मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक – ‘अष्टदीप’

लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव

प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या – ३०० पाने

पुस्तकाचे मूल्य – ४२५ रुपये

पुस्तक परीक्षण- सुश्री विभावरी कुलकर्णी

अष्टदीप पुस्तकाविषयी

या पुस्तकात भारतरत्न मिळालेल्या आठ व्यक्तींची चरित्रे लेखकाने रेखाटली आहेत.   महर्षी कर्वे, जे आर डी टाटा, सर विश्वेश्वरय्या, लता मंगेशकर, लाल बहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, सरदार पटेल आणि ए पी जे अब्दुल कलाम. या सर्वांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि त्यांचे कर्तृत्व रसाळ आणि सोप्या भाषेत वर्णन केले आहे. दीपस्तंभाप्रमाणेच ‘ अष्टदीप ‘ हे पुस्तक तरुणाईसाठी प्रेरणास्रोत ठरेल यात शंका नाही.यातील व्यक्ती भिन्न परिस्थितीतून असलेल्या आहेत.पण सर्वांनी काम मात्र देशासाठीच केले.आणि त्या साठी   या सर्वांच्या नावा आधी असलेली विशेषणे त्यांचे कार्य सांगून जातात.या सर्वांनीच अतिशय खडतर प्रवास केला आहे.आणि तोच या पुस्तकात वाचायला मिळतो.

निश्चयाचा महामेरू महर्षी धोंडो केशव कर्वे

नाव वाचताच लक्षात येते खूप प्रतिकूल परिस्थितीत अचल महामेरू प्रमाणे ठाम ध्येय डोळ्या समोर ठेवून निश्चयाने काम केले आहे.त्यांचे विधवांचे पुनरुत्थान आणि स्त्री शिक्षण याने जगातील स्त्रियांना वेगळेच स्थान मिळवून दिले आहे.प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली छोटी संस्था आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरीत झाली आहे.आणि कित्येक महिलांचे कल्याण झाले आहे.

द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरैया

पाणी, कालवे, बंधारे यावर त्यांनी केलेले संशोधन व प्रयोग आजही उपयुक्त ठरत आहेत. किंवा त्याला पर्यायच नाहीत. त्यांना आधुनिक विश्वकर्मा म्हणतात.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

द्रष्टा उद्योगपती जे.आर.डी.टाटा

कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये ‘दिवसातून आठ तास काम’, ‘मोफत आरोग्यसेवा’, ‘भविष्य निर्वाह निधी’ आणि ‘अपघात विमा योजना’ अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.

टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय साली मुंबईत सुरू केले

लाल बहादूर शास्त्री

अतिशय साधी रहाणी व देशा साठी केलेले कार्य यांच्या वरील जी भाषणे ऐकतो त्या पेक्षा वेगळी व सखोल माहिती या पुस्तकात मिळते.

अशीच माहिती आठही रत्नांची मिळते.

यातील लता मंगेशकर यांचे छोटी लता ते महान गायिका लता मंगेशकर असा जीवन पट वाचायला मिळतो.आणि सध्या त्यावरील एका सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद पण आपण घेत आहोत.

ठळक वैशिष्ट्ये

आठ भारतरत्न प्राप्त व्यक्तींचा आदर्श हे पुस्तक आपल्या समोर ठेवते.

मूल्यविहीन तडजोड, भ्रष्टाचार इ च्या पार्श्वभूमीवर या भारतरत्न प्राप्त व्यक्तींचे जीवन म्हणजे जणू आपल्यासमोर धरलेला आरसा आहे.

देशासाठी बांधिलकी, त्याग करणे, कठीण परिस्थितीत खचून न जाता तिला धैर्याने तोंड देणे या गोष्टी हे पुस्तक नकळतपणे शिकवून जाते.

मूल्य – 425/- प्रकाशन – जुलै 2022

श्री विश्वास विष्णु देशपांडे

लेखकाविषयी

विश्वास देशपांडे हे लोकप्रिय लेखक असून त्यांची यापूर्वीची पुस्तके वाचकांकडून गौरवण्यात आली आहेत. ललित लेखन हा त्यांचा आवडता प्रांत आहे. सकारात्मक आणि आनंद देणारे लेखन हे त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य आहे.

कवडसे सोनेरी अंतरीचे व आकाशझुला ही दोन्ही पुस्तके शासनमान्य पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत.आणि बेसटसेलर पुस्तकात या पुस्तकांच्या बरोबर अष्टदीप याचाही समावेश आहे.

आत्ता पर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.आणि नवीन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत.

अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन पण सोप्या सुटसुटीत शब्दात वाचकांच्या समोर आणणे हे लेखन वैशिष्ट्य आहे. त्या मुळे आपल्याच मनातील भावना व्यक्त होत आहेत असे वाटते.लेखकांची निरीक्षण शक्ती पण खूप दांडगी आहे.आणि शांत, गंभीर, सुस्पष्ट आवाजातील निवेदन या मुळे रेडिओ विश्वास वरील कार्यक्रम (आठवड्यातून तीन दिवस प्रसारित होणारे) अतिशय लोकप्रिय झाले आहेत.

एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते,लेखकांची सर्वच पुस्तके संग्रही ठेवावी व भेट म्हणून द्यावीत.

या पुस्तकाला तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांचा राष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार, प्रेरणादायी व्यक्तिकथा हा पुरस्कार  ६ ऑगस्ट २०२३ रोजी प्राप्त झाला आहे.पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन!

पुढील साहित्य निर्मिती साठी खूप खूप शुभेच्छा!

पुस्तक परीक्षण – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “मागे वळून पाहताना” – डॉ. पी. डी. सोनवणे ☆ परिचय – सौ. सुनंदा शिवाजी कदम ☆

सौ. सुनंदा शिवाजी कदम

परिचय 

 मिस्टरांना बिझनेस मध्ये मदत करते.

वाचन लिखाणाची आवड. वाचनाच्या आवडी पोटी  आम्ही मैत्रीणींनी मिळून चालू केले वाचनप्रेमी वाचनालय. वाचन संस्कृती  वृद्धिंगत होण्यासाठी दर रविवारी मुलांसाठी वाचन कट्टा घेते.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “मागे वळून पाहताना” – डॉ. पी. डी. सोनवणे ☆ परिचय – सौ. सुनंदा शिवाजी कदम

पुस्तकाचे नाव_   मागे वळून पाहताना

लेखक_              डॉ. पी. डी. सोनवणे

प्रकाशन_            शिवस्पर्श प्रकाशन

पृष्ठसंख्या_          407

मूल्य_                 500/

पुस्तक अभिप्राय…

आयुष्यात कुठेतरी थांबावं लागतं. लेखक आयुष्याच्या एका वळणावर आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून थांबायचे ठरवतात. तेव्हा आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना, त्यांनी अनुभवलेल्या आठवणी कागदावर उतरतात, आणि जन्म होतो …मागे वळून पाहताना…या पुस्तकाचा.. त्यांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्राचा..

लेखकाचा जन्म खेड्यातला,  पण सधन कुटुंबातला. आजोबांची इच्छा नातवाने डॉक्टर होण्याची. फक्त इच्छा नाही तर त्यांच्या प्रयत्नांनाही सलाम करावासा वाटतो. चौथीपर्यंत लेखकांना त्यांचे आजोबा  खांद्यावरून शाळेत सोडत. अभ्यासात गोडी लागण्यासाठी शिक्षकांना स्वतःच बक्षीस देत व उत्तर बरोबर आले कि ते आपल्या नातवाला देण्यास सांगत.

आजोबांच्या कष्टाचे चीज करत, लेखक नेहमी वर्गात पहिले येत असत. एकेक पायरी पुढे चढत पुण्याला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळतो. मेडिकल मध्ये असतानाच, त्यांचं लग्न, पहिल्या मुलाचा जन्म असे सुखद धक्के तर वडील व आजोबांचे छत्र हरवते असे दुःखद धक्के सहन करत, पी डी सोनवणे डॉक्टर होतात. …

कोकणापासून सुरुवात केलेली सरकारी नोकरी शेवटपर्यंत कोणताही डाग न लागू देता निवृत्त होणे खूपच अवघड गोष्ट. पण लेखकांनी ती साध्य केली. आपल्या सेवेला डाग तर सोडा त्यांच्या शिरपेचात अनेक मानाची तुरे खोवले गेले. शासकीय सेवे सोबत रोटरी क्लब,लायन अशा सामाजिक संस्था शी निगडित त्यांनी अनेक समाजकार्य केली. रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम  अशा उपक्रमात त्यांनी नेहमीच योगदान दिले.

कामाच्या व्यापातून आपली गाण्याची ,सूत्रसंचालनाची आवड लेखकांनी आजतागायत  जपली आहे. जुन्या परंपरा जोपासत नव्याचा स्वीकार करणारे लेखकांचे विचार मनाला स्पर्शून जातात.

आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर साथ देणारी आपली पत्नी सौ भारती चा उल्लेख नेहमी ते आदराने करतात. आपल्या यशाचे सर्व श्रेय ते आपल्या पत्नीला देतात.

लेखकांची सुसंस्कारित मुले, सुना, नातवंडे यांनी जणू घराचं गोकुळच फुलले आहे.

लेखकांच्या समाजकार्याचे अनुकरण करत त्यांचे मोठे चिरंजीव डॉक्टर अभिजीत सोनवणे हे डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून काम करतात.  भिक्षेकर्यांचे डॉक्टर म्हणून त्यांना ओळखतात. डॉक्टर अभिजीत सरांनी  आपल आयुष्य   भिक्षेकर्यासाठी वाहून घेतल आहे.

आपला नातू डॉक्टर व्हावा हे आजोबांनी पाहिलेलं स्वप्न लेखकाने प्रत्यक्षात उतरवलंच, शिवाय स्वतःच्या नातवाला सोहमला प्रत्यक्ष डॉक्टर होताना पाहण्याचं भाग्य ही लेखकाला लाभल आहे.

सामान्यातील असामान्य डॉक्टर पी डी सोनवणे यांचे आत्मचरित्र खरंच आजच्या  पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

पुस्तक विक्रीतून मिळणारे सहयोग मूल्य डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या सोहम ट्रस्ट ला भिक्षेकर्यांच्या सेवेसाठी दिले जाणार आहे. पुस्तक विक्रीतूनही समाजकार्य .

संवादिनी : सौ. सुनंदा शिवाजी कदम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

प्रेम रंगे, ऋतू संगे

कवी: सुहास रघुनाथ पंडित

प्रकाशक: अक्षरदीप प्रकाशन आणि वितरण

प्रथम आवृत्ती:१ मे २०२३

श्री सुहास रघुनाथ पंडित यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रेम रंगे ऋतूसंगे हा नुकताच प्रकाशित झाला. या संग्रहातल्या कविता वाचताना प्रेम या सुंदर भावनेचा एक विस्तृत, नैसर्गिक आणि शिवाय अतिशय सुंदर शब्दात व्यक्त झालेला भाव अनुभवायला मिळाला. 

श्री सुहास रघुनाथ पंडित 

पुस्तक हातात घेतल्यानंतर माझं पहिलं लक्ष गेलं ते अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण अशा मुखपृष्ठावर.  हिरव्या धरणीच्या पार्श्वभूमीवर सुंदर बहरलेला लाल गुलमोहर आणि एक मानवी हात ज्यावरचे तर्जनी आणि अंगठा यातलं अंतर हे फारच बोलकं आहे.  कुठलाही चित्रकार जेव्हा समोरच्या दृश्याचं चित्र कागदावर रेखाटतो तेव्हा रेखाटण्यापूर्वी तर्जनी आणि अंगठा उघडून त्या अंतरातून एक माप घेत असतो. ते समोरचं  दृश्य त्याला त्या तेवढ्या स्केलमध्ये चितारायचं असतं.  कवी हा ही चित्रकारच असतो नाही का?  फक्त त्याच्यासाठी रंग, रेषा हे शब्दांच्या रूपात असतात आणि जे जे अवतीभवती घडत असते, दिसत असते ते सारे तो मनाच्या एका स्केलमध्ये टिपत असतो.  मुखपृष्ठावरचा हात आणि ही दोन बोटे अशी रूपकात्मक आहेत.  अवाढव्य पसरलेल्या निसर्गाच्या नजराण्याला मनाच्या कागदावर टिपणारं माप.  खरोखरच सुंदर, अर्थपूर्ण, बोलकं असं हे मुखपृष्ठ!

या काव्यसंग्रहाला लाभलेली डॉक्टर विष्णू वासमकर यांची प्रस्तावनाही अतिशय सुंदर, काव्याभ्यासपूर्ण आणि उल्लेखनीय आहे.  प्रस्तावनेत काव्यशास्त्र, त्याची सहा प्रयोजने, काव्याचे लक्षण, स्वरूप, तसेच काव्यशरीर या संकल्पनेत शब्द, अर्थ, रसोत्पत्ती, अलंकार, वक्रोक्ती, व्युत्पत्ती यांचे महत्त्वाचे स्थान याविषयीचे मुद्दे सुलभपणे उलगडले आहेत.  काव्यशास्त्रातील अलंकार, रस ,वृत्त ही काव्य कारणे किती महत्त्वाची आहेत हे या प्रस्तावनेत सूचकपणे सांगितलेले आहे.  सुरुवातीलाच ही प्रस्तावना वाचताना पुढच्या काव्य वाचनाला मग एक दिशा मिळते.  चांगल्या काव्याची ओळख होण्यास मदत होते. आणि जेव्हा मी पंडितांच्या  प्रेमरंगे ऋतुसंगे काव्यसंग्रहातील एकेक कविता वाचत गेले तेव्हा कवितेतला अभिजात दर्जा, त्यातले अलंकार, रस, वृत्त, छंद त्याचबरोबर प्रतिभा आणि अभ्यास या काव्य कारणांचा ही नितांत सुंदर असा अनुभव आला.  अत्यंत परिपक्व अशा या कविता आहेत.  उच्च कोटीची शब्दकळा यात आहे. काव्य म्हणजे नेमकं काय याचाच या कविता वाचताना खरा अर्थ कळतो.

या संग्रहात एकूण ६६ कविता आहेत. या सर्व कवितांमध्ये प्रेम हा स्थायीभाव आहे.  प्रेमाचे अनंत रंग यातून उलगडलेले आहेत. पंडितांनी त्यांच्या मनोगतात म्हटले आहे की ‘ प्रेम, निसर्ग आणि माणूस यांना एकमेकापासून कसे वगळता येईल?’ आणि हे किती खरे आहे याची जाणीव त्यांच्या या निसर्ग कविता वाचताना होते.

“प्रेमरंगे ऋतुसंगे”  या शीर्षकातच निसर्गाच्या बदलणाऱ्या ऋतुंसोबत उलगडणार्‍या प्रेम भावनेचे अनेक सूक्ष्म पदर दडलेले आहेत. सर्वच कवितांमध्ये गीतात्मकता, भावात्मकता, रसात्मकता आहे.  पंडितांची प्रतिभा, प्रज्ञा, अभ्यास वाचकाला थक्क करून सोडतो.  कवितांना दिलेली सुंदर आणि चपखल शीर्षके हे आणखी एक वैशिष्ट्य.

 प्रत्येक कवितेत प्रेमाचा मंत्र मिळतो, संदेश मिळतो.

       पाण्यामधली अवखळ झुळझुळ

       करात बिलवर करती खळखळ …

 

      शब्द होतील पक्षी आणि गातील गाणी तव दारी..

      लाटेवरती लाटा झेलत तूही आणिक मीही आलो

 

     खूप जाहले खपणे आता

     जपणे आता परस्परांना 

     खूप जाहला प्रवास आता

     गाठू विश्रांतीचा पार जुना.

…  अशा गेयता असलेल्या अनेक सुरेख काव्यपंक्ती पुन्हा पुन्हा वाचाव्यात असेच वाटते.

  उष्ण रश्मीचे सडे,

  कुरळे कुरळे मेघ .

  गर्भिताच्या गुहेतून अर्थवाही काजवे… यासारख्या शब्दरचना किती संपन्न, समृद्ध आहेत तेही जाणवते.

या काव्यसंग्रहातल्या ६६ही  कवितांवर खूप काही लिहिण्यासारखे आहे.  एकेक कवितेचे रसग्रहण करावे इतक्या त्या विलोभनीय आहेत, ताकदीच्या आहेत. मात्र “रात्र काळी संपली…” या एकाच कवितेबद्दल मी जरा सविस्तरपणे लिहायचं ठरवलेलं आहे.  अतिशय सुंदर, मला आवडलेली ही कविता आहे.  पण लिहिण्यापूर्वी एक सांगू इच्छिते की कवी, कविता, वाचक यांचं नातं जुळत असताना कवीच्या मनातले अर्थ आणि वाचकाच्या मनात उलगडलेले अर्थ भिन्न असू शकतात.  विचारांची फारकत होऊ शकते. 

“रात्रकाळी संपली”  हे गीतात्मक काव्य आहे. 

       आसमंती सूर येता नूर सारा पालटे

       रात्र काळी संपली किरण किरण सांगते ।।धृ 

 

      चांदण्याचे नुपूर लेऊन निघून गेली निशा 

      केशराचे वस्त्र ल्यायलेली  अंबरी आली उषा

      पाठशिवणीचा खेळ तयाचा वसुधा पाहते 

      रात्र काळी संपली..

 

      हिरवे दवही तांबूस झाले स्पर्शून जाता रविकिरणे 

      शेपूट हलवीत सुरू जाहले मुक्या जीवांचे बागडणे

      घरट्यामधुनी उडून जाता पहा पाखरू चिवचिवते

     रात्र काळी संपली…

 

     पूर्व दिशेला विझून गेल्या नक्षत्रांच्या ज्योती

     रांगोळीपरी फुले उमलली झाडां-वेलींवरती 

     तबकासम हे गगन सजले हळद कुंकवाने

     रात्र काळी संपली…

 

     गिरणीमधुनी,  रस्त्यामधुनी चक्र गरगरा फिरे

     जागी झाली गुरे वासरे जागी झाली घरे

     क्षणाक्षणाने काळाचेही पाऊल पुढे पडते

     रात्र काळी संपली किरण किरण सांगते …

तसे हे वर्णनात्मक गीत आहे.  “घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला”  या भूपाळीची आठवण ही कविता वाचताना होते. 

.. रात्रकाळी संपलेली आहे आणि सुंदर सकाळ उगवत आहे हा या गीतामधला एक आकृतीबंध.  अतिशय सुंदर, चपखल उपमा आणि उत्प्रेक्षांनी परिपूर्ण असलेलं हे काव्य.

.. चांदण्यांचे नपुर घातलेली निशा, केशराचे वस्त्र ल्यायलेली उषा आणि उषा निशाचा पाठशिवणीचा खेळ पाहणारी वसुंधरा.. पहिल्या कडव्यातले  हे वर्णन म्हणजे शब्दरूपी कुंचल्याने रेखाटलेलं  सकाळचे वास्तविक चित्र.

दुसऱ्या कडव्यातले रविकिरणाच्या स्पर्शाने तांबूस झालेले दव, बागडणारे  मुके प्राणी आणि घरट्यातून उडून जाणारे पाखरू…हे वर्णन पृथ्वीवरची जागी होणारी पहाट अलगद उतरवते.

.. पूर्व दिशा उजळते आणि नक्षत्रांच्या ज्योती विझत आहेत, झाडांवर वेलींवर फुलांची रांगोळी सजली आहे आणि गगन कसे तर तबकासारखे आणि रविकिरणांच्या तांबूस पिवळ्या प्रकाशास हळद-कुंकवाची उपमा देऊन जणू हळद कुंकवाचे हे आकाशरुपी तबक उषेचं स्वागत करत आहे.  या तिसऱ्या कडव्यातलं हे कल्पना दृश्य कसं सजीवपणे शब्दांतून आकारले आहे. या संपूर्ण गीतात हळूहळू उलगडणारी ही सकाळ अतिशय मनभावन आहे.

शेवटच्या आणि चौथ्या कडव्यात जागं झालेलं मानवी जीवन, घरे दारे,गुरे, वासरे यांचं वाहतं वर्णन वास्तव घेऊन उतरतं. आणि शेवटच्या दोन ओळी…

..  क्षणाक्षणांनी काळाचेही पाऊल पुढती पडते

    रात्र काळी संपली किरण सांगते…

या ओळी वाचल्यानंतर या संपूर्ण वर्णनात्मक गीतातला गर्भित आत्माच उघडतो.  संपूर्ण गीताला वेगळ्याच अर्थाची कलाटणी मिळते.  मग मला हे गीत रूपकात्मक वाटले. रात्र काळी संपली हे शब्द आश्वासक  भासले. निसर्गचक्रामध्ये जे अव्याहत, नित्यनेमे घडत असते त्याचा मानवी जीवनाशी, भावविश्वाशी संदर्भ असतो. रोजच येणाऱ्या आणि जाणाऱ्या उषा आणि निशा या माणसाच्या जीवनातल्या सुखदुःखाशी रूपक साधतात.  काळ म्हणजे आलेली परिस्थिती आणि किरण म्हणजे मार्गदर्शक गुरु किंवा आशावाद.  काळाचे पाऊल पुढती पडते म्हणजेच आजची परिस्थिती उद्या नसणार आहे हे सत्य. स्थित्यंतर हे नैसर्गिकच आहे.  त्यामुळे संकटाची, दुःखाची, नैराश्याची काळी रात्र संपून केशराची वस्त्रे लेऊन सकाळ होणार आहे. ही केशरी वस्त्रे म्हणजे आनंदाची प्रतीके. नवा दिवस,नवी स्वप्ने. तमाकडून प्रकाशाकडे होणारी वाटचाल.

ज्यावेळी या अर्थाने मी हे गीतात्मक काव्य वाचले तेव्हा मला शब्दाशब्दामध्ये दडलेलं एक सकारात्मक तत्व सापडलं आणि मग हे गीत केवळ वर्णनात्मक न राहता जीवनाला खूप मोठा रचनात्मक संदेश देणारं ठरतं.  एक लक्षात आलं की या सर्वच सहासष्ट कवितांमध्ये निसर्ग आणि मानवाचं एक अतूट भावात्मक नातं शब्दांनी रंगवलेलं आहे.

खरोखरच पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा या कविता देव्हाऱ्यातली एखादी पोथी वाचताना जी प्रसन्नता आणि ऊर्जा मिळते तद्वतच या कविता वाचताना मन प्रफुल्लित होते.  वाचकांनी या काव्यवाचनाचा जरूर आनंद घ्यावा हे मी आवर्जून सांगते.

सुहास पंडितांनी त्यांच्या अर्पण पत्रिकेत म्हटलं आहे,

       रसिका तुझ्याचसाठी हे शब्द वेचले मी 

       रसिका तुझ्याचसाठी हे गीत गुंफले मी..

कवी आणि वाचकाचं नातं हे किती महत्त्वाचं असतं याची जाण त्यांच्या या शब्दातून व्यक्त होते.  या सुंदर काव्यरचनांबद्दल मी  श्री सुहास पंडित यांचे मनापासून अभिनंदन आणि वाचकांना दिलेल्या या सुंदर भेटीबद्दल धन्यवाद देऊन  त्यांच्या या सुरेल  काव्यप्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते.

परिचयकर्त्या : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘एक उलट एक सुलट’ – लेखिका – सुश्री अमृता सुभाष ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘एक उलट एक सुलट’ – लेखिका – सुश्री अमृता सुभाष ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

पुस्तकाचे नाव – एक उलट एक सुलट

लेखिका – अमृता सुभाष

प्रकाशन – राजहंस प्रकाशन

पृष्ठसंख्या – 178

किंमत – 225

वाचनालयात पुस्तके चाळताना माझी नजर एका पुस्तकावर गेली. त्यावर अमृता सुभाष चा फोटो होता आणि लेखिका देखिल अमृता सुभाषच.

पटकन हे पुस्तक मी निवडलं.हे पुस्तक निवडण्याचे मुळ कारण म्हणजे  अमृता सुभाषचं खूप वर्षापूर्वी ती फुलराणी नाटक पाहीले होते. तेव्हा पासून तिने माझ्या मनावर अधिराज्य केले. तिचं ते “तुला शिकवीन चांगलाच धडा “काही केल्या डोळ्यासमोरून हटत नाही.त्यामुळे हे पुस्तक वाचायची प्रबळ इच्छा झाली.

सुरवातीपासूनच हे पुस्तक खिळवून ठेवतं आणि तिच्या प्रेमात पडायला लावतं. लोकसत्ता चतुरंग पुरवणीतील लेखिकेच्या एकत्रित लेखांचाच हा लेखसंग्रह आहे.

प्रस्तावनेपासूनच लेखिकेच्या लेखनाचे अक्षरशः गारुड पडते. प्रस्तावनेमध्ये तिने तिच्या नातेवाईकांचा आणि लिखाणाचा परस्पर संबंध कसा आहे यावर भाष्य केलेले आहे.

पहिला लेख तिने तिचे “अमृता सुभाष ” हे पडद्यावरिल नाव  कसे ठरविले याबाबत उहापोह केला आहे. तिने जाणून बुजून स्वतःचं आडनाव लावले नाही कारण “जात “ही बाब तिच्यासाठी गौण आहे. त्यांच्या घराण्यात बरेच आंतरजातीय विवाह झाले असून त्या बाबतीत त्यांच्या घरात खूप पुढारलेला दृष्टीकोन आहे. गरज संपल्यावर माणसाची शेपूट गळून पडली तशी जातही गळून पडायला हवी असे तिचे ठाम मत आहे.हे मला खूप आवडले.

दुसऱ्या लेखामध्ये मन मनास उमगत नाही यावर लिहीले आहे या लेखामध्ये कोणालाही मानसोपचार तज्ञांची  मदत लागू शकते व मानसोपचार घेणे म्हणजे एखादयाला तुझ्यात काहीतरी कमी आहे असे सांगणं न्हवे तर आय केअर फॉर यू असे सांगणे आहे शहाणं आणि वेडं मधे भानासकट उतू जाणे नावाचा प्रदेश असतो. तेव्हा आपणाला सावरू शकण्याची मुभा असते तेच काम मानसोपचार करते असे लेखिकेचे मत खूप विस्तृत पणे लिहीलेले आहे.

पुढे मग तिची आई नटी असल्याने तिचे बालपण कसे होते हे ” नटी आई” व आई-वडीलांचे गुण दोष ” वारसा ” या लेखामध्ये मांडले आहेत.

तसे या लेख संग्रहातील सर्वच लेख अप्रतिम आहेत पण गिंको बिलोबा हा लेख खूप भावला. जपान नागासाकी वर अणुबॉम्ब टाकला गेला आणि ही दोन्ही शहर पूर्ण बेचिराख झाली. सगळे काही नष्ट झालेले असतानाही त्या राखेतील फक्त सहा जीवांनी जगणे निवडलं ते होते.ती ही सहा झाडे. ती झाडे अजूनही आहेत. आजही त्या झाडांना आशेचे प्रतिक म्हणून मानतात. या झाडाची प्रेरणा घेऊन जपान्यांनी टोकियो येथे एक फार सुंदर रस्ता तयार केला आणि दोन्ही बाजूला भरघोस पिवळ्या रंगाची पाने फुले असलेली गिंको बिलोबाची झाडे वाढवण्यात आली.या रोडचे  पाहात रहावे असे अतिशय सुंदर फोटो इंटरनेटवर पहायला  मिळतात. सगळ्या मोडतोडी नंतर जिवंत रहाणाऱ्या झाडांचे  तेथील लोकानी कौतुक वाटण्यासारखे संवर्धन केले आहे.हे वाचताना नकारात्मक वातावरणात देखील सकारात्मकतेचे स्फुरण चढते.

ऋतूपर्ण  या लेखामध्ये समलिंगी व्यक्तीबददल समाजाची खूप क्लेशदायक वर्तणूक या बद्दल लिहीले आहे. कितीही निष्णात असले तरी अशा व्यक्तींना समाजातून मिळालेल्या हीन वर्तणुकीवर या कथेत लेखिकेने पोटतिडकीने लिहीले आहे ते वाचून अंगावर शहारे येतात.

वेगळा या लेखामध्ये स्पेशल चाईल्ड बद्दल लिहीले आहे ते चटका लावून जाते मनाला. अशा मुलां बद्दल आपल्याला माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी  आपल्याला कुठेतरी खूप आतमध्ये हलवून सोडतात.धन्य ते माता-पिता जे अशा मुलांना वाढवतात. हा लेख हतबलता अधोरेखित करतो.

हिरवं तळं आणि गाभारा. हा लेखही अतिशय विलक्षण लेख.नैनिताल येथील एक तळं आहे.जेव्हा त्याचा रंग हिरवा होतो तेव्हा तेथे कोणालाही जाण्याची परवानगी नसते. कारण ते तळं पाहणाऱ्याना स्वत:कडे आकर्षित करतं.जसे नायगारा धबधबा प्रत्यक्ष पाहिल्यावर कित्येकांना त्यात उडी घ्यावीशी वाटते व काहींनी ती घेतली सुद्धा आहे.

निसर्गाचं सौंदर्य एखाद्याला स्वतः कडे इतकं आकर्षित करू शकतं की त्यामुळे एखाद्याचा जीव देखिल जाऊ शकतो ते का व कसं हे या लेखामध्ये विस्तृत पणे या मांडलं आहे.

त्यानंतरच्या अस्तु, एकलव्य, टोकियो स्टोरी-मुंबई स्टोरी हे  लेखही भाव भावनाचे विविध कंगोरे अधोरेखित करतात. एक वेगळे पण सच्चे विश्व जणू उलगडत जाते.

अभिनयाबरोबर लिखाणानेही दिल जित लिया अमृता तुमने😘💞 असंच म्हणाव असं पुस्तक.

आयुष्याचे विविध पैलू अगदी सहज अलवार उघडून अनेक विध भावभावनांचा सुंदर आविष्कार घडवला आहे  तिच्या लेखणीने. जियो अमृता मस्तच लेख संग्रह😍💕

या पुस्तकातील आवडलेली वाक्ये – Beautiful young people are accident of nature, but beautiful old people are works of art.

ट्रँजिक फ्लॉ म्हणजे कोणाच्याही अंगी असा एखादा गुण विशेष असतो जो स्वतःचाच घात व्हायला कारणीभूत असतो.

निवडीचा क्षण – एकदा का आयुष्याला निवडलं की पुढचं सगळं आयुष्य बदलते

अगदी पुस्तकाच्या कव्हरवरील अमृताचा फोटो ते मलपृष्ठावरील कविता सारं काही लाजवाब. अविस्मरणीय अनुभव. संग्रही ठेवण्याजोगे पुस्तक. 

🥰दEurek(h)a 😍

🥰दयुरेखा😍

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

26-07-2023

सांगली – मो.नं 9552298887

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अस्तित्व’ – सुश्री सुधा मूर्ती – अनुवाद – प्रा ए आर यार्दी ☆ संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण ☆

सौ.मनिषा विजय चव्हाण

अल्प स्वपरिचय

मी सौ.मनिषा विजय चव्हाण फार्मासिस्ट म्हणून मेडिकल मध्ये रूजू आहे. वाचनाची आवड आहे,पुस्तके वाचून अभिप्राय लिहिते. कविता लिहिते. 

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अस्तित्व’ – सुश्री सुधा मूर्ती – अनुवाद – प्रा ए आर यार्दी ☆ संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण ☆

पुस्तक – अस्तित्व 

लेखिका  – सुश्री सुधा मूर्ती 

अनुवाद – प्रा ए आर यार्दी

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे 

पृष्ठसंख्या – १०४   पाने

पुस्तकाचे मूल्य – ११0  रुपये

संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण

मुकेश उर्फ मुन्ना याच्या जिवनपटावर आधारीत कादंबरी ‘अस्तित्व’.स्वतःचे अस्तित्व किती महत्वाचे आहे.अस्तित्व असणे ,ते जपणे म्हणजे जणू लढाईच.स्वतःचे अस्तित्व हरविलेल्या माणसाची अवस्था अतिशय दयनीय होते .

हिच गोष्ट आपणास ‘अस्तित्व’ कादंबरी वाचल्यावर कळते.

मुन्नाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो.

मग माझी आई कोण?तिने मला का टाकले? तिच्यावर अशी कोणती वेळ आली कि तिने मला दुस-याच्या स्वाधीन केले? हे शोधण्यासाठीचा त्याचा प्रवास,त्याने केलेला संपत्तीचा त्याग.आईवडिलांवरील त्याची श्रद्धा,प्रेम,त्याच्या स्वभावातील खरेपणा.सत्य स्विकारण्याची त्याची मानसिकता.सर्व काही ह्रदयाला भिडते.

स्त्रीचे  परमपावन स्वरूप म्हणजे ‘आई’.

त्या आईची तीन रूपे यात अनुभवायला मिळतात.

जन्म देणारी आई, दूध पाजणारी आई.

पाळणारी, घडवणारी,संस्कारक्षम पूर्ण माणूस बनवणारी आई.

महान अश्या थोर मनाच्या माता यात दिसतात.दोघीही त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत.दिला शब्द पाळताना,वचन निभावताना,सगळ्या गोष्टींसाठी झगडताना

करावा लागलेला त्याग, मनाचा मोठेपणा, विश्वास दिसून येतो.

आणखी एक म्हणजे जन्म कोणत्याही कुळात,गोत्रात ,देशात होऊ देत.माणूस घडतो तो फक्त आणि फक्त त्याच्यावर केल्या गेलेल्या योग्य संस्कारांमुळे हे या कादंबरी मध्ये प्रकर्षाने जाणवते.

रावसाहेबांच्या रूपात एक सच्चा दिलदार माणूस,खरेपणा जपणारा प्रेमळ बाप दिसतो.रक्ताचा नसताना,पोटी जन्म न झालेला, ज्याला आपला मानला तो आपलाच.तसेच अतिशय व्यवहारकुशल माणूस.

आपण म्हणतो भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका पण इथे भावनेला प्राधान्य देऊनच रावसाहेबांनी संपत्तीचे वाटे केले.ही संपत्ती माझी नसून मी याचा मालक नाही.ही सारी संपत्ती मुन्नाची आहे,तोच या सा-या संपत्तीचा एकमेव मालक आहे.ही त्यांची भावना,हा विचार उद्दात्त आहे.सत्यप्रिय,निष्ठावान,असेच त्यांचे व्यक्तित्व आहे.

संपत्तीचा मोहन बाळगता ती स्वतःहून दुस-याच्या स्वाधीन करणारा त्यांचा मुलगा मुकेश उर्फ मुन्ना पाळलेला नसून त्यांचा सख्खा मुलगाच शोभतो ना?

यापेक्षा नात्यातील गोडवा अजून काय असू शकतो?

आजच्या काळात अश्या संस्कारांची अतिशय गरज आहे अतिशय सोप्या भाषेत मांडणी…

वाचताना भावनाविवश व्हायला होते….

खूपच सुंदर आणि वाचनिय…

खरचं सगळ्यांनी वाचायला हवेच….

संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण

सांगली, मो. नंबर….9767090659

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आनंदाच्या गावा जावे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

डॉ मीना श्रीवास्तव

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आनंदाच्या गावा जावे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

पुस्तक – ‘आनंदाच्या गावा जावे’

लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव

प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या – १६३  पाने

पुस्तकाचे मूल्य – १६१ रुपये

पुस्तक परीक्षण- डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे

विश्वास सरांच्या विविधरंगी लेखणीतून साकारलेले त्यांचे जुलै २०२२ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक वाचले. त्यांच्या लेखणीला असे विविधरंग प्राप्त होण्याचे कारण, त्यांचे विविध विषयांवरील अफाट वाचन, गहन चिंतन आणि अनवरत मनन असावे, असा मला विश्वास आहे! बरे, नुसते वाचन करतील ते विश्वास सर कसले? कारण त्यांची जबरदस्त निरीक्षणशक्ती, जी, हे जेथे जातात तेथे यांच्या सांगाती असतेच असते. मी हे ‘निरीक्षण’ यासाठी नोंदवीत आहे, की या बहुल-विषय सामग्रीने सुसज्जित पुस्तकात असलेले विषय! पुस्तकातील समग्र ३९ लेख वाचले, अन पुस्तक वाचल्यावर मी माझ्या अल्पमतीने त्यांना कांही श्रेणींमध्ये विभागले अन ते-ते विषय परत चाळले. ते लेख असे (कंसात लेखांची संख्या दिली आहे): प्रेरणादायी व्यक्तिचित्रे (११), शिक्षण आणि तत्वज्ञान (११), भक्तिरसपूर्ण लेख (५), समाजबोध (४), संगीत (३), आरोग्य (२), कविता (२) आणि साहित्यिक विनोद (१). अर्थात या श्रेणी ढोबळ मानानेच विभागल्या आहेत. या माहितीचा हेतू इतकाच की, लेखकाने या पुस्तकात हाताळलेले बहुरंगी आणि बहुढंगी विषय आपल्यापर्यंत पोचावेत.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

यावरून हे लक्षात येते की प्रत्येक जाणत्या अन नेणत्या, तसेच प्रत्येक वयोगटातील वाचकासाठी या पुस्तकात कांही ना कांही आहे, इतकंच काय, ज्यांना विविध विषयांवर ललित साहित्य वाचायची आवड आहे, त्या वाचकांसाठी तर ही अत्यंत पौष्टिक तसेच रुचकर साहित्यिक मेजवानीच समजावी. अर्थात आभासी मेजवानीचे महत्व आपण जाणतोच, विचारांना खाद्य (food for thought) पुरवायचे असेल तर या पुस्तकाला पर्याय नाही असेच मी म्हणेन. आता यातील सर्वाधिक लेख असलेले विषय बघू या. लेखकाचे स्वतःचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहेच, याचा अनुभव त्यांनी आजवर लिहिलेल्या पुस्तकांतून, लेखमालांमधून, रेडिओवरील आणि प्रत्यक्ष भाषणांतून आपल्याला येतच असतो. त्याच अनुभवाचे संपन्न रूप या ११ लेखातून प्रकर्षाने जाणवते. मोजकी उदाहरणे द्यायची तर यांत आदर्श व प्रसिद्ध व्यक्ती (अंधत्वावर मात करून कर्तृत्वाने आकाशदीप झालले राहुल देशमुख, बहुआयामी शिक्षणाच्या धनी डॉक्टर शारदा बापट, आपल्या हृदयसिंहासनावर सदैव अधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी) आहेतच. परंतू आधी अप्रसिद्ध असून देखील लेखकाच्या सानिध्याने आणि या पुस्तकाच्या पानांवर आता अधिष्ठित होऊन प्रसिद्ध झालेल्या व्यक्ती अधिक आहेत. त्यांच्या हरहुन्नरी आणि विशेष कर्तृत्वाची दखल घेऊन लेखकाने त्यांचा यथोचित सन्मान केलाय, याबद्दल मी सरांचे आणि त्या व्यक्तींचे मनःपूर्वक अभिनंदन करते. यात लेखकाची चोखंदळ अभिरुची दिसते. कारण या व्यक्ती विविध क्षेत्रातील आहेत. उदाहरण द्यायचे तर आधुनिक रामदास, हे सामान्य असूनही असामान्य सामाजिक कार्य करणारे! आणि माळे गुरुजी. अशाच इतरही व्यक्तींचा मनोज्ञ वेध लेखकाने घेतलाय! सजीव व्यक्तिचित्रण तर सरांचे बलस्थान. म्हणूनच त्या सर्वांना जणू भेटण्याचे समाधानच लाभावे इतक्या त्या सरांनी आपल्या सहज सुंदर ओघवत्या लेखनातून जिवंत केल्या आहेत. या पुस्तकाचे मला तरी हेच सर्वोच्य आनंदाचे निधान वाटले.

आता अन्य श्रेणीकडे वळू या. शैक्षणिक विषय आणि तत्वज्ञान हे तर सरांचे त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक अनुभवाचे लाडके विषय! यामुळे ते लिहितांना लेखकाला अन वाचतांना वाचकांना आनंदाचे डोही आनंदतरंग असा अनुभव आला नाही तरच नवल! अशिक्षित कोण (उदा.बहिणाबाई), उन्नयन विचारांचे अन भावनांचे, कौशल्यासुत (हा राम नाही, पण कौशल्य नसेल तर कधी-कधी जीवनात राम नाही हा सरांचा एकदम अनवट विचार!) कोण कुणाजवळून शिकले ही मला अत्यंत भावलेली भावस्पर्शी गोष्ट, (पाश्चात्त्य असूनही आपल्या हृदयाचा संपूर्णपणे ठाव घेणारी) एका शिक्षिकेची अन तिच्या टेडी या विद्यार्थ्याच्या हृदयंगम नात्याची. मंडळी, आपण शिक्षक असा किंवा विद्यार्थी, या संपूर्ण कथेचे वाचन हा दैवी अनुभव हे आणखी एका अश्रूभरल्या आनंदाचे पान!

मंडळी, आता ज्या प्रकरणाचा उल्लेख करते ते शेवटचे आणि अतिशय वाचनीय, कारण संपूर्ण पुस्तकातील सर्वात अधिक पानांचे म्हणून नव्हे, तर ध्येयनिश्चितीच्या मार्गावरील पायऱ्या, खाचाखळगे आणि मळलेल्या वाट सोडून देखील मार्गक्रमण कसे करता येईल याचे विस्तृत, सुनियोजित, परखड आणि अनुभवपूर्ण, तरीही पायरी-पायरीने वृद्धिंगत होणारे रोमांचकारी विवेचन. कारण प्रत्येक पायरीच्या पुढे काय विचार असेल याची उत्सुकता! हे शीर्षक वाचून हे समस्त प्रकार विद्यार्थ्यांकरिता राखीव असावेत असे मला (उगीच) वाटले, मात्र, मित्रांनो मला यात मला पहिला धडा हाच मिळाला की बाह्यरंगावर (शीर्षक) जाऊ नका, अंतरंगात जाऊन बघाल तर या परीस आनंदाचे क्षण नोहे! विश्वास सर, या शेवटच्या भागात आपण आनंदाचेच नव्हे तर आपल्या लेखनकौशल्याचे देखील शिखर गाठलेत बरं का!

आता इतर भागांविषयी लिहिणे म्हणजे डुप्लिकेट पुस्तक छापल्यासारखे होणार. शिवाय आपल्याला पुस्तक वाचायला प्रवृत्त करणे हा माझा प्रमुख उद्देश आहे.

सरांची लालित्यपूर्ण भाषा म्हणजे त्यांच्यासारखीच साधी, सुलभ आणि सर्वांना आपलीशी वाटणारी. क्लिष्ट शब्दांचे आणि अवजड कल्पनांचे जाळे नसल्याने या सुगम आणि नितांतसुंदर साहित्याचा आस्वाद प्रत्येक जण घेऊ शकेल. अभिजात लेखन वजनदार असलेच पाहिजे असे नाही. शिक्षकी बाणा जपत त्यांनी हे ललित लेखन असे केले आहे की मागील बाकावर बसलेल्या मस्तीखोर किंवा ढ विद्यार्थ्याला देखील याचे आकलन होईल. किंबहुना हाडाच्या शिक्षकाचे टार्गेट बहुदा हेच विद्यार्थी असतात. साहित्याच्या बाबतीत मी पण बॅकबेंचर होते. म्हणूनच या पुस्तकाबद्दल मला विशेष प्रेम निर्माण झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, आपण कोठेही बसा मित्रांनो, मल्टिप्लेक्समधील मेगास्क्रीनप्रमाणे हे सर्व लेख तुमच्या डोळ्यांचे अन हृदयाचे पारणे फेडणार यात मला कुठलीच शंका नाही.

या पुस्तकाच्या शीर्षकाविषयी माझे मत मांडते. यात आनंदाच्या वाटाच वाटा आढळतील. कुठलेही पान उघडा, ३-४ पानांत आनंदाचे दार उघडलेलं दिसणार. आपण फक्त चालायचे काम करा (चालण्यावर देखील एक धडा हाय! चालतंय की म्हणून, न चालणाऱ्यांसाठी खास आहेर!) आणि सरांच्या ऋजू व्यक्तिमत्वासमान मृदू, मुलायम भाषेत सूचना आहेत. (त्यांचा आवाज ऐकायला मिळाला असता तर तलत सारख्या असे म्हटले असते) योग, व्यायाम, सामाजिक कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि बरंच कांही!

आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती, तसेच या पुस्तकातील व्यक्तिरेखांनी त्यांच्या प्रेरणादायक आयुष्यात आनंद शोधलाय. काहींच्या जीवनात अपार दारिद्र्य, हाल, कष्ट, मेहनत, या सर्वांत देखील आनंद असतो हे या पुस्तकाच्या वाचनातून कळले. मला तर हे पुस्तक वाचतांना असे वाटले की आपण एका अत्यंत रमणीय अशा उपवनात विहार करतोय! त्यात दिसलेत काटेरी विविधरंगी गुलाब, जाई-जुई या जुळ्या बहिणी, रंगीबेरंगी शेवंती, नाजूक पारिजातक, धुंद गंध असलेला सोनचाफा, कमलिनी आणि कुमुदिनी वगैरे वगैरे, एक विसरले: बकुळीची नाजूक फुले देखील दृष्टीस पडली की! यांच्या मनमोहक रंगांचा अन मनोवेधक गंधांचा किती अन कसा आस्वाद घ्यावा हा प्रश्नच होता. पण एकदा उपवनाची मालकी मिळाली की, कधीही अन कितीही वेळा हे अवर्णनीय सुख अनुभवता येईल याचा आनंद आहे. अन शेवटी जाता जाता आठवले ते निराळेच, या उपवनाची हिरवीजर्द वाट चाळीगावावरून सुरु झाली, दूर-दूर गेली आणि परत मुक्काम पोस्ट, आनंदाचे गाव, म्हणजे चाळीसगावातच येऊन थांबली की!

विश्वकर्मा पब्लिकेशन्सनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक विकत घ्या, वाचा आणि दुसऱ्यांना भेट द्या, हेच आजच्या दिनाचं आनंदवनभुवन समजा!

धन्यवाद!

पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ गुजगोष्टी शतशब्दांच्या… सुश्री वीणा रारावीकर ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? पुस्तकावर बोलू काही?

☆ गुजगोष्टी शतशब्दांच्या… सुश्री वीणा रारावीकर ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

पुस्तक – गुजगोष्टी शतशब्दांच्या

लेखिका – वीणा रारावीकर

प्रकाशक – सृजनसंवाद प्रकाशन

पृष्ठ संख्या – ११५

 किंमत – २२५ /-

वीणा रारावीकर या पदार्थविज्ञान,संगणक तंत्रज्ञान व्यवस्थापन या विषयातील उच्चशिक्षित पदवीधर आहेत.लोकप्रिय  ललित लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत.अनेक प्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित आहेत.त्यांचा नावीन्यपूर्ण ” गुजगोष्टी शतशब्दांच्या “  हा लघुकथा संग्रह नुकताच वाचण्यात आला. या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे शंभर शब्दांच्या शंभर लघुकथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुस्तकाच्या नावात गंमत आहे. आपण जवळच्या माणसांशी हितगुज करत असतो. आपल्या खोल मनाच्या कप्प्यात दडलेलं त्यांना  सांगून मन मोकळं होतो. आपल्यात एक विश्वासाचे नाते तयार होते. मला वाटते त्याच अधिकाराने लेखिकेने या लघुकथातून वाचकांशी संवाद साधला आहे. एखादी गोष्ट पाल्हाळ लावून सांगणे एक वेळ सोपे, पण नेमक्या शब्दात मांडणं अवघड आहे. ते अवघड  काम लेखिकेने या पुस्तकात नेमके साधले आहे.

सुश्री वीणा रारावीकर

वाचनाची आवड तर आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनासाठी वेळ काढणे मोठी गोष्ट झाली आहे. अशा वेळी खूप मोठी गोष्ट वाचत बसायला वेळ नसतो. तसेही आजच्या नव्या पिढीला सगळं कसं झटपट हवं असतं. त्यांची ही वाचण्याची भूक भागवण्याचा प्रयत्न लेखिका वीणा रारावीकर यांनी ” गुजगोष्टी शतशब्दांच्या ” या लघुकथा संग्रहातून केली आहे. शंभर शब्दांच्या शंभर गोष्टी ही आपल्याला सोपी गोष्ट वाटू शकते..पण प्रत्यक्षात ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कथेचे मूल्य हरवू न देता आशय संपन्न कथा मर्यादित शब्दात लिहिणे म्हणजे कसोटीचे काम आहे. हे लघुकथा लेखनाचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. लघुकथा लिहिण्याचा एक प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे.

लघुकथेतील  शंभर शब्दांच्या शंभर गोष्टी– यातली प्रत्येक गोष्ट नेटकी झाली आहे. कथेची मांडणी उत्तम आहे. नेमक्या शब्दात कथा मांडायची असल्याने शब्दांचा फाफटपसारा कुठे दिसत नाही. प्रत्येक शब्द विचार करून लिहिला आहे. तरीही कोणतीही कथा ओढूनताणून झाली आहे असे वाटत नाही. कथा प्रवाही आहेत. पटपट वाचून होतात.

लघुकथेतील विषय रोजच्या दैनंदिन जीवनातील असल्याने वाचकाला प्रसंग आपले वाटतात. वाचक कथेचा विषय आपल्या अनुभवाशी जोडून बघतो. कोणत्याच विषयाचे लेखिकेला वावडे नाही. आई, सासू, सून, नणंद भावजय, मुलगी, फिटनेस, ऑनलाईन शिक्षण,अपंगत्व, माणुसकी, वयोवृद्ध लोकांच्या समस्या,पदर,यासारख्या अनेक विषयांवर गोष्टी लिहिल्या आहेत. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण आहे. 

लघुकथेची मांडणी प्रसंगाला धरून आहेत. लघुकथेचे काही विषय हलकेफुलके आहेत तर काही विषय विचार करायला भाग पाडणारे आहेत, तर काही विषय नवी शिकवण देणारे आहेत. तर काही विषय  प्रबोधन करणारे आहेत. लघुकथेतून समाजाचे, व्यक्तीच्या स्वभावाचे, मनोवृत्तीचे निरिक्षण नेमक्या शब्दात लेखिकेने शब्दबद्ध केले आहे.

समाजात पावलोपावली पैश्याचे महत्व वाढताना दिसत आहे. आज पैश्यापुढे नात्यांची किंमत शून्य होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज नाती सोयीनुसार आठवतात, हे ‘ निर्मळ नाती ‘ या कथेतून स्पष्ट झाले आहे. गरज निर्माण झाली की विसरलेली नाती  आठवतात. मनात तर असते पण आपण  काही कारणाने दुरावतो. पण एखादा प्रसंग असा येतो  जेव्हा आपल्याला  कुणाच्या तरी आधाराची गरज निर्माण होते . जिथे नाती निर्मळ असतात  तिथे कसलीच अडचण येत नाही.

आईचं प्रेम शाश्वत असतं. ते कोणत्याही कारणानं कमी किंवा जास्त होत नाही. आईचं प्रेम व्यक्त करण्यापलीकडेचे असते. सूनेने बोलणे तोडले, संबंध तोडले तरी आईच्या प्रेमावर याचा परिणाम होत नाही. आपलं मुल संकटात आहे म्हटल्यावर आई आपलं सर्वस्व पणाला लावते, हे “अहो आई” या लघुकथेतून अधोरेखित होते. आताच्या नव्या पिढीचे विचार,आचार, जीवनशैली वेगळी आहे.तरी त्यांच्यात प्रामाणिकपणा जिवंत आहे. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नव्या पिढीत आहे, हेच लेखिकेने ‘ पत्रास कारण की’ आणि ‘ पत्रास उत्तर की ‘ या लघुकथेतून मांडले आहे.

गरिबीनी गांजलेल्या मुलांच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे भरणारी श्यामल ” फुगे घ्या फुगे ” 

या लघुकथेतून दिसते. पदर, निर्णय, हळदी कुंकू अशा अनेक गोष्टी मनात घर करून राहतात.

जीवनात अनेक समस्यांना समोरे जावे लागते. हेच खरं जगणं आहे. गुजगोष्टीतील लघुकथा हेच सांगतात. गोष्टी खूप मोठ्या नाहीत, प्रसंग साधेच आहेत. पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा हवा. म्हणजे जगणं वेगळं, सोपं आणि सुंदर होते. प्रत्येकांने * गुजगोष्टी शतशब्दांच्या* हे पुस्तक जरूर वाचावे. या गोष्टीचा आनंद घ्यावा. जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलावा.

लेखिकेला पुढील लिखाणासाठी, साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा देते.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “कालिंदी” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

स्व-परिचय

मी सौ. मंजिरी येडूरकर, MSc, BEd  असून मिरज येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्या काळात रोजच्या सांगली – मिरज बस प्रवासात मिळणाऱ्या वेळेत काव्य निर्मिती सुरू झाली. पण त्या प्रसंगानुरूप! कुणाचा वाढदिवस, सहस्त्र चंद्र दर्शन, निरोप समारंभ, लग्न मुंज अशा समयोचित कविता करायला सुरुवात झाली. मी निवृत्ती जरा लवकरच घेतली. त्यामुळं वेळ मिळत होता. सुचलेलं लगेच लिहायला बसू शकत होते. मग कथा ललित लेख लिहायला सुरवात झाली. ‘जाहल्या तिन्हीसांजा’ हा कवितासंग्रह व ‘मर्म बंधातली ठेव ही’ हा कथा, ललित लेख यांचा संग्रह मुलाने प्रकाशित केला. अर्थात फक्त घरगुती वितरणासाठी. स्वरचित कवितांना चाली लावून, त्या  विविध कार्यक्रमात सादर करत होते. पण खरी सुरवात झाली ती कोविड मध्ये आम्ही भावंडांनी सुरू केलेल्या साहित्य कट्ट्या पासून. त्याच्या थोडं आधी महावीर वाचनालयाच्या साहित्य कट्ट्या मध्ये सहभाग घेत होते. त्यामुळेच साहित्यिक मैत्रिणी मिळाल्या. कांहीतरी लिहिण्याची उर्मी निर्माण झालीच होती, त्यात भावंडांनी भर घातली.आता थांबायचं नाही असं ठरवलंय. बघू!

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कालिंदी” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆ 

पुस्तक – कालिंदी (लघु कादंबरी)

लेखिका – सुश्री अनुराधा फाटक 

प्रकाशक – नवदुर्गा प्रकाशन 

पृष्ठ संख्या – 136

किंमत – 250 रु

परिचय – मंजिरी येडूरकर. 

मुखपृष्ठ खूपच बोलकं आहे. कालिंदी मातोश्री या वृद्धाश्रमाचा आधार घेण्याचा विचारात आहे.असं दृश्य चित्रित केलं आहे.

श्रीमती अनुराधा फाटक

या लघुकादंबरीत एका स्त्रीची विविध रूपं फुलवली आहेत. आपला मुलगा लहान असतांना रणांगणावर निघालेल्या पतीच्या मनातील चलबिचल पाहून, कठोर होऊन त्याला स्वतःचं कर्तव्य बजावण्याचा आग्रह धरणारी वीरांगना, पती निधनानंतर मुलाचं संगोपन करणारी, त्याच्या विकासासाठी, उन्नतीसाठी झटणारी आई, मुलानं न सांगता लग्न केल्यानंतर ही त्याला समजून घेणारी शांत आई, एका रात्रीत पूर्णपणे बदललेला मुलगा बघून कांही न बोलता त्याच्या आयुष्यातून बाजूला होऊन वृद्धाश्रमाचा आधार घेणारी संयमी आई, अर्थात तीच नंतर त्या वृद्धाश्रमाचा आधार बनते. आपला मुलगा अडचणीत आहे व त्याला अडचणीत आणणारी त्याची पत्नीच आहे हे माहीत असूनही त्याला त्याच्या नकळत मदत करणारी हळवी आई, मुलाला कफल्लक करून त्याची बायको सोडून गेली व तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला हे समजल्यावर आपली सर्व मिळकत त्याच्या नावावर करणारी वत्सल आई, मुलानं दिलेली हीन वागणूक  विसरू न शकलेली व त्यामुळे पुन्हा त्याच्या समोरही जायचं नाही असं ठरवणारी स्वाभिमानी आई, मुलाची वाताहात सहन न झाल्यामुळे प्राणत्याग करणारी आई! ही कालिंदीची सारी रूपं आपल्या काळजाला स्पर्श करून जातात.कालींदीचं भावविश्व, समाजासाठी झटण्याची वृत्ती, दुःखीताच्या हृदयात प्रवेश करून त्याचे डोळे पुसण्याची ताकद या गुणांनी या व्यक्तिरेखेला आणखीनच झळाळी आली आहे.  असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व उलगडत नेण्याचं शिवधनुष्य लेखिकेने लीलया पेलले आहे.निराधार झालेला मुलगा आईला शोधत येतो.तोपर्यंत आईनं वैकुंठाचा रस्ता धरलेला होता. तो विचारतो,” आई कुठे गेली?” याचं उत्तर डॉ सुनील देतात,” मुलाचं बालपण शोधायला गोकुळात गेली.” अशा सुरेख कल्पना तुम्हाला या लघुकादंबरीत वाचायला मिळतील. आवश्य वाचा.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री

मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर” — लेखिका : सुश्री विनया खडपेकर ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

श्री कचरू सूर्यभान चांभारे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर” — लेखिका : सुश्री विनया खडपेकर ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

पुस्तक .. ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर

लेखिका .. विनया खडपेकर

प्रकाशक .. राजहंस प्रकाशन पुणे

प्रथमावृत्ती  2007

सातवी आवृत्ती: एप्रिल २२

पृष्ठे …288

अहमदनगर आता अहिल्यानगर नगर म्हणून ओळखलं जाईल….ज्या कर्तुत्वान मातेचे नाव या जिल्ह्याला देण्यात आले आहे …त्या  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील हा ग्रंथ !

ग्रंथाचा आरंभ करताना लेखिका विनया लिहितात की ….

अहिल्याबाई होळकर…

ती सत्ताधारी होती .पण ती सिंहासनावर नव्हती.ती राजकारणी होती पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.

ती पेशव्यांची निष्ठावंत होती पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.

ती व्रतस्थ होती पण ती संन्यासिनी नव्हती.

जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्याचा धर्म होता, हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता ,तेव्हा..

तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळा असे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरातून घुमले…. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती, तर तिला माणुसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या.

… लेखिकेने अहिल्याबाई चरित्र ग्रंथ मांडताना हा जो पहिलाच परिच्छेद लिहिला आहे ,त्यात ग्रंथाचे सार आहे, तसेच लोकमातेचेही जीवनसार आहे.

युगपुरूष ,लोककल्याणकारी राजांची आई राजमाता जिजाऊसाहेब, मुत्सद्दी येसूबाई राणीसाहेब, भद्रकाली ताराराणी मातोश्री  ,लोकमाता अहिल्याई ,झाशीची राणी लक्ष्मीबाई, अशा अनेक नारी नररत्नांनी इतिहासाच्या पानावर अतुलनीय छाप सोडलेली आहे. दुर्दैवाने त्या काळात स्त्रियांविषयी लिहून ठेवण्याची रीत नव्हती किंवा लिहिलं तरी भरभरून लिहावं अशी वहिवाट नव्हती. त्यामुळे नारी वंशात जन्माला येऊन  आणि नरश्रेष्ठाहून काकणभर अधिकची कामगिरी करूनही या अग्निरेखा थोड्या दुर्लक्षितच राहिल्या. अलीकडील काळात बरेचसे लेखन झाले आहे ,हा भाग वेगळा.

कुंभेरीच्या लढाईपासून लेखिकेने या चरित्र कादंबरीची सुरूवात केली आहे. सुरजमल जाटासोबत चाललेली ही लढाई अंतापर्यंत पोहचत नव्हती. निकराची झुंज चालू होती पण अंतिम परिणाम येत नव्हता. दुर्दैवाने १७ मार्च १७५४ रोजी  भर दुपारी अत्यंतिक दुर्दैवी घटना घडली. फिरत्या तोफेतून आलेला एक गोळा खंडेराव होळकरांच्या वर्मी बसला ,अन् होळकरशाहीच्या एकुलत्या एक खांबास उद्धवस्त करून गेला. खंडेरावांच्या जाण्याने मल्हारबाबा कोसळून पडले. उणंपुरं तिशीचं वय ,पदरात दोन लेकरं असताना अहिल्यामाईस वैधव्य आलं. धार्मिक आचरणाचा पगडा असलेल्या अहिल्यामाई सती जाण्याचा निर्णय घेतात पण मल्हारबाबा त्यांना परावृत्त करतात. संसार हे मिथ्या मायाजाळ असल्याचे एक मन सांगत असले तरी लहानग्या मालेरावातून व लाडक्या मुक्ताईतून लोकमातेचा जीव निघत नव्हता. मल्हारबाबा हे अहिल्यामाईस गुरू होते, पिता होते. त्यांच्या आज्ञावजा विनंतीचा मान ठेऊन अहिल्याई मागे थांबतात.

धर्मपरायण राज्यकारभार करताना अहिल्यामाईंनी प्रजेवर पुत्रवत प्रेम केले.त्यांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग, घटना लेखिकेने सविस्तर मांडल्या आहेत. अहिल्यामाईंचे चरित्र मांडताना थोरले बाजीराव पेशवे ते दुसरा बाजीराव पेशवा असा अठराव्या शतकाचा राजकीय पट लेखिकेने वकुबाने मांडला आहे. शिंदे व होळकर हे पेशवाईचे दोन नेत्र होते. शिंदे-होळकरातील संघर्ष ,दुरावा व जवळिकताही लेखिकेने मांडली आहे. कर्तबगार राज्यकर्ती व धर्मपरायण पुण्यश्लोक म्हणून अहिल्यामातेस दोन बाजू आहेत. या दोघांचाही सार ग्रंथात आला आहे.

मल्हारबाबा व मालेरावांच्या मृत्यूनंतर राघोबादादा इंदूर संस्थानावर वरवंटा फिरविण्याच्या विचारात असतात. अर्थात याला माधवराव पेशव्यांची संमती नसते. पण तरीही पेशवेपद न मिळाल्यामुळे अस्वस्थ राघोबा काहीतरी अचाटच उद्योग करत असतात. त्यांच्या या निकृष्ट चालीला अहिल्यामाईंनी मुत्सद्दीपणे प्रतिशह दिला, या घटनेला तोड नाही. पण पुढे राघोबादादा दुर्दैवाच्या फे-यात अडकतात. नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतरही बारभाई कर्ते राघोबास पेशवाईची वस्त्रे मिळू देत नाहीत. गोरे अस्वल (इंग्रज ) राघोबाला गुदगुल्या करत ,स्वतःच्या जाळ्यात ओढतात. राघोबा भरारी फरारी जीवन जगत असताना   राघोबाच्या पत्नीस म्हणजे आनंदीबाईस आसरा देतात. राघोबाच्या पापाच्या छायेची आठवण न करता मायेची छाया देतात…. हे सगळेही या पुस्तकातून समजते. 

धार्मिक कार्य करताना अहिल्यामाईंनी राज्याची सीमा लक्षात घेतली नाही. पश्चिम टोकाच्या गुजरातच्या सोरटी सोमनाथपासून ते अति पूर्वेच्या जगन्नाथ पुरीपर्यंत ,समुद्र काठच्या रामेश्वर दक्षिण तीरापासून ते उत्तरेत अयोध्या ,बद्रीनाथ, गया ,मथुरा अशी सर्वत्र मंदिराची बांधकामे, नदीवरील घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे लोकमातेने घडवून आणली. त्यांचा न्यायनिवाडाही चोख होता. चोर ,पेंढारींचा बंदोबस्त करताना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देऊन ,विघातक हात ,विधायक हात बनविले.

प्रजाहितरक्षक लोकमातेचे कार्य देवगणातले असले तरी मनुष्य गणातले दुःख त्यांना चुकलेले नव्हते. सत्तर वर्षाच्या दीर्घ आयुत त्यांनी दोन डझनाहून अधिक जवळच्या लोकांच्या मृत्यूचे कडवट घास गटगट गिळले. पती खंडेरावांचा आभाळदुःख देणारा मृत्यू, पतीसोबत सती गेलेल्या स्त्रियांचे मृत्यू, पितृछत्र देणारे सासरे मल्हारबाबा, पुत्र मालेराव, सासू गौतमाबाई, सती गेलेल्या सुना, जावई यशवंत फणसे, नातू नथोबा ,लेक मुक्ताईचं सती जाणं ,सुभेदार तुकोजी होळकरांच्या पत्नी रखुमाईचा मृत्यू …..असे किती प्रसंग सांगावेत…  मृत्यूचे कडवट प्याले रिचवत रिचवत मातोश्रींचे जीवन पुढे पुढे सरकत होते. मुक्ताईच्या मृत्यूनंतर मात्र लोकमाता खरोखरीच खंगल्या होत्या. त्यानंतर अल्पावधीतच लोकमातेचा देह निष्प्राण झाला.

अखेरचे पर्व व उपसंहार या शेवटच्या दोन प्रकरणात लोकमातेच्या कर्तृत्वाचा अर्क मांडला आहे. वाचकाने शेवटचं  लेखनतीर्थ जरूर प्राशन करावं.

ऐतिहासिक शब्दांचे अर्थ देण्यासाठीही लेखिकेने आठ पाने खर्ची घातली आहेत.अनेक ऐतिहासिक संज्ञा स्पष्ट होण्यासाठी हा दस्तऐवज उत्कृष्ट आहे. ‘ अहिल्यामाईंचे जनकल्याण कार्य ‘ ही यादी वाचताना त्यांच्या आसेतुहिमाचल नवनिर्माणाची आपल्याला कल्पना येते. त्यानंतरच्या पानावर लोकमातेच्या जीवनातील ठळक घटनांचा तपशील तारीखवार मांडला आहे. संदर्भ सूची वाचताना लेखिकेच्या परिश्रमाची कल्पना येते. व शेवटच्या पानावर आपल्याला लेखिकेचा परिचय वाचायला मिळतो.

बीड-अहमदनगरच्या सीमेवर छोट्या गावात जन्मलेली एक ग्रामकन्या, पेशवाईच्या मातब्बर सुभेदाराची सून होऊन परराज्यात जाते, दुःखाचे अगणित कढ झेलत होळकरशाहीचा ध्वज लहरता ठेवते, आदर्शाचे नवनिर्माण पीठ तयार करत पुण्यश्लोक बनते…. हा अहिल्यामाईंचा जीवनप्रवास रोमांचकारी व प्रेरणादायी आहे. ‘ ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई ‘ वाचत असताना अज्ञात असलेल्या अनेक गोष्टी ज्ञात होतात.एवढे मात्र खरे. “ ज्ञात-अज्ञात “  एकदा तरी वाचावेच ,अशी विनंती करतो.

पुण्यश्लोक लोकमातेस स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

परिचयकर्ता – श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘बिटवीन द लाईन्स’ (एकांकिका संग्रह)  – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘बिटवीन द लाईन्स’ (एकांकिका संग्रह)  – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆

जगण्याचा नाट्यपूर्ण वेध ! – बिटवीन द लाईन्स (एकांकिका संग्रह)

लेखक : डॉ. मिलिंद विनोद. 

प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई.               

डॉ. मिलिंद विनोद यांचा ‘बिटवीन द लाईन्स’ हा दहा एकांकिकांचा संग्रह. या सर्वच एकांकिका,नोकरी व्यवसायानिमित्त लेखकाचे विविध परदेशांमधील प्रदीर्घकाळचे वास्तव्य त्याच्या अनुभवांचा पैस विस्तारित करणारे ठरल्याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत.

या एकांकिका विषय-वैविध्य आणि आशय  यादृष्टीने लक्षवेधी आहेत. तसेच त्यातून डाॅ.मिलिंद विनोद यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, जगण्यातली विसंगती न् कालातीत तसेच कालपरत्त्वे बदलणाऱ्या प्रश्नांचे बोचरेपण अधिकच तीव्र करीत असल्याचेही जाणवते.

‘मा सलामा जव्वासात’ व ‘वेसोवेगल सिनकाॅप’ अशी वरवर अनाकलनीय तरीही अर्थपूर्ण शीर्षकांसारखीच ‘बिटवीन द लाईन्स’ , ‘विजिगिषा’ यासारखी सुबोध वाटणारी बाकी एकांकिकांची शीर्षकेही रसिकांची उत्सुकता वाढवणारी आणि या एकांकिकांचे वेगळेपण अधोरेखित करणारीही आहेत.

‘मा सलामा जव्वासात’ आणि ‘विजिगिषा’ या एकांकिकांमधील नाट्य अनुक्रमे दुबई व अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. ‘मा सलामा जव्वासात’ मधील जीवनसंघर्ष अस्वस्थ करणारा आहे. आपलं कुटुंब, आपला देश यापासून दूर परदेशी कामधंद्यासाठी जाऊन तिथे वर्षानुवर्षे असह्य कष्टप्रद आयुष्य व्यतीत करावं लागलेल्या मजूर- कामगारांचं उध्वस्त भावविश्व आणि त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीतला भ्रमनिरासांती व्यथित करणारा अखेरचा प्रवास वाचकांच्या मनाला चटका देऊन जातो !

‘विजिगिषा’ ही एका सत्यघटनेवर आधारलेली, ‘अॅराॅन’ नावाच्या इंजिनिअरच्या, एका अनपेक्षित वळणावर सुरु झालेल्या घुसमटीमधील उलघालीचा नाट्यपूर्ण वेध घेणारी एकांकिका आहे.

या दोन एकांकिकांचा हा ओझरता परिचयसुध्दा इतर एकांकिकांचा कस आणि जातकुळी यांचा अंदाज येण्यास पुरेसा ठरावा असे वाटते.

इतर सर्व एकांकिकांची पार्श्वभूमी भारतीय असून त्यांच्या आशय-विषयांचं वेगळेपणही गुंतवून ठेवणारे आहे. अर्थशून्य अशा निरस मराठी मालिकांचं उपरोधिक चित्रण (‘टी आर पी’ अर्थात ‘थर्ड रेटेड पब्लिक’), गीतरचना,संगीत आणि गायन यापैकी कोणती कला श्रेष्ठ असा पेच पडलेला नायक आणि  गीतकार,संगीत-दिग्दर्शक आणि गायिका या रुपात त्याच्या सहवासात आलेल्या तीन स्रियांपैकी  कुणा एकीची निवड करावी हा त्याला पडलेला प्रश्न (‘त्रिधा’ द म्युझिकल), सरोगेट मदरची मानसिक ओढाताण, अस्वस्थता, दुःख आणि परिस्थितीशरणता (ओव्हरी मशीन), दयामरणाचा प्रश्न (वेसोवेगल सिनकॉम), संगीतप्रेमींची कालानुरुप बदललेली अभिरुची आणि त्यामुळे जुन्या संगीताचा वारसा प्राणपणाने जपू पहाणाऱ्या एका बुजूर्ग कलाप्रेमीची होणारी मानसिक कुतरओढ (रुखसत विरासत), विडी-कामगार स्त्रियांचं शोषण (पॅसिव स्मोकर), ‘वेड (अन)लाॅक’ मधे विभक्त जोडप्याला अनपेक्षित अल्पसहवासात झालेला हरवलेल्या प्रेमाचा साक्षात्कार, ‘बिटवीन द लाईन्स’ मधलं समाजापासून तुटलेलं किन्नरांचं वेदना आणि वैफल्यग्रस्त जगणं…..! ही या संग्रहातील एकांकिकांची ओझरती झलक !!

या सर्व एकांकिकांचं सादरीकरण अर्थातच दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांचाच कस पहाणारं ठरणार असलं, तरी लेखक-दिग्दर्शकाच्या योग्य समन्वयातून तयार होणाऱ्या या एकांकिकांच्या रंगावृत्ती प्रेक्षकांना उत्कट नाट्यानुभव देण्यास पूरक ठरतील असा विश्वास वाटतो.

पुस्तक परिचय – श्री अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print