मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मी येतोय बरं का !.☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “मी येतोय बरं!.. ” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

श्री नंदकुमार पंडित वडेर

“… मगं काय दशावतराची दिवसरात्र रंगीत तालमी जोरात चालू आहेत वाटतं!…. गणपती बाप्पाचा काॅस्च्युम घालूनच चहाला आलात ते!… बाकी या बाप्पाच्या काॅस्च्युम

 मधे तुम्ही तर खरचं बाप्पाच चहा प्यायला टपरीवर आल्यासारखाच वाटतोय!… आपले बाकीचे सहकलाकार कुठे आलेले दिसत नाहीत!… का ते आधीच चहा पिऊन तालमी साठी परत गेलेत?… हो तेही खरचं असणार म्हणा!… तुम्हाला या सोंडेतून चहा प्यायची कसरत करावी लागत असल्याने निश्चितच वेळ नाही का लागणार?… मगं थोडा वेळ तो बाप्पाचा मुखवटा काढून ठेवला असतात तरी चाललं असतं… आज पावसाने तर सकाळपासून दमदार बॅटींग सुरू केलीय!.. मी गणपतीला रत्नागिरीला घरी जाण्यासाठी रेल्वेचं तिकिट काढायला म्हणून स्टेशनवर येतो काय?.. नशिबाने मला हवं असलेल्या तारखेचं कन्फर्म तिकिट लगेच मिळतय काय?… कधी नव्हे ती रेल्वेची कृपा झाली.. होय हो, एक वेळ तुमचीच म्हणजे गणपती बाप्पाची मर्जी, आपलं कृपा सहजगत्या होईल पण रेल्वेचं हवं तेव्हाचं रिझर्वेशन मिळायची कृपा कधीच होत नाही!… ती आज झाली नि आनंद माझ्या पोटात माईना माईना….. असल्या पावसात गरमागरम चहा पिण्याची तलफ आली म्हणून मी इकडे आलो तो. तर तुमचं प्रत्यक्ष बाप्पाच्या रूपात दर्शनच झालं… अगदी देव साक्षात भेटीला आल्यासारखे वाटते… काय योगायोग असतो नाही का!… तुमचं काय म्हणणं यावर?. “

“.. हो! हो. !. वत्सा थोडा धीर धरं. !.. त्या मशिनगनमधून धाड धाड गोळ्यांच्या फैरी झाडव्यात तश्या मुखातून एका पाठोपाठ एक प्रश्नांच्या फैरीवर फैरी सोडल्यास कि माझ्या वर!… मला वाटलं तूच बोलत राहणार आणि मी फक्त ऐकायचं काम करायचं!… पण शेवटी तू दमलास आणि मला बोलायची संधी दिलीस त्याबद्दल तुझे थँक्स.. हं तर वत्सा! मी कोणी कुठल्या दशावतारातील नाटकातील गणपती बाप्पाची भूमिका करणारा कलावंत नसून मी खराच गणपती आपलं तुमचा लाडका देवबाप्पा आहे बरं!.. आणि मी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आधी महिनाभर इथं या स्टेशनवर नुसता संचार करत असतो… कारण याच वेळेपासून तुमचं कोकण रेल्वेचं आरक्षण सुरू होणार असतं… आणि मुंबईतला चाकरमानी कोकणातला माणूस इकडचं जग तिकडं उलथल़ं तरी गणपतीच्या सणाला गावाकडे जाणार म्हणजे जाणारच… कामावरून मंजूर रजा मिळो वा न मिळो.. रेल्वे बसची तिकिटा मिळो वा न मिळो पण मिळेल त्या वाहनाने गणपतीला घरं गाठणार म्हणजे गाठणारंच!… अशी माझ्यावर निस्सीम भक्ती करणारी मंडळी फक्त कोकणातच बघितली बरं… पण मी संपूर्ण देवाच्या वेषभूषेत न येता तुम्हा मानवांच्या नित्याच्या वेशभूषेत इथं या स्टेशनवर फिरत असतो… ती गणपतीची सगळ्या दिवसाची रेल्वे तिकिटा खिडकी उघडता उघडताच संपून गेलेली असतात… याचं दरवर्षी मला ना कोडं पडतं.. सकल विद्येचा मी दाता हा स्थायीगुण माझाच असला तरी या तिकिट रिझर्व्हेशनच्या बाबतीत माझी मतीच गुंग होते… देव असून मला तिथे कुठलाच चमत्कार वगैरे दाखवता येत नाही याचं मात्र दुख होतं.. ती रात्रभर लाईनीत उभी राहीलेली माझ्या भक्त मंडळींचा भ्रमनिरास मला पाहवत नाही.. आणि तो तिकडच्या दूरच्या कोपऱ्यातला पांढरा पायजमा कुरता वाला आपल्या डोक्यावरची गोल टोपी सारखी फिरवत… रत्नागिरी अडीच हजार, कुडाळ चार हजार सावंतवाडी पाच हजार.. भावाचे मुलमंत्र घोकत असतो… माझ्या प्रमाणे तो ही दरवर्षी न चुकता या ठिकाणी या वेळेलाच मला दिसतो… रेल्वे नाही तर नाही बस तर नक्कीच कोकणी माणूस प्रयत्न करणार आणि गणपतीला जाताना आकाशाला भिडलेली कितीही भाडेवाढ झालेली असली तरी त्याच्या भक्तीच्या विशाल हृदयात श्रद्धेची फुलंच फुलं उमलेली असतात तिला कुठल्याही काट्यांनी कमीपणा येत नाही.. दलाल लोकांना अडलेल्या गरजूला नाडून घेतल्याशिवाय त्यांना लक्ष्मी प्रसन्न होत नाही त्यांच्या ही दिवसागणिक चढतीभाजणीचा खेळ सुरू असतोच… रस्ते तर खड्याने अडवलेले असतात.. जागोजागी टोलनाके दरडोखोरांसारखे भाविकांच्या वाहनावर अव्वाच्या सव्वा टोलधाड घालत असतात… कोकणातील माणूस अनेक आपत्तींना तोंड देत देत आपलं जेव्हा गावं गाठतो तेव्हा अत्युच्च आनंद होतो… चतुर्थी पासून ते अनंतापर्यंत दहा दिवस सकाळ संध्याकाळ आरती महाआरती, पूजाअर्चा, गौराईचं आगमनाची तयारी.. रोज रात्री भजन, भारूड, डब्बल बारी… दशावताराचा एखाद्या भाग… गावातल्या हौशी तरुणांनी बसवलेले नाटक… एक ना अनेक करमणुकीचे आनंदवर्धक भरघोस कार्यक्रम.. मी मखरात बसून बघत असतो. शेवटी कर्ता करवीता तो मीच असल्याने जे जसं होईल ते तसंच मला अर्पण करत असतात.. मग मला कुठे बरी असावी ती आवड निवड.. पण खेड्यातल्या या भक्ती ला स्पर्धाचे ग्रहण लागले.. भक्ती तोलणारा तराजू वगर्णीच्या रककमेवरच तोलला जाऊ लागलाय… सावंतांच्या गल्लीचा राजा तर काळसेकरांच्या गललीतला महाराजा.. एकमेंकावर कुरघोडी करू लागलाय… पवित्र आणि निर्मळ मनाने केलेली पूजेला पावणारा बुद्दीदेवाचे.. आता आपल्याच बुद्धीचे दिवाळे वाजवून नवसाला पावणारा महागणपती म्हणून गावोगावी जाहिरात बाजीचं धंदेवाईक मार्केटिंग करू लागलेत… चुकून माकून बोला फुलाला गाठ पडावी तसा एखाद्याचं किरकोळ मागणं सत्यात उतरलं गेलं कि… गणपती पेक्षा गुरवाचाच गोरक्ष धंदा जोमात चालतो… आणी मी मात्र डोळे कान, मन सगळं सगळं उघडे ठेवून निर्विकारपणे एकही शब्द न बोलता बघत बसतो… दहावा दिवस कधी उजाडेल नि मी परत माझ्या गावाला कधी परत जातोय याचीच वाट पहात असतो… ते दहा दिवस अक्षरश झिट आणून सोडतात.. कोकणात आलेला चाकरमानी अकराव्या दिवशी मिळेल ती गाडी पकडून मुंबईला कामधंद्यावर हजर होतो… ती त्याला मिळालेली त्या दहा दिवसातली उर्जा पुढच्या वर्षीच्या माझ्या आगमनापर्यंत पुरते… आणि गणपती बाप्पा मोरय्या पुढच्या वर्षी लवकर या… या आरोळीच्या नादाच्या गुंजनात स्वताला हरवून बसतो… आता अलिकडे मला देखील दर वर्षी या दहा दिवसाच्या आगमनाची ओढ लागून राहिलेली असते… या दिवसातच मी प्रत्येकाला त्याच्या नकळत चांगलाच ओळखत असतो… आता मनी नसतो भाव श्रद्धाळूचा बडा दिखाव… सणांचं पारंपरिक माहात्म्य लोपलंय तिथं सणाचं इव्हेंटमध्ये सोनंच सोनं चमकतयं… समाजप्रबोधनाचे विचारांचे व्यासपीठ छचोर, सवंग तद्दन कलाविष्काराचं पीठ दळतयं… देशाभिमान, समाजाभिभान, धर्माभिमान, भाषाभिमान, आणि आणि स्वाभिमान या पोकळ अर्थहीन शब्दांचे बुडबुडे झाले… आणि राजकीय स्वार्थासाठी त्यांचेच वाद निर्माण करून लोकमानसाची दिशाभूल करून अराजकता निर्माण करून अस्थिरता आणलीय… पूर्वी पॅकेट सिस्टीम होती आता सगळीकडे पॅकेजचाच बोलबाला आहे.. मधुबालाचं निखळ सोज्वळ सौंदर्य तिच्याबरोबरच अस्तंगत झालयं आणि बारबालाचं भडक मादक बेगडी सौंदर्य उदयाला आलयं.. भजन, कीर्तनातले गाता गळ्याचे बुवा जाऊन त्या ठिकाणी शिंदळकी करणारी बुवाबाजी आलीय… संत मंहत, थोरा मोठ्यांच्या विधायक कार्याने घडलेल्या इतिहासाच्या वारसा असलेला हा देश आता त्यांच्याच नावावर आणि प्रतिमांच्या चौकटी ठिक ठिकाणी भिंतीवर लावून आपलचं चोरांचचं राज्य करु लागलाय.. विद्यावंताला बटीक आणि खुशमस्करेनां मलिदेचा खाटीक केला गेलाय… हा सगळा हैदोस मी जसा पाहतो तसा माझे असंख्य भक्त ही पाहतात अनुभवत आहेत… आणि दरवर्षी माझ्या आगमनाच्या वेळी हे गणराया या हैदोसाला आता तुझ्या शिवाय पायबंद कोण घालेल बरं.. असं साकडं घालतात.. तूच कर्ता आणि करविता आहेस असं म्हणतात… पण वत्सा माझं असं म्हणणं आहे की हे तर सगळंच तुमचकचं कतृत्व आहे… यात मी कशी ढवळाढवळ करणार… मी फक्त सामर्थ्य देऊ शकतो.. लढाई तर तुम्हालाच लढावी लागणार आहे… बुद्धीच वरदान तर मी तुम्हांला कधीच दिलयं पण ते वापरायचं असतं की नसतं हे तुम्हीच ठरवायचं रे… नाहीतर शोभेच्या डोक्यावर पगडी, टोपी, नि फेटा बांधताहातच कि तुम्ही आता तर माझ्याही डोक्यावर तुम्ही मुकूट असताना फेटा बांधयला कमी करत नाही… मला तर वाटतं हे फेट्याचंच जग आहे आणि सगळं विधायक विचारांना फेटाळून लावत विघातक विचारांची नि कृत्यांची फक्त फेटे उडवाउडवी चालेली दिसतेय… खऱ्याला कुणी ओळखत नाही कारण खरं ओळखायची निर्भेळ, निरक्षीरविवेक दृष्टी कुठे आहे… खोट्याची झगमती दुनियेपुढे डोळे तर दिपून जातातच पण मती देखिल गुंग होऊन जाते… कालाय तस्मै नम: म्हणून सोडून द्यायचं!… आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे गणपती बाप्पा मोर्या म्हणत राहायचं… माझा चहा पिऊन झालाय तेव्हा मी आता इथंनं निघावं म्हणतो… बघं तुला माझं काही पटलं असेल तर यावेळी आचरणात आणता येतयं काय ते! आग्रह नाही माझा पण लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देश्याने हा उत्सव सुरू केला होता त्याला थोडासा न्याय दिल्यासारखे होईल… ! “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिक्षा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “प्रतिक्षा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

ये रे  ये रे कधीची तुझी वाट बघत बसलोय आम्ही तिघेही…

मी, ह्या टपटप गळणाऱ्या पावसाच्या सरी आणि

तो तुझा गरमागरम चहाचा कप…

आम्ही सारेच निशब्द, स्तब्ध आणि बरचं काहीसं हरवून गेल्यासारखं बसून राहिलोय या गवाक्षाजवळ…

एकच एक तुझी कमी भासतेय आम्हाला… मैफिल खोळंबून राहिलीय..

ती टपटप गळणारी सरीवर सरी मला सांगतेय कि  मन  प्रसन्न करणारं वातावरण आहे…

हाती तुझ्या वाफळता चहाचा मग आहे… तरीही तू का उदास आहे…

अरे वेड्या जरा माझ्या कडे पहा मलाही असतात बरं तुझ्यासारख्या भावभावना..

पण त्याच मी जर उराशी कवटाळून बसले तर मला जगता येईल का..

म्हणून मी असे काळ्या ढगातून ओघळत असते आणि आणि माझ्या भावभावनां ओघळू देते..

टाकलेले  उसासे माझे विरघळतात तुमच्या चेहऱ्यावरील आनंदात जे तुम्ही मला जेव्हा पाहतात तेव्हा मला माझ्या आयुष्याचा अर्थ गवसतो..

आणि तू मी इथं तुझ्या अवतीभवती वावरत असताना नि हातातील मगातले गरमागरम चहाचे चुटके घेऊन मनाला तजेला करण्या ऐवजी…

तो कोण अद्यापही आला नाही याच्या चिंतेत बसतोस… आणि या आनंदाला मुकतोस..

बघ तो चहाचा मग सुद्धा कसा आता त्या गरमागरम चहाने रागावून गाल फुगवून  तुझ्या कडे पाहात बसलाय..

काय अरसिक माणूस असेल हा.. इतक्या सुंदर वातावरणात आणि एखाद्याची कवि प्रतिभा कशी खुलून आली असती आणि झरझर मोत्यांच्या ओळीत कविता सरसर कागदावर उतरली असती…

पण नाही  ना हा अरसिक मनाचा त्याला सौंदर्याचा, निर्सगाचा आस्वाद कसा घेतात तेच ठाऊक नाही… आणि उगाच तो कोण कुठला त्याच्या प्रतिक्षेत आपल्या बरोबर आम्हालाही ताटकळ ठेवलयं…

ती टपटप ओघळणारी पावसाची सर आणि तो गरमागरम वाफळता चहाने भरलेला मग त्याला अखेरचं निक्षेपानं सांगू लागले…

आम्हांलाही मर्यादा असतात हे ठाऊक आहे ना तुला.. मग आमच्या सोबतीची ठेवना जर कदर… का ओढून घेतोस मनावर  विषण्णेतेची चादर…

अरे आता नाही तरी नंतर पुढे काही वेळेत आमच्यातला जोश ते हवेहवेसे चैतन्य लोप पावत जाईल..

मग थंड पडलेल्या कलेवरासारखे तूच काय कुणीच आमच्याकडे ढुंकूनही बघणार नाही..

मग तूच म्हणशील या पावसानं काय उच्छाद मांडलाय नि त्यात तो मगातला चहा तर गारठोण झालाय..

दिवसाची सुरुवात तरी या मुड ऑफ करणाऱ्या गोष्टीने तरी व्हायला नको होती…

पण पण तो देखील का बरं नेमका आज उशीर करून राहिलाय…

त्याला पक्कं ठाऊक असतं अश्या रम्य वातावरणात मी त्याची नेहमीच आवर्जून वाट पाहत असतो..

आणि तो सोबत असतो तेव्हा तेव्हा आमच्या या मैफिलीला खुमार चढत असतो..

तो बोलत जातो एकामागोमाग एक बोरकर, पाडगावकर,शांताबाईंच्या  आणि बऱ्याच कविंच्या  कविता मागून कविता..

बाहेर  टपटप ओघळणाऱ्या सरीच्या तालावर धुंदफुंद झालेल्या वातावरणात हातातले गरमागरम वाफाळ लेले चहाचे घुटके घेत असताना सारं सारं काही चैतन्यानं फुलंत उमलत जातं…

मी माझा राहातच नाही…

आणि यासाठीच मी त्याची चातकासारखी वाट बघत असतो…

जरी सोबतीला ती टपटप ओघळणारी पावसाची सरीवर सर आणि वाफळता चहाचा मग  माझा आणि त्याचा असले तरी…

त्याच्याशिवाय मैफिल रंगतच नाही…

मन उदास होऊन बसतं त्याला जसजसा उशीर होतोय माझ्याकडं येण्यासाठी…

आणि आक्रंदन करणारं मन त्याला बोलवंत राहतं…

ये रे कधीची तुझी वाट बघत बसलोय आम्ही…

मी, ह्या टपटप गळणाऱ्या पावसाच्या सरी आणि 

तो तुझा गरमागरम चहाचा कप…

आता अधिक उशीर लावू नकोस बरं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दार उघड बया दार उघड… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “दार उघड बया दार उघड…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

ट़ोक टोक… टोक.. कुणी आहे का आत? या बंद खिडकीतून ऐकू कसं जाईल म्हणा! … पण कुणी तरी या दिवाणखान्यात येऊन जाईलच कि! .. सगळीच मंडळी का स्वयंपाक घरात कायमची बसून राहणार आहेत… बसली असतील म्हणा या असल्या राक्षसी पावसाच्या दिवसात.. गरमागरम कांदा भजी नि सोबत तो वाफाळता चहाचे दमा दमाने घुटके घेत… गारठली असावीत तना ने नि मनाने… उबदार पांघरूणात गुरफटून मुस्कट मारून पडून राहावंसं वाटतं असेल त्यांना… पण मला काय करायच्या त्यांच्या या कविकल्पनां ना घेऊन…. माझा कुठे प्रश्न सुटलाय अजून… आहे का त्यांना कशाचं व्यवधान.. जरा दारावरची बेल वाजू दे अशी कर्कश आवाजात की मग जातील धावत पळत आता कोण तडमडलंय या असल्या धुंवाधार पावसात? म्हणत दार उघडतील… आणि हवी असलेली व्यक्ती असेल तर हास्याचा गडगडाट करून आनंदाची कारंजी फुटून त्या अभ्यागताचं स्वागत करतील.. अरे आधी आत तर ये.. पावसाने किती भिजलास बघ बरं आधी बाथरूम जाऊन कपडे बदलून घे… आणि मगं गरमागरम चहा घे… आणि सोबत कांदा भजी पण आहे बरं… आज तुझं नशिब चांगलच फळफळलयं बघ.. आम्ही सगळेच घरात तुला या वेळी भेटतोय शिवाय सोबत चहा नि भजी… त्या पाहुण्यानं काढलं ते नशीब.. आं आणि मगापास्नं या खिडकीच्या काचेवर टोक टोक करून बोलवतोय आहे का कुणाचं लक्ष माझ्याकडे.. सगळे एकजात बहिरे कशाने झाले एव्हढे… का कानात एअरफोनचा बोळा कोंबून हरिहरनची गज़ल मधे गुंग झालेत…. अरे कुणी तरी या रे या दिवाणखान्याच्या खिडकी जवळ… या मुसळधार पावसात मी ही चिंब चिंब भिजलोय… बराच लांबन उडत उडत आलोय रे.. आणि जरा अजून थोडसंच लांब घरटं राहिलय़ माझी मैत्रिण चिमणीचं… पावसात उडत उडत इथवर आलो खरा पण आता त्याच पावसाच्या ओल्यानं पंख पाठीला नि पोटाला इतके चिकटून बसले मला उडताच येईना… शिवाय पावसात भिजून गेलो त्याने अंगात चांगलीच हुडहुडी भरली आहे… थोडसं अंग शेकून काही वेळ विसावा घेऊन पुढे निघावं असा विचार करून या खिडकीच्या कठड्यावर येऊन टेकलो.. पण पावसाचा मारा काही चुकवता आलाच नाही… अरे असं नका करू रे… अहो ताई माई अक्का…. दादा भाऊ, काका… अरे कुणी तरी यांना या खिडकीच्या जवळ.. आणि हि खिडकी उघडून मला आत घ्या… मला ठाऊक आहे ती कावळ्याची नि चिमणीची चिऊ ताई चिऊ ताई दार उघडं.. जुनी गोष्ट चांगली आठवत असणार तुम्हाला.. तेव्हाचा माझा धूर्त स्वार्थी स्वभावही चांगलाच तुम्ही लक्षात ठेवलेला असणार.. म्हणुन तर तुम्ही बघून न बघितल्यासारखे करून मला टाळायचं पाहताय… काय कलियुग आलयं असं तुम्ही एकमेकांना सांगताय चिमणीचं घर मेणाचं जवळच तर आहे तिकडे जायचं सोडून हा इकडे माणसांच्या फ्लॅट कडे कसा आला… का त्याला तिकडे चिमणीने तिच्या कटू पूर्वानुभवाने त्याला हाकलुन दिलं असणार तेव्हा कुठेच थारा मिळत नाही हे पाहून हा आमच्या घराच्या खिडकीच्या कठड्यावर टेकलायं काय? …. अरे पण तुम्ही असं दुष्टपणानं वागणार नाही याची मला खात्री आहे… अजूनही तुमच्या मनात माणूसकी, भूतदया शिल्लक आहे… तुम्ही मला नक्कीच आत घ्याल… थोडावेळ कोरडं होऊ द्याल… काही बाही चटकमटक खायला ही पुढ्यात टाकाल… अशी माझी आशा आहे… बाकी तुम्ही काहीही म्हणा पण तुम्ही सुध्दा माझ्याही पेक्षा जास्त स्वार्थी, आपमतलबी निघालात हं… कसं काय म्हणतात अहो तुमच्या या वाढलेल्या स्फोटक लोखसंखेला सामावून घेणाऱ्या लक्ष लक्ष संखेने बांधल्या जाणाऱ्या घरासाठी, महामार्ग बांधण्यासाठी आणि काय काय उभा करण्यासाठी वृक्षतोड किती केलीत… अहो सिमेट जंगल उभा केलत ते नैसर्गिक जंगलाची आहुती देऊन… आम्हा पक्षांची घरटी उद्ध्वस्त करून आमचा संसार धुळीला मिळवलात आणि छान छान घर बांधलीत आणि राजाराणी टुकीचा संसार करू लागलात… तुम्हाला ठाऊक आहे का या तुम्ही केलेल्या उध्वस्त पणात आमची गण संख्या रोडावत चालली.. आणि एकवेळ तर अशी येईल कि तुम्ही आमचं चित्रच बघाल… का म्हणून तुम्ही असं आमच्याशी उभा दावा केलात… काय घोडं मारलं होतं आम्ही तुमचं… गरज आम्हाला नाही गरज तुम्हालाच जास्त होती आमची… तुमच्या पितरांना ठेवलेले पिंडांना आम्ही शिवल्या शिवाय मुक्ती कशी मिळणार आहे… हा आमचा मान होता पण तुमच्या कृत्याने आमचा अपमान झाला आहे… या गोष्टी मी तुम्हांला तुमच्याच घरात येऊन बोलणार नव्हतो… पण वेळच तशी आणली तुम्ही आमच्यावर.. मग नाईलाजच झाला… आता कसं प्रायश्चित्त घेणार आहात… बघा राग आलाना तुम्हाला म्हणून तर बंद खिडकीच्या आतूनच मला हुसकावून लावण्यासाठी आलात नां? जातो बाबा बाबा इथून जातो… मला वाटलं नव्हतं आम्हा कावळ्यांपेक्षा तुम्ही डोमकावळेच फार भीतीदायक असाल म्हणून…. ह़ं चला तर मग तुमच्या पाशी सहृदयता, सहानुभूती, भुतदया, दयाळूपणा संपलेलाच दिसतोय… आता आपल्या मैत्रीण चिऊताई शिवाय आहे कोण दुसरं…. शेवटी आपल्याच बिरादारीतलीच माणसं एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात हेच निर्विवाद सत्य आहे… चिऊ ताई चिऊ ताई दार उघड जरा बाई… आलोय तुझ्या कडे मदत मागायला… माझं घरटं वाहून नेलय पाऊसानं… मी निघालोच तुझ्याकडे.. काव काव काव….

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कसा त्यजू मी त्या पदाला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “कसा त्यजू मी त्या पदाला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

दादा त्या येळेला तुमास्नी लै म्हंजी लै राग आलता हुता ना…. म्या सोता बघितला ना त्या येळेला तुमास्नी… हे कसलं लालभडक मिरचीच्या बुक्कीवानी त्वांड झालेलं तुमचं… टकुरात राख घालूनशान हे घरात निसता रागाचा आगडोंब उसळेलेला…

‘तू आदुगर बाहीर गपगुमान बाहीर पडं.. मला तुझं थोबाड बघायचं न्हाई… अन असं, समजू नगंस की आपून न्हाई तर ह्यो दादा घराबाहीर कसा काय पडनार… पायात काय बी घातल्याबिगर अनवाणीच… चालणार.. रस्त्यावरनं… पाय पोळलं म्हंजी.. एखादा चुकार मोळा पायाला टुपला तर… त्ये टोकदार खडं, दगुड तळपायात रूतला तर आली का बैदा ना पुढं जायची ना माघारी फिरायची आबदा… ‘

दादा मला ठावं हायं तुमास्नी माझाच राग आला व्हुता… आन राग आला नसला तरी यायलाच पाहिजे हुता… त्यो तुमालाच कोण बी ह्यो जोडा पायात घालंल त्येला बी तसाच राग येनारच व्हता… अवं काय म्हंजी त्यो पाव इंचाचा इतुकासा खिळा वर आलेल्या आनि त्येंन पायाला कडकडकीत टोचावं.. लाल लाल रगताचा एक टपोरा थेंब बाहीर येईस्तोवर जोड्यात पाय टाकणाऱ्यानं एकदमच अय्यो गं.. मेलो मेलो करत किचाळयाला लागलाच… अन मग पाय काढून जोड्यात कुठं बरं हा लपलाय हे डोळं फाडूनशान शोध घेतला तरी बी बहाद्दर नदरंला हाताला गावना म्हंजी.. लै मस्तीला आलाय म्हनायचा जोडा… असला जोडा असल्यापेक्षा फेकून दिलेला बरा… नाहीतरी लै जुनाच झालेला व्हता आणि खालनं तळवा तर साफ कागदावानी गुळगुळीत झालेल्या असल्यानं मधीच भसकं पडलेली व्हती… तसं तुम्ही या जोड्याला जाम कटाळला बी हुता… आनि एक दिस दिला की फेकून घराच्या बाहीर त्या मातीच्या ढिगावर.. म्या आपलं इवलसं त्वांड करून त्या ढिगाऱ्यावर बेवारसा सारखा पडून राहिलो… दुसरं माझ्याहाती तरी हुतं काय म्हना… आता ततनं कुनी उचलून उकिरड्यावर बी टाकना.. त्येंना तरी काय पडलीया म्हना नसत्या उचापती करायची.. एकच जुना अन त्योबी फाटका पडंना कि तकडं… असं कानाडोळा करून बेवारश्यागत झटकून टाकलं कि समंध्यानी… मगं भुईचा फुफाटा, उनाचा ताव, पावसाची झड अन थंडीची तड बाराहीमहिनं आता काय आपल्या नशिबाला चुकाया न्हाई हे एकदाचं पक्क झालं… आधीच अंगाच्या कातड्याची दैना दैना झालेली आन त्यात या ऋतु चक्राच्या भडिमारानं रयाचं गेली… हळूहळू भुईवरचं हिरव्या गवतानं, शेवाळानं जोड्यावरनं पांघरूण घालायला सुरुवात झाली… पाठीवरनं मायेचा हळूवार.. उबदार हात फिरविल्या सारखा वाटतं हुतं… अन कुठलं तरी एका झाडाचं बी रूतलं नि रुजलं बी जोड्याच्या आत… बघु बघू करता एक दिवस ते पिवळं धमक सोनचाफ्याच्या फुलावानी दोनचार फुलं ततं फुलून आली… थोडा सुंगध दरवळला जिकडे तिकडं.. माझा कायापालटच केला त्या फुलानं… जसा शिरपेचात मानाचा तुरा खोवला जातो अगदी तसचं झालं बघा मला… मग आजुबाजूची भुईवरची छोटी मोठी तृणपाती माझ्या समोर लवून मुजरा करताहेत असंच वाटलं… कुठं उकिरड्यावर बेवारस होउन कुजत पडलो असतो.. तो आता या पिवळ्या धमक फुलांच्या संगतीन जिंदगीचच सोनं झालयं असं जाणवू लागलंय… दादा तुम्ही मला वळिखला नव्हं… आवं त्योच मी तुम्ही ज्याला घराबाहीर फेकून दिलात… आता कसं बरं आठवयाचं तुमास्नी… तुमच्या पायात आता नवा इंम्पोरटेड जोडा हाय नव्हं… मग या देशी बेण्याला कोन इचारतो… ते जाऊ दे.. आता तुम्हाला नवा जोडा चावत, टुपत नाही नव्हं… हे ब्येस झालं बघा… दादा अजून एक इचारीन म्हणत होतो… रागवनार नसशीला तर बोलू काय.. व्हय त्या दिवशी मला तुम्ही घराबाहीर फेकून दिलासा तर त्यानंतर माझ्या दुसऱ्या जोडीदाराला कुठं फेकून दिलात… म्या त्याच्या आठवनीनं लै बैजार झालू बघा… त्याला बी माझ्या दिशेकडं टाकनासं करायचा हुता… अशी कधी कोनाची जोडी तोडून फोडून टाकत आसतयं व्हयं…

जोडीनं पडलो असतो तर कुणा गरजवंताला अनवाणी पायाला कामाला तरी आलू असतो… आमच्या राहिलेल्या जल्माचं ते्व्हढचं सार्थक नसतं का झालं असतं.. परं तुम्ही लै पैकं वालं पडलं ना… तुम्हाला कुठं कळायला गोरगरीबा़ची व्यथा… न्हाई का?

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रवाहपतीत… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “प्रवाहपतीत…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

शोधता तळ तुझा अंतराचा… नितळ स्फटिकासमान खळळाता मला दिसला… पारदर्शी, निर्मळ होता तो…किल्मिष न उरले इतुकेही तव मनात माझ्याविषयी… रागाचे ते तणही पाण्यासोबत वाहत वाहत निघती… पण दिसली बरं का मला!मी पूर्वी दिलेल्या तुला दुखाची काळी काळी पुटं! … रुतून बसलीय तुझ्या अंतकरणात…का अजुनही जतन करून ठेवली आहेस हे न कळे!.. तोच एक दुखरा सलणारा तुकडा आता मी जेव्हा पाहिला …माझ्यातला माणूस हरवून गेला होता का तेव्हा! हेच समजून आले मला…नित्य वाहते खळखळ करत ते जल पण अजूनही त्याला निपटून टाकणे नाही जमले …करतसे कबुली ती प्रांजल … नतमस्तक मी झालो त्या तुझिया प्रेमाचा झरणारा निर्झरास कि जो असावा अमृत धारेचा निर्मम प्रवाह तो..जो माझीया उत्शृंखल वृतीस दमन करतो…. सारे तुझ्या विपरीत घडतची राहत गेले तरी तू मात्र तुझ्या अंतरी त्यांच्याप्रती शुद्ध भावच ठेवतोस… मिसळून घेतोस त्या दृष्टादृष्ट भावनांना एकतत्व नामातला अद्वैताचा प्रवाह होतोस… आणि आणि मी मात्र तुझ्या प्रवाहाला पावलो पावली अवरुध्द करण्यासाठी मुढमतीचा खडक होउन तुझी वाट अडवण्याचा करंटेपणा करत आपली महत्ता दाखवून देत बसतो… पण त्यालाही तू तुझ्या पवित्र जलाने सचैल स्नान घालून त्याचं सदैव पापक्षालन करण्याचं असिधारा व्रताचं पालन करत राहतोस… देहाचं मालिन्य आजवरी तुझ्या प्रवाहाने धुवून गेले… पण मनाचं मालिन्य घालवण्यासाठी त्या अमृताचा थेंब प्रवाहपतीतम्हणून घेण्याची इच्छा काही झाली नाही… नि मी अजूनही असाच नर्मदेच्या गोट्या सारखा प्रवाहपतीत राहीलो…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ छप्पर फा़ड के… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “छप्पर फा़ड के…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

” काय हे? अरे किती पाॅश जागा आहे ही! असं वाटतंय इथं राहायला आलं की दुसरीकडे कुठेही जाऊच नये! आहे इथं का भाड्याने जागा काही? मला अगदी हवी तशीच जागा आहे ही! … “

… ” अरे मग सांगत होतो काय तुला मगापास्नं.. पाॅश जागा, पाॅश लोकॅलीटी.. मनाला भुरळ घालणारी… अशी एकच नाही तर माझ्या सगळ्या अशाच जागा मुंबई ठिक ठिकाणी आहेत… त्यातली ही गोल्डन लॅंड आहे… आहेस कुठे! ….

हं तर मग तुला जागा भाड्यानं पाहिजे म्हणतोस? … एकटाच सडाफटींग असशील तरच त्या कोपऱ्यातील बारीक खांबाला लागून सहा बाय चार चा पिवळ्या रंगाचा आयत आहे ती तुला जागा मिळेल… पंधराशे रूपये डिपाॅझिट आणि महिना पाच शे रूपये भाडं… इथं तुला दिवसभर खुला प्रकाश, मस्त हवा, पावसापासून प्रोटेक्शन, रात्रभर सोडीयम व्हेपरचा मोफत लाईट मिळेल.. आंघुळीची आणि हगण्यामुतण्याची सोय वर मेट्रोचं स्टेशन आहे तिथं या सोयी आहेत पण त्यासाठी तिथल्या सेक्युरिटी गार्डला तुला चायपानीची तोड करावी लागेल… बाकी या जागेत तुला कसलाच त्रास नाही… उलट या जागेत जर तू राहायला आलास तर तुझी लै तरक्की व्हएल…. अट एकच तुझ्या जागेत तूच एकटा दिसायला हवा आणखी कोणी ज्यादा माणूस काणूस दिसला तर भाडं तिप्पट द्यायला लागेल… आणि हो जागा खाली करून गेल्यावर दूसरा माणूस त्या जागेवर आल्यावरच तुझ्या डिपाॅझिटचे पैसै परत दिले जातील… बाय द वे तू कुठल्या एरियात बिझनेस करतोस? त्या एरियाचा नगरपालिकेचा तुझा बिल्ला मला दाखव… तरच तुला हि जागा भाड्याने मिळेल…

आनि हां इथं राहायला आल्यानंतर इथले कायदे कानुन पाळावे लागतील… त्यात तुझं काहीच नुकसान होणार नाही.. अरं बाबा असं डरनेका नही रे.. ते लिडर लोगा, उनके फंटर आपल्याला त्यांच्या मोर्चामंधी, धरना धरायच्या येळी, त्या जाहीर सभेला, थोडीफार दगडफेक करायला, रस्तारोको करायला, आमरण उपोषणाला, त्यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून नेतात आणि कसलंही कुठलीही निवडणूक असो दोन तीन बुथवर पाच सहा वेळेला ते आपल्याला घेऊन जातात.. लोकशाहीचा संविधानाने मिळालेला नागरीकांना एकमेव मतदानाचा अधिकाराची अंमलबजावणी ते सांगतील तसं बजवायचा… तो अधिकार त्यांचा.. धू म्हटलं की आपून फक्त धुवायचं काम करायचं… खाली पिली झंगटमें पडना नही… समझा.. आपण त्यावेळी त्यांना पाहिजे तशी मदत करायची… मंग पेपर वाले आपल्या गर्दीकडं बघून छापतात यंदा खुल्या वातावरणात मतदानाची टक्केवारी वाढली.. लोकशाहीची प्रगल्भतेकडे वाटचाल म्हणून…. पण आपून काही हि फुकटची येडताकपटृटी करत नसतो.. हां ते आपली खायची ते प्यायची सगळी सोय करतात आणि त्या दिवसाची बिदागी पण हातात ठेवतात… फकस्त आपला त्या दिवसाचा धंदा बंद ठेवायचा एव्हढचं ध्यानात ठेवायचं… तुला सांगतो आता आता कुठे या धंद्याला सोन्याचे दिवस आलेत बघ… इंडीव्हीज्युअल वरून मास कलेक्शन आणि आता तर त्याच्याही पुढे कार्पोरेट फंड बिझीनेस झाल्यानं… धंद्याला जी बरकत आलीय… आपल्या या समाजाचं स्टॅंडर्ड ऑफ लाईफ काहीच्या काहीच बदलयं की ते पाहून समाजातील इतर वर्गाला आपल्याबद्दल जलन होऊ लागलीयं… बसल्या ठिकानी सगळं आता मिळतयं… डिजिटल चाऑनलाईन चा जमाना सुरू झालाय बाबा… कुठं जायला यायला लोकांपुढे हात पसरायला, तोंड वेंगाडून दावायची गरजच उरली नाही… मोबाईल वरून एक मिस काॅल दिला की आपलं काम झालचं…

.. साला एक काळ तो होता आम्हाला रस्ता रस्यांवर येणाऱ्या जाणाऱ्या माणसा माणसा पुढे हात पसरावे लागायचे… कमी मिळणाऱ्या मिळकतीतून पोट भरण्यापेक्षा त्या समाजाने दिलेल्या मानहानी ची, शिव्याशापांच्या लाखोलीनेंच पोट भरायचे… लाचारी शिवाय जगणं असायचं नाही मुळी… धडधाकट असलो तरी कामधंदा कुणी द्यायला तयार नसायचा आणि कुणी दिलाच तर मजुरी मात्र छदाम मिळायची… जावो साले भिक मंगे कहाॅसे आते है.. असा दमबाजी देऊन हाकलायचे.. रेल्वे स्टेशन, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूव्दारा, सिनेमा घर, बडी हाटेला आणि शादी की पार्टीयां आदी ठिकाणी मग आपला जथ्थाच हजर असायचा…. हि मारामारी व्हायची आपापसांत… काही वेळेला तर कार्यक्रम ला आमंत्रित लोकांपेक्षा आपल्याच लोकांचीच हजेरी मोठी असायची… त्यावेळी असं वाटायचं कार्यक्रमाचे नेमके पाहूणे कोण आहेत… बस्स भगवान यहाॅं देर है लेकिन अंधेर बिल्कुल नही है यही सच है आखिर में.

… 1971च्या लढाईच्या वेळी सीमेवरून घुसखोरी करून जो एकदा या देशात आलोय तेव्हापासून इथलाच बनून राहिलोय… आलो त्यावेळी खिशात एक दमडी नव्हती.. पण इथे आल्याबरोबर इथल्या मायबाप सरकारने आम्हा निर्वासितांची आजन्म काळजी घेतली की जितकी त्यांनी या देशातले खऱ्या नागरिकांची घेतलेली नसेल… अरे आज माझ्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मायनाॅरीटी कम्युनिटी सर्टीफिकेट, रेशन कार्ड… सगळी सरकारी अधिकृत कागदपत्रे आहेत तितकी इथल्या लोकांच्या कडे पण नसतील… हि सगळी ‘कृपा ‘त्या सरकारी यंत्रणेची, आपलं कोणतंही घंटो का काम मिनिटोमें करतात बघ… आपण बुवा जिथे राहतो तिथल्या देशाचे सगळे कायदेशीर (काय द्यायचं घ्यायचं) बाबी आधी पाळतो मग हक्कासाठी भांडतो… तुला सांगतो आज माझ्याकडं सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन, हार्बर लाईन, तिकडे कुलाब्याकडे आणि कोस्टलला मेट्रो लाईनच्या खाली अशा मालकीची जागा आपल्या लोकांसाठी भाड्याने देत असतो… आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी विकास सोसायटी सुरू केलीय, गरजूंना अल्प व्याजदरात पैसे देतो.. शिवाय टॅक्सी, रिक्षा, ट्रक देखील माझे आहेत जे बेरोजगार लोकांना अश्या मुळे रोजगार देतो… मी फक्त रात्री आठ वाजता या सगळ्या गोष्टी़चं रोकडा कलेक्शन करत असतो… बाकी दिवसभर हा असा आरामात जातो… कुठल्याही प्रकारचा सरकारी टॅक्स मला भरायला लागत नाही कारण मी नेहमीच आर्थिक दृष्ट्या मागासच राहिलेला असतो… अधनंमधनं मी विमानाने माझ्या देशात जाऊन आठ पंधरा दिवस तिकडे राहून येतो… न जाणो उद्या आपल्याला परदेशीय म्हणून इथून हाकलले तर तिकडे सोय असावी हे कुशन म्हणून ठेवलं आहे… मग आता बोल आहे का तुला या सगळ्या अटी मान्य तर तुला ही जागा भाड्याने देतो… नाहीतर तू दुसरी सोय बघ बाबा… माझ्या कडे जागाच शिल्लक कधी असत नाही.. उद्या आलास तर माझा नाईलाज असेल… या शेखची शेखी शहरभर फिरलेली आहे.. समजलास… उद्या तू देखील माझ्या सारखाच मोठा ब्रॅडेड भाई होशील हा माझा विश्वास आहे… कारण हा देश अतिशय प्रेमळ स्वभावाचा आहे इथं जो जो येतो तो आपली पथारी पसरूनच राहतो… मागे जी खानेसुमारी झाली त्यात आपले परप्रांतीय, परदेशीय जनतेची संख्या हि स्थानिक लोकांच्या पेक्षा कैकपटीने आहे… म्हणून मुंबई, नविन मुंबई आणि आता तिसरी मुंबई करायचा प्रस्ताव सुरू आहे… तुला तिकडे भरपूर स्कोप आहे बघ… कान नाक नि डोळे कायमच उघडे ठेवशील तर उद्याच्या तिसऱ्या मुंबईचा तू लवकरच डॉन होशील… पण काही झालं तरी आपण आपला ब्रॅंड सोडायचा नाही… कायमच अंगावर मळकट फाटके कपडे, दाढी केसाचं जंगल वाढलेलं… एक मळखाऊ झोळी त्यात हिंदालियमचं थाळी, पेला, काडी नि विडी बंडल.. पथारी पसरायला एक तुटकी चटई… हे कायमच आपल्या सोबत ठेवून फुटपाथवर राहायचं… कधीही पक्क्या घरात राहयचं नाही… मिळालं तरी ते एकतर विकून टाकायचं किंवा भाड्याने द्यायचं… आणि गरीबोंकी सुनो.. वो तुम्हारी सुनेगा.. तुम एक पैसा दोगे वो दसलाख देगा अशी आळवणी करत बसायचं… कारण इथं ना देनेवाले के हजार हाथ होते है लेकिन लेने वालेको दोही हाथ राहते है… इसलिए एक दिन पूरा निभाता नही सालो सालतक चलता रहे गा…

जा आता तुझा धंद्याचा टाईम झाला असणार.. बाकी आपुन आज रात को ही डील फायनल कर देंगें… कसं?

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ सावली सोडून जाते तेव्हा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “सावली सोडून जाते तेव्हा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… हे बघ पाहतेस ना तू.. आता माझ्याच हाती काही उरलं नाही… आणि तसं म्हणशील तर सकाळपासून ते या उतरणीच्या वेळेपर्यंत माझ्या छायेचं छत्र धरून होतो तुझ्या तनावर नि मनावर… तोलून धरला होता मी उंच शेंड्यावर नि शाखा शाखांवर, केली होती पानांची पत्रावळ त्या तळपत राहणाऱ्या रवीचे धगधगते उन झेलून… चटके देऊन देऊन मला त्याने ठिकठिकाणी भाजून काढले तरी मी एक ब्र काढला नाही मुखातून… त्याची शक्ती किती अफाट होती तोलून धरलं वरच्या वर त्याला.. तरी मुठीत धरलेल्या वाळूने घटृट मुठीतून वाट काढावी तशी सुळकन वाळूची धार ओघळून जायची अगदी नकळत.. आणि मग हाताच्या पंजावर काही वाळूचे कण तसेच चिकटून बसायचे… कधी तो हात झाडला जातोय आणि आपण मुक्त होतोय याची वाट पहात… तसा रवीच्या किरणांनी माझ्यासोबत किल्ला लढवताना कुठेतरी कमजोर दुबळ्या बाजूने खिंडार पाडलं नि तेथून त्यांनी मग आपल्या सोनसळी किरणांनी मारा सुरु केला… पाना पानांनी त्या सोनसळीला अडवयाचा खूप प्रयत्न केला पण त्यात पानांच्या ढालीची छिन्न विछिन्न चाळणच झाली… तुझ्या पर्यंत कमीत कमी आच बसावी हि तडफड तडफड होत होती जीवाची… पण अखेर मी थकलो गं पण तो नाही… मग झुकावं लागल मला त्याच्या पुढे अगदी नाईलाज झाला तेव्हा… नंतर त्याचाही जोर ओसरला जेव्हा तो उतरणीकडे झुकू लागला… पण त्यावेळी माझ्या त्या सावल्या हळूहळू मला सोडून देत देत तूझ्यापासूनही लांब लांब होत गेल्या…

हट्टी मन ते पुन्हा पुन्हा त्या आठवणींना मोजत बसतं… चिंतनात मिटलेल्या डोळ्यासमोर सारापट उलगडून दाखवतं… हे माझे, ते माझे आणि आणि मी सुद्धा त्यांचीच,. साथ दिली घेतली क्षणाची जी नव्हती कधीच आपली.. फक्त एकटेपणाची धवल शाल ती ऊजेडात आली आणि कायमची साथीला राहिली..

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ हा रुसवा सोड सखे… पुरे हा बहाणा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “हा रुसवा सोड सखे… पुरे हा बहाणा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… अनबिटन नाईंटीला पोहचलेले दाते काका.. आणि  चौऱ्याऐंशीला टेकलेल्या दाते काकू…

पन्नासहून जास्त वर्षांची   संसारी  वेलसेटल्ड पार्टनरशीप..

हम दो और हमारे दो  स्टाईलचं  चौकोनी कुटुंब…

प्रत्येकाच्या करियरच्या महत्वाकांक्षेचा परीघ सातासमुद्रापार विस्तारलेला..

मग कानी, डोळी, चित्ती आणि मस्तकी तेच भिनलेले असल्याने करियरचं लिमिटलेस  आकाशात  हमारे दो ची बाऊंड टू बी भरारी…कांक्षा, महत्वाकांक्षाचा सूर्य तिकडे कधीच मावळत नाही… केशरी, सोनेरी वर्खाची झुलणारी स्वप्नं… डाॅलरच्या भुलभुलैय्याच्या गाळात रुतून बसलेली…

आणि इकडे मायपित्याचें लिमिटेड अवकाशात आशेच्या केंद्र स्थाना भोवती भिरभिरतं.. तो आशेचा सूर्य इकडे उगवायला काकू करतो… आणि निशेचा नैराश्याचा अंधार मनाला ग्रासतो…मन विध्द झाले तरी आर्शिवादाचे कर कल्याणमस्तू सांगत असतात…सातासमुद्राच्या अंतराहून मनाचं  कोसोदूर पडलेलं अंतर मात्र तसचं राहतं…

. पंख फुटलेली पिल्लं दूर दूर विहार करती झाली पण पुन्हा म्हणून वळचणीला आली नाहीत… आणि दाते काका काकूंना त्यांच्या कडे जाण्यासाठी मनाची आतुरता असली तरी देहाची उभारी झाली नाही…

सटीसहामाही फोनवरून मुलांच्या काबिल्याचा  श्रावण झरझर बरसून जायचा आणि त्यावर मग दोघांच्या मनात हिरवळ दाटे चोहीकडे सारखा  आनंद फुलून यायचा… पण ते क्षणैक असायचं.. चुटपुटीचं उनं मात्र घरीदारी कायमच चटके देत असायचं….

आणि वाढत्या वयामुळं पिसंच झडून गेल्यानं दोन वृद्धांच्या पंखातलं बळचं नाहीसं झाल्यानं आपल्या घरट्यात एकमेकांशी संवादाचा किलबिलाट करत राहिले…

कालच्या भुतकाळाची आठवणींची पासोडी सोडत .त्यावर हलकासा सुस्कारा सोडून उरलेल्या आयुष्यातले एकेक दिवस कमी कमी करत … अन रात्र झाल्यावर उद्याचा दिवस आपल्याला दिसेल ना या चिंतेत झोपेचं खोबरंच करत… थकलेले शरीर नि मरगळलेल्या मनास पहाटे पहाटे पेंगत पेंगत कधी निद्रेच्या अधिन होणं… सकाळी दाते काका किंवा काकू यांच्या पैकी जो कोणी लवकर उठत असे  त्याचं पहिलं लक्षं  त्या झोपलेल्या आपल्या माणसाकडे लागे.. अंगावर पांघरलेली  चादरीची  श्वासोच्छ्वासने वरखाली होणारी हालचाल पाहून हायसं वाटून घेणं… विशेष करून दाते काकूंचं… त्यांना काकांची काळजी वाटायची आपल्या माघारी त्याचं कसं आणि काय?… आत गलबलून येतयं असं वाटलं की डोळ्यांच्या ओलसर झालेल्या कडा बोटाने निपटून टाकत… अनाकलनीय अनिश्चितते पुढे झुकलेली हतबलता जणू…

आणि दाते काका जर आधी उठले तर.. हि ने एव्हढी साथ दिली म्हणून तर आपला संसार झाला… नव्हे नव्हे तिनेच तो तडीला नेला… आपलं काय  तिच्या कुठल्याही कामाचं कौतुक न करता; आमटीला तडतडणारी फोडणी सारखं कायमच तडतडबाजा आपण  वाजवला.. संवादाला विवादाचं लोणचं कायमच घरात घातलेले असायचं… पण घर सा़ंभाळण्याचं तिचं कसब अलौकिक असचं होतं… पण आता  माझ्या माघारी तिचं कसं नि काय?… कढ भरून आलेला आवंढा घश्यात अडकून राहत होता…

… बघता बघता कापरासारखे दिवस विरत विरत गेले.. तुझी माझी जोडी हिच कायमची हेच शिलालेख वर कोरले गेले… एकमेकांना समजून घेण्याचा  नव्हे नव्हे पुरते ओळखून आहोत याचा दावा आता मांडण्यात ,  तू तू मैं मैं च्या हलक्या सरी वर सरी कोसळत राहिल्या… प्रेमाचं आच्छादन दोघांकडेही होतं ..पण त्याही पेक्षा कुरबुरीच्या  पावसात भिजणं त्यांना अधिक पसंत होतं…बराचदा असं होत असे… आणि मग त्यावेळी दाते काकाचं आपली छत्री उघडून दूरवर बसलेल्या काकूंच्या डोक्यावर धरत असतं… समजूतदारपणाचं छत्र…आपण स्वतः भिजतोय ईकडे त्यांचं   सहेतुक दुर्लक्ष असायचं .. आणि फुरगुटून बसलेल्या काकूंची छत्री मात्र पावसात तशीच भिजत  आपलं लबाड हसू चेहऱ्यावर ओघळत राहायची….वयाची शान वाढवणारा वरवरचा लटका रूसवा काकूंचा काकांच्या प्रेमळ सरींच्या मिनतवारीने फार काळ टिकायचा नाही… आता तुम्ही कशाला पावसात भिजताय.. सर्दी खोकला झाला की आली का मॅरेथॉन करायची पाळी मजवर… असं थोडसं गुश्याने बोलणं… आणा ती माझी कोपऱ्यात पडलेली छत्री.. आणि ही तुमची तुम्ही ठेवून घ्या…  काकांच्या चेहऱ्यावरील वक्र रेषा मंदस्मितात वितळून गेल्या… भुरूभुरू पावसानं भिजलेल्या कपड्यांवर वाऱ्याने फुंकर मारली… अन एक गुलाबी प्रेमाचा काटा अंगभर मोहरून गेला…काका नि काकुंवर  पाऊस मात्र आता   हसत हसत प्रेमाचं शिंपण करत  राहिला….

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दिसलीस तू फुलले ऋतू.… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “दिसलीस तू फुलले ऋतू…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

भावना त्यालाच कळतात ज्याला त्याची जाणीव असते.

तारुण्याच्या त्या टप्प्यावर तुझं माझ्या आयुष्यात येणं.. हा खरोखरच नियतीचा योगायोग होता… पहिल्या नजर भेटीतच कलिजा खलास झाला होता… कळले नाही कधी मी नजरकैदेत बंदिस्त कसा झालो… हरवले भान स्व:ताचे…. जगणेच विसरून गेलो… बस्स तोच एक क्षण आला नसता आयुष्यात तेव्हा! .. असे त्या भेटीनंतर कैकदा वाटून गेले… मिळणार नाही साथ तिची हेही तेव्हाच कळून चुकले.. सौंदर्यवतीचे चाहते लाखो असले, तरी भाग्यवान तो एकच असतो… पण पण जुनी ओळख ती कुठे तरी हृदयाच्या कप्यात दडून राहीली होती तिच्याही नि माझ्याही.. पुन्हा कधीच न उचंबळून न येणारी… ताटातूट ठरलेली घडलीच काही क्षणातच… अन दोन वळून वळून बघणारे चेहरे काही अनामिक भावनांचे कंगोरे घेऊन समोरून निघून गेले.. दोन ओंडक्यांची पुन्हा कधीच घडणार नसते गाठभेट हे ही तितकेच सत्य असते… अबोल नि असफल प्रीतीच्या वेलीचे सलणारे काटे… मनाला घायाळ करतात.. समजूत घालता घालता मनं थकून जातं.. काळाचं औषध विरहाचं दु:ख विसरायला लावतो… आणि दुसऱ्या प्रेमाच्या तडजोडीने मनाची तगमग दूर करायची मदत घेतो… आता सारं काही आलबेल नि आनंदाच्या लहरीवर जीवनाचे तरंग तुषार उधळण करत जात असतं… आणि आणि एक दिवस नियतीला पुन्हा खोडसाळपणा करण्याची हुक्की येते…

ध्यानीमनी नसताना एक दिवस सकाळी मार्निंग वाॅकला बागेत असताना तिचे माझ्या सामोरी येणे… अगदी तसेच पहिल्या त्या भेटीसारखे… नजरेला नजर मिळताना… ओळख आहे का? असा निशब्द प्रश्न त्यातून विचारला जाताना.. डोळेच ते एकमेकांना भिडल्या भिडल्या अनेक गोष्टी नजरेने नजरेला नजर करूनही गेले… शब्दांची वाट न पाहता… काही क्षणातच आम्ही दोघं एकमेकांच्या समोरूनच गेलो… आणि गुंतलेले हट्टी मन ओढून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहताना मात्र मनाची चलबिचल वाढवत गेले… ती जुनी ओळख कुठे तरी हृदयाच्या कप्यात दडून बसलेली, तिच्याही नि माझ्याही.. पुन्हा एकदा उचंबळून येते… तेही क्षणैक ठरते… आता देहाचं तारूण्य ओसरून कधीच गेलेलं असतं, वार्धक्याची रूपेरी देहावर पसरलेली असते… तरीही अजूनही मनात कोवळे तृणांकूर उमलू पाहतात… आम्ही एकमेकांना पाहिलेलं असतं तेव्हा… भावभावनांची खळबळ उरात उठते.. अजूनही आपण तुला विसरलेलो नाही हेच नजरेतून सांगणे असते… काही गोष्टींमुळे आपण एकत्र जरी आलो नाही, आणि कितीही दूर दूर अंतरावर आपण असलो तरीही मनातल्या प्रेमरज्जूने आपण एकमेकांशी कायमचे बांधले गेलो आहोत… हे ही नसे थोडके… होय ना! …

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ आय. टी.… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “आय. टी.” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

ऐ चला गं भराभर… इतके दिवस नुसतं बेंचवर बसून तो नवा प्रोजेक्ट येण्याच्या आशेवर बसून काढले… वाटलं नव्हतं नवीन प्रोजेक्ट येईल असा… कंपनी ने तर पंधरा दिवसांनी बेंचवर च्या फोर्सला नारळ देण्याचं पक्क केलेलचं होतं… पण समहाऊ नवा प्रोजेक्ट एकदाचा मिळाला… आज त्याची रिव्ह्यू मिटींग काॅल केलीय अरली इन दी मार्निंग… त्यात नेमका उशीर झालाय आपल्याला… बाॅस कधीचा उखडला असणारं… प्रोजेक्ट सुरू करून आठवडाच झालायं…. चार महिन्याची डेड लाईन आहे त्याची… पण बाॅस ने प्राॅडक्शन मॅनेजरला आपल्याला विश्वासात न घेताच जंटलमन वर्ड दिलाय तिसऱ्या महिन्यातच अलाॅटेड जाॅब पूर्ण करून देतो म्हणून… त्याचं कायं गं सांगायला जातयं.. शेवटी आपल्या मानगुटीवर बसून रात्रंदिवस पिळून काढणार आपल्याला आणि हा शेवटी एक नंबरचे रॅंकिंग घ्यायला मोकळा… ॲप्रिसिएशनच्या दिवशी हे श्रेय माझ्या सिनसियर टिमचं आहे असं कोरडं पोकळ शब्दबापुडे कौतुक भरलेल्या मिटींग मधे करताना आपल्या ओठांवर पडलेल्या मधाचा थेंब जिभेने चाटत.. (ए. जी. एमची हांजी हांजी करत) बोलणार आणि सगळं तूप आपल्याच पोळीवर ओढून घेणार आणि आपल्याला… रॅंकिंगच हॅंगिंग करणारं… वर म्हणणार… मॅनेजमेंट ने यंदाच्या वर्षी काॅस्ट कटींगचं टारगेट ठेवल्यानं सगळ्यांना रॅंकिंग नि इयरली इनरक्रीमेंटला कट दिला आहे… म्हणजे वर्षाचा मलिदा कंपनीच्या डायरेक्टर नि मॅनेजमेन्टने खाऊन घ्यायचा आणि प्रत्यक्षातल्या टास्कफोर्सला धतुरा दाखवायचा… मी तर बाई ठरवलयं एप्रिलला जो बोनस, इन्सेटीव्ह जमा झाला कि या कंपनीला कल्टी मारणारं… तसं माझ्या प्रोफाईलला बघून दोन तीन कंपन्यांनी चांगली ऑफर देऊ केलीय.. फिनॅशियल बेनिफिट खात्यावर जमा झाले रे झाले दुसऱ्या मिनिटाला पेपर टाकणार… कोण काम करणारं या आसल्या टाईट पोझिशन्स मधे… आपल्या काय कंपनीचा तुटवडा आहे काय… तू नही तो और सही… साखर कधी संपत नसते.. हंटिंग करत राहिलं म्हणजे साखरेच्या गोडीचा वास लगेचच जाणवतो… मग मोर्चा तिकडे का वळवू नये… आणि पुन्हा तिथं ही असाच अनुभव येतोय असं दिसलं कि आहेच पुन्हा नवा शोध घेणे… हि मु़ग्यांची रांग कधीही संपत नाही.. कुठून नि कशी सुरू होते काही कळत नाही… पण एक मात्र खरं त्यांची हि येजा कधीही एकट्याने होत नसते कायमच मोठी रांगच्या रांग लागलेली असते… ते बाहेर पडलेत कि आत निघालेत हे त्या निघालेल्या रांगेवरून कळत नाही.. पण एक आहे तो साखरेचा कण जेव्हा आपल्या चिमटीत पकडून वाहून नेतात तेव्हा दोन मुंग्या कश्या समोरासमोर आल्यावर संवादाचं शेअरिंग करतात… तसंच आपल्या आय. टी. वाल्यांचं देखील आहे… पर्कची साखर गोडीला कुठली चांगली आहे आणि जास्त काळ पुरणारी आहे इतकी बाब समजलं म्हणजे झालं… चल तर आपण दोघी कॅन्टीन मधे जाऊन कप ऑफ टी घेऊन एकमेंकांना गुडबाय म्हणूया…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares