सत्तरीच्या घरातल्या हसतमुख दमदार पावले टाकीत, येणाऱ्या जाणाऱ्यांचा राम राम स्वीकारत, झपाझप चालत माझ्याकडे येणाऱ्या काकांना मी विचारले “काय हो काका किती दिवसांनी भेटताय कुठे लपला होतात?
माझ्या कोपरखळीला दाद देत मिस्कील हंसत त्यांच उत्तर आलं, ” गेलो होतो मसणात” मी उडालेच, ” काय काका! काहीतरीच काय बोलणं?, नाही म्हणजे कुणी जवळचं माणूस.. त्यांचं काही बरवाईट?तुम्ही दुःखी आहात का? नाही म्हणजे स्मशानात? म्ह ण जे अशा जागी कोणी सहज, मुद्दामून जात नाही, नाही कां? माझा नुसता गोंधळ उडाला होता.
“कबूल आहे! नाही जात अशा ठिकाणी. पण मी गेलो आणि भरून पावलो. प्रसन्न मनाने त्या वैकुंठधामात वावरलो. माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून काका पुढे म्हणाले, “माझ्या बोलण्याने गोंधळलीस ना नेहमीसारखी! बैस खाली. सगळं सांगतो. माझं कोड्यातलं बोलणं संभ्रमात टाकतय ना तुला?
“हो ना हो!एक वेळ पुस्तकातलं कोडं सोडवणं सोप्प आहे पण स्मशान काय मसणात काय! काका हे माझ्याअल्पबुद्धी पलीकडचं आहे, तेव्हा आता फिरक्या घेणं पुरे आणि मुद्द्यावर या काकासाहेब “
आणि मग गाडी रुळावर आली वक्तृत्व स्पर्धेत 1ला नंबर असलेले माझे जेष्ठ मित्रवर्य बोलू लागले, “अगं इंदोरला गेलं होतं आमचं मित्र मंडळ. सगळं इंदोर पालथ घातलं. खाऊ गल्ली झाली, मंदिरें झाली, मार्केटिंग झालं. सगळे जाम दमले आणि म्हणाले, ” बस झालं! सगळं शहर फिरलोय आता उद्या पुण्याला निघायचं बघूया.
माझ्या मनात वेगळंच चाललं होतं. मला कुठेतरी वाचल्याचं आठवत होतं. इंदोर दहनघाट बघण्यासारखा आहे. ताड्कन उठलो आणि गर्जना केली “चलो दहनघाट ” दहनघाट???झोपलेले खाड्कन जागे झाले. जागे असलेल्यांनी डोळे विस्फारले, बसलेले ताड्कन उठून मला धरायला धावले, सगळ्यांना वाटलं परिणाम झालाय माझ्या डोक्यावर. बायको तर इतकी भेदरली की किंचाळून म्हणाली, “अहो काल उज्जेनला महाकालेश्वराची भस्मपूजा पाहयलीत त्याचा काही विपरीत परिणाम नाही ना हॊ झाला तुमच्यावर?
सगळ्यांच्या नजरेत कींव होती. “भ्रमिष्ट झालाय हा! अशा सुतकी अशुभ ठिकाणी कुणी जातं कां रें मुर्खा!” वशा खेकसलाचं.
आरडाओरडा, मित्रांच्या शिव्या, बायकोचं रडणं चालूच होतं. जणू काही मी शेवटच्या प्रवासाला निघालोय परत येणारच नाहीय्ये की काय असंच मला वाटायला लागलं. ” काका मजेत टाळ्या वाजवून गंमत सांगत होते.
न राहून मी म्हणाले”काकुंच बरोबर आहे काका, अहो मृत्यूचं नाव काढलं, प्रेतयात्रा पाहिली, ज्वाळा बघितल्या की माणूस घाबरतोच आणि अशा ठिकाणी सगळं सोडून जाण्याची तुम्हाला तरी काय बुद्धि झाली?काहीतरी असतं हं काका तुमचं !
“अगं बाई! पुढचं तर ऐक त्याचं असं झालं माझे एक मित्रवर्य ह्या उपक्रमात सहभागी आहेत. ते म्हणाले “मध्य प्रदेशात आलात ना की दहन घाटाला भेट द्यायला विसरू नका. ती जागा बघण्यासारखी आहे. उदास मनाला टवटवी आणणारी फुलझाडे आहेत तिथे.
असं बघ राधिका, जाणारा महाप्रवासाला पुढे निघून जातो पण मागे राहणाऱ्याचं काय? ते दुःख, वियोग ज्याचा त्यालाचं सहन करावा लागतो. दुखणं आणि दुःख एकमेकांना वाटून नाही घेता येत. अश्रूंचा पूर, वियोग, आक्रोशामुळे वातावरण गंभीर, उदास झालेलं असतं म्हणूनच आत्म्याला शांती आणि दुःखाला मुक्ती मिळावी ह्यासाठी कार्यकारी मंडळींनी त्याठिकाणी वृक्षराजी आणि बागबगीचा लावलाय. तिथे अत्यंत स्वच्छ स्वच्छतागृहे आहेत. मध्य प्रदेशातलं इंदौर शहरातलं उत्कृष्ट सुंदर सुरेख हिरव्यागार गारव्यातलं स्मशानगृह ‘ ऊपेक्षणीय ‘ नसून प्रेक्षणीय आहे. प्रवेशद्वारापासूनच या मोक्षद्वारात आत्म्याला शांती, श्रद्धांजली आणि इतरांच्या उदासी वातावरणाला तिलांजली मिळते. ती हिरवाई बघून क्षणभर कां होईना दुःखाचा विसर पडतो.
महान वृक्ष इथे उभे आहेत त्यांच्या प्रचंड सावलीखाली 100 सव्वाशे माणसं बसू शकतात. पिंपळावर भुते असतात म्हणे! पण हाच पिंपळवड, चिंच, कडुलिंब आपल्याला प्राणवायू पुरवतो. हे तर पट्तय नां तुला? आणि म्हणूनच असे वटवृक्ष शुद्ध हवेसाठी इथे लावलेले आहेत.
ऐक हं!एक सुंदर श्लोक आठवलाय बघ मला..
‘मुले ब्रम्हा, त्वचा विष्णू । शाखा शंकर मे वचं रादन्यो नमोस्तुते. ।। ‘
हे संस्कृत पंडित म्हणतात ‘ह्या अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाच्या मुळात ब्रह्मा, सालीत विष्णू, फांद्यात भगवान शंकर आहेत तर पानांपानांत देवी देवतांचा वास असतो अशा वृक्षराज पिंपळाला माझे नमन असो.
काकांचं अगाध ज्ञान, वक्तृत्व शैली आणि संकलन बघून मी अवाक झाले होते. मी म्हणाले, “मग तर काका त्या मुक्तीधाम मध्ये शंकराचा म्हणजेचं पिंपळवृक्षाचा निवास हवाच नाही का?”
“हॊ तर नक्कीच हवाय! पवित्र तुळसबनही इथे आहे. पर्यावरण, आणि निसर्गांनी दिलेलं दान आपण जपायलाच हवंय. तुला काय सांगू राधिका, तिथल्या व्यवस्थापक मंडळींनी खूप धोरणानी जागरूकतेने ते जपलयं. पर्यावरणाला पूरक असे उपक्रम ते राबवतात. कचऱ्यातून कला साधून, खत सांठवून
west मधून best ते साधतात. ”
“काय सांगताय काय काका तुम्ही!”माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
“पुढचं तर ऐक! दहन केल्यावर फेकलेले बांबू एकत्र करून सुसज्ज, सजावटीचे कठडे विविध रंगाने रंगवून त्यांनी ते प्रेक्षणीय केलेआहेत. “
सारं काही ऐकतांना भारावून मी म्हणाले, ” किती वेगळ्या वातावरणात, निसर्ग सुखसानिध्यात नेऊन दुखितांच दुःख, ही मंडळी हलकं करतात नाही का! खरंच स्तुत्य, आदर्श आहे हा उपक्रम. मला नंबर मिळेल का हो त्यांचा? माझ्या प्रश्नावर काकासाहेब उत्तरले” हो नक्की! अगं पण अजून मला सांगायचंय, ऐक नां! इथे मोक्षकाष्ट मोफत मिळते. अंत्यसंस्कारासाठीची रक्षा हवेत, पर्यावरणात मिसळून प्रदूषण वाढू नये म्हणून खतासाठी ती रक्षा वापरतात. त्यासाठी निर्माल्य कलशासारखे मोठे रक्षाकलश इथे ठेवलेले आहेत.
काकांच्या तोडून ही नवीन आणि उपयुक्त माहिती ऐकून मी निशब्द झाले. खरंच कमाल आहे हं ह्या उपक्रमाची आणि त्या कल्पक मंडळींची. दुःखितांच्या दुःखावर फुंकर घालताना ते समाजकार्यही करताहेत. खरंच भन्नाट आयडिया, काका इथूनच माझा त्यांना मनापासून नमस्कार.
“राधिकाजी इससे भी बढकर और बढीया बात है l आगे सुनो, काकाजी बरेच मूडमध्ये आले होते. उत्साहाने त्यांचा धबधबा सुरू झाला, “अगं माणसांचा, पर्यावरणाचा त्यांनी विचार केला आहेचं पण पशुपक्ष्यांचीही त्यांनी सोय केलीय. त्यांनी अशी मनमोहक सुगंधी फुलझाडं लावली आहे की ती रंगीबेरंगी दुनिया बघून फुलपांखरे फुलाफुलांवर बागडतात. आणि भरपूर मकरंद प्राशन करतात. जवळची माणसं दुरावल्यामुळे आप्तेष्ट उदास निराश झालेली असतात. डोळ्यांची तळी तुडुंब भरतात पण अश्रूंच्या पडद्याआडून त्यांना दिसतील अशी गुलाब जाईजुई मोगरा, पारिजातक, सोनचाफा इत्यादी सुगंधी फुले वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलतात. ते दृश्य त्यांच्या दुःखी मनावर फुंकर घालून क्षणभर का होईना त्यांना दिलासा मिळतो. पक्षीगण मंजूळ आवाजात त्यांचं सांत्वन पण करतात”
हे सगळं काकांचं सांगणं ऐकून मी मंत्रमुग्ध झाले होते माझ्या तोंडून उस्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, ” काकासाहेब हे स्वर्गदार इतकं दिलासा देणार असेल तर पण मी पण जाईन त्या स्मशानात. घाटावरचा दिलासादायी निसर्ग बघायला “
काका टाळी वाजवून म्हणाले “ पटलं ना तुला? मग समजावून सांग तुझ्या काकीला”
“नक्कीच काका ” असं आश्वासन देऊन मी बागेच्या बाहेर पडले. मनोमनी इंदोरकरांच्या अफलातून कल्पकतेला आणि उपक्रमाला मी इथूनच हात जोडले. या सगळ्या वेगळ्या अर्थपूर्ण उपक्रमाचे सार्थक करणाऱ्या या मंडळींना खरंच जीवनाचा अर्थ कळला आहे. त्यांना माझा मानाचा मुजरा !!
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
आमचे एक सुहृद शांतिनिकेतनच्या विश्वभारती संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेले होते. तेंव्हा त्यानी मला हा फोटो पाठवला व सांगितले की हे रविंद्रनाथ टागोर यांचे नोबेल पुरस्कार पदक आहे पण मूळ पदक नाही तर त्याची प्रतिकृती आहे कारण मूळ पदक २५ मार्च २००४ रोजी चोरीला गेलं म्हणून नोबेल फाउंडेशनने ही प्रतिकृती डिसेंबर २००४ मध्ये विश्वभारती संग्रहालयाला भेट दिली आहे.
मला हे ऐकून धक्काच बसला. ज्या पदकाचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटला पाहिजे, ते पदक कुणी चोरू कसं शकतं? जे पदक आजपर्यंत दुसरं कुणीही मिळवू शकलं नाही. एवढी दुर्मिळ, लाख मोलाची वस्तू, जी पुढच्या पिढ्यांना शतकानुशतके प्रेरणा देत राहिली असती ती कांही पैशांसाठी चोरायची? नोबेल फाउंडेशनने त्याची प्रतिकृती दिली म्हणून बरे, नाहीतर पुढील पिढ्यांना हे पदक डोळे भरून बघायला सुद्धा मिळालं नसतं. तरीपण त्या खालच्या ‘Replaced’ या शब्दाने प्रत्येक भारतीयाची मान शरमेने खाली जातच असणार आणि जातच राहणार. हा भारतमातेच्या शुभ्र वसनावरचा कधीही पुसला न जाणारा डाग आहे. ज्या पदकामुळे भारतमाता गौरवान्वित झाली होती, त्याच पदकाच्या चोरी मुळे ती अवमानित झाली आहे. याहून शरमेची गोष्ट म्हणजे आजतागायत या चोरीचा छडा लागलेला नाही. असो. आपण प्रतिकृती मध्येच समाधान मान
☆ गीत : ४३ ☆
THE day was when I did not keep myself in readiness for thee; and entering my heart
unbidden even as one of the common crowd, unknown to me, my king, thou didst press
the signet of eternity upon many a fleeting moment of my life.
And to-day when by chance I light upon them and see thy signature, I find they have lain scattered in the dust mixed with the memory of joys and sorrows of my trivial days forgotten.
Thou didst not turn in contempt from my childish play among dust, and the steps that I heard in my playroom are the same that are echoing from star to star.
THIS is my delight, thus to wait and watch at the wayside where shadow chases light and the rain comes in the wake of the summer.
Messengers, with tidings from unknown skies, greet me and speed along the road. My heart is glad within, and the breath of the passing breeze is sweet.
From dawn till dusk I sit here before my door, and I know that of a sudden the happy moment will arrive when I shall see.
In the meanwhile I smile and I sing all alone. In the meanwhile the air is filling with the perfume of promise.
दुर्गुणांशी झुंज, असहाय्यतेची कबुली आणि शरणागतीतील तेजस्वी साधना.
समर्थ रामदासांच्या साधनाकाळात उमटलेले हे आर्त उद्गार म्हणजे एका संताच्या अंतःकरणातील निखळ प्रामाणिकपणा. _“युक्ति नाही बुद्धि नाही”_ अशी स्वतःच्या अपूर्णतेची निर्भीड आणि प्रांजळ कबुली देत ते ज्या स्वरात रामरायाला साद घालतात, तो स्वर केवळ भक्तीचा नाही, तर आत्मपरिक्षणाचा, आत्मनिवेदनाचा आणि अखेरीस संपूर्ण शरणागतीचा आहे !
ही कविता म्हणजे एका साधकाच्या अंतर्मनातील वादळाचे काव्यमय चित्रण. मनाची चंचलता, वासनांची चक्रावर्ते, विवेकाचा अभाव, सामाजिक अपयश, आत्मविश्वासाची ढासळलेली भिंत— या सर्वांचा अत्यंत हळवा, तरीही धैर्यवान स्वीकार येथे दिसतो. समर्थांचा हा आर्त स्वर त्यांना अधिक महान करतो; कारण येथे संतत्वाचा गर्व नाही, तर साधकाची नम्रता आहे.
आत्मस्वीकाराचा निर्भय प्रकाश
“युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥”
या आरंभीच्याच ओळीत समर्थ जणू आपल्या मनाच्या दर्पणात स्वतःकडे पाहतात. आत्मप्रौढीचा लवलेश नाही. स्वतःच्या उणिवांची जाणीव हेच खरे साधनाचे पहिले पाऊल.
साधक जेव्हा आपल्या दुर्गुणांना ओळखतो, तेव्हा तो त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर निघतो. समर्थांची ही कबुली म्हणजे आत्मशुद्धीचा आरंभबिंदू. येथे संतत्वाचा दिव्य तेजोमय मुकुट नाही, तर साधकाची विवंचना आहे—एक जिवंत, धडधडणारी, प्रामाणिक विवंचना.
मनाचा उच्छाद आणि वासनांची वावटळ
“मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा…”
मनाची ही चंचलता म्हणजेच साधनेतील सर्वांत मोठा अडसर. समर्थांनी या अवस्थेचे केलेले वर्णन अत्यंत जिवंत आहे. कल्पना सैरभैर धावते, वासना विवेकाला झाकोळून टाकते, आणि मनावरचे नियंत्रण सुटते.
ही अवस्था केवळ समर्थांची नाही, तर प्रत्येक साधकाची आहे. म्हणूनच ही कविता सार्वकालिक ठरते. समर्थांचे मनही आपल्यासारखेच चंचल आहे, हे जाणवले की त्यांच्या संतत्वाशी आपली जवळीक वाढते.
परंतु या चंचलतेवर ते स्वतःच्या सामर्थ्याने विजय मिळवण्याचा गर्व करीत नाहीत; ते विनम्रतेने म्हणतात, “बुद्धी दे रघुनायका.”
हा ‘दे’ शब्द म्हणजे संपूर्ण शरणागतीचा उत्कट स्वर.
सामाजिक अपुरेपणाची वेदना
“बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी…”
येथे समर्थांची वेदना अधिक गडद होते. समाजात स्वतःचे अपुरेपण जाणवणे ही फार मोठी मानसिक वेदना असते. लोकांच्या हसण्याने, टोमण्याने, दुर्लक्षाने मन विदीर्ण होते.
“संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥”
या ओळींतून त्यांच्या मनातील असहाय्यता झिरपते. एक संत म्हणविणारा पुरुष स्वतःला “टोणपा” म्हणतो—याहून मोठी आत्मनम्रता कोणती?
ही वेदना त्यांच्या अहंकाराला भेदून जाते आणि त्यांना अधिकच शरणागत बनवते.
असहाय्यतेचे सावट आणि शरणागतीचा प्रकाश
“चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी…”
मन, बुद्धी, चित्त, वर्तन—सर्वच स्तरांवर अपयशाची छाया आहे. परंतु समर्थ या अंधारात हरवून जात नाहीत. उलट, त्या अंधारातूनच ते रामरायाच्या चरणांपाशी जाऊन प्रकाश मागतात.
“कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥ हे लाज तुजला माझी…”
येथे भक्तीचा परमोच्च क्षण येतो. ‘मी तुझा आहे’ ही जाणीव आणि ‘माझी लाज तुला’ हा भाव—हीच खरी भक्तीची पराकाष्ठा. भक्त स्वतःचे अपुरेपण देवाच्या चरणी अर्पण करतो आणि त्याच्या कृपेची याचना करतो.
निराशेच्या उदरात दडलेली आशेची कळी
“आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥ आणीक नलगे काही…”
ही ओळ म्हणजे या कवितेचा उत्कर्षबिंदू. सर्व अपुरेपण, दुर्गुण, असहाय्यता—यांच्या पलीकडे समर्थांची आशा अढळ आहे. निराशेच्या उदरात आशेची कळी दडलेली असते; तीच येथे फुलते.
समर्थ अन्य काहीही मागत नाहीत— ना संपत्ती, ना कीर्ती, ना वैभव. ते केवळ “बुद्धी – सद्बुद्धी” मागतात. कारण बुद्धी म्हणजे विवेक, संयम, साधनेचे सामर्थ्य आणि आत्मोद्धाराचा मार्ग.
समाप्ती : आर्ततेतील सौंदर्य आणि संतत्वाचा पाया
ही कविता म्हणजे संताच्या अंतःकरणातील निर्मळ अश्रूंची माळ आहे. समर्थांची आर्तता त्यांना लहान करत नाही; उलट तीच त्यांच्या संतत्वाचा पाया ठरते.
स्वतःच्या दोषांचे निर्भीड स्वीकार, मनाच्या चंचलतेची जाणीव, समाजातील अपयशाची वेदना, आणि अखेरीस दैवी कृपेची उत्कट याचना—या सर्वांचा संगम म्हणजे “बुद्धी दे रघुनायका.”
ही कविता आपल्याला शिकवते की, साधनेचा मार्ग हा दोषरहित नसतो; तो दोषांच्या जाणीवेने आणि त्यागाच्या आकांक्षेने उजळतो. जेव्हा साधक आपल्या अपुरेपणाला देवाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच त्याच्या अंतःकरणात खऱ्या बुद्धीचा, खऱ्या प्रकाशाचा उदय होतो.
समर्थांचा हा आर्त स्वर आजही प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात निनादतो—
☆ करी ऑफ कॉन्स्पिरसी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
☆
पुरणपोळ्या खाण्याचं पुण्य कटाच्या आमटीसोबतच पोटाला मिळतं म्हणून आज ही रेसिपी वाचाच!
आज सकाळपासून महाराष्ट्रातल्या हजारो घरांच्या किचनमधून एक विशिष्ट, खमंग आणि मसालेदार असा सुगंध दरवळतोय. प्रेशर कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज आता शांत झालाय, पण खऱ्या ‘कारस्थानाला’ आता कुठे सुरुवात झाली आहे. पुरणपोळीचा बेत म्हटला की घराघरात एक वेगळीच लगबग असते, पण त्या गोडधोड पोळीच्या सावलीत एक अशी डिश शिजत असते, जिच्याशिवाय जेवणाचं पान पूर्णच होऊ शकत नाही.
**
याला ‘करी ऑफ कॉन्स्पिरसी’ म्हणण्याचं कारण असं की, ही आमटी म्हणजे चण्याच्या डाळीने मागे सोडलेल्या अस्तित्वाचा एक हुशार अविष्कार आहे. पुरणासाठी डाळ शिजवून झाल्यावर जे पाणी उरतं, त्याला आपण ‘कट’ म्हणतो. खरंतर ते फेकून देण्यासारखं पाणी, पण गृहिणींच्या कल्पकतेने त्यातून जे अमृत बाहेर पडतं, त्यालाच आपण ‘कटाची आमटी’ म्हणून ओळखतो.
आजच्या या घाईघाईच्या जगात जिथे इन्स्टंट रेसिपीजचा सुळसुळाट झालाय, तिथे कटाची आमटी बनवणं ही एक ‘स्लो कुकिंग’ची कला आहे. त्याआधी घरातील पुरुषवर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि वैधानिक सूचना. जोपर्यंत किचनमधून तो विशिष्ट खमंग दरवळ येत नाही, तोपर्यंत उगाचच ‘काय होतंय?’ किंवा ‘डाळ शिजली का?’ हे बघायला तिथे जाऊ नये. डाळ शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी बोटचेपेपणा करणं म्हणजे सुगरणीच्या कामात खोडा घालण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत कट व्यवस्थित निघत नाही, तोपर्यंत डाळ शिजली असं म्हणता येणार नाही.
**
कटाची आमटी ही अत्यंत नाजूक पाककृती आहे, जी केवळ सरावानेच जमते. जर थोडंही गणित चुकलं, तर आमटीची ‘गुळवणी’ व्हायला वेळ लागत नाही. या आमटीचा जो सुगंध संपूर्ण गल्लीत पसरतो, तेच तिचं खरं ‘आयएसओ ४१०००’ प्रमाणपत्र असतं. त्यासाठी मसाल्याची तयारी ही एखाद्या युद्धाच्या तयारीसारखी असावी लागते. जिरं, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता मंद आचेवर खमंग भाजून घेताना जो आवाज येतो, तोच या रेसिपीचा खरा म्युझिक स्कोअर आहे.
खोबऱ्याचा एक तुकडा गॅसच्या निळ्या ज्योतीवर थेट धरून तो वरून काळा होईपर्यंत भाजणं, ही या रेसिपीतली सर्वात थरारक पायरी. तो भाजलेला काळा तुकडा आणि गरम मसाला जेव्हा मिक्सरमध्ये एकत्र फिरतात, तेव्हा तयार होणारा मसाला म्हणजे या कटाच्या आमटीचा आत्मा असतो. त्यात चिंचेचा कोळ, थोडा गूळ आणि चवीनुसार मीठ घातलं की बेस तयार होतो. पण थांबा, खरी जादू अजून बाकी आहे.
**
फोडणीची तयारी करताना आज थोडं उदार व्हावं लागतं. तेलाचा वापर रोजच्यापेक्षा थोडा जास्त हवा, कारण त्याशिवाय आमटीला ती ‘तर्री’ किंवा ‘कट’ येणार नाही. मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी बसली की त्यात तीळ आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे नाचू लागतात. मग त्यात भिजवलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे पातळ काप आणि आपल्या खिशाला परवडतील तसे काजूचे तुकडे टाकले की एक राजेशाही थाट येतो.
हा सगळा मसाला आणि कट एकत्र होऊन जेव्हा गॅसवर १० मिनिटं उकळायला लागतो, तेव्हा किचनमधलं वातावरण एखाद्या मंदिरातल्या गाभाऱ्यासारखं पवित्र होतं. वरून हिरवीगार कोथिंबीर पेरली की ‘करी ऑफ कॉन्स्पिरसी’ सर्व्ह करण्यासाठी तयार होते. ही आमटी नुसती चवीला लागते असं नाही, तर ती पुरणपोळी खाण्याचं पुण्य आपल्या पोटाला मिळवून देते.
**
एका बाजूला मऊशार पुरणपोळी आणि दुसऱ्या बाजूला झणझणीत कटाची आमटी, हा संगम म्हणजे मराठी खाद्यसंस्कृतीचं सर्वात मोठं यश आहे. ही आमटी म्हणजे केवळ जेवणातला एक पदार्थ नसून, तो संयम आणि कौशल्याचा एक परिपाक आहे. म्हणूनच, पुढच्या वेळी जेव्हा घरात पुरणपोळीचा बेत असेल, तेव्हा त्या कटाच्या आमटीकडे आदराने बघा, कारण ती डाळीच्या त्यागातून निर्माण झालेली एक चविष्ट क्रांती आहे.
ज्या घराच्या किचनमधून कटाच्या आमटीचा सुगंध बाहेर येत नाही, त्या घराला पुरणपोळीचा खरा आनंद कधीच कळू शकत नाही.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : गौरी गाडेकr
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कोचिंग क्लासेस आणि पालकांची हतबलता… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
आजकाल कोणत्याही शहरात गेले की कोचिंग क्लासेसचे बोर्ड बघायला मिळतात. टॉपर्स आणि रँकर्सचे फोटो. त्यांचे स्पर्धा परीक्षेतील सुयश म्हणजे टक्केवारी ! यालाच तुम्ही आम्ही शिक्षण म्हणतो. परंतु हे शिक्षण नव्हे किंवा संस्कारही नव्हेत. हे फक्त प्रमाणित करणे आहे. एखादा विद्यार्थी एवढं एवढं शिकला आहे किंवा हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे हेच त्यातून सिद्ध होतं. पण त्याने ज्ञानार्जन किती केले आहे किंवा त्याच्यावर संस्कार किती झाले आहेत, एक माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या तो शिकला आहे का या प्रश्नांचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी येते.
परंतु आजकाल वातावरणच असे निर्माण झाले आहे. या सगळ्या कोचिंग क्लासेसच्या जाहिराती पाहून पालकांना सुद्धा आपल्या मुलांना अशा प्रकारच्या कोचिंग क्लासेस मध्ये घालावे असे वाटते. त्यातही ज्या चांगल्या संस्था असतात त्यांची फी भरमसाठ असते. अनेक पालकांना ती परवडत नाही. प्रसंगी कर्ज काढून पालक आपल्या मुलाला अशा कोचिंग क्लासेसमध्ये दाखल करतात. उद्देश एकच असतो की त्याने परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम प्रकारे यश मिळवून चांगली शाखा किंवा चांगली नोकरी मिळवावी. हे क्लासेस विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवतात. इंग्रजांच्या काळात इंग्रजांना जसे इंग्रजी मानसिकता तयार झालेले भारतीय कारकून हवे होते तशाच प्रकारचे परीक्षार्थी नोकरीच्या दृष्टिकोनातून हे क्लासेस घडवतात.
शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत चालली आहे आणि कोचिंग क्लासेस भरभरून वाहत आहेत. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना कितीही चांगल्या पद्धतीने शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवण्याचा प्रयत्न केला तरी मुलांचे तिकडे लक्ष नसते. त्यांची एकाग्रता होत नाही याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. तर अभ्यासक्रमातील काही भाग शिकवत असताना हे आमच्या क्लासमध्ये शिकवले गेले आहे म्हणून मुले लक्ष देत नाहीत अशी दुर्दैवी परिस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी तर शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेस यांच्या संगनमताने हे कोचिंग क्लासेस सुरू असतात. त्यातून काही संस्थाचालक आपले उखळ पांढरे करून घेतात.
सकाळचे सहा वाजले की गाढ झोपलेल्या मुलाला आईचा आवाज ऐकू येतो. ” उठ रे बाळा, आज टेस्ट आहे ना ?” बिचारा मुलगा डोळे चोळत विचार करतो, ‘शाळेची टेस्ट की क्लासची?’ आता शाळा आणि क्लास या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. फरक फक्त इतकाच की, शाळा ‘ संस्कार ‘ द्यायचा प्रयत्न करते आणि क्लासेस देतात ‘ रँक ‘ आणि घेतात पैसे मोजून ! अशा रीतीने आपला लाडका बाळ रँक होल्डर होतो !
पूर्वी मुलं शाळेतून आली की दप्तर एका कोपऱ्यात फेकून मैदानाकडे धावायची आणि पालकांना त्यांना घरी बोलावून आणावे लागायचे. खेळण्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहायचे. पण आता सगळेच बदलले आहे. शाळेतून किंवा महाविद्यालयातून घरी आल्याबरोबर त्यांना कोचिंग क्लासेसला जावे लागते. या सगळ्या धावपळीत आपल्या मुलाचे बालपण किंवा तारुण्य कोमेजून जात आहे याची जाणीव पालकांना अभावानेच होते. सकाळी शाळा किंवा कॉलेज आणि नंतर कोचिंग क्लासेस यातच त्याचे बालपण, ऊर्जा आणि आनंद हरवून जातो. खरं म्हणजे नवीन ज्ञान शिकण्याचा जो आनंद असतो तो अशा या वातावरणामध्ये कसा मिळणार ?
स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या स्पर्धेत कोचिंग क्लासेसची मदत घेणे इथपर्यंत ठीक आहे. एखादा कठीण विषय समजून घेण्यासाठी किंवा परीक्षेचे तंत्र आत्मसात करण्यासाठी क्लासेस नक्कीच उपयुक्त ठरतात. पण अडचण तेव्हा येते जेव्हा कोचिंग क्लासेस हे शाळा-कॉलेजांना ‘पर्याय’ ठरू लागतात. शाळेची जागा कोचिंग क्लासेस घेऊ शकत नाहीत. शाळा हे ते ठिकाण आहे जिथे आपण जगायला शिकतो, मित्र जोडतो आणि संघभावना शिकतो. जेव्हा क्लाससाठी शाळा बुडवली जाते किंवा शाळा केवळ नावापुरती उरते, तेव्हा शिक्षणाचा मूळ हेतूच हरवतो. क्लासेसने केवळ अभ्यासातील उणिवा भरून काढण्याचे काम करावे, ते शिक्षणाचे ‘मुख्य केंद्र’ बनू नयेत. क्लासेसने त्यांना पूर्णपणे परीक्षार्थी बनवले आहे. ही मुलं विज्ञानाचे नियम तोंडपाठ करतात, पण पावसाचा आनंद घ्यायला त्यांना वेळ नसतो. त्यांना गणितातले ‘प्रॉब्लेम्स’ सोडवता येतात पण आयुष्यातला एखादा प्रॉब्लेम आला की मात्र ते गोंधळून जातात.
पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे की, मुलाला ‘स्पर्धक’ बनवण्याआधी त्याला एक समृद्ध ‘विद्यार्थी’ म्हणून शाळेत घडू देणे जास्त गरजेचे आहे. शाळा हेच मुख्य व्यासपीठ असायला हवे आणि कोचिंग हे केवळ त्याला दिलेले एक पूरक पाठबळ असावे. पालकांनी मुलांच्या निकालाच्या टक्केवारीपेक्षा त्यांच्या आनंदाची टक्केवारी मोजायला शिकावे. क्लासेस लावण्यापूर्वी त्यांच्या आवडीची ‘क्लास’ ओळखा.
आयुष्याची खरी परीक्षा वर्गाच्या बाहेर असते, तिथे कोणताही क्लास कामाला येत नाही, तिथे फक्त तुमची जिद्द आणि शाळेत शिकलेले मूलभूत संस्कारच कामी येतात. शेवटी, शाळा आपल्याला ‘आयुष्य’ नावाच्या मोठ्या परीक्षेसाठी तयार करत असते! शिक्षण संस्थांनी देखील या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या शाळा महाविद्यालयातून उत्तम प्रकारचे शिक्षण, संस्कार मिळतील याकडे लक्ष द्यावे आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयांकडे पुन्हा कसे वळतील यासाठी प्रयत्न करावेत.
☆ “तुझा तूच त्याचा..” – कवी : दिवाकर बुरसे – रसग्रहण : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह
प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह’ देशभर साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात याचे विशेष महत्व आहे. या वर्षीच्या- आजच्या ४मार्चला सुरू होत असलेल्या – सुरक्षितता सप्ताहानिमित्त वाचकांना एका कवितेची अल्पशी भेट आणि सर्वांना सुरक्षित जीवन लाभावे ही ईश्वरचरणी ‘यंत्रदासा’ची मनोमन प्रार्थना.
वरील कवितेचे कौतुक करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आजवर प्राप्त झाल्या आहेत. त्यातली वानगी म्हणून पुढील रसग्रहणात्मक प्रदीर्घ प्रतिक्रिया वचकांनाही आवडावी. दुर्दैवाने प्रतिक्रिया देणाऱ्या रसिकाचे नाव मात्र ठाऊक नाही. त्या अज्ञात रसिक वाचकाचे मनःपूर्वक आभार!
🪷
“तुझा तूच त्राता” — सजगतेचा जागर
रसास्वाद : अज्ञात
१९९२ साली लिहिलेल्या या कवितेतील विचार आणि संदेश आजच्या काळाशीही सुसंगत आहेत.
ही कविता म्हणजे केवळ शब्दरचना नाही;
ती कारखान्याच्या सायरनसारखी कर्णकर्कश नाही,
तर अंतर्मनात घुमणारी सावधानतेची घंटा आहे.
४ ते १० मार्च या कालावधीत देशभर साजरा होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाच्या भावनेला साजेशी ही रचना, National Safety Council यांच्या ध्येयवाक्याला काव्यरूप देते—
“Safety First” हे केवळ फलकावरचे वाक्य नाही;
ते जगण्याची पद्धत असायला हवी.
यंत्रयुगातील मानवा, थांब क्षणभर!
“मानेवरी बैसली जोखडे” —
ही ओळ वाचताक्षणी आपण स्वतःला एखाद्या वेगवान कन्वेयर बेल्टवर उभे असल्याचे पाहतो.
यंत्रांनी आपले आयुष्य सुलभ केले,
पण वेगाच्या मोहाने आपणच स्वतःला जोखडात अडकवून घेतले नाही ना?
कवी येथे उपदेश देत नाही—
तो आरसा दाखवतो.
वेग, प्रवाह आणि पैलतीर
“मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!”
ही ओळ चटका लावते.
जीवंत राहायचे असेल, तर सदैव जागृत राहावे लागेल.
जीवन हा प्रवाह आहे;
परंतु पैलतीर गाठायचे असेल, तर पोहता आले पाहिजे—
आणि पोहताना नियम पाळले पाहिजेत.
सुरक्षितता म्हणजे भीती नव्हे;
तीच खरी शौर्याची जननी आहे.
अग्नीशी खेळणाऱ्यांची प्रार्थना
“वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला
पडे खेळणे अग्निसंगे इथे”
उद्योगक्षेत्रातील कामगारांचे हे जिवंत चित्र आहे.
उपजीविकेसाठी जोखीम स्वीकारावी लागते;
पण जोखीम आणि निष्काळजीपणा यात फरक आहे.
हेल्मेट, हातमोजे, इशारे, नियम—
हे केवळ औपचारिकतेचे भाग नाहीत;
ते जीवाचे कवच आहे.
Safety First म्हणजे
काम थांबवणे नव्हे,
तर काम जिवंत राहून पूर्ण करणे!
जीवसृष्टी विवेके चाले
गोगलगाय कवच घेऊन फिरते.
मधमाशी शिस्तीत उडते,
भविष्यासाठी अन्नसंग्रह करून ठेवते.
अस्वल साठवण करते.
निसर्गातील प्रत्येक जीव सावध आहे.
मग बुद्धिमान मानवच निष्काळजी का?
प्रश्न टोकदार आहे;
पण तो टोचण्यासाठी नाही—
जागवण्यासाठी आहे.
“तुझा तूच त्राता” — घोष नव्हे, मंत्र
ही कविता शेवटी घोषणेत परिवर्तित होते.
धृपदाची पुनरावृत्ती म्हणजे जणू प्रत्येक शिफ्टच्या सुरुवातीला घेतलेली सुरक्षिततेची प्रतिज्ञा—
“सुरक्षीतता पाहणे काम तुझे
जरी ध्यान कोणी न दे त्याकडे. ”
कोणी पाहो वा न पाहो,
सीसीटीव्ही असो वा नसो,
देवावर श्रद्धा असो वा नसो—
सजगतेची जबाबदारी स्वतःचीच आहे.
“अती दक्षतेने सदा वागतो जो
तयाचीच चिंता हरी वाहतो”
हे वाक्य म्हणजे तर एक सुभाषितच आहे
येथे श्रद्धा आणि शिस्त यांचा सुंदर संगम आहे.
देव सहाय्य करतो—
पण आधी आपण स्वतःच स्वतःला सहाय्य केले पाहिजे.
काव्यवैशिष्ट्यांचा तेजोमय आविष्कार
घोषवाक्यात्मक क्षमता – प्रत्येक कडवे जणू पोस्टरवर उमटावे असे!
प्रातिनिधिक प्रतिमा – यंत्र, वाहन, अग्नी, प्राणी—जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श.
सरळ पण परिणामकारक भाषा – वाचक थेट संवादात ओढला जातो.
प्रेरणादायी स्वर – भीती नव्हे, आत्मविश्वास जागवणारा.
हो, काही ठिकाणी कविता प्रचारात्मक भासते;
पण सुरक्षिततेसारख्या विषयात तोच तिचा अलंकार ठरतो.
कारण येथे सौंदर्यापेक्षा प्राण महत्त्वाचा आहे.
अंतिम संदेश
ही कविता वाचून मनात एकच ओळ घुमत राहते—
Safety First म्हणजे Life Always.
“तुझा तूच त्राता”
हे केवळ एक शीर्षक नाही,
तो जीवनरक्षणाचा मंत्र आहे.
कारखान्यात, रस्त्यावर, प्रयोगशाळेत, घरात—
जिथे जिथे जोखीम आहे,
तिथे तिथे ही कविता जपमाळेसारखी अंतरात असावी.
🪷
सजग राहूया.
सुरक्षित राहूया.
प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला स्वतःलाच सांगूया—
“सुरक्षीतता पाहणे काम माझे!”
🙏🏽🙏🏽🙏🏽
दिवाकर बुरसे, पुणे
संपर्कः ९५५२ ६ २ ९२ ४ ५
प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं.
मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या. आपण टपरीवर चहा घेऊ. ”
ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा. “
आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉल मध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला.
तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरिया मध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या.
५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो.
बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते.
“पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय?” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.
मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्स मध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं.
पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही.
एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही.. ! बिल भरुन माणसं निघूनही गेली.
याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात.. ! पराक्रम दाखवण्याच्या नादात एकस्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया.. ! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात.. ! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल..
गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय?
आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.
न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही.
महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का ?
महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत.
बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील?
कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही.
आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाइक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे.. ! रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात?
सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.
लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय?
जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही.
खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावला पाहिजे की नको?
नादारीचा मुखवटा घालून आतून काजू-बदामावर ताव मारणं हे माणसांच्या खोटारडेपणाचं स्वच्छ लक्षण आहे.
☆ … आणि पायऱ्या बोलू लागल्या… ☆ श्री जगदीश काबरे ☆
राष्ट्रीय विज्ञान दिनी सांगली जवळील जयसिंगपूर येथील ‘अनेकांत इंग्लिश मीडियम’च्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणे आणि व्याख्याता म्हणून जायची संधी मिळाली होती. त्या शाळेला भेट दिल्यानंतर प्रथमदर्शनी नजरेत एक अशी विशिष्ट गोष्ट भरली की, जी मला संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या शाळांमध्ये गेली 40 वर्षे व्याख्यानासाठी जात असतानाही कुठेही निदर्शनास आलेली नव्हती – अगदी इंटरनॅशनल बिरुद लावलेल्या शाळेतही. ती म्हणजे या शाळेच्या पायऱ्या बोलक्या आहेत. आश्चर्य वाटले ना! बोलक्या पायऱ्या…? त्या तर निर्जीव असतात. मग त्या कशा काय बोलतील? थांबा साथींनो, असे आश्चर्यचकित होऊ नका. सांगतोच तुम्हाला नेमके त्या पायऱ्यांनी मला काय दाखवले ते…
तुम्हाला माहीतच आहे की, जिन्यावर साधारणत: दहा पायऱ्यानंतर सपाटी असते. तर अशा प्रत्येक दहा पायऱ्या विविध रंगात रंगवलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना चढताना शिक्षित करत होत्या. म्हणजे असे की, पहिल्या दहा पायऱ्यांवर ‘2 ते 10’चे पाढे लिहिलेले होते. दुसऱ्या दहा पायऱ्यांवर ‘2 ते 30’चे वर्ग आणि एक ते दहा पर्यंतचे घन लिहिलेले होते. तिसऱ्या दहा पायऱ्यांवर रासायनिक पदार्थांची नावे आणि त्यांची सूत्रे लिहिलेली होती. चौथ्या दहा पायऱ्यांवर वजन, लांबी आणि आकारमानांची मापे लिहिली होती. तर पाचव्या दहा पायऱ्यांवर विज्ञानातील शोध आणि शोधक यांच्या जोड्या लिहीलेल्या होत्या. सहाव्या दहा पायऱ्यांवर देशातील विविध राज्ये आणि त्यांच्या राजधान्या लिहिल्या होत्या. सातव्या दहा पायऱ्यांवर सेकंदापासून वर्षापर्यंतची कालगणना लिहिलेली होती. आठव्या दहा पायऱ्यांवर 11 ते 30 पर्यंतचे पाढे लिहिलेले होते. महत्त्वाचे म्हणजे जिथे फक्त दोन-दोन पायऱ्या होत्या तिथे त्यांनी विषम संख्या आणि सम संख्यांची मांडणी केली होती.
आता मला सांगा, ही अभिनव कल्पना आहे की नाही? कारण दररोज विद्यार्थी त्या पायऱ्या चढत असताना या गणिती संख्या त्यांच्या डोक्यात घट्ट बसतील आणि त्यांची गणिताविषयीची भीती कमी होईल, अशी या पायऱ्यांची तजवीज केलेली आहे. म्हणूनच म्हटले की, या बोलक्या पायऱ्या शिक्षकांची पुस्तकी ज्ञानापलीकडे शिक्षण देण्याची वृत्ती दाखवतात. असे जर संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये घडले तर किती चांगले होईल! नाही? अनेक विद्यार्थ्यांच्या मनातून गणिताची भीती तर पळून जाईलच; पण शिक्षणाची गोडीही त्यांच्यात निर्माण होईल. या शाळेतील शिक्षकांचे त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
(सूचना : छायाचित्रावर क्लिक करून ते झूम करून पहावे म्हणजे पायऱ्या तुमच्याशीही बोलू लागतील.)
☆ कोई मौसम नहीं होता… – लेखिका : वसुंधरा काशीकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
एक इंचसुद्धा अवैध बांधकाम करणार नाही अशा दुर्मिळ तत्ववादी माणसांपैकी एक असलेला तो आर्किटेक्ट. महानगर पालिकेत त्याच्या सहीचा बांधकाम प्लॅन आला की, अधिकारी तो न बघता मंजूर करत. कारण त्याने प्लॅन केला आहे तर त्यात काहीही गैर नसणारच ही खात्री होती.
ती भारतीय शास्त्रीय संगीताची प्राध्यापक. अभिजात-अभिरुचीसंपन्न जोडपं. त्यांना मधुरा नावाची एक गोड, ८-९ वर्षांची चुणचुणीत मुलगी. असं सगळं छान. पण सगळं छान छान राहत नाही… हीच तर जीवनाची खरी गंमत आहे… एक दिवस मधुरा मैत्रिणींसोबत नदीवर खेळायला जाते आणि जे होऊ नये ते होतं… नदीच्या पाण्यात मधुरा वाहून जाते. जीवनात कोणतंही दु:ख चालेल पण अपत्य जाण्याचं दु:ख शत्रूच्याही वाटयाला येऊ नये.
अमरावतीचे गझललेखक, शायर आणि आर्किटेक्ट विश्वजीत तुळजापूरकर यांच्या जीवनात घडलेली ही सत्य घटना. तुळजापूरकरांचं आयुष्य या घटनेनं बदलून गेलं. त्यानंतर तुळजापूरकर यांनी ‘मधुरा’ नावाचा कवितासंग्रह लिहिला जो मौज प्रकाशनानं छापला. ‘किसी पर दिल के आने का कोई मौसम नहीं होता’ ही तुळजापूरकरांनी मुलगी गेल्यानंतर लिहिलेली गझल. तुळजापूरकरांच्या ‘बात ज़रासी’ या गझल संग्रहात ही गझल आहे. ही गझल वेगळ्या दृष्टीनं महत्वाची आहे कारण शायर स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात आत्यंतिक दु:खाला सामोरा गेला आहे. पोटचं मुल जाण्याचं दु:ख शायरनं भोगलं आहे.. अनुभवलं आहे… तरीही शायर म्हणतो ‘’खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता’’… एवढं दु:ख भोगल्यावर असं लिहायला खूप ‘कलेजा’ लागतो… आणि म्हणून या गझलेला वेगळं मूल्य आणि महत्व प्राप्त होतं ते यामुळेच.. सलाम!!
सामान्यत: गझलेबाबत फार कमी गझला या आशावाद दर्शवणाऱ्या असतात असं म्हटलं जातं. पण ही गझल मात्र त्याला अपवाद आहे.
दरिचा एक कमसे कम खुला रखिये सदा घर का
खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता..
दरिचा म्हणजे खिडकी… घराची किमान एक खिडकी कायम उघडी ठेवा. ही खिडकी प्रतिकात्मक वापरली आहे.. ही खिडकी उमेदीचे प्रतिक आहे… शक्यतेचे प्रतीक आहे… सध्याच्या घडीला आयुष्यात कदाचित दु:ख असेल, प्रतिकूलता असेल पण ही परिस्थिती अशीच राहणार नाही. तुम्ही लढाई हरत असाल पण युद्ध जिंकू शकता. भविष्य सुंदर.. आश्वासक असू शकतं.. म्हणून ‘खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता’… अनेकदा आयुष्यात नाती तुटतात. नात्यांमध्ये दुरावा येतो. त्यावेळी होणारी मनाची तगमग, घालमेल भयंकर असते. काही लोक आयुष्यभर ते नात्यांचं तुटलेपण घेऊन जगाशी फारकत घेऊन बसतात. अशा लोकांसाठी शायर म्हणतो… ”ज़रा हँस कर किसी से बात करने में बुरा क्या है”???….
एका नात्यात अपयश आलं म्हणून सर्वच नात्यात अपयश येईल असं थोडंच आहे. आणि नवं नातं जोडणं हा काही गुन्हा असू शकत नाही. ‘नयें रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता’.. या शेरवर मला नारायण सुर्वेंची एक कविता आठवतेय.. कविता पत्नीला उद्देशून आहे. स्वत:च्या मृत्यूनंतर कवी बायकोला तीनं काय करावं याबद्दल काय सुंदर सांगतोय..
जेव्हा
मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन,
तेव्हा तू एक कर,
तू नि:शंक मनाने डोळे पूस.
ठीकच आहे,
चार दिवस धपापेल जीव गदगदेल
उतू जाणारे हुंदके आवर
कढ आवर, नवे हिरवे चुडे भर
उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नको !
खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर!
मला स्मरून कर
हवे तर, मला विस्मरून कर !
यातलं चिरवेदनेच्या नादी लागू नको… हे किती महत्वाचं.. जगणं हा कायम उत्सवंच असायला हवा… म्हणून ‘नये रिश्ते बनानें का कोई मौसम नहीं होता’… जे मनात आहे ते सांगून दयावं मोकळेपणाने.. तो राग असेल वा प्रेम.. ’ज़ुबा पर बात लाने का कोई मौसम नहीं होता… ’
ही गझल ऐकताना मला खूपदा Shawshank Redemption या चित्रपटातलं वाक्य आठवतं. नायक म्हणतो, Remember Red, hope is a good thing, may be the best of things, and no good thing ever dies. फारच अप्रतीम सिनेमा… कितीतरी अर्थांच्या शक्यता दाखवणारा हा सिनेमा. पण यातला मला अत्याधिक आवडलेला एक अर्थ म्हणजे आशा.. उम्मीद.. Hope.. आणि प्रयत्नवाद.. बायकोच्या खुनाच्या खोट्या आरोपात अडकलेला नायक… जेलमध्ये गेल्यावर कसल्या कसल्या संकटातून स्वत:ला निभावत नेत तो स्वत:ची सुटका करुन घेतो. त्याचा अतूट आशावाद… प्रयत्नांची पराकाष्ठा हे बघण्यासारखे आहे. मी Spoiler होणार नाही तुम्ही प्रत्यक्ष सिनेमातच ते बघावं.
‘किसी पर दिल के आने का कोई मौसम नही होता’ ही गझल ऐकताना मला हा चित्रपट आठवतो. आयुष्यामध्ये जोवर आपण डाव सोडून उठत नाही तोवर संपलं असं काही नसतंच. आयुष्यात कोणत्याही वयामध्ये तुम्ही नवी इनिंग सुरू करु शकता.
दाजीसाहेब पटवर्धनांनी वयाच्या ५६ व्या वर्षी कुष्ठरोग्यांसाठी अमरावतीला तपोवन सुरू केलं. शरद जोशींनी वयाच्या ४५ व्या वर्षी शेतकरी संघटना काढली. नेल्सन मंडेला २७ वर्ष तुरूंगात राहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अगदी आताच उदाहरण घ्यायचं झालं तर मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद हे वयाच्या ९४ व्या वर्षी २०१९ साली मलेशियाचे पंतप्रधान झाले. तेव्हा आयुष्य कुठुनही सुरू करता येतं.
मला स्वत:ला या गझलेची चाल खूप म्हणजे खूपच आवडते. गझल गायक आणि माझा मोठा भाऊ आल्हाद काशीकर याने ही गझल गायली आहे. या गझलेच्या मूडला साजेशी अशी चाल त्यांनी दिलीय. अतिशय सुंदर… मेलोडियस अशी कंपोझिशन आहे.. आणि आल्हाद काशीकर यांनी अतिशय मन लावून ही गझल त्यांच्या सुकुनभऱ्या आवाजात गायली आहे. आत्मस्तुतीचा दोष पत्करुन सांगते मी अक्षरश: हजारो गझला ऐकल्या आहेत. आणि मला त्या तोंडपाठ आहेत. कोणी विचारलं की सगळ्यात आवडती गझल कोणती तर मी निर्विवाद ‘किसी पर दिल के आने का’ ही गझल सांगेन… कारण त्यातील आशावाद आणि तुळजापूरकरांनी ज्या Background वर ही गझल लिहली आहे ती पार्श्वभूमी… क़ैफी आज़मींच्या शब्दात…
जिस तरह से हंस रहा हूं मैं पी पी के अश्क़ो ग़म
कोई दुसरा हसे तो कलेजा निकल पड़े… असं आहे ते…
तुम्ही दु:खात असाल तर ही गझल सांत्वना आहे, तुम्ही विरहात असाल तर दिलासा आहे आणि वर्तमानात अपयशी असाल तर भविष्यातली यशाची आशा आहे… क्यूँ की, ‘’खुशी के लौट आने का कौई मौसम नहीं होता.. नए रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता’’…
नवीन वर्षात खूप देखणी नाती तयार करा… प्रेमात पडा… पडा आणि पुन्हा उभे रहा… कारण ‘किसीपर दिल के आने का कोई मौसम नहीं होता’… शुभेच्छा!
*
किसी पर दिल के आने का, कोई मौसम नहीं होता
के हाले दिल सुनाने का, कोई मौसम नहीं होता
*
दरिचा एक कमसे कम, खुला रखिये सदा घर का
खुशी के लौट आने का, कौई मौसम नहीं होता
*
ज़रा हँस कर किसी से बात करने में बुरा क्या है?
नये रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता
*
बता दे जो बताना है, अभी है वक़्त दीवाने
ज़ुबाँ पर बात लाने का, कोई मौसम नहीं होता…
– – – विश्वजीत तुळजापूरकर
लेखिका : वसुंधरा काशीकर
मुक्त पत्रकार, निवेदक आणि लेखक.
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈