मैत्रिणीचा फोन आला,” अगं शीला आपण अगदी चुकीचं शिकवलं बघ आपल्या विद्यार्थ्यांना. आपण सांगितलं सोलापुरात खूप झाडं लावा तरच पाऊस चांगला पडेल अन्यथा आपल्याकडे दुष्काळच… पण काय ग कसला पाऊस आपण चुकीचं सांगितलं बाई…!” या विनोदावर आम्ही खूप हसलो खरंच विनोदच म्हणायचे याला सोलापुरात आम्ही कधीच एवढा पाऊस पाहिला नव्हता पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासून जो पाऊस पडतोय तो मला वाटतं थंडी सुरू झाली तरी पडत राहणार आहे असं दिसते. मग काय घरात निवांत बसणे सोलापुरातल्या माणसाला पावसाची सवय नाही त्यामुळे त्याच्याकडे रेनकोट छत्री इत्यादी साहित्य नसते पाय पाण्यात बुडाले तर त्याला सर्दी होते अशी जडणघडण झालेले आमचे शरीर मग आता या वयात तरी निवांत घरी बसलो. 45 बंगल्यांच्या आमच्या सोसायटीत पूर्ण शुकशुकाट 45 घरात मोजून 50 माणस आहेत त्यातली 25 व्यवसायाला गेलेली… काही घरे कुलूप बंद . .प्रचंड शांतता….! मोबाईल आणि टीव्हीचा कंटाळा आलेला… मी शांत पडून राहिले भिंतीवरच्या घड्याळाकडे मात्र सतत लक्ष होतं…. एकेक काटा गतीने फिरत होता…. सेकंदाचा फिरणं 60 घर… तेव्हा मिनिट काटा एक घरावर हलायचा… मग 60 मिनिटे झाल्यावर तास काटा पाच घर चालायचा… हा खेळ मी तासभर बघत होते आणि लक्षात आले याना कंटाळा कसा येत नाही तेवढ्याच गोलात चालायचा…! हे कधी थांबत नाहीत…. बरोबर आहे त्याच्या मागे त्याचा बाप बसलाय ना.. बॅटरी ….आणि मग असेच काही काही विचार येत राहिले आणि माझ्या तोंडून सहजच निघाले ,”ओ काटेकर थांबा की तुम्हाला चालताना बघून कंटाळा आलाय… आम्हाला मात्र चालता येत नाही आणि तुम्ही पळत आहात”. आणि पटकन क्लिक झाल..” काटेकरांची मुलं”…. मग भराभर कल्पना येत राहिल्या बारा वाड्या . साठ घर …आणि खूप काही जे कवितेत मांडलेल आहे ..!मग काय समोर एक पावतीचा कागद पडला होता अगदी हाताएवढा… पेन घेतला आणि त्यावर लिहायला सुरुवात केली भराभर ओळी उतरत गेल्या सहजच स्फुरलेले काव्य, ते काही कष्ट काव्य नव्हतं पंधरा मिनिटात कविता झाली. मला चांगल्या कागदावर आणि चांगल्या अक्षरात कविता करता येत नाही कागद पाठ कोरा, पावत्या, रद्दी इत्यादी मधला असेल तर कवितेला स्फुरण चढते .. !कविता तर झाली पहिला श्रोता हवा ना…? शेजारी पेइंग गेस्ट म्हणून एक एमबीबीएस ची मुलगी राहते… नीरजा तिच्या परीक्षेच्या अभ्यासातून तीला पाच मिनिट ब्रेक दिला… म्हटलं चल कविता ऐकवते… कविता ऐकून ती खुश झाली आणि फ्रेश सुद्धा झाली म्हणाली,” क्या बात है आत्या मस्त” बास एवढ्या प्रतिक्रियेवर कविता पटापट पाठवली .आता ही कविता वाचून काहींनी विचारले कसं काय सुचत हो तुम्हाला? मनात म्हणलं बाई एकटेपणाचे दुःख तुम्हाला काय माहिती आहे घरात माणसं नसली की कविता सुचतात… ही थोडी गंमत बरं मला खात्री आहे तुम्हाला ही कविता आवडेल . .चला तर मग पाहूया काटेकरांची मुलं काय म्हणतात….!!!
☆ काटेकरांची मुलं ☆
*
बारावाड्यांचा 60 घरांचा एक होता गाव
घड्याळ त्याचे नाव//
*
काटेकरांचे वेडे तीन भाऊ होते गावभर फिरणारे
मोठा ताशा बळ मधला मिंटो आणि लहान होता पळ पळ
*
तोच मोठा होता चपळ पळ पळ सतत पळायचा
बारा वाडे फिरल्यावर मिंटू एक घर चालायचा
मिंटो साठीला आला की ताशा भाऊ पाचघर हलायचा
*
पण फिरून नाही हं दमायचे
रात्र असो दिवस असो असो उन्हाळा पावसाळा
बारा घरांचा त्यांना लागला होता लळा
*
यांचं म्हणजे एक असतं वेळ म्हणजे वेळ
आणि शिस्त म्हणजे शिस्त
पाळायलाच पाहिजे ना
साऱ्या जगाची असते यांच्यावरच भिस्त
*
सगळीकडे यांचेच राज्य घर ऑफिस शाळा
रेल्वे एसटी विमान सुद्धा पाळतात यांच्या वेळा
आई-बाबांना यांचाच धाक
लोकलचतर चालते यांच्यावरच चाक
*
यांचा दर्जा कायम वरचा
भिंतीवर मनगटावर मोबाईलच्याही स्क्रीनवर
*
ग्रहावरही यांचीच हुकूमत
सूर्य ही उठतो वेळेवर
दिलेल्या कक्षेत मुकाट फिरतात
ग्रह तारे बिनदिक्कत
*
जन्म लग्न मृत्यू मुहूर्त सगळीकडे यांचाच गणित
अपरंपार महिमा यांचा भक्त यांचे अगणित
*
पण ठाऊक आहे का काय यांची गंमत
यांचे बाबा मागे बसूनपाहतअसतात जम्मत
बॅटरी वाले बाबा त्यांना देतात ऊर्जा
म्हणून वेळेवर हलतोय त्यांचा प्रत्येक पूर्जा
*
धावणाऱ्याच्याही मागे असतो दडलेला एक बाप
तो असला की नाही चिंता, धावायचं पण नसतो डोक्याला उगाच ताप
*
मागे म्हणे आजीनं गाठोड्यात याला बांधलं
एका कवीने शोध शोधलं पण त्यालाही नाही सापडलं
*
आता नको शोधा शोध नको त्याचा मनस्ताप
काटे कुटुंबाला बांधून घ्या आणि सरळ चला बिनधास्त//
*
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कवितेतून मनातील भावनांचा विकोपाला गेलेला अहंकार अथवा एकरुपतेच्या मान्यतेत हरवून गेलेल जीवन.
जिथे आत्मघाताने जीवन संपवणारी दोन मने काल्पनिक संवादातून साधू इच्छीतात प्रेमाचा विजय.
खरे तर प्रेम या विषयावर फेलोशिप करणे कठिणच. अगदी शेक्सपिअर व कुसुमाग्रजांसारख्या दिग्गज साहित्यिकांचे चिंतनसुध्दा पूर्णपणे शब्दात अभिव्यक्त झालेले दिसून येत नाही.
अंतरीतील दोन हृदयाची एकत्र येण्याची तगमग म्हणजे प्रेम. प्रेमातील दुरावा यामध्ये समाजातील काही बंधनेही आडवी येतात.त्या प्रेमाच्या मान्यतेत असणा-या विचारधारेला.
विष पिऊन,दरीत उडी टाकून,समूद्रात एकत्रीत बुडून अथवा सर्व प्रेम ऋणानुबध नात्यांना झुगारुन प्रेमी युगलांनी जीवन संपवणे म्हणजे प्रेमातील आतिशोयक्ती म्हणता येईल.
प्रेम केवळ आठवणींवर टिकवता येते.जन्मभर राधा कृष्णासारखे.
भावनिक तृप्ततेच्या जवळ येऊन दुराव्यातील विरहाने जवळ येण्याची आयुष्यभर आठवणींना उराशी कवटाळून एकमेकाविषयी आदर ठेवणे याला प्रेमाची सरळ व्याख्या म्हणता येईल.
प्रत्येक साहित्यिकांना प्रेमावर लिहीणा-या सर्व प्रकारातील कवी,लेखक,कादंबरीकार अथवा प्रत्येक प्रकारातील प्रेमाभिव्याक्ती शब्दात मांडणा-या साहित्यिकांना
त्या त्या विचाराप्रमाणे अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य निश्चीतच आहे.
महाभारतातील सुभद्रा हरण असो अथवा राधेच आठवणीतील प्रेम.प्रेम हे मनातील निर्मळ भावनेच प्रतिक असतं.
माझ्या ‘पुन्हा एकदा त्याच वळणावर’या कवितेसाठी अभिव्यक्त होणे गरजेचे वाटले म्हणून दिली अभिव्यक्ती 🙏
पुण्यातला सुप्रसिद्ध बाजीराव रोड … त्या रस्त्यावर असणारा तितकाच प्रसिद्ध शनिपार चौक.. चहूबाजूंनी सदैव गजबजलेला.. जीवनावश्यक सर्व चीजा सहजपणे उपलब्ध करून देणारे, या चौकात एकत्र येणारे चारही रस्ते… या चौकाच्या.. या बाजीराव रस्त्याच्या अगदी लागून असलेल्या ठिकाणी मी जन्मापासून पुढे ४६-४७ वर्षं राहिलेली आहे. आणि म्हणूनच या चौकाच्या चौफेर असणारे चार महत्वाचे गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीची मोठ्या उत्साहात वाजत गाजत जाणारी विसर्जन मिरवणूक म्हणजे माझ्या आयुष्याचा जणू एक अविर्भाज्य भागच…. उत्साह आणि आनंदाची …गणेशाच्या मंगलमय नेत्रसुखद दर्शनाची लयलूट करणाऱ्या या सगळ्या गोष्टी… जाण्याआधीच पुढच्या वर्षीच्या आगमनाची वाट पाहायला भाग पाडणारा हा उत्सव….
….. हो.. आठवतंय तेव्हापासून गेल्या काही वर्षांपर्यंत असंच तर होतं सगळं. फुले मंडईपासून विसर्जन मिरवणूक सुरु व्हायची. आणि त्यासाठी पुण्यातली सगळी सार्वजनिक मंडळे रांग लावून सज्ज असायची.
ढोल ताशे – त्याबरोबर शिस्तीने तालबद्ध.. लयबद्ध नाचत जाणारे त्या त्या मंडळाचे कार्यकर्ते – शांततेने.. स्वयंशिस्त पाळणारे बघे लोक…… आणि वेळेत सुरु होऊन वेळेत संपणारी प्रेक्षणीय मिरवणूक……
….. काही वर्षांनी कालानुरूप हे चित्र हळूहळू बदलत चालल्याचे कुठेतरी जाणवत होते हे नक्की.. शहराची लोकसंख्या सतत वाढत होती.. गणपती पहात हिंडण्याची वेळही वाढत होती. सजावटीचे नवनवे तंत्रज्ञान उपलब्ध होण्याचे प्रमाणही वेगाने वाढत होते.. तरीही त्यावेळचं एकूणच सामाजिक वातावरण सुसह्य होत होतं…….. पण आता गेल्या काही वर्षांपासून मात्र, प्रसन्नता.. मनापासूनचा भक्तिभाव.. आणि मनात साठवून ठेवावा असा आनंद देणाऱ्या या उत्सवाचे.. विशेषतः विसर्जन मिरवणुकीचे स्वरूप पूर्णपणे पालटल्याचे स्पष्टपणे अगदी दरवर्षी जाणवते आहे. डीजे.. त्यावर वाजणारी कानठळ्या बसवणारी कर्कश्श गाणी.. त्यावर बेधुंद होऊन विचित्र अंगविक्षेप करत भान हरपून नाचणारी तरुणाई … पाहतांना चक्कर यावी अशी विद्युत रोषणाई …. सगळे सगळे अगदी असह्य करणारे होत चालले होते.. नव्हे.. झालेच होते.
.. भर रस्त्यावर असणाऱ्या माझ्या घराच्या गॅलरीत एका वर्षी रात्री त्या मिरवणुकीसाठी चाललेला अनागोंदी गोंधळ बघत अगदी सुन्न होऊन उभी होते.. कारण घरात झोप लागणं केवळ अशक्य होतं. जिकडे तिकडे सगळा नुसता धुमाकूळ.. रस्ता दिसतच नव्हता.. दिसत होती फक्त डोकी.. आणि डोकी… आणि फक्त कलकलाट.. हा शब्दही खरं टोकदाच होता त्या डोकं बधीर करणाऱ्या गोंगाटासाठी. रस्त्याच्या कडेने दाटीवाटीने उभे असलेले खाद्यपदार्थांचे अगणित स्टॉल्स आणि त्याच्या कढयांवर मुद्दाम आपटल्या जाणाऱ्या झाऱ्यांचे जणू डोक्यात घाव घातल्यासारखे घणघणाट …. चणे-फुटाणे, कर्कश्श पिपाण्या, फुगे, आणि काय काय विकणाऱ्यांच्या गर्दीला मारलेल्या हाका….. किती आणि काय काय सांगावं …
….. मिरवणुकीसाठी नंबर लावून उभ्या असलेल्या एका ट्रकवर ठेवलेल्या गणपतीकडे मध्येच माझं लक्ष गेलं.. त्याच्याकडे पहात असतांना अचानक त्या विघ्नहर्त्या गणेशाचाच चेहेरा अगदी केविलवाणा.. रडवेला.. वैतागलेला दिसत असल्याचा मला भास व्हायला लागला…….. आणि मनात नकळत शब्द उमटू लागले……
नाद रंग अन उत्साहाचा उत्सव चाले चोहीकडे
परि या जल्लोषात हरवली उत्सवमूर्ती कुणीकडे ….
*
दहा दिवस त्या मांडवात बांधून घातले त्यालागी
आज पहा किती बरे वाटले.. घरी जाण्याची घाई उगी….
*
रात्रीपासून मोटारीवर बसवून त्याला ठेवियले
सहनशील हा गजानन परी, आसन ना त्याचे ढळले ….
*
सकाळपासून जल्लोषाला पूर पहा हो किती आला
वाजतगाजत सगळे जमले उधाण आले उत्साहाला ….
*
मोटारीवर मुकाट बसुनी गणपती सारे पहात होता
जाणवले त्यालाही होते, गर्दीतच तो चुकला होता ….
*
लेझीम ढोल नि टिपरीचा तो तालच गर्दीमध्ये हरवला
धांगडधिंगा किती चालला विसरलेच त्या गजाननाला ….
*
“ छंदच नीत मज सकल जनांना चकवत असतो नशीबरूपे
म्हणे आज मी स्वतःच चुकलो – चकविती ही माझीच रुपे ….
☆ क्षण सृजनाचा ☆ आमुचा गणपती आला ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी☆
||श्री||
सकाळी जाग आली ती या ओळी गुणगुणतच…
दोन ओळी सुचल्या त्या काम करता करता गुणगुणत राहिले. आणि पुढे इतकं काही सुचू लागलं की काम बाजूला ठेवून मला त्या लिहून काढाव्या लागल्या. पूजा करतानासुद्धा इतकी तन्मयता झाली असेल की नाही माहिती नाही पण या ओळी लिहिताना मात्र एक विलक्षण तन्मयता, आनंद, चैतन्य जाणवत होतं. लिहिल्यावर जाणवलं की ही एक साधीसुधी आरती म्हणता येईल अशी रचना आहे. गणपतीची विविध नावं यात गुंफली गेली आहेत.
☆ क्षण सृजनाचा ☆ उंच हंडी ध्येयाची ☆ श्री प्रमोद वामन वर्तक
आजकाल दहीहंडी हा एक इव्हेंट बनला आहे! लाखोंची उंच हंडी फोडायच्या नादात, अनेक तरुण गोविंदा कायमचे जखमी अथवा मृत झाले आहेत. म्हणून मी एक वेगळ्या प्रकारची हंडी फोडायचे आवाहन, आजच्या तरुणांना करतो आहे. ती हंडी फोडायचा त्यांनी जरूर विचार करावा! 🙏
☆ क्षण सृजनाचा ☆ कॉफी, पाऊस आणि कविता…☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
माझ्या आयुष्यात “काॅफी, पाऊस आणि कविता ” या तीन गोष्टी एकत्र आल्या आणि काही क्षण सुखाचे करून गेल्या..! तेच क्षण मी एकत्र करून कवितेच्या रुपात कागदावर मांडले…!
जितकी साधी जीवाला भावणारी कॉफी, जितका जिव्हाळयाचा पाऊस तितक्याच साध्या सरळ, भावणा-या माझ्या कविता…!
कुठल्या तरी वळणावर, कळत- नकळत, काही कारण नसतांना आड वाटेला थांबून एखादा कोवळा क्षण समोर यावा ना तश्या ह्या कविता त्या अनोळखी क्षणासारख्या समोर उभ्या राहिल्या आणि त्या क्षणांनी पहिल्या सरीच्या बेधुंद पावसात मनाला भिजवून टाकल्या…!
एका सेमिनारसाठी आळंदीला गेलो इंद्रायणीचे आकर्षण खूप होतं. संध्याकाळी नदीच्या काठी बसलो पण पाणी काही स्वच्छ नव्हतं… बायका कपडे धुत होत्या… लोक आंघोळ करत होते… कोणी भांडे धुवत होतं… घाटावरची माणसं वेगवेगळ्या कृती त्या पाण्यात करत होते…. कोणीतरी सांगितलं” पुढे जा छान स्वच्छ पाणी आहे “त्या घाटावर गेल्यानंतर तिकडे पाणी चांगलं होतं. अर्थात आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो होतो. आणि त्या ठिकाणी क्रियाकर्म केले जात होते. फारशी गर्दी नव्हती पण एका कुणाचं तरी तरुण मुलाचे क्रिया कर्म होते. आणि बरीच माणसं परगावावरून आलेली होती. ज्या तरुण मुलीचा प्रियकर लग्नापूर्वीच गेलेला होता. त्याचे नुकतेच लग्न ठरवून साखरपुडा झाला होता. ती मुलगी कमालीची रडत होती आणि तिला दोघी तिघी बायका तिला खूप समजून सांगत होत्या…. बायकाही बऱ्याच आल्या होत्या… आमच्या बोलक्या स्वभावामुळे आम्ही थोडीशी माहिती काढली. त्यातील एका बाईने माहिती दिली होती. त्यानंतर त्या मुलीने जिथे त्याची रक्षा विसर्जित केली होती त्या तिथे पाण्यात जाऊन त्यातली एक ओंजळ भरून घेतली त्याच्याकडे क्षणभर तिने पाहिले.. आणि तिने ते पाणी पिऊन टाकले. तोंड धुतले डोळे धुतले आणि ती काठावर आली… हे सगळं पाहताना त्या मुलीच्या मनात काय चाललं असेल याचा सहजच विचार आला…. आणि काही ओळी सुचल्या… पुढे त्याची कविता झाली… पण ते दृश्य मी कमीत कमी दोन-चार दिवस तरी विचारू शकले नाही. खूपच अस्वस्थ करणारे ते दृश्य होते दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जीवांना असं वेगळं करण्यामध्ये देवाला काय मिळत असाव..? असा प्रश्न मला नेहमी सतावतो… आणि शेवटी त्याची करणी कोण जाणतो? …. असे म्हणून आपण थांबतो ती ही कविता….!
☆ वांझोटी प्रीत ☆
*
तिन्ही सांजेच्या वेळी
बसले इंद्रायणीच्या काठी
सूर्य मावळतीला गेला
अन चंद्र पृथ्वीच्या ओठी —
*
तो दुसरा प्रकाश
भेदून तिमिर निघाला
सावल्या स्वतःच्या
हळूच कुठे हरवल्या —
*
त्या जलाशयावर
टेकवले मी तळवे
ते तरंग परिचित
उठले विरले हळवे —
*
त्या तळव्यांना हा
स्पर्श तुझा रे कळला
मी ओळखले रे
तूच त्यात विरघळला —
*
तव देहाची रे
रक्षा येथे पडली
इंद्रायणीच्या त्या
जळात ती विरघळली —
*
मग श्रद्धेने मी
ओंजळ त्याची भरली
ओठास लावता
तृप्ती एक जाणवली —
*
तो घोट तृप्तीचा
पिऊन पिऊन घेतला
अन देहामध्ये
कणकण सामावला —
*
त्या मर्त्यकणातून
उगवण काही नाही
प्रीतीला शाप रे
वांझोटी ती राही —
*
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ क्षण सृजनाचा ☆ अंतिम सत्य ☆ श्री प्रमोद वामन वर्तक
वाळल्यावर गळून पडलेल्या एका पानाने, आपल्या मातेसमान झाडाबद्दल तक्रार करण्यास सुरवात केली. तेंव्हा त्या मातेने त्याला कशा प्रकारचे उत्तर दिले असते, ते या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 🙏