मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चक्क डाव्या हाताने पुण्यकर्म !” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “चक्क डाव्या हाताने पुण्यकर्म !” ☆ श्री सुधीर करंदीकर

“पुण्यात पाणी कपात आणि चक्क डाव्या हाताने पुण्य कर्म”

आपल्या डाव्या हाताला छान पुण्य कर्म करण्याची संधी लाभणार आहे.

देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत. दोन्ही अगदी तंतोतंत सारखे आहेत, तरीपण का ते माहित नाही, आपण सगळेच जण उजव्या हातावर जास्त प्रेम करतो.

जेवण उजव्या हाताने करतो,

देवाची पूजा करताना देवाला गंध लावणे; हळदीकुंकू वाहणे; फुलं वाहणे; हे सगळे उजव्या हाताने करतो,

कुणी प्रसाद दिला तर तो उजव्या हातावर घेतो, दानधर्म उजव्या हाताने करतो, वगैरे वगैरे.

आणि आपण डाव्या हाताला फक्त टॉयलेट मध्ये असतानाच न आवडणारे काम देतो.

आता डाव्या हाताला पुण्य कर्म करायला देण्याची पुणेकर मंडळींना छान संधी येत आहे.

कशी ते आता बघू –

येत्या सोमवारपासून म्हणजे १५ जून पासून नळाला पाणी एक दिवसाआड येणार आहे. म्हणजे पाणी वाया न घालवता वापरले तरच साठवलेले पाणी दोन दिवस पुरणार आहे. आणि पाणी वाया न घालवणे हे छानच पुण्य कर्म आहे.

आपल्या घरांमध्ये पाणी कुठे कुठे वाया जाते याचा जर आपण आढावा घेतला तर लक्षात येईल, बेसिन च्या नळांमधून दिवसभरात खूप पाणी वाया जात असतं.

दिवसातून आठ ते दहा वेळा आपण प्रत्येक जण नक्कीच वॉश बेसिन पाशी जातो.

सकाळी उठल्यावर दात घासणे, काही खाल्ल्यानंतर /जेवल्यानंतर तोंड धुणे; चुळा भरणे, मधून मधून चेहरा स्वच्छ करण्याकरता चेहऱ्यावर पाणी मारणे, मधून मधून नाक शिंकरणे, वगैरे वगैरे.

आणि आपल्या बहुतेकांची सवय अशी असते, की, बेसिन जवळ जायचे, नळ सुरु करायचा (काहीजण तर नळ अगदी फुल उघडतात) आणि वर दिल्याप्रमाणे दात घासणे, वगैरे कार्य करायचे आणि मग चेहरा बघायचा, आ करून जीभ बघायची / मान डावीकडे उजवीकडे वळवून आपण छान दिसतोय ना, हे बघायचे आणि शेवटी बेसिनचा नळ बंद करायचा.

थोडक्यात काय, तुमचं काम छान होते, पण ज्या कामा करता अर्धा मग पाणी पूरलं असतं, त्याकरता चार-पाच मग पाणी ड्रेनेज मध्ये जात असतं.

बहुतेक जण बेसिनचा नळ पूर्ण का उघडतात हे कोडेच आहे. आपल्याला एका हाताच्या ओंझळीत मावेल एवढेच पाणी प्रत्येक वेळी घ्यायचे असते, त्याकरता अगदी बारीक नळ पण चालतो. (प्रत्येक बेसिनच्या खाली एक कॉक असतो. आपण सगळ्यांनीच तो कॉक कायम अर्ध्याच्या वर बंद करून ठेवावा म्हणजे बेसनची धार आपोआपच लहान येते. हे जरूर करा).

आता तुम्ही म्हणाल की डाव्या हाताला पूण्य कर्म कसे करायला मिळणार.

सांगतो – 

बेसिन पाशी गेल्यानंतर डावा हात नळावर ठेवायचा. जेव्हा जेव्हा उजव्या हातावर पाणी घ्यायचे असेल, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी डाव्या हाताने नळ उघडायचा, ओंजळ भरली की डाव्या हाताने प्रत्येक वेळी नळ बंद करायचा. जोपर्यंत आपण बेसिन जवळ आहोत तोपर्यंत डावा हात नळावरच ठेवायचा.

म्हणजे आपण डाव्या हाताने काय केले आहे – पाहिजे तेव्हा नळ सोडला, नको तेव्हा नळ बंद केला. आणि यामुळे भरपूर पाण्याची बचत होणार आहे. आणि ती पण रोजच्या रोज, आणि घरामधल्या प्रत्येकाकडून.

पाणी वाचवणे / वाया न घालवणे हे पुण्य कर्म नक्कीच आहे.

आज करून बघा.

जलदेवता खुश होईल, आपल्याकडून पुण्य कर्म होत आहे म्हणून डावा हात खुश होईल, शरीर देवता पण खुश होईल. आपल्या वास्तूमध्ये हे पुण्यकर्म होत आहे म्हणून वास्तुदेवता पण खुश होईल.

वाचवलेल्या पाण्यामुळे काही लोकांची तहान भागणार आहे त्यामुळे निसर्ग देवता पण खुश होईल, आणि वरच्या देवता पण खुश होतील…

एखादी गोष्ट सतत एक महिना केली तर ती सवय लागते असे म्हणतात. पुण्यामध्ये एक दिवसाआड पाणी बंद हे महिनाभर नक्की चालू राहणार.

अशा रीतीने एक दिवस पाणी बंद यामुळे आपल्याला अगदी सोप्या रीतीने पुण्य कर्म करत राहण्याची सवय लागणार आहे.

ज्या ज्या ठिकाणी पाणी बंदी नाही, त्यांनी पण ही सवय जरूर लावून घ्यावी, आणि पुण्य कर्म करत राहावे… आणि खुश रहावे.

खुशिया ही खुशिया हो,

दामन में जिसके,

क्यू ना खुशी से वो दिवाना हो जाये…

आणि याकरता करायचे काय आहे – तर काहीही कारणाकरता बेसिन जवळ गेल्यावर डावा हात बेसिनच्या नळावर ठेवणे, पाहिजे तेव्हा नळ उघडणे आणि नको तेव्हा बंद करणे.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठ आणेवाले आणि मोफत कोचिंग… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ आठ आणेवाले आणि मोफत कोचिंग☆ शीला पतकी 

इयत्ता आठवी ड चा वर्ग… सहामाहीचे पेपर वाटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि गणितात नापास… कारण या विद्यार्थिनी बाहेरच्या शाळेतून आलेल्या… जिथे इंग्रजी फारसे करून घेतले जात नाही… आणि गणिताची तितकी तयारी नसते. या वर्गाला शिकवणारे आम्ही दोन शिक्षक मी आणि डॉक्टर पार्वतीबाई मोहोळकर !.. दोघी आम्ही मेहनती, मुलींबद्दल कळवळा, प्रेम, आपल्या विषयात तयार असल्या पाहिजे याची जाणीव. हे सगळं आमच्या दोघींकडे होतं. मग आम्ही ठरवलं की यांचं कोचिंग घ्यायचं. कोचिंगला सकाळी या मुली लवकर येत नाहीत कारण या मुलींना घरामध्ये कामाला खूप गुंतवले जाते. अतिशय खालच्या वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांनी असतात एकल पालक विद्यार्थिनी. पैशाची चणचण आणि मुलीला कुठेतरी कामाला लावलेले असते. त्यामुळे तिला सकाळी वेळ नाही. मग आम्ही ठरवलं शाळा सुटल्याबरोबर वर्गात घुसायचे एकाही मुलीला घरी जाऊ द्यायचं नाही पालकांना तशी कल्पना दिली होती आणि गुरुदक्षिणा म्हणून वर्गाला एक रुपया फी ठेवली होती. तीन दिवस मोहोळकर बाई इंग्रजी शिकवायचे आणि तीन दिवस मी गणित करून घ्यायची. मुलींना हा तास बुडवता येत नव्हता. अगदी बेसिक पासून आम्ही शिकवायला सुरुवात केली त्यामुळे मुलींना समजायला लागलं त्या शंका विचारायला लागल्या आणि त्यानंतरच्या नऊमाही परीक्षेमध्ये थोडी प्रगती झालेली दिसली. त्यांचाही उत्साह वाढला आमचाही उत्साह वाढला. आणि वार्षिक परीक्षेला मात्र त्या मुलीने कमालच केली सर्व मुलीने उत्तम गुण मिळवले होते आता एक चार दोन असतात ते सुधारत नाहीत ते सोडले तर बाकी सगळ्या मुलींनी चांगले मार्क मिळवले चांगले म्हणजे त्यांच्या दृष्टीने जिथे आज सात आठ दहा पंधरा मार्क पडायचे तिथे ते 40 45 50 पर्यंत गेल्या मुख्य म्हणजे त्यांना विषयाची गोडी लागली, आणि आम्हाला खात्री पटली की आता या दहावीपर्यंत नापास होणार नाहीत. या वर्गाला असणारी एक रुपया फि. वर्गांची संख्या 50 ते 55. शेवटचा वर्ग असायचा. साधारणपणे महिन्याला चाळीस एक रुपये जमायचे. बाकी काही गरीब विद्यार्थीना रुपयाही माफ होता. त्यातले 20 डॉक्टर पार्वती बाई मोहोळकर आणि वीस शीला पत्की अशी वाटणी व्हायची. वीस रुपये फी मिळत असताना आम्ही तीन दिवस एक तास जीव तोडून शिकवत होतो त्या तर बाई पीएचडी करत होत्या.

दुसरी घटना मी मुख्याध्यापक झाल्यावर रिझल्ट वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दहावी वर प्रयत्न सुरू झाले दहावीत जातानाच सर्व नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी एका वर्गात घातल्या जेणेकरून आम्हाला त्यांच्याकडून ठोस काही करून घेता येईल. त्या सर्व मुलींच्या पालकांची मीटिंग बोलवली आणि त्यांना सांगितले की आम्ही या वर्गाला कोणतेही शुल्क घेणार नाही. फक्त मुलींना सकाळी बरोबर आकरा वाजता पाठवा. पालकांची मीटिंग झाली ह्या मुलींवर आता काम केले तर त्या सहज दहावी पास होऊ शकतील असा विश्वास आम्ही पालकांना दिला. कारण त्यावेळेला वीस मार्काच्या कुबड्या नव्हत्या. पालकांनाही कल्पना पटली एक महिना हा वर्ग चालू ठेवला तेव्हा बऱ्याच विद्यार्थिनी उशिरा येत होत्या किंवा आल्या तर बाहेर बसायच्या असे चालू झाले. पुन्हा एकदा विद्यार्थिनी आणि पालक यांची एकत्रितरित्या मीटिंग घेतली. त्यामध्ये एक अडाणी असलेल्या पालक बाई म्हणाल्या,

“मी या सगळ्याची जबाबदारी घेते रोज अकरा वाजता मी येऊन शाळेपाशी बसते एकही मुलगी इकडे तिकडे फिरणार नाही सगळ्या आत जातील ही जबाबदारी मी घेते आणि त्या बाईने मुलींना एक लेक्चर दिले अगदी… का ग टिंब टिंब नो एवढी शाळा तुमच्यासाठी काय काय करायली,… ही बाई एवढं तळमळून सांगायली… अन तुम्हाला नग वाटते होय ग… आमच्या काळात शिक्षण नव्हतं म्हणून आमची अशी तरा झाली… तुम्हाला एवढ आम्ही शाळेत घातले चांगले शिका की 

… मग बसाल आमच्यासारख्या भाकऱ्या थापत अन शेण लावत. अगं पोरींनो तुम्ही पास झाला तर तुमच्या आई बाचं नाव होईल ह्या बाईचं नाव होणार आहे का ?ऐका जरातेवढी तळमळून सांगायला लागली “

झालं या भाषणा नंतर सभेचा नूरच बदलला प्रत्येक पालकाने आपल्या मुलीची जवाबदारी घेतली वर्ग व्यवस्थित सुरू झाले आणि त्यावर्षीचा रिझल्ट सेवासदन च्या आत्तापर्यंतच्या रिझल्ट मध्ये सर्वाधिक म्हणजे 92 टक्के लागला तेव्हा एवढे रिझल्ट लागत नव्हते आणि कॉपी वगैरे प्रकरणं फार प्रचलित नव्हती आणि आमच्या शाळेत तर नाहीच नाही.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आज एक बातमी वाचली 45 हजार रुपये देणाऱ्यांनाच मोटेगावकर प्रश्न देत असत.

फुकट शिकवल्यावर किंमत नसते म्हणून 1रू घेऊन महिनाभर शिकवणारे आम्ही शिक्षक आणि त्याला गुरुदक्षिणा हे भक्कम नाव देणारे… आणि शाळेचा निकाल उत्तम पद्धतीने वाढला पाहिजे यासाठी मुलींच्या वर्गाचे नियोजन करूनमोफत शिकवणारे आमचे शिक्षक त्याला सहकार्य करणारे पालक या सगळ्या घटना 20-22 वर्षांपूर्वीच्या आहेत 22 वर्षांमध्ये एवढ अधःपतन व्हावे याचे वाईट वाटले…!

आता तुम्ही म्हणाल तुमचं काय नीट च नव्हतं पण आमचं त्या गरीब मुलींचं नीट व्हावं म्हणून तरी नक्कीच होतं

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ताकद शांततेची – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ ताकद शांततेची – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे वळण येते जिथे शब्दांच्या तलवारीने काळजावर वार केले जातात. जेव्हा एखादी व्यक्ती आपला सतत अपमान करते तेव्हा सुरुवातीला मनात संताप येतो मग वेदना होते आणि हळूहळू आपण स्वतःच्याच नजरेत स्वतःला कमी लेखू लागतो. पण खरं सांगू का?अपमान हा देणाऱ्याचा स्वभाव असतो पण तो स्वीकारायचा की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. जेव्हा समोरची व्यक्ती वारंवार कटू शब्द बोलते तेव्हा ती प्रत्यक्षात तिच्या स्वतःच्या मनातील गोंधळ मत्सर किंवा न्यूनगंडाला वाट करून देत असते. आपण मात्र ते शब्द एखाद्या ओझ्यासारखे आपल्या खांद्यावर वाहत राहतो.

खरंतर समुद्राच्या लाटा जशा किनाऱ्यावरील खडकावर आदळून परत फिरतात तसाच आपला स्वभाव असायला हवा. खडक शांत असतो स्थिर असतो आणि लाटांच्या आदळण्याने त्याचे अस्तित्व संपत नाही. आपली शांतता हेच अशा अपमानाला दिलेलं सर्वात सडेतोड उत्तर असतं. कारण आपण जेव्हा प्रत्युत्तर देतो तेव्हा आपण नकळत समोरच्याच्या पातळीवर उतरलेलो असतो. कधीकधी हा अपमान आपल्याला खूप काही शिकवून जातो. ज्यांनी आपल्याला कमी लेखलं ज्यांनी आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं तेच लोक कळत-नकळत आपल्याला प्रगतीची जिद्द देऊन जातात. अपमान पचवणं सोपं नसतं पण जो तो पचवून त्याचं रूपांतर ऊर्जेत करतो तोच इतिहासाच्या पानात स्वतःचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहितो.

जगातील मोठ्या क्रांती या बहुतेक वेळा कोणाचे तरी हसे उडवल्यामुळे किंवा कोणाचा तरी घोर अपमान झाल्यामुळेच घडल्या आहेत. अशा वेळी स्वतःला दोष देणं थांबवा. तुमच्या सौंदर्याची तुमच्या बुद्धीची किंवा तुमच्या कर्तृत्वाची किंमत एखाद्या व्यक्तीच्या शब्दांवरून ठरत नाही. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांच्यापासून हळूच दोन पावलं मागे होण्यातच शहाणपण असतं. स्वतःचा आदर करायला शिका कारण जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तेव्हा जगातील कोणताही शब्द तुम्हाला जखम करू शकत नाही. तुमचं मौन इतकं प्रगल्भ असू द्या की समोरच्याला स्वतःच्या शब्दांच्या पोकळपणाची जाणीव व्हावी. शेवटी सूर्याला कोणी कितीही दूषणं दिली तरी त्याचा प्रकाश कमी होत नाही तसंच तुम्ही तुमच्या तेजाने तळपत राहा अपमान करणाऱ्यांचे शब्द आपोआप हवेत विरून जातील. तुमच्या शांततेत इतकी ताकद असू द्या की, समोरच्याच्या शब्दांना स्वतःचीच लाज वाटली पाहिजे.

“मित्रांनो;काळजी घ्या… “

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आजकालची लग्न म्हणजे” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आजकालची लग्न म्हणजे…” ☆ श्री मंगेश मधुकर

परिचयातल्या एकाच्या मुलीच्या लग्न होतं. आग्रहाचं आमंत्रण असल्यानं तासाभराचा प्रवास करून संध्याकाळी सहाच्या सुमारास विवाहस्थळी पोचलो. सव्वा सहाचा मुहूर्त होता. भल्या मोठ्या लॉनमध्ये जंगी तयारी. पाचसातशे खुर्च्या मांडलेल्या. पाहुणे मंडळीचा ओघ सुरू होता. स्टेजवर सत्कार सुरू होते. तीस-चाळीसजण तिथं उगीचच गर्दी करून उभे होते. माईकवर नावं पुकारणाऱ्या दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींमध्ये मोठा आवाज कुणाचा? यावर स्पर्धा चाललेली त्यात भरिसभर म्हणजे दोघं एकाचवेळी बोलत असल्यानं सत्कार घ्यायला येणाऱ्यांना नक्की कोणत्या बाजूला जायचं हे कळत नव्हतं. यामुळे वातावरण तापायला लागल्यावर नवरीच्या मामानं आपल्या माणसाला थांबायला सांगितल्यानं पुढचे सत्कार नीट सुरू झाले. काही वर्षांपासून लग्नात सत्काराचं फॅड बरचं वाढलंय. त्यावरून बऱ्याच मानपानाच्या घटना घडतात. खरं तर या सत्कारांकडं कोणाचं फारसं लक्ष नसतं पण त्याला फार महत्व आलंय. एवढं मात्र नक्की!! असो.

अचानक मुहूर्ताची आठवण झाल्यानं नवरा-नवरीला स्टेजवर बोलावलं गेलं तोपर्यंत साडे-सहा वाजलेले. मुहूर्तची वेळ टळून गेलेली पण त्याविषयी कोणाला देणघेणं नव्हतं. मुहूर्ताची वेळ फक्त पत्रिकेत छापण्यासाठीच असते. बाहेर डीजेच्या दणदणाटात वरात सुरू झाली.

घोड्यावर विराजमान नवरदेव, समोर नाचणारे मित्र-नातेवाईक तर लॉनच्या दाराशी वाट बघणारी नवरी. स्टेजवर चालू असलेले सत्कार आणि वेलकम ड्रिंक, स्टार्टरमध्ये गुंतलेली पाहुणेमंडळी. असं एकूणच नजारा.

सुमारे पाऊण तासानं वरात दाराशी आल्यावर जोरात नाचगाणं झालं त्यात नवरदेवही नाचले. नवरीला पण आग्रह झाला पण ती आली नाही. सुवासिनींनी ओवाळल्यावर रंगबिरंगी दिव्यांच्या झगमगत्या रथात नवरा-नवरी बसले. साधारणत: पाचशे मीटरचं अंतर त्यातही रथाच्या बाजूंनी फटाक्यांची आतषबाजी, मशीनमधून धूर सोडला जात होता सोबत सोनेरी कागदाची चमचम उधळली जात होती, पुढे सहा तरुणींचे समईनृत्य परंतु स्पीकरवरचं गाणं सारखं बंद पडायचं म्हणून वैतागून सगळ्याजणी चालायला लागल्या. या शाही वरातीचे उत्सवमूर्ती नवरा नवरी मात्र अवघडल्यासारखे बसलेले. त्यातही नवरी खूप एक्साईट झालेली. सगळा प्रकार फार भन्नाट, भारी वाटत असल्याचं तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं. नवरा मात्र बावचळल्यासारखा टकामका पाहत होता. रथ स्टेजजवळ पोचल्यावर सत्कार थांबले. दोन्ही कुटुंबातर्फे पुन्हा पाहुण्यांचं स्वागत केल्यानंतर दोन पुढऱ्याचं आशीर्वादपर भाषणं झालं आणि अंतरपाट धरला गेला.

पहिली मंगलअष्टका झाल्यावर अक्षतांची वारेमाप उधळण झाली. त्यानंतर एकच मंगलअष्टका म्हटली गेली आणि “लग्न” लागलं. आकाशात डोळे दिपवणारी फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. ती दहा मिनिटं चालली आणि “लग्न” मात्र अवघ्या तीन मिनिटांत लागलं. लगेचच पाहुणे मंडळीं जेवणाच्या हॉलच्या दिशेने पळाली. काही क्षणांपूर्वी सेलिब्रिटी असणारे नवरा-नवरी एकदम बेदखल अर्थात ती दोघंसुद्धा जग विसरून फोटोसाठी पोजेस देण्यात बिझी. नवीन जोडप्याला शुभेच्छा आणि आहेर देण्यासाठी लागलेल्या रांगेत मीही सामील झालो.

बुफे काउंटर जवळ तुफान गर्दी झालेली. दिसेल त्या मोकळ्या जागेत बसून खाणं चाललेलं. प्रत्येकाची ताटं गच्च भरलेली. त्यातलं बरंचसं टाकून दिलं जात होतं. अन्नाची नासाडी पाहून जेवायची इच्छा राहिली नाही. घड्याळात पाहिलं तेव्हा साडेआठ वाजून गेलेले. न जेवताच निघालो.

डोक्यात विचारांचा कल्लोळ…

  • आताशा ‘लग्न” मंगल सोहळा न राहता भपकेबाज इव्हेंट झालाय.
  • परंपरांसोबतच अनेक फिल्मी आणि खर्चिक गोष्टींच प्रमाण वाढलंय.
  • आपुलकी, आपलेपणा, अगत्य कमी आणि दिखाऊपणा जास्तच असतो.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मीपण’ गळून जावे… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ ‘मीपण’ गळून जावे… ☆ राधिका भांडारकर ☆

त्यादिवशी ती मला सांगत होती, “मी आहे म्हणून यांचं बरं चाललंय. माझ्यामुळेच यांचं सारं सुरळीत चाललं आहे. संसाराचा रगाडा काही कमी असतो का? सगळं काही मी खांद्यावर पेलते म्हणून यांना कसली ददात नाही, तोशीश नाही. उद्या मी गेल्यावर यांचं कसं होईल गं? याची चिंता मला लागून राहिली आहे. ”

… थोडक्यात ‘मी मी आणि मीच’. माझ्या आधीही मीच, आताही मीच आणि नंतरही मीच. तिचं हे लांबलचक “मी पुराण” ऐकून मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं पण तिला काही समजूतीचं लवचिकतेचं, दूरस्थ, निवृत्त राहण्याबाबतीतलं काही सांगावं असंही मला वाटेना. कारण ती तिच्या ‘मीपणात’ इतकी डुबून गेली होती की माझं बोलणं तिनं माशी सारखं उडवून दिलं असतं. शेवटी मी तिला इतकंच म्हणाले, “खरोखरच तू सुपर वुमन आहेस. ”

आमच्या सोसायटीतल्या मिसेस उदगावकर ही अशाच. तशा त्या देखण्या आहेत, त्यांची राहणी नीटनेटकी आहे, धनवानही आहेत, पारिवारिक आयुष्यात तशा सुखीच. रोज संध्याकाळी कट्ट्यावर येतातही पण बाईच्या चेहऱ्यावर अदृश्य अक्षरे लिहिलेली जाणवतात. ”आय अॅम द बेस्ट! ” माझ्यासारखी मीच. जे जे काही नंबर वन ते सगळं सगळं माझ्याकडे आहे. ”

.. …. तशा बोलतात सगळ्यांशी पण चेहऱ्यावर असलेला कायमस्वरूपी, दुसऱ्यांच्या बाबतीतला तुच्छताभाव कधीही लपत नाही. ज्या दिवशी त्या कट्ट्यावर येत नाहीत तो दिवस भाग्याचाच असतो म्हणाना सगळ्यांसाठी.

“आज आल्या नाहीत का मिसेस “फुशारकी”? बरं झालं! ” असं म्हणून कट्ट्यावर एक अत्यंत नैसर्गिक असा हशा पिकतो.

समोरचे नानाही त्याच पठडीतले आहेत. ”आपलं बुवा असं आहे. भल्याभल्यांनी माझ्यापुढे नाकं घासली आहेत आता सांगा? ”

पण नानांच्या बाबतीत एकदा कुणीतरी म्हणाले होते, ” अहो! कोण विचारते या नानांना? निवृत्त झाले तेव्हा साधा निरोपसमारंभ ही कुणी आयोजित केला नाही यांच्यासाठी. एकही मित्र, स्नेही यांना नाही. पत्नी बिचारी त्यांचा हा अहंभाव, मीपणा नाईलाजाने सहन करते पण मुले कुठे विचारतात? ”

 – – थोडक्यात ही “मीपण” पांघरून वावरणारी माणसं असतात ना ती आपल्या पलीकडे काही जग आहे हे विसरूनच गेलेली असतात. अत्यंत अहमन्य आणि आत्मकेंद्री असतात ही.

मला आठवतंय एकदा मी माझ्या नातीने (वय वर्ष सात) काढलेलं एक सुंदर चित्र जवळच्या एका नातेवाईक स्त्रीला दाखवत होते. खरं म्हणजे तिने ते नीट पाहिलं सुद्धा नाही. कौतुक करणं तर दूरच राहो पण फाटकन म्हणाली,

.. “छे हो! हे तर काहीच नाही. माझ्या नातवाने केलेली पेंटिंग्ज तुला दाखवेन. रवी वर्माने पाहिली असती ना तर त्यानेही त्याचं कौतुक केलं असतं. आमच्या घरात एका खोलीत माझ्या सुनेने त्याची सर्व पेंटिंग्ज भिंतीवर छान रचनात्मक पद्धतीने लावून ठेवली आहेत. ये एकदा पहायला मग कळेल तुला. ”

– – तिच्या कलाकार नातवाचं मला का कौतुक नसावं पण *त्या दिवसाचा एक अत्यंत बावळट चेहरा म्हणून*(Todays Face या मोडमध्ये) माझा क्रमांक नक्कीच लागला असता…. तिनं माझ्या वात्सल्य भावनांना अथवा ममत्त्वाला किती दुखावलं याचा तिला पत्ताही नसेल इतकी ती स्वतःत गुंतलेली होती. तिच्या “मीपणाच्या” रम्य कल्पना विश्वात ती मात्र खरोखरच खुशीत असावी. *खुदपसंत* यालाच म्हणतात का?

अशा अहंभावात रमलेल्यांना काय कळणार हो संत रामदासांचा दासबोध आणि युगंधराची गीता? हे लिहिताना “गाढवापुढे वाचली गीता” ही म्हण मात्र माझ्या मनात अगदी बिनदिक्कत प्रवेश करती झाली.

भगवत गीतेनुसार “मीपण” म्हणजेच अहंकार, म्हणजेच दुःखाचे मूळ कारण. अहंकार सोडून निमित्तमात्र होऊन कर्म करणे, निस्वार्थ भावनेने जगणे आणि देहबुद्धी न ठेवता आत्मरूपाने राहणे, अहंकाराचे विसर्जन करणे, मीपण गळून जाणे हे तत्त्वज्ञान यांच्या कधीतरी पचनी पडो असाच धावा जणू मी या समस्त “मीपण” बाळगणाऱ्यांसाठी परमेश्वरापाशी करेन.

– – या “मीपण” असणार्‍यांच्या गोतावळ्यात जेव्हा मी चेंगरून जाते तेव्हा नकळत स्वतःलाही तपासून पाहते बरं का! मी थोडीच साधू संत आहे? तसे काही विकार माझ्यातही असणारच ना? *कोहम* हा प्रश्न माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जेव्हा घुमतो तेव्हा मीही अशीच भांबावते. खरं म्हणजे त्या क्षणी ही जी काही माणसं माझ्या भोवती अहमन्यतेचे झेंडे घेऊन परिक्रमा करत असतात तेव्हा मी सावधपणे विचार करू लागते” मी कशी आहे? ” यापेक्षा मी कशी असले पाहिजे याकडे आपोआपच लक्ष केंद्रित करते. झाडावरून एक पान अलगद माझ्या पायाशी गळून पडतं आणि तेव्हाच त्या गळून पडलेल्या पानाच्या स्वधर्माशी मी मला तपासून पाहते. माझ्यात असलेलं “मीपण” हे असंच या पानासारखं गळून पडावं. नको अहंकार, नको मोह, नको पाश. मुक्त तरी जोडलेलं, स्वतंत्र तरी नम्र. “मी आणि माझे” या रेषा ओलांडून पूर्णपणे विसावलेलं असं माझं मन असावं मग या सुखाच्या अविकारी मार्गावरून जाण्याची मला ओढ लागते पण जमेल का मला हे?

खरं म्हणजे मनातल्या मनात मी कधीतरी, माझ्या भोवतालच्या या अहंकाराने पछाडलेल्या माणसांचे आभार मानते कारण त्यांच्यामुळेच “मीपणा” गळावा या चिंतनयुक्त तत्त्व रेषेवर मी येऊन पोहोचलेली असते. समाजात अशा माणसांची होणारी थट्टा, उपहास, निंदा, नकोसेपण आणि पर्यायाने त्यांचे अंतिम एकटेपण पाहून मला या अवगुणांपासून दूर जावेसे वाटते.

– – एक असतो अर्ध्या हळकुंडात पिवळा होऊन समाजात स्वतःचीच पाठ थोपटत बडेजावात मिरवणारा तर दुसरा असतो साधक, तपस्वी, स्थिर, शांत, निगर्वी. त्याच्या ठायी असलेल्या महान कलागुणांचा त्याला इतकासाही दर्प नसतो, अहंकार नसतो. तो त्याच्या प्रेक्षकांसमोर श्रोत्यांसमोर, शिष्यगणांसमोर आणि स्वतःच्या कलेशीही सदैव लीन असतो. श्रेयस आणि प्रेयस मधल्या कलहात तो कधीच नसतो. शेवटच्या श्वासापर्यंत “मीपण” पार गळून गेलेला तो फक्त एक अभ्यासक असतो.

.. आज मी नसेन तशी, नाहीच. पण उद्याच्या वाटेवर मी नक्की प्रयत्न करेन.

‘ लहानपण देगा देवा … मुंगी साखरेचा रवा.. ’

– – यातला “लहानपण” हा शब्द खूप व्यापक आहे. ”लहानपण” म्हणजे मीपणा, मोठेपणा गळून गेलेला काळ.

.. “ भगवंता माझ्यातले “मीपण” असेच गळून जावे इतकेच माझे मागणे ”.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “१० प्रश्न…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “१० प्रश्न☆ श्री जगदीश काबरे ☆

खाली दिलेले १० प्रश्न हे माणूस रॅशनल विचार करणारा (तार्किक, विवेकवादी) आहे की नाही हे ओळखण्यासाठी तयार केलेले आहेत.

प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना खालील चार पर्याय वापरता येतील —

(अ) पूर्ण असहमत (ब) थोडा असहमत (क) थोडा सहमत (ड) पूर्ण सहमत

रॅशनल विचार ‘ ओळखण्यासाठी प्रश्नमंजुषा———

१) मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिच्या मागचा पुरावा किंवा तर्क शोधतो.

२) देव, भाग्य किंवा नियती यापेक्षा मानवी प्रयत्न आणि विज्ञानावर माझा जास्त विश्वास आहे.

३) धार्मिक किंवा पारंपरिक विधी करण्यापूर्वी मी त्यामागील तर्कशुद्ध कारणांचा शोध घेतो.

४) एखादी गोष्ट बहुसंख्य लोक मानतात म्हणून ती खरी असते असे मला वाटत नाही.

५) कोणतीही श्रद्धा किंवा परंपरा जर मानवी हक्क किंवा समानतेविरुद्ध जात असेल, तर मी तिचा विरोध करतो.

६) माझ्या निर्णयांवर भावना किंवा समाजाचा दबाव नव्हे, तर तथ्ये आणि विचारांचा प्रभाव असतो.

७) भविष्य जाणणारे, वास्तुशास्त्र, राशी, ग्रहदशा यावर आधारित सल्ले मला अवैज्ञानिक वाटतात.

८) मी माझ्या विचारांना चुकीचे ठरवणारा पुरावा आल्यास मत बदलायला तयार असतो.

९) समाजात स्त्री-पुरुष समान आहेत ही भूमिका मी धर्मग्रंथांपेक्षा वैज्ञानिक आणि नैतिक दृष्टिकोनातून मान्य करतो.

१०) अंधश्रद्धा, चमत्कार किंवा तथाकथित “दैवी हस्तक्षेप” या संकल्पना मला समजून घेण्यासारख्या नव्हे तर तपासण्यासारख्या वाटतात.

– – या सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून स्वतःलाच द्यावयाची आहेत.

– — – वरील सगळ्या प्रश्नांना ‘पूर्ण सहमत’ हे उत्तर देणारा माणूस रॅशनल विचार करणारा आहे असे समजायला हरकत नाही.

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ओम फेसबुकाय नमः” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ओम फेसबुकाय नमः” ☆ श्री सुधीर करंदीकर

” ओम फेसबुकाय नमः “

बऱ्याच दिवसात एका मित्राशी फोनवर बोलणं झालं नव्हतं म्हणून विचार केला आज वेळ आहे तर फोन करावा. पलीकडे रिंग वाजली आणि लेडीज आवाज आला –

हॅलो कोण बोलतायं आपण

मी : नमस्कार, मी करंदीकर बोलतोय. शर्माजी कुठे बाहेर गेलेत का.

तिकडून : नाही, ते घरीच आहेत पण सध्या ते फेसबुकवर आहेत.

मी : म्हणजे! मग फोन तुम्ही कसा काय घेतला

तिकडून : रोज सकाळचा नाश्ता झाला की ते दोन तास फेसबुकवर असतात. आणि त्यावेळेत कोणाचाही फोन घ्यायचा नाही म्हणून कॉल फॉरवर्डिंग करता माझा नंबर दिलेला असतो. म्हणून फोन माझ्या फोनवर येतो.

तिकडून : ते फेसबुक वरून उठले, की तुमचा फोन येऊन गेल्याचे त्यांना सांगते.

मी ठिक आहे म्हटले, बाय-बाय केले आणि फोन बंद झाला.

आणखीन एका मित्राला फोन लावला आणि तो पण फेसबुक वरच होता.

विचार केला, एका मैत्रीणीला फोन लावावा, ती नक्कीच फेसबुक वर नसणार.

फोन लावला आणि तिकडून पुरुषी आवाज आला..

तिकडून : हॅलो कोण बोलताय आपण?

मी : नमस्कार, मी करंदीकर बोलतोय. छाया मॅडम आहेत का?

तिकडून : आहेत, पण आता त्या फेसबूक वर आहेत. अजून दोन एक तास तरी त्या फेसबुक वरून बाहेर येणार नाहीत. हा त्यांचा रोजचा शेड्यूल असतो. बाहेर आल्या की त्यांना तुमचा फोन आल्याचे सांगतो.

मी थोडे बोललो आणि धन्यवाद म्हणून फोन बंद केला.

विचार केला की आता अशा मित्राला फोन लावावा की जो स्वतः फेसबूक वर असला आणि कॉल फॉरवर्ड त्याच्या बायकोकडे गेला, तर त्याच्या बायकोशी पण बोलता येईल, कारण त्या पण चांगल्या ओळखीच्या आहेत.

मी फोन लावला रिंग वाजली आणि तिकडून एकदम तरुण माणसाचा आवाज आला –

हॅलो कोण बोलताय आपण?

मी : मी करंदीकर बोलतोय, सुरेश जी आहेत का.

तिकडून : आहेत पण आता ते फेसबुक वर आहेत

आणि या वेळेत ते कोणाचाही कॉल घेत नाहीत.

मी : त्यांच्या मिसेस ना फोन देता येईल का?

तिकडून : सॉरी सर, त्या म्हणजे आई पण आता फेसबुक वर आहे. ती पण यावेळी कोणाचे फोन घेत नाही. मी सुरेशजींचा मुलगा बोलतोय.

माझं वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे मी घरीच आहे. दोघांनी त्यांचे फोन कॉल फॉरवर्ड वर माझा नंबर दिला आहे.

मी : दोघंही दोन तीन तास फेसबुकवर म्हणजे सकाळच्या वेळी घरात कामाचा खोळंबा होत असेल

तिकडून : नाही नाही, सगळ्या कामांना मावशी आहेत. आणि ते दोघं फेसबुक वर असले, की घरात तेवढीच शांती असते. माझी बायको पण रिलॅक्स असते.

मी दोघांनाही तुमचा फोन आल्याचे सांगतो.

मी मुलाशी त्याच्या ऑफिस बद्दल / कामाबद्दल थोडी चौकशी केली, ‘हॅव अ नाईस डे’ असे म्हणून फोन बंद केला.

 — — विचार केला, अरे सगळे फेसबुक वर आहेत आणि आपण फेसबुकच्या बाहेर आहोत हे काही बरोबर नाही.

 मी लगेच माझ्या मोबाईलवर कॉल फॉरवर्ड करता बायकोचा नंबर टाकला आणि फेसबूकमय झालो.

 “ओम फेसबुकाय नमः”

 

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”वक्त ने आजमाया.. लेकिन…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “वक्त ने आजमाया.. लेकिन...” ☆ संध्या बेडेकर ☆

वक्त ने आजमाया.. लेकिन.. हरा नहीं पाया ।” – – – 

काल भारत पाकिस्तानची T 20 World Cup मॅच बघत होते. अनेक चढ उतार मॅच मध्ये घडत होते, आणि त्याबरोबर प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चूकत होते. शेवटचा ओव्हर तर ‘full of activities ‘ होता. बहुतेक क्रिकेट मधील सर्व टर्म्स त्या ओव्हर मध्ये ‘commentators ‘ ना वापराव्या लागल्या.

त्या ओव्हर मध्ये काय नाही झालं.??

एक, दोन, तीन, चार, सिक्स रनस्, नो बॉल, फ्री हिट Wide Ball, stumps उडाले, दोन प्लेअर आउट होतात. कॅप्टन चे एंपायर बरोबर डिस्कशन वगैरे वगैरे. तो एक ओव्हर म्हणजे पूर्ण मॅच होता.

खेळ कसा प्रत्येक बॉलवर बदलू शकतो. ते समजे पर्यंत दुसरी घटना घडते. प्लेअर्स ची कमाल तर होतीच, बरोबर एंपायर्स ची पण परीक्षाच होती. एवढी कठीण परीक्षा त्यांनीही यापूर्वी कधी दिली नसेल बहुतेक. जणू काही सर्वांच्या डोक्यात Super computer fit असतात, तसे ते निर्णय देत होते.

खेळ कसा खेळावा याची अनेक उदाहरण प्रत्यक्षात बघायला मिळत होती.

म्हणजे पूढे एखादा कोच आपल्या शिष्याला कोचिंग देताना हा over नक्की दाखवेल असा हा over होता.

कोणाकोणाचे किती आणि कशा कशाचे कौतुक करावं हेच कळत नाही. हा over म्हणजे तासोंतास चर्चा करण्याचा विषय आहे.

विराटचे तर विराट कौतुक. त्याची बॉडी लॅंगवेज, aggressive approach, presence of mind, stamina, awareness, quick decisios. एवढ्या प्रेशर मध्ये असताना तो घेत होता. कुठेही give up, surrender ची बॉडी लॅंग्वेज नव्हती. ‘मी जिंकणारच ‘हाच भाव चेहऱ्यावर होता.

त्याला साथ देणारा हार्दिक चे योगदान पण तेवढेच. आश्विनचां एवढ्या प्रेशर मध्ये असताना wide ball समजून, सोडणे. खरंच खूप कौतुकास्पद. दोन बॉल खेळायला आलेल्या अश्विन चा वर्ल्ड क्लास दिसला. अनुभव कामी आला.

 

पूर्ण टीम वर्क. positive attitude, Never say die approach.

हारलेला मॅच जिंकला.

 

कुठे, कधी, किती, कसा, केंव्हा, काय?? समतोल साधावा?? हे कोणीही मॅच बघून शिकावं. आयुष्याचे सार सांगणारा असा हा over होता.

मला तर वाटतं मनातील मरगळ काढायला प्रत्येकाने हा मॅच मधून मधून नक्की बघावा.

एक लाखाच्या आसपास उपस्थित दर्शकांसमोर आपले concentration कायम ठेवणे. ध्येयाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक बॉल वर होणारा प्रेक्षकांचा हल्ला तुम्हाला विचलित करत नाही, म्हणजे किती मानसिक शक्ती, टफनेस, विल पावर, आणि काय म्हणाव?? शब्द/ विशेषण कमी पडतायेत.

त्यानंतर मी कितीदा तरी हा मॅच बघीतला. प्रत्येक वेळी अनेक नवीन विचार मनात येत होते.

हाच का तो कोहली?? मधल्या पिरेडमध्ये अगदी डाऊन होता. प्रत्येक वेळेस खेळायला यायचा आणि लगेच पॅव्हेलियन मध्ये परत जायचा. तेंव्हा अनेकांना बोलायचा चान्स मिळाला होता.

पुन्हा बाऊन्स होऊन पुर्वी पेक्षा जास्त दमदार वापसी. व्वा!! कौतुक च आहे.

तो काळ म्हणजे त्याच्या क्रिकेट जीवनात आलेला ‘Bad Patch ‘ च होता. शिखरावर असताना खाली घसरण. पुन्हा शिखरावर पोहचण. यामधील काळ म्हणजे अनेक मानसिक, शारीरिक उलाढाली चां काळ असणार नाही का?? त्यात पब्लिक फिगर असल्यावर लोकांच्या अपेक्षा असतातच. कौतुक करताना अगदी डोक्यावरच नाही तर, देवघरात बसवतील, तर अपेक्षा भंग झाल्यास काय करतील?? त्यांचाही भरवसा नसतो..

भारतीय तर तसेच क्रिकेट प्रेमी म्हणजे क्रिकेट मागे वेडेच,

 

 क्रिकेट के लिये कुछ भी करेगा वाले

 त्यात पाकिस्तान बरोबर मॅच म्हणजे

 “इज्जत का सवाल असतो.

 

BAD PATCH मध्ये,

खेळताना येणाऱ्या अडचणींवर लक्ष देणे, काही खेळण्याचे टेक्नीक बदलणे. कुठे सतर्क रहायचे?? कुठे समर्पित रहायचे?? हे ठरविणे. योग्य वेळी दोन पावले मागे घेणे.

खेळण्या बरोबर मानसिक अनुशासन असणेही आवश्यक आहे. हे काम खेळाडूंच्या कोचचे जरी असले तरी ते खेळाडू ने ऐकणेही महत्वाचे आहे.

जो काळानुसार स्वतः मध्ये बदल करतो तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. घसरत असताना ताठ उभं राहून चालत नाही. झुकता आलं पाहिजे. शिक्षण घेणे आणि त्याचा उपयोग परीक्षेत करणे, दोन्हीं मध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. खेळाच्या मैदानावर common sense and Presence of mind चे महत्व जास्त असते.

या काळात,

“जब कोई बात बिगड जाए, जब कोई मुश्किल आ जाए, तुम देना साथ मेरा. “

 

असा कोचही पाहिजे. ‘धोनी’ सारखा साथ देणारा मित्रही पाहिजे.

हा विश्वास कोच आणि प्लेअर मध्ये असायला हवा.

“वक्त ने विराट को आजमाया बहुत लेकिन हरा नहीं पाया ।

हेच म्हणावे लागेल.

 

Bad Patch

हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच. त्यांचा सामना करणे म्हणजे, स्वतः चे परिक्षण निरिक्षण करेक्शन करता आले पाहिजे. पुन्हा RESTART चे बटन दाबून पुन्हा जोमाने कष्ट करता आले पाहिजे.

स्वतः लाच Push and run करणे जमले पाहिजे. प्रत्येक area त double XL पेक्षा जास्त मेहनत करणे जमले पाहिजे.

 

म्हणतात ना

” जिंदगी में तोता नहीं बाज बनिए, क्यों कि तोता बोलता बहुत हैं और उड़ता कम हैं । बाज शांत रहता है, लेकिन आसमां छूने की ताकत रखता हैं। “

 

जिंदगी हर कदम एक नयी जंग हैं।

 Don’t be afraid to take risk.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “राधा कृष्ण…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “राधा कृष्ण…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

राष्ट्र सेविका समितिची शाखा एक तास असते. त्या एका तासाचे व्यवस्थित नियोजन केलेले आहे. ध्वजवंदन, शारीरिक- सूक्ष्म व्यायाम, खेळ, बौद्धिक, गीत आणि शेवटी प्रार्थना असा सर्वसाधारण क्रम असतो.

इथे घेतले जाणारे खेळ एकदम वैशिष्ट्यपूर्ण आहेत. लंगडी, खोखो, कबड्डी हे खेळ कसे खेळले जातात हे शब्दांवरूनच समजते. तसेच हे खेळ प्रत्येकीने आधी खेळलेले आहेत. इथले खेळ कदाचित तुम्ही खेळले नसणार…

आता” राधा कृष्ण ”

हा खेळ बघा बरं… तुम्ही खेळलात का कधी?

नाही ना… सांगते मजेदार खेळ आहे.

सर्वांनी गोल करून उभ राहायचं. ओळीने एक दोन… एक दोन म्हणायचं. त्या दोघींची जोडी. एक राधा आणि दुसरी कृष्ण..

राधानी डोक्यावर माठ असल्याची ॲक्शन करून ऊभ रहायच. कृष्ण असलेल्यांनी शिट्टी वाजली की गोल पळायला सुरुवात करायची. नियम असा की ऊलटं पळायच नाही.

तेव्हा मोठ्या आवाजात घोषणा द्यायच्या.

” हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की.. ”

” जय जय गीता भगवत गीता ”

परत शिट्टी वाजली की आपल्या राधे कडे धावत पळत लवकर पोहोचायचं. तिच्यासमोर श्रीकृष्णाच्या मुरलीधर रूपात उभ राहायचं. शंकराचार्यांच्या श्रीकृष्ण अष्टकम् मध्ये त्यांनी म्हटल आहे तसं

” सुनाद वेणू हस्तकं ”

 

किती गोड खेळ आहे ना…

ज्यांची जोडी शेवटी होईल ती आऊट..

परत खेळाची पुढची फेरी सुरू…

सहज घोषणा देता देता श्रीकृष्णाच्या भगवत गीतेची आठवण करून दिली जाते. मला तर हा खेळ फार आवडला. या खेळात दरवेळी निराळी जोडी जमते. परस्पर परिचय.. संवाद होतो. स्नेहबंध वृद्धिंगत होतो.

अशा जोड्या जमवून खेळायचा अजून एक खेळ..

” धबधबा ”

बघा… हा शब्द ऐकून.. अरेच्चा हा कसा खेळायचा? ही उत्सुकता तुमच्या मनात आली ना?

तो खेळ असा आहे..

एक नंबरनी गुढघ्यावर हात ठेवून वाकायचं. दोन नंबरनी शिट्टी वाजली की पळायला सुरुवात करायची. अर्थात त्यावेळेस घोषणा सुरू करायच्या..

” झूल झूल झेंडा झूल

संघटन में शक्ती है

शक्ती को बढाना है

हिंदुस्तान हमारा है “

घोषणा देत पळताना मनात एक ऊर्जा निर्माण होऊन जोश येतो. खेळात उत्साह चैतन्य येते.

शिट्टी वाजली की सखीच्या समोर जाऊन तिच्या पाठीवर पालथे हात वरून खाली जोरजोरात थोपटायचे… की झाला धबधबा.. आहे की नाही मजा… सगळ्याजणी एकाच वेळेस ही क्रिया करतात त्यामुळे बघायला फार गंमत वाटते.

हे खेळ मनाला सुखावून जातात..

असंही समितीत सुरू असतं…

निखळ आनंद देणार…

अवघड व्यायाम करायच्या आधी खेळाडूंकडून थोडा वाॅर्मअप करून घेतात. शाखेत खेळानंतर बौद्धिक असते. इथे मेंदू तरतरीत होऊन बौद्धिक नीटपणे ऐकले जावे म्हणून हे खेळ घेत असावेत.

गंमत म्हणून म्हटलं हं…

इथे सांगितलेले बौद्धिक ऐकण्याची सध्या मात्र फार गरज आहे. आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी समितीत जाऊन समजतात. आजूबाजूला काय चाललेले आहे हे माहित होते.

आपण काय करायला हवे याचे भान येते. त्याबरोबरच… ते ऐकून आपल्यात सुधारणा करूया.. इतरांनाही शाखेत येण्यासाठी प्रवृत्त करूया… खेळाचा आनंद घेत घेत राष्ट्रप्रेम जागृत ठेवू या.

त्यासाठी वंदनीय केळकर मावशींना वंदन करून म्हणूया…

मौसीजीने पेड लगाया 

तन-मन धन से सिचेंगे”

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनुष्य इंगळी, अति दारुण – – ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ मनुष्य इंगळी, अति दारुण – – ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

“पणत्या कशा दिल्या काकू? ”

“नक्षीच्या ६० रूपये डझन आणि साध्या ४० रूपये डझन”

“मला ६ हव्यात. ”

“६ नं कुठं दिवाळी होत असती का दादा? दोन्ही घ्या की एकेक डझन.. नव्वद ला देते मी.. ”

हो-नाही, हो-नाही करत करत शेवटी एक डझन पणत्या घ्याव्यात असा निर्णय झाला. ‘वैशाली’त उत्तप्पा मागवताना एवढा विचार नाही करत कुणी. पण पणत्या सहा घ्याव्या की बारा? याचा निर्णय घेण्यासाठी पाच मिनिटं घेतो आपण. माणसाची तऱ्हाच निराळी.

लग्न ठरवण्यासाठी भेटताना बरिस्ता किंवा सीसीडी मध्ये भेटून बिलासाठी पाचशे रूपयांच्या दोन नोटा देणाऱ्या तरूणाचं रूपांतर लग्नानंतर एक किलोच्या भावात घासाघीस करून पाव किलो भाजी घेणाऱ्यात कसं होतं, ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. याला दुटप्पीपणा म्हणता येणार नाही, ही स्वाभाविक वृत्ती आहे. कोणत्या गोष्टी गृहित धराव्यात, कोणत्या गोष्टींना महत्व द्यावं, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात याच्या धोरणांमध्ये गडबड झाली की जगण्या-वागण्याची पुढची सगळी समीकरणं चुकतच जातात आणि आपल्याच चुकांमुळं हे घडतंय, हे बहुतांश लोकांच्या लक्षातही येत नाही.

“हव्यात कशाला ढीगभर पणत्या? दारात लावायला दोन पणत्या पुरे झाल्या. ” असं म्हणणाऱ्या गृहलक्ष्मीनं स्वत:चा चारखणी वाॅर्डरोब उघडून त्याचं ऑडीट करावं आणि मग पुढची प्रत्येक साडी खरेदी करताना “हवेत कशाला ढीगभर कपडे? ” असं म्हणावं. जमेल का?

एका ग्राहकरूपातल्या गृहलक्ष्मीला समोरच्या विक्रेतीमधली गृहलक्ष्मी दिसू नये, हे स्वत:च्याच कोषात गुरफटून गेलेल्या कमालीच्या असंवेदनशील व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे.

मंडई- तुळशीबागेपासून खरेदी सुरू होते, तेव्हा पाकीट लहान असतं, तिथल्या वस्तू महागड्या वाटतात. पुढं बेलबाग चौकातून डावीकडे वळलं की, तेच पाकीट प्रत्येक पावलागणिक आकारानं मोठं-मोठं व्हायला लागतं आणि खरोखरच्या महागड्या गोष्टीसुद्धा स्वस्त वाटायला लागतात. हा केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीतला खेळ नाही, हा माणसांच्या जगण्याविषयीच्या अस्पष्ट आणि अंधुक कल्पनांचा खेळ आहे.

एक जुना प्रसंग सांगतो. जोगेश्वरीच्या बोळात एक विक्रेता मेणाच्या उष्णतेवर चालणाऱ्या पत्र्याच्या बोटी विकत होता. मला त्या बोटी हव्या होत्याच. मी त्या निवडून घेत होतो. एक तरूण वडील आपल्या मुलाला घेऊन आले. त्यांना एक बोट हवी होती.

“केवढ्याला दिली रे?”

“साठ रूपये साहेब.”

“साठ? अरे, खेळणं विकतोस की खरी बोट विकतोस? ”

“खेळणंच आहे. ”

“साधी पत्र्याची तर आहे. माझ्या लहानपणी पाच रूपयांना मिळायची. आता साठ रूपये? वीस ला दे. ”

“साहेब, माझी खरेदीच चाळीस रूपयाची आहे. वीस ला कशी देऊ? ”

तेवढ्यात त्यांच्या लहान मुलानं सूर लावला. “पप्पा, मला प्ले स्टेशन देणार होतात तुम्ही. मला हे नकोय. हे एकदम थर्ड क्लास आहे. ”

“चल. देतो तुला प्ले स्टेशन. ”

बाप-लेक निघून गेले. तीस हजार रूपयांचं प्ले स्टेशन घेताना त्यानं पाचशे रूपयांत मागितलं असेल का? “आमच्या वेळी तर असलं काहीच नव्हतं. म्हणून दे आता फुकट. ”असं म्हटलं असेल का त्यानं? नक्कीच नाही. तो काय, कुणीच असं म्हणणार नाही.

“दादा, हे गिऱ्हाईक दुसऱ्यांदा येऊन गेलं बघा. नुसतंच बघून भाव करून जातो. खरेदी तर करत नाही. ” मी निरूत्तर होऊन त्याचा निरोप घेतला. पण तो मुद्दा मनात राहिला तो राहिलाच.

डाॅ. कलामांनी एकदा प्रश्न विचारला होता, “जगातली सगळ्यात मोठी समस्या कोणती? ” त्यावर एका लहान मुलीनं उत्तर दिलं होतं, “गरिबी. ” त्या मुलीचं उत्तर किती खरं होतं, याचा प्रत्यय दरवर्षी दिवाळी आली की येतो. सणासुदीच्या वस्तू, ज्याला आजकाल ‘सिझनल्स’ म्हणायची पद्धत आहे, ती बाजारपेठ ही खरं तर आपल्या देशातली एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. पण अन्य व्यवसायांच्या चकचकाटात तिची गर्भश्रीमंती आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. या बाजारपेठेचे विक्रेते शालेय शिक्षणाच्या दृष्टीनं अडाणी असतीलही पण भारतीय मनांचं आणि सश्रद्धतेचं मर्म त्यांना अचूक उमगलेलं आहे. त्यांना या गोष्टींना ब्रॅन्डचं रूप देता आलेलं नाही, ही गोष्ट खरी आहे पण त्याचं कारण कदाचित या बाजारपेठेचं असंघटित असणं हेही असू शकेल. त्यामुळे तो दोष माणसांचा नाही, असलाच तर तो चुकीच्या धोरणांचा आहे आणि कोरोनाच्या सावटाखालच्या या दिवाळीत तर त्याचा रंग अधिकच ठळकपणे दिसतो आहे.

वडापाव विकणारा, चहा विकणारा आणि झेंडूची फुलं विकणारा असे तीन विक्रेते एकाच रस्त्यावर शेजारी शेजारी उभे राहून व्यवसाय करतायत. त्यात वडापावच्या भावाची घासाघीस होत नाही आणि चहाचीही होत नाही. पण झेंडूची फुलं विकणाऱ्याशी मात्र जवळपास प्रत्येकजण घासाघीस करतो, हुज्जत घालतो. गजरे विकणाऱ्यानं दहा रूपये असं म्हटलं की, ‘पन्नासला सहा देतोस का? ’ असं दहापैकी नऊपण विचारतातच. पण वीस-पंचवीस वडापाव खरेदी करूनही ते वडापाव विक्रेत्याला हा प्रश्न अजिबात विचारत नाहीत, पैसे देतात. तसं पाहिलं तर, दोघेही रस्त्यावरचेच विक्रेते. मग हा फरक का?

फरक विक्रेत्यात नाही, फरक आपल्या दृष्टीकोनात आहे. आपल्याला स्वत:ला बदलावंच लागेल..!

 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares