मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एका टिंबामुळे पडणारा फरक…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ “एका टिंबामुळे पडणारा फरक…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

एका टिंबामुळे पडणारा फरक – –

आवरण आवरणं / साधणं सांधणं / शीळ शिळं / यात्रिक यांत्रिक / संख्या सख्या / निश्चित निश्चिंत / 

खाण खाणं / मेल मेळ मेलं / भाग भांग / हरण हरणं / देणं देण / वार. वारं / दगा दंगा / हंस ह्स / 

कस कसं / जात जातं जाते / सध्या संध्या / नागर नांगर / याच याचं / जंगले जगले / मंद मद / तळ तळं / एकात एकांत / संख्या सख्या सख्ख्या / जाळ जाळं / खोटं खोट / साग सांग / वदन वंदन / सार सारं / 

भाग भांग / पांडू पाडू /जून जुनं / शिक शिंक / भरत भरतं / खात खाते खातं / कस कसं / कडं कडे / बाधणे बांधणे / आयत आयतं / गड गंड / माडी मांडी / साधे सांधे / अशात अशांत / कायमच कायमचं / दुसऱ्याच ( दिवशी ) दुसऱ्याचं / सार सारं / डाबर डांबर / त्याच त्याचं त्याचे / स्वतःच स्वतःचं / ढंग ढग /

रग रंग / याच याचं / डाव डावं / कळत कळतं / जाण ( समज ) जाणं / होत होतं होते / बाधा बांधा / भांडं भाडं / बेबी बेंबी / नकोस नकोसं / संबंध सबंध / मंजूर मजूर / वश वंश / कोंबी कोबी

आडनावं = शेडगे शेंडगे, पागे पांगे, गावडे गावंडे

आहे की नाही गम्मत…….

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चोर – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चोर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

कालच इयत्ता सातवीची परीक्षा घेतली होती. त्या मध्ये एका विद्यार्थ्याने ‘ चोर ‘ या विषयावर लिहिलेला निबंध ….

” चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे “

लोकांना हे खोटे वाटते, पण लक्षात ठेवा…..

चोरामुळे तिजोरी आहे, कपाट आहे, त्यांना लॉक आहे,

चोरामुळे खिडकीला ग्रील आहे, घराला दरवाजा आहे, दरवाजाला कुलूप आहे, बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे,

चोरामुळे घराला/सोसायटीला कंपाउंड आहे, त्याला गेट आहे, गेटवर वॉचमन आहे, वॉचमनला वर्दी आहे,

चोरामुळे CCTV कॅमेरे आहेत, मेटल डिटेक्टर मशीन आहेत, चोरामुळे सायबर सेल आहे,

चोरामुळे पोलीस आहेत, त्यांना पोलीस स्टेशन आहे, त्यांना गाड्या आहेत, काठ्या, पिस्तुल आणि बंदुका आहेत, त्यात गोळ्या आहेत,

चोरामुळे न्यायालय आहे, तिथं जज आहेत, वकील आहेत, शिपायापासून कारकून आहेत,

चोरामुळे तुरुंग आहे, जेलर आहे, जेलमध्ये शिपाई आहेत.

मोबाईल, लॅपटॉप, तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सायकल, बाईक, कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नवीन वस्तू खरेदी करतो, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो,

चोर शब्दामुळे भाषेतील साहित्यकृतींमध्ये भर पडण्यास हातभार लागला आहे.

अलीबाबा चाळीस चोर ही कथा, प्रेम कथांमध्ये हमखास येणारा चोरटा कटाक्ष, चित्तचोरटी, क्रिकेट मधील चोरटी धाव व चोराची आळंदी हे गाव… यासारखे शब्दप्रयोग याची सर्वश्रुत उदाहरणं आहेत.

चोराच्या वाटा चोराला ठाऊक /चोरावर मोर /चोराच्या मनात चांदणे /चोर सोडून संन्याशाला सुळावर देणे /काडी चोर तो माडी चोर /चोराच्या उलट्या बोंबा /चोरांच्या हातची लंगोटी/ चोर तो चोर वर शिरजोर/ चोर चोरीसे जाये पर हेरा-फेरीसे न जाये…… यासारख्या अनेक म्हणी… यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे.

चित्रपटसृष्टीला अर्थ, प्रसिद्धी मिळवून देणारे चोरी मेरा काम / चितचोर /चोर मचाये शोर / चोरोंकी बारात यासारखे अनेक लोकप्रिय चित्रपट… अशा कित्येक घटकांना अस्तित्वात असणाऱ्या “चोर” या शब्दाचं सहाय्य मिळालं आहे.

राजकीय चोरांमुळे मात्र अर्थ-व्यवस्थेला कोणताही फायदा नाही….. ते फक्त स्वतः साठीच जगत असतात.

लेखक : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मला दुबईत भेटलेले पु. ल. …” – लेखक : श्री प्रशांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “मला दुबईत भेटलेले पु. ल. …” – लेखक : श्री प्रशांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

८ नोव्हेंबर. पुलं चा वाढदिवस. त्यानिमित्ताने पुलंनी दुबईच्या महाराष्ट्र मंडळात कथा कथनाच्या रूपाने पहिला परदेश दौरा केला. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. त्यांचा सहवास लाभला. 1982 सालची ही आठवण.

दुबईच्या एअरपोर्ट समोर त्यावेळचे दुबई इंटरनॅशनल हॉटेल चे भव्य सभागृह दुबई महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांनी खच्च भरले होते. सर्वांना उत्सुकता होती ती महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना डोळे भरून पाहण्याची. आतापर्यंत पुस्तकातून भेटलेले पुल प्रत्यक्ष भेटणार होते. ‘हसवण्याचा माझा धंदा’ या कार्यक्रमातून ते आपल्या काही कथा साभिनय सादर करणार होते. या आधी पुलंना वाऱ्यावरची वरात, बटाट्याची चाळ या सारख्या प्रयोगातून बघितलेले ही काही भाग्यवंत मंडळात होतेच. त्यांच्या कडून पुलं बद्दल खूप काही कौतुकास्पद गौरव उदगार कानी आले होतेच. पण आज मात्र मंडळाचे पदाधिकारी कॉलर ताठ करून फिरत होते. त्याला कारणही तसेच होते. मंडळाच्या आठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतातून एका नामवंत कलाकाराला आमंत्रित करण्यात आले होते. आणि तो कलाकार सर्वांचे आवडते पुलं असावे हा एक सुंदर योगायोग होता. तत्पूर्वी मंडळाचे कार्यक्रम हे स्थानिक कलाकारांचे नाटक, गणेशोत्सव, वार्षिक सहल यापुरते मर्यादित असायचे. पण यावर्षी पुलं ना आमंत्रित करून मंडळाने एका नवीन पर्वाला सुरुवात केली होती. त्या पर्वाचे साक्षीदार होण्याचे भाग्य ज्या सभासदांना लाभले ते हा क्षण डोळ्यात साठवून आयुष्यभर आठवण म्हणून जपून ठेवणार होते. (पुलं च्या ‘चित्रमय पुलं’ या पुस्तकात पुलं च्या दुबईतील पहिल्या वहिल्या परदेश दौऱ्याच्या पोस्टर च फोटो अंतर्भूत केला आहे. )

कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच सांगण्यात आले की ‘जर कोणी हा कार्यक्रम रेकॉर्ड करताना आढळला तर कार्यक्रम थांबवण्यात येईल व टेपरेकॉर्डर जप्त करण्यात येईल. ‘उपस्थित या अनाउन्समेंट चा अर्थ लावत असतानाच कार्यक्रमाला सुरुवात देखील झाली. पुढचे दोन अडीच तास सभागृह हशा टाळ्यांनी एवढे दणाणून गेले की मगाचच्या अनाउन्समेंटचा सर्वांना विसर पडला.

कार्यक्रम पार पडल्यावर पुलं पण खुश होते. आखाती देशातील त्यांचा पहिलाच कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. प्रेक्षकांच्या गराड्यात असताना कोणीतरी मगाचच्या अनाउन्समेंट विषयी विचारले, तेव्हा पुलं म्हणाले, ” अहो, त्याचे काय आहे, कधीतरी अशा कार्यक्रमात बोलण्याच्या नादात विनोदाने एखादया नेत्याविषयी विनोद म्हणून काहीतरी बोलले जाते. ते तेवढ्यापुरतेच घ्यायचे असते. पण काही जण असे कार्यक्रम रेकॉर्ड करून त्या नेत्यापर्यंत पोहोचवतात, पुलं तुमच्याबद्दल जाहीरपणे असे बोलतात. असे सांगून कान भरले जातात. मग तो नेता नाराज होतो. म्हणून मला अशी काळजी घ्यावी लागते. ” पुलं च्या या खुलाशाने मात्र या सभासदांचे समाधान झाले आणि पुढील आठ दिवसांचा पुलं चा दुबई मुक्काम दिलखुलास होणार याची खात्री पटली. पण यात आणखी एका आनंदाची अचानक भर पडणार आहे याची कोणाला कल्पना होती?

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सात वाजता दुबई प्लाझा हॉटेल मध्ये पुलं चा पेटीवादनाचा आणि सभासदांसोबत गप्पांचा प्रोग्राम ठरला होता. पण त्यावेळी मिळालेल्या पेटीचे आणि पुलंचे सूर काही जुळले नाहीत. म्हणून पेटी बाजूला सारून पुलं गप्पा मारायला बाह्या सरसावून बसले. तेवढ्यात तिथे त्याकाळच्या रेडिओवरचे बादशाह, निवेदक अमीन सयानी यांचे आगमन झाले. त्याचे झाले असे की रेडिओच्या काही कामानिमित्त अमिनजी शारजाला होते. त्यांना पुलं दुबईत असल्याचे समजल्यावर ते पुलं ना भेटायला आले होते. दोघांची दिल्लीत ऑल इंडिया रेडिओ पासूनची ओळख होती. पुलं त्यांना सिनियर म्हणून पुलं ना ते ‘दादा’ म्हणत होते. मग तेही पुलंच्या बाजूला मांडी घालून बसले आणि दोघांच्या अनौपचारिक गप्पांना सुरुवात झाली. साक्षीदार होतो आम्ही. हातात माईक येताच अमीनभाईंनी पुलं ना काहीतरी प्रश्न विचारताच पुलं पटकन हात जोडत म्हणाले, ” ए बाबा, मेरा interview वगैरे मत लेना! ”

हसत हसत अमिनभाई म्हणाले, ” खैर, दादा अब तो छोड देता हुं, लेकिन इंडियामे मिले तो नही छोडूंगा! “ मग थोडा वेळ गप्पा मारून ते निघून गेले. त्यानंतर मात्र पुलंचे सभासदांच्या घरी जेवणाचे वार लागले. रोज कोणा ना कोणाकडे तरी आमंत्रण असायचे. जेवणाबरोबर गप्पांचा फड पण रंगायचा.

एकदा एकाकडे असाच जेवणाचा बेत ठरला होता. पुलं वेळेवर हजर होते. गप्पा सुरूच होत्या. पण जेवणाची वेळ टळून चालली होती. कोणीतरी यजमानांना जेवणाची आठवण करून दिल्यावर ते म्हणाले,

‘एक मित्र येणार होते त्यांची वाट पाहतोय. ‘ पुलं पटकन मिश्कीलपणे म्हणाले, ‘ मलाच जेवायला बोलावलंय ना? ‘ त्या प्रश्नातच यजमानांना काय समजायचे ते समजले.

एके दिवशी पुलंच्या प्रकाशकाचे एक स्नेही पुलं ना भेटायला आले आणि घरी चलण्याची गळ घालू लागले. बोलता बोलता पुलं ना म्हणाले, ” माझ्याकडे B & O ची म्युझिक सिस्टिम आहे, त्यावर तुम्हाला कुमारांचे गाणे ऐकवतो. कुमारांचे गाणे कोळून प्यालेले पुलं म्हणाले, “अहो, गाणे जर समजत असेल तर साध्या टेपरेकॉर्डरवर देखील चांगले वाटते. त्यासाठी म्युझिक सिस्टिमच कशाला हवी? “ असे बोलून पुलं नि त्याला कसेबसे (पि)टाळले.

पुलं च्या सहवासातले ते दिवस हा हा म्हणता सरले. जाताना मंडळाच्या अध्यक्षांनी मानधनाची ठरलेली बिदागी म्हणून 1001 दिरहामचे पाकीट पुलं च्या हातात ठेवले. पुलं नी ते बघितले आणि अध्यक्षांना म्हणाले, ” तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी मानधन 1001 रुपये असे सांगितले होते. दिरहाम नाही “. (त्यावेळी 1 दिरहाम ला 2 रुपये असा exchange rate होता. )

अध्यक्षांनी नम्रपणे सांगितले की “ हो आम्हाला माहीत आहे पण आम्ही आनंदाने ही बिदागी तुम्हाला देतोय”. सांगितलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम मिळत असतांना पुलंचा हा सालस प्रामाणिकपणा सर्वाना स्पर्शून गेला.

दुबईहून गेल्यानंतर काही दिवसांनी पुलं चे पत्र आले त्यात सर्वांचे आभार मानत असताना पुलंनी लिहिले होते की …. ” लहानपणी आयुष्यात वारावर जेवायची वेळ कधीच आली नव्हती.. ती पाळी दुबईत आली आणि तेव्हा प्रत्येक भगिनींच्या घरी जेवायला जाताना भाऊबीज असल्यासारखे वाटत होते. “

एका घरी गप्पा मारताना पुलं असेच सहज म्हणाले होते, “ तुम्ही वसंतराव देशपांडेंना बोलवा. मी त्यांच्या बरोबर पेटी वाजवायला येईन. ”सर्वांना ही कल्पना पसंत पडली होती. पण हे होणे नव्हते. पुढच्याच वर्षी वसंतराव गेले अन ती कल्पना पोरकी झाली. शेवटी प्रत्येक कार्यक्रमाचे पण नशीब असते!

असाच एक कार्यक्रम पुलं च्या पंचाहत्तरी निमित्त दुबईत करायचा ठरला. नावही पुलंना साजेसेच दिले गेले “पुलंदाजी”.. पुलंच्या साहित्यावर कार्यक्रम करायला त्यांनीही आनंदाने परवानगी दिली. कार्यक्रमानंतर ठरलेले मानधन द्यायला मित्र त्यांच्याघरी गेला. त्या दिवशी तारीख होती 6 डिसेंबर (बाबरी मशीद घटनेचा दिवस). बोलता बोलता पुलंना त्या तारखेची आठवण होऊन ते सुनीताबाईना म्हणाले,

“अगं, आज त्या बाबरी मशिद चा वाढदिवस ना? “ सुनीताबाईना त्या घटनेचा वाढदिवस हा उल्लेख आवडला नाही. तसे त्यांनी म्हणताच पुलं पटकन म्हणाले, “ठीक आहे, वाढदिवस नाही तर ‘पाडदिवस’ म्हण हवे तर. ” 

त्या वयातही पार्किन्सन्स च्या आजाराने ग्रासलेल्या पुलंची विनोदबुद्दी, हजरजबाबीपणा शाबीत राहिला होता.

पुलं च्या सुरुवातीच्या काळातील पुस्तकांवर पारल्यातील घराचा अजमल रोड असा पत्ता असे. यानंतर पुण्याला गेल्यावर 777 रुपाली असा झाला आणि नंतर मालती माधव. घर बदलत गेले तसे त्यांचे पत्तेही बदलत गेले पण पत्याचा धनी मात्र एकच होता… ‘ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ‘!

… आता चौवीस वर्षें झाली ह्या धन्याचा पत्ता बदलून पण पत्त्याचा धनी आमच्या मनात कायमचा घर करून बसलाय.

 

लेखक : श्री प्रशांत कुलकर्णी, अबुधाबी

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अशीही एक अनोखी आदरांजली… – लेखक : श्री अभिषेक ढिले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ अशीही एक अनोखी आदरांजली… – लेखक : श्री अभिषेक ढिले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

– – कथाकथनाचा एक मंच आहे. मंचावर एक लाकडी पोडियम आहे. पोडीयमच्याच मागे लाकडी स्टूलावर पाण्याचे तांब्या – भांडे ठेवले आहे…

… सगळ्याचा आनंद घेत माझ्यासारखे भक्तरूपी श्रोते कथाकथनाचा आस्वाद घेत आहेत… कार्यक्रम पुण्यात असून सगळे वेळेवर पोहोचले आहेत… याचं कारण म्हणजे तारमास्तरांनी बहुदा दिलाचा तगादा कुणाचाही पत्ता न चुकवता पाठवला असावा…

गाडी लेट झाल्याने मधु मनुष्टे आणि सुबक ठेंगणी मागच्या लाइनीत जोडीनं बसले आहेत. त्यांच्याच बाजूला उस्मान शेठ आपल्या फॅमिलीसोबत आम्लेट खात आहेत. बसायला जागा न मिळाल्यामुळे आपले बिस्तरे थिएटराच्या नैऋत्येला अंथरून बगू नाना, झंप्या आणि अनुभवी मंडळी यांची चार तासांची निश्चिंती झाली आहे. मास्तर आत येतानाच टॅनिक युक्त चहा घेऊन आले आहेत…

मधेच कुठूनतरी रावसाहेबांचं साताच्या वर हासू ऐकू येऊन त्यावर “हाण तुझ्या xxx” अशी जोरदार दाद देखील येत आहे.

अंतुबरवा तर आज स्वतःहून तिकीट काढून आले आहेत. एव्हाना त्यांच्या दाताचा संपूर्ण अण्णू गोगट्या झाला असला तरी त्यांच्या येण्याने त्यांच्याकडचा गंगेचा गडू शाबूत असल्याची खात्री झाली आहे…

श्री अभिषेक ढिले

कोणी एक कुळकर्णी दिवाळी अंकातल्या बाईचं चित्रं पहावं तसं समोर बघत आहे आणि विनोद ऐकताच “पाताळविजयम” नाटकातल्या राक्षसासारखा हसत आहे. शेजारच्या गटण्याला तर तो माणूस कम शैतान वाटत असल्याने गटणे त्याच्याकडे केवळ भूतदयेने बघत आहे.

गटणे आता साहित्याशी आणि जीवनाशी पूर्णपणे एकनिष्ठ झाला असावा. कारण, कार्यक्रमाला तो सहकुटुंब उपस्थित आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पुढारीसाहेब मधूनच उठून सर्वांना नमस्कार (कुणाचे लक्ष असो वा नसो) करून दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याकरता निघाले आहेत. त्याच वेळेस दारातून गडबडीत असणारा नारायण लग्नाची खरेदी उरकून सगळ्या माम्यांना घेऊन आत शिरत, कोपऱ्यातल्या राखीव जागेत ‘आणि मंडळीं’मध्ये जाऊन बसला आहे…

आज चक्क चक्क पोस्टमास्तर पहिल्या रांगेत अखंड दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्ट दिसत आहेत. डिलीव्हरीच्या चिंतेतल्या माणसाला हसताना पहायचा हाच तो योग…

कधी नव्हे तर पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर चक्क शेजारी बसले आहेत. एवढचं काय तर प्राध्यापक भांबुर्डेकर, प्रा. येरकुंडकरांसोबत सलगी करत आहेत. चितळे मास्तर जणू हरिवंश ऐकल्यासारखं कथाकथन ऐकत आहेत… मध्येच पेस्तनकाका नाकात तपकिर घालत आहेत. असल्या नल्ल्या हरकतीमुळे पेस्तनकाकी हळूच पेस्तनकाकांना चिमटा काढत आहेत.

थिएटरच्या बाहेरच्या गेटवर बसलेला कावळा येणाऱ्या जाणाऱ्याला “काय झालं का जेवण, काव काव” असं विचारत आहे.

देव गाभाऱ्यातून बाहेर यावा, तसा चौकातला पानवाला सुद्धा ठेला बंद करून आला आहे.

… आणि…

… आणि या सगळ्यांच्यासमोर आमचं पु. ल. दैवत निष्काम कर्मयोगाने कथाकथन सादर करत आहेत…

“अरे देवव्रत, तुला पुराव्याने शाबित करुन सांगतो. देवळात गेल्यावर मनाला एक प्रकारची प्रसन्नता, भव्यता, दिव्यता वैगरे काय काय वाटतं ना तसचं वाटतं होतं. आम्हाला साक्षात कृष्णाच्या तोंडून डायरेक्ट गीता ऐकल्यासारखं वाटतं होतं. “

… आम्हाला सांगत होते ना हरितात्या… पुरूषोत्तमबद्दल…

लेखक : श्री अभिषेक ढिले (देवव्रत) 

प्रस्तुती:सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक प्लेट दोस्ती”… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ “एक प्लेट दोस्ती”… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

आज प्रथमच मी ‘ हॉटेल मैत्री ‘ मध्ये एकटी जेवायला गेले. खरं तर घरात जेवण तयार होते पण एकटे जेवायचा कंटाळा आला होता. … उगाssच.. विशेष काही नाही.

मी नेहमी कॉर्नरचे टेबल पकडते, एकतर दुसरे काय ऑर्डर करतात हे कळते आणि मी किती हादडून खाते हे कुणाला दिसत नाही. नेहमीचा वेटर पाणी टेबलावर ठेवून म्हणाला, ” काय मॅडमआज एकट्याच? “ त्याने मेनू कार्ड हातात दिले.

(थोड्या वेळाने) वेटर, ” मॅडम ऑर्डर ?? ”

पाणी पिता पिता कुठेतरी त्याचा प्रश्न डोक्यात होताच.

“आज एकट्याच !!? ” वेटर नेहमीचाच आणि आमच्या मैत्रिणींचा अड्डा बर्‍याच वेळा इथे जमतो त्यामुळे तो मला बर्‍यापैकी ओळखत असे.

मेनू कार्ड त्याच्या हातात देवून म्हणाले, “ एक प्लेट दोस्ती “ … मी थोडे खोचकपणे सांगितले

” नक्की मॅडम ? “.. त्याने मात्र मिश्किलपणे हसत उत्तर दिले..

थोड्या वेळाने हातात मोठी स्पेशल महाराजा थाळी घेऊन तो आला म्हणाला,

“ मॅडम, घ्या.. “मैत्री स्पेशल”…. ह्या थाळीच्या साम्राज्यात आपले दोस्त नक्कीच आहेत … पदार्थ आणि पक्वान्नच्या स्वरुपात. ”

‘ मीठ??? ‘

माझ्या चेहर्‍यावरचा प्रश्न त्याने लगेच हेरला

” मॅडम असे दोस्त नसले तर आयुष्य बेचव, पण अश्यांबरोबर प्रमाणापेक्षा जास्त दोस्ती कधी BP वाढवतील सांगता येत नाही. बरोबर ना मॅडम ? ”

मला हसू यायला लागले

*लिंबू* … कितीही म्हणा.. वयाच्या प्रतेक टप्यात एक आंबट मित्र /मैत्रीण ही असतेच. पण ती छोट्या लिंबाच्या फोडीइतकीच ठीक.. नाहीतर कधी तुमची विकेट उडवेल सांगता येत नाही. (स्वानुभव )

मॅडम, *चटणी * …. एखादी स्पष्ट बोलणारी मैत्रीण भली झणझणीत असते. मैत्री म्हणजे नेहमीच ” तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ” नाही. ‘ तुला अक्कल नाही. मूर्ख,,’, असं वेळप्रसंगी म्हणणारी…. पण दिसते तशी असते. कपट कुठे नाही… खरे आहे ना?

*कोशिंबीर* … ह्या मैत्रिणी सतत अलिप्त. स्वतः ला सांभाळून नेहमी कोपर्‍यात. WHAT’S APP ग्रुप च्या मूक सदस्या.

*पापड* … बापरे … या डेलीकेट डार्लिंग मैत्रिणीला मी स्वतः फार लांब ठेवते. अहो अति emotinal. पटकन तुटतात. पसारा सांभाळेपर्यंत नाके नऊ येतो.

….. मी पानातून बाहेर काढला … सांगितले, “ नको रे बाबा पापड पसारा. ”

मॅडम, *भजी* घ्या,….. अगदी सुटसुटीत. स्वतः च्या मस्तीत मस्त असणार्‍या मैत्रिणी. बेफिकिर पण सगळ्यांच्या आवडत्या.

*लोणचे*.. कधी आंबट कधी गोड, पण त्यांची जित्याची ती खोड, पण जरूरी असते एखादी *फोड * खरं आहे ना??

*चपाती किंवा भाकरी* … अतिशय मेहनती, सोशिक, पण बरेच काही बोध देतात. अतिशय साध्या, कुठे ही भपका नाही. मी बरे की माझी राहणी बरी. प्रकृतीला उत्तम. आयुष्यभर आपल्याला ह्यांची गरज … आणि त्यांना, तुमची काळजी असते पण गरज नसते.

*भाजी*.. रूपे भरपूर बदलेल पण तुमची साथ कधी नाही सोडणार. कधी *फतफते’ ल देखील पण तुमच्या आजूबाजूला नक्की घुटमळणारा हमखास पदार्थ.

*आमटी*.. ज्या वाटीत पडेल त्या वाटीचा आकार घेणारी… प्रत्येक प्रसंगाला आपले रूप बदलणारी पण प्रसंग सांभाळून नेणारी.

*गोड पदार्थ* …. अश्या मैत्रिणी तुम्हाला कधी एकट्या सोडत नाहीत. अगदी दुःखाच्या प्रसंगी देखील. कधी लाडवाच्या रुपात कधी खिरीच्या स्वरुपात.

*ताक किंवा सोलकढी* … अशासारखी मैत्रीण फारशी महत्वाची नसते, पण नसून ही चालते कधी कधी आयुष्यात अपचन फार झालं की शेवटी ह्याच उपयोग पडतात. प्रत्येक प्रसंगाची यथेच्छ चहाडी आणि उलटी यांच्याकडे करू शकतो. (थोडक्यात मन आणि पोट दोन्ही साफ)

*वरण भात.. दही भात* …. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत साथ देणार्‍या मैत्रिणी. त्या आपली भूमिका मस्त पार पाडतात. तुमच्या आयुष्यातील गोळा बेरीज याचा त्यांच्याशी काही संबंध नाही.

*मसालेभात.. साखरभात* …. अश्या मैत्रिणी ह्या एखाद्या कार्यक्रमाला किंवा प्रसंगाला हजेरी लावणार. पण त्या वेळी. आपली झलक दाखवून मनावर ठसा उमटवून जातात… पण नंतर आपल्याच लक्षात येईल की अश्या मैत्रिणी ह्या तेवढ्यापुरत्याच बर्‍या. दररोज अशांची मैत्री खुद्द आपल्याला परवडणार नाही.

….. स्वतःशीच हासत माझ्या मैत्रीच्या साम्राज्यात अगदी मग्न होते. इतक्यात वेटर भाजीचा चौफुला घेऊन आला……

“ मॅडम, थोडी उसळ? ”

मी, “अरे उसळ तर थाळीमध्ये नव्हतीच. “

“ मॅडम, प्रवासात किंवा सहज मार्केटमध्ये अचानक दोस्ती होते. ” … पण भाजीसारख्या मैत्रिणीची जागा कोणी घेऊ शकत नाही. उसळ ती शेवटी उसळच.

आयुष्याचे ताट गोड, आंबट, तिखट मैत्रिणींमुळे अगदी चविष्ट झाले होते.

“ मॅडम “ … seasonal स्वीट, आमरसाची वाटी घेऊन वेटर उभा

” नको असे दोस्त, स्वतः च्या सोयी प्रमाणे आयुष्यात येणारे.. ”

“ मॅडम, त्यांची देखील काही मजबूरी असू शकते. “.

” इतकी मजबुरी? ना दुःखात.. ना सुखात … फक्त स्वतः च्या सोई प्रमाणे? ”

*जिलेबी* सारख्या भल्या वेड्या वाकड्या असतील, गुलाबजामसारख्या भले रंगाने काळ्या असतील, पण रसगुल्लासारख्या अगदी सफेद स्वभावाच्या मैत्रिणी आहेत या थाळीत. नको असे seasonsl स्वीट दोस्त. ”.

वेटर …. ” मॅडम, त्यांचे महत्व पटले तुम्हाला ते ह्या seasonal आमरस मुळे ना. ? नाही म्हणू नका एखादी वाटी घ्याच. सोबत पुरी देखील आहे. ”

….. ह्म्म,,, हे असे दोस्त नेहमी इम्प्रेशन मारण्यासाठी एखादी चमची घेऊन फिरत असतात.

जेवण पूर्ण झाले. मस्त कालवून भुरका मारून सर्व मित्र मैत्रिणींची आठवण करून थाळीचा आस्वाद घेतला.

पण ताटाच्या बाहेर असलेले *काटे आणि चमचे?? *…. टोचून बोलणार्‍या आणि उगाच ढवळाढवळ करणार्‍यांना मैत्रीण ना.. थाळीतील दोस्तापासून दूर ठेवते. नाही म्हटलं तरी त्यांच्यात देखील एखादा चांगला गुण असतो. तितकाच पहायचा बाकी दुर्लक्षित करणे.

हात धुवून पेल्यातून पाणी प्यायले. असेही काही दोस्त असतात ज्यांची नावे माझ्या ओठावर सतत असतात. अगदी पाण्यासारखी निर्मळ मैत्री.

… आज मस्त पोटभर जेवले बघा…  तुम्हाला कशी वाटली ही माझ्या दोस्तीची चविष्ट थाळी?

बडीशेप, पान खाल्ले ?

मssssग… भरा बिल आता।

अहो किती काय ? …

… ह्या दोस्तीच्या थाळीची किंमत…??? … ” अमूल्य “.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फक्त सेल्फी काढण्यापूरते हासरे चेहरे ठेऊ नका !”….लेखक : श्री विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? वाचताना वेचलेले ?

☆ “फक्त सेल्फी काढण्यापूरते हासरे चेहरे ठेऊ नका !”….लेखक : श्री विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

आपल्या आयुष्यातील आनंद, सुख, समाधान हे प्रामुख्याने कशावर अवलंबून असतं ? 

तुम्ही अवतीभवतीची नाती कशी जपता, नाती कशी टिकवता यावरच सारं काही अवलंबून आहे.

दैनंदिन जीवन जगतांना दोन्ही प्रकारची नाती जपता आली पाहिजेत … 

दोन्ही प्रकारची नाती म्हणजे – – रक्ताची नाती आणि परिचिताची नाती. ( म्हणजे रक्ताची नसलेली. )

समोरची व्यक्ती जर आपल्या मनासारखं वागत असेल तर ते नातं सहज जपल्या जातं, ते नात फुलतं आणि टिकतं. परंतु प्रत्येक नात्याच्या बाबतीत असं होत नसतं. म्हणजे समोरची व्यक्ती आपल्या मनासारखं वागत नसली तरीही नातं टिकवता आलं पाहिजे !

 

म्हणजे नाती जपण्यासाठीचा Common minimum प्रोग्राम राबवता आला पाहिजे, तरचं नातं टिकत असतं ! – – समोरच्या व्यक्तीच्या मनासारखं, 100 टक्के जरी वागता आलं नाही, तरी किमान 50 / 60 टक्के तरी मनासारखं वागण्याचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हायला पाहिजे !

 

नवरा-बायको, भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ, सासू-सून, नणंद-भावजय अशी सर्वच नाती टिकवण्यासाठी आपल्याला तडजोडी कराव्या लागतात आणि त्या करता आल्या पाहिजेत. ( याचा अर्थ समोरचा कसाही वागत असेल तरीही adjust करा, असा मुळीच नाही. )

 

कोणाकडूनच काहीही अपेक्षा ठेऊ नये….. हे वाक्य बोलण्यापुरते ठीक आहे, पण प्रत्यक्षात असं होत असतं का ? 

या प्रश्नाचं खरं उत्तर ” नाही ” हेच आहे ! आणि असा जर कुणी आपल्या पहाण्यात असेल तर तो देवमाणूस समजावा. आपल्या अवतीभवतीच्या कोणत्याच नात्याकडून काहीच अपेक्षा न ठेवणं ही कला साधण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत ….. आणि या बरोबरच अजून एक कला आपल्याला आली पाहिजे, ती कला म्हणजे थोडं फार का असेना, समोरच्या व्यक्तीच्या मनासारखं जगण्याची, त्याचं मन जपण्याची कला ! 

 

आपण कोणासाठी काही केलं तर ती व्यक्ती आपल्यासाठी काही तरी करेल, हे अगदी साधं equation आहे ! पण highly qualified असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा ही गोष्ट जमत नाही, हे समाजातले वास्तव आहे.

 

नवरा-बायको, भाऊ-भाऊ, सासू-सून यांच्यामध्ये का बरं धुसफूस असावी ? या नात्यामध्ये भांडणं, अबोला, मतभेद असलेच पाहिजेत का ?

सासूने माझ्यासाठी काय केलं ? आई-वडिलांनी आमच्यासाठी काय केलं ? असे प्रश्न विचारतांना सासूसाठी सून म्हणून आपण काय केलं ? मुलगा म्हणून आपण आई-वडिलांसाठी काय केलं, हे ही प्रश्न स्वतःच्या मनाला विचारले पाहिजेत !

 

एकतर्फी प्रेमातून कोणतंच नातं फुलतही नसतं आणि टिकतही नसतं !

– – लक्षात घ्या फक्त सेल्फी काढण्यापुरते हसरे चेहरे ठेऊ नका. असे वागणे म्हणजे स्वतःची आणि इतरांची फसवणूक करण्यासारखे आहे.

…. सुनेने सासूचा तिरस्कारच केला पाहिजे का ?

…. भावा-भावा मध्ये आणि जावा-जावा मध्ये भांडणं असलेच पाहिजे का ?

…. Busy पणाच्या नावाखाली किंवा परिस्थिती गरीब आहे म्हणून बहिणीकडे जाणे येणे सोडूनच द्यायचे का ? 

…. एखाद्या वेळेस मित्र चुकीचा वागला म्हणून काय मैत्रीच तोडून टाकायची का ?

 

व्यवस्थित बोलून, सुसंवाद साधून नाती टिकवता येतात, ही गोष्ट सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे.

चला तर मग…..

…. एकमेकांचं मन जपण्याचा प्रयत्न करूया….

…. प्रत्येकाशी मन मोकळं बोलू या

…. आणि आपल्यासाठी खूप काही करणाऱ्यासाठी आपणंही काहीतरी करू या, किमान कुणी काही केलं याची नोंद तरी ठेऊ या !

लेखक : प्रा. विजय पोहनेरकर

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)

 94 20 92 93 89

प्रस्तुती : सौ.अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सनातन संस्कृती आणि विज्ञान… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

सनातन संस्कृती आणि विज्ञान☆ श्री अनिल वामोरकर ☆

फ्रान्समधील ट्रेले नावाच्या शास्त्रज्ञाने हवनावर संशोधन केले, ज्यामध्ये त्याला कळले की हवन मुख्यत्वे आंब्याच्या लाकडावर केले जाते.

जेव्हा आंब्याचे लाकूड जळते तेव्हा फॉर्मिक अल्डीहाइड नावाचा वायू तयार होतो. जे धोकादायक जीवाणू आणि जीवाणू मारतात आणि वातावरण शुद्ध करते. या संशोधनानंतरच शास्त्रज्ञांना हा वायू आणि तो बनवण्याचा मार्ग कळला.

गूळ जाळला तरी हा वायू तयार होतो. तौतिक नावाच्या शास्त्रज्ञाने हवनावर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, जर कोणी अर्धा तास हवनात बसले किंवा शरीर हवनाच्या धुराच्या संपर्कात आले, तर टायफॉइडसारखे घातक आजार पसरवणारे जीवाणूही मरतात आणि शरीराला शुद्ध होते. हवनाचे महत्त्व पाहून लखनऊच्या नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनीही यावर संशोधन केले की, हवनामुळे खरोखरच वातावरण शुद्ध होते आणि बॅक्टेरिया नष्ट होतात का? त्यांनी ग्रंथात नमूद केलेले हवन साहित्य गोळा केले आणि ते जाळल्यावर ते विषाणू नष्ट करते.

मग त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या धुरावरही काम केले आणि पाहिले की फक्त एक किलो आंब्याचे लाकूड जाळल्याने हवेतील विषाणू फारसा कमी होत नाही. पण त्यावर अर्धा किलो हवन साहित्य टाकून जाळले असता तासाभरात खोलीतील बॅक्टेरियाची पातळी ९४% कमी झाली.

एवढेच नाही तर त्यांनी खोलीच्या हवेत असलेल्या बॅक्टेरियाची आणखी चाचणी केली आणि त्यांना असे आढळले की खोलीचा दरवाजा उघडून सर्व धूर निघून गेल्याच्या २४ तासांनंतरही बॅक्टेरियाची पातळी सामान्यपेक्षा ९६ टक्के कमी होती.

वारंवार केलेल्या चाचण्यांनंतर असे आढळून आले की या एकवेळच्या धुराचा प्रभाव महिनाभर टिकला आणि ३० दिवसांनंतरही त्या खोलीतील हवेतील विषाणूची पातळी सामान्यपेक्षा खूपच कमी होती.

हा अहवाल डिसेंबर 2007 मध्ये एथनोफार्माकोलॉजी 2007 च्या संशोधन जर्नलमध्ये देखील आला आहे.  हवनाद्वारे केवळ मानवच नाही तर वनस्पती आणि पिकांचे नुकसान करणारे जीवाणूही नष्ट होतात, असे या अहवालात लिहिले होते.  त्यामुळे पिकांमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी होऊ शकतो.

ही माहिती तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कळवावी. हवन केल्याने केवळ देव प्रसन्न होत नाही तर घरही शुद्ध होते. परमेश्वर सर्व कुटुंबातील सदस्यांना रक्षण आणि समृद्धी देवो.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अडिसरी… कवी – अज्ञात ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ अडिसरी… कवी – अज्ञात डॉ. माधुरी जोशी 

मराठीची कमाल बघा तर. — – 

अडीच अक्षरांचा कृष्ण

 अडीच अक्षरांची लक्ष्मी

अडीच अक्षरांची श्रद्धा

अडीच अक्षरांची शक्ती !

*

अडीच अक्षरांची कान्ता

 अडीच अक्षरांची दुर्गा

अडीच अक्षरांची इच्छा

 अडीच अक्षरांचा योध्दा !

*

अडीच अक्षरांचे ध्यान

 अडीच अक्षरांचा त्याग

अडीच अक्षरांचेच कर्म

 अडीच अक्षरांचाच धर्म !

*

अडीच अक्षरांत भाग्य

 अडीच अक्षरांत व्यथा

अडीच अक्षरांतच व्यर्थ

 बाकी सारे मिथ्या !

*

अडीच अक्षरांत संत 

 अडीच अक्षरांचा ग्रंथ

अडीच अक्षरांचा मंत्र

 अडीच अक्षरांचे यंत्र !

*

अडीच अक्षरांची तुष्टी

 अडीच अक्षरांचीच वृत्ती

अडीच अक्षरांतच श्र्वास

 अडीच अक्षरांतच प्राण !

*

अडीच अक्षरांचा मृत्यू

 अडीच अक्षरांचाच जन्म

अडीच अक्षरांच्याच अस्थि

 अडीच अक्षरांचाच अग्नि !

*

अडीच अक्षरांचा ध्वनी

 अडीच अक्षरांचीच श्रुती

अडीच अक्षरांचा शब्द

 अडीच अक्षरांचाच अर्थ !

*

अडीच अक्षरांचा शत्रू

 अडीच अक्षरांचा मित्र

अडीच अक्षरांचेच सत्य

 अडीच अक्षरांचेच वित्त !

जन्मापासुन मृत्युपर्यंत अडीच अक्षरांत बांधले आयुष्य हे मानवाचे,

… नाही कुणा उमगले नाही कुणा समजले.

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. माधुरी रानडे जोशी.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आता कुनी बलवत नाय’ – कवयित्री : सुश्री अनुराधा हवालदार☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आता कुनी बलवत नाय’ – कवयित्री : सुश्री अनुराधा हवालदार☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

दिवायीच्या फराळाले

आता कुन्नी बलवत नाय

ताटं भरले फटु धाडते

सांगा तेचं करु काय?

*

आठ दिस आधीपासून 

शुबेच्चानं भरते फोन

घरी या फराळाले

आता असं म्हंते कोन?

*

घरी आता फराळाचं

मँड्डम काही करत नाय

रेड्डीमेड आनून खानं

अंगवळनी पडलं हाय

*

किचन झाले पॉश आता

कामासाटी बाया हाय

दोन कामं केली तरी 

मँडम म्हंते दुखते पाय

*

असं होन्यामागं बघा

कारनीभूत थो एकच हाय

हातामंदी चिकटलेला

मुबाईल काई सुटत नाय

*

सारे मिंटा मिंटानं

उघडू उघडू पायते फोन

नवी काय पोष्ट आली

आनलाईन हायेत कोन

*

चकली चिवडा लाडू शेव

ताटलीमंदी सजवतेत

मार त्याचे फटु काढून

वाटसअपवरती पाठवतेत

*

तोंडापुरतं या म्हंतेत

तेच्यातून समजाचं काय

दिस वार स्थळ येळ

काई काई सांगत नाय

*

लोनी लावू लावू बापे

शबूद फेकते गोड गोड

घरी येतो म्हना बरं…

मंग व्हते म्युट मोड

*

मले सांगा फटु पाहून

पोट माह्यं भरन काय?

म्या मनलं कवडीचुंबका

घरी कदीतं बलवत जाय

*

डाएटवरती हावो म्हंते

आईली आमी खातच नाय

पिझ्झा बर्गर मॅगी खातेत

याले काय अर्थ हाय

*

कलियुग हाये बाप्पा

फराळेचे फटुच घ्या

शुगरकोटेड बोलून म्हंते

पुढच्या वर्षी नक्की या

*

पैले आज्जी आय आमची

करत व्हती किती काय

दळन तळण सारं करुन

तक्रार कद्दी केली नाय

*

फार नवती सुबत्ता पन

पावना नेहमी जेऊन जाय

पैसा झाला मोट्टा तरी

मन आता कोतं हाय..

…फराळाचं इसरून जाय…

…बाई फराळाचं इसरून जाय…

कवयित्री : सुश्री अनुराधा हवालदार

नागपूर

प्रस्तुती : डॉ .  मीना श्रीवास्तव.

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दिवाळी… की हॅलोविन ???” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “दिवाळी… की हॅलोविन ???” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

आमच्या पुण्याच्या घरी सोसायटीतील काल‌ काही लहान मुलं हॅलोवीनचे भुतांचे चेहरे रंगवून “ट्रिक ऑर ट्रीट” असं म्हणत कँडीज मागायला आली‌ होती. त्यावर सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर त्यांच्यातल्या काही मातांनी, “अवर हॅलोवीन गँग, सो क्यूट!” असे‌ फोटो टाकले.

आज सकाळी त्याच ग्रूपवर त्याच फोटोंच्या खाली एका पुणेरी एकारान्त काकांनी हा मेसेज फॉरवर्ड केला. शेवटचे दोन परिच्छेद तर विशेष धमाल‌ आहेत.

असं मनोरंजन फक्त पुण्यातच मिळू शकतं!

“हल्ली गेल्या काही वर्षात हॅलोविन नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरतो आहे…

हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते, हडळ ह्यांचे चेहरे, जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे happy haloween!!  🤦‍♀️

हिंदूंचा आनंदमय दीपोत्सव साजरा करताना घरातले अमंगल, दारिद्र्य बाहेर जावो.. मंगलमय, लक्ष्मी सोनपावलांनी घरात येवो असे म्हणायचे आणि 

दिवाळी नंतर हॅलोविनच्या मूर्खपणाच्या नावाने तीच घाण घरात परत घरात आणायची.. ??

आधी सर्वांगसुंदर सुख- समृद्धीचे प्रतीक नवीन कपडे घालून लक्ष्मी पूजन करायचे पाडव्याच्या दिवशी देवळात जाऊन 

“अज्ञानत्व हरोनी बुद्धि मती दे आराध्य मोरेश्वरा

चिंता, क्लेश, दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी”

अशी प्रार्थना म्हणायची नंतर थोड्या दिवसात भुतखेतांचे ड्रेस घालून हिंडायचे आणि त्यांना घरात घेऊन यायचं ही कसली अवदसा आहे??

मुलांना मुंज केल्यावर दोन घरी भिक्षेला जायला लाज वाटते आणि भुतांची चेहरे रंगवून घरोघरी चॉकलेट मागत फिरतात.. ही कसली विकृती साजरी करत आहोत??

आपली मुले हे प्रकार करत असतील त्याचं मूर्खासारखे कोडकौतुक न करता चांगले बदडून काढा.. आणि जे कोण हे करायला उद्युक्त करत असतील त्यांना चांगला दम द्या.. आणि आठवण करुन घ्या आपण थोड्या दिवसांपूर्वी हिंदू धर्मात होतो म्हणून मंगलमय दिवाळी साजरी केली..

परत जर हे प्रकार मुलांकडून करायला लावले तर तुमच्या दारात श्राद्धाचा स्वयंपाक, मिरची लिंबू, काळी बाहुली, पत्रावळीवर गुलाल घातलेला भात असं सगळं आणून ठेवू. हिंदूंमध्ये भुताखेतांची कमी नाही जी विदेशी भूत आयात करायची गरज पडते आहे” 🤣

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares