मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वंगण : मनाचे, स्वभावाचे” – लेखिका : विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “वंगण : मनाचे, स्वभावाचे” – लेखिका : विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

सकाळच्या गडबडीत नेमकी ट्रॉली बाहेर ओढताना अडकली… धड ना आत, धड ना बाहेर… वैतागच… नेमके चहा साखरेचे डबे आत अडकले…! आतल्याआत चडफड नुसती… आता सुतार बोलवावा लागणार… एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार… नाहीतर बजेट वाढवून या कशा मोडीत काढायला झाल्यात, याची गाथा वाचणार. आजकाल मॉड्यूलर किचन कसं जोरात चाललंय… माझी इकडे कामं आणि तिकडं कामं. सगळं क्षणात मनात आणि डोळ्यांसमोरुन तरळूनच गेलं.

जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कड्कट् आवाज काढलाच तिने. लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई.. कडेच्या पट्टीवर… सरकेल… तात्पुरते तरी निभावेल…! चांगली आयडिया… मी पट्कन तेलाचं बोट फिरवलं… दोन मिनिटांनी ट्रॉली मऊसरपणे आतबाहेर डोकावली… कसलं भारी काम झालं एकदम! मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद देत म्हणलं, “बरं झालं बाई, वेळेत आलीस… नाहीतर… चहा पावडर विकत आणावी लागली असती. “ती हसली…

“वंगण लागतंय ताई, थेंबभरच पुरतं, पण लागतं कधीमधी आणि वेळेवर! ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा क्षणात! “

खरंच, वंगण लागतं…!

फक्त मशीन, वस्तूंनाच नाही तर माणसालाही, अगदी त्याच्या देहाइतकंच मनालाही, अगदी नात्यांनाही वंगण अवश्यक आहे.

चार चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचार वाचनाचं, सूरमैफिलींचं, श्रद्धा भक्तीचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कलाकल्पनेचं. जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येऊन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पूर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं.

लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची. प्यायचं म्हणजे प्यायचं… कितीही आदळापट केली तरी ती तिचा हेका सोडायची नाही. पोट आतड्याचं ते वंगणच आहे… महिना- दोन महिन्याने एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं… आणि तुम्ही मग आबरचबर हादडायला मोकळे… कानात तेल, नाकात दोन थेंब तूप, डोक्यावर बुदलीभर कोमट तेल… शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्षे आमच्या पिढीने खरं तर अनुभवला. रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यायची… शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं.

खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रूपात आपली सोबत करत राहतं… आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं, कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला आहे.

जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपण- गंज मिटवणं आणि पूर्वस्थितीत आणून सोडणं.. हा (स्व)भावच आहे वंगणाचा!

क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळूवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याशी शांतपणे बोलणं… हे ही नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचे वंगणच आहे.

वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं… जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपण उरेल… आणि कोरडेपण क्षणात भस्मसात होऊन जातं! त्यामुळे जगण्यात येणारे हर एक प्रकारचे वंगण जपणे, प्रसंगी ते वापरणे फार आवश्यक आहे. निर्जीव मशीन सामुग्रीला जिथं त्याचं महत्त्व समजतं, तिथं तुमच्या आमच्यासारख्या जिवांनी ते जाणलंच पाहिजे.. त्याचं जतन केलंच पाहिजे… तर जगणं लयीत.. सुसह्य… होत राहील!

* * * *

लेखिका : विदुला जोगळेकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “टॉक्सिक पॉझिटिव्हिटी” – लेखिका: डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “टॉक्सिक पॉझिटिव्हिटी” – लेखिका: डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी नेहमी आनंदी राहण्याचा अतिरेक

 

“नेहमी हसत राहा” — पण मन रडत असेल तर?

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी : भावनांना नाकारणारी खोटी सकारात्मकता.

आजकाल आपण सतत एकच गोष्ट ऐकतो —

“पॉझिटिव्ह राहा…”

“हसत राहा…”

“सगळं ठीक होईल…”

सोशल मीडियावर, नात्यांमध्ये, अगदी घरातही आपल्याला दुःख लपवून आनंदी दिसण्याचा सल्ला दिला जातो.

पण प्रत्येक वेळी हसणं खरंच आवश्यक असतं का?

मन आतून तुटत असताना फक्त “मी ठीक आहे, ” असं दाखवणं योग्य आहे का?

माणूस हा भावना असलेला जीव आहे.

त्याला आनंद होतो, पण दुःखही होतं.

त्याला प्रेम वाटतं, पण कधी भीती आणि एकटेपणाही जाणवतो.

आणि या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत.

पण जेव्हा समाज आपल्याला “दुःखी होऊ नको”, “रडू नको”, “नेहमी मजबूत राहा” असं शिकवतो, तेव्हा आपण आपल्या खऱ्या भावनांपासून दूर जाऊ लागतो.

यालाच “टॉक्सिक पॉझिटिव्हिटी” म्हणतात.

ही अशी सकारात्मकता आहे जी वरून सुंदर दिसते, पण आतून माणसाच्या भावनांना गप्प बसवते.

ती माणसाला समजून घेत नाही, उलट त्याला स्वतःच्या दुःखाबद्दल अपराधी वाटायला लावते.

 

खरी सकारात्मकता म्हणजे नेहमी हसत राहणं नाही…

तर रडताना स्वतःला स्वीकारणं आहे.

खरी ताकद म्हणजे भावना लपवणं नाही…

तर ‘मला त्रास होतोय’ हे प्रामाणिकपणे मान्य करणं आहे.

कधी कधी माणसाला सल्ल्यांची गरज नसते,

त्याला फक्त कोणीतरी शांतपणे ऐकणारं मन हवं असतं.

“सगळं ठीक होईल” या शब्दांपेक्षा

“मी तुझ्यासोबत आहे” हे शब्द जास्त आधार देतात.

म्हणून आपल्या आसपासच्या लोकांना नेहमी आनंदी राहण्याचा दबाव देऊ नका.

 

कारण भावना दाबल्याने माणूस मजबूत होत नाही…

तो आतून एकटा पडत जातो.

मानसिक आरोग्याची सुरुवात ‘खोटं हसण्यात’ नाही,

तर ‘खऱ्या भावनांना स्वीकारण्यात’ असते.

खरी सकारात्मकता म्हणजे नेहमी हसत राहणं नाही…

 

 आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या भावनांना जागा द्या.

त्यांना रडू द्या, बोलू द्या, व्यक्त होऊ द्या.

 

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी : नेहमी आनंदी राहण्याचा अतिरेक होत चाललाय का, हा विचार करायची वेळ आली आहे.

 

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या दुःख, राग, भीती, ताण किंवा नैराश्य यांसारख्या भावना दुर्लक्षित करून तिला जबरदस्तीने सकारात्मक राहण्यास सांगणे. यात व्यक्तीच्या खऱ्या भावनांना महत्त्व दिले जात नाही.

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी का घातक आहे?

प्रत्येक माणूस आयुष्यात वेगवेगळ्या भावना अनुभवत असतो. आनंद, दुःख, राग, भीती, निराशा या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत. पण जर एखाद्याला सतत “नकारात्मक विचार करू नकोस” असे सांगितले गेले, तर त्या व्यक्तीला स्वतःच्या भावना चुकीच्या वाटू लागतात.

यामुळे व्यक्ती:

भावना दाबून ठेवते

एकटेपणा अनुभवते

स्वतःला दोष देते

मानसिक तणाव वाढतो

मदत मागण्यास घाबरते

समुपदेशनामध्ये (Counseling) व्यक्तीच्या भावना समजून घेणे आणि स्वीकारणे खूप महत्त्वाचे असते. फक्त सकारात्मक बोलून समस्या दूर होत नाहीत.

दैनंदिन जीवनातील उदाहरणे

१. दुःखी व्यक्तीला जबरदस्ती सकारात्मक राहायला सांगणे

एखाद्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल आणि ती व्यक्ती रडत असेल, तर काही लोक म्हणतात:

“रडू नकोस, मजबूत बन. ”

“देवाची इच्छा असेल. ”

“सगळं चांगल्यासाठीच होतं. ”

ही वाक्ये ऐकायला सकारात्मक वाटतात, पण त्या व्यक्तीच्या दुःखाला जागा देत नाहीत. अशावेळी “तुला खूप वाईट वाटत असेल, मी तुझ्यासोबत आहे” असे म्हणणे अधिक योग्य असते.

२. विद्यार्थ्यांवरील दबाव

एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर त्याला लगेच:

“Positive रहा. ”

“तू overthink करतोस. ”

“हे काही मोठं नाही. ”

असे सांगितले जाते. पण त्या विद्यार्थ्याच्या मनातील भीती, अपयशाची भावना आणि ताण समजून घेणे गरजेचे असते.

३. नैराश्य असलेल्या व्यक्तीशी वागणे

नैराश्य (Depression) असलेल्या व्यक्तीला अनेकदा:

“फक्त आनंदी राहा. ”

“इतकं काय विचार करतोस? ”

“इतरांचं बघ, त्यांच्याकडे जास्त समस्या आहेत. ”

असे बोलले जाते. यामुळे त्या व्यक्तीला स्वतःच्या भावना व्यक्त करणे कठीण होते.

सोशल मीडियाचा प्रभाव

आज सोशल मीडियावर “Happy Life”, “Positive Vibes Only”, “Always Smile” अशा गोष्टी खूप दिसतात. लोक स्वतःच्या आयुष्यातील फक्त आनंदाचे क्षण दाखवतात. त्यामुळे इतरांना वाटते की आपणच फक्त दुःखी आहोत.

खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष असतात. पण सतत आनंदी दिसण्याचा दबाव मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो.

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी कशी टाळावी?

जवळच्या व्यक्तींनी:

त्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकावे.

तिच्या भावना मान्य कराव्यात

लगेच उपाय देण्याचा प्रयत्न करू नये.

“तुला असे वाटणे स्वाभाविक आहे” असे सांगावे

सह अनुभूती दाखवावी

योग्य प्रतिसाद कसा असावा?

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी

योग्य आणि समजूतदार प्रतिसाद

“सगळं ठीक होईल. ”

“तू सध्या कठीण काळातून जात आहेस. ”

“रडू नकोस. ”

“रडायला हरकत नाही. ”

“Positive रहा. ”

“तुझ्या भावना महत्त्वाच्या आहेत. ”

“हे काही मोठं नाही. ”

“ही गोष्ट तुला त्रास देत आहे, मी समजू शकतो. ”

भावना स्वीकारणे का महत्त्वाचे आहे?

भावना दडपून टाकल्याने समस्या वाढू शकतात. जेव्हा व्यक्तीला स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतात, तेव्हा तिचा मानसिक ताण कमी होतो. दुःख, भीती किंवा राग या भावना चुकीच्या नसतात. त्या मानवी जीवनाचा भाग आहेत.

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी:

भावना व्यक्त करणे

मदत मागणे

स्वतःला वेळ देणे

स्वतःवर दया ठेवणे हे आवश्यक आहे.

 

सकारात्मक विचार करणे चांगले आहे, पण प्रत्येक वेळी फक्त सकारात्मक राहण्याचा आग्रह धरणे योग्य नाही. टॉक्सिक पॉझिटिव्हिटीमुळे व्यक्तीच्या खऱ्या भावनांकडे दुर्लक्ष होते आणि मानसिक तणाव वाढू शकतो.

समुपदेशनामध्ये व्यक्तीच्या भावनांना स्वीकारणे, तिला समजून घेणे आणि तिच्यासोबत सहअनुभूतीने उभे राहणे केले जाते. प्रत्येक भावना महत्त्वाची आहे आणि त्या व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणून कोणावरही टॉक्सिक पॉझिटिव्हिटी ठेवण्याचा दबाव आणू नका.

लेखिका: डॉ. स्वाती गानू

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जावईबापूंचे प्रकार – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ जावईबापूंचे प्रकार – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

आपल्याकडे जावईबापूंचे साधारणपणे पाच प्रकार सांगितले जातात… ते पुढीलप्रमाणे:

१) साखऱ्या जावई

साधारणत: २% जावई या प्रकारात मोडतात. हे जावई १०० कि. मी. पेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्यामुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जात-येत असतात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून त्यांचा मानपान होत असतो. चांगलीच बडदास्त असते यांची, ‘कुठे बसवू अन् कुठे उठवू? ‘ अशी अवस्था सासरच्या मंडळींची होत असते, म्हणून यांना ‘साखऱ्या जावई’ असं म्हटलं जातं. जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे…

२) भाकऱ्या जावई

या प्रकारात ९५% जावई मोडतात. हे जावई सासुरवाडीच्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर/वारंवार जात-येत असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई-बाबांची आठवण आली तर तिच्या सोबतसुध्दा जावे लागते. यांचे जाणे-येणे नेहमीचे असते, त्यामुळे या जावयांना जेवणासाठी जो घरात स्वयंपाक केलेला असतो, तोच वाढला जातो. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते… हे नेहमीचेच आहेत, ‘नित उठे, अन् कपाळ बसे. ‘ या म्हणीतल्या उक्तीप्रमाणे. म्हणून यांना काही खास मानपान नसतो, म्हणून यांना ‘भाकऱ्या जावई’ असं म्हटलं जातं.

३) ढोकऱ्या जावई

या प्रकारात २% जावई मोडतात. हे ‘घरजावई’ असतात. या जावयांना घरात पाणीसुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दूध अशा वस्तूसुध्दा आणून द्याव्या लागतात. झाडलोटीची कामे पण करावी लागतात. घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी यांचा अपमान नक्कीच केला जातो. म्हणून यांना ‘ढोकऱ्या जावई’असं म्हटलं जातंय.

४) दयावान जावई

हे जावई सासरच्या लोकांना कायम मदत करीत असतात. बायकोचं ऐकतात, शालकाला उसने पैसे देतात. सासरची मंडळी त्यांना कायम गोड-गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हे एक-दोन वर्षातून सासरी येत-जात असतात, त्यावेळी त्यांच्याकडे आजूबाजूचे लोक सहानुभूतीपूर्वक बघतात. म्हणून यांना ‘दयावान जावई’ असं म्हटलं जातंय.

५) बेरकी जावई 

हे दूर असोत किंवा जवळ ते सासुरवाडीला जातच नाहीत अन् गेलेच तर त्यांना हवं तेच जेवायला करावं लागतं, तेवढं करूनही ते गोड काही बोलत नाहीत, तुसडेपणाने वागतात, म्हणून यांना ‘बेरकी जावई’ असं म्हटलं जातंय.

शेवटी आपल्या पूर्वजांनी अर्थात आपल्या माता-भगिनींनी ‘जात्यावरच्या ओवीत’ म्हटलंच आहे, की

(१)

जावाई, जावाई नको करू तू मायबाई,

जिन्ही वं दिधा जन्म, तिना तिले झाया नही.

(२)

जावयाची जात फार बेईमान सांगती,

‘लक्ष’ गं केलं दान, तरी माझ्या ‘ताई’ ला गांजती.

शेवटी जावयाच्या महिमेचं कौतुक करतांना सासुबाई म्हणतात,

“शंभर ब्राह्मण, एक जेवाले जावाई,

म्हणून ‘दादासले’ पुण्य काशीतून सवाई. “

आता तुम्हीच ठरवा आपण स्वत: कोणत्या जावईबापूंमध्ये मोडतात ते…  

या समूहातील सर्वच धोंडोपंतांना आहे धोंड्याच्या महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनावधानाचे ध्यान – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

अनावधानाचे ध्यान – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

दररोज रात्री झोपण्यापूर्वी तन मन धन आपल्या आराध्याला अर्पून डोळे मिटून त्याला समर्पण करावं.

रात्रीची झोप आणि सकाळी जागं होणं…ही फक्त रोज घडणारी शारीरिक क्रिया नाहीये, त्यात एक गूढ अध्यात्म दडलं आहे.

दिवसभर “मी”, “माझं”, “माझ्या इच्छा”, “माझी धडपड” यात गुरफटलेला मनुष्य जेव्हा रात्री झोपतो, तेव्हा नकळत सगळं सोडून देतो.

पद, पैसा, चिंता, यश, अपयश, नाती, अहंकार — काहीच हातात राहत नाही. झोप म्हणजे एका अर्थाने दररोज अनुभवलेलं छोटंसं ‘ध्यानच’ असते. ध्यानात जसं मन बाहेरच्या जगापासून बाजूला होऊन निरामय शांततेत उतरतं, तसं झोपेतही घडतं. फरक एवढाच की ध्यानात आपण जाणीवपूर्वक शांततेकडे जातो आणि झोपेत निसर्ग आपल्याला त्या शांततेत अलगद घेऊन जातो.

कदाचित म्हणूनच गाढ झोप ही इतकी सुखद वाटते, कारण त्या क्षणी मनुष्य अहंकारातून पूर्णतः पण थोडावेळच बाहेर आलेला असतो.

ना कालची खंत असते, ना उद्याची भीती…फक्त एक शांत अस्तित्व.

मग पहाटे जेव्हा जाग येते आणि आपले डोळे उघडतात, श्वास सुरू असतोच, सूर्य पुन्हा खिडकीतून डोकावणार असतो, तेव्हा आपल्या संस्कारित मनाला जाणवतं ही फक्त जाग नाही, ही कृपा आहे. आपण रात्री स्वतःला पूर्णपणे अज्ञाताच्या स्वाधीन करतो आणि सकाळी पुन्हा जागे होतो यापेक्षा मोठा विश्वास आणि यापेक्षा मोठं आश्चर्य दुसरं कोणतं? खरं म्हणजे हीच ती ईश्वरी कृपा आहे, असते, असेल.

अध्यात्म कदाचित ह्याच एका जाणिवेपासून सुरू होत असावं की जीवनावर आपला ताबा नाही, फक्त सहभाग आहे. आपण मालक नाही, निमित्त आहोत.

प्रत्येक सकाळ ही केवळ नवीन दिवसाची सुरुवात नसते; ती अस्तित्वाने दिलेली एक हळूवार आठवण असते

“ अजून तुझं कार्य संपलेलं नाही.”

जो मनुष्य रात्री झोपताना समर्पण आणि सकाळी उठताना कृतज्ञता अनुभवतो, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस साधनेसारखा होतो. त्याला उमगू लागतं – झोप ही केवळ विश्रांती नाही, आणि उठून बसणं ही केवळ दिनचर्या नाही…तो दररोज घडणारा एक अदृश्य आध्यात्मिक चमत्कार आहे.

ह्याची जाण ज्याला आली तो अध्यात्म तरला असेच म्हणावे लागेल.

*

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सहज विचार… – लेखक : अज्ञात – संग्राहिका : उषा सोमण  ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सहज विचार… – लेखक : अज्ञात – संग्राहिका : उषा सोमण  ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

सहज-विचार (random thoughts)

जेव्हा मी सत्तरीत पाऊल ठेवलं, तेव्हा मी माझ्या जुन्या आरामखुर्चीवर शांतपणे बसले होते. पार केलेल्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना मी स्वतःशीच पुटपुटले,
“बरं… तर हे कदाचित आयुष्याचं शेवटचं प्रकरण असावं.”

पण मी जितका विचार केला, तितकी मला एक आश्चर्यकारक गोष्ट जाणवली: आयुष्य संपत नव्हतं, तर ते फक्त सत्याचा उलगडा करत होतं.

ज्या गोष्टींवर मी कधीकाळी मनापासून विश्वास ठेवला होता, त्यातील अनेक गोष्टी केवळ आभास निघाल्या.

मुले? ती मोठी होतात आणि स्वतःचं वेगळं जग निर्माण करतात.

आरोग्य? ते तुमच्या कल्पनेपेक्षाही वेगाने अदृश्य होऊ शकतं.

सरकार? ते बहुधा फक्त हेडलाईन्स, आश्वासने आणि कागदावरचे आकडे असतात.

आणि वृद्धत्व… वृद्धत्व क्रूर असू शकतं. ते आधी तुमच्या शरीरावर नाही, तर तुमच्या आशेवर हल्ला करतं.

म्हणून मी काही कडू सत्यांशी, प्रामाणिक सत्यांशी तडजोड केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच सत्यांनी मला वाचवलं.

° मुलं तुम्हाला एकटेपणापासून वाचवू शकत नाहीत.

वर्षानुवर्षे आपण स्वतःला सांगतो,

“जेव्हा माझी मुलं मोठी होतील, तेव्हा मी कधीच एकटी नसेन. ती मला भेटायला येतील, माझी काळजी घेतील, माझ्या जवळ राहतील.”

हे एक सुंदर स्वप्न आहे.

पण वास्तवाचे बेत वेगळे असतात. मुलांकडे नोकऱ्या, बिलं, जोडीदार, जबाबदाऱ्या आणि त्यांची स्वतःची मुलं असतात. त्यांचे दिवस कामांनी भरलेले असतात आणि तुम्ही फक्त त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या मधली एक छोटी आठवण बनून राहता.

कधीकधी तुम्ही एखाद्या सणासारखी त्यांच्या फोनची वाट पाहता.

दिवस जातात.

आठवडे उलटतात.

आणि शेवटी एक मेसेज येतो:

“हाय मॅाम, आशा आहे की तू ठीक असशील.”

त्यांना आपली आठवण राहिली, या विचाराने तुम्ही हसता.

पण खोलीतला तो शांत एकटेपणा तसाच राहतो.

तेव्हा मला समजलं: मुलं हे एक वरदान आहेत, पण ती एकटेपणाविरुद्धचं संरक्षण कवच नाहीत.

° आरोग्य हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे.

एक दिवस असा येतो, जेव्हा पायऱ्या चढणं म्हणजे एखादा डोंगर चढल्यासारखं वाटतं. जेव्हा तुमचे गुडघे तुमच्या विचारांपेक्षा जास्त जोरात ‘बोलू’ लागतात. ज्या ठिकाणी तुम्ही एकेकाळी धावत जायचात, तिथे जाणं तुम्ही टाळता.

तेव्हा तुम्हाला समजतं: आरोग्य हे अनंत काळ टिकणारं नाहीये.

तीच तुमची खरी संपत्ती आहे.

आरोग्याशिवाय पैशाला काही अर्थ उरत नाही. ताकदीशिवाय स्वातंत्र्याची चमक कमी होते. जोपर्यंत तुमचं शरीर तुमचं ऐकतंय, तोपर्यंत त्याची काळजी घ्या.

° पेन्शन आणि पैसा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत

पेन्शन तुम्हाला जिवंत ठेवू शकतं, पण ते तुम्हाला ‘जगू’ देईलच असं नाही.

वर्षानुवर्षे माझा असा विश्वास होता की ही व्यवस्था आपली काळजी घेईल. दशकांच्या कामानंतर कोणीतरी म्हणेल, “आता विश्रांती घे. आम्ही आहोत ना.”

पण आयुष्य असं चालत नाही.

बिलं येतातच. औषधांचा खर्च वाढतो. महागाई वाढते. आणि अचानक तुम्हाला जाणवतं की जगणं महाग झालं आहे.

म्हणून मी एक निर्णय घेतला: आश्वासनांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. जेवढं शक्य आहे तेवढी बचत करा. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत कमवा. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी छोटीशी बचतही मोलाची ठरते.

°मी पाळत असलेले ५ नियम:°

°नियम १: पैसा हा अनेकदा मुलांपेक्षा जास्त भरवशाचा असतो.

हे ऐकायला कदाचित कठोर वाटेल, पण सत्य असंच असतं. मुलं म्हणजे प्रेम आहेत, आनंद आहेत, पण ती तुमचा ‘रिटायरमेंट प्लॅन’ नाहीत. स्वतःसाठी बचत करा. ती बचत तुम्हाला स्वातंत्र्य देते आणि स्वातंत्र्य तुम्हाला शांतता देतं.

°नियम २: तुमचं आरोग्य हेच आता तुमचं ‘फुल-टाईम’ काम आहे.°

तुमचा रोजचा पहिला विजय म्हणजे अंथरुणातून कोणत्याही वेदनेशिवाय उठणे. चाला, व्यायाम करा, साखर-मीठ कमी खा. आजार तुम्ही कोण आहात हे पाहत नाही, पण खबरदारी सर्व काही बदलू शकते.

°नियम ३: स्वतःच्या सहवासाचा आनंद घ्यायला शिका.°

कुणाची तरी वाट पाहणं दुःख निर्माण करतं. फोनची, भेटीची किंवा कोणीतरी आपल्याला आनंद देईल, याची वाट पाहू नका. स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करा. आवडता पदार्थ बनवा, एखादं चांगलं पुस्तक वाचा, जुनी गाणी ऐका. जिथे अपेक्षा संपतात, तिथे शांतता सुरू होते.

°नियम ४: वृद्धत्व म्हणजे ‘कमकुवत’ होण्याचा परवाना नाही.°

मी माझ्या वयाची अशी अनेक लोकं पाहते जी दिवसभर तक्रार करतात— “सगळं दुखतंय,” “कोणालाच काळजी नाही,” “जग खूप वाईट आहे.” मग हळूहळू लोक त्यांना भेटायला येणं बंद करतात. प्रेमाचा अभाव नसतो, पण सततची नकारात्मकता थकवणारी असते. तुमची जिद्दच आदर मिळवून देते. आयुष्य कितीही दुखत असलं, तरी ताठ मानेने जगा.

° नियम ५: भूतकाळ सोडून द्या.°

वृद्धत्वातील सर्वात धोकादायक शब्द म्हणजे “पूर्वी.” पूर्वी आयुष्य सोपं होतं, पूर्वी मुलं ऐकायची, पूर्वी जग चांगलं होतं. पण तो “पूर्वी” आता निघून गेला आहे. फक्त “आज” अस्तित्वात आहे. जर तुम्ही कालच्या आठवणीत जगलात, तर आज जे काही शिल्लक आहे तेही तुम्ही गमावून बसाल.
मी आता जगायला शिकतेय. आठवणीत नाही, पश्चात्तापात नाही, तर या क्षणात.

वृद्धत्व ही एक परीक्षा आहे. ती तुमच्यासाठी दुसरं कोणीही देऊ शकत नाही. तुम्ही खुर्चीत बसून मदतीची वाट पाहत तक्रार करू शकता… किंवा दीर्घ श्वास घेऊन जे काही उरलं आहे, त्यातून पुन्हा आपलं आयुष्य उभारू शकता.

आणि जर तुम्ही तसं केलंत, तर तुम्हाला एक सुंदर गोष्ट सापडेल:

सत्तरीनंतरचं आयुष्य संपलेलं नसतं. त्यात अजूनही हास्य असू शकतं, शांतता असू शकते आणि एक अर्थ असू शकतो.

आणि हो…

ते अजूनही एक अतिशय सुंदर आयुष्य असू शकतं.

लेखक:अज्ञात
संग्राहिका : उषा सोमण
प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रिय सावरकर… – कवी : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ प्रिय सावरकर… – कवी : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले

प्रिय सावरकर,

 

न तुमच्या नावे कारखाने, न बँका,

 न पतपेढ्या

न सहकारी सत्तेत मुरलेली मस्ती

न राजघाट, न शांतिवन.. समाधीलाही पारखे

न पद्मांचे भूषण, न रत्नांचे मुखवटे.

 

न चलनी नोटांवर तुमचे चित्र

न इतिहासाच्या पुस्तकात तुमचे पान

तरीही काळजावर कोरले तुमचे नाव

हाच तुमचा सन्मान.

 

नातू-पणतू नात-पणती कोणी गादीवर नाही

आमदार-खासदार सोडा साधा नगरसेवकही

न वांग्याची शेती, न लवासाची सृष्टी

न वाळूचे ट्रक, न दारूचे परवाने

न सरकारी गुत्तेदारीच्या गोष्टी

न हप्त्याची टोळी, न गुंडांची फौज दिमतीला

न कुबेरगिरी करणारा पेपर तुमच्या मदतीला.

 

लाभला नाही तुम्हाला पॅलेसचा तुरुंग

तुम्ही झाला नाहीत कधी विदेशी सत्तेचे

Sincere friend, Obedient servant

तुम्ही होतात शत्रू आणि

राहिलात खरोखरीचे शत्रू

अखेरपर्यंत.

 

तुमच्या वाट्याला आलं फक्त अंदमान

तिथली ती यमाच्या मालकीची काळकोठडी

निरंतर अकरा वर्षे कोलू ओढणारा देह

दिवस दिवस खडीबेडीत

जखडून ठेवलेले प्राण

हाच तुमचा काळ्या पाण्याचा लेखाजोखा.

 

खिळ्याने भिंतीवर कोरलेली

कविताच होतं जणू

साखळदंडांत बांधलेलं तुमचं आयुष्य.

 

अंदमानातून सुटलात

पण शत्रूच्या मगरमिठीतून नाही

अलीपूर, भायखळा, रत्नागिरी, येरवडा

तीन वर्षात चार-चार तुरुंग

सजा चुकली नाहीच

तेरा वर्षे नजरकैदेची बेडी आणखी.

 

स्वातंत्र्याच्या शत्रूने

अखेरपर्यंत माफ केलं नाही

म्हणून तर तो इतिहासपुरुष

स्वातंत्र्यवीरम्हणतो तुम्हाला.

 

शत्रूने दिली जन्मठेप

एक नव्हे दोन दोन

आम्ही दिली एक ‘मृत्युठेप’

जिवंतपणी आणि मरणोपरांतही

आणि आमच्यासाठी केलीत तुम्ही

राखरांगोळी स्वतःच्या आयुष्याची

 

जिवंतपणी मरण भोगलेत

आता मेल्यावरही मरण भोगा

हा आमचा कृतज्ञतेचाशाप!

 

“माफ करा सावरकर”..

ओठी येते, पण अडते

कारण माफीच्या त्या डावालाही

ठोठावले त्यांनी काळे पाणी पुढे.

 

उठेल पुन्हा वणवा तेथून

चितेच्या राखेचीही भीती त्यांना

म्हणून हा अट्टाहास सारा

हा दरारा जिता राहावा..!

 

कवी:अज्ञात

प्रस्तुती: अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आम्ही मध्यमवर्गीय होतो…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आम्ही मध्यमवर्गीय होतो…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी ‘मध्यमवर्गीय’ ही जमात अस्तित्वात होती. तसं तर संपूर्ण भारतभर ती पसरली होती, पण महाराष्ट्रात तिचा स्वतःचा असा ‘ब्रँड’ होता.

घरात एक कमावता पुरुष, दोन-तीन भावंडं, नवराबायको, कुठे कुठे आजी आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला, अशी एकूण कुटुंबसंस्था होती. एक कमावता आणि खाणारी तोंडं ५-६, हे चित्र सगळीकडे सारखंच होतं. काही ठिकाणी महिलावर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता, पण आजच्याइतका नाही. म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्रीवर्गाची सत्ता होती… एकहाती सत्ता! पण तिथलं तिचं स्वतःचं एक गणित होतं… पक्कं गणित..! त्यावरच सगळे हिशोब जुळत होते.

अन्नाच्या बाबतीत, “पोटाला खा हवं तेवढं, पण नासधूस नको, ” असा शिरस्ता होता. माझी आजी नेहमी म्हणायची, “खाऊन माजावं, पण टाकून माजू नये. “

कढी, पातळ भाजी, कालवण करायची त्या दिवशी वरण कमी लावायचं, आंब्याचा रस वगैरे असेल तर भाजी कमी करायची, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्याच तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या… अशी साधी साधी समीकरणं असायची. घरातली पुरुषमाणसांची आणि मुलांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या. उरलंसुरलं त्या खाऊन घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमागरम पिठलं असायचं. इतकंही करून पोळी-भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हायचा ‘कुचकरा’ किंवा ‘फोडणीचा भात’. जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे. सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न परस्पर मिटायचा.

मुलांची शाळा म्हणजे ‘टेन्शन’चा विषय नव्हता. आपली साधी मराठी शाळा. १००-१५० रू वर्षाची फी. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे. जरा मोठाधाटा युनिफॉर्म घेतला की सहज २ वर्ष जायचा.

पुस्तकांचा जरा ‘जुगाड’ असायचा. म्हणजे समजा ‘अ’ ने दुकानातून कोरीकरकरीत पुस्तकं विकत घेतली असतील, तर तो ती पुस्तकं वर्ष संपल्यावर ‘ब’ ला ७०% किमतीत विकायचा.. अन् मग ‘ब’ तीच पुस्तकं ‘क’ ला ४०% मधे विकायचपुस्तकाच्या या ३ वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजरत महल, अहिल्याबाई अशा ‘दूरदृष्टी’च्या व्यक्तिमत्त्वाला चष्मा लागायचा, कोणाला दागिने मिळायचे, तर कोणाला दाढी मिशी यायची. आणि हे असे उद्योग अ ब क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं.

बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाजं फिरत असायची. पण शाळेत असताना, ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला बॅकवॉटर अशी Destinations मला नकाशातसुद्धा कधी भेटली नाहीत.

पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा अशी बिनडोक कामे सहसा ‘अ’ करून मोकळा व्हायचा… म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त चित्रकलेतच “स्कोप” उरलेला असायचा. आणि त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानावर यायचा…

शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागत नसत. मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं, त्यांचे दप्तर- स्वेटर वापरणं ह्यात ‘इगो बिगो’ कोणाचा आड येत नव्हता. स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा. त्यातही लहान बाळाचा स्वेटर, कपडे, दुपटे, झबले इतके फिरायचे की त्याचा मूळ मालक कोण हेही कोणाला आठवायचं नाही.

पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. मुलींना “यंदा नापास झालीस किंवा कमी मार्क्स मिळाले तर तुझं लग्न लावून देवू.. ” आणि मुलांना, “तुला रिक्षा घेवून देवू चालवायला” अशी ‘जागतिक’ धमकी मिळायची..

SSC नंतर कुठल्या शाखेकडे जायचं, कोणता कोर्स करायचा, घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली स्थळं… Proposals.. हे आजच्या काळातले ‘Highly Personal Issues’ त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिले जात. हातपाय पसरायला लागते, तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात Space. बाकी सगळा ‘लेकुरवाळा’ कारभार!!

आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा ‘बाबा’ लोकांचा प्रांत होता. प्रत्येक बाबांच्या तीनचार तरी RD, LIC काढलेल्याच असायच्या… आणि त्यासुद्धा बहुतेक वेळा एजंटवरील प्रेमापोटी! बाकी शेअर्स, Mutual Fund वगैरेचा ‘एजंट’ त्या काळी उदयाला आलेला नव्हता आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याच, तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमीशनला सुरुंग लागायचा… Share market म्हणजे जुगार.. हा ‘समज’ अगदी पक्का होता..

‘फॅमिली डॉक्टर’ हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा. आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे. तसे ते डॉक्टर पण ‘नीतिमत्ता’ वगैरे बाळगून होते. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी करायला सांगायचे नाहीत.. गरज असेल तरच करूया, पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल, असा त्यांचा ‘व्यावहारिक’ पवित्रा असायचा.

जसा ‘फॅमिली डॉक्टर’ तशीच एक फॅमिली ‘बोहारीण’ पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण.. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत.. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे. मग ही ‘बोहारिण’ एका दुपारी अवतरायची.. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने, आई जरा वैतागलेली असायची.. भलं मोठं कपड्यांचं गाठोडं विरुद्ध चहाची गाळणी अशी ‘तहा’ ला सुरवात व्हायची.. तिची गाळणी खपवायची घाई.. तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा! खूप घासाघीस करून ‘Deal’ चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची.. ह्या कार्यक्रमात २-३ तास आरामात जायचे, शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या. शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..

खरं सांगू का.. मध्यमवर्गीय ही काही ‘परिस्थिती’ नाहीये, ती ‘वृत्ती’ आहे… साध्या, सरळ, कुटुंबवत्सल, पापभीरू माणसांची. मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा ‘कणा’.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे.. आम्हीच आहोत नियमित ‘कर’ भरणारे, वाहतुकीचे काटेकोर ‘नियम’ पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत ‘मतदान’ करणारे. असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा..

अचानक १९९०-९१ मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.. ते आमच्या पर्यंत यायला १०-१२ वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याच, ‘ वादळ ‘ झालं होत.. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीयपण..

प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही… अचानक ‘प्रोफेशनल’ झालो. माणसामाणसातलं आपलेपण कोरडं झालं. कालांतराने ते भेगाळलं.

पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या. Busy Schedule, Deadlines, Projects Go Live अश्या ‘गोंडस’ नावाखाली आम्ही ते स्वीकारलं. गलेलठ्ठ पैकेजेस मध्ये गुंडाळला गेला आमच्यातला चांगुलपणा, प्रेमळपणा आणि आपलेपणासुद्धा.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ही देखील प्रथा सुरू करावी..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

ही देखील प्रथा सुरू करावी..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

आजपासून… आत्तापासून…

हॉस्पिटल = लिफाफा.

हीच खरी माणुसकीची प्रथा.

 

लग्न… मंडप सजलेला असतो. सनईचे सूर घुमत असतात.

नवरी नटून थटून बसलेली असते.

आपण मोठ्या तोऱ्यात जातो. खिशातला लिफाफा काढतो.

“नव्या संसाराला हातभार” म्हणून 500, 1000, 5000 रुपये हसतमुखाने देतो.

फोटो काढतो. स्टेटस ठेवतो.

“किती भारी आहेर दिला” याची चर्चा चार दिवस रंगते.

 

पण…

पांढऱ्या भिंती. औषधांचा दर्प.

ICU बाहेर एक बाई भिंतीला टेकून बसलेली असते.

तिची ओटी रिकामी, कपाळावरचं कुंकू पुसट होत चाललंय.

नवऱ्याचा श्वास नळीतून चाललाय.

डॉक्टर दर 2 तासांनी बाहेर येतात आणि एकच वाक्य बोलतात: “बिल भरलं का?”

 

तिच्या पोरगं मेडिकलच्या काऊंटरवर उभं राहतं.

हातात चिठ्ठी असते: “इंजेक्शन 8000 रुपये. ”

खिशात फक्त 2000.

तो गुपचूप मागे फिरतो. इंजेक्शन न घेताच.

बाप आत तडफडतोय आणि पोरगं बाहेर लाचार उभं आहे.

 

घरातलं मंगळसूत्र केव्हाच विकलं गेलंय.

बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेली FD मोडली गेलीय.

शेजाऱ्यांकडे, नातेवाईकांकडे हात पसरून झाले.

आता फक्त डोळ्यात पाणी आणि ओठावर एकच प्रार्थना: “देवा, वाचव रे माझ्या माणसाला. “

 

आणि अशा वेळी आपण जातो…

हातात दोन सफरचंदं.

टेबलावर ठेवतो आणि म्हणतो, “काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. ”

“काही लागलं तर बिनधास्त सांग. ”

 

खरंच?

बिनधास्त सांगू?

“वहिनी, 50 हजार कमी पडतायत, द्याल का?” असं विचारायची हिंमत आहे का तिच्यात?

नाही. ती फक्त मान डोलावते आणि आतल्या आत मरते.

 

आपण निघून येतो. गाडीत बसतो.

“बिचारी” म्हणून एक सुस्कारा टाकतो.

आणि घरी येऊन जेवण करतो.

 

पण तिचं जेवण?

तिच्या पोरांचं जेवण?

हॉस्पिटलच्या बिलाने त्यांच्या ताटातला घास हिरावून घेतलाय.

 

जिथे ढोल ताशे आहेत, तिथे आपण लाखो उधळतो.

आणि जिथे व्हेंटिलेटरचा ‘बीप बीप’ आवाज येतोय, मृत्यू दारात उभा आहे, तिथे आपण 100 रुपये द्यायलाही दहा वेळा विचार करतो.

 

ही कुठली माणुसकी? ही कुठली रीत?

 

आज शपथ घ्या…

पुढच्या वेळी कुणी आजारी असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, तर रिकाम्या हाताने जायचं नाही.

लिफाफा न्यायचाच. 100 रुपये असले तरी चालतील.

कारण तो लिफाफा नसतो… तो ‘श्वास’ असतो.

“तू लढ, मी आहे सोबत, ” हा दिलासा असतो.

 

कदाचित तुमच्या त्या लिफाफ्यामुळे…

एका बापाला त्याची पोरं पुन्हा “बाबा” म्हणू शकतील.

एका नवऱ्याला त्याची बायको पुन्हा “अहो” म्हणू शकेल.

एका पोराला त्याची आई पुन्हा जेवू घालू शकेल.

 

लग्नातला आहेर लोक विसरतात हो…

पण स्मशानाच्या वाटेवरून परत आणणारा आधार, माणूस मेल्यावरही विसरत नाही.

 

ही प्रथा सुरू करा.

कारण उद्या काळाने घाला घातला आणि तुमचाच माणूस त्या बेडवर असेल…

तेव्हा तुम्हाला कळेल की ‘Get Well Soon’ च्या कार्डापेक्षा 500 च्या नोटेची किंमत काय असते.

 

आजपासून… आत्तापासून…

हॉस्पिटल = लिफाफा.

हीच खरी माणुसकीची प्रथा.

 

वाचून डोळे पाणावले असतील तर नक्की शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्यातरी घरचा दिवा विझायचा थांबेल…

 

लग्नातला आहेर मिरवला जातो,

आजारपणातला आधार जपला जातो.

कारण मृत्यूच्या दारात उभा असताना,

माणूसच माणसाचा देव असतो.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वामी विवेकानंद म्हणतात… – लेखक: स्वामी विवेकानंद ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ स्वामी विवेकानंद म्हणतात… – लेखक: स्वामी विवेकानंद ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)

धर्मसंबंधीच्या सर्व संकुचित, मर्यादित, कलहप्रसू, आक्रमक कल्पना आता लयास जावयास हव्यात. धर्मसंबंधीच्या साऱ्या पंथनिष्ठ, जमातनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ कल्पना टाकून द्यावयास हव्यात. प्रत्येक जाती-जमातीचा फक्त स्वतःचा असा एकेक विशिष्ट देव असावा आणि स्वतःखेरीज इतर सगळ्यांचा देव खोटा आहे असे प्रत्येकाने मानीत असावे ही भ्रामक, वेडगळ समजूत आता भूतकाळात जमा व्हावयास हवी. असल्या सगळ्या कल्पनांचा सपशेल त्याग करावयास हवा.

धर्मांनी समावेशक वृत्ती धारण केली पाहिजे, ईश्वरविषयीच्या त्यांच्या विशिष्ट कल्पना इतरांहून वेगळ्या आहेत एव्हढ्याचसाठी त्यांनी तिरस्काराने एकमेकांना तुच्छ न लेखले पाहिजे. मी आपल्या आयुष्यात अशी कितीतरी धार्मिक माणसे पाहिली आहेत, अशी समंजस माणसे पाहिली आहेत की ज्यांचा ईश्वरावर, आपण त्या शब्दाचा जो अर्थ करतो त्या अर्थाने मुळीही विश्वास नाही. कदाचित तुम्हा-आम्हाला कधी कळू शकला असेल त्यापेक्षा कितीतरी चांगल्या रीतीने ईश्वर त्यांना कळला आहे.

धर्मांनी, त्यांच्या ठायी प्रचंड शक्ती वसत असल्यामुळे, जगाचे भले करण्यापेक्षा त्याचे नुकसानच जास्त केले आहे, आणि असे होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा संकुचितपणा आणि विशिष्ट सीमांमध्येच घुटमळत राहण्याची त्यांची प्रवृत्ती.

– स्वामी विवेकानंद (पुस्तक- ज्ञानयोग, पान नंबर 15 आणि 16)

लेखक: स्वामी विवेकानंद

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “व्हाट्सऍपची काठी” –  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “व्हाट्सऍपची काठी” –  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित 

उतार वयात  मिळाली

व्हाट्सऍपची काठी !

कपाळावरची मिटली

आपोआप आठी !

 

वेळ कसा जातो आता

हेच कळत नाही !

वर्तमान पत्राचं पानसुद्धा

हल्ली हलत नाही !

 

चहा पिताना लागतो

व्हाट्सऍप हाताखाली !

डाव्या बोटाने हलके हलके

मेसेज होतात वरखाली !

 

कुणाचा वाढदिवस आहे ?

कोण आजारी आहे ?

कोण चाललंय परदेशात

अन काय घडतंय देशात ?

 

कधी लताची जुनी गाणी तर

कधी शांताबाईंची कविता !

बसल्या बसल्या डुलकी लागते

कधी एखादी गझल समोर येते ! 

 

टीव्हीवरचं चॅनेलसुद्धा

हल्ली बदलत नाही

व्हाट्सऍपशिवाय आमचं

पान जरासुद्धा हलत नाही !

 

वय जरी होत चाललं

हातपाय जरी थोडे थकले !

तरी व्हाट्सऍपच्या औषधाने

मन मात्र रिलॅक्स झाले !

 

आता फार काळजी करत नाही

आता चिडचिडसुद्धा होत नाही !

व्हाट्सऍपचा मित्र भेटल्यापासून

आता मनातसुद्धा रडत नाही !

 

आनंदी कसे  जगायचे याचे

आता कळले आहे तंत्र !

व्हाट्सऍपच्या या जादूच्या

काठीने दिला सुखाचा मंत्र.

  

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares