☆ याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 1 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆
घड्याळांत सहाचे ठोके पडले, अन् आम्ही पन्हाळा किल्ला उतरायला प्रारंभ केला. आषाढ मासीच्या काळोख्या रात्री धूमधूम पावसात भिजत शिवछत्रपति पन्हाळा उतरून ज्या आडवाटेने विशाळगडीं पोहोचले, त्याच वाटेने जायचे, असा आमचा संकल्प होता.
दहा-पाच पावले उतरलो, अन् पाहिले, की बाबासाहेब थांबले आहेत ! आता हा माणूस प्रवासाच्या आरंभीच हे असले करायला लागला, तर हा रानावनांतला पंचेचाळीस मैल प्रवास कसा पार पडायचा ! काहीसा चिडून मी हाका मारू लागलो. आपल्या मुद्रेवरचे हसूं मावळू न देता बाबासाहेब म्हणाले,
“त्याचं काय आहे, अप्पासाहेब, उजवा पाय थोडासा लचकला. कसा, कोण जाणे ! पण निघताक्षणी त्यानं दगा दिला. हा निघालोच – गुडघ्याला रूमाल बांधताक्षणी !”
– अन् ते दु:ख वागवीत हा मराठी शाहीर ते रानावनांतले, अवघड वाटेवरले कंटाळवाणे पंचेचाळीस मैल तस्सा चालत राहिला ! मुद्रेवरचे स्मित त्याने कणभरही झाकोळू दिले नाही.
या माणसाला मी चांगला ओळखून आहे ! शिवचरित्रावरील भक्तीपोटी हा काय वाटेल ते करू शकतो, या विषयी माझ्या मनी तिळप्राय शंका नाही.
वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पावसाळा सुरू झाला होता. वरंध घाट बंद झाल्यामुळे महाडहून पुण्यास परततांना महाबळेश्वरमार्गे यावे लागत असे. मोटार महाबळेश्वरीं थांबली होती. पावसामुळे झडपा बंद करून घेतल्या होत्या. कुतूहलामुळे मी माझ्या मागची झडप उचलून पावसाचे झरपणे पाहात बसलो होतो. तों वाईकडच्या रस्त्याने कुणी सायकलस्वार चिंब भिजून आलेला दिसला. एकटाच होता. अंगातलें कुडते अंगाशी अगदी चिकटून गेले होते. मस्तकावरून पाणी निथळत होते. दात थडथडत होते.
पाहिले, तर गडी ओळखीचा वाटला. मी तिथल्या तिथून जोरजोराने हांक मारू लागलो. आइकून तो काकडलेला सायकलस्वार मोटारीकडे वळला.
मी आश्चर्याने विचारले,
“बाबा, कुणीकडे ?”
स्मित करून बाबासाहेबांनी म्हटलें,
“प्रतापगडावर.”
“एवढ्या पावसांत ? अन् एकटे ? मोटारीने का गेलां नाही ?”
“तिथं एक कागद आढळांत आला, असा सांगावा पोचला. निघालो, झालं !”
एक जुना कागद आढळांत आला, असा म्हणे सांगावा आला. तेवढ्यासाठी हा माणूस पुणे ते प्रतापगड हा प्रवास वाटेतले तीन घाट चढून, या लागत्या पावसाळ्यांत, सायकलवरून करायला निघाला होता !
पण हे काहींच नव्हे. आम्हांला केवळ पुरंदर्यांचे शिवचरित्र दिसते. मोहोरेदार कागदावर छापलेले. चित्रे घालून सजवलेले. मराठी ग्रंथसंपत्तीचे केवळ शिरोभूषण असे श्री. ब.मो.पुरंदरेलिखित ‘राजा शिवछत्रपति’ ! पण त्यापाठीमागचे हे कष्ट, हे रक्त आटवणे कुणाला माहीत आहे ? जिथे जिथे शिवचरित्र घडले, तो बहुधा सर्व प्रदेश या तरूण पुरुषार्थ्याने पायांतळी घालून अक्षरश: विंचरून काढला आहे. अमुक एका खिंडीतून शिवछत्रपतिंचे सैन्य अमुक एका वेळी मुघलांसमोर उभे ठाकले, असे वाचले मात्र की त्या वाटेने तसतसा प्रवास करून तो सगळा प्रांत डोळ्यांखाली घातलाच पाहिजे. प्रतापगडाभोवतालचा तो पारघाट, ते जनीचे टेंब, ती जावळी, ते कोयनापार हे सगळे भटकले पाहिजे. या येडपट संकल्पात कोण जोडीदार मिळणार ? त्या भयानक प्रदेशांत भयानक झाडी. अस्वलांची आणि बिबळ्यांची वस्ती. हे रान तुडवीत बाबाबरोबर कोण हिंडणार ? ठीक आहे. न मिळो ! अंग काट्यांनी फाडून घेत हे महारण्य एकट्याने धुंडाळायचे. अन्न आहे आहे, नाही ! नाही ! चिंता करतो कोण ? देवाने तारूण्य दिले, ते कशासाठी तर मग ?
या मस्ताना जोग्याने वाचले, की शिवछत्रपति आग्र्याहून नर्मदा ओलांडून दक्षिणेत शिरले. लगेच रेल्वेत बसून आग्रा गाठले, अन् भिडू निघाला तिथून पायी. सामानाचा लबेदा नाही. पाठीवर एक पिशवी, तिच्यांत कपड्यांचा जोड आणि एक पांघरूण. कोण करतो हो, हे सगळे ? कुणाच्या छातीत एवढी हिंमत ?
आम्ही एकदा निघालो रायगडावर. दिवस होते सरत्या उन्हाळ्याचे. मी, पुरंदरे, अमरावतीचे देशमुख आणि बेदरकर. म्हटलें, की लवकरच पावसाळा लागेल, आणि मग मार्ग बंद होईल. पण कोंझर सोडून पाचाडच्या चढाला लागलो, अन् जी वळवाच्या पावसाने झोडायला सुरूवात केली !
क्रमशः….
लेखक – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर
संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे
भ्रमणध्वनी:- 9860006595
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आपल्याला प्रत्येकाला हवीहवीशी वाटते भेटवस्तू, छान छान गोष्टी भेट म्हणून मिळाव्यात अशी इच्छा असतेच सगळ्यांचीच. . भेट म्हणजे काय हे न समजणाऱ्या अजाणांची आणि आत्तापर्यंत अनेक गोष्टी भेट म्हणून मिळालेल्या सुजाण ज्येष्ठांची देखील. बाहुला-बाहुली, चेंडू, खेळणी या बालभेटीतून सुरु होत असलेला हा खजिना . . . वयानुसार कात टाकतो. . महागड्या, आराम देणाऱ्या, मौल्यवान वस्तूंची लयलूट भेट म्हणून केली जाते. कपडे, दागिने, मोबाईल एवढंच कशाला काहींना तर चारचाकी सुध्दा दिली जाते बरं का भेट म्हणून… . काहींना मात्र चॉकलेट, बिस्किटे, लाडू, पिझ्झा, केक अशा रसदार, चवदार पदार्थांची भेट घ्यायला आवडते.
असो.आस प्रत्येकाची, हो ना?
मी ही काही वेगळी नाही बरं. मलाही गिफ्टस् द्यायला आवडतात. घ्यायला तर त्याहूनही आवडतात. काही खास दिवस, खास लोकांनी गिफ्ट दिलीच पाहिजे असा आग्रह नसला तरी आस लागलेली असतेच मनात.. . माझ्या एका वाढदिवसाला मला अशीच एक आगळी भेट मिळाली. वाढदिवसाच्या निमित्तानं मी नानामामांना भेटायला गेले होते. त्यांना नमस्कार करताच भरभरून तोंडभरून आशीर्वाद मिळाला.”अगं, ते पाकीट दे तुझ्या कडं ठेवायला दिलंय ते.”, मामांनी सुमनमामींना सांगितले. मामींनी दिलेलं पाकीट पर्स मध्ये ठेवतच होते तोच मामा म्हणाले,
“अगं, उघडून बघ ना बाळ.”
मामी हसून म्हणाल्या, “हो ना, काय आहे त्या पाकिटात मलाही माहित नाही. तुझ्या मामांनी बघू दिलंच नाही.”
सुमन मामी नेहमी हसून बोलत.”अय्या! खरंच.” माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली. मी चटकन उघडलं पाकीट. अरे हे काय? उघडंच तर होतं ते. आतून एक फोटो बाहेर आला. तो बघून माझ्या हातातलं ते रिकामं पाकीट गळून पडलं. तो फोटो दोन्ही हातात अलगद धरुन मी मामींच्या शेजारी बेडवर बसले. दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. गळा भरुन आला. ओठांवर मात्र किंचितस स्मित होतं.
फोटो माझ्या लग्नातला होता. कार्यालयात शालू नेसून बसलेली मी आणि माझ्या शेजारी माझी आजी. . . . हा फोटो कुणी काढला ? मला कळलंच नव्हतं तेंव्हा. नानांनी तो जवळपास दहा वर्षे सांभाळून ठेवला. इतका आनंद झाला म्हणून सांगू. आठवणी फेर धरुन नाचू लागल्या.
नऊवारी नेसणारी, उंच, कृश, गोरी आजी. तिचा सात्त्विक साधा चेहरा. घट्ट दुमडलेली लहान, नाजूक जिवणी. मऊसूत, गुलाबी सायीचे हात.मी एकदा खेळताना जोरात आपटले होते. हातपाय मोडले नाहीत, पण त्यांनी काही दिवस अस्मादिकांशी असहकार पुकारला होता. याच हातांनी तेंव्हा माझे दात घासले होते.. . . फोटोतून माझ्याकडं बघून हसणारे तिचे डोळे एकदा माझ्यासाठी रडले होते. फॅशन च्या नावाखाली लांब केस कापून मी घरी गेले तेंव्हा. तशी हळवी वाटणारी आजी; कृष्णाच्या, रामाच्या गोष्टी रंगवून सांगताना, आयुष्याचं तत्त्वज्ञान सहज सांगून जात असे ती. किती रविवार गेले तिच्या बरोबर रेडिओ वरची प्रवचनं ऐकण्यात. जास्त करुन तिच्या तल्लीन चेहऱ्यावरील भक्ती निरखण्यात. तिची भक्ती श्रीकृष्णावर आणि माझी तिच्यावर. नारळ कसा खवणावा इथंपासून ते पुरणपोळी जिभेवर विरघळण्यासारखी झाली पाहिजे पर्यंत स्वैपाकघरातल्या खास टिप्स तिनं दिल्या. याबरोबरच व्यवहारज्ञान दिलं. नुसती डिग्री नको प्रोफेशनल डिग्री प्रत्येक मुलीनं घेतली पाहिजे या बाबतीत ती आग्रही होती. काम केल्यानं बोटं झिजत नाहीत, असं म्हणे ती.. पाय जमिनीवर ठेवा. . प्लेगच्या साथीत आई वडील, भाऊ गमावल्यामुळं की काय. . . नाती जपण्यात, भावनांची कदर करण्यात तिला समाधान लाभे.
. . . अशा कितीतरी गोष्टी तिच्याकडूनच शिकले.
इतकंच कशाला हसतमुख, प्रेमळ सुमनमामी आणि आमचे नानामामा यांची पहिली भेट तिच्याच घरी झाली. माझी आजी म्हणजे नानामामांची काकू. माझी आई आणि नाना मामा चुलत बहीण भाऊ. माझे हे मामामामी मेड फॉर इच अदर. नात्यातला गोडवा वानप्रस्थाश्रमापर्यंत टिकून राहिला होता. किंबहुना जुन्या मोरावळ्यागत मुरला होता. पण हे स्वतः तच गुरफटलेलं, रमलेलं जोडपं नव्हतं.काही माणसांना देव आनंद वाटण्यासाठी या जगात पाठवत असावा. समाधानाचा पिंपळ त्यांच्या अंगणात सदैव सळसळत असे. प्रसन्न चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, लाघव अशा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे कुणालाही वश करत असत दोघं. सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून तशा गिफ्ट्स देण्याचा त्यांचा आग्रह असे . त्यात त्यांना परमानंद मिळे. त्यांच्या भेटीत आपुलकीचा ओलावा जाणवे. कोरडा व्यवहार न बघता, हिशेब न ठेवता, भावनेची कदर करणाऱ्या त्यांच्या भेटींनी कितीक रेशीम बंध गुंफले!!
पारिजातकाच्या फुलांच्या सड्यासारख्या आजोळच्या आठवणींनी मनाच्या अंगणात केशरसडा शिंपला. या स्मृती फुलांनी माझं मन सुगंधीत केलंय. महागड्या, मोठ्या, किंमती वस्तूंपेक्षा नानामामांनी दिलेला तो फोटो माझ्यासाठी अमूल्य आहे. आजीची आठवण जागवणारा तो फोटो मी मनापासून जपून ठेवलाय.
(मागील भागात आपण पाहिलं-त्यांनी जाई ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्याचाच पुढचा भाग मेनका लिहिली. अनुपा, अभुक्ता, दिग्या शा अनेक कादंबर्या त्यांनी पुढे लिहून प्रकाशित केल्या.- आता इथून पुढे ) —-
बा. द. सातोस्कारांची महत्वाची पुस्तके मात्र सागर साहित्यानी नाही, ‘शुभदा सारस्वत’चे प्रकाशक, गोगटे यांनी काढली आहेत. ही पुस्तके केवळ लेखक सातोस्कर यांची नाहीत, तर लेखक आणि संशोधक सातोस्करांची आहेत. ‘मराठी मासिकांचे पहिले शतक’ हे त्यांचे पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले. हे पुस्तक माहितीपूर्ण आहेच, पण संदर्भ साहित्य म्हणूनही उपयोगी आहे. गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार हे पुस्तक ‘सागर साहित्या’ने ७५साली काढले. अर्वाचीन गोव्याचा इतिहास त्यांनी ३ खंडात लिहिला आहे. त्यांचे सर्वात महत्वाचे संशोधनपर पुस्तक म्हणजे गोमंतक प्रकृती आणि संस्कृती – ३ खंड. हे ग्रंथ ‘शुभदा सारस्वत’ ने प्रकाशित केले आहेत . यात गोव्याचा प्राचीन इतिहास आहे, गोव्याचे प्राकृतिक वर्णन आहे. समाजव्यवस्था, लोकांची संस्कृती, सण , उत्सव सगळे आहे. या ग्रंथाचा पहिला खंड १९७९ साली प्रकाशित झाला. याला ‘केसरी मराठा संस्थेचा तात्यासाहेब केळकर पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर प्रकाशित झाले, ते ’बादसायन’ हे त्यांचे आत्मचरित्र. हे आत्मचरित्र म्हणजे काही केवळ ‘बा.द. सातोस्कर’ यांचे स्वत:चे चरित्र नाही. त्याला गोव्याचे अस्तर आहे. गोमंतकीय समाज , तिथले लोकजीवन, तत्कालीन गोव्याचे वातावरण , गोव्याचा निसर्ग याला जोडून ते येते. ‘’बादसायन’ प्रकाशित झाले १९९३ मधे . ‘शुभदा सारस्वत’ नेच ते प्रकाशित केले. या दरम्यान त्यांनी रामायणाचा अभ्यास करून ‘अभिराम’ ही कादंबरी लिहिली. यावेळी त्यांचे वय होते ८० .त्याच अभ्यासातून पुढे ‘रामायणकालीन जमाती व संस्कृती असे एक छोटेखानी पुस्तकही लिहून टाकले.
१९८५ च्या दरम्यान दादा आजारी पडले. प्रकाशनासाठी करावी लागणारी दगदग त्यांना सहन होईना. आई आधीच गेली होती. मग त्यांनी ‘सागर साहित्य प्रकाशन’ बंद केले. ते शेवटचे माझ्या घरी आले, तेव्हा विषादाने म्हणाले होते, “ गोव्यात गेलो, तेव्हा दोन गोष्टी डोळ्यापुढे होत्या. मराठी हीच गोव्याची भाषा आहे, हे सिद्ध करायचे. आणि भाषिक व सांस्कृतिक एकतेच्या आधारावर महाराष्ट्र आणि गोवा यांचे एकीकरण घडवून आणायचे.” पण त्यांना हे शक्य झालं नाही, आणि याची बोच त्यांनी कायमची आपल्या काळजात वागवली.
पुढे माझ्या बहिणीने- लताने गोव्यातलं आपलं बिर्हाड – बाजलं हलवून पुण्याला मांडलं. मग गोव्यात जाणं झालंच नाही. नंतर दादा अर्धांगाने आजारी असल्याचे कळले. आई आधीच गेली होती. दादांना भेटून यावं, असं खूप मनात होतं. पण त्यांना भेटायला जाणं नाहीच जमलं. नंतर दादा गेल्याचीच बातमी पेपरमध्ये वाचली.
दादा म्हणजे, प्रकाशक, लेखक, संपादक, संशोधक, गप्पिष्ट, माणसांचे लोभी, कृतिप्रवण अशा व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंनी झळझळणारे लोलकाचे लखलखते झुंबर. ते मालवलं आणि गोव्याचं माझं माहेरही सरलं —-
आज गौराईचे विसर्जन . प्रत्यक्ष जगत्जननी माहेरपणाला आली होती . तीन दिवस तटस्थ व्रतस्थपणे उभी होती . माझे घर न्याहाळत होती . नुसत्या कुंकवाचा तिलक लावल्यामुळे किती तेजस्वी व प्रसन्न दिसत होती . घरभर फिरली . दृश्य अदृश्य गोष्टी पाहात होती . अगदी तिच्या स्वागतासाठीचा माझा आटापिटाही तिने पाहिला असेल . मी केलेल्या पाहुणचाराने ती खूश झाली असेल ना ! आज तिने निरोप घेतला . तरीही तिच्या अस्तित्वाचा सुवास सुगंध घरभर दरवळत आहे . माझ्या मनातही तो रेंगाळून राहिला आहे . गौराईचा निरोप घेताना डोळे भरून तर येतातच . आरती मधील शेवटच्या कडव्यांचे उच्चारही कधी कधी नीट होत नाहीत . मन भरून येते .
चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी॥
लिहिल्या असतील माते माझे निज भाळी॥
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी ॥
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥
हे आई , माझ्या नशिबात सर्वच कुशल मंगल असणार नाही हे मी जाणते . पण तू माझ्याजवळ असलीस तर सर्व अमंगल आपोआप पुसून जाईल . प्रथम आम्हाला स्वतःमधील वाईट गुणांचे , वाईट सवयींचे विसर्जन केले पाहिजे . चराचरातील प्रत्येकाकडे सहृदयतेने पाहिले पाहिजे . तूच दिलेल्या दिव्य शक्तीची आम्हाला जाणीव झाली पाहिजे .
‘ थोडी श्रद्धा व विश्वास माझे ठायीं ठेवा म्हणजे या संसाररूपी खेळात तुम्हाला आनंद मिळेल,’ असेच काही तू सांगत होतीस ना !
खरेच आई आज थोडे थोडे कळते आहे . जीवनातील हा संसाररूपी खेळ म्हणजे एक श्रेष्ठ शाश्वत सत्य आहे . या सृष्टीत माणसाने सुखाने जगावे म्हणून तू किती भरभरून दिले आहेस . तुझी प्रत्येक निर्मिती रसपूर्ण , सौंदर्य युक्त आणि परिपूर्ण आहे . पण आम्हाला हे समजून घेण्याला किती काळ जाईल कोणास ठाऊक ? चराचरात तुझ्यामुळे व्यापून असलेला आनंद आम्हाला कधी ओळखता येणार ? भरभरून देण्यामधले समाधान आम्हाला कधी कळणार ? केवळ ममतेने जग जिंकता येते हे कधी अनुभवता येणार ? प्रत्यक्षात पृथ्वीतलावर स्वर्ग लोकाची अनुभूती येईल असा सुदिन लवकर येवो, म्हणजे तुझ्या आरतीचा अर्थ खऱ्या अर्थाने आम्हाला कळेल .
☆ ती हाक येई कानी ….. भाग – 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर) (९/३/१८९९ – २६/११/८५ )
( तूच रमणी, प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले, एक कहाणी, यासारख्या, विशेषत्वाने उल्लेख करावा अशा त्यांच्या कविता. ) इथून पुढे —-
‘एका कवितेत अनेक कविता गुंफणे,’ हे त्यांचे वाखाणण्यासारखे वैशिष्ट्य होते. ‘ एक कहाणी ‘ या कवितेत बारा कविता, ‘ चमेलीचे झेले ‘ या कवितेत तीन कविता त्यांनी गुंफल्या होत्या. या प्रकारातील एका कवितेचं उदाहरण द्यायलाच हवं असं —- ‘ एका वर्षानंतर ‘ ही ती कविता —-
ती तू दिसता हृदयी येती कितीक आठवणी ।
मम सौख्याची झाली होती तुझ्यात साठवणी ।।
— अशा प्रसन्न भावनेने सुरुवातीला प्रेम व्यक्त करणारी ही कविता —
सुहासिनी का दर्शन देशी, मी हा दरवेशी ।
समोरुनी जा, झाकितोच वा, हृदयाच्या वेशी ।।
—- असे प्रेमातील अपयशामुळे आलेले नैराश्य व्यक्त करत संपते. पण या दोन टोकांमध्ये यशवंतांनी टप्प्याटप्प्याने आठ कवितांची मालिका रचलेली आहे.— त्यांची प्रयोगशीलता दाखवणारी “ जयमंगला “ ही कविता म्हणजे २२ भावगीतांमधून हृदयसंगम दाखवणारी आणि प्रत्येक भावगीत म्हणजे एक स्वतंत्र कविता असली तरी त्यांची एकत्र गुंफलेली मालाच वाटणारी कविता तर वाचकाला थक्क करणारीच. —–इथे एक वेगळेच कवी यशवंत भेटतात.
त्यांचे सुरुवातीचे महाराष्ट्र- प्रेम बहुदा त्यांच्याही नकळत राष्ट्रप्रेमाकडे झुकले, आणि त्यांनी राष्ट्रीय वृत्ती जोपासणाऱ्या, व त्याच्या जोडीनेच सामाजिक आशयाच्याही कविता लिहिल्या. आकाशातील तारकांच्या राशी, लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन ।
पण स्वातंत्र्यलक्ष्मी तुझ्या चरणांशी लीन होईन ।।
ही स्वातंत्र्याचा ध्यास व्यक्त करणारी ‘ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा ‘ ही कविता, तसेच,सिंहाची मुलाखत, गुलामांचे गाऱ्हाणे, इशारा, यासारख्या, राष्ट्रजीवनातल्या पुरुषार्थाला जाग आल्याची भावना व्यक्त करणाऱ्या प्रतिकात्मक कविता त्या काळात खूप लोकप्रिय झाल्या होत्या.
वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती । मन्मना नाही क्षिती ।
भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडूनी । मुक्त तो रात्रंदिनी ।।
— “ तुरुंगाच्या दारात “ कवितेतल्या, स्वातंत्र्ययोद्धयांना प्रोत्साहन देतादेता त्यांच्या बेधडक वृत्तीचे कौतुक करणाऱ्या या ओळी आवर्जून आठवाव्यात अशाच आहेत.
अशा देखण्या ओळींमधून त्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी वर्णन केले होते.
“ मायभूमीस अखेरचे वंदन “ या कवितेत मृत्यूवर मात करू शकणारी झुंझार वृत्ती दाखवून दिली होती. अशी ही इतिहासातले स्फूर्तिदायक क्षण शब्दात रेखाटणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा यासाठी भावनात्मक आव्हान करणारी, आणि निरंतर स्वातंत्र्याचा ध्यास व्यक्त करणारी– त्यांची मनावर ठसणारी कविता.
१९१५ ते ८५ या ७० वर्षांत, जीवनाचे विविध पैलू लख्खपणे उलगडून दाखवणारी विपुल काव्यसंपदा त्यांनी निर्माण केली. ‘ सुनीत ‘ या नव्या काव्यप्रकारावर आधारित स्फुट कविता, “ बंदिशाळा “ हे बालगुन्हेगारांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य, “ काव्यकिरीट “ हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्याभिषेकावरचे खंडकाव्य, “ छत्रपती शिवराय “ हे महाकाव्य, “ मुठे लोकमाते “ हे पानशेत धरण- दुर्घटनेवरचे दीर्घकाव्य, “ मोतीबाग “ हा बालगीतांचा एकमेव संग्रह, — अशी सगळी त्यांची पैलूदार काव्यप्रतिभा अचंबित करणारी आहे. तुटलेला तारा, पाणपोई, यशवंती, यशोगंध, वाकळ, यशोधन, यशोनिधी, असे त्यांचे कवितासंग्रह, आणि “ प्रापंचिक पत्रे “ या नावाने ललित लेखन प्रसिद्ध झालेले आहे. हा त्यांचा सगळा काव्यप्रवास म्हणजे एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्वाच्या जीवनविकासाचा आलेख असल्याचे उचितपणे म्हटले जाते.
“ घायाळ “ ही यशवंतांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वाईग यांच्या “ Downfall of the Heart “ या दीर्घकथेचे रूपांतर आहे, आणि मूळ लेखकाची पूर्ण माहिती देणारी दीर्घ प्रस्तावनाही त्यांनी लिहिली आहे.
ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते, आणि जव्हार संस्थानाचे ‘ राष्ट्रगीत ‘ त्यांनी लिहिले होते, ही एक वेगळी माहिती. १९५० साली मुंबईत भरलेल्या ३३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
कवितेने केव्हाही आणि कुठूनही हलकीशी जरी साद घातली, तरी तिच्या त्या हाकेला तत्परतेने, आणि आत्मीयतेने “ओ “ देत तिचे डौलदार स्वागत करणारे महान कविवर्य यशवंत यांना अतिशय श्रद्धापूर्वक आदरांजली.
☆ Being alive is a special occasion. – डॉ संजय मंगेश सावंत ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
Being alive is a special occasion !!!
काल सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने, डॉक्टर दीपकने एक मेसेज पाठविला, Stop keeping your clothes & shoes for special occasion, Wear them whenever you can,, Now a days being alive is a special occasion !!!
आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा,,,
सणासुदीला किंवा लग्नसमारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज नुसते कपाटात ठेवून देऊ नका. आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे,,,
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिट साठी गेलो होतो. दोघेही ८० च्या आसपास असावे. राहणीमान, कपडालत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे. फी देतानासुद्धा घासाघीस करायचे. औषधे लिहून दिली तरी अर्धीअधिक आणायचे. कसली चैन नाही, कोणा नातेवाईकांचं येणं जाणं नाही, कधी चांगलंचुंगल खाणं नाही, की कपडा नाही. परंतू असते एखाद्याची परिस्थिती नाजूक, असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो.
एक दिवस माझ्या व्हिजिट बॅगमधला प्लास्टिकचा एक मोठा बॉक्स होता रिकामा होत आला होता. ते बाबा मला म्हणाले, “ डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल का ?” मी लगेच त्यांना तो देऊन टाकला,,, कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडं गडबडून गेले, पण बायको पटकन बोलून गेली, “ त्यांना 1000 च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे, “– मी अचंबित –निघताना पुन्हा म्हणाले,” अजून एखादा असेल तर पुढच्या वेळी द्या मला. यात बसणार नाहीत.“ त्यावेळी माझी व्हिजिट फी दहा रुपये होती, ती देण्यासदेखील ते नाखुश असायचे. विचारांचं काहूर डोक्यात घोंघावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो,,,
दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडी मध्ये शिरतो न शिरतो तोच कंपाउंडर म्हणाला, “ सर काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होतात, ते आजोबा सकाळीच गेले,,,” पटकन माझ्यासमोर नोटांनी गच्च भरलेला त्यांचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला,,, ‘ ना खुद खाऊंगा, ना खाने दुंगा ‘ असं आयुष्य जगतच, कसलाही उपभोग न घेता, नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते— आपण अमर आहोत किंवा अजून खूप जगणार आहोत या भ्रमातच ते गेले.
मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झाले. तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या. मोठी बॅग भरली होती. काहींच्या तर घड्यादेखील मोडल्या नव्हत्या. परंतू ती नेहमी साध्याच साड्या वापरायची. अर्थात वयोमानाने विरक्ती आल्यामुळे असेल कदाचित, पण या साड्यांमुळे नीताचा व तिचा नेहमी वाद व्हायचा,” कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅगेत,,, कुणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई असून कसल्या साड्या घालते “ –वगैरे वगैरे. “ मला कोण बघणार
आहे ?”, तिचे नेहमीचे उत्तर. जेवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या गरजूंना देऊन टाकल्या, बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे !!
आपल्या वॉर्डरोबमध्ये अनेक नवीन साड्या, पॅन्ट शर्ट पडून असतात. एवढ्या भारी साड्या, शर्ट, पॅन्ट रोज कशाला वापरायच्या, म्हणून तशाच पडून असतात. कधीकधी त्या घालायचा मुहूर्तही उजाडत नाही. आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या तर त्याची फॅशन आउटडेटेड झालेली असते. त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता. कपड्यांच्या बाबतीतच नव्हे, तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण ‘ नंतर वापरू ’ असं म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच लोळत पडतात,,,
आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते तीच आपल्या मनातील चांगल्या-वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते. बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह, प्रेम, आपुलकी, आपण आपल्या इगो किंवा संकुचित वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही. मग बरेचदा वेळ निघून जाते, कारण बोलण्यासाठी ती व्यक्तीच उरलेली नसते. संचय वस्तूंचा असो वा मनातील विचारांचा, त्याचा योग्य विनियोग, वापर झाला नाही तर त्यांची किंमत शून्य होऊन जाते. तेव्हा मित्रांनो आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी occasion असतो– त्याच्यावरच आपला अधिकार असतो.—म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान–मग त्या वस्तू असोत वा विचार— आजच वापरून टाका– त्या ‘ आउटडेटेड ‘ होण्याअगोदर !!!
डॉ संजय मंगेश सावंत
संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ ती हाक येई कानी ….. भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर) (९/३/१८९९ – २६/११/८५ )
(ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्य यशवंत, म्हणजे कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा काल, दि . २६ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन होता. ( ९/३/१८९९ — २६/११/८५ ) त्या निमित्ताने त्यांच्या काव्य-कर्तृत्वाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. )
“ महाराष्ट्र कवी “ असा ज्यांचा अतिशय गौरवाने उल्लेख केला जातो, त्या कवी यशवंत यांच्याबद्दल, त्यांच्या साहित्यसेवेबद्दल किती आणि काय काय सांगावे ते कमीच वाटावे, असेच म्हणायला हवे.
लौकिक जीवनाचा अतिशय खडतर मार्ग आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती यामुळे यशवंत यांना फायनलनंतर पुढचे शिक्षण घेता आले नव्हते, हे, त्यांची समृद्ध काव्यसंपदा पाहता कुणालाच खरे वाटणार नाही असे सत्य होते. त्यांच्या शाळेतील शिक्षक, आणि नामवंत कवी व कादंबरीकार श्री. गो.गो.मुजुमदार ( साधुदास ) यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर मोठाच प्रभाव होता. आणि बहुदा त्यामुळेच ते त्या वयात कवितेच्या प्रेमात पडले होते. जन्म चाफळचा असल्याने समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांना त्यांच्या भावविश्वात जणू अढळ स्थान होते. लो. टिळकांनी सुरु केलेल्या शिवजयंती उत्सवाचा मनावर मोठाच संस्कार झालेला होता. “ छंद लागला टिटवीला । तिने समुद्रही आटविला ।। हे टिळकांबद्दलचे स्फूर्तिदायक शब्द मनावर कोरून घेऊनच त्यांनी आपला मुक्काम पुण्याला हलवला आणि त्यांच्या आयुष्याला नवे सुंदर वळण मिळाले.
पुण्यात त्यांना अभिरुचीसंपन्न कवी गिरीश हे मित्र मिळाले. व्युत्पन्न आणि मनस्वी कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधव ज्युलियन यांचा सहवास मिळाला. दिनकरांसारखे चोखंदळ वाचकमित्र मिळाले — आणि त्यांना कवितेचे नवे लोभस क्षितिज खुणावू लागले. चौफेर आणि चोखंदळ वाचनाने त्यांनी औपचारिक शिक्षणाची उणीव भरून काढली. “ रविकिरण मंडळ “ या आधुनिक कवितांची नवी परंपरा सुरु करणाऱ्या कविमंडळातल्या सप्तर्षींमध्ये माधव ज्युलियन यांच्याबरोबर कवी यशवंत यांचेही नाव अग्रक्रमाने झळकू लागले. “ वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळत रहावी , त्याप्रमाणे मी अंतर्यामीची कवितेची आवड सांभाळली, जोपासली, “ असे कवितेवर अनन्य निष्ठा असणारे यशवंत म्हणत असत. एकीकडे कारकून म्हणून रुक्ष व्यावहारिक जीवन जगत असतांना, ‘ काव्य हे एक व्रत ‘ मानून त्यांनी मनापासून काव्याची उपासना केली, असेच म्हणायला हवे.
एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये प्रामुख्याने जोपासल्या जाणाऱ्या शाश्वत जीवनमूल्यांचे सतत समर्थन करतांना, त्यांची कुटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांमधून नकळतच प्रकट झालेली असायची. ‘ दैवते माय-तात ‘ ही आईवडलांबद्दलची कृतज्ञता परिणामकारकपणे व्यक्त करणारी कविता, आईचे महत्त्व सांगणारी “ आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी। ती हाक येई कानी, मज होय शोककारी “ ही अतिशय लोकप्रिय झालेली, आणि आर्तपणे मनाला भिडणारी कविता, या त्यांच्या अशा आत्मनिष्ठतेमुळेच इतक्या सुंदर जमून गेल्या आहेत, यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यांची कविता मनातील असंख्य भाव-भावना, आशा-निराशा, तीव्र दुःखाच्या छटा, जीवनातले प्रखर वास्तव, अशा सगळ्या अनुभवांचे यथार्थ चित्रण करणारी होती. –याचे उदाहरण म्हणून, ‘ समर्थांच्या पायाशी ‘, ‘ बाळपण ‘, ‘ मांडवी ‘, अशासारख्या किती कविता सांगाव्यात ?
माझे हे जीवित, तापली कढई,
मज माझेपण दिसेचिना—
माझे जीवित, तापली कढई,
तीत जीव होई लाही – लाही ।।
—- स्वतःच्या आयुष्यातल्या प्रखर वास्तवाचे चित्रण करणारी “ लाह्या-फुले “ ही तशीच एक कविता. अशा वेगळ्याच धाटणीच्या अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत.
‘ प्रेमकविता ‘ ही त्यांची आणखी एक खासियत, ज्यात प्रेमाचे साफल्य आणि वैफल्य, मृत्युवरही मात करू शकणारे प्रेमाचे चिरंजीवित्व, अशा प्रेमाच्या अनेक छटा त्यांनी उत्तम चित्रित केल्या आहेत. यासंदर्भातले त्यांच्या विचारांचे वेगळेपण हे की, प्रेमाची परिणती आत्मिक मीलनात होणे ही प्रेमाची खरी परीक्षा असते हा त्यांचा विचार, आणि तो अधोरेखित करणाऱ्या— तूच रमणी, प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले, एक कहाणी, यासारख्या, विशेषत्वाने उल्लेख करावा अशा त्यांच्या कविता.
(मागील भागात आपण पहिलं,- त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा मी जाई, तेव्हा तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील विजय सुराणाने लिहिलेल्या ओळी आठवत,
‘असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली ।
क्षणभरी पहुडाया अनंताने हांतरली।। आता इथून पुढे – )
पुढे पुढे पुण्याला त्यांच्या मुलीकडे वृंदाकडे जाताना ते आमच्याकडे थांबत आणि मग पुढे पुण्याला जात. आमचा हा थांबा त्यांच्यासाठी फक्त एक-दोन दिवसांचा असे. पण तेवढ्या वेळात वाङ्मय क्षेत्रातील काही घडामोडी, त्यांचे काही नवीन संकल्प, प्रसिद्ध झालेले नवीन पुस्तक असं खूप काही कळत असे.
दादांना दोन मुली आणि एक मुलगा होता. आणि साहित्याच्या रेशमी धाग्याने जोडलेल्या आम्ही दोघी मुली —माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर, लतावर त्यांचा स्वतःच्या मुली असल्यासारखाच लोभ जडला होता. दादांनी म्हणजे बा.द.सातोस्करांनी आपल्या ९१ वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यात काय काय आणि किती किती केलं, हे सांगायचं तर एक ग्रंथच होईल. ते ग्रंथपाल होते. प्रकाशक होते. लेखक होते, संपादक, संशोधक होते आणि गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्तेही होते. गोवा मुक्ति लढा धगधगता ठेवण्यासाठी त्यांनी सन ५४ ते ६२‘दूधसागर हे पाक्षिक चालवले होते. गोवा मुक्त झाल्यावर त्यांना दैनिक गोमंतक वृत्तपत्राचे संपादन करण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी ती जबाबदारी ५ वर्षे सांभाळली आणि नंतर या जबाबदारीतून मुक्त झाले.
दादा सातोस्कर साधारणपणे १९३२-३४च्या दरम्यान मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात काम करत होते. तिथल्या अनुभवाच्या जोरावर, पुस्तकांचे शास्त्रशुद्ध व निर्दोष वर्गीकरण कसे करावे, हे शिकवणारी द्विबिंदू वर्गीकरण पद्धत त्यांनी शोधून काढली आणि त्यावर पुस्तकही लिहिले.
ते ग्रंथवेडे होते. त्यांनी ग्रंथ वाचले. ग्रंथांवर प्रेम केले. ग्रंथ लिहिले. ग्रंथप्रेमातून ग्रंथरक्षणाच्या म्हणजेच ग्रंथपालनाच्या शास्त्राकडे वळले. त्यावर पुस्तक लिहिले. गाव तिथे ग्रंथालय ही चळवळही त्यांनी सुरू केली. उत्कृष्ट प्रकाशक हा ग्रंथवेडा असतो- नव्हे असायलाच हवा, असं ते बोलून दाखवत.
१९३४ साली दादा मुंबईत असताना, लक्ष्मणराव सरदेसाईंचे ‘ कल्पवृक्षाच्या छायेत ‘ आणि जयंतराव सरदेसाईंचे ‘ सुखाचे दिवस ’ ही पुस्तके विक्रीची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याकडे आली. त्याचवेळी त्यांच्या मनात आले, पुस्तकाशी संबधित असा पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय करावा. १९३५मध्ये बा.द. सातोस्कर पदवीधर झाले. त्या काळात त्यांना कितीतरी चांगल्या नोकर्या मिळाल्या असत्या. पण साहित्य प्रेमाने, त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. आणि ‘ सागर साहित्य प्रकाशन ‘ ही प्रकाशन संस्था काढली. १९३५ ते १९८५ या ५० वर्षांच्या काळात त्यांनी हा प्रकाशन व्यवसाय अव्याहतपणे, उत्साहाने व आनंदाने केला. मराठी प्रकाशक परिषदेच्या पहिल्या संमेलन प्रसंगी, जुन्यातला जुना प्रकाशक म्हणून त्यांचा सत्कार झाला होता, तर ५व्या संमेलन प्रसंगी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
सातोस्करांनी प्रकाशनासाठी पुस्तक निवडताना प्रथितयशांच्या पुस्तकांबरोबरच नवोदितांची पुस्तके काढून त्यांना प्रोत्साहन दिले. सुजाण वाचकांकडून दर्जेदार पुस्तक काढले, अशी वाहवा मिळवून घेण्यापेक्षा, अधिकाधिक लोकांपर्यंत आपले पुस्तक पोचले पाहिजे, अधिकाधिक लोकांनी ते वाचले पाहिजे आणि अधिकाधिक लोकांना ते कळले व आवडले पाहिजे, असा त्यांचा दृष्टीकोन होता. म्हणूनच पुस्तकाची निवड करताना त्यांनी ‘क्लास’चा विचार न करता ‘मास’चा विचार केला. प्रकाशन व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी दोन-तीन वर्षात स्वत:चा प्रेस घेतला. पुढे १९४३च्या दरम्यान कबूल केलेल्या लेखकांनी वेळेवर पुस्तके आणून दिली नाहीत, तेव्हा प्रेसला काम पाहिजे, म्हणून त्यांनी स्वत:च पुस्तक लिहिण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांनी पर्ल बकच्या ‘मदर’ कादंबरीचा ‘आई’ असा अनुवाद केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ‘द गुड अर्थ ‘ चा ‘धरित्री असा अनुवाद प्रसिद्ध केला. प्रकाशक सातोस्कर असे लेखक सातोस्कर झाले. त्यानंतर त्यांनी ‘जाई‘ ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्याचाच पुढचा भाग ‘ मेनका ‘ लिहिली. अनुपा, अभुक्ता, दिग्या अशा अनेक कादंबर्या त्यांनी पुढे लिहून प्रकाशित केल्या.
संपादकीयसाठी दिनविशेष बघताना दिसलं, २७ तारखेला बा. द. सातोस्कर यांचा स्मृतिदिन आहे. हे पाहिलं आणि आठवणींची पाखरं भिरीभिरी येऊन मनाच्या झाडावर उतरली आणि किलबिलत राहिली.
त्यांची माझी पहिली भेट झाली, गोव्यातील डिचोली येथे झालेल्या साहित्य संमेलनात. त्यापूर्वी माझी मामेबहीण लता हिच्याकडून त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं. तेवढ्यानेही माझी छाती दडपून गेली होती. डिचोलीला लताच्या बालकविता- संग्रहाचे प्रकाशन होते. अध्यक्ष होते, पं महादेवशस्त्री जोशी. ते माझ्या मामांचे मित्रच. तिथे कार्यक्रमाच्या आधी लताने माझी बा. द. सातोस्कर यांच्याशी ओळख करून दिली आणि म्हणाली, ‘ ही माझी आत्येबहीण. हीसुद्धा कथा-कविता लिहिते.’ संमेलनाच्या दरम्यान मधल्या वेळेत त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या. त्यांनी मोठ्या आत्मीयतेने माझी चौकशी केली. मी काय काय लिहिलं, कुठे कुठे छापून आलं, वगैरे विचारलं. मोठ्या (कर्तृत्वाने) लोकांशी बोलताना मी फारशी मोकळी होत नाही. त्यांच्याशी बोलताना मला दडपणच येतं. धाकुटेपणाची ( कर्तृत्वाच्या दृष्टीने) भावना मनाला वेढून रहाते. पण सातोस्करांचं मोठेपण असं की, ते मधलं औपचारिकतेचं अंतर तोडून दादा स्वत:च धाकुटेपणाजवळ आले. दादा म्हणजे सातोस्कर. जवळचे, परिचित त्यांना दादा म्हणत. मीही मग त्यांना दादा म्हणू लागले. त्यानंतर दादांनी मला मुलगीच मानलं आणि तसं घोषितही केलं. त्यानंतर सांगलीला आल्यावर त्यांचा आणि माझा पत्रव्यवहार वाढला. मी नवीन काही लिहिलं की त्यांना वाचायला पाठवावं असा त्यांचा आग्रह असे. हा पत्रव्यवहार प्रामुख्याने माझ्या बाजूने पाठवलेल्या कविता, मांडलेल्या कथा- कल्पना किंवा मग सगळीच कथा, लिहिलेले लेख या संदर्भात असे. तर त्यांच्या बाजूने त्यांच्या नवीन लेखनाच्या योजना किंवा साहित्य क्षेत्रातील विविध घटनांची माहिती, या संदर्भात असे.
पुढच्या वर्षी मंगेशीला साहित्य संमेलन झालं. अध्यक्ष होते, बा. द. सातोस्कर. एका परिसंवादात बोलण्यासाठी मला त्यांनी निमंत्रित केलं. संमेलनाला सुरुवात होण्यापूर्वी एका खोलीत दादा, गंगाधर गाडगीळ, जितेंद्र अभिषेकी , कृ. ब. निकुंब इ. थोर थोर मंडळी बसली होती. मला बघताच दादांनी मला आत बोलावलं. बस म्हणाले. मग त्यांनी ‘ ही माझी मुलगी, उज्ज्वला केळकर. ही सुद्धा लिहिते, बरं का! आणि चांगलं लिहिते.’ अशी माझी ओळख करून दिली. मला अतिशय संकोच वाटला. अनेक वर्षे शारदेची उपासना करणार्या व्यक्तीने, तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तींपुढे माझं कौतुक करावं, याची एकीकडे अपूर्वाई वाटत असताना, दुसरीकडे संकोचही वाटत होता. त्याचवेळी त्यांच्या एका मित्राने चेष्टेने विचारलं , ‘ आम्हाला माहीत नसलेली ही मुलगी तुला केंव्हा झाली? ’ दादा सहजपणे म्हणाले. ‘ डिचोलीच्या साहित्य संमेलनात. तिथेच तिची आणि माझी ओळख झाली.’
बा. द. सातोस्कर यांच्याशी नाते जुळले आणि गोवा हे माझे माहेर झाले. शाळा- कॉलेजात आणि नंतरही बा.भ. बोरकरांच्या कविता वाचताना, त्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना गोवा माझी स्वप्नभूमी झाली होती. आता ते माझं माहेर झालं. त्यावेळी दादांनी मला घरी येण्याचा खूप आग्रह केला होता. पण मला वेळ नव्हता. दुसर्या दिवशीचं परतीचं माझं रिझर्वेशन झालं होतं.
त्यानंतर मी ४-५ वेळा गोव्याला गेले, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे, मी आणि माझी बहीण लता गेलो. पणजीपासून १५-१६ कि.मीटर अंतरावर असलेल्या करंजाळे इथे ‘स्वप्नगंध’ हे काव्यात्मक नाव असलेली त्यांची टुमदार बंगली होती. घराच्या मागच्या बाजूला मांडवी नदीचे बॅक वॉटर. भोवताली स्निग्ध शांतता. अतिशय रम्य जागी त्यांची छोटी बंगली होती आणि बंगलीत होते स्वागतशील आई आणि दादा. त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा मी जाई, तेव्हा तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील विजय सुराणाने लिहिलेल्या ओळी आठवत-