☆ BE PRACTICAL! – लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
“चिटी चावल ले चली,
बीच में मिल गई दाल।
कहे कबीर दो ना मिले,
इक ले , इक डाल॥”
अर्थात :
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होतीस , आता वरणाचीही सोय झाली.’ पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.’
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात.
साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, ‘इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं!’
विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण,शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.
ती बघून, ‘घेशील किती दोन करांनी’ अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांसाठी हाकायला खूप सोपी पडतात.
पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तूही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते. (आणि ऐपतही नव्हती.)
आज असंख्य विकल्पांनी, वस्तूंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तूही भंगारात टाकू लागले आहेत.
भौतिक वस्तूंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.
देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.
म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकाऊ बनतो.
कबीरांच्या या दोह्यात असा मोठा अर्थ दडला आहे.
चला तर मग आनंदी जगूया.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती :सौ. शशी नाडकर्णी- नाईक
फोन नं. 8425933533
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
स्त्रियांना कधी कामं करताना पहाल, तर दिसेल की , त्या फिरत गरगरत कामं करतात, सतत उठताना बसताना दिसतात. कारण कामं चहूदिशेला असतात.एका सरळ रेषेतलं एकच एक मोठं काम नसतं, तर लहानसहान वेगवेगळी कामं असतात.म्हणूनच काय आणि किती केलं हे कधी मोजता येत नाही. दिवसाच्या शेवटी सगळं जागच्या जागी हेच उत्तर असतं आणि इतरांच्या यशात असणारा, पण न दिसणारा वाटा, हेच यश असतं. प्रत्येक खोलीत गेलं की कामं बोलवत असतात आणि स्वयंपाकघरातली कामं तर कधी संपतच नाहीत.
टाईम झोन अनुसार किंवा नैसर्गिक स्त्रीप्रकृतीचा विचार करता स्त्रीतत्त्व मुळात शांत आणि रिलॅक्सड प्रवृत्तीचं आहे. स्त्रीची कामं करण्याची पध्दत आक्रमकपणे फडशा पाडण्याची नसून आनंद घेत निर्मिती करण्याची आहे, पण आजच्या जीवनशैलीमुळे ती सतत अस्वस्थ धावताना दिसते. आतला न्यूनगंड भरुन काढण्यासाठी घरातल्यांना काही देत राहते. स्वतःलाच शिक्षा केल्यासारखी कामात बुडून राहते, स्वतःवरचं कमी झालेलं प्रेम तिला आणखी दु:ख देतं आणि त्या वेदनांपासून, त्या भावनांपासून पळण्यासाठी ती आणखी कामं करत बसते.
शांत बसलं की माणसाच्या मनातल्या भावनांची वादळं वर येतात. विश्रांतीची गरज आहे, स्वतःला वेळ द्यायचाय, स्वतःकडे लक्ष द्यायचंय अशी ओरड आतून येते, खरंतर त्याकडे लक्ष देऊन त्या वेदना हील करणं सोडून ती कामात बर्न आऊट होत रहाते, थकते दमते आणि तक्रार करते. या तक्रारींमुळे इतर आणखी लांब जातात. तिला टाळतात. मग ती आणखी एकटी पडते.
टाईम मॅनेजमेंट हा विषय स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळा आहे आणि तो वेगवेगळया पध्दतीनेच रिझल्ट देणारा आहे. स्त्रीची कार्यक्षमता आणि एकूण दिनक्रम याचा संबंध विश्रांतीशी आहे. स्त्रियांच्या विश्रांतीला आळस समजणं म्हणजे अक्षरशः अज्ञान आहे. निसर्ग संतुलन साधत असतो, यशासाठी जितकी धावपळ,गडबड,पळापळ गरजेची असते,तितकीच शांतता आणि विश्रांतीसुध्दा.
एक उपाय सुचवत आहे. अनेक घरात असेलही. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी हा प्रयोग करुन पहा. आपल्या घरातल्या सगळया स्त्रिया जिथे जास्त वेळ उभ्याने काम करतात, जिथे जास्त वेळ घालवतात, तिथे एक लहानसा स्टूल बसण्यासाठी ठेवा. पटकन बसता येईल, टेकता येईल असा एक स्टूल ओट्यापाशी हवाच. चहा, दूध गरम होईपर्यंत, भाजी चिरताना, निवडताना ओट्यापाशी पटकन विसावता येईल.
स्टूल फार मोठा जागा व्यापणारा, अडचणीचा नको, लहानसा, हलका !
कोणी म्हणेल आमच्या किचनमधे डायनिंग टेबल आहे, पण कामात ती खुर्ची पटकन घेतली जात नाही. बायका उभ्यानेच खातात, चहा पितात आणि तासनतास बसत नाहीत. मग पाठदुखी कंबरदुखी मागं लागते.
हे स्टूल प्रतीक म्हणून काम करेल, विश्रांतीची आठवण करुन देणारं प्रतीक!
‘बस जरा. कामं पळून जात नाहीत. दोन मिनिटं शांत बस. पाणी पी,’
हे सगळं बोलणारं कुणी असायची गरज नाही. हे स्टूल बोलेल.
या क्षणभर विश्रांतीनं थकवा 50% कमी होईल. सगळं संपल्यावर एकदम कोसळायला होणार नाही आणि मनालाही शांतता मिळेल. किचनमधला असा हा कृष्णसखा क्षणभर विश्रांती देऊन कशी मदत करतो, हे खरंतर सवयीनं अनुभवण्याची गोष्ट आहे, बघा प्रयोग करुन!
लेखिका : श्रीमती कांचन दीक्षित
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माझे सासरे रोज पुजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधीकधी त्यांचा गळासुद्धा भरून येतो हे म्हणताना.
त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुधा एकच असते. मला पण छान वाटतं. असं वाटतं की माझ्या स्वयंपाकावर अनायासे संस्कार होत आहेत.
पूर्ण पूजा झाल्यावर जेव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात, तेव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते.
त्यांची पाठमोरी आकृती, देवाजवळ तेवणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंवा तत्सम फुलांनी सजलेले माझे छोटेसे देवघर.
शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,
अनायासेन मरणं :
मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा तर अनायासेन – सहज.
विनादैन्येन जीवनं :
जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.
देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:
मृत्यूनंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा तुझेच’.
पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे, तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.
इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले
गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले
हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा
काय मागणे आहे ना. रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कारवर्गाची गरज भासेल का?
परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते. दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड तोच विषय आमचापण होता.
हल्ली संस्कार कमी पडतात. बोलता बोलता ती म्हणाली, “आता काय गं आपली मुलं मोठी झाली. संस्कार वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे, आता ती घडली. आता परिवर्तन होणार नाही.”
मला तेव्हा सांगावंस वाटलं तिला, ‘संस्कार काय १०वी-१२वी किंवा पदवीधर असं नाही गं.
आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही, असं नसतं.
संस्कार तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते. ‘
माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे. पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल, तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील.
आज कदाचित त्याचं महत्त्व तिला कळणार नाही. पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरुवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल, त्यावेळी ही ‘संस्कार शिदोरी’ तिला उपयोगी पडेल.
देवासमोर हात जोडताना ‘नवस’ बोलण्यापेक्षा ‘दिलेल्या जीवनाबद्दल आभार’ मानणे, ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती.
आपल्या जीवनाची ‘जबाबदारी’ जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत ‘ती अगाध शक्ती’सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घेतो त्याक्षणी आपले ‘मागणेच बदलते’.
अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।
देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भोजन– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
लहानपणी खूप पदार्थ नसायचे.
जेवणाच्या बाबतीत लाडही नसायचे.
आईचा स्वयंपाक होत आला की पाटपाणी घ्यायचे.
त्यात सुध्दा क्रम आणि जागा ठरलेली असायची.
पाट, पाण्याचे लोटी-भांडे ,ताट , वाटी (चमचा गरज असेल तर) , हातांनीच जेवायचे.
पान पद्धतशीर वाढायचे. घरात जेवायला केलेले सगळे पदार्थ अगदी थोडे थोडे वाढले जायचे. नैवेद्य दाखवल्यावर जेवायला सुरवात करायची. आधी श्लोक म्हणायचे. एका सुरात, एका तालात.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म,
उदर भरण नोव्हे जाणिजे यज्ञ कर्म.
पानात पहिले वाढलेले सगळ्यांनी खायचेच.मग लागेल तसे परत घ्यायचे.
पानात काहीही टाकायचे नाही.आवड नावड नाही . पहिले वाढलेले सगळे खायचे.नको असेल तर परत घ्यायचे नाही. हा दंडक होता.ही शिस्त होती.नावडते पदार्थ पाण्याच्या घोटाबरोबर गिळायचे, पण पानात काही टाकायचे नाही. जेवणाला नावे ठेवायची नाहीत.पदार्थ कसाही झाला तरी खायचा.माऊली कष्टाने रांधून , प्रेमाने सगळ्यांना जेवायला वाढतेय.साक्षात अन्नपूर्णा आहे ती.कशालाही नावं ठेवायची नाहीत.पूर्वी स्टोव्हवर,चुलीवर, कोळश्याच्या शेगडीवर स्वयंपाक करायचा. कधीतरी पदार्थाला धुराचा किंवा रॉकेलचा, करपलेला वास यायचा. पण न बोलता जेवायचे. खूप कडक शिस्त होती.नसते लाड चालायचेच नाहीत.अन्नाला नावे ठेवायची नाहीत.
शाळेतही श्लोक म्हणूनच डबा खायचा.एकमेकांना वाटावाटी करुन खायचा.समजा कोणी आणला नसेल तर त्याचंही पोट भरायचे.हे संस्कार न कळत घडत होते.
जनी भोजनी नाम वाचे वदावे ,
अती आदरे गद्य घोषे म्हणावे
हरी चिंतने अन्न सेवेत जावे ,
तरी श्रीहरी पाहिजे तो स्वभावे ..
धुवा हात पाय चला भोजनाला
बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला
नका मागू काही अधाशीपणाने
नका टाकू काही करा स्वच्छ पाने.
आई नेहमी म्हणायची, ‘खाऊन माजावे पण टाकून माजू नये.अन्नाचा शाप बाधतो.’ अर्थ फारसा कळायचा नाही.पण पानात वाट्टेल ते झाले तरी टाकायचे नाही, हा संस्कार सहज घडला.अन्नाचा कणही वाया जाता कामा नये,असा सक्त नियम होता.
मुखी घास घेता करावा विचार
कशासाठी हे अन्न मी सेवणार
घडो माझिया हातूनी देशसेवा
त्यासाठी मला शक्ती दे देवराया..
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे
कृषीवल कृषीकर्मी राबती दिनरात
श्रमिक श्रम करुनी वस्तु या निर्मितात
करुन स्मरण तयांचे अन्न सेवा खुशाल
उदरभरण आहे चित्त होण्या विशाल.
अशा श्लोकांतून अन्नसेवनाचा संस्कार सहज घडतो.
आपल्यावर झालेला संस्कार पुढच्या पिढीवर रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा.आज सगळं बदललं आहे तरी आपण सांगत राहायचे.ह्याचा परिणाम होतो.आधी विरोध होईल.वेळ नसतो आम्हांला, हे ऐकून घ्यावे लागेल.ही शाश्वत मूल्ये ,जीवनमूल्ये आपल्याला मिळाली, ती सांगत रहायची ,रुजवत राहायची.
नको तिथे लाड नाहीत.वेळच्या वेळी सांगायचे .त्यामुळे चांगली शिस्त, संस्कार मनात रुजतात.सगळ्या भाज्या, पदार्थ आवडीने खाल्ले जातात .पानात पडेल ते खायचे. टाकायचे नाही. हवे तेवढेच घ्यायचे .दोन घास कमी पोटात गेल्याने काही बिघडत नाही.हे विचार मिळतात.
गोष्ट छोटी असते.संस्कार महत्त्वाचा.
तेव्हा लग्नाच्या पंगतीतही ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक खणखणीत आवाजात म्हटला जात असे.
‘पार्वतीपते हर हर महादेव’च्या गजराने भोजनास प्रारंभ होत असे. लहान मुलांनाही पंगतीत बसून हवं नको विचारुन वाढले जात असे.पान स्वच्छ केल्याशिवाय उठता येत नसे.
लहान असताना बोडणाला कुमारिका म्हणून जेवायला एकटेच जावे लागे. बोलावणे आल्यावर ‘नाही’ म्हणत नसत.
लहान मुलांनाही बटू म्हणून जेवायला जावेच लागे. कळतनकळत पानात न टाकता सगळे व्यवस्थित जेवण व्हायचे.
बदल करायचा कालानुरूप पण शाश्वत जीवनमूल्यं सोडायची नाहीत. तोच आपल्या समृद्ध जीवनाचा पाया आहे. त्यातला भाव , मर्म समजून घ्यायचे अन्नदान हा संस्कार आहे.
अन्न वाया घालवणे हा माज आहे.
अन्नाचा त्या पूर्णब्रह्माचा अपमान करायचा नाही, हा संस्कार आहे.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈