मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”छेडोगे तो छोडेंगे नहीं…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “छेडोगे तो छोडेंगे नहीं…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

*कधी कधी शक्ति प्रदर्शन करणं आवश्यक असतं. * 

– – आज कुठून सूर्य उगवला माहित नाही. रोज शांतपणे सुरू होणारा दिवस, आज जरा विचित्रच सुरू झाला. रात्रभर अस्वथच होते मी. स्वप्न पण विचित्रच पडली. सारखी मारामारी दिसत होती. द्रोण, मिसाइल, सायरन किती ते आवाज! डोक भणभणत होत. रोज सकाळी देवाला नमस्कार करत आणि आजची सकाळ बघायला मिळाली, त्याबद्दल देवाचे आभार मानत, भूमीला वंदन करत उठणारी मी, आज वर्षानुवर्ष चालणारी परिपाटी पार विसरून गेले.

मन अस्वस्थ, अशांत, काहीतरी बिघडलंय, काहीतरी वेगळ घडलय, जे मन विचलित करणारं, तसं काहीतरी वेगळंच.

 भांडण, मारामारी, ठोकाठोकी आज स्वप्नात हेच सगळे बघितले. आणि TV वर पण जोरजोरात तेच सांगणं चालू होतं.

आज काही खरं नाही. विचाराची दिशा चुकलीच आहे. आज त्याच संदर्भात जुन्या घटना आठवल्या.

मनाने एकदम भरारी घेतली. मन तर वाटच बघत असत. सुपरसोनिक स्पीड ने भांडणाच्या सर्व घटना बरोबर शोधून काढल्या. त्यावर बरोबर वार केला.

खरतर भांडाभांडी करायचा माझा स्वभाव नाही. पटत नाही अस जेंव्हा कधी माझ्या लक्षात येत, तेंव्हा मी रस्ता बदलते. हा सरळ सोपा मार्ग मी निवडला आहे. पण जेंव्हा हे लक्षात येत की आपल्या शांतिपूर्ण वागण्याला समोरचा granted घेतोय, तो आपल्याला मूर्ख समजतोय. बेवकूफ समजतोय, तेंव्हा मात्र दणका दयावाच लागतो. दणका मात्र वेळ बघून, जोरात बसेल, चार लोकांच्या लक्षात येईल असा देते.

*जोर का झटका जोर सेही लगे* असाच वार करायचा.

या विचारा बरोबर हे जे चाललय, ते चूक की बरोबर याचाही गोंधळ मनात चालूच असतो. त्यांना दणका देताना, आपल पण नुकसान होतच असतं ना.

दणका द्यायचे *दोन* फायदे होतात.

** एकतर आपल्याला आपली शक्ति कळते. वार करताना काय बरोबर? कुठे चूक झाली ? हे कळत. म्हणजे पूढे जर अशी वेळ आलीच, तर जास्त पावरफुल वार करता येईल. लगेच पूढची *strategy* तयार होते.

आणि दुसऱ्यालाही आपण काय आहोत? हे समजत. बाकीचे चार लोक आपल्या आप सावध होतात. त्यांनाही आपल्या शक्तिची झलक दिसते. आपल्याबद्दल त्यांचे अनुमान/ Impression ते ठीकठाक करतात.

उदया पुन्हा खोड्या काढायच्या आधी, पंगा घ्यायच्या आधी सर्व विचार करतील.

त्यामुळे भांडण नेहमी चूकच असत अस नाही. असा आज मी शोध लावलाय.

लहानपणी शिकवल होत *भांडायच नाही. * आता गेले ते दिवस. एका गालावर मारल तर दुसरा गाल पूढे करायचे दिवस गेले.

कधी कधी शक्ति प्रदर्शन करणही आवश्यक असतच. आपण जपून ठेवलेले हथियार वेळ पडली तर काम चोख बजावतात की नाही त्यांची *testng* पण होऊन जाते.

भांडणात फायदा तसा कोणाचाच नसतो. भांडणानंतरही नाॅर्मल व्हायला वेळ लगतोच.

*अरे!! त्यावेळेस मला अस बोलायला हव होत, अस म्हणायला हव होत. अस करायला हव होत. * चर्चांचा दौर सुरू होतो. जो तो आपल्या बुद्धीनुसार, स्वभावानुसार, आपला फायदा बघून आपले विचार मांडत असतो.

हे सर्व मनात येत राहतं. बरेच दिवस त्यावर विचार होत राहतो. हे असं किती दिवस चालेल ? हे माहित नसत. एकदा मनसोक्त ठोकून झालं की लवकरात लवकर भांडण थांबविणं आवश्यक असतं. कधी कधी लोक दुसऱ्यांचा चष्मा घालून त्यांचा आधार घेऊन भांडतात. इंग्रजीत भांडतात. त्यांचा बहुतेक असा समज असतो की अस केल्याने समोरच्यावर जास्त दबाव पडेल. दबाव आणि प्रभावाचा माझ्यावर काडीचाही असर पडत नाही.

भांडताना केव्हा थांबायचे ? ते मात्र वेळेवर कळलच पाहिजे. आपल्या भांडणाची मजा घेणारे कोण ? किती जण आहेत ? आपल्याला उक्सवणारे किती आहेत ? आपल्याला समोर ढकलून मागच्या मागे पळून जाणारे कोण ? किती ? शुभचिंतक किती ? हेही समजत. तसे शुभचिंतकांची संख्या खूप नसतेच. या अशा लोकांच्या तावडीत जायचं नाही.

*There are lot of jealous people with friendly faces around us. We must always remember this truth. * 

त्यांच्या मनोरंजनाचे कारण आपण व्हायच नाही. ते काय फ्री फुकटमध्ये मजा घेतात. नुक़सान तर आपलंही होतंय ना. आपण आपली किती energy, वेळ, पैसा, मनस्वास्थ्य? यावर खर्च करायच, हे आपल्यालाच ठरवायच असत. त्यामुळे वेळेवर, *Cease fire* करणं जमलं पाहिजे.

लोकांना काय वाटेल ते वाटू दे. काही समजो वा न समजो लोक काय दोन्ही बाजूने बोलतात.

*If you want to make wrong decision, ask everyone. * 

*Cease fire* मी घाबरले म्हणून झाला नाही, केलाय.. माझा उद्देश्य पूर्ण झाला होता. म्हणून केलाय. मग पुढे होणारे नुकसान वाचविण्यातच हुशारी होती. एवढं समजण्याइतपत आपण हुशार आहोतच. आपल्याला आपली जबाबदारी, कर्तव्य, माझं, माझ्या कुटुंबाच हित समजण्याएवढी हुशार मी नक्कीच आहे. फुकटच काही मिळतंय म्हणून लाळघोटेपणा करणं जमत नाही मला. हा माझा

* EGO* नाही *SELFRESPECT* आहे.

सकाळी विचलित असलेल मन हळुहळु शांत झाल. जे झाल ते चांगल झाल. आणि लवकर थांबल, तेही चांगलच झाल.

म्हणतात ना,…

* Revenge is just waste of Time, Skip people. *

हे जरी खर असल तरी कधी कधी छान *दणका* देण आवश्यक असतच.

शक्ति प्रदर्शन करण ही आवश्यक आहे.

खूप soft राहिल तर लोक मूर्ख समजतात. तेंव्हा आपली strong personality दाखविणेही आवश्यक असत.

**छेडोगे तो, छोडेंगे नही, थोडा नुकसान सह लेंगे, लेकिन झुकेंगे तो बिल्कुलही नही. **

हा मेसेज देणे आवश्यक असतं…

At the same time…

If you treat me good, I will treat you better. – – हेही सांगणे/ दाखवणे आवश्यक असते.

कोणाला सांभाळायचं ? आणि कोणापासून सांभाळून रहायचं ? हे ही समजलंच पाहिजे. नाही का ?

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘एकलव्य!’ – लेखक : श्री पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘एकलव्य!’ – लेखक : श्री पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

तेलगू रंगभूमीवरील श्रेष्ठ गायक-नट रघुरामय्या

*  * 

मला एक प्रसंग आठवतो : पंधरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हैद्राबादला माझ्या एका नाट्यप्रेमी तेलगू मित्राच्या बंगल्याच्या गच्चीवर चांदण्या रात्री गप्पागोष्टींची एक मैफल जमली होती. बहुतेक मंडळी नाटक, गाणे, वाजवणे ह्यांतली होती. तेवढ्यात कुणीतरी मला पेटीवर मराठी नाटकातले एखादे पद वाजवण्याची फर्माइश केली. मी काय वाजवावे ह्या विचारात पट्ट्यांवर बोटांची चाळवाचाळव सुरू केली. मिश्रपिलूच्या अंगाने एकदोन जागा पेटीवर निघाल्या आणि त्या गच्चीच्या कोपऱ्यातून आवाज आला, “अय्योय्यो बालगंधर्वाऽऽ! ” एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही. एक गोरापान, काळेभोर कुरळे केस असलेला, अंगावर रेशमी झब्बा, पांढरेशुभ्र धोतर नेसलेला देखणा गृहस्थ तिथून उठून सरळ माझ्यापर्यंत चालत आला आणि समोर बसून त्याने चक्क आपले दोन्ही हात माझ्यापुढे केले आणि माझे हात हातात घेऊन स्वतःच्या कपाळाला लावून म्हणाला, “बाबूजीऽऽ यह बालगंधर्वका गाना आपके उंगलीमें आके बैठा है… सत्य वदे बजाना-” ‘सत्य वदे’ हे माझेही आवडते गाणे. मी वाजवायला सुरुवात केली. ‘अश्रुनीर वाहे डोळां’ अशा अवस्थेत तो गृहस्थ समोर बसून कुठे तरी पार हरवल्यासारखा ते ऐकत होता. हे अद्भुत घडताना पाहून आमचे इतर तेलगू मित्रही चकित झाले होते. हा तेलगू रंगभूमीवरचा आणि त्यानंतर शेकडो तेलगू बोलपटांतला *श्रेष्ठ गायक-नट रघुरामय्या. *

– – त्या नंतरची ती मैफिल म्हणजे मी बालगंधर्वांची आठवतील ती गाणी पेटीवर वाजवत होतो, जमतील तशी गात होतो आणि त्यातल्या प्रत्येक गाण्याचे तेलगू भाषेतले रूपांतर बालगंधर्वांच्या गायनाच्या ढंगाने, त्यातल्या गानसौंदर्यातली जागा न् जागा दाखवत रघुरामय्या गात होते. कर्नाटक संगीताचा वापर असलेल्या तेलगू रंगभूमीवर ह्या बालगंधर्वांच्या एकलव्यासारखी विद्या मिळवलेल्या शिष्याने सारी बालगंधर्व गायकी नेऊन असंख्य लोकांची मने जिंकली होती.

पस्तिशी-चाळिशीतला वाटावा असा हा रसरशीत माणूस मला भेटला त्या वेळी सत्तरीत शिरला होता. एक केस पिकला नव्हता. चेहऱ्यावर एक सुरकुती नव्हती. त्यानंतर पुढचे आठ दिवस मला एखाद्या लहान मुलासारखा धरून होता. विषय फक्त बालगंधर्व! बालगंधर्वांसारखाच लहानपणी रंगभूमीवर आला. नवव्या दहाव्या वर्षांपासून गायला लागला. एका नाटक कंपनीवाल्याने ह्याच्या शेतकरी बापाला जमिनीचा लहानसा तुकडा देऊन हा मुलगा विकत घेतला. कंपनीच्या भ्रमंतीत कुठल्याशा गावी नाटकात चांगले काम केल्याबद्दल तिथल्या सावकाराने “हे गाणे गात जा” म्हणून ह्या बालनटाला बालगंधर्वांची रेकॉर्ड दिली‌, ती ‘सत्य वदे’ची. रघुरामय्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे, “वह यकच प्यालामें सुधाकर जैसा पहिले पियालेमे शराबी बन गया, वैसा येक सत्य वदे’की रेकॉर्डने हमको बालगंधर्वका चरणरज बना दिया. ” रघुरामय्यांचा तो ‘चरणरज’ आजही माझ्या कानात आहे. ह्या रघुरामय्यांना आम्ही बालगंधर्व स्पर्धेची पारितोषिके द्यायला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याला बोलावले होते. त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली तीच मुळी, “हमने बालगंधर्वका उच्छिष्ट खाते खाते जिंदगी बितायी” ह्या वाक्याने. समोर श्रोत्यांत भीमसेन होते, हिराबाई होत्या, वसंतराव देशपांडे होते. गंधर्वप्रेमी रसिकांनी हॉल खचाखच भरला होता. आमच्या आग्रहावरून ह्या तेलगू भाषिक नटाने ‘मूर्तिमंत भीति उभी’ म्हटले. शंभर टक्के बालगंधर्वांचे स्मरण करून देणाऱ्या त्यांच्या गाण्याला सार्‍या सभेने डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूंनी दाद दिली. ते एक अद्भुत दृश्य होते. गंधर्व-गायकी त्याच्या रंध्रारंध्रांत भिनली होती. ती त्यांनी आत्मसात केली होती, केवळ भक्तिभावाने.

लेखक : श्री. पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “फक्त एकच खोली कशाला ?” – माहिती संग्राहक : श्री सुधीर गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “फक्त एकच खोली कशाला ?” – माहिती संग्राहक : श्री सुधीर गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

डॉ. अशोक जैन आणि त्यांनी उभारलेली शाळा.

“ फक्त एकच खोली कशाला ? “

“ फक्त एकच खोली कशाला ? “ पूर्ण शाळाच बांध!” – आईच्या एका शब्दाखातर लेकाने उभारली तब्बल सात कोटीची शाळा…

राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील ‘दादाल’ गावातील एका शाळेची सध्या देशभर चर्चा होत आहे. ही शाळा चक्क ‘संसद भवना’ सारखी दिसते! पण या इमारतीपेक्षाही मोठी आहे ती यामागील भावना..

नेमकी गोष्ट काय? या गावातीलच सुपुत्र असलेले डॉ. अशोक जैन हे गेल्या ३१ वर्षांपासून अमेरिकेत डॉक्टर आहेत. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण याच सरकारी शाळेत पूर्ण केले होते. जेव्हा ते गावी आले, तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना विनंती केली की, “शक्य असल्यास मुलांसाठी एक खोली बांधून द्या. “

आईचा तो शब्द आणि पालटलेले चित्र: अशोक जैन यांनी ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. तेव्हा आईने दिलेला सल्ला ऐतिहासिक ठरला. आई म्हणाली, “एका खोलीने काय होणार? मुलं खूप आहेत, तू पूर्ण शाळाच बांधून दे! “

आईचा शब्द मानून डॉ. अशोक जैन यांनी सुमारे ७ कोटी रुपये खर्च केले. संसदेसारखी दिसणारी भव्य आणि आधुनिक इमारत उभारली. शाळेत सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची ही पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. ज्या शाळेत शिकून मोठे झाले, त्याच शाळेला आज त्यांनी एक नवं रूप दिलं आहे.

अशा दानशूर सुपुत्राला आणि संस्कार देणाऱ्या मातेला सलाम!

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अवयवांची गंमत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “अवयवांची गंमत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

०१. जिभेचे वजन खूप हलके असते, पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते.

०२. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्‍या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो.

०३. पाठ मजबूत ठेवा. कारण शाब्बासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.

०४. माणसाने घमेंडीत एवढे उडू नये. एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते हे विसरू नये.

०५. सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात पण एकमेकांना न पाहता.

०६. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे असावं. कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात.

०७. एकदा हाताने पायांना विचारले, “तुझ्यावर सगळे डोके ठेवतात. तो अधिकार मला का नाही? “त्यावर पाय हसून म्हणाले, “त्यासाठी जमिनीवर असावं लागतं, हवेत नाही. “

०८. दुःखात बोटं अश्रू पुसतात तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात, आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची!

०९. जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य. ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो.

१०. एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली, “तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात? ” त्यावर हारातील फुले म्हणाली, ” त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते. “

११. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो, तेच डोळ्यांना बघायला लावतो.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – लोक काय म्हणतील..? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – लोक काय म्हणतील..? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

कुछ तो लोग कहेंगे.. लोगों का काम है कहेना.. छोडो बेकार की बातों मे… बीत न जाये (रैना)… हे गाणं आजच्या विषयाला अगदी समर्पक आहे ना.. मनुष्य प्राणी समाजप्रिय आहे आणि ह्या समाजाचा मुख्य घटक म्हणजे लोक.. त्यामुळे आपल्या आयुष्यातील कित्येक निर्णय आपण लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून घेत असतो.. पण हे कितपत योग्य आहे..? कोण आहेत हे लोक?

हे आपल्याला खरंच ओळखतात का?

– हे आपल्या संघर्षात सोबत होते का?

– हे आपलं सुख-दु:ख वाटून घेतात का?

हे तीन प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत अस मला वाटत.. आपले निर्णय जर लोक काय म्हणतील ह्यावर अवलंबून असतील तर ह्या प्रश्नांची उत्तर मात्र आपल्याकडे हवीत.. आणि ह्या प्रश्नांची उत्तर जर “नाही” अस असेल तर मग मात्र उडत गेले हे लोक म्हणाव आणि आपले निर्णय आपल्याला हवेत तसे घ्यावेत..

“लोक काय म्हणतील? ” हा प्रश्न आपल्याला अडवत असेल, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे –

‘आपलं आयुष्य, आपले निर्णय, आपली जबाबदारी! ’

लोकांचं मत हा एक ट्रेंड आहे – ते दर मिनिटाला बदलतं.

पण आपल्या निर्णयाचा परिणाम आपल्यावर होतो – त्यामुळे जो भी करेंगे आपने लिये करेंगें.. मग जो होगा देखा जाएगा.. कोणताही निर्णय घेताना लोकांचा विचार करण्यापेक्षा आपल्या निर्णयांचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत हे महत्वाचं असत.. लोकांच काय आहे उद्या लोक तेराव्याच जेवायला आल्यावर ही ऊन जास्त आहे मसाला ताक हव होत यार हे ही बोलून दाखवतील.. त्यामुळे लोगोको मारो गोली और मस्त जियो..

अपना हर दिन ऐसे जियो

जैसे कि आखिरी हो..

अस गाणं गुणगुणत मस्त आयुष्य जगायचं.. शेवटी काय जिंदगी एक पहेली है सुलझावो तो सुलझेगी और उलझावो तो उलझेगी.. म्हणून लोगोंका काम है कहेना म्हणायच आणि चालत रहायचं.. फारच लोक मागे लागले तर आपण पाठमोर होऊन एक झक्कास सेल्फी घ्यायची की मग सगळे आपल्याकडे बघतात आणि खुशी खुशी हसतात.. सो चला तर जलने वालोंको और जलाओ और खुद जी भर के जियो…

अपनी लाइफ अपने रूल..

बाकी सबको जाओ भूल..

 

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विवेकवादी पालकत्व – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “विवेकवादी पालकत्व – –☆ श्री जगदीश काबरे ☆

विवेकवादी पालक होणे म्हणजे केवळ देव न मानणे किंवा धार्मिक आचार न पाळणे एवढाच मर्यादित अर्थ नसून, आपल्या पाल्याला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतःच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याची मोकळीक देणे होय. विवेकवादी पालकत्वाचा केंद्रबिंदू श्रद्धा नव्हे तर तर्क, भीती नव्हे तर समज, आणि अंधानुकरण नव्हे तर जाणीवपूर्वक निवड हा असतो. असा पालक मुलाला “हे असंच आहे” असे सांगण्याऐवजी “हे का असावं? ” असा प्रश्न विचारायला उद्युक्त करतो आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रक्रियेत स्वतःही सहभागी होतो.

विवेकवादी पालकत्व म्हणजे नैतिकतेचा उगम देवभयात नाही तर मानवी सहवेदनेत म्हणजे कोणत्याही प्राण्याशी माणुसकीने वागण्यात आहे हे मुलांच्या मनात रुजवणे. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य यांची मांडणी स्वर्ग-नरक किंवा पाप-पुण्याच्या चौकटीत न करता, इतर माणसांवर होणारा परिणाम, न्याय, समता आणि जबाबदारी यांच्या आधारावर करणे, हा त्याचा गाभा असतो. त्यामुळे मूल “कोणी पाहत आहे का? ” म्हणून नव्हे, तर “यामुळे कुणाला त्रास होईल का? ” म्हणून हा विचार करून वागायला शिकते. विवेकवादी पालक होणे म्हणजे मुलाला समाजापासून तोडणे नाही, तर समाजात विवेकाने उभे राहण्याची क्षमता देणे होय. सण-उत्सव, परंपरा, धार्मिक वातावरण यांपासून मुलाला सक्तीने दूर न ठेवता, त्यामागची सामाजिक-ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून सांगणे आणि त्या गोष्टी प्रश्नांसह स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची मुभा देणे, ही त्याची भूमिका असते. यामध्ये पालक स्वतःला अंतिम सत्याचा मालक मानत नाही, तर शिकणारा सहप्रवासी मानतो. एकूणच विवेकवादी पालकत्व म्हणजे मुलांच्या मनात भीतीऐवजी कुतूहल, आज्ञाधारकतेऐवजी संवाद, आणि अंधश्रद्धेऐवजी चिकित्सक बुद्धी रुजवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करणे होय. हा मार्ग सोपा नसतो, कारण तो सतत आत्मपरीक्षणाची मागणी करतो; पण याच मार्गातून स्वतंत्र विचार करणारी, जबाबदार आणि माणुसकी जपणारी पिढी घडू शकते, हीच त्यामागची मूलभूत धारणा असते.

हे सगळे माझे आजचे विचार आहेत. पण खरं सांगायचं तर मी जेव्हा माझ्या तरुणपणी विवेकवादी मार्गाने जगण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला वाटलं होतं की, हा संघर्ष मुख्यतः माझ्या वैयक्तिक आयुष्यापुरताच मर्यादित राहील. पण जेव्हा पालक झालो, तेव्हा उमगलं की हा निर्णय आता केवळ माझा राहिलेला नाही; तो माझ्या मुलाच्या भवितव्याशी, त्याच्या प्रश्नांशी, त्याच्या भीतीशी आणि त्याच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाशी घट्टपणे जोडला गेला आहे. पालकत्व ही आईबाप झाल्यानंतर आपल्यावर पडणारी एक मोठी जबाबदारी असते. त्यातही नास्तिक आणि विवेकवादी पालकत्व ही जबाबदारी अधिकच गुंतागुंतीची करते. कारण इथे केवळ पोट भरण्यासाठी शिक्षण देणे किंवा सुरक्षितता पुरवणे एवढ्यावर गोष्ट थांबत नाही, तर मुलाच्या मनात कोणत्या प्रकारचा विवेक रुजतो आहे, कोणत्या प्रकारची भीती नकळत पेरली जातेय, आणि कोणते प्रश्न आपण टाळतो आहोत, याचाही सतत हिशोब ठेवावा लागतो. मी जेव्हा माझ्या पाल्याच्या बालपणाकडे मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की हा प्रवास सरळ रेषेत झालेला नाही; तो अनेक वळणांचा, चुकांचा, अपराधी भावनेचा, आत्मपरीक्षणाचा आणि कधी कधी स्वतःच्या विवेकालाही प्रश्न विचारायला लावणारा राहिला आहे.

माझ्या विवेकवादी भूमिकेमुळे सर्वात आधी सामना करावा लागला तो कुटुंबातच. माझे आई-वडील, आजी-आजोबा, काका-मावश्या हे सगळे ज्या श्रद्धा, सण-उत्सव, देवधर्म यांच्या वातावरणात वाढले, त्यातूनच त्यांनी मला घडवलं होतं. पण माझ्या वाचनाच्या सवयीमुळे मी त्या प्रवाहातून बाहेर आलो, प्रश्न विचारू लागलो, देव मानणं सोडलं. पण तरीही कुटुंबातील नात्यांची ऊब टिकून होती. मात्र जेव्हा माझ्या मुलाचा प्रश्न आला, तेव्हा अनेकांना वाटलं की आता मी “अति” करतो आहे. “तू नास्तिक असलास तरी मुलाला देवापासून का वंचित ठेवतोस? ”, “लहान मुलाला देव नाकारायला शिकवणं म्हणजे त्याचं बालपण हिरावून घेणं नाही का? ” असे प्रश्न थेट किंवा अप्रत्यक्षपणे विचारले गेले. सुरुवातीला मी आक्रमक झालो. मला वाटायचं की मी जे करतो आहे तेच योग्य आहे आणि बाकी सगळे अंधश्रद्धेच्या कैदेत अडकलेले आहेत. पण हळूहळू कळलं की, या आक्रमकतेचा फटका माझ्या मुलालाच बसतो आहे. कारण तो नात्यांच्या संघर्षात नकळत ओढला जात होता. मग मी एक तोडगा शोधला. वाद टाळला नाही, पण संघर्ष सौम्य करण्याकडे कल ठेवला. मी मुलाला देव न मानायला “शिकवणं” थांबवलं आणि देवाबद्दल प्रश्न विचारायला “परवानगी” देऊ लागलो. कुटुंबात सण आले, पूजा झाली, तेव्हा मी त्याला जबरदस्तीने दूर ठेवलं नाही, पण त्याला हेही स्पष्ट सांगितलं की, हा सगळा लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे, निसर्गाचा नियम नाही. हा मध्यम मार्गही माझ्यासाठी सोपा नव्हता. पण त्यामुळे नात्यांमध्ये निर्माण होणारी कटू टळली आणि मुलाला स्वतःचा निष्कर्ष काढायला वाव मिळत गेला.

शाळेचा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होता. पहिल्याच दिवशी सकाळची प्रार्थना, देवाचं नाव, हात जोडून उभं राहणं, हे सगळं माझ्या मुलासाठी नविन होतं, पण माझ्यासाठी अस्वस्थ करणारं. एकीकडे मला वाटायचं की सार्वजनिक शिक्षणसंस्थांमध्ये धर्मनिरपेक्षता असावी, तर दुसरीकडे मला हेही जाणवत होतं की रोजच्या लढाईत मुलाला वेगळं पाडणं त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या जड ठरेल. सुरुवातीला तो घरी येऊन विचारायचा, “आपण देव मानत नाही तर मला प्रार्थना का म्हणायला लावतात? ” तेव्हा मी थेट उत्तर दिलं, “तुला मनापासून वाटत नसेल तर मनातल्या मनात शांत उभा राहा. ” पण काही दिवसांनी लक्षात आलं की, हा सल्ला त्याच्यासाठी अवघड आहे. वर्गात सगळे एकत्र म्हणत असताना वेगळं वागणं म्हणजे स्वतःकडे लक्ष वेधून घेणं. मग मी माझी भूमिका बदलली. मी त्याला सांगितलं की प्रार्थना ही शाळेची शिस्त आहे, श्रद्धा नाही. जोपर्यंत आपण त्यांचा अर्थ तपासतो आणि प्रश्न विचारतो तोपर्यंत शब्दोच्चार करण्यात काहीच गैर नाही. हा बदल माझ्यासाठीही मोठा होता. कारण मला स्वतःला अनेक वर्षे धर्माशी निगडित कोणतेही शब्द उच्चारायचीही चीड होती. पण इथे मला मुलाच्या मानसिक सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं लागलं.

सण-उत्सवांबाबतही असाच गोंधळ होता. दिवाळी, गणेशोत्सव, रमजान, ख्रिसमस हे सगळं मुलांसाठी रंग, गाणी, मिठाया, गोष्टी यांचं जग असतं. मी जर फक्त “हे सगळं उथळ आहे” एवढंच सांगितलं असतं, तर कदाचित त्याच्या आयुष्यातून आनंदाचा एक मोठा भाग काढून टाकल्यासारखा झाला असता. म्हणून मी वेगळा मार्ग निवडला. आम्ही सण साजरे केले, पण देवासाठी नाही, तर माणसांसाठी. दिवाळीत दिवे लावले, कारण प्रकाश आवडतो; गणेशोत्सवात मूर्ती पाहिल्या, पण गणेशाची पूजा केल्याने समस्या सुटतात का, या प्रश्नावर चर्चा केली. रमजानमध्ये उपवासामागचं शिस्तीचं तत्त्व समजावलं. ख्रिसमसमध्ये भेटवस्तू देण्यामागचं सामाजिक नातं उलगडून दाखवलं. या प्रक्रियेत मला जाणवलं की विवेकवाद म्हणजे आनंद नाकारणं नाही, तर आनंदाच्या पार्श्वभूमीवर असलेली भीती आणि अंधश्रद्धा काढून टाकणं आहे.

देव आणि धर्माइतकाच कठीण विषय म्हणजे नैतिकता. अनेकदा लोक मला विचारायचे, “देव मानत नसाल तर चांगलं-वाईट कसं ठरवता? ” हा प्रश्न माझ्या मुलालाही पडला. शाळेत, गोष्टींमध्ये, चित्रपटांत चांगला माणूस म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा असा सूचक संदेश असायचा. तेव्हा मी त्याच्याशी खूप साध्या भाषेत बोललो. मी सांगितलं की, नैतिकता म्हणजे भीतीपोटी तयार केलेले नियम नाहीत, तर सहवेदनेतून समाज सुरळीत चालावा म्हणून घेतलेले निर्णय असतात. आपल्यामुळे कुणाला त्रास होतो का? कुणाचं नुकसान होतं का? आपण समाजात एकमेकांवर किती आणि कोणत्या हेतूने अवलंबून आहोत? आपण नागरिकशास्त्राचे नियम मोडत तर नाही ना? या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे नैतिकता. मला वाटलं होतं की, हे सगळं त्याच्यासाठी फार तात्त्विक ठरेल, पण उलट तोच मला उदाहरणं देऊ लागला… “मी मित्राची वस्तू परत दिली; कारण त्याला वाईट वाटू नये, असं मला वाटलं. ” त्या क्षणी मला कळलं की, विवेकवादी मूल्यं मुलांच्या मनात नैसर्गिकरीत्या रुजतात, फक्त आपण त्यांना धर्माच्या चौकटीत अडकवता योग्य दिशा दिली पाहिजे. इथेच माझ्या पालकत्वाची खरी कसोटी लागली.

मृत्यूबद्दलचा संवाद हा कदाचित सर्वात जड टप्पा होता. एखाद्या नातेवाइकाचा मृत्यू झाला, तेव्हा प्रश्न उभा राहिला, “तो कुठे गेला? ” अनेक पालक स्वर्ग-नरक, पुन्हा जन्म, देवाकडे गेला अशी उत्तरं देतात. कारण ती उत्तरं सोपी असतात. पण मी ठरवलं होतं की, मी असलं काही खोटं सांगणार नाही. तरीही मला भीती वाटत होती की, सत्य सांगितल्याने त्याचं मन अस्वस्थ होईल की काय? मी त्याला सांगितलं की, माणूस मरतो तेव्हा त्याचं शरीर निसर्गात मिसळतं, आठवणी आपल्या मनात राहतात, आणि तो आपल्यामध्ये अस्तित्वात राहतो त्याच्या स्मृतीतून. तो काही वेळ शांत राहिला, मग म्हणाला, “म्हणजे आपण त्याला आठवत राहिलो तर तो जिवंत आहे? ” त्या वाक्याने मला जाणवलं की मृत्यूबद्दलची विवेकवादी मांडणी माणसाला अधिक जबाबदार बनवते. त्या जबाबदारीतून त्याला हे कळलं की, स्वर्गाची आशा नसताना, आपलं आयुष्य इथेच अर्थपूर्ण करावं लागतं.

जन्माच्या बाबतीतही असाच संवाद झाला. म्हणजे तो साधारण चार वर्षाचा असताना त्याने आईला विचारले की, “मी कुठून आलो आणि कसा आलो? ” सर्वसाधारण घरातून अशा प्रश्नाला उत्तर दिले जाते की, ‘तुला देवबाप्पाने पाठवले. ‘ या उत्तराने मुलाचे समाधान होत असले तरी हे उत्तर चुकीचे आहे, खोटे आहे. यामुळे आपण मुलांवर नकळतपणे अंधश्रद्धेचा संस्कार करत असतो. तेव्हा त्याच्या आईने त्याला समाजावून सांगितले की, “तुला चित्रे काढायला आणि रंगवायला आवडतात. तू जेव्हा लाल रंगात हिरवा रंग मिसाळतोस तेव्हा त्यापासून तिसऱ्याच रंगाचा पिवळा रंग तयार होतो. तसेच बाबाच्या आणि माझ्या प्रेमाचे रंग मिसाळल्यामुळे तिसरा तू माझ्या पोटातून जन्माला आलास. ” किती विवेकी आणि सुंदर उत्तर आहे हे!

विवेकवादी संस्कार रुजवताना मी अनेक प्रयोग केले आणि तितक्याच चुकाही केल्या. एक काळ असा होता की, मी प्रत्येक गोष्टीत अंधश्रद्धा शोधून काढायचो. एखादी अंधश्रद्ध गोष्ट ऐकली की लगेच विज्ञान सांगायचो, आकडे मांडायचो, पुरावे द्यायचो. पण नंतर जाणवलं की मुलासाठी प्रत्येक क्षण वादाचा असणं थकवणारं आहे. कधी कधी त्याला फक्त गोष्ट ऐकायची असते, प्रश्न लगेच सुटले नाही तरी चालतात. मी हेही शिकलो की, विवेकवाद म्हणजे कायम “मला सगळं माहीत आहे” अशी भूमिका घेणं नाही, तर “मला अजून माहीत नाही” हे मान्य करण्याचं धैर्य आहे. खरोखरच त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेही नव्हती, आणि ते मी त्याला प्रामाणिकपणे सांगितलं. या प्रामाणिकपणामुळे आमच्यात विश्वासाचं नातं अधिक घट्ट झालं. आज मागे वळून पाहताना मला असं वाटत नाही की, मी एक परिपूर्ण विवेकवादी पालक आहे. उलट मला असं वाटतं की मी माझ्या मुलाकडून, समाजाकडून, आणि स्वतःच्या चुका पाहून अजूनही शिकतो आहे. पण एक गोष्ट नक्की वाटते की मी त्याला भीती दाखवण्यापेक्षा प्रश्न विचारायला उद्युक्त केले, आज्ञाधारक बनवण्यापेक्षा संवाद साधण्यास शिकवले, आणि श्रद्धेपेक्षा सहवेदना महत्त्वाची असते हे त्याच्या मनावर बिंबवले. थोडक्यात हा लेख केवळ माझ्या आठवणींचा संग्रह नाही; तो अशा अनेक पालकांच्या अनुभवांचा आरसा आहे, जे समाजाच्या प्रवाहात वाहून न जाता थोडं थांबून विचार करतात. कारण विवेकवादी पालकत्व हा एकट्याचा लढा नसतो; तो संपूर्ण कुटुंबाचा लढा होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, आपण आपल्या पुढच्या पिढीला अंधारात लोटले नाही, तर त्याच्या हृदयात करूणेची आणि मेंदूत विचाराची ज्योत प्रज्वल्लीत करण्याचा प्रयत्न केला, याचा आनंद काही औरच असतो.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपण नामाचे सावकार…!! ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ आपण नामाचे सावकार…!! ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

प्रिय महाराज,

शिरसाष्टांग नमस्कार.

आताच घरी सुखरूप पोचलो…!!

लेकीने चार दिवस माहेरी यावं आणि त्यातील एकेक दिवस चार दिवसांचा असावा, असे कुटुंबवत्सल असलेल्या प्रत्येक बापास वाटतं असेल…

लेक माहेरून सासरी निघाली की तो पोचल्याचा फोन येईपर्यंत आईबापाच्या जीवाची घालमेल होत असते… हो ना…?

आणि म्हणून आताच घरी पोचलो आणि तुम्हाला पत्र लिहायला घेतलं आहे…

– – खरं सांगू का? पत्रात काय लिहू? असा प्रश्न मला पडला आहे…

घरून निघताना आपल्याकडे मागण्याची मोठी यादी असते, गोंदवल्यात जाईपर्यंत ती पाठ झालेली असते,

पण…

जेव्हा तुमची दर्याद्र दृष्टी आमच्यावर पडते ना… तेव्हा आमचं मन विरघळून जातं…

मनाची संपूर्ण जागा तुम्ही व्यापून घेता आणि आमचे सर्व विषय, मागण्या त्यात आपोआप विरघळल्या जातात…

तुमच्याकडे कसली जादू आहे, हे काही मला अजून उमगलेले नाही…

पण खरं सांगू गोंदवल्यातून घरी येताना मन भरून जाते आणि पाय मात्र अजिबात निघू देत नाहीत…

पायांना आपल्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या भूमीची उब सोडून घरी यावं असे वाटत नसावे…

पण महाराज, आम्ही प्रापंचिक माणसं, आमची दुःख तुम्हालाच ठाऊक…

आजपर्यंत अनेक सावकारांच्या कथा ऐकल्या आहेत. त्यातील काही सावकार दयाळू तर काही सावकार एकदम बदमाश.

पण आपली सावकारी एकदम जगावेगळी…!!!

“आपण नामाचे सावकार…!!”

ज्याला रामाची ओढ नाही, त्याच्या मनात शिरून त्याला गोंदवल्याच्या रामाचे दर्शन घेण्यास प्रवृत्त करणारे…

ज्याने रामाचे दर्शन घेतले आहे, त्याला रामनामाची गोडी लावणारे…

ज्याला रामनामाची थोडीफार गोडी लागली आहे, त्याला अनुग्रह देऊन कृपांकित करणारे..

ज्याला आपण अनुग्रह दिला आहे की जो नाम घेतो, त्याच्या प्रपंचाची आणि परमार्थाची संपूर्ण जबाबदारी घेणारे…

तुमच्यावर विश्वास ठेवून नाम घेणाऱ्याच्या प्रपंचातील आसक्ती नकळत शोषून घेणारे…

प्रत्येक नाम घेणाऱ्याने परमपूजनीय ब्रम्हानंद बुवांसारखे कामासाठी नाम न घेता नामासाठीच नाम घ्यावे असा प्रयत्न करणारे…

अतिशय दर्याद्र दृष्टीने प्रत्येकाकडे पाहणारे…

– – माझी लेखणी… थिटी पडते लिहिताना…

पण आपले कौतुक आणि लीला सांगताना मन मात्र सारखे उचंबळून येत आहे…

कालच्या उत्सवात नामाच्या शक्तीची अगदी छोटीशी झलक माझ्या मर्यादित कुवतेने अनुभवू शकलो…

एकच करू शकतो…

त्रिवार वंदन!!!!

प्रत्येकाने नामस्मरण करून आपल्या जीवाचे कल्याण करून घ्यावे असा आपला उद्देश मला तत्वतः तरी कळला आहे…

इथून पुढे तसे आचरण करण्याचा माझा प्रयत्न असेल…

आपण मला त्यात यश द्यावे…

काल आपल्या पुण्यतिथीला आपले सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ भक्त आलेले असतील, त्याचा कळतनकळत सहवास आपल्यामुळे आम्हाला घडला…

*”तुझ्या भक्ताची संगती मज घडो सर्वदा!! “* असा आशीर्वाद आपण आम्हाला द्यावा…

बाकी क्षेम…

तुमचा,

बाळ

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १८ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांनी गीतांजलीतील १५ ते १६ कवितांची रचना परमेश्वराला पती, प्रियकर किंवा सखा मानून केलेली दिसते. कांही कवितांत हे नातं उघडपणे मांडलेलं आहे तर कांही कवितांत या भावनेला निसटता स्पर्श केल्याचे जाणवते.

परमेश्वर व भक्त जेव्हा परस्परात एकरूप होऊन जातात तेव्हा ती मधुरा भक्ती असते. त्यांच्यातल्या नात्याला पती-पत्नी, प्रियकर- प्रेयसी असे संबोधले जाऊ लागले. वैदिक काळापासून हिंदू धर्मात तसेच मुस्लिम व ख्रिस्ती धर्मातही अशा प्रकारचे उल्लेख आढळतात.

महर्षी नारदांनी भक्तीचे नऊ प्रकार – नवविधा भक्ती, सांगितली आहे.

१- श्रवण भक्ती: म्हणजे देवाच्या कथा, गुण, महात्म्य श्रद्धेने ऐकणे.

२- कीर्तन भक्ती: म्हणजे देवाची स्तुती भजन व गुणगान गाणे.

३- स्मरणभक्ती: परमेश्वराचे चिंतन करणे व त्याची निरंतर आठवण ठेवून नाम जप करणे.

४- पादसेवन भक्ती: यात देवाची किंवा संतांची चरण सेवा करणे.

५- अर्चना भक्ती: पूजेच्या साहित्याने देवाची बाह्य पूजा, आरती करणे.

६- वंदन भक्ती: देवाला नमस्कार करून प्रार्थना करणे.

७- दास्यभक्ती: देवाचा सेवक म्हणून त्याची तन-मनाने सेवा करणे.

८- सख्य भक्ती: देवाशी मैत्री करणे आणि आपले प्रत्येक कर्म त्याच्यासाठीच आहे याची जाणीव ठेवणे.

९- आत्मनिवेदन भक्ती: स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करणे. पूर्ण शरणागती पत्करणे. देहाभिमान नष्ट होऊन आत्मा परमात्म्यात विलीन होईल असा प्रयत्न करणे.

आत्मनिवेदनात भगवंतावरील प्रेम, आसक्ती ही सर्वात तीव्र स्वरूपाची आहे. पण ही आसक्ती हे प्रेम मिळवायचे कसे? याचे उत्तर देण्यासाठी ऋषींनी काही अध्यात्मिक वृत्तींची माहिती दिली आहे. अत्युच्च पदापर्यंत जाण्याच्या पायऱ्याच म्हणानात! त्यांनाही भक्ती म्हणतात.

१- शांता भक्ती: यात आनंद- दुःख, यश- अपयश देवाचीच देणगी आहे म्हणून स्वीकारणे. त्यासाठी कोणतीही तक्रार न करणे.

२- सख्य भक्ती: म्हणजे साथीदार व सल्लागार प्रभूच असतो. नेहमी त्याच्या सांगण्यावरूनच भक्ताची कृती होत असते.

३- दास्यभक्ती: स्वतःला देवाचा सेवक मानणे म्हणजेच देवाला आपला स्वामी मानणे.

४- वात्सल्य भक्ती: म्हणजे देवाला आई-वडील मानून, प्रभु चरणाशी स्वतःला जोडणे.

५- मधुरा भक्ती: भक्त व देव यांच्यात अद्वैत निर्माण होणे. ज्याला नाव नाही, रूप नाही, कोणताही गुणधर्म नाही अशा परमतत्वात विलीन होण्याची तळमळ असणे.

वेद, उपनिषदे इत्यादींमधील वाङ्‍मयात ईश्वर व भक्त यांच्यामधील प्रेमसंबंधाच्या वर्णनात दांपत्यप्रेमाचे दाखले दिल्याची उदाहरणे आढळत असली, तरी तेथे ही भक्ती स्पष्टपणे मधुरा भक्तीच्या स्वरूपात आढळत नाही. मात्र गोपींनी कृष्णाची प्रेमस्वरूप भक्ती केली आणि त्यामुळे त्यांचा उध्दार झाला, या भागवतातील विवेचनामुळे मधुरा भक्तीची ही संकल्पना उदयाला आली, असे मानले जाते. या संकल्पनेनुसार भक्तांना ईश्वर प्रेमाच्या प्रचीतीसाठी गोपींप्रमाणे स्त्रीरूप स्वीकारण्याची आवश्यकता वाटू लागली. यामुळे, या प्रकारात भक्त लिंगविपर्यास मानतात. याउलट, ईश्वराला प्रेयसी व स्वत:ला प्रियकर मानून केल्या जाणाऱ्या सूफी साधू वगैरेंच्या भक्तीत असा लिंगविपर्यास मानण्याची आवश्यकता नसते.

कृष्ण हा जगातील एकमेव पुरूष असून, बाकी सर्व जीवात्मे कृष्णाची निसर्गतःच ओढ असलेल्या स्त्रिया आहेत, असा सिध्दांतही त्यासाठी निर्माण करण्यात आला. याचा परिणाम म्हणून पुरूषभक्तांनीदेखील स्त्रीवेष धारण करून भक्ती करावयास सुरवात केली. विरह, मीलन इत्यादींमध्ये स्त्रियांना ज्या विविध अवस्थांचा अनुभव येतो, त्या अवस्थांचा अनुभव पुरूषभक्तही घेऊ लागले. बंगालमधील चैतन्य गौरांग प्रभूंच्या वैष्णव संप्रदायात काही वेळा या गोष्टीचा इतका अतिरेक झाला, की पुरूषभक्ताला तो स्त्री बनल्यामुळे स्त्री प्रमाणे मासिक ऋतुप्राप्ती झाल्याचे मानून त्यानुसार वर्तन करण्याचे प्रकारही आढळू लागले.

मधुरा भक्तीमध्ये असे आगळेपण आढळत असल्यामुळे तिचे मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याचेही प्रयत्‍न झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मधुरा भक्तीला काही जणांनी विकृती मानले, तर यात आश्चर्य नाही. मधुरा भक्तीमध्ये कामभावनेचे उदात्तीकरण होते, की कामभावनेचे रूपांतर होऊन मधुरा भक्ती ही एक वेगळीच अवस्था बनते, यांसारख्या प्रश्नांची मानसशास्त्रीय चर्चा करण्यात आली आहे. पुरूषभक्ताला स्त्रीवेष धारण करावा असे वाटणे ही विकृती आहे, की आणखी काही वेगळी अवस्था आहे, याचेही विवेचन करण्यात आले आहे.

परंतु एक सत्य मान्य केलेच पाहिजे की, पती-पत्नी, प्रियकर- प्रेयसी या नात्यातील अत्यंतिक उत्कटता, माधुर्य, समर्पण याकडे केवळ भक्तच नाही तर कवीही आकर्षित झाले. तद्वतच टागोरांना देखिल या भावनेचा, मधुरा भक्तीचा आधार काही रचनांसाठी घ्यावासा वाटणे स्वाभाविकच आहे.

—–

☆ गीत: ५२ ☆

THOUGHT I should ask of thee ⎯ but I dared not ⎯ the rose wreath thou hadst on thy neck. Thus I waited for the morning, when thou didst depart, to find a few fragments on the bed. And like a beggar I searched in the dawn only for a stray petal or two.

Ah me, what is it I find? What token left of thy love? It is no flower, no spices, no vase of perfumed water. It is thy mighty sword, flashing as a flame, heavy as a bolt of thunder. The young light of morning comes through the window and spreads itself upon thy bed. The morning bird twitters and asks, “Woman, what hast thou got? ” No, it is no flower, nor spices, nor vase of perfumed water ⎯ it is thy dreadful sword.

I sit and muse in wonder, what gift is this of thine. I can find no place where to hide it. I am ashamed to wear it, frail as I am, and it hurts me when I press it to my bosom. Yet shall I bear in my heart this honour of the burden of pain, this gift of thine.

From now there shall be no fear left for me in this world, and thou shalt be victorious in all my strife. Thou hast left death for my companion and I shall crown him with my life. Thy sword is with me to cut asunder my bonds, and there shall be no fear left for me in the world.

From now I leave off all petty decorations. Lord of my heart, no more shall there be for me waiting and weeping in corners, no more coyness and sweetness of demeanour.

Thou hast given me thy sword for adornment. No more doll’s decorations for me!

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५२ ☆


देशील हार गळ्यात रुळणारा?

आठवण म्हणून, तो मोहविणारा

*

वाटलं विचारावं, पण धाडस नाही

कधी येते उषा याचीच वाट पाही

*

अधाशासरखी धावले शेजेकडे

दोन तरी पाकळ्या मिळोत तिकडे 

*

भितीदायक आठवण दिलीस

तुझी पराक्रमी तलवार ठेवलीस

*

सौदामिनी सारखी तळपत होती

नाजूक हातांना या पेलत नव्हती

*

राघू, मैना काय मिळालं म्हणाले

काय सांगू? कुठं लपवू? गोंधळले

*

जड इतकी, कशी हृदयाशी घेईन

वेदनेचं ओझं सन्मानाने मिरवीन

*

आता भिती वाटत नाही कशाची

जगाच्या संघर्षात पाश तोडण्याची

*

भित्री, नाजूक, लाजरी नाही मी आता

माझा साज शृंगार ही तलवारच आता

*

तू घालून दिलेल्या मार्गानेच जाईन

वेदनेचे गीत गात तुलाच आळवीन

*

तूच माझा सखा जिवा-भावाचा

साज चढवेन तुला मम आयुष्याचा

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत:५३ ☆

BEAUTIFUL is thy wristlet, decked with stars and cunningly wrought in myriad-coloured jewels. But more beautiful to me thy sword with its curve of lightning like the outspread wings of the divine bird of Vishnu, perfectly poised in the angry red light of the sunset.

It quivers like the one last response of life in ecstasy of pain at the final stroke of death;it shines like the pure flame of being burning up earthly sense with one fierce flash.

Beautiful is thy wristlet, decked with starry gems; but thy sword, O lord of thunder, is wrought with uttermost beauty, terrible to behold or to think of.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५३ ☆

कलात्मक घडवलेलं, अनंत रंगीत रत्नांनी

कंकण तुझे सुंदर, सजवलेले लक्ष ताऱ्यांनी

*

पण त्याहून सुंदर, खड्ग बाकदार, चमकणारे

विष्णुवाहन वैनतेयाच्या पंखापरी पसरणारे

भव्य रूप ते पश्चिमेच्या लालीत तळपणारे

*

शेवटच्या प्रतिसादाला तडफडणाऱ्या देहासारखे

ऐहिक भावना जळताना उडणाऱ्या प्रकाशासारखे 

*

मेघाधिपती, कंकणरूपी जीवना साज रत्नांचा

खड्ग रुपी मृत्यू त्याहून सुंदर, अनामिक भितीचा

*

होशील जर सखा माझा, वाहीन जीवन सजलेलं

खड्ग पेलण्याचं धैर्य दे, मन आहे आसुसलेलं

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ५४ ☆

ASKED nothing from thee; I uttered not my name to thine ear. When thou took’st thy leave I stood silent. I was alone by the well where the shadow of the tree fell aslant, and the women had gone home with their brown earthen pitchers full to the brim. They called me and shouted, “Come with us, the morning is wearing on to noon. ” But I languidly lingered awhile lost in the midst of vague musings.

I heard not thy steps as thou camest. Thine eyes were sad when they fell on me; thy voice was tired as thou spokest low ⎯ “Ah, I am a thirsty traveller. ” I started up from my day-dreams and poured water from my jar on thy joined palms. The leaves rustled overhead; the cuckoo sang from the unseen dark, and perfume of babla flowers came  from the bend of the road.

I stood speechless with shame when my name thou didst ask. Indeed, what had I done for thee to keep me in remembrance? But the memory that I could give water to thee to allay thy thirst will cling to my heart and enfold it in sweetness. The morning hour is late, the bird sings in weary notes, neem leaves rustle overhead and I sit and think and think.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५४ ☆


तू बोलला नाहीस, मी ही नाही बोलले

स्तब्ध उभी पहात, सारेच अधुरे राहिले

*

घागर घेऊन उभी, जिथे होती तिरपी साऊली

मैत्रिणी म्हणाल्या, ‘चल, दुपार होऊ लागली’

*

तिथेच रेंगाळले, आज कुणी तार हृदयाची छेडली

तू आलास, तुझी चाहूल कां नाही आली?

*

तू उदास होतास, थकला होतास

तहान लागली, पाणी मिळेल कां म्हणालास

*

एकदम जागी झाले मी, दिवा स्वप्नातून

घागरीतलं पाणी प्यालास, तुझ्या ओंजळीतून

*

अन् पानं सळसळली, कोकीळ गाऊ लागला,

काय ही जादू! फुलांनीही गंध पसरला

*

नाव विचारता तू, मी लाजून चूर 

शब्दही नाही फुटला, हीच हुरहूर

*

तुझी तहान भागवली हा दिलासा जिवाला

ही गोड आठवण सदैव आनंद देईल मनाला

*

सूर्य माथ्यावर, कोकिळेचा आवाज थकला

तुझी माझी भेट हा संकेत कसला?

*

मी एकटीच विणते साखळी विचारांची

तूच माझा कान्हा, ओळख शतजन्मांची

– क्रमशः भाग १८..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माणुसकीची अनोखी गोष्ट! – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

माणुसकीची अनोखी गोष्ट! – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर

माणुसकीची अनोखी गोष्ट!

 – – “ एका चिमणीसाठी ‘न्यायालय’ रस्त्यावर आलं! “

“जिथे जीव वाचवण्याची जिद्द असते, तिथे कायद्याचे दरवाजेही माणुसकीसाठी उघडले जातात! ” केरळच्या उल्लिकलमध्ये एका छोट्याशा चिमणीने संपूर्ण प्रशासनाला कसं कामाला लावलं, ही अंगावर शहारे आणणारी गोष्ट नक्की वाचा.

८ एप्रिल रोजी मनोज कुमार नावाच्या मिस्त्रीने पाहिलं की, एका बंद कपड्याच्या दुकानात एक चिमणी अडकली आहे. एका छोट्या पाईपमधून ती आत शिरली, पण बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नव्हता. काचेवर चोच मारून तिचे पंख थकत चालले होते.

दुकान एका मालमत्ता वादामुळे कोर्टाच्या आदेशाने ‘सील’ होतं. दुकान उघडण्याचा अधिकार कोणालाच नव्हता. अग्निशमन दल, गाव अधिकारी आणि अगदी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, पण कायद्याचं उल्लंघन कसं करणार?

ऑटो चालक, दुकानदार आणि गावकऱ्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्या छोट्या छिद्रातून चिमणीसाठी दाणे आणि पाणी आत सोडलं, जेणेकरून ती जिवंत राहील. ३ दिवस गावचा जीव टांगणीला होता.

जेव्हा प्रकरण गंभीर झालं, तेव्हा गावकऱ्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून जिल्हा न्यायाधीश के. टी. निसार अहमद स्वतः त्या दुकानापाशी पोहोचले आणि माणुसकीच्या नात्याने दुकान उघडण्याची विशेष परवानगी दिली!

अखेर ती उडाली… : १० एप्रिल रोजी दुकान उघडलं आणि तीन दिवसांच्या संघर्षांनंतर ती चिमणी मोकळ्या आकाशात झेपावली. गावच्या आनंदाला पारावार उरला नाही!

एका नगण्य वाटणाऱ्या चिमणीसाठी जेव्हा संपूर्ण गाव आणि न्यायव्यवस्था एकत्र येते, तेव्हा समजतं की माणुसकी अजून मेलेली नाही. ही गोष्ट आपल्याला शिकवते की, प्रत्येक सजीव महत्त्वाचा आहे!

“एका चिमणीचा जीव वाचवण्यासाठी धावून आलेल्या या गावकऱ्यांसाठी आणि संवेदनशील न्यायाधीशांसाठी कमेंटमध्ये एक ‘Heart’ नक्की द्या! माणुसकीच्या या महान कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ” 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ५ – टिक टिक -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ५ – टिक टिक – ☆ विभावरी कुलकर्णी

सध्या लहानमुलांसाठी खूप आकर्षक म्हणजे अगदी मोठ्या माणसांना सुद्धा भुरळ पडावी अशी खेळणी दिसून येतात. ती खूप महाग पण असतात. काही खेळणी ज्ञान वाढवणारी असतात. परंतु साधारण चाळीस वर्षांपूर्वी एक लोकप्रिय असलेले खेळणे मला आठवते. त्याची किंमत असेल दहा किंवा पंधरा पैसे. पण मुलांच्या दृष्टीने उपयुक्त! त्याचे नाव टिक टिक किंवा टीन क्लिकर

 ​या वस्तूला ‘कडकडी’ सुद्धा म्हटले जाते. इंग्रजीत याला ‘Metal Clicker’ किंवा ‘Cricket’ असेही नाव आहे. ​खेळणी म्हणून: ८० च्या दशकातील मुलांचे हे सर्वात आवडते आणि स्वस्त खेळणे होते. अंगठ्याने तो धातूचा पत्रा दाबला की ‘कडक’ असा आवाज येतो, म्हणून मुले याचा वापर गंमत म्हणून किंवा एकमेकांना खुणावण्यासाठी करत असत.

​फार कमी लोकांना माहीत आहे की, अशा प्रकारच्या क्लिकरचा वापर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांद्वारे (विशेषतः पॅराट्रूपर्स) रात्रीच्या वेळी अंधारात एकमेकांना सांकेतिक संदेश देण्यासाठी केला जात असे. एकदा ‘क्लिक’ केल्यास उत्तर म्हणून दोनदा ‘क्लिक-क्लिक’ करणे, ही त्यांची ओळख पटवण्याची पद्धत होती.

निर्मिती

​हे खेळणे लवचिक स्प्रिंग स्टील (Spring Steel) किंवा कथील (Tin) च्या पातळ पत्र्यापासून बनवले जाते.

​एका छोट्या धातूच्या चौकटीत किंवा डबीत हा पत्रा अशा प्रकारे बसवलेला असतो की तो थोडा फुगीर राहतो.

​ जेव्हा आपण या पत्र्यावर दाब देतो, तेव्हा तो आपला आकार बदलतो आणि पुन्हा मूळ स्थितीत येताना हवेच्या दाबामुळे एक विशिष्ट ‘टीक’ आवाज निर्माण होतो. सुरुवातीला हे अगदी साधे पत्र्याचे असायचे. कधीकधी तो पुढचा पातळ पत्रा हाताला लागायचा. किंवा ते खिशात ठेवले की पत्र्याच्या टोकामुळे खिशाला छिद्र पडायचे. पण कोणालाही कळू न देता मित्रांना संकेत द्यायला उपयोगी होते.

मुले फक्त मजेसाठी हा आवाज काढत असत.

​खेळताना (उदा. लपाछपी किंवा पकडापकडी) एकमेकांना दूरून संकेत देण्यासाठी किंवा बोलावण्यासाठी याचा वापर व्हायचा.

​ गाणी म्हणताना किंवा ठेक्यावर वाजवण्यासाठी मुले याचा वापर करत.

​ काही मुले हे आपल्या सायकलच्या हँडलला लावून बेलसारखा वापर करायची.

नंतर या साध्या दिसणाऱ्या टिकटिकला आकर्षक रंग लावून किंवा काही प्राण्यांचे आकार देऊन रंगीबेरंगी करुन आकर्षक केले गेले.

याच्या आवाजाच्या मदतीने कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जात होते.

​हे खेळणे आता दुर्मिळ झाले असले तरी, आजही जत्रेत किंवा जुन्या वस्तूंच्या दुकानात पाहायला मिळते.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares