श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “१९६५ भारत – पाकिस्तान युद्धकथा” – लेखिका: सुश्री रचना बिश्त रावत – मराठी अनुवाद: श्री भगवान दातार ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : १९६५ भारत पाकिस्तान युद्धकथा
लेखिका : रचना बिश्त रावत
अनुवाद : भगवान दातार
पृष्ठ : १६८
मूल्य: २९५₹
१ सप्टेंबर १९६५… पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील चुंब जिल्ह्यामध्ये हल्ला चढवला. शांतताप्रिय भारत देश युद्ध छेडणार नाही, अशी पाकिस्तान्यांची समजूत होती. पण ती चुकीची ठरली. त्या आक्रमणामुळे रक्तपाती युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वांत मोठं रणगाडा-युद्ध म्हणून ओळखलं गेलं, ज्यात पाकिस्तानकडील अमेरिकी पॅटन रणगाड्यांना भारतीय सैनिकांनी नामोहरम केलं.
लष्करी नोंदी आणि युद्धात सर्व जागी झालेल्या सैनिकांच्या तसंच हुतात्म्यांच्या नातेवाइकांच्या मुलाखतींच्या आधारे लेखिका रचना बिश्त यांनी हाजी पीर, असल उत्तर, फिलोरा यांसारख्या लढायांची माहिती, त्यांमधले डावपेच, अचानक उभी ठाकलेली आव्हानं आणि त्यांवर केलेली मात यांबद्दलचं विश्वासार्ह कथन या पुस्तकात केलं आहे. तसंच वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या हृद्य स्मृतींना उजाळाही दिला आहे.
पॅटनचं कब्रस्तान
१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातील रणगाडा युद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतिहासातलं सर्वांत मोठं रणगाडा युद्ध मानलं जातं. या भीषण युद्धात दोन्ही बाजूंनी सुमारे एक हजार रणगाडे रणांगणावर उतरवण्यात आले होते
असल उत्तर याचाच अर्थ मुंहतोड जवाब. खेमकरण भागातल्या भिकिविंड गावाजवळ रणगाड्यांचं हे घनघोर युद्ध झालं. भारतीय जवानांनी मोठ्या संख्येने काबीज केलेले पाकिस्तानचे रणगाडे रांगेत उभे केलेले होते.
रणगाड्यांची ही रांग हीच या युद्धातली सर्वांत मोठी आणि अभिमानास्पद ट्रॉफी होती. ताब्यात घेतलेल्या रणगाड्यांची संख्या १०३ होती. एवढ्या मोठ्या संख्येने पाकिस्तानी रणगाडे इथे ठेवण्यात आल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी लगेच या ठिकाणाला ‘पॅटन नगर’ म्हणावयास सुरुवात केली.
युद्धानंतर फिल्म्स डिव्हिजनने यावर एक माहितीपटही चित्रित केला. काही जण याला ‘पॅटन रणगाड्यांचं कब्रिस्तानहीं’ म्हणायला लागले.
पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनीही या स्थळाला भेट दिली. मी तर माझ्या आयुष्यात तुटलेल्या बैलगाड्यासुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने पाहिल्या नाहीत, असं ते गमतीने म्हणाले.
भारतीय सैनिकांच्या अतुल्य धैर्याच्या, वीरश्रीच्या आणि शौर्याच्या कथा म्हणजेच १९६५ भारत-पाकिस्तान युद्धकथा!
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







