मराठी साहित्य – विविधा ☆ टाॅलस्टाॅयच्या शोधात ☆ संग्राहक – श्री समीर गायकवाड

? विविधा ?

☆ टाॅलस्टाॅयच्या शोधात ☆ संग्राहक – श्री समीर गायकवाड ☆

(व्हाट्सएप्प वरून साभार)

सोशल मीडिया माणसाला खूप स्क्रोल करवतो

लोक नुसते भराभर मागे पुढे होत राहतात

एखाद्या चांगल्या वॉलवर, पोस्टवर थांबत नाहीत

पुढेपुढे जात राहतात

नुसते स्क्रोल होत राहतात

पुढे जाऊन याची सवय होते

 

सलग गाणं ऐकत नाहीत

एका कडव्यानंतर बदलतात

 

टीव्ही पाहत बसल्यावर अवघ्या काही मिनिटागणिक चॅनेल बदलत राहतात

 

पुस्तके वाचत नाहीत, वाचायला घेतलीच तर भराभर पाने पालटतात

 

फिरायला गेले तर एका जागी बसत नाहीत

 

सिनेमा नाटकास गेले तर दहाव्या मिनिटाला विचलित होतात

 

प्रवासात असले तर खिडकी बाहेरचं जग पाहत नाहीत

 

कुठे काही दिसलं जाणवलं तर डोळ्याने पाहत नाहीत हातातला मोबाईल काढून शूट करू लागतात !

 

लोक नुसते पुढे पुढे जात राहतात

बाजारात गेले तर दुकानामागून दुकाने पालथी घालतात

 

गप्पा मारताना सलग काही तास एका जागी बसू शकत नाहीत

 

एकत्रित सिलेब्रेशन करताना देखील पहिल्या तासानंतरच वेगवेगळे कोंडाळे करून बसतात

 

बातम्या पाहताना वाचताना कहर करतात नुसत्याच हेडलाईन्स पाहतात,

दृश्ये पटापट पुढे सरकावित यासाठी तिष्ठतात

 

खोलात जाऊन विचार करणं, स्वतःला प्रश्न विचारणं बंद केलंय  

मन कशातच लागत नाही, वागण्या बोलण्यातली सलगता हरवून बसतात

 

सिनेमे आठवड्यात बदलतात, गाणी दिवसाला बदलतात

आताच्या घडीला ट्रेंड कुठला आहे हे पाहण्याचा सोस बाळगतात

 

ट्रेंडप्रमाणे बोलतात, लिहितात, रडतात, हसतात, धावतात, थांबतात, श्रद्धांजली वाहतात, शुभेच्छा देतात

 

लोक नुसते बाहुले झालेत, नुसते धावताहेत

 

मी वाट पाहतोय टॉलस्टॉयच्या गोष्टीतल्या शेवटाची

जमिनीच्या हव्यासापोटी धावणाऱ्याच्या कोसळण्याची,

आहे तो आनंद गमावून बसल्याची जाणीव होण्याची !

 

माणसांच्या वागण्यात, विचारात, जीवनात, सामुदायिक वर्तनात जुने काहीच उरलेले नाही

माणसाचाच एक ट्रेंड झालाय

 

मी टॉलस्टॉयला शोधतोय.

तुम्हाला दिसला का तो ?

 

संग्राहक – श्री समीर गायकवाड

(व्हाट्सएप्प वरून साभार)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ प्राजक्त… ☆ सुश्री नीलाम्बरी शिर्के

सुश्री नीलाम्बरी शिर्के

? मनमंजुषेतून ?

प्राजक्त… ☆ सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆ 

माझ्या अंगणात आपसूक आले होते एक प्राजक्ताचे झाड. पहिल्यांदा मला त्याच्या पानाचा खरखरीतपणाच लक्षात आला. नंतर तो बोचूही लागला.  पण त्याचे औषधी गुण जाणल्याने मी ते सहन करू लागले.  हळुहळु  त्याला नाजुक फुलेही आली. वासही मंदमंद असा— मनाला चित्ताला प्रसन्नता देणारा. मी फुलांच्या सौंदर्य व सुगंधात गुंतले. नंतर लक्ष गेल तर झाडाची भली मोठी फांदी कुंपणापलीकडे वाढत जाऊन बहरलेली. रोज तिकडे फुलांचा सडा नजरेला दिसायचा.  गंधाचे झोत वारा इकडे तिकडे उधळायचा.  माझी फुले माझी, पण पलिकडची पखरणही माझ्याच मालकीहक्काची होती ना ? पण तक्रार  केली तर “ तुला कमी पडताहेत का फुलं ?मग गप्प  बस की “ असं  उत्तर  मिळालं  .या उत्तरातून मला शापच मिळाला जणू– माझ्याकडची फुलं मला प्रसन्न  करायला असफल होऊ लागली.—-आणि पलिकडची फुल अस्वस्थता देऊ लागली.  पलीकडे जाणारी फांदी तोडण्याचा अयशस्वी प्रयोगही केला ,कारण  ते माझ्या ताकदीबाहेरचं  काम हे माझ्या लक्षात आलं,  अन खरखरीत  पानं  जास्तच खरखरीत वाटू लागली.  

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगातील सर्वात उंच गणेश मूर्ती ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ जगातली सर्वात उंच गणेशमूर्ती ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नाही, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरामध्ये जगातली सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती आहे. या शहरामध्ये गणेश इंटरनॅशनल पार्क बनवण्यात आलं आहे, तिकडेच ही ३९ मीटर उंच गणपतीची कांस्याची मूर्ती आहे.

गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर कमळाचं फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलं आहे. या मूर्तीला कांस्याच्या ८५४ वेगवेगळ्या भागांपासून बनवण्यात आलं आहे. गणपतीच्या मूर्तीसह हे पार्क बनवायला २००८ ते २०१२ अशी ४ वर्ष लागली. थायलंडमध्ये जी ४ फळं पवित्र मानली जातात, त्या फळांना गणपतीच्या हातात ठेवण्यात आलं आहे. यामध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळ्याचा समावेश आहे. 

थायलंडमध्ये आंब्याला समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. गणपतीच्या पोटावर सापाने वेटोळे घातले आहेत, तर बाप्पाच्या सोंडेमध्ये लाडू आणि पायाखाली उंदीर आहे. थायलंडमध्येही गणपतीला ज्ञान आणि बुद्धीमत्तेची देवता म्हणून मानलं जातं.

थायलंडमध्ये गणपतीची ही मूर्ती नेमकी बनवली कोणी याचा किस्साही रंजक आहे. थायलंडमधली अयोध्या म्हणजेच अयुथ्या साम्राज्याबाबत विस्ताराने वाचलं असता, याचे दाखले मिळतात. या साम्राज्यामध्ये चाचोएंगशाओ नावाचं शहर १५४९ मध्ये वसवण्यात आलं होतं. याच शहराची चाचोएंगशाओ असोसिएशन ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्य करायला नेहमीच पुढे असते. या असोसिएशनचे अध्यक्ष पोल जेन समाचाई वानीशेनी यांनी जगातली गणपतीची सगळ्यात मोठी मूर्ती बनवायचं ठरवलं. यानंतर त्यांनी जागा शोधायला सुरूवात केली. 

संस्थेला ख्लॉन्ग ख्वान्ग शहरात ४० हजार वर्ग मीटर जागा निश्चित करण्यात आली. ही जमीन सुपीक आणि कृषीप्रधान क्षेत्र असल्यामुळे ही जागा गणपतीची मूर्ती स्थापन करण्यासाठी निवडण्यात आली. सगळ्यात आधी या जागेवर इंटरनॅशनल गणेश पार्क बनवण्यात आलं. यानंतर मग मूर्ती बसवण्यात आली. 

चाचोएंगशाओ असोसिएशनने इकडे एक सेंट्रल म्युझियमही बनवलं आहे. स्थानिक इतिहासाचं संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी हे म्युझियम बनवण्यात आलं. या भागामध्ये कित्येक शतकांपासून हिंदू संस्कृतीही नांदत आहे. 

मागच्या काही वर्षांपासून थायलंडच्या बँक पॅकांग नदीच्या आसपासचं क्षेत्र सगळ्यात मोठं पर्यटन क्षेत्र झालं आहे. त्यामुळे तिथले लोक आंतरराष्ट्रीय देवाची सगळ्यात मोठी मूर्ती तिकडेच असावी, अशी मागणी करत होते. अखेर गणपतीची मूर्ती बसवण्यावर सगळ्यांची सहमती झाली. 

गणपतीची जगातली सगळ्यात मोठी मूर्ती तिथले प्रख्यात मूर्तीकार पिटक चर्लेमलाओ यांनी तयार केली आहे. 

गणपतीची ही मूर्ती जगातली सगळ्यात उंच असून अजूनपर्यंत कोणीही यापेक्षा उंच मूर्ती असल्याचा दावा केला नसल्याचं असोसिएशनने सांगितलं आहे.

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व ☆ डाॅ.संजय ओक

? विविधा ?

☆ चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व ☆ डाॅ.संजय ओक ☆

माझ्या विभागात माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहयोगी प्राध्यापिकेचा आठ वर्षांचा चुणचुणीत मुलगा.. काळानुरूप नव्या मॅक्डोनाल्ड आणि पिझ्झा-हट संस्कृतीचा प्रतिनिधी. ‘दिवाळीच्या सुट्टीत काय किल्ला वगैरे करणार का?’ या माझ्या बाळबोध प्रश्नाला, ‘नाही अंकल, मी पर्सनॅलिटी बिल्डिंगच्या क्रॅश कोर्सला जाणार आहे,’ असे उत्तर देता झाला आणि मला धक्काच बसला.

आमच्या लहानपणी आम्ही विटा, गोणपाट, माती, चिखल यांनी किल्ले बांधायचो. त्यावर छानसे अळीव पेरायचो. मावळे आणि महाराजांचे पुतळे आणायचो. किल्ल्याच्या पायथ्याशी रस्ता असायचा. त्यात आमच्या इम्पाला, फोर्ड अशा जुन्या गाडय़ांची पुन: पुन्हा रंगवलेली खेळण्यातली मॉडेल्स ठेवायचो. ‘महाराजांच्या काळात इम्पाला कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. पण किल्ला बांधणे हा दिवाळीच्या सुट्टीतला सर्वात आनंददायी कार्यक्रम होता, हे खरे!

आता हा आठ वर्षांचा आतिश पर्सनॅलिटी बांधून काढण्याच्या कोर्सला जाऊन आपली दिवाळी सत्कारणी लावणार होता. खूप फरक जाणवला मला त्या क्षणी दोन काळांत., दोन बालपणांत.

आमचे बालपण आमच्या हातात अदृश्य वज्रमुठी घालत होते. आता रिस्ट-बॅण्डचा जमाना होता. आमच्या आई-वडिलांना पर्सनॅलिटीत गम्य नव्हते; पण आपल्या मुलांची जडणघडण चिरेबंदी चारित्र्याची व्हावी, त्याच्या ठायी अक्षय मूल्यांची पायाभरणी व्हावी यासाठी किल्ला, चिरोटे, फराळ, धन्वंतरी- पूजन या साऱ्या गोष्टींचा आग्रह होता. या गोष्टींनी आमचे बालपण समृद्ध केले. चारित्र्य हे असे कळत-नकळत घडत गेले. पर्सनॅलिटी फार नंतर अवतरली.

“चारित्र्य” आणि “व्यक्तिमत्त्व” या नाण्याच्या दोन बाजू. छापा आणि काटा एकमेकांपासून जितके वेगळे, तितक्याच निराळ्या या बाजूही. पण नाणं पूर्ण व्हायचं असेल आणि त्याला ‘चलनी’ म्हणून व्यवहारात चालवायचे असेल तर दोन्ही आवश्यक. मग त्या दोन बाबींत नेमका फरक तो कोणता?

चारित्र्य दिसत नाही; ते असते. व्यक्तिमत्त्व दिसते, त्याची छाप पडते. चारित्र्य हा अस्तित्वाचा गाभा असतो, तर व्यक्तिमत्त्व हा अस्तित्वाचा एक भाग असतो. चारित्र्य उजळते, व्यक्तिमत्त्व झळाळते. चारित्र्य म्हणजे माजघरात किंवा देवघरात तेवणाऱ्या नंदादीपाची ज्योत. व्यक्तिमत्त्व म्हणजे उघडझाप करणारी इलेक्ट्रिकची चायनीज माळ. चारित्र्य उघडय़ा दारातून आत येते, व्यक्तिमत्त्व खिडकीतून डोकावते. चारित्र्य टिकाऊ असते, तर व्यक्तिमत्त्व दिखाऊ असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे वड, तर चारित्र्य म्हणजे चंदन. वडाच्या पारंब्यांनी जसा त्याचा संभार पसरतो, तद्वतच व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे अनुयायांची मांदियाळी वाढते. चंदनाच्या अस्तित्वाची साक्ष पटविण्यासाठी त्याला पारंब्यांची गरज नाही, तर त्याचा गंधच रानोमाळी त्याची महती सांगतो. थाळीत टाकलेला भाकरीचा तुकडा तोंडाला लावण्यापूर्वी डोळ्यांतून निष्ठा, भक्ती, कृतज्ञता आणि स्नेहबंध यांची पोचपावती देणाऱ्या घरातल्या श्वानासारखे चारित्र्य हे नि:शब्द बोलते. तर मालकाला मिळो- ना मिळो; मला माझे दूध कमी पडता कामा नये; आणि पडलेच, तर ओटय़ावरच्या भांडय़ाला पंजा मारायला मागे-पुढे न पाहणाऱ्या मन्यासारखे व्यक्तिमत्त्व हे मतलबी, आत्मकेंद्रित आणि स्वत:पुरते असते. चारित्र्य घडते ते संस्कारांतून, शिकवणीतून आणि अनुकरणातून. व्यक्तिमत्त्व घडविले जाते ते आकारातून, अंधानुकरणातून आणि प्रसंगी अविचारातून.

पण मग आज व्यक्तिमत्त्वाचाच बोलबाला का? त्याच्या संपादनासाठी पदरमोड करून क्लासेस कशासाठी? उत्तर सोपे आहे. व्यक्तिमत्त्व विकले जाते. त्याची बोली लागते. चारित्र्य विकावू नसतेच मुळी. आणि त्याची किंमत जगाच्या बाजारात सहजासहजी ठरविता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा व्यवहार होतो आणि म्हणूनच आजच्या देवाणघेवाणीच्या जगात त्याची चलती आहे. त्याच्यासाठीच सारे काही.. कोणते कपडे घालायचे? कोणत्या जिममध्ये जायचे? पर्सनल ट्रेनर ठेवायचा की एरोबिक्स इन्स्ट्रक्टरला बोलवायचे? कोणते अन्नपदार्थ खायचे? काय टाळायचे म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसेल? याचीच सर्वत्र चर्चा.

या विचारांच्या आवर्तनात सापडलो असताना काही वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात घडलेला एक प्रसंग आठवला.

एके दिवशी डीन ऑफिसात दरवाजाखालून एक चिठ्ठी आत आली- ‘सर, द्वितीय वर्षांतला सतीश दिवसातून फक्त एकदाच जेवतो. त्याच्या घरी अडचण आहे. त्याला दुसऱ्या वेळच्या जेवणाची सोय करू शकाल का?’ शंभर मुला-मुलींमधून सतीशला शोधणे फारसे कठीण नव्हते. अपुऱ्या अन्नग्रहणाच्या खाणाखुणा अंगावर वागवीत हा काळासावळा, नम्र मुलगा मला भेटला. त्याच्या डोळ्यांत मला विनम्रता, सलज्जता, थोडीशी असहायता या साऱ्या भावभावनांचे दर्शन झाले. कँटीनवाल्याला सांगून मी त्याची रात्रीच्या थाळीची सोय केली. झाला प्रसंग मी विसरूनही गेलो.

साडेतीन महिन्यांनंतर सतीश परत कार्यालयात हजर. खाणे थोडेफार अंगी लागले होते. माझ्या कपाळावर कळत-नकळत आठी. ‘आता काय आणखी?’ असे भाव.

सतीश नमस्कार करून बोलता झाला- ‘सर, घरचा प्रश्न थोडा मार्गी लागला. मला वडील पैसे पाठवू शकतात. आता मी माझे बिल भरेन. आपले आभार मानायला आलो आहे.’

“चारित्र्य” आणि “व्यक्तिमत्त्व” यांतला माझ्या मनातला गुंता तत्क्षणी सुटला.

© सौ.सुचित्रा पवार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आली गौराई अंगणी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ आली गौराई अंगणी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आली गौराई अंगणी

रुणझुणत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा’ गाणं गुणगुणतच आपण मोठं झालो हे आता आठवते.गौराई येते ती अशीच आनंदात, उत्साहात! त्या माहेरवाशिणीचं किती कौतुक करू असं वाटतं!

लहानपणी निसर्गाच्या सान्निध्यात फुले, पत्री गोळा करताना खूप आनंद उत्साह असे.माझ्या माहेरी गौर बसवायची पद्धत नव्हती, तरी मी माझ्या मैत्रीण सह त्यांच्या आनंदात सहभागी होत असे.

सासरच्या घरी आल्यावर मात्र गौरी गणपतीचा आनंद खूप मिळाला सांगली ला कृष्णा नदीच्या  जवळच आमचे घर असल्याने गौर आणायला मी सासुबाईं बरोबर नदीवर गेले होते. त्यांनी मला गौरी ची सगळी तयारी करायला शिकवले. आम्ही वाड्यातील शेजारणीं बरोबर नटून थटून नदीवर जाऊन गौरी घेऊन आलो. छोटासा गडू, त्यावर ठेवायला ताटली, गौरीची पानं,(तेरड्याची पाने) हळद कुंकू, फुलं सर्व घेऊन पाणवठ्यावर गेलो. तिथे गडूत थोडसं पाणी, त्यावरच्या ताटलीत पाच खडे ठेवून त्याची पूजा केली. हळद कुंकू,वस्त्र, फुल वाहिले. तिथून येताना तोंडात जवळ घेऊन तसंच यायचं, मागं वळून पहायचं नाही, असे काही काही रितीभाती चे नियम मला शिकायला मिळाले. घरी आलं की दारातच ती पाण्याची चूळ बाहेर टाकायची. आणि   त्या गौरीला ओवाळून पायावर दूध-पाणी घालून घरात घेतलं जाई. घरात आलं की प्रत्येक खोलीत गौरीसह जायचं. तिथे जाऊन ‘इथे काय आहे? या प्रश्नाला’ उदंड आहे!’ असं उत्तर द्यायचं! अशी ही सोन्याच्या पावली येणारी गौर गणपतीच्या जवळ आणून बसवायची!ते झाल्यानंतर गौरी आणणारीची ओटी भरायची हे सर्व छान साजरे केले जायचे. नवीन साड्या, दाग दागिने घालून मिरवत मिरवत नवीन सुनेकडून गौर आणण्याचा आनंद काही वेगळाच असे.

गौरी आणल्या की रात्री गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य असे. दुसऱ्या दिवशी  गौरी जेवणाची तयारी आधीच केली जाई. गौरी जेवणाच्या दिवशी बायकांची धावपळ असे.एकमेकीकडे पाठशिवणी दिल्यासारख्या सवाष्ण म्हणून बायका जात असत. ते सर्व एकमेकीच्या सोईने केले जाई. एकदाचे गौरी जेवण झाले की संध्याकाळच्या हळदी कुंकवाची तयारी करायची. संध्याकाळी आसपासच्या घरातून हळदी कुंकू घेऊन यायचे आणि आपल्या घरी बायका ना हळदीकुंकवासाठी बोलवायचे. अशी धावपळ असायची, पण त्यातही खूप मोठा आनंद मिळत असे. कदाचित संस्काराचा परिणाम असेल पण हे सर्व आवडत होते. काळाबरोबर आता थोडे बदल करायलाच हवेत. आपल्या पुढच्या पिढीला नोकरी, व्यवसाय यातून वेळ काढून सर्व करणे अवघड जाते तरीही त्या हौसेने जमेल तितके करतात याचे कौतुक वाटते.

एकदा  का गौरी जेवणाचा दिवस झाला की, गौरी-गणपती जाणार म्हणून मनाला हुरहुर लागत असे. गौरी गणपतीचे पाच-सहा दिवस इतके धामधुमीत उत्साहात जात की खरोखरच घरी  पाहुणे आल्यासारखे वाटे. त्या पाहुण्यांना निरोप देताना मनापासून वाईट वाटे. नेहमीप्रमाणे गौरी, गणपती घेऊन विसर्जनाला गेले की मन भरून येते! निरोप देताना दही भात, तळलेले मोदक, करंजी यांची शिदोरी गणपती, गौरीसाठी दिली जाई. तिथून येताना पाण्या जवळची थोडीशी माती, खडे बरोबर घेऊन यायचे आणि ते गौरी गणपतीच्या रिकाम्या जागी ठेवायचे! एकदम रिकामी जागा नको म्हणून तिथे एखादे देवाचे पुस्तक ठेवायची आमच्याकडे प्रथा होती. गणपतीचा हा सगळा सोहळा आनंददायी केला जाई.

कितीही संकटे आली तरी आपण ती बाजूला सारून या उत्सवाला आनंदाने सामोरे जातो.

शेवटी ते संकट दूर करणारा विघ्नहर्ता गजाननच आहे याची आपल्याला खात्री असते.

आता ही आलेली वादळे, कोरोना आणि इतर संकटे दूर करून गणपती आपल्याला चांगले दिवस दाखवून देईल ही मनाची खात्री आहे. गौरी गणपती कडे एवढेच मनापासून मागणी आहे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – तो असा, ती तशी !☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? तो असा, ती तशी ! ?

“जागा आहेस, का नुसताच लोळत पडलायस ?” हे थोडं दरडावणीच्या सुरात, आपल्या कानावर आपण लहान असतांना आईकडून आणि मोठेपणी (आपापल्या) बायकोकडून ऐकण्याचे अनेक प्रसंग आपल्यावर आत्ता पर्यंत नक्कीच आले असणार ! कारण झोपेतून जागे झाले तरी, 99.9% पुरुषांना लोळत पडून रहायची सवय असतेच असते, मग तो कामाचा दिवस असो वा सुट्टीचा ! ही टक्केवारी, मी एखाद्या साबणाच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे, रोग जंतूचा नाश करण्याच्या त्याच्या क्षमते इतकीच घेतली आहे, हे माझ्या सारख्या चाणाक्ष नवऱ्यांनी लगेच ओळखलं असेलच ! आता हे साबणाचे उदाहरण देण्या मागे सुद्धा माझे स्वतःचे असे एक सबळ कारण आहे, जे तुम्हाला पण 100% पटेल ! आपण जागे झालोय आणि नुसतेच लोळत पडलोय हे नंतर बायकोने ओळखल्यावर, ती आपल्या मागे भुणभुण करून आपल्याला सुद्धा तिच्या मागोमाग उठायला भाग पाडून, तेव्हढयावरच ती थांबली, तर ती अर्धांगिनी कसली ?  तिला असं वाटत असतं की, आपल्या नवऱ्याने पण, भूतां सारखे लोळत पडण्यापेक्षा, लगेच उठून आपल्या सारखेच लगेच सुचीरभूत व्हावे ! आता भूतं जाग आल्यावर अशीच लोळत (का झाडावर लटकत?) पडतात, हे तिला कसं कळलं का तिला कोणी (तिची आई?) तसं सांगितलं, हा एक झोप न घेता करायचा संशोधनाचा विषय ठरू शकतो ! या माझ्या विधानाशी, माझ्या सारखे 100% आळशी नवरे, सहमत होऊन भली मोठी जांभई देत, परत आपल्या डोक्यावरून पांघरूण घेऊन गादीला जवळ करतील, याची मला 100% नाही तर 101% खात्री आहे ! आणि या उप्पर जरी नवऱ्याने तिला प्रेमाने (का स्वार्थापोटी ?) म्हटलं “झोप की जरा, आज सुट्टी तर आहे !” तरी 100% बायका, ते जणू ऐकलंच नाही असं भासवत, ते अजिबात मनावर न घेता, लगेच आपल्या रोजच्या कामाला स्वतःला जुंपुन घेतात, हे तमाम नवरे मंडळी मान्य करतील !

असं जाग आल्यावर लोळत पडणं वगैरे बायकांना झेपत नाही, का त्यांना ते जमत नाही, का त्यांची मानसिक घडणंच तशी असते, हे त्या निद्रादेवीलाच माहित ! त्या जाग आल्या आल्या लगेच, कुणीतरी आपल्या पाठीमागे अदृश्यपणे छडी घेऊन उभा आहे या भीतीने, रोजच्याच अंगावळणी पडलेल्या कामाला, वाघ मागे लागल्यागत सुरवात करतात ! तो अदृश्य छडीधारी कोण असेल, याचा मी अनेक वेळा माझ्या (बायकोच्या म्हणण्या नुसार) अल्पमती प्रमाणे शोधायचा अनेक वेळा विफल प्रयत्न केला, पण तो करता करता कित्येक वेळा परत  झोपेच्या अधीन कधी झालो, हे माझंच मला कळलं नाही ! शेवटी मी तो नाद सोडून दिला आणि माझ्या मनाची मीच अशी समजूत करून घेतली की, सकाळी उठल्या उठल्या रोजच्या कामाचा तोच तोच व्यायाम केल्याशिवाय, तमाम बायकांना त्यांचा दिवस सुरू झालाय असं वाटतच नाही ! असो !

आता या अशा पेच प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याचा विचार करता करता मला, थोरा मोठ्यांनी जे काही मोठ्या मनाने म्हणून ठेवलं आहे, त्याची आठवण झाली ! जसं, ऐकावे जनाचे (बायकोचे) करावे मनाचे ! म्हणजे तुमच्या लक्षात मतितार्थ आला असेलच, की आपल्याला देवाने जे दोन कान दिले आहेत, त्याचा योग्य वापर करून, म्हणजेच एका कानाने बायकोचे ऐकून, तेच दुसऱ्या कानाने सोडून, डोक्यावर पांघरूण घेवून मस्त ताणून देणे !

निद्रादेवीचा विजय असो !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अभियंता दिन – भारतरत्न सर विश्वेश्वरय्या ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ अभियंता दिन – भारतरत्न सर विश्वेश्वरय्या ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

१५ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘ अभियंता दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेलेले विश्वेश्वरय्या हे ध्येयवादी आणि थोर देशभक्त होते.

कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी खेड्यात १५ सप्टेंबर १८६१ ला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्रीनिवासशास्त्री हे विद्वान संस्कृत पंडित होते. आईने त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आणि बंगळूरमधून विशेष गुणवत्ता किताब घेऊन बी.ए केले.

त्यांना तांत्रिक शिक्षणाची आवड लागली. म्हैसूरच्या राजांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊन पुण्यात अभियांत्रिकी पदवी साठी पाठवले. अत्यंत कठीण अशी इंजिनीयरिंग ची अंतिम परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून मुंबई राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.स्थापत्य शास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वत्र पसरला.त्याची नोंद घेत सरकारने मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून नेमणूक केली. याच काळात खडकवासला धरणासाठी त्यांनी स्वयंचलित गेटची निर्मिती केली. भारतात प्रथमच हे गेट केले गेले. या डिझाईनला ‘विश्वेश्वरय्या गेट’ हे नाव दिले गेले.

१९०४ साली बढती मिळून देशाचे पहिले अभियंता होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. संपूर्ण देशातून त्यांचे कौतुक झाले.

वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी २४ वर्षे नोकरी केली आणि १९०७ चाली सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर हैद्राबाद सरकारचे विशेष सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली.मूसा आणि इसा या दोन नद्यांवर धरणे बांधून त्यांनी फार मोठे काम केले.

त्यानंतर म्हैसूरच्या राजांनी मुख्य अभियंता म्हणून त्यांना बोलाविले.ते म्हैसूरला आले ‘ कृष्णराज सागर ‘ या कावेरी नदीवरील धरणाचे काम त्यांनी पूर्ण केले.वृंदावन उद्यान, म्हैसूर सॅंडल ऑईल ॲंड सोप फॅक्टरी, म्हैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ म्हैसूर या इमारती आणि धरणे ही त्यांच्या कार्याची पावती आहे.शिक्षण, उद्योग, कृषी अशा सर्व क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली. सर्वांगीण विकासासाठी अनेक गोष्टी , उद्योगांना चालना दिली.समाजोन्मुख कामे केली. ‘कर्नाटकच्या विकासाचा भगिरथ’ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. त्यांचा गौरव म्हणून म्हैसूर संस्थानचे ‘दिवाण पद ‘त्यांना बहाल केले गेले.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्यात होती. शेतकऱ्यांना शेतीचे ज्ञान व्हावे म्हणून त्यांनी ‘म्हैसूर विद्यापीठा’ची स्थापना केली. सिंचन क्षेत्रासाठी मौलिक असे योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळून पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टीम ही त्यांची देणगी आहे.

भद्रावतीचा लोखंड आणि पोलाद कारखाना ही त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. मुंबईची प्रीमियर ऑटोमोबाईल इंडस्ट्री, हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी ( आत्ताची दि हिंदुस्तान एराॅनाॅटिक्स ) आणि ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेत त्यांनी भाग घेतला. धुळे, सुरत, सक्कर, कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड, विजापूर अशा अनेक शहरांच्या पाणीपुरवठा योजना त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. पुण्याच्या डेक्कन क्लबच्या स्थापनेतही त्यांनी भाग घेतला. त्यांनी औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली.

सेवानिवृत्तीनंतर चाळीस वर्षे विविध समित्या आणि संस्थांमध्ये विविध पदांवर अखंडपणे मोलाचे काम केले. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते.अगदी साधी राहणी होती. म्हैसुरी पद्धतीचा फेटा आणि साधी वेशभूषा त्यांनी शेवटपर्यंत जपली. त्यांचा स्वभाव साधा होता.पण काही बाबतीत परखड होता. ‘शिस्त ‘हा त्यांचा परवलीचा शब्द होता. ते सतत कठोर परिश्रम करीत. प्रत्येक काम नियमित, नीटनेटके आणि स्वच्छ असावे हा त्यांचा आग्रह असे. त्यांना अंधश्रद्धा मान्य नव्हती. माणसात देव आहे आणि माणसाची सेवा हीच ईश्वरसेवा आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते.

ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ हा किताब बहाल केला. अनेक विद्यापीठांनी सन्माननीय ‘डि.लीट’ने गौरविले. वयाच्या ९४व्या वर्षी सरकारने ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले. बंगळूरचे ‘सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम’ भारतातले सर्वात मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांचा जन्मदिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र सरकार तर्फे त्यांच्या स्मरणार्थ ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ दिला जातो.

ते शतायुषी होऊन निरामय जीवन जगले. १४ एप्रिल १९६२ साली वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे हे अफाट कार्यकौशल्य अत्यंत गौरवास्पद आहे. एका उत्तुंग, महान चरित्राचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्या स्मृतींना शतशः प्रणाम !! ?

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हेमराजवाडीतील गणपती ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ हेमराजवाडीतील  गणपती ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

प्रत्येकवर्षी गणपती आले की  गिरगावातील वेगवेगळ्या गणपतींची आठवण  येतेच. 

सहा महिने आधीपासून रविवारी गणपती मंडळांच्या मिटींग्स चालू व्हायच्या .वाडीतील काही बुजुर्ग लोकाना अध्यक्ष,सचिव, खजिनदार अशी पदे देऊन सार्वजनिक मंडळाची नेमणूक व्हायची. वर्गणीवर चर्चा व्हायची, वाद आणि काही वेळा भांडणेही होत असत.  पण त्यामुळे कधी गणेशोत्सवात विघ्न येत नसे. सगळेजण गणेशोत्सव कसा चांगला होईल ह्यासाठी जोमाने कामाला लागायचे.

—- पण १९८७ च्या  हेमराजवाडीच्या  गणपतीची तयारी मात्र एक वर्ष आधीपासूनच चालू होती, कारण त्यावर्षी हेमराजवाडीतल्या गणपतीला ५० वर्षे होणार होती. त्यामुळे ते गणपतीउत्सवाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्याची संपूर्ण जबाबदारी अशा कामात नेहेमी आघाडीवर असणाऱ्या  वाडीतील चार तरुणांनी  घेतली होती. वाडीतील असंख्य तरुण कार्यकर्ते त्यांच्या मदतीला  होते. त्यामुळेच सुवर्णमहोत्सवी शिवधनुष्य वाडीतल्या रहिवाश्यांच्या साथीने व्यवस्थित  उचलले गेले. सुवर्ण महोत्सवाची तयारी पद्धतशीरपणे  चालू होती.

एक महिना शिल्लक असताना बाबूच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. तसे त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना येणे हे  नवीन नव्हते. त्याने सांगितले, ” ह्यावर्षी  आपण गणपतीला  खरोखरच्या हत्तीवरून आणायचे “. सुरुवातीला सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले . जोखीम खूप आहे– पोलीस परमिशन मिळणे मुश्किल आहे —हत्ती गर्दी बघून उधळू शकतो –अशी अनेक कारणे सांगून सगळ्यांनी त्याला हा विचार डोक्यातून काढायला सांगितला.  पण बाबू असा सहजासहजी हार मानणारा नव्हता—-

परळच्या पुलाखाली एक माहूत त्याचा हत्ती घेऊन राहत होता. तेथे जाऊन त्याने प्रथम त्या माहुताला तयार केले.. नंतर जवळपास  पंधरा दिवस, रोज रात्री त्या हत्तीजवळ जाऊन कधी फटाक्यातला बॉंम्ब लाव, फटाक्याची माळ लाव, तर कधी ढोलताशा वाजव असे करून हत्ती दचकतो का, उधळतो का ह्याचे निरीक्षण केले. जेव्हा सगळ्यांना खात्री पटली की हत्तीवरून गणपती आणण्यात  काहीच धोका नाही, तेव्हा सर्वसंमत्तीने त्यावर शिक्कामोर्तब झाले. आता पोलीस संमतीची गरज होती. त्याकाळी दक्षिण भारतात देवांच्या मिरवणुका हत्तीवरून निघायच्या हे टीव्हीवर बघायला मिळायचे.  पण महाराष्ट्रात तरी तसे कधी दिसले नव्हते. तेव्हाचे एक राजकीय  नेते वाडीतच रहात असल्याने पोलीस संमतीची बोलणी झाली, पण लेखी संमती मिळणे शक्य नव्हते.  त्यामुळे,’ तुमच्या जबाबदारीवर  मिरवणूक काढा आणि काही अघटित घडल्यास कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा,’ या अटीवर, गणपतीचे आगमन  हत्तीवरून होणार हे नक्की झाले, आणि पूर्ण गिरगावात हेमराजवाडीच्या गणपतीची चर्चा सुरु झाली. 

गणेशचतुर्थीच्या  दिवशी पहाटे हत्तीला कोमट पाण्याने आंघोळ घालून दुधाचा अभिषेक केला गेला.  सोंडपट्टी आणि अंगावर झालर चढवून सजविण्यात आले.  सजवलेल्या अंबारीत  बाप्पांची मूर्ती ठेवण्यात आली.पुढे राजदंड आणि मागे छत्र घेऊन मावळे उभे केले गेले. ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी सामुदायिक आरोळी दिली गेली. सनई चौघडा आणि बँड पथक वाजविण्यास सज्जच होते. ‘गजानना श्रीगणराया आधी वंदू तुझ मोरया’ हे  गाणे बँडवर  वाजविण्यास सुरवात झाली. सगळे कार्यकर्ते  मिरवणुकीत काही अघटित घडू नये ह्याची दक्षता घेत होते. गणपतीबरोबर एकाला अंबारीत बसवून, जितेकर वाडीतून वाजतगाजत मिरवणूक सुरु झाली. सी पी टॅंक वरून फडके वाडीच्या गणपतीवरून, गिरगावातून मिरवणूक हेमराजवाडीत आली. गणपतीचे वाडीत आगमन झाल्यावर नऊवारी साड्या नेसून, नथी घालून, केसांत गजरे  माळून १५१ सुवासिनींनी  गणपतीला औक्षण केले. त्यादिवशी हेमराजवाडीत सगळे खरंच ‘ न भूतो न भविष्यती ‘ असेच  घडत होते. गणरायाचे आगमन गजराजाच्या अंबारीतून– असे आधी कधीच  घडले नव्हते आणि त्यानंतरही आजपर्यंत कधीही घडले नाही— ते स्मृती पटलावरून कधीच विरणारेही नाही. . 

गणपती स्थानापन्न झाला आणि गणपतीउत्सव सुरु झाला. नेहमीपेक्षा मोठे स्टेज आणि सजवलेला मांडव उत्सवाची भव्यता वाढवत होता . तेव्हाच्या महापौरांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी उत्सवाचे उदघाटन झाले. 

दहाही दिवस सकाळसंध्याकाळच्या प्रसादाचा मान कोणाचा ह्याचे ‘आरक्षण’ झालेलेच  होते. प्रत्येकालाच  आपला हातभार लागावा असे वाटत असल्याने, जमेल तसा प्रत्येकजण गणपतीची सेवा करीत होता 

रात्री पन्नासाव्या वर्षाला शोभेल असे करमणुकीचे कार्यक्रम होत होते.                  

सुवर्णमहोत्सवाची भव्यता जाणवत होती. त्यासाठी मंडळाला पैशाची गरज होती म्हणून लॉटरी काढण्यात आली होती. आधी एक महिन्यापासून लॉटरी चालू करून पहिले बक्षीस स्कुटर ठेवले होते. त्याकाळी स्कुटर घेणेही सगळ्यांना शक्य नसे. छोटेसे स्टेज करून त्यावर स्कुटरचे प्रदर्शनही केले होते. पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटचे तीन दिवस राहिले होते. मी लॉटरी विकायची जबाबदारी  घेतली. शेवटच्या तीन दिवसात लहान मुलांना  पँट- शर्ट आणि टाय लावून वाडीच्या नाक्यावर उभे केले. माइकवरून  प्रत्येकाला तिकीट  घेण्यासाठी गळ घातली जाऊ लागली. मोठ्या मुलांना सिग्नलला बसमध्ये चढवून  तिकीटे  विकायला पाठविले, ज्याला प्रतिसादही चांगला मिळाला. “ लॉटरीचे तिकिट घ्या आणि बसऐवजी स्कुटरवरून घरी जा” असे  आवाहन करत तीन दिवसात सगळी तिकीट विकली गेली.आवश्यक पैसे जमा झाले. निकाल काढायला  झावबावाडीतल्या  स्वप्नील जोशी या तेव्हाच्या फेमस बालनटाला  बोलाविले होते. एक दिवस वाडीतल्या  रहिवाश्याना जेवण ठेवले होते.आवर्जून वाडीच्या माहेरवाशीणीना, आणि वाडी सोडून गेलेल्या माजी रहिवाश्यानाही बोलाविले होते. त्यादिवशी संपूर्ण वाडीत एक वेगळेच चैतन्य नांदत होते. 

गणपती विसर्जनाचा दिवस उजाडला. दहा दिवस कसे गेले ते कळलेच नाही.. बाप्पासाठी निरोपाच्या दिवशीही  काहीतरी वेगळंच असणार हे नक्की होते. फुलांनी सजवलेला चार सफेद घोड्यांचा रथ बाप्पासाठी तयार होता. पुढे ढोल — लेझीम –आणि मागे रथात बसलेला बाप्पा, अशी  मिरवणुकीला सुरुवात झाली. बाप्पा परत चालले म्हणून सगळी वाडीच मिरवणुकीत सामील झाली होती. प्रत्येकाच्याच  डोळ्यात पाणी  होते. अशातऱ्हेने हेमराजवाडीतील आगळयावेगळया सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सवाची सांगता झाली.

————-खरंच काही आठवणी विसरता नाही येत —जागा बदलल्या तरी ओढ नाही संपत—-  अंतर वाढले म्हणून प्रेम नाही आटत.

हेमराजवाडीचे वेगळेपण हेमराजवाडी सोडल्यावरच  जास्त जाणवते. गिरगाव सोडलेल्या प्रत्येक गिरगावकरची आपल्या वाडीबद्दल अशीच भावना असेल ह्याची मला खात्री आहे. 

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लाईफ मॅनेजमेंट ☆ संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ लाईफ मॅनेजमेंट ☆ संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर ☆ 

लाइफ मॅनेजमेंट ?

प्रोफेसरने भांड्यात पाणी टाकून त्यामध्ये बेडूक टाकला, यानंतर ते भांडे तापायला ठेवले, पाणी गरम झाल्यानंतर बेडकाचे काय झाले, प्रोफेसरने असे कां केले ???——–

एका कॉलेजमध्ये “फिलॉसफीचे” एक प्रोफेसर शिकवायचे…ते वेगवेगळ्या पध्दतींनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील लहान-लहान गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करायचे…

एक दिवस प्रोफेसरने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले की, आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट समजावणार आहे.

सर्व विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत व बघत होते.

प्रोफेसरने पाण्याने भरलेले एक भांडे घेतले आणि त्यामध्ये बेडूक टाकला. पाण्यात जाताच बेडूक आरामात पोहू लागला. यानंतर प्रोफेसरने ते भांडे तापायला ठेवले.

भांड्यातील पाणी हळुहळू गरम होत होते. भांड्यामध्ये जो बेडूक होता तो पाण्याच्या वाढत्या तापमानानुसार स्वतःला अॅडजस्ट करत होता. हळुहळू पाणी जास्त गरम होत होतं, पण बेडकाला काहीच फरक पडत नव्हता. तो स्वतःला तापमानानुसार तयार करत होता.

काही वेळानंतर पाण्याचे तापमान खूप वाढले आणि पाणी उकळू लागले. तेव्हा बेडकाचीहि सहनशक्ती संपली. त्याला त्या भांड्यात थांबणे कठीण झाले. तेव्हा बेडकाने उडी मारुन भांड्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला.

बेडकाने पूर्ण शक्ती लावूनहि त्याला त्या भांड्यातून बाहेर पडता आले नाही. प्रोफेसरने तात्काळ त्या बेडकाला बाहेर काढले. प्रोफेसरने विद्यार्थ्यांना विचारले की, बेडूक भांड्याबाहेर उडी कां मारु शकला नाही ???

सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली.

तेव्हा प्रोफेसर म्हणाले – बेडूकाची इच्छा असती तर तो पाणी तापायला ठेवल्याबरोर बाहेर येऊ शकत होता. पण बेडूक स्वतःला वातावरणानुसार ऍडजेस्ट करण्याचा प्रयत्न करत होता. जेवढे तो सहन करु शकत होता, तेवढे त्याने केले.

पण जेव्हा त्याला वाटले की, जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावेच लागेल, तेव्हा तो उडी मारु शकला नाही, कारण अॅडजस्ट होण्याच्या प्रयत्नात त्याची सर्व एनर्जी नष्ट झाली होती. जर मी त्याला बाहेर काढले नसते, तर बेडूक मरुन गेला असता.

लाइफ मॅनेजमेंट ?

प्रोफेसरने आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवले – 

सर्व लोकांसोबत असेच होते. आपण नेहमी आपल्या परिस्थितीशी जुळवून घेतो. पण त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. पण जेव्हा आपण पूर्णपणे परिस्थितीमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला वाटते की, मी योग्य वेळी बाहेर पडायला पाहिजे होते. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते.

 बोध—— योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला होय.

संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्राजक्ताची फुले .. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? विविधा ?

☆ प्राजक्ताची फुले ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येते

मी प्राजक्ताला पहाते

ही टपटपणारी फुले जणू

आहेत अबोल अश्रुधारा …

हो ना …तू असा दुनियेच्या संसारात गुंतलेला तुला कुठे ठाऊक आहेत या उरीच्या वेदना ?? या प्राजक्ताच्या झुळुकीसारखेच तुझे अस्तित्व …तू आलास म्हणून मोहरून जातात दिशा …स्तब्ध होतो वारा …… मध्यान रात्री पक्षी फडफडतात …सूर्यही अवचित डोकावतो अवेळी काळ्याशार ढगांच्या जळात …गायी कान टवकारतात ..इतकेच काय ती तुझी बासुरी सुद्धा अधीर होते तुझ्या कोमल अधरांवर विसावायला …थरथरते तिचीही काया अन अधीर होते तुझ्या मंजूळ स्पर्शासाठी …केवड्याच्या बनात नाग उगीचच सळसळत रहातात …निशिंगन्ध डोकावतो हळूच हिरव्या पानाअडून तुझ्या आगमनाची वार्ता पसरावयाला ! पण …पण तू येतोस …विद्युल्लतेच्या वेगाने … धड -धड होते काळजात ..कालिंदीच्या डोहात तरंग उठत रहातात …आसुसतो तोही डोह …तुझ्या चरण कमलाना स्पर्शायला … धावते वेड्यासारखी तुझ्या भेटीला पण …पण पितांबर  लहरत रहातो रुक्मिणीच्या परसदारात …चांदणं झुला झुलत राहतो …..कर -कर आवाज अंधार कापत जातो ..कस्तुरी रेंगाळत रहाते आसमंतात …खोलवर श्वासात रुतत जाते माझ्या .. .. अन … अबोल प्राजक्त हळुवार ओघळतो त्या काजळलेल्या डोळ्यांच्या व्याकूळ काळोखात नि:शब्द ….

 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares