मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका हाकेचे अंतर….भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ एका हाकेचे अंतर….भाग 1. ☆ श्री अरविंद लिमये ☆

रोहन. आठ वर्षांचं कोवळं वय. आई आणि तान्हया लहान भावाबरोबर रोहनबाळ आजोळी आलेला. आणि साधं तापाचं निमित्त झालं. दोन दिवस झाले तरी घरगुती औषधाने ताप उतरेना म्हणून त्याच्या आजोबांनी त्याला आज परिचित आणि ख्यातनाम अशा बालरोगतज्ञाकडे तत्परतेनं आणलंय.

पूर्वी नाडीपरीक्षा अचूक असायची. म्हणूनच निदानही बिनचूक. आता अनेक शोध लागले. अचूक विश्लेषण करणाऱ्या चाचण्या अस्तित्वात आल्या. शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या हालचालींचा नजरवेध घेणारी यंत्रणा दिमतीला आली. पण या गदारोळात बिनचूक निदान मात्र कुठे तरी हरवून गेलंय एवढं खरं. या घटनेमधले बालरोगतज्ञ हे किमान नीतिमत्ता पाळणारे , रोहनच्या आजोबांच्या खास परिचयातले , अनेक वर्षांच्या वैद्यकीय सेवेतून नावलौकिक कमावलेले आहेत हे खरेच. पण शरीराद्वारे व्यक्त होणाऱ्या तक्रारीचे मूळ मनातही कुठेतरी असू शकते याचा विचार आजच्या इन्स्टंट उपचार पद्धतीत सहसा होत नाहीच. इथेही त्यांनी रोहनला तपासलं. तापाचा हा दुसरा दिवस. तापाने एकचा पारा ओलांडलेला. आधी त्याचा बंदोबस्त करायचा असे ठरवून त्यांनी एक औषध लिहून दिलं. त्याचा पहिला डोस दवाखान्यातच नर्स देईल असं सांगून त्यांनी पुढचा पेशंट बोलावला. औषध पोटात गेलं की तापाचा पारा खाली येणार याची त्यांना खात्रीच होती. उन्हाळा सुरू झाल्यापासून व्हायरल इन्फेक्शनचे अनेक बालरुग्ण गेल्या दोन महिन्यात त्यांनी हाताळले होतेही.

तापाच्या ग्लानीतही ‘आई.. आई.. ‘ म्हणत रडणाऱ्या रोहनला नर्सकडे देऊन आजोबा प्रिस्क्रिप्शन घेऊन लगबगीने समोरच्या मेडिकल स्टोअरकडे धावले. औषध घेऊन ते परत येईपर्यंत पाच एक मिनिटे गेली असतील , पण तोवर रोहनला सावरणं,सांभाळणं थोपवून धरणं नर्सला अशक्यच होऊन बसलेलं होतं. आजोबा येऊन त्याचा ताबा घेताच नर्सने सुटकेचा निश्वास टाकला. नर्स औषध द्यायला पुढे येताच त्याने पुन्हा रुद्रावतार धारण केला. हात पाय झाडत ओरडायला सुरुवात केली. नर्सने बाटलीच्या टोपणात औषध भरून ते त्याच्या तोंडाजवळ नेले मात्र.. आपल्या थरथरत्या हाताच्या एका फटक्याने रोहनने ते टोपण औषधासकट भिरकावून दिले. नर्स आणि आजोबा दोघेही हतबुद्ध.

” तुम्ही आलायत कसे?” नर्सने आजोबांना विचारले.

” रिक्षाने. “

” याची आई कां नाही आली बरोबर?”

“अहो, तिच्याजवळ अंगावर पिणारं लहान बाळ आहे. त्याला घेऊन ती कशी येणार ? हा तसा जाणत्या वयाचा आहे. माझ्या सवयीचा आहे म्हणून मग मीच घेऊन आलो “

“हो.. पण हे औषध लगोलग त्याच्या पोटात जायला हवं त्याचं काय करायचं ? तुम्ही  त्याला घेऊन घरी जा न् हे औषध लगोलग त्याला द्या. त्याच्या आईकडूनच तो घेईल. ” नाईलाजाने आजोबाही ‘ बरं ‘ म्हणाले.

(क्रमशः)

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी रे पाणी ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

? जीवनरंग ?

☆ पाणी रे पाणी ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

रेडिओच्या जाहिरातीतील ताई सारखी विचारतेय, आई कधी येणार गं नळाला पाणी?

छोटूला  कळतच नाही आहे ही ताई रोज रोज अशी का विचारतेय? नळाला पाणी तर आहेच ना? मग?

त्यानं आजीच्या मागं एकसारखा तगादा लावला आहे.

छोटू: “आजी ही वेडी आहे का ग? की या ताईच्या घरात खरंच पाणी येत नाही नळाला?”

आजी: “नाही रे वेडी कशी? त्यांच्याकडं नळच  नाही. ऐकलं नाहीस का तिची आई तिला विहीर दाखवतेय ते?”

छोटू : “विहीर?”

आजोबा : “हो, अरे तुझ्या त्या पुस्तकात आहे बघ चित्र; वेल चं?”

छोटू : “Well? बापरे. . आजोबा त्यांना रोज वेल मधून पाणी काढावं लागतं? नळ नाही त्यांच्या कडं?”

“आजी , आपण जाऊया त्यांच्याकडं? मला बघायची आहे वेल”..

महानगरातल्या आलिशान सोसायटीत राहणाऱ्या छोटूला घरात नळ नसतात, पाणी नळाला येत नाही ही कल्पनाच करता येत नाही. मागं एकदा त्याच्या यूकेजी च्या’ मिस नं दूध कोण देतं? ‘ असा प्रश्न विचारला होता. छोटू म्हणाला, ‘पिशवी. ‘मिसनं बरंच समजावून सांगितलं. पण हा ऐकेचना. शेवटी त्याच्या आई बाबांना शाळेत बोलाविण्यात आलं. मग एकदा त्याला गावी जाऊन गोठा दाखवावा लागला. तेंव्हा कुठं बाळराजांना  गाय आणि म्हैस दूध देतात हे पटलं.

आजी : “हो, जाऊया हं. तुझ्या आई बाबांना रजा काढायला सांगू आणि जाऊ विहीर बघायला.”

छोटू एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं संध्याकाळी आई बाबा आल्यावर त्यांच्या मागं लकडा लावून गावी जायचं ठरवूनही टाकलं.

आजी मात्र विचारात हरवल्या. त्यांच बालपण जरी शहरात गेलं असलं तरी त्यांचे काका- काकू गावीच रहात होते. प्रत्येक दिवाळी, मे महिना या दोन्ही सुट्ट्यांत आजी म्हणजे यमू गावी जायची.

आजींच्या डोळ्यासमोर आठ-नऊ वर्षांची फ्राॅक घातलेली यमू आली. त्यांचं मन भूतकाळात गेलं. छोटू बरोबर बोलता बोलता त्या यमू बरोबर किटलीतून पाणी आणू लागल्या.

“आई, काकू मी येणार आहे पाणी आणायला.”

” खूप लांबून आणायचंय हं पाणी ठमाबाई. तुला नाही जमणार.” . . . काका

“हो आणि येताना थोडं ऊन होईलच. आमची चांदणी कोळपून जाईल.”. . . काकू

अशा कोणत्याही वाक्यांना न जुमानता यमू शांताक्कांच्या मागं लागून फळीवर ठेवलेली लहानशी किटली काढून घेईच. आई आणि काकूच्या मागं मागं ती छोटी छोटी पावलं टाकत चालायला लागे देखील.

शेतातल्या विहिरीवर पोचेपर्यंत तिच्या हातातली किटली शांताक्काकडं पोहोचे. तिच्या हातात, फ्राॅक च्या खिशात फुलं, पानं यांचं संमेलन भरले. प्रत्येक वेगळा रंग तिला खुणावत असे. पानांचा, फुलांचा वेगळा आकार तिला मोहात पाडत असे.

गावापासून जवळच असलेली विहीर. . . सगळ्या बायका इथं जमत आणि मग सुखदुःखाची देवाणघेवाण करत कपडे धुतले जात. दगडावर घासून , धोपटून जसा कपड्यातला मळ बाहेर पडे तसाच मनातला सुध्दा. स्वच्छ धुतलेल्या कपड्यांचे पिळे, आणि पिळ सुटलेली स्वच्छ मनं तसंच भरलेल्या कळशा घागरी घेऊन सगळ्या घरी परतत.

एवढा वेळ यमू कधी पाण्यात खेळे, कधी आपला फ्राॅक धुवून टाके तर कधी जवळच्या फुलझाडांत रमे. मे महिन्यात मात्र ही फुलझाडं वाळलेली असत. पिवळी पडलेली पानंही तिच्या वही पुस्तकात गोळा होत. शाळेतल्या मैत्रिणींना तिचा हा गावरान अल्बम वेड लावत असे. फिरकीच्या टोपणाची किटली भरुन घेऊन ती घरी परते.

क्वचित कधीतरी काकू नदीवर कपडे धुवायची टूम काढे. वारणा नदीचं तसं उथळ पात्र, खडकाळ काठ, गावापासून लांब असलेला, तिथं नेणारा धूळखात, सुस्त पडलेला, तापलेला मातीचा रस्ता, धूळ बसलेली झाडं, झुडपं, काटेरी निवडूंग! त्या रस्त्यावर काकूच्या मैत्रिणी भेटायच्या. रखरखत्या ऊन्हात, संसाराचा कोरडा भार गाठोड्यात बांधून, कोरड्या मनानं, झपाझप चालत त्या नदीकाठ गाठत. गळ्यात लाकडी ओंडका बांधलेली , पाण्यात डुंबण्यासाठी आसुसलेली जनावरं  जड पायांनी संथपणानं जाताना दिसत. धूळरस्ता त्यांनी उठवलेली अक्षर चित्रलिपी कोरडेपणानं वागवत राही.

हाताला काही तरी गार लागलं. आजी भानावर आल्या. आजोबा सरबताचा ग्लास हातात घेऊन ऊभे होते.

“काय, आठवणीतून आलात का बाहेर?”

आजीनं हसून ग्लास हातात घेतला.एक घोट घेऊन त्या म्हणाल्या,” परिस्थिती फारशी बदललेली नाही हो. आठवणीतील गाव काय आणि आपलं शहर तरी काय. आजची बातमी वाचलीत पेपर मधली?”

आजोबा:  “हं, इतकी वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून, अजून दैनंदिन गरजा भागवता येत नाहीत.”

आजी:  “परदेशात बेसीनच पाणी देखील पिण्यायोग्य असतं.”

आजोबा:  “गल्फ कंट्रीज मध्ये समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार होत. पाणी महाग आहे पण दुर्लभ नाही.”

आजी: “आणि जीवनदायी पाण्याचं महत्त्व पटवून द्यायला कमी पडलो आपण”.

आजोबा: “या भारतदेशाला पुन्हा एकदा भगीरथ प्रयत्न करावे लागणार बहुतेक.”

“आजी, आजोबा, आजोबा.” . छोटू  जोर जोरात हाका मारत होता.

“अगं ही भीमाक्का  बघ नळ सुरू ठेऊन कुठं गेलीय. बादली भरून वाहतेय ना.”

दोघंही आवाजाच्या दिशेनं निघाली.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  deepapujari@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फरिश्ता….भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

 ☆ जीवनरंग ☆ फरिश्ता….भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

मध्येच मी डोळे उघडले. गप्पा थोड्या थांबल्यागत वाटल्या. म्हणून पाहिलं तर अंकलने त्यांचा मोठा ट्रक वजा बॉक्स,-जसा सामान्यपणे सर्व सैनिकांकडे असतो तसा-उघडला होता व एक फोटो अल्बम त्यातून बाहेर काढला होता. मी पुन्हा दुर्लक्ष करून डोळे मिटले. वेगवेगळ्या फोटोबद्दल ते माहिती सांगत होते.

“ये हमारा खेत, ये अम्मा-बाऊजी, अच्छा… ये ना, ये बडे बडे भाई साब ।

“और अंकल ये कौन है?”

“ये मेरा बेटा सचिन और ये उसकी मम्मी।”

“ओह, हाऊ फनी! जवान अंकल, सचिन की मम्मी ने मतलब इस आंटी ने मुँह क्यों ढक रखा है ?…ओ होs हो! आगे की सारी फोटो में भी ऐसा ही है। ….अंकल आपने ऑंटी की मुँहवाली फोटो क्यों नही खिंची ?”….हीsहीsही हसणं आणि मनसोक्त खिदळणं.

हे जरा अतीच होतं.

“सानवी” मी जरा जोरात हाक मारली. तिला खूणेनं आपल्या जवळ बोलावून घेऊन तिला दटावत म्हटलं, “अंकलना त्रास देऊ नको ग.”

“जी नही मॅडम, वह क्या मुझे परेशान करेगी? बल्कि बहूत  अच्छा लग रहा है उससे बाते करके” जवान अंकल म्हणाले.

“बाते करके या बकबक सुनके?” माझा प्रतिप्रश्न होता.

डब्यातले बरेच लोक त्यांचे बोलणे इंटरेस्ट घेऊन ऐकत होते सगळे गंमतीनं हसू लागले. हळूहळू सगळ्यांनाच ही गोष्ट माहित झाली की हा आर्मीतला हट्टाकट्टा नौजवान कारगिल युद्धात भाग घेण्यासाठी चालला आहे. तीन महिन्यांच्या सुट्टीसाठी तो घरी गेला होता. पण अचानक सुट्टी कॅन्सल होऊन त्याला त्याच्या हेड-क्वार्टरला पुण्याला पोहोचावे लागले.. आणि आता ऑर्डरप्रमाणे दिल्लीपर्यंत ट्रेनचा प्रवास करून तो गंतव्य स्थानाकडे प्रस्थान करणार होता. ते पण त्याला दिल्लीला कळणार होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दल कुतूहल आणि आदराचा भाव दिसत होता.

रात्र झाली. दोघी मुली झोपल्या. मी पण वॉकमनवर गाणी ऐकत थोडा टाईमपास केला. उद्या निनाद आम्हाला रिसिव्ह करायला स्टेशनवर येईल. तो आता परत जाणार नाहीय. हा विचारच मला रोमांचित करत होता.

सकाळ झाली. दिल्ली तो बहुत दूर थी। मी जरा फ्रेश होऊन आले. पाहिलं, तर जवान अंकल आणि सानवी गप्पात रंगले होते. पुन्हा ती मोठी ट्रंक उघडल्याचा आवाज आला. सानवी चक्क खाली बसून वाकून काहीतरी पाहत होती. मी फारशी उत्सुकता दाखवली नाही. पण काही वेळानं तिचा मोर्चा माझ्याकडे वळला.

“मम्मा, जवान अंकल कडे ना गन आहे हे. मी आत्ताच पाहिली. जवान अंकल खूप सगळ्या दुश्मनांना मारणार आहेत. पण मी त्यांना सांगितलय की “हम दिल्ली से और गोलिया भेज देंगे, आप जीत के ही आ जाना। मम्मा आपण पाठवू शकतो ना गोळ्या?” सानवी सगळं प्लॅनिंग केल्यागत बोलली.

“हो ग बाई, पाठवू या. पण आता जरा गप्प बस. सोनाली आणि तू पत्ते खेळत बसा. मी तिला दटावले.”

ती गप्प झाली खरी. पण त्या पाच वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यात काय काय खदखदत होतं तिचं तिच जाणे !

“मम्मा मी ना आता या राखी पौर्णिमेला जवान अंकलच्या सचिनला राखी पाठवणार आहे.  मम्मा मी त्याची बहीण होऊ शकते ना?” तिने विचारले .

तिला गप्प बसण्यासाठी मी होकारार्थी मान हलवली.

दुपार झाली. दोघी झोपी गेल्या होत्या. डब्यात बरीच शांतता होती. जवान अंकल पण जरा खिन्न होऊन बसलेले दिसले. मधेच ते दुसऱ्या बोगीत गेले असावेत. कारण त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखेच तीन चार जवान गप्पा मारत आमच्या कंपार्टमेंटमध्ये आलेले दिसले. बोलता-बोलता सानवी कडं इशारा करत’ नन्हा फरिश्ता’ असं अंकल म्हणालेलं मी ऐकलंआणि मला खूपच समाधान वाटलं.

संध्याकाळ झाली. आमच्या हीरोइन कन्या का जाग्या होऊन जवान अंकल बरोबर हितगुज करत होत्या. तिने कागदावर अंकलचा पत्ता लिहून घेतला असावा. कारण ती सगळं काही विसरून आमचा पत्ता वगैरे त्यांना सांगत होती. माझे लक्ष गेलेले पाहिल्यावर माझ्या जवळ येऊन माझ्या कानात तिने हळूच सांगितले,

“जवान अंकल परके नाहीयेत आपलेच आहेत म्हणून त्यांना पत्ता दिला.”

मी शरणागतीच पत्करली कारण त्या वेडीला रागवण्यात आता काहीच अर्थ नव्हता.

फरीदाबाद आलं तशी आमची उतरण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली. मी, सोनाली फ्रेश झालो.  सानवीला पण बेसिन पर्यंत घेऊन येण्यास निघाले. तेवढ्यात तिचाच जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला. ‘आता काय रामायण- महाभारत घडलं?’ विचार करत मी कंपार्टमेंट मध्ये गेले, पाहिलं तर खूप लोकांचा घोळका समोरचा सीन पाहत होता .

“अंकलss आप कारगिल मत् जाना….” सानवी रडत रडत म्हणत होती. आप दिल्ली स्टेशन पर उतर के सिधे अपने गाव चले जाना …. अंकल प्लीज्… अगर गलती से दुश्मन आपको मारेगा तो …..नही, नही पापा के बगैर सचिन कैसे जियेगा? भगवान जी सचिन को पापा और मुझे जवान अंकल हमेशा के लिए चाहिये। ….. जवान अंकल प्लीज “तिचे रडणे आणि हुंदके थांबतच नव्हते.

  क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फरिश्ता….भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

☆ जीवनरंग ☆ फरिश्ता….भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

“अभी भी मुझे बहुत कुछ याद है,मम्मा” हे सांगताना तिचे डोळे लकाकत होते. “आपल्या वाटेतच ते गाव आहे. तर त्यांच्या घरावर आपण अचानक जाऊन हल्ला करायचाय. कशी आहे माझी आयडिया?” विचारताना तिच्या शरीरातलं ते अजब रसायन जणू ऍक्टिव्हेट झालंयअसं मला वाटलं.

“मला नाही बाईआवडली ही आयडिया.अगं, खूप वर्षांपूर्वी…. जवळजवळ वीसेक वर्षांपूर्वी… ट्रेनमध्ये झालेली थोडीशी ओळख ती काय ..आणि त्याच्या आधारावर त्यांच्याकडे अचानक जायचं म्हणजे काय?या मधल्या कालखंडात काय काय घडलं असेल,… ते तिथेच रहाताहेत का?… ते आपल्याला ओळखतील तरी का?

“माझं बोलणं मध्येच तोडून ती म्हणाली,”मम्मा यार ,नको बोअर करू! नाही भेटले तर कोई बात नहीं.पण जर भेटले तर… इमॅजिन कर, कित्ती कित्ती थ्रीलिंग गोष्ट असेल.”

एडवेंचर एक्साइटमेंट ,थ्रील या दुनियेत गर्क झालेल्या तिला इतर काही समजूनच घ्यायचे नव्हते.

लगबगीनं आवरून आम्ही जोधपूरला जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसलो. गाडीनं वेग पकडला अन् माझ्या मनानं पण भूतकाळातल्या आठवणीत  वेगानं प्रवेश केला.

…..

साधारण मे 1999 मधली ती घटना.उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही तिघी मायलेकी पुण्याला आलो होतो. निनाद गेली तीन वर्ष साऊथ आफ्रिकेत होता. पण अचानक मुदतीपूर्वीच काम संपल्यामुळे तो परत दिल्लीत आला होता. त्यामुळे मीही घाईगडबडीने मुलींसह दिल्लीत परत जायला निघाले होते .पुणे स्टेशन वर आम्हाला सी ऑफ करायला माहेर आणि सासरचा बराच मोठा गोतावळा जमला होता. गाडीत बसण्या पूर्वीच नेहमीप्रमाणं सानवीचं रडणं सुरू झालं.

“मै यही रहूंँगी… दिल्ली नहीं जाऊँगी” तिचा हट्ट चालू झाला होता. सोनाली आपली सर्वांना बाय् करून सगळ्यांनी गिफ्ट दिलेली कॉमिक्स चाळत होती.

गाडीने स्पीड पकडला.मीही आपले सामान व्यवस्थित लावून सहप्रवाश्यांवर एक नजर टाकून आपल्या सीटवर विराजमान झाले. सोनाली कॉमिक्स मध्ये बुडून गेली होती. तर सानवी खिडकी जवळच्या सीट वर कब्जा करण्याच्या खटाटोपात होती.

मला प्लॅटफॉर्मवर असतानाच प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे बरेच फौजी इकडे तिकडे वावरत होते… आणि ते बरोबरच होते म्हणा, कारण ते कारगिल युद्धाचे दिवस होते. सं पूर्ण देशात समाजाच्या प्रत्येक थरात तेव्हा वेगळ्या तर्‍हेचे  वातावरण निर्माण झाले होते. वीररसाची ,देशप्रेमाची भावना आबालवृद्धांत जागृत झालेली होती.काहीतरी आगळेवेगळे, भव्यदिव्य घडावे असे सगळ्यांनाच वाटत होते. आमच्य बोगीत चढणाऱ्या काही फौजींना पाहून माझ्या मनात खूप अभिमान व आदरयुक्त अशी भावना जागृत झाली होती.

मनात अजून सैनिकांचेच विचार चालू होते. तेवढ्यात सानवीनं मला जरा हलवलं. हळू आवाजात ती सांगू लागली,

“मम्मा ते मुच्छड अंकल आहेत नां त्यांनी मला त्यांची सीट द्यायचं प्रॉमिस केलंय. प्लीssज मी तिथं जाऊन बसू? तू सांगितलेले सगळं मला याद आहे. ओकेsss….!” आणि माझ्या होकारा-नकाराची वाटही न पाहता ती खिडकीजवळच्या सीटवर जाऊन बसली सुद्धा.

मी मुलींना त्या शाळेत जाऊ लागल्या, तेव्हापासून असं बजावून ठेवलं होतं की आपण खूपदा तिघीच इथे राहतो. डॅडी कधी परदेशात असतो तर कधी इथे. पण हे सगळे कोणालाही  सांगायचे नाही. आपल्या घराचा पत्ता.एरीया, फोन नंबर, पण कोणा परक्या व्यक्तीला सांगायचा नाही. कोणी खायला दिले तर घ्यायचे नाही.कोणी कुठे ‘टच’ केला तर ओरडायचे… अनोळखी व्यक्ती बरोबर जायचे नाही. ओळखीच्या व्यक्तींबरोबर ही माझी परवानगी घेतल्याशिवाय ,मला सूचना दिल्या शिवाय जायचे नाही.  कशी खबरदारी घ्यायची हे समजावून सांगताना…  किडनॅपिंग, रेप ,या सारख्या विक्रृत गोष्टी त्या निष्पाप जीवांना त्यांना कळेल अशा भाषेत सांगताना मला खूप प्रयास पडले होते.

………

माझं लक्ष गेलं तेव्हा सानवी खिडकीबाहेर चे सीन बघण्यात गर्क होती. पण हळूहळू ती अंकल बरोबर गप्पा मारतेय हे मला कळलं होतं. मी डोळे मिटून पेंगुळलेल्या अवस्थेत बसले होते.गप्पांचे काही शब्द,काही वाक्ये,काही संदर्भ माझ्या कानावर पडत होते.

“अच्छा, तो अंकल आप सेना में है ?आप जवान है ?तो जैसे हमारी किताब में ‘जय जवान जय किसान’ लेसन है वैसे ?

“हॉ गुडिया”

“फिर आप बुड्ढे हो जाओगे तब भी जवान कहलाओगे?  मैं आपको जवान अंकल ही बुला सकूंगी , है ना ?” सानवीआणि अंकल ची प्रश्नोत्तरे चालू होती. अंकल चे हसणे कानावर पडले, “नही गुडिया अगर प्रमोशन नहीं मिला तो 17 साल की सर्विस के बाद हमें रिटायर होना पडता हैं। हमारी जगह नये जवान आते हैं. अपनी आर्मी हमेशा जवान रहनी चाहिये ना इसलिये!” अंकल तिला अगदी मनापासून समजावून सांगत होते.

  क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फरिश्ता….भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

 ☆ जीवनरंग ☆ फरिश्ता….भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

 सकाळी- सकाळीच सानवी ने, आमच्या धाकट्या कन्येने दोन हॅन्ड बॅग्ज आणि एक सॅक  माझ्यासमोर टाकला.

मम्मा आपण दोघी राजस्थानमधल्या दोन तीन खेड्यात जातोय.त्या दृष्टीने आपले साधारण तीनेक दिवसांचे कपडे पॅक कर.” तिने फर्मानच ऐकवले.’आता हे काय नवीनच खूळ?’ मी विचार करत राहिले.

ह्या मुलीत रक्ताबरोबरीनं एक अजब रसायन वाहतं असं मला नेहमीच वाटत आलंय.अल्लड, बडबडी, भांडखोर, थोडीशी हटवादी अशी ही.तर मोठी सोनाली समजूतदार, अबोल,शांत स्वभावाची. पण तरीही  सानवी च्या वागण्यात,तिच्या हट्टात मला एक तर्‍हेचा गोडवा जाणवतो.लोकांना आपलंसं करण्याची जादू तिच्या स्वभावातच आहे.

आई तर नेहमीच म्हणतात, “मोठी गुड गर्ल तर धाकटी गोड मुलगी.”

आमच्या गुड गर्ल चं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं. जावई पण तिच्या सारखाच डॉक्टर. सगळी फॅमिलीच यु. एस्.ची सिटीझन. त्यामुळे ही पण तिथे छान सेट झाली. आठ महिन्याच्या तेजस ला घेऊन ती नुकतीच इंडियात येऊन गेली. इथे दिल्लीतच, तिच्या मैत्रिणीचं लग्न होतं. मग काय बाळालाआमच्याकडे सोपवून लग्नात धमाल करायला ती मोकळी झाली ! शॉपिंग,हिंडणं-फिरणं मनसोक्त करून मागच्या आठवड्यात ती परत गेली अन् घर सुनं सुनं वाटायला लागलं.कंपनीच्या कामामुळे निनादचा नेहमीच एक पाय घरात तर एक परदेशात अशी स्थिती. परवाच तो यु. के.ला गेला, तेही चांगलं दोन महिन्यांसाठी. घरात मी एकटी.कारण कामामुळे आमची गोड मुलगी दिवसभर  घराबाहेरच असायची.

एम् एस् सी झाल्याझाल्या इथं दिल्लीतच तिनं एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉब स्वीकारला.’ गैरपारंपारिक ऊर्जा स्रोत’ हा तिचा अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आणि ती कंपनी पण सोलर एनर्जी  प्रॉडक्टवर काम करणारी. त्यामुळे नोकरीत ती छान रमली. बरेचदा तिला कामाच्या निमित्ताने गुजरात, राजस्थान, हरियाणा यांच्या पश्चिमी जिल्ह्यांत जावं लागायचं. त्यांचा सहकार्‍यांचा ग्रुप काम आणि भटकंतीत छान रमायचा.

‘पण आज हे मला”तू पण राजस्थानात चल म्हणणं,” म्हणजे काय प्रकार आहे ?’मी अंदाज बांधत राहिले.

नऊ च्या सुमाराला ती पुन्हा घरात दाखल झाली.

“हे काय मम्मा,तू अजून तयार नाही झालीस ?मी माझी बाहेरची कामे पण उरकली.“मला पारोश्या अवतारात बघून ती उदगारली.

“मला तुझा प्लॅन कळल्याशिवाय मी एक पाऊल पण पुढे टाकणार नाही.”मी ठामपणे सांगितले.

“त्याचे असे आहे की पुढचे चार दिवस आम्हाला सुट्टी आहे.पण मी आमच्या गॅंग बरोबर नाही जाणारेय.”ती म्हणाली.

“का?”न राहवून मी विचारले.

“त्याचं काय आहे ना,” एखाद्या तत्वज्ञान्याच्या अविर्भावात ती बोलू लागली, “आपल्या घरात एक छोटीशी मुळूमुळू रडणारी मुलगी आहे. डॅडी घरात नाही…ते सोनालीचं गुब्बू- गूब्बू बाळ सुद्धा लळा लावून त्याच्या देशात निघून गेलं…. आता मी पण

गावाला गेले ना,तर ती मुलगी जेवण-खाण,काम धंदा सोडून नुसती रडतच बसेल आणि गंगा-यमुनेच्या पुराने घर वाहून जाईल…… दॅट्स व्हाय…!”

ती पुढे काय- बाय सांगत होती.पण ती माझ्याबद्दल एवढा विचार करते.माझी तिला काळजी वाटते. हा विचारच मला सुखावून टाकणारा होता. गुगल मॅप वरून तिने सगळा प्लॅन मला समजावला. “जोधपूरहून पुढे ही चार खेडी  मी कव्हर करणार आहे. हस्तकला, हस्तशिल्प,कॉटेज इंडस्ट्री साठी हा एरिया प्रसिद्ध आहे.उच्च प्रतीच्या लाखेपासून केलेल्या वस्तू आणि बांधणी वर्क त्याला लागणारे नैसर्गिक रंग असं खूप काही मला शिकायचंय.” ती सांगत गेली. तर ठरल्याप्रमाणे तू माझ्याबरोबर येणार आहेस. आपली राहण्याची सोय पण केलीयआणि जोधपुरपासून पुढे हिंडण्या- फिरण्यासाठी  मी कॅब पण बुक केलीय. तेव्हा नो चिंता,नो फिकिर.” तिने मला अधिकारवाणीने सांगितले.

“आणखी एक गंमत आहे.” ती म्हणाली. ‘गंमत?व्वा! आता कुठं सगळ्या प्लॅनला सानवी टच् येतोय’ मी मनात म्हणाले.

आपल्या खोलीतून एक जाडजूड डायरी -खूप जुनी अशी- आणून तिनं माझ्या हातात ठेवली. वीस-एक वर्षांपूर्वीची ती डायरी माझ्या जुन्या आठवणी ताज्या करून गेली. निनाद त्यावेळी तीन वर्षाचं साऊथ आफ्रिकेतील काम संपवून इकडं परत आला होता. इतर खूप वस्तूंबरोबर आणलेल्या दोन डायर्‍यांपैकी त्या आणि त्याच डायरी साठी दोघी बहिणींनी केलेलं झिंज्या पकडू भांडण मला आठवलं.

मी हसत-हसत डायरीची पानं चाळू लागले. “जास्त बघू नको मम्मा, फक्त फर्स्ट पेज बघ. ती म्हणाली… आणि…मम्मा जी गंमत फर्स्ट पेज वरच आहे. म्हणूनच माझ्या लक्षात राहिलीय.”ती उदगारली.

मी पाहू लागले इंग्लिश मध्ये ओम, जय माता दी, त्याखाली स्वतःचं नाव, शाळेचे नाव, इयत्ता, तुकडी वगैरे आणि त्याखाली कागदाचा वेडावाकडा फाडलेला तुकडा चिकटवला  होता. त्यावर बलदेव सिंग... सिंधोरा कलाँ… नियर हनुमान गढी… जोधपुर.…असं लिहिलेलं होतं.तर बाजूला बाण काढून जवान अंकल,सन सचिन असं लिहिलेलं होतं…. वाचलं अन् माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

      क्रमशः…

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – निशाणी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – निशाणी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

खूपच रात्र झाली होती. थंडीचे दिवस होते. सगळीकडे शुकशुकाट होता. बराच उंच आणि लांबलचक असणाऱ्या त्या पादचारी पुलावरून जातांना आता मला खरंच पश्चात्ताप होत होता. माझ्या बॅगेत माझ्या सरकारी ऑफिसची अडूसष्ठ हजारांची रक्कम होती. ऑफिसमधून निघायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे घरी लवकरात लवकर पोहोचण्याच्या नादात या सुनसान रस्त्याने जाण्याचा मोह मी आवरू शकलो नव्हतो, कारण हा शॉर्टकट होता. इतक्या कडाक्याच्या थंडीतही माझ्या चेहऱ्यावरून घाम ओघळत होता– पण तो घाईघाईने पायऱ्या  चढत असल्यामुळे, की घाबरल्यामुळे हे सांगणं कठीण होतं. अंगातला कोटही काढून फेकून द्यावा असं वाटत होतं. त्या अवस्थेतच मी नकळत मागे वळून पाहिलं, आणि माझ्या चालण्याचा वेग आणि हृदयाची धडधड जास्तच वाढली. त्या धूसर अंधारात मला दिसलं की ओव्हरकोटसारखं काहीतरी घातलेला एक उंचापुरा माणूस त्याच पुलावरून चालत येत होता. ” बाप रे ! मेलो आता — नक्कीच हा एखादा लुटारू असणार. माझ्याकडे बरीच रोकड आहे हे नक्कीच कळलेलं असणार त्याला. देवा.. आता काय करू मी?”  माझा चालण्याचा वेग आणि भीती दोन्हीही वाढायला लागलं होतं. घाम निथळायला लागला होता…” हा पूलही किती लांबलचक आहे. या निर्मनुष्य पुलावर हा आरामात लुटेल मला. पण एकवेळ लुटलं तरी चालेल, कारण पैसे माझे नाहीत , सरकारचे आहेत. मी पोलिसात तक्रार दाखल करीन — किंवा  काहीतरी करून ऑफिसमध्ये पैसे भरून टाकीन— पण याने चाकूने भोसकून माझी आतडी बाहेर काढली तर ?– हेही शक्यच आहे. मला मारून टाकून माझ्या जवळची बॅग पळवणे हे तर जास्तच सोपं असेल त्याच्यासाठी — ठीक आहे— देवाच्या मनात जे असेल ते होईल– पुष्पाला  माझ्या जागेवर नोकरी मिळेल– पण मग मुलांचं काय? किती लहान आहेत अजून ती. त्यांचं कसं होईल? “– माझा जीव कंठाशी यायला लागला होता. जे अजून घडलेलं नाही, ते घडण्याच्या शंकेने- भीतीने माझे मन आणि विचार कुठून कुठे पोहोचले होते.

अजून तो माणूस माझ्या जवळ आल्याची चाहूल लागत नव्हती, म्हणून मनाचा हिय्या करून मी मागे वळून पाहिलं—-” अरे याच्या हातात हे काय आहे ? ओह–“. ‘ हुश्श ‘ करत मी एक मोठा श्वास घेतला. ” याच्याकडे मी नीट पाहिलच नव्हतं की –“. माझ्या जिवात जीव आला. एकदम मला खात्री पटली — हृदयाची धडधड थांबली — ” हा चोर – डाकू असू शकत नाही– शकत नाही काय– नाहीच आहे. ”

—- त्याच्या हातात टिफीन होता …. तीन चार पुडांचा जेवणाचा मोठा डबा —- ही तर कष्टकरी माणसाची निशाणी आहे — ‘ टिफीन‘. चोर लुटारू यांची नाही.

तो अजूनही माझ्या मागेच होता. पण माझ्या विचारांमधून मात्र झटदिशी खूप लांब निघून गेला होता.

 

मूळ हिंदी कथा : श्री संतोष सुपेकर

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भरली वांगी – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆ भरली वांगी – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

??‍♀???

 “शालन आली होती का गं ‘चम्मतग’ला?”

“नव्हती आणि त्या आधीच्या ‘चम्मतग’ ला तरी कुठे होती? मोबाईलवर फोन केला तर कध्धी उचलत नाही. ती एकीकडे आणि तिचा मोबाईल कुठे दुसरीकडे ठेवलेला. तिच्या लँडलाईन वर फोन करायचा म्हणजे आपल्या सहनशक्तीची परीक्षा!”

“का बरं”?

“पुटुपुटु येऊन तिच्या सासूबाईच फोन घेतात आणि साऱ्या जगाच्या चौकशा करीत राहतात. नाहीतर  तेच तेच पुन्हा नव्याने सांगत बसतात.”

“वय फार वाढलं की कठीण होत जातं जगणं. नव्वदीच्या पुढे असतील ना आता त्या?”

“हो तर! पण त्यांची गंमत माहितीये ना तुला?”

“कसली गंमत?”

“महिन्यापूर्वी त्या घरातच पडल्या थोड्याशा. शालनच्या मिस्टरांनी डॉक्टरांना बोलावून कुठे हाडबिड मोडलं नाही ना याची खात्री करून घेतली. डॉक्टरांनी सांगितलं की,’ आता तुम्ही आजींना चालताना काठी वापरायला सांगा. ‘तर नातवाने लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून येताना छान चार पायांची काठी आणली. ती कशी वापरायची याचं आजीकडून प्रात्यक्षिक करून घेतलं. आजींनी दोन-तीन दिवस ती काठी वापरली. मग लागल्या पुन्हा पहिल्यासारखं तुरुतुरु चालायला. ते बघून नातवानं विचारलं, ‘अगं आजी, काठी कुठाय तुझी? डॉक्टरांनी चालताना काठी वापरायला सांगितलेय  ना?’ तर त्या म्हणाल्या,” नको अरे! काठी घेऊन चाललं की म्हातारं झाल्यासारखं वाटतं.”

“शाब्बास. ग्रेटच आहेत अगदी. दोन दिवसांपूर्वी मोहिनी भेटली होती. ती तिच्या नणंदेकडील  वेगळीच गंमत सांगत होती. नणंदेच्या नवीन सुनेच्या माहेरचे लोक ‘हरेराम ‘च्या पंथाला लागलेले.ती सून सुद्धा कांदा-लसूण काही खात नाही. दर रविवारी सकाळपासून बाहेर. कधी मंदिरात भजन-कीर्तन तरी असतं नाहीतर कुणाकडे तरी साजुक तुपातल्या 108 पदार्थांचा अन्नकोट. मूर्तीवर गुलाब पाकळ्यांचा अभिषेक करायचा आणि प्रसाद म्हणून सर्वांनी ते नाजूक-साजूक ड्रायफ्रूटचे पदार्थ, फळं खायची. ती सूनपण नेते एखादा पदार्थ करून. कांदा-लसूण, मसाले काही नाही. कपाळभर गंधाचा मळवट भरायचा आणि पांढऱ्या साड्या नेसायच्या!नस्ती एकेक थेरं. साधे घरात शेंगदाणे भाजले तरी त्याचा भोग दाखवायचा. प्रत्येक भोगाच्या वाट्या वेगवेगळ्या. त्या इतर कशाला वापरायच्या नाहीत.

“मी म्हटलं ना तुला, की आपल्या साळुंख्या पुष्कळ बर्या.”

“पुढच्या महिन्यात आपल्याला चारूच्या मुलाच्या लग्नाला जायचंय ना, त्या आधी आपण एखाद्या पार्लरमध्ये जाऊन यायचं का? बघूया तरी तिथे काय काय प्रकार असतात ते! आपण घरी रंगवलेल्या केसांचा काही दिवसांनी तिरंगा झेंडा तयार होतो. केसांचा मूळ रंग,रंगवलेल्या केसांचा अर्धवट उडालेला रंग आणि मधे मधे डोकावणारे पांढरे केस.”

“चालेल-चालेल. आपली विद्या नेहमी फेशिअल करून घेते. तेही करून बघूया.”

“चल, ठेवते फोन. इतका वेळ मी फोन अडवून बसलेय म्हणून फोनकडे आणि माझ्याकडे रोखून बघत यांच्या अस्वस्थ येरझाऱ्या सुरू झाल्या आहेत. आजची पत्त्यांची बैठक कुणाकडे ठरली ते विचारायला मोबाईल वरून फोन करून ते त्यांचा बॅलन्स कमी करणार नाहीत. मागच्या रविवारी आमच्याकडे होता तो पत्त्यांचा गोंधळ अच्छा, पाठव लवकर मसाला.”

“पाठवते. पण आपल्या गप्पांची ‘भरली वांगी ‘अगदी मसालेदार झाली नाही?”

समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भरली वांगी – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

 ☆ जीवनरंग ☆ भरली वांगी – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

“असुदे राहुदे,पुसेन  मी नंतर”

“काय झालं? कुणाशी  बोलते आहेस

“मिस्टर कुरकुरे.”

“कोण?”

“हेच ग आमचे! आज सकाळी थोडा वेळ होता म्हणून टीव्ही जवळच्या प्लास्टिक फुलांचा गुच्छ, फ्लावर पॉट सगळ छान धुतलं, पाणी काढून ओट्यावर टॉवेलवर वाळत घातलं, नंतर टीव्ही आणि त्याच्या आजूबाजूची धूळ पुसून सगळं छान स्वच्छ केलं आणि ती धुतलेली फुलं फ्लावर पॉट मध्ये घालून जागेवर ठेवताना जराशी झटकली आणि नीट लावून ठेवली. त्या झटकलेल्या पाण्याचे चार थेंब जमिनीवर पडले तर झाली यांची बडबड सुरू. ‘मी इथे घसरुन पडलो म्हणजे? पाणी किती पडले आहे?’ म्हणजे तिथे सगळे छान स्वच्छ झाले त्याचं ॲप्रिसिएशन वगैरे नाहीच. उलट कुरकुर सुरु.”

“जाऊदे ग! सगळेच मिस्टर असेच कुरकुरेच असतात”.

“तर मी काय सांगत होते, राकेशला क्लासला पोचवून  सुमेधा जाणार आहे पार्लरला. तिथून राकेशला घेऊनच घरी येईल. जाताना माझ्या भरल्या वांग्याचं कौतुक करीत मला भरली वांगी करायचं गोड आवाजात फर्मावून गेलीय. दोन-तीन तास पार्लरमध्ये जाऊन काय स्वतःच्या जीवाचे चोचले करून घेतात कुणास ठाऊक! आम्ही आपली करतोय भरली वांगी.”

“आपल्या साळुंक्या पुष्कळ बऱ्या म्हणायच्या! परवा वसू तिच्या अमेरिकेहून आलेल्या सुनेबद्दल काय- काय सांगत होती! तीन आठवड्यांसाठी आलेल्या या पाहुण्या सुना त्यांच्या माहेरी आणि माहेरच्या गोतावळ्यात जास्त असतात. वसु कडे होती चार दिवस, तेव्हा वसू तिला म्हणाली,’अगं घरात असताना नीलला डायपर लावू नकोस. दीड वर्षाच्या मुलाच्या नाजूक स्कीनला  त्रास होतो’. नाराजीने आणि मनाविरुद्ध सुनेनं नीलला डायपर  लावला नाही आणि त्याचे कपडे खराब झाल्यावर हातातल्या मोबाईल स्क्रीनवरची नजर सुद्धा न उचलता, त्याच्या रडण्याकडे ढिम्म  पाहिलं नाही.  शेवटी या शीतयुद्धात आजोबांनी नातवाला स्वच्छ केलं”.

“धन्य ग बाई! मागच्या महिन्याच्या आपल्या चम्मतग ग्रुपच्या मिटींगला तू नव्हतीस ना! सुनेच्या बाळंतपणासाठी सहा महिने अमेरिकेला राहून आलेली शुभा काय काय मजा सांगत होती! तिच्या नातवाचा महिन्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुनेच्या मैत्रिणी सहकुटुंब आल्या होत्या. त्यातल्या एका मैत्रिणीने सुंदर पैठणीचा ड्रेस घातला होता. तिच्या सहा महिन्यांच्या बाळाला डायपर बांधलेला असूनही तिच्या ड्रेसच्या हातावर त्याच्या शीचा थोडासा ओघळ आलाच. तर काय करावं त्या मुलीने? सरळ त्या ड्रेसचा हात कापून टाकून दिला. आहे की नाही?”

                            क्रमशः….

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भरली वांगी – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मनमंजुषेतून ☆ भरली वांगी – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

??  ? ??

“हॅलो सुमा, सुशी बोलतेय. मगाचपासून   फोन करतेय तर एंगेज्ड् लागतोय.”

“अगं,नागपूरहून ताईची मृणाल गप्पा मारीत होती. ती मधेच म्हणाली ‘मावशी,आता किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला?’ 50 होतील म्हटल्यावर ‘अभिनंदन, अभिनंदन’ म्हणायला लागली. तर मी म्हटलं, त्यात कसलं अभिनंदन ?आमच्या वेळी घटस्फोटाची पद्धत नव्हती ना, म्हणून झाली पन्नास वर्ष”

“हा हा हा ! काय ग बाई बोलणं  तुझं सुमे!”

“गंमत केली जरा. पण पेपरातून डोकं वर उचलून यांनीही रोखून बघितलं माझ्याकडे चष्म्यातून. संसारातल्या बारीकसारीक गोष्टी टोकाला न्यायच्या नसतात हे या नवीन मुलींच्या कानावर असलेलं बरं ! तू का फोन करीत होतीस?”

“तुझ्याकडे भरल्या वांग्यासाठीचा गरम मसाला आहे ना, तो थोडा तुझ्याकडच्या  कुंदा बरोबर पाठवून दे ना!”

“पाठवते. पण चार दिवसांपूर्वी भेटली होतीस तेव्हा म्हणालीस की भरल्या वांग्यासाठी ताजा मसाला करून ठेवलाय म्हणून.”

“केलाय गं, पण तोच मेला सापडत नाहीये. फ्रीज उघडला तर छोले, सांबार, गावरान, मालवणी, चायनीज कसल्या कसल्या मसाल्यांच्या बाटल्या इकडून तिकडून हसताहेत मला. पण माझा भरल्या  वांग्यांचा मसाला कुठे सापडत नाहीये. ”

“सुमेधाने कुठे उचलून ठेवलाय का विचारलस का?”

“ती घरात कुठाय? राकेशला मराठीच्या क्लासला घेऊन गेलीय आणि तिथून……..”

“काय ?मराठीचा क्लास? रविवारचा ? दुसरीतल्या मुलाला?”

“काय करणार? तुला माहितीये हा धाकटा नातू मोठ्या सुरेश सारखा शांत, समंजस नाहीये. अर्क आहे अगदी अर्क. एकसारखा इंग्लिश मधून बोलतो. म्हणून त्याला म्हंटलं ‘अरे, घरात तरी मराठी बोलावं. आपली मातृभाषा आहे ती. तर म्हणाला, “ममा स्पीक्स  इन इंग्लिश. सो व्हॉट इज माय मदरटंग?” असली घोड्याच्या पुढे धावणारी अक्कल! वर्गात टीचरने ‘गाय’ या विषयावर दहा ओळी लिहायला सांगितल्या तर याने काय लिहावं ? “अमेरिकेत मुलांना ‘गाय’ असं हाक मारतात. भारतात गाय हा चार पायांचा प्राणी आहे. ती गवत खाते. ती दूध देते. पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.”

“हा हा हा”

“ऐक पुढे….गाईच्या शीला शेण म्हणतात. त्याच्या ‘गौर्या’ बनवतात. गाईची पूजा करतात. वर्गात माझ्या शेजारी पूजा बसते. ती मला खूप आवडते.

“छान, छान !अगदी मनापासून आणि मनःपूर्वक निबंध लिहिलाय राकेशनं.”

“आणि अगदी चक्क ‘गौर्या’…. ग ला काना आणि दोन मात्रा असं लिहिलं होतं.’ अरे, ‘गवऱ्या’असा लिहायचा तो शब्द!

“नो. टीचरने असाच सांगितलाय.”

‘टीचर ने सांगितलं आहे’या ब्रह्मवाक्यानंतर काहीही बोलण्यात अर्थच नसतो.’

‘त्याला म्हणावं, टीचरला पण घेऊन जा क्लासला”.

“हा हा हा.”

                            क्रमशः….

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांजवात…भाग 3 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

☆ जीवनरंग ☆ सांजवात…भाग 3 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

सत्येन…. हो, त्याच्याशी बोलल्याशिवाय मनाची घालमेल कमी होणार नाही, हे ज्योतीला अनुभवातून माहित होते. म्हणुन तिने लगेचच फोन करुन त्याला सांजवातमध्ये येण्यास सांगितले. डोळे झाकून ती शांत बसुन राहिली. ज्योती अस्वस्थ आहे हे मायाने ओळखले.

“ज्योतीताई, बरे वाटत नाही? कॉफी आणु का? नाहीतर खोलीत जाऊन जरा विश्रांती घेता? कामांचे काय हो ,ती करु नंतर.”

“नाही, नाही, नको मला काहीच. I am ok,”

दोन मिनीटे थांबुन…. मनात काहीतरी नक्की करुन. ज्योतीच पुढे म्हणाली, “हे बघ माया,… तु खोलीत जाऊन त्या अनुराधा जोशींना  सामान आवरायला सांग,. नाही,  तुच मदत कर त्यांना. अन् हो, रेखा आली की त्यांना ईकडे च घेऊन ये”

“ठीक आहे” म्हणुन माया निघाली. म्हणजे त्यांना ठेवुन घ्यायचे नसावे असा विचार माया च्या मनात आला.

स्वातीताईच्या कानावर घालुया, तिला काय वाटते ते पण बघुया. असा विचार करुन ज्योतीने स्वातीला फोन लावले. अन् बराच वेळ बोलणे झाले.

“हो ताई…. माझ्या तरी मनात तसे आहे, खुप धीर वाटला तुझ्याशी बोलुन.  हं,हं, सत्येन आला वाटते, रात्री निवांत बोलुयाच, काय होते ते” म्हणुन फोन ठेवला.

अचानक तातडीने का बोलावले या संभ्रमात सत्येन होता. पाठोपाठ रेखा आणि सुरेशही आले. रेखाने…. गेल्या २, ४ दिवसातील सर्व घटना थोडक्यात सांगितल्या.

नंदन तब्येत बरी रहात नसल्यामुळे इथला सर्व व्यवसाय बंद करुन कायमचा अमेरिकेला  मुलाकडे जाणार आहे. त्याची बायको, मुलगा आणि सून सगळ्यांचाच अनुआईला तिकडे नेण्यास विरोध, अगदी कडाडून विरोध.

म्हणुन २५ लाख रु, डिपॉझिट देऊन त्याने तिची व्यवस्था ईथे करायचे ठरवले,. सर्व बंगले, घरेही विकुन टाकली.

ज्योतीच्या मनात आले, बाबांची कोट्यावधी ची इस्टेट. आपल्याला काही नाहीच. पण त्याच्या बायकोला, जिच्यामुळे हे मिळाले त्या सख्ख्या आईला फक्त २५ लाख रु, तेही डिपॉझिट. देणगी नाही, एखादे छोटेसे हक्काचे घर तरी ठेवायचे तिला. चिड आली त्याच्या स्वार्थी वृत्तीची. खरे तर सत्येन आणि स्वातीताईकडे मिस्टर यांचा विरोध म्हणुन कोर्टकचेरी केली नाही, आपलाही हक्क आहेच ना बाबांच्या इस्टेटीत.

“रेखा, ज्यो…. तुला माहित आहेच, सांजवातला पैशाची गरज कायमच असते. पण, तरीही त्यांच्या ईथे रहाण्याने तुला मानसिक त्रास होणार, ताण येणार म्हणुन आपण त्यांना नाही म्हणणार आहोत.”

संस्थेची पैशाची गरज महत्वाची आहे, ही संधी सोडुन नये, फारतर ज्योती सांजवातमधुन बाहेर पडेल, असे सत्येन मत.

पण पैसा नंतरही मिळेल पण ज्योती सारखी कार्यकर्ती, founder member गमवायची नाही, त्यांची सोय आपणच दुसरीकडे करून देऊ. असा सुरेश आणि रेखाचाच युक्तिवाद. यावरही बरीच उलट सुलट चर्चा झाली.

ज्योतीचा कशातच सहभाग नव्हता.

शेवटी रेखा तिच्याजवळ जाऊन “ज्यो… खरंच सांग तुला काय वाटते? तुझ्या मनात काय आहे?”

डोळ्यात आलेले पाणी पुसुन, ज्योती अगदी शांतपणे म्हणाली “सत्येन, आपल्या लग्नाच्या

आधीपासुन सर्व निर्णय आपण दोघांनी मिळुन घेतले, किंवा एकमेकांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मला वाटते, आजही तसाच तुझ्याकडून मिळेल. रेखा, सुरेश, मला वाटते, अनुआईला ईथे ठेवू नये”  ज्योतीने एकदा सगळ्यांकडे बघितले.

“अनुआईला, आमच्या घरीच कायमचे रहायला घेऊन जावे”, सर्वजण तिच्याकडे अवाक होऊन पाहु लागले. पण तिने आपले बोलणे ठामपणे पुढे चालु ठेवले.

“केवळ लहरींखातर किंवा नंदुदादावर मनात करायची म्हणुन मी हा निर्णय घेत नाही, अनुआईवर आतापर्यंत झालेले अन्याय, तिची मानसिक कुचंबणा, तिच्या डायरीतुन वाचली होती, प्रत्यक्षात बघत होते, पण तेंव्हा काही करु शकत नव्हते, नवविधासाठी काम करतांना, ईतर सर्व बायकांना मदत करतांना हे मला कायम टोचतो असे की माझ्याच घरातील अन्याय  मी काही करु शकत नाही, अन् आता संधी मिळते आहे, मी अनुआईला सन्मानाने जगण्यासाठी माझ्या घरी नेणार, माझ्या बाबांनी तिची घेतलेली जबाबदारी, मी स्वीकारणार”

पुढची फाईल बंद करुन बाजुला सारुन ज्योतीने जणु सांगितले की तिचा निर्णय झाला आहे, पक्का झाला आहे. “मघाशी, स्वातीताईशी बोलले, तिचाही पाठिंबा आहे.”

सत्येन, तिच्याजवळ जाऊन, “ज्यो, I am really proud of you, आणि माझ्यावर विश्वास ठेवुन, होकार समजलास, Thanx”

रेखा, सुरेशकडे बघुन, “सुरेश, तु म्हणतोस ते बरोबर आहे, पैसा आपण कुठूनही मिळवू नंतर .पण आता मात्र, तो चेक नंदनला परत देऊन टाका. आम्हाला अनुआईंसाठी एक पैसा ही नको त्यातला.”

तेवढ्यात मागुन, “नाही, नंदनला तो चेक परत द्यायचा नाही, त्याचा या पैशावर काहीही अधिकार नाही.” अनुआई दारातून आत येत म्हणाली.

“अनुआई, अनुआई…” म्हणत ज्योतीने धावत जाऊन मिठी मारली.

तिला जवळ घेत, “ज्यो… ज्यो.. खरंच कौतुक वाटते तुझे अन् सत्येन म्हणतात तसा अभिमानही. तुझा, तुझ्या विचारांचा, आणि तुझ्या या कार्याचाही. पैसे नंदन ने दिलेत कबुल आहे. पण ते आहेत माझ्या नवर्याचे. माझ्या मुलींच्या वडिलांचे, त्यांचाही तेवढाच हक्क आहे त्यावर. माझ्या मुलीच्या कामासाठी, सांजवात प्रकाशमान होण्यासाठीच तो वापरायचा. डिपॉझिट नाही तर, देणगी आहे ही.”

सर्वचजण तिच्याकडे बघु लागले, रेखा काहीतरी बोलणार, तेवढ्यात अनुआई “मायाबरोबर सामानाची आवरा आवर करुन मघाशीच बाहेर येऊन बसले, विझायच्या मार्गावर असलेल्या या दिव्याला आणखी कुठल्या वादळात जावे लागणार, आता उरलेल्या आयुष्याला अजुन कोणत्या बदला ला सामोरे जावे लागणार.. या विचाराने, उदास, निराश झाले होते. पण तुमचे सगळे बोलणे कानावर पडले. ज्योचे किती आणि कसे आभार मानू तेच समजत नाही.”

अनुआईच्या डोळ्यांतील पाणी पुसत, “नाही, अनुआई, नाही, लेकीचे आभार मानतात चा कधी?”

रेखाही पुढे होऊन “आणि… अनुआई. विझायच्या मार्गावरचा दिवा म्हणु नका हं. उलट आतापर्यंत वादळवार्याला तोंड देणारी तुमची जीवनज्योत आता मानाने, शांतपणे… तेवत रहाणार आहे ज्योच्या घरात सांजवात म्हणुन”

कथा समाप्त

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares