मराठी साहित्य – विविधा ☆ प्रिय कवितेस.. ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

☆ विविधा ☆ प्रिय कवितेस.. ☆ श्री मुबारक उमराणी ☆

प्रिय कवितेस,

सप्रेम नमस्कार

अलीकडे आधुनिकीकरणामुळे पत्र म्हणजे दुर्मिळ. म्हणून मी ठरवलं मेसेज वगैरे कारण्यापेक्षा सरळ पत्र पाठवावे!  आणि हे पत्र पहिलचं आहे. मला जसं जमलं समजलं तसं लिहिलं, चुकलं तर माफी असावी. शारदेच्या पदकमली रममाण होणा-या विणेच्या झंकारातून शब्द बद्ध होणा-या, कधी आसवातून बरसणा-या, कधी हास्यातून फुलणा-या, कधी मुक्त विहार करणा-या, कधी कारण नसतांना निराशेच्या गर्द खाईत नेणा-या  शब्दात तूच लपलिस. तू कशी आहेस माहित नाहीस, हवेततरंगणाऱ्या, सळसळणा-या झाडांच्या पानात तूचआहेस, वेळूच्या बेटात मस्तपैकी शिळ घालत कान्हांच्या बासरीतून मंत्रमुग्ध विहार करणा-या वनराईच्या गाईच्या गळ्यातील घुंगुर माळांच्या नादमयी सुरात, मेंढपाळ्यांच्या काळ्या गर्द घोंगडीत त्याच्या दिडक्या चालीत आणि त्या रानभर चरणा- या मेंढरांच्या आवाजातील नाद मोहून टाकतो. सुंबरान मांडताना ढोलाच्या, टाळांच्या, कैताळाच्या नादमयी पायातील हालचाल, अंग अंग हेलकावे खाणारे त्यांचे देह पटक्याचा  सोगा वा-यावर भूरभूरताना अबीर गुलालात माळून गेलेल्या चेह-यावरील हास-या भावात तूच आहेस.

सकाळच्या काकडं आरतीत गाव सारं जागं करतांना अंग अंग प्रत्येकाच्या मनात देवत्वाचा भास तूच निर्माण करून, दिवसभरात काम करणा-याची उमेद, जि्द्द त्यातून निर्माण होणारी स्नेहरूपी वात्सल्यातही तूच आहेस. घमानं चिंब निजलेला हमाल पाठीवर असह्य वजन असतांना चालताना त्यांच्या तोंडी “जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणांचा वाजतो” म्हणता असह्य वजन कुठल्या कुठे पळून जाते अन् तो हवेत तरंगल्यासारखा चालायला, पळायला,हसायला लागतो. हे सर्व कविते, तुझ्यामूळेचं नाही का?

पण कधी कधी सुन्न करणा-या घटना घडतात तेंव्हा “रक्ताळले शरीर भडका जीवात झाला आईस सोडवाया येणार कोण बोला”.अशी आर्त हाक मारणारी तूच असतेस. तूच असतेसं होनाजी बाळा, आण्णाभाऊ साठे, बहिणाई, पी.सावळाराम, पठ्ठे बापूराव, ज्ञानेश्वर, मुक्ताई, जनाई, संत नामदेव, तुकारामाची गाथा, एकनाथांचे भारूड शाहिरांची ललकारी,  केशवसुतांची तुतारी, कवीच्या कवितेत, लेखकांच्या लेखनित तुच,फक्त आम्ही नाममात्र असतो.

आभाळभर गरजणा-या काळ्या ढगातील वीज तूच असतेस ढगांना बोलके करणारा “मेघदूत” आम्ही कसे विसरेन? काळ्याकुट्ट अंधारात. रात किड्यांच्या रातभर गुजंन करण्यात तूच सूरमयी होतीस. चंद्राचा प्रकाश शितलतेचा स्पर्श करतांना होणारी शितलतेची जाणीवात तूच नाही का असतेस. सकाळी  क्षितीज फुटते तांबडे तेंव्हा आभाळभर पसरून प्रकाश गीत गायेस, किती रूपे!  हळूवार रंग बेरंगी फुलणा-या पाखरांच्या चिवचिवाटात तूच जन्म घेऊन जगण्याची खुद्द देतेस. तुझे कितीही कसेही वर्णन केले तरी अपूर्णच! !

हिरव्यागार माळरानात रानफुलांच्या रंगात रंगून दवबिंदूच्या मोत्यांची रास रचून सर्वाचं परिसर मोतीमय करतेस. पतंग उडविणा-या निरागस मुलांत, वा-यावर उडणा-या पतंगाच्या मांज्यात आगळाच स्वर तूच निर्माण करतेस. माळभर आनंदाची उधळण होते. त्यातून गीत निर्माण होतात हे माणसाला, निसर्गाला जगण्याची जिद्द, प्रेरणा, उमेद अन् माणसाला गीत गात गात जगण्याचे शास्त्र शिकवतेस, सागराच्या तळापासून ते आकाशाच्या अनंता पर्यत फक्त तूझेचं गीत घुमत असते.

ज्यांनी ज्यांनी तुझी सेवा केली त्यांना तू अजरामर करून सोडलेस किती हे कार्य माणसांच्या पदी भरभरून देतेस, जो गातो तो तरतो, गानकोकिळा लता पासून आजच्या सोनू निगम पर्यताच्या मुखातून लयबद्ध. होऊन त्यांना प्रसिद्धिच्या अती उच्च पदी नेऊन त्यांचा उध्दार करतेस.

गौतमबुध्द, भगवान महावीर, मं. पैंगबर, गुरू नामक, प्रभू येशू, यांच्या मधूर वाणीतून धर्माची शिकवण देणारी तूचं होतीस.

देश भक्ताच्या, सैनिकांच्या, शेतक-याच्या कामगार, साधू संताच्या, कबिराच्या भक्तीत, मीरेच्या तल्लीनतेत, सुरदासच्या भक्तिभावात सा-या, सा-यात तुझाचं जयजयकार होतो.

किती वर्णावे तुज पहाडाच्या गिरीशिखरावर स्थैर्याची,सागर गार्भियांची, नदी, झरे चैतन्य पुष्प जीवनाला सुगंधित बनविण्याची प्रेरणा तूच दिलीस. पक्षी प्राणी यांच्या कंठातून येणा-या आवाजातून सप्तस्वरांची निर्मिती करायला लावलीस. मोरापासून षड्ज, बैलापासून ऋषभ, बोकडापासून गंधार, करकोच्या पासून मध्यम, कोकिळ पंचम, घोडा धैवत, हत्ती निषाद, या सारख्या स्वरांची निर्मिती तुच करून आपलं आगळवेगळ अस्तित्व दाखवलीस या स्वरांना भारतीयांचं दैवत म्हणून आळवतो.

सा- सांब सरस्वती, रे- रघुपति राघव, ग- गणपती, म- महादेव महेश्वर,प- परमेश्वर पशुपतीनाथ, ध- धनेश्वर, नि- निराकार नीळकंठेश्वर आणि संगीत ही मन प्रसंन्न करणारी अद्भूत जादू तुझ्यामुळेचं ऐकतोय आणि या निसर्गातील रंगसंगतीत अधिकचं खुलून दिसतेस. षड्ज होतो कमळासारखा, ऋषभ हिरवा मिश्रित पिवळा, गंधार सोन्यासारखा पिवळा, मध्यम कंद फुला सारखा, पंचम काळी, धैवत पिवळा तर निशाद ठिपक्यांची टिपक्याचा सगळा निसर्गचक्रांत तुझ्यासोबत मग काय कमी आहे बावीस रागांची रचना तर बघा प्राण्यांच्या पायाशी तुलना, धरती मातेला त्या पायांचा स्पर्श, चालताना होणारा एक नांदमय आवाज व्हावा  ऐकावा आणि सारे आयुष्य मंगलमय व्हावे म्हणूनचं असेल मोर दोन पाय, बैल चार, बोकड चार, करकोचा दोन, कोकिळ दोन घोडा चार, हत्ती चार असे बावीस रागांची निर्मिती म्हणूनच कविता तू कोणत्याही भाषेत ये तुला नाद, लय, ताल, स्वर, झंकार आहेचं सारी वाद्ये तुझा नाद मधुर करण्यासाठी स्वतःला शिक्षा करून घेत आहेत. त्या वेळीस संगीताच्या बरोबरीत आम्ही सारे वेडे होतो. थयथय नाचतो. कशाचे भान उरत नाही तू आहेस म्हणूनचं जगण्याला अर्थ आलाय!

आकाशाचा कागद समुद्राची शाई, झाडांची लेखणी  केली तरी तुझे गोडवे लेखन करता येणार नाही ते अपूर्णच राहील आणि अपूर्णतेतचं खरं जगणं आहे नाही का? कळत न कळत काही लिहायचे राहून गेलंतर राग मानू नकोस, समजून घे, मला तुझी सेवा करण्याची प्रेरणा दे!

हिचं इच्छा! तुझ्याकडे  काही मागणार नाही कारण न मागता तू नेहमीचं मला भरभरून देतेस, हा ओघ असाचं राहो हीच मनोमन कामना!

पुन्हा एकदा त्रिवार वंदन करतो. तुझा जयजयकार सा-या आसमंतात घुमो!

मी सदैव तुझाचं ऋणी राहीन हे ऋण मी कसे फेडू!

तुझाचं सेवक

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ताळतंत्र’..सुखी जीवनाचा मूलमंत्र! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ ‘ताळतंत्र’..सुखी जीवनाचा मूलमंत्र! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

‘ताल’ आणि ‘ताळ’ हे सख्खी भावंडं शोभावेत असे दोन शब्द. यांच्यात अक्षरसाध्यर्म तर आहेच आणि अर्थसाध्यर्मही. ‘ताल’म्हणजे लय. उदाहरणार्थ द्रूत, मध्य, विलंबित, किंवा एकताल, झुमरा, दादरा यासारख्या संगीताशी संबंधित अर्थाचा हा ताल आहेच.

शिवाय ताल या शब्दाचे ‘तट’ ‘बांध’ असेही अर्थ आहेत. ताल हा असा नियमबद्धता,नियमितपणा यांच्याशी संबंधित शब्द. म्हणूनच त्याची तालबद्ध तालशुद्ध अशी इतर बारकावे ध्वनित करणारी रूपे सुद्धा आहेतच.

‘ताळ’ या शब्दाच्या विविध अर्थांमध्ये ‘ताल’या शब्दार्थातला नियमितपणा ध्वनित होतोच.ताल आणि ताळ यांना मी सख्खी भावंडे म्हणतो ते यासाठीच.

‘ताळ’हा मेळ,मिलाप, सुसंगती, एकवाक्यता,नियंत्रण, मर्यादा अशा विविध रंगछटांचे अर्थ ध्वनित करणारा शब्द! ताळमेळ, ताळातोळा, ताळतंत्र हे सगळे ‘ताळ’ या शब्दाचेच सगेसोयरे.

पूर्वी गणिताचा पाया पक्का करणारे पाढे, पावकी, दिडकी, नेमकी,अडीचकी अशा आकड्यांच्या अनेकपटींची घोकंपट्टी हा शाळापूर्व अभ्यासाचा घरगुती रिवाजच असायचा. त्या काळात मूल सात वर्षाचं होऊन पहिलीसाठी प्रवेशयोग्य होईपर्यंत हा पाया घरीच अतिशय भक्कम करून घेतला जात असे. विविध शोध लावून सोईस्कर, सहजसोपे मार्ग शोधता शोधता हे सगळे हिशोब चुटकीसरशी करु शकणारा ‘कॅलक्युलेटर’ हाताशी आला आणि सगळे चित्रच पालटले. पालटलेच नाही फक्त तर ते चित्र काहीसे ‘विचित्र’ च होऊन बसले. हे सगळं ‘ताळ’या शब्दाचं विवेचन सुरु असताना आठवायचं कारण म्हणजे आमच्या बालवयात  सोडवलेली गणिताची उत्तरे अचूक आहेत का याची शहानिशा करून घेण्यासाठी गणित सोडवून झाले की त्याचा ताळा म्हणजे उलटा हिशोब करून पाहायला आम्हाला शिकवलं जायचं. ताळ म्हणजे जुळणी. त्याप्रमाणे गणितातला हा ताळा म्हणजे, आलेल्या उत्तराशी जुळणी करुन पहाणेच असे. हल्ली हे सगळं कालबाह्य झालंय हे खरं. त्यामुळे हा गणितातला ताळा आता अस्तित्वातच नाहीये.

हिशोबासाठी आलेल्या कॅल्क्युलेटरचा वापर सोपा वाटतो खरा पण हे वाटणं एक भासच ठरतं कधीकधी. कारण यामुळे ‘तोंडी हिशोब’ ही संकल्पना कालबाह्य झालेली आहेच शिवाय कॅल्क्युलेटर वापरताना आकडे किंवा चिन्हे प्रेस करण्यासाठी बोटे वापरावी लागतातच. आणि त्याचा कितीही सराव झाला, तरीसुद्धा बटणं प्रेस करण्यात कणभर जरी चूक झाली, तरी लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही. आणि ताळा करुन पहाण्याची सोय नसल्याने ती चूक चटकन् लक्षातही येत नाही. यंत्राचा असा सोयीसाठी उपयोग करता करता आपण त्याच्या किती अधीन होत होत परस्वाधीनही झालो आहोत याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण! जगण्यातलं ताळतंत्र हरवून बसायला निमित्त ठरणारी कॅल्क्युलेटरच्याच मोबाईल, टीव्ही यासारख्या इतर भाऊबंदांची अशी अनेक उदाहरणेही देता येतील.

काळानुसार बदल अपरिहार्य असले तरी ते किती आणि कसे स्वीकारायचे याचं ‘ताळतंत्र’ न राहिल्याने आपण सर्वार्थाने ‘परतंत्र’होत जातोय याचे भान आपण हरवून बसलो आहोत. विकासात लपून बसलेला विनाशही आपण आपल्याच नकळत  कवटाळतो आहोत.

‘ताळतंत्र ‘म्हणजे जीवन शैलीतल्या असंख्य घटकांच्या अचूकतेचे मंत्र’अशीही मांडणी करता येईल. जीवनपद्धतीतल्या पहाटे उठणे, मुखमार्जन, व्यायाम, खेळ, लेखन-वाचन, आपला पेहराव, आहारपद्धती,  संवाद,आदरातिथ्य, स्वयंपाक, पूजाअर्चा, विश्रांती, झोप अशा असंख्य घटकांबाबतचे कृतीनियम म्हणजेच हे मंत्र! त्यांच्या विविध पद्धती काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या असल्यामुळे त्या जाणीवपूर्वक नियमित, काटेकोर पद्धतीने पाळण्याचा प्रयत्न सर्वांनीच करायला हवा खरंतर. पण हेच ताळतंत्र न राहिल्याने निर्माण होणारे आरोग्य, स्वास्थ्य, मन:शांती समाधान, शरीर आणि मनाच्या क्षमता अशा अनेक बाबतीतले जटिल प्रश्न आता नित्याचेच होत आहेत. याची पुसटशी जरी जाणिव झाली आणि आपल्या जीवनशैलीतील शिस्त, आत्मसंयमन, नियंत्रण, मर्यादा, सुसंगती, एकवाक्यता अशा अनेक ‘ताळ’ अर्थांचे अचूक भान आपल्याला आले तरच नकळतही ताळतंत्र कधीच सूटू न देण्याची अत्यावश्यक सजगता आपण दाखवू शकू अन्यथा…?

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गप्पांची एक मैफिल संपली ☆ श्री चंद्रकांत बर्वे

श्री चंद्रकांत बर्वे

 ☆ मनमंजुषेतून ☆ गप्पांची एक मैफिल संपली ☆ श्री चंद्रकांत बर्वे ☆ 

प्रसिद्ध पत्रकार, मुलाखतकार, लेखक, नाटककार आणि माझे मित्र अशोक शेवडे यांनी आता या जगातून एक्झिट घेतली आहे. पण त्याच्याबद्दल लिहिताना मी तसा इमोशनल नाही होणार, कारण त्याच्या आठवणी जर जागवल्या तर त्या सगळ्या आनंदी आहेत. त्याला कुणीही कधीही दुर्मुखलेल पाहिलं नसेल.

ही बातमी समजल्यावर मी जेव्हा त्याच्या मुलीला राखीला फोन केला तेव्हा ती म्हणाली आज पहाटे ते गेले पण काल रात्रीपर्यंत आम्ही बोलायचो तेव्हा ते कायम आनंदी असायचे.

मी १९८५ मध्ये आकाशवाणी मुंबईला आलो तेव्हा त्याचा आणि माझा प्रथम परिचय झाला. तो आकाशवाणी आणि दूरदर्शन मध्ये अनेक छोटेमोठे कार्यक्रम करायचा. कोणत्याही कामानिमित्त आला तर तो बाकी सर्व स्टाफशी देखील भेटणार गप्पागोष्टी करणार असा त्याचा स्वभाव आणि मी तर गप्पिष्टच त्यामुळे आमची मैत्री होणं अगदी स्वाभाविक होतं. आमचा चहा पिऊन झाल्यावर मी सिगारेट पीत असे, पण त्याने मात्र कधी सिगरेटला स्पर्श केला नाही. तो स्टेट बँकेत कॅशीअर होता आणि तरीही त्याचे वेगवेगळ्या पेपरमध्ये फिल्मी आणि ललित लिखाण वगैरे चालू होतंच. एकदा आल्या आल्या त्याने मला गंभीरपणे विचारले १०० रुपये आहेत का? मला वाटलं काही तरी त्याला अडचण असेल. मी लगेच त्याला एक नोट काढून दिली. त्याने लगेच मला हसत हसत एक रुपयाच्या १०० नोटांचे बंडल दिले. त्या काळात एकेक रुपया कायम छोट्या मोठ्या खरेदीला उपयोगी पडायच्या. त्यामुळे तो कधी ऑफिसात आला की बरेचजण त्याला एकच्या नोटांचे बंडल मागत. त्याला या सगळ्या गोष्टी जमतात कशा? तर त्यावर त्याचं उत्तर म्हणजे त्याचे पब्लिक रिलेशन्स. आमच्या आंबटगोड कार्यक्रमाचे रेकॉर्डिंगच्या दिवशी त्याचे स्क्रिप्ट वेळेवर त्याचा एक माणूस आणून द्यायचा. फोर्टात बँकेचे काम आणून देणारा माणूस जाता जाता आकाशवाणीत स्क्रिप्ट देऊन जायचा. त्याचा मित्र परिवार मोठा होता आणि वेगवेगळ्या शासकीय आणि निम शासकीय ऑफिसातून देखील होता. पत्रकार असल्यामुळे सगळे नाटकवाले आणि मराठी फिल्मी लोक त्याचे मित्र झाले होतेच. शिवाय मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे यांच्या सारखे बडे राजकीय नेते देखील.

नोकरी करून तो मला म्हणाला मी नोकरी सोडणार आहे पण पुढे फिल्मी डायलॉग मारला. ‘सही समय और सही मौका’ आनेपर. आणि पुढे त्याने त्याप्रमाणे नोकरी सोडली.

माझीही आकाशवाणीतून दूरदर्शन अहमदाबादला बदली झाली. पण आकाशवाणीच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी माझ्या नावे मी एक आकाशवाणीच्या निर्मात्यांसाठी जनरल वर्कशॉप घ्यावे असे पूर्वीच ठरवले होते आणि त्याप्रमाणे माझ्यावर एक आठवड्याचे वर्कशॉप ची जबाबदारी आली. मीच वेगवेगळ्या विषयातील जाणकारांना घेऊन ते अहमदाबाद आकाशवाणीत कंडक्ट करायचे होते. मी त्यातला ‘मुलाखतीचे तंत्र’ हा विषय अशोकला दिला. हां पण इतर राज्यातील निर्माते सहभागी होत असल्याने हिंदी किंवा इंग्रजीतून सोदाहरण लेक्चर अपेक्षित होतं. अशोकने हिंदीतून आपले आपले सादरीकरण सुरु केले. पहिल्या पाच मिनिटात भरपूर हशा मिळाला, आणि मग त्याने मुलाखतीच्या किंवा भाषणाच्या सुरुवातीला श्रोते हसतील किंवा उत्सुकतेने ऐकू लागतील हा पहिला मंत्र सांगितला. एकूण त्याच्या शिकवण्यावर सर्व निर्माते एकदम खुश झाले. मलाही हा अन्य भाषिक मंडळींना देखील इम्प्रेस करू शकतो हे समजलं.

पुढे काही वर्षांनी माझी मुंबई दूरदर्शनला बदली झाली. मी जरी ‘असिस्टंट स्टेशन डायरेक्टर’ म्हणून आलेलो असलो तरी मी केंद्रात नवीन होतो आणि अशोक तर बरेचदा येजा करायचा. त्यामुळे सुरुवातीला त्यानेच माझी बऱ्याच जणांशी ओळख करून दिली. केंद्रातील काहीजण तर मला अशोक शेवडेचा मित्र म्हणून ओळखत होते. पुढे मी एक फिल्मी कार्यक्रम करायला घेतला ‘चंदेरी सोनेरी’ अशोक म्हणजे मराठी फिल्म्सच्या माहितीचा एक्का असल्याने मुलाखतीची जबाबदारी त्याच्यावर. त्याने ती आनंदाने स्वीकारली. त्यासाठी आमच्या स्टुडिओ ची तारीख या फिल्मी लोकांची तारीख मिळवणे, त्यांना भेटून मुलाखतीची प्रश्नोत्तरे तयार करणे, अनुषंगिक कोणते फिल्मी कट्स लागतील त्याची उपलब्धता वगैरे बरीच कामे असतात पण त्यात त्याचे संपूर्ण सहकार्य मिळे, नव्हे ते तो आनंदाने करे. तो कोणालाही भेटीची वेळ घेतल्यावर जाताना स्वतः बुके घेऊन जायचा, तो वेळेत गेला नाही असे कधीही घडले नाही. त्याचे घर डोंबिवलीत आणि पावसाळ्याच्या दिवसात कधी गाड्यांचा खोळंबा होण्याची शक्यता असते, पण त्यामुळे कार्यक्रमात अडचण येऊ नये म्हणून शूटींगच्या आदल्या रात्री तो माहिमला आपल्या मुलीकडे राह्यला जायचा. टीव्हीवर कार्यक्रम ही त्याची नेहमी टॉप प्रायोरिटी असे. तो फिल्मी पत्रकार, आमचा कार्यक्रम फिल्मी त्यामुळे पार्टीची निमंत्रणे येत असत. त्यात मद्यपान असतेच असते. तो शेकडो पार्ट्याना गेला असेल पण त्याने कधीही एक पेगही घेतला नाही. तो मला म्हणायचा की मी साधारणतः मराठी सिनेमा बद्दल जे वाईट जाणवेल ते निर्मात्याला सांगतो पण तसे शक्यतो लिहित नाही कारण मराठी सिनेमांना प्रोत्साहित करावे असे मला वाटते. आमच्या चंदेरी सोनेरी कार्यक्रमाचे शंभर एक कार्यक्रम झाले.

त्याने पुढे स्वतः प्राची देवस्थळी बरोबर ‘चंदेरी सोनेरी’ हा स्टेजशो सुरु केला. त्याचेही शेकडो कार्यक्रम झाले. एका कार्यक्रमात मी पाहुणा म्हणून गेलो होतो त्यावेळेस माझा परिचय करून देताना अशोक म्हणाला की मी त्याला १०० कार्यक्रम करण्याची संधी दिली. मी त्याला लगेच उत्तर दिले.

मी तुला फक्त एक कार्यक्रम दिला होता, पुढले कार्यक्रम तुला तुझ्या चांगल्या कामामुळे मेरिटमुळे मिळाले.

©  श्री चंद्रकांत बर्वे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चादर… अंथरतांना आणि पांघरतांना ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

परिचय 

नाव – सुश्री गायत्री हेर्लेकर
शिक्षण – M.Com., M.Phil.
मुळची कोल्हापूरची, सध्या वास्तव्य पुणे
कॉमर्स कॉलेज कोल्हापुर – 30-32 वर्षे प्राध्यापिका.
वाचन लेखनाची आवड

☆ विविधा ☆ चादर… अंथरतांना आणि पांघरतांना ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

दार किलकिले करुन, …हळुच आत डोकावुन सुनेने सांगितले, “आई, बेडशीटस मळलेल्या दिसतात. बदलता का आज? मशीनला लावुन टाकेन.”

खरंच की. केंव्हा बदलल्या तेही आठवत नव्हते, खरं तर पुर्वी असे होत नसे. नियमीत बदलणे व्हायचे.

अधेमधेही, काहीतरी कारण काढुन घरातील यच्चयावत कॉटवरच्या चादरी बदलायची सवय,  आवड.. हौस किंवा सोसच होता, खुप वेळा त्यासाठी बोलुन पण घेत होते. पण हल्ली कंटाळा, आळस किंवा कोण येतंय माझ्या खोलीत बघायला … काहीतरी निमित्त काढुन चालढकल होते.

आता मात्र मोबाईल बाजुला ठेवुन, ताडकन… वयाला झेपेल इतपत… उठले. चादरी…. हो माझ्या भाषेत चादरीच.. काढाव्यात म्हणुन कपाट उघडले. बेडस्प्रेड, बेडकव्हर, बेडशीट, नाहीतर अगदी पलंगपोस काहीही म्हणा, मला मात्र “चादर”च जवळची वाटते.

चादरींचा हा ढीगच होता कपाटात.

रंग गेलेल्या थोड्याशा विटलेल्या पण जुन्या आठवणी आवडत्या म्हणुन ठेवलेल्या, काही २, ४वेळा धुऊनही खळ न गेलेल्या, टरटरीत वापरायला टाळाटाळ होणार्या, तर काही” “निमित्त्याने काढु”, “फारशी आवडली नाही, द्यायला होईल कुणालातरी ऐनवेळी” म्हणुन कोर्याकरकरीत लेबल ही न काढलेल्या, तर काही नेहमीच्या वापरातल्या. विविध प्रकारच्या रंगबेरंगी पानाफुलांच्या, जॉमेट्रिक डिझाईनच्या, बाटीक प्रिंट, वारली प्रिंट, पॅचवर्क,  दोरीवर्क, विणलेल्या, हौसेने पेंट केलेल्या, आणि हो काही अगदी प्लेन सौम्य रंगांच्या. राजस्थान, गुजराथ, सौराष्ट्र, बंगाल, आसाम, काश्मीर, दक्षिण भारत, मध्य प्रदेश,अशा आसेतु हिमाचलातील अनेक प्रांतातील वैशिष्टे असलेल्या, काही तर परदेशी जन्मस्थान, आणि काही अगदी ओसरी पडवीतल्या ईचलकरंजी, सोलापुरच्या सर्वजणी सुखाने नांदत होत्या माझ्या या संग्रहात.

ही कोलकत्ता ट्रीपमधली,तर ती मैत्रिणीने बडोद्याहुन पाठवलेली.

नवर्याने कधीनाही ते एका लग्नाच्या वाढदिवसाला आणलेली, आणि आईला चादरींची आवड म्हणुन लेकीने वेळोवेळी आणलेल्या. लग्न_मुंजीत मिळालेल्या, नॅपकिन टॉवेल आणायला गेल्यावर खुपच आवडल्या म्हणुन घेतलेल्या, अन् हो नातींनी online मागवून दिलेल्या. प्रत्येक चादरीची वेगवेगळी आठवण. डबल, सिंगल, दिवाणावरच्या, अंथरायच्या, पांघरायच्या… किती प्रकारच्या आहेत.

कुठली जोडी सॉरी सेट काढावा हे ठरवतांना विचाराच्या धाग्यांत गुंतत च गेले.

काय म्हणाली सून, “”बेडशीटस मळल्यात, “आपल्या भाषेत “चादर मळली आहे,” डोक्यात काहीतरी चमकले, मनात आले, आपल्या आयुष्याची चादरही मळायला लागली, नव्हे मळली च आहे. नकळत तोंडातुन शब्द बाहेर पडले,

“चदरिया झिनी रे झिनी

राम नाम रस भिनी रे..”

एक छान भजन. मला आवडणारे. संत कबीरदासांचे. संतमंडळींची जीवनाकडे बघायची दृष्टीच किती वेगळी असते ना? अशी भजने, कोणत्याही गायकाच्या आवाजात, कोणत्याही शैलीत, डोळे मिटून, शांतपणे ऐका. शब्द कानावर पडतात पण मन गुंतते ते शब्दाशब्दातुन प्रतित होणार्या भावार्थातच. शरीराला दिलेली चादरीची उपमा मनात कुठेतरी खोलवर जाऊन रुजते. कमलपुष्पाच्या चरख्यावर ९, १०महिने विणायला लागलेली ही चादर, आपल्याला मर्यादित काळापुरतीच, कबीराच्या भाषेत “दो दिन”च मिळालेली असते.

आपल्या कर्माने “मैली” होते. मग संतांना वाटते, अन् ते भगवंतांना विचारतात अशा अर्थाचे एक भजन,

“मैली चादर ओढ के कैसे

द्वार तिहारे आऊं?”

कारण त्यांनाच माहित असते की भगवंताच्या भक्तीने, नामस्मरणाने ती निर्मल करता येते. अनेक भक्तशिरोमणींनी असे केल्याचे दाखले आहेत.

चादर म्हणजे कापड, वस्त्र. गीतेत, भगवंतांनी मनुष्यदेहाला दिलेले वस्त्राचा रुपक सर्वपरिचित आहे. संदर्भ, दुसरा अध्याय, २२वा श्लोक, “वासांसि जीर्णानि”.

आपण सामान्य माणसेही, चादर आणि वस्त्राचा संबंध शरीराशीच जोडतो. ऊपयोग जाणतो तो संरक्षणाचा. शरीराला इजा पोहचू नये, दुखापत होऊ नये याच हेतूने वापर करतो. अंथरुणात आणि पांघरुण म्हणुन. ती मळु नये म्हणुन काळजी घेतो.तरीही मळतेच. मग पाणी, साबण वापरुन स्वच्छ करतो, या शरीररुपी चादरीबाबत तसे करता येणार नाही का?

भगवंतनामावर विश्वास आणि सत्विचार, सत्संगती, सत्कर्म ही त्रिसुत्री लक्षात ठेवली पाहिजे, चादर अंथरतांना आणि पांघरतांना.

 

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोरोनाबरोबरचं वर्ष – २०२० -२०२१ ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ कोरोनाबरोबरचं वर्ष – २०२० -२०२१ ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय १२ मार्च २०२१ ला! मागील वर्षी 12 मार्चला आम्ही दुबई पुणे ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ने पुण्याला येण्यासाठी निघालो. त्याआधी तीन-चार दिवसच आम्हाला ‘कोरोना’ म्हणजे काय ते कळू लागले होते. नातवंडांना शाळेला सुट्ट्या दिल्या गेल्या. आमचं बाहेर फिरणं बंद झालं होतं. तिथल्या न्यूज पेपर ला येणाऱ्या बातम्यांवरून ब्राझील,इटली, इंग्लंड आणि युरोप मधील कोरोनासंबंधी ची माहिती थोडीफार कळली होती, पण  त्याची तीव्रता अजून जाणवली नव्हती. जावई दुबईला एमिरेट्स एअर्वेज मध्ये असल्याने त्यांना बदलती परिस्थिती लक्षात येत होती. दहा तारखेला त्यांनी आम्हाला भारतात जायचे असेल तर लवकर निघावे लागेल, कदाचित् फ्लाइट्स बंद होण्याच्या शक्यता आहेत आणि एकदा बंद झाल्या की पुन्हा कधी सुरू होतील याची शाश्वती नाही याची कल्पना आली, त्यामुळे आम्ही लगेच 12 तारखेला निघायचा निर्णय घेतला. एअरपोर्टवर आलो तेव्हा नेहमीचे आनंदी, उत्साही वातावरण नव्हते. सर्वजण एका भयाण शांततेत, गंभीर चेहऱ्याने मास्क वापरताना बघून आमच्याही मनावर दडपण आले. आम्हीही मास्क घेतले होतेच, बरोबर सॅनिटायझर ही होते पण या सगळ्याची इतकी काय गरज आहे, असंच वाटत होतं! पहाटे पुणे एअरपोर्ट ला पोहोचलो. तिथेही टेंपरेचर घेतले गेले, बाकी काही त्रास नाही ना, याची चौकशी झाली. आम्ही अगदी ‘ओके’असल्याने हे सर्व कशासाठी? अशीच भावना मनात होती. आम्हाला घेण्यासाठी मुलगा एअरपोर्ट वर आला होता, त्याच्या गाडीतून घरी जाताना त्याने आम्हाला परदेशातून आल्यामुळे लागण झालेले काही कोरोनाचे पेशंट पुण्यात आले आहेत हे सांगितले, त्यामुळे बऱ्याच लोकांना क्वाॅरंटाईन मध्ये ठेवल्याचे ही सांगितले.आम्ही तेव्हा मनानेच निर्णय घेतला की आपणच स्वतःला क्वाॅरंटाईन करून घ्यावे! त्याप्रमाणे घरात एकदा जे पाऊल टाकले ते जवळपास एक महिना बाहेर आलोच नाही! अर्थात मुलगा समोरच राहत असल्याने त्याचा पूर्ण सपोर्ट होता!

ते दिवस अक्षरशः स्थानबद्धतेचे  होते. पोलीस येऊन चौकशी झाली. कॉर्पोरेशन कडून लोक येऊन गेले. हातावर क्वाॅरंटाईनचा शिक्का मारला! शिवाय आसपासच्या लोकांच्या ‘हेच ते दुबई हून आलेले लोक’ असे दाखवणार्या नजरा, या सगळ्या गोष्टींचा नकळत मनावर परिणाम होत होता. त्यावेळचे ते दिवस आठवले की,  मला पूर्वीच्या काळी समाज बहिष्कृत लोकांना कसे वाटत असेल याची जाणीव सतत मनाला होत असे! त्यामुळे मन अधिकच अंतर्मुख झाले!त्रस्त असलेल्या मनाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडू लागले आणि नकळत अनेक लेख आणि कविता लिहिल्या गेल्या. तो एकांतवास एका दृष्टीने फारच फायदेशीर ठरला! स्वतःच्या मनाशी संवाद घडू लागला! मोबाईल वरून जवळच्या व्यक्तींशी बोलता येत होते एवढाच फक्त माणसांची संवाद!

त्या काळात कोरोनाचे पेशंट वाढले, मधेच लॉकडाउन चालू होता, दूध, भाजी, किराणा या गोष्टी वेळच्या वेळी मिळतील ना अशी साशंकता  सतत मनात असे!आयुष्यात कधी न पाहिलेले अशा प्रकारचे दिवस होते ते! जगात सगळीकडे कोरोनाचा प्रभाव दिसत होता. दुःखात सुख म्हणजे आम्ही परदेशातून स्वदेशात वेळीच आलो होतो! आम्ही आलो आणि दुसर्‍या दिवसापासूनच दुबईहून येणाऱ्या फ्लाईटस् बंद झाल्या. तिथे मुलगी,जावई यांच्या घरीच होतो, तरीसुद्धा आपला देश, आपलं घर हे वेगळेच असते! गेले पूर्ण वर्ष या कोरोनाच्या छायेतच चालले आहे, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही द्रुष्टीने त्रासदायक च गेले.

अजूनही कोरानाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही. कोरोनाच्या लसीचा एक डोस पार पडला आणि एका मोठ्या दिव्यातून बाहेर आल्या सारखं वाटले. अजून 28 दिवसांनी दुसरा डोस!’कोव्हिशिल्ड’ चे शिल्ड वापरून पुन्हा एकदा जीवनाला नव्याने सामोरे जायचेय! जगावर आलेल्या या संकटाला माणसाने धीराने तोंड दिले आहे. नकळत एक वर्ष डोळ्यासमोर उभे राहिले! कोरोनाच्या २०२० सालाने तसं माणूस बरेच काही शिकला! निसर्ग आणि माणसाने एकमेकाशी संलग्न राहिले पाहिजे हे कोरोनाने शिकवले! प्रगतीच्या नावाखाली माणसांकडून मानवी मूल्यांची जी घसरण चालली होती, ती थोपवण्याचे काम या कोरोनाने केले आहे एवढे मात्र नक्की!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

१० मार्च २०२१

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २२) – ‘सुरसकथा’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग – २२) – ‘सुरसकथा’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

वाद्यवर्गीकरणपद्धतीनुसार वाद्यांचे विभाजन कोणत्या प्रकारांमधे होते हे आपण गेल्या दोन-तीन भागांत पाहिले. वाद्यांच्या बाबतीत आणखी थोडा मागोवा घेत गेलो तर जुन्या ग्रंथकारांच्या कृपेने काही मनोरंजक गोष्टी हाती लागतात. भगवान शंकरांचा डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य मानलं गेलं आहे. त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर शंभू महादेव नृत्य करू लागले. त्याला तालसंगत करण्यासाठी ब्रम्हदेवाने एका अवनद्ध वाद्याची निर्मिती केली. त्याचा वाजवायचा भाग अर्थातच कातड्यानं मढवलेला होता. मात्र ढाचा मातीचा होता म्हणून त्या वाद्याला मृद्‌+अंग म्हणजे मृदंग म्हटलं गेलं. शिवपुत्र श्रीगणेशांनी हे वाद्य त्यावेळी वाजवलं. मृदंगाच्या उत्पत्तीची अशीआख्यायिका आहे. आणखी एका कथेनुसार वृत्तासुराला मारल्यानंतर आनंदित झालेले भगवान शंकर तांडवनृत्य करू लागले. त्यांच्या नृत्याला तालसंगत करण्यासाठी गणपतीने जमिनीत एक खड्डा खणला, त्यावर मृत वृत्तासुराचं कातडं पांघरलं आणि त्यावर तो ताल वाजवू लागला.

भगवान शंकरांच्याच बाबतीत आणखी एक कथा आढळून येते. ते कैलास पर्वतावर तप करत असताना मुरजासुर नावाच्या राक्षसाने त्यांना त्रास देऊन त्यांचा तपोभंग केला. त्यामुळं क्रोधित झालेल्या शंकरांचं त्याच्याशी तुंबळ युद्ध होऊन त्यात मुरजासुर मारला गेला. हात-पाय-मुंडकं तुटलेल्या अवस्थेतलं त्याचं शव तिथून गिधाडांनी उचलून नेलं. त्यांनी ते पंजांत धरून त्यातलं मांस बऱ्यापैकी खाल्लं. मात्र जास्ती वजनामुळं ते शरीर त्यांच्या पंजातून सुटून खाली एका झाडावर पडलं. काही काळानंतर ते शरीर पूर्ण वाळून त्याचा फक्त वाळक्या ताठरलेल्या कातड्याचा पोकळ सांगाडा झाडावर शिल्लक राहिला.

एके दिवशी जोरात वारं सुटल्यामुळं झाड्याच्या फांद्या त्या कातड्यावर आपटून सुंदर नाद निर्माण होऊ लागला. वनभ्रमण करत असलेल्या शंकरांनी तो सुंदर नाद ऐकला आणि उत्सुकतेपोटी त्या आवाजाच्या दिशेने येत त्या झाडाजवळ पोहोचले. ते कातडं पाहून त्यांना घडलेली सगळी घटना आठवली. त्यांनी त्या कातडी ढाचाच्या एका बाजूला डाव्या हातानं आघात केल्यावर ‘ता’ हा बोल उत्पन्न झाला आणि दुसऱ्या बाजूला उजव्या हाताच्या आघाताने ‘घी’ हा बोल उत्पन्न झाला. त्यापुढंही ते दोन्ही हातांनी त्यावर आघात करत राहिले तसे वेगवेगळे बोल उत्पन्न झाले. थोड्यावेळानं शंकर तिथून निघून गेले.

त्यानंतर एकदा ते पार्वतीसोबत पर्णकुटीत बसले असताना पावसाचे थेंब कुटीच्या वाळलेल्या पानांवर पडू लागले तसा सुंदर नाद उत्पन्न झाला. तो नाद पार्वतीला खूपच आवडल्यानं तिनं शंकरांना विनंती केली कि त्यांनी अशा प्रकारचं काही वाद्य तयार करावं ज्यातून अशा सुंदर नादांची निर्मिती होईल. तेव्हां त्यांनी तिला मुरजासुराची कथा सांगितली आणि त्यातून उत्पन्न होणऱ्या विविध वर्णांचं विस्तृत वर्णन केलं. पुढं असं जे अवनद्ध वाद्य अस्तित्वात आलं त्याला ‘मुरज’ हे नाव मिळालं. मात्र दुसऱ्या एका ग्रंथातील वर्णनानुसार ‘मर्दल’ नावाच्या वाद्याची निर्मिती ही ‘मुरज’ नावाच्या राक्षसाच्या मृत शरीरातून झाली आणि ती श्रीकृष्णांनी केली.

अवनद्ध वाद्यांची माहिती घेताना सरोवरातील कमळाच्या पानांवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे निर्माण होणारा कर्णप्रिय नाद ऐकून स्वाती नामक ऋषींना तालवाद्यनिर्मितीची प्रेरणा मिळाली हे आपण पाहिलं. त्यापुढची कथा म्हणजे तो सुंदर नाद त्यांनी आपल्या मनात अगदी साठवून घेतला आणि मग ते आपल्या आश्रमात परतले. तिथं त्यांनी विश्वकर्म्याला हा वृत्तांत सांगून त्या सुंदर नादाचं वर्णनही केलं आणि त्याला असा नाद निर्माण करणारं वाद्य तयार करायला सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या नादांचं वर्णन मनात ठेवून तसे नाद निर्माण होतील असं मातीचा ढाचा असलेलं जे वाद्य विश्वकर्मानं तयार केलं ते ‘पुष्कर’ ह्या नावानं ओळखलं गेलं. कालमानानुसार ह्याच वाद्याच्या आधाराने लाकूड, धातू इ.. गोष्टींचा वापर करत प्रयोग होत राहिले आणि त्यातूनच मृदंग, पटह, दर्दुर अशा वाद्यांची निर्मिती  झाली.

रामायणकाळात आजच्या रागसंगीतासारख्या शैलीला गंधर्वगान म्हटलं जायचं. प्रभू श्रीरामचंद्र स्वत: गंधर्वगानप्रवीण होते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र लव-कुशही संगीतज्ञ असल्याचा उल्लेख आढळतो. रावणही मोठा संगीतज्ञ होता. त्यानं निर्माण केलेल्या रावणास्त्र किंवा रावणहस्त ह्या तंतुवाद्याचा उल्लेख प्राचीन वाद्यांमधे आढळून येतो. लंका आणि भारताच्या काही भागात आजही हे वाद्य कालानुसार होत गेलेल्या परिवर्तित स्वरूपात उपलब्ध आहे. वीणेच्या प्रकारांमधेही ‘रावणी’ नावाच्या वीणेचा उल्लेख आढळतो. आपल्याकडील राजस्थान प्रांतातलं रावणहाथा हे वाद्य ह्याच ‘रावणहस्त’चं परिवर्तित रुपडं असावं जे पुढं आजच्या सुप्रसिद्ध व्हायोलिन ह्या वाद्याचा आधार मानलं जातं.

भगवान श्रीकृष्णांच्या केवळ मानवालाच नाही तर निसर्गातील प्रत्येक पशु-पक्षी, वृक्षवेलींना किंबहुना अवघ्या विश्वालाच संमोहित करणाऱ्या जादुई बासरीवादनाविषयी तर आपल्याला कितीतरी सुरस कथा वाचायला मिळतात. श्रीकृष्ण हे महान संगीतज्ञ होते आणि त्यांच्यासारखा श्रेष्ठ बासरीवादक पुन्हा कधीच पृथ्वीवर अवतरला नाही. महाभारतात उल्लेखिलेले श्रीकृष्णाचा ‘पांचजन्य’नामक शंख आणि अर्जुनाचा ‘देवदत्त’नामक शंख हे मुख्यत्वे युद्धाच्यावेळी काही संकेत देण्यासाठी वापरले गेले तेही एक प्रकारचं सुषीर वाद्यच! जसे श्रीकृष्ण सर्वोत्तम बासरीवादक तसाच अर्जुन हा सर्वोत्कृष्ट वीणावादक असल्याचं मानलं जातं. अर्जुनही उत्तम संगीतज्ञ होता. पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात अर्जुनानं बृहन्नडा नावानं स्त्रीरूप धारण करून विराट राजाची कन्या उत्तरा हिला संगीतशिक्षण देण्याचं काम पत्करलं होतं. अर्जुनाचं वीणावादनही समोरच्याला भान विसरायला लावायचं आणि ह्या कालखंडातील संगीताच्या विकासाचं मोठं श्रेय अर्जुनाकडं जातं, असं मानलं गेलं आहे.

बनारस घराण्याचे शहनाईवादक शहनाईची उत्पत्ती श्रीमहादेवांच्याच शृंग किंवा सींग ह्या सुषीर वाद्यातून झाली असं मानतात. ह्या वाद्याचं वादन पहिल्यांदा शिव-पार्वतीमीलनाच्या शुभसमयी झाल्याचंही मानलं जातं.  विवाहादि शुभकार्यप्रसंगी शहनाईवादनाची प्रथा आजतागायत आपल्याला पाहायला मिळते. त्या पद्धतीचं मूळ दर्शविणारी ही कथा जुन्या ग्रंथांमधे आढळून येते.

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इन्द्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिन-21 मार्च ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ इन्द्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिन-21 मार्च ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित☆ 

शब्दांच्याही पल्याड असते माझी कविता

केवळ रसिकालाही दिसते माझी कविता

दिसते म्हणजे तशीच असते असेही नाही

आभासाच्या  गावी वसते माझी कविता.

?  ?  ?  ?

मी शब्दांसंगे अविरत भांडत असतो

अन् अर्थांचा मी काथ्या कांडत असतो

जे मुशीतुनी तावून सुलाखून निघते

ते कांचन मी बाजारी मांडत असतो.

               –  इलाही जमादार  

अशी असावी कविता, फिरून

तशी नसावी कविता, म्हणून

सांगावया कोण तुम्ही, कवीला

आहात मोठे ?–पुसतो तुम्हाला.

      – कवी   केशवसुत.

असे कितीतरी नामवंत कवी आणि त्यांच्या कवितांचा उल्लेख करता येईल.

‘Poetry is the spontaneous overflow of powerful feelings’ हे William Wordsworth यांचे सुप्रसिद्ध  विधानही आपणा सर्वांना माहित आहे. या सर्वांचा उल्लेख आज करण्याचे कारण म्हणजे आज जागतिक कविता दिन साजरा होत आहे.

साहित्यातील काव्यप्रकाराचा सन्मान करण्याचा आजचा दिवस ! युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आणि 21/03/1999 पासून दरवर्षी 21 मार्च जागतिक कविता दिन म्हणून साजरा होऊ लागला. “कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते” असे युनेस्कोच्या महासचिवानी म्हटले आहे. भाषिक विविधतेला समर्थन आणि लुप्त झालेल्या भाषा ऐकण्याची  संधी  उपलब्ध करून देणे हा ही यामागचा उद्देश आहे. युनेस्कोने आपल्या जाहीरनाम्यात “to give fresh recognition and impetus to National, Regional and International poetry movements” असे म्हटले आहे.

आजचा दिवस म्हणजे जगातील  सर्व कवी, कवयित्री आणि काव्यप्रेमी रसिक यांच्या सन्मानाचा दिवस! चला,आपण सर्वजण त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काव्यरसाच हा मधुघट काठोकाठ भरून ठेवूया.

संकलन 

श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ती, स्वप्न, आणि पणती ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

☆ विविधा ☆ ती, स्वप्न, आणि पणती ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

अंधार  सरेल,उजाडेल आणि सार लख्ख प्रकाशमान होईल. मग सार मळभ सरून आसमंत स्वच्छ दिसेल. हवं ते मिळेल आपल्याला. मग येईल समाधानान जगता.  म्हणून तिने प्रसन्न मनाने खूप प्रतिक्षा केली. वाट पाहून पाहून ती थकली, कंटाळली, अखेर वैतागली.

असा अंधाराचा अंदाज घेत कसं, किती आणि कुठवर जायच ? पण आशा मनाची,मरत नव्हती.‌सरत नव्हती. चाचपडत चाचपडत जगताना मनात धैर्य ठेऊन वावरताना तिला एक पर्यायी तेजाची ठिणगी असणारी पणती सापडली. खूप आनंद  झाला तिला. आता आपल्या या अंधारलेल्या वाटेवर थोडाफार  प्रकाश  पडेल. अडखळत चालणं संपेल. आश्वासक  पावलं टाकता येतील आयुष्याच्या वाटेवर. म्हणून तिने ती पणती  हळुवार  हातात घेतली.  पदराआड लपवली. पणती अधीक तेजाळली. आकर्षक व मोहमयी दिसू लागली. आशाळभूत होऊन  लाचावली ती.  तिने आपले लालचुटूक महतप्रयासान जपून ठेवलेले ओठ पदराआडच पणतीच्या प्रखर ज्योती जवळ नेले. तिला दाह जणवला. ती मुळीच घाबरली नाही. मन मात्र खंबीर ठेवून ती ज्योतीला म्हणाली.

“आता तूच काय तो माझा भक्कम आधार  आहेस माझ्या पुढच्या अंधारलेल्या आयुष्यात”.

पणती  परकीय होऊन हलकेच  हसल्याचा भास झाला तिला. ती सुखावली मनातून.  तिला वाटलं   पणतीच्या प्रकाशात पुढची सारी जीवनवाट प्रकाशमय  होऊन न्हाऊन निघेल, वाटनिश्चीत करून मिळणा-या सांद्रमंद  प्रकाशात  ती पुढे पुढे  निर्वेधपणे

चालतं राहिली. पुढे जाण्यापुरता सहवासाचा उजेड मिळतोय याचाच आनंद  तिला समाधान देत होता. तोच उजेडाची स्वप्न  रंगवायला साथ देणार होता तिला.  आनंदाने अंगभर नटलेली ती स्वप्नसुखाच्या राजरस्त्यावर

पुढे पुढे चालत असताना तिच्या मागे अंधाराची जडशीळ पावले पाठलाग करत येत आहेत याचे भानच राहीले नाही तिला. तो अंधार तिच्या नकळत तिच्या

साम्राज्यात  पुन्हा  प्रवेश करणार होता. हे तिला उमजलच नाही. करण ती स्वप्नं पहाण्यात  रंगुन गेली होती.

ती बेसावध असताना अचानक पाठीमागून  तिच्या डोक्यावर जबरदस्त तडाखा बसला. हातातील  पणती हातातून   गळून पडली. फुठली. तिचे तुकडे इतस्ततः विखरून गेले. तेजोमय प्रखरतेने जळणारी प्रकाश देणारी

वात  बाजुला पडली. वात काही काळ धुपली. मग सावकाश  शांत  झाली. आणि निपचित  पडलेल्या तिच्या स्वप्नाळू विश्वा भोवती अंधाराने आपला अंमल सुरू केला.तिला त्या अंधारात  किती लागल, ती शुद्धिवर आली की तशीच संपून गेली. हे कुणाला कधीच  कळणार नव्हत.कारण हे सारं घडलं होतं अंधारात, आणि अंधाराला कुठे डोळे असतात. पुन्हा जे घडतंय ते पहाण्या साठी. आता ती, तिची स्वप्न, ती पणती, आणि पणतीत जळणारी वात काळोखाच्या खोल खोल डोहात कायमची समाधीस्थ होऊन गेली आहेत.

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेल्फी ☆ श्री चंद्रकांत बर्वे

 ☆ विविधा ☆ सेल्फी ☆ श्री चंद्रकांत बर्वे ☆ 

बार्गेनिंग  

आजकाल जिला शॉपिंगची आवड नाही अशी बाई लाखात एक असेल. मला काही लाख बायकांचा अनुभव नाही पण आपलं लिहायचं म्हणून लिहिलं. असो! हां तशी माझी बायको जरी लाखात एक असली तरी शॉपिंगची आवड नसलेली ‘ती’  नव्हे. हां तर आम्ही कुठेही म्हणजे बाहेरगावी, मॉलमध्ये  किंवा परदेशी गेलो तर ती शॉपिंग हे करतेच करते. हरकत नाही, पण पुढे जे सुनावते ते साधारणपणे असं असतं. उदाहरणार्थ: ही पर्स बघितली?  मी कौतुकाने बघतो. “किती  रुपयाला घेतली असेन?”  हा प्रश्न कठीण असतो कारण मला एक किमतीचा अंदाज सांगायचा असतो. मी सांगितलेला अंदाज जर जास्त असेल तर हरकत नाही पण मी जर कमी सांगितली तर “तुला यातलं काही कळत नाही” असं ऐकावं लागतं. मी अशा वेळी उत्तर न देता ती वस्तू जास्त वेळ न्याहाळत बसतो आणि चेहऱ्यावर आवडल्याचे भाव मात्र आणतोच आणतो. मग तीच सांगते फक्त आठशे रुपये. मला तो खर्च जरी जास्त वाटला तरी मी तो माझ्या बोलण्यातून कळू देत नाही. आता ८०० रु देऊन पर्स घेतली एवढ सांगितलं असतं तरी चाललं असतं, पण नाही. फक्त या शब्दावर जोर देऊन ती सांगते. ती पुढे असं सांगते कि तो दुकानदार आधी बाराशे रुपये सांगत होता वगैरे. त्या दुकानदाराच काय जातय, तो आपल्या मालाची किंमत ‘वाट्टेल ती सांगेल’  असा माझ्या मनात आलेला विचार मी मनातच ठेवतो. थोडक्यात म्हणजे “मी बार्गेन करून स्वस्तात मिळवली” असा तिचा दावा असतो आणि मग ती लगेच आता गेल्या महिन्यात हॉटेल वेस्टइन मध्ये आपण गेलो होतो तेव्हा अगदी अशी पर्स मी तिथे शोकेस मध्ये अडीच हजार रुपयांना पहिली होती अशी अतिरिक्त माहिती पुरवते. सरतेशेवटी निष्कर्ष म्हणजे ती बार्गेन करण्यात हुशार आहे आणि बार्गेन म्हटलं की मी एकदम माझ्या फ्लॅशबॅक मध्ये जातो.

वेल, १९७९ साली मी महिनाभर दिल्लीला आकाशवाणीच्या ट्रेनिंग साठी गेलो होतो. आम्हा महाराष्ट्रातील प्रोड्युसर मंडळींचा प्रसिद्ध न्यूज रीडर नंदकुमार कारखानीस दिल्लीतील फ्रेंड, फिलोसॉफर आणि गाईड असायचा. मी करोलबागेत राहत होतो तिथले अजमल खान रोडवरचे मार्केट प्रसिद्ध. तिथे वाट्टेल ते मिळतं आणि स्वस्त मिळतं म्हणे. हां पण बार्गेन करावे लागतं. नंदकुमारने मला स्पष्ट सल्ला दिला “तो रस्त्यावरचा फेरीवाला जी किंमत सांगेल त्याच्या अर्ध्या पेक्षा कमी किमतीला ती वस्तू घ्यायची, अर्ध्या किमतीला सुद्धा नाही”. मी त्याचा सल्ला लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी मार्केट पहात फिरत होतो. एके ठिकाणी काही टीशर्ट्स छान दिसले. मला आवडले. मी पाहू लागलो. तो फेरीवाला म्हणाला ६५ रु.चा आहे पण तुम्हाला म्हणून मी ६० रुपयात देतो. मला ती किंमत जरा जास्त वाटली. मी काहीच बोललो नाही. तो एकदम गाडी चौथ्या गिअर वरून एकदम दुसऱ्या गिअर मध्ये टाकावी अशा थाटात म्हणाला चला ५० रुपयात घेऊन टाका. मी म्हटलं छे छे फार जास्त किंमत सांगताय. त्यावर तो म्हणाला टीशर्ट निट बघा तर खरं. माझ्या हातात त्याने टीशर्ट कोंबला. टीशर्ट होता छान,  पण मी न घेता निघण्याचा अभिनय करू लागलो. मग त्याने सरळ मला विचारले किती रुपयाला घेणार? त्याने बॉल माझ्या कोर्टात टाकला. मला गाडी पहिल्या गिअर मध्ये टाकणं आलं. मला नंद्कुमारचा सल्ला आठवला. “फेरीवाला जी किंमत सांगेल त्याच्या अर्ध्या पेक्षा कमी किमतीला ती वस्तू घ्यायची, अर्ध्या किमतीला सुद्धा नाही” मग मी मन घट्ट करून ६५ च्या निम्मे साडेबत्तीस हे लक्षात घेऊन सरळ ३० रुपये किंमत सांगितली. मग तो म्हणाला हे तुम्ही फारच कमी सांगताय, आम्हालासुद्धा या किंमतीत हे मिळत नाही वगैरे. मग मी ३५ रुपयाला तयार झालो. तोही उपकार केल्यासारखा तयार झाला. मी ते टीशर्ट्स पाहू लागलो, त्यातले दोन टीशर्टस मला आवडले. कुठला घेऊ या विचारात पडलो. तो दोन्ही घ्या म्हणाला पण ‘मला एकच हवाय’ असे म्हणून मी त्यातला एक घेतला. पैसे दिले. मी मनातून आपल्याला बार्गेनिंग येतं अस सर्टिफिकेट घेऊन निघालो. मग तो म्हणाला की हा दुसरा टीशर्ट देखील तुमच्या गोऱ्या रंगावर छान उठून दिसेल. मी त्याच्याकडून माल घेतल्याने त्याला माझा गोरा रंग दिसला बरका! (आणखी खरेदी केली असती तर माझे काळे केस, नंतर सरळ नाक देखील दिसले असते) मी देखील नुसते स्मित केलं आणि जाऊ लागलो तर तो म्हणाला हा दुसरा टीशर्ट मी तुम्हाला ३० रुपयाला देतो. माझा बार्गेनिंगचा आनंद जरा कमी झाला, पण मी नको म्हणून निघालो, त्याने मग मला ठीक है तो फिर मै आपके लिये २५ रुपयेमे देनेको तैयार हुं. माझा बार्गेनिंगचा आनंद पार मावळला. मग मात्र मी तडक काढता पाय घेतला पण जाताजाता मला त्याचा आवाज ऐकू आला “तो फिर आप कितनेमे लेना चाहते हो?” मनातल्या मनात स्वतःला दिलेल्या बार्गेनिंगचं सर्टिफिकेट मी टराटरा फाडून टाकलं.

©  श्री चंद्रकांत बर्वे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आजची मी….’बघ कस समाधान मिळत ते’ ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

 ☆ विविधा ☆ आजची मी….’बघ कस समाधान मिळत ते’ ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

 ए सखी, गृहिणी म्हणून कामाचा उरका पाडताना, तू करतेस का ग हे?

करत नसशील तर बघ करून….  ‘बघ कस समाधान होत ते’!!

सखी…पोरं, बाळ, नवरा सर्वांचा नाश्ता, डबे आटोपून, तव्यावर शेवटची भाकरी टाक!

टम्म फुगलेली तव्यावरची भाकरी तशीच ताटात घे…त्याच तव्यावर मेथी किंवा पालेभाजी पटकन  परतायची…आणि गरम भाकरी सोबत पटकन खा!नाश्ता म्हणून!! बघ कस समाधान मिळत ते!

भाजीच हवी असही नाही, नुसत गरम भाकरीवर तूप, मीठ, तिखट लाव, आणि मजेत भाकरी खा बघ कशी अंगी लागेल. तुही स्वतःला नाश्ता करायची सवय लावून घे न… आणि सांग कस समाधान मिळत ते!

केर झाला, फरशी झाली, धुण झालं, सगळं स्वच्छ झालं, पूजाही झाली, आणि इतर सगळी सकाळची काम आटोपून घड्याळात बघ एक वाजलाय…. सखी घे ताट आणि चौरस पण सात्विक आहार घे! कंटाळा करू नकोस. फळभाजी, पालेभाज्या, कोशिंबिरी, चटण्या  खायच्या. उरकायच म्हणून जेवण उरकू नकोस ह! दही अन ताक पोटाला शांत करत, ते घ्यायला विसरू नकोस, एकटीच असतेस घरी म्हणून भरभरही खाऊन सम्पऊ नकोस. अन्नाचा आस्वाद घेत, शरीर स्वास्थ्यासाठी जे उत्तम त्याचा विचार करत खा! जेवण झाल्यावर चार शेंगदाणे व गूळ तोंडात टाकायला विसरू नकोस… HB च्या गोळ्या का घ्यायच्या ग?? गुळाचा खडा तोंडात टाक बघ कस समाधान मिळत ते!

दुपारी एखाद अख्ख  फळ तू खा… स्वतःसाठी, सर्वाना फळ कापून देताना… स्वतःला किती घेतेस? येतंय का लक्षात? म्हणूनच म्हणते फलाहार पोटाला शांत करतो.. मग अस शांत झाल्यावर बघ, कस समाधान मिळत ते!

तुझे आवडते छंद जप, वर्तमानपत्र वाच. रोज काहीतरी लिहीत जा. व्यक्त हो, दाबून ठेऊ नकोस तुझ्या भावना. घरातली कशी सगळी माहिती तुला असते, तशी बाहेरची, वातावरणाची, राजकारणाची, घडामोडीची माहिती तुला  मिळत गेली की तुझ्या ज्ञानात आणखी भर पडेल… तुझा आत्मविश्वासही वाढेल. मग बघा कस समाधान वाटत ते!

सखी… संध्याकाळी चहा झाला की ४० मिनिटं तरी चालून ये हं! चयापचय, रक्ताभिसरण व्यवस्थित व्हायला हवं न? आणि हाच व्यायाम आपली ऊर्जाही वाढवतो, संध्याकाळी चणे फुटाणे टाक तोंड हलवायला! बघ कस समाधान होत ते!

रात्री लवकरच सगळं आवरत जा, स्वयंपाक वगैरे, कारण रात्री लवकर  जेवण केलं की पचतही व्यवस्थित. झोपताना एक कप कोमट दूध पी, बघ कस समाधान होत ते!

खाण्याचं, व्यायामाच, मनशक्तीच तंत्र संभाळलस तर का दुखतील पाय? का होईल HB कमी? का होईल calcium कमी? का येईल थकवा? का येतील दुखणी सांग ना?

अगदी झोपताना एका आसनावर ध्यानस्थ हो, सगळ्या शंका, कुशंका , चिंता, भय, विचार सोडून दे आणि ध्यानावर लक्ष केंद्रित कर!

त्या परमानंदासारखं आनंद दुसरा नाही!

हीच  ध्यानातील शांतता तुला शांत झोप येण्यास मदत करेल, तूझं आत्मबळ वाढवेल, तुझी शारीरिक व मानसिक ऊर्जा वाढवेल….

आता तरी स्वतः साठी जगून बघ, ‘मुक्तछंदी’!  सर्वाना वेळ देताना, काढ स्वतःसाठी वेळ! तुझ्या दैनंदिन कामाच्या यादीत, ही सुद्धा यादी नोट करून घेच अन……

…. मग बघ कस समाधान मिळत ते!

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares