. नाहीतर ते “नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा” असे व्हायचे. षोडशोपचार करणे हे म्हणजे hardware म्हणता येईल आणि आराध्य देवतच्या गुणांचे दैनंदिन व्यवहारात आचरण करण्यास सुरुवात करणे हे सॉफ्टवेअर समजावे. हे सर्व समजायला थोडं जड आहे पण थेट अंतर्मनात बदल घडविणारे आहे. ह्या सोबत नाम घेता आले तर दुधात साखरच!

समजा एखाद्याने रामास आपले आराध्य मानले तर त्याने रामचरित्र वाचावे. रामाचा भक्त आहे, म्हणून त्याचीही पत्नी चोरायला कोणी रावण येईल आणि त्यालाही रामासारखा पराक्रम गाजविता येईल असे नाही. तर दैनंदीन जीवनात आपले आचरण रामासारखे ठेवण्याचा प्रयत्न त्याने करावा. आपली पत्नी सितारुप आहे, वडील दशरथा समान आहेत, थोडक्यात राम जसा आपल्या कुटुंबातील सदस्यांशी वागला, तसे त्याने आपल्या कुटुंबातील सर्वांशी वागावे. नाम घेतले तर उत्तम, पण असे आचरण मात्र काटेकोरपणे करावे. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येकामध्ये एकच राम आहे हे जाणून त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजेच सगुण भक्ती करणे.

सध्या कलियुग आहे, त्यामुळे जरी श्रीकृष्णाने गीतेत मी परत अवतार घेईन असे सांगितले असले तरी गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी जशी सर्व गोपांनी आपापली काठी लावली अगदी तसेच आपल्या आपली साधना करायला हवी. आपण सर्वांनी आपापली काठी लावली की आपले काम झाले. कारण भगवंत आहेच, तो करंगळी लावतोच.

आपल्याला दैनंदिन जीवनात आधीपासून उपस्थित असलेले परमेश्वराचे अस्तित्व जाणवायला लागले म्हणजे आपली प्रगती सुरु झाली असे म्हणता येईल. अशी भक्ती करावी की आपल्याला डोळ्यात पाणी आले तर भगवंतांच्या डोळ्यात पाणी यावे. अशी भक्ती संतांनी करून दाखवली. याचे सर्वात चांगले आणि आपल्या घरातील उदाहरण म्हणजे आपली आई. आपल्या डोळ्यात पाणी आले तर आपल्या आईच्या डोळ्यात पाणी येते. किंबहुना आपल्या डोळ्यात कधीच पाणी येऊ नये म्हणून प्रत्येक आईचा प्रयत्न असतो, मग ती आई गोरी असो व काळी, गरीब असो व श्रीमंत. आई आईच असते, तीला पर्याय नाही.

आपल्या ‘आईची’ मान जगामध्ये कायम ताठ राहील, तिला समाजात आपली ओळख करू देताना आपण अमक्याची आई आहोत असे सांगण्यात गौरव वाटेल आणि आपल्याला आपल्या आईमध्येच देवाचे अस्तित्व जाणवेल तीच खरी सगुणोपासना !!

पूजा करण्या आधी आतुरता, पूजा करताना आनंद आणि पूजा करुन झाल्यावर चित्त शांत होत असेल, समाधान लाभत असेल तर आपली सगुणोपासना योग्य दिशेने चालू आहे असे म्हणायला हरकत नाही…… !

साधनेच्या अंतिम टप्प्यात साधकाला भागवतांचा साक्षात्कार झाला तरी तो साधक आपले साधन, अर्थात सगुणोपासना सोडत नाही. सगुणोपासना करताना चाखायला मिळणारा भक्तिरस काहीतरी और असेल, अन्यथा स्वतः पांडुरंग झाल्यावरही संत तुकाराम बुवांनी विठ्ठलाची पूजा केलीच नसती…. ! ते एका ठिकाणी म्हणतात,

“आधी होता वाघ्या | दैवयोगें झाला पाग्या | त्याचे यळकोट राहिना | देहस्वभाव जाईना ||१|| आधी होता ग्रामजोसी। राज्यपद आले त्यासी ॥ त्याचें पंचांग राहीना। देहस्वभाव जाईना ||२|| आधी होती दासी। पट्टराणी केलें तिसी ॥ तिचें हिंडणे राहीना। देहस्वभाव जाईना ||३|| आधी होता संतसंग| तुका झाला पांडुरंग | त्याचे भजन जाईना |मूळ स्वभाव जाईना ||४||”

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. १६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares