मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुक्रवारची कहाणी …. ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ शुक्रवारची कहाणी …. ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

(व्हाट्सअपवरून आलेल्या एका अतिशय चांगल्या मेसेजवरून सहज सुचलेलं.)

कीर्ति लहान असल्यापासून मी तिला ओळखत होते.आमच्या शेजारीच राहायचे हे लोक.

कीर्ति फार हुशार मुलगी– स्वभावाने गरीब, भिडस्त, सर्वांना मदत करणारी.  पुढे ते दुसरीकडे राहायला गेले, मग  फारसा  संपर्क नाही राहिला. पण कानावर येत असत बातम्या, की कीर्ति  छान शिकतेय– एका चांगल्या फर्ममध्ये नोकरीही लागलीय. कीर्तिला लहान भाऊही होता, तोही एमबीए झाला, चांगला पगारही मिळवू लागला.

मग असे कानावर आले,की कीर्तीने आईवडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केले. मुलगा  गरीब कुटुंबातील होता, कीर्तिइतका पगारही नव्हता त्याला. माहेरची श्रीमंत कीर्ति, आता भाड्याच्या घरात राहू लागली. पण ती खूश होती. 

भावाचे लग्न झाले. आईने अगदी श्रीमंत घरातली सून शोधली. मुलगी दिसायला अगदी बेताची.  शिक्षणही फारसे नाही. पण म्हणतात ना, पैसा बोलतो. सगळी उणीव पैशाने भरून काढली होती त्या लोकांनी. कीर्तिची आई फारच खुश होती. नवीन भावजय  श्रीमंत घरातली. उशिरा उठायची. सासूबाई आयता चहा-नाश्ता  हातात द्यायच्या. कामाची सवय होती कुठे?

दरम्यान,कीर्तिच्या आईचा एक फ्लॅट रिकामा झाला.  बाबा म्हणाले, “ कशाला भाडे भरत बसतेस? तुम्हीच रहा या फ्लॅटमध्ये. “ —ते  त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. फ्लॅट तिच्या माहेरपासून जवळच होता.  कीर्तीला मुलगा झाला. तिच्या भावजयीलाही दोन मुली झाल्या. वहिनीला उरक बिलकुल नाही. मुली अभ्यासात मागे. आईचे लक्षच नाही ना. कीर्तीचा मुलगा मात्र हुशार. कीर्ति अभ्यास घ्यायची  त्याचा.

एक दिवस कीर्तिची आई म्हणाली, “ अग, त्या मुलींचाही घे ना अभ्यास, किती कमी मार्क पडलेत.” —-मुली कीर्तिकडे जाऊ लागल्या. मग, रोज मुलींचे जेवणखाणही कीर्तीच करू लागली. हळूहळू अशी परिस्थिती झाली की, कीर्तिच्या गळ्यात सगळेच पडू लागले– “ अग, आज माझी बाई नाही आली, तुझ्या बाईकडून पोळ्या घे ना करून, आणि दे पाठवून इकडे.”—हे रोजचेच सुरू झाले,आणि कीर्तीला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू झाला. नवराही सगळे दिसत असून  बोलू शकत नव्हता. वैतागून कीर्ति एक दिवस माझ्या घरी आली. म्हणाली,” मावशी, मला काहीतरी सल्ला द्या, माझी फार घुसमट होते आहे. अगदी कठीण झालंय सगळं. माझी भावजय इतकी स्वार्थी आहे— सगळच माझ्या गळ्यात टाकून गावभर फिरत असते. पण आईला तिचेच कौतुक.

‘श्रीमंतांची मुलगी,’ हा एकच गुण आहे तिच्यात. माझी कोणतीही गोष्ट तिला चांगली वाटतच नाही.” 

मी तिला म्हटलं, “ कीर्ति,यासाठी तुला काही गोष्टी कराव्या लागतील. बघ पटतंय का.

एक तर तू आता स्वतः चे घर घ्यायच्या मागे लाग. आणि तेही आईच्या घरापासून लांब घे. 

तुम्हाला चांगले पगार आहेत ना ? मग घ्या की कर्ज.  .किती वर्षे अशी तू राबत राहणार ग.

तू सांगतेस ते ऐकून कीवच येतेय मला तुझी. हे बघ,लहानपणी आपण शुक्रवारची कहाणी ऐकलीय ना, ती सत्यच आहे बरं बाळा. या युगात गुणांना किंमत नाही, तर पैशालाच आहे ..अजूनही.

दागिन्यांनाच  जिलब्या आणि पक्वान्ने वाढतात लोक.—आता तुला बदलले पाहिजे. इतके सहन केलेत, आणखी थोडे करा. लवकर बुक करा फ्लॅट. वेळ असेल तर आईची कामे जरूर कर,

पण नसेल तर तसे स्पष्ट सांग, “  मला ऑफिस मध्ये खूप काम आहे.”  गोष्टी गोड बोलुनही होतात कीर्ति. किती गृहित धरलंय तुला माहेरच्यांनी. आपलेच दात आणि आपलेच ओठ, असं झालंय तुझं.  

पण मला तरी , तू घर घेणे, आणि यापुढे उगीच काही  गळ्यात न घेणे, हेच उपाय दिसतात सध्या.” 

कीर्ति विचारात पडली. तिलाही आईच्या घरात बिनभाड्याचं रहायचा मोह होताच की. तिने तिच्या नवऱ्याला विश्वासात घेतलं . तोही बिचारा भोगत होताच. सासरेबुवांची बरीच कामे करावी लागत त्यालाही..

त्यांनी आईच्या घरापासून दूर फ्लॅट बुक केला. कीर्तीने आईबाबांना त्याबद्दल सांगितलं . बाबांना मनापासून आनंद झाला, पण आईला हे आवडले नाही. “ कशाला ग जातेस एवढ्या लांब, आम्ही काय जा म्हणणार होतो का?”—कीर्ति निमूट राहिली. यथावकाश ते तिकडे राहायला गेले.

वास्तुशांतीला  मला बोलावणे होते. कीर्तीने फ्लॅट सुंदर सजवला होता. अभिमानाने मला घर दाखवतांना म्हणाली, ”आता इथे आम्ही सुखाचा श्वास घेऊ शकू. रोजरोजची कटकट, सुनेचे गुणगान, खोटी स्तुती ऐकणे,  माझ्या गरीब नवऱ्याचा उपहास– काहीच नको.”

मी मनापासून आशीर्वाद दिला– “ कीर्ति, मस्त आहे घर. अशीच सुखात रहा  दोघेही.”  कीर्ति हसत म्हणाली, ” होय गुरू, तुमचा सल्ला ऐकला, आणि सगळे शक्य झाले. ती शुक्रवारची कहाणी सांगितलीत, ती मात्र खरीच आहे हो. या जगात गुणांना किंमत नाही– फक्त श्रीमंतीलाच आहे–  कटु सत्य आहे —- “ दागिन्यांना जिलब्या— “,  हो ना ?” 

मी हसले, आणि म्हटलं , “ विसर ते–आता गोष्टीतली गरीब बहीणही झालीये  घरदारवाली.  आणखीही घेशील सगळे.” 

बघा ना–

आपल्या  पूर्वीच्या शहाण्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी या काळातसुद्धा कशा लागू पडतात ना—

 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अहो आश्चर्यम् ! ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ अहो आश्चर्यम् ! ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

ज्येष्ठा कनिष्ठा गौरी बद्दल खूप माहिती आपल्याला मिळत आहे. एक अनुभव सांगते. सांगलीला होतो आम्ही त्यावेळेस. वाड्यात बरीच बिर्‍हाड होती. त्यात माझ्या मामी पण राहत होत्या

मामीकडे सुगडाच्या गौरी होत्या. झोकात गौरी हळदी कुंकू झाले. दुसरे दिवशी विसर्जन पण झाले. मामी म्हणाल्या, “ सगळ्या  आमच्या घरी या.  तुम्हाला गौरीचा चमत्कार दाखवते.”  

त्या म्हणाल्या, “ आज विसर्जन केले तरी गौरीचं अस्तित्व घरात असतं. तिला खेळायचं असतं.”  त्यांनी आपले दोन अंगठे जमिनीवर हात ठेवून उभे केले. समोर एका सवाष्णीला बसवून तिला पण त्यांच्या प्रमाणे दोन अंगठे  उभे करायला सांगितले .आणि चार अंगठ्यावर ती सुगडाची गौर म्हणजे सुगडच ठेवायला सांगितले. त्या म्हणाल्या, “ आता तुम्ही फक्त यात अक्षत टाका आणि तुमची इच्छा बोला .जर इच्छा पूर्ण होणार असेल, तर गौर  उजवीकडे फिरायला लागेल व नसेल तर डावीकडे फिरेल—–.

——-आणि अहो आश्चर्यम् !— प्रथम मीच त्या गौरीवर अक्षत टाकली आणि माझी एक इच्छा बोलून दाखवली आणि अक्षरशः 4 अंगठ्यांवर ती सुगडरुपी गौर उजवीकडून गरगर गरगर जोरात फिरायला लागली. नंतर दुसरी इच्छा बोलून दाखवली.  अक्षत टाकून मनातल्या मनातच मी काही विचारले. आणि गौर डावीकडे जोरजोरात फिरायला लागली. फक्त चार अंगठ्यावर  ती उभी होती. मग हळूहळू वाड्यातल्या सगळ्या जमल्या. आणि दीड तास हा खेळ रंगला. नंतर मामी म्हणाल्या, “ आता गौर दमली, आता बास करा. कुणीतरी अक्षत टाकली आणि म्हटले,” गौरी माते खूप खेळलीस, दमलीस आता तुझ्या तुझ्या घरी जा.”  त्यानंतर ती जागच्या जागीच हलली आणि शांत झाली. पुढे कितीही अक्षत टाकून कोणी काही विचारले तरी ती सुगडरुपी गौर अजिबात हलली नाही. हे स्वतः आम्ही अनुभवले आहे .

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रोमँटिक दळण ☆ प्रस्तुती – कौस्तुभ केळकर नगरवाला

? मनमंजुषेतून ?

☆ रोमँटिक दळण ☆ प्रस्तुती – कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

आपलं हे असं आहे.

आपण कशातही कधीही कधीच गुंतून पडत नाही…

संसारात तर बिलकूलच नाही.

भाजी,दळण,इस्त्रीचे कपडे, वाणसामान वगैरे वगैरे गोष्टी आणण्यासाठी आपला जन्मच झालेला नाही.

असं आपलं मी माझं मलाच समजावतो.

 

गेला बाजार माझी स्वतःचीच समजूत पटत नाही..

बायकोला काय पटणार…?

जरा कुठे निवांत सोफ्यावर सांडलेला दिसलो की…

बायकोला कसंसंच होतंय.

जा दळण आण.

जा ईस्त्रीचे कपडे टाकून ये..

ईस्त्रीचे कपडे घेऊन ये.

अर्धा किलो मैदा घेऊन ये…

भाजी आण.

जाऊ दे..

तुम्हाला सहन नाही व्हायचं.

सांगकाम्या झालोय मी आमच्या बिगबाॅसचा.

 

कालचीच दुपारची गोष्ट.

दोन ऊशा डोक्याखाली अन् दोन पायाखाली.

मी शेषाशायी मोडवर सोफ्यावर सांडलेलो.

रिमोट भरल्या गोलपोटावर.

नजर टीव्हीकडे.

डोळे मिटलेले.

ब्रह्मानंदी टाळी की का काय ते झालेलं…

एवढ्यात साहेब कडाडले..

जा दळण घेवून ये.

दहा किलो गहू दिलेत काल दळायला.

80 रूपये होतील…

मी दचकून जागा झालो.

सरपटत गिरणीच्या दिशेने.

आमच्या बिल्डींगखाली चौकातच गिरणी आहे.

पुण्याला शिफ्ट झाल्यापासून ईथंच ईथलंच दळण दळतोय.

गिरणीचं काम एकदम सिस्टीमॅटीक.

काऊंटरवर मार्कर ठेवलेला असतो.

दळणाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंना आपलं नाव टाकायचं..

मागाहून घोटाळा नको.

 

आपला नगरी बाणा.

आमची दळणाची एक पुश्तैनी पिशवी आहे.

नगरच्या कोहीनूर क्लाॅथ स्टोअरची.

लाल रंगाची, भलीमोठी, कापडी, दणकट, युनिक.

एकदम ओळखणेबल…

मार्करची आपल्याला गरजच पडलेली नाहीये. 

गिरणीत कोहीनूरवाली पिशवी आपल्याशिवाय दुसर्या कुण्णा कुण्णाकडे नाहीये.

माझा फुरफुरणारा ओव्हरकाॅन्फीडन्स.

मी तडक गिरणीत धडकलो.

80रू मालकांच्या हाती टेकवले.

घरी परत.

कोहीनूरची पिशवी स्वयपाकघरात आदळली.

 

शून्य मिनटात सोफ्यावर आडवा.

जरा कुठे डोळा लागतोय तर…

केळकरांचं घर आपट्यांचं झालेलं.

 

नुसती आदळआपट, धूसफूस.

बिगबाॅस कडाडले…

“कुणाची पिशवी ऊचलून आणलीयेस ?

यात दहा किलो भाजणी आहे.

कुठं लक्ष…..”

चलता है.

मी परत गिरणीत.

असं कसं झालं ?

तिथं पोचतो अन्…

 

माझा खपली गहू झालेला.

जुन्या खपल्या.

आमच्या वर्गातली, हमारे जमानेवाली,

सगळ्यात सुंदर अप्सरा…

अजूनही तश्शीच.

हाय मै मर जावा.

काळजात ड्रिल मारल्यासारखं वाटलं.

अप्सरा आली…

 

हातात लाल कोहिनूरची पिशवी घेऊन.

ती कनफ्युजलेली तिथं ऊभी.

गिरणीवाल्यानं मला ऊसासारखा सोलला.

 

तिकडे लक्ष न देता ती म्हणाली…

“तू ईकडे कुठे ?

किती वर्षांनी भेटतोयस ?

आमचीही दळणाची पिशवी सेम टू सेम.

तेवढीच माहेरची आठवण.

बरं झालं कोहिनूरच्या लाल पिशवीनं घोटाळा केला, 

अन् तू भेटलास..

 

कसा आहेस ?”

ती नुकतीच मुंबईहून ईथं शिफ्ट झालेली.

ऊभ्या ऊभ्या गप्पा.

सेल नं. ची देवाणघेवाण.

‘ ये ना घरी ‘ ची नाजूक विनंती.

 

ठार मेलो..

दळण इतकं रोमँटिक असेल असं वाटलंच नव्हतं कधी..

ठरलं—-

आजपासून कधीही कुठल्याही संसारिक कामाला नाही म्हणायचं नाही.

आपल्या वर्गात साडेनऊ सुंदर अप्सरा होत्या..

आज गिरणीत एक भेटलीये.

न जाणो ऊद्या मातीगणपतीपाशी भाजीवाल्याकडे दुसरी—-

आशाँए—-

अवघाची संसार…

सुखाचा करीन—–

 

प्रस्तुती –  कौस्तुभ केळकर नगरवाला

(*माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.)

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुभंकरोती….….! ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ शुभंकरोती….….! ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

आज्जी भूषणला म्हणाली,  “बाळा, दिवेलागणीची वेळ झाली, शुभंकरोती म्हणायला चल. हातपाय धुवून ये हं.”  भूषण आला नि आज्जीजवळ बसला. आज्जी  शिकवायला लागली.” शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम धनसंपदा———-बाहेरची लक्ष्मी घरात येवो,  घरातली इडापिडा बाहेर जावो,”  हे सगळं आज्जीने शिकवलं. 

भूषण म्हणाला, “आजी, लक्छुमी म्हंजे काय?”

आज्जीने सांगितलं, “लक्ष्मी म्हणजे पैसे, दागिने, धान्य, वगैरे.” 

“आनी इलापिला म्हंजे काय?”

त्याला समजेल अशा भाषेत आज्जीने  सांगितलं—- 

” इडापिडा म्हणजे गरिबी, खायला मिळत नाही, फाटके कपडे, आजारी पडणं असं सगळं  “

“इलापिला बाहेल जाऊदे म्हंजे कुथे?”

“जाऊदे तिकडे रस्त्यावर”  आज्जीने उत्तर दिलं . 

“मी शुभंकलोती म्हननाल नाही.”  

“कारे”?आज्जीने विचारलं.

“लश्त्यावल पबीचं घल आहेना!  (पबी म्हणजे त्याची छोटी मैत्रिण प्रभी,ती झोपडीत रहाते.)

इलापिला तिच्याकले गेली तल ती आजाली पलेल”. 

लहानशा भूषणचा समाजवाद ——

—–आज्जीला खूप काही शिकवून गेला.  

 

प्रस्तुती :  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साठवणीतल्या आठवणी – स्व. ह. मो. मराठे ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ साठवणीतल्या आठवणी – स्व. ह. मो. मराठे ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

७६-७८चा सुमार असेल. मी जरा उत्साहाने कविता लिहित होते. चांगल्या, दर्जेादर मासिकातून याव्यात असं वाटत होतं. पण एकूण स्वभावात न्यूनगंडच जास्त. एकदा माझ्या इंदूरच्या मामेभावाला शरदला मी कविता वाचायला दिल्या. तो म्हणाला, `चांगल्या आहेत.’ मी म्हंटलं, `स्त्री-किर्लोस्कर’कडे यायला पाहिजेत.’  तो म्हणाला, `त्यात काय? किर्लोस्क प्रेसमध्ये जा. मुकुंदरावांना भेट आणि तुझ्या कविता दे. एकदम बाड त्यांच्यापुढे टाकू  नकोस . दोन-तीन कविता दे.’

माझ्यात आत्मविश्वास जरा कमीच. त्यात अक्षर चांगलं नसणं,  हा आणखी एक मायनस पॉइंट. मी जरा का कू  करतेय,  असं पाहिल्यावर,  माझी वहिनी ललिता मला पुढ्यात घालून प्रेसमध्ये घेऊन गेली.

एका मध्यम आकाराच्या हॉलमध्ये काही सुट्या सुट्या टेबल-खुच्यांवर बसून लोक काम करत होते. अजून संगणक आला नव्हता. साहित्य वाचणं,  तपासणं, टायपिंग,  फायलिंग वगैरे कामं चालली होती. समोरच एका टेबलामागच्या खुर्चीवर एक उंच, गोरे, चष्मिष्ट गृहस्थ बसलेले दिसले. आम्ही त्यांच्यापुढे उभे राहिलो.

`काय पाहिजे?’

`मुकुंदरावांना भेटायचय.’

`ते बाहेर गेलेत. काय काम आहे?’

`अं… कविता द्यायच्यात.’

`बघू…’ मी कविता त्यांच्या हातात दिल्या आणि लहान मुलीसारखं बजावलं, `नक्की द्या हं त्यांना.’ त्यांनी हसून मान डोलावली. मग वाटलं आपण आपली मौल्यवान इस्टेट  (कविता) कुणाकडे सोपवली, त्यांचं नाव तरी माहीत असावं, म्हणून नाव विचारलं. ते म्हणाले, `ह. मो. मराठे’’. तोपर्यंत तरी एक लेखक म्हणून हे नाव मला परिचित नव्हतं. मासिकातून त्यांच्या कथा-लेख वाचलेही असतील,  पण ते लेखन आणि ह.मो. हे नाव,  याचं समीकरण डोक्यात फिट्ट झालं नव्हतं. तोपर्यंत साहित्य क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करायची ह.मों.ची धडपड चालू होती, पण प्रथितयशाचं वलय त्यांच्या नावाभोवती अद्याप तेजाळायचं होतं.

त्यानंतर दोन महिन्यांनी माझी एक कविता किर्लोस्करमध्ये प्रकाशित झाली. आणखी काही महिन्यांनी दुसरी. पुढे कळलं, किर्लोस्कर मध्ये छापायच्या साहित्याची बहुतेक सारी निवड तेच करतात.

जानेवारी ७७ पासून ‘किर्लोस्कर’ ने एक उपक्रम राबवला. दरमहा जिल्हावार कविसंमेलने घ्यायची व त्यातल्या ७ कविता किर्लोस्करमध्ये प्रसिद्धीसाठी निवडायच्या. ज्या जिल्ह्यात, ज्या गावी हे कविसंमेलन आयोजित करायचं. तिथल्या एका संस्थेने जबाबदारी घेऊन कविता संकलित करायच्या. त्यापैकी ३० कविता (प्रत्येकी १ किंवा २ ) संमेलनात वाचण्यासाठी निवडायच्या. सांगली नगर वाचनालयाने या उपक्रमाचे यजमानपद स्वीकारले. ३५० कविता आल्या होत्या, असे नंतर कळले. माझ्या `जन्म’ आणि `पेपर’ या दोन्ही कवितांची निवड वाचनासाठी झाली होती. किर्लोस्करकडून ह. मो. मराठे,  संजीवनी मराठे या ज्येष्ठ कवयित्रींना घेऊन आले होते. त्यातून ज्या ७ कविता छापण्यासाठी निवडल्या गेल्या, त्यात माझी ‘पेपर’ कविता होती.

त्यानंतर ह.मों.चं एक पत्र आलं. तुमची परवानगी असेल, तर मी `तुमच्या `पेपर’ कवितेवर एक कथा लिहू इच्छितो.’  या मधल्या काळात ह.मोच्या कथा माझ्या वाचनात आल्या होत्या आणि त्या मला आवडल्याही होत्या. एक चांगला, जाने -माने कथालेखक आपल्या कवितेच्या कल्पनेवर कथा लिहितोय म्हंटल्यावर मी जरा फुशारलेच आणि त्यांना आनंदानं परवानगी दिली. त्यानंतर किती तरी महिन्यांनी त्यांची भेट झाल्यावर मी त्यांना विचारलं, `माझ्या `पेपर’ कवितेवर तुम्ही कथा लिहिणर होतात,  लिहीलीत का?’

`हो! गोमंतकच्या दिवाळी अंकात ती छापूनही  आली.’

‘मला वाचायला का पाठवली नाहीत?’

`तुम्ही कुठे म्हणाला होतात, कथा पाठवा म्हणून?’

`अच्छा? म्हणजे असं मुद्दाम सांगायला लागतं का? मला वाटलं माझ्या कवितेवर लिहिताय,  म्हणजे आपणहून पाठवाल तुम्ही!’ त्यानंतर तो विषय तिथेच थांबला. मला ती कथा कधीच वाचायला मिळाली नाही.

किर्लोस्करमध्ये माझी `पेपर’ कविता प्रकाशित झाली आणि पाठोपाठ ह. मों.चं पत्र. `नियमाप्रमाणे तुम्हाला मानधन मिळेल, पण मी एक गोष्ट सुचवू इच्छितो, त्याऐवजी, पुढल्या महिन्यापासून तुम्हाला वर्षभर किर्लोस्करचे अंक पाठवले तर चालतील का? (या महिन्याचा अंक तुमची कविता आल्यामुळे तुम्हाला येईलच.)’ मी वर्षभर किर्लोस्करच्या अंकाचा पर्याय स्वीकारला. एवढंच नाही,  तर पुढेही किती तरी वर्ष स्त्री-किर्लोस्करची वर्गणी भरत राहिले. मला वाटतं,  अनेकांनी दुसरा पर्याय स्वीकारला असणार. कारण त्यावेळी, घराघरात टी.व्ही.ची इडियट बॉक्स बसलेली नव्हती. त्यानंतरही पुढे कितीतरी वर्षं मी स्त्री-किर्लोस्करची वर्गणी नियमितपणे भरत राहिले. मला वाटतं,  अनेकांनी तसंच केलं असेल.

त्यानंतर काही वर्षांनी ह.मों.चं `मधलं पान’ पुस्तक वाचनात आलं. त्यात त्यांनी आपण लोकप्रभा,  सामना,  घरदार, इ. नियतकालिकांचा खप वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले,  कोणते उपक्रम राबवले,  ते सारं विस्तारानं लिहिलय. ते सगळं वाचताना वाटलं, किर्लोस्करचा जिल्हावार कविसंमेलनाचा उपक्रम हा नव्या दमाच्या कवींच्या प्रतिभेचा शोध ( म्हणजे तसं त्यावेळेला म्हंटलं गेलं तरी…) यासाठी नसून तिथेही किर्लोस्करचे वर्गणीदार वाढवावेत हाच हेतू असावा.

 

प्रस्तुती –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वेळीच दाद द्या ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ वेळीच दाद द्या ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

(व्हाट्सअपवरून आलेल्या एका अतिशय चांगल्या मेसेजवरून सहज सुचलेलं.)

—–माणूस जिवंत असतानाच आपण त्याला का चांगले म्हणत नाही ?  दुर्दैवाने तो गेल्यावर, मग त्याचे चांगले गुण आपण गौरव करून सांगतो. आपले एवढे मोठे  मन  का बरं नसावं, की आपण एखाद्याला त्याच्यासमोरच कौतुकाचे शब्द ऐकवावे.

—–विशेषे करून आपण बायका,समोरच्या बाईंचे कौतुक जरा हात राखूनच करतो ना?

काय हरकत आहे हो लगेच असं म्हणायला , की  “ अग, किती सुंदर आहे ही तुझी साडी,

अगदी मस्त दिसतेय तुला.” 

—–का नाही पटकन आपण म्हणत,  “  किती ग मस्त केलेस तू वडे. अगदी अन्नपूर्णा आहेस बघ. “ 

—–पण सहसा हे लोकांच्या हातून होत नाही.—हे फक्त बायकांच्याच बाबतीत नाही मला म्हणायचे, तर पुरुष मंडळीही याला अपवाद नाहीत. ऑफिसमध्ये, कनिष्ठ पदावरच्या  माणसाला  प्रमोशन मिळालं , तर खुल्या दिलाने त्याचे कौतुक किती सहकारी करत असतील? फार कमीच.

—–ही वृत्ती लहान मुलांतही असतेच. पण पालकांनी त्याला खतपाणी घालता कामा नये. पहिल्या आलेल्या मुलाचे खुल्या दिलाने अभिनंदन करायला मुलांना आईवडिलांनी शिकवले पाहिजे.

 —– सुंदर दिसणाऱ्या मुलीचे आपण कित्तीतरी वेळा मनातल्या मनात कौतुक करतो. 

पण मग तिला तसे प्रत्यक्ष जाऊन सांगत का नाही ?–की, “ अग, किती छान दिसतेस तू.

तुझा चॉईस खूप छान आहे, तुला  कपड्यातले खूप छान कळते ग. माझ्या बरोबर येशील का खरेदीला? “ —बघा किती आनंद होईल तिला.

—–सुनेने एखादा पदार्थ खरोखरच सुंदर केला, तर द्यावी ना सासूबाईंनी दाद की “ किती चव आहे ग तुझ्या  हाताला. मस्त केलेस हो हे. ”

—–आनंद, हा कौतुक केल्याने  द्विगुणित होतो— आम्ही पुण्याच्या प्रख्यात हुजूरपागा शाळेत  शिकलो. मुख्याध्यापक बाईंच्या त्या ऑफिसमध्ये जायचीही भीती वाटायची तेव्हा, इतका त्या खुर्चीचा दरारा होता. पुढे फार वर्षांनी माझी मामेबहीण  हुजूरपागेची मुख्याध्यापिका  झाली. इतके कौतुक वाटले ना तिचे. तिला भेटायला आणि तिचे कौतुक करायला, तिला न कळवता आम्ही बहिणी शाळेच्या ऑफिसमध्ये गेलो. म्हटले, “ आमची बहीण कशी दिसते या खुर्चीत, ते बघायला आलोय आम्ही .”  त्यावेळी तिचे आनंदाने भरून आलेले डोळे आजही आठवतात.

—–पाठीवर दिलेली कौतुकाची थाप तर आपल्या कुत्र्यालाही आवडते. मग आपण तर माणसे—का नाही समोरच्याचे वेळीच कौतुक करू? चार चांगले शब्द काय जड होतात का हो उच्चारायला?

—–या वरून आपल्या लाडक्या सुधा मूर्ती आठवतात.–तळागाळातील बायकांशी मैत्री करून, त्यांची सुखदुःख्खे जाणून घेऊन, त्यावर उपाय शोधून, पुन्हा कुठेही मोठेपणाची हाव न धरणाऱ्या सुधाताईंचे किती कौतुक करावे—-समाजाने वाळीत टाकलेल्या बायकांनी केलेल्या सुबक गोधड्या बघून, त्यांचे मन भरून कौतुक करणाऱ्या सुधाताई नुसत्या तेवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांना त्या विकायला त्यांनी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. ,मान खाली घालायला लावणारा त्यांचा व्यवसाय त्यांना सोडायला लावून, नवीन दिशा दिली. आणि यातूनच, “ तीन हजार टाके ” हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक जन्माला आले.—–असे निरपेक्ष मोठे मन  आपण किती लोकांकडे बघतो?  फारच कमी. खरं  तर आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करत, आपणही खुल्या दिलाने इतरांचे कौतुक करायला शिकले पाहिजे.

—–मी मुलीकडे हॉंगकॉंग ला गेले होते. तिकडे फिरत असताना , आम्हाला बाबा गाडीत आरामात बसलेली  दोन इतकी गोड बाळे दिसली ना—–मला लहान मुले अतिशय आवडतात. त्यातून ही गुबगुबीत आणि गोंडस जुळी मुले तर मिचमिचे डोळे करून आमच्याकडे बघत होती. मी त्यांच्या आईला विचारले, “ मी बोलू का यांच्याशी? ” ती हसली आणि म्हणाली,” हो, बोला की. पण ती चावतात बर का. जपूनच बोला. ” मी गुढग्यावर बसले, आणि चक्क मराठीत बोलू लागले त्या गोड बाळांशी. ती दोघेही जोरजोरात दंगा करायला लागली, आणि हात पसरून माझ्याकडे झेप घेऊ लागली. त्यांच्या आईला खूप मजा वाटली. किती अभिमानाने ती आपल्या गोड बाळांकडे बघत होती —–

—–प्रेमाला भाषा नसते हो—फक्त तुम्ही ते व्यक्त करा, ते समोर पोचते लगेच.

—– माणूस जिवंत असतानाच दाद द्या,

—–चार शब्द कौतुकाचे बोला,

—–तो माणूस शहरातून बदलून गेल्यावर, किंवा दुर्दैवाने या जगातूनच निघून गेल्यावर, मग हळहळून काय उपयोग ?

—–आपल्या भावना लगेचच पोचवायला शिका.  वेळ आणि वाट नका बघत बसू. 

 कारण नंतर कितीही हळहळूनही , गेलेली वेळ परत येत नसते. मग आपल्या हातात, 

“ अरेरे।” असं म्हणत पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही उरत नाही.

—–मंडळी चला तर मग —करा सुरुवात दिलखुलास दाद द्यायला,—न कचरता.

आणि बघा,  समोरचाही किती खुश होतो,  आणि तुमचाही दिवस किती सुंदर जातो ते।।।

© डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ Speak up before you give up  – सुश्री वृषाली दाभोळकर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ Speak up before you give up  – सुश्री वृषाली दाभोळकर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

Speak up before you give up – 

‘डिप्रेशन‘  या विषयावर आपण सध्या बऱ्याच पोस्ट वाचतोय. मीही आज माझा अनुभव शेअर करतेय – वयाच्या १९ व्या वर्षी मी सरकारी नोकरीत रुजू झाले आणि ३९ वर्षे सर्व्हिस करून जानेवारी २०२०मधे स्वेच्छानिवृत्ती घेतली. माझी पोस्ट Clerical. पण मला बरीच वर्षे माझ्या पोस्ट पेक्षा अधिक जबाबदारीचे काम करण्याची संधी मिळाली e.g. GM/DGM Secretariat. 

ऑफिस मधील बहुतेक सर्व कमिटीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सर्व काही छान चालले होते. ऑफिसमधील वेगवेगळ्या सेक्शनमधील कामाचा अनुभव मी घेतला. क्रेडिट सोसायटी, युनियन सर्वच ठिकाणी मी अॅक्टिव होते. थोडक्यात ऑफिस हेच आयुष्य बनले होते.

५-६ वर्षापूर्वी माझ्या मुलाला डेंग्यू झाला. तो ठाण्यात हॉस्पिटल मधे अडमिट होता. प्लेटलेट्स कमी होत होत्या, काळजी वाढत होती. मी त्याच्याबरोबर होते आणि त्याचदरम्यान माझी बदली  त्याच बिल्डिंगमधे एका अश्या ठिकाणी झाली/केली गेली ज्याची मी कधी अपेक्षाच केली नव्हती. एक आऊटसोर्स  केलेले डिपार्टमेंट  पुन्हा ताब्यात घेऊन तेथे स्टाफची नेमणूक करण्यात आली होती. सरकारी खात्यात असलेल्या सर्व असुविधा तेथे होत्या. गेट जवळील वॉचमनरूमशेजारील छोटी रूम, पत्र्याची शेड, डासांचे साम्राज्य…. १५-२०दिवसानंतर मुलाची तब्बेत सुधारल्यावर मी ऑफिसला नवीन सेक्शनमध्ये जॉईन झाले.  ऑफिसवर/तिथल्या कामावर मनापासून प्रेम होते त्यामुळे कामात लक्ष नसणे/चुका होणे असे कधी सुदैवाने झाले नाही, किंवा ऑफिसला जाऊ नये असेही कधी वाटले नाही. पण मनावर कुठेतरी खोलवर परिणाम झाला होता. घटना छोटीशी असते —आता कुणीही म्हणेल की सरकारी खात्यात एका डिपार्टमेंटमधून त्याच बिल्डिंगमधे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदली यात काय विशेष? अगदी खरंय… मला हेच तर सांगायचे आहे. एखादी छोटीशी घटना तुमच्या मनाला किती खोल जखम करून जाईल सांगता येत नाही. ऑफिसचे काम व्यवस्थित चालू होते त्यामुळे कुणालाही माझ्या मानसिक स्थितीचा अंदाज येणे शक्य नव्हते. मलाही नक्की काय होतंय हे समजत नव्हते. सतत कुठलातरी अवयव दुखायचा, कधी पाठ तर कधी हात.. डॉक्टरच्या फेऱ्या– पण टेस्टचे रिपोर्ट मात्र नॉर्मल. आजार शरीराला नाही तर मनाला झालाय हे समजतच नव्हते. रात्रीची झोप येत नव्हती, बेचैनी वाढत होती. कुठल्याही गोष्टीचा आनंद वाटेनासा झाला होता. दरम्यान मुलाने आणि सुनेने पवईसारख्या एरियात फ्लॅट घेतला, होंडा कार  घेतली. खरंतर किती आनंदाचे प्रसंग ! माझ्या डोक्यात मात्र निगेटिव्ह विचारांनी थैमान घातले होते. हे काहीतरी वेगळे आहे हे माझ्या लक्षात येऊ लागले होते, पण उपाय सापडत नव्हता. काहीच दिवसात परिस्थिती आणखी बिघडली – मी ९ व्या मजल्यावर राहते. घराला दोन टेरेस.  मला असे वाटू लागले की मी आता टेरेसमधून खाली उडी मारणार…. खूप भीती वाटायची, मी टेरेसची दारे बंद ठेवू लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी ऑफिसला अगदी नेहमीप्रमाणे टापटीप, छान साड्या/ड्रेस घालून जात होते, काम अगदी व्यवस्थित करत होते.  त्यामुळे माझ्या मनात काय चालले आहे हे कुणालाही समजत नव्हते. दरम्यान मी ठाण्याला माझ्या विहीणबाईंकडे गेले असता त्यांच्याशी बोलले. त्यांनी डॉ आनंद नाडकर्णी यांच्या IPH (Institute of Psychological Health)  या  संस्थेतील डॉ कवलजीत यांची अपॉइंटमेंट घेतली. आम्ही डॉक्टरांची भेट घेतली. कवलजीताना  माझी मातृभाषा समजत नव्हती,  पण माझ्या मनाचा आजार समजला होता. त्यांनी मला या आजारा – विषयी संपूर्ण माहिती सांगितली व तो लगेच बरा होणार नसल्याचेही सांगितले. औषधे सुरू झाली. प्रश्न होता तो मी हा आजार स्वीकारण्याचा . जसा शरीराला आजार होतो तसा आपल्या मनाला झालाय आणि यातून आपल्याला यशस्वीपणे बाहेर पडायचे आहे हे मनाला आणि मेंदूलाही पक्के समजावले. या आजाराशी लढताना मला माझ्या कुटुंबाचीपण खूप चांगली साथ मिळाली. माझ्या डोळ्यातून अनेकदा वाहणाऱ्या अश्रूंचा अर्थ त्यांना समजू लागला होता. टीव्हीवर हाणामारीचे किंवा दुःखाचे प्रसंग दिसताच चॅनल बदलले जाऊ लागले होते. माझ्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली. ७-८ महिन्यानंतर ३ गोळ्यापैकी २ गोळ्या बंद झाल्या. दरम्यानच्या काळात मी पुण्यातील IPH मधेही ट्रीटमेंट घेतली– आता गाडी पूर्वपदावर आली आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेऊ लागले आहे. सकाळी चहा पिणे , पेपर वाचणे तर संध्याकाळी सूर्यास्त  बघणे असा माझ्या टेरेसचा मनसोक्त आनंद घेत आहे. माझ्या आयुष्यातील आनंद परत मिळवून दिल्याबद्दल डॉ आनंद नाडकर्णी आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार. अर्थात या आजारावर आपल्याला मात करायची आहे या माझ्या मनाच्या निग्रहाचीही खूप मदत झाली. एवढं सगळं लिहिण्याचा उद्देश हाच की साधारणपणे हा आजार दडवून ठेवण्याची मानसिकता असते. समाज काय म्हणेल त्याचे भय असते. कुटुंबाकडूनही– दुर्लक्ष कर, लोकांच्यात मिसळ, हसत राहा, छंदात मन रमव– असे सल्ले दिले जातात आणि उपचार घेण्याचे टाळले जाते. मी खरंच सांगते, त्या मानसिक अवस्थेत हे कुठलेही सल्ले मेंदूपर्यंत पोहोचतच  नाहीत तर उपयोगी कुठून पडणार? हे सारे लाभदायक ठरते ते मानसिक अवस्था सुधारल्यानंतरच. साधारणपणे सेलिब्रिटीज,राजकारणी , प्रसिद्ध खेळाडू, श्रीमंत वर्गातील लोक या आजाराचे शिकार होतात असे समजले जाते. तसेच, डिप्रेशन  कर्जबाजारी झाल्यामुळे, प्रेमभंग झाल्यामुळे किंवा मोठ्या अपयशामुळे येते असेही नाही. तेव्हा कृपया आपल्या वागण्यात काही बदल झालाय का, आपण उगाचच इमोशनल होतोय का, काहीतरी आपल्या मनाला बोचत आहे का याकडे लक्ष द्या, वेळीच जवळच्या व्यक्तीजवळ बोला, दुर्लक्ष करू नका किंवा समोरची व्यक्ती आपल्याला काही सांगत असेल तर त्याकडेही नक्कीच दुर्लक्ष करू नका. कदाचित तिला तुमच्या मदतीची गरज असेल. मुख्य म्हणजे गरज पडल्यास ट्रीटमेंट जरूर घ्या, टाळाटाळ करू नका. आयुष्यापेक्षा काहीही महत्वाचे नाही. डिप्रेशन मधून तुम्ही नक्की बाहेर येऊ शकता हे मी माझ्या अनुभवावरून सांगते.

माझी ही पोस्ट वाचली की काहीजण  मला कदाचित बिचारी म्हणतील, यापुढील काळात माझ्या एखाद्या वाक्याचा/वागण्याचा माझ्या डिप्रेशनशी संबंध लावला जाईल. पण मला ते महत्वाचे मुळीच वाटत नाही.  उलट या पोस्टचा एखादया व्यक्तीला जरी फायदा झाला तरीही ती या एवढ्या मोठ्या पोस्टची अचिव्हमेन्ट असेल.

ले : सुश्री वृषाली दाभोळकर

प्रस्तुती – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाण्यातले भाऊजी ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

अल्प परिचय 

निवेदिका, लेखिका, कवयित्री, समाजसेविका, व्याख्याती.

विविध दैनिके मासिके यातून लेखन. ” नैमिषारण्य सुरम्य कथा  पुस्तक लिहिले आहे.

संस्कार भारती, साने गुरुजी कथामाला, सखी संवादिनी, वगैरे संस्थावर पदाधिकारी.

? मनमंजुषेतून ?

☆ पाण्यातले भाऊजी ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

—-गौरी-गणपतीचे दिवस, आईची देखणी पूजा, पुरणावरणाचा साग्रसंगीत स्वयंपाक, आम्हाला सर्वांना  वात्सल्याने ओवाळणं, भावुक होऊन दाराच्या दिशेने अक्षता टाकून” पाण्यातले भाऊजी, जिथे असाल तिथे सुखात रहा” असं पुटपुटणं आणि नंतर त्या भाऊजींची कथा सांगणं सारं सारं आठ वतं. सांगतेच सख्यांनो तुम्हाला.

माझ्या आईचा जन्म 1921 साल चा. अत्यंत देखणी, समजुतदार, सासरी माहेरी सर्वांची लाडकी. तेराव्या वर्षीच लग्न होऊन सासरी आली. घरात प्रेमळ पण करारी सासुबाई , शिस्तीचे भोक्ते व सदैव देव धर्मात रमलेले दीर, कष्टाळू जाऊ व एक तिच्याच वयाचे दीर होते. त्यांचे नावही माहीत नव्हते पण बरोबरीचे असल्यामुळे तिला ते जास्तच आवडत. ते कुणाशीही बोलत नसत. जणु मुकेच होते. पण ते तासनतास देवघरात रमत.  स्तोत्रे म्हणत. देव त्यांच्याशी बोलतही होते म्हणे. एकदा ते देवघरातून बाहेर आले आणि मोठ्याने म्हणाले

” आता नदीला पूर येणार आणि आम्ही  जाणार.” ते छान पोहत असत. सर्वांना वाटले  ते पुराचे पाणी बघायला आणि पोहायला जाणार.

गणपती बसले. गौरी  आवाहनादिवशी आजीने आईला सांगितले ” संध्याकाळी शेजारच्या बायकांबरोबर पूजेचे साहित्य घेऊन खड्याच्या गौरी घेऊन ये. तुझ्या पाठी मागे तुझा लाडका दिर घंटा वाजवत येईल. दारात आल्यावर तुझी मोठी जाऊ पायावर दूध-पाणी घालेल. शुक्रवारी बसवलेली सुगडाची गौर तुझ्या गौरी ला भेटवेल. घरात सगळीकडे हळदीकुंकवांनी गौरीची पावले काढलेली असतील. त्यावर पावले टाकीत ये. प्रत्येक खोलीतून तुझ्या गौरीला फिरवून आण. ती पाहुणी आलेली असते. प्रत्येक पाऊल टाकताना म्हणायचे

” गौर आली गौर.” आम्ही विचारू 

” कशाच्या पावलांनी” तू म्हणायचे” सोन्या रुप्याच्या पावलांनी ” गौरीला सगळे घर दाखवायचे व विचारायचे ” इकडे काय आहे?” मग जाऊ सांगेल” इकडे देवघर आहे,  इकडे स्वयंपाक घर आहे,  इकडे कोठीची खोली आहे, इकडे माजघर आहे ,इकडे न्हाणीघर आहे.” असे  सगळे घर दाखवून देवघरात पाटावर दोन्ही गौरींना शेजारी बसवायचे. साग्रसंगीत पूजा करायची शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवायचा.”

आई आनंदाने संध्याकाळी शेजारणीं बरोबर छोट्या दीरासह गेली. नदीला भयानक पूर आलेला होता. सुरक्षित ठिकाणी सगळ्यांनी पूजा केली. स्वच्छ घासलेल्या तांब्यात 5 खडे, गौरीच्या झाडांचे फुलासकट  लांब तुरे , मोठमोठ्या दुर्वा, आघाडा , कडेने चाफ्याची पाने  लावून नदीच्या पाण्याने तांब्या भरला. त्याला बाहेरून ओल्या हळदीची व कुंकवाची बोटे रेखून छान सजवला. मनोभावे पूजा करून सगळ्याजणी घराकडे निघाल्या. प्रत्येकीच्या मागे कोणीतरी घंटा वाजवत येत असे. आईच्या मागे तिचे भाऊजी येणारच होते. सासूबाईंनी बजावून सांगितले होते ” गौरी घेवून सरळ घरी यायचे. मागे वळून पाहायचे नाही.” त्याप्रमाणे आई आली. जाऊ बाईंनी पायावर दूध-पाणी घालून सुगडाची गौर भेटवली.” जेष्ठा कनिष्ठा” घरभर फिरून देवघरात स्थानापन्न झाल्या. पूजा नैवेद्य आरती झाली.

जेवायला पंगत बसली. धाकटे भाऊजी कुठेच दिसेनात. तोपर्यंत सर्वत्र अंधार दाटला होता. त्यावेळी गावात वीज आलीच नव्हती. बत्तीच्या उजेडात सारेजण शोधायला बाहेर पडले. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पुरात उड्या मारल्या. नावाड्याने खूप शोधाशोध केली. पण काही उपयोग झाला नाही. भाऊजी दिसलेच नाहीत.

आधीच अबोल असलेली आमची आजी पार मुकीच झाली. पण तिला आपले बाळ परत येईल अशी शेवटपर्यंत आशा होती. दुसर्या दिवशी तिने पुरणावरणाचा स्वयंपाक केला. सर्वांना ओवाळले. शेवटी दाटल्या गळ्याने तिने दाराकडे अक्षता टाकून आपल्या बाळाला औक्षण केले व म्हटले

” औक्षवंत हो बाळा. कुठे असशील तिथे सुखात रहा.”

तिचे बाळ कधीच परत आले नाही. पण माझी आई मात्र दर श्रावण शुक्रवारी व गौरजेवणादिवशी दाराबाहेर अक्षता टाकून औक्षण करायची व म्हणायची

” पाण्यातले भाऊजी , औक्षवंत व्हा. जिथे असाल तिथे सुखात रहा .”

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

मी लहान असताना आमच्या शेजारच्या घरमालकीण (जिला सगळे नानी म्हणत) त्या माझ्या नानीची ही एक आठवण. एकंदरीत चार भाडेकरूंची मालकीण होती तरीही ती घरातली सगळी कामं स्वतःच करायची आणि ते ही अगदी आत्मीयतेनं. आपण शिकलो नाही पण मुलांना शिकवायचंय तर पैसा साठवायला हवा ही जाणीव तिला होती. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे नानीच्या मनासारखी स्वच्छता, टापटीपपणा दुसऱ्या कुणाला जमणं अवघडचं.  स्वच्छतेचं तिला व्यसन होतं असं म्हटलं तरी चालेल. याची छोटी झलक तिच्या भांडी घासण्यात दिसायची. 

रोज रात्री अंगणात गोष्टी ऐकायची आमची वेळ आणि भांडी घासण्याची नानीची वेळ एकच असायची. त्यामुळे गोष्टीला आपोआपच बॅकग्राऊंड म्युझिक मिळायचं. अजूनही ते दृश्य लख्खं आठवतं. रात्रीचं जेवण झालं की नानी भांड्यांचा ढिगारा घेऊन अंगणात यायची. ढिगाराच असायचा. कारण एक तर माणसं जास्त असायची आणि त्यात नानीचं शाकाहारी जेवण आणि इतरांचं मांसाहारी जेवण यांची भांडी वेगळी असायची. मागच्या अंगणात दोन सार्वजनिक नळ होते त्यातल्या एका नळावर नानीचं भांडी घासण्याचं काम चालायचं. नानी भांडी घासता घासता गोष्टीत रस दाखवायची आणि मी तिच्या भांडी घासण्यात. 

कधीकधी गोष्ट नसेल तर माझ्या आणि नानीच्या गप्पा सुरू व्हायच्या. नानीला बोलायला खूप लागायचं. ती मला बोलतं करायची. शाळेतली एखादी गोष्ट सांग, अभ्यास केला का सांग, किंवा अजून काही खेळातली गंमत, मैत्रिणीशी भांडण झालं असेल तर असं सगळं काही त्या भांडी घासण्याच्या कार्यक्रमात बोलणं व्हायचं. 

पण कधीकधी तिचा मूड नसायचा. तेव्हा मी विचारायचे… 

“नानी आज तू बोलत का नाही?” 

“दमले आज मी”.  

“मग मी करते ना तुला मदत”.  

“कशाला पुढं बाईच्या जन्माला हे करावं लागतंच. आतापासून नको. त्यापेक्षा तू श्टोरी सांग.”

आणि मग मी तिला गोष्ट सांगायचे. पण माझं लक्ष गोष्टीपेक्षा नानीच्या भांडी घासण्यात अधिक असायचं. एकंदरीतच ती ज्या पद्धतीनं भांडी घासायची ते पाहून असं वाटायचं नानीचा या भांड्यांवर खूप जीव आहे.

एखादा माणूस पूजा जेवढ्या भाविकतेनं करतो ना तसं नानी भांडी घासायची. पूजेचं कसं एक तबक असतं… त्यात फुलं-पत्री, हळद-कुंकू आणि पूजेचे इतर साहित्य ठेवलेलं असतं तसं नानींच भांडी घासण्याचं सामान एका ताटलीत नीट ठेवलेलं असायचं. (हा! नानीच्या कुठल्याही अशा सामानाला हात नाही लावायचा नाही तर मग काय खरं नसायचं.) नारळाच्या शेंड्या, भांडी घासायची राख, चिंचेचा कोळ, थोडं मिठ  आणि एका मोठ्या भांड्यात गरम पाणी. असा सगळा जामानिमा घेऊन, नानी त्या त्या भांड्यांना त्या त्या पद्धतीनं स्वच्छ करायची. कुठलं भांडं, कसं साफ करायचं, तसंच का साफ करायचं अशा माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीला ती प्रेमानं तोंड द्यायची. आणि भांडी धुऊन झाली की त्यातलंच एक स्वच्छ ताट, मला देऊन म्हणायची,  

“बघ बरं, यात तुझा चेहरा सपष्ट दिसतो का?”

मी ते ताट हातात घेऊन चेहरा बघायचे आणि ‘हो’ म्हणायचे. मग नानीचा चेहरा खुलायचा. तेव्हा मला याची गंमत वाटायची. पण आज कळतंय तिला दिवसभराच्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटत असेल. 

लॉकडाऊनच्या काळात भांडी घासताना नानीची नकळत आठवण आली तशी मी लहान होऊन पुन्हा नानीच्या अंगणात गेले. नानीशी आणि तिच्या भांड्यांशी संवाद साधू लागले.

भांडी

किती निगुतीने घासत असते बाई

आपल्या घरातली भांडी, 

ती भांडी म्हणजे केवळ वस्तू नसतात; 

तर त्या असतात घरातल्या माणसांच्या ‘तृप्ततेच्या खुणा’. 

म्हणूनच माणसांच्या तऱ्हांप्रमाणेच ती ओळखत असते भांड्यांच्या ही तऱ्हा. 

त्यांच्या नितळतेसाठी चांगल्यातला चांगला साबण आणि चरा पडू न देणारी घासणी वापरते.

खरकटं काढून, स्वच्छ आंघोळ घालून, सुगंधी साबणाने घासून, धुवून काढते.

आणि काही वेळासाठी का होईना पण त्यांना पालथं निजवते.

दूध, तेल, तूप, या स्निग्धता जपणाऱ्या भांड्यांवर तर खास जीव तिचा.

ऊन ऊन पाण्याने त्यांचे सर्व अंग शेकून त्यांच्या ओशटपणाचा थकवा ती घालवून टाकते.

इतकंच काय, तिला माहीत असतात तांब्या-पितळ्याच्या भांड्यांच्याही व्यथा.

म्हणूनच त्यांना हाताळताना ती बोटभर का होईना चिंच आणि मीठ यांनी त्यांची दृष्ट काढते. 

मग त्यांच्या तेजस्वी रुपाने स्वतः च झळाळून उठते. 

किती निगुतीने घासत असते बाई, 

आपल्या घरातली भांडी, 

जाणून त्यांच्या तऱ्हा.

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली ☆ संग्रहिका – प्रस्तुति – कालिंदी नवाथे

? मनमंजुषेतून ?

☆ हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली ☆ संग्रहिका – प्रस्तुति – कालिंदी नवाथे ☆ 

 

लग्न पूर्ण ठरेपर्यंत 

स्पर्शाचा गंधही नव्हता.. 

नुकत्याच ठरलेल्या लग्नाला 

स्पर्श मंद मंद स्पर्शत होता .. 

 

जातायेता वाऱ्याने उडलेला पदर

गुदगुल्या करायचा .. 

चहाच्या कपाची देवाणघेवाण

हळूच बोट धरायचा . 

 

रस्त्याने चालताना समोरून येणारी गाडी 

खांदा धरायला भाग पाडायची 

ती रुतलेली बोटं 

काळजापर्यंत भिडायची .. 

 

हॉटेलमध्ये समोरासमोर बसल्यावर

नजरेला नजर स्पर्श करायची .. 

टेबलाखाली लपलेली पावलंही 

अडसर दूर करुन पावलाला बिलगायची .. 

 

मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध

केसांनाही स्पर्शुन जायचा .. 

मानेवर ओघळलेल्या फुलाला नव्हे मानेला 

हात लावण्याचा मोह व्हायचा .. 

 

वाऱ्याने उडलेलं पान 

हळूच गालावर पडायचं .. 

पान सुकलेलं असलं तरी 

त्या दोघांच प्रेम हिरवगार  व्हायचं .. 

 

तरल कोमल अशा भावनांनाच 

स्पर्शाचं भान होत .. 

कळतनकळत एकरूप होण्याचं 

अनावर स्वप्न होतं .. 

 

हळूहळू जोपासलेल्या या नात्याला 

एकमेकांच्या संमतीची साथ होती .. 

नाती आयुष्य संपेपर्यंत टिकवण्याची 

ती अलिखित नियमावली होती .. 

 

हे सगळे पुन्हा आठवले 

आजकालचे स्पर्श पाहून .. 

नजाकत त्यातली संपली .. 

याने दाटून आले काहूर .. 

 

झटपट आयुष्यामधे 

नात्यात फक्त झटापट उरली .. 

प्रत्येक कृतीला भावनांची जोड हवी  

हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली .. 

 

||  हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली..||

 

अनामिक……

प्रस्तुति –  कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares