मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – तुज मागणे ते देवा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – तुज मागणे ते देवा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

तुका म्हणे

तुज मागणे ते देवा /

आम्हां तुझी चरण सेवा // १//

*

आन नेघो देसी तरी/

रिद्धी सिद्धी मुक्ती चारी //२//

*

संतसंगती सर्व काळ/

थोर प्रेमाचा सुकाळ//३//

*

तुका म्हणे नाम /

तेणे पुरे माझे काम//४//

*

– संत तुकाराम.

तुका म्हणे

देवा माझ्या कडून तुझी चरण सेवा घडावी येवढीच माझी तुझ्या चरणी मागणी आहे. माझी हीच मागणी पूर्ण कर. मग तू मला रिद्धी सिद्धी आणि चारी मुक्ती दिल्या नाहीस तरी चालेल. मला सततचा संतसंग दे. कारण त्यातच सर्व सुखसमाधान आहे. मला तुझे नामस्मरण करावयाचे आहे. त्यानेच माझे सर्व कार्य होणार आहे.

लोक देवाकडे रिद्धी सिद्धी मागतात कारण त्यांच्या प्राप्तीने लोकांना या जगात सुखी समाधानी आणि ऐश्वर्यात रहाता येईल असे वाटते. म्हणजेच या जगात समाधानी जगण्यासाठी लागणारा पैसाअडका, धनदौलत, धनधान्य, सत्ता, इंद्रिय सुख, मागतात. पण या सुखोपभोगाच्या पलीकडे गेलेली माणसे या पैकी कशाचीही लालसा बाळगत नाहीत. तुकाराम महाराज तसेच होते ते असले काहीच मागत नाहीत. ते देवाला विनंती करतात. देवा तू मला यातले काहीच देवू नकोस फक्त तुझे नामस्मरण करण्याचे बळ दे. संतांची संगती मला सतत लाभुदे. त्या मुळेच माझ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. मला मोक्ष हवा आहे आणि तो तूच देवू शकतोस.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – शब्दा नाही धीर… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – शब्दा नाही धीर… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

शब्दा नाही धीर /

ज्याची बुद्धि नाही स्थीर //१//

*

त्याचे न व्हावे दर्शन/

खळा पंगती भोजन//२//

*

संतांसी जो निंदी/

अधम लोभासाठी वंदी //३//

*

तुका म्हणे पोटी/

भाव आणीक ज्या ओठी//४//

*

– संत तुकाराम.

तुका म्हणे

ज्या माणसाची बुद्धी स्थीर नाही त्याच्या शब्दालाही धीर धरवत नाही. अशा माणसाचे प्रत्यक्ष दर्शन ही होवू नये. त्याच प्रमाणे जो खल आहे त्यांच्या सोबत बसून पंगतीतही कधी भोजन घेवू नये.

जी व्यक्ती संताची निंदा करते ती व्यक्ती स्वतःच्या लाभासाठी अधमालाही वंदन करते. त्याचे वर्तन ओठात एक आणि पोटत एक असेच असते.

तुकाराम महाराजांचे समाज निरीक्षण अत्यंत सूक्ष्म आणि तरल होते. त्यांना माणसांची योग्य पारख होती. माणसातली वैगुण्ये सांगताना महाराज म्हणतात. जो माणूस स्थीर बुद्धीचा आणि गंभीर वर्तनाचा नसून चंचल स्वभावाचा असतो त्याच्या शब्दाना मुळीच धीर धरवत नाही. त्याची निर्थक बडबड सतत चाललेली असते. अशा माणसांचे आपल्याला दर्शन ही घडू नये

त्याच प्रमाणे दुष्कर्म करणा-या माणसासोबत पंगतीत बसून जेवणही करू नये. जो माणूस संतांची सतत निंदा नालस्ती करतो तोच माणूस स्वतःच्या लाभासाठी, स्वार्थी साठी अधमातील अधम व्यक्तीला वंदन करत असतो. तो ओठात एक आणि पोटात एक अशा कपटी स्वभावाचा असतो. अशा लोका पासून आपण दूरचं रहाणे पसंत करावे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – एका बीजा केला नास… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – एका बीजा केला नास… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

एका बीजा केला नास /

मग भोगिले कणीस //१//

*

कळे सगळा हा भाव /

लहान थोरावरी जीव //२//

*

लाभ नाही फुकाफूकी /

केल्याविण जीवासाठी //३//

*

तुका म्हणे रणी /

जीव देता लाभ धुणी //४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

एक बीज जेव्हा नष्ट होते तेव्हा त्याचे झाड होते. त्याला कणीस येते. मग ते भोगायला मिळते. लहान थोराना हे माहिती असते. जीवासाठी आपण काही केले तरच लाभ होतो. फुकटात काहीच मिळत नाही. पण जो रणांगणावर मरतो त्याला मिळणारा लाभ दुप्पट असतो.

काही मिळवायला काही त्यागावेच लागते.

एक बीज पेरले जाते.

ते नष्ट होते. झाडाचे रूप धरते. त्याचे रक्षण करावे लागते. मशागत करून ते वाढवावे लागते. काही काळ गेल्यावर त्याला कणीस येते. मगच त्याचा उपभोग घेता येतो. हे खरेतर सगळ्याना माहीत असते. एक बीज नष्ट होते. ते दुस-या जीवाला जन्म देते. पण जो आयुष्याच्या रणांगणावर आपला जीव खर्च करतो त्याला थोडाथोडका नाही तर दुप्पट लाभ होतो. इथले रणांगण म्हणजे शत्रू पक्षाशी लढण्याची जागा नव्हे तर संसार आहे. इथे रोजच संकटाशी लढावे लागते. मात्तबर असणा-या शड् रिपुंशी लढावे लागले. त्याना जिंकले तरच जन्माचे सार्थक होते. हेच तुकाराम महाराजांनी लोकांना उदाहरणांसह पटवून दिले आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – मनोमय पूजा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – मनोमय पूजा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

*

मनोमय पूजा/

हेच प्रिये केशिराजा //१//

*

घेतो कल्पनेचे भोग /

न मानतील बाह्यरंग // २//

*

अंतरीचे जाणे /

आदी वर्तमान खुणे//३//

*

तुका म्हणे कुडे /

कोठे सारे त्याच्यापुढे//४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

तुम्ही मनापासून केलेली परमेश्वराची पूजा परमेश्वर चरणीच अर्पण करा. कारण परमेश्वर बाह्यरंगाला भुलत नाही तर तो तुम्ही अंरात्म्यातूनकेलेले सोपस्कार जाणून घेतो. तुमच्या मनात आणि बाहेर जे काय आहे ते त्याला सर्वकाही माहिती असते. मग त्याच्या पुढे जाणे आपल्याला कधीतरी शक्य होईल का?

तुमच्याकडे डामडौल, आणि डोळेदिपवणारा बाह्य देखावा नसला तरी तुम्ही देवाची करूणा भाका. त्याची मनोभावे पूजा करा. तुमच्या मनात काय आहे तुम्हाला काय हवे आहे ते तो ओळखतो. तुम्हाला काय द्यायचे हे ही तोच ठरवतो. म्हणून तर त्याला सर्वेश्वर म्हणतात. त्याच्या पुढे जाणे आपल्याला कधीतरी शक्य असेल का?

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ भीती मेंदूत आरपार… कवी- दासू वैद्य ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ भीती मेंदूत आरपार… कवी- दासू वैद्य  ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ भीती मेंदूत आरपार… ☆

आता फारशी जत्रा भरत नाही,

भरली तरी

मुलं पुंग्या विकत घेत नाहीत,

घेतात प्रकाशमान होताना धडाडणारी बंदूक

 

मुलं कुठं खेळतात खेळ पाणी

खेळतात युद्ध युद्ध

 

बैठकीतल्या उशांचा बांध रचून

पोरांनी एकदा

माझ्यावरच रोखली, स्टेनगन

गोळीला घाबरलो नाही

पण चिमुकल्या डोळ्यात

हिंस्रतेचा अविर्भाव पाहून,

हातातली खोटी बंदूक

कधीही खरी होण्याची भीती

मेंदूत आरपार घुसत गेली.

 कवी – दासू वैद्य

  रसास्वाद

दासू वैद्य हे विसाव्या शतकाच्या नवव्या दशकापासून लेखन करणारे आघाडीचे कवी, गीतकार, नाटककार. त्यांनी बाल व कुमार वाङ्मयात देखील मोलाची भर घातली आहे. त्यांच्या एकांकिका, नभोनाट्य, ललित लेख इत्यादी विपुल साहित्य असून ते टी व्ही, चित्रपट यासाठी गीतलेखन देखिल करतात. त्यांच्या बाल कवितांचं वाचन विजय तेंडुलकरांसारख्या चिकित्सक साहित्यिकाने केले आहे.

ते आपल्या आजूबाजूच्या जीवनात रमतात व त्या जीवनाशी निगडित विषयांवर साहित्य निर्मिती करतात. त्यांची कविता जगण्याचे वास्तव सांगते, स्वप्नरंजनात रमत नाही. ती तत्वज्ञान सांगत नाही तर बहुसंख्यांच्या जगण्याचं वास्तव सांगते. कवी म्हणून समकालाकडे बघण्याची त्यांची दृष्टी प्रस्तुत कवितेत स्पष्टपणे जाणवते. सद्यस्थितीचं सखोल आकलन व ते व्यक्त करून समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज ज्या साहित्यिकांना कळते तेच समाजाचं देणं फेडू शकतात. दासू वैद्य त्यातलेच एक व प्रस्तुत कविता अशातलीच एक.

सदर कवितेत कवी आपल्या दाराशी येऊन ठेपलेल्या भयावह भविष्याबाबत आपल्याला जागरूक करतात. ही कविता, हा विचार, समाजातल्या विशेष करून मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित, एक किंवा दोनच मुले असणारे, आपल्या मुलांचे सर्व लाड पुरवणारे, मुलांना सर्व अत्याधुनिक व महागडी खेळणी आणून देणारे पालक यांच्यापर्यंत पोहोचवण्याची निकड दासू सरांना जाणवते म्हणून ते अशा कविता लिहितात.

आपण वेळीच जागे झालो नाही तर पाश्चात्य देशातील शाळांत घडणाऱ्या दुर्दैवी घटना आपल्याकडेही लवकरच पहायला मिळतील. अल्पवयीन मुले गंमत म्हणून किंवा किरकोळ कारणावरून घरातल्या वडिलधाऱ्यांचे पिस्तुल वापरायला मागेपुढे बघणार नाहीत.

कवी म्हणतात पूर्वी जत्रा भरायच्या, तिथं मुलं आण्या, दोन आण्याला मिळणारी पुंग्यांसारखी खेळणी घ्यायची पण आता मुलांना धडाडणारी, खोट्या का असेनात पण सटासट गोळ्या झाडणारी मशीनगन आवडते, त्यांना युद्ध युद्ध खेळायला आवडतं. उशांचाअडसर बनवून, त्यामागून मुलाने जेव्हा वडिलांवर बंदूक रोखली तेव्हा त्याच्या डोळ्यातील हिंस्र भाव बघून कवीचे काळीज चरकलं व त्यातूनच जन्मली ही कविता.

पाश्चात्य देशांत अधुनमधून अल्पवयीन मुलांकडून अशी हिंसा घडत असते पण आपण त्यातून कांहीच बोध घेणार नाही का? खेळण्यांचे निर्माते पैसे कमवण्यासाठी कसलीही खेळणी बनवतील पण आपण कसलाही विचार न करता ती खेळणी मुलांना आणून देणार आहोत का? सिनेमातील हिंसा बघून बघून आपणही हिंसेला निर्ढावलो आहोत का? लहान मुलांच्या निष्पाप मनात आपणच हिंसेची बीजं तर रोवत नाही ना? या सर्व प्रश्नांची उत्तरे दासू सर या कविते द्वारे समाजाकडे मागत आहेत.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – पाठी पोटी देव… – ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – पाठी पोटी देव… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

पाठी पोटी देव /

कैसा हरिदासा भेव //१//

*

करा आनंदें कीर्तन /

नका आशंकित मन //२//

*

जिथे कोठे काळ /

करील देवापाशी बळ //३//

*

तुका म्हणे धनी /

सपुरता काय वाणी //४//

  – संत तुकाराम.

तुका म्हणे

ज्या भक्ता मागे त्याला सांभाळण्यासाठी देव मागे पुढे उभा आहे त्या हरिच्यादासाला कुणाचे कसले भय असणार आहे. म्हणूनच आनंदाने देवाचे नामस्मरणकरा. कीर्तन करा. मनात कसलाही शंका बाळगू नका. काळ कितीही बलशाली असला तरी तो देवा पेक्षा बलवान नाही. आपला धनी सर्वापेक्षा बलवान असेल तर आपल्या जीवनात सगळीकडे आनंदच आनंद भरून राहील.

ज्याच्या मनात देवाविषयी सात्विक भाव, श्रद्धा, आपुलकी, आणि नितांत आदर असेल तर त्याच्या मनात फक्त देवच कायम वस्तिला असतो. त्याला कशाचीही भीती नसते. आपल्या मनात फक्त देव जपा त्याचे ध्यान करा, कीर्तन करा. मनात कसलीही शंका बाळगू नका. आत्ताचा हा काळ कितीही संकटाचा, अवघड, आणि घातपात करणारा असलातरी देवापुढे त्यांचे काहीच चालणार नाही. ज्याला तुम्ही आपला धनी मानले आहे तो बलशाली परमात्मा तुमचे संरक्षण करील. तुमच्या जीवनात तो आनंदाची सतत बरसातच करत राहील.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मज कोण मारतो हाका… कवयित्री : डॉ. स्नेहल कुलकर्णी ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

 

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ मज कोण मारतो हाका… कवयित्री : डॉ. स्नेहल कुलकर्णी ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ कविता ☆ मज कोण मारतो हाका

वाऱ्याला फुटला फाटा निस्तब्ध रान सन्नाटा

अवसेच्या अथांग डोही अंधार कापती वाटा

व्याकूळ स्वरांच्या पोटी उसवून भयाचा टाका

ह्या झपाटलेल्या वेळा… मज कोण मारतो हाका

*

घटलेला जलोनिधी की पडलेला उलटा फासा

पात्रात गुंजभर पाणी तडफडतो करूण मासा

रणरणत्या नदीतटावर औदुंबर झुरतो ओका

ह्या माध्यान्हीच्या वेळा.. मज कोण मारतो हाका

*

बंबाळ चितेचा भडका चमचमती स्मशानजागा

शृंगार यातना करते श्वासात धुराचा धागा

आत्म्याचा लगाम सुटतो देहाचा वितळून साका

ह्या गुदमरणाऱ्या वेळा.. मज कोण मारतो हाका

*

हे शापित अमृत कोणी.. शिंपडले माझ्या भाळी

स्रोतांना बधीर करते बेभान सुखाच्या काळी

मी दुःख जोजवत नाही ना आनंदाचा झोका

ह्या मरणकळांच्या वेळा.. मज कोण मारतो हाका

© डॉ. स्नेहल कुलकर्णी

रसग्रहण ☆ नीलिमा खरे ☆

समृद्ध जाणिवा, सजग दृष्टीकोन, संवेदनशील मन हे पैलू जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्त्वात अंतर्भूत असतात तेव्हा ती व्यक्ती आयुष्य जगताना केवळ आत्मकोशात राहून सुखी व आनंदी जगण्याचा विचार करू शकत नाही. आजूबाजूची परिस्थिती, त्यातील बदल याकडे उघड्या डोळ्यांनी ती व्यक्ती पाहते. बदलांच्या परिमाणाकडे व परिणामांकडे विचारपूर्वक लक्ष देते. आजूबाजूच्या वातावरणाशी स्वतःच्या मनस्थितीची सांगड घालण्याचा प्रयत्न करते, त्यातील साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न करते.
अशाच प्रकारची विचारी भूमिका मांडणारी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांची ही प्रगल्भ कविता “मज कोण मारतो हाका”…

“वाऱ्याला फुटला फाटा” त्याच्या वाटेला फाटा फुटला आहे म्हणजे तो काही कारणाने वाहत नाहीये या वास्तवाचे भान होते. साहजिकच वाऱ्याच्या अभावाने रानही निस्तब्ध झाले आहे. पानांची सळसळ, झाडातून वारा वाहताना होणारा शिळीचा भास होत नाहीये.

सारे वातावरण एकदम चिडीचूप झाले आहे. सन्नाटा पसरलाय. सन्नाटा या एका शब्दातून निस्तब्धतेचा कमालस्तर लक्षात येतो. “फाटा फुटणे” हा अतिशय समर्पक वाक्प्रचार कवितेतील आशयाला पूरक आहे. अवसेच्या रात्रीचा गहिरा व अथांग काळोखाचा डोह व त्यातील अंधार कापणाऱ्या वाटा यामुळे कवितेतला आशय ठसवण्यात कवयित्री यशस्वी होते. अशा निसर्गसन्निध वातावरणात व्याकुळ स्वरांच्या पोटी भयाचा टाका उसवून या झपाटलेल्या वेळी मला कोण हाक मारतंय असा प्रश्न कवयित्रीला पडला आहे. निसर्गातील वातावरणाचा परिणामकारक उल्लेख करत कवयित्रीने मनोवस्था, भावावस्था वर्णिली आहे. सन्नाटा मनात वावरत असताना वाऱ्याची सुखकारक, सुखद झुळूकही लाभली नाही. वाऱ्याने ही पाठ फिरवली. “अंधार कापती वाटा” यातून वाटेवर चालताना केवळ अंधार नजरेस येतोय ही भावना स्पष्ट होते. अवसेच्या भयाण रात्री चहूबाजूला अंधार दाटून राहिलाय. प्रकाशाचा कवडसा, एखादा किरणही दृष्टीस पडत नाहीये. मार्गक्रमणा करताना येणाऱ्या वाटेला अंधार कापतोय अशी अतिशयोक्तीची कल्पना केली आहे. चेतनागुणोक्ति आणि रूपक अलंकाराचे उत्तम प्रयोजन कवयित्रीने केलेले जाणवते. यातून तिचे साहित्यिक भान तर लक्षात येतेच आणि कवितेचा आशय मनावर अधिक चांगल्या तऱ्हेने ठसला जातो. या वातावरणाच्या प्रभावाने, परिमाणाने तिचा स्वर व्याकुळला आहे. पण तरीही अंतरंगातले भय, भीतीचा टाका उसवून, तो दूर सारून या झपाटलेल्या वेळातून तिला कोणीतरी हाक मारतयं… कदाचित तिचेच अंतरंग…. “झपाटलेल्या” या शब्दांतून तिची भावावस्था किती खोलवर आणि आरपार तिच्यात भिनली आहे हे लक्षात येते.

अवसेच्या रात्रीची अवस्था वर्णून झाल्यावर ती माध्यान्हीचे वर्णन करत आहे. माध्यान्ह शब्दांतून टळटळीत दुपार, रणरणते ऊन, उन्हाच्या काहिलीने थकणारे शरीर व मन यांकडे निर्देश केला आहे. अत्यंत समर्पक शब्दांतून खूप मोठा अर्थ व्यक्त होतो. या रणरणत्या उन्हात पोळलेल्या जीवाला जरुरी असते पाणी… परंतु ज्यावेळी प्रकर्षाने ते हवे तेव्हा मिळणे हे प्राक्तनात नाहीये. अगदी त्याच क्षणी जणू काही जलधी घटलाय. पाण्याची कमतरता जाणवत आहे. “उलटा फासा पडला” म्हणजे मनाविरुद्ध घडलं. हवं ते न मिळणं, अपेक्षित पूरक, पोषक अवस्था उपलब्ध न होणं हा अर्थ स्पष्टपणे कळतो. “उलटा फासा” या शब्दांतून व कवितेतील भावनेला योग्य अर्थ दिला आहे. जवळ असलेल्या पात्रात (नदीचे पात्र व पाणी पिण्याचे भांडे)गुंजभर पाणी आहे. साहजिकच अपेक्षित प्रमाणात उपलब्ध पाणी उपलब्ध नसल्याने करुण व केविलवाणा झालेला, भासणारा मासा तडफडतोय. कारण पाणी हेच त्याचे जीवन आहे. त्यापासून तो दुरावलाय. मासा हे रूपक व्यक्तिला वापरले आहे. पाण्यविना जशी माशाची तडफड होते तशीच तगमग विपरीत वातावरणात व्यक्तिची होते. अत्यंत समर्पक व अर्थवाही रुपक… पुढे कवयित्री सांगते की नदीतटही रणरणता आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने पुरेशा पाण्याअभावी नदीतट स्वतःच तृषार्त आहे. त्यामुळे त्याच्या काठावरील औदुंबर झुरतोय पाण्यविना… तो “ओका”बोका निष्पर्ण जीवनाचे लक्षण नसलेला असा दिसतो आहे. औदुंबराचे रूपकही अत्यंत अर्थपूर्ण… अशा या माध्यान्ही वेळेला तिला कोण हाका मारतो आहे हा प्रश्न तिला पुन्हा सतावतो आहे.

पूर्णपणे विपरीत परिस्थिती आजूबाजूला व जीवन सुसह्य करणारी स्थिती दृष्टीपथात नाही. अशावेळी दुःखाने दुखावलेला जीव मरणासन्न झालाय. “बंबाळ” या शब्दांतून दुःखाचा अतिरेक, कमालस्तर, आकारमान, कठोरपणा हे सारे सारे ध्यानात येते. दुःखबंबाळ जीवाची जणू चिता पेटते, तिचा भडका उडतो. “भडका” या शब्दयोजनेमुळे प्रमाण आणि परिमाण मोठे आहे हे लक्षात येते. एकदम आगीचा डोंब उसळल्यागत अवस्था झाली आहे हे ध्यानात येते. आणि चिता पेटल्यानंतर जशी स्मशानाची जागा चितेच्या दाहक प्रकाशाने चमचमते त्याप्रमाणेच व्यक्तीचे आयुष्य बनते. या जागेवर आणि जाणिवेवर यातनेचा, वेदनेचा जणू काही शृंगार दिसतो. अर्थात यातनामय शृंगार सुरू आहे अशी भावना व्यक्त केली आहे. “श्वासात धुराचा धागा” ही कल्पना केवळ अप्रतिम.. परिस्थितीचे गांभीर्य आणि त्याची तीव्रता ध्यानात आणून देणारी कल्पना… शरीराच्या अस्तित्वाला आवश्यक असलेला श्वास जळू लागला आहे आणि त्यातून निघणारा धूर ही त्या श्वासाला मिळाला आहे व श्वासात मिसळलेला आहे. शरीराबरोबरच मनालाही जाळणारी यातना आणि त्यातून निर्माण झालेला धुराचा धागा… ही वेळ केवळ अगतिक, हतबल बनवणारी… अशावेळी देहाचा “साका” तळापासून, मुळापासून वितळतो. मनाच्या तळाशी साचलेले सगळे बाहेर पडते, चितेच्या भडकणाऱ्या ज्वाळेत नष्ट होते. त्यामुळे प्राणावर, जीवावर असलेला आत्म्याचा लगाम सुटतो. आत्मा जो आयुष्य या संकल्पनेवरील लगाम आहे तो सुटतो, अदृश्यच होतो. विचित्र, असह्य, सहन न होणाऱ्या परिस्थितीत जीव गुदमरतोय, तगमगतोय, तडफडतोय, कासावीस होतोय, परंतु याला तरणोपाय नाही व यातून सुटका नाही हे सत्य ध्यानात आलेले आहे.

अमृत सेवनाने माणूस अमर होतो अशी कल्पना आहे. पण कवयित्री म्हणते की तिच्या भाळी मात्र कुणीतरी शापित अमृत शिंपडले आहे. साहजिकच असे अमृत त्याची किमया पूर्णार्थाने करण्यास असमर्थ आहे. केवळ “शिंपणाने” ही अवस्था तर शापित अमृताचा कलश कुणी ललाटी लावला असता तर काय झाले असते? तर कदाचित तिच्या वेदनेला अंतच उरला नसता. आंतरिक प्रेरणेच्या स्त्रोताला ही परिस्थिती बधिर करून सोडते, काहीही सुचत नाही. भान नसलेल्या, बेभान झालेल्या सुखाच्या काळी तिला मात्र काहीच सुचत नाही. अर्थात सुखाच्या क्षणांकडे दुर्लक्ष होते. “सुख पाहता जवाएवढे व दुःख पर्वताएवढे” अशी मानसिक अवस्था होते. अशा विपरीत वातावरणात कवयित्री पुढे सांगते की ती दुःखाला जोजवत, कुरवाळत राहत नाही. जोजवत या शब्दांतून एखाद्याच्या प्रती असलेला जिव्हाळा किंवा ममत्व अधोरेखित केले जाते. (उदाहरणार्थ बाळाला जोजवणे.) कवयित्री स्पष्ट करते आहे की ती या तिच्या दुःखाप्रती अशी भावना बाळगून नाही. ती दुःखाचे भांडवल करत नाही. त्याचवेळी ती पूर्णपणे आनंदाच्या झोक्यावरही झुलत नाहीये. अत्यंत तटस्थपणे आणि त्रयस्थपणे ती आयुष्याकडे पाहते आहे. असे असूनही व असे असल्यानेच तिला मरणकळा, मरणप्रायवेळा सामोऱ्या आहेत असे वाटते. आणि या अशा वेळी तिला कदाचित तिचे पुढील आयुष्य हाका मारते आहे.. सद्य परिस्थितीत ही सकारात्मक भावनेने जगायला प्रवृत्त करते आहे.

नितांतसुंदर अशी ही कविता.. गहन अर्थाची आणि तो परिणामकारक रीतीने शब्दबद्ध करणारी कविता.. निसर्गातील प्रतिमांचा, रूपकांचा आधार घेऊन त्याच्याशी समांतर असणारी, त्यातल्या अर्थाप्रती समान असणारी, साधर्म्य सांगणारी मनोवस्था आणि त्याचे अत्यंत भेदक वास्तववादी, भयाण, भयावह, जीवनसत्य शब्दचित्रातून सूचकतेने मांडणारी, उलगडणारी अप्रतिम कविता.. प्रत्येक कडव्याच्या आशयाला सुसंगत असा शेवटचा चरण… संपूर्ण कवितेतून कवयित्रीची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, तिचे सजगभान व सृष्टीतील गोष्टींबद्दलचे अवलोकन आणि त्या भावपूर्ण आशयाला दिलेली सुजाण साहित्यिक लेखनाची कौतुकास्पद शैली…
अनुप्रास, यमक, रूपक, उपमा, श्लेष, चेतनागुणोक्ति इत्यादी साहित्यिक अलंकारांचा सहज सुंदर वापर कवितेतील आशयाला उंची व खोली प्रदान करणारा.. अंतरंगातून आलेली अंतरंगापर्यंत पोहोचणारी अप्रतिम अशी ही भावकविता…

कदाचित यातील संपूर्ण अर्थ, भावार्थ स्पष्टपणे व योग्य शब्दात मांडण्यात माझ्या भावना कमीही पडल्या असतील कारण त्या केवळ जाणून घ्यायच्या असतात. जाणीवेने आणि नेणीवेने नेमकेपणे व्यक्त करण्याकरता माझे शब्दमाध्यम अपुरे ठरले असेल. एक अतिशय उच्च दर्जाची कविता एवढे मात्र नक्की म्हणते.

© सुश्री नीलिमा खरे

२६-३-२०२५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – माप म्हणे… – अनुतापे दोष ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – अनुतापे दोष… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

अनुतापे दोष /

जात न लागता निमिष//१//

*

परि तो राहे विसावला /

आदी आसवांनी मला //२//

*

हेच प्रायश्चित्त/

अनुतापी न्हाय चित्त //३//

*

तुका म्हणे पापा/

शिवो नये अनुतापा//४//

  – संत तुकाराम.

तुका म्हणे

केलेल्या चुकीचा पश्चात्ताप झाल्यावर चुकीचा दोष घालवण्यासाठी एका क्षणाचा कालावधी पुरेसा असतो. पश्चात्ताप वाटल्यानेच माणूस अगदीच शांत होईल आणि शांतच राहील. माणसाच्या मनात पश्चात्ताप भरून रहाणे हेच खरे प्रायश्चित्त आहे. जर असे झाले तर प्रायश्चित्त करणा-याच्या मनात पाप शिरकावच करू शकणार नाही. आपण केलेल्या किंवा आपणाकडून नकळतही झालेल्या चुकांचा आपल्याला खरा पश्चात्ताप झाला असेल तर वाईट गोष्टी करायला लागणारे सगळे दोष आपल्या पासून दूर पळून जातील. त्यामुळे आपल्या कायम व्यस्त असणा-या मनाला विश्रांती मिळेल. मन सतत दग्ध असणे हीच केलेल्या कुकर्मिची खरी शीक्षा असते. मनात जर पश्चात्ताप भरून राहिला असेल तर आपल्या कडून वाईट वर्तन घडणारच नाही. आणि वाईट वर्तन घडले नाही तर पाप आपल्याला चिकटायला येणारच नाही.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – तुटे भवरोग… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – तुटे भवरोग… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

तुटे भवरोग /

संचित क्रियमाणभोग //१//

*

ऐसे विठोबाचे नाम /

उच्चारिता खंडे जनो //२//

*

वसो न सके पाप /

जया त्रिविध तो ताप //३//

*

तुका म्हणे माया /

होय दासी लागे पाया //४//

  – संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

विठोबाचे नाम सर्व गूण संपन्न आहे. त्याच्या स्मरणाने व उच्चाराने संसारातील दुर्धर रोगही तुटून जातात. तसेच प्ररब्धाप्रमाणे साठलेले भोग सुद्धा नाश पावतात. त्याच्या केवळ नामस्मरणाने पुनर्जन्माची भीती रहात नाही. देवाचे सतत नाव घेतल्याने पापाचरण घडत नाही. त्यामुळे नामजप करणाराला जगा कडून कसलाही त्रास होणार नाही. वाईट गोष्टी भोगाव्या लागणार नाहीत. त्या प्रारब्धाप्रमाणे वाट्याला आल्या तरी त्रासदायक वाटणार नाहीत. त्यांच्यावर मोहमाया मोहिनी टाकू शकणार नाही. तर ती त्याच्या पायावर लोळण घेवून त्याची दासी बनेल.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – विचारावाचून… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – विचारावाचून… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

 *

विचारावाचून /

न पाविजे समाधान //१//

*

देह त्रिगुणांचा बांधा /

माझी नाही गुण सुधा //२//

*

देवाचिये चाडे/

देवा द्यावे जे जे घडेल //३//

*

तुका म्हणे होते /

बहु गोमटे उचिते //४//

*

  – संत तुकाराम.

तुक म्हणे

कोणत्याही गोष्टीचा सारसार विचार केल्याशिवाय मनाला समाधान वाटता कामा नये. आपण माझा माझा म्हणतो तो देह त्रिगुणांनी बनलेला आहे . पण त्या देहातले गुणावगुणही माझ्या मालकीचे नाहीत. म्हणून मनात देवाचे भान ठेवून जे काही घडते ते देवालाच अर्पण करावे. त्याच्यामुळे जे काही घडेल ते उचित, देखणे, आणि योग्यच घडेल .

मनात सतत विचार असायलाच हवेत त्याशिवाय मन स्वस्थ रहातच नाही. मला दिसणारा आणि मला माझा वाटणारा देह माझा नाही . त्याची रचना निराळीच आहे .तो पंचमहाभूते व त्रिगुणानी बनलेला असून त्यांच्याशीच कटीबद्ध आहे. मला ज्यांचा अभिमान वाटतो ते गुणही माझे नाहीत. दूस-या कुणीतरी ते गुण माझ्या देहात भरलेले आहेत. हे जेव्हा पक्के आपल्या मनात बसेल तेव्हा जे काही बरेवाईट घडेल ते सारे देह घडवणा-या परमेश्वरालाच अर्पण करावे असे वाटायला हवे. त्या मुळे आपल्याला जे फळ आणि बळ मिळेल ते महत्त्वाचे आणि यथायोग्यच असेल.

 © प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares