मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मन – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ मन– – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

.. मन हे माणसाचं सर्वात सूक्ष्म आणि शक्तिशाली साधन आहे.

.. ते दिसत नाही पण आपल्या प्रत्येक विचारामागे निर्णयामागे आणि कृतीमागे मनच असतं.

.. मन शांत असेल तर जग सुंदर वाटतं आणि मन अस्थिर असेल तर सर्व काही अस्थिर वाटू लागते.

.. मनाला सतत काही ना काही हवं असतं. कधी आनंद, कधी मान, कधी अपेक्षा..

.. पण हेच मन जर समजून घेतलं तर ते आपल्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकतं.

.. मनावर नियंत्रण ठेवणं सोपं नाही पण जागरूकता आणि स्वानुभवाने ते शक्य होतं.

.. मनाला जबरदस्तीने शांत करण्यापेक्षा त्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे.

.. जेव्हा आपण आपल्या विचारांकडे निरीक्षक म्हणून पाहतो तेव्हा मन हळूहळू स्थिर होतं.

.. राग, भीती, अपेक्षा हे सर्व मनाचेच खेळ आहेत.

.. शेवटी मन जिंकलं तर जग जिंकलं.

… म्हणूनच मनाशी मैत्री करा त्याला समजून घ्या आणि शांततेकडे वाटचाल करा.

मित्रांनो काळजी घ्या…

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टीका : एक अदृश्य मार्गदर्शक – –  ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ टीका : एक अदृश्य मार्गदर्शक – –  ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतं, तेव्हा सुरुवातीला मनाला थोडं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण याच टीकेकडे जर आपण वेगळ्या नजरेने पाहिलं, तर ती आपल्याला खचवण्यासाठी नाही तर सावरण्यासाठी आलेली असते हे लक्षात येतं.

शांतपणे विचार केला तर जाणवेल की ज्याच्याकडे काहीतरी विशेष आहे जो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावरच लोक बोट उचलतात. संथ पाण्यात कोणी खडा मारत नाही खडा तिथेच मारला जातो जिथे काहीतरी हालचाल होत असते. त्यामुळे टीका होत असेल. तर समजावं की आपली दखल घेतली जातेय आणि आपण कुठेतरी प्रगतीच्या वाटेवर आहोत.

कधीकधी हीच टीका आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करते. आपल्यातल्या उणिवा शोधून त्या सुधारण्याची एक सुवर्णसंधीच जणू समोर उभी असते. जर आपण टीकाकारांच्या शब्दांतून राग बाजूला काढून फक्त त्यातला ‘सार ‘ घेतला तर आपल्याला स्वतःला घडवणं अधिक सोपं जातं.

– – जगातील मोठ्या माणसांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांना मिळालेली निंदा आणि टीका त्यांनी कधीच मनाला लावून घेतली नाही तर ती पोटात पचवून स्वतःच्या ध्येयाकडे जाण्यासाठी इंधन म्हणून वापरली.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीकाकारांना शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा आपल्या शांततेने आणि कर्तृत्वाने उत्तर देणं जास्त प्रभावी असतं. जेव्हा आपण टीकेला उत्तर न देता आपल्या कामात अधिक झोकून देतो तेव्हा तीच टीका आपल्यासाठी एक ‘चॅलेंज ‘बनून उभी राहते. “ तुला हे जमणार नाही ” असं म्हणणाऱ्यांच्या समोर ‘ हे मी करून दाखवलंय ‘ असं सिद्ध करणं हीच खरी विजयाची पावती असते.

टीका ही धार लावणाऱ्या दगडासारखी आहे तो दगड तुम्हाला जखम करणार की तुमच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडणार. हे सर्वस्वी तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

– – त्यामुळे इथून पुढे जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करेल तेव्हा डगमगून जाऊ नका. उलट मनात म्हणा बरं झालं मला अजून चांगलं व्हायची प्रेरणा मिळाली ही वृत्ती एकदा अंगी बाणली की टीका तुमचं खच्चीकरण करू शकत नाही तर तुम्हाला अधिक कणखर आणि प्रगल्भ बनवते.

– – आयुष्याच्या या खेळात टीकाकार हे तुमचे शत्रू नसून तुम्हाला खेळात टिकून राहण्यासाठी आणि अधिक जोमाने खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे अदृश्य मार्गदर्शकच असतात.

मित्रांनो काळजी घ्या…

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “महिलांकडून शिकण्यासारखे…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “महिलांकडून शिकण्यासारखे…” ☆ श्री सुधीर करंदीकर

महिलांकडून खरंच खूप काही शिकण्यासारखे असते…

८ मार्चला आपण सगळ्यांनीच जागतिक महिला दिन खूप उत्साहात आणि आनंदाने साजरा केला.

महिलांकडून खूप काही शिकण्यासारखे असते, त्यांचे खूप काही गुण घेण्यासारखे असतात, हे आपण सगळे जाणतोच आणि याचा आपण अनुभव पण घेत असतो (मी तरी नक्कीच घेत असतो). देवाने पण आई, बहीण, बायको, मुलगी, आजी, पणजी, आत्या, मावशी, हे सगळे छान छान रोल पण बायकांकडेच दिले आहेत.

बायकांचा एक आगळावेगळा आणि चांगला गुण म्हणजे – 

बायका एकत्र जमल्या, कि, मनमोकळेपणाने खुल्या दिलाने फूल व्हॉल्युम मधे गप्पा मारणे आणि त्या पण फुल व्हॉल्युम मध्ये हसत हसत. यामुळे त्यांचं मन नेहमीच एकदम मोकळं आणि नितळ असतं. आणि तब्येत एकदम मस्त असते. 

परवा असंच मित्रांबरोबर या विषयावर गप्पा मारताना माझी एक जुनी आठवण ताजी झाली.

– – रिटायर झाल्यानंतर आम्ही दोघं मुलीकडे अमेरिकेला San Jose येथे गेलो होतो. अमेरिकेतली सगळी महत्त्वाची ठिकाणे बघण्याकरता तिने आम्हाला संपूर्ण ट्रॅव्हल ची बाय एअर / बाय रोड बुकिंग करून दिली होती, साईट सिईंग करण्याकरता तिथल्या एजन्सीची बुकिंग करून दिली होती, प्रत्येक ठिकाणी राहण्याकरता हॉटेल बुकिंग करून दिली होते, आणि बहुतेक ठिकाणी तिच्या ओळखीचे मित्र/ मैत्रिणी होते, त्यांचे फोन नंबर दिले होते. आणि या सगळ्यामुळे अमेरिकेसारखा अनोळखी देश आम्ही एकदम मजेत बघितला.

एकेक ठिकाण बघत बघत आमचा प्रवास छान सुरू होता.

एक महत्वाचे ठिकाण होते, नायगरा फॉल. जवळच्या एअरपोर्ट पर्यंत आमचे विमानाचे बुकिंग होते व तिथून साईट सिईंग करणारी टुरिस्ट बस पकडायची होती.

एअरपोर्टहून आम्ही टुरिस्ट बसच्या स्टार्टिंग पॉइंटला वेळेवर जाऊन पोहोचलो. भारतातून पुण्याची एक टुरिस्ट कंपनी लेडीजचा ग्रुप घेऊन तिथे आली होती. निरनिराळ्या देशातली पण काही स्त्री पुरुष मंडळी आली होती. बरोबर वेळेवर बस हजर झाली. दिलेल्या सीट नंबरप्रमाणे आम्ही सगळे बसमध्ये चढलो. तिथले लोकल गाईड पण जॉईन झाले. आणि नायगरा फॉलकडे आमचा प्रवास सुरु झाला.

गाईडनी सगळ्या प्रवाशांना कानाला लावायला इयरफोन दिले आणि स्वतः त्यांच्याकडे इयरफोन आणि माईक हे दोन्ही होते. गाईड जे माईक मध्ये जे बोलतील / ज्या सूचना देतील, ते सगळ्यांना तुम्ही जवळपास कुठेही हिंडत फिरत असाल तरी ऐकू येणार अशी कम्युनिकेशनची व्यवस्था होती. काही अंतर अलीकडेच एका ठिकाणी बस थांबली. शॉर्ट ब्रेकमध्ये चहापाणी – कोल्ड्रिंग झाले. नंतर गाईडने थोडे प्रास्ताविक केले.

गाईड : मी तुम्हाला नायगरा फॉलविषयी सगळी माहिती इथेच सांगणार आहे. कारण तिथे इतक्या उंचीवरुन आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी खाली पडतं असते, कि त्याच्या आवाजात जवळून दोन-तीन जेट विमाने गेली, तरी फॉलच्या आवाजामुळे विमानांचा आवाज ऐकू येत नाही. गाईडने नायगरा फॉल ची सगळी माहिती सांगितली, काही प्रश्नोत्तरे झाली, आणि आमची बस नायगरा फॉल कडे निघाली.

फॉल बघण्यासाठी आणि तो आवाज ऐकण्यासाठी आम्ही जास्तच उत्सुक होतो. तिथे पोचलो, नायगरा फॉल चे दृश्य एकदमच अप्रतिम आहे. मी व्हिडिओ काढत होतो पण फॉलचा म्हणावा तेवढा मोठा आवाज येत नव्हता. तेवढ्यात काही परदेशी प्रवाशांनी गाईडला हाताने खुणा करून सुचवले, की तुम्ही म्हणता तसा फॉलचा आवाज ऐकू येत नाहीये. गाईड च्या पण हे लक्षात आले आणि त्यांची ट्युब पेटली.

त्यानी कमरेला लावलेल्या माईक वरून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आणि अनाउन्समेंट केली. गाईड चक्क तुटक् – तुटक् मराठीमधे बोलत ह़ोते..

गाईड : मी सर्व भारतीय भगिनींना सौजन्य पूर्ण विनंती करतो कि, आपण इथे आहोत, तोपर्यंत त्यांनी आपापसातील गप्पा आणि मोठमोठ्याने हसणे थांबवावे, आणि शांतता पाळावी. भारतीयांच्या भाषेत तुम्ही तोंडावर बोट ठेवावे, फक्त कान आणि डोळे पूर्ण उघडे ठेवून या स्थळाचा आनंद घ्यावा आणि आपल्या सहकाऱ्यांना पण तो मनसोक्त घेऊ द्यावा.

गाईड काय बोलले हे परदेशी माणसांना समजले नाही, पण गाईडच्या बोलण्याचा अपेक्षित परिणाम झाला हे समजले. फॉलचा खरा आवाज आता ऐकू यायला लागला.

फॉलचा आवाज ऐकून सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला. सगळ्यांनी व्हिडिओ शूटिंग केले. दिलेली वेळ संपल्यानंतर गाईडने सगळ्यांना परत फिरण्याची खूण केली. सगळे बस जवळ जमा झालो. गाईडने अनाउन्समेंट केली – आता स्त्रियांनी तोंडावरचे बोट काढायला हरकत नाही…

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वाटी…!” ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “वाटी…!” ☆ शीला पतकी 

“अरे वाटीने दिल तर पाटीने गोळा करशील. ” हे आमच्या आजीचे दातृत्वाचे माप! मोलाचा विचार !!आज आपल्यातील थोडं जे आहे त्यातलं लोकांना दिलं तर पुढे जाऊन त्या पुण्य कर्मामुळे आपल्याला खूप काही मिळतं… साधी गोष्ट पण एका ओळीत सुंदर सांगितलेली.

वाटी हे आपल्या भोजनपात्रातले सर्वात लहान भांडे वाटीचे अनेक प्रकार आहेत. नैवेद्याची वाटी, आमटीची वाटी, भाताची मुद पाडायची वाटी, तुपाची वाटी, आमरसाची वाटी, श्रीखंडाची वाटी, दह्याची वाटी, या अशा अनेक वाट्यांना त्यातल्या पदार्थ प्रमाणे मानाचे स्थान असे. त्यांचाही थाट असायचा.. काही वाट्या चांदीच्या काही पितळेच्या नंतरच्या काळात स्टीलच्या जर्मनच्या पण वाट्या असायच्या पण त्या वापरत नव्हते. जगावर राज्य करायला निघालेल्या जर्मनच्या वाटीची अवस्था फारच वाईट होती. कुत्र्या मांजराला खाऊ घालण्याचे पदार्थ त्या वाटीत ठेवले जायचे ती जरा आकाराने मोठी असायची. मला त्या धातूला जर्मन असे का म्हणतात हेच कळत नाही. त्या काळात जर्मनची भांडी हलकी म्हणून प्रसिद्ध होती पण ती घरात वापरायला कोणी तयार नसे. हमालाचं काम करतानाही जगावर राज्य करण्याची महत्त्वकांक्षा बाळगणारा क्रूर माणूस म्हणजे हिटलर… किंबहुना क्रूरतेला हिटलर हा शब्द पर्यायी म्हणून दिला आहे. असो एकूण जर्मनच्या वाट्या फारशा वापरल्या जात नव्हत्या.

नैवेद्याच्या वाटीचे नशीब जोरदार… ती चांदीची, देवापुढे रोज ठुमकत जाऊन बसण्याचा मान तिला! तिच्यामध्ये असलेले पदार्थ म्हणजे केशर काजू बदाम मिश्रित शिरा, केशर घातलेल श्रीखंड तर कधी मस्त घट्ट बासुंदी कधी बेसनाचा लाडू, डिंकाचा लाडू, साखरभात अशा भारदस्त पक्वान्नाना त्या वाटीत सामावून घेण्याचा मान मिळायचा. बाकीच्या वाट्या आमटी भाजी इत्यादीसाठी असायच्या.

आमरसाच्या वाटीचे मात्र वैशिष्ट्य.. ती खास असायची. तिला आपला हा मध्यम आकार चालायचाच नाही. हाताची बोटे पसरल्यावर जेवढा आकार होईल त्यात मावणारी ती वाटी.. ही चांदीची वापरायची. आता मात्र ती स्टीलची असते. चांदीच्या वाटीतला तो आमरसाचा रंग मोठा देखणा दिसायचा.. ते उत्तम मॅचिंग होतं. वाटी पाहिल्यानंतर माणसाच्या जिव्हेला आवर घालणे अवघड असायचे.

तसेच आमटीच्या वाटीचा आकारही थोडा मोठाच असायचा कारण त्यामध्ये कधी चिंच गुळाची आमटी, कधी शेवग्याच्या शेंगाची आमटी, कधी कांद्याची आमटी, उपवासाची शेंगाची आमटी, नवीन मसाला केल्यावर उखळ धुतल्यावर केलेल्या पाण्याची.. मसाला आमटी, वड्याची आमटी, आणि हल्ली प्रसिद्ध असलेली बाजार आमटी – – आमटीचा भुरका मारला की त्या आमटीने माणसाचा मेंदू तरतरीत होत होता.

उसनवारीचा व्यवसाय केला तो वाटीनेच… वाटीभर साखर, वाटीभर डाळीचे पीठ, वाटीभर डाळ, वाटीभर तांदूळ, वाटीभर तेल, ही सगळी उसनवारी या वाट्याच्या माध्यमातून होत असे.

लहान मुलांना तरी वाटीत काहीतरी घालून बसवले.. अगदी चुरमुरे वगैरे कि ती खात निवांत बसायची आणि आईचे काम व्हायचे.. ! शाळेतून आल्यानंतर आईने वाटीत काहीतरी खायला दिले की आनंद व्हायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत केली जाणारी भेळ वाटी वाटीतूनच वर्तमानपत्राच्या कागदावर वाटली जायची. चाळ आणि वाडे यांच्यातील घराघरामधील स्नेह वाढवण्याचे काम या वाटीनेच केले आहे. भाजी आमटी चांगली झाली की शेजाऱ्याकडे ती वाटी जायची किंवा काही खास वेगळे केले तरी वाट्यांची देवाण-घेवाण व्हायची शेजाऱ्याकडे दिलेली वाटी कधीही रिकामी परत येत नसे, आणि आतासारखे चार दाणे साखर टाकून देण्याचा जमानाही नव्हता. त्यामध्ये पुन्हा घसघशीत पदार्थ घालून ती वाटी परत केली जात असे. माझ्या शेजारी असणाऱ्या एका कुटुंबातील मुलगी माझ्या आईच्या हातच्या आमटीसाठी हट्ट धरून बसायची. तिच्या आईला संकोच वाटायचा की रोज काय त्यांच्याकडून आमटी आणायची. माझी आई म्हणायची ‘अगं नेत जा.. मला नाती सारखी आहे ती ‘. पण त्यांनी एक युक्तीच केली आमच्या घरची वाटी घेऊन जाऊन त्यात ते त्यांच्या घरची आमटी घालून ठेवत आणि मग ती आमटी बाईंनी तुला दिली आहे असे सांगितले की ती खुश व्हायची आणि आईला म्हणायची, ” बघ बाईच्या हाताची आमटी किती सुंदर होते “– ही फसवा फसवी तिच्या आईने किती तरी दिवस केली होती. अशी ही गंमत.

या वाटीने सकाळी नळावर झालेली कडाक्याची भांडणे क्षणात विसरून जाऊन बायका पुन्हा चार वाजता गप्पा मारण्यासाठी एकत्र यायच्या. हे वैशिष्ट्य चाळ आणि वाड्यातच पाहायला मिळणार. नळावरची भांडणं त्या वाटीतून कधी बादली, घागरी पर्यंत पोहोचली नाहीत. ते सगळे विचार.. नाराजी वाटीमध्ये विरून जायची !

लग्नात या वाटीचे महत्त्व फार मोठे. मधुपर्कच्या एका विधीला जावयाला चांदीची वाटी देत असत. तसेच संक्रांतीला चांदीच्या वाटीत हलवा घालून जावयाला आहेर करायची पद्धत होती. भाच्याला पहिला दात समोरचा आला तर चांदीची वाटी मामाने आणून मारायची अशी पद्धत होती.. मारायची म्हणजे त्याला आहेरच करायचा. पूर्वी चांदीच्या वाटीचा आहेर करीत असत. बारशाला वाटी चमचा असा आहेर व्हायचा.. आहेरात चांदीची वाटी देणे याला खूप महत्त्व होते. बायका हिंगाच्या डबीत पैसे साठवून एक एक चांदीची वाटी जमा करीत असत. चांदीची वाटी, चांदीचं ताट, चांदीचे ताम्हण हे त्या घराचं वैभव बायकांच्या हिंगाच्या बचतगटाच्या डबीतून आलेलं आहे. आहेरात चांदीची वाटी दिली तर देणाऱ्याचा मान वाढत असे.. “अग बाई चांदीची वाटी का दिली… ” असे कौतुकही होत असे

माणसांच्या संभाषणात सुद्धा वाटीला अनन्यसाधारण महत्त्व होतं. उदाहरण पहा… “वाटीभर रक्त आटवलं याच्यासाठी पण काही उपयोग झाला नाही” यासारख्या वाक्याने वाटीला एक साहित्यिक महत्त्व आलं आहे. तिला ताटाची जोड मिळाली ना की मग तिचं सौभाग्य फुलते. पूर्वी ताटवाटीचा आहेर करायचे – – एकूण आपल्या संस्कृतीत जोडी असणे याला खूप महत्त्व आहे… वाटीतलं ताटात सांडले तर काय बिघडतं… वाटीतलं ताटात काय आणि ताटातलं वाटीत काय… इत्यादी म्हणजे थोडक्यात आपल्या माणसासाठी हे सगळं आहे असं सांगण्याचा तो उद्देश आहे.. त्याला दिले तर काही बिघडत नाही.

– अशा अनेक साहित्यिक वाक्यांमध्ये वाटीला स्थान आहे.

सर्वांना समान वाटणी करण्याची पूर्वी पद्धत होती, म्हणजे अगदी द्राक्ष आणली तरी प्रत्येक मुलाला सहा- सहा आठ आठ अशी मोजून द्राक्ष वाट्यात घालून दिली जात असत. (पूर्वी द्राक्ष दुर्मिळ होती) वाटीत कोणाला तरी गुपचूप काढून ठेवून देणे हे त्याच्यावर असलेल्या मायेच प्रतीक होतं. सुनबाई जर सासूबाईंना म्हणाल्या, ” आई आहो तुम्ही देवळात गेला होता ना म्हणून यांनी आणलेली बर्फी मी तुमच्यासाठी वेगळी काढून वाटीत ठेवली आहे “… सासुबाई सुखावून जातात… ! गपचूप काढून ठेवलेल्या वस्तूंचे महत्त्व विरोधी गटातही प्रेम वाढवण्यासाठी उपयोगी ठरले आहे.

चांदीच्या वाट्या कपाटात असतात. पितळेच्या वाट्या आता कालबाह्य झालेल्या आहेत. स्टीलच्या वाट्यांची चलती जोरात आहे. पण त्यांनाही मागे टाकून आता प्लास्टिकच्या वाट्या येऊ लागल्यात. पण या वाट्यांना चांदीच्या आणि पितळेच्या वाट्यांचे शाहीपण नाही…

… पण सगळ्याच वाटी प्रकाराला जे बाईपण लाभलं आहे ना ते वाखाणण्याजोग आहे. बाईपण यासाठी की हा संसारातला स्नेह, समजूतदारपणा, भांडणे मिटवून टाकणं, आपल्यातलं थोडं दुसऱ्याला देणं, हे जे गुण घरातल्या बाईजवळ असतात तेच गुण या वाट्यामध्ये आहेत. वाटी हे वाडे आणि चाळीचे स्नेह वाढवणारे घटक आहेत. बंगल्यात ती देवघेव होत नाही आणि तो स्नेह ही निर्माण होत नाही.

… “एक वाटी आमटी भाजी की कीमत तुम क्या जानो बंगले वालो… ” 

आता हा लेख वाचल्यानंतर शेजारच्या पाजारच्या बंगल्यातून मला वाट्या येतील असं वाटतंय… बघूया एक छोटं भांडं – ‘वाटी‘ – यावर मी माझे विचार प्रकट केले आहेत. आवडले असले तर वाटीभर अभिप्राय द्या आणि ही वाटी पुढच्या घरी पाठवा माझे काही बंधन नाही…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “समजुतीचा घोटाळा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “समजुतीचा घोटाळा…” ☆ श्री मंगेश मधुकर

माणसांच्या विचित्र वागण्यानं समजुतीचा घोटाळा होतॊ.

झालं असं की,

सध्या उन्हाळ्याचे दिवस. रात्र लहान तर दिवस मोठा. सकाळी फार लवकर म्हणजेच साडेपाच-सहालाच जाग येते. नंतर काही केल्या झोप येत नाही. उगीच कूस बदलत लोळत पडायचा कंटाळा येतो म्हणून मग फिरायला जायला सुरवात केली. मोबाइल मुद्दाम घरातच ठेवला. प्रसन्न वातावरण, हळूहळू जागं होणारे शहर, रस्त्यावर गाड्यांची कमी आणि पायी चालणाऱ्यांची संख्या जास्त. आजकाल असलं दृश्य पहायला मिळणं तसं दुर्मिळच.. फार मस्त वाटलं. असो..

सर्वच वयोगटातील लोक बाहेर पडलेले त्यातही ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त. फुटपाथवरुन जात असताना समोरून टी-शर्ट, हाफ पॅन्ट घातलेला, तुळतुळीत टक्कल असलेला पन्नाशीचा माणूस माझ्याकडं पाहत हातवारे करत काहीतरी बोलत होता. आमच्यातलं अंतर जवळपास शंभर फुटांचे होतं. तो नक्की आपल्याकडेच पाहत हातवारे करत आहे ना याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केला पण नीटसा अंदाज आला नाही. त्याचे हातवारे अजूनही चालूच. मी हात उंचावून प्रतिसाद दिला पण शून्य प्रतिसाद.. मला आश्चर्य वाटलं आणि रागही आला. अगदी जवळ आल्यावर लक्षात आलं की तो इयर पॉड लावून फोनवर बोलत होता आणि मला वाटलं की.. , , , माझ्याकडे ढुंकुनही न पाहता शेजारून निघून गेला तेव्हा माझं मलाच हसायला आलं. नशीब बायको सोबत नव्हती नाहीतर तिला चिडवायला अजून एक कारण मिळालं असतं.

पुढे गेल्यावर असेच एकटेच बोलणारे, हातवारे करणारे अनेकजण दिसले पण यावेळेला मी अनुभवानं शहाणा झाला होतो.

काळ बदललाय हेच खरं… पूर्वी एकटाच बडबडणाऱ्या, हसणाऱ्याला वेड लागलंय किंवा डोक्यावर परिणाम झाला असं म्हणायचे. तसं पाहिलं तर आताही तीच परिस्थिती आहे. मोबाईलमुळे डोक्यावर परिणाम झालाच आहे. निसर्गानं बहाल केलेल्या सुंदर सकाळचा अनुभव घेण्याऐवजी मोबाइलला चिकटलेल्यांची खरंतर कीव वाटली.

विचारांच्या तंद्रीतच चौकातल्या बसस्टॉपवर बसलो. शेजारचा हातवारे करत, शून्यात पाहत बोलत होता मध्येच मोठ्याने हसत होता. अजून एक फोन पागल… आपल्याच तंद्रीत असलेल्या त्यानं माझी दखलही घेतली नाही. सतत बडबड चाललेली अन मी शांत बसलेलो. तितक्यात समोरून चाललेले आजोबा आमच्याकडे क्षणभर पाहत थांबले. थोडं पुढे जाऊन त्यांनी मला ‘शुक शुक’ करून बोलावलं.

“काय झालं”मी विचारलं.

“भलेतच डेरिंगबाज आहात”

“का?”

“म्हणजे तुम्हाला माहिती नाही की अजूनही लक्षात आलं नाही”आजोबांच्या प्रश्नांनी गोंधळ वाढला. माझा प्रश्नांकित चेहरा पाहून आजोबा म्हणाले..

“अहो, मिस्टर ज्याच्या शेजारी बसला होता तो वेडा आहे. भीती वाटली नाही ? ” आजोबांचं ऐकून नखशिखांत हादरलो. आजोबा मात्र माझ्याकडं कौतुकमिश्रित विचित्र नजरेनं पाहत होते.

“लोक इतके विचित्र वागतात की कोण वेडं की कोण नॉर्मल ओळखणं अवघड झालयं. ”मी म्हणालो.

“बरोब्बर”

“एवढ्या सकाळी सुद्धा बरेचजण फोनवर बिझी??. “

“ स्मार्ट फोन आल्यापासून माणसांचा बावळटपणा वाढलाय ”आजोबा मार्मिक बोलले.

“खरंय!!तुमचे मनापासून आभार!!” 

… हात जोडत आजोबांचा निरोप घेऊन निघालो बसस्टॉपवरच्या वेड्याचं बोलणं सुरूच होतं. तितक्यात समोरून काहीजण एकटेच बोलत येताना दिसल्यावर फुटपाथ सोडून रस्त्यावरून चालायला लागलो…… मनात विचार आला की एक खरंच वेडा आणि बाकीचे.????

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”उंबरठा” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “उंबरठा” ☆ संध्या बेडेकर ☆

माझं बालपण एका सुसंस्कृत लोअर मिडल क्लास परिवारात गेलं.

छान होते ते दिवस. आम्ही चार बहिण भाऊ. अगदी सामान्य परिस्थिती, सामान्य घर, सामान्य राहणीमान. पण घरातील नियम मात्र त्या मानानं बरेच होते. घराच्या आतले आणि घराच्या बाहेरचेही

*उंबरठा* के इस पार और उस पार के भी. ***

कसं वागायचं? कसं रहायचं? स्वतः ला कसं सांभाळायचं? काय बोलायचं? सांगायचं? कोणाशी बोलायच? कोणाशी नाही? कपडे कसे घालायचे? अंधार व्हायच्या आधी घरी यायचं. हे बाळकडू (नियम) आम्हाला मिळालेले. त्यात मी मुलगी म्हणून चार जास्तीचे नियम होतेच.

अभ्यासाकडे विशेष लक्ष असायचं, कारण या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एकच निश्चित मार्ग म्हणजे चांगले शिक्षण. त्यामुळे नियमित अभ्यास हा एक प्रमुख नियम होता.

आमच्यावर घरच्यांचीच काय? शेजारी पाजाऱ्यांची पण नजर असायची. त्यांना पण आम्हाला रागवायचा हक्क होता. शाळेतील प्रत्येक गोष्ट घरापर्यंत सहजच पोहचत असे… 

उंबरठा म्हणजे लक्ष्मण रेषा होती.

त्यावेळेस या सर्व गोष्टींबद्दल काही वाटलं नाही. आजूबाजूला सर्व माहोल तसाच होता. आमच्या सारखेच सर्व. Lower middle class चे आमचे शेजारी.

अगदी चाळ वातावरण नसलं म्हणजे एकदम एकदुसऱ्याच्या घरात डोकावत नसलो तरी, सर्वांना आजूबाजूच्या बऱ्याच बातम्या माहीत असतं.

आजच्या पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीची सामाजिक व्यवस्था, त्यात मराठी, अजून भर म्हणजे लोअर मिडिल क्लास स्टेटस म्हणजे काहीही करायच्या आधी *लोक काय म्हणतील? * हा million dollars प्रश्न उभा राहात असे. आपल्यापेक्षा लोकांचा विचार जास्त होत असे. समाजाच्या नियमांविरूद्ध जायची हिम्मत नव्हती. त्यावेळेस ही स्मार्ट श्रीमंत लोक होतेच त्यांना प्रथम भेटण्याचा अनुभव आम्हाला कोॅलेजमध्ये आला. त्यांच्या मते आम्ही *बेहेनजी* कैटिगरी चे होतो.

… बरे असो.

 तसंही घरची सामान्य परिस्थिती बघता विशेष काही करायचा स्कोप नव्हताच. जेमतेम पैसा त्यामुळे जेमतेम राहणीमान. आजूबाजूला तसेच सर्व होते, म्हणून वाईटही वाटत नसे. घरी आम्ही मजेत रहायचो, प्रश्न वगैरे विचारायची पद्धत नव्हती.

My word is final. मैने जो कह दिया सो कह दिया।असा अलिखित नियमच होता. ं

फॅशनच्या नावाखाली असं काही खूप सांगण्यासारख काही विशेष नाही. वर्षातून एखादा सिनेमा, एखाद वेळेस हॉटेलिंग एवढीच काय ती चंगळमंगळ. वर्षातून दिवाळीचा एखादा ड्रेस वगैरे. कपडे च जास्त नसायचे, म्हणून आता सारखं कपडे ओसंडून आलमरीतून खाली पडतायेत असं वगैरे कधीच झालं नाही.

आजची मुलं हे ऐकून चकितच होतील नाही का? – – 

– – सकाळी लवकर उठायचं? संध्याकाळी सातच्याआधी घरी यायचं? कुठे जातो? आणि केंव्हा घरी येणार हे सांगूनच बाहेर पडायचे. व्यवस्थित कपडे घालायचे, म्हणजे पूर्ण अंग झाकलेले. मुल मुली एकत्र जातायेत ते तर.. बाप रे! ! अशक्यच.

बापरे! म्हणजे किती कंट्रोल हा? म्हणजे हे घर आहे की जेल? काय समजायचं?

आता अशा सूचना आज मुलांना दिल्या तर मुलामुलींचा स्वतः चां आई वडिलांबरोबर डायव्हर्सच होईल बहुतेक.

 

आजकाल कपड्यांबद्दल काय बोलायचं? (जेवढे फाटके तेवढे छान,), महागडा मोबाईल, रात्री बेरात्री घरी येणे, बॉयफ्रेंड तर मस्टच आहे, त्याशिवाय फ्रेंड सर्कल मध्ये value च नाही. Status च नाही. हे सर्व स्मार्टनेस चे पॅरामीटर्स आहेत.

खरं तर आता आपल्याला पण असं बघायची सवय झाली आहे. बघताना त्रास होतो. स्वतःच्या मुलांबरोबर बोलायची आईवडिलांची किती हिम्मत आहे? आणि किती मुले सहज ऐकतात? माहित नाही… मुलामुलींचा एकत्र गृप, एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून सहज गप्पा मारणं, एकत्र पिकनिक, हॉटेलिंग या सहज घडणाऱ्या गोष्टी झाल्या आहेत. खूपदा बघायला, पचायला जड जात पण मुलांना कसं सांगायचं? हा एक मोठा प्रश्न बहुतेक प्रत्येक घरी असावा असं वाटतं.

 

आजकाल मुलांना रागावणे मारणे बंदच आहे. म्हणजे अगदी अमेरिकेसारखी परिस्थिती अजून आलेली नाही की मुलं लगेच 911 वर फोन करतील. पण एकुलत्या एक मुलाला मारणं बरोबर नाही. नाही का? कुठे बिथरला तर? मुलं आईवडीलांना घाबरतात, असं वाटतं नाही. याउलट आई वडिलच मुलांना घाबरतात की काय अस वाटत? आता सायकॉलॉजी बदलली आहे. *Friendly relations* या थीमवर सर्वच नाती आहेत.

– म्हणजे एखाद्या मुलीला *ए राजू लवकर ये* असा आवाज देताना ऐकलं की ती मुलाला बोलवतेय? की नवऱ्याला? हे पटकन कळत नाही.

 

आता सर्वच समीकरणे बदलली आहेत.

Middle class ही बराच स्मार्ट झाला आहे. थोडा जास्तच. म्हणजे जे, जेवढ आहे/नाही, त्यापेक्षा जास्त दाखवायचा प्रयत्न फक्त मुलच नाही, तर सर्वच करतायेत.

 

– – जग बदलत आहे. आपल्याला ही बदलावच लागेल. पण दिशा चुकतेय, अस वाटतय. नवीन जगातील काय घ्याव आणि काय नाही? हे समजत नाहीये.

फक्त काय आणि किती? मनाचा आणि घराचा उंबरठा लक्षात ठेवल्यास बरं होईल. शिस्त मग ती वागण्यात, बोलण्यात, पैसे खर्च करण्यात किंवा फॅशन च्या नावाखाली, स्मार्ट नेस, modernization च्या नावाखाली किती आणि कुठे थांबायचे, हे वेळेवर कळलं तर बरं होईल. सध्याची विस्कळीत झालेली सामाजिक स्थिती कदाचित सुधारेल… म्हणजे young generation सुसाट सुटली आहे. आणि Seniors confused आहेत.

 

प्रत्येक 5 वर्षांत समाजात बदल होतातच. पण इतक्यात हा बदल खूप जाणवतोय. *मानसिक तब्येत* बघून तर भीती वाटतेय. * स्वातंत्र्य * च्या नावाखाली वागण्या बोलण्याची पातळी अजून किती खाली जाईल? माहित नाही.

भारतात राहून अमेरिकन्स सारख वागताहेत. आणि जग म्हणे भारताकडे बघतय. खरय का?

आम्हा जेष्ठांना आता खूप कठीण झालय. आम्ही आयुष्यात खूप पेपर सोडवले. खूप परीक्षा दिल्या. आतापर्यंत छान पास होत होतो आम्ही. आम्ही भावनांचा अभ्यास केलाय, पण इतक्यात सर्व प्रश्न पत्र व्यवहारांचे येत आहेत. तेथे आमची गडबड होतेय.

 

हे चतुर युग आहे. जोपर्यत आपली यात्रा पूर्ण होत नाही, तोपर्यंत उतार चढाव बघण आलच.

तेंव्हा कमी आणि मोजक बोलायच. आणि आपला मान जपायचा. कुठं मुकं, कुठं बहिर, कुठं आंधळ व्हायच हे आता लक्षात आल. मी स्वतःच माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधलय.

मला कुठेतरी वाचलेल एक छान वाक्य आठवल, •••

 

जिंदगी परिवर्तनो से ही बनी है।। किसी भी परिवर्तन से घबराए नही ।उसे स्वीकार कीजिए। । कुछ परिवर्तन आपको भी उन्नति का नया मार्ग दिखायेंगे, आपकी सुप्त इच्छांए पूर्ण करने का अवसर देंगे.

 

आयुष्याचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळण येतील, तस वळावच लागेल.

फक्त प्रत्येक odd situation मध्ये मनाच्या उंबरठ्यावर उभं राहून शांतपणे विचार करायचा.

ठरलं तर मग…..

… नवीन जगात यात्रा करायला मी आता पूर्णपणे तयार आहे.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शून्य : एक निःशब्द अनंत… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

✦ शून्य : एक निःशब्द अनंत ✦ श्री दिवाकर बुरसे ☆


शून्य म्हणजे केवळ अभाव नाही,

ते अदृश्याचे प्रकटीकरण आहे.

 

आपण ज्याला रिक्तपणा म्हणतो,

तोच तर विश्वाच्या गूढ गर्भातील स्पंदन आहे.

अस्तित्व नसल्याच्या भासामागे

अस्तित्वाच्या अनंत आकाशाचा विस्तार दडलेला आहे.

 

*शून्य हे केवळ एक वर्तुळ नाही—

तो आरंभ आणि अंत यांना जोडणारा निःशब्द पूल आहे.

जिथे अंक संपतात, तिथे अर्थ सुरू होतो.

नदी समुद्रात विलीन झाली की ती नष्ट होते का?

की तीच समुद्र बनून पुन्हा जन्म घेते?

मानवी अस्तित्वही तसेच—

कधी प्रकट, कधी अप्रकट;

कधी शब्दांत, कधी निःशब्द.

पण कधीच शून्य नाही.

 

निःशब्दता म्हणजे रिक्तता नाही, 

ती सृजनाची गर्भावस्था आहे.

बीज मातीखाली गाडले की ते नाहीसे होते का?

नाही—ते पृथ्वीशी संवाद साधत असते.

अंधार हा प्रकाशाचा शत्रू नाही,

तो त्याचा पूर्वसंगीत आहे.

 

रात्र संपते म्हणूनच प्रभात जन्म घेते—

आणि प्रत्येक प्रभातामागे

एक गूढ, शांत अंधार उभा असतो.

माणूसही तसाच आहे.

कधी स्वतःपासून दूर जाणारा,

कधी स्वतःलाच न सापडणारा.

पण त्या हरवण्यातच शोध दडलेला असतो,

त्या निःशब्दतेतच एक लय असते.

 

तत्त्वज्ञान सांगते—अस्तित्व हा पूर्णविराम नाही;

तो अखंड वाहणारा वाक्यप्रवाह आहे,

ज्यात प्रत्येक स्वल्पविरामावर नवे अर्थ जन्म घेतात.

 

माणूस हा निष्कर्ष नाही, 

ती एक प्रक्रिया आहे—

क्षणोक्षणी घडणारी, अनुभवागणिक विस्तारत जाणारी.

त्याचे सौंदर्य त्याच्या अपूर्णतेत आहे;

त्याच्या थांब्यात पुढील प्रवास दडलेला आहे.

 

शून्य म्हणजे एक विराम—

पण विराम म्हणजे अंत नव्हे.

तो पुढच्या पावलासाठी घेतलेला श्वास आहे.

जीवन हे गणित नाही; ते काव्य आहे.

प्रत्येक ओळीत काहीतरी न सांगितलेले असते—

आणि तेच न सांगितलेले सर्वात गहिरे सत्य असते.

म्हणूनच “शून्य” म्हणणे म्हणजे

त्या काव्याला अपूर्ण मानणे,

त्या निःशब्दतेला नाकारणे,

त्या शक्यतांकडे दुर्लक्ष करणे.

पण जिथे निःशब्दता आहे, तिथे स्वर जन्म घेतात.

 

जिथे रिक्तता आहे, तिथे सृजन उगवते. 

कारण—

शून्य हा शेवट नाही,

ते अनंताकडे नेणारे द्वार आहे.

जिथे शून्य आहे, तिथे विश्व आहे.

जिथे विश्व आहे, तिथे मानव आहे.

आणि

जिथे मानव आहे_

तिथे आशा आहे!

 

आपला दिवस मंगल जावो!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “५ रुपयांचे ५०० रुपये झाले…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “५ रुपयांचे ५०० रुपये झाले…” ☆ श्री सुधीर करंदीकर

 “५ रुपयांचे ५०० रुपये झाले – फक्त पंधरा दिवसांमध्ये – मजेशीर आठवण. ” 

आपण सगळेच जण निरनिराळ्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करत असतो, त्यावर कुठे ७ टक्के व्याज मिळते, कुठे ५ टक्के, काही ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे १० टक्के, हे आपण जाणतोच. आणि जास्तीत जास्त व्याज कुठे मिळेल याकडे आपली कायम नजर असते.

मला चक्क एका ठिकाणी पाच रुपये देऊन त्याबद्दल पाचशे रुपये मिळाले आणि ते पण फक्त पंधरा दिवसांमध्ये, किती टक्के झाले हे तुम्हीच सांगा.

जुनी गोष्ट आहे, मी एकदा बावधन ला ट्रॅफिकचा रस्ता क्रॉस करण्याकरता एका म्हशीची मदत घेतली. आणि म्हशी बरोबर अगदी आरामात रस्ता क्रॉस केला. आणि त्याकरता म्हशी च्या मालकाला ५ रुपये दिले.

एकदमच वेगळी घटना म्हणून या घटनेवरती मी ‘म्हैस’ हा लेख लिहिला. आणि लेख मित्रमंडळींना पाठवला. एका मित्राचा फोन आला की लेख खूपच छान आहे, तू लोकसत्तेला पाठव म्हणजे तो खूप लोकांपर्यंत पोहोचेल.

मित्र हे पण म्हणाला की लेख पाठवल्यानंतर त्यांच्याकडून लेख मिळाला असं उत्तर येईल किंवा उत्तर येणार पण नाही, तसेच लेख छापून येईल किंवा येणार पण नाही. कारण त्यांच्याकडे भरपूर लेखांची आवक जावक असणार. आपण पाठवून बघायचं.

मी लगेचच लोकसत्तेचा ई-मेल ऍड्रेस शोधला आणि त्यांच्या ऑफिसला लेख पाठवला.

आणि चक्क तिसऱ्या दिवशी मला लोकसत्ता ऑफिस मधून फोन आला – म्हैस लेख छानच आहे आणि आम्ही येत्या शनिवारच्या चतुरंग मध्ये तो छापत आहोत. आणि लेख छापून आला..

खूप ओळखीच्या आणि अनोळखी लोकांचे छान छान अभिप्राय कळवणारे मेसेजेस आले / फोन आले. मजा आली.

आणि त्याच आठवड्यात लोकसत्तेकडून मला म्हैस लेखाबद्दल ५०० रुपयांचे मानधन मिळाले.

थोडक्यात म्हणजे ट्रॅफिकचा रस्ता क्रॉस करण्याकरता म्हशी बरोबरच्या मुलाला मी पाच रुपये दिले, तो अनुभव कागदावर उतरवून मी तो लोकसत्तेकडे पाठवला, आणि लोकसत्तेने मला त्याबद्दल पाचशे रुपये दिले.

अशा रीतीने पाच रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्यांचे मला पाचशे रुपये मिळाले, आणि ते पण फक्त पंधरा दिवसांमध्ये…

आहे की नाही मस्त इन्व्हेस्टमेंट!

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सृजनाचे क्षण… भाग – २ ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ सृजनाचे क्षण… भाग – २ ☆ उज्ज्वला केळकर

आता ‘पांघरूण’कथेविषयी. याच क्रेशमधला एक मुलगा. त्याचं नाव मी ठेवलं ‘सर्जा’. सर्जाचं घर, मी, तळा-गाळातलं कुठलंही प्रतीनिधिक घर असेल, तसं रंगवलं. त्याची आई विड्या वळून संसार चालवणारी. म्हातारी, दमेकरी सासू, दोन भावंड, दिवसभर उनाडणारी, बाप रिक्षा चालवायचा पण सगळा पैसा बाई-बाटलीत उडवायचा. मनात येईल, तेव्हा बायकोच्या तोंडावर काही नोटा फेकायचा. तेवढंच त्याचं आपल्या संसाराबाबतचं कर्तव्य. ‘साल्या, भडव्या, रांडलेका’शिवाय बोलणं नाही. आईदेखील सदा करवादलेली.

आज क्रेशमध्ये चादरींचं वाटप होतं. त्यासाठी सगळ्या आयांना बोलावलं होतं. मी कथेत चादरींची केली ब्लॅंकेटस्. नाना रंगांची आकर्षक ब्लॅंकेटस्. आपल्याला कोणत्या रंगाचं ब्लॅंकेट मिळेल? तो विचार करायचा. त्याला लाल ब्लॅंकेट मिळालं होतं. त्याचा जर्मनीतला भाऊ डेव्हीड सारखंच. सर्जा अतिशय उत्तेजित झाला होता. त्याला आज जेवण-खाण काही सुचत नव्हतं. त्याने घरी आल्या आल्या आपल्या भावंडांना बोलावलं आणि सगळे ते ऊबदार ब्लॅंकेट पांघरून झोपून गेले.

सर्जाचा बाप दारू पिऊन घरी येतो. आज त्याच्या खिशात दमड्या नसल्यामुळे त्याला बाईकडे जाता आलेलं नाहीये. तो अस्वस्थ आहे. घरी येताच त्याचा पाय त्या नव्या ब्लॅंकेटमध्ये अडकतो. तो खाली पडतो. उठता उठता त्याचे लक्ष एकदम त्या आकर्षक ब्लॅंकेटकडे जाते. त्याच्या डोक्यात वीज चमकते. हे ब्लॅंकेटच आज तिला द्यावं. ती एकदम खूश होऊन जाईल. अशी चिकटेल, लई मजा येईल. तो सर्जाच्या अंगावरचे ब्लॅंकेट ओढू लागतो. ‘ब्लॅंकेट दे’ म्हणतो. सर्जा म्हणतो, ‘माझ्या जर्मनीतल्या बापाने माझ्यासाठी पाठवले आहे. मी देणार नाही. ’

‘तुझ्या जर्मनीतल्या बापाकडेच निघून जा, ‘ असं म्हणत सर्जाचा बाप ते ब्लॅंकेट हिसकावून निघून जातो. पाठीमागच्या सीटवर ब्लॅंकेट ठेवून तो रिक्षा सुरू करतो.

सर्जा रडत राहतो. त्याच्या अश्रूभरल्या डोळ्यासमोर येतं, ते फोटोतल्या ज्यो बाबांचे उबदार घर. त्याला अधीकच उघड्यावर पडल्यासारखं वाटतं. रडत रडत तो आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. आई आपल्या फाटक्या धडुत्याचा पदर त्याच्या अंगावर सरकवते…इथे कथा संपते.

तर अशा अनेक कथांमागच्या कथा सांगता येतील. अनेकदा प्रत्यक्ष अनुभव न घेता मानसिक अनुभवावरही मी कथा लिहिल्या आहेत. जे सुचलं, ते एकदा कागदावर उतरलं, की तृप्तता येते. समाधान वाटतं. आनंद होतो. तरीही मी, काही जण म्हणतात, त्याप्रमाणे असं म्हणणार नाही, की मी ‘स्वान्त सुखाय’ लिहिते. ‘स्वान्त सुखाय’च जर लिहायचं असेल, तर छापायला पाठवायचा खटाटोप कशाला करायचा? मला जे वाटतं, भावतं, ते तसं इतरांनाही भावतं, आवडतं का? हे मला समजून घ्यावसं वाटतं, त्यांच्या प्रतिक्रिया समजून घ्याव्यात, त्यातून काही नवीन शिकायला मिळेल का, हेही बघावं, असं वाटतं म्हणून मी लिहिते आणि छापायलाही देते.

अनेक जण अर्थप्राप्तीसाठी लिहितात. नावलौकिक मिळावा म्हणूनही लिहितात. मागणी तसा पुरवठा करणारीही काही लेखक मंडळी आहेत. संपादक, प्रकाशक, प्रायोजक यांनी सांगितलं, म्हणून लिहिणारीही काही लेखक मंडळी आहेत. इतरांचं कशाला? मी माझंच एक उदाहरण सांगते. सांगली आकाशवाणीच्या नाट्यविभागाने एकदा मला सांगितलं, जागतिक आरोग्यादिनाच्या निमित्ताने ‘फास्ट फूड’ या विषयावर तुम्ही नभोनाट्य लिहा. ठाशीव, साचेबंद विचार – फास्ट फूडचे फायदे-तोटे इ. बद्दल मला लिहावेसे वाटत नव्हते. या शब्दाभोवती विचार करता करता ‘फास्ट फूड’ संकल्पनेच्या नाना परी मला सुचल्या. बाजारात मिळणारं नेहमीचं फास्ट फूड, दहा दिवसात दहावी विज्ञान, भूगोल, इ. ‘इंटलेक्चुअल फास्ट फूड, ’ ‘कल्चरल फास्ट फूड’, ‘जेनेटिक फास्ट फूड’ (९ महिन्यांऐवजी ९ आठवड्यात बाई बाळंतीण व्हावी, म्हणून संशोधन) वगैरे… फॅँटसीच्या अंगाने मी हे नभोनाट्य लिहिले. ते अनेकांना आवडलेही. माझ्याकडे वरील विषयाची मागणी झाली नसती, तर मी हे नभोनाट्य वा नंतर याचीच केलेली कथा मुळीच लिहिली नसती. म्हणजे हा विषय मला सुचलाच नसता. माझी एकूण ५ नभोनाटये, व १००च्या वर ‘प्रतिबिंब’ शीर्षकाखालील कौटुंबिक श्रुतिका प्रसारित झाल्या आहेत.

सांगली आकाशवाणीच्या नाट्यविभागाने माझ्याकडून ‘एड्स्’ या विषयावरही सांगून नभोनाट्य लिहून घेतले. त्या विषयावरही मागणी नसती, तर मी नाटक, कथा लिहिली नसती.

एकदा एका मुलाखतीत कुणी तरी मला माझ्या लेखन प्रवासाविषयी विचारले. मग मीही त्याचा मागोवा घेऊ लागले. मला आठवतं, मी आठवीत असताना पहिली कविता लिहिली. त्यावेळी गोवा मुक्तिसंग्राम अगदी शिखरावर होता. रोज नव्या बातम्या. त्यावर चर्चा वगैरे… एक दिवस बातमी आली, या संग्रामातले शिलेदार हेमंत सोमण रस्त्यातून तिरंगा घेऊन चालत असताना पोर्तुगीज सैनिकाने त्यांना गोळी घातली. ते शहीद झाले. सर्वांना वाईट वाटलं. त्या दिवशी कशी कोण जाणे, मला कविता सुचली,

‘ हेमंत सोमणांनी गोव्यात झेंडा रोविला.

तडतडा तडकले पोर्तुगीज झेंडा त्यांनी पाहिला ‘ यानंतर ओळींवर ओळी… ते हुतात्मा झाले इथपर्यंतच्या. सगळ्यांनी कवितेचे कौतुक केले. पण दुसर्‍या दिवशी बातमी आली, त्यांना गोळी मारली नाही. त्यांना तुरुंगात टाकले. बातमी चांगलीच होती. आम्ही आनंदोत्सव साजरा केला. झाले ते चांगलेच झाले, पण माझी बिच्चारी कविता मात्र शहीद झाली. त्यानंतर शाळेत फारशी काही कवितेच्या वाटेला गेले नाही. नाही म्हणायला ११वीच्या निरोप समारंभाच्या वेळी एक कविता करून म्हंटलेली आठवते.

कॉलेजमध्ये असताना मला कवितेत रस असणार्‍या, कविता करणार्‍या मैत्रिणी मिळाल्या. आणि मीही उत्साहाने कविता करू लागले. हळू हळू वैचारिक, ललित लेखनही सुरू झालं. अभ्यासाचा सराव म्हणून असेल, मी कविता, कथा, पुस्तके यांची समीक्षाही करू लागले.

माझं लग्न झालं आणि मी सांगलीजवळील माधवनगरसारख्या खेड्यात एकत्र कुटुंबात राहू लागले. पुढे दोन-तीन वर्षे घरात काम काम आणि कामच. काही नवीन सुचायला आणि विचार करायला वाव आणि वेळच नव्हता. माझे लेखन थांबलेच जसे. नाही म्हणायला किरकोळ कविता अधून –मधून लिहिल्या जात. त्या जाणणार्‍या आणि कविता लिहिणार्‍याही काही जेष्ठ कवयित्री तिथे मला मिळाल्या. महिला मंडळाच्या ‘वंदना’ या हस्तलिखित वार्षीकाच्या संपादनाचेही काम तिथे मी केले.

पुढे १९७० साली मला सांगलीच्या डी. एड. कॉलेजमध्ये अध्यापनाची नोकरी लागली. तिथे अनेक विद्यार्थिंनींशी संबंध आला. त्यांच्या नाना कथा आणि व्यथा मला कळल्या, पण तरीही मी कथेच्या वाटेकडे वळले नव्हते. बाकीचे लेखन मात्र पूर्ववत चालू होते. या काळात माझे अनुभवविश्वही विस्तारले. मला लेखनाला नवनवे विषय सुचले. तरीही या काळात माझे प्रामुख्याने लेखन हे कॉलेजचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी झालं.

माझं कथालेखन त्या मानाने उशिरा सुरू झालं. त्याला कारणही तसंच घडलं. मला लग्नानंतर दहा वर्षाने मुलगा झाला. तोपर्यंत मुलाची (मुलगा किंवा मुलगी) वाट पाहून आम्ही अनाथाश्रमातून मूल दत्तक घ्यायचे ठरवले होते. त्यासाठी फॉर्म भरणे वगैरे चालू केले होते आणि अचानक मला दिवस गेल्याचे लक्षात आले. नंतर माझ्या मनात आलं, जर मी आधी मूल दत्तक घेतलं असतं आणि नंतर मला स्वत:चं मूल झालं असतं, तर घरातली, नात्यातली, शेजारची त्याच्याशी कशी वागली असती? यातून मला ‘परक्याचं पोर’ हे कथा सुचली. बाळंतीण असतानाच मी ती लिहिली. ही माझी पहिली वाहिली कथा. ती खूप गाजली. मला अनेक खुषीपत्रे आली. त्यानंतर मी बर्‍याच कथा लिहिल्या. त्याही गाजल्या. माझे ५ कथासंग्रह प्रकाशित आहेत. १. कृष्णस्पर्श २. धुक्यातील वाट ३. झाले मोकळे आकाश ४. फास्ट फूड ५. पाचा उत्तरी सफल संपूर्ण. माझे २ कविता संग्रह आहेत. १. चंद्रपालखीची वाट २. मृगजळाकाठी. एक भौगोलिक पुस्तक आहे. ‘भारतीय नद्यांची ओळख. ’ यात भारतातील मुख्य नद्या व त्यांना मिळणार्‍या ३-४ महत्वाच्या उपनद्या यांची भौगोलिक व सांस्कृतिक महिती दिली आहे.

याशिवाय माझी बालवाङ्मयाची ३०-३२ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यात कथा, कविता, नाटिका, चरित्र इ. प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. माझ्या काही कथांचा हिंदीत, तर तुरळकपणे उडिया, तेलुगु, कन्नडमध्ये अनुवाद झाले आहेत. मला माझ्या एकंदर लेखनासाठी, बालवाङ्मयाच्या ३ पुस्तकांसाठी, २ अनुवादीत पुस्तकांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. तसेच मला जालंदर येथे पंजाब कला साहित्य अ‍ॅकॅडमीचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे मला कोटा येथे ‘शब्दसरोज सन्मान’, व जबलपूर येथे ‘डॉ. श्रीराम दादा ठाकूर संस्कारधानी सन्मान’ मिळाला आहे. पण महाराष्ट्राबाहेरचे हे पुरस्कार सन्मान मला माझ्या अनुवादित साहित्यासाठी मिळाले आहेत.

अनुवादीत साहित्य हा माझ्या लेखनाचा आणखी एक टप्पा. मला अनुवादित साहित्य वाचायला आवडतं आणि अनुवाद करायलाही आवडतो. अनुवाद म्हणजे केवळ एका भाषेतील शब्दाला, दुसर्‍या भाषेतील प्रतिशब्द देणे नव्हे. ते झाले भाषांतर. अनुवाद हीदेखील पुनर्निर्मिती असते. अनुसृजन असंही काही लोक त्याला म्हणतात. तो शब्द मला फार आवडतो. तर मी अनुवाद करते म्हणजे पुनर्निर्मिती किंवा अनुसृजन करते.

मी फक्त हिन्दी भाषेतील साहित्याचा अनुवाद करते. अनुवादामुळे, वेगवेगळे प्रदेश, तिथला परिसर, वातावरण, लोकजीवन, लोकसंस्कृती, त्यांचे रीतिरिवाज, त्यांची जीवनदृष्टी कळून येते. नवीन ज्ञान होतं. त्याचबरोबर हेही कळतं, की जीवनपद्धती वेगवेगळी असली, तरी संस्कृतीचा अंत:स्त्रोत एकच आहे. मी आत्तापर्यंत, मोहनलाल गुप्ता, प्रतिमा वर्मा, सूर्यबाला, मधु कांकरीया, भगवान वैद्य ‘प्रखर’, सुशांत सुप्रिय, गिरिमा घारेखान, हंसा दीप, इ. लेखकांच्या कथांचा अनुवाद केला आहे. रेत में खोयी नदी, संघर्ष, गोरा, गोदान इ. कादंबर्‍यांचा अनुवाद केला आहे. माझे ७ अनुवादित लघुकथा संग्रह प्रकाशित आहेत. हरीशंकर परसाई, घनश्याम अग्रवाल यांच्या व्यंग्य लेखनाचाही मी अनुवाद केला आहे. सरश्री तेजपारखी, स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानात्मक पुस्तकांचाही मी अनुवाद केला आहे. माझ्या अनुवादीत पुस्तकांची संख्या ३५ च्या वर आहे. काही पुस्तके छापली जाण्याची वाट बघत प्रकाशकांच्या रांगेत उभी आहेत.

अभिमन्यू जसा चक्रव्यूहात शिरला आणि आत आतच जात राहिला, तसेच माझे अनुवादाच्या बाबतीत झाले आहे. मी एकदा अनुवादात घुसले, ती त्यातच गुरफटत गेले. माझे स्वत:चे लेखन बाजूलाच पडले. पण मला यातही आनंद मिळाला. अगदी नवनिर्मिती केल्याचा आनंद. तर असे हे माझे काही सृजनाचे क्षण, जे मला आनंद, समाधान, तृप्ती देऊन गेले. आपल्या सगळ्यांना ते सांगावेसे वाटले, म्हणून हा लेखन प्रपंच.

— समाप्त —

©  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तेथे काळजीचे काय काम!! ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ तेथे काळजीचे काय काम!! ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

*अनेक वर्षांपूर्वीची कथा. एका जनपदाचा (त्यावेळी राज्यांना जनपद म्हटले जायचे…) राजपुत्र आपल्या असामान्य कर्तृत्वाने राजाधिराज झाला…! *

नव्हे…!!

*विश्वविख्यात झाला..!!! “*

नव्हे…!

*युगयुगांवर त्याने आपले नाव कोरले…!! “*

… *लौकिक अर्थाने त्याने आई वडिलांची आज्ञा पाळली. आपल्या गुरूंची आज्ञा पाळली. त्यांच्या प्राणप्रिय पत्नीला जेव्हा राक्षसाने फसवून पळवून नेले, तेव्हा त्याने उपलब्ध मनुष्यबळ, साधनसामग्रीच्या आधारे राक्षसाचा वध केला…! दुसऱ्याच्या राज्याचा मोह न करता, त्याच्या भावाला राज्याभिषेक करून हा स्वर्गाहून प्रिय असणाऱ्या आपल्या मातृभूमीत परत आला…!! *

– – *यात त्याने कायम “प्रतिसाद” देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. * 

आपल्या मनात जे आहे तेच मी इथे लिहिले आहे…

*प्रत्येकाला “नर ते नारायण” अर्थात “राम ते प्रभू श्रीराम” असा प्रवास करण्याचा मूलभूत अधिकार भारतीय संस्कृती आपल्याला देत आली आहे…! “*

रामचरित्र जितके गाऊ तितके कमीच आहे…!

आज सर्वसामान्य माणसं एक तक्रार करीत असतात की कशातच राम राहिलेला नाही, त्यावेळी रामाची कथा प्रकर्षांने आठवते आणि ती कथा आपल्याला सांगते की जोपर्यंत रामकथा या भूमीवर जोपर्यंत ऐकली जाते, गायली जाते, सांगितली जाते, तोपर्यंत इथल्या कणकणात राम आहे…! आपण त्याचे स्मरण करून आपले विहित कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या सोबत असेल…

कारण…

कर्तव्य म्हणजे राम

बांधिलकी म्हणजे राम

समर्पण म्हणजे राम

निराश होण्याचे, तक्रार करण्याचे काहीच कारण नाही…

श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात त्याप्रमाणे आजपासून आपण *”मुखी नाम | हाती प्रपंचाचे काम ||”* हे सूत्र अंगीकारण्याचा प्रयत्न करू.

– – *”जेथे आहे रामनाम |*

 *तेथे काळजीचे काय काम ||”*

श्रीराम जयराम जयजयराम

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares