मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ४ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – ४ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्लोक ३१ ते ४० 

श्ववृत्तिव्यासङ्गो नियतमथ मिथ्याप्रलपनं

कुतर्केश्वभ्यासः सततपरपैशुन्यमननम् ।

अपि श्रावं श्रावं मम तु पुनरेवं गुणगणा-

नृते त्वत्को नाम क्षणमपि निरीक्षेत वदनम् ॥ ३१॥

*
विशालाभ्यामाभ्यां किमिह नयनाभ्यां खलु फलं

न याभ्यामालीढा परमरमणीया तव तनुः ।

अयं हि न्यक्कारो जननि मनुजस्य श्रवणयो-

र्ययोर्नान्तर्यातस्तव लहरिलीलाकलकलः ॥ ३२॥

*

विमानैः स्वच्छन्दं सुरपुरमयन्ते सुकृतिनः

पतन्ति द्राक् पापा जननि नरकान्तः परवशाः ।

विभागोऽयं तस्मिन्नशुभमयमूर्तौ जनपदे

न यत्र त्वं लीलादलितमनुजाशेषकलुषा ॥ ३३॥

*

अपि घ्नन्तो विप्रानविरतमुशन्तो गुरुसतीः

पिबन्तो मैरेयं पुनरपि हरन्तश्च कनकम् ।

विहाय त्वय्यन्ते तनुमतनुदानाध्वरजुषा-

मुपर्यम्ब क्रीडन्त्यखिलसुरसम्भावितपदाः ॥ ३४॥

*

अलभ्यं सौरभ्यं हरति सततं यः सुमनसां

क्षणादेव प्राणानपि विरहशस्त्रक्षतहृदाम् ।

त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात्

पुनीते सोऽपि द्रागहह पवमानस्त्रिभुवनम् ॥ ३५॥

*

कियन्तः सन्त्येके नियतमिहलोकार्थघटकाः

परे पूतात्मानः कति च परलोकप्रणयिनः ।

सुखं शेते मातस्तव खलु कृपातः पुनरयं

जगन्नाथः शश्वत्त्वयि निहितलोकद्वयभरः ॥ ३६॥

*

भवत्या हि व्रात्याधमपतितपाखण्डपरिषत्

परित्राणस्नेहः श्लथयितुमशक्यः खलु यथा ।

ममाप्येवं प्रेमा दुरितनिवहेष्वम्ब जगति

स्वभावोऽयं सर्वैरपि खलु यतो दुष्परिहरः ॥ ३७॥

*

प्रदोषान्तर्नृत्यत्पुरमथनलीलोद्धृतजटा-

तटाभोगप्रेङ्खल्लहरिभुजसन्तानविधुतिः ।

बिलक्रोडक्रीडज्जलडमरुटङ्कारसुभग-

स्तिरोधत्तां तापं त्रिदशतटिनीताण्डवविधिः ॥ ३८॥

*

सदैव त्वय्येवार्पितकुशलचिन्ताभरमिमं

यदि त्वं मामम्ब त्यजसि समयेऽस्मिन्सुविषमे ।

तदा विश्वासोऽयं त्रिभुवनतलादस्तमयते

निराधारा चेयं भवति खलु निर्व्याजकरुणा ॥ ३९॥

*

कपर्दादुल्लस्य प्रणयमिलदर्धाङ्गयुवतेः

पुरारेः प्रेङ्खन्त्यो मृदुलतरसीमन्तसरणौ ।

भवान्या सापत्न्यस्फुरितनयनं कोमलरुचा

करेणाक्षिप्तास्ते जननि विजयन्तां लहरयः ॥ ४०॥

मराठी भावानुवाद – – 

सारमेय वृत्ती ठेवुन मी सैरभैर सर्वदा

असत्य भाषण कुतर्कामध्ये गर्क राहतो सदा

सज्जन दुर्जन चाड न ठेवुन करितो परनिंदा

नाम तुझे मी सदैव घेतो पाही मज एकदा ॥३१॥

*

सुंदर नेत्र आकर्ण जरी नाही तुला देखिले

लाभ न काही विशाल नयनी तन्वांग न पाहिले

तव लहरींचे सुरेल संगीत निनादूनी आले

कर्णांची अवहेलना तयांनी ना ऐकले ॥३२॥

*

द्युलोकी जाती पुण्यात्मे बसुन विमानात

पापि जनास स्थान असते केवळ नरकात

कृपेने तुझ्या गङ्गामाते पाप नष्ट होत

तुझा वास नाही तेथे जीवन अशूभ होत ॥३३॥

*

ब्रह्महत्या मद्यपी तथा सुवर्ण शर्विलक

गुरुपत्नीची अभिलाषा मनि असे घोर पातक

अंत्यकाळी परि विलीन होती तव प्रवाही माते

सुरांसि वाञ्छित मोक्षाचे पद प्राप्त होई त्यांते ॥३४॥

*

वियोगशस्त्राने घायळ त्याचा घेई प्राण

अलभ्य सुगंध पुष्पांमधला सदैव ने चोरून

वायूदेवे चंचल लहरी करी त्यांही पावन

पवित्र होती तव लाटांनी विश्वलोक तीन ॥३५॥

*

परोपकारासाठी जगती कितीक या जगतात

पावन आत्मे परलोकाची आंस मनी धरतात

इह-परलोक भार तुजवरी निःशंके सोपवी

जगन्नाथ सुखनिद्रा शांत निवांतशी घेई ॥३६॥

*

नीच पतित पाखंड्यांचे तू करी परित्राण

त्याग तयांचा करणे तुजला होते महाकठीण

पापाचरणी अतीव जडला मोह माझिया मनी

त्याग करणे अशक्य असतो स्वभाव सकल जनी ॥३७॥

*

नर्तन करता त्रिपुरारीच्या जटा जशा विखुरल्या

जटांवरी लहरींच्या तुझिया भुजा रुंद पसरल्या

गुंफेतुनी जलडमरू करतो ध्वनी मधुर सुरेल

शिवतांडव हे दुःख जगाचे खचीत हटवील ॥३८॥

*

विसंबुनीया आर्द्र दयेवर उभा तुझ्या पायाशी

त्यागशील जर मजशी माते घात विश्वासासी

त्रैलोक्यासी तव करुणेचा असे महाऽधार

निष्कपटी करुणेचा होइल उध्वस्त आधार ॥३९॥

*

अर्धांगिनी प्रेमाची वसते वामांगी शिवाच्या

सवति मत्सरे क्रोधित किरणे नयनातून उमेच्या

प्रकट जाहल्या जटेजटेतुन लहरी गङ्गेच्या

विजयी होवो लोभस लहरी देवी भागिरथीच्या ॥४०॥

– क्रमशः भाग चौथा  

कवी : श्री जगन्नाथ पंडित 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्वप्नातल्या कळ्यांनो!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“स्वप्नातल्या कळ्यांनो! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

ती केवळ दहा वर्षांचीच आणि यापुढेही दहाच वर्षांची राहणार आहे… तिच्या आई-वडिलांच्या आणि त्याच्याही स्मृतींमध्ये. ती एका असाध्य विकाराने ग्रस्त आहे. ती म्हणजे तिचा नाजूक देह. मनाने मात्र ती एखाद्या फुललेल्या गुलाबासारखी टवटवीत… सुहास्यवदना! निष्पाप! 

तिला प्रेमाचा एकच अर्थ इतक्या वर्षांत उमगू शकला आहे. आपल्या माणसाचं सान्निध्य… सततचं. मोठी माणसं त्यासाठीच तर लग्न करतात आणि एकत्रित राहतात… तिचं मन आपलं हे असा विचार करीत असायचं. तिला तो लहानपणापासूनच आवडायचा… एकत्र वाढले होते ते दोघं… रुसवे, फुगवे, भांडणे, खेळ आणि शाळा एकमेकांच्या हातांत हात गुंफूनच होत होती.

तिच्या मनातल्या परीराज्यात स्वप्नीचा राजकुमार दुसरा कुणी नव्हताच… हाच राजकुमार. ती मनात म्हणायची. लग्नगाठ बांधीन तर याच्याशीच. मोठ्या माणसांच्या लग्नसमारंभांना ती जायची याचसाठी की तिथं कसं असतं सगळं, काय काय करतात हे डोळ्यांत साठवून ठेवायचं आणि अगदी तसंच करायचं आपल्याही लग्नात. त्यांच्याकडे बाहुल्या असतात, आणि त्यांचीही लग्नं लावली जातात. पोरांच्या खेळांत!

पण तिला आता खूपच घाई झाली होती. आणखी आठ वर्षे थांबण्याची तिला परवानगी नव्हती. आणि ती मागणारही नव्हती. त्या जीवाला त्याच्या श्वासांची सीमा ठाऊक होती. पैलतीर खुणावतो आहे… आणि काळ त्याबाजूला तिला ढकलतो आहे… ! ही काही शाळा नव्हे… आज मी नाही जाणार शाळेला… असं आईला सांगायला. एकवेळ आई “रहा आजच्या दिवस घरी!” असं म्हणेलही… पण मृत्यूदेवतेचे दूत न्यायला येतातच… आणि मग जावंच लागतं! 

रूग्णालयातल्या शय्येवर निजलेली असताना तिने एकेदिवशी तिच्या वडिलांचा हात हातांत घेतला.. आणि म्हणाली… ”बाबा, मला नवरी व्हायचं आहे. ! त्याच्याशी लग्न करायचं आहे.. तुम्हांला माहीत आहे ना तो… त्याच्याशिवाय मला करमत नाही. !” 

डबडबल्या डोळ्यांनी या वधूपित्याने तयारी सुरु केली. काही काही कमी पडू दिलं नाही या कन्यादानात. पै-पाहुण्यांनी अंगण भरून गेलं. प्रत्येकाच्या चेह-यावरच्या हस-या मुखवट्याखाली एक ठसठसणारी वेदना होती. ती डोळ्यांतून डोकावत होती. खरं तर बापानं सर्वांना बजावलं होतं. माझ्या लेकीच्या आनंदाचा प्रसंग आहे… आसवांना थांबवून ठेवा… पुढे लवकरच त्यांनाही बोलावलं जाईल! 

ती आणि तो… सजले.. धजले… आणि लाजलेही. तो सामोरा येताच ती मुग्ध होऊन त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत राहिली.. तिचे एवढेसे दोन डोळे. त्याच्या प्रेमाचं सारं ब्रम्हांड साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. जागा पुरणार नव्हती… पण उरणारही नव्हती… ती चालत असलेली वाट मात्र सरणार होती.

त्याने तिचा हात हाती घेतला. टाळ्यांचा कडकडाट झाला. बापाचे थरथरते हात तिच्या खांद्यांवर आणि ओठ तिच्या क्षितिजाएवढ्या कपाळावर. ”सुखी जीवनाच्या शुभेच्छा, बेटा!” तो कसाबसा म्हणाला! आई तर वेदनेचा एक प्रवाह झाली होती. वाहत वाहत दूरवर चालली होती. तिने तिला घट्ट मिठी मारली.. न बोलता खूप काही बोलून गेली! 

सोहळा खरं तर सोळा दिवस होत राहिला पाहिजे… पण चार दिवस आधीच तिच्या शरीरातल्या श्वासांनी प्रस्थान ठेवलं.. पण ती नवपरिणीत पोर सुहास्य वदनाने तिच्या माहेरी. दूर आभाळात निघून गेली.. पुन्हा न परतण्यासाठी! 

… इकडे विल्यम शेक्सपिअर The marriage of true minds लिहित होते… ”दोन पवित्र जीवांच्या मिलनात कोणताही अडथळा यावा, असं कोणतंही कारण मला तरी दिसत नाही. प्रेम म्हणजे समुद्रात भटकणा-या जहाजांचा ध्रुवतारा. दिशादर्शक! खरं प्रेम काळाच्या तडाख्यात मोडून पडत नाही. ते जगाच्या अंतापर्यंत ताठ उभं राहतं… आणि माझं हे म्हणणं जर खरं ठरलं नाही तर असं समजा की मी कधीच काही लिहिलं नाही आणि या जगात कुणी कधी प्रेमच केलं नाही!”

– – – – इंटरनेट म्हणजे एक मोहाची दुनिया. इथं कधी कधी असलं काही हाती लागतं. आणि शब्द मनात थांबत नाहीत! गोष्ट परदेशातली आहे… एका दहा वर्षाच्या मुलीला असाध्य विकार आहे… तिच्याकडे आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. तिला तिच्या बालमित्राशी खरंखुरं लग्न करायचं आहे… तसा तिचा हट्टच आहे म्हणा. मग तिच्या आई-वडिलांनीही आणि त्या मुलाच्याही आई-वडिलांनी तिला हा न भविष्यति अनुभव देण्याचं ठरवलं आणि तसं घडवूनही आणलं. ती वधू तिच्या वराच्या डोळ्यांत पाहताना तिच्या डोळ्यांकडे पहा. तुम्हांलाही काहीतरी निश्चित दिसेल… ! 

(छायाचित्र साभार. विल्यम शेक्सपिअर यांच्या कवितेचा मी लिहिलेला अर्थ मूळ अर्थाबरहुकुम असेलच असं नाही. केवळ संदर्भ दिला आहे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चांगला नवरा मिळत नाही… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चांगला नवरा मिळत नाही… – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

लग्न करायला चांगला नवरा मिळत नाही, मग बॉयफ्रेंड कसे मिळतात ?

आजकाल अनेक मुलींच्या तोंडी एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं – “लग्नासाठी चांगला मुलगा मिळत नाही हो. ” हे वाक्य ऐकलं की माझ्या मनात नेहमी एक साधा प्रश्न उभा राहतो – मग बॉयफ्रेंड कसे मिळतात?

कारण कॉलेजपासून ऑफिसपर्यंत, बसस्टॉपपासून सोशल मीडियापर्यंत, मित्र शोधण्याची प्रक्रिया अगदी वेगाने चालू असते. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते, इंस्टाग्रामवर लाईक्सची देवाणघेवाण होते, व्हॉट्सअॅपवर गुड मॉर्निंगची फुले उमलतात आणि काही दिवसांत फक्त मित्र हा शब्द स्पेशल फ्रेंड पर्यंत पोहोचतो. तेव्हा कुणी उंची मोजत नाही, पगाराची स्लिप मागत नाही, बँक बॅलन्स तपासत नाही किंवा स्वतःचं घर आहे का? याची चौकशी करत नाही. पण ज्या क्षणी लग्नाचा विषय निघतो, तेव्हा अचानक सगळे निकष जागे होतात.

मुलगा उंच हवा, पगार मोठा हवा, स्वतःचं घर हवं, चारचाकी हवी, सवयी चांगल्या हव्यात, व्यसन नसावं, सासू-सासरे समजूतदार हवेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा देखणा हवा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बॉयफ्रेंडसाठी मन चालतं आणि नवऱ्यासाठी गणित!

दुसरीकडे मुलांचंही काही वेगळं नसतं. प्रेमात असताना ते म्हणतात, “तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून आणीन. ” पण लग्नाची वेळ आली की प्रश्न बदलतात. घर किती मोठं आहे, नोकरी काय आहे, अपेक्षा काय आहेत, हे सगळं महत्त्वाचं वाटू लागतं. प्रेमात भावना असतात, पण लग्नात जबाबदाऱ्या असतात.

बॉयफ्रेंड निवडताना अनेकदा वर्तमान पाहिलं जातं, तर नवरा निवडताना भविष्य पाहिलं जातं. म्हणूनच प्रेमासाठी योग्य वाटणारी व्यक्ती आयुष्यभराच्या सहजीवनासाठी योग्य वाटेलच असं नाही.

आजची खरी समस्या ‘चांगला नवरा मिळत नाही’ ही नसून ‘परिपूर्ण नवरा शोधण्याचा अट्टाहास’ ही आहे. कारण परिपूर्ण माणूस या जगात कुठेच नाही. प्रत्येकामध्ये काही गुण असतात, काही उणिवा असतात. संसार हा गुणांच्या प्रदर्शनावर चालत नाही, तर उणिवांच्या स्वीकारावर चालतो.

कधीकधी जे लोक म्हणतात की चांगले मुलगे मिळत नाहीत, त्यांनी स्वतःलाही एक प्रश्न विचारायला हवा मी ज्या गुणांचा नवरा शोधते, ते गुण माझ्यात कितपत आहेत? आणि मुलांनीही स्वतःला विचारायला हवं मी ज्या मुलीची अपेक्षा करतो, तिच्या अपेक्षांना मी पात्र आहे का? कारण नातं हे खरेदी-विक्रीचा व्यवहार नसतो. तो दोन माणसांनी एकमेकांच्या सुख-दुःखात उभं राहण्याचा करार असतो.

आजच्या काळात एक विचित्र गोष्ट दिसते. बॉयफ्रेंड शोधताना आपण हसणारा चेहरा पाहतो, पण नवरा शोधताना बँक बॅलन्स पाहतो. प्रेमात स्वभावापेक्षा आकर्षण महत्त्वाचं वाटतं, तर लग्नात माणसापेक्षा त्याची परिस्थिती. मग नंतर तक्रार केली जाते की चांगले लोक मिळत नाहीत. खरं तर चांगले लोक आजही आहेत, पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

ज्याच्याकडे महागडी गाडी नाही, पण मन मोठं आहे, तो अनेकदा दुर्लक्षित राहतो. ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही, पण जबाबदारीची जाणीव आहे, त्याला संधी मिळत नाही. आणि मग वर्षानुवर्षे ‘योग्य व्यक्ती’ शोधण्याचा प्रवास सुरूच राहतो.

शेवटी एकच सांगावंसं वाटतं. बॉयफ्रेंड मिळवणं सोपं असतं, कारण तिथे स्वप्नं विकली जातात. नवरा मिळवणं कठीण वाटतं, कारण तिथे आयुष्य जगायचं असतं. स्वप्नांमध्ये चुका चालतात, पण संसारात वास्तव स्वीकारावं लागतं. म्हणून चांगला नवरा शोधण्यापेक्षा चांगला माणूस ओळखायला शिका. कारण सुखी संसार चेहऱ्याने, पगाराने किंवा गाडीने टिकत नाही; तो विश्वास, स्वभाव, समजूतदारपणा आणि परस्पर आदराने टिकतो.

आणि म्हणूनच प्रश्न “चांगला नवरा कुठे मिळेल?” हा नसून, “चांगला माणूस ओळखण्याची आपली नजर किती चांगली आहे?” हा असायला हवा. हाच प्रश्न समजला, तर कदाचित अनेकांची नवरा शोधण्याची समस्या आपोआप सुटेल.

*

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

महावस्त्र नात्यांचं

  ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे,

 जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे..’

अतिशय अर्थपूर्ण असं हे गाणं. आपल्या आयुष्याला तंतोतंत लागू पडणारं. क्षणभर त्यातील सुखदुःखाचा विषय आपण बाजूला ठेवू, पण आपलं आयुष्य हे एक सुंदर असं जरतारी वस्त्र आहे. जेव्हा आपण नात्यांचा विचार करतो, तेव्हा हे एका ‘महावस्त्राचं’ रूप घेतं.

आपण ज्या घरात जन्म घेतो, त्या घरापासून आणि जन्मापासून काही नाती आपल्याला उपजतच मिळतात. आई, वडील, बहीण, भाऊ यासारखी अनेक नाती रक्ताची असतात. पण आपण समाजात जसजसे मोठे होत जातो, तशी आणखीही अनेक नाती आपल्याशी जोडली जातात. मग ती नाती बऱ्याच वेळा रक्तापलीकडची असतात. अशी बिनरक्ताची नाती कित्येकदा रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असतात. अशी सगळी नाती मिळून तयार होतं ते भरजरी महावस्त्र ! यातील मधले एकमेकात गुंफलेले घट्ट धागे असतात रक्ताच्या नात्यांचे; बाजूची रुपेरी किनार असते समाज नावाच्या नात्याची; आणि पदरावर जी मोरपंखी नक्षी असते ना, ती असते जिवलग मित्रांची! त्यांच्यामुळेच ही भरजरी पैठणी शोभून दिसते. वस्त्राला ‘पट’ असाही एक सुंदर शब्द आहे. आपल्या आयुष्याचा पट अशा अनेक रंगीबेरंगी धाग्यांनी विणला गेलेला असतो. 

पण… पण… असा भरजरी पट प्रत्येकाच्याच नशिबी येतो का? कदाचित नाही. कुणाच्या वाट्याला महावस्त्र येतं, तर कुणाच्या वाट्याला जाडंभरडं वस्त्र. कुठे या महावस्त्राचे इंद्रधनुषी रंग शोभून दिसतात, तर कुठे ते फिकट झालेले असतात. पण जे वस्त्र आणि जसं वस्त्र तुमच्या वाट्याला आलं असेल, ते तुम्हाला स्वीकारावंच लागतं. काही जण आपल्या कर्तृत्वाने या वस्त्रात इतके सुंदर रंग भरतात की साध्या वस्त्राचंही महावस्त्र होतं; आणि दुर्दैवाने एखादी व्यक्ती आपल्याला मिळालेलं भरजरी वस्त्रही मातीमोल करते.

महाभारतातल्या कर्णाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरं तर तो ज्येष्ठ कुंतीपुत्र आणि अत्यंत तेजस्वी असा सूर्यपुत्र. राज्यावर पहिला हक्क त्याचा. पण जन्म होतो आणि त्याचा त्याग त्याच्या आईलाच करावा लागतो. तरीही, आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने आपल्याला मिळालेल्या या जाड्याभरड्या वस्त्राचं रूपांतर तो महावस्त्रात करतो. तो अभिमानाने सांगतो:

सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्।

दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्॥

(मी विणकर वा विणकर पुत्र जे काही असेल ते दैवामुळे आहे. कोणत्या कुळात जन्म घ्यायचा हे माझ्या हातात नाही, पण माझ्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने मोठे व्हायचे की नाही ही गोष्ट नक्कीच माझ्या हातात आहे.)

याउलट रावणाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर असं दिसतं की रावण ऐश्वर्यसंपन्न होता, शक्तिमान होता, विद्वान होता, शंकराचा परमभक्त होता, लंकेसारख्या सुवर्णनगरीचा राजा झाला होता. एका अर्थाने त्याच्या पदरात पडलेले हे महावस्त्रच होते. पण आपल्या नैतिक अध:पतनाने आणि अहंकारामुळे त्याने या वस्त्राचे पार पोतेरे केले.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं आपण म्हणतो, पण माणसाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचं बळ देणारी खरी शक्ती नात्यांमध्ये असते. जन्माला आल्यापासून ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण अनेक नात्यांच्या धाग्यांनी वेढलेले असतो. काही नाती रक्ताची असतात, तर काही नाती प्रेमाची, विश्वासाची आणि कर्तव्याची असतात. ही नात्यांची वीण जेवढी घट्ट, तेवढं कुटुंब निकोप; आणि कुटुंब जेवढं निकोप, तेवढा समाज आणि देश सुदृढ. नाती ही केवळ आपणा सर्वांना एकमेकांशी जोडणारी साखळी नसून, ती संपूर्ण समाजाला अंतर्गत ऊर्जा देणारी एक जिवंत व्यवस्था आहे. म्हणूनच, मिळालेली नाती जपायला हवीत, वाढवायला हवीत.

नात्यांमध्ये एक अद्भूत सामर्थ्य असतं. ती जशी कुटुंब आणि समाजाला एकत्र बांधून ठेवतात, जोडतात; तशीच जर ती कमकुवत झाली, तर संपूर्ण व्यवस्था तोडण्याची विनाशकारी ताकदही त्यांच्यात असते. एका सुताचा धागा कमकुवत झाला की अख्खं वस्त्र विस्कळीत व्हावं, तसंच एखाद्या नात्यात वितुष्ट आलं की संपूर्ण कुटुंब कोलमडून पडतं. म्हणूनच, निकोप नात्यांमधून निकोप कुटुंब आणि निकोप कुटुंबांमधून एका निकोप, बलशाली राष्ट्राची निर्मिती होत असते. देश जोडायचा असेल, तर आधी घराघरातील नात्यांचा सांधा भक्कम असावा लागतो.

आपल्या भारतीय संस्कृतीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ऐतिहासिक, सामाजिक आणि अध्यात्मिक परंपरांचा या नात्यांवर असलेला गहिरा प्रभाव. आपल्याकडे नात्यांकडे केवळ एक ‘करार’ (Contract) म्हणून पाहिले गेले नाही, तर ती एक साधना मानली गेली आहे. आपल्या परंपरा जेवढ्या उज्वल, तेवढाच आपल्या नात्यांचा दर्जाही उच्च आणि उदात्त राहिला आहे.

याचा सर्वात मोठा आणि आदर्श वस्तुपाठ आपल्याला ‘रामायण’ काळात पाहायला मिळतो. रामायणाने मानवी नात्यांचे जे आदर्श निर्माण केले, ते आजही मानवी संस्कृतीचे दीपस्तंभ आहेत. पित्याचे वचन पाळणारा पुत्र, पुत्रासाठी प्राण त्यागणारा पिता; वशिष्ठांसारखे ऋषितुल्य गुरु आणि त्यांच्या चरणी लीन होणारा शिष्य; राम-लक्ष्मण-भरत यांच्यातील नि:स्वार्थ बंधुप्रेम; सुग्रीव आणि बिभीषणासारखे मित्र; हनुमंतासारखा परमभक्त आणि सेवक; आणि सुख-दुःखात सावलीसारखी पाठीशी राहणारी पत्नी… रामायणातील प्रत्येक नातं कर्तव्याच्या आणि त्यागाच्या एका अत्युच्च पातळीवर विणलं गेलं होतं. तिथे स्वार्थाला जागा नव्हती, म्हणूनच तो रामराज्य नावाचा एक सुवर्णकाळ ठरला.

परंतु, काळाचे चक्र फिरले आणि ‘महाभारत’ काळात ही परंपरा काहीशी खंडित झाली, नव्हे ती कलंकित झाली. महाभारताचा पट हा मानवी नात्यांच्या विस्कळीतपणाचा आणि मर्यादांचा पट आहे. तिथे सत्तेचा लोभ, अहंकार आणि महत्त्वाकांक्षा एवढीणी टोकाला गेली की, रक्ताची नाती एकमेकांच्या रक्ताची तहानलेली झाली. गुरु-शिष्याचे नाते, बंधुत्वाचे नाते, ज्येष्ठ-श्रेष्ठांचे मान-सन्मान सत्तेच्या सारीपाटावर पणाला लावले गेले. जेव्हा नात्यांमध्ये कर्तव्याऐवजी स्वार्थ आणि प्रेमाऐवजी मत्सर जागा होतो, तेव्हा महाभारतासारखा विनाश अटळ असतो, हाच धडा आपल्याला इतिहासाने दिला.

आज आपण एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे वर्तमान परिस्थितीत जगत आहोत. आजची कुटुंब व्यवस्था एका अत्यंत संवेदनशील वळणावर उभी आहे. काळाने आणि आधुनिकतेने आपल्यासमोर अनेक नवी आव्हाने उभी केली आहेत. तंत्रज्ञानाच्या जाळ्याने आपल्याला जगभरातल्या लोकांशी जोडले असले, तरी शेजारी बसलेल्या आपल्या माणसापासून आपण दुरावत चाललो आहोत की काय, अशी भीती वाटू लागली आहे. एकत्र कुटुंब पद्धती मागे पडून विभक्त कुटुंबे आली आणि आता तर ‘फ्लॅट संस्कृती’मध्ये माणसे अधिक आत्मकेंद्रित होऊ लागली आहेत. नात्यांची वीण उसवू लागली आहे. नात्यांच्या या महावस्त्राचं रूपांतर एखाद्या टॉवेलमध्ये होतं की काय, अशी भीती वाटू लागली आहे. टॉवेलला आपण गरजेपुर्ते हात पुसतो आणि बाजूला ठेवतो. नाती अशी असतात का ?

आजच्या या गतिमान, यांत्रिक युगात संवाद हरवत चालला आहे आणि जिथे संवाद संपतो, तिथे नात्यांची वीण सैल होऊ लागते. संवाद नसलेली नाती म्हणजे केवळ नावापुरती उरलेली नात्यांची एक चौकट. आजच्या तरुण पिढीसमोर आणि आपल्या सर्वांसमोरच हे मोठे आव्हान आहे की, या बदलत्या काळात नात्यांमधील पूर्वीचा तो ओलावा, तो जिव्हाळा आणि ती विश्वासाची ऊब कशी टिकवून ठेवायची? एक गोष्ट मात्र नक्की की स्नेहजलाचं सिंचन झालं की नाती उमलून येतात. स्नेह जाऊन त्याची जागा स्वार्थाने घेतली की नाती कोमेजतात. म्हणूनच जिथे अकृत्रिम प्रेम असते आणि केवळ स्वार्थाला थारा नसतो तिथले नात्यांचे रंग कधीही फिके होत नाहीत.

याच सगळ्या गदारोळात, मनात एका नव्या सृजनाचा अंकुर फुटला. मनात आले, काळाच्या प्रवाहात आपण जे मागे सोडत चाललो आहोत, याची पुनश्च एकदा जाणीव करून द्यायला हवी. वस्त्रातील उभे-आडवे धागे जसे प्रेमाने एकत्र येतात आणि एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, तसाच हा दिशाहीन होत चाललेला समाज पुन्हा एकदा नात्यांच्या सूत्रात गुंफायला हवा. या विचारातूनच ‘नात्यांचं महावस्त्र’ या लेखमालेचा जन्म होतोय.

महावस्त्र हे वेगवेगळ्या रंगांच्या, रेशमी मुलायम पण बळकट अशा धाग्यांच्या एकत्र विणण्यातून तयार होतं. या लेखमालेच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील अशाच काही अमूल्य, रेशमी नात्यांचे पदर उलगडणार आहोत. आईचे नि:स्वार्थ वात्सल्य, बाबांचे आकाशाएवढे छत्र, आजी-आजोबांच्या संस्कारांची शिदोरी, भाऊ-बहिणीचे निखळ प्रेम, मावशी आणि काकांचा मायेचा आधार, सुख-दुःखात पाठीशी राहणारा मित्र आणि आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा गुरु… या सर्व नात्यांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

या महावस्त्राचा एक-एक धागा आपण अत्यंत मायेने आणि जिव्हाळ्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. हे महावस्त्र जितकं सुंदर विणलं जाईल, तेवढं आपलं घर, आपला समाज आणि आपले जगणं अधिक सुकर आणि आनंदी होईल. या वैचारिक आणि भावनिक प्रवासात आपण माझ्या सोबत नक्कीच असाल, ही खात्री आहे.

(पुढील भाग दर रविवारी)

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आयुष्याची छायाचित्रे..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आयुष्याची छायाचित्रे.. ☆ संध्या बेडेकर ☆

न्युटन ने अगर गिरे हुए सेब की जगह गिरे हुए लोग देखे होते तो *gravity *की जगह *Humanity* की पढाई हो रही होती.  

श्रावण महिना म्हणजे विशेष महिना. श्रावण सोमवार, नागपंचमी, गोकुळाष्टमी, असे अनेक सणवार आणि १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण. त्यानंतर लगेच नवरात्र, दसरा, दिवाळी 

महिने केंव्हा सुरू होतात ? आणि केंव्हा संपतात, कळतच नाही. नवीन लग्न झालेल्यांच्या घरी अजून एक भर म्हणजे मंगळागौर पूजन. एकंदरीत उत्साही वातावरण.

आमच्या भजन मंडळीला अनेक ठिकाणी भजनासाठी आमंत्रण असते.

दरवर्षी आम्ही दोनदा तरी भजन आनंदवन आणि आसरा या वृद्धाश्रमात करतोच.

तेथील लोकांना पण आता आमची सवय झाली आहे.

तेथे गेल्यावर मात्र आयुष्याची अनेक छायाचित्रे प्रकर्षाने जाणवतात. रंगीन असं एकही चित्र दिसत नाही. म्हणजे मला नेहमी वाटतं ज्यांना आयुष्यात लहान सहान कारणांवरून तक्रार असते ना त्यांनी मधून मधून वृद्धाश्रमाला भेट द्यावी. अशा सर्वांचे डोळे उघडतील आणि डोकं ठिकाणावर येईल.

बरे असो,

वृद्धाश्रमाचे नाव जरी आनंदवन असले तरी आनंदाचा अभाव स्पष्ट जाणवतो. प्रत्येक चेहर्यावर नकळत नजर थांबते, चेहऱ्यावरील भाव वाचायचा मी प्रयत्न करते. त्यांच्या डोळ्यातील स्तब्ध भाव त्यांच्या दुःखाची, पण स्पष्ट न दिसणारी अनेक कारणं मनात धुमाकूळ घालतात.

येथे स्वइच्छेने कोणी येत असेल का ? 

या लोकांचे कोणी नातेवाईक नाहीत का ? यांची मुल कुठे आहेत ? यांनी कोणती नोकरी केली असेल ? यांचे येथे येण्याआधीच आयुष्य कसे असेल ? यांना कोणी भेटायला येत असेल का ? घरच्यांनी पण नाइलाजाने यांना इथे ठेवले असेल का ? 

त्यांचा पण आयुष्याचा काही काळ मजेत गेला असेलच ना. खटृटी मीठी यादें असतीलच ना. त्यावेळी आयुष्य नावाच्या पुस्तकाचे पूढचे पान त्यावर काही तरी भारी लिहिलं असेल या आशेने / विचाराने पलटवत असतीलच ते. आता ते पुस्तक बंदच करून ठेवलं असेल का त्यांनी ? 

 एका खोलीत चार अनोळखी माणसं एकत्र राहतात. सर्व जेष्ठ, एकटे, मनाने खचलेले,

एकमेकांना बघून यांच्या दुखात भरच पडत असणार. कदाचित समदुःखी असल्याने आपापल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करणं जमत असेल का त्यांना ? 

शहरात अनेक वृद्धाश्रम आहेत. काही तर अगदी फाइव स्टार आहेत. तेथे गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर बिचारा भाव दिसत नाही. पण येथे मात्र त्यांना बघून जीव कासावीस होतो.

प्रत्येक वर्षी दोन चार नवीन चेहरे दिसतात, तर जूने चेहरे गायब असतात. ते कुठे गेले ? आपल्या घरी गेले का ? असा विचार मनात येतो पण विचारायची हिम्मत होत नाही.

आज कार्यक्रम चालू असताना एक गृहस्थ उमाताईंजवळ आले आणि म्हणाले, 

“तुमची काही हरकत नसेल तर त्या तिथे बसलेल्या ताई आहेत ना, त्या छान गाणं म्हणतात. त्यांना एक भजन म्हणू देत का ? “

 उमाताईंनी लगेच हो म्हंटल आणि लगेच पेटीची साथ दिली. थोड्या वेळ का होईना त्या ताईंच्या चेहऱ्यावर आनंदी भाव बघून आम्हाला बरं वाटलं 

आज भजन झाल्यावर, संस्थेचे संस्थापक बरोबर चहा घेत असताना त्यांनी आपले अनुभव सांगितले. सध्या सामाजिक परिस्थिती कशी खालावली आहे त्याबद्दल ते बोलत होते. एकेक *खरी गोष्ट * ऐकून जीव खालीवर होत होता.

सध्या लोकांची वैचारिक समीकरण चूकत आहेत. संवेदना जणू मेल्या आहेत. लोक माणूस घाणे झाले आहेत. बाकीचे जाऊ दे स्वतः चे आई वडील पण नकोसे झाले आहेत.

सामाजिक परिस्थिती भयावह आहे.

अस प्रत्येक घरी आहे, असं म्हणता येणार नाही. पण प्रमाण वाढत चाललंय. सामाजिक आरोग्य ढासाळलय. हा रोग तीव्र गतीने वाढतोय. कॅंसर सारख्या रोगांवर रामबाण औषध शोधणं सुरू आहे. पण या रोगांवर औषध काय ? 

म्हणूनच की काय, 

काल आसाम सरकार ने या दिशेने एक पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दर वर्षी ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सुट्टी जाहीर केली आहे.

ती कशाला ? 

तर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या आईवडिलांबरोबर ही सुट्टी घालवावी यासाठी.

म्हणजे आता परिस्थिती ही आहे की हे सांगावं लागतंय. कुठून तरी सुरुवात करणं पण गरजेचे आहे.

संस्थापक जे सांगत होते, 

त्यात नटसम्राट चे उदाहरण होते. तर मुलांनी वृद्धाश्रमात आईला किंवा वडिलांना आणून सोडलेली अनेक व्यक्ती होत्या. त्यानंतर त्यांना भेटायला सुद्धा येत नाहीत. त्यांची तब्येत खराब आहे हे सांगायला फोन केला, तर तो सुद्धा उचलत नाहीत. आपण कोणालाही नकोसे आहोत ही भावना च माणसाला अर्ध अधिक संपवते. हे असे लोक जीवन जगत नाही तर दिवस काढतायेत. श्वास चालू असेपर्यंत जगणार आहेत नाईलाजाने.

मी सहज त्यांना मला तेथे ओळखीचे वाटणाऱ्या एका गृहस्थांबददल विचारले तर ते म्हणाले, 

अहो!! ते सहकार नगर मध्ये राहणारे श्री देशमुख आहेत. बायको मागच्या वर्षी गेली. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. एका मोठया कंपनीत वैज्ञानिक आहे.

Gravitational force संबंधित काही तरी research करतोय म्हणे.

आई गेली तेंव्हा किंवा त्यानंतरही *त्याला* भारतात येणे जमले नाही.

मोठा माणूस तो. म्हणून वेळ मिळाला नाही. 

संस्थापकांचा राग लक्षात आला.

देशमुख येथे रहात नाही पण आठवड्यातून दोन तीन दा येतात. छान इंग्रजी बोलतात. खूप पुस्तकं वाचतात. सर्वांशी गप्पा मारतात, सर्वांना बरोबर घेऊन बाग काम करतात. त्यांच्या येण्याने येथील वातावरण थोडं बदललंय.

तेवढ्यात श्री देशमुख तेथे आले. आमच्या बरोबर गप्पा मारत होते.

चेहऱ्यावर, बोलण्यात आत्मविश्वास होता.

जे झालं ते झालं. त्यावर विचार करत बसण्यापेक्षा पूढे काय करायचे ? हे बघावे. या मताचे असावे. 

असे त्यांच्या बोलण्यावरून वाटल. श्री देशमुख म्हणाले, 

मी पण त्यांच्यातलाच एक आहे. त्यांचा एकटेपणा, दुःख मी समजू शकतो. मी येथे रहात नाही पण मधून मधून येतो.

स्वतः ला किती ही समजवा, किती ही बहादुर बनायचा प्रयत्न करा, शेवटी कुठे तरी हृदयात दबलेले दुःख, ती जखम आपल डोकं वर काढतेच ना.

सहजच देशमुख साहेब बोलून गेले.

माझा मुलगा अमेरिकेत वैज्ञानिक आहे. Gravitational force च्या संदर्भात Reaserch करतोय.

थोडं हसून (?) म्हणाले, 

ज्यावेळी न्युटनने सफरचंद खाली पडताना बघीतले आणि gravity चां शोध लावला. त्यावेळी जर त्याने माणसाला खाली पडताना बघीतल असतं तर बर झालं असतं. आज लोकांनी gravity च्या ऐवजी Humanity चां अभ्यास केला असता. 

नाही का ? 

सर्व स्तब्ध होते. जग पूढे चाललंय, पण आपण ? प्रत्येकाच्या चेहर्यावर अनेक प्रश्न होते.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “संस्कार म्हणजे…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “संस्कार म्हणजे…☆ श्री जगदीश काबरे ☆

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार.

गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष कमी करायचे.

 

मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मानव.

… विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते.

… प्रत्येक कार्यच चांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे,

 

उदाहरणार्थ – – 

.. केळी खाऊन आपण साले टाकतो ही कृती आहे.

.. केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रवृती.

.. केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणे ही विकृती.

.. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणे ही संस्कृती.

 

… म्हणून आपल्या कृत्याची जबाबदारी नशिबावर, ईश्वरावर न ढकलता प्रत्येकाने आपल्या आत डोकावून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून स्वीकारली पाहिजे.

आणि त्यासाठी ईश्वराची नाही तर सदविवेकाची गरज आहे. –

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे!” – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे!” – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

अतुल्य के. व्ही.

जर आपल्या घरातील इंटरनेट कनेक्शन, स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर आणि वाहनांमधील इंधन आपल्यापर्यंत विनाअडथळा पोहोचत असेल, तर त्यामागे समुद्राच्या खोल अंधारात, श्वास रोखून प्रचंड धोका पत्करून पडद्यामागे काम करणारी एक महिला आहे — अतुल्य के. व्ही.

केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील पट्टाम्बी या छोट्याशा गावात जन्मलेल्या अतुल्य या एक मल्याळी महिला आहेत, ज्यांनी जगाच्या खोल समुद्रात धाडस करून इतिहास घडवला आहे. त्या भारतातील पहिल्या महिला व्यावसायिक डायव्हर आहेत.

स्कुबा डायव्हिंग हा सामान्यतः समुद्राचे सौंदर्य अनुभवण्यासाठी केला जाणारा एक मनोरंजक उपक्रम असला तरी, अतुल्य यांचे काम व्यावसायिक डायव्हिंगच्या अधिक धोकादायक क्षेत्राशी संबंधित आहे.

जेव्हा मोठ्या पाण्याखालील तेल आणि गॅस पाइपलाइन किंवा इंटरनेट केबल्सचे नुकसान होते, तेव्हा दुरुस्ती, वेल्डिंग आणि देखभालीची कामे करण्यासाठी अतुल्यच समुद्राखाली डुबकी मारतात. अशी कामे करण्यासाठी आवश्यक असलेला व्यावसायिक परवाना असलेली त्या भारतातील एकमेव महिला आहेत.

त्यांनी खोल समुद्राच्या अशा अनेक भागांना भेट दिली आहे, जे आपल्यापैकी बहुतेकांनी कधीही पाहिलेले नाहीत. तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या मागे समुद्राखाली अतुल्यला गुहेसारख्या विलक्षण जलचर रचना आढळल्या.

त्याचप्रमाणे, कोझिकोडच्या किनाऱ्याजवळ डायव्हिंग करताना, कुंजली मराक्करचे आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या भागात तिला प्राचीन बोटी आणि तोफांच्या गोळ्यांमुळे तयार झालेले ठसे आढळले.

अशा शोधांची योग्य नोंद व्हावी आणि इतिहासाचा भाग म्हणून ते जतन केले जावेत, हे अतुल्यचे एक दीर्घकाळापासूनचे स्वप्न आहे.

ती शक्तिशाली पाण्याखालील प्रवाह आणि स्टोनफिश व स्टिंगरेसारख्या धोकादायक सागरी जीवांचा सामना करत या मोहिमा पूर्ण करते.

अतुल्यच्या मते, समुद्राच्या तळावरील कोणतीही गोष्ट खऱ्या अर्थाने आपली नाही. तिथे राहणारे जीव आपल्यासारखेच जीव आहेत. त्यांना त्रास देण्याऐवजी, आपण त्यांच्या जगाचा एक भाग बनले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे.

अतुल्या, एक मल्याळी महिला, जी समुद्राच्या अथांग गर्तेत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि इतिहासाचे अवशेष या दोन्हींचे रक्षण करते, ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे.

दुर्दैवाने, हे नमूद केले पाहिजे की विकिपीडियानेही छायाचित्रे आणि योग्य कागदपत्रांसह तिला पुरेसा सन्मान दिलेला नाही.

जगाला तिच्यासारख्या लोकांबद्दल माहिती व्हायलाच हवी—विशेषतः केरळचा अभिमान असलेल्या या तरुणीबद्दल. ही ओळख आपल्यापासून सुरू होऊ द्या.

फक्त एक स्विच ‘ऑन’ केल्याने – – 

जर आपल्या घरातील इंटरनेट कनेक्शन, स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर आणि वाहनांमधील इंधन आपल्यापर्यंत विनाअडथळा पोहोचत असेल, तर त्यामागे समुद्राच्या खोल अंधारात, श्वास रोखून प्रचंड धोका पत्करून पडद्यामागे काम करणारी एक महिला आहे — अतुल्य के. व्ही.

केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील पट्टाम्बी या छोट्याशा गावात जन्मलेल्या अतुल्य या एक मल्याळी महिला आहेत, ज्यांनी जगाच्या खोल समुद्रात धाडस करून इतिहास घडवला आहे. त्या भारतातील पहिल्या महिला व्यावसायिक डायव्हर आहेत.

स्कुबा डायव्हिंग हा सामान्यतः समुद्राचे सौंदर्य अनुभवण्यासाठी केला जाणारा एक मनोरंजक उपक्रम असला तरी, अतुल्य यांचे काम व्यावसायिक डायव्हिंगच्या अधिक धोकादायक क्षेत्राशी संबंधित आहे.

जेव्हा मोठ्या पाण्याखालील तेल आणि गॅस पाइपलाइन किंवा इंटरनेट केबल्सचे नुकसान होते, तेव्हा दुरुस्ती, वेल्डिंग आणि देखभालीची कामे करण्यासाठी अतुल्यच समुद्राखाली डुबकी मारतात. अशी कामे करण्यासाठी आवश्यक असलेला व्यावसायिक परवाना असलेली त्या भारतातील एकमेव महिला आहेत.

त्यांनी खोल समुद्राच्या अशा अनेक भागांना भेट दिली आहे, जे आपल्यापैकी बहुतेकांनी कधीही पाहिलेले नाहीत. तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या मागे समुद्राखाली अतुल्यला गुहेसारख्या विलक्षण जलचर रचना आढळल्या.

त्याचप्रमाणे, कोझिकोडच्या किनाऱ्याजवळ डायव्हिंग करताना, कुंजली मराक्करचे आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या भागात तिला प्राचीन बोटी आणि तोफांच्या गोळ्यांमुळे तयार झालेले ठसे आढळले.

अशा शोधांची योग्य नोंद व्हावी आणि इतिहासाचा भाग म्हणून ते जतन केले जावेत, हे अतुल्यचे एक दीर्घकाळापासूनचे स्वप्न आहे.

ती शक्तिशाली पाण्याखालील प्रवाह आणि स्टोनफिश व स्टिंगरेसारख्या धोकादायक सागरी जीवांचा सामना करत या मोहिमा पूर्ण करते.

अतुल्यच्या मते, समुद्राच्या तळावरील कोणतीही गोष्ट खऱ्या अर्थाने आपली नाही. तिथे राहणारे जीव आपल्यासारखेच जीव आहेत. त्यांना त्रास देण्याऐवजी, आपण त्यांच्या जगाचा एक भाग बनले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे.

अतुल्या, एक मल्याळी महिला, जी समुद्राच्या अथांग गर्तेत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि इतिहासाचे अवशेष या दोन्हींचे रक्षण करते, ती स्वतःच इतिहासाचा एक भाग आहे.

दुर्दैवाने, हे नमूद केले पाहिजे की विकिपीडियानेही छायाचित्रे आणि योग्य कागदपत्रांसह तिला पुरेसा सन्मान दिलेला नाही.

जगाला तिच्यासारख्या लोकांबद्दल माहिती व्हायलाच हवी—विशेषतः केरळचा अभिमान असलेल्या या तरुणीबद्दल. ही ओळख आपल्यापासून सुरू होऊ द्या.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असे हे मराठी प्रतिभावंत – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ असे हे मराठी प्रतिभावंत – माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर

ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे ह्यांच्या प्रतिभेचा एक अप्रतिम व अफलातून किस्सा:

१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत.

संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु. ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीच वातावरण होतं.

त्यावेळी साहीर लुधियानवी (हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी) मंचावर आले. ते म्हणाले- अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।

पु. ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलवल आणि म्हणाले, “साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही”. असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.

मग साहीरजींनी तो शेर ऐकवला – 

“एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,

एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,

रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी। 

सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,

खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?

अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,

रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।”

… आणि साहीरजींचा शेवटचा “जी” पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांनी तो पूर्ण शेर मराठी रुपांतर केलेला होता.

“एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,

एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी

ओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी 

सेजेशी समई मी लावू कशाला?

जुळत्या जीवालागी जळती कशाला?

अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,

रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी”.

ह्यातील *’झुंझुरता’* ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा…

… आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु. ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.

असे हे आपले मराठी प्रतिभावंत…

… एक नंबरी सोनेरी नाणं…

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रात्रभर जागणारी पिढी आणि… गप्प होत चाललेले पालक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रात्रभर जागणारी पिढी आणि… गप्प होत चाललेले पालक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

रात्रीचे एक दोन वाजलेले असतात. घरातले सगळे दिवे बंद असतात. फक्त एका खोलीतून थोडासा अंधुकस लाइट बाहेर पडत असतो. आईला मध्येच जाग आलेली असते. ती उठते, पाणी पिते आणि सहज मुलाच्या किंवा मुलीच्या खोलीत डोकावून पाहते. हातात मोबाईल असतो. कानात इयरफोन. स्क्रीनवर काहीतरी सुरू असतं. वेळेचं भान हरवलेलं असतं.

“अजून झोपला नाहीस?”आईचा प्रश्न. “हो ना… पाच मिनिटांत झोपतो. ”हे पाच मिनिटं मग एक तास होतात. दोन तास होतात. आणि शेवटी रात्र संपते.

हे दृश्य आज अनेक घरांमध्ये रोज घडतं आहे.

सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत झोप. उठल्यावर चहा हातात आणि पुन्हा मोबाईल. शरीर जागं झालेलं असतं, पण दिवसाची लय हरवलेली असते.

रात्रभर जागणं, सकाळी उशिरा उठणं, दिवसाची सुरुवातच दुपारच्या सुमारास होणं आणि मग पुन्हा रात्री उशिरापर्यंत मोबाईल, लॅपटॉप किंवा स्क्रीनसमोर बसणं हे अनेक मुलांचं रूटीन बनलं आहे.

 

काळ बदलला आहे, तंत्रज्ञान बदललं आहे, जीवनशैली बदलली आहे. हे सगळं मान्य आहे. पण माणसाच्या शरीराच्या गरजा बदललेल्या नाहीत. शरीराला विश्रांती हवीच असते. मनाला शांत झोप हवीच असते. डोळ्यांना अंधार हवा असतो. मेंदूला पुनरुज्जीवनासाठी वेळ हवा असतो.

पण आजची पिढी जणू स्वतःच्या शरीराशीच स्पर्धा करत आहे.

 

आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे वेगळंच जग होतं. रात्री गच्चीवर झोपायचं. तारांकडे पाहत गप्पा मारायच्या. सकाळी सूर्य उगवण्याआधीच जाग यायची. पक्ष्यांचा आवाज याने दिवस सुरू व्हायचा. अंगात उत्साह असायचा. दिवसभर खेळणं, वाचन, भटकंती, गप्पा यात वेळ जायचा.

आज अनेक मुलांना सूर्योदय पाहण्याची सवयच राहिलेली नाही. पहाट म्हणजे काय, सकाळची प्रसन्नता म्हणजे काय, पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे काय, याचा अनुभवच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

आणि याचं दुःख फक्त जुन्या आठवणींचं नाही. त्याचा संबंध त्यांच्या आरोग्याशी, मानसिक स्थितीशी आणि भविष्यातील जीवनशैलीशी आहे. पण आजची पिढी जणू रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र मानू लागली आहे.

 

पालक म्हणून आम्ही हे सगळं पाहत असतो. सुरुवातीला आम्ही सांगतो. खूप प्रेमाने सांगतो. नंतर समजावतो. पुन्हा पुन्हा सांगतो. कधी रागावतो. कधी विनवणी करतो. पण आजकाल मुलांकडेही प्रत्येक गोष्टीचं उत्तर तयार असतं.

“आम्हाला माहिती आहे. ”

“तुम्ही काळजी करू नका. ”

“सगळेच असं करतात. ”

“आमच्या जनरेशनचं लाइफ वेगळं आहे. ”

ही उत्तरं ऐकताना पालक शांत होतात. पण त्यांचं मन मात्र शांत नसतं. कारण अनुभवाने त्यांना माहीत असतं की शरीरावर अन्याय केला की त्याची किंमत कधीतरी मोजावी लागते.

वीस-पंचवीस वर्षांच्या वयात काही परिणाम जाणवत नाहीत. पण सततची अपुरी झोप, अस्थिर दिनचर्या, शारीरिक हालचालींचा अभाव, स्क्रीनचा अतिरेक आणि मानसिक ताण याची छोटी छोटी बीजं नकळत पेरली जात असतात.

उद्या त्याच बीजांचं झाड उभं राहतं. चिडचिड वाढते. एकाग्रता कमी होते. उत्साह हरवतो. नात्यांमध्ये संवाद कमी होतो. आत्मविश्वास डळमळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनातील साध्या साध्या गोष्टींमधला आनंद हरवायला लागतो.

पण पालकांना सर्वात जास्त वेदना या परिणामांची नसते.

त्यांना वेदना असते ती आपल्या मुलांपर्यंत पोहोचता न येण्याची.

प्रत्येक पिढीला वाटतं की पालक आपल्याला समजून घेत नाहीत. पण सत्य हे आहे की आई-बाबा मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत असतात.

लहानपणी मुलांच्या रडण्याचा अर्थ समजून घेतात. शाळेतल्या भीतीचा अर्थ समजून घेतात. पहिल्या अपयशाचं दुःख समजून घेतात. पहिल्या प्रेमाची चाहूलही ओळखतात. मुलं काही बोलली नाहीत तरी त्यांच्या चेहऱ्यावरून मनातील गोष्ट वाचतात.

मग एक वेळ अशी येते की तीच मुलं मोठी होतात आणि म्हणतात,

“तुम्हाला काहीच समजत नाही. ”हे वाक्य पालकांच्या मनाला सर्वाधिक जखम करतं. कारण त्यांना माहिती असतं की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलांना समजून घेण्यात घालवलं आहे.

 

आई-बाबा मुलांच्या आयुष्यातील शत्रू नसतात.

ते त्यांच्या स्वप्नांचे खरे साक्षीदार असतात. त्यांच्या यशासाठी प्रार्थना करणारे पहिले लोक असतात. त्यांच्या अपयशाने आतून तुटणारेही तेच असतात.

मुलं आजारी पडली की रात्रभर जागणारे तेच.

मुलांना यश मिळालं की स्वतःपेक्षा जास्त आनंदी होणारे तेच.

मग ते रात्रभर जागू नकोस असं सांगतात, तेव्हा त्यामागे नियंत्रण ठेवण्याची इच्छा नसते.

त्यामागे प्रेम असतं.

काळजी असते.

अनुभव असतो.

आणि एक निःस्वार्थ भीती असते

“आपल्या मुलाला काही त्रास होऊ नये. ”

पण सतत समजावूनही जेव्हा काही बदल होत नाही, तेव्हा पालक हळूहळू गप्प होऊ लागतात.

मुलांना वाटतं की आता त्यांना काही फरक पडत नाही.

पण खरं तर त्यांना खूप फरक पडत असतो.

फक्त त्यांना कळून चुकलेलं असतं की आता शब्दांची ताकद संपली आहे.

आता अनुभवच शिकवणार आहे.

हे गप्प होणं म्हणजे हार नाही.

तो एक प्रकारचा दुःखी स्वीकार असतो.

ज्यादिवशी पालक बोलणं कमी करतात, त्यादिवशी त्यांच्या मनातली काळजी संपलेली नसते.

उलट ती आणखी वाढलेली असते.

कारण आई-वडील असणं ही अशी अवस्था आहे की मुलं पन्नास वर्षांची झाली तरी त्यांची काळजी संपत नाही.

त्यांच्या वयाबरोबर काळजीचं स्वरूप बदलतं, पण काळजी कधीच संपत नाही.

म्हणूनच आजच्या मुलांना एक विनंती आहे.

आई-बाबांचं प्रत्येक म्हणणं मान्य करा असं नाही.

प्रत्येक गोष्टीत त्यांच्याशी सहमत व्हा असंही नाही.

स्वतःचे विचार ठेवा.

स्वतःचे निर्णय घ्या.

स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगा.

पण कधीतरी त्यांच्या बोलण्यात दडलेलं प्रेम ऐकण्याचा प्रयत्न करा.

कारण आयुष्यात अशी एक वेळ येते, जेव्हा आई-बाबांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींचा अर्थ अचानक समजू लागतो.

आणि मग मनात एकच खंत राहते—

“हे तेव्हा समजलं असतं तर किती बरं झालं असतं. ”

 

आजही अनेक घरांमध्ये एखादी आई रात्री उठून मुलाच्या खोलीत डोकावते.

एखादा बाबा सकाळी उशिरापर्यंत झोपलेल्या मुलाकडे पाहून न बोलता निघून जातो.

ते काही बोलत नाहीत.

रागावत नाहीत.

वाद घालत नाहीत.

पण त्यांच्या मनात एक नि:शब्द प्रार्थना सतत सुरू असते,

“देवा, आमच्या मुलांना चांगलं आरोग्य दे. योग्य समज दे. त्यांना सुखी ठेव. आणि जे आम्ही शब्दांत सांगू शकलो नाही, ते त्यांना आयुष्य वेळेवर शिकवो. ”

कारण जगातलं सर्वात निःस्वार्थ प्रेम कोणतं असेल, तर ते पालकांचं.

ते कधी उपदेशाच्या रूपात दिसतं.

कधी काळजीच्या रूपात.

कधी भांडणाच्या रूपात.

आणि कधी पूर्णपणे गप्प झालेल्या शब्दांमधूनही ते तितक्याच ताकदीने व्यक्त होत राहतं. त्यांची ही काळजीच त्यांच्या प्रेमाची सर्वात खरी भाषा असते.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्र… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ मैत्र☆  कल्याणी केळकर बापट

काल व्हॉट्स ॲप वर एक खूप विचारात पाडणारा फोटो बघितला. त्या फोटोमध्ये दहा वर्षांच्या अंतराने छोट्या चार स्टेजेस दाखवण्यात आल्या होत्या. साधारण 1995 मधील फोटोत सहा सात समवयस्क मित्र घोळका करून बसले असतात आणि मनमोकळी विचारांची देवाणघेवाण करीत असतात. दुसऱ्या फोटोच्या भागात ही मित्रांची संख्या थोडी कमी होते. हा फोटो साधारण 2005 मधील. पुढील 2015 सालच्या फोटोत ही मित्रांची संख्या जरा जास्तच रोडवते आणि अगदी दोन तीन मित्र साथीला असतात. आणि शेवटचा फोटो 2025 मधील ह्यात तो मुलगा एकटाच बसला असून बाजूला म्हणजेच साथीला व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि अशीच मंडळी असतात.

खरं सांगायचं तर कोंबडी आधी की अंडे आधी ह्या न उत्तर मिळणाऱ्या प्रश्ना सारखा प्रश्न मनात लगेच येतो की मित्रांची संख्या घटल्याने वा दुर्मिळ झाल्याने ह्या आभासी गोष्टींची मदत घेतल्या जाते की ही मदत घेऊन आभासी गोष्टींना जवळ केल्याने मित्र दुरावल्या जातात ?

ह्या गोष्टीचा विचार करता एक गोष्ट नक्की. “मैत्र” ह्या संकल्पनेत झपाट्याने बदल होत गेला. सहसा सगळ्यात पहिल्यांदा मैत्रीची जाणीव अगदी बालवयात शेजारी राहणाऱ्या समवयस्क मुलांकडून होत असे. आणि ही अगदी सुरवातीची घट्ट मैत्री पुढे काही काळाने परिस्थिती मुळे दूर गेल्यासारखी वाटली तरी मनात मात्र त्या जुन्या लहानपणच्या मैत्रीचे धागे घट्ट गुंफल्या गेलेले असतात. मैत्रीची जपणूक करण्यासाठी द्यावा लागतो वेळ, कायम मदतीचा हात आणि परस्परांमध्ये हवी सद्भावना.

आभासी जगातील मैत्र हे खरं, कायमस्वरूपी टिकणारे मैत्र नव्हेच. फ्लॅट संस्कृती मधील कायमदार बंद संस्कृती ही अनमोल मैत्र गमावतेय हे नक्की.

 

©  कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares