मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक संपाची कहाणी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एक संपाची कहाणी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(कामगारांचे म्हणणे पडले सारंगच्या यूनियनला जॉईन व्हावे म्हणजे सारंगअण्णा मालकाला पगारवाढ द्यायला भाग पाडतील.. शेवटी त्याने इतर कामगारप्रतिनिधी बरोबर सारंगअण्णांची भेट घेतली होती.

विश्वास रागाने धूमसत होता.. इतक्यात श्रद्धा शाळेतून आली..) 

इथून पुढे – – 

‘भेटले का सारंग?

‘होय. मग?

‘मग काहीच नाही.. त्त्यांचे म्हणणे तसा संप मागे घेऊ शकत नाही.

‘का?

‘त्त्यांची आणखी अनेक कंपन्यात यूनियन आहे.. त्यामुळे या कंपनीतून माघार घेतली तर इतर कंपन्यात परिणाम होतील.

‘पण मग कामगारांनी काय करायच? दत्तूकाका सारखेच बाकीचे.. मग तू का प्रयत्न करत नाहीस संप मागे घ्यायचा?

‘मी तस करू शकत नाही कारण आमच्या कामगारांपैकी अनेकांना सारंगअण्णा मोठी पगारवाढ देतील अशी आशा आहे आणि दुसरे..

‘दुसरे काय?

‘ही यूनियन चालवाणारी माणसे सरळ नसतात.. गुंड पोसत असतात हे.. मी संप मागे घेण्याचा प्रयत्न केला तर मलाच ठार मारतील ही लोक..

‘बापरे… तू नको पडूस यात.. चल जेवायला.. मी जेवण गरम करते…

ती दोघे जेवण करत असताना दार वाजू लागले म्हणून जेवणावरून उठून श्रद्धाने दार उघडले तर दत्तूकाका बाहेर होता..

‘मास्तर इलेत?

‘होय.. जेवत आहेत.. बसा.

दत्तूकाका आत येऊन बसले.

जेवण अर्धवट टाकून विश्वास बाहेर आला..

‘काका, सारंगअण्णांना भेटून आत्ताच आलो.. पण त्त्यांचे संप मागे घेण्याचे मन नाही..

‘मग.. आमी काय करायचा? किती दिवस उपाशी रवायचा?

‘मी सगळं सांगून बघितलं.. पण मालक अटी मान्य करत नाहीत आणि अण्णा अटी शिथिल करत नाहीत.. आपलंच चुकलं.. आपण उगीचच या यूनियनच्या मागे धावलो..

‘पण मास्तर.. माका पैशाची गरज आसा हो.. माज्या चेडवाचा लगीन करुचा आसा..

‘होय काका… मला समजतंय.. पण माझ्याकडे पण काहीच नाही.. तुमच्या सारखा मला पण दोन वर्षे पगार नाही. श्रद्धाला शाळेत काय थोडे पैसे मिळतात, त्यावर.. नशीब आम्हाला मूल नाही अजून.. नाहीतर..

‘पण माका आसा ना.. दोन चेडवा आसात.. दोगांय लग्नाची झालीत. थोरल्याचा लगीन ठरान दोन वरसा झाली. आता ती माणसा थांबतीत काय? मास्तर… मी अण्णाका भेटाक जावं.. माजी परिस्थिती सांगतय.. माज्यासारखी बरीच जणांची परिस्थिती अशीच..

‘ठीक आहे दत्तूकाका.. तुम्ही अण्णांना भेटा.

दुसऱ्या दिवशी दत्तूकाका सारंगअण्णाच्या ऑफिसमध्ये पोचले. दोन तास बाहेर बसल्यावर त्याना आतमध्ये घेतले..

‘बोला.. कोण तुम्ही..

‘मी दत्तू सावंत.. आमच्या कंपनीत संप सुरु आसा.. काल विश्वासमास्तर तुमका भेटून गेले.

‘बर.. तुम्ही त्या कंपनीत आहात. काय काम?

‘साहेब.. दोन वरसा आमी भायेर आसवं.. दोन वरसा म्हणजे चव्विस महिने पगार नाय.. कसा जगायचं?

‘तुम्हीच मंडळी माझ्याकडे आलात ना? मी तुमच्याकडे आलो होतो काय? तुम्हाला मोठी पगारवाढ पाहिजे.. पण थांबायला नको? कंपनीच्या मालकाकडे पगारवाढ मागितली.. पण तो देत नाही.. म्हणून संप.. मला काय हौस आहे संप पुकारण्याची?

‘पण अण्णा.. माझी खूप कुचम्बणा झाली हो.. माका दोन मुली.. दोघी पण लग्नाची झाली.. थोरलीचा लग्न ठरला पण.. माझ्याकडे पाच पैशे नाय हो.. लग्न करुचा कसा धाडस करू सांगा?

‘या तुमच्या वैयक्तिक गोष्टी मला सांगू नका.. संप केला की हे सोसावंच लागत.. डॉक्टरनी मिलचा संप पुकारला.. तुमच्याच कोकणातील कामगार देशोधडीला लागले.. मी असं ऐकलं की गिरणीकामगारांच्या मुली डान्सबार मध्ये नाच करतात म्हणे.. अजून करतात.. त्यानी आपल्या बापाचे कर्ज फिटवले, असे ऐकतो मी. असं होत..

 दत्तूकाका रागाने लाललाल झाले.. त्त्यांचे मस्तक गरम झाले… रागाने ते म्हणाले..

‘म्हणजे तुमचा म्हणणं.. माज्या मुलींनी डान्सबारमधी नाच करुचो..

‘असं म्हणत नाही मी…

‘मग काय म्हणताय. तुमका संप मागे घेऊक जमणा नाय आणि असलो सल्लो देतास?

रागाने दत्तूकाका बाहेर पडले.

दत्तूकाका विश्वासच्या घरी आले तेंव्हा तो सिगरेट ओढत बसला होता.. बाजूलाच श्रद्धा मुलांचे पेपर तपासत होती.. चिडलेले दत्तूकाका विश्वासला म्हणाले..

‘सालो भडवो माका सल्लो देता.. म्हणता गिरणी कामगारांचे मुली डान्सबार मध्ये नाच करतत.. तेनी बापाचा कर्ज फेडला.. नालायक सालो.. माका असो राग इलो, साल्याचो गळो दाबीन म्हणून..

‘शांत व्हा काका.. शांत व्हा.. अहो हे पुढारी असेच.. त्याना कामगार कसे राहतात याची कल्पनाच नसते.. मी आणि श्रद्धाने तुमच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाची सोय केली आहे.

‘काय?

‘होय काका… आम्ही पनवेलमध्ये एका सोसायटीत ब्लॉक बुक केला होता दोन वर्षांपूर्वी. दिढ लक्ष भरले होते.. परत पैसे भरणे जमलेच नाही.. आजच आम्ही पनवेल मध्ये जाऊन ते अग्रीमेंट रद्द केले.. बिल्डर खूष झाला कारण आता डबल दर झाले आहेत तिकडे… ते पैसे पंधरा दिवसात मिळतील. तेंव्हा तुम्ही मुलीच्या लग्नाचे ठरवा.. तोपर्यंत पैसे येतील.. लग्न होऊन जाईल..

दत्तूकाका रडू लागले.. ‘अजून देव आसा या जगात तुमच्यासारखो..

 दत्तूकाका डोळे पुसत घरी गेले. विश्वास, श्रद्धाला समाधान वाटले कारण कितीतरी दिवसांनी दत्तूकाका हसले.. समाधानाने घरी गेले.

 त्या रात्री खुप दिवसांनी विश्वास गाढ झोपला.

पहाटे पहाटे दारावर थापा सुरु झाल्या. एवढ्या पहाटे कोण म्हणत.. श्रद्धाने दार उघडले..

दत्तूकाका छाती पिटत ओरडत होते..

‘काय झाले काका?

‘काय सांगा बाय.. राती पासून माजा चेडू नायसा झाला.

‘आ.. कुठे गेली? शोधलंत का?

एवढ्यात विश्वास बाहेर आला.

‘काय झाल काका?

‘मास्तर.. माज्या चेडवान फसवल्यानं माका.. त्या बंडूदादाबरोबर पळणं गेला.. देवळात जाऊन लगीन पण केलान.

‘अरे.. काय हे? तुम्हाला काहीच कल्पना नव्हती?

‘थोडी थोडी होती.. तेचा तरी काय चूक? तीस वरसा झाली.. अजून लगीन नाय.. माजी कपंनी बंद.. मी तेचा लगीन ठरवलंय.. पण लगीन करूंक पैसो नाय.. शेवटी वाट बघून बघून तेना दुसऱ्याचो हात धरल्यानं. पण ता दुसरेपणाक..

म्हणजे?

‘त्या बंडू दादाचा पयला लग्न झाला हो.. तेका दोन झील आसात.. आणि तेचो मटक्याचो धंदो.. चार दिवस आत चार दिवस बाहेर..

‘अरेरे.. वाईट वाटले..

“आता तेका सोडूचय नाय.. सोडूचय नाय.. म्हणत संतापाने लाल झालेला दत्तूकाका बाहेर पडला..

 त्याच दिवशी दुपारपासून टीव्ही वरील बातम्यात ठळक बातमी यायला लागली..

 कामगारनेते जयवंत सारंग (अण्णा) यांचा त्यान्च्या ऑफिस बाहेर पोटात सुरा खुपसून खून..

 खुनी दत्तू सावंत याला अटक.

समाप्त

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक संपाची कहाणी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एक संपाची कहाणी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

दारावर खटखट झाली म्हणून श्रद्धाने दार उघडले.. बाहेर दत्तू होता..

‘काय हो काका? आज सकाळीच…

‘मास्तर आसत..?

‘अजून झोपलाय तो.. काल रात्री गेटमिटिंग करून आलाय.. उठवू का?

तेवढ्यात दत्तूकाकांच्या आवाजाने जागा झालेला विश्वास बाहेर आला..

‘काय हो दत्तूकाका.. आज सकाळीच..?

‘मास्तर.. कालच्या मिटिंगमध्ये काय ठरला संपाचा?

‘नाही हो.. मालक मागण्या मान्य करत नाही.. आणि मागण्या मान्य केल्याशिवाय आत जायचे नाही असे साहेबांचे म्हणणे..

‘मास्तर.. यात आमी उपाशी रवलव.. दोन वरसा झाली.. संप आज मिटात. उदया मिटात म्हणून.. खायचा काय?

‘होय हो काका.. मला का समजतं नाही.. एवढा दीर्घ संप चालेल याची कल्पना नव्हती.

‘मग पुढे काय? सारंगअण्णा काय म्हणटत?

‘बघू.. आज मी भेटायला जाणार आहे अण्णाना.. त्याना कालच्या गेटमिटिंग बद्दल पण सांगायचे आहे..

‘मास्तर.. जास्त वेळ काढू नकात.. माज्या चेडवाचा लग्न ठरवलंय.. दोन वरसा झाली.. तेच्या घरची चौकशी करतत.. गळ्यात तीन ग्रॅमची डवली तरी घालूक होयी.. आणि लग्नाचो खर्च.. कपंनी बंद.. पैसे खायसून हाडू?

‘बर मी आज म्हणतो अण्णांना.. तुमचा विषय पण सांगतो.. या तुम्ही..

‘उदया येतंय मास्तर.. बरी बातमी घेऊन या.. म्हणत दत्तूकाका गेले आणि विश्वास खुर्चीत धापकन बसला.

आंघोळ करून श्रद्धा बाहेर आली..

‘गेले दत्तूकाका? काय म्हणत होते?

‘संप केंव्हा संपणार? त्यान्च्या लेकीचे लग्न ठरून दोन वर्षे झाली.. त्यान्च्या गावाकडील आहे मुलगा.. कणकवली जवळचा.. पोलीस आहे.. लग्न करायचे पण खिशात काय तरी हवे ना..

‘या तुमच्या संपामुळे खुप लोकांचे वांधे झाले.. दोन वर्षे संप..? किती कामगार आहेत तुमच्या कंपनीत?

‘सोळाशे.. आणि स्टाफ वेगळा..

‘म्हणजे जवळजवळ दोन हजार कुटुंबे दोन वर्षे पगारवाचून आहेत.. एका कुटुंबात पाच माणसे पकडली तर एक लाख माणसे उपाशी आहेत.

‘होय तर.. जवळपास एक लाख माणसे या संपामुळे उपाशी आहेत.. दत्तू काका सारखे..

‘विश्वास.. आपली पण तीच परिस्थिती आली असती पण माझी नोकरी आहे म्हणून.. कशी काय असेना.. कमी पगाराची का असेना पण त्यामुळे घरात रेशन तरी येतंय.

‘बर.. मी सारंगअण्णांकडे जाऊन येतो, संप मागे घेतात का ते विचारायला… तुझ्याकडे पन्नास रुपये असतील तर दे.. बस साठी.. सिगरेट्स पण संपल्यात.. श्रद्धाने पर्स मधून पन्नास रुपये काढून दिले.

विश्वास बसमधून उतरला आणि पंधरा मिनिटे चालत सारंगअण्णाच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये पोचला. आत अण्णाच्या समोर पाचसहा मंडळी बसली होती आणि अण्णा मोठमोठ्याने त्याच्याशी बोलत होते. विश्वास आत गेला आणि एका स्टूलवर बसला. त्याला पहाताच अण्णांनी बोलणे आवरते घेतले आणि त्याच्याकडे तोंड करत बोलले..

‘झाली काल गेट मिटिंग? कामगारांचे काय म्हणणे?

‘अण्णा.. कामगार घायकुतीला आलेत.. त्त्यांचा संयम संपला.. त्यान्च्या दोन वेळ जेवणाचे वांधे झालेत.. पोरीबाळींची लग्ने अडकलीत.

‘पण त्या वेळी हेच कामगार माझ्याकडे आले होते ना? मी यांच्याकडे गेलो होतो? मी ठाणे पट्टीत दहा बारा कंपनीत भरगोस पगारवाढ दिलीच ना? पण आता परिस्थिती बदलली.. मिलचा संप फसला.. डॉक्टरांची डाळ शिजली नाही तर आपले काय?

‘म्हणजे अण्णा.. मिलच्या संपानंतर एवढा बदल झाला?

‘होय रे बाबा.. खूपच बदल झाला.. डॉक्टर एवढे स्ट्रॉग.. एवढा मिलकामगार त्यान्च्या मागे.. तरी संप यशस्वी झाला नाही.

‘का यशस्वी झाला नाही मिलकामगारांचा संप?

‘कारण मुंबई.. येथील जमिन.. जमिनी विकून कोट्यावधी पैसे मिळतात तर मिल चालवायला कुणाला इंटटेस्ट आहे? आणि राज्यकर्ते.. दोघांची आतून सेटलमेंट..

‘मग आपला संप? त्याचे काय होणार?

‘विश्वास.. मी तुझ्या कंपनीतील संप मागे घेऊ शकत नाही.. कारण माझे यूनियन मुंबईतील अजून दहा कंपनीत आहे आणि पुणे.. नाशिक भागात पण आहे.. हा संप फसला तर इतर कंपनीत परिणाम होईल… मला माझे यूनियन सुरु ठेवायचे आहे आणि त्यावर माझी डाळचावल आहे.

‘म्हणजे अण्णा.. तुमच्या स्वार्थासाठी आमच्या कपंनीतील कामगारांना उपाशी ठेवणार? केवढे हे पाप?

‘जीवो जिवश्य जीवनम.. हा डार्विनचा सिंद्धांत तुला माहित असेलच. अश्या लाखो कामगारांच्या जीवावर आमचे बंगले उभे राहतात.

‘हे पाप आहे अण्णा? कामगार स्वस्थ बसणार नाहीत..

‘मग कामगारांना तू का सांगत नाहीस.. संप मोडून कंपनीत जा म्हणून?

‘मला तसें सांगावेसे वाटते.. पण मला हे मान्य करायला हवे.. अजूनही बऱ्याच कामगारांचा तुंमच्यावर विश्वास आहे… कारण अनेक कंपन्यात तुम्ही घसघशीत पगारवाढ दिली आहे… आणि माझ्या दृष्टीने दुसरे कारण..

‘कसले दुसरे कारण विश्वास? बोल.. स्पष्ट बोल…

‘मला माहित आहे.. तुमच्यापाशी मुंबईतील अनेक गुंड आहेत.. त्याना तुम्ही पोसताय.. संप जो मोडेल त्त्यांचा तुम्ही गेम कराल..

अण्णा मोठ्याने हसले.. ‘तुला माहित आहे ना सर्व.. मग गप्प बस..

रागाने विश्वास बाहेर पडला.. बस पकडून घरी आला.. घराखाली एक दोन सिगरेटी घेतल्या आणि दार उघडून घरात गेला. त्याचे डोके गरम झाले होते. अण्णा आपला हेका सोडतं नव्हते.. पुढे काय करावे हे त्याला कळेना.. त्याची कॉलेजपासूनची डावी विचारसरणी.. कामगार.. त्यांचे हक्क.. याविषयी तो पोटतिडकेने बोलायचं. या कंपनीत नोकरी मिळाल्यापासून तो कामगारांच्या जवळ गेला.. त्त्यांचे लहानसहान प्रश्न सोडवू लागला.. त्यामुळे तो यूनियनलीडर झाला. गेली पाच वर्षे कंपनीने पगारवाढ दिली नव्हती, त्यामुळे कामगार नाराज होते. ते विश्वासबरोबर बोलत.. कामगारांचे म्हणणे पडले सारंगच्या यूनियनला जॉईन व्हावे म्हणजे सारंगअण्णा मालकाला पगारवाढ द्यायला भाग पाडतील.. शेवटी त्याने इतर कामगारप्रतिनिधी बरोबर सारंगअण्णांची भेट घेतली होती.

विश्वास रागाने धूमसत होता.. इतक्यात श्रद्धा शाळेतून आली..

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गाईड – गुरू – फिलॉसॉफर… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ गाईड – गुरू – फिलॉसॉफर… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(अशी चार वर्षे बघताबघता गेली. उत्तम ग्रेड्स् घेऊन केतन रँक मध्ये आला. त्याची जिद्द त्याने पुरी करून दाखवली.) 

इथून पुढे – – 

त्याच्या उत्तम ग्रेड्सवर त्याला एन वाय के. या जपानी कंपनीत कॅडेट म्हणून जॉब मिळाला. अतिशय खूष होऊन केतन आप्पा माईना अपॉइंटमेंट लेटर दाखवायला आला. आपला रुबाबदार उंचापुरा देखणा नातू आपल्या समोर उभा राहिलेला बघून आप्पांच्या डोळ्यात पाणी आलं.

थरथरत्या हातांनी त्याला जवळ घेऊन म्हणाले, “ जिंकलंस रे पोरा. ”

– आधीच लिहिलेला पन्नास हजारांचा चेक केतनच्या हातात ठेवून आप्पा म्हणाले, “माई, नातवाला ओवाळताय ना? दूर निघालं आपलं पोरगं. ”

महेश हसत म्हणाला,

“आप्पा. मला नाही कधी दिलेत हं एवढे पैसे. त्या गाढवाला देताय हो पन्नास हजार एकदम? उडवून टाकेल तो. ”

“ अरे बाबा. दुधावरची साय आहे हा पोरगा. गुणी आहे माझा नातू. ” केतनच्या डोळ्यात पाणी आलं.

“बाबा, अप्पानी काय केलं नाही माझ्यासाठी? तुम्हाला त्यांनी कसं राजी केलं मला माहित नाही, पण ते होते म्हणूनच मी मर्चंट नेव्हीत जाऊ शकलो. तुम्ही आणि आईने कधीही नसतं मला जाऊ दिलं. ”

केतन आजी-आजोबांच्या, आई वडिलांच्या पाया पडला.

आता वेगळ्या विश्वात केतनचा प्रवास सुरु होणार होता. वर आकाश खाली पाणी असे सतत चार महिने काढायचे. बरोबर सगळे अनोळखी निरनिराळ्या देशातले लोक. थोड्याच दिवसात केतन बोटीवरच्या आयुष्याला रुळून गेला. डॉलरमध्ये जमा झालेला पहिला पगार बघून केतनला गहिवरून आलं.

केतनने आता शिपिंगच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. लवकरच तो सेकंड मेट झाला आणि पगारही भरपूर वाढला त्याचा.

त्या दिवशी ड्राय डॉक् होते म्हणून केतनची शिप आठ दिवस ओसाकाला थांबणार होती.

केतन आणि त्याच्या बरोबरचा ऑफिसर सुट्टीत ओसाकाला हिंडायला म्हणून बाहेर पडले.

चेरी ब्लॉसमचा सिझन होता तो. जपान नुसतं चेरीच्या गुलाबी बहराने फुलून गेले होते. एका बागेत एका झाडाखाली केतन आणि त्याचा ऑफिसर जिमी बसले. चेरीच्या फुलांचा मंद सुगन्ध दरवळला होता

. छोट्या मुलांची ट्रिप आलेली दिसत होती बागेत.

जिमी म्हणाला, “ चल आपण कॉफी घेऊन येऊया. ”

समोरच्या कॉफी शॉपमध्ये एक जपानी मुलगी उभी होती. केतन म्हणाला, “ टू कॉफी प्लीज. ”

– – ती मुलगी हसली आणि म्हणाली “ सॉरी सर. हे शॉप माझं नाहीये. माझ्या मैत्रिणीचं आहे. जस्ट अ मिनिट. “ जपानी भाषेत काहीतरी बोलत तिने मैत्रिणीला बोलावून घेतलं.

दोघांच्या हातात फेसाळलेली कॉफी ठेवत ती मालकीण दहा वेळा वाकवाकून सॉरी म्हणाली.

तिची मैत्रीण अस्खलित इंग्लिशमध्ये म्हणाली, “ मी किम. इथल्या नामुरा बँकेत नोकरी करते. तुम्ही इंडियन आहात का? ” 

केतन म्हणाला, ” हो. मी बोटीवर ऑफिसर आहे आणि हा माझा मित्र जिमी. तो माझा ऑफिसर आहे. Nice to meet you.. Mind for a cup of coffee? ”

किमने त्यांच्याबरोबर कॉफी घेतली. “ थँक्स “ म्हणत ती तिथून निघून गेली.

केतन तिच्याकडे ती दिसेनाशी होईपर्यंत बघत होता. जिमीने त्याला ढोसलं आणि म्हणाला “चला. गेली ती डॉल. ” दोघे पुन्हा बोटीवर परतले.

बारा बारा तास अत्यंत हेक्टिक ड्यूटी करून वैतागला होता केतन.

अजून आपला पगार कसा जमा झाला नाही, आणि मोबाईल वर नोटिफिकेशन कसं आलं नाही म्हणून केतन म्हणाला, “ बँकेत जाऊन विचारून तरी येतो. ”

 जिमी म्हणाला “ चल. मी पण येतो. ”

– – बँकेत गर्दी होती. सहज बघितलं तर परवाची जपानी मुलगी स्मार्टपणे काउंटर संभाळत होती.

“ हॅलो मिस किम. मला विचारायचं होतं, माझ्या अमुकअमुक अकाउंटला पैसे जमा झालेत का सांगता का प्लीज? “

 किमने लॅपटॉप वर चेक करून सांगितलं “ झालेत की. राहिलं असेल तुम्हाला नोटिफिकेशन यायचं. सॉरी. ”

 केतन म्हणाला “अजून आठ दिवस आमचे शिप इथे आहे. माझ्याबरोबर डिनर घ्यायला आवडेल का तुम्हाला? ”

“आत्ता नको. बघू नंतर. ” आणि किम कामात बुडून गेली.

केतनचे शिप आणखी आठ दिवस होते पण तेवढ्यात त्याची आणि किमची भेट झाली नाही. शिप हलले. आता जवळजवळ तीन आठवड्यानी शिप मुंबईला लागणार होते.

मधेच जिमी केतनला भेटायला आला. त्याने त्याला मोबाईल वर फोटो दाखवले. जिमी आणि किम एका 

रेस्टोरां मध्ये हसत खेळत ड्रिंक्स घेत होते. गप्पा मारत होते.

जिमी हसून म्हणाला, ” पोरी त्या पोरीच. जरा कौतुक केलं, लहानसहान गिफ्ट दिल्या की पाघळतात. त्यांना आमच्या गोऱ्या कातडीचं फार कौतुक. पन्नास मुली खेळवल्या आहेत मी. ”

जिमी मुद्दाम खवचट हसत तिथून निघून गेला.

केतनला मनापासून वाईट वाटलं. ही पहिलीच मुलगी त्याला मनापासून आवडली होती.

न राहवून त्याने आजोबांना कॉल केला… “ काय केतन, आज माझी कशी आठवण झाली?

बरंय ना सगळं? ”

केतनने आजोबांना घडलेलं सगळं सांगितलं. ”आजोबा, असे इतके दुष्ट लोक असतात का हो जगात? मला नाही आवडलं जिमी आणि किम वागले ते. ”

आजोबा हसले. “ अजूनही तू बच्चाच आहेस केतन. काही लोकांना दुसऱ्याच्या हातातलं खेळणं ओरबाडून घेण्यात आसुरी आनंद मिळतो. सोडून दे केतन. ती पोरगी तुझ्यासाठी नव्हती म्हण आणि move on. अरे, अजून खूप बघायची आहे तुला दुनिया. देवाने मारलेल्या गाठी या. अकस्मात समोर येऊन उभी राहतात रे माणसं. अजिबात डिस्टर्ब होऊ नको. ”

“नाही आजोबा. खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्स. ठेवतो. ” केतन शांत झाला.

– – त्याने जिमीला कोणतीही रिऍक्शन दर्शवली नाही. नाही म्हटलं तरी जिमी त्याचा बॉस होताच.

शिप मुंबईला लागली. आता केतनला तीन महिने तरी सुट्टी होती. आजोबा आजी आई बाबा यांच्यासाठी जपान मधून केलेली खरेदी घेऊन केतन पुण्याला आला. सगळे त्याची वाट बघत होते.

केतनने आईबाबा, आजीआजोबांना मिठीमारली.

“मस्त मानवलेली दिसते हो नोकरी. चांगला गोरा आणि थोडा जाड झालास केतन. ” आई कौतुकाने म्हणाली.

” हो ग आई. आता इथे आहे तर मला अजिबात आग्रह करकरून खायला घालू नकोस. उद्याच जिम लावणार आहे मी”.

तेवढ्यात शेजारच्या साने काकू भेटायला आल्याच.

“काय म्हणतोय केतन? मजा आहे बाबा. सगळे देश बघायला मिळतात आणि वर मस्त पगार. ” किंचित असूयेने साने काकू म्हणाल्या.

“ काकू नीरज काय म्हणतो? झाला असेल ना डॉक्टर? सॉरी. मी इथं चार वर्षे नव्हतोच ना.

मग गेलो बोटीवर तो आत्ता येतोय. ” – काकूंच्या हातावर चॉकलेट्स ठेवत केतन म्हणाला.

“ नाहीं रे. एमेस्सी केलं नीरजने. नाही मिळाली ऍडमिशन त्याला मेडिकलला. आणि पेमेंट सीटचे इतके पैसे भरायला कोणाची ताकद आहे बाबा? पण आता छान आहे नोकरी त्याला. ” असं म्हणत साने काकू मग हळूच सटकल्याच.

आजोबा शेजारी उभे होते. त्यांनी केतनकडे बघितलं.

“बघितलंस का केतन? इतका खरोखर हुशार मुलगा. डॉक्टर व्हायच्या योग्यतेचा. पण सगळीच स्वप्नं पुरी होत नाहीत बाळा. मुकाट्याने एमेस्सी झाला आणि नोकरीला लागला. तू योग्य निर्णय घेतलास.

या ससा कासव शर्यतीत तुझा निभाव लागणार नाही हे तू अगदी वेळेवर ओळखलंस. चांगलं झालं तुझं. आपली कुवतसुद्धा माणसाने ओळखली पाहिजे. ” 

आणि मग आजोबा हसत म्हणाले, “मग? काय म्हणतो जिमी आणि त्याची जपानी मैत्रीण? ”

“ अहो आजोबा, त्या जिमीने तिला नुसते खेळवले आणि गेला निघून. मला मेल आला होता किमचा. भेटूया का म्हणून. मी म्हटलं सॉरी. मी चाललो भारतात परत. बाय.

आजोबा हसले. ”बरोबर. योग्यच केलंस तू बाळा. आपलं असेल ते आपल्यासमोर चालत येतं बघ.

विश्वास ठेव या म्हाताऱ्यावर. ”

– – केतनने आजोबांच्या मांडीवर डोके घुसळले. “अरे अरे गधड्या. मांडी मोडेल की आजोबांची. ” लीना म्हणाली. केतनने आजोबांना मिठी मारली.

“ येस येस माय डिअर डिअर आजोबा. माय गाईड गुरू अँड फिलॉसॉफर टू. या वेड्या मुलाचं जे काय भलं झालंय ते तुमच्याचमुळे हो. आणि हो. सांगून ठेवतोय. सारखं म्हणू नका दोघेही की थकलो म्हणून. माझं लग्न झालेले बघायचं आहे तुम्हाला. “ ‘

… सगळं घर.. माई लीना महेश.. सगळेच हसण्यात बुडून गेलं..

समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गाईड – गुरू – फिलॉसॉफर… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ गाईड – गुरू – फिलॉसॉफर… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

“झाली का केतन शाळा नीट? आज कोणाशी भांडण?”

आप्पांनी केतनला शाळेतून येताना विचारलं. रोज आजोबा नातवाची जोडगोळी शाळा सुटली की चालत घरी येत असे. येताना केतन शाळेतले सगळे रुसवे फुगवे आजोबांना सांगत मग घरी यायचा.

घरापासून जवळच होती ही शाळा आणि आप्पांनी हौसेने हे काम गळ्यात घेतले होते.

केतनला आजोबा फार आवडत आणि माईआजीपण. केतनचे आईवडील नोकरी करत आणि केतन एकुलता एक मुलगा. आजोबाआजीच्या भरवशावर लीना आणि महेश बिनधास्त नोकऱ्या करत.

लीनाचा तर आपल्या सख्ख्या आईवडिलांपेक्षा माईआप्पांवर जास्त जीव होता. कधी त्यांची भांडणे 

झाली नाहीत की कधी वेगळे राहायचा विचार सुद्धा लीना महेशच्या मनात आला नाही.

केतनसाठी आप्पा म्हणजे जीव की प्राण. त्यांच्याकडून तो बुद्धिबळ शिकायचा. आप्पा त्याला सुट्टीत शिबिरांना पोचवायचे. माई केतनला श्लोक शिकवायच्या. साधेसुधे मध्यमवर्गीय कुटुंब ते.

केतन हुशार होता पण अगदी पहिला येईल इतका नव्हता बुद्धिमान. अप्पाना त्याची जाणीव होती.

महेशला म्हणायचे आप्पा.. “ अरे सगळे कसे पहिले येतील शर्यतीत? पण म्हणून तिसरा आलेला मुलगा काही कमी हुशार नसतो. देव सगळ्याना काहीतरी देणगी देऊन पाठवतो. आपण ते ओळखलं पाहिजे बघ. आणि कष्टाने बऱ्याच गोष्टी होतात बरं साध्य. तुझा केतन कष्टाळू आहे. सगळं छान होईल त्याचं. ”

महेशला मात्र वाटायचं हा आपला एकुलता एक मुलगा आहे त्याने खूप यश मिळवले पाहिजे आणि कोणीतरी मोठे होऊन दाखवलं पाहिजे.

केतन आता दहावीत गेला. त्याला भाराभर क्लास लावलेले आप्पा माई बघत होतेच.

त्या रात्रीआपल्या बेडरूममध्ये आल्यावर माई म्हणाल्या, ” अहो ते एवढेसे पोर पिचून जातंय असल्या हजार क्लासेसपायी. त्याचा स्वतःचा अभ्यास करायला तरी पोराला वेळ होतोय का? तुम्ही तरी सांगा की महेशला. ”

“ छे ग माई. मुलगा त्यांचा, निर्णय त्यांचे. आपण काहीही बोलायचं नाही. तूही बोलू नकोस. नसते वाद नकोत मला. गप्प बसायचं आपण. ”

आप्पा पाठ फिरवून झोपून गेले. माई मात्र बराच वेळ जाग्या होत्या.

सगळे क्लासेस संपवून घरी आला की केतन अतिशय दमलेला असे. त्याला आणखी अभ्यास करायचा उत्साहच नसे. जेवला की डोळे मिटत त्याचे.

एक दिवस केतन आजोबांच्या खोलीत आला… ”काय रे केतन? झाली का सगळी तयारी परीक्षेची? ठीक चाललंय ना सगळं? ” आणि केतन खाली मान घालून रडायला लागला.

“आजोबा, मला हे सगळं झेपतच नाहीये. मला स्वतःला एक ताससुद्धा मिळत नाहीये अभ्यासाला. मला तर आता परीक्षेला बसूच नये असं वाटतंय. मी नाही बसत परीक्षेला. मला जर वाईट मार्क्स मिळाले तर आईबाबा फाडून खातील. मी नक्की निराशा करणार त्यांची. मला नाही पडणार त्यांना हवे तसे नव्वदच्या पुढे मार्क्स. मी काय करू आजोबा. त्यांना वाटतंय खूप क्लास लावले की खूप मार्क्स मिळतील मला. तसं नाहीये आजोबा. माझा तर शिकण्यातला सगळा इंटरेस्टच गेलाय. मला शिकायचंच नाही यापुढे. ” 

– – आजोबांना अतिशय वाईट वाटलं. सोन्यासारखा हा मुलगा आणि त्याच्यावर या कोवळ्या वयात हे दडपण.

“ मग केतन, तुला मनापासून काय करावंसं वाटतं? हे बघ. हे असले शिक्षण सोडण्याचे विचारच मनात आणू नकोस. आपल्याला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही बाळा. ”

“ आजोबा मला मर्चंट नेव्हीत जावंसं वाटतं. मी सगळी चौकशी केलीय. बारावी सायन्सनंतर त्यांची आता मुंबई चेन्नई अशा ठिकाणी कॉलेजेस आहेत. मी चार वर्षे तिकडे शिकून बीएस्सी नॉटिकल ही डिग्री घेईन. मग मला कॅम्पस् इंटरव्ह्यूमध्ये चांगल्या शिपवर कॅडेट म्हणून नोकरी लागेल. मग तिथेच परीक्षा देत मी नक्की पुढे कॅप्टनपर्यंत जाऊ शकतो. मला या इथल्या शर्यतीत भागच घ्यायचा नाही. मी टिकणार नाही या रॅटरेस मध्ये आजोबा. ” 

“ अरे मग उत्तम की. चांगला निर्णय आहे तुझा केतन. ”

“हो. आहे तिकडे सगळं उत्तम. मला त्या डॉक्टर इंजिनिअर सीए या मळलेल्या वाटेला जायचंच नाहीये.

या मर्चंट नेव्ही कोर्सला फी खूपच असते पण नंतर माझं जन्माचं कल्याण होईल हो आजोबा.

मी उद्यापासून कोणत्याही क्लासला जाणार नाही. मला ऐशी टक्क्यांच्या वर नक्की मार्क्स मिळतील आजोबा. मी नव्वद आणि पंच्यांणव चा मुलगा नाही. ”

आजोबांना केतनचं अतिशय कौतुक वाटलं.

” केतन, नक्की मिळवशील ऐंशीच्या वर मार्क्स? ”

“ सहज आजोबा. पण मी क्लास बंद करून स्वतःचा अभ्यास केला तरच.. आणि हे तुम्ही आईबाबांना पटवून द्या. मी त्यांच्याशी बोलूच शकत नाही. त्यांना हे पटणार नाही. एकटे तुम्ही आहात जे मला लहानपणापासून जाणून घेता. ”.. केतनने आजोबांना मिठी मारली.

“ हो केतन. सुरू कर अभ्यास उद्यापासून. मी बोलतो लीना महेशशी. अरे, तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस. ते काही शत्रू नाहीत तुझे सोन्या. असतो विचारात फरक. आणि हल्ली बाहेरचे फार प्रेशर असते आईबापांनाही ना. पिअर प्रेशर ना.. तुमच्या भाषेत लोक काय म्हणतील? हे! ”

केतन हसला… “ हो आजोबा. तुमच्यावेळी किती मस्त होतं ना. मॅट्रिक झालं की मिळेल ती नोकरी करायची रिटायर होईपर्यंत. तुम्हीच वेगळे आहात. त्या काळात पीएचडी करून प्रोफेसर झालात. हा बंगला बांधलात. बाबाही बँकेत मोठ्या पोस्टवर आहेत. आई सुद्धा बँकेत आहे. पण मी मात्र वेगळी वाट निवडणार. ”

“ खुशाल निवड पोरा. ” आजोबा म्हणाले. “ मी आणि माई आहोत कायम तुझ्यामागे. उद्या समजावून सांगतो महेश लीनाला. अरे तेही आनंदाने तुला सपोर्टच करतील की.. चांगला निर्णय आहे तुझा. जा आता. सगळं टेन्शन बाजूला ठेव आणि मस्त अभ्यास करायला लाग. ”

केतन रिलॅक्स होऊन आपल्या खोलीत गेला.

आजोबांनी आणि माईने काय आणि कसं सांगितलं माहीत नाही, पण केतनने सगळे क्लास सोडून दिले हे बघूनही महेश आणि लीना त्याला काही बोलले नाहीत.

केतनच्या खोलीत रात्री उशिरापर्यंत दिवा दिसू लागला. माई हळूच उठून त्याला कॉफी करून देत.

‘ घे रे केतन. मीही जागीच होते. घे एवढी कॉफी. तरतरी येईल. ” माई हळूच निघून जायच्या.

परीक्षा झाली. आता केतन एका ट्रेकिंग ग्रुपबरोबर एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेला. आणि खूप खूप अनुभवाचे मोठे गाठोडे घेऊन आला.

ठरल्या वेळी परीक्षेचा रिझल्ट लागला. केतनला सत्त्याऐशी टक्के मार्क्स मिळाले. घरी सगळ्याना अतिशय आनंद झाला. आता महेश लीनाने केतनचा निर्णय मनापासून मान्य केला.

शेजारच्या सानेकाकू घरी आल्या. लीना, काय ग.

बरे मिळाले केतनला मार्क्स ग. पण आमच्या नीरजला चौऱ्याणव टक्के मिळाले बरं. डॉक्टर व्हायचंय त्याला. ”

लीना म्हणाली, “होय हो काकू. हुशार आहेच नीरज. पण केतन म्हणेल ते करिअर आम्ही त्याला देऊ. एकच तर गुणी मुलगा आहे आमचा. नीरजचे अभिनंदन हं. ”

आजोबांनी अभिमानाने लीनाकडे बघितलं.

केतनने सायन्स साईडला प्रवेश घेतला. त्याला आता कोणत्याच स्पर्धा परीक्षा द्यायच्या नव्हत्या. एकीकडे त्याने मर्चंट नेव्हीच्या एन्ट्रन्स चा अभ्यास सुरू केला. केतनने बारावीत असताना चार ठिकाणी एन्ट्रन्स 

एक्झाम्स दिल्या. त्याला चेन्नईला लगेचच प्रवेश मिळाल्याचा मेल आला.

बारावीच्या निकालानंतर ती मार्कशीट पाठवून मगच केतनचा प्रवेश निश्चित होणार होता. केतनला बारावीत ऐशी टक्के गुण मिळाले आणि त्याचा चेन्नईचा प्रवेश आता निश्चित झाला. कधीही घराबाहेर न राहिलेला मुलगा आता घर सोडून जाणार म्हणून सगळ्याना वाईट वाटलं

….. आता ही डिग्री मिळाली की केतन एखाद्या चांगल्या शिपिंग कंपनीत जॉईन होईल आणि घरी चार महिन्यांनीच येईल हेही सत्य सर्वांनी स्वीकारले.

अर्थात या जॉबचे फायदेही भरपूर होते. डॉलर मध्ये पगार, इन्कमटॅक्स नाही. सोपं नव्हतं हे करणं पण केतनने हे करिअर मनापासून निवडलं होतं. केतनची ऍडमिशन घ्यायला, त्याला पोचवायला, लीना महेश दोघेही चेन्नईला गेले. त्याचा रूम पार्टनर कोणआहे जेवण कसे असते, ही सगळी चौकशी करून केतनला निरोप देऊन जड अंतकरणाने दोघेही परत आले.

“ बाबा सगळं व्यवस्थित आहे केतनचं. पुढच्यावेळी तुम्ही दोघे पण आमच्याबरोबर या त्याला भेटायला.

विमानाने गेलो की तुम्हाला काही त्रास होणारनाही. ” महेश म्हणाला.

 “ हो हो येऊ की आम्ही. ” माई म्हणाल्या.

अशी चार वर्षे बघताबघता गेली. उत्तम ग्रेड्स् घेऊन केतन रँकमध्ये आला. त्याची जिद्द त्याने पुरी करून दाखवली.

क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ असाही एक गुन्हेगार… ☆ श्री संजय जोगळेकर ☆

श्री संजय जोगळेकर

? जीवनरंग ❤️

☆ असाही एक गुन्हेगार… ☆ श्री संजय जोगळेकर 

“साहेब, मला लवकरात लवकर फाशी द्या… मला अजिबात जगायचं नाहीये! ” २२ वर्षांच्या खुन्याने भर न्यायालयात न्यायाधीशांना आव्हान दिले… पण जेव्हा न्यायाधीशांनी ‘ते’ भयंकर सत्य शोधून काढले, तेव्हा त्यांनी भर कोर्टात स्वतःचा काळा कोट फेकून दिला!

मुंबई उच्च न्यायालयातील (Bombay High Court) ‘कोर्ट रूम नंबर १’ मध्ये आज भयंकर गर्दी होती. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आजच्या निकालाकडे लागले होते. कारण आज न्यायदानासाठी खुर्चीवर बसले होते न्यायमूर्ती ‘अरविंद देशमुख’. देशमुख साहेब म्हणजे गुन्हेगारांसाठी साक्षात यमराज! गेल्या ३० वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नव्हता. त्यांनी अनेक भयंकर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली होती, त्यामुळे त्यांना ‘हँगिंग जज’ (Hanging Judge) म्हणून ओळखले जायचे.

आणि आज त्यांच्यासमोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता अवघ्या २२ वर्षांचा एक तरुण— ‘कबीर’!

कबीरवर आरोप होता की त्याने महाराष्ट्रातील एका अत्यंत बड्या आणि शक्तिशाली राजकीय नेत्याचा, ‘प्रतापराव मोहिते’ यांचा त्यांच्याच बंगल्यात घुसून अत्यंत निर्घृणपणे खून केला होता. कबीरने स्वतः पोलिसांसमोर रक्ताने माखलेल्या चाकूवर स्वतःचे ठसे देऊन शरणागती पत्करली होती. त्याने स्वतःच्या बचावासाठी कोणताही वकील दिला नव्हता.

तो कोर्टातील प्रसंग आणि गुन्हेगाराचा उद्दामपणा:

न्यायमूर्ती देशमुख यांनी आपला चष्मा सावरला आणि कबीरकडे अत्यंत भेदक नजरेने पाहिले. कबीरच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता, उलट त्याच्या ओठांवर एक बेफिकीर हास्य होते.

“कबीर, तू प्रतापरावांचा खून केला आहेस हे तू पोलिसांसमोर कबूल केले आहेस. पण न्यायव्यवस्था तुला तुझी बाजू मांडण्याची शेवटची संधी देत आहे. तुला काही सांगायचे आहे का? ” देशमुख साहेबांचा भारदस्त आवाज संपूर्ण कोर्टात घुमला.

कबीरने पिंजऱ्याच्या लाकडी कठड्यावर हात ठेवले आणि तो हसत म्हणाला,

“माय लॉर्ड, मला काहीही सांगायचं नाहीये. मीच त्या राक्षसाचा खून केलाय आणि मला त्याचा कोणताही पश्चात्ताप नाहीये! तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका. साधी आणि सोपी केस आहे… मला लवकरात लवकर फाशी द्या! मला जगायचं नाहीये! “

त्याच्या या उद्दाम उत्तराने कोर्टात एकच खळबळ उडाली. न्यायमूर्ती देशमुख संतापाने लाल झाले. ते आपला निकाल टाईप करण्यासाठी पेन उचलणार… तेवढ्यात त्यांची नजर कबीरच्या लाकडी कठड्यावर ठेवलेल्या ‘डाव्या हाताच्या मनगटावर’ गेली. आणि पुढच्याच सेकंदाला देशमुख साहेबांच्या शरीरातील रक्त अक्षरशः गोठून गेले! त्यांचा श्वास घशातच अडकला!

कबीरच्या डाव्या मनगटावर आगीने होरपळलेला एक जुना, ‘चांदणीच्या आकाराचा’ (Star-shaped) व्रण (Burn Mark) स्पष्ट दिसत होता. तो व्रण बघताच देशमुख साहेबांच्या डोळ्यांसमोर २० वर्षांपूर्वीचा एक भयंकर प्रसंग उभा राहिला.

२० वर्षांपूर्वी पंढरपूरच्या यात्रेत देशमुख साहेबांचा ३ वर्षांचा एकुलता एक मुलगा ‘ओम’ गर्दीत हरवला होता. तो कधीच सापडला नाही. आणि त्या ओमच्या डाव्या मनगटावर, दिवाळीत फटाक्याची ठिणगी उडाल्यामुळे तसाच हुबेहूब ‘चांदणीच्या आकाराचा’ व्रण पडला होता!

देशमुख साहेबांचे हात थरथरू लागले. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांनी घाम पुसला आणि घाईघाईने निकाल राखून ठेवला. “या केसचा अंतिम निकाल उद्या सकाळी सुनावण्यात येईल. कोर्ट बरखास्त! ” असे म्हणत ते तडकाफडकी स्वतःच्या केबिनमध्ये निघून गेले.

तो गुप्त तपास आणि तुरुंगातील ती रात्र:

देशमुख साहेबांना रात्रभर झोप लागली नाही. तो व्रण हा फक्त एक योगायोग असू शकत नाही, याची त्यांना खात्री होती. त्यांनी रात्रीच मुंबई पोलिसांच्या एका अत्यंत विश्वासू इन्स्पेक्टरला ‘कबीर’ची संपूर्ण पार्श्वभूमी (Background) शोधण्याचे गुप्त आदेश दिले.

रात्री २ वाजता तो इन्स्पेक्टर एक फाईल घेऊन देशमुख साहेबांच्या घरी पोहोचला.

“साहेब… हा कबीर एक अनाथ मुलगा आहे. त्याला २० वर्षांपूर्वी याच ‘प्रतापराव मोहिते’च्या गुंडांनी भीक मागण्यासाठी पळवून आणले होते. प्रतापराव बाहेरून राजकारणी होता, पण आतून तो लहान मुलांची तस्करी (Human Trafficking) करणारा एक भयंकर राक्षस होता. त्यानेच कबीरला गुन्हेगारीच्या जगात ढकलले. “

इन्स्पेक्टरने एक प्लास्टिकची पिशवी टेबलावर ठेवली. “साहेब, कबीरच्या झोपडीत आम्हाला त्याची एक जुनी डायरी आणि ही एक वस्तू सापडली. “

देशमुख साहेबांनी ती पिशवी उघडली आणि त्यातून एक ‘चांदीचा गंडेरा’ (Silver Bracelet) बाहेर पडला. त्यावर ‘ओम’ (ॐ) असे कोरलेले होते! हा तोच गंडेरा होता, जो देशमुख साहेबांनी आपल्या ३ वर्षांच्या मुलाला पंढरपूरला जाण्यापूर्वी घातला होता.

देशमुख साहेब तिथेच जमिनीवर कोसळले! ते लहान मुलासारखे ओक्साबोक्शी रडू लागले. ज्या गुन्हेगाराला ते उद्या ‘फाशीची’ शिक्षा सुनावणार होते… तो दुसरा कुणीही नसून त्यांचा २० वर्षांपूर्वी हरवलेला स्वतःचा पोटचा गोळा, ‘ओम’ होता!

डायरीतील ते भयंकर सत्य आणि बापाचे फाटलेले काळीज:

देशमुख साहेबांनी थरथरत्या हातांनी कबीरची ती डायरी उघडली. त्या डायरीतील शेवटचे पान वाचून तर या कडक न्यायाधीशाच्या काळजाचे हजार तुकडे झाले.

कबीरने डायरीत लिहिले होते-

“गेले २० वर्षे मी एका नरकात जगत होतो. पण एका महिन्यापूर्वी जेव्हा मला एका जुन्या माणसाकडून समजले की माझे खरे वडील कोण आहेत… तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. ‘न्यायमूर्ती अरविंद देशमुख’! माझा बाप या राज्याचा सर्वात मोठा आणि प्रामाणिक न्यायाधीश आहे! मी त्यांना भेटायला त्यांच्या बंगल्याबाहेर गेलो होतो. पण तिथे मी टीव्हीवर त्यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला. ते टीव्हीवर सांगत होते की- ‘माझ्यासाठी कायद्यापेक्षा मोठं कुणीच नाही. उद्या जर माझ्या स्वतःच्या रक्ताने जरी गुन्हा केला, तरी मी त्याला फाशी देण्यास मागेपुढे पाहणार नाही! ‘”

डायरीच्या पानावर कबीरचे अश्रू सांडलेले होते.

“ते वाक्य ऐकून मी तिथेच थांबलो. जर मी त्यांना जाऊन सांगितलं असतं की मी त्यांचा मुलगा आहे, तर प्रतापरावांनी माझ्या माध्यमातून माझ्या वडिलांच्या ३० वर्षांच्या निष्कलंक कारकिर्दीला काळिमा फासला असता. माझ्या बापाची इज्जत माझ्यामुळे धुळीला मिळाली असती. माझा बाप एक ‘देव’ आहे, आणि मी एक कचरा! म्हणून मी ठरवलं, मी माझ्या बापाला माझा काळा चेहरा कधीच दाखवणार नाही. “

कबीरने पुढे लिहिले होते,

“पण प्रतापरावांच्या गोदामात आणखी ५० लहान मुले नरकयातना भोगत होती. मी ठरवले, मरण्यापूर्वी एक चांगले काम करून जाईन. मी प्रतापरावांचा खून केला! मला माहित आहे माझी केस माझ्याच वडिलांच्या कोर्टात चालेल. उद्या माझा बाप स्वतःच्या हाताने मला ‘फाशी’ सुनावेल. मी हसत हसत ती फाशी स्वीकारेन, पण माझ्या बापाचा सन्मान कधीच कमी होऊ देणार नाही! हा माझा माझ्या बापाला शेवटचा मुजरा! ” 

कोर्टरूमचा तो ऐतिहासिक क्लायमॅक्स:

दुसरा दिवस उजाडला. कोर्टरूममध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. कबीर पिंजऱ्यात शांतपणे उभा होता.

न्यायमूर्ती देशमुख आपल्या खुर्चीवर येऊन बसले. त्यांचे डोळे रडून सुजले होते. त्यांनी कबीरकडे पाहिले. कबीरनेही त्यांच्याकडे पाहिले आणि त्याने डोळ्यांनीच त्यांना ‘मला फाशी द्या, सत्य लपवून ठेवा’ असा मूक इशारा केला!

संपूर्ण कोर्टात स्मशानशांतता होती. देशमुख साहेबांनी माईक ओढला आणि ते बोलू लागले.

“कबीर… तू प्रतापरावांचा खून केला आहेस. कायदा तुला खुनी मानतो. ” देशमुख साहेबांचा आवाज जड झाला होता. त्यांनी अचानक आपला चष्मा काढला. आणि सर्वांच्या आश्चर्याला धक्का देत, न्यायमूर्ती देशमुख यांनी स्वतःच्या अंगावरचा तो ‘काळा कोट’ (Black Robe) काढला आणि तो न्यायाधीशांच्या टेबलावर फेकून दिला!

संपूर्ण कोर्टात एकच खळबळ उडाली. वकील आणि पोलीस अवाक् होऊन बघत राहिले.

देशमुख साहेब खुर्चीवरून खाली उतरले आणि चालत थेट कबीरच्या पिंजऱ्याजवळ गेले. त्यांनी कबीरच्या पिंजऱ्याचे दार उघडले आणि सर्वांसमोर त्या ‘खुनी’ कबीरला स्वतःच्या छातीशी घट्ट कवटाळले!

“माय लॉर्ड! हे काय करताय तुम्ही? ” सरकारी वकील ओरडले.

देशमुख साहेब धाय मोकलून रडत संपूर्ण कोर्टासमोर कडाडले,

“आज या कोर्टात एक न्यायाधीश हरला आहे… आणि एक बाप जिंकला आहे! हा कबीर एक खुनी नाहीये… तर हा माझा स्वतःचा पोटचा गोळा ‘ओम’ आहे, जो २० वर्षांपूर्वी हरवला होता! “

कबीरच्याही डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. तो बापाच्या कुशीत शिरून हुंदके देत होता.

देशमुख साहेब पुढे म्हणाले, “माझ्या या मुलाने स्वतःच्या बापाची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले. त्याने ५० लहान मुलांना वाचवण्यासाठी त्या प्रतापरावासारख्या राक्षसाचा वध केला. जर अशा देवदूताला शिक्षा देणे हा या देशाचा कायदा असेल, तर मी आज या न्यायाधीशाच्या पदाचा कायमचा राजीनामा देत आहे! मी माझ्या मुलाला फाशी देऊ शकत नाही! “

त्या दिवशी मुंबई हायकोर्टात एक ऐतिहासिक प्रसंग घडला होता. कायद्याच्या काळ्या पट्ट्यावरून एका बापाच्या आणि मुलाच्या निःस्वार्थ प्रेमाने कायमचा विजय मिळवला होता. कबीरची केस दुसऱ्या खंडपीठाकडे गेली आणि ५० मुलांचे प्राण वाचवल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता झाली.

मित्रांनो, रक्ताचं नातं हे जगातल्या कोणत्याही कायद्यापेक्षा आणि प्रतिष्ठेपेक्षा खूप मोठं असतं. जो पोरगा स्वतःच्या बापाच्या सन्मानासाठी मृत्यूलाही हसत हसत कवटाळायला तयार होता, त्या पोरासमोर जगातील सगळी संपत्तीही फिकी आहे!

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : संजय जोगळेकर

मो. 9867180426 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चोरी! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ चोरी! ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

इन्स्पेक्टर सूर्यकांत भोसले यांना अव्यवस्थितपणा आवडत नसे. न बांधलेल्या बुटांच्या नाड्या, चुकीच्या जागी ठेवलेली कागदपत्रे, अपूर्ण अहवाल – असं काही दिसलं की त्यांना ते सहनच होत नसे. सध्या माने हवालदारांसोबत ते पुण्यात, स्वारगेट पोलीस चौकीत तैनात होते.

आज ऐन दुपारच्या वेळी काळेबाई चौकीमध्ये घाबरलेल्या अवस्थेत आल्या होत्या. त्यांच्या शिलाईच्या दुकानातून त्यांची सोन्याची साखळी चोरीला गेली होती.

“माझे घोरपडे उद्यानाजवळ कपडे आणि शिलाईचे दुकान आहे. माझ्या सोन्याच्या साखळीचा हूक घट्ट करण्यासाठी साखळी काढून काऊंटरवर ठेवली होती. मी काऊंटरवरच एका ग्राहकाशी बोलत होते, फक्त क्षणभरासाठी मागे वळले, ” त्या सांगत होत्या, “आणि मी जेव्हा परत पाहिले, तेव्हा साखळी गायब झाली होती आणि तो ग्राहकही. ”

“ग्राहकाचे वर्णन करा, उंची, रंग, कपडे… ”

“मध्यम उंची, साधारण साडे पाच फूट, निळा शर्ट, दाढी होती, चष्मा नव्हता, ” त्या सांगत होत्या आणि माने हवालदार वहीत टिपून घेत होते.

“दुकानात आणखी कोण होते?” भोसल्यांनी विचारले.

“राजू – दुकानातला गेल्या वर्षीपासूनचा नोकर. ”

“त्याने काही पाहिले का?”

“तो नाही म्हणतोय. ”

भोसल्यांनी मान्यांना गल्लीतील लोकांशी बोलण्यासाठी पाठवले, तर ते स्वतः दुकानाची तपासणी करू लागले.

काळे बाईंच्या दुकानामागची गल्ली अरुंद आणि लहान दुकानांनी गजबजलेली होती. पार्क केलेल्या स्कूटर्सच्यामध्ये मुले क्रिकेट खेळत होती. जवळच्याच एका वडापावच्या टपरीवर तेलाचा तडतड आवाज येत होता.

बाईंच्या दुकानात सर्व काही व्यवस्थित दिसत होते. काउंटरजवळ पावतीच्या कागदाचा एक फाटलेला तुकडा पडलेला भोसल्यांना दिसला.

दरम्यान मान्यांनी गावभराच्या बातम्या गोळा करून आणल्या होत्या.

“वडापाववाल्याने निळ्या शर्टमधल्या एका तरुणाला स्वारगेट बस स्टँडच्या दिशेने पळताना पाहिलं, ” तो म्हणाला. “पण शेजारच्या न्हाव्याला वाटतं की तो माणूस लक्ष्मी फॅब्रिक्समधून आला होता. ”

भोसल्यांनी पावतीच्या त्या तुकड्याकडे निरखून पाहिले.

“हा जवळच्याच एका कापड पुरवठादाराचा – लक्ष्मी फॅब्रिक्सचा आहे. ” बाईंनी सांगितले, “तिथे डिस्काउंट कूपन अशी असतात. ”

लक्ष्मी फॅब्रिक्समध्ये, मालकाने दुजोरा दिला की काळे बाईंच्या दुकानातला राजू सकाळी ११:४२ च्या सुमारास डेनिमचा एक तागा परत करण्यासाठी आला होता. आणि काळे बाईंच्या म्हणण्यानुसार चोरी ११:४० च्या सुमारास झाली होती.

राजूविरोधात संशय निर्माण करण्याइतपत पुरावा होता, पण गुन्हा सिद्ध करण्याइतपत नाही.

भोसले राजूच्या हालचालींचा मागोवा घेत राहिले. तो घाईघाईने आल्याचे चहावाल्याला आठवत होते. बस स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट होते, पण तिथल्या कचरापेटीजवळ अर्जुनला धुळीत चपलांचे ठसे आढळले. शेजारच्या “Good Price pawn shop” (गहाणवट) दुकानात जाण्यापूर्वी त्यांनी त्या ठश्यांचे फोटो काढले.

गहाण ठेवणारा दुकानदार बोलण्यापूर्वी क्षणभर थांबला. “एक घाईगडबडीत असलेला तरुण सोन्याची साखळी गहाण ठेवण्याबद्दल विचारत आला होता, ” तो म्हणाला. “बारीक बांधा. निळा शर्ट. मनगटावर लहान ताऱ्याचा टॅटू. ”

धागेदोरे जुळून येत होते.

त्याच संध्याकाळी, भोसल्यांनी राजूला चौकशीसाठी चौकीत बोलावले. राजू तणावग्रस्त दिसत होता, त्याची नजर जमिनीवर खिळलेली होती, आणि त्याच्या डाव्या मनगटावर एक फिकट झालेला ताऱ्याचा टॅटू होता.

“मी फक्त लक्ष्मी फॅब्रिक्समध्ये कापड परत करायला गेलो होतो, ” त्याने एकच धोशा लावला.

राजूच्या फिकट निळ्या शर्टाकडे बघत, काही न बोलता भोसल्यांनी त्याला पॉन शॉपमधील सीसीटीव्ही फुटेज दाखवले.

“साखळी उचलल्यानंतर तू घाबरला होतास. पॉन शॉपनंतर तू कुठे गेलास?” भोसल्यांनी शांतपणे विचारलं.

राजूचं बिंग उघडकीस आलं होतं. त्याचा धीर सुटला.

“मी हे ठरवून केलं नव्हतं, ” तो म्हणाला. “मला काउंटरजवळ ती साखळी पडलेली दिसली. तो ग्राहक निघून जात होता, मॅडम पाठमोऱ्या होत्या. मला आईच्या औषधांसाठी पैशांची गरज असल्यामुळे मी ती साखळी उचलली तर खरी, पण नंतर मला भीती वाटली. साखळी गहाण ठेवून जास्त पैसे मिळत नव्हते, म्हणून मी ती साखळी नाकोडा ज्वेलरला विकून टाकली. आलेले पाच हजार रुपये मी आईला पाठवून दिले. ”

खोलीत शांतता पसरली.

काळेबाई रागावण्यापेक्षा जास्त दुखावल्यासारख्या दिसत होत्या.

“माझ्याकडे का नाही मागितलेस पैसे? आणि नंतर खरं का नाही सांगितलंस?” बाईंनी विचारले.

“मला भीती वाटली. ”

राजू त्यांना सोनाराकडे घेऊन गेला. त्याने ती साखळी वितळवली होती, त्यातला एक तुकडा विकलाही होता.

सोनाराने पैश्यांच्या मोबदल्यात उरलेलं सोनं परत करायचे कबूल केले.

पैसे मिळाल्यावर काळे बाईंनी तक्रार मागे घ्यायची तयारी दाखवली. पैश्यांची तूट भरून काढण्यासाठी काळेबाई राजूच्या पगारातून पैसे कापून घेणार होत्या.

“लक्षात ठेव, ” त्या राजूला म्हणाल्या, “विश्वास पुन्हा निर्माण करणं हे सोन्यापेक्षाही जास्त महाग आहे. ”

“आणखी एक केस सुटली, साहेब. ” ते सगळे गेल्यावर माने हवालदार म्हणाले.

“गरीबी फार वाईट, माने, ” भोसले म्हणाले, “माणसाला नको त्या मार्गाला लावते. काळे बाईंनी समजूतदारपणा दाखवला आणि गुन्हा दाखल केला नाही, अन्यथा राजूच्या भविष्याचं मातेरं झालं असतं. ”

भोसल्यांनी फाईल बंद केली आणि ‘SOLVED’ असे लिहिलेल्या ड्रॉवरमध्ये सरकवली.

बाहेर, स्वारगेट पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या लयीत परतले होते—रिक्षांचे हॉर्न, सायंकाळची गर्दी आणि अचानक आलेल्या पावसाने ओल्या झालेल्या रस्त्यांवर लखलखणारे दुकानांचे दिवे. अगदी शांतपणे, आणि जवळजवळ कोणाच्याही लक्षात न येता, तिथे पुन्हा एकदा सुव्यवस्था प्रस्थापित झाली होती.

(काल्पनिक कथा)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अग्निदिव्य… भाग – २ ☆ अर्चना सुरेश देशपांडे ☆

अर्चना सुरेश देशपांडे

 

? जीवनरंग ?

☆ अग्निदिव्य भाग – २ ☆ अर्चना सुरेश देशपांडे ☆

(मामाच्या घरी तिला “अश्रित “हाच दर्जा मिळाला होता. राब राब राबून शिव्या खाणेच तिच्या नशिबात होते. आपल्या नशिबात आहे ते भोगायलाच पाहिजे असा विचार करून ती गप्प बसत होती आणि तोंडातून ब्र न काढता जोमाने अभ्यास करीत होती.) 

इथून पुढे  

तिचे शिक्षक त्यांना जमेल तेवढी मदत करत होते. जात्याच हुशार असल्याने तिला थोड्या अभ्यासाने चांगले मार्क पडत होते. सरस्वतीचा वरदहस्त असल्याने तिने धीराने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, गुणवत्ता यादी चमकली आणि वर्गशिक्षिकेचया सहकार्याने “निराधार केंद्रात” प्रवेश मिळवला. तिच्या या निर्णयामुळे मामा दुखावला गेला पण घरातील वातावरण पाहून त्याने तिला नाईलाजाने होकार दिला. पुढे बुद्धिमत्तेच्या जोरावर पुण्यात बी. जे. मेडिकल महाविद्यालयात शिष्यवृत्ती मिळवून ती जिद्दीने डॉक्टर झाली. पुढे डी. जी. ओ पदवी संपादन केली हुशार विद्यार्थिनी म्हणून तिचे कौतुक झाले. मामालाही आनंद झाला. मामीने गोड पदार्थ करून तिला जेवायला बोलावले आणि घरी राहण्याचा आग्रह केला पण आता माधुरीला स्वतःच्या हिमतीने जगायचे होते, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करायचा होता. आपला नोकरी करण्याचा निर्णय तिने स्पष्ट सांगितलं. त्याच वेळी तिला तिच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून डॉक्टर साने यांच्या हॉस्पिटल बद्दल माहिती मिळाली. कासे गाव पासून 20 किलोमीटर आत वाटेगाव आहे. तिथे जाण्याची तुझी तयारी आहे का? तुझे आयुष्य पुण्यासारख्या शहरात गेले तेव्हा खेडेगावात जायचे की नाही ते तू ठरव. असे त्यांनी सांगितले. त्याच क्षणी तिने वाटेगाव ला जायचे ठरवले.

प्राध्यापकांनी सांगितले, “मधुरा वाटेगावला डॉक्टर साने यांचे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल तसे फार मोठे नाही, तिथे गोरगरिबावर मोफत उपचार केले जातात एकंदरीत कमी पैशात उपचार केले जातात. त्यामुळे तुला पगार कमी मिळेल पण देव माणसासारख्या दांपत्याकडून बरेच शिकायला मिळेल हे निश्चित. “ठरवल्याप्रमाणे ती वाटेगावला डॉक्टर साने यांना भेटली. तिने आपली कागदपत्रे त्यांना दाखवली. तिची मार्कलिस्ट व इतर सर्टिफिकेट्स पाहून साने यांना तिचे कौतुक वाटले आणि त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये तिला काम करण्याची संधी देण्याचे ठरविले.

ममता हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या क्वार्टर मध्ये तिची राहण्याची सोय केली. तिची राहण्याची सोय झाली आणि साने कुटुंबासारख्या सज्जन माणसांचा आधार मिळाला. माधुरीने “वाटेश्वराच्या “साक्षीने कामाला सुरुवात केली आणि मिळालेल्या संधीचे सोने केले. आपल्या डॉक्टरी पेशाला सर्वस्व मानले. आजच्या “कलियुगात मोजकीच माणसे कर्तव्य या शब्दाला जपणारी असतात “आणि माधुरीचा स्वभाव तोच आहे हे डॉक्टर जाणून होते. माधुरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती प्रत्येक रुग्णाशी प्रेमाने व न थकता आपुलकीने बोलायची. किती ही शंका विचारल्या तरी न चिडता त्या शंकांचे निरसन करायची, कायम हसतमुखाने गोड बोलून रुग्णांना आपलेसे करण्याच्या या पद्धतीमुळे ती लवकरच सर्वांची लाडकी झाली. तिच्यामुळे हॉस्पिटलचे वातावरण हसते खेळते झाले होते.. ती गुणी व परिस्थिती समजून वागणारी होती. डॉक्टर नेहमी तिचे कौतुक करत. “कौतुकाने ओझे कमी होत नाही पण कर्तव्य पेलणारे हात बळकट होतात “हा त्यांचा अनुभव होता. डॉक्टर साने दांपत्याला मूलबाळ नसल्याने त्यांनीही माधुरीला मुलीप्रमाणे माया लावली होती. आणि माधुरी सारख्या पोरक्या मुलीला “मायेची सावली “मिळाली होती. माधुरी सारख्या अनाथ मुलीला अनाथ मुलाबद्दल जिव्हाळा असणे साहजिकच होते म्हणूनच तिने अनाथ मुलीचा स्वीकार करण्याचे ठरविले तिच्यावर चांगले संस्कार केले, तिच्या बालपणीच्या लाडाकोडात स्वतःचे बालपण अनुभवले. माधुरीचा व्याप व जबाबदाऱ्या वाढत होत्या. विमल मावशी आपली नोकरी सांभाळून आपुलकीने मोहिनीला सांभाळत होत्या. तिची जेवणाची वेळ, शाळेची वेळ पाळत होत्या, तिचे कोड कौतुक करत होत्या. तिच्या ” आजी” या शब्दाने सुखावत होत्या. मोहिनी बालपणापासून कुशाग्र बुद्धीची होती. , माधुरी सारखीच बुद्धिमत्तेच्या जोरावर चमकत होती,. दहावी उत्तम गुणांनी पास झाली. तिला थोडी समज येताच माधुरी ने तिला तिची “जन्म कहाणी” सांगितली. त्यानंतर तिचा आई बद्दलचा आदर भाव अजून वाढला. वाटेगाव तसे खेडेगाव असल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिला सांगलीला जावे लागले. आपल्यापासून दूर पाठवणे माधुरीला जड वाटत होते पण “भावनेपेक्षा कर्तव्य” करणे जरूर आहे या विचारांनी तिला सांगलीला पाठवण्याचा विचार माधुरीने निश्चित केला. चांगल्या गुणामुळे विलिंग्डन कॉलेजमध्ये ला प्रवेश मिळाला. मोहिनी मन लावून अभ्यास करत होती. मैत्रिणींना अभ्यासात मदत करत होती. वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा जिंकून कॉलेजचे नाव उज्वल करत होते. सगळ्यांच्या आग्रहाखातर तिने जी. एस पद पण स्वीकारले पण अभ्यासात कुचराई केली नाही. बारावी उत्तम गुणांनी पास झाल्यावर तिने आईचा वारसा पुढे चालवण्याचा मानस बोलून दाखवला आणि माधुरीने दिला दुजोरा दिला. गुणांच्या जोरावर मिरज मेडिकल कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला. जिद्दीने M. B. B. S. केले. पुढे बालरोग तज्ञ म्हणून बोर्डात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तिच्या पदवीदान समारंभाला येण्यासाठी महाविद्यालयाकडून डॉक्टर साने व माधुरीला आग्रहाचे निमंत्रण होते. तिच्या पदवीदान समारंभाला माधुरीने डॉक्टर साने कुटुंबासमवेत हजेरी लावली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी साने यांना पुढील रांगेत बसवले, माधुरी त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसली. मोहिनीचे नाव पुकारण्यात आले. टाळ्यांच्या कडकडाटात मोहिनी स्टेजवर आली. समोर आपली आई व आजोबा यांना पाहून तिला खूप आनंद झाला. तिने आदरपूर्वक सर्वांना हात जोडले आणि मेडल आपल्या आजोबांच्या हस्ते मिळावे अशी ‌मोहिनीने अध्यक्षांना विनंती केली. डॉक्टर साने स्टेजवर येताच मोहिनीने त्यांना चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि पाठोपाठ प्राचार्यांना वाकून नमस्कार केला डॉक्टर आजोबांच्या हस्ते मेडल स्वीकारल्यानंतर हातात माईक घेऊन ती म्हणाली, “नमस्कार, माझ्या आजी आजोबांचे आशीर्वाद व शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच आणि आईचे उपकार ही’त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळाली चांगले काय? आदर्श कसे वागावे याचे ज्ञान मिळाले त्यांच्यामुळेच मी आज तुमच्या पुढे उभी आहे” पुढे माधुरी कडे पाहून म्हणाली, “तू माझी जीवनदात्री आहेस. आज मी जी काही आहे ते केवळ तुझ्यामुळे. मी खूप आनंदात आहे ते तुझ्यामुळे. माझ्या नशीब मोठं म्हणून मला तुझ्यासारखी आई मिळाली.. “माधुरीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि केलेल्या अग्नी दिव्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले.

तिच्या यशाप्रीत्यर्थ साने यांनी ममता हॉस्पिटलच्या टेरेसवर “कौतुक समारंभ “आयोजित केला त्यावेळी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी व डॉक्टरांचे स्नेही हजर होते. माधुरीचे प्राध्यापक डॉक्टर गोडबोले यांनाही साने यांनी अर्जवून बोलवले होते. माधुरीने निवृत्त झालेल्या विमल मावशींना प्रेमाने बोलावले होते. मोहिनीने स्व खर्चाने सर्व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणली होत्या. विमल मावशी साठी सुंदर, सुती वायल साडी आणली होती. ती विमल मावशी येताच नमस्कारसाठी पुढे झाली तेव्हा विमल मावशींनी तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत तिच्या बालपणीच्या आठवणी सामावल्या होत्या. ती म्हणाली, “मावशी आजी माझे बालपण रम्य झाले ते तुमच्यामुळे. तुम्ही माझ्या लहानपणी दिलेला वेळ माझ्यासाठी आठवणींचा अमूल्य ठेवा आहे “हे मोहिनीचे शब्द ऐकून विमल मावशी सुखावल्या त्यांच्या डोळ्यात पाणी तराळलं. कौतुक सोहळा होताच मोहिनी म्हणाली “मला एक माझ्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे. ” सर्वजण तिची इच्छा ऐकण्यासाठी उत्सुक होते. मी उद्यापासून याच हॉस्पिटलमध्ये “बाल रोग तज्ञ”. म्हणून रुजू होणार आहे हे ऐकताच माधुरी तसेच साने कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला. डॉक्टर साने म्हणाले “आता तू आणि तुझी आई दोघीही माझे कार्य पुढे नेण्यासाठी समर्थ आहात आता आम्ही आयुष्याच्या संध्याकाळी समाधानी जीवन जगायला मोकळे झालो”

– समाप्त –

©  अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ संस्थापक संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अग्निदिव्य… भाग – १ ☆ अर्चना सुरेश देशपांडे ☆

अर्चना सुरेश देशपांडे

 

? जीवनरंग ?

☆ अग्निदिव्य भाग-१ ☆ अर्चना सुरेश देशपांडे ☆

अंगातला एप्रन काढून खुर्चीवर ठेवत माधुरीने” विमल मावशी “अशी हाक मारली. “आले आले हो ताई” म्हणत विमल मावशी लगबगीने स्टाफ रूम मध्ये आल्या. हाताची घडी डोक्या खाली घेत माधुरी कोचवर कलंडली.. “आई ग!”अती श्रमामुळे तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.

माधुरी जवळ जवळ आठ-दहा तासांनी जरा आरामात आडवी झाली होती. सकाळपासून तिची नुसती धावपळ सुरू होती. दुपारपासून अडकलेल्या रूपालीचे बाळंतपण करण्यात तिने आपलं कौशल्य पणाला लावले होते. आता रूपाली आणि तिचे बाळ दोघेही शांतपणे झोपले होते. रूपालीच्या चेहऱ्यावर आनंदाचं चांदणं पसरलं होतं. तिची सुखरूपपणे सोडवणूक करण्यासाठी माधुरीवर खूपच मानसिक ताण आला होता. अशा प्रकारची अवघड केस हाताळण्याची तिची पहिलीच वेळ होती. डॉक्टर साने प्रख्यात स्त्री रोग तज्ञ होते, त्यांचयावर रुग्णांचा विश्वास होता आणि त्यांच्या हाताला यश होते. आज माधुरीवर सर्व हॉस्पिटलची जबाबदारी टाकून डॉक्टर विश्वास साने व त्यांच्या पत्नी विशाखा साने दोन दिवस मुंबईला कॉन्फरन्स साठी गेले होते. त्यांचा माधुरीच्या कामावर पूर्ण विश्वास होता आणि रूपाली चे बाळंतपण यशस्वीरित्या पार पाडून तिने विश्वास सार्थ करून दाखवला होता. आता ती स्टाफ रूम मध्ये परतली होती. विमल मावशींची चाहूल लागताच माधुरी म्हणाली, “मावशी माझ्यासाठी एक कप कॉफी करता का?! तुमची कॉफी होईपर्यंत मी फ्रेश होऊन येते”

आषाढातील दिवस होते, हवा पावसाळी होती आकाशात काळया ढगांनी गर्दी केली होती. अशावेळी कॉफीची आवश्यकता होती. माधुरी फ्रेश होऊन येताच मावशी वाफाळलेली कॉफी आणि बिस्किटांची डिश घेऊन आल्या. ” ताई सकाळ धरनं लई थकलासा! ही गरम गरम काफी घ्या, मंग वाईज बरं वाटल “म्हणून त्यांनी कॉफीचा कप तिच्या हातात दिला आणि राहिलेली कामे उरकण्या साठी त्या आत गेल्या.

माधुरीने कप तोंडाला लावून एक घोट घेतला असेल तोच बाहेरून बाळाचा रडण्याचा आवाज तिच्या कानी पडला. अनुभवी माधुरीने तान्ह्या बाळाचा आवाज लगेच ओळखला. तिनं”विमल मावशी”अशी हाक मारताच हातातले काम सोडून त्या बाहेर आल्या. ” ताई अजून काही हवे आहे का?”. ‘नाही, मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. जरा मावशी बघा हो बाळाच्या रडण्याचा आवाज कुठून येतोय तो?

मावशींनी चाहूल घेतली व आवाज बाहेरून येतोय हे लक्षात येताच त्या मुख्य दरवाजाकडे धावल्या.

विमल मावशींनी मुख्य दरवाजा उघडला. कंदीलाच्या प्रकाशात दरवाजाच्या समोर नुकतंच जन्मलेलं इवलसं बाळ टॉवेल मध्ये गुंडाळलेले त्यांना दिसले. ते पाहताच त्यांनी माधुरीला हाक मारली. “ताई लवकर बाहेर या”मावशींची हाक ऐकून माधुरी कॉफीचा कप तसाच ठेवून दाराशी धावली. दारात टॉवेलमध्ये गुंडाळलेले छोटसं बाळ अन् त्याला पाऊस लागू नये म्हणून डोक्यावर उघडलेली छत्री हे दृश्य तिला दिसले.

माधुरीतील डॉक्टरी हृदयाने तिला कर्तव्याची जाणीव करून दिली. तिने पटकन बाळाला उचलले टॉवेल मध्ये गुंडाळलेल्या निष्पाप अर्भकाला तपासले. लालचुटूक ओठ, गोरीपान, डोक्यावर भरपूर जावळ असलेली बालिका होती. तिने किलकिले डोळे करून पाहिले पण उजेड सहन न झाल्याने ती पुन्हा निस्तब्ध पडून राहिली. तिचे वजन कमी होते, ती थंडीने कुडकुडत होती. माधुरीने मावशींच्या मदतीने बाळाला स्वच्छ केले, तिला प्रथम मधाचे बोट चाटवलं, ड्रॉपर ने थोडे दूध पाजले. दवाखान्यातील कपडे घालून चटकन् “इंक्युबेटर “मध्ये ठेवले. अशी केस घ्यायची म्हटलं तर डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागणार होती पण माधुरीने ठरवले की बोलणी बसली तरी बेहत्तर पण माणुसकीला काळिमा लावून घ्यायचा नाही. त्यामुळे त्या मुलीची सर्व व्यवस्था झाल्यावर तिने डॉक्टरांना फोन केला, “सर मी एक अनौरस मुलगी दाखल करून घेतली आहे. तिची परिस्थिती पाहता तुमच्या परवानगीशिवाय मला दाखल करून घेणे भाग पडले. ” डॉक्टर साने म्हणाले, “वेल डन माधुरी”केवळ मुलगी म्हणून तिला जगण्याचा अधिकार नाकारणारे हे कोण? असा विचार माधुरीच्या मनात चमकून गेला. काही झाले तरी या बाळाला वाचवायचे असे तिने निर्धार केला. ती तिची खूप काळजी घेत होती आज गुंतागुंतीची केस तिने एकटीने हाताळली होती. यश पदरी पडल्यामुळे खुश होती खरं पाहता तिला विश्रांतीची गरज होती पण त्या निष्पाप बाळासाठी तिचा जीव कासावीस होत होता. दहा मिनिटाच्या अंतराने जाऊन ती स्वतः बाळाची तपासणी करत होती.

तिला ड्रॉपर ने दूध पाजत होती. तिच्या योग्य वाढीसाठी औषधांचे drops देत होती. तिला वाचवण्यासाठी धडपडत होती. तीन महिन्याच्या अथक प्रयत्नाने त्या बाळाची तब्येत सुधारू लागली. सतत सहवासात राहिल्यामुळे त्या दोघींच्यात एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झाला, माधुरीला तिचा लळा लागला. ,. या निष्पाप मुलीला अंतर द्यायचे नाही असे तिने मनोमन ठरवून टाकले. एक दिवस माधुरीने “या मुलीला माझी मुलगी म्हणून वाढविण्याची माझी इच्छा आहे” हे डॉक्टर साने यांच्या कानावर घातले.

डॉक्टर साने म्हणाले, “तुझा निर्णय चांगला आहे पण अगं माधुरी भावनेच्या भरात असा निर्णय येऊ नकोस. अजून तुझे लग्न व्हायचे आहे. या मुलींमुळे तुला आयुष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल, लोकांच्या शंका कुशंकांना सामोरे जावे लागेल, लोकांच्या कुत्सित नजरा सहन कराव्या लागतील. , लोक तुझी बदनामी करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत थोडक्यात काय तुला एक प्रकारचे “अग्नी दिव्य” करावे लागेल. याची तुझी तयारी आहे का? दोन दिवस पूर्ण विचार कर आणि मगच निर्णय अन्यथा आपण तिची चांगल्या अनाथाश्रमात सोय करू,. ”

रात्रीचे दोन वाजले होते. सगळीकडे निरव शांतता पसरली होती पण माधुरीच्या डोक्यात असंख्य विचारांचे काहूर माजले होते. तरीसुद्धा त्या विचारावर मात करून तिने त्या निष्पाप बालिकेचे मातृत्व स्वीकारण्याचा निश्चय केला. दुसरे दिवशी डॉक्टरांना ती म्हणाली, “पूर्णविचारांती मी त्या मुलीला स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे “. डॉक्टरांनी तिच्या निर्णयाचे स्वागत केले.

मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो’ माणसाचं काहीसं तसंच असतं, काही माणसं काही क्षणात आपली होऊन जातात तशी त्या बाळाने माधुरीवर मोहिनी घातली होती जणू! डॉक्टरांच्या संमतीने दवाखान्यातील रुग्णांच्या समवेत बाळाचं थाटामाटात बारस करून माधुरीने तिचे नाव ठेवले “मोहिनी. ” मोहिनी म्हणजे माधुरीच्या आयुष्यात एक गोड स्वप्न होतं, तिच्या बोबड्या बोलांनी सर्वांवर गारुड केले होते. समंजस आणि गोड, तेवढीच खेळकर स्वभावाची मोहिनी नेहमी सर्वांना हवीहवीशी वाटे.

माधुरीला आपले बालपण आठवले. आई, बाबा आणि ती एक सुखी कुटुंब होते. तिचे वडील एका छोट्या कंपनीत अकाउंट सेक्शन मध्ये नोकरीला होते. आई गृहिणी होती. पैशाची चणचण होती पण काटकसरीने तिची आई छान घर चालवत होती. लाडक्या माधुरीची हौस पुरी करत होती. माधुरी एक साधी मुलगी होती, तिला खूप शिकायचे होते, फुलपाखरांचे पंख लावू उडायचं होते. तिच्या आईला तिच्या गुणांचे कौतुक होते. एके दिवशी लेकीच्या शाळेत लेकीचे नृत्य पाहण्यासाठी ते गेले आणि कार्यक्रम संपवून घरी परतत असताना त्यांच्याच स्कूटरला कारने धडक दिली. आई वडील दोघेही खाली पडले पण गाडीवाला न थांबताच भरधाव निघून गेला. कोणीतरी मामाला फोन करून बातमी कळवली. तो तात्काळ त्या ठिकाणी पोचला पण तो येण्यापूर्वी ते दोघे जग सोडून गेले होते. माधुरीचे वडील एकटेच तिच्या मामाला आपल्या बहिणीची निशाणी म्हणून माधुरीला घरी घेऊन जाणे भाग होते. माधुरी शाळेतून येण्यापूर्वी सर्व संपले होते. आई-वडिलांचा मृतदेह पाहून माधुरीने हंबरडा फोडला. मामाने कसेबसे सावरले. थोडे दिवस मामीने प्रेमाने केले. आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर मामाने माधुरीला घरी नेले खरे पण मामीला मात्र घरकामासाठी आयती मोलकरीण मिळाली. तिने या पोरीला अनेक प्रकारे छळले. मामा ऑफिसला गेला की तिच्याकडून घरची कामे करून घ्यायची मग शाळेत जायची परवानगी द्यायची. रात्री काम आवरून तिने अभ्यासाला सुरुवात केली की मामी ओरडत येई, “लाईट बिल काय तुझा बाप भरणार?’माधुरी नाईलाजाने लाईट बंद करून झोपायला जायची. मामाच्या घरी तिला “अश्रित “हाच दर्जा मिळाला होता. राब राब राबून शिव्या खाणेच तिच्या नशिबात होते. आपल्या नशिबात आहे ते भोगायलाच पाहिजे असा विचार करून ती गप्प बसत होती आणि तोंडातून ब्र न काढता जोमाने अभ्यास करीत होती.

– क्रमशः भाग पहिला 

©  अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ संस्थापक संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ५ अनुवादित लघुकथा – आणखीन एक वीरगती / विश – नवीन वर्षाची / वारसा / भीती / नात्यांचा अंत – हिन्दी लेखक : सेवासदन प्रसाद ☆ मराठी भावानुवाद – जस्मिन शेख ☆

जस्मिन शेख

🌸 जीवनरंग 🌸

☆ ५ अनुवादित लघुकथा – आणखीन एक वीरगती / विश – नवीन वर्षाची / वारसा / भीती / नात्यांचा अंत – मूळ हिन्दी लेखक : सेवासदन प्रसाद ☆ मराठी अनुवाद – जस्मिन शेख ☆

☆ १. आणखीन एक वीरगती ☆

आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर लांब सियाचीनच्या बर्फाच्छादित दऱ्याखोऱ्यांमध्ये देशाची सुरक्षा करण्यासाठी तैनात असलेल्या अनेक सैनिकांसोबत हनमन थप्पा आपल्या धरती मातेच्या सेवेत हजर होता. काही क्षणातच डोळ्याची पापणी लवते न लवते तोच बर्फाच्या एका प्रचंड वादळाने काही सैनिकांना आपल्या मिठीत कवटाळले. तेव्हा बर्फच त्यांचे कफन बनले, बर्फातच त्यांचे दहन झाले आणि बर्फच त्यांची कबर बनली. मग सुरू झाले ‘सर्च अभियान’! 

साऱ्या जगाने तर त्यांना मृत घोषित केले होते. परंतु हनमन थप्पा यांची पत्नी महादेवी आणि कन्या नेत्रा यांच्या डोळ्यात मात्र अजूनही आशेची किरणे चमकत होती. भारतीय नारीच्या दृढ विश्वासाने प्रेरित झालेली होती ना!

शेवटी एका पत्नीच्या अचल श्रद्धेने चमत्कार घडवला. प्रचंड बर्फाच्या खाली घुसमटून गेलेला, दबून गेलेला हनमन थप्पा जिवंत सापडला. त्याच्या पत्नीचा विश्वास बहरून आला. ती हनमन थप्पाच्या सुरक्षेसाठी देवाला साकडे घालू लागली. मग काय! पूर्ण देशात प्रार्थनेचे वादळ वाहू लागले. मंदिरातील घंटा रात्रंदिवस निनाद करू लागली. मशिदीमध्ये नमाजचे पठण होऊ लागले. चर्चमध्ये प्रार्थनांचा गजर चालू झाला. तर गुरुद्वारा मधून ग्रंथं वाचनाचा आवाज घुमू लागला. भारतीयांची ही अनोखी राष्ट्रभावना बघून अख्खे विश्व विस्मयचकित झाले. ‘मेरा भारत महान’ ही भावना सर्वांच्या मनावर विराजमान झाली. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोधैर्यही वाढू लागले.

पण म्हणतात ना ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’. शेवटी करोडोंना दुःखाच्या अंधारात लोटून एका सैनिकाला वीरगती प्राप्त झाली आणि तेव्हा भारत मातेला सुद्धा अश्रू अनावर झाले.

मूळ हिंदी कथा : सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद : जस्मिन शेख

२. विश… नवीन वर्षाची !

वर्षाची शेवटची रात्र. शर्मा साहेब कुटुंबासह हॉल मध्ये विराजमान! रात्री १२वाजण्याची उत्सुकता!आज घड्याळात बघण्याची गरजच काय? फटाक्यांचा आवाज आणि आतषबाजीनेच कळून चुकेल की गतवर्षाचे बारा वाजलेत आणि नवीन वर्षाचे आगमन झाले आहे.

शर्मा साहेब म्हणाले, ” नेहमीप्रमाणे आज सगळ्यांनी आपापली एक विश सांगायची आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी वर्षभर कटिबद्ध रहायचे आहे. ” 

शर्मा वहिनींनी सुरुवात केली, ” माझी तर अशी इच्छा आहे की माझा मुलगा शिकून डॉक्टर बनावा आणि मुलीला सुखी सासर मिळावे. “

यावर नीताने लगेच आपली इच्छा प्रकट केली, ” मी माझं शिक्षण पूर्ण करून आधी नोकरी करणार नंतर लग्न, जेणेकरून जीवनात कोणती कमतरता भासू नये. “

शर्मा साहेब आणि अखिल शांत राहीले. शेवटी एका बापाने आपली इच्छा व्यक्त केली, “माझी केवळ इतकीच मागणी आहे की, माझ्या मुलाची आणि मुलीची इच्छा पूर्ण होवो आणि माझं म्हातारपण सुखात जावो. “

आता सगळ्यांच्या नजरा अखिलकडे वळल्या. फटाके फुटू लागले, रोषणाईचे नृत्य सुरू झाले. त्यातच अखिलने धमाका फोडला, ” बाबा, मला नेता बनायचे आहे. ” बाबांना धक्का बसला. मग समजावण्याच्या सुरात म्हणाले, “बाळा, नेत्याचं जीवन विवादातच अडकलेलं असतं. न पटणा-या मूल्यांशी गाठ बांधावी लागते. आणि अनिश्चित कार्यकाळ असतो. नेता केवळ लेखक आणि मिडियातील एक व्यंगचित्रं बनून राहतं. “

– – पण अखिल आपला दृढविश्वास कायम ठेवत म्हणाला, ” नाही बाबा, या देशाला आता योग्य नेत्याची गरज आहे. जर देशच विस्कटलेला असेल तर डॉक्टर, इंजिनिअर कसे टिकतील देशात? “

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जास्मिन शेख

☆ ३. वारसा ☆

रोगशय्येवर पडून शेवटच्या घटका मोजणारा बाप आणि समोर त्याचा स्नेहकांक्षी ! बाप मनातलं बोलायला व्याकूळ आणि मुलाची ऐकण्याची तेवढीच अतुरता ! बापाने स्पष्ट शब्दात मन मोकळं केलं, “बाळा, माझ्याकडे या घराशिवाय आता काहीच शिल्लक उरलं नाही. जे काही होतं ते सगळ तुझ्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी खर्च झालं. आज मला अभिमान आहे की माझा मुलगा विदेशात एका मोठ्या हुद्द्यावर नोकरीला आहे. बस जे काही आहे ते या कपाटात बंद आहे. “

मुलाला आश्चर्य वाटलं. लोकं मौल्यवान वस्तू एकतर बँकेतील लॉकर मध्ये ठेवतात किंवा तिजोरीत! मुलाच्या मनातील गोंधळ अचूक ओळखून त्या लेखक बाप ख-या परिस्थितीवरून पर्दा उठवत म्हणाला, “मुला, या कपाटात माझी प्रकाशित पुस्तके, अप्रकाशित साहित्य-लेखन‌, वाचक आणि लेखक मित्रांनी पाठवलेले प्रशंसापत्र आहेत. हीच माझी आयुष्यभराची पुंजी आहे. जी मी तुझ्या हाती सुपूर्द करतो. “

मुलाला माहित होते की वडिलांनी अखंड आयुष्य साहित्य सेवा केली होती. शेवटी मुलगा अभिमानाने बोलला, “बाबा, या घराला मी साहित्य संग्रहालय बनवेन, अप्रकाशित लेखन‌ साहित्य प्रकाशकाकडे पाठवेन, सर्व प्रशंसापत्रांचा एक सुंदर अल्बम बनवेन आणि तुमचे स्मृतीचिन्ह आपल्या कुटुंबाची परंपरागत संपत्ती म्हणून कायम जतन करेन. हाच माझा अनमोल वारसा आहे. “

– – – असहनीय वेदनेने त्रस्त असून ही बाबांचे डोळे आनंदाने चमकू लागले.

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

☆ ४. भीती ☆

विधवा आईच्या मृत्यूनंतर शालिनीने एक खूप मोठा निर्णय घेतला की ती तिच्या लहान बहिणीला एकटी सोडू शकत नाही. तिला सोबत ठेवल्याने तिची काळजीपण राहणार नाही आणि मोहिनीला एकटेपणा छळणार नाही. पतीच्या सहमतीने तिला आणखीन बळ दिलं.

मोहिनी, ताईच्या या निर्णयाने आपले सर्व दु:ख विसरून गेली. विचार केला, ताई आणि भावजींच्या आधाराने ती तिचे भविष्य उभारण्याचा प्रयत्न करेल. शहरातील प्रत्येक दिवशी घडणा-या वाईट घटनांमुळे तिच्या मनात भयंकर भिती घर बनवत होती. तिच्यात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. अशात ताईचे संरक्षण एक शक्ती बनून तिच्यातील भीती कमी करत होती. ती आता आनंदात होती. मनापासून ताई-भावजींची काळजी घेऊ लागली.

अचानक पोटदुखीमुळे शालिनीला दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले. थोड्या वेळाने ताईच्या कुशलतेचा समाचार ऐकून तिला बरे वाटले. भावजी दवाखान्यातून कधी परत येतील कोणास ठावूक? त्यांना पण पत्नीच्या तब्बेतीची काळजी आहेच की! त्यांच्याकडे डुप्लिकेट चावी आहेच. नाहीतर सकाळी दवाखान्यात जावून भावजींना घरी पाठवते. या विचारातच शेवटी ती झोपायला गेली.

अर्ध्या रात्री कोणाच्यातरी स्पर्शाने मोहिनीला जाग आली. समोर भावजींना पाहून चाट पडली. जी भिती मरून गेली होती ती पुन्हा जिवंत होऊ लागली. घृणा अन् क्रोधाच्या आवेशाने भावजींचा चेहरा नखांनी रक्ताने माखून टाकला. जुन्या भितीने पुन्हा डोके वर काढले. ती रात्र खूप जड गेली. आता केवळ घरातील नव्हे तर अखंड जगातील भितीशी संघर्ष करण्यासाठी ती कटिबद्ध झाली. पहाटेच तिच्या पायांनी वाट धरली… गर्ल्स होस्टेलची!

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

☆ ५. नात्यांचा अंत ☆

खुशहाल वृद्धाश्रमाचा रौप्यमहोत्सवी समारंभ ! समारंभाचे प्रमुख अतिथी अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती श्री. आलोककुमार यांचे आगमन! आलोककुमार याच शहराचे रहिवासी होते. याच शहरातील गल्ली-बोळात त्यांचे बालपण व्यतीत झाले होते. त्यांना माहित होते की भारतात अनुदान देऊन सन्मान मिळवण्याची प्रथा आहे. या शहरातील एक ही वृद्ध व्यक्ती निराधार राहू नये यासाठी त्यांनी खुशहाल वृद्धाश्रमला ५० लाखांची देणगी दिली.

आता मुख्य अतिथींचे गुणगान करणे, जोरदार स्वागत करणे तसेच त्यांच्या उदारतेची प्रशंसा करणे हे तर कमिटी सदस्यांची नैतिक जबाबदारी बनते. कार्यक्रमादरम्यान अध्यक्षांनी वृद्धाश्रमातील वरिष्ठ वृद्धाच्या हस्ते श्री. आलोककुमार यांचा सत्कार करण्याचे ठरवले. जेव्हा एक वृद्ध व्यक्ती कांप-या हातात फुलांचा हार घेऊन मंचावर आली. तेव्हा आलोककुमार यांच्या चेह-याचा रंग उडाला. पण गतकाळातील सर्व दु:खांवर मौनाचे पांघरूण घालून एका बापाने आपल्या मुलाच्या इभ्रतीत मोरपीस खोवले. श्री आलोककुमार यांची मान लाजेने झुकली पण लोकांना वाटले त्यांनी सत्कारासाठी मान झुकवली.

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

मिरज जि. सांगली मो 9881584475

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कृतज्ञतेचे अश्रू…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शोभा जोशी☆

शोभा जोशी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “कृतज्ञतेचे अश्रू…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शोभा जोशी

“सरू, चाळीस वर्षं… तब्बल चाळीस वर्षं रक्ताचं पाणी केलं ग म्या या पोरांसाठी! स्वतःच्या लेकरावाणी जपलं एकेकाला. पण आज माझा शाळेतला शेवटचा दिवस होता, निरोप समारंभ तर सोडाच, पण एकानेबी साधं १ रुपयाचं गुलाबाचं फूल बी दिलं न्हाय ग. म्या काय कमी पडलो व्हतो का ग शिकवायला? का आजकालच्या पोरांच्या काळजात पाझरच उरला न्हाय?”

देसाई सर सोफ्यावर बसून लहान मुलासारखे धाय मोकलून रडत होते आणि त्यांची बायको त्यांना निमूटपणे सावरत होती.

देसाई सर… जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक. शिस्तीचे पक्के, पण मनाने मेणासारखे मऊ. हातातल्या छडीचा मार आणि डोळ्यातलं प्रेम, दोन्हीही विद्यार्थ्यांनी अनुभवलं होतं. आज ३१ मार्च. देसाई सरांच्या रिटायरमेंटचा (सेवानिवृत्तीचा) दिवस.

सकाळपासून देसाई सर आरशासमोर उभे राहून तयारी करत होते. त्यांनी आपली जुना पण कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती. मनात एक वेगळीच हुरहुर होती. “आज नक्कीच शाळेत मोठा कार्यक्रम असेल. सगळी जुनी पोरं येतील, भाषणांवर भाषणं होतील, गळ्यात हारांचे ओझे असेल… ” या विचारानेच त्यांचे डोळे पाणावले होते.

सर शाळेत पोहोचले. पण हे काय? शाळेचं फाटक उघडंच होतं, पण तिथे ना फुलांची सजावट होती, ना मंडप टाकला होता. पटांगण सुनं सुनं होतं. सर ऑफिसमध्ये गेले. सहकारी शिक्षकांनी “गुड मॉर्निंग सर” म्हटलं आणि आपापल्या कामाला लागले. शिपाई रामू काका सुद्धा नेहमीसारखेच चहा घेऊन आले.

देसाई सरांना वाटलं, ‘कदाचित सरप्राइज असेल. दुपारपर्यंत तयारी करतील. ‘

दुपार झाली, शाळा सुटायची वेळ झाली. पण काहीच हालचाल नाही. शेवटची घंटा वाजली. मुलं दप्तरं घेऊन पळाली. शिक्षकांनी रजिस्टरवर सह्या केल्या आणि “सर, येतो आम्ही, निवांत भेटा आता, ” असं रुक्षपणे म्हणून निघून गेले.

देसाई सर आपल्या खुर्चीतून उठले. त्यांनी त्या रिकाम्या वर्गांकडे पाहिलं. भिंतीवरचे फळे, ती बाकडी… सगळं काही शांत होतं. त्यांच्या गळ्यात हुंदका दाटून आला. “ज्या शाळेला मी मंदिर मानलं, तिथे आज माझ्या जाण्याने कुणालाच काही फरक पडत नाही?”

जड पावलांनी, मान खाली घालून सर शाळेबाहेर पडले. रस्ताभर त्यांना लोकांचे चेहरा बघवत नव्हते. त्यांना वाटत होतं, आपण आयुष्यभर फुकट राबलो. कुणालाच कदर नाही.

घरी येताना त्यांच्या डोक्यात एकच विचार चक्रावून गेला – ‘कर्ज’.

देसाई सरांनी मुलीच्या लग्नासाठी आणि घराच्या दुरुस्तीसाठी बँकेतून ५ लाखांचे कर्ज काढले होते.

पेन्शनमधून अर्धे पैसे जाणार होते. म्हातारपण कसं जाईल, या चिंतेने त्यांना ग्रासलं होतं. पण त्याहीपेक्षा जास्त दुःख होतं ते ‘उपेक्षेचं’.

घरी आल्यावर त्यांनी पत्नीसमोर मन मोकळं केलं आणि रडू लागले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.

सरांनी डोळे पुसले आणि दार उघडलं. समोर पोस्टमन उभा होता.

“देसाई साहेब, बँकेतून पत्र आलंय. अर्जंट आहे, सही करा. “

सरांच्या पोटात गोळा आला. ‘नक्कीच कर्जाच्या हप्त्याची नोटीस असेल. रिटायर झालो नाही तोच बँकेने तगादा लावला, ‘ असं वाटून त्यांनी थरथरत्या हाताने पाकीट घेतलं.

ते सोफ्यावर बसले आणि त्यांनी पाकीट फोडलं. आत एक बँकेचं अधिकृत पत्र आणि एक दुमडलेला कागद होता.

सरांनी बँकेचं पत्र वाचायला सुरुवात केली आणि… वाचता वाचता त्यांचे डोळे विस्फारले. त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यांनी चष्मा पुसून पुन्हा वाचलं.

त्यात स्पष्ट लिहिलं होतं – “श्री. देसाई सर, तुमचे घराचे ५, ००, ००० (पाच लाख) रुपयांचे गृहकर्ज आज दिनांक ३१ मे रोजी पूर्णपणे परतफेड (Nil/Closed) करण्यात आले आहे. आता बँकेची तुमच्यावर कोणतीही देणी बाकी नाहीत. “

सर गोंधळले. “हे कसं शक्य आहे? मी तर पैसे भरलेच नाहीत. “

त्यांनी तो सोबतचा दुसरा कागद उघडला. ते एक हाताने लिहिलेलं पत्र होतं.

पत्र

“आदरणीय देसाई सर,

आम्हाला माहित आहे, आज तुम्ही शाळेतून रिकाम्या हाताने आणि जड अंतकरणाने घरी गेलात. तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या विद्यार्थ्यांची आठवणशक्ती कमी झाली आहे. पण सर, तुमची शिकवण आम्ही विसरलो नाही.

आम्ही सर्वांनी (तुमच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आणि सहकारी शिक्षकांनी) मिळून ठरवलं होतं की, तुम्हाला हार-तुरे, शाल-श्रीफळ आणि पेढे देऊन तुमचा सत्कार करायचा नाही. त्या हार-फुलांची किंमत दोन दिवसात कोमेजून जाते.

त्याऐवजी आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून ‘गुप्त वर्गणी’ जमा करत होतो. त्यात आम्हां विद्यार्थ्यांसोबत शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी, शिपायांनी आणि मुख्य म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठ्या पदावर असलेल्या तुमच्या माजी विद्यार्थ्यांनी तर खूप मदत केली. आम्हाला माहित होतं की तुमच्या डोक्यावर कर्जाचं ओझे आहे आणि निवृत्तीनंतर तुम्हाला त्याची काळजी सतावणार आहे.

म्हणून, तुमच्या निवृत्तीच्या दिवशी, आम्ही तुम्हाला ‘ताणमुक्त’ आयुष्य भेट देत आहोत.

सर, तुम्ही आम्हाला घडवलंत, आता तुमचं म्हातारपण सुखात जावं, हीच आमची खरी गुरुदक्षिणा!

तुमच्यावर प्रेम करणारी… तुमची ‘कृतघ्न’ वाटलेली पोरं!”

 

पत्राखाली शेकडो विद्यार्थ्यांच्या सह्या होत्या.

देसाई सर स्तब्ध झाले. त्यांच्या हातातून कागद गळून पडला.

तेवढ्यात घराबाहेर “देसाई सर आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” अशा घोषणा ऐकू आल्या.

सरांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. संपूर्ण गल्लीत त्यांचे शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी उभे होते. कुणी ढोल वाजवत होतं, तर कुणी डोळ्यात पाणी आणून बघत होतं.

देसाई सर धावत बाहेर आले. त्यांनी कोणा एकाला नाही, तर समोरच्या गर्दीला हात जोडले आणि गुडघे टेकून जमिनीवर डोकं ठेवलं.

त्यांच्या डोळ्यातून आज दुःख नाही, तर अपार कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते.

त्यांना उमजलं होतं – ‘माणसं जोडली की पैसा गौण ठरतो. हार गळ्यात नाही, तर लोकांच्या हृदयात असावा लागतो. ‘

आज देसाई सर जगातले सर्वात श्रीमंत मुख्याध्यापक होते.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : शोभा जोशी 

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares