☆ “पुस्तक म्हणजे काय गं आई?” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
पुस्तक म्हणजे काय गं आई?
अरे पुस्तक हे गुरू असतात
म्हणजे माझे टिचर का गं आई?
नाही रे पुस्तक हेच टिचर असतात. पण हे टिचर कोणीतरी अनुभवातून लिहून ठेवलेले ज्ञान देत असतात. ज्ञान देणारे लिखीत टिचर म्हणजे पुस्तक!!
म्हणजे आपले NEWS PAPER का गं आई?
अरे अरे तसे नाही. NEWS PAPER आजूबाजूला जे घडलेले असते ते सांगत असते. पण पुस्तक म्हणजे तुम्ही शाळा शिकताना तुमच्या वेगवेगळ्या विषयाची माहिती एकत्रीत असते त्यातून बघून टिचर तुम्हाला शिकवतात ना ते म्हणजे पुस्तक!!!
म्हणजे टिचरचा लॅपटॉप का गं आई?
अरे बाबा ते पण नाही!! कसे सांगू तुला? अरे पुस्तक म्हणजे अशी गोष्ट आहे जी बघून तुम्ही शिकत असता केव्हाही कशीही कोणतीही माहिती पाहिजे असेल तर त्या त्या विषयीची लिहिलेली माहिती तुम्हाला देत असते.
म्हणजे टिचरचा स्मार्ट फोन का गं आई?
अरे बाबा तुझ्यापुढे तर मी आता हातच टेकले. कसं सांगू तुला? पुस्तक ••• पुस्तक•••म्हणजे बुक बुक•••
अगं आई तेच की मग. टिचरच्या स्मार्ट फोन मधे eBook असते त्यातूनच तर आम्ही learn करतो ना?
अरे राजा ते नाही रेऽऽऽऽऽ
आईने बरीच शोधाशोध करून रद्दीतून एक पुस्तक काढून आणले आणि दाखवले. बघ बाळा याला म्हणतात पुस्तक•••
ईऽऽऽऽऽऽऽ असले पुस्तक? किती हेवी ना? असले घेऊन फिरायचे? यातून रीड करायचे? त्यापेक्षा माझा मोबाईलच चांगलाय की. काही वजन नको ओझं नको आणि कॅरी करायला इझी. शोधायला इझी रिफर करायला इझी.
अरे बाळा पण अशी पुस्तके हे वैभव असतात. पिढ्यानुपिढ्या हा खजिना राहू शकतो.
आई राहू दे गं तुझा मोठेपणा तुझ्यापाशीच. तुम्ही पुस्तक पुस्तक केलं आणी आता पुस्तक डे साजरा करता. आता आम्ही पण मोबाईल डे साजरा करणार!!
काय करायचं? हा प्रश्नच असला तरी बदलणार्या युगातही पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!!
☆ भेटी वेगवेगळ्या.. पण आयुष्य बदलवणाऱ्या… ☆ शीला पतकी☆
☆
भेट देणे भेट घेणे पहिली भेट शेवटची भेट ऊरा ऊरी भेटणे परमेश्वराला! हल्ली मिळणे या शब्दाला सर्रास.. मला पेन भेटला असं म्हणतात. ते भेटणे. लग्नामध्ये भेट बकरा… कदाचित हा शब्द काही वेगळा असावा… तिथे सर्व नातेवाईकांच्या गाठीभेटी होतात ते भेट ठीक आहे पण बकरा काय माहित नाही तो विडंबित बेड सुद्धा झाला आहे.. भेटीत तृष्टता मोठी ते वेगळच.. ती तृष्ठाता ऋणानुबंधाच्या गाठीशी संबंधित आहे…
मतदार संघात भेटीगाठीवर भर देण्यात आला ते प्रकरण वेगळे आहे तिथल्या भेटींना वेगळा अर्थ आहे. विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांना भेटले.. त्यांची बंद खोलीत भेट झाली हे वेगळच आहे इथे सगळे राजकारणच बदलतं…!
व्यावसायिक भेट तिथे करार ठरतात. वेळेवर डॉक्टर भेटले म्हणून तो वाचला या भेटीला तर वेगळाच अर्थ आणि अनन्य साधारण महत्त्व आहे.
हल्ली सर्वात चर्चेचा विषय पंतप्रधान, ट्रम्प तात्यांना भेटले… जागतिक खळबळ सुरू होते… खळबळजनक भेट…
अहो कुणीतरी आपल्याला भेटायला आले आहे आनंददायी घटना असते किंवा हल्ली कोणी येतच नाही किंवा फोन येतो मी भेटायला येऊ का वेळ घेऊन येणारे शिस्तबद्ध लोक… इकडून चाललो होतो म्हणलं भेटून जाऊ… संधी साधू माणसं. आवर्जून भेटायला आले आदर आणि प्रेम! परमेश्वरा कंटाळा आला एकदाचाये खाली भेट मला… वैतागल्यावर येणारे वाक्य!
भरत भेट… हा तर लहानपणापासून कोरला गेलेला धडा कारण रामाची त्याच्याशी भेट झाल्यावर रामाच्या पादुका डोक्यावर घेऊन तो आपल्या गावी गेला आणि त्या सिंहासनावर ठेवून त्याने 14 वर्षे राज्य केले हा भेटीतला व बंधू प्रेमाचा आदर्श.
रिकामे ढग दिसले की धरती फाटून जाते तिला ओढ लागते त्याच्या भेटीची… साहित्यिक भेट…! म्हणजे दुष्काळ पडणार पण डायरेक्ट सांगत नाहीत.
बापाबरोबर जन्मभर राहिलो
बाप कधीच भेटला नाही
तो गेल्यावर कळलं
माझ्याशिवाय कोणासाठीच तो आयुष्यभर झटला नाही…!
नवकवींची काव्यमय भेट
येथे सागरा धरणी मिळते
तेथे तुझी मी वाट पाहते.
गुगल मीट म्हणजे पत्ता!
दोन ओंडक्यांची होते भेट सागरात एक लाटतोडी दोघा पुन्हा नाही भेट
तत्वज्ञानी भेट!
के की मुसाची चाळीसगाव स्टेशन वरची भेट आपल्या प्रेयसी साठी रोज दोन माणसांचा स्वयंपाक करून तिच्यासाठी गुच्छ तयार करून येऊन एका विशिष्ट गाडीची वाट पाहत भेटीची अपेक्षा करणारा केकी… भारतातील महान चित्रकार ज्याची आपल्या प्रेयसीची कधीच भेट झाली नाही ही सत्य कथा आहे… ती हळवी भेट!
पंडित जवाहरलाल नेहरू आपली पत्नी कमला नेहरू हिला टी बी झाल्यामुळे शेवटच्या आठ वर्ष भेटले नाहीत त्यांचा अंतिम संस्कार सुभाष चंद्र बोस यांनी केला अत्यंत संताप जनक… न झालेली भेट
शबरीची रामाची झालेली भेट अपारंपार भक्ती आणि भक्तीची खात्री असलेली भेट याला श्रद्धा म्हणतात ही श्रद्धा भेट आहे.
रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांची भेट… तरुणांमध्ये भारतीय विचार रुजवणाऱ्या महान वैचारिक वारशाची भेट!
जंगलातल्या ओसाड आश्रमाशी आल्यावर तिथे पडलेल्या शिलेला स्पर्श होताच अहल्या शाप मुक्त झाली ती राम भेट शाप मुक्तीची भेट आहे.
सावकार बापान ऋणमुक्तीसाठी लग्न करून आणलेली सून शोभण्याचा वयाची मुलगी… तो हाक मारतो आई… आणि मान वर करून पाहतो ती त्याचे प्रेयसी असते… शारदा सिनेमातील मीनाकुमारी, राज कपूर यांची भेट… तत्कालीन समाज व्यवस्थेवर कोरडे ओढणारी… महिलांवर अन्याय करणारी… मीनाकुमारी अगतिक पण निश्चयी नजर आणि राज कपूर ची धक्का बसलेली असाह्य दृष्टी दिग्दर्शकाची कमाल दाखवणारी भेट!
अशा असंख्य भेटी आजही स्मरणात आहेत. कितीतरी लिहिता येईल पण कामवाली आली आहे ती पुन्हा भेटत नाही ना… म्हणून लेखणीला विराम..
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६७ आणि ६८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ६७ – –
घनःश्याम हा राम लावण्यरूपी ।
महा धीर गंभीर पूर्णप्रतापी ।
करी संकटी सेवकाचा कुडावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६७।।
अर्थ – – पावसाळी मेघाप्रमाणे श्यामल वर्ण हा राम अत्यंत सुंदर आहे. तो महा धैर्यवान आणि गंभीर असा असून अत्यंत पराक्रमी आहे. संकटात आपल्या भक्ताचे तो रक्षण करतो. अशा या श्रीरामाचे पहाटे चिंतन करावे.
(कुडावा – रक्षण)
विवेचन – – मनाच्या श्लोकांमधील श्लोक ६६ ते ७६ हा दहा श्लोकांचा एक वेगळा गट आहे. याचे वैशिष्ट्य असे की या श्लोकांमध्ये समर्थ रामाच्या सगुण रूपाचे वर्णन करतात. आपल्याला त्याचे ध्यान करायला सांगतात. परमेश्वराची निर्गुण भक्ती ही श्रेष्ठ आणि सूक्ष्म मानली जाते. परंतु सगुण भक्ती आपल्यासारख्या सामान्य साधकांसाठी सुलभ आहे. म्हणून सुरुवात करायची झाली तर ती सगुण भक्तीपासून करावी. या पृथ्वीवर आपण देह धारण करून आलो आहोत. परमेश्वर देखील जेव्हा जेव्हा या धरतीवर अवतीर्ण झाला तेव्हा तेव्हा त्याने देह धारण करूनच आपले कार्य केले. त्यामुळे परमेश्वराच्या सगुण रूपाची कल्पना करणे आपल्याला सोपे जाते. म्हणूनच समर्थ या दहा श्लोकांच्या माध्यमातून श्रीरामाचे (परमेश्वराचे) सगुण रूप आपल्यासमोर ठेवताहेत.
श्रीरामाचे रूप कसे आहे? तर पावसाळी मेघाप्रमाणे सावळा. ‘ सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी… ‘ त्या सावळ्या रंगात विलक्षण सौंदर्य आहे. वेद आणि पुराणात वर्णिल्याप्रमाणे आपले बहुतेक देव सावळेच आहेत. विष्णू, विठ्ठल, श्रीराम हे सावळेच आहेत. ‘ सावळे सुंदर, रूप मनोहर. राहो निरंतर हृदयी माझ्या… ‘ असे संत तुकाराम म्हणतात. तेच समर्थ आपल्याला सांगत आहेत. श्रीरामाचे रूप वर्णन करताना समर्थांनी राम सुंदर आहे असे न म्हणता लावण्यरूपी असे म्हटले आहे. ‘ लावण्य ‘ या शब्दात आणखी खोल, गहन असा अर्थ आहे. त्यात माधुर्य आहे. म्हणून संतांनी देखील विठ्ठलाला लावण्याचा गाभा असे म्हटले आहे.
या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत समर्थ श्रीरामाचे गुण वर्णन करताना म्हणतात, ‘ महा धीर गंभीर पूर्णप्रतापी. ‘ ‘ महा ‘ हे विशेषण धीर आणि गंभीर या दोन्ही शब्दांसाठी लागू होते. तो अत्यंत धैर्यशाली आहे. तसेच तो अत्यंत गंभीर देखील आहे. इथे गंभीर या शब्दाचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाही. तर जीवनातील सर्व संकटांचा सामना करताना जे धैर्य आणि गांभीर्य लागते, त्या अर्थाने हा शब्द इथे आला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्रीरामांचे धैर्य आणि शौर्य सागराप्रमाणे अपार आहे. सागराजवळ अमर्याद जलसाठा आहे. पण तरीही तो आपले गांभीर्य म्हणजेच आपली मर्यादा सोडत नाही. तसेच सर्वगुणसंपन्न श्रीराम आहेत. ते पूर्णप्रतापी आहेत म्हणजे अत्यंत पराक्रमी आहेत. श्रीराम म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, धैर्य आणि गांभीर्य, पराक्रम! असे अनेकविध गुण त्याच्या ठिकाणी वसतात.
अशा या धीर गंभीर आणि पूर्णप्रतापी श्रीरामांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या सेवकाच्या संकटात धावून जातात, त्याचे रक्षण करतात. ते भक्तवत्सल आहेत. ज्या ज्या भक्तांनी संकटकाळी त्यांचा धावा केला, त्यांच्या साहाय्याला ते तात्काळ धावून गेले आहेत. पण परमेश्वरावर दृढ श्रद्धा हवी. त्यासाठी परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती करावी लागते. अनन्यभावाने म्हणजे ‘ हे परमेश्वरा, मला तुझ्याशिवाय कोणी त्राता नाही. तूच माझे सर्वस्व आहेस. ‘ अशा प्रकारची वृत्ती हवी. श्रीरामांचे किंवा श्रीकृष्णाचे भक्त हे अशा प्रकारचे होते. हनुमंताला तर एका रामाशिवाय दुसरे काहीच नको होते. अशा या रामाचे (भगवंताचे) पहाटे चिंतन करायला समर्थ आपल्याला सांगत आहेत.
रात्रीची शांत निद्रा आटोपली की पहाटेच्या वेळी आपले मन एखाद्या नदीच्या डोहासारखे शांत असते. पाणी जर स्वच्छ आणि शांत असेल तर त्यात आपले प्रतिबिंब दिसते. त्याचा तळ दिसतो. पहाटेच्या वेळी अशा शांत आणि इतर विचारांची गर्दी नसलेल्या मनात रामाचे चिंतन करावे. त्याचेच प्रतिबिंब आपल्या मनात पडावे. सकाळ जर अशी पवित्र आणि सुंदर झाली तर दिवसही चांगला जाईल. आपण जेव्हा त्याचे चिंतन करू तेव्हा त्याचे रूप आणि गुण आपोआपच आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. आपली सकाळ मोबाईल, टीव्ही किंवा वर्तमानपत्रांच्या बातम्याने बऱ्याच वेळा होते. त्यातील अपघात, खून, दरोडे, अत्याचार, राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप इ. नकारात्मक बातम्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात न करता श्रीरामाच्या चिंतनानेच करावी.
स्वसंवाद – –
१) माझ्या दिवसाची सुरुवात कोणत्या विचारांनी होते? चिंतेने की चिंतनाने?
२) पहाटेच्या शांत वेळेत मी स्वतःसाठी आणि भगवंतासाठी काही क्षण राखून ठेवतो का?
३) संकटसमयी माझी भिस्त भगवंतावर असते का?
४) मी दिवसभरात जास्त कोणत्या गोष्टी मनात साठवतो? नकारात्मक बातम्या की सकारात्मक चिंतन?
५) रामाचे धैर्य, गांभीर्य आणि करुणा हे गुण माझ्यातही यावेत असे मला वाटते का? (क्रमशः)
=====
श्लोक क्र. ६८ – – –
बळे आगळा राम कोदंडधारी ।
महां काळ विक्राळ तोही थरारी ।
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६८।।
अर्थ – – धनुष्य धारण केलेला राम हा पराक्रमाने आगळावेगळा आहे. सर्व प्राणिमात्रांचा विनाश घडवून आणणारा महाकाळ सुद्धा या रामापुढे थरथर कापतो. तर अशा या रामापुढे (भगवंतापुढे) सामान्य माणसाची काय कथा? म्हणूनच प्रभात समयी रामाचे चिंतन करावे.
(कोदंडधारी – धनुष्य धारण केलेला, महाकाळ – काळाचाही काळ जो अखिल विश्वाचा विनाश घडवून आणतो, किंकर -दास/सेवक, केवा – महत्व)
विवेचन – – समर्थ या श्लोकाची सुरुवात करताना ‘ बळे आगळा राम कोदंडधारी ‘ असे म्हणतात. श्रीरामाने कोदंड म्हणजे धनुष्य धारण केले आहे. त्याच्या धनुष्याचा टणत्कार ऐकल्यावर काळाचा देखील थरकाप होतो. सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी श्रीरामाने धनुष्य धारण केले आहे. समर्थांच्या काळात जेव्हा मोगलांचे आक्रमण झाले होते, तेव्हा सगळा समाज दुर्बल झाला होता. गुलामगिरीची वृत्ती निर्माण झाली होती. अशा वेळी समर्थांनी या धनुर्धारी श्रीरामाचा आदर्श समाजापुढे ठेवला. तेव्हा साहजिकच श्रीरामाची केवळ पूजा न करता त्याचे गुण देखील अंगी बाणवणे आवश्यक ठरते. म्हणूनच तर ‘ प्रभाते मनी राम चिंतीत जावा ‘ असे समर्थ म्हणतात.
श्रीराम महापराक्रमी तर आहेच पण तो ‘ बळे आगळा का? ‘ तर ज्याची भिती कळीकाळालाही वाटते असा राम आपल्या शक्तीचा उपयोग सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी करणारा आहे. ज्यांच्याकडे शक्ती, सामर्थ्य आहे असे बरेचसे लोक अनादिकालापासून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करताना दिसतात. रावणाजवळही सामर्थ्य होते, पण त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला. महाभारतात देखील कंसाने आपल्या शक्तीच्या साहाय्याने समाजातील सज्जनांना त्रास दिला. आज समाजात ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि शक्ती आहे अशी बरीचशी मंडळी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करताना दिसतात. म्हणून श्रीराम ‘ बळे आगळा ‘ आहे.
जो जन्माला आला त्याला मृत्यू निश्चित आहे. काळ हा सर्वशक्तिमान आहे. सामान्य माणसासाठी यम म्हणजे काळाचेच एक रूप. सामान्य माणूस यमाचे नुसते नाव जरी काढले तरी घाबरतो. पण ज्याला सर्वच घाबरतात असा काळ देखील भगवंतापुढे थरथर कापतो. तर सामान्य माणसाची त्यापुढे काय कथा? म्हणून आपण जर अनन्यभावाने भगवंताची आराधना केली तर अशा सर्वशक्तिमान काळाच्या कचाट्यातून, मरणाच्या भीतीतून देखील तो आपल्याला मुक्त करील. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका करील. मग काळाचा प्रभाव आपल्यावर राहणारच नाही. तेव्हा हे मना, प्रभात समयी श्रीरामांच्या गुणांचे चिंतन कर.
स्वसंवाद – –
१) मी श्रीरामाची भक्ती करताना केवळ पूजा करतो, की त्याच्या गुणांचे अनुकरण करण्याचाही प्रयत्न करतो?
२) माझ्याकडे असलेली शक्ती, ज्ञान, पैसा, पद किंवा अधिकार मी इतरांच्या हितासाठी वापरतो का?
३) माझ्या जीवनात “बळ” म्हणजे काय? इतरांवर प्रभाव टाकणे की स्वतःवर संयम ठेवणे?
४) माझ्या दिवसाची सुरुवात प्रभाती सकारात्मक चिंतनाने होते का?
☆ “पुण्यातील टांग्याची माहित नसलेली ओळख…” – लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
पुण्याच्या वाहतुकीचा आणि संस्कृतीचा एक काळ असा होता जो ‘टांग्यांच्या खडखडाटाने’ गाजला. पेशवेकाळात सुरू झालेली आणि ब्रिटिश काळात वैभव शिखरावर पोहोचलेली पुण्याची टांगेवारी आज इतिहासजमा झाली असली, तरी तिच्या अशा काही रंजक, विस्मरणीय आणि अप्रकाशित बाजू आहेत, ज्या आजच्या पिढीला तर सोडाच, पण जुन्या पुणेकरांच्याही स्मरणातून पुसल्या गेल्या असतील. पुण्याच्या टांगेवाल्यांविषयीची अशीच काही अनोखी आणि पडद्याआड राहिलेली माहिती
टांग्यांचे नंबर आणि शनिवार वाड्याची ‘पासिंग सिस्टीम’ आज जसे वाहनांचे आरटीओ पासिंग असते, तशीच कडक व्यवस्था ब्रिटिश काळात पुण्यात टांग्यांसाठी होती. प्रत्येक टांग्याला पितळी नंबर प्लेट असायची. दरवर्षी या टांग्यांचे पासिंग आणि घोड्यांची तपासणी शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर व्हायची. तिथल्या मैदानावर टांगे रांगेत उभे राहायचे. घोड्याचे आरोग्य ठीक नसेल किंवा टांग्याचे लाकूड कमकुवत असेल, तर त्या टांगेवाल्याला ‘पासिंग’ मिळत नसे.
पुण्याचे शाही छकडे विरुद्ध लोकल टांगे:- पुण्यात दोन प्रकारचे टांगे चालत, ज्यांची रचना आणि भाडे वेगळे असायचे. शाही टांगा यात चार चाके असत आणि वरचे छत मागे-पुढे दुमडता यायचे. हे टांगे फक्त लष्करातील गोरे अधिकारी, कॅन्टोन्मेंटमधील बडे प्रस्थ किंवा श्रीमंत व्यापारी, सावकार वापरत. दोन चाकी टांगा (बग्गी): हा अस्सल पुणेरी टांगा होता. याचे भाडे आण्यांमध्ये असायचे आणि तो सामान्य पुणेकरांसाठी धावायचा.
घोडा-बदली चे थांबे:- पुण्यातून जेव्हा दूरवर प्रवासी जायचे उदा. पुणे ते खडकी, पुणे ते लोणावळा किंवा पुणे ते सासवड, तेव्हा एकाच घोड्याला संपूर्ण अंतर धावणे शक्य नसायचे. यासाठी पुण्यात घोडा-बदलीचे थांबे असायचे. पुणे स्टेशन, संचेती जवळचा परिसर आणि दापोडी येथे असे थांबे होते, जिथे दमलेला घोडा काढून दुसरा घोडा टांग्याला जोडला जाई. या बदल्यांच्या काळात टांगेवाल्यांची आपापसात एक वेगळीच सांकेतिक भाषा असायची, जी सामान्य प्रवाशांना कधीच कळायची नाही.
अनेकदा तरुण विद्यार्थी टांगेवाल्यांशी दोन-दोन पैशांसाठी हुज्जत घालत. यातून टांगेवाल्यांनी एक युक्ती शोधली होती, ते अशा हुज्जत घालणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या आत सोडणार नाही, बाहेर रस्त्यावरच उतरवणार अशी धमकी द्यायचे. त्या काळात डेक्कन जिमखान्यावरून कॉलेजच्या मुख्य इमारतीपर्यंत चालत जाणे प्रतिष्ठेचे मानले जात नसल्याने, विद्यार्थी अखेर टांगेवाल्याने मागितलेले भाडे निमूटपणे द्यायचे.
रात्रीची कंदील सक्ती आणि दंड:- ब्रिटिश राजवटीत पुण्याच्या टांग्यांसाठी अत्यंत कडक नियम होते. सूर्यास्तानंतर प्रत्येक टांग्याच्या दोन्ही बाजूंना घासलेटीचे (केरोसिन) कंदील पेटवणे सक्तीचे होते. जर रात्रीच्या वेळी शनिवार पेठ, सदाशिव पेठ किंवा कॅम्प भागात एखाद्या टांग्याचा कंदील विझलेला दिसला, तर पोलीस त्या टांगेवाल्याला जागेवरच दोन आणे दंड करायचे. हा दंड चुकवण्यासाठी अनेक टांगेवाले कंदिलाच्या काचेवर काजळी धरू नये म्हणून त्यात खास तेलाचा आणि सुती वातीचा वापर करत.
टांगेवाल्यांची नजर आणि शनिवार पेठेतील नाके:- पुण्यातील जुने टांगेवाले हे केवळ चालक नव्हते, तर ते शहराचे माहितीगार होते. शनिवार पेठेतील टांगा नाका किंवा लक्ष्मी रस्त्यावरील थांब्यांवर उभे असणारे टांगेवाले कोणत्या वाड्यात कोण आले, कुठली बैठक चालू आहे, याची खडानखडा माहिती ठेवत. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारक आणि भूमिगत नेते ब्रिटीश पोलिसांची नजर चुकवण्यासाठी टांग्याच्या मागच्या बाजूला पडदा लावून प्रवास करायचे आणि अनेक देशभक्त टांगेवाल्यांनी त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यास मदत केली होती, ज्याची नोंद इतिहासाने फारशी घेतली नाही.
पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकणारी सांकेतिक भाषा:- क्रांतिकारकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना टांगेवाले अत्यंत हुशारीने काम करत. पोलिसांची गस्त कुठे सुरू आहे, याची पक्की माहिती टांगेवाल्यांना असायची.
जेव्हा एखादा पोलीस अधिकारी किंवा गुप्तहेर टांग्यापाशी घुटमळत असे, तेव्हा टांगेवाले एकमेकांशी बोलताना किंवा घोड्याला हाकताना खास सांकेतिक शब्द वापरत. उदा, घोड्याचा नाल सैल झालाय किंवा आज दाणा महाग मिळाला अशा वाक्यांचा अर्थ अडचण आहे, क्रांतिकारी प्रवाशाला आता वाड्यातून बाहेर काढू नका असा असायचा. या कोड लँग्वेजमुळे अनेक मोठे नेते ऐनवेळी पकडले जाण्यापासून वाचले.
पडदा पद्धती आणि दुहेरी ओळख:- त्या काळात स्त्रियांसाठी टांग्याला दोन्ही बाजूंनी जाड कापडी पडदे लावण्याची सोय असायची, जेणेकरून आतील व्यक्ती बाहेर दिसणार नाही. या सुविधेचा टांगेवाल्याने क्रांतिकारक यासाठी कल्पकतेने वापर केला. अनेकदा बरेच क्रांतिकारक वेषांतर करून टांग्यात बसत. जर पोलिसांनी टांगा थांबवलाच, तर टांगेवाला अत्यंत आक्रमकपणे किंवा पुणेरी उपरोधाने पोलिसांवरच डाफरायचा वाड्यातील बड्या घराण्यातील बायका आत बसल्या आहेत, पडदा बाजूला करून अब्रू घेता का? त्या काळात घरंदाज स्त्रियांच्या बाबतीत पोलीस सहसा कडक भूमिका घेत नसत, आणि टांगेवाल्यांच्या या धाडसामुळे क्रांतिकारक सुरक्षितपणे पेठां मधून पार होत.
गाडीत बसलेला प्रवासी साधा सुती कुर्ता घातलेला कार्यकर्ता आहे की ब्रिटीश सरकारचे १० हजार रुपयांचे बक्षीस असलेला नेता, हे ठाऊक असूनही टांगेवाले कधीही पैशांच्या आमिषाला बळी पडले नाहीत हे विशेष.
क्रांतीच्या साहित्याची अदृश्य वाहतूक:- केवळ नेत्यांचीच नाही, तर सरकार विरुद्धची पत्रके, बंदी घातलेली वृत्तपत्रे आणि काही प्रसंगी शस्त्रे व बॉम्ब बनवण्याचे साहित्य एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्याचे काम या टांग्यांनी केले. टांग्याच्या खालच्या बाजूला, जिथे घोड्याचा दाणा-पाणी आणि टांगेवाल्याचे सामान ठेवण्याची लाकडी पेटी असायची, तिथे हे प्रतिबंधित साहित्य लपवले जायचे. वरून घोड्याचे घास-पेंढा टाकलेला असल्याने पोलिसांना कधी संशय आलाच नाही.
इतिहासात टांगेवाल्यांची नावे का नोंदवली गेली नाहीत, यालाही एक ऐतिहासिक कारण आहे. भूमिगत चळवळीचा पहिला नियमच कमालीची गुप्तता हा होता. अनेक टांगेवाल्यांना स्वतःलाही माहीत नसायचे की आपण ज्या प्रवाशाला सोडले त्याचे खरे नाव काय आहे, कारण ते एकमेकांना भाई, भाऊ किंवा गुरुजी अशा टोपण नावांनीच हाक मारत.
दुर्दैवाने संशयावरून पोलिसांनी काही टांगेवाल्यांना ताब्यात घेतले, त्यांना बेदम मारहाण केली, त्यांचे परवाने रद्द केले आणि त्यांचे घोडे-टांगे जप्त करून त्यांना कंगाल केले. परंतु, तरीही त्यांनी पोलिसांसमोर तोंड उघडले नाही.
पुण्याच्या या श्रमकरी वर्गाने स्वतःच्या पोटाची आणि प्राणाची पर्वा न करता, केवळ देश स्वतंत्र झाला पाहिजे या एकाच भावनेने क्रांतीच्या या गाड्याला आपल्या घोड्याच्या टापांनी गती दिली होती. म्हणूनच, पुण्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा या अज्ञात, देशभक्त टांगेवाल्यांच्या त्यागाशिवाय अपूर्ण आहे.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २७ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
पंढरपूरचे वर्णन
संत तुकारामांच्या पाच हजाराहून अधिक अभंग असलेल्या या गाथेत आपण त्यांनी हाताळलेले विविध विषय आजपर्यंत पाहिले, त्यावर विचार केला आणि जमेल तेवढा अभ्यास केला. पंढरपूर हे तुकारामांचे माहेर, माऊली विठ्ठलाचे निवासस्थान! माहेर कोणाला प्रिय नसते? तुकाराम महाराजांनाही ते अत्यंत प्रिय! अशा त्यांच्या या माहेराचे वर्णन महाराजांनी अनेक अभंगातून केल्याचे गाथा वाचताना लक्षात येते. अशाच माहेरच्या वर्णनाच्या आणि मोठेपणाच्या काही अभंगांचा आपण आज परामर्श घेऊया.
पांडुरंग कुठे, कसा आणि कशासाठी उभा आहे, हे तुकाराम महाराज सामान्य माणसाला सांगत आहेत. ते म्हणतात,
आता उघडी डोळे/ जरी अद्यापी न कळे/
तरी मातेचिया खोळे/ दगड आला पोटासी/
मनुष्य देह ऐसा निध/ साधीलते साधे सिद्ध/
करुनी प्रबोध/ संत पार उतरले//
नाव चंद्रभागे तिरी/ उभी पुंडलिकाचे द्वारी
* कर धरूनिया करी/ उभा उभी पालवी*//
* तुका म्हणे फुकासाठी/ पायी घातलीया मिठी*/
होतो उठा उठी/ लवकरीच उतार//
या अभंगातून सामान्य संसारी माणसाला ते डोळे उघडायला सांगतात. तुला काहीच कसे कळत नाही, खरोखरच तुझ्या आईच्या पोटी तू दगड म्हणूनच जन्माला आलास का? असा प्रश्न त्याला विचारतात. ते म्हणतात, ” अरे तुला माणसाचा जन्म मिळाला आहे, त्याचा तू सदुपयोग का करून घेत नाहीस? या देहात तुझी सिद्धी करून घेशील ती तुला साधेल, ” असा बोध करून संत स्वतः विवेक करून संसाराच्या पार उतरले आहेत. तुला तरायचे असेल तर एक नौका आहे, ती चंद्रभागेच्या तिरावर पुंडलिकाच्या दारात कमरेवर हात ठेवून उभी आहे, आणि ती सर्वांना उभ्या-उभ्याच बोलावीत आहे. या नौकेला कोणत्याही प्रकारचे भाडे मोजावे लागत नाही. एकनिष्ठ भावाने देवाच्या पायाला मिठी घातल्यास या भवसिंधुतून पार पडता येते. ” थोडक्यात काय तर पंढरपुरासी, चंद्रभागेच्या काठी पांडुरंग प्रपंचाची नौका पार करून देण्यासाठी भक्तांच्या सेवेला हजर आहे.
महाराजांचा विठ्ठल चरणी किती हा दृढ विश्वास आहे, हे या अभंगातून सहज समजते.
रे नामाची भरली पेठ/ वाहती वाट मार्ग/
वघेची येती वाण/ अवघे शकुन लाभाचे//
अडचणी केल्या दुरी/ देण्या उरी घेण्याच्या/
तुका म्हणे जोडी झाली/ ते आपुली आपणा//
या अभंगात पंढरपूरचे वर्णन करताना महाराज म्हणतात–
पंढरी ही भक्तांना इनाम म्हणून मिळालेली पेठ आहे. या पेठेत भक्तांचे थवेच्या थवे आहेत, तिकडे जाण्याचे मार्गही भक्तांनी भरलेले आहेत
(आषाढी- कार्तिकी वारीचा यात संदर्भ असावा) या पेठेत सर्व काही उपलब्ध आहे. लाभाचे शकून भक्तगणांना होतात. भक्तांच्या देण्या घेण्याच्या सर्व अडचणी दूर केलेल्या आहेत.. लाभ करून घेतला, जे जे या पंढरपुर क्षेत्री गेले, त्या सर्वांना फायदा झालेला आहे.
अनुपम असे कार्तिकी वारीचे वर्णन तुकाराम महाराज या अभंगात करतात.
कार्तिकीचा सोहळा/ चला जाऊ पाहू डोळा*/
आले वैकुंठ जवळा/ सन्निध पंढरीये//
पीक पिकले घुमरी/ प्रेम न समाये अंबरी/
अवघी मातली पंढरी/ घरोघरी सुकाळ//
चालती स्थिर स्थिर/ गरुड टकयांचे भार/
गर्जती गंभीर/ टाळ श्रुती मृदुंग//
मिळाली या भद्र जाती/ कशा आनंदे डुलती/
शूर उठावती/ एक एक आगळे//
नामामृत कल्लोळ/ वृंदे कोंदली सकळ/
आले वैष्णव दळ/ कळी काळ कापती//
आज करिती ब्रह्मादिक/ देखुनी वाळवंटीचे सुख/
धन्य धन्य मृत्यू लोक/ म्हणती भाग्याचे कैसे//
स्मरण मुक्ती वाराणसी/ पितृ ऋण गया नासी/
धार नाही पंढरीसी/ पायापाशी विठोबाच्या//
तुका म्हणे आता/ काय करणे आम्हा चिंता/
सकळ सिद्धीचा दाता/ तो सर्वथा नुपेक्षी//
कार्तिकीच्या वारीचे वर्णन करताना सोबतच्या भक्तांना उद्देशून म्हणतात,
चला हो आपण हा वारीचा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहू या. या पंढरपुरात प्रत्यक्ष वैकुंठ आपल्याजवळ आले आहे. हरी नामाचा घोष आसमंतात घुमतो आहे, हेच मोठे पीक पिकले आहे. प्रेम आकाशात मावेनासे झाले आहे. हरीच्या प्रेम भावनेने सर्व पंढरपूर दुमदुमले आहे. घरोघरी परमार्थाचा सुकाळ चालू आहे. वैष्णव जन आनंदाने भजन करत हळूहळू थांबत थांबत चालत आहेत. त्यांनी गरुडचिन्हे असलेले ध्वज धारण केले आहेत. टाळ, मृदुंग, एकतारी, वीणा यांच्या साथीने श्रीहरीच्या नामाची गर्जना चालू आहे. मोठमोठे हत्ती गजदळात जसे डोलत असावेत, तसे एकाहून एक श्रेष्ठ विष्णू भक्त आघाडीवर चालत आहेत. भक्त जन समुदाय हरिनामाच्या अमृतघोशाने न्हाऊन निघाला आहे. विष्णू भक्तांचे हे सैन्य पाहून कली आणि काळ थरथर कापत आहेत. पंढरीच्या वाळवंटातील भजनाचे सुख आपल्याला मिळावे अशी सर्व देवांची इच्छा आहे. मृत्युलोक धन्य आहे, तेथील लोक भाग्यवान आहेत. काशीमध्ये मरण आले तर मुक्ती मिळते, पण या पंढरपुरात सर्व काही रोखीने इथेच मिळते. मग चिंता कशाची?
हा संपूर्ण अभंग वाचताना आपणही त्या वारीचाच एक भाग आहोत अशी भावना दृढ होते आणि देवाच्या द्वारी मुक्ती मिळाल्याचा पराकोटीचा आनंद मिळतो.
हे भू वरील वैकुंठ कसे आहे ते आता तुकारामांच्या वाणीतून ऐकूया.
जया दोषा परिहार/ नाही नाही धुंडीता शास्त्र/
ते हरती अपार/ पंढरपूर देखीलिया//
ज्या दोषांची प्रायश्चित्ते कोणत्याही शास्त्रात सापडत नाहीत, अशी पातके जरी हातून घडली तरी नुसत्या पंढरपुराच्या दर्शनाने ती नाहीशी होतात असा महिमा आहे.
धन्य धन्य भीमातीर/ चंद्रभागा सरोवर/
पद्म तिर्थी विठ्ठल वीर/ क्रीडा स्थळ वेणू नाद//
सकळ तीर्थांचे माहेर/ भू वैकुंठ निर्विकार/
नामाचा गजर/ असूर काळ कापती//
पंढरपूर हे भूतलीचे वैकुंठ आहे, सर्व तीर्थांचे जन्मस्थान आहे, तेथे कोणताही विकार नाही, तेथे हरी नामाचा गजर होतो त्यामुळे असुरांना, कळी काळाला कंप सुटतो.
नाही उपमा द्यावया/ समतुल्य आणिक ठाया/
धन्यवाद जया/ जे पंढरपूर देखती//
या क्षेत्राला दुसरी कशाचीही उपमा देता येत नाही. ज्यांना ज्यांना पंढरपूरचे दर्शन झाले, ते सर्व धन्य होत.
उपजोनी संसारी/ एक वेळ पाहे पा पंढरी/
महादशा कैची उरी/ देवभक्त देखीलिया//
जन्माला येऊन एकदा तरी पंढरीचे दर्शन घ्यावे. येथील पांडुरंग आणि भक्त पुंडलिक यांच्या दर्शनाने महापातके नष्ट होतात.
ऐसी विष्णूची नगरी/ चतुर्भुज नर नारी/
सुदर्शन घरटी करी/ रीघ न पुरे कळी काळा//
ते सुख वर्णावया गती/ एवढी कैची मज मती/
जे पंढरपुरा जाती/ ते पावती वैकुंठ//
अशी ही विष्णूची नगरी आहे. तेथील स्त्री-पुरुष चतुर्भुज संपन्न आहेत. सुदर्शन त्यांचे रक्षण करीत आहे, त्यामुळे काळाला इथे प्रवेश नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या पंढरपुराचे सुख वर्णन करण्याइतकी बुद्धी मजपाशी नाही. जे पंढरपुरास जातात त्याला वैकुंठप्राप्ती होते.
तुका म्हणे या शब्दांचा/ जया विश्वास नाही साचा/
तो अधम जन्मांतरीचा/ जया पंढरी नावडे//
त्यांचे असे म्हणणे आहे की या गोष्टींवर ज्यांचा विश्वास नाही आणि ज्यांना पंढरीची आवड नाही तो पूर्वजन्मीचा अधम होय.
तीर्थ केली कोटीवरी/ नाही देखिली पंढरी/
जळो त्याचे ज्यालेपण/ न देखेची समचरण//
योग याग अनंत केले/ नाही समचरण देखिले/
तुका म्हणे विठ्ठल पाई/ अनंत तीर्थे घडली पाही//
पंढरपूरचा महिमा महाराज सांगत आहेत. कोट्यावधी तीर्थयात्रा केल्या तरी ज्याने पंढरी पाहिली नाही त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही
(आग लागो त्याच्या जगण्याला) कारण विटेवरी पांडुरंगाच्या समचरणांचे दर्शन ज्यांना लाभले नाही त्यांनी कितीही योगयाग केले तरी सारे व्यर्थ आहे. एका पांडुरंगाच्या चरणस्पर्शातच अनंत तीर्थे केल्याचे पुण्य आहे.)
… “जोडीदाराला आयुष्यभर साथ देणारी पत्नी म्हणजे आदिशक्तीच नाही का ??”
आज बऱ्याच वर्षांनंतर माझी मैत्रिण ‘रिया’ भेटली. मधल्या काळात कधी तरी फोन वर बोलणं होतं असे. जून्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या चेहऱ्यावर चे भाव बघून ती लगेच म्हणालीच, “ओळखलं नाहीस ना मला. “
अग !! मी पण तुला ओळखल नाही, आम्ही दोघी मनमोकळेपणाने हसलो.
दोघींमध्ये आमूलाग्र बदल झाला होता. क्षणभर व्यक्तिमत्वांची अदलाबदल झाली की काय ?? असं वाटलं
रियाला बघून, “हीच का ती स्टाइलिश रिया जाधव ?? “असा प्रश्न मनात आला.
त्यावेळेस आमच्या मैत्रिणींमध्ये ‘रिया ‘ म्हणजे सर्वात स्टायलिश, स्वतः भोवती गरगर फिरणारी. फॅशन, योग, जॉगिंग, फिटनेस, प्रोटीन शेक, diet यावर लक्ष देणारी. त्यातच ‘चेरी ऑन केक ‘म्हणजे छान इंग्लिश बोलणारी. आमच्या सगळ्यांच्या मध्ये वेगळीच उठून दिसणारी. आमच्याच वयाची असली तरी सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायची ती. कधी कधी हेवाही वाटायचा.
प्रत्येक भेटीत तिचा काही तरी नवीन फंडा असायचा. आता काय म्हणे ?? मी पहाटे चारला उठते व व्यायाम करते.
आता काय तर, मी प्रत्येक वार प्रमाणे त्या त्या रंगाचे कपडे घालते. म्हणजे सोमवारी पांढरा तर गुरवारी पिवळा. शनिवारी काळया रंगाचा ड्रेस घालणार. रंग तोच असला तरी प्रत्येक वारी ड्रेस वेगळा असायचा. आमच्या गृप मध्ये रिया म्हणजे सर्वात स्मार्ट, वेगळीच दिसायची. तिचा ड्रेसिंग सेन्स खूप छान. व ती स्वतःला छान कॅरी करायची. एकदम ” smart impressive, fashionable, modern ” वजनावर कटाक्षाने लक्ष देणारी. तिला बघून असं वाटायचं जीवन जगावं तर असं.
स्वतः जशी टिपटॉप रहायची, तसंच तिच घरही असायचं. घर व इतर गोष्टी चां बॅलन्स तिला छान सांभाळता यायचा. मला तिचं नेहमीच कौतुक वाटायचं.
सर्व गोष्टींची एकानंतर एक आठवण आली. फॅशनमध्ये आम्ही कोणी तिच्या जवळपास ही नसायचो. खास करून मी तर अजिबात नव्हतेच.
तिच्या नवनवीन गोष्टी ऐकुन मला आश्चर्यच वाटायचे, आपल्याला कसं काहीच सुचत नाही, जमतं नाही. आपण घर, स्वयंपाक, मुल, त्यांचे डबे, परीक्षा, नवऱ्याची काळजी यातच गुंतलेलो असतो.
यातले एखादे काम कमी केले तर वेळ मिळेल का ? ? खरंतर मी अगदी चारला पहाटे वगैरे काही उठू शकत नाही, हे मला नक्की माहित होतं. पण गुरवारी पिवळी साडी किंवा ड्रेस घालणे ही साधी गोष्ट ही आपल्याला जमत नाही. मला तिच्या सारखं रहावं, फॅशन करावी असं वाटायचं, पण जमायच नाही. मनात खूप विचार यायचे. आपण बरोबर की चूक ? याचा गुंता सोडविण्यात मी बिझी असायचे.
जसं फोन मध्ये अनावश्यक डेटा सेव्ह झाला की फोन कसा हॅन्ग होतो ना, तसंच काहीसं माझ्या मनाचं व्हायच. आपल्याच वेळापत्रकाची उलट सुलट तपासणी करत रहायची. फॅशन तर काही कधी जमली नाही पण डिस्टर्ब मात्र नक्की व्हायची. कधी अगदी खूप ठरवून काही केलं तर बरं दिसतय का ?? लिपस्टिक खूप डार्क लावलं का ?? असंही वाटतं रहायचं. म्हणजे आत्मविश्वास असा नव्हताच.
फॅशन करायला एकतर मनापासून आवड असावी लागते, ती समज, तो सेन्स असावा लागतो. फॅशन तुमच्या पर्सनालिटी ला साजेशी असावी लागते. प्रसंगानुरूप, वेळेनुसार कपड्यांची, रंगाची निवड करता आली पाहिजे. फॅशन म्हणजे काही दुसऱ्यांची काॅपी करायची गोष्ट नाही. हे सर्व कळत होतं. तरी सुप्त इच्छा मात्र होती. रिया सारख कोणाला बघीतल की ती इच्छा पुन्हा पुन्हा जागृत व्हायची.
वयाप्रमाणे सर्व च बदलत गेले. मुलं मोठी झाली. अनघा कॉलेज मध्ये जाऊ लागली. अनघाला छान सुंदर तयार झालेलं बघताना मला छान वाटायचे. तिने खूप स्मार्ट रहाव असं मला नेहमी वाटायचे. माझी अपूर्ण इच्छा अनघा पूर्ण करत होती.
एकदिवस अनघा म्हणाली, आई !! माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या, “तुझी आई छान दिसते. She is very well maintained and looks young. “
आई तुझा व्यायाम व योग वर्ग बंद करू नकोस हं. अशीच छान रहा.
बाबा लगेच म्हणाले, अगं !!! अनघा एकदा आईला बाजारात घेऊन जा. तिच्या personality ला साजेसे नवीन कपडे घे. गरज वाटल्यास प्रोफेशनल हेल्प घे. तिलाही खूप आवड आहे या सर्वांची.
ब्युटिशियन ‘ मालविका ‘. अनघाची मैत्रिणी ने माझे ‘makeover ‘करून दिले. माझा हेअर कट केला. म्हणाली,
काकू हा ‘ salt n paper hair cut ‘ तुम्हाला छान दिसतोय. वेगवेगळे comfortable dresses घेतले. , make up चे प्रशिक्षण दिले. थोडक्यात मी पण फॅशन जगात / संस्थेत प्रवेश घेतला.
आपल्या वयाची मर्यादा सांभाळून मी पण उत्साहाने नवनवीन कल्पना आत्मसात करत होते. आता बऱ्यापैकी समाधान ही झाले आहे. स्वतः ला बदलणे म्हणजे आपल्या’ comfort zone ‘ मधून थोडे बाहेर निघावे लागते. हे कळले.
आता,
काकू छान दिसताय. हेअर कट छान दिसतोय. असे रिमार्क मिळताहेत.
चला, उशिरा का होईना, एक इच्छा पूर्ण झाली.
आज रिया पण म्हणाली, अग !! छान दिसतेस. Very Smart.
पूढे रिया म्हणाली, एक जमाना था, ” When I was very perticular about my looks. “
मधल्या काळात आयुष्याने एवढे रंग दाखविले की, आता रंगांचे तारतम्य विसरलेच बघ मी. रिया म्हणाली
रिया ची मुलगी ऋतुजा म्हणाली,
“मावशी !!! मागची पूर्ण बारा वर्षे बाबा आजारी होते. आईने बाबांची खूप सेवा केली. आम्हाला सांभाळले. घराकडे लक्ष दिले. “
मावशी !! मला आईला पुन्हा पुर्वी सारखं बघायचंय. तिने पुन्हा तसंच जगाव असं मला वाटतं. बाबांची पण हीच इच्छा होती.
रिया ची मागच्या बारा वर्षांची कहाणी ऐकून तिने तिच्या वर आलेल्या कठीण प्रसंगाला तिने ज्या धैर्याने तोंड दिले ते ऐकून पुर्वीची स्टाइलिश रिया नव्याने दिसली. “
आज वेगळीच रिया समोर होती. कणखर, कर्तव्यदक्ष, संयमाने आपली जबाबदारी पार पाडणारी. न डगमगता एकानंतर एक येणाऱ्या समस्यांना तोंड देणारी.
एक वेळेस आपल्या स्त्रीत्वाचा सजून धजून जगण्याचा हक्क बजावणारी, आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेणारी.
आज कर्तव्याला तेवढ्याच जबाबदारी ने पार पाडणारी.
खरंच,
आयुष्याच्या प्रवासात सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक गोष्टी घडतात. परिस्थिती नेहमी एकसारखी नसते.
“न डगमगता जोडीदाराला आयुष्यभर साथ देणारी पत्नी म्हणजे आदीशक्तीच नाही कां ?? “
म्हणतात ना,
“उस नारी का कोई मुकाबला नहीं, जिसके पास शक्ति के साथ सहनशक्ति भी हो।”
रिया म्हणाली, पूर्ण एक तप ग !!!
बहुतेक मागच्या जन्माची काही तरी परतफेड असावी. मला समाधान आहे की मी माझे कर्तव्य /सेवा मनापासून केली.
मी विचारलं, कस manage केलंस ग हे सर्व ???
रिया म्हणाली, अग म्हणतात ना,
“Mind is nothing but traffic of thoughts. Select your route carefully. “
मी संयमाने गरजेप्रमाणे वागत गेले.
या अवधीत मी फक्त एकच प्रार्थना करत होते,
हे देवा,
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया.
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया.
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया, देई रे बुद्धी रामराया.
आज पुन्हा एकदा रिया ला बघून मी तिच्या आदरयुक्त प्रेमात पडले. काही लोकांच्या संगतीत आपलं आयुष्य घडत असतं. हे नक्की.
☆ “स्वप्नातल्या कळ्यांनो!”☆ श्री संभाजी बबन गायके ☆
ती केवळ दहा वर्षांचीच आणि यापुढेही दहाच वर्षांची राहणार आहे… तिच्या आई-वडिलांच्या आणि त्याच्याही स्मृतींमध्ये. ती एका असाध्य विकाराने ग्रस्त आहे. ती म्हणजे तिचा नाजूक देह. मनाने मात्र ती एखाद्या फुललेल्या गुलाबासारखी टवटवीत… सुहास्यवदना! निष्पाप!
तिला प्रेमाचा एकच अर्थ इतक्या वर्षांत उमगू शकला आहे. आपल्या माणसाचं सान्निध्य… सततचं. मोठी माणसं त्यासाठीच तर लग्न करतात आणि एकत्रित राहतात… तिचं मन आपलं हे असा विचार करीत असायचं. तिला तो लहानपणापासूनच आवडायचा… एकत्र वाढले होते ते दोघं… रुसवे, फुगवे, भांडणे, खेळ आणि शाळा एकमेकांच्या हातांत हात गुंफूनच होत होती.
तिच्या मनातल्या परीराज्यात स्वप्नीचा राजकुमार दुसरा कुणी नव्हताच… हाच राजकुमार. ती मनात म्हणायची. लग्नगाठ बांधीन तर याच्याशीच. मोठ्या माणसांच्या लग्नसमारंभांना ती जायची याचसाठी की तिथं कसं असतं सगळं, काय काय करतात हे डोळ्यांत साठवून ठेवायचं आणि अगदी तसंच करायचं आपल्याही लग्नात. त्यांच्याकडे बाहुल्या असतात, आणि त्यांचीही लग्नं लावली जातात. पोरांच्या खेळांत!
पण तिला आता खूपच घाई झाली होती. आणखी आठ वर्षे थांबण्याची तिला परवानगी नव्हती. आणि ती मागणारही नव्हती. त्या जीवाला त्याच्या श्वासांची सीमा ठाऊक होती. पैलतीर खुणावतो आहे… आणि काळ त्याबाजूला तिला ढकलतो आहे… ! ही काही शाळा नव्हे… आज मी नाही जाणार शाळेला… असं आईला सांगायला. एकवेळ आई “रहा आजच्या दिवस घरी!” असं म्हणेलही… पण मृत्यूदेवतेचे दूत न्यायला येतातच… आणि मग जावंच लागतं!
रूग्णालयातल्या शय्येवर निजलेली असताना तिने एकेदिवशी तिच्या वडिलांचा हात हातांत घेतला.. आणि म्हणाली… ”बाबा, मला नवरी व्हायचं आहे. ! त्याच्याशी लग्न करायचं आहे.. तुम्हांला माहीत आहे ना तो… त्याच्याशिवाय मला करमत नाही. !”
डबडबल्या डोळ्यांनी या वधूपित्याने तयारी सुरु केली. काही काही कमी पडू दिलं नाही या कन्यादानात. पै-पाहुण्यांनी अंगण भरून गेलं. प्रत्येकाच्या चेह-यावरच्या हस-या मुखवट्याखाली एक ठसठसणारी वेदना होती. ती डोळ्यांतून डोकावत होती. खरं तर बापानं सर्वांना बजावलं होतं. माझ्या लेकीच्या आनंदाचा प्रसंग आहे… आसवांना थांबवून ठेवा… पुढे लवकरच त्यांनाही बोलावलं जाईल!
ती आणि तो… सजले.. धजले… आणि लाजलेही. तो सामोरा येताच ती मुग्ध होऊन त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत राहिली.. तिचे एवढेसे दोन डोळे. त्याच्या प्रेमाचं सारं ब्रम्हांड साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. जागा पुरणार नव्हती… पण उरणारही नव्हती… ती चालत असलेली वाट मात्र सरणार होती.
त्याने तिचा हात हाती घेतला. टाळ्यांचा कडकडाट झाला. बापाचे थरथरते हात तिच्या खांद्यांवर आणि ओठ तिच्या क्षितिजाएवढ्या कपाळावर. ”सुखी जीवनाच्या शुभेच्छा, बेटा!” तो कसाबसा म्हणाला! आई तर वेदनेचा एक प्रवाह झाली होती. वाहत वाहत दूरवर चालली होती. तिने तिला घट्ट मिठी मारली.. न बोलता खूप काही बोलून गेली!
सोहळा खरं तर सोळा दिवस होत राहिला पाहिजे… पण चार दिवस आधीच तिच्या शरीरातल्या श्वासांनी प्रस्थान ठेवलं.. पण ती नवपरिणीत पोर सुहास्य वदनाने तिच्या माहेरी. दूर आभाळात निघून गेली.. पुन्हा न परतण्यासाठी!
… इकडे विल्यम शेक्सपिअर The marriage of true minds लिहित होते… ”दोन पवित्र जीवांच्या मिलनात कोणताही अडथळा यावा, असं कोणतंही कारण मला तरी दिसत नाही. प्रेम म्हणजे समुद्रात भटकणा-या जहाजांचा ध्रुवतारा. दिशादर्शक! खरं प्रेम काळाच्या तडाख्यात मोडून पडत नाही. ते जगाच्या अंतापर्यंत ताठ उभं राहतं… आणि माझं हे म्हणणं जर खरं ठरलं नाही तर असं समजा की मी कधीच काही लिहिलं नाही आणि या जगात कुणी कधी प्रेमच केलं नाही!”
– – – – इंटरनेट म्हणजे एक मोहाची दुनिया. इथं कधी कधी असलं काही हाती लागतं. आणि शब्द मनात थांबत नाहीत! गोष्ट परदेशातली आहे… एका दहा वर्षाच्या मुलीला असाध्य विकार आहे… तिच्याकडे आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. तिला तिच्या बालमित्राशी खरंखुरं लग्न करायचं आहे… तसा तिचा हट्टच आहे म्हणा. मग तिच्या आई-वडिलांनीही आणि त्या मुलाच्याही आई-वडिलांनी तिला हा न भविष्यति अनुभव देण्याचं ठरवलं आणि तसं घडवूनही आणलं. ती वधू तिच्या वराच्या डोळ्यांत पाहताना तिच्या डोळ्यांकडे पहा. तुम्हांलाही काहीतरी निश्चित दिसेल… !
(छायाचित्र साभार. विल्यम शेक्सपिअर यांच्या कवितेचा मी लिहिलेला अर्थ मूळ अर्थाबरहुकुम असेलच असं नाही. केवळ संदर्भ दिला आहे.)
☆ चांगला नवरा मिळत नाही…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
लग्न करायला चांगला नवरा मिळत नाही, मग बॉयफ्रेंड कसे मिळतात ?
आजकाल अनेक मुलींच्या तोंडी एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं – “लग्नासाठी चांगला मुलगा मिळत नाही हो. ” हे वाक्य ऐकलं की माझ्या मनात नेहमी एक साधा प्रश्न उभा राहतो – मग बॉयफ्रेंड कसे मिळतात?
कारण कॉलेजपासून ऑफिसपर्यंत, बसस्टॉपपासून सोशल मीडियापर्यंत, मित्र शोधण्याची प्रक्रिया अगदी वेगाने चालू असते. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते, इंस्टाग्रामवर लाईक्सची देवाणघेवाण होते, व्हॉट्सअॅपवर गुड मॉर्निंगची फुले उमलतात आणि काही दिवसांत फक्त मित्र हा शब्द स्पेशल फ्रेंड पर्यंत पोहोचतो. तेव्हा कुणी उंची मोजत नाही, पगाराची स्लिप मागत नाही, बँक बॅलन्स तपासत नाही किंवा स्वतःचं घर आहे का? याची चौकशी करत नाही. पण ज्या क्षणी लग्नाचा विषय निघतो, तेव्हा अचानक सगळे निकष जागे होतात.
मुलगा उंच हवा, पगार मोठा हवा, स्वतःचं घर हवं, चारचाकी हवी, सवयी चांगल्या हव्यात, व्यसन नसावं, सासू-सासरे समजूतदार हवेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा देखणा हवा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बॉयफ्रेंडसाठी मन चालतं आणि नवऱ्यासाठी गणित!
दुसरीकडे मुलांचंही काही वेगळं नसतं. प्रेमात असताना ते म्हणतात, “तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून आणीन. ” पण लग्नाची वेळ आली की प्रश्न बदलतात. घर किती मोठं आहे, नोकरी काय आहे, अपेक्षा काय आहेत, हे सगळं महत्त्वाचं वाटू लागतं. प्रेमात भावना असतात, पण लग्नात जबाबदाऱ्या असतात.
बॉयफ्रेंड निवडताना अनेकदा वर्तमान पाहिलं जातं, तर नवरा निवडताना भविष्य पाहिलं जातं. म्हणूनच प्रेमासाठी योग्य वाटणारी व्यक्ती आयुष्यभराच्या सहजीवनासाठी योग्य वाटेलच असं नाही.
आजची खरी समस्या ‘चांगला नवरा मिळत नाही’ ही नसून ‘परिपूर्ण नवरा शोधण्याचा अट्टाहास’ ही आहे. कारण परिपूर्ण माणूस या जगात कुठेच नाही. प्रत्येकामध्ये काही गुण असतात, काही उणिवा असतात. संसार हा गुणांच्या प्रदर्शनावर चालत नाही, तर उणिवांच्या स्वीकारावर चालतो.
कधीकधी जे लोक म्हणतात की चांगले मुलगे मिळत नाहीत, त्यांनी स्वतःलाही एक प्रश्न विचारायला हवा मी ज्या गुणांचा नवरा शोधते, ते गुण माझ्यात कितपत आहेत? आणि मुलांनीही स्वतःला विचारायला हवं मी ज्या मुलीची अपेक्षा करतो, तिच्या अपेक्षांना मी पात्र आहे का? कारण नातं हे खरेदी-विक्रीचा व्यवहार नसतो. तो दोन माणसांनी एकमेकांच्या सुख-दुःखात उभं राहण्याचा करार असतो.
आजच्या काळात एक विचित्र गोष्ट दिसते. बॉयफ्रेंड शोधताना आपण हसणारा चेहरा पाहतो, पण नवरा शोधताना बँक बॅलन्स पाहतो. प्रेमात स्वभावापेक्षा आकर्षण महत्त्वाचं वाटतं, तर लग्नात माणसापेक्षा त्याची परिस्थिती. मग नंतर तक्रार केली जाते की चांगले लोक मिळत नाहीत. खरं तर चांगले लोक आजही आहेत, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
ज्याच्याकडे महागडी गाडी नाही, पण मन मोठं आहे, तो अनेकदा दुर्लक्षित राहतो. ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही, पण जबाबदारीची जाणीव आहे, त्याला संधी मिळत नाही. आणि मग वर्षानुवर्षे ‘योग्य व्यक्ती’ शोधण्याचा प्रवास सुरूच राहतो.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं. बॉयफ्रेंड मिळवणं सोपं असतं, कारण तिथे स्वप्नं विकली जातात. नवरा मिळवणं कठीण वाटतं, कारण तिथे आयुष्य जगायचं असतं. स्वप्नांमध्ये चुका चालतात, पण संसारात वास्तव स्वीकारावं लागतं. म्हणून चांगला नवरा शोधण्यापेक्षा चांगला माणूस ओळखायला शिका. कारण सुखी संसार चेहऱ्याने, पगाराने किंवा गाडीने टिकत नाही; तो विश्वास, स्वभाव, समजूतदारपणा आणि परस्पर आदराने टिकतो.
आणि म्हणूनच प्रश्न “चांगला नवरा कुठे मिळेल?” हा नसून, “चांगला माणूस ओळखण्याची आपली नजर किती चांगली आहे?” हा असायला हवा. हाच प्रश्न समजला, तर कदाचित अनेकांची नवरा शोधण्याची समस्या आपोआप सुटेल.
*
लेखक:अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
☆ महावस्त्राचे पदर – भाग १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
महावस्त्र नात्यांचं
‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे,
जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे..’
अतिशय अर्थपूर्ण असं हे गाणं. आपल्या आयुष्याला तंतोतंत लागू पडणारं. क्षणभर त्यातील सुखदुःखाचा विषय आपण बाजूला ठेवू, पण आपलं आयुष्य हे एक सुंदर असं जरतारी वस्त्र आहे. जेव्हा आपण नात्यांचा विचार करतो, तेव्हा हे एका ‘महावस्त्राचं’ रूप घेतं.
आपण ज्या घरात जन्म घेतो, त्या घरापासून आणि जन्मापासून काही नाती आपल्याला उपजतच मिळतात. आई, वडील, बहीण, भाऊ यासारखी अनेक नाती रक्ताची असतात. पण आपण समाजात जसजसे मोठे होत जातो, तशी आणखीही अनेक नाती आपल्याशी जोडली जातात. मग ती नाती बऱ्याच वेळा रक्तापलीकडची असतात. अशी बिनरक्ताची नाती कित्येकदा रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असतात. अशी सगळी नाती मिळून तयार होतं ते भरजरी महावस्त्र ! यातील मधले एकमेकात गुंफलेले घट्ट धागे असतात रक्ताच्या नात्यांचे; बाजूची रुपेरी किनार असते समाज नावाच्या नात्याची; आणि पदरावर जी मोरपंखी नक्षी असते ना, ती असते जिवलग मित्रांची! त्यांच्यामुळेच ही भरजरी पैठणी शोभून दिसते. वस्त्राला ‘पट’ असाही एक सुंदर शब्द आहे. आपल्या आयुष्याचा पट अशा अनेक रंगीबेरंगी धाग्यांनी विणला गेलेला असतो.
पण… पण… असा भरजरी पट प्रत्येकाच्याच नशिबी येतो का? कदाचित नाही. कुणाच्या वाट्याला महावस्त्र येतं, तर कुणाच्या वाट्याला जाडंभरडं वस्त्र. कुठे या महावस्त्राचे इंद्रधनुषी रंग शोभून दिसतात, तर कुठे ते फिकट झालेले असतात. पण जे वस्त्र आणि जसं वस्त्र तुमच्या वाट्याला आलं असेल, ते तुम्हाला स्वीकारावंच लागतं. काही जण आपल्या कर्तृत्वाने या वस्त्रात इतके सुंदर रंग भरतात की साध्या वस्त्राचंही महावस्त्र होतं; आणि दुर्दैवाने एखादी व्यक्ती आपल्याला मिळालेलं भरजरी वस्त्रही मातीमोल करते.
महाभारतातल्या कर्णाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरं तर तो ज्येष्ठ कुंतीपुत्र आणि अत्यंत तेजस्वी असा सूर्यपुत्र. राज्यावर पहिला हक्क त्याचा. पण जन्म होतो आणि त्याचा त्याग त्याच्या आईलाच करावा लागतो. तरीही, आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने आपल्याला मिळालेल्या या जाड्याभरड्या वस्त्राचं रूपांतर तो महावस्त्रात करतो. तो अभिमानाने सांगतो:
सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्।
दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्॥
(मी विणकर वा विणकर पुत्र जे काही असेल ते दैवामुळे आहे. कोणत्या कुळात जन्म घ्यायचा हे माझ्या हातात नाही, पण माझ्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने मोठे व्हायचे की नाही ही गोष्ट नक्कीच माझ्या हातात आहे.)
याउलट रावणाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर असं दिसतं की रावण ऐश्वर्यसंपन्न होता, शक्तिमान होता, विद्वान होता, शंकराचा परमभक्त होता, लंकेसारख्या सुवर्णनगरीचा राजा झाला होता. एका अर्थाने त्याच्या पदरात पडलेले हे महावस्त्रच होते. पण आपल्या नैतिक अध:पतनाने आणि अहंकारामुळे त्याने या वस्त्राचे पार पोतेरे केले.
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं आपण म्हणतो, पण माणसाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचं बळ देणारी खरी शक्ती नात्यांमध्ये असते. जन्माला आल्यापासून ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण अनेक नात्यांच्या धाग्यांनी वेढलेले असतो. काही नाती रक्ताची असतात, तर काही नाती प्रेमाची, विश्वासाची आणि कर्तव्याची असतात. ही नात्यांची वीण जेवढी घट्ट, तेवढं कुटुंब निकोप; आणि कुटुंब जेवढं निकोप, तेवढा समाज आणि देश सुदृढ. नाती ही केवळ आपणा सर्वांना एकमेकांशी जोडणारी साखळी नसून, ती संपूर्ण समाजाला अंतर्गत ऊर्जा देणारी एक जिवंत व्यवस्था आहे. म्हणूनच, मिळालेली नाती जपायला हवीत, वाढवायला हवीत.
नात्यांमध्ये एक अद्भूत सामर्थ्य असतं. ती जशी कुटुंब आणि समाजाला एकत्र बांधून ठेवतात, जोडतात; तशीच जर ती कमकुवत झाली, तर संपूर्ण व्यवस्था तोडण्याची विनाशकारी ताकदही त्यांच्यात असते. एका सुताचा धागा कमकुवत झाला की अख्खं वस्त्र विस्कळीत व्हावं, तसंच एखाद्या नात्यात वितुष्ट आलं की संपूर्ण कुटुंब कोलमडून पडतं. म्हणूनच, निकोप नात्यांमधून निकोप कुटुंब आणि निकोप कुटुंबांमधून एका निकोप, बलशाली राष्ट्राची निर्मिती होत असते. देश जोडायचा असेल, तर आधी घराघरातील नात्यांचा सांधा भक्कम असावा लागतो.
आपल्या भारतीय संस्कृतीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ऐतिहासिक, सामाजिक आणि अध्यात्मिक परंपरांचा या नात्यांवर असलेला गहिरा प्रभाव. आपल्याकडे नात्यांकडे केवळ एक ‘करार’ (Contract) म्हणून पाहिले गेले नाही, तर ती एक साधना मानली गेली आहे. आपल्या परंपरा जेवढ्या उज्वल, तेवढाच आपल्या नात्यांचा दर्जाही उच्च आणि उदात्त राहिला आहे.
याचा सर्वात मोठा आणि आदर्श वस्तुपाठ आपल्याला ‘रामायण’ काळात पाहायला मिळतो. रामायणाने मानवी नात्यांचे जे आदर्श निर्माण केले, ते आजही मानवी संस्कृतीचे दीपस्तंभ आहेत. पित्याचे वचन पाळणारा पुत्र, पुत्रासाठी प्राण त्यागणारा पिता; वशिष्ठांसारखे ऋषितुल्य गुरु आणि त्यांच्या चरणी लीन होणारा शिष्य; राम-लक्ष्मण-भरत यांच्यातील नि:स्वार्थ बंधुप्रेम; सुग्रीव आणि बिभीषणासारखे मित्र; हनुमंतासारखा परमभक्त आणि सेवक; आणि सुख-दुःखात सावलीसारखी पाठीशी राहणारी पत्नी… रामायणातील प्रत्येक नातं कर्तव्याच्या आणि त्यागाच्या एका अत्युच्च पातळीवर विणलं गेलं होतं. तिथे स्वार्थाला जागा नव्हती, म्हणूनच तो रामराज्य नावाचा एक सुवर्णकाळ ठरला.
परंतु, काळाचे चक्र फिरले आणि ‘महाभारत’ काळात ही परंपरा काहीशी खंडित झाली, नव्हे ती कलंकित झाली. महाभारताचा पट हा मानवी नात्यांच्या विस्कळीतपणाचा आणि मर्यादांचा पट आहे. तिथे सत्तेचा लोभ, अहंकार आणि महत्त्वाकांक्षा एवढीणी टोकाला गेली की, रक्ताची नाती एकमेकांच्या रक्ताची तहानलेली झाली. गुरु-शिष्याचे नाते, बंधुत्वाचे नाते, ज्येष्ठ-श्रेष्ठांचे मान-सन्मान सत्तेच्या सारीपाटावर पणाला लावले गेले. जेव्हा नात्यांमध्ये कर्तव्याऐवजी स्वार्थ आणि प्रेमाऐवजी मत्सर जागा होतो, तेव्हा महाभारतासारखा विनाश अटळ असतो, हाच धडा आपल्याला इतिहासाने दिला.
आज आपण एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे वर्तमान परिस्थितीत जगत आहोत. आजची कुटुंब व्यवस्था एका अत्यंत संवेदनशील वळणावर उभी आहे. काळाने आणि आधुनिकतेने आपल्यासमोर अनेक नवी आव्हाने उभी केली आहेत. तंत्रज्ञानाच्या जाळ्याने आपल्याला जगभरातल्या लोकांशी जोडले असले, तरी शेजारी बसलेल्या आपल्या माणसापासून आपण दुरावत चाललो आहोत की काय, अशी भीती वाटू लागली आहे. एकत्र कुटुंब पद्धती मागे पडून विभक्त कुटुंबे आली आणि आता तर ‘फ्लॅट संस्कृती’मध्ये माणसे अधिक आत्मकेंद्रित होऊ लागली आहेत. नात्यांची वीण उसवू लागली आहे. नात्यांच्या या महावस्त्राचं रूपांतर एखाद्या टॉवेलमध्ये होतं की काय, अशी भीती वाटू लागली आहे. टॉवेलला आपण गरजेपुर्ते हात पुसतो आणि बाजूला ठेवतो. नाती अशी असतात का ?
आजच्या या गतिमान, यांत्रिक युगात संवाद हरवत चालला आहे आणि जिथे संवाद संपतो, तिथे नात्यांची वीण सैल होऊ लागते. संवाद नसलेली नाती म्हणजे केवळ नावापुरती उरलेली नात्यांची एक चौकट. आजच्या तरुण पिढीसमोर आणि आपल्या सर्वांसमोरच हे मोठे आव्हान आहे की, या बदलत्या काळात नात्यांमधील पूर्वीचा तो ओलावा, तो जिव्हाळा आणि ती विश्वासाची ऊब कशी टिकवून ठेवायची? एक गोष्ट मात्र नक्की की स्नेहजलाचं सिंचन झालं की नाती उमलून येतात. स्नेह जाऊन त्याची जागा स्वार्थाने घेतली की नाती कोमेजतात. म्हणूनच जिथे अकृत्रिम प्रेम असते आणि केवळ स्वार्थाला थारा नसतो तिथले नात्यांचे रंग कधीही फिके होत नाहीत.
याच सगळ्या गदारोळात, मनात एका नव्या सृजनाचा अंकुर फुटला. मनात आले, काळाच्या प्रवाहात आपण जे मागे सोडत चाललो आहोत, याची पुनश्च एकदा जाणीव करून द्यायला हवी. वस्त्रातील उभे-आडवे धागे जसे प्रेमाने एकत्र येतात आणि एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, तसाच हा दिशाहीन होत चाललेला समाज पुन्हा एकदा नात्यांच्या सूत्रात गुंफायला हवा. या विचारातूनच ‘नात्यांचं महावस्त्र’ या लेखमालेचा जन्म होतोय.
महावस्त्र हे वेगवेगळ्या रंगांच्या, रेशमी मुलायम पण बळकट अशा धाग्यांच्या एकत्र विणण्यातून तयार होतं. या लेखमालेच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील अशाच काही अमूल्य, रेशमी नात्यांचे पदर उलगडणार आहोत. आईचे नि:स्वार्थ वात्सल्य, बाबांचे आकाशाएवढे छत्र, आजी-आजोबांच्या संस्कारांची शिदोरी, भाऊ-बहिणीचे निखळ प्रेम, मावशी आणि काकांचा मायेचा आधार, सुख-दुःखात पाठीशी राहणारा मित्र आणि आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा गुरु… या सर्व नात्यांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
या महावस्त्राचा एक-एक धागा आपण अत्यंत मायेने आणि जिव्हाळ्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. हे महावस्त्र जितकं सुंदर विणलं जाईल, तेवढं आपलं घर, आपला समाज आणि आपले जगणं अधिक सुकर आणि आनंदी होईल. या वैचारिक आणि भावनिक प्रवासात आपण माझ्या सोबत नक्कीच असाल, ही खात्री आहे.