मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्नेहवन – एका प्रेमाच्या भेटीची गोष्ट ☆ स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य? 

☆ स्नेहवन – एका प्रेमाच्या भेटीची गोष्ट ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित ☆

(Please visit->> www.snehwan.in)

आळंदीपासून साधारण १० किलोमीटर वर कोयाळी फाटा इथे स्नेहवन नावाची एक संस्था… श्री. अशोक आणि सौ. अर्चना देशमाने यांचा २३० जणांचा संसार ….

२५ व्या वर्षी संगणक क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दुसऱ्यांच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी अंगावर घेणे आणि ती व्यवस्थित पार पाडणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. अशोकजींच्या समर्पणाला आणि त्यांना  तन आणि मनाने साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ला माझा सलाम !

२०२० मध्ये आलेली मरगळ झटकून देऊन २०२१ मध्ये काहीतरी खूप छान करायचे. मी, माझे कुटुंब आणि माझे घर यापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करायचे असा संकल्प मनी धरूनच या वर्षीची सुरुवात केली होती. त्यामुळे  जेव्हा या संस्थेविषयी कळले त्यावेळी इथे नक्की भेट द्यायची आणि आपल्याकडून जी होईल ती मदत करायची हे मनात पक्क केलं होतं. ती संधी चालून आली आमच्या ब्राह्मण संघामुळे. यावर्षीचा व्हॅलेंटाईन डे थोडा वेगळा साजरा करूयात ही कल्पना मंदारजी रेडे आणि केतकीताई कुलकर्णी यांनी मांडली आणि आम्ही सर्वानी ती उचलून धरली. याचा अर्थ असा नाही की या आधीचे सर्व व्हॅलेंटाईन डे आम्ही साजरे केलेच आहेत :).  पण काहीतरी वेगळं , ज्या समाजात आपण राहतो , ज्यांच्यामुळे आपल्याला ४ सुखाचे  घास मिळतायत अश्या शेतकऱ्यांना, त्यांच्या मुलांना जर स्नेहवनमार्फत आपणही छोटीशी मदत करू शकत असू तर करावी या हेतूने आम्ही २५ जणांनी स्नेहवनला भेट दिली.

तिथे गेल्या गेल्या अशोकजींनी हसतमुखाने आमचे स्वागत केले आणि एका क्षणात आम्हाला आपलेसे करून घेतले. थोडा औपचारिक गप्पा तोंडओळख झाली आणि मग अशोकजीनी सांगितलेला त्याचा इथपर्यंतचा प्रवास ऐकून आम्ही सर्वजण स्तिमित झालो.

अशोकजींचे बालपण परभणीजवळील एका छोट्याश्या खेड्यात अत्यंत हलाखीच्या परिस्थिती झाले. जिथे रोजच्या जेवणाची भ्रांत होती तिथे शिक्षणाची आस धरणे हे एक स्वप्नच होते. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने त्यांनी ते इंजिनिअर झाले आणि एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत नोकरीला लागले. नोकरी करत असताना ते विविध विषयांवरील पुस्तके, स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करत होते. स्वतः एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांचे प्रश्न खूप जवळून पाहिल्यामुळे त्यांना सतत यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटत होते. नुसत्या गप्पा मारून अन चार कविता लिहून, पैसे देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत तर यासाठी वेळ दिला पाहिजे.

या विचारात असतानाच एका क्षणी त्यांनी ठरवले की आता मी यात उडी मारणार आणि स्वतःच्या आई वडिलांचा विरोध पत्करून त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ या कार्याकरिता वाहून घेतले. सुरुवातीला विरोधात असलेले आई वडील नंतर मुलाचा निर्धार बघून गावाकडील शेतीवाडी विकून पुण्यात मुलाच्या संसाराचा गाडा ओढू लागले.  सुरवातीला भोसरी येथे ४ खोल्यांमध्ये ते तिघे आणि १८ मुले असे २१ जण जवळ जवळ ३-४ वर्षे राहत होते. थोड्याच दिवसात अशोकजींचा लग्नाचा विषय त्यांच्या आई वडिलांच्या डोक्यात घोळायला लागला. पण लग्नाआधीच १८ ते २० मुलांचे पालकत्व स्वीकारलेल्या मुलाबरोबर लग्न करायला तयार होणारी मुलगी मिळणे म्हणजे कर्मकठीण काम. पण म्हणतात ना तुम्ही जर मनापासून समर्पित होऊन जर एखादे काम करत असेल तर देवसुद्धा तुम्हाला त्याच्या परीने सर्व मदत करतो.  अनेक वधुपरीक्षा झाल्यांनतर अर्चनाताई अशोकजींच्या आयुष्यात आल्या आणि ते ही रीतसर पद्धतीने दाखविण्याचा कार्यक्रम करूनच. अर्चना ताई आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या धाडसाचे ही कौतुक करावे तितके थोडे आहे. कुठल्याही आई वडिलांचे आणि मुलीचे स्वतःच्या लग्नाचे संसाराचे एक सुरेख चित्र असते. पण त्या चौकटीच्या बाहेर येऊन चित्र पूर्ण काढणे आणि ते रंगवणे ह्यासाठी पण एक वेगळी दृष्टी लागते. ती दृष्टी अर्चनाताई आणि त्यांच्या पालकांकडे होती म्हणून एवढा मोठा निर्णय ते घेऊ शकले.

१८ मुलांपासून सुरु केलेला त्यांचा संसार आज २३० मुलांबरोबर गुण्या गोविंदाने सुरु आहे. स्नेहवनात असलेले अनोखे उपक्रमही जाणून घेण्यासारखे आहेत.

१.  वन बुक वन मूवी : स्नेहवनात भारतातील पहिली कंटेनर लायब्ररी आहे ज्यात १०००० पुस्तके आहेत. इथल्या प्रत्येक मुलाने दर आठवड्याला एक पुस्तक वाचायचे आणि त्यावर विवेचन करायचे. जो पुस्तक वाचून पूर्ण करेल त्याला एक चित्रपट पाहायला मिळेल. जो पुस्तक वाचणार नाही त्याला त्या आठवड्यात चित्रपट पाहायला मिळणार नाही. मग त्याला स्वतः अशोकजी आणि अर्चनाताईही अपवाद नाहीत.

२.  रिंगण: इथली मुळे TV अजिबात पाहत नाहीत तर रोज संध्याकाळी सगळे मुळे एकत्र रिंगणात बसतात आणि वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारतात, आपली मते मांडतात.  कधी कधी एखादा विषय दिला जातो आणि त्यावर प्रत्येकानी आपले मत , विचार व्यक्त करायचे. मग तो विषय माझी आई, माझे गाव, आपले पंतप्रधान असा काहीही असू शकतो पण ह्यामुळे ह्या मुलांच्यात लहानपणासूनच वक्तृत्व कला जोपासली जाते आणि विचारांना दिशा देऊन ते व्यक्त करण्याचे धाडस येते. त्यामुळे ही मुळे ५०० लोकांसमोर सहज बोलू शकतात.

३.  सोलर प्लांट : स्नेहवनचा संपूर्ण परिसर हा सोलर पॉवरवर चालतो.  इथली मुलेच हा प्लांट पण सांभाळतात.

४.  बायो गॅस : इथे प्रत्येक जण स्वतःला लागणार गॅस स्वतः तयार करतो. हा पूर्ण प्रकल्प पण मुलेच सांभाळतात.

५.  कॉम्पुटर लॅब आणि अकाउंटिंग : लॅब चे व्यवस्थान आणि हिशोबाचे काम ही मुलेच पाहतात. कुणालाही काहीही लागले तरी तो तो विभाग पाहणाऱ्या मुलांना विचारूनच सगळे कामे केली जातात. अगदी अशोकजीसुद्धा या मुलांच्या सल्ल्यानेच काम करतात

६.  संगीत, चित्रकला, योगाभ्यास : दर शनिवारी आणि रविवारी इथे बाहेरील शिक्षक येऊन मुलांना गाणे , चित्रकला आणि योगाचे धडे देतात आणि त्यांची चौफेर प्रगती होईल याकडे लक्ष देतात

७.  गौ-शाळा : स्नेहवनची  स्वतःची गौशाला आहे त्यात २ गीर गायी आहेत. त्यामुळे त्यांना लागणारे दूध दुभतेही त्यांना इथेच उपलब्ध होते.

८.  जैविक शेती : स्नेहवनला लागणार रोजचा भाजीपाला ते त्यांच्याच आवारात पिकवतात ते ही जैविक पद्धतीने. कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता.

अश्या एक ना अनेक गोष्टी इथे पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या. एक अतिशय स्तुत्य उपक्रम बघून , एकमेवाद्वितीय असा अनुभव घेऊन भारलेले आम्ही सर्वजण पुढील अनेक दिवसांसाठी अनोखी ऊर्जा घेऊन तिथून बाहेर पडलो.

प्रत्यकाने जाऊन जरूर पाहावे आणि अनुभवावे असे हे स्नेहवन , नक्की भेट द्या !!!

स्नेहवन संपर्क- 87964 00484

www.snehwan.in

सौ. शिल्पा महाजनी

संग्राहक – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कलास्वाद ☆ आनंद रंगरेषांचा – मधुबनी शैली/ पेंटिंग ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सौ.वंदना अशोक हुळबत्ते

? कलास्वाद ?

☆ आनंद रंगरेषांचा – मधुबनी शैली/ पेंटिंग ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

चित्रकला हा मानवी जीवनातील अविभाज्य भाग आहे. ज्या वेळी भाषा विकसित झाली नव्हती तेव्हा आदिमानव आपल्या भावना चित्राच्या माध्यमातून व्यक्त करीत होता. अश्मयुगातील गुहाचित्रातून हे स्पष्ट झाले आहे. आज ही चित्रकला आदिवासी लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सांस्कृतिक ठेवा आहे. लोककलेची ओळख करून घेऊ.

आबालवृद्धांना चित्र पाहणे आवडते. सरळ साधी सोपी चित्रे सहज समजतात.त्या चित्रातील रंग आकर्षक असतील तर ती चित्रे पुन्हा पुन्हा पहावीशी वाटतात. मधुबनी शैलीची चित्रे सर्वांग सुंदर आहेत.त्यातील विषय,आशय, रंग बघताक्षणी आपल्या खिळवून ठेवतात.

मधुबनी पेंटिंग हा बिहारचा सांस्कृतिक ठेवा आहे.हा चित्र प्रकार सुंदर आहे.ही चित्रे छान तेजस्वी रंगात रंगवलेली असतात. रेखांकन मुक्त असते. पाने, फुले, पक्षी, प्राणी, मासा, देवदेवता, किती सहजतेने काढलेली असतात. १९३४ साली बिहार मध्ये मोठा भूकंप झाला तेव्हा या भागाची पाहणी करण्यासाठी एक इंग्रज अधिकारी तिथे आला तेंव्हा भूकंपात पडलेल्या घराचच्या  भिंती वर सुंदर चित्रे दिसली.त्या चित्राचे त्यांनी फोटो काढले. हे फोटो या चित्र शैलीचे सर्वात जुने नमुने आहेत. ही चित्रे गावातून बाहेर कधी आलीच नव्हती. ही चित्रेशैली आजवर बिहार मधील महिलांनी जोपासली. बिहार मधील काही गावं चा गावं या चित्र शैलीने सजलेली दिसतात. प्रत्येक घरातील चार वर्षाच्या मुली पासून नव्वद वर्षांच्या महिले पर्यत सर्वजण ही चित्रे काढतात. जणू ही चित्र शैली त्यांच्या रक्तातून धावत आहे.

बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यात ही कला विकसित झाली. म्हणून याला मधुबनी पेंटिंग/शैली म्हटले जाते. मधुबनी बरोबर दरभंगा, पूर्णिया, सहसा, मुजक्कापूर व नेपाळचा काही भाग यातून ही चित्रे काढली जातात. ही कला पुरातन काळा पासून प्रचलीत आहे असे मानले जाते. जनक राजाने आपली कन्या  सीता हीच्या विवाह सोहळ्याच्या वेळी संपूर्ण राजवाड्यात, गावात ही चित्रे काढून घेतली होती. म्हणून या  कलेला मिथिला पेंटिंग/शैली म्हणून ही ओळखली जाते. रामायण  काळापासून ही कला चालत आली आहे.

या चित्र शैलीचे दोन प्रकार

१) भिंती चित्रे

२)अरिपन चित्रे

१) भिंतीवर चित्रे काढण्याचे दोन प्रकार पडतात अ) गोसनी म्हणजे देवघराच्या भिंतीवर काढायची चित्रे यात दुर्गा, काली, गणेश, सूर्य, राधाकृष्ण या विषयावर चित्रे. काढतात.

ब) कोहबर म्हणजे शयन कक्ष इथे प्रमुख्याने कमळ,मासा,झाडे, शिवपार्वती,घोडा,सिंह इ.चित्रे रेखाटली जातात.

२)अरिपन म्हणजे रांगोळी. अल्पना ही म्हणतात. घरातील खोलीच्या फरशीवर, अंगणात, सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.त्यात रेषेला जास्त महत्त्व असते.

ही चित्रे काढण्यासाठी बांबूच्या काटक्या, काडेपेटीच्या काड्या यांचा उपयोग होत असे.ही चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.हळदी पासून पिवळा,पळसा पासून लाल,काजळी पासून काळा,तांदळा पासून पांढरा.

चित्राचे रेखांकन प्रथम काळ्या‌ रंगाने करून घेतले जाते. मग त्यात लाल,पिवळा,हिरवा,निळा हे रंग भरले जातात.बार्डर दुहेरी असते.चित्रातील चेहरे व्दिमित एका बाजूला पाहणारे असतात.ही चित्रे सहज समजतात.त्यांतील भाव कळतात .चित्रे आपल्याशी बोलतात म्हणून तर ही चित्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर जावून पोहचली.परदेशातून या चित्रांना मोठी मागणी आहे.विशेषत: अमेरिका,जपान.जपान मध्ये मधुबनी कलेचे मोठे म्युझियम आहे.या कलेच्या प्रसार करण्यासाठी १५० महिला कलाकारांनी मधुबनी रेल्वेस्थानक विनामोबदला सुशोभित केले आहे.नंतर दरभंगा, पूर्णिया,सहसा,मुजक्कापुरही रेल्वे स्थानके ही सुशोभित केली.ही कला केवळ महिलांन मूळे जिवंत आहे.आज पर्यंत महिलांनी टिकवली आणि विकसित केली.या चित्राची वाढती मागणी पाहून पुरुष चित्रकार ही आता तयार झाले आहेत.पण या कलेच्या विकासाचे आणि संवर्धनाचे सारे श्रेय महिलांनाच जाते.

मधुबनी चित्रात साधेपणा दिसतो.बघता क्षणी मनाला भावतात.मनुष्य,पशुपक्षी,देवीदेवता, राधाकृष्ण, शिवपार्वती,फळे फुले,शुभचिन्हे,चित्रे काढली जातात.मातीच्या भिंतीवर, कागदावर, काॅन्व्हासवर, पिलोवर ही चित्रे काढली जातात. सीता देवी यांनी ही कला गावातून बाहेर काढली. दिल्लीत चित्रे पाठवली, प्रदर्शने मांडली, लोकांन समोर मांडली. लोकांना चित्रे समजू लागली मागणी वाढू लागली स्थानिक महिलांना रोजगार मिळू लागला.परदेशातील आर्ट गॅलरीत ही चित्रे पोहचली.चित्रांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढली. सीतादेवींच्या या कामाची दखल घेवून त्यांना बिहार सरकारने पुरस्कार देवून १९६९ मध्ये सन्मानीत केले, तर भारत सरकारने १९८४ ला पद्मश्री देवून सन्मानित केले. ही कला विकसित होण्यास जगदंबा देवी,महासुंदरी देवी,बउआ देवी या महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे.त्यांना ही पद्मश्रीने सन्मानीत केले आहे.

या कलेचे महत्त्व इतके वाढले आहे की स्टेट बॅक ऑफ़ इंडियाने आपले डेबीट कार्ड या चित्राने सुशोभित केले आहे. अनेक रेल्वेचे डबे या चित्राने सजत आहेत.ह्या चित्रातील साधेपण आपल्या आकर्षित करतो.ही कला कलाकारी न राहता आता कारागिरी झाली आहे. अनेक महिला या कलेवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. ही कला केवळ बिहार ची न राहता भारताचा सांस्कृतिक ठेवा झाली आहे. तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यक्तिचित्रण- बाई रामचंद्र सिंदकर ☆ डॉ दिपाली घाडगे

? मनमंजुषेतून ?

☆ बाई रामचंद्र सिंदकर ☆ डॉ दिपाली घाडगे ☆ 

व्यक्तिचित्रण – बाई रामचंद्र सिंदकर

जन्म-१९३२.        

वय वर्ष -८७

बाई म्हणजे माझ्या सासूबाई, दहाबारा दिवसांपूर्वी त्यांचे देहावसन झाले.मला अखंड कुतूहल वाटायचे त्यांच्या नावाबद्दल, व्यक्तिमत्वा बद्दल आणि एवढ्या दीर्घायुष्याबद्दल.

इथे माझ्या सासऱ्यांचा उल्लेख केलाच पाहिजे ‘ कै नारायण घाडगे ‘ सहा फुटांपेक्षा जास्त उंची, गौर वर्ण आणि चेहऱ्यावर कायम एक प्रसन्न,समंजस हास्य,कुठल्याही मदतीला सदैव तत्पर व्यक्तिमत्व. मी सुरुवातीला त्यांना पाहिलं ते लाल रंगाचा स्वेटर घालून घराजवळच्या बागेत बंबासाठी लाकडे फोडताना. त्या

पोशाखात त्यांचे व्यक्तिमत्व अगदी एखाद्या इंग्रजी पिक्चर मधील कलाकारासारखे दिसत होते.

याच्या अगदी विरुध्द बाईंचे व्यक्तित्व. ठेंगणाठुसका बांधा, सावळा नाहीच काळ्याकडे झुकणारा वर्ण आणि नाकीडोळी मात्र ठसठशीतपणा,कपाळावर मोठे कुंकु आणि चेहऱ्यावर आत्म प्रौढी मिरवणारे दिमाखदार हास्य.त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा स्वभाव प्रतीत व्हायचा.अखंड स्वत:च्या तालात असणारे व्यक्तित्व.जणू तो अहंकार त्यांच्या

शरीरालाच चिकटलेला होता आणि तो शेवटपर्यंत तसाच राहिला.

त्याच्याकडे प्रचंड बुध्दीमत्ता होती, नेतृत्वगुण होते शिवाय ज्ञानप्राप्तीची आवड होती,त्यामुळे सतत सल्ला विचारण्यासाठी माणसे येत असत.कधीही फक्त स्वतः च्या कुटुंबाचा विचार करायचा नाही, आपल्या मुलांबरीबरचं त्यांच्या मित्रांनाही खाऊपिऊ घालायाचे.त्या काळी एस टी मध्ये काम करणाऱ्या माणसाचे उत्पन्न ते किती असायचे,पण त्यातूनही सतत परोपकार करत राहायचे.आपली पाच मुलं जशी तशी ती सुध्दा आपलीच मुलं मानायच्या आणि त्यांना शिकण्या साठी सक्रिय प्रोत्साहन द्यायच्या.

त्याची पाचही मुले उच्च शिक्षित आणि आपापल्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणारी.त्या  स्वतः साठ वर्षांपूर्वीच्या म्याट्रिक आणि माझे सासरे संस्कृत मध्ये एम ए होते.(कै नारायण घाडगे विट्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेतील सुरुवातीच्या शिक्षकांपैकी एक होते) त्यामुळे दोघांनाही शिक्षणाविषयी आस्था होती.त्याची मुले माझे मोठे दिर श्री अविनाश घाडगे मुख्याध्यापक म्हणुन निवृत्त झाले, श्री दिनेश घाडगे विट्यातील शिवसेनेचे संस्थापक, श्री सुरेश घाडगे सोलापूर ट्रेनिंग सेंटर येथे DYSP म्हणुन कार्यरत, कै अधिवक्ता सतीश घाडगे प्रथितयश वकील, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे तालुक प्रमुख होते आणि कै राजेश घाडगे यशस्वी वेट लिफ्टर होते.

या सर्वांबरोबर श्री लालासाहेब पवार आणि श्री अरुण फडतरे हे त्यांचे मानसपुत्र देखिल उच्चशिक्षित झाले. पवार सरांनी शेवटपर्यंत त्यांची सेवा केली, त्यांचा कोणताही शब्द डावलला नाही.

बाईंचे माहेर वाई. अागदी नदीकाठालगत ब्राम्हणपुरी मध्ये. त्यामुळे शुद्ध सडेतोड भाषा, ओचा पदर खोचलेली नऊवार साडी आणि आंबाड्यावर खोचलेले एखादे फूल नेहमीच त्यांना शोभून दिसत असे. त्यांचे माहेर देखिल सुशिक्षितच. वडिल शिक्षक होते आणि भाऊ मामलेदार, आई मात्र लहानपणीच वारलेली मग कर्तेपणाने लहान बहिणींची लग्ने बाई भावजींनीच करुन दिली. त्यामुळे सारेच सासऱ्यांना भावोजी म्हणू लागले.

बाई आपल्या वडिलांकडून काही औषध देण्यास शिकल्या होत्या. त्यामुळे काविळीचे  औषध घेण्यासाठी त्यांच्याकडे बरेच लोक येत. त्या देखिल सकाळी सकाळी ओचा पदर खोचून, आजूबाजूला फिरून काही वनस्पती गोळा करत आणि त्या वाटून रस काढून पिण्यास देत, वरुन काही पथ्य सांगत.त्यामुळे मी डॉक्टर असले तरी सुरुवातीला आमच्याकडे येणारे रुग्ण बाईंकडून औषध घेण्यासाठी येत.

अशी ही कृष्णा काठची लेक घाडगेवाडी सारख्या दुष्काळी गावात आली आणि त्या गावची होतकरू व्यक्ती झाली.

तिथली खडकाळ शेती विट्यातील मैत्रिणींना बरोबर घेऊन केली.

या कृष्णा काठच्यां लेकीचे सासरीही तसेच लाड झाले, शिकलेली ज्ञानी म्हणुन. अगदी तिच्या थोरल्या जावेणे, म्हाताऱ्याआईने, इंदुला सिनेमा बघायला आवडते म्हणुन

आपल्या दिराला बैलगाडी जुंपायला सांगावे आणि ती परत येईपर्यंत भाकरी कालवण करुन ठेवावे.

पोथ्या, पुराणे, पचांग जाणत असल्या तरी बाई विचाराने पुरोगामी होत्या. रोजचे वर्तमान पत्र वाचणे आणि टीव्ही वरच्या बातम्या पाहणे हे त्यांचे शेवटच्या पाचसहा वर्षां पूर्वीपर्यंत चे छंद होते. आपल्या मुला, नातवंडांनी आपल्या मर्जीने केलेली लग्न त्यांनी स्वीकारली होती.

आम्हा सुनांच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्वभावानुसार फार लावून घेतले नाही, पण आमच्या शिक्षणाला व्यक्तिमत्व विकासाला कधी बाधा आणली नाही. माझ्या मोठ्या जाऊबाईंच BA Bed, नंतरच्या BSc,नंतर MSc Bed   आणि माझे BAMS  या साऱ्या पदव्या लग्नानंतर घेतल्या गेल्या आहेत आणि आम्ही साऱ्याजणी स्वतः चा पायावर उभ्या आहोत, यातच सारे काही आले.

बाईंच्या नातसूनांनीही ही परंपरा पुढे चालवली. सौ कविता MA Bed, सौ  अमृता Phd,. सौ अनुजा ME, त्याचबरोबर त्यांची सारी नातवंडेही उच्च शिक्षित असून विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नातावंडाला दिलेले वेगवेगळे नाव बाळक्या,गुंड्या,पप्या ही त्यापैकी काही. सगळ्यात लहान नात म्हणजे माझी मुलगी.तिला त्या नेहमी आवडे या नावानेच हाक मारत. असा बाईंच्या वारसांचा वटवृक्ष विस्तारला आहे. एक सुफळ संपुर्ण आयुष्य त्यांना लाभले.

सारं आयुष्य भरल्या घरात, खूप माणसं अवतीभोवती असं गेलं त्यामुळे थोडथोडक काही करायचं माहीतच नाही, जे केलं जायचं ते अगदी डबे भरभरून असायचं.भाकरी चपाती बरोबर पुरणाची पोळीही पोळपाट भरुन लाटली जायची, त्यामुळे आयुष्याच्या शेवटी जेव्हा नवरा, आणि दोन तरुण मुलं यांचं जाणं बघावं लागलं, घरातली माणसं कमी झाली तसा स्वभाव अधिक दुराग्रही झाला. तरी त्यांची जीवनेच्छा जबरदस्त होती आणि त्यांच्याजवळ वर्तमान काळात जगण्याची हातोटी होती.

बरीच वर्षे मला कोडे पडले होते त्यांना बाई का म्हणत असावेत आणि विशेष म्हणजे त्यांना बाई म्हटलेले आवडायचे, आपल्या परतवंडांना ही त्या स्वतः ला बाई म्हणायला शिकवत, तसे त्यांचे नाव इंदिरा ठेवले होते.

नंतर मी कोठेतरी वाचले की महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वी घरातली मोठ्या मुलीला बाई म्हणायची पद्धत होती, जसं ताई, अक्का तसं बाई. म्हणजे बाई हे त्यांचे माहेरचे नाव होते आणि म्हणुनच त्यांना बाई म्हटलेले आवडायचे.

© डॉ दिपाली घाडगे

विटा

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अहमदनगर जिल्ह्यातील माॅरिशस… ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ अहमदनगर जिल्ह्यातील माॅरिशस… ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆

अहमदनगर जिल्ह्यातील मॉरिशस  म्हणजे अकोल्यातील “फोपसंडी” गांव जेथे आजही सुर्योदय 9 वाजता आणि सूर्यास्त 4.30 ला होतो

अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणजे निसर्ग सौदर्याचे माहेरघर. भंडारदरा धरण, रंधा फॉल, रतनगड, कळसुबाई शिखर, हरीचंद्र गड, सांदण दरी  हे पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटनाचे माहेरघर म्हणून जनतेला माहीत आहे.पावसाळ्यात हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे भेट देतात. अगदी तासनतास ट्रॅफिक जॅमचा इकडे येतांना अकोला सोडल्यानंतर  अनुभव घ्यावा लागतो.

मात्र  पर्यटकांच्या नजरेतून सुटलेलं व निसर्ग सोंदर्याने भरलेलं प्रति “मॉरिशस” असलेलं हे 1200 लोकवस्तीचे ” फोपसंडी” गांव अकोलेपासून अवघे अंदाजे 40 कि. मी. अंतरावरील अनेक मोठमोठे डोंगर पार करून दरीच्या तळाशी वाड्या, पाड्यावर वसलेलं अतिदुर्गम गांव आहे.

या गांवचा इतिहास ही रंजक आहे. साधारणतः 1925 च्या सुमारास संगमनेर प्रांताचे इंग्रज अधिकारी “फोप” हे  घोड्यावरून जंगलात फिरत फिरत या दरीत उतरले. तेथे त्यांना आदिवासींची वस्ती आढळली. या “पोफला” येथील निसर्ग खूप आवडला.व येथे तो दर रविवारी येऊ लागला. येथे राहण्यासाठी त्यांनी “मांडवी नदीच्या” तिरावरील टेकडीवर त्याचे रेस्ट हाऊस बांधले. तेथून तो वरील चार ही जिल्ह्याच्या सिमेवरील डोंगर,  कोंबड किल्ला (कुंजीर गड),  चोहोबाजूंनी धबधबे  पाहण्याचा आनंद घेत असे. पोफच्या या राहण्याने नंतर या गावाला “पोफसंडी” म्हणू लागले. नंतर त्याचा अपभ्रंश होऊन “फोपसंडी” हे नांव रूढ झाले. ते आजतागायत तसेच आहे.

स्वातंत्र्यानंतर ही 50 वर्षे हे गांव शासनाच्या सर्व सोई सुविधांपासून वंचित होते. अगदी निवडणुकीच्या वेळी ही गाढवावरून 10 कि.मी. मतदान पेट्या नेल्या जात होत्या. 1997 मधील गावातीलच दत्तात्रय मुठे ही व्यक्ती पुणे येथून परत गावांकडे आली. व गांवात  रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, एस टी इत्यादी सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांपासून ते तालुका स्तरापर्यंत सतत पत्रव्यवहार केले,पायपीट केली. सर्वात प्रथम गावांत बस येण्यासाठी त्यांनी सरकारदरबारी प्रयत्न केले.शेवटचे हत्यार गावकऱ्यांनी गावातच  सांघिक आमरण उपोषणाबाबतचे हत्यार उपसले. नाईलाजाने अधिकारी वर्गांना गावात  पायी यावे लागले. शेवटी गावांत रस्ते आले, बस आली. 2005 ला गावांत रस्ते, वीज यासाठी स्थानिकांनी श्रमदानाचा मोठा सहभाग उचलल्याचे या योजना इथपर्यंत पोहचू शकल्या. आज गांव 100 टक्के हागणदारी मुक्त दिसून आले. गावांत 10 वी पर्यंत शाळा, आहे. वाड्या वस्त्यांवर सिमेंट रस्ते आहेत. नळयोजना आहेत.अकोले येथून रोज एक मुक्कामी बस येते. गावांत अंगणवाड्या आल्या आहेत. नदीवर, ओढ्यावर बंधारे आहेत.

? अजूनही काय सुधारणा आवश्यक आहे ?

१) गावांत पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. म्हणजे स्थानिकांना पर्यटनातून रोजगार मिळेल.

२) दळणवळणासाठी रस्ते अजून मोठे व चांगले होणे गरजेचे आहे.

३) येथून माळशेज घाट अवघा 10 कि. मी. अंतरावर आहे. किमान 3 कि. मी. डोंगर फोडून रस्ता केला तर माळशेज अगदी जवळ येईल. व दळणवळण, पर्यटन वाढेल.

४) गावांत बँक येणे आवश्यक आहे.

५) सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलीही दूरध्वनी सेवा, मोबाईल सेवा, इंटरनेट सुविधा गावात नाही.ते होणे गरजेचे आहे.

६) गावातील दूध दररोज 5 कि.मी घेऊन जावे लागते. त्यासाठी गावातच डेअरी होणे आवश्यक आहे.

या गांवचे अनेक  वैशिष्टये सांगता येतील त्यातील काही प्रामुख्याने खाली देत आहे.

१) अहमदनगर, नाशिक, पुणे, ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेवटचे गांव)

२) पावसाळ्यात तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याने अजूनही गावातील बहुतांश आदिवासी गुराढोरांसह पावसाळ्याचे चार महिने गुहेचा आसरा घेतात..

३)) या गावात  सकाळी नऊ वाजता सूर्योदय व संध्याकाळी साडेचार वाजता सूर्यास्त होतो. हा दोन्ही देखावा पर्यटकांनी पाहणे म्हणजे पर्यटकांना  कपिलाषष्टीचा योग होय.

४) पर्यटनाच्या दृष्टीने फोपसंडी परिसरात ” कोंबड किल्ला, भदभद्याचा धबधबा, धुळगडीचा धबधबा, धारीचा धबधबा, कावड्याचा धबधबा, चोहडीचा धबधबा, काजवा महोत्सव, आदिवासी नृत्य, निसर्गसॊदर्याने भरलेला  मानखांदा गायदरा, सानदरी, निखळीचा डोंगर, बाळूबाईचा डोंगर, रांजण्याचा डोंगर, टकोरीची खिंड, वारल्याचा कडा, चारण गडद, दोंड्याची गडद, घोडगडद, केमसावण्याचे पाणी, उंबारले,  अनेक गुहा, तसेच कळमजाई मंदिर, बर्डीनाथ मंदिर, दर्याबाई मंदिर, राणूबाई मंदिर इतके प्रचंड निसर्ग सॊदर्याने भरलेले पॉईंट  येथे पहावयास मिळतात. मात्र त्यासाठी किमान तीन दिवस  पायी भटकण्याची तयारी हवी.

५) या गावचे पाणी पिण्यासाठी अतिशय गोड आहे. तसेच धबधब्याखाली आंघोळ केल्यावर शांपू न लावता ही केस कुरळे होतात.

६) पर्यटकांना राहण्याची, जेवण्याची व पर्यटन घडवून आणण्याची व्यवस्था या गावातीलच फोपसंडीचा कायापालट धडवून आणणारे तथा गाईड श्री.दत्तात्रय हनुमंता मुठे यांचे सह्याद्री दर्शन पथिकालय आहे. मात्र त्यासाठी पर्यटकांना 7218327435, 8669754121, 9850989183 या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. वरील मोबाईलला फोपसंडीत रेंज नसल्याने दुसऱ्या गावात आल्यावरच फोन लागतो.त्यामुळे वारंवार फोन लावावा लागेल.

मॉरिशससारखा छोटा देश आज केवळ तिथल्या सरकारने पर्यटन सुविधेवर भर दिल्याने तिथला निसर्ग पाहण्यासाठी जगभरातील लोक तिथे जातात. भारतात ही फोफसंडी सारखे अनेक निसर्ग सॊदर्य असलेली ठिकाणे आज पर्यटकांपासून वंचित असल्याने तेथील जनतेचा विकास खुंटला आहे.तसेच पर्यटक निसर्ग सॊदर्याला मुकले आहे.चला आपण ही पर्यटनासाठी  या निसर्गरम्य व शांतताप्रिय दरीखोऱ्यातील “फोपसंडी” पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्या.  पर्यटन करून आल्यावर  तेथील सुवासिक तांदूळ, मध, व चुलीवरच्या तांदळाच्या भाकरी, मासवडी, लज्जतदार शेवंती तसेच  गावरान कोंबडीचाही आस्वाद घ्या.

चला तर मग कधी निघताय पर्यटनाला”फोपसंडी”येथे.

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाऊलखुणा – २ ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? मनमंजुषेतून ?

☆ पाऊलखुणा – २ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ 

(या लेखमालेचा पहिला भाग अनावधानाने “आत्मसाक्षात्कार” – १ या शीर्षकाखाली प्रकाशित झाला आहे, ही “पाऊलखुणा” नावाची लेखमाला आहे.)

लिंक  >> पाऊलखुणा – १

माझा जन्म माझ्या आजोळी झाला. आजी आजोबांच्या सुंदर बंगल्यात…ते ठाणे जिल्ह्यातील छोटसं टुमदार गाव! मोठ्या भावानंतर झालेलं मी दुसरं अपत्य! भावाचा जन्म वाडा या तालुक्याच्या गावी हॉस्पिटल मधे झाला.

 माझी आजी वाडा या गावातल्या सरकारी दवाखान्याच्या कमिटीवर चेअरपर्सन होती त्यामुळे ट्रेन्ड नर्सला घरी बोलवून आईचं हे दुसरं बाळंतपण आजीनं घरातच केलं! माझ्या जन्माच्या वेळी आजी आजोबा, मामा मावशी आणि माझा सव्वा वर्षाचा मोठा भाऊ इतकी माणसं घरात होती. कार्तिक प्रतिपदेचा, रात्री १२.४७ चा माझा जन्म !  तारीख   २० नोव्हेंबर १९५६ ! माझ्या आईला माझं नाव मृणालिनी ठेवायचं होतं  पण मामांनी चंदाराणी ठेवलं!जे मला मुळीच आवडायचं नाही.

खुप संपन्न घरात आणि निसर्गरम्य परिसरात माझा जन्म झाला, आजोबांनी तो बंगला त्यांच्या आमराईत बांधला होता, आजीआजोबा दोघेही सुशिक्षित, सुसंस्कृत, सामाजिक कार्यकर्ते, मामा पुण्यात एस. पी.काॅलेज मधे शिकत होते, मावशी नुकतीच मॅट्रीक पास झालेली, आजोळी आम्हा नातवंडांचे खुपच लाड झाले. मी आणि माझा मोठा भाऊ तीन चार वर्षाचे होईपर्यंत आजोळीच वाढलो. कारण माझ्या धाकट्या बहिणीच्या जन्माच्याआधी आई बरीच आजारी होती त्यामुळे आम्हा दोघांना माहेरी ठेऊन ती सासरी निघून गेली होती. आमचं हे आजोळ वाडा तालुक्यातलं तेव्हा ठाणे जिल्ह्यात असलेलं पण आता पालघर जिल्ह्यात गेलेलं छोटंसं गाव “वरले” नावाचं!गावात देशमुखांची सात आठ घरं बाकीचे कुणबी, कातकरी, कोळी, वारली लोक!

घरात कामाला कोळीण होती! ती घरात झाडलोट, धुणीभांडी, गड्यांसाठी नाचणीच्या आणि घरात नाष्ट्याला तांदुळाच्या भाकरी करत असे, चंदु आणि अप्पा नावाचे दोन गडी कायमचे जेऊन खाऊन होते.

माझी आजी सुगरण होती आणि वेगवेगळे पदार्थ करायची तिला आवड होती. माझं आजोळ आणि वडलांचं गाव दोन्ही कडे संपन्नता होती, भरपूर शेतीवाडी, दुधदुभतं, फळफळावळ, भाजीपाला, धनधान्य सगळं मुबलक होतं! आजोळ कोकणात तर वडिलांचं गाव घाटावर! मला ती दोन्ही गावं अजूनही खुप आवडतात. आमच्या शिक्षणासाठी १९६० साली आम्हा सख्ख्या चुलत पाच भावंडांना घेऊन आईनं पुण्यात बि-हाड केलं, आम्ही तीनचार वर्षे सदाशिव पेठेत तर तीन वर्षे डेक्कन जिमखान्यावर राहिलो! कधी दिवाळीच्या सुट्टीत तर कधी मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आजोळी जायचो, दोन्ही मामा मुंबईत तर कोल्हापूर सासर असलेली मावशी पण काही काळ पुण्यात रहात होती, सुट्टीत मावस, मामे भावंडं भेटत असू. मोठे मामा सिव्हिल इंजिनियर होते, त्यांच्याकडे कंपनीची “डाॅज”  होती,काळ्या रंगाची,त्या गाडीतून ते आम्हाला जवळपास च्या ठिकाणी विशेषतः वज्रेश्वरीला  फिरवून आणत! मे महिन्यात भरपूर हापूस आंबे असत! जांभळं, पेरू, चिक्कू, केळी बंगल्या भोवती ही असंख्य फळझाडं आणि फुलझाडं होती.जंगलात जाऊन करवंदं तोडायची, तळ्यावर फिरायला जायचं, भावंडांबरोबर पत्ते, बुद्धीबळ खेळायचे…अशी मस्त सुट्टी असायची!

त्या बंगल्यात वरच्या मजल्यावर स्वतंत्र अभ्यासिका होती कपाटात, मांडणीवर असंख्य मासिके, पुस्तके होती, आम्हा मुलांसाठी चांदोबा, अमृत ही  मासिके आणली जात. गावात असलेले चुलत मामा, मावशी ही खुप प्रेम करायचे. आजोळच्या सगळ्या आठवणी हापूस आंब्यासारख्या मधूर आहेत!

मध्यरात्री जन्मताना घेऊन आले चांदणे

गर्द काळ्या त्या तमाला भेदून आले चांदणे

जन्म जेथे जाहला त्या गावात माझा चांदवा

त्याच गावी आठवांचे ठेवून आले चांदणे

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका मोटरमनचं आयुष्य ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एका मोटरमनचं आयुष्य ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर☆

एक मोटरमन ( लोकल ट्रेनचा ड्रायव्हर) याने हे लिहिले आहे

शेवटची लोकल निघते सीएसटीवरून 12. 37 ला. आणि शेवटची पोहोचणारी लोकल असते 1. 38 ची. 12 वाजून 37 मिनीटांनी निघालेली लोकल तीन च्या दरम्यान पोहोचते कर्जत ला. तिथून ती रिटर्न निघते साधारण साडे चारला. मधल्या काळात मोटरमन आणि गार्ड आराम करतात ते त्यांच्यासाठी खास बनवलेल्या रेस्ट रुम मध्ये. तसं प्रत्येक मोटरमन आणि लोकल गार्ड यांच्यासाठी ड्युटी अवर्स असतात अधिक तम 6ते8तास. हे तास ट्रेनच्या रनिंग टाईमनुसार मोजले जातात. त्यात ट्रेन कुठे किती वेळ थांबली वगैरे ग्राह्य धरलं जात नाही. पण त्या  तासात पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून एकटक एका नजरेनं एका दिशेत पाहत राहणं, योग्य अंतरावर प्रॉपर नोटिफिकेशन देणं, दर चारशे मीटरवर येणाऱ्या सिग्नलला तपासणं शिवाय प्रत्येक स्पीड इंडिकेटरवर लक्ष ठेऊन स्पीड मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. रात्रीच्या वेळेस हे काम फार जिकीरीचं असतं. जर स्पीड 40 ऐवजी 42 वर जरी गेला तरी मोटरमन आणि गार्ड यांना कंट्रोल रुमकडून ताकीद जाते. ड्युटी संपल्यावर त्याचं लेखी कारण द्यावं लागतं. एखाद्या वेळेस मोटरमन कडून सिग्नल असताना जरी ट्रेन क्रॉस केली गेली तर अवघ्या पाचशे मीटर अंतर पुढे गेल्यावर ट्रेन आपोआप बंद होते. नवीन मोटरमन बोलावला जातो. चूक झालेल्या मोटरमनला आणि गार्डला आधी सस्पेंड केलं जातं मग चौकशी आयोगाला सामोरं जावं लागतं. चौकशी आयोगाच्या फेऱ्यात रेल्वे कर्मचारी अडकला की त्याचं त्यातून सुटणं मुश्किल असतं. तर ह्या अशा वाहनचालकांच्या बाबतीतलं थोडंसं.

मी अनेकदा यांच्या रेस्ट रुम मध्ये शिरून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. स्वभावाने बरे असतात. पण अबोल असतात. रोज रोज एकच रस्ता. तेच रुटीन, तेच सिग्नल, तेच काम त्यांच्या स्वभावाच्या एकसुरीपणाला कारणीभूत असेल असं वाटलं होतं. पण खरं कारण वेगळंच होतं. त्यातील काहींनी सांगितलेलं कारण फार भयानक होतं. प्रवाशी फुटओव्हर ब्रीजचा वापर करत नाहीत. अपघात होतात. वारंवार हाय डेसीबलचा हॉर्न वाजवून आमच्या कानांचे पडदे फाटतात पण बेजबाबदार प्रवाशांना स्वतःची काळजी करावीशी वाटत नाही. काही लोक आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर निर्धास्त होऊन उभे राहतात. काही मान रुळावर ठेऊन झोपून जातात. काही संडास करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर बसतात ते ही कानाला हेडफोन लावून. रेल्वे क्रॉसींग करताना कानात हेडफोन लावतात. त्यांचं चिरडलं जाणं, कापलं जाणं, तुकडे तुकडे पडलेले शरिर आम्हाला दर दोन तीन दिवसाआड एकदा तरी पहावंच लागतं. जेव्हा जेव्हा कुणी आत्महत्या करतं, ट्रेनमधून पडून मरतं, क्रॉसिंगच्या वेळेस मृत्यूमुखी पडतं तेव्हा आमचं हृदय काही काळासाठी स्टॉप झालेलं असतं. पण ट्रेन चालू असते. लगेच भानावर यावं लागतं. डोळे सुद्धा मिटता येत नाहीत. सिग्नल चुकवायचा नसतो. नाहीतर मोठ्या अनर्थाला सामोरं जावं लागू शकतं. पाहीलेला आघात कडु घोटासारखा गिळून घ्यावा लागतो. थोडा वेळ ही मिळत नाही सावरायला.

एकदा मोटरमनच्या कोचमधून प्रवास करत असताना एका मुलाने अगदी ऐन वेळेला ट्रॅक क्रॉस केला. थोडक्यात बचावला. ट्रेन साधारण ऐंशीच्या स्पीडला होती. मोटरमन भलताच वैतागला. खिडकीच्या बाहेर डोकं काढून त्या पोराला मजबूत शिव्या हासडल्या. म्हणाला, मादरचोद मेरी ही ट्रेन मिली थी क्या तुझे मरने के लिए? त्याचं हे बोलून होईपर्यंत गाडी बरीच पुढे निघून गेली होती. त्याचं बोलणं काय त्या मुलाला ऐकू जाणार नव्हतं. पण तरी मनातला राग व्यक्त करण्याचा त्याचा हा प्रकार होता. (शुभ अप झालेला BP नाॅमल करण्याचा प्रकार समजा हव तर)असो..

लास्ट लोकल च्या प्रवासात रुटीन अपघात होत असतात. कुणी दारातून पडतं तर कुणी ट्रेन पकडण्याच्या नादात तरी पडतं. तर कुणी लोकल सायडींगला लावल्यावर झोपायला मिळावं म्हणून अपोझिट साईडनं चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तरी चाकांमध्ये अडकतं. काही पोलिसांचा अटकाव नको म्हणून टपावर लपून बसतात. काही कपलिंगच्या स्पेस मध्ये लपतात. लपणारे, चढणारे तीनेक तासांसाठी आसरा शोधत असतात. काहींना गर्द घ्यायची असते,…

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्णावळ…. ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ कृष्णावळ…. ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज आमच्या सासूबाई म्हणाल्या पोह्यांसाठी 2 कृष्णवळ द्या. मी ऐकतच राहिलो. मग त्या म्हणाल्या अहो म्हणजे कांदे !

कांद्याला कृष्णवळ म्हणतात हे मला पाहिल्यानंदीच समजले.

कृष्णावळ….. अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द !

आजकाल कोणीही नाही वापरत !

कृष्णावळ चा अर्थ कांदा !

कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे.

कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो… आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो.

शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत.

ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.

कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे.

पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार  व  पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो… आहे की नै गंमत…

डोळ्यातून पाणी काढणारा कांदा किती वेगळ्या उंचीवर गेला ना कृष्णावळ या शब्दामूळे !

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 – स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? मनमंजुषेतून ?

☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 – स्व दत्ता हलसगीकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

करुणाघन, कोषातून बाहेर, आशयघन,उन्हातल्या चांदण्यात, चाहूल वसंताची, शब्दरूप मी, सहवास, ऋतू सोहळे, झोका ( बालकविता )हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. कवितेतील अमृतघन (समीक्षा), तरुणासाठी दासबोध (ललित), परखड तुकाराम (ललित), बहिणाबाईंची गाणी (संपादित)ही त्यांची इतर पुस्तके आहेत.

सोलापूरची अर्वाचीन साहित्यिक ओळख म्हणून कवी संजीव, कवी रा.ना. पवार आणि कवी दत्ता हलसगीकर या त्रयीकडे पाहिले जाते. नवकवी आणि साहित्याच्या अभ्यासकांच्या पाठीवर दत्ताजींचा नेहमीच प्रोत्साहनाचा हात असे. दत्ताजींच्या नावे महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर ही संस्था ‘ कविवर्य दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय श्रेष्ठ साहित्य पुरस्कार ‘ देत असते. अनेक नामवंत साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे.

मलेशियातील जागतिक मराठी साहित्य संमेलनात फक्त दत्ताजींच्या कवितांचा विशेष कार्यक्रम झालेला होता. कार्यक्रमानंतर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना स्टँडिंग ओवेशन दिले होते.

आकाशवाणी हीरक महोत्सवानिमित्त १९ मार्च २०१३ रोजी दत्ताजींवर ‘ शुभंकराचा सांगाती ‘ नावाचा कार्यक्रम प्रसारित झाला होता. त्यात त्यांच्या कवितांचे वाचन, गायन सादर झाले होते.

 दत्ताजींच्या वागण्या, बोलण्यात एक अंगभूत साधेपणा होता. तो शेवटपर्यंत टिकून होता. वास्तविक जीवनातही ते अगदी मोकळ्या मनाने एक ‘जिंदादिल’ माणूस म्हणून वावरले. जीवनातील आनंद कसा घ्यावा यावर त्यांनी खूप सुंदर भाष्य केलेले आहे ते त्यांच्या ‘वय’ या कवितेत.

☆ वय ☆

वय झाले असेल माझे नाही असे नाही,

अजूनही फुलांची निमंत्रणे येत असतात मला |

डोळ्यावरच्या चष्म्याच्याही पलीकडचा

हिरवागार बहारदार खुणावतोय मळा ||

 

तुकारामाचा अभंग उत्कट ओढ लावतो तरी

अजूनही आर्त गझलेची चढते नशा | दिवसभर मग्न असतो माझ्या व्यापात मी

रुमझुमणारे पैंजण बांधून अजून येते निशा ||

 

सगळेच ऋतू वेढून आहेत, वसंत तर सखा

मस्त कोसळणार्‍या पावसात अजून राहतो उभा

दरवळणारा सुगंध घेऊन भेटते लाजरी उषा

वेड लावते अजून मला नक्षत्रांची आभा ||

 

वय म्हणजे नक्की काय, वार्धक्याची व्याख्या काय

न बोलवताही आपण, येतच असते मरण

पैलतीरावर नजर तरी जत्रेत रंगलो आहे

झुलते माझ्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण ||

 

असे हे मनाचे चिरतारुण्य त्यांनी शेवटपर्यंत जपले. कवितेच्या रचनात्मक स्वरूपावर हरखून न जाता आशयाशी प्रामाणिक राहायला हवं या विचारांवर ते ठाम होते. म्हणूनच ते सहजपणे लिहितात,

दारे उघडी ठेवली म्हणून फार बरे झाले

नाहीतर सडून गेलो असतो हवाबंद पोकळीत

उघड्या दारातून थोडीशी धूळ आली हे मान्य

वाऱ्यासवे सुगंधाच्या लाटाही आल्या झुळझुळत ||

रसिक मनाच्या दत्ताजींचा दृष्टिकोन खूप आशावादी होता. छोट्या छोट्या गोष्टीत जीवनातला आनंद शोधणारा होता. त्यात लढाऊ बाणा होता, तशीच फुलांची नाजूक गुंफण होती. ते म्हणतात,

जीवनात सारंच घडत नसतं आपल्या मनासारखं

नाही त्याचा नाद सोड, आहे त्याचा हात धर

जीवनावर प्रेम कर, जगणं फार सुंदर आहे

अमावस्येच्या रात्रीलाही नक्षत्रांच झुंबर आहे ||

ही त्यांची सदाबहार, सकारात्मक वृत्ती नीरस, कंटाळवाण्या नकारात्मकतेतून बाहेर काढणार आहे. असे हे विचारसंपन्न व्यक्तिमत्व ९ जून २०१२ ला आपल्यातून निघून गेले. जाता जाता ‘नेत्रदान’ करवून त्यांनी आपल्या शब्दांना कृतीची जोड दिली.त्यामुळे प्रतिभाशाली कवी बरोबरच सर्जनशील व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा दृढ झाली.
अनंताच्या प्रवासाला जाण्याआधी ऋणनिर्देश करताना ‘तुमच्यामुळेच’ या कवितेत ते लिहितात,

तुमच्यामुळेच अंधारातून सुखरूप चालत आलो

आणि सुरेख घराच्या दाराआड येऊन पोहोचलो

अशी किर्रर्र रात्र होती उरात होती भीती

तुमच्या शब्दातला उजेड घेऊन,उजेड होऊन आलो ||

समाप्त

(संदर्भ — गुगल)

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ यमक ☆ सुश्री सुषमा जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ मनमंजुषेतून ☆ यमक ☆ सुश्री सुषमा जोशी ☆ 

ज्योतिताईंनी एकदा विचारलं, “एका ओळीने शेवट झाला की पुढच्या कडव्याची सुरुवात त्याच ओळीनं होते, या काव्यप्रकाराला काय म्हणतात?”  माझा हक्काचा स्रोत  म्हणजे आईदादा!

दादांचा फोन बंद होता आठ दिवसांपासून! जाम बेचैन झाले. म्हणून आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करून ठेवलं. पाचव्या मिनिटाला दादांचा फोन!

“अगं, आत्ताच फोन सुरू झाला आणि तुझा मेसेज वाचला. ऐक, यमकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तू म्हणतेस ते दामयमकाच्या जवळपास जाणारं यमक असेल, असं आई म्हणत्ये.”

मागून मला आईच्या नाजूक गुणगुणण्याचा आवाज आला. आईची स्मरणशक्ती अफाट! कोणतीही कविता पाठ असते.

‘श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया|

मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया|

सारा या प्रभुची हे लीला गाती सदैवही सुकवी|

सुकवी भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी|’

(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा.)

दादा म्हणाले, “हे बघ ऐक!” त्यांनी तोवर, ते आठवीत असतानाचं (आईला ८४ वर्षे पूर्ण होतील आता. दादा ८६ वर्षांचे!) मराठीचं पुस्तक आणलं होतं.  पाय प्रचंड दुखतात त्यांचे! पण ब्रिज आणि भाषा हे विषय आले की, त्यांना पंख लाभतात!

तर कुमार भा. वि. जोशी, इयत्ता आठवी, असं लिहिलेलं पुस्तक हातात घेऊन त्यांनी मला यमकाचे प्रकार सांगितले. थोडक्यात इथे मांडत आहे.

१) एकाक्षरी यमक: 

एक्या पदे भूमि भरोनि थोडी

दुजा पदे अंडकटाह फोडी

(डी ला डी हे एकाक्षरी यमक)

२) द्व्यक्षरी

दे तीसरा पाद म्हणे बळीला

म्हणोनी पाशी दृढ आकळीला

(ळीला हे द्व्यक्षरी)

३)चतुराक्षरी

बाई म्यां उगवताच रवीला

दाट घालुनि दही चरवीला

त्यात गे फिरवितांच रवीला

सार काढुन हरी चरवीला

(काय अफाट आहे ना हे!  प्रत्येक ‘चरवीला’ वेगळा आशय मांडतो.)

४) मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदि चरण सारखा.

सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात

तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात

५) दामयमकाचं उदाहरण वर दिलंच आहे.

६) पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक.

सुसंगति सदा घडो… पडो.. झडो… नावडो

७) अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक.

वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो

(वाजत गाजत साजत आजत याजत.. अशी गंमत आहे.)

मज मागे मत्स्यांचा हा रिपु – शशि- राहु- बाहु राणा हो

८) युग्मक यमक हा भन्नाट प्रकार आहे.

पायां नमी देइन वंश सारा

पा या न मी दे इनवंशसारा

(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम!)

९) समुद्रक यमक

हेही अफाट प्रकरण आहे. –

अनलसमीहित साधी राया, वारा महीवरा कामा

अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा

(हे पृथ्वीपते धर्मा, वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला  साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, बलरामही हवे तर येतील. मग वराका (बिचारी) मा (रुक्मिणी) तुझ्या साह्यास का येणार नाही?

अशा यमकांत चमत्कृती असते. पण काव्याचा ओघ नसतो. हे काव्य कृत्रिम असलं, तरीही हे प्रतिभेचंच देणं, लेणं आहे हे निःसंशय!

©️ सुश्री सुषमा जोशी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे भारतातच घडू शकतं… भाग-2☆ सुश्री मृदुला बेळे

?इंद्रधनुष्य? 

☆ हे भारतातच घडू शकतं… भाग-2 ☆ सुश्री मृदुला बेळे☆

एकदाची  शेवटच्या मजल्यावरच्या त्यांच्या भव्य कार्यालयात जाऊन पोचले. त्यांच्या कार्यालयात होते ते स्वत: आणि एमके हमीद- त्यांचे बंधू. लालसर गोरापान रंग, पूर्ण चंदेरी झालेले केस, तीक्ष्ण नजर पण बोलण्यात अत्यंत मार्दव असलेले माझ्या आजोबांच्या वयाचे डॉ. युसुफ हमीद. त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक वलय होतं…आणि त्यांच्यासमोर बसल्या बसल्या ते मला जाणवू लागलं. त्यानी मजेशीर बोलून माझी चिंता एकदम दूर पळवून लावली आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मला हे का लिहावसं वाटतंय असं त्यानी आधी समजून घेतलं. मग मी किती पाण्यात आहे हे जोखण्यासाठी त्यानी मला माझं या विषयातलं ज्ञान तपासून पाहणारे काही प्रश्न विचारले. आणि मी बरोबर उत्तरं दिल्यावर मग मला म्हणाले, ” हं…आता विचार”. आणि मी त्यांची मुलाखत घेऊ लागले.

उत्तरं देताना प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी लख्ख आठवत होती. किती तरी औषधांच्या रासायनिक संरचना ते समोरच्या वहीत झरझर  काढत होते. मधनंच ” रोझी sssरोझीssss” अश्या मोठमोठ्याने हाका मारत आपल्या सेक्रेटरीला कुठला तरी शोधनिबंध,  वृत्तपत्रातला एखादा लेख, एखादं पुस्तक आणायला लावत होते. जेवायची वेळ झाली. त्या दिवशी प्रत्यक्ष डॉ.  युसुफ हमीद याच्या पंगतीला बसून जेवण्याचा मान माझ्या नशिबात होता. जेवणं आटपून कॉफी पीत पीत आमची मुलाखत परत सुरू झाली. त्या दिवशी संपली नाही म्हणून दुसऱ्या दिवशीही  चालू राह्यली. बोलण्याच्या ओघात मी ज्या लोकांशी बोलायला हवं अश्या किती तरी लोकांची नावं ते मला सांगत होते आणि मी लिहून घेत होते. मुलाखत संपवून  मी नाशिकला परत आले तेंव्हा मी खरोखर थक्क झाले होते. डॉ.  हमीद यांच्या ज्ञानी, मृदू हुशार व्यक्तीमत्वाने दीपून गेले होते.

दोनच दिवसात त्यांच्याकडून एक खोकं भरून पुस्तकं, सीडीज, वृत्तपत्रीय लेख माझ्या घरी येऊन पोचले. त्यानंतर त्यानी सांगितलेल्या या लढ्यातल्या शिलेदारांना शोधून काढून त्यांच्याशी संपर्क करण्याचा माझा उद्योग सुरू झाला. ही मंडळी जगभर पसरलेली होती.

मी राजहंसच्या दि. ग. माजगावकरांना पुस्तकाची कल्पना कानावर घातली आणि त्यांनीही पुस्तक करायला आनंदाने होकार दिला. देशोदेशी पसरलेल्या माझ्या कहाणीच्या नायकांचा शोध घेण्यात गुंतून गेले.

विशेष उल्लेख करीन तो न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रात आरोग्य विषयक लिखाण करणारे पत्रकार डोनाल्ड मॅकनील यांचा. डोनाल्डने मला आतोनात मदत  केली.  डॉ. हमीद यांचं काम सगळ्यात आधी जगाच्या नकाशावर जाहीरपणे आणलं ते डोनाल्डने- न्यू यॉर्क टाईम्समधे याबाबत लेख लिहून. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला डोनाल्डने मला  मोठमोठे ईमेल्स लिहिले, दुसऱ्याना  फोनवर दिलेल्या मुलाखती मला पाठवल्या, स्वत: लिहिलेलं काही लिखाण पाठवलं…आणि इतर किमान पन्नास लोकांशी माझ्या ओळखी करून दिल्या. या सगळ्यांची मी आजन्म  ऋणी राहीन.

तुरीनला असताना जी कहाणी ऐकून मी प्रचंड अस्वस्थ झाले होते, हलले होते, ती कहाणी या सगळ्या मंडळींबरोबर जणू पुन्हा एकदा जगले. त्या कहाणीचा एक भाग झाले. या सगळ्यांशी बोलताना, या बद्दल लिहिताना अनेकदा फार  भावनिक व्हायला झालं. ही कहाणी लिहिताना औषधनिर्माणशास्त्राची एक प्राध्यापक आणि आजन्म विद्यार्थिनी म्हणून माझी सामाजिक बांधिलकी काय आहे याची लख्ख जाणीव मला झाली. ती जाणीव माझ्या विद्यार्थ्यांमधे यावी म्हणून मी फार विचारपूर्वक प्रयत्न करू लागले.

या विषयातली सगळी तांत्रिक माहिती लिहायची,  पण ती सामान्य माणसाला समजली पाहिजे, त्यासाठी ती कादंबरीसारख्या फॉर्ममधे कशी लिहिता येईल, हे एक मोठंच आव्हान होतं.

सामान्य माणूस महाग औषधं घेत राहतो आणि पिळवटला जातो. हे थांबवण्यासाठी भारतीय पेटंट कायद्यात फार उत्तम सुविधा आहेत. त्यावर जगभरातून, विशेषतः अमेरिका आणि युरोपातून प्रचंड टिका होते, भारतावर प्रचंड दबाव आणला जातो. पण आपलं सरकार बधत नाही. आमच्या जनतेचं आरोग्य तुमच्या पेटंटसपेक्षा जास्त महत्वाचं आहे हे ठणकावून सांगत राहते. रेडक्रॉस,  डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स सारख्या सेवाभावी संस्थांना गरीब देशात काम करण्यासाठी morning स्वस्त पण उत्तम दर्जाची औषधं भारत पुरवत राहतो. पण त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपसारख्या दर्जाबाबत अत्यंत जागरूक असणाऱ्या देशांचाही सगळ्यात मोठा निर्यातदार बनतो. भारत  हे कसं करू धजावतो हे जाणून घेण्यात इतर देशातल्या लोकांना प्रचंड रस असतो. आर्जेन्टिना, इंडोनेशियातले लोक जेंव्हा येऊन सांगतात की “सामान्य नागरिकांना औषधं स्वस्तात मिळावी म्हणून काय करायचं हे भारताने आम्हाला शिकवलंय आणि तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावर आम्ही चालतोय”,  तेंव्हा ऊर अभिमानाने भरून येतो.

सगळ्या जगाची फार्मसी  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या औषधनिर्माण उद्योगाचा आपण एक लहान बिंदू इतका छोटा भाग आहोत या विचाराने फार कृतार्थ  वाटतं! आणि म्हणूनच हे ऋण फेडण्यासाठी माझ्यासारख्या या बिंदूने केलेला एक छोटासा प्रयत्न, उचललेला एक खारीचा वाटा,  म्हणजे हे पुस्तक आहे. भारताबद्दल अभिमान वाटण्याचे आणखी एक कारण हे पुस्तक वाचकांना नक्की देईल याची मला नुसती आशा नव्हे तर खात्री वाटते!

समाप्त 

© सुश्री मृदुला बेळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares