मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रेस्टींग पिरियड…… नात्यांमधला !!! ☆ सुश्री स्वाती देव

? मनमंजुषेतून ?

☆ रेस्टींग पिरियड…… नात्यांमधला !!! ☆ सुश्री स्वाती देव ☆

बागकाम हा माझा ठआवडता छंद असल्यामुळे बागकामाचे व्हिडिओ बघत होते. अनेक plants ची माहिती करून घेत होते. त्यांच्या वाढीविषयी किंवा त्यांच्या संगोपना विषयी माहिती वाचताना एक शब्द बऱ्याच वेळा येत होता. तो म्हणजे रेस्टींग पिरियड. साधारणतः हिवाळ्यामध्ये त्यांचा रेस्टिंग पिरियड असतो. त्या कालावधीमध्ये खत अजिबात घालायचं नसत, पाणी कमीत कमी देतात. काही काही झाडांच तर हार्ड प्रूनिंग किंवा कटिंग करून टाकतात. सगळी पाने काढून टाकतात. म्हणजे बर्‍यापैकी हार्श ट्रिटमेंट त्यांना दिली जाते असे मला वाचताना वाटले. म्हणजे एखाद्याला झाडांबद्दलची ही पुरेशी माहिती नसेल तर झाडांचे बहरणे बंद झाल्यावर तो सोसासोसाने त्याला खतपाणी घालत बसेल, उन्हातली कुंडी सावलीत ठेवेल, सावलीतली ऊन्हात ठेवून बघेल आणि तरी शेवटी फुलं येत नाही म्हणून दुःख करत बसेल. पण या हक्काच्या रेस्टिंग पिरियडनंतर ज्या जोमाने झाडं बहरतात हे वाचल्यानंतर मनात एकदम विचार येऊन गेला की नात्यांच पण असंच असतं का ?

नात्यांना आपण मायेचं, प्रेमाचं, विश्वासाचं खतपाणी घालत असतो आणि ती हळूहळू बहरतात पण कधीकधी या गोष्टींचा समतोल बिघडतो. कधी जास्त गृहीत धरल जातं, कधी अति काळजी केली जाते, कधी हक्क दाखवला जातो. काय आणि कसं पण हे नातें हळु हळू नाजूक, कमकुवत व्हायला लागत. मग अचानक कधीतरी छोटीशी वाटणारी कृती किंवा अजाणतेपणी गेलेला एखादा शब्द हे पुरेसं ठरतं आणि ते नातं एकदम शॉक मध्ये जातं. मग अशा वेळेस हा चक्क नात्यांमधला रेस्टिंग पिरियड आहे असं मानायला काय हरकत आहे ? मग अशावेळी जाणीपूर्वक संवाद थोडा कमी झाला तरी हरकत नाही, वारंवार भेटणं व्हायला पाहिजेच असं नाही, गरजेपुरताच संवाद झाला तरी काही बिघडत नाही. नेमकं काय चुकलं असेल याचा विचार करून, योग्य तो बोध घेऊन, आपण स्वतः चुकलो असलो तर आपल्याला स्वतःला सुद्धा माफ करून शांत राहावे. अगदीच तशी गरज पडलीच तर आपण आहोतच एकमेकांना एवढा विश्वास पुरेसा आहे. कालांतराने मन किंवा नाती पुन्हा जुळतील याबद्दल मला तरी खात्री वाटते.

मात्र कधीकधी बसणारा शॉक हा मोठा असतो. नुकत्याच आमच्या गच्चीमध्ये माळीबुवांकडून सगळ्या कुंड्या repoting करून घेतल्या. पूर्ण झाडं काढून त्याची मुळांची छाटणी करून ती गरजेनुसार मोठ्या कुंड्यांमध्ये लावली. काही काही झाडांना पालवी फुटायला सुरुवात पण झाली पण काही झाडं मात्र ढिम्मच. त्यांच्यात जिवंतपणाची काही लक्षणे दिसत नव्हती. मला चाळाच लागला होता रोज एकदा त्या वाळलेल्या झाडांकडे जाऊन निरीक्षण करायचं कुठे जिवंतपणाची निशाणी दिसतेय का ते. दोन तीन झाडांची तर मी आशाच सोडून दिली होती पण आता सीझन बदलल्यानंतर अचानक मला त्यांच्यावर इवलिशी फूट दिसायला लागली. ज्या झाडांची मी आशा सोडून दिली होती त्या प्रत्येकाला पालवी फुटलेली आहे. थोडक्यात नात्यात सुध्दा शॉक मोठा असेल तर वेळ पण जास्त लागेल पण ते पूर्ववत मात्र नक्की होईल असा विश्वास वाटतो.

एवढं सगळ असलं तरी जसं आपण अमरपट्टा घेऊन आलो नाहीये तशी काही नाती सुद्धा अमरपट्टा घेऊन आलेली नसतात, त्यांचीही एक्सपायरी डेट असतेच की. त्यांचा सुद्धा मृत्यू होतो. तसं झालंच तर मग त्या वेळेस मात्र तोही शांतपणे स्वीकारावा.

हे सगळे माझ्या स्वतःच्या अनुभवातून मनामध्ये उठणारे तरंग आहेत. निसर्ग आणि माझं अचपळ मन यात मला कुठेतरी संगती दिसली, ती शब्दांत उतरवली….

 

© सुश्री स्वाती देव

+91 98509 72526

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जागतिक अंध दिवस निमित्त – डोळस…. ☆ श्री सुनीत गोधपुरे

? मनमंजुषेतून ?

☆ जागतिक अंध दिवस निमित्त – डोळस…. ☆ श्री सुनीत गोधपुरे ☆

तो अंध तरुण रोज काॕर्पोरेशनच्या त्या बसस्टाॕपवर उभा असतो.

मी ज्या वारजेमाळवाडी  बसमधे चढतो, तोही त्याच बसमधे चढतो. मी वारजे जुन्या जकात नाक्याला माझ्या आॕफीसशी उतरतो अन तो अजून तसाच पुढे माळवाडीला जातो. त्याच्या पाठीवर जी सॕक सदृश्य बॕग असते त्यावर फिक्कट पुसट अक्षरे दिसतात ‘जीवन प्रकाश अंध शाळा, माळवाडी’. गर्दीमुळे ब-याच वेळेला बसायला जागा मिळत नाही तेंव्हा काही सुजाण लोक त्याला बसायला जागा देतात, तेंव्हा तो विनम्रपणे नकार देतो. कोथरुड स्टँडच्या आसपास गाडी ब-यापैकी रिकामी होते तेंव्हा आम्हाला बसायला जागा मिळते. माझा स्टाॕप त्यानंतर  लगेच असल्याने मी पुढे जाउन बसतो व उतरुन जातो. बसबरोबर त्या तरुणाची आठवण दुस-या दिवसापर्यंत पुढे निघून जाते.

त्या दिवशी योगायोगाने आम्ही नळस्टाॕपला एका सिटवर बसतो. ब-याच  दिवसांचे कुतुहल असल्याने मी त्याला विचारतो..

‘तुम्ही रोज बस ला दिसता..पुढे माळवाडीला जाता..स्टुडंट आहात का?’

अचानक मी विचारलेल्या प्रश्नाने तो आधी चमकतो. मग उत्तर देतो.

‘सर, मी विद्यार्थी नाही मी शिकवतो..’

‘ओ अच्छा..ब्रेल वाचायला वगैरे शिकवता का मुलांना?’ मी विचारतो.

तो हसतो..मग उत्तरतो ’नाही सर. मी ज्या मुलांना शिकवतो ती ब्रेल मधले मास्टर आहेत. मी त्यांना कम्प्यूटर ब्रेल कोड शिकवतो..आम्ही अंध व्यक्तींना उपयुक्त ब्रेल साॕफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारी कोड्स तिथल्या मुलांना शिकवतो. ही मुले पुढे ब्रेल प्रोग्रामर होतील ’

माझ्यासाठी हे नवीनच होतं..मी उत्सुकतेने त्याला विचारतो.. ‘अरे वा म्हणजे दिवसभर तुम्ही तिकडेच शिकवायला असता?’

पुन्हा मला खोडून काढत तो म्हणतो

‘नाही मी दुपारी परत येतो..डेक्कनला आमच्या कंपनीत..तिथे आम्ही काही स्पेशल प्रोजेक्टस वर काम करतो’

मी चिकाटीने पुन्हा त्याला विचारतो ‘म्हणजे ब्रेल प्रोग्रामिंग वगैरे?’

पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवत  तो म्हणातो ‘आम्ही जे करतो त्याला एथिकल हॕकींग म्हणतात..तुम्ही त्याबद्दल ऐकले असेल’

आता थक्क होण्याची वेळ माझ्यावर वर आली असते.

‘माय गाॕड..पण एथिकल हॕकिंग साठी लागणारे सिस्टीम्स..सर्व सुविधा…?’

‘आमच्याकडे आहेत..’  तो पटकन म्हणतो, ‘आता विषय निघालाय म्हणून सांगतो. आपल्या देशात ज्या  सरकारी वेबसाईट्स आहेत त्यांचे सतत हॕकिंग होत राहते..ते काम  देशविरोधी गृप्स करत राहतात. आम्ही अशा हॕकर्स ना कसा प्रतिबंध करता येइल यासाठी नॕशनल इन्फाॕर्मटीक्स सेंटर म्हणजे NIC बरोबर मिळून काम करतो.  आम्ही चार अंध मित्र आहोत..आम्ही या लोकांना लोकेट करतो..आम्ही हे काम NIC बरोबर मिळून करतो कारण NIC या सर्व सरकारी वेबसाईट्स होस्ट करते व त्यांच्या सुरक्षेची काळजी घेते. या सर्व अज्ञात शक्तींना प्रातिबंध करण्यासाठी आम्हाला आम्हा अंध लोकांमधे जन्मजात असलेले Intuition कामाला येते..’ तो हसत म्हणतो.

तो तरुण जे सांगत असतो त्याने मी अवाकच होतो. हा तरुणसवदा मुलगा जे एवढ्या सहजताने सांगत आहे ते करणे सोपे नसते. मी स्वतः माझी छोटीशी आय टी कंपनी चालवत असल्याने हे सारे किती अवघड आहे हे मला ठाउक असते. तरीही न राहवून मी त्याला शेवटचं विचारतो,

‘फक्त या कामावर तुम्ही व तुमची कंपनी चालते..?’

‘नाही सर..!’ तो उत्तरतो ‘ आम्ही ब्रेल कम्प्युटींग व एथिकल हॕकींग साठी काही अल्गोरिधम वर ही बरंच काम करतोय की जेणे करुन हे काम आमच्या इतर अंध बांधवापर्यंत आम्हाला पोचवता येइल.आमचं काम प्रत्यक्ष NIC चे हेड आॕफीस हँडल करतं..काम खूप सिक्रेटीव्ह असल्याने यापेक्षा जास्त सांगता येत नाही.’

तो हसतो व म्हणतो ‘बाय द वे तुमचा स्टाॕप आलाय..’

मी पाहतो तर खरोखरच माझा स्टाॕप आलेला असतो.

‘अरेच्चा..’ मी विचारतो..’ तुम्हाला कसे कळाले माझा स्टाॕप आलाय?’

‘सर तुम्ही तिकीट घेतला तेंव्हा मी तुमचा स्टाॕप ऐकला..माझ्या डोक्यातही एक प्रोग्राम देवाने आपलोड केलाय..Travelled Distance Analysis चा..पण  त्याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन..गुड डे सर!’

तो मला हसत म्हणतो.

बसमधूनन उतरतो व स्तंभित होउन ती नाहीशी होइपर्यंत मी फक्त पहात राहतो. खरे सांगू? आपल्या आंधळ्या दुनियेत आज मला एक डोळस माणूस भेटलेला असतो.. त्याच्या प्रखर प्रकाशात मी अक्षरशः दिपून जातो.

 

© श्री सुनील गोबुरे

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काला….. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

? मनमंजुषा ?

☆ काला…..☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘काला ‘ म्हणलं की डोळ्यांपुढं काय उभं राहतं ? लहान बाळाने पाटीवर किंवा वहीवर उभ्या आडव्या किंवा गोल गोल रेघोट्या ओढून केलेला  गीजबीट काला की लहानपणी खाल्लेला आमटी भाकरीचा काला ? बऱ्याच जणांना हाच काला आठवला असणार! कारण या काल्याची चव जिभेवर तशीच रेंगाळत असणार! काला —भाकरी कुस्करून भिजेल इतपतच दूध किंवा आमटी घालून बनवलेला एकजीव लगदा ! जो पातळही नसतो आणि अगदी तोटरे लागेपर्यंत घट्टही.

लहानपणी मधल्या सुट्टीत जेवणाचे डबे फक्त ज्यांची घरे लांब आहेत किंवा शेतातल्या वस्तीवरून येणाऱ्या मुलं मुलीच आणत. ज्यांची घरे जवळ आहेत ते घरीच येऊन जेवत. कमी वेळेत पोटभर जेवण खायचा चविष्ट, साधा सोपा मार्ग म्हणजे भाकरीचा काला करणे. शक्यतो डाळीची किंवा कडधान्याचीच आमटी असायची. भाजी हा प्रकार फक्त कधीतरी हिरवी पालेभाजीच, इतरवेळी आमटीच. सकाळी भात ही त्याकाळी करत नसत. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून ठेवून शेतावर कामासाठी किंवा मजुरीसाठी जायला लागायचे त्यामुळं मधल्या सुट्टीपर्यंत बुट्टीतली भाकरी थोडीशी वाळून गेलेली असायची अगदी मऊसूत नसायची म्हणून त्यावर शोधलेला नामी उपाय म्हणजे काला ! भाकरी कुस्करून (चुरून शब्द खूप मिळमिळीत)एका ताटलीत घ्यायची मग त्यात पळी दोन पळी आमटी घालायची आणि पूर्ण चुरा कालवला म्हणजे भाकरीच्या अणू -रेणूत आमटी एकरूप व्हायची मग ते छोटे छोटे घासाचे गोळे करून खायचे,अहाहा ! किती चविष्ट लागायचा तो काला ! आणि पोट भरल्याचे समाधानही ! (मटणाचा रस्सा अन शिळ्या भाकरीचा काला तर अवर्णनीयच!)

शेतावर जाताना फडक्यात बांधलेली भाकरी कालवणात भिजून जायची; तो भिजलेला काला भुकेल्या पोटी खाताना अमृताहून रुचकर लागायचा. पूर्वी डबे वगैरे असला काही प्रकार नसायचा. सरळ फडक्यात खाली दोन भाकरी, वर दोन भाकरी आणि मधल्या भाकरीवर कालवण. ही मधली भाकरी कालवणातल्या थोड्याश्या ओलसर पणाने भिजून जायची आणि तिचा मऊ काला व्हायचा. भुकेल्या पोटी हा काला खाताना होणारा क्षुधापूर्तीचा आनंद अवर्णनीयच !

म्हाताऱ्या माणसाना दात नसल्याने काल्याशिवाय पर्याय नसतो. कोणताही पदार्थ पातळ केला की पचायला सोपा होतो हेच तर शास्त्र नसेल ना काला करण्यामागचे?

खरे तर श्री कृष्णाने काल्याची सुरुवात केली असावी असे मला वाटते.

यमुनेच्या तीरी

जमवून गोपाळाना

करुनी गोपाळकाला

सुखावतो सवंगड्यांना

रानात गाई चरावयला नेल्यानंतर दुपारच्या वेळी गुरे सावलीत विश्रांती घेत आणि कृष्ण आपल्या सवंगड्यांना जमवून शिदोरी सोडत असे आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खात. गोपाळ काला तेव्हापासूनच समाजमान्य आणि समाजप्रिय झाला; कारण हा काला सामाजिक समतेचे प्रतीक होते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीचे हे बालगोपाल एकत्र जेवताना कुणालाच अवघडलेपण येऊ नये, सर्वजण एकत्र असताना कुणी स्वतःचे वेगळेपण जपू नये ,त्याचबरोबर अन्न हे जिभेसाठी नसून पोटासाठी, क्षुधा शमवण्यासाठी असते हाच संदेश कृष्णाने गोपाळ काला करून दिला. दही भाताचा काला कृष्णाला जसा प्रिय तसाच अनेक देवदेवतांना प्रिय आहे. भात, दही, साखर वरून तुपाची धार सोडलेला दही भाताचा काला शंकराला प्रिय आहे.खरे तर जे अन्न पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे तेच देवाला प्रिय आहे आणि तेच आपण देवाला नैवेद्यात वापरतो.

ताजा थंड झालेला मऊ भात ,त्यात मावेल इतपतच दही(फार पिचपीचीत न करता)चवीपुरती साखर घालून एकजीव काल वलेला दहिभाताचा अमृततुल्य काला लहान मुलांसाठी पौष्टिक आहे .क्षुधा शांत होते,जठराग्नी शमतो आणि बल देणारा हा काला देवालाही न आवडला तर नवलच.

“दही भाताचा घ्या काला आमचा कूळस्वामी(ज्याचा जो कुलस्वामी असेल त्याचं नाव घयायचे) पारधीला गेला.”

पौष पौर्णिमेला  दही-भात ,गाजराचे तुकडे ,कांदा पात, हिरवा ओला हरभरा एकत्र मिसळून  काला करायचा,त्याचे शंकू सारखे मूद करून देवाला नैवेद्य दाखवून संध्याकाळी ताटात मूद ठेवून शेजारी पाजारी एक एक मूद वाटायची आणि त्यांनी ताटात त्याबदल्यात शिळी चतकोर-अर्धी भाकरी ठेवायची.माघारी आल्यावर ती शिळी भाकरी आपण खायची. शिळीच भाकरी का द्यायची?मला कारण समजले नाही पण अन्न शिळ की ताज असो त्याचा अव्हेर/अपमान करायचा नाही, असा संदेश असेल. त्या जमलेल्या भाकरी घरी येऊन खायच्या.आता कुणी मूद वाटत नाही.याच पौर्णिमेला मूदीची पुनीव म्हणतात.

नुकतेच जेवण घेऊ लागलेल्या बाळाला दही-भात, वरण भात, दूधभात किंवा दुधभाकरी, वरण भाकरी चा काला भरवतात. नुकतेच दात येऊ लागलेले असतात त्यामुळं त्याला घास चावणे व पचणे सोपे जावे व पोटही भरावे म्हणून बाळाला काला भरवतात.वृद्ध व्यक्तीही दात नसतात म्हणून काला खाणेच पसंद करतात. शेतकरी लोक गडबडीत जेवण उरकण्यासाठी आमटी भाकरीचा काला खाणेच पसंद करतात.

पारायणाची सांगता काल्याच्या किर्तनाने होते. काला सामाजिक समतेचे प्रतीकच आहे जणू. भिन्न आर्थिक स्तरातील समाज एकसंघ राहण्यासाठी स्वतःचे वेगळेपण बाजूला ठेवून, ‘स्व’ विसरून एकमेकांत मिसळणे गरजेचे असते कारण एकत्र रहाताना वेगळेपण जपायचे नसते त्याला ‘अहं’ची बाधा होते.म्हणूनच कृष्णाने गोपाळ काल्याची संकल्पना सुरू केली ..अवघा रंग एक झाला..’पंढरपुरात हरी कीर्तनात,हरी भजनात तल्लीन होताना भेद आपोआप गळून सगळेच रंग एक होऊन हरीमय होतात.भेदाभेदाला तिथं मुळीच स्थान नसते किंबहुना भेदाभेद पाळणारा हरीमय होऊ शकत नाही.लहान मोठा ,गरीब श्रीमंत ,उच नीच सगळेच चंद्रभागेच्या वाळवंटात एक होतात.

आज सामाजिक परस्थिती खूपच  बदलली आहे.काला खाणे कालबाह्य झालेय आणि एकाच घरातल्या माणसांचे वेगवेगळे रंग एकरंग होणे अवघड झालेय कारण हेच, आम्हाला एकमेकांत कालवून घ्यायचे नाही!   निकोप ,सुदृढ शरीरासाठी आणि समाजासाठी पुन्हा काल्याचे स्मरण होण्याची खरेच गरज आहे,तुम्हाला काय वाटते ?

तुम्हीही खाल्लाय का कधी काला?एकदा जरूर खा अन ब्रह्मानंदी टाळी लागू द्याच!!

 

© सौ.सुचित्रा पवार

10/3/21

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वादळ – (तौक्ते) च्या निमित्ताने ☆ सुश्री मंजिरी दातार

? मनमंजुषेतून ?

☆ वादळ – (तौक्ते) च्या निमित्ताने ☆ सुश्री मंजिरी दातार☆ 

मी लग्न होऊन ओरीसात गेले, ओरीसा म्हणजे बरंचसं आपल्या कोकणासारखं वाटलं….सुंदर निसर्ग….आणि आमच्या गावात तर समुद्र. कॉलनीच्या मागे ‘महानदी’ होती. मी इतकी हरखून गेले होते, कॉलनी पाहून…एकूणच तो नविन प्रदेश पाहून….पण आता जितके फायदे तितकेच तोटे पण असणारच.

ओरीसा म्हणजे दरवर्षी cyclone ठरलेलं….छोटं, मोठं….पण वर्षातून एकदा दोनदा तरी वॉर्निंग यायचीच….मग cyclone नाही आलं तर मोकळा श्वास सोडायचा….आलं तर परत पुढचं येईस्तोवर राज्य पडत झडत उभं राहायचं.

माझं लग्न झालं त्याआधी १९९९ ला ओरीसानी super cyclone बघितलं होतं…..त्यामुळे प्रचंड दहशत होती लोकांच्या मनात….नंतर २००२ मधे cyclone ची वॉर्निंग आली. माझ्या साठी हा पहिलाच अनुभव होता…..प्रदिप नी, माझ्या मिस्टरांनी मात्र १९९९ चं cyclone बघितलं होतं.

मला प्रदिप नी सांगितलं, तू जरा सामान भरुन ठेवशिल का? कारण cyclone येईल मग पंचाईत होईल…..म्हटलं चालेल. तर म्हणाले….क्षिप्रा भाभी बरोबर जा दुकानात…तर म्हटलं का…मी जाईन….तर म्हणाले नको तिला बरोबर ने….म्हटलं ठिक.

क्षिप्रा अगदी माझ्या बाजुच्या फ्लॅट मधे रहायची,बंगाली होती….मी आल्यापासून सगळ्यात खूप मदत केली तिने….( ती बंगाली असल्यामुळे आम्ही हिंदीत बोलायचो….पण आता मी सगळं मराठीत लिहितेय) प्रदिप गेल्यावर मी तिला विचारलं की जाऊया का….तर म्हणाली हो चालेल, तासाभरानी जाऊया…..पण एक काम कर, दोन्ही वेळचा स्वैपाक आटपून घे मग जाऊया. मग आम्ही दोघी गेलो दुकानात….मी दुकानदाराला म्हटलं, ही लिस्ट….भाभी म्हणाली मला दाखव लिस्ट….त्यात तांदुळ, डाळ, आटा, तेल असं काय काय होतं….तिनी माझ्या कडे बघितलं म्हणाली ही लिस्ट परत पर्स मधे टाक….मला कळेना असं का म्हणतेय ती.

मग दुकानदाराला तिनी माझ्यासाठी सामान सांगितलं, १५ अंडी, २ ब्रेड चे मोठे पुडे, १०/१२ चिप्सची पाकीटं, २/४ हल्दीराम सारखे काही चिवडा, मिक्चर वगैरे, जॅम, ८/१० बिस्किटाचे पुडे….आणि तो डिप डिप वाला चहा….पहिल्यांदा घेतला मी आयुष्यात….आणि ४ लिटर दुध. मी तिला म्हटलं माझा दुधवाला येवून गेलाय, तर म्हणाली पुढचे २/४ दिवस कदाचित नाही येणार.

मग तिनी पण असंच सामान तिच्यासाठी घेतलं….आणि आम्ही निघालो, परत येतांना मी तिला म्हटलं हे सगळं मला महिनाभर पुरेल….तर म्हणाली ते तेव्हा,जेव्हा तुम्ही बाकी काही जेवता तेव्हा….एकदा वारं सुरु झालं ना की गॅस पेटणार नाहीये….हे जे घेतलंय हेच लंच, डिनर, ब्रेकफास्ट असणार आहे. आता घरी जाऊन, दुध तापवून,  अंडी उकडून फ्रिज मधे ठेव….आपल्याला जी electric शेगडी दिली आहे ना घरात ती अश्या वेळी वापरायची….अर्थात जोपर्यंत वीज आहे तोपर्यत…..आम्ही तिथे रोजचं पाणी उकळून प्यायचो…..तेव्हा तिनी पाणी पण ८/१० लिटर उकळून ठेवायला सांगितलं….कारण वीज गेली, की नंतर पाणी पण जाणार.

ती मला म्हणाली स्वैपाक झालाय ना आजचा….आता घरी जाऊन तुला ही सगळी तयारी करायची आहे…..वापरायचं पाणी भरुन ठेव.

मला खूप टेंशन आलं होतं…मी म्हटलं इतकं काही होईल? तर म्हणाली नाही झालं तर बेस्ट पण तयारी हवी…..आम्ही बिल्डिंग शी आलो तर बरेच लोक तळमजल्यावरच्या फ्लॅट्स मधे दिसत होते….मी म्हटलं हे काय झालंय….तर म्हणाली चल दाखवते….मग खाली एक मैत्रिण रहायची तिच्या घरात गेलो…..तर टिव्ही बांधून ठेवला होता….दोरीनी….आत मधे फ्रिज साठी एक तात्पुरता लाकडाचा उंच पाट करुन त्यावर चढवला होता…..त्याला बांधण्याचं काम सुरु होतं…..कंपनीची लोकं येवून हे करुन देत होते…..कारण वारं सुटलं…वादळ आलं की ‘महानदी’ कॉलनीत येणार….आणि जे हवं ते बरोबर घेवून जाणार….म्हणून शक्य तितकी काळजी घेणं सुरु होतं.

आम्ही दोघी दुसऱ्या मजल्यावर रहायचो….पाण्याची भिती आम्हाला नव्हती….आम्हाला वाऱ्याची भिती होती.

मग क्षिप्रा नी सांगितलं…..आता खाण्यापिण्याचं झालं की घर जे सजवलं आहेस ते काढून बॅग भरुन ठेवून द्यायची…..कपडे सगळे आवरुन ठेव….जितकं कमी सामान बाहेर राहील तितकं चांगलं…..त्याप्रमाणे मी सगळं घर आवरलं.

संध्याकाळ पर्यंत वातावरण कुंद झालं होतं….वारं पण फार नव्हतं…..पण नेहमीपेक्षा जास्त होतं. रात्री प्रदिप ला सगळं सांगितलं सकाळी काय झालं….तो म्हणाला म्हणूनच म्हटलं होतं की भाभी बरोबर जा.

दुसरा दिवस उजाडला, ते एकदम विचित्र वातावरण घेऊनच….वारं पूर्ण पडलं होतं, पाऊस अगदी बारीक होता…..मला वाटलं झालं वाटतं सगळं शांत….प्रदिप तयारी करत होता ऑफिसची….मी म्हटलं सगळं शांत झालं ना….तर फक्त हम्म म्हणाला….पण निघतांना म्हणाला, be brave…काही वाटलं तर क्षिप्रा भाभीला फोन कर….अर्थात फोन सुरु असले तर (हे पण जोडलं त्यानी पुढे) मला फोन केलास तर चालेल पण मी येवू शकेन की नाही सांगता येत नाही, भाभी च मदत करेल.

प्रदिप गेल्यावर भाभी आलीच बघायला,सगळं नीट आहे ना….मी म्हटलं ये चहा पिऊ तर म्हणाली मी घर बघू का तुझं सगळं….म्हटलं बघ की.

तिला मी म्हटलं शांत झालंय ना सगळं….गेलं का वादळ? तर म्हणाली तू वादळापुर्वीची शांतता असा शब्द ऐकला आहेस? हे ते आहे….संध्याकाळी वारं सुरु होईल.

मग मी चहा करेस्तोवर तिनी घर बघितलं….एक दोन वस्तू तिला हव्या तश्या हलवल्या. मग मला तिनी बेडरुम मधे बोलावलं….आमच्या बेडरुम मधे भितींत एका खाली एक असे मोठे कोनाडे केलेले होते…..उघडेच होते, दारं नव्हती त्याला….ते इतके मोठे होते की सगळ्यात खालच्या खणात मी सुटकेस ठेवायची….ती तिथेच उघडायची सुध्दा….तेव्हा तिथे सगळी पेपर ची रद्दी होती माझी ठेवलेली…..भाभी म्हणाली ती काढून घे आणि वर ठेव….म्हटलं ओके….पुढे म्हणाली वारं वाढलं दार, खिडक्या तुटायला लागल्या तर या खणात येवून लपून बसायचं….ही जागा सगळ्यात सेफ आहे. माझ्या अंगावर सरसरुन काटा आला.

संध्याकाळी खरंच सोसाट्याचं वारं सुरु झालं, खिडकी दारं वाजायला लागले…..पाऊस सुरु झाला….निसर्गाचं रौद्र रुप त्या रात्री अनुभवलं….प्रदिप ऑफिस मधेच होता….भाभी शी मी फोनवरच बोलत होते….मग लाईट गेलीच….महानदी आलीच कॉलनीत…..मग खालच्या मजल्यावरचे लोकं वरती आमच्याकडे आले……तेवढंच दुःखात सुख की मी आता घरात एकटी नव्हते…१/२ दोघी मैत्रिणी होत्या. कारण बहूतेक सगळे पुरुष प्लांट मधेच होते…..पूर्ण रात्र जागून काढली….प्रयत्न करुनही झोप लागणं शक्यच नव्हतं…..१९९९ च्या वादळानंतर जास्त पक्की दारं, खिडक्या बसवल्या होत्या त्यामुळे दारं तुटली नाहीत….खिडक्यांच्या काचा मात्र फुटल्या….त्यातून प्रचंड पाऊस आत येत होता….पण आमचा हॉल सेफ होता….सगळ्या खोल्यांची दारं बंद करुन आम्ही रात्र हॉल मधे काढली……मध्यरात्री landfall झाला…..आणि दुसरा दिवस उजाडला…..पुढे अजून एक दोन दिवस वारं, पाऊस होताच. नंतर झालेली हानी बघवत नव्हती….तळमजल्यावर सुध्दा लोकांच्या घरात गेलेलं पाणी काढणं, सामान आवरणं कठिण झालं होतं.

निसर्गापुढे आपण किती थिटे पडतो याचा अनुभव त्यावर्षी घेतला. मग पुढच्या ३ वर्षात असे बरेच छोटे मोठे cyclone ओरीसात अनुभवले पण हा पहिला अनुभव मात्र काळजावर कोरल्या गेलाय.

© सुश्री मंजिरी दातार

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवनागरी ☆ श्री मयुरेश गद्रे

? मनमंजुषेतून ?

☆ देवनागरी ☆ श्री मयुरेश गद्रे ☆ 

आजच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये सुभाष अवचटांचा “देऊळ” म्हणून लेख आलाय. गावातल्या जुन्या दगडी, हेमाडपंथी देवळाची गोष्ट. त्या वास्तूशी जवळीक सांगणाऱ्या कोवळ्या वयातल्या आठवणी. आणि मग अचानक गावकीनं निर्णय घेऊन देवळाला केलेली ऑइल पेंटची रंगरंगोटी. सुंदर देवळाचं असं विद्रूप होणं त्यांच्यातल्या कलाकाराला किती अस्वस्थ करून गेलं असा तो एकंदर लेखाचा नूर….!

हे वाचता वाचता, सहज मी ते वर्तमानाशी जोडत गेलो.

गेलं साधारण वर्षभर मी व्हॉट्सअप वापरतोय. खाजगी कमी. बहुतांशी दुकानाच्या ऑर्डर्ससाठी. वेगवेगळ्या प्रांतातील सर्वभाषिक मंडळी आमची ग्राहक आहेत. त्यामुळं हिंदी, मराठी, इंग्रजी सर्वच भाषांतून विचारणा सुरू असतात. इतर भाषिकांचं सोडून देऊ. पण माझं सर्वसाधारण निरीक्षण असं की मराठी भाषकांना आपल्याच देवनागरी लिपीचं भयंकर वावडं आहे.

यातले हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता सगळे जण सर्रास रोमन स्क्रिप्ट मध्ये मराठी टाईप करतात.

काय प्रॉब्लेम आहे हा? कुणालाच त्यात काही गैर वाटत नाही. मी त्यातल्या अनेकांना न राहावून हा प्रश्न विचारतो की बाबांनो, का करता असं? तर सार्वत्रिक उत्तर म्हणजे ” मराठी टाईप करायचं म्हणजे कसलं कंटाळवाणं काम ! त्यापेक्षा हे सोप्पं आहे “

खरंच इतकं कठीण आहे का देवनागरी लिहिणं? इतकं वेळखाऊ का वाटतं आपल्याला आपल्याच लिपीत लिहिणं? की देवनागरी हा फक्त कॅलिग्राफी (सुलेखन) करण्यापुरता वापरून सोडून द्यायचा विषय आहे?

कितीतरी लोक आमच्या दुकानात आता गणपतीस्तोत्र, मारुतीस्तोत्र, रामरक्षा इंग्रजीत आहे का असं विचारतात. म्हणजे आता

भीमरूपी महारुद्रा

हे

Bheemroopee Mahaarudraa असं छापायचं का?

उद्या कुणी म्हणेल म्हणून

लाभले आम्हांस भाग्य

बोलतो मराठी

हे

Laabhale amhans bhagya

Bolato marathi

असं छापायचं?

आणि मग छत्रपतींच्या घोषणा

Har Har Mahadev

अश्या लिहायच्या?

त्यासुद्धा “आम्ही मराठी” असं छातीठोकपणे सांगणाऱ्या  माणसांसाठी??

 

ज्या लिपीत केवळ २६ वर्ण – त्यातही ५ स्वर आणि २१ व्यंजनं – आहेत ती रोमन समृद्ध?

की ज्यात अ ते ज्ञ असे तब्बल ४८ वर्ण – त्यात अ आ इ ई….असे १२ स्वर आणि क ते ज्ञ अशी ३६ व्यंजनं आहेत ती देवनागरी लिपी?

कृपया लक्षात घ्या मी भाषेबद्दल बोलत नाहीये, लिपीबद्दल बोलतोय. इंग्रजी भाषेच्या समृद्धीबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. पण रोमन  लिपी ( स्क्रिप्ट) मराठी भाषेसाठी का वापरावी किंबहुना का वापरू नये याबद्दल हे पोटतिडकीने केलेलं लिखाण आहे.

आज कालनिर्णय दिनदर्शिकेच्या तमीळ, तेलगू, हिंदी इत्यादि भाषेतल्या आवृत्त्या बघा. आकडे हा दिनदर्शिकेचा प्राण आहे. पण या सगळ्या छपाईमध्ये समान गोष्ट म्हणजे त्यांचे आकडे इंग्रजी भाषेत म्हणजेच रोमन लिपीत आहेत. आपणही असेच बेछूट वागत राहिलो तर साळगावकरांवर मराठी दिनदर्शिकेत इंग्रजी आकडे छापण्याची वेळ येईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

भाषा हा आत्मा असला तरी लिपीचं शरीर घेऊनच तो वावरतो.

लिपी म्हणजे काय तर चिन्हांचा खेळ. त्यातून विचार आणि भावना व्यक्त केल्या जातात. म्हणून मग आपण आता सर्रास इमोजी वापरतो. शब्द लिहायचा कंटाळा आणि व्यक्त व्हायला सोप्पं माध्यम !  म्हणजे  एका अर्थी पुन्हा आपण आदिमानवाच्या सांकेतिक भाषेकडे चाललो आहोत. ( माझ्या कोणत्याही लिखाणात मी कधीही इमोजी वापरत नाही.)

आज जगभर हेच मंथन चालू आहे. अनेकांचं म्हणणं हेच की भावना कळल्या की झालं ! पण भाषा म्हणून जसं सौंदर्य आहे तसं लिपी म्हणून आहेच की ! ते नाकारून कसं चालेल? आपलं नुसतं नाव लावून भागतं का….. आपल्या नावापुढे वडिलांचं नाव, आडनाव हे सगळं लावावसं वाटतं ना? परंपरा आणि वारसाच  तर सांगतो त्यातून. भाषा आणि लिपी यांचं नातंही असंच परंपरेचं आणि वारशाचं नातं आहे.

आज एकट्या अच्युत पालवांच्या सुलेखनाच्या जोरावर आपण देवनागरी नाही वाचवू शकत. ( जर्मनीत जगातल्या सर्व लिपींचे नमुने असलेलं संग्रहालय आहे. तिथलं देवनागरी लिपीतलं लिखाण पालव सरांच्या हातातून सजलंय…). भाषा आणि लिपी हा समूहाचा हुंकार आहे.

जागतिकीकरणाच्या फायद्यांबरोबर येणारे जे छुपे आणि भयंकर उत्पात घडवणारे तोटे आहेत त्यातला महत्त्वाचा एक म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अंगातलं संपुष्टात येणारं वैविध्य…! भाषा, लिपी, आहार, शेती, पोशाख या सगळ्यात येणारा एकजिनसीपणा आणि त्यातून समूळ नष्ट होत चाललेलं “देशी वाण” हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. जागतिकीकरणाला विरोध नाही पण त्यापुढे लोटांगण घालताना स्वत्व हरवणं भयावह आहे.

एकच सांगतो, आजही मी माझे बँकेचे चेक लिहिताना स्वच्छ मराठी भाषा आणि देवनागरी लिपीचाच वापर करतो. अगदी आमच्या रोटरी इंटरनॅशनलचे चेकसुद्धा..( आणि ते पासही होतात)!

अवचटांच्या आजच्या लेखातलं हेमाडपंथी मंदिर आणि त्याला फासलेला ऑइलपेंट हे चित्रं मला का अस्वस्थ करून गेलं हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच.

माझं हे लिपीपुराण वाचून रोमन स्क्रिप्टमध्ये मराठी टायपिंग करणाऱ्या एका तरी बहाद्दराचे किंवा वाघिणीचे मतपरिवर्तन झाले तरी,

याचसाठी केला होता अट्टाहास……!

 

श्री मयूरेश गद्रे

गद्रे बंधू, डोंबिवली

(१६ मे २०२१)

संग्राहक – श्री आनंद  मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाजारहाट ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ बाजारहाट ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

खरेदी पूर्वीची ते आँन लाईन

आठवडी बाजार आणि जत्रा या  प्रत्येक गावाच्या वैशिष्ट्यपुर्ण गो़ष्टी. शनिवार म्हणले की  आम्हाला आठवतो आमच्या गावचा म्हणजे सांगलीचा आठवडी बाजार. मारुती रोड पासून हरभट रोड ते कापड पेठ, गणपती पेठे पर्यत पसरलेला. आजच्या आँनलाईन खरेदी आणि लाँकडाऊन च्या प्रार्श्वभूमीवर याबाबतच्या आठवणी

तसं पहायला गेलं ते प्रत्येक व्यक्तीची खरेदीची सुरवात अगदी लहानपणापासून सुरु झालेली असते. पूर्वी आपल्या घरी नातेवाईक / ओळखीचे/ शेजारचे कुणीही कधीही अगदी अचानक येऊ शकत. फोनवर विचारून येणे, आधी Appointment घेणे मग येणे वेगैरे मँनर्स सांभाळण्याचा तो काळ नव्हताच मुळी. आणि घरी आलेल्याला चला सगळे मिळून हाँटेलात जाऊ आम्ही पण अजून या हाँटेलात गेलो नाही असे म्हणायचे ही ते दिवस नसायचे. अश्यावेळी आलेल्या पाहुण्यांसाठी चक्क घरात पोहे/ उपमा/ शिरा / चहा / सरबत असं काहीस बनवले जायचे.

कधीकधी अचानक आलेल्या स्नेंहीमुळे आईची गडबड व्हायची, चहा घेणार का?  असे विचारताच चक्क ‘हो’  म्हणायचा तो काळ असायचा आणि थांबा आधण ठेवते असे म्हणायला आणि चहा पुड संपलीय हे लक्षात यायला एकच गाठ पडायची.

अशावेळी जा ग / जा रे कोप-यावरच्या दुकानातून चहा पुड/ आले/ बिस्किटं घेऊन ये अशी आँर्डर दिली जायची. पैसे नंतर देते असं सांग काकांना आणि काका चक्क तयार व्हायचे.  घेतलेल्या सामाना बरोबर हातावर श्रीखंडाची गोळी ठेवायला विसरायचे नाहीत

साधारण लहानपणी पहिल्यांदा अशा प्रकारचा बाजारहाट केलेला सगळ्यांनाच आठवत असेल.

वाड्यात मित्र-मैत्रिणींबरोबर खेळ ऐन रंगात आला असताना आईचे बोलवणे आणि काहीतरी आणायला सांगणे हे जीवावर आल्यासारखे वाटायचे. मलाच का आई दरवेळेला बोलवते, माझ्या बहिणीला / भावाला पण कधी बोलवत नाही याचे दु:ख ही वाटायचे मात्र अभ्यास करत असताना असे बाहेर जाणे मात्र आवडायचं

जसं जसं मोठे होत गेलो तसे खरेदीचा आवाका वाढला आणि मग आम्हाला  आठवडा बाजारासाठी कामाला लावण्यात आले. आठवडा  बाजारासाठी यादी करणे, घरातल्यां  बरोबर  खरेदीला जाणे, दुकान (यादी) वाटून घेणे, खरेदी झाल्यावर मारुती मंदिरात समोरील रसवंती गृहात बसून लिटरच्या मापात उसाचा रस पिणे, ऐनवेळच्या यादी व्यतिरिक्त जास्ती खरेदीची मजा घेणे, बाजारहाट करताना बरोबरचीचे मित्र – मैत्रिणी भेटणॆ, त्यांचे पालक भेटणे,  मग आपल्या पालकांची ओळख करुन देणे, मग चर्चा अभ्यासावर येणे यात नेमके समोर शाळेतल्या बाई येऊन सामील होणे मग हळूच आई मी तिकडे ते घेऊन तिथे थांबतोय/ थांबतीय  ग म्हणून सटकणे, दरावरुन घासाघासी करणे, दर पटला नाही म्हणून पुढे जाणे (आणि परत पहिल्या वाल्याकडूनच त्याच दरात वस्तू घेणे), बाजूच्या मंदीरातील देवाला रस्त्यावरुनच चप्पल काढून हात जोडणे, सगळी ओझी सांभाळत चालत घरी येणे,  माल खराब निघाला तर दुस-यादिवशी बदलून घेणे त्यासाठी भांडण करणे , येताना आणि चार नवीन गोष्टी आणणे

हु:श दमलो / दमले  म्हणत परत घरात आईला मदत करणे

मस्त बाजारहाट असायचा तो. त्याची मजा माँल मधील अलिप्त वाटणा-या खरेदीला नाही, आँनलाईन खरेदीला तर नाहीच नाही. आँन लाईन खरेदी मधून “हाती आले ते पवित्र झाले ” या न्यायाने जी काही वस्तू आली ती स्विकारायची. काही कारणाने बदलायची झाल्यास ” भिक नको पण कुत्र आवर ” अशी परिस्थितीत.  त्या सगळ्या प्रोसीजर पेक्षा परत बाजारात जाऊन प्रत्यक्ष परत नवीन वस्तू आणलेली एकवेळ परवडेल. पण अर्थात श्रम / त्रास यातून थोडी मुक्तता मिळते हे नक्की

पण पारंपारिक बाजारहाट ची मजा काही वेगळीच होती हे नक्की आणि आपल्या पिढीने मस्त एन्जाॅय केला बाजारहाट, बरोबर ना?

(बाजार उठवणारा) अमोल ?

©  श्री अमोल अनंत केळकर

२२/०५/२१

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक दुपार ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

?मनमंजुषेतून ?

☆ एक दुपार ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

ढेबेवाडी! एक टुमदार लहानसं खेडं! त्या गावातील बस स्टॅण्ड जवळच एक लहानसं तळं होतं. पाऊस चांगला झाला तर ते थोडं तलावासारखं दिसे. एरवी वर्षभर  ते  डबकं असे. या तळ्याच्या काठावर मोठे मोठे खडक होते. जवळच एक वडाचं झाड होतं. पंचायतीच्या मदतीने झाडाभोवती एक पार बांधला होता.झाडाची सावली खडकांच्या काही भागांवर पडत असे.झाडाच्या चारी बाजूंनी पारंब्या लोंबत होत्या. सकाळी गावातल्या बायका धुणीभांडी करायला येत. संध्याकाळी पुरुष लोकांची बैठक असे पारावर.गावातल्या मुलांसाठी हे एक प्रकारचं जिमच होतं म्हणा ना!

आज ऊन्हाचा तडाखा काही वेगळाच होता. उन मी म्हणत होतं. झाडाचं एकही पान हलत नव्हतं. एस. टी स्टँड च्या पायऱ्यांवर बसलेला लंगडा भिकारी कुणीतरी दिलेला पावाचा कोरडाच तुकडा खात होता. खाऊन झाल्यावर त्यानं हात अंगातल्या घामानं भिजलेल्या कळकट्ट शर्टच्या बाहीला पुसला. त्याच हातानं त्यानं कपाळावरुन खाली ओघळलेला घामही पुसला. पावाचे कण त्याच्या घामानं चिकचिकलेल्या गालाला चिकटले.आता त्याला तहान लागली . शेजारी पायरीला टेकवून ऊभी केलेली काठी त्यानं उजव्या हातानं पकडली. लंगडत लंगडत काठी ओढत तो समोरच्या कोपऱ्यातल्या नळावर गेला.अशक्त , कृश, ऊजवा पाय वर करुन , काठी आधारासाठी काखेत धरून त्यानं तोटी फिरवली. किं. . ‌ . किं. . किं. . करत नळ उघडला.आपली हाताची ओंजळ तोल सावरत तोटीला लावली. ओणवा होऊन त्यानं तोंड ओंजळीपर्यंत नेलं. पाण्याचे काही थेंब त्याच्या हातावर सांडले. नळ भकास तोटी करून त्याच्या ओंजळीकडं कोरडाच बघत होता.आपलं तोंड ओंजळीला लावून ते थेंब तीर्था सारखे त्यानं चाटले. वडावरचे दोन कावळे कर्कश काकसूर लावत उडाले.धाडधाड आवाज करत दोनची एस. टी. स्टॅंडवर आली. त्या लाल डब्याच्या खिडकीच्या काचा खणखाण आवाज करत ओरडल्या. कंडक्टर धाडकन दार उघडून उतरला. त्यानं शिट्टी कर्कश्शवाणी वाजवून एस. टी. मागं घेतली. पुण्याच्या थांब्यावर आणून थांबवली. एस. टी च्या लाला पिवळ्या पत्र्यावर हातानं थाड थाड वाजवून ड्रायव्हरला ब्रेक लावायचा इशारा दिला.एस. टीनं मागच्या धुराड्यातून काळा गरम धूर सोडला. भस्स भस्स आवाज करत , श्वास टाकत तिचा वरखाली होणारा ऊर हळूहळू शांत झाला. ड्रायव्हरनं त्याच्या सीटवरून खाली ऊडी मारली.त्याच्या बाजूचं अर्धं दार खाडकन उघडून थाडकन बंद केलं. खिडकीची आधीच खिळखिळी झालेली , तुटलेली काच आपलं अस्तित्व दाखवत आवाज करत खुडमुडली.

आपले नाकावर नसलेले मास्क कानाच्या खुंटीवरून काढून दोघं चहाच्या टपरीकडं वळले.

एवढा वेळ बाकड्यावर वाट बघत बसलेले सरपंच, उपसरपंच, कोरोनाची पुण्यातली ताजी खबर ऐकायला पोट आणि पोटावरून घसरणारी पॅंट सावरत टपरी कडं पळाले. लगोलग चार-पाच जणांचं टोळकं तयार झालं. कोरोनच्या बातम्या रंजकतेनं सांगितल्या जाऊ लागल्या. स्टार माझा किंवा आजतक पेक्षा जास्त रंजक, भडक, अतिरंजित आणि धडकी भरवणाऱ्या होत्या.

गण्या, परशा आणि वासू थोडा वेळ ऐकत थांबले.

नंतर ते तळ्याकडं गेले. पाण्यात पाय सोडून ते खडकावर बसले.

त्यांच्या गावात अजूनही कोरोनाचं पाऊल पडलं नव्हतं. पण सायन्सच्या मोघे सरांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात होत्या. या महामारीचं गांभीर्य त्यांना समजलं होतं. ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू, ऑक्सिजन गळती, हॉस्पिटलमध्ये सातत्यानं होरपळणारे पेशंटस्. बातम्या ऐकून आज त्यांचा सूर पारंब्या चा खेळ थांबला होता. पाण्यात भाकरी ऊठत नव्हत्या. लहान लहान पावलं स्थिर होती. पाण्यात हलवून लाटांचा आवाज सुध्दा करत नव्हती.

वासूचा चेहरा खूपच गंभीर झाला होता.

तो म्हणाला, “काहीतरी करायला पाहिजे गड्या.”

परशा, जा बर, आपल्या सगळ्या दोस्तांना बोलव इकडं”

परशानं ओळखलं, वासूच्या डोक्यात काही तरी शिजतय. तो पळालाच. पळता पळता तो हाका मारत होता. “ए गंम्प्या, ए, मन्या या रे तळ्यावर.”

“अरे एक राजा चल की. वाश्या बोलवतोय बघ.”

थोड्याच वेळात वडाखाली वानरसेना जमली. सावल्या लांब होईपर्यंत चर्चा सुरू होती. टोळक नंतर मोघे सरांच्या घराकड गेलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठची गाडी गावच्या वेशीवर च आडवली गेली. वासू, गण्या, परशा बरोबर त्यांचे बरेच शाळासोबती रस्ता अडवून ऊभे होते. ड्रायव्हरला गाडी थांबवावीच लागली. कंडक्टर खाली उतरला. वासू त्याच्याशी काही बोलला. गाडी तून एक एक पॅसेंजर खाली उतरु लागले. गण्या थर्मल गन घेऊन ऊभा होता. परशा  प्रवाशांनी मास्क नीट घातलाय ना हे बघू लागला.

वासू प्रत्येकाच्या बोटाला oxymeter लावून बघत होता. राजा तेवढ्यात भाषण ठोकून कोरोनाच्या सोवळ्याचे नियम सांगू लागला.काही मुलांनी गावात, स्टॅंडवर, जिथं जमेल तिथं कोरोनात घेण्याच्या काळजी घे, नियमांचे फलक लावले.आख्ख्या ढेबेवाडीचा नूरच बदलला.सरपंचांनी चावडीवर मुलांना सहकार्य करण्याचं फर्मान  सोडलं.आजही उन्हाळा तोच होता. रखरख तशीच होती. स्टॅंडवर एस. टी तशीच खडखडाट करत येत होती. पण एक सूज्ञ विचारांचा वारा गावात गारवा पसरवत होता. तळ्यातलं पाणी लहान लहान लाटांतून हसत होतं.

वडाखाली गाय शांत झोपली होती. वडाच्या झाडाची हिरवी सळसळ वाऱ्याबरोबर आनंद तरंग पसरवत होती.

 

सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जेव्हा संगीत येतं तुमच्या दारात ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

? जेव्हा संगीत येतं तुमच्या दारात ? श्री सुहास सोहोनी ?

(एक सांगीतिक कोडं! खाली दिलेल्या लेखात भारतीय संगीतामधील 37 रागांच्या नांवांची गुंफण केलेली आहे. लेख नीट लक्ष देऊन वाचा आणि ते राग  ओळखून दाखवा!!)

पूर्वी शिमगा, दसरा या सणांच्या दिवशी कोंकणात घरोघरी गोमू, बाल्ये, बहुरूपी, वासुदेव – हे लोक गाणी म्हणत यायचे. आताच्या काळात त्यांचं प्रमाण कमी कमी होत चाललेलंय्. त्यात जसे कोंकणातले स्थानिक लोक असायचे, तसे परराज्यातले लोक सुद्धा असायचे. मारवाडी, गुजरीतोड्ये, गौड प्रांतीय, तिरंगी, या समाजातले हे फिरस्ते लोक असायचे. हे सारे विविध भाषांतली लोकगीत म्हणायचे. तेव्हा प्रत्येक शब्दाचा अर्थ कुठे समजत होता? पण चाल ठेका धरायला लावायची. कोंकण, गोवा या प्रांतातल्या लोकांच्या रक्तातच संगीत भिनलेलं आहे! राजस्थानी फिरस्ते तर जौंधपुरी नाचही करून दाखवत असत. डोक्यावर भला मोठा, भुसा भरलेला पांढरा पक्षी घेऊन हंसाचा ध्वनी काढून दाखवणं, ही त्या पहाडी कलाकारांची खासियत होती. त्यांना तोडीस तोड म्हणून कुडाळ देसकार हिंडोल पक्ष्यांचा आवाज काढून मजा आणायचे. त्यातले काही दशावतारी नट देखील होते. ते नाटकांतली गाणी सुद्धा गायचे. ही नाट्यकला व तिचा मालवणी अविष्कार या गोष्टी परंपरेतून आलेल्या असत.  फाल्गुन सरल्यावर वसंताचं आगमन झालं की निसर्गात रंगीबेरंगी फुलांचं बहारदार प्रदर्शन भरायचं. अशा वेळी अंगावर पट्टे ओढलेले, काहीसे सुधारलेले, स्वतःला शंकराचे भक्त – भैरव वंशीय समजणारे, जंगलातले भिल्ल फुलांच्या माळा गळ्यात घालून यायचे आणि अडाण्यासारखे काही-बाही गायचे. काही वेळा बंगाली बैरागी जादूगार यायचे. ते स्वतःला दरबारी जादूगार मानायचे. कालीसह दुर्गामातेची पूजा करून ते जादूचे अघोरी प्रयोग करीत असत. एका कलिंगडाचे नुसत्या हातांनी क्षणार्धांत दोन तुकडे करून त्याच्या पोटातून बर्फाच्या गारा, मुलतानी मातीचे खडे, अशा वस्तू काढून जनांवर संमोहिनी घालीत असत. भीती वाटायची ते प्रयोग बघतांना. शहाणा माणूस पण वेडा व्हायचा. आणि हे सर्व चालू असतांना हातात डमरू आणि तोंडातून सतत ऱ्हाम्-ऱ्हीम्-ऱ्हुम् असं चालूच असे! कानडा प्रांतीय कलाकार प्राणी-पक्षी घेऊन यायचे. डमरूच्या ठेक्यावर बोकड, कुत्र्याचं पिल्लू, माकड, यांचे खेळ बघतांना हसून हसून पुरेवाट व्हायची! बोकडाचा नाच, माकडाच्या उड्या मस्तच! किती वेळ पाहिलं तरी समाधानच होत नसे. मग तो माकडवाला त्याच्या कानडी हिंदीत “अब बस हो गया जी! अब काफी हो गया जी” असं म्हणत पैसे गोळा करायला लागायचा. नंद म्हणजे उत्तर भारतीय गवळी समाजाचे लोक. हे गाई किंवा नंदीबैल घेऊन यायचे. ते श्रीकृष्णाची गाणी म्हणायचे. “लल्ला, बेडा कर दे पार, खोल दे बंद सरग के दार”. सोबत गोवंशीय वस्तू, म्हणजे गाईचं तूप, लोणी, घुंगुर, शिंगाना लावायचे गोंडे, अशा वस्तू (माल) सुद्धा ते विकायला घेऊन यायचे. काही वेळा पंजाबी सरदारजी खांद्याला हार्मोनियम लटकवून यायचे आणि नानकगुरूंची बिलावली भक्तीगीतं गायचे. कधी कधी नाथपंथीय अंगाला राख फासून यायचे व गोरखनाथांची कल्याणकारी हिंदी गाणी ऐकवायचे. अशी खूप खूप गाणी घरच्या घरी ऐकायला मिळाली त्या काळी!!

              ?????

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ क्षमा….. ☆ मा.भारती ठाकूर

? मनमंजुषेतून ?

☆ क्षमा….. ☆ मा.भारती ठाकूर ☆

(नर्मदालयच्या मा. भारती ठाकूर यांनी लिहिलेली अप्रतिम कथा.)

नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या. रस्त्याने जाणारा-येणारा थोडावेळ थबकून त्यांच्या कडे न बघता गेला असं कधी होत नव्हतं. श्रावण महिना होता. माझ्या दारा समोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर –(गर्द गुलाबी) रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली होती. साधारण दहा बारा फुट उंचीचे झाले होते ते झाड. रोज किमान 56-60 हून अधिक फुले झाडावर असायची. फार लाडकी जास्वंद होती ती माझी. तिने शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरवात केली, समजलंच नाही. तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडून त्याचा खूप कचरा व्हायचा. कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची. ती मग दिवस भर घरात देखील फिरायची. कोमेजल्यावर फुले चिकट होत. त्यावर चुकून पाय पडलाच तर पाय सटकून माणूस खाली पडायची पण शक्यता असायची.

शेजारचे सोनार काका मला रोज सांगत, “अगं भारती, आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या फांद्या कापून टाक बरं. मला त्रास होतो त्याचा.” मला त्यांचा त्रागा समजत असे. पण त्या फांद्यांवरच्या असंख्य कळ्या पाहिल्या की मी त्यांना प्रॉमिस करायची, “ काका, एवढ्या कळ्यांची फुले होऊन जाऊ देत ना. काही दिवसांनी असाही त्याचा बहर कमी होईल. मग कापतेच मी त्याच्या फांद्या. चालेल ना ?”

“ठीक आहे. पण लवकर काप. मी पडलो पाय घसरून तर ?” इति काका.

“हो, हो, लवकरच कापीन मी फांद्या. प्रॉमिस काका !” माझे ठरलेलं उत्तर .

एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परतले तर काका बाहेरच उभे. “त्या फांद्या आत्ताच्या आत्ता काप . फार दिवसापासून ऐकतोय तुझं. आज कापते- उद्या कापते. आज आत्ता माझ्या समोर काप फांद्या.” एरवी अत्यंत प्रेमळ असे सोनार काका त्यादिवशी इतके का संतापले होते मलाही समजलं नाही. माझाही राग जरा अनावर झाला. घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त  त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या  जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या. दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं . कंपाऊंड वॉलच्या पलीकडून सुद्धा ते आता काकांना दिसणार नव्हतं.

ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की  माणूस किती विकृतपणे वागतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं.

पश्चाताप तर लगेचच झाला. पण आता पश्चाताप करून काही उपयोग पण नव्हता. त्या फांद्या पुन्हा थोडीच जोडता येणार होत्या ? त्या रात्री जेवलेही नाही आणि झोपलेही नाही.

पावसाचे दिवस होते. झाड पुन्हा भराभर वाढलं. आश्चर्य म्हणजे एकही फांदी  सोनार काकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही. पुन्हा दहा -बारा फुट झाड वाढलं. पाने हिरवीकंच आणि टवटवीत. पण फूल मात्र एकही नाही. त्याच्या आसपासच्या झाडांवर असंख्य फुले पण याला मात्र एकही नाही. खतं-औषधे सर्व काही प्रयोग झाले. सहा महिने उलटले आणि माझी अस्वस्थता वाढली. काय करू मी ? सोनार काकांना पण ही घटना सांगितली. त्यांनाही खूप वाईट वाटलं.

एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती दीदी यांचा फोन आला. त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली होती. झाडा झुडपांची आणि बागेची सरस्वती दिदीना खूप आवड होती. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर -अगदी समुद्राच्या रेतीत सुंदर असे Beach Garden त्यांनी बनवलेले मी पाहिले होते. झाडांवरचे त्यांचे प्रेमही मला ठाऊक होते . त्यांचा फोन येताच मी जास्वंदीच्या झाडाची कथा अगदी अथपासून त्यांना सांगितली. ‘दीदी, त्या झाडाला आता कुठलं खत घालू म्हणजे त्याला पुन्हा छान फुले येतील?” मी अक्षरश: रडवेली झाले होते.

“There is no need for any fertilizer. Did you say sorry to that plant Bharati ? And say it honestly till it responds to you.” 

“काय? झाडाला सॉरी म्हणू ?” खरं तर डॉ जगदीश चंद्र बोस यांनी लावलेले वनस्पतींच्या बाबतीतले सर्व शोध माहीत होते. वनस्पतींना भावना असतात, ते प्रतिक्रिया व्यक्त करतात वगैरे. Secret of plants सारखी अनेक पुस्तकेही वाचली होती. पण प्रत्यक्षात आपल्याला स्वत:ला असा काही अनुभव येईल असा कधी विचारही मनात आला नव्हता. सरस्वती दिदी पुढे म्हणाल्या की अगदी रोज ठराविक वेळेला क्षमा मागायची. झाडाला कुरवाळायचं, इतरही गप्पा मारायच्या.

झाडाची क्षमा मागण्याचा माझा दैनिक कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी थोडं कृत्रिम वाटलं पण जसजसे दिवस वाढत गेले, एक व्याकुळता माझ्या बोलण्यात – स्पर्शात आपोआपच यायला लागली.

जास्वंदीशी बोलणं, तिला कुरवाळणं मलाही आवडायला लागलं.  तिला फुले कधी येतील या उत्सुकतेपेक्षा आमच्या  दोघींमध्ये एक वेगळं नातं तयार झालं ते मला अधिक महत्त्वाचं वाटलं.. दहा-बारा दिवस होऊन गेले.  एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागे एक कळी लपून बसलेली दिसली.  जणू म्हणत होती, “शोध मला. बघ मी आलेय”.  आनंद गगनात मावेना म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं.  पण थोडा वेळच.  शेवटी मन शंकेखोर.  हा निव्वळ योगायोग  तर नाही ?  पण चार दिवसातच जास्वंदी कळ्यांनी  पानोपान बहरली. फुलेही उमलू लागली.  मग मात्र खात्री पटली की जास्वंदीने मला खरोखर क्षमा केली  आहे.

पहिला फोन सरस्वती दीदींना  केला.  माझ्या या आनंदात त्यांच्या इतकं दुसरं कोण सामील होऊ शकलं असतं?

त्या दिवशी जास्वंदीशी हितगुज करताना मी म्हणाले,  “आता जन्मात कधी मी असे वागणार नाही.  पण तू सुद्धा माझ्याशी पुन्हा कधी कट्टी घ्यायची नाही बरं का !”

 

©  भारती ठाकूर

नर्मदालय, लेपा  पुनर्वास (बैरागढ) जिल्हा खरगोन मध्य प्रदेश.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज काळ इतका बदलला आहे की, समर्थांच्या काळानुरूप त्यांना अपेक्षित असणाऱ्या सत्वगुणांच्या कसोट्या आता तंतोतंत वापरता येणं शक्य नाही,  असंच म्हणावं लागेल.  समाजमनाची धारणा, माणसाची जीवन-पध्दती, जीवनमूल्ये, आयुष्याकडे बघण्याची आणि विचारांची दिशा — सगळंच खूप बदललं आहे. त्यामुळे समर्थांच्या काळानुरूप तेव्हा अपेक्षित असणाऱ्या  सत्वगुणांनुसार  प्रत्यक्ष आचरण करता येणे आता खरोखरच अवघड आहे असं  नाईलाजाने म्हणावे लागेल. पण तरीही “भक्ती निकट अंतरंगे”असा जो सत्वगुणाचा एक सर्वोत्तम निकष समर्थांनी सांगितला आहे, तो मात्र त्रिकालाबाधित असा आहे— काळ कितीही बदलला तरीही आचरणात आणण्यासारखा आहे. कारण ”अंतरंगाशी निकट असणारी भक्ती”ही परमेशाप्रती असावी, असा याचा शब्दशः अर्थ असला, तरी आजचा काळ लक्षात घेता,  याचा अभिप्रेत अर्थ मात्र आता नक्कीच अधिक व्यापक असायला हवा. पण म्हणजे कसा? तर तो असा असायला हवा असे मला वाटते. —-सत्वगुण अंगी बाळगण्याचा मुख्य हेतू मनात कमालीची भक्तिभावना निर्माण करणे — म्हणजे त्यासाठी ध्यास घेणे –मग तो स्वतःतच वसणाऱ्या परमेशाची ओळख पटवून देणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा ध्यास असू शकतो—- उत्तम विचारांचा- उत्तम आचारांचा ध्यास — उत्तम ते शिकण्याचा ध्यास — इतरांशी वागतांना,  त्यांच्या जातीधर्मानुसार, त्यांच्या कामानुसार, त्यांच्या शारीरिक,  बौद्धिक किंवा आर्थिक क्षमतेनुसार भेदभाव न करता, सगळ्यांशी सारख्याच सौहार्दाने, प्रेमाने, आपलेपणाने वागण्याचा ध्यास — इतरांना निरपेक्ष वृत्तीने जमेल तितकी मदत करत रहाण्याचा ध्यास … इथे मी नुकतंच वाचलेलं एक छान वाक्य मला आठवतंय, जे आजच्या व्यावहारिक जगाशी नातं सांगणारं, त्याच भाषेतलं असलं, तरी समर्थांच्या उपदेशाच्याच थेट जवळ जाणारं आहे —–”वाणी,  वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे— आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल.” वाहवा. —-. आज वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर,  माणसाला  क्षणोक्षणी अस्थिरतेच्या, अनिश्चिततेच्या स्वैर झोक्यावर, हतबल होऊन बसायला भाग पाडणाऱ्या अनिर्बंध परिस्थितीत, कितीही विपरीत परिस्थिती ओढवली तरी श्रध्येय देवतेवरचा आणि मुख्यतः स्वतःवरचा विश्वास ढळू न देता, मन शांत व स्थिरच कसे राहील यासाठी आवर्जून आणि अभ्यासपूर्ण प्रयत्न करण्याचाही ध्यासच घेणे गरजेचे झालेले आहे.

“देव आहे‘– आणि माझ्यातही नक्कीच ईश्वरी अंश आहे” अशी जाणीव मनापासून व्हावी, असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. पण प्रत्येकजण हे सत्य जाणवण्याइतका सजग नसतो. मग तसे सतत सजग रहाण्याचा ध्यास घेणे, हाही महत्वाचा सत्वगुणच — ज्याला काळाचे बंधन नाही. मग, “माझ्यात जसा ईश्वरी अंश आहे, तसाच तो इतर प्रत्येक सजीवातही नक्कीच असणार“ हे मान्य करता येणे अवघड मुळीच नाही आणि तसे एकदा खात्रीपूर्वक मान्य केले,  की मग समर्थांना अपेक्षित असणारा सत्वगुण उच्च कोटीवर पोहोचायला कितीसा वेळ लागणार?

“देवा– सोडव रे बाबा आता लवकर” असं हताशपणे म्हणतांना आपण अनेकांना ऐकतो. पण “सोडव” म्हणजे “मरण दे”हा एकच अर्थ त्यात अभिप्रेत असतो का? तर अजिबातच नाही. “सोडव”म्हणजे ‘आयुष्यातल्या कटकटींपासून, समस्यांपासून, मनाचा गुंतवळ करून टाकणाऱ्या परिस्थितीपासून तू सोडव‘ अशी खरंतर ती भीक मागितलेली असते. पण देवाकडे अशी भीक मागण्याची माणसाला गरजच नाही, असेच समर्थांचे ठाम म्हणणे असावे, असे दासबोध वाचतांना प्रकर्षाने जाणवते. कारण आत्मरक्षणासाठी सतत सज्ज असलेल्या सशक्त सत्वगुणांना आवर्जून, प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक, आणि मनापासून पाचारण केले, त्यांना मनापासून आपले मानले, तर देव स्वतः वेगवेगळ्या रूपात माणसाला भेटायला येईल– फक्त  ‘तो मला ओळखता यायलाच हवा” असा ध्यास मात्र मनात बाळगला पाहिजे. मग जगण्याचा कुठलाही मार्ग, अगदी नाईलाज म्हणून जरी निवडावा लागला तरीही, त्या मार्गावर परमशक्तीवरच्या विश्वासाच्या, श्रद्धेच्या आणि भक्तीच्या पायघड्या घालून, त्यावर फक्त सत्वगुणांचीच फुले उधळत जाण्याचा निश्चय केला, की मग कुठल्याही मार्गाने गेले तरी अंती तो जगन्नियंता, परमेशाचे आपल्यासाठी श्रध्येय असणारे स्वरूप घेऊन, आपल्या रक्षणासाठी, आणि त्याही पुढे जाऊन, मानवजन्माचे अंतिम उद्दिष्ट साध्य करून देण्यासाठी सज्ज असणारच.

——— सध्याच्या परिस्थितीला अनुरूप असा हाच बोध समर्थांनाही अपेक्षित असावा असे मनापासून म्हणावेसे वाटते.

{ समाप्त }

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares