मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ६ – अनुकरण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ६ – अनुकरण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मुलं अनुकरणप्रिय असतात. घरात आपले आई वडील कसे वागतात, कसे बोलतात, कपडे काय घालतात, नातेवाईकांशी कसे संबंध ठेवतात हे सर्व ते रोज बघत असतात. त्यांच्या सवयी काय आहेत ,कोणत्या आहेत? हे मनात साठवत असतात. मुली असतील तर त्या आईची नक्कल करतात,उदा. भातुकली च्या खेळात मुली आईची भूमिका नेहमी करत असतात. आजही. मुले वडिलांची नक्कल करतात. म्हणजे आई वडील या नात्याने आपल्या मुलांच्या भविष्यात चांगले काही घडण्यासाठी ची आईवडिलांची जबाबदारी किती मोठी असते हे लक्षात येईल. घरात जसे वातावरण असेल तशी तशी मुलं घडत जातात. 

नरेंद्रही अशा वेगळ्या वातावरणात घडत होता. १८७७ मध्ये नरेंद्र विश्वनाथबाबूंच्या बरोबर रायपूर येथे राहत होता. तेथे शाळा नव्हती. त्यामुळे ते स्वत:च नरेंद्रला शालेय पाठ्यपुस्तकाशिवाय इतिहास तत्वज्ञान, साहित्य विषय शिकवीत असत. शिवाय घरी अनेक विद्वान व्यक्तीं येत असत. त्यांच्या चर्चाही नरेंद्रला ऐकायल मिळत असत. त्याचं वाचन इतकं होतं कि, तो वादविवादात पण सहभागी होत असे. नरेंद्रची बुद्धी आणि प्रतिभा बघून ते वेगवेगळ्या विषयांवर मोकळेपणी मत मांडण्याची संधी नरेंद्रला देत असत.

नरेंद्रचही असच होत होतं. वडिलांचे गुण, दिलदारपणा, दुसर्‍याच्या दु:खाने द्रवून जाणं, संकटकाळी धीर न सोडता, उद्विग्न न होता, शांतपणे आपलं कर्तव्य बजावत राहणं अशी वैशिष्ठ्ये त्यानं आत्मसात केली होती. दुसर्‍यांची दुखे पाहू न शकल्याने दिलदार विश्वनाथांनी मुक्त हस्ताने आपली संपत्ती वाटून टाकली होती. तर ज्ञानसंपदा दोन्ही हातांनी मुलाला देऊन टाकली होती. एकदा कुणाच्या तरी सांगण्यावरून नरेंद्रनी आपल्या भविष्यकाळाबद्दल वडिलांना विचारले , “ बाबा तुम्ही आमच्या साठी  काय ठेवले आहे?”  हा प्रश्न ऐकताच विश्वनाथबाबूंनी भिंतीवरच्या टांगलेल्या मोठ्या आरशाकडे बोट दाखवून म्हटलं, “ जा, त्या आरशात एकदा आपला चेहरा बघून घे, म्हणजे कळेल तुला, मी तुला काय दिले आहे”.  बुद्धीमान नरेंद्र काय समजायचं ते समजून गेला. मुलांना शिकविताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून विश्वनाथबाबू त्यांना कधीही झिडकारत नसत, की त्यांना कधी शिव्याशाप ही देत नसत.

आपल्या घरी येणार्‍या आणि तळ ठोकणार्‍या ऐदी आणि व्यसनी लोकांना वडील विनाकारण, फाजील आश्रय देतात म्हणून नरेंद्रला आवडत नसे. तो तक्रार करे. त्यावर नरेंद्रला जवळ घेऊन वडील म्हणत, “ आयुष्य किती दुखाचे आहे हे तुला नाही समजणार आत्ता, मोठा झाला की कळेल. हृदय पिळवटून टाकणार्‍या दु:खाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी, जीवनातला भकासपणा थोडा वेळ का होईना विसरण्यासाठी हे लोक नशा करत असतात. हे सारे तुला जेंव्हा कळेल, तेंव्हा तू पण माझ्यासारखाच त्यांच्यावर दया केल्याखेरीज राहणार नाहीस”. 

समोरच्याचा दु:खाचा विचार करणार्‍या वडिलांबद्दल गाढ श्रद्धा नरेंद्रच्या मनात निर्माण झाली होती. मित्रांमध्ये तो मोठ्या अभिमानाने वडिलांचे भूषण सांगत असे. त्यामुळे, उद्धटपणा नाही, अहंकार नाही, उच्च-नीच , गरीब-श्रीमंत असा भाव कधीच त्याच्या मनात नसायचा. वडीलधार्‍या माणसांचा अवमान करणे नरेंद्रला आवडत नसे. अशा प्रकारे नरेंद्रला घरात वळण लागलं होतं.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अध्यात्म व विज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ? 

☆ अध्यात्म व विज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पुरातन देवळात  दर्शन घेण्यास का जावे ? (गल्ली बोळातील नाही)

अध्यात्म आणि सायन्स

देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.

देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक (good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.

त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.

आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो……..

ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.

जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे……

ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.

अ. कापूर जाळणे — दृष्टी

ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे… स्पर्श

क. मुर्तीवर फुले वाहणे…फुलांच्या अरोमामुळे वास.

क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.

हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.

ड. घंटानाद व मंत्रोच्चरण….ऐकणे.

अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.

मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..

पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.

मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..?

मुळात हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो science वर आधारित आहे

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाषेचे वैविध्य ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ भाषेचे वैविध्य ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ‘ बेळगाव येथे मराठी भाषिक आणि कन्नड भाषिक यांच्यात वादावादी झाली’. हा प्रकार बेळगावात नवीन नाही. ‘ बेळगाव म्हणजे कानडी व मराठी वादाची पेटती भट्टी आहे ‘ असं पु. ल. नेहमी म्हणायचे. पण त्या बातमीमुळे भाषेविषयी काही लिहावे असे वाटले.

दर वीस मैलांवर भाषा बदलते असं म्हणतात. ही भाषा म्हणजे मूळ भाषा नसून ती बोलीभाषा असते. फरक बोलीभाषेत असतो.मूळ भाषा एकच असते. काही शब्द वेगळे असतात, काही ठिकाणी उच्चार, हेल यात फरक असतो. बेळगाव मधे मराठी भाषिक खूप आहेत.पण त्यांची मराठी आणि महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी यात खूपच अंतर आहे. बेळगावात बोलल्या जाणाऱ्या मराठीवर कन्नड भाषेचा खूप प्रभाव आहे.

मराठी भाषेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बोलली जाते ती भाषा, त्यातले हेल, उच्चार वेगवेगळे जाणवतात. पुण्यामधे साधारणपणे शुद्ध मराठी पहिल्यापासूनच बोलली जाते. सातारा, कोल्हापूर भागात वेगळेच टोन ऐकू येतात.सोलापूरची बोलीभाषा तर खूपच वेगळी आहे. त्यावर कन्नड आणि तेलुगू दोन्ही भाषांची छाप आहे.

शहरात आणि खेडेगावात तीच मराठी भाषा किती वेगळी वाटते. खेडेगावात तर असे काही शब्द वापरले जातात ते शहरातील लोकांना माहीतही नसतात. धुळे, नाशिक इथली बोली औरंगाबाद, किंवा एकूणच मराठवाड्यातील बोलीभाषा यात खूपच फरक आहे. खानदेशच्या भाषेवर तिथल्या स्थानिक अहिराणी भाषेचा जास्त प्रभाव आहे. ही अहिराणी भाषा गुजराती व मराठी यांचे मिश्रण आहे असे म्हणतात.विदर्भातल्या मराठी भाषेचा वेगळाच बाज आहे. मुंबईत हल्ली जी मराठी बोलतात तिच्यात निम्मे हिंदी , इंग्रजी शब्द घुसडलेले ऐकू येतात. शुद्ध पुणेरी मराठी असा लौकिक आजवर मिरवणाऱ्या पुण्यातल्या मराठी भाषेतही अलिकडे हिंदी इंग्रजी  प्रचुर शब्द येतात.

काळानुसार तर भाषेत फारच बदल होतात. प्रत्येक संतांच्या काळात जी जी बोली भाषा होती तीच त्यांच्या साहित्यातून प्रतीत झाली आहे.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात खूप जण स्थलांतरित होतात. त्यांची भाषा कालांतराने बरीच बदलते.तिथल्या भाषेचे संस्कार या भाषेवर होतात. त्यांच्या भाषेच्या टोनमधे आपली मूळ भाषा बोलली जाते. तिकडून पुन्हा ते जेव्हा मूळ स्थानी येतात तेव्हा हा वेगळेपणा जास्त जाणवतो.एखादे मराठी कुटुंब काही कारणाने बरीच वर्षे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इकडे राहिले तर ते परत महाराष्ट्रात येतात ते तिकडच्या भाषेचे मिश्रण घेऊनच!! ही स्वाभाविक होणारी प्रक्रिया आहे.

आम्ही काशी, गया, प्रयाग , अयोध्या यात्रेला गेलो होतो. काही मराठी पुरोहित वर्षानुवर्षे तिथे राहतात. ते मराठी बोलतात. पण ते अस्खलित मराठी वाटत नाही.तर त्यांच्या बोलण्यात हिंदीचा प्रभाव आहे. त्यात चूक काहीच नाही. एके ठिकाणचे गुरूजी आमच्याशी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात येत होते. ते पिढ्यानपिढ्या तिकडे राहतात. त्यातही ते मराठी भाषा विसरलेले नाहीत ही खूप मोठी जमेची बाजू आहे. हे त्यांचेच श्रेय आहे.

परवा एका टीव्ही चॅनल विषयी काही वाचनात आले.ते आहे तामिळनाडूचे! नाव आहे ” दक्षिणी मराठी” . त्या चॅनल वर ते माहिती देतात की, १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी अळगिरी नायक या राजाकडून तंजावर जिंकून घेतले.  साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी राजांनी  अनेक मराठी सरदार, त्यांची घराणी तंजावर येथे नेली.  हे लोक तिथेच स्थायिक झाले. ते मराठीच बोलत असत. पण काही काळानंतर त्या मराठीवर तिथल्या स्थानिक भाषेचा, संस्कृत भाषेचा शिवाय दक्षिण भारतातील  मल्याळम, तेलगू, कन्नड, तमिळ या सर्व भाषांचा प्रभाव पडत गेला. ती तंजावर मराठी  या नावाने प्रसिद्ध झाली.  तीच त्यांची बोली भाषा बनली.

हे लोक अजूनही गुढीपाडवा, संक्रांतीला तिळगूळ घ्या गोड बोला,  अंबाबाईचा गोंधळ हे सण मराठी पद्धतीने साजरे करतात म्हणे! ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणाने आता बरेच लोक महाराष्ट्र, गुजरात, उत्तरेकडची राज्ये ,दिल्ली दक्षिणेत इतरत्र, एवढेंच काय पण परदेशातही स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तामिळनाडू येथे या लोकांची संख्या कमी झाली आहे. पण ते तंजावर मराठीच बोलतात. ही मराठीची वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे.. या दक्षिणी मराठी चॅनेल च्या माध्यमातून त्यांचा आपल्या मूळ मातीशी संबंध टिकविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अनेक मराठी लोक आमचे चॅनल पाहतात. तुम्ही आम्ही एकच आहोत हे सांगायलाही ते विसरत नाहीत.

भारतात, किंबहुना जगातही अशा काही मराठीपासून उत्पन्न झालेल्या भाषा असतीलच. त्यांच्या विषयी समजले तर अजूनच आपल्या ज्ञानात भर पडेल.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विशेषणे…. ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ विशेषणे…. ☆ प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

केवढी विशेषणे … कमाल आहे. आणि प्रत्येक गोष्ट पटते.   

 

फुले माळावी मोगर्‍याची

फुले वेचावी पारिजातकाची

फुले जपावी बकुळीची

फुले दरवळावी चाफ्याची

फुले खुलावी गुलाबाची

फुले वाहावी अनंताची

फुले बहरावी बहाव्याची

फुले घमघमावी रातराणीची

फुले फुलावी कमळाची

फुले रंगावी जास्वंदाची

फुले झुलावी मधुमालतीची

फुले भरावी केळ्याची

फुले मोहरावी आंब्याची

फुले ओघळावी बुट्ट्याची

फुले दिखावी बोगनवेलीची

फुले स्मरावी बाभळीची

फुले लाघवी अबोलीची

फुले निर्गवी गोकर्णीची

फुले उधळावी झेंडुची

फुले तोलावी केशराची

फुले उमलावी ब्रम्हकमळाची

फुले निरखावी कृष्णकमळाची !

 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वृषोक्ती …. वि.दा.सावरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ वृषोक्ती …. वि.दा.सावरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर

सावरकरांची कविता…रसग्रहण

☆ वृषोक्ती ☆

गाडीला वृष जुंपिला धरित जो जू मानेवरी

आला ऊंच चढून घाट दमला गेला आवांका तरी

होता वाहून नेत वाहत तरी तो?! मंदचारी तया

कोणी हिंदु वदे सगर्व ह्रदये धिक्कारवाणीस या।।१।।

 

हा धिक् रे वृष,मान वाकवूनिया तू दाससा राबशी

मोठे जूं जड हे असह्य भार हा विश्रांतिही ना तशी

तोंडी ये बहु फेस त्राण नुरला मारी धनी हा तरी

वाटे पापचि मूर्तिमंत वृष रे त्वजन्म हा अंतरी ।।२।।

 

ऐके तू वृष शांतिने सकल हे उद्गार  त्याचे असे

दावोनि स्मित मंद ज्यांत बहुधा धिक्कार भारी वसे.

बोले हिंदुसी त्या,अरे मज बहु निंदावचे ताडिले

दावि त्वस्थिति अल्पही न तुजला हे म्यां मनी ताडिले।।३।।

 

निंदाव्यंजक शब्द योजूनी बहु माझ्या धन्या निंदसी

कैसा वागवितो तुला तव धनी शोधूनी पाहे मनी।।४।।

 

ज्याते राज्य अफाट आर्यवसुधा तैसी जया अर्पिली

दोहायास सुवर्णभू सतत त्वां हस्ते ज्याला दिली

लोखंडी असताही कांचनमया केलीस यद् भू अरे

तो देई तुज काय वेतन तुझा स्वामी कधी सत्वरे।।५।।

 

किंवा तू म्हणशील की तव धनी आभार भारी वदे

राजे रावबहाद्दुरादिक तुला मोठ्या किताबांसी दे

ऐसे शुष्क किताब घेउनी तुवा स्वातंत्र्य संपत दिली।।६।।

 

दारिद्र्यासह पारतंत्र्य दुबळ्या मानेवरी लादती

तेव्हां येउनि मानवी तनुस बां तू साधिले काय ते

भूभारापरी गर्वभार अजुनु त्वचित्त का वाहते।।७।।

 

सोडी गर्व स्वदेशभार हरण्या यत्नांसी आधी करी

होई इशपदी सुलीन पुरवी सद्हेतुला श्रीहरी।।८।।…..

 

☆ रसग्रहण ☆

वृषोक्ती  ही  कविता सावरकरांनी १९०१ साली लिहीलेली आहे. एकदा जव्हार घाटातून बैलगाडीने प्रवास करत असताना त्यांना ती सुचली. या कवितेतली त्यांची कल्पकता आणि विचार दोन्हीही थक्क करणारे आहेत.

१९०१ सालचा काव्यकाळ हा वृत्तबद्ध ,

छंद काव्याचा होता.अलंकारिक भाषेचा होता.आजची मराठी आणि तेव्हांची मराठी यात खूप अंतर होते. त्यावेळची भाषा संस्कृतप्रचुर,नटलेली अवघड होती.पण अर्थातच रसाळ होती.वृषोक्ती या सावरकरांच्या कवितेचं रसग्रहण करताना मला ते जाणवलं.शिवाय ,ने मजसी ने …किंवा जयोस्तुते ..या काव्यरचनांची संगीतबद्ध गाणी झाली म्हणून ती आपल्यापर्यंत पोहचली पण सावरकरांच्या अशा अनेक कविता आहेत की त्यातून सावरकर एक संवेदनशील ,डोळस,कणखर व्यक्तीमत्व आपल्याला दिसतं..

वृष म्हणजे बैल आणि वृषोक्ती म्हणजे बैलाने ऊद्गारलेले…ही काव्यरचना शार्दुलविक्रीडित या वृत्तात बद्ध आहे.या वृत्तात चार चरण, १९वर्ण आणि प्रत्येक बारा वर्णानंतर यती असतो.या दृष्टीनेही ही कविता व्याकरण शुद्ध आहे.लयीत आहे म्हणून अर्थ उलगडता येतो.

या कवितेत एक काल्पनिक संवाद आहे.

बैलाचा आणि एका गर्विष्ठ माणसाचा..

तो पारतंत्र्याचा काळ होता.आणि स्वातंत्र्याचे वारे हळुहळु वाहत होते.

गाडीला जुंपलेल्या, हळुहळु घाट चढून पार दमलेल्या बैलाकडे पाहून एक स्वत:त रमलेला भारतीय माणूस त्याची  निर्भस्तना करतो.मानेवर  जू ठेवून धन्याची सेवा करणारा बैल म्हणून त्याचा धिक्कार करतो.

त्याचवेळी हा बैल मनोमन हसतो आणि त्याला एक चपखल, प्रखर उत्तर देतो.

“अरे! तू माझी आणि माझ्या धन्याची काय निंदा करतोस..तू कधी तुझा  विचार केला आहेस…आज तुझी काय स्थिती आहे हे कळलंय् का तुला..आर्यांची  तुझ्या कष्टाने उभारलेली ही  सुवर्णभूमी तू परकीयांच्या हवाली केलीस.स्वत:च्याच भूमीत तू त्यांची चाकरी करतोस. त्याचं वेतन तरी तुला कधी मिळतं का वेळेवर ? त्यांनी दिलेले राजे रावबहादुर या किताबातच तू खूष आहेस…त्यांच्या भाषेतला आभार हा बेगडी शब्द तुला भुलवतो…अरे त्या बदल्यात तुझं लाखमोलाचं स्वातंत्र्य हरण केलय् त्यांनी.. याची जाणीव आहे कां तुला..

त्यापेक्षा मी बैल बरा ..धन्याच्यात आणि माझ्यात परस्पर सांमजस्य आहे..प्रेम आहे.

तू माणसाच्या जन्माला येऊन काय मिळवलंस…? परकीयांची गुलामगिरी..

धिक्कार असो तुझा…माणूसपणाचा मला जो गर्व दाखवतोस ,तो सोड..स्वभूमीला पारतंत्र्यातून सोडव…

प्रयत्नांची पराकाष्ठा कर…या उदात्त कार्यात परमेश्वरही तुला मदत करेल…..

हा या कवितेचा सारांश! एक सुंदर रुपकात्मक संदेश देणारा…ही कविता वाचताना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सावरकर किती झपाटलेले होते हे जाणवतं.

लोकांमधे जागृती निर्माण करण्याची त्यांची तळमळ दिसून येते.अरे परकीयांचं जोखड घेऊन जगण्यार्‍या तुझ्यापेक्षा तो बैल बरा…

अशा शब्दात ते त्याची कानउघाडणी करतात…

सावरकरांचा कणखरपणा ,विद्रोह  शब्दाशब्दात जाणवतो.ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी वीर सावरकरांनी काव्य हे माध्यम प्रभावीपणे वापरलं.त्याचा थेट परिणाम लोकांच्या मनावर नक्कीच झाला.

या काव्यात उद्विग्नतेबरोबर उपहासही जाणवतो…

शिवाय ही कविता, आता काळ ओलांडून गेली असेही वाटत नाही.ती कालातीत आहे.

जेव्हांजेव्हां माणसाच्या मनावर वैचारिक गंज चढतो तेव्हा माणूस परिस्थितीचा गुलामच बनतो.आज देश स्वतंत्र असला तरीही एक बौद्धीक पांगळेपण समाजात जाणवतं. अशावेळी सावरकरांची ही वृषोक्ती नक्कीच परिणामकारक आहे..

२६फेब्रुवारी हा सावरकर   यांचा स्मृतीदिन!! त्या निमीत्ताने त्यांच्या कवितेतलं हे विचार मंथन…

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदाचे डोही आनंद तरंग… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ आनंदाचे डोही आनंद तरंग… ☆ सौ ज्योती विलास जोशी

आनंदाचे डोही आनंद तरंग…..

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो

क्या गम है जिस को छुपा रहे हो

ही गझल ऐकता ऐकता विचारांचा भुंगा मनाभोवती पिंगा घालू लागला. दुःखाचा विसर होण्यासाठी हास्याचा धबधबा हवा. इतकं साधं आणि सोपं  दुःखावर सोल्युशन आहे

असाच अर्थ लावला माझ्या मनानं …. हा धबधबा अर्थातच नैसर्गिक हवा ना?…. त्याचा उगम कसा? त्याची व्याप्ती किती? तो किती वेगाने आणि किती उंचावरून पडणारा आणि किती मोहक असावा? या सर्व प्रश्नांचं उत्तरं एका वाक्यातंच….तो आनंदाचा स्त्रोत असावा.

होय! हास्यातून आनंद आणि आनंदातून हास्य निर्माण होतं, जे नैसर्गिक आनंद देतं.आनंदाची बेरीज म्हणजे दुःखाची वजाबाकी.आनंदाला दुःखाची झालर आणि दुःखाला आनंदाची किनार असतेच म्हणून तर आनंदा मागून दुःख आले तरी ते पचवायची क्षमता येते आणि त्यानंतर येणाऱ्या आनंदाची ग्वाही आपल्याला मिळते.

जीवनाच्या आनंदयात्रेवर दुःखाचे स्पीड ब्रेकर असणारच!आपल्या प्रत्येकाला निसर्गदत्त अशा परीसाच वरदान आहे.त्या परीसास सुखाचे आनंदाचे क्षण चिकटत असतात. परिसस्पर्श होताच या क्षणांचं सोनं होत असतं आपला हेतू साध्य होत असतो परंतु याकडे आपलं लक्ष नसतं. आपण नुसतं धावत असतो. ते सुवर्णक्षण वेचायचा आनंद आपण उपभोगत नाही. प्रत्येक क्षणात ओतप्रोत भरलेला असतो आनंद… परंतु आपल्याला तो कणाकणानं क्षणाक्षणानं वेचायची सवय नाही आपल्याला तो तात्काळ भरभरून हवा…. या आपल्या अट्टाहासापायी आपण आनंदाला मुकतो.

लहानपणी  ‘आई माझं पत्र हरवलं’ह्या खेळात ‘ते मला सापडलं’ असं म्हणून पत्र लगेच सापडायचं….. कारण ते कुठंच हरवलेलंच नसायचं… तसंच सुखही आपल्या अवतीभवतीच आहे. फक्त शोधण्याची कला हवी.नाही का? लपाछपीचा खेळ ही तसाच! एका ठराविक कक्षेत सगळेच गडी असायचे. ते कुठेच हरवलेले नसायचे. शोधले की सापडायचे आणि मग कोण आनंद मिळायचा. आनंदाचं ही तसंच आहे. तो इतस्ततः विखुरला आहे.तो गोळा करायची ताकद हवी, संयम हवा एवढंच!

आपलं घर हेच आपलं आनंद निधान आहे, हेच आपण विसरतो आहोत.आपलं काम सुकर व्हावं म्हणून आपण यंत्र विकत घेतली आहेत .थोडक्यात आनंद विकत घ्यायचा प्रयत्न केला आहे. या यंत्रांच्या हप्त्यासाठी पैसे गोळा करण्याचा छंद आपल्याला लागलेला आहे आणि ती तडफड आपले सुखाचे क्षण हिरावून घेतेय.

चिमण्यांचा किलबिलाट हा सत्य आणि शाश्वत आनंद आहे पण आपण त्याकडे कानाडोळा करतो आहोत. ट्विटरवरील नैसर्गिक असं चिमणीचं आपल्याला आनंद देते आणि आपण नैसर्गिक आनंदाला मुकतो आहोत आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे हे ठाऊक असूनही इकडे तिकडे चोहिकडे बघण्यास आपणाला वेळ नाही.

आनंद कुठे कुठे आहे तो कुठे शोधायचा हे एकदा सापडले की  मग…..आनंदाचे डोही आनंद तरंग…….आनंदलहान मुलाच्या निरागसतेत आहे. आनंद आपल्या मनात आहे .अंतरंगात आहे. आपल्या अस्तित्वात आहे.आपल्या श्वासात आहे. आनंद निसर्गात आहे. धुंद हवेत, गुलाबी थंडीत ,रिमझिम श्रावणात, चांदण्या रात्रीत, हिरव्या रंगात ,इंद्रधनुष्यात ,संगीताच्या सात सुरात,लताच्या आवाजात, छंदाच्या वेडात वाचनाच्या धुंदीत……

परमेश्वराला देखील सच्चिदानंद म्हटलं आहे. समर्थ रामदासांनी ‘आनंदवनभुवन’ असं परमेश्वराला संबोधलं आहे. अहो माणसाचा जन्मच आनंदातून झाला आहे हे आपण कसे विसरतो? ‘अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक’ ही अमृतवाणी आहे. ‘तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे’ म्हणून आनंदाचा साठा वाटत संत फिरतायेत. तो भरभरून घ्यावा असे आपल्याला का बरे वाटत नाही?

जीवन हे आनंदाचं  वरदान आहे. तो एक आनंदोत्सव आहे,हे विसरता कामा नये.आनंद भरून घ्यायचा असेल तर मनाची कवाडं उघडी हवीत .एकदा का तो रोमारोमात संचारला की मग अगदी हलकंफुलकं पिसासारखं वाटायला लागेल. आणि मग आनंद पोटात माझ्या माईना म्हणून उंच उडावसंही वाटेल. ….

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -7 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:)

गुरूंकडून संकेत मिळताच, वेणास्वामी कीर्तनासाठी उभ्या राहिल्या .समर्थांनी स्त्रियांपैकी, फक्त वेणास्वामींनाच, उभे राहून कीर्तन करण्याची आज्ञा दिली होती.  वेणास्वामींनी आपल्या गुरुंना ,रामपंचायतन यांना वंदन केले .आणि आता झांजा वाजवायला सुरुवात केली. कीर्तनाचा पुर्वरंग सुरू झाला. श्रीराम जय राम जय जय राम. सियावर रामचंद्र की जय. मैंने राम रतन धन पायो।। वस्तू  अमोलिक  दी मेरे सतगुरू, करि करपा अपनायौ।। जनम जनमकी पूंजी पायी जगमे सबै  खोवाऔ ।।

सद्गुरूंनी मला अमूल्य वस्तू दिली आहे. राम नाम रुपी रत्न हा जन्मजन्मांतरीचा ठेवा आहे. कीर्तन चालू असताना, समोर रामचंद्र आणि सद्गुरु दोघेही आहेत. सद्गुरूनी रामाची ओळख करून दिली ,त्यामुळे त्यांनी प्रथम गुरुदेवांना वंदन केले. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु ।।गुरूचा महिमा असा की त्याच्यासारखा सख्खा सोयरा कोणी नाही. त्यांच्याच कृपेने, रामनामाची अपार संपत्ती मला मिळाली  आहे. ती अखंड अक्षय कुंभा सारखी आहे. पुढे कीर्तनात वेणास्वामींनी एक गोष्ट सांगितली. एक साधू बाबा होते .दुःखी लोक त्याच्याकडे येत. तेव्हा ते कागदावर राम नाम लिहून देत. व तो कागद पाण्यात घोळवून, आजाऱ्याला द्यायला सांगत. एकदा साधू नसताना त्यांच्या शिष्याने त्याप्रमाणे उपाय केला. साधू परत आले .त्यांना ही गोष्ट कळली .आणि राग आला. त्या साधूने  शिष्याला सांगितले की, कोपऱ्यातला रंगीत दगड घे.इ आणि बाजारात जाऊन किंमत कर. एका बाईने, दोन मेथीच्या जुड्या ,बनिया ने एक रुपया, सोनाराने एक हजार रुपये, एका जवाहिऱ्याने एक लाख रुपये, दुसऱ्याने पाच कोटी, आणि राजाचा रत्नपारख्याने सारे राज्य अशी किंमत केली. अखेर त्या दगडाने लोखंडाचे सोने व्हायला लागले. साधूने सांगितले, तो पारसमणि आहे .त्याची किंमत कशी करता येणार!  तसेच रामाचे नाम हे भव रोगाला नष्ट करणारे आहे .राम नाम मणि दीप धरू,जीह देहरी द्वार । तुलसी भीतर–बाहरी जो चाहसी उजियार ।।रामनामाचा दीप जिभेवर ठेवला तर आत बाहेर सर्वत्र प्रकाश पसरेल, असे तुळशीदास म्हणतात .कीर्तनाचा पूर्वार्ध संपला. समर्थांनी स्वतः वेणास्वामींना बुक्का लावला. आणि हार घातला .श्रीराम जय राम जय जय राम.

त्यांनी स्वतः विपुल काव्य रचना केलेली आहे. त्यांनी  चार पाच पदे हिंदीतही केलेली आहेत. उत्तर भारतात ,आपल्या यात्रेत, हिंदुस्थानी भाषेत कीर्तन करून, अगणित लोकांना राम भक्ती मध्ये दीक्षित केले होते .त्यांनी मराठीमध्ये सीतास्वयंवर सारखे खंडकाव्य लिहिले आहे. भारतीय भक्ती साहित्यामध्ये खंड काव्याची रचना करणाऱ्या त्या प्रथम स्त्री साहित्यिक  होत. इतकच काय तर त्यांनी मंगल, संकेत ,लवकुश, सुंदर, शब्द व भाषा नावाची सात रामायणे लिहिलेली आहेत. त्यांनी गुहाख्यान  व कौल अशी आख्या नात्मक काव्येही लिहिली आहेत. कौल ही  राम कथेमधील नवीन कल्पना आहे. त्यामध्ये  त्यांची अनन्य भक्ती ,अध्यात्मिक उंची, तत्वज्ञानातील हुषारी, आणि सुरू दयता दिसून येते. यांच्या कीर्तनाचा उत्तररंग सुरू झाला. उत्तर रंगात सीतास्वयंवराचे वर्णन केले आहे. विश्वामित्रांचा यज्ञ यशस्वी होण्यासाठी, राम लक्ष्मण यांना  ते घेऊन जातात, येथून सुरुवात केली आहे. वाटेत त्राटिका  वध, अहिल्येचा उद्धार, मिथिले चे वर्णन ,आणि जनकाच्या दरबारातील शिवधनुष्य उचलण्याचा रामाचा पराक्रम या सर्व गोष्टी वेणा स्वामींनी ओघवती काव्यात लिहिल्या आहेत. ते वर्णन वाचताना डोळ्यासमोर सर्व गोष्टी उभ्या राहतात. स्वयंवराचे वर्णन तर अप्रतिम केले आहे. मंगल वाद्ये, वधू-वरांचे हळदी लावून स्नान ,नाना प्रकारची पक्वान्ने, फळांचे रस, वेगवेगळ्या वस्त्रालंकारांनी नटून आलेली सभा मंडळी, देवी, देवता ,वराती सह श्रीराम रथावर होते  हे सांगताना त्या म्हणतात, ते कनक मणीची मिथिलापुरी। शृंगारिलिसे  बहुपरी । राम पहाया नरनारी । मंदिर मस्तकी  दुभागी ।।  (सी. स्व  ९..६६ ). शुभ प्रसंगी विवाह झाला. अगदी प्रत्येक घटनेचे वर्णन वेणास्वामिनी अत्यंत सुंदर शब्दात  केले आहे .तीन दिवसांच्या पाहुणचारा नंतर एकमेकांना मोठमोठे आहेर दिले गेले .जनक पत्नी सुमेधा हिने विरहाने अश्रू पुसत, सीतेला उपदेश केला. सर्वांचे रथ आयोध्ये ला आले. आयोध्या नगरीचे वर्णनही  खूप छान केले आहे. वेणास्वामी संपूर्ण वर्णन करण्यात रममाण झाल्या. त्या अखेर म्हणाल्या, या रामकथेचा कर्ता रामच आहे, हे  गुह्य मी स्वतःच जाणते.” हे बोलणे येथार्थ । कर्ता राम याचा  समर्थ । कोणा सांगो हा गुह्मार्थ । माझा मीच जाणे। (  सी. स्व. १४..१४९ ) . हे राघवाची कथा । कर्ता मी नव्हे सर्वथा । सत्य आवडले समर्था । ग्रंथ प्रसिद्धी पावला ।। (सी. स्व.१४..१५० ).

वेडा स्वामींनी गर्जना केली, “जय जय रघुवीर समर्थ “आणि “श्रीराम जय राम जय जय राम” असा जप करत त्या तल्लीन होऊन नाचू लागल्या. डोळे मिटले. पखवाली च्या तालावर त्यांची गती वाढू लागली. राम नाम घुमू लागले. स्वतःला त्या विसरून गेल्या. थकून खाली कोसळल्या. त्या जागी समर्थांचे चरण होते. आपले प्राण गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले. मावळत्या सूर्याच्या साक्षीने, आत्मा परमात्म्यात मिळून गेला. सीतास्वयंवराच्या अख्ख्यानाच्या कीर्तनाचा पूर्णविराम झाला. ( चैत्र वद्य  १४ शालिवाहन शके  १६०० इसवी सन   १६७८ )श्री समर्थांनी वेणास्वामींच्या देहास अग्नी दिला.

संत वेणास्वामी लेखमाला

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समर्थ रामदासांचे कार्य…. ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

डाॅ.व्यंकटेश जंबगी

 

?  विविधा ?

☆ समर्थ रामदासांचे कार्य…. ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

“समर्थाचिया सेवका वक्र पाहे

असा सर्व भूमंडळी कोण आहे

जयाची लीला वर्णिति लोक तिन्ही

नुपेक्षी कदा रामदासाभिमानि”

समर्थांच्या कार्याची ओळख करून देण्यास पुरेसा आहे.वास्तविक “समर्थ”हे विशेषण रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामांना दिले आहे.परंतु स्वामींचे कार्य पाहून लोकांनीच त्यांना समर्थ ही उपाधि दिली.

शक्ती आणि भक्ती दोन्ही समर्थांच्या ठिकाणी होते. छत्रपति शिवाजी महाराज हे स्वामींचे समकालीन होते.त्या काळात रयतेवर,महिलांवर अन्याय होत होता.हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे राजे आणि स्वामी दोघांचे कार्य समकक्ष होते.दिशा समांतर होत्या.राजे युद्ध, स्वारी,तह, राजकारण यात व्यस्त असत,पण त्यांनी ठिकठिकाणी योद्धे सिद्ध केले होते.समर्थांनी श्रीरामावर श्रद्धा ठेवून युवकांना बलोपासना शिकविली.अनेक मारूती मंदिरांची स्थापना शक्तिची देवता म्हणून स्थापन केली.समर्थ अनेक पातळ्यांवर एकाच वेळी यशस्वी होत होते.त्यांनी महाराष्ट्रभर रामदासी सिद्ध केले होते. समर्थ निर्भय, निर्भीड,स्पष्ट होते.ब्रम्हांडापलिकडे रामकथा गेली पाहिजे असे ते म्हणत.. ते सांस्कृतिक अधिकारी होते.. लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन करण्याची त्यांची क्षमता होती… छत्रपती शिवाजी महाराज यांचेशी समर्थांची राजकारणाबरोबर तत्वज्ञानावरही होत असे.दोघांचे मार्ग वेगळे पण लक्ष्य एकच…..

हिंदवी स्वराज्य स्थापन करणे !

दोघांनी एकमेकांच्या क्षमतेची जाण होती…आदर होता… विश्वास होता…”.रामदास स्वामी नावाचा कोणी साधू महाराष्ट्रात आहे,त्यांचा दरारा राज्यात आहे”असे पोर्तुगीज लेखक कास्पोर्दि गार्डा याने लिहिले आहे.

“संत” या कक्षात समर्थ बसणारे नव्हते.संत म्हणजे सहिष्णु,नम्र, क्षमाशील, सोशिक…..पण समर्थ तसे नव्हते ते जिथे आवश्यक तिथे शांत,पण तेवढेच आक्रमक होते:-

“सुभटासि व्हावे सुभट

ठकासि व्हावे महाठक”

असे त्यांनी सांगितले. छत्रपति शिवाजी महाराजांच्या मध्ये आणि समर्थांमध्ये हे विलक्षण साम्य होते ईश्वरभक्तांनी उगीच मिळमिळीत राहू नये,नेटका प्रपंच करावा,संपन्न जीवन जगून ही भक्ती करता येते.असे त्यांचे मत होते.भक्तांनी लाचारी, गयावया का करावी ?, प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वास कसा असावा? सज्जन भक्तांचे रक्षण आणि शत्रूंचा बीमोड त्यांनी करून दाखविला: –

“सामर्थ्य आहे चळवळीचे,

जो जो करील तयाचे

परंतु तेथे भगवंताचे

अधिष्ठान पाहिजे”

हा महान संदेश महाराष्ट्र संकटात असताना त्यांनी दिला.

समर्थांचा शिष्यगण आणि भक्तगण प्रचंड होता.मठ ऐश्वर्यवान होते..त्या ऐश्वर्याचा विनियोग त्यांनी स्वराज्यासाठी केला.ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो म्हणतो,”समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तत्वज्ञानी आणि राज्यकर्ता असा पूरक संयोग होता.

स्वामी एकांतप्रिय आणि अनेकांतप्रियही होते.म्हणून दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके हे लोकप्रिय झाले.शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती शंभूराजेंना

लिहीलेल्या पत्रात समर्थ प्रारंभी लिहितात :-

“शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप

भू मंडळी…”

अशा अनेक उपदेशाने छत्रपती संभाजी महाराज यांना समर्थांनी धीर तर दिलाच,पण कर्तव्याची जाणीव करून दिली.

यापेक्षा मोठे कार्य काय असेल ?

लिहीण्यासारखे अनंत आहे पण लेखनसीमेचा आदर करून इथेच थांबतो.

! !जय जय रघुवीर समर्थ!!

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! सोनेरी उपाय ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

 ? सोनेरी उपाय ! ?

“गुड मॉर्निंग पंत ! आज मॉर्निंग वॉक लवकर झाला का तुमचा ?”

“लवकर वगैरे काही नाही, माझ्या सगळ्या गोष्टींच वेळापत्रक ठरलेलं असतं आणि मी माझ्या रोजच्याच वेळेला घरी आलो आहे आणि माझा चहा सुद्धा झाला आहे, त्यामुळे तुला चहा…. “

“असं काय पंत रोज तुमच्यकडेच चहा घेवून माझी सकाळ…. “

“सुरु व्हायची, आता ते विसर.”

“असं करू नका पंत, अहो ही अजून उठली नाही, ती उठणार कधी, चहा करणार कधी ?”

“मोऱ्या, ते सगळं खरं असलं तरी आजपासून तुझा चहाचा रतीब बंद म्हणजे बंद !”

“पंत, एव्हढे नका निष्ठुर होऊ, एक कप चहाचा तर प्रश्न आहे !”

“प्रश्न नुसत्या एक कप चहाचा नाही मोऱ्या, गॅसचा पण आहे आणि कालपासूनच गॅस आणखी महाग झाला आहे, माहित आहे ना? “

“हो पंत, मी पण वाचलं काल पेपरात. पण सरकार तरी काय करणार ना?”

“काय करणार म्हणजे, निवडणुका जवळ आल्यावर सगळी कशी स्वस्ताई होते ? मग आत्ताच काय…. “

“पंत निवडणूक आणि गॅसचे दर यांचा काहीच संबंध नाही ! जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर कमी जास्त ….. “

“होण्यावर ते दर अवलंबून असतात हे ठाऊक आहे मला, तू नको अक्कल शिकवू ! तुझ्या पेक्षा जास्त पावसाळे पहिले आहेत मी, हे विसरू नकोस !”

“हो ना, मग तुम्हीच सांगा त्यावरचा एखादा उपाय आता !”

“अरे माझ्याकडे यावर, निदान आपल्या दोन चाळींसाठी तरी पर्मनंट उपाय आहे, आता बोल !”

“मी काय बोलणार पंत ? तुम्ही उपाय सांगितलात, तर चाळीच्या भाडेकरू संघाचा अध्यक्ष या नात्याने तो लोकांना सांगून, लोकांना तो पटला तर त्याची अंमलबजावणी करीन एव्हढे मात्र नक्की !”

“हो ना, मग ऐक ! आपल्या दोन चाळी मिळून एकूण  किती बिऱ्हाडे आहेत ?”

“काय पंत, तुम्ही सर्वात जुने भाडेकरू, तुमच्या ओळखीनेच तर आम्हाला इथे खोली मिळाली, अशी आठवण बाबा सांगायचे ते आठवतंय मला.”

“ते सगळे सोड, बिऱ्हाड  किती ते सांग.”

“असं बघा, तळ मजला आणि चार मजले धरून साधारण एका चाळीत पंच्याहत्तर प्रमाणे दोन चाळीत दीडशे !”

“बरोब्बर आणि एका कुटुंबात साधारण नातेवाईक धरून, राहणाऱ्यांची संख्या सरासरी आठ धरली तर दोन चाळीत मिळून बाराशे लोक राहतात, पै पाहुणा सोडून, बरोबर ?”

“बरोबर, पण त्याचा गॅसशी….”

“सांगतो सांगतो, जरा धीर धरशील का नाही ?”

“पंत तुम्ही असा सस्पेन्स क्रिएट करताय की, तो उपाय मला कळला नाही तर मलाच गॅसवर ठेवायची वेळ येईल आता !”

“हां, तर आपल्या दोन चाळीतल्या बाराशे लोकांचं जे रोज सोनखत तयार होत, ते वापरून दोन चाळींच्या मधे एक बायोगॅसचा प्लँट उभा करायचा आणि पाईपने सगळ्यांना गॅस पुरवायचा, कशी आहे आयडिया माझी ?”

“फँटॅस्टिक आयडिया पंत, खरच मानलं तुम्हाला !”

“मानलं ना, मग आता लगेच भाडेकरू संघाची मिटिंग बोलाव आणि हा प्रस्ताव मांड बर त्यांच्या पुढे.”

“हो लगेच लागतो त्या कामाला, पण पंत यात मला एक प्रॉब्लेम दिसतोय !”

“कसला प्रॉब्लेम ते आत्ताच वेळेवर सांग, म्हणजे लगेच त्यावर उपाय पण सांगतो !”

“असं बघा  पंत, बायोगँस प्लॅन्ट उभा करायचा तर सुरवातीला भरपूर खर्च येणार आणि आपले भाडेकरू तर सहा सहा महिने घराचे भाडे भरत नाहीत तर या प्लँट साठी कुठून पैसा…. “

“देणार, असच ना ?  मग ऐक, त्यावर सुद्धा माझ्याकडे जालीम उपाय आहे मोऱ्या !”

“सांगा, सांगा पंत, म्हणजे मिटिंग मधे हा मुद्दा कोणी काढला, तर मी तसे उत्तर द्यायला मोकळा !”

“अरे पैशाची चिंता अजिबात करू नकोस तू मोऱ्या, आपल्या नॅशनलाईज बँका बसल्या आहेत ना कर्ज द्यायला !”

“पंत अहो त्या बँका भले कर्ज देतील, पण ते फेडणार कोण? आपले लोक सहा सहा महिने घरभाडे…… “

“देत नाहीत हे मला तू मगाशीच सांगितलंस आणि तेच तर त्यांचे क्वालिफिकेशन आहे !”

“असं कोड्यात नका बोलू पंत, नीट काय ते उलगडून सांगा बघू.”

“अरे असं बघ, बँकांची घेतलेली कर्ज ही परतफेडीसाठी नसतातच मुळी, ती बुडवण्यासाठीच घेतलेली असतात असाचं लोकांचा धृढ विश्वास आहे आणि लोक त्या प्रमाणे वागून तो अगदी सार्थ ठरवतात !”

“तुम्ही म्हणता ते कळतंय मला, पण उद्या बँक जर कोर्टात गेली तर… “

“तर काय ? आपण हात वर करायचे आणि आम्ही कंगाल आहोत हे कोर्टात जोरात ओरडून सांगायच, म्हणजे आपले पण कर्ज माफ होईल !”

“कसं शक्य आहे हे पंत, तुमच आपल काही तरीच असतं !”

“का, का शक्य नाही ? अरे अनिल अंबानी सारखा करोडपती उद्योगपती आपण कंगाल आहोत, हे भारतातल्या नाही, तर परदेशातल्या कोर्टात ओरडून ओरडून सांगतो, तर आपल्या सारख्या मध्यमवर्गीयांनी तसे भारतातल्याच एखाद्या कोर्टात ओरडून सांगायला कसली आल्ये लाज ?”

“तुम्ही म्हणता ते खोटं नाही, पण मध्यमवर्ग मुळातच कर्ज काढायला घाबरतो आणि त्यात ते बुडवणे म्हणजे… “

“तू म्हणतोयस ते खरच आहे ! मग कसं करायचे ते तूच सांग आता.”

“पंत, माझ्या पण डोक्यात एक भन्नाट आयडिया आली आहे !”

“बघ माझ्या संगतीचा परिणाम ! बर सांग तर खरी तुझी आयडिया मोऱ्या.”

“सांगतो ना ! आपण काय करू या, आपल्या प्लॅन्ट मधे जो जास्तीचा गॅस तयार होईल तो आपण आपल्या शेजारच्या चाळकऱ्यांना विकून, त्यातून मिळणाऱ्या पैशातून, आपण बँकेचे कर्ज फेडू !”

“मस्त, ही खरी मध्यमवर्गीय मानसिकता !  एक रुपया सुद्धा कर्ज नको डोक्यावर त्याला ! मग कशी गोळया न घेता रोज शांत झोप लागते ! हे स्वर्गसुख त्या उद्योगपतींच्या नशिबात नाही, हेच खरे ! काय बरोबर ना मोऱ्या ?”

“अगदी बरोब्बर पंत !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असा बॉस होणे नाही…. श्री प्रभाकर जमखंडीकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

असा बॉस होणे नाही…. श्री प्रभाकर जमखंडीकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इस्रोमध्ये कार्यरत असतानाची एक गोष्ट सांगितली जाते. इंडिजिनस गायडेड मिसाईल प्रोजेक्टवर तेव्हा जोरात काम चालू होतं. शास्त्रज्ञांची एक मोठी टीम या प्रोजेक्टवर काम करत होती. एके दिवशी त्या प्रोजेक्ट मध्ये काम करणारे एक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की, “सर मला आज संध्याकाळी थोडं लवकर घरी जायचं आहे, चालेल का?”

कलाम सर हसत म्हणाले, “शुअर, एनी प्रॉब्लेम?”

“नाही सर, म्हणजे काय आहे की गावात सर्कस येऊन महिना झाला. मुलं रोज सर्कस पहायला जाऊ या म्हणतात. पण मला ऑफिसमधून घरी जायलाच उशीर होतोय, त्यामुळे ते जमलंच नाही. आता, उद्या सर्कस दुसऱ्या गावी जाणार आहे. आणि, पुन्हा वर्षभर तरी गावात सर्कस येणार नाही. तेव्हा आज लवकर घरी जाऊन मुलांना सर्कस दाखवून आणावी म्हणतोय.”

“अरे मग जा ना तुम्ही, जरुर जा. मी तर तुम्हाला आत्ताच घरी जाण्याची परवानगी देतोय. अल्वेज पुट युअर फॅमिली फर्स्ट.”

“नाही सर, मी हातातलं काम आटोपून दुपारी 4 वाजता जाईन.” एवढं बोलून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले आणि कामाला लागले.

साडेचार वाजता कलाम साहेबांनी सहज त्या ज्यु. सायंटिस्टच्या केबिनमध्ये पाहिलं तर ते खाली मान घालून त्यांच्या कामात व्यग्र होते. कलाम साहेब लागलीच ऑफिसच्या बाहेर आले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. ते तडक त्या सायंटिस्टच्या घरी गेले. मुलांना घेतलं. स्वतः सोबत बसून मुलांना सर्कस दाखवली आणि येताना छान हॉटेलमध्ये नेऊन मुलांना जे हवं ते खाऊ दिलं आणि नऊ वाजता मुलांना पुन्हा गाडीतून घरी सोडलं.

इकडे साडे सात वाजता ज्यु. सायंटिस्टला आठवलं की आपल्याला साडे चारला जायचं होतं. घड्याळात पाहिलं तर साडे सात वाजून गेले होते. कामाच्या व्यापात आपण याही वर्षी मुलांना सर्कस दाखवू शकलो नाही याचं त्यांना प्रचंड वाईट वाटायला लागलं. हिरमुसल्या चेहऱ्याने त्या दिवशीचं काम आटोपून ते घरी पोहोचले तर घर एकदम शांत. पत्नी निवांतपणे टीव्ही पहात बसलेली. त्यांनी घाबरतच तिला विचारलं, “मुलं कुठे गेलीत?”

“अहो, असं काय करता? तुम्हाला वेळ लागणार होता म्हणून तुम्हीच नाही का तुमच्या बॉसना पाठवून दिलं आपल्या घरी? ते येऊन मुलांना घेऊन, केव्हाच गेले सर्कस पहायला. आणि काय हो, एवढ्या मोठ्या माणसाला आपली घरगुती कामं तुम्ही कशी काय सांगू शकता?”

ज्यु. सायंटिस्ट काय समजायचे ते समजले. कलाम साहेबांना मनोमन धन्यवाद देत सोफ्यावर बसले. इतक्यात मुलांचा दंगा त्यांच्या कानावर आला. मागोमाग हसत, बागडत मुलं आणि कलाम साहेब घरात आले. कलाम साहेबांना पाहून ते खजिल होऊन उभे राहिले. त्यांच्या खांद्यावर मायेने हात ठेवत खाली बसण्याची खूण करत कलाम म्हणाले, “अहो, साडे चार वाजून गेले तरी तुमचं काम चालूच होतं. तुमची एकाग्रता पाहून माझ्या लक्षात आलं की तुम्ही सर्कसचा विषय पूर्णपणे विसरुन गेला आहात. मुलांची सर्कस बुडू नये म्हणून मी त्यांना घेऊन सर्कसला जाऊन आलो.”

कलाम साहेबांचे आभार मानावेत की त्यांना आपण कामाला लावलं याबद्दल सॉरी म्हणावं हे त्या सायंटिस्टना कळेना. पण स्वतःला पट्कन सावरत, हात जोडत ते म्हणाले, “थॅंक्यु व्हेरी मच सर!”

“नो, नो. ऑन द कॉन्ट्ररी आय शुड से थॅंक्यु टू यू.” असं म्हणत कलाम साहेबांनी त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि ते पुढे म्हणाले, “कित्येक वर्षांनी आज मीही तुमच्या मुलांसोबत सर्कसचा आनंद लुटला. खूप मजा आली आम्हाला. कितीतरी दिवसांनी मीही आज मुलांसोबत बागडलो.”

मुलांच्या चेहऱ्यावरुन तर आनंद ओसंडून वहात होता. कलाम सरांच्या हातातील आपले हात त्या सायंटिस्टने हळूच सोडवून घेतले आणि आपले डोळे रुमालाने पुसले. बॉस आणि ज्युनिअर मधील प्रेम पाहून बाजूला उभ्या असलेल्या मातेचे मात्र ओलावलेले डोळे आपल्या साडीच्या पदराने पुसणे कितीतरी वेळ चालूच होते.

(ही कथा डॉ. कलाम यांच्यासोबत इस्रोमध्ये काम केलेल्या एका शास्त्रज्ञाच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेली आहे.)

 

श्री  प्रभाकर जमखंडीकर

संचालक, स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट, सोलापूर

प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares